मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रश्न सामाजिक स्वास्थ्याचा… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ प्रश्न सामाजिक स्वास्थ्याचा… ☆ श्री संदीप काळे ☆

छत्रपती संभाजीनगर जवळ घृष्णेश्वर मंदिर आहे. मी आणि माझा मित्र किशोर गुंजाळ दर्शनासाठी तिथे गेलो होतो. मंदिराच्या एका कोपऱ्यात एक स्त्री आणि एक पुरुष एकमेकांचे हात हातात घेऊन रडताना दिसले. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघालो.

थोड्यावेळाने माझे लक्ष झाडाखाली बसलेल्या काही लोकांकडे गेले. त्याच लोकांमध्ये ते दोघेही होते, ज्यांना मी मंदिरात रडताना पाहिले होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू अजूनही थांबले नव्हते. बाजूला बसलेली काही मंडळी त्यांना शांत होण्याचा सल्ला देत होती.

आम्ही थोडे पुढे गेल्यावर एका ठिकाणी जेवायला बसलो. त्या हॉटेलमधील एक माणूस दुसऱ्याला सांगत होता, “त्या झाडाखाली बसलेले जोडपे आहे ना, त्यांनी पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यांची मुलं परदेशात शिकत आहेत. पैसा, संपत्ती, सगळं काही आहे, पण समाधान नसल्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला होता. ” हे ऐकून मी गडबडीने किशोरचा हात पकडला आणि त्या माणसांमध्ये जाऊन बसलो.

‘जर त्या त्या वेळी कोणीतरी मार्गदर्शन करणारे असते, तर माझ्याकडून चुकीचे काम झाले नसते’, असे ठामपणे सांगणारे अनेक जण मी पाहिले आहेत. मात्र, येथे मी ते प्रत्यक्ष अनुभवत होतो.

ते जोडपे, ते कुटुंब आणि त्या सर्व माणसांशी मी संवाद साधला. त्या संभाषणानंतर मी इतका थक्क झालो की, माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. मी ज्यांच्याशी बोलत होतो, त्यांची नावे अर्चना देशमुख आणि सतीश देशमुख.

अर्चना देशमुख या मूळच्या यवतमाळच्या, पूर्वाश्रमीच्या अर्चना पाटील. त्या मराठवाड्यात न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. सतीश देशमुख हे मराठवाड्यातील एक मोठे उद्योजक आहेत. त्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. त्यांना दोन अपत्ये झाली. मात्र, काही वर्षांतच सतीश आणि अर्चना यांच्यातील मतभेद टोकाला पोहोचले आणि अखेर त्यांनी घटस्फोट घेतला.

सतीश आणि अर्चना यांचा मुलगा संकेत हा अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) क्षेत्रात कार्यरत आहे, तर त्यांची मुलगी सत्यभामा ही परदेशात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. घटस्फोटानंतरही सतीश यांच्या आई-वडिलांपासून अर्चनाच्या आई-वडिलांपर्यंत, तसेच त्यांच्या दोन्ही मुलांपर्यंत सर्वांचे नाते घट्ट राहिले. मात्र, सतीश आणि अर्चनाचे नाते मात्र तितकेच ताणले गेले होते.

दोघांचेही स्वभाव अतिशय टोकाचे होते. दोघेही प्रतिष्ठित आणि उच्च सामाजिक स्थान असलेले व्यक्ती असल्यामुळे त्यांना मन मोकळे करणे सहज शक्य नव्हते. पण खोलवर विचारल्यानंतर, ते दोघे हळूहळू व्यक्त होऊ लागले.

अर्चना सांगत होत्या, “आम्ही दोघेही आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी एवढे झटत होतो की, त्यात आमचे व्यक्तिगत आयुष्यच हरवून गेले. वैयक्तिक, मानसिक आणि शारीरिक गरजा असतात. त्या पूर्ण करण्यासाठी कधी कधी एक पाऊल पुढे टाकावे लागते, तर कधी एक पाऊल मागेही घ्यावे लागते. कधी नवऱ्याने समजून घ्यावे लागते, तर कधी बायकोने. मात्र, हे सगळे आम्ही दोघेच विसरलो होतो. त्यामुळे आमच्या नात्यात इतकी दरी निर्माण झाली की, अखेर घटस्फोट झाला. ”

पुढे त्या म्हणाल्या, “खरं तर सामाजिक आणि शारीरिक गरजा कुठेतरी पूर्ण होतील, या विचाराने आम्ही विभक्त झालो. मात्र, घटस्फोटानंतर आम्हाला मानसिक शांती मिळाली नाही. अखेरीस आम्ही समुपदेशनासाठी गेलो, आणि तिथेच आम्हाला सत्याचा साक्षात्कार झाला. मग आम्ही निर्णय घेतला की, आपल्याला एकत्र राहिले पाहिजे. त्यातूनच आम्ही पुन्हा एकत्र आलो. ”

सतीश आणि अर्चनांच्या नातेवाईकांमध्ये संजू पाटील नावाचे एक वकील होते. ते म्हणाले, “हे दोघेजण पुन्हा एकत्र आल्यावर, त्यांच्या आई-वडिलांनी ठरवलं की आपण ज्या घृष्णेश्वराला मानतो, त्याच्या समोर जाऊन नतमस्तक व्हायला पाहिजे. त्यामुळे आम्ही सगळेजण आज घृष्णेश्वर ला आलो. ”

संजू एकेक विषय मांडत होते, आणि मी त्यांना प्रश्न विचारत होतो. अर्चना आणि सतीश हे दोघे विभक्त का झाले, याची कारणे उघडपणे सांगणे सोपे नव्हते. पण हा प्रश्न केवळ त्यांच्यापुरता मर्यादित राहिला नव्हता, तो आता संपूर्ण समाजाच्या मानसिक आरोग्याशी निगडित झाला होता. संजू वकील आणि त्यांच्यासोबत असलेल्या मंडळींनी यावर माझ्याशी चर्चा केली.

मी अर्चना आणि सतीश दोघांनाही विनंती केली, “तुम्ही आज अनेक भांडणाऱ्या आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून नाती तोडणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी एक आदर्श आहात. ”

अर्चना माझ्याकडे पाहत शांतपणे म्हणाल्या, “आम्ही काही उदाहरण वगैरे नाही आहोत. जर उदाहरण असायचं असेल, तर त्यासाठी आम्हाला खूप वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. स्त्री आणि पुरुष निसर्गाने वेगळे बनवले आहेत, पण अनेकदा दोघेही ते वेगळेपण स्वीकारत नाहीत. त्यामुळे वाद होतात. ”

डॉ. विजय दहिफळे

सतीश म्हणाले, “तेरा दिवसांपूर्वीच मी संभाजीनगरमध्ये डॉ. विजय दहिफळे (93560 33230) यांच्या ‘सामाजिक स्वास्थ्य’ कार्यक्रमाला उपस्थित होतो. त्यांना मी याआधी टीव्हीवर पाहिले होते, पण त्या दिवशी प्रत्यक्ष ऐकले आणि मनावर जबरदस्त परिणाम झाला. त्याच कार्यक्रमातून मी माझ्या बायकोला फोन केला. रडत रडत तिने तो फोन उचलला आणि म्हणाली, ‘हा एवढासा फोन करायला तुला पंधरा वर्षे लागली?’”

 मी तिला उत्तर दिलं, “आता मला एकही मिनिट तुझ्यापासून दूर राहायचं नाही. तू जिथे कुठे आहेस, मला सांग, मी तुला भेटायला येतो. ” अर्चना संभाजीनगरपासून १५० किमी दूर होती, पण त्या क्षणी मी थेट तिच्याकडे पोहोचलो.

 मी तिला पाहिलं आणि जाणवलं—ती अजूनही तशीच होती. माझी वाट पाहत बसलेली, माझी काळजी करणारी. तिला फक्त माझ्याकडून प्रेमाची, आपुलकीची, सुरक्षिततेची जाणीव हवी होती.

 मी मात्र तिच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. तिला काय हवं आहे, कधी हवं आहे, हे समजण्याइतका मी सजग नव्हतो. पण ही डोळस समज आणि खऱ्या अर्थाने ‘पुरुष’ असण्याची अनुभूती मला डॉ. विजय दहिफळे यांच्या सहवासात आल्यावरच मिळाली. आम्ही दोघेही त्यांच्या क्लिनिक मध्ये जाऊन त्यांना भेटलो. त्यांनी आमचं गैरसमजुतींचं जडलेलं आवरण दूर करून सुखी वैवाहिक जीवनाचा मंत्र दिला.

 सतीश पुढे म्हणाले, “आमच्या घटस्फोटामुळे आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झाला. आमच्या मुलांना मानसिक वनवास भोगावा लागला. आम्ही दोघेही आमच्या वैयक्तिक आयुष्यात सुखी नव्हतो. अशा कित्येक समस्या या एका निर्णयामुळे उभ्या राहिल्या होत्या. ”

मी आणि किशोर दोघेही हे ऐकून थक्क झालो.

 डॉ. विजय दहिफळे यांचा संपर्क आणि पत्ता घेऊन आम्ही त्यांना भेटायचं ठरवलं. संभाजीनगरमध्ये न्यायालयाजवळच त्यांचा दवाखाना होता. सायंकाळची वेळ होती, आणि त्या वेळीही डॉक्टरांना हार-तुरे घेऊन भेटायला आलेल्यांची संख्या मोठी होती. आम्हीही भेटण्याच्या रांगेत उभे राहिलो.

 तिथे उपस्थित असलेल्या लोकांशी बोलत असताना लक्षात आलं की, बहुतांश लोक शारीरिक आणि मानसिक त्रासांतून बाहेर पडून आता सुखी जीवन जगत होते. माझ्या मनात एकच विचार घोळत होता– आपलं सामाजिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी अशा डॉक्टरांची समाजाला नितांत गरज आहे. सतीश आणि अर्चना यांच्यासारख्या शेकडो जोडप्यांनी नव्याने आयुष्य सुरू केलं होतं, आणि त्यासाठी डॉ. दहिफळे यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरलं होतं.

 सुख, मग ते शारीरिक असो की मानसिक, ते उपभोगण्यासाठी आपला जन्म कसा आहे? आपण कसे वागले पाहिजे? याबाबत समुपदेशन करणे, आणि गरज पडल्यास स्वतः विकसित केलेली औषधे लोकांना देणे यामध्ये डॉ. दहिफळे यांचा कमालीचा हातखंडा होता.

 मी डॉक्टरांनी जे काही उभं केलं होतं, ते बारकाईनं निरीक्षण करत होतो. तुटलेली लग्न आणि मनं पुन्हा जोडण्याच्या कार्यात डॉक्टरांनी जागतिक पातळीवर विक्रम केले होते. एक-दोन नव्हे, तर अडीच लाखाहून अधिक जोडप्यांना सामाजिक स्वास्थ्याचं महत्त्व पटवून देऊन त्यांनी त्यांना एकत्र आणलं होतं.

 मी स्त्रीरोगतज्ञांविषयी अनेक ठिकाणी वाचलं होतं, पण इथं डॉक्टर पुरुषरोगतज्ञ होते.

 डॉक्टर बाहेर आले. त्यांनी प्रत्येकाशी आपुलकीने संवाद साधला. सर्वांशी बोलून झाल्यावर शेवटी आम्ही दोघेच उरलो. डॉक्टर आमच्याशी अगदी आत्मीयतेने बोलले. आम्ही अर्चना आणि सतीश यांचा दाखला देत डॉक्टरांशी संवाद सुरू केला.

 अत्यंत हुशार, प्रचंड हजरजबाबी आणि अनेक वर्षांचा सामाजिक स्वास्थ्याचा अनुभव असलेले डॉक्टर आमच्या प्रत्येक प्रश्नाला सखोल उत्तर देत होते. आम्ही अडीच तास डॉक्टरांशी गप्पा मारल्या, पण तरीही आमचे समाधान झाले नाही.

 मी डॉक्टरांना अनेक वेळा टीव्हीवर ‘कामशास्त्र’ या विषयावर मनमोकळेपणाने बोलताना पाहिले होते. आज समाजात, घरात, शाळा- कॉलेजांमध्ये सेक्स संदर्भात उघडपणे बोललं जात नाही. त्यामुळेच संपूर्ण पिढी गोंधळलेल्या विचारसरणीकडे आणि अज्ञानाकडे झुकत आहे, हे डॉक्टर आम्हाला समजावून सांगत होते.

 डॉक्टर म्हणत होते, “हे सत्य आहे की, सेक्स या विषयावर घरात, शाळेत, कॉलेजमध्ये आणि समाजात उघडपणे चर्चा केली जात नाही. त्यामुळेच तरुणाई दिशाहीन होत आहे. ”

 डॉक्टरांनी राज्यभरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये समुपदेशन मोहीम हाती घेतली. त्या मोहिमेमुळे दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला.

डॉक्टरांनी त्यांच्या कामाचे पुरावे—बातम्या, छायाचित्रे आणि संशोधन दाखवत आम्हाला समजावले की, आपल्या भारतीय संस्कृतीने ‘कामसूत्र’ या महत्त्वाच्या ग्रंथाकडेही दुर्लक्ष केले आहे.

 ज्या डॉक्टरांनी पाच लाखांहून अधिक संसार वाचवले, दहा लाखांहून अधिक युवकांना शारीरिक जाणीव आणि समज दिली, त्या क्षेत्रात कदाचित राज्यात कुणीच इतकं मोठं कार्य केलं नसेल.

भविष्यात पुढील चारशे वर्षे डॉक्टरांचे ज्ञान पुढील पिढ्यांच्या उपयोगी यावे, यासाठी डॉक्टरांनी आधीच तयारी करून ठेवली आहे.

काही माणसं समाजासाठी पूर्णतः झपाटलेली असतात आणि ते केवळ समाजाच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करतात. हीच भावना डॉक्टरांच्या कार्यातून प्रकर्षाने जाणवत होती.

सेक्स, कामसूत्र, स्त्री-पुरुष संबंध यांसारखे शब्द ऐकताच पुढे काय बोलावे हे कळत नाही. मात्र, डॉक्टर या प्रश्नांकडे थेट आणि डोळसपणे पाहतात.

मूळचे अंबाजोगाईचे असलेले डॉ. दहिफळे हे “माझ्या घडणीत वडील सोपानराव आणि आई पार्वती यांच्या संस्कारांचा मोठा वाटा आहे, ” असे आवर्जून सांगत होते.

डॉक्टर अनेक लोकांशी संवाद साधत होते, कुणाला समुपदेशन करत होते, कुणाला औषधे देत होते. पण हे सर्व करत असताना तिथे पैशाची अजिबात विचारणा नव्हती.

मी डॉक्टरांना विचारले, “डॉक्टर, समाजसेवा ठीक आहे, पण हे सगळं चालवायचं कसं?”

डॉक्टरांनी वर पाहत हात जोडले आणि उत्तर दिले, “त्याची सगळी काळजी घेतली आहे. ”

एखाद्या मंदिराबाहेर जशी मोठी गर्दी आणि प्रदीर्घ रांग असते, तशीच रांग डॉक्टरांना भेटण्यासाठीही होती. लोक हार-तुरे घेऊन त्यांना भेटण्यासाठी उभे होते.

मी आणि किशोर परतीच्या मार्गाला लागलो. आम्ही दोघेही चर्चा करत होतो की, मानसिक आणि शारीरिक आरोग्य समाजासाठी किती महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी डॉक्टर दहिफळे जे महान कार्य करत आहेत, ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं होतं.

डॉ. दहिफळे थेटपणे कार्य करतात आणि आता हे कार्य आपण सर्वांनी हाती घेण्याची गरज आहे.

 

तुम्ही डॉक्टर नसाल, तरीही तुम्ही चांगले समुपदेशक बनून भरकटलेल्या पिढीला योग्य मार्ग दाखवू शकता.

हेही तेवढेच सत्य आहे, बरोबर ना?

— डॉ. विजय दहिफळे 

© श्री संदीप काळे

संस्थापक, व्हाईस ऑफ मेडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय बाबा… कवयित्री : सुश्री वंदना श्रीवास्तव ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ प्रिय बाबा… कवयित्री : सुश्री वंदना श्रीवास्तव ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

मूळ हिन्दी कविता लिंक >> हिन्दी साहित्य – कविता ☆ ओ मेरे जनक… ☆ सुश्री वंदना श्रीवास्तव ☆

प्रिय बाबा,

तू पुन्हा मला 

चिमणी म्हणालास.

मला आठवण आहे,

जेव्हा मी छोटीशी चिमणी होते,

अंगणात नाचत, बागडत होते, तेव्हा

तू मला आपल्या मांडीवर बसवून

आकाशाकडे बोट दाखवत 

म्हणाला होतास,

तुला उडायचं आहे.

हे अनंत आकाश तुझं आहे. ,

अनंत उड्डाणासाठी.

तेव्हा माझे डोळे लकाकले होते.

माझे पंख उत्साहाने फडफडले होते

पण, तेव्हा मला कुठे माहीत होते 

की मी पंख पसरून उडण्याचा प्रयत्न करेन,

त्या अनंत आकाशात,

तेव्हा माझ्याभोवती तू कुंपण घालशील 

माझे पंख थोडेसे खुडशील 

शाळेत पोपटपंची केलेलं

मी फटाफटा बोलत होते 

शाळेत शिकवलेल्या कविता 

लचकत, मुरडत गात होते, तेव्हा,

तू मुग्ध होत होतास.

माझ्या विद्वत्तेवर आणि असामान्यत्वावर 

पण जेव्हा मी,

माझे स्वत:चे शब्द बोलण्याची इच्छा धरली,

त्या ठरीव परिभाषेला बाजूला सारून,

माझी वाक्ये बोलू लागले,

तेव्हा तू गुपचुप माझी जीभच कातरलीस 

माझ्या शब्दकोषातील किती पाने फाडून टाकलीस 

तो तूच होतास ना! माझ्यावर खूप खूश होतास आधी 

मग आपला ‘कोहिनूर’ मूल्यांकनासाठी 

दुसर्‍यांकडे का सोपवलास? 

ज्यांनी माझं मनोबल आतपर्यंत तोडलं.

आता जर ‘चिमणी’ म्हणून बोलवायचं असेल,

तर कान टोचण्याच्या वेळी,

हा मंत्रही कानात पुटपुट की 

चुकीचं ऐकून मी गप्प बसू नये.

डोळ्यात काजळाबरोबर 

स्वप्न बघण्याची हिंमतही भर.

कवटाळताना मला इतकं साहस दे की 

त्यांना पूर्ण करण्याची जिद्द मी दाखवू शकेन 

इतका आत्मसन्मान भर माझ्यात, की

जे आहे, जशी आहे, तशीच बनून राहू शकेन.

इतकं करू शकलास बाबा,

तरच मला ‘चिमणी’ म्हणून हाक मार.

तरच मला ‘चिमणी’ म्हणून हाक मार… 

—–

मूळ कविता – ओ मेरे जनक

मूळ कवयित्री – सुश्री वंदना श्रीवास्तव 

संपर्क – नवी मुंबई महाराष्ट्र; ई मेल- vandana [email protected]

भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ निर्माल्य !! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ निर्माल्य !! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

बाजारात अनेक फुले होती. मोगरा होता, गुलाब होता, जाई होती, जुई होती, सोनचाफा होता. शेवंती होती, झेंडू होता, सायली होती, मखमल होती, अनेक फुलं होती. सर्व लोकं ही फुले घेण्यास उत्सुक होती. प्रत्येक फुलाची ऐट वेगळीच. प्रत्येकाचे मूल्य वेगवेगळे आणि सुगंधाप्रमाणे वाढत जाणारे.

मी तगर!! कुठेही सापडणारे, सहज उपलब्ध असलेले नि त्यामानाने ‘नगण्य’ मूल्य असलेले सामान्य फुल. मला मनमोहक ‘गंध’ नाही, रूप नाही, रंग ही सामान्य (पांढरा). मला कोण देवाच्या पायी वाहणार ? परमेश्वराच्या मंगल आणि पावन चरणांना स्पर्श करण्याचे भाग्य मला कसे लाभणार ? 

मनात असलेली, ध्यास लागलेली गोष्ट यथावकाश घडतेच असे म्हटले जाते. मलाही त्याची अनुभूती आली. भगवंताच्या रूपाने एक साधू महाराज आले, त्यांनी मला ‘खुडून’ घेतले आणि भगवंताच्या चरणावर अर्पण केले. माझी सुप्त इच्छा पूर्ण झाली. मला मूल्य नाही मिळाले, किंमत मिळाली नाही, सुगंध मिळाला नाही, पण एक गोष्ट मिळाली की ज्यामुळे मी कृतकृत्य झालो. मी कोमेजलो नाहीच, निर्माल्य होण्याचे भाग्य मला मिळाले यापेक्षा पुण्य काय असू शकते ? भगवंताच्या सहवासात माझे ‘निर्माल्य’ झाले. निर्माल्य! 

… मनुष्याचे जीवन फुलासारखे तर असते. नाना तऱ्हेची फुले तशी नाना तऱ्हेची माणसे. फक्त निर्माल्य होणे गरजेचे. किमान तसा प्रयत्न आपण करायला हवा.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२१ – आधुनिक काळातला स्तुत्य उपक्रम ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२१ – आधुनिक काळातला स्तुत्य उपक्रम ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आधुनिक काळातला स्तुत्य उपक्रम….

जुन्या काळातल्या पुण्यात भरारी घेताना मन आधुनिक पुण्यातही झेपावतं. नुकतीच कोथरूड येथे, मयूर कॉलनीत, जोग शाळे समोर असलेल्या ‘श्री वर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठान, ‘ येथिल ‘जैन स्थानक भवन ‘ येथे ‘भुकेलेल्यांना पोटभर जेवण ‘ ह्या एकाच तत्वावर चालविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती मिळाली. येथे गरीब श्रीमंत एकाच पंक्तीला बसून भोजनाचा आस्वाद घेतात. ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी, विद्यार्थी, फक्त 100 रुपयांत भाज्या वरणभात, पोळ्या नमकीन, रविवारी मिष्ठान्न अशा गरमागरम ताज्या सात्विक भोजनाचा मनमुराद आस्वाद घेतात. समस्त लहान थोर मंडळींची ‘पोटोबा’ शांती करणारे हे पुण्यपुरुष नव्हे संतच म्हणावं लागेल त्यांना, भोजन तयार करणाऱ्यांचाही यात सिंहाचा वाटा आहे, त्यांनाही ” अन्नदाता सुखी भव ” हा आशीर्वाद द्यावा लागेल कारण अनेकांच्या मुखात त्यांच्यामुळे घरगुती जेवण जाते. विद्यार्थ्यांच्या आया त्यांच्यामुळेच निर्धास्त असतात. असे हे महात्मा, समाजसेवक आहेत तरी कोण ? असा प्रश्न मला पडला. आणि त्यांची नांवे कळली. आनंद देणारे, घेणारे आणि वाटणारे हे समाजसेवक आहेत, श्री. ईश्वर भटेवरा आणि श्री. प्रितेश कर्नावट. त्यांच्या नांवातच ‘ईश्वर’ आहे आणि प्रितेश म्हणजे प्रित यांच्या नावातही ‘प्रेम’ आहे. या सदगृहस्थांशी संवाद साधताना जाणीव झाली, ‘ मानव सेवा हीच देशसेवा. ‘आणि ‘अन्नदान हेच श्रेष्ठ दान ‘ही त्यांची ब्रीदवाक्ये आहेत. भोजनोत्तर तृप्त झालेल्या रुग्णांचे, वयोवृद्धांचे त्यांना भरभरून आशिर्वाद मिळतात. संस्थेतर्फे महिन्यातून सहा वेळा वारजे व किनारा हॉटेल नजिकच्या मजुरांना मोफत नाश्ता देऊन ते संतुष्ट करतात. धार्मिक कार्यात तर त्यांचं पुढचं पाऊल असतंच पण भूतदयेतही ही संस्था अग्रेसर आहे. ‘जीवदया ‘ गोशाळेला नियमितपणे चारापाणी देऊन मुक्या जनावरांचा, गोमातेचाही ते आशिर्वाद घेतात. इतर मदत करून आणि देणगी देऊन काही सज्जन त्यांना हातभार लावतात आपणही या सात्विक थाळीचा उपभोग घेण्यासाठी भोजनालयाला भेट देऊया. उत्तम आणि स्तुत्य अशा ह्या उपक्रमेला खूप खूप धन्यवाद.  

त्यांचा पत्ता– श्रीवर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठान, जैन स्थानक भवन, योग शाळेसमोर, मयूर कॉ. पुणे संपर्क– ईश्वर भटेवरा — 83 78 88 34 45 आभार..

– क्रमशः… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दर्शन रामरायाचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “दर्शन रामरायाचे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मैत्रिणीचा फोन..

” कशी आहेस नीता? खूप दिवसांनी फोन करते आहे.”

” अगं ठीक आहे. रामरायाचं दर्शन करून आले.”

यावर अगदी आश्चर्याने ती म्हणाली

” काय सांगतेस काय? कमाल आहे तुझी. मला बोलली पण नाहीस..”

त्यात काय सांगायचं मला काही समजलचं नाही…

” कधी ठरवलंस? मला विचारायचं तरी  …मी पण आले असते “

ती रागवलीच ….

“अग  रामनवमीला फार गर्दी असणार म्हणून सकाळी मनात आलं आणि जाऊन आले .”

“म्हणजे इथेच होय.. मग ठीक आहे. मला वाटलं अयोध्येला गेलीस का काय?”

सध्या सगळ्यांना राम म्हटलं की अयोध्याच का आठवत आहे कळतं नाही..

तीला म्हटल

” कधीतरी इथल्याही रामाला जायचं. देवळात रामनवमीची तयारी चाललेली आहे . कार्यक्रम पण सुरू आहेत.”

यावर ती म्हणाली

 ” एक सांगु मी किती दिवसात रामाच्या देवळात गेलेच नाहीये. जाईन एकदा”

” तुळशीबागेत जातेस ना ? मग जाऊन यायचं की”

” अगं  तिथे गेल की खरेदीच्या नादात विसरून जाते.”

“असू दे … पुढच्या वेळेस गेलीस की जा … अजूनही कुठे कुठे रामाची देऊळं आहेत की तिथेही जाऊन ये..”

“खरचं ग.. लक्षातच येत नाही संध्याकाळी  जाऊन येईन”

मी बघीतल आहे..खूप जणी अयोध्येला जायला मिळालं नाही म्हणून दुःखीकष्टी आहेत.

खरतरं ईथल्या देवळातल्या रामातही रामच आहे… कधीतरी जावं त्याच्या दर्शनाला.

त्या मूर्तीतही तेच प्राणदत्त्व आहे. पण आपण मूर्तीच्या सौंदर्याकडे मंदिराच्या शिल्पातच दंग होत आहोत का? असे वाटते आहे.

 आपण टीव्हीवर मोबाईलवर अयोध्येच मंदिर बघितलेलं आहे. जेव्हा जमेल तेव्हा जाऊ नाही जमलं तर जाणारही नाही.

आपण जाऊ शकलो नाही अशी कित्येक ठिकाणं आहेतच की ….

त्यासाठी वाईट कशाला वाटून घ्यायचं…

आपला रामराया फक्त अयोध्येत नाहीये. तो इथल्या देवळातल्या मूर्तीतही आपण पाहूया…

त्यासाठी आधी शांतपणे बसुया…

डोळे बंद केले आणि मनोभावे त्याची आठवण केली की अंतर्यामी त्याची जाणीव होते.

जमेल तेव्हा अयोध्येला  जरूर जा.

एक लक्षात ठेवा.. अमुक एक देवळात जाणं हेच आपलं साध्यं आहे का ?  तिथे गेल तरच देव भेटणार आहे का? याचाही विचार करा.

रामराया कुठे आणि कशाकशात पाहायचा याचा शोध घ्या.

अंतरंगात डोकावून  मनोभावे विचार करा .

रामराया कुठे ना कुठे भेटेलच…

रामनवमी पाच दिवसांवर आलेली आहे. रोज रामरक्षा, अभंग, रामाची गाणी, आरत्या म्हणा… तुमचा तुम्हाला आनंद मिळेल.

विष्णुदास नामा यांनी रामाची फार सुंदर आरती लिहीलेली आहे. ती तुमच्यासाठी पाठवत आहे.

आरती

श्रीराम जय राम जय जय राम

आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम

टणत्काराचे ठाण  करी धनुष्यबाण

हनुमंत पुढे उभे हात जोडून ॥१॥ 

*

भरत शत्रुघ्न दोघे चामर ढाळीती

सिंहासनी आरुढले जानकीपती ॥२॥

*

रत्नजडित माणिक  वर्णु काय मुगुटी

स्वर्गातून देव पुष्पवृष्टी करिती ॥३॥

*

लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्रांची

चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ॥४॥

*

विष्णुदास नामा म्हणे मागणे हेचि

अखंडित सेवा घडो रामचंद्रांची…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तसंच ! – लेखिका : डॉ. अपर्णा बेडेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

सुश्री सुनिता जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ तसंच ! – लेखिका : डॉ. अपर्णा बेडेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी

 तसंच !…

घरी आलेल्या कुणालाही ‘तसंच’ पाठवायचं नाही आणि आपण कुणाकडे जाताना ‘तसंच’ जायचं नाही हा आमच्या घरचा शिरस्ता! 

या ‘तसंच’ मधे जगभरचा पाहुणचार सामावलेला होता.

माझे कुणी मित्रमैत्रीण ठरवून आले की बटाटेवडे कर, अचानक आले तर त्यांच्या आवडीचा गोडाचा शिरा नाहीतर सांजा कर.. अगदीच वेळ नसेल तरी धडपडत उठून किमान “सफरचंदाची एक फोड तरी खा” म्हणत ती हातावर दे..

आई-बाबांचे ऑफिसमधले कुणी पाहुणे आले तर किमान चहा तरी कर..

नातेवाईकांपैकी कुणी येणार असेल तर खास आवडी-निवडी जप हे सारं अध्याहृत होतं.

हे सगळं करताना आई-आजीच्या चेहऱ्यावर कधी आठी यायची नाही, श्रम दिसायचे नाहीत, त्यांचं स्मितहास्य लोपायचं नाही… इतकं ते सारं सहज होतं! सहज होतं म्हणून सुंदर होतं!

पाहुण्यांसाठी असलेल्या ह्या नियमाला एक पोटनियमही होता. आपल्याच घरातून निघतानाही ‘तसंच’ निघायचं नाही घरातल्या सर्व माणसांसाठी उपनियम!

सकाळचा चहा पिऊन झालेला असला तरी, “‘तशीच’ जाऊ नको कॉलेजला!” असं म्हणत आजी तूपसाखर लावलेली एक पोळी घेऊन माझ्या मागे उभी असायची.

मनसुखानी नावाचा प्रोफेसर त्यावेळी आम्हां मुलींमध्ये भारीच फेमस होता. आमच्या गप्पातून आजीला हे कळलं असावं. आणि मग..

“आजी, उशीर होतोय ग.. नकोय मला.. मी जाते तशीच” असं म्हणण्याचा अवकाश… 

ती त्या मनसुखानीच्या नावाने बोटं मोडायची.

“त्या मनसुखानीला म्हणावं एवढी पोळी खाल्ल्याशिवाय माझी आजी काही मला ‘तशीच’ सोडत नसते. बाकी तू तुझं बघ” असा तिचा राग उफाळून यायचा पण घरातून निघताना ‘तसंच’ जायचं नाही हा तिचा नियम आम्हाला पाळायलाच लागायचा.

आपण कुणाकडे जातानाही ‘तसंच’ जायचं नाही हा या सगळ्याचा व्यत्यास.. तो ती तितकाच खरा होता. आत्याकडे जाताना खास ठेवणीतल्या लोणच्याची बाटली भरली जायची. मावशीला आवडतात म्हणून घारगे व्हायचे.. एक ना दोन! यातलं काहीच नाही जमलं आणि अचानक कुणाकडे जावं लागलं तर जाता जाता द्राक्ष घे.. चिकू घे, असलं काही न काही त्या करायच्या.

हे सगळे सोपस्कार आई-आजी पाळायच्या इथपर्यंत ठीक! पण मी माझ्या शाळा-कॉलेजच्या वयात काही कामासाठी कोणाकडे एकटीच जातेय तरी या ‘तशीच’ जाऊ नको गं म्हणायच्या आणि मग मात्र माझी चिडचिड व्हायची. मी कधी ऐकायचे पण अनेकदा त्या-त्या वयातल्या न ऐकण्याच्या नादात ‘तशीच’ निघून जायचे. लहान आहे.. मोठी होईल तेव्हा कळेल असं म्हणून सोडूनही द्यायच्या! 

एकदाच आजीने या चिडचिडीवरचा उतारा केला.

मला म्हणाली, “कपभर चहाही न देता कुणाला ‘तसंच’ पाठवशील किंवा रिकाम्या हाताने कोणाकडे जाशील.. तर आपल्या घरातलं काही जाणार नाही.. पण ‘पत’ मात्र जाईल. ज्याला ऐपत आहे, त्याने पत सांभाळावी”

आजही माझ्या आणि माझ्यासारख्या अनेक घरातून ‘तसंच’ कुणी जात नाही आणि आपणही ‘तसंच’ कुणाकडे जात नाही.

काय करणार.. ? 

आजी नावाची मौल्यवान विद्यापीठं शब्द पेरून आसपासच वावरत असतात.

लेखिका : डॉ. अपर्णा बेडेकर.

प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३५ – रेडिओ – भाग दुसरा ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३५ – रेडिओ – भाग दुसरा  ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

रेडिओ – भाग दुसरा 

(हे “गीत रामायण” वर्षभर श्रोत्यांनी प्रचंड भावनात्मकतेने, श्रद्धेने आणि अपार आनंदाने ऐकले.) 

इथून पुढे — 

आज काय रामजन्म होणार…

सीता स्वयंवर ऐकायचे आहे…

राम, सीता, लक्ष्मण वनवासात चालले आहेत..

“माता न तू वैरिणी” म्हणत भरत कैकयीचा तिरस्कार करतोय…

भरत भेटीच्या वेळेस,

।पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा।

या गाण्याने तर कमाल केली होती.

सेतू बांधा रे” या गाण्याबरोबर श्रोतृवर्ग वानरसेने बरोबर जणू काही लंकेलाच निघाला. घरोघर “सियावर रामचंद्रकी जय” चा गजर व्हायचा.

शेवटचं,

।गा बाळांनो श्री रामायण। या गाण्याने कार्यक्रमाचा जेव्हा समारोप झाला तेव्हा एक अनामिक हुरहूर दाटून आली. खरोखरच या श्रोतृगणात आमची पिढी होती हे आमचं किती भाग्य! या अमर महाकाव्याची जादू आम्ही या रेडिओमुळे प्रत्यक्ष अनुभवली. त्यानंतरच्या काळात गीतरामायणाचे अनेक प्रत्यक्ष कार्यक्रम झाले.. आजही होतात पण रेडियोवर ऐकलेल्या त्या पहिल्या कार्यक्रमाची मजाच और होती! आजही आठवताना, लिहिताना, माझ्या अंगावर काटा फुलतो. कसे आम्ही कुटुंबीय, शेजारी, आजूबाजूचे सारेच हातातली कामे टाकून गीत रामायणातल्या समृद्ध रचना गाणाऱ्या रेडिओ जवळ मग्न होऊन, भान हरपून बसून राहायचे आणि पुढच्या आठवड्याची प्रतीक्षा करायचे.

आज ओठातून सहज उद्गार निघतात, “रेडिओ थोर तुझे उपकार.”

शालेय जीवनातला आणखी एक- रेडिओ सिलोन वरून प्रसारित होणारा अतीव आनंददायी, औत्स्युक्यपूर्ण कार्यक्रम म्हणजे “बिनाका गीतमाला

अमीन सयानी”चं बहाररदार निवेदन आणि तत्कालीन हिंदी चित्रपटातील एकाहून एक आवडती गाणी ऐकताना मन फार रमून जायचं. दर बुधवारी रात्री आठ वाजता, रेडिओ सिलोन वरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही न चुकता ऐकायचो. त्यासाठी दुसऱ्या दिवशीचा गृहपाठ पटापट संपवून “बिनाका गीतमाला” ऐकण्यासाठी सज्ज व्हायचे हे ठरलेलेच. आज कुठले गाणे पहिल्या पादानवर येणार यासाठी मैत्रिणींमध्ये पैज लागलेली असायची. तसेच नव्याने पदार्पण करणार्‍या शेवटच्या पादानवरच्या गाण्याचे ही अंदाज घेतले जायचे. आम्ही अक्षरश: “बिनाका गीतमालाची” डायरी बनवलेली असायची. शेवटच्या पादानपासून पहिल्या पादानपर्यंतची दर बुधवारची गाण्यांची यादी त्यात टिपलेली असायची. मुकेश, रफी, तलत, आशा, लताची ती अप्रतीम गाणी ऐकताना आमचं बालपण, तारुण्य, फुलत गेलं.

जाये तो जाये कहा..

जरा सामने तो आओ छलिया..

है अपना दिल तो आवारा..

जिंदगी भर नही भूलेंगे..

जो वादा किया वो..

बहारो फुल बरसाओ..

बोल राधा बोल..

बिंदिया चमकेगी, कंगना खनकेगी..

वगैरे विविध सुंदर गाण्यांनी मनावर नकळत आनंदाची झूल या कार्यक्रमातून पांघरली होती.

दुसऱ्या दिवशी शाळेतही मधल्या सुट्टीत पटांगणातल्या आंब्याच्या पारावर बसून आम्ही मैत्रिणी ही सारी गाणी सुर पकडून (?) मुक्तपणे गायचो. अमीन सयानीचे विशिष्ट पद्धतीने केलेले सूत्रसंचालन, त्याचा आवाज आम्ही कसे विसरणार? अजूनही हे काही कार्यक्रम चालू आहेत की बंद झालेत हे मला माहीत नाही. असतीलही नव्या संचासहित पण या कार्यक्रमाचा तो काळ आमच्यासाठी मात्र अविस्मरणीय होता हे नक्की.

फौजीभाईंसाठी लागणार्‍या विविधभारतीनेही आमचा ताबा त्याकाळी घेतला होता.

वनिता मंडळ नावाचा एक महिलांसाठी खास कार्यक्रम रेडिओवरून प्रसारित व्हायचा. तो दुपारी बारा वाजता असायचा. त्यावेळी आम्ही शाळेत असायचो पण आई आणि जिजी मात्र हा कार्यक्रम न चुकता ऐकायच्या. खरं म्हणजे त्या काळातल्या सर्वच गृहिणींसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आणि मनोरंजनाचा ठरला होता. माझा या कार्यक्रमांशी प्रत्यक्ष संबंध आयुष्याच्या थोड्या पुढच्या टप्प्यावर आला. त्यावेळच्या आठवणी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. अकरावीत असताना

माझे अत्यंत आवडते, इंग्लिश शिकवणारे, खाजगी क्लासमधले “काळे सर” हे जग सोडून गेले तेव्हा मी खूप उदास झाले होते. त्यांच्या स्मृतीसाठी मी एक लेख लिहिला आणि “वनिता मंडळ” या आकाशवाणीच्या कार्यक्रमात तो सादर करण्याची मला संधी मिळाली. त्यावेळी मा. लीलावती भागवत, विमल जोशी संयोजक होत्या. त्यांना लेख आणि माझे सादरीकरण दोन्ही आवडले आणि तिथूनच आकाशवाणी मुंबई केंद्रावर माझ्या कथाकथनाच्या कार्यक्रमाची नांदी झाली. तेवढेच नव्हे तर मी लेखिका होण्याची बीजे या आकाशवाणीच्या माध्यमातूनच रोवली गेली. माननीय लीलावती भागवत या माझ्या पहिल्या लेखन गुरू ठरल्या. रेडिओचे हे अनंत उपकार मी कसे आणि का विसरू?

अगदी अलीकडे “उमा दीक्षित” संयोजक असलेल्या एका महिला कार्यक्रमात कथाकथन करण्यासाठी मी आकाशवाणी मुंबई केंद्रावर गेले होते. पन्नास वर्षात केवढा फरक झाला होता! दूरदर्शनच्या निर्मितीमुळे आकाशवाणीला ही अवकळा आली असेल का असेही वाटले. नभोवाणी केंद्राचे एकेकाळचे वैभव मी अनुभवलेले असल्यामुळे त्या क्षणी मी थोडीशी नाराज, व्यथित झाले होते. फक्त एकच फरक पडला होता. त्या दिवशीच्या माझ्या कार्यक्रमाचा अडीच हजाराचा चेक मला घरपोच मिळाला होता पण त्याकाळचा १५१ रुपयाचा चेक खात्यात जमा करताना मला जो आनंद व्हायचा तो मात्र आता नाही झाला. आनंदाचे क्षण असे पैशात नाही मोजता येत हेच खरं! माझ्या कथाकथनाला अॉडीअन्स मिळेल का हीच शंका त्यावेळी वरचढ होती.

आता अनेक खाजगी रेडिओ केंद्रेही अस्तित्वात आहेत. गाडीतून प्रवास करताना अनेक RJ न्शी ओळख होते. कुठल्याही माध्यमांची तुलना मला करायची नाही पण एक नक्की माझ्या मनातलं नभोवाणी केंद्र… ऑल इंडिया रेडिओ… त्याचे स्थान अढळ आहे आज मी रेडिओ ऐकत नाही हे वास्तव स्वीकारून सुद्धा… 

“ताई उठता का आता? चहा ठेवू का तुमचा? साखर नाही घालत.. ”

सरोज माझ्या डोक्यावर हात ठेवून मला उठवत होती…

“अगबाई! इतकं उजाडलं का? उठतेच..

आणि हे बघ तो रेडियो चालूच ठेव. बरं वाटतं गं!ऐकायला”

गरमगरम वाफाळलेला आयता चहा पिताना रेडियोवर लागलेलं कुंदा बोकीलचं,

।शाळा सुटली पाटी फुटली

आई मला भूक लागली।

हे गाणं ऐकत पुन्हा मी त्या आनंददायी ध्वनीलहरीत बुडून गेले.

– क्रमश: भाग ३५ – समाप्त.

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – – ३५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

रेडिओ – भाग पहिला 

अमळनेर हे माझं सासरगाव. जेव्हा मी अमळनेरला जाते तेव्हा अगदी निवांत असते. देहाने आणि मनानेही. माझी धाकटी जाऊ सरोज, माझा तिथला मुक्काम आरामदायी व्हावा म्हणून अगदी मनापासून प्रयत्नशील असते. ती पहाटे लवकर उठते. प्रभात फेरफटका मारून येते. शांत झोपलेल्या मला- खुडबुडीचे आवाज येऊ नयेत म्हणून माझ्या रूमचा दरवाजा हलकेच ओढून घेते. खरं म्हणजे मी जागीच असते. माझा धाकटा दीर सुहास खराट्याने खरखर अंगण झाडत असतो. सरोज बाहेर गेली, आत आली, मागचा दरवाजा उघडला या सर्वांचे आवाज येत असतात पण तरीही मी उठत नाही. अशी घरी बनवलेल्या, घरच्या कपाशीच्या गादीवर अर्धवट झोपेतली जाग मी मजेत अनुभवत असते.

त्या पहाटेच्या वेळी फिरून आल्यानंतर पहिलं जर काय सरोज करत असेल तर ती तिचा छोटासा रेडिओ लावते. रेडिओवर सकाळची मंगल गाणी, भक्ती गीतं, भगवत् गीतेच्या अध्यायावरचं विवेचन वगैरे एकापाठोपाठ एक चालू असतं. मधून मधून निवेदिकेचा मंजुळ आवाजही येत असतो. सरोज रेडिओ काही कान देऊन ऐकत नसते पण दरम्यान ती चहापाणी, घरातला केरवारा, कपडे, भांडी यासारखी कामे रेडिओच्या तालात सहजपणे आवरत राहते, तेव्हा माझ्या मनात विचार येतो आजच्या दूरदर्शन, संगणक, मोबाईलच्या जमान्यातही सरोजसारखी रेडिओ ऐकणारी माणसं आहेतच की!

“ सकाळचे सहा वाजले आहेत, आम्ही जळगाव आकाशवाणी केंद्रावरून बोलत आहोत. ” या एका वाक्याने मी जवळजवळ ६० वर्षे मागे जाते.

रेडिओ

हा रेडिओ म्हणजे एक महत्त्वाचं स्थान आहे आमच्या बालपणातलं आणि जडघडणीतलंही. एक अखंड नातं त्या ध्वनीलहरींशी जुळलेलं आहे. त्यावेळी घरबसल्या करमणुकीचं रेडिओ हे एकमेव साधन होतं. घराघरात वाजणारा, बोलणारा रेडिओ म्हणजे त्या त्या परिवाराचा एक महत्त्वाचा सदस्य होता.

ऑल इंडिया रेडिओ. AIR.

आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पहाटेच्या प्रहरी वाजणाऱ्या सिग्नेचर ट्युननेच आम्ही जागे व्हायचो. आजही ती विशिष्ट वाद्यवृंदातील सुरमयी धुन कानात आहे आणि तिच्या आठवणीने अंतःकरणात खूप काहीतरी अनामिक अशा भावनांच्या लाटा उसळतात. बाल्य, कौमार्य आणि तारुण्य सारं काही आकाशवाणीच्या या धूनमधून उलगडत जातं.

रात्री झोपताना दिल्ली आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणारी संगीतसभाही सोबत असायचीच.

आता टेलिव्हिजन वरच्या अनेक दुष्ट, मतलबी, स्वार्थी, विकृत मानवी भावनांचा अविष्कार घडवणाऱ्या, मनोवृत्ती बिघडवणाऱ्या, वर्षानुवर्षे चालणाऱ्या अनेक दीर्घ मालिका बघताना सहज मनात येते, रेडिओ हे त्यावेळेचे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते तर ते साहित्य, संगीत, कलेच्या माध्यमातून सामाजिक संस्कार करण्याचे, समाज घडवण्याचे एक श्राव्य माध्यम होते. आनंदी जीवनाची दिशा दाखवणारं साधन होतं. नि:संशय..

गंमत- जम्मत नावाचा लहान मुलांसाठी एक सुंदर कार्यक्रम आकाशवाणी वरून प्रसारित केला जायचा. त्यातले नानुजी आणि मायाताई मला अजूनही आठवतात. त्यांचे ते प्रेमळ आवाज आजही कानात घुमतात. कितीतरी कथा, बालनाट्ये, बालगीते या कार्यक्रमातून ऐकली. इतिहास, भूगोल, विज्ञान, समाजशास्त्र यांचेही मनोरंजक पद्धतीने ज्ञानार्जन व्हायचे. याच कार्यक्रमातून एखादी ऐतिहासिक किंवा भौगोलिक प्रश्नपत्रिका दिलेली असायची. आम्ही ती उतरवून घ्यायचो आणि त्याची उत्तरे पत्राद्वारे मागवलेली असायची.

द्वारा केंद्राधिकारी, आकाशवाणी मुंबई केंद्र, गंमत जंमत विभाग. मुंबई ४ असा त्यांचा पत्ता असायचा. मी अनेक वेळा या पत्त्यावर प्रश्नपत्रिका सोडवून पत्रं पाठवलेली आहेत आणि पुढच्या कार्यक्रमातून जेव्हा उत्तरे बरोबर असलेल्या अनेक नावांबरोबर माझे नाव घेतले जायचे तेव्हा मला खूप गंमत वाटायची.

माझ्या आजीचे आवडते कार्यक्रम म्हणजे “कामगार सभा” आणि “कीर्तन”. ती रेडियोला कान लावून कीर्तन ऐकायची आणि तिच्याबरोबर आम्ही सुद्धा. या कीर्तनानेही आम्हाला नकळत घडवलेच की! नऊ रसात ओथंबलेले ते कीर्तन ऐकताना आम्ही पुरणकाळात, ऐतिहासिक काळात सहजपणे फेरफटका मारून आलोय. हरिभक्त परायण कीर्तनकाराच्या संगीतातून, गायनातून आम्ही विस्तृत अशा लोक परंपरेच्या हातात हात घालून नाचलो, बागडलो. टाळ चिपळ्यांसोबत गायलेलं “जय जय रामकृष्ण हारी” अजूनही कानात आहे. प्रत्येकवेळी निरुपण संपले की आम्हीही बुवांबरोबर “बोला! पुंडलिक वरदे हरी विठ्ठल।श्री ज्ञानदेव तुकाराम।। असा जयघोष करायचो.

या क्षणी मला रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या वेळा, त्यात सहभागी असणाऱ्या आकाशवाणीच्या प्रत्येक कलाकारांची नावे आठवत नाहीत पण प्रहर आठवतात, आवाज आठवतात. त्या त्या कार्यक्रमाच्या वेळी वाजणारा वाद्यवृंद आठवतो आणि मन पुन्हा पुन्हा त्या काळात झेपावतं.

संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या, ऑल इंडिया रेडिओ दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही न चुकता ऐकायचो. सगळ्या घडामोडींचा ताजा आणि निखळपणे घेतलेला मागोवा आम्हाला समाजाबरोबर ठेवायचा. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून बातम्या देणाऱ्या “सुधा नरवणे” यांचा स्पष्ट, मोकळा आवाज आमच्या पिढीतली एकही व्यक्ती विसरू शकणार नाही.

अनेक संगीत नाटकांचं रेडिओवरूनच सुंदर सादरीकरण व्हायचं. कलाकारांच्या संवाद बोलीतूनच डोळ्यासमोर ती पात्रं, ते सीन, वातावरण साकारायचे आणि आभासी असला तरी प्रत्यक्ष रंगभूमीवर नाट्यप्रयोग पाहत असल्याचा आनंद या आकाशवाणीने आम्हाला दिला. गो. नी. दांडेकरांच्या “शितू” या गाजलेल्या कादंबरीचे अभिवाचनही आम्ही रेडिओ जवळ बसून ऐकले. काय आनंद दिला आहे आम्हाला या दर्जेदार कार्यक्रमाने ते कसं सांगू तुम्हाला?

हलक्या- फुलक्या, विनोदी श्रुतिका हे तर मुंबई आकाशवाणीचं खास वैशिष्ट्य. त्या संबंधात मला “प्रपंच” ही श्रुतिका मालिका आठवते. प्रत्येक भाग हा विशेष, हसवणारा आणि मनोरंजक असायचा. त्यातले टेकाडे भाऊजी आणि वहिनी यांच्यात घडणारे खुसखुशीत संवाद आठवले की आताही सहज हसू येतं. “बाळ कुरतडकर”, “नीलम प्रभू”, प्रभाकर (आडनाव आठवत नाही) हे कसलेले कलाकार त्यात सहभागी असायचे. काय जिवंतपणा असायचा त्यांच्या नाट्य सादरीकरणात!

तशी मी लहानच होते पण तरीही १९५५ ते १९५६ हे साल म्हणजे आकाशवाणीच्या इतिहासातले सुवर्णाचे पान म्हणून गाजले ते पक्के लक्षात आहे. पुणे आकाशवाणी केंद्राचे तत्कालीन अधिकारी, भारतीय शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्य संगीताचे जाणकार “सीताकांत लाड” यांनी रामायणावर आधारित साप्ताहिक कार्यक्रमाची संकल्पना मांडली. कवी गदिमा आणि संगीतकार, गायक सुधीर फडके यांच्या सहभागाने “गीत रामायण” हे हृदयात राहणारे संगीतमय महाकाव्य अस्तित्वात आले. एक एप्रिल १९५५ रोजी ऑल इंडिया रेडिओ पुणे केंद्रावरून रामनवमीच्या पवित्र प्रसंगी 

॥ स्वये श्री रामप्रभू ऐकती कुश लव रामायण गाती ॥

 या परमसुंदर, श्रवणीय गीताने गीतरामायण कार्यक्रम सुरू झाला. हा कार्यक्रम वर्षभर चालला. अधिक मासामुळे हे वर्ष ५६ अठवड्यांचं होतं म्हणून ५६ भागात हे “गीत रामायण” वर्षभर श्रोत्यांनी प्रचंड भावनात्मकतेने, श्रद्धेने आणि अपार आनंदाने ऐकले.

 क्रमशः…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तक्रार… लेखिका – सुश्री तेजस्विनी ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

? मनमंजुषेतून ?

🍃 तक्रार… लेखिका – सुश्री तेजस्विनी ☆ प्रस्तुती –  सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

का कळेना दाटते डोळ्यात पाणी..

मी खरे म्हणजे तशी दुःखात नाही..

तेवढा ओल्या सरींनी घात केला…

नाहीतर तशी माझी तक्रार नाही…

— स्पृहाच्या ह्या ओळी वाचताना मनात आलं… खरंच तक्रार करण्यासारखं असतं का खरच काही??आपलं आपल्यालाही जाणवत राहतं… की ही तक्रार नक्की कशासाठी?

अगदी पेपर वेळेवर आला नाही, आजूबाजूचे नीट काम करत नाहीत, कुणी माझ्याकडे लक्षच देत नाही.. अगदी साध्या साध्या विषयात आपण तक्रारीचा सूर लावतो… कुणी ऐकलं आणि नाही ऐकलं तरीही….

अगदी घरापासून, सोसायटीपर्यंत… समाजापासून देशापर्यंत… कितीतरी बाबतीत प्रत्यक्ष कृती, प्रयत्न न करता… फक्त नाराजी व्यक्त करत राहतो… कुणीतरी हे पटकन सगळ बदलावं… ही अपेक्षा…

दूध नाही आलं.. लेमन टी चा आस्वाद घ्यायला काय हरकत आहे?

कचरा उचलला नाही तर एक दिवस आपणच वन टू करत टाकून यावा… कामात बदल हे कितीतरी तक्रारींवरचं औषध आहे… हो ना?

प्रत्येक गोष्ट कुणीतरी कुठेतरी आपल्यासाठी करावी… ती ही आपल्या मर्जी प्रमाणे… तक्रारीचा जन्म बहुतेक तिथेच होत असावा…

तक्रार.. लाडिकही असू शकते… त्याची वाट पाहून, त्याच्या भेटीसाठी तरसणारी ती… तक्रार करते… किती वाट पहायची?

त्याचीही तक्रार.. रुसवा तो कधीतरी डोकावतोच… किती केलं तरी तुझं आपलं तेच… म्हणून अबोल झालेला तो…

तक्रार… एका पिढीने दुसऱ्या पिढीबद्दल केलेली… जराही चील मारत नाहीत हे मोठे लोक…

आमच्यावेळी असं नव्हतं म्हणत… तरुण पिढीची तक्रार… करून करून गुळगुळीत झालेली….

तक्रार… सौम्य कधी कधी टोकाची… टोचणारी… वादात, भांडणात रुपांतर होणारी…

तक्रार का होते आहे, खरं मुळ शोधून त्यावर नेमका उपाय करणं केव्हाही श्रेयस्कर!!!

खरं सांगू… तक्रार असावी, थोडासा रुसवा.. क्वचित.. लोणच्याच्या खारासारखा.. नात्याला चव यावी इतकाच…

तक्रार करण्याची आणि ऐकण्याची दोन्ही सवयी… घातकच!!!!

सर्वांगानं फुलून यावं वाटत असेल… माणूस आणि नातंही… तर… मनापासून स्वीकार… आणि नो तक्रार…

गुलाब, चाफा, मोगरा 

जुई जाई शप्पथ…

तुझ्यासारखे कुणीच नाही…

आईशप्पथ…

लेखिका : सुश्री तेजस्विनी

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेमासाठी सारे काही… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ प्रेमासाठी सारे काही… ☆ श्री संदीप काळे ☆

संत श्री. एम. मुळे वृंदावनचा फार जवळून संबंध आला. अनेक वेळा, अनेक दिवस वृंदावनला राहता आले. श्री. एम. मुळेच खूप सारे मित्र मिळाले. त्या मित्रांमध्ये वृंदावनमध्ये राहणारे राजेश तिवारी यांची खूप छान मैत्री झाली. अनेक वेळा त्यांच्यासोबत राहून तिवारी यांच्या नजरेने वृंदावन पाहिले. कृष्णभक्ती, अद्वितीय प्रेम आणि वृंदावन हा माणसाने एकदा तरी अनुभवावा असा अनोखा संगम आहे. त्या दिवशी राजेश यांचा फोन आला आणि मला म्हणाला, ‘संदीप, माझे लग्न ठरले आहे. तुला यायचे आहे’. मला राजेशच्या लग्नाला जाणे गरजेचे होते. कारण राजेशचे लग्न आमच्या सर्वांची मैत्रीण यूएसची श्रीकृष्णभक्त रुसीसोबत होणार होते. रुसीने पाच वर्षांपासून वृंदावनात श्रीकृष्ण भक्तीमध्ये स्वतःला समर्पित केले आहे.

रुसी आणि राजेशच्या लग्नाला वृंदावनात गेलो. दोन दिवस वृंदावनला मुक्काम होता. वृंदावनात फिरणे, तिथल्या माणसांशी बोलणे, यात जो आनंद मिळतो, तो अन्य कशातच नाही. लग्न लागल्यावर वृंदावनला फिरण्यासाठी बाहेर पडलो. वृंदावनात प्रत्येक वेळी नवीन काहीतरी अनुभव मिळतो. वृंदावनमधील मंदिर परिक्रमा हा माझा आवडता विषय.

मजल दरमजल माझा प्रवास सुरू होता. प्रेम- मंदिरापासून थोडे दूर गेल्यावर जप करत बसलेले एक जोडपे दिसले. दोघांचे लांब केस, दोघांमध्ये एक आसन, एकच पाण्याची बाटली, एकच बॅग, सारे काही दोघांत एकच होते. ते मी पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की हे एक जोडपे आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून मला वाटले, आपण यांच्याशी बोलले पाहिजे. मी त्यांच्या अवतीभोवती घुटमळत होतो. आत्ता जागे होतील, नंतर जागे होतील, याची मी वाट पाहत होतो. खूप वेळ झाला, पण ते काही त्यांच्या साधनेतून बाहेर यायला तयार नव्हते. मी तिथून निघणार, इतक्यात ते दोघेही जागे झाले.

मी त्यांना नमस्कार केला. त्यांना मी म्हणालो, ‘तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, म्हणून ब-याच वेळापासून थांबलो आहे’.

त्या दोघांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले. त्यातली महिला मला म्हणाली, ‘सांगा ना काय बोलायचं आहे तुम्हाला? 

‘तुम्ही जी साधना करताय, तुम्ही जी ध्यानधारणा करताय, त्यातून तुम्हाला खरंच ईश्वराची भेट होते का? या साधनेने तुम्हाला समाधान मिळते का? का तुम्ही अन्य कुठल्या कारणास्तव ध्यानधारणा करताय?’ त्या दोघांनीही एकमेकांकडे पाहत आणि स्मितहास्य करत मला उत्तर दिलं. त्या जोडीमधला तो पुरुष मला म्हणाला, ‘अहो, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीत ईश्वर आहेच. तुम्ही ध्यानधारणा करा, तपस्या करा अथवा करू नका. त्याची आणि तुमची भेट होतच असते. मन एकाग्र ठेवून श्रीकृष्णाला भेटण्याची आस ठेवली, तर तो भेटतोच भेटतो’.

मग काय मी प्रश्न विचारत गेलो आणि ते उत्तर देत गेले. ते कुठे राहतात, ते काय करतात, ते कधीपासून साधू बनलेत, इथपासून ते त्यांचं पूर्वायुष्य मी त्यांच्याकडून जाणून घेत होतो. आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आल्यावर त्या दोघांनी साधूच्या वेशात राहणं पसंत केले. ते दोघेही आयटी इंजिनियर साधू का बनले? त्या दोघांची खूप करुण कहाणी मी ऐकली आणि माझं मन एकदम सुन्न झालं.

प्रेमिला शर्मा आणि सिद्धार्थ अवस्थी हे दोघेही अगदी जवळचे नातलग. लहानाचे मोठे ते उत्तर प्रदेशात झाले. उच्च शिक्षणासाठी मुंबईला गेले. तिथून दोघेही आयटी इंजिनियर झाले. दोघेही मुंबईत काम करू लागले. एकमेकांची ओळख होती. त्या ओळखीतून दोघांचे प्रेम झाले आणि ते प्रेम लग्नाजवळ येऊन थांबले.

प्रेमिलाला वडील नाहीत. प्रेमिलाची आई तिच्या एका बहिणीला घेऊन उत्तर प्रदेशात राहते. प्रेमिलाने जेव्हा सिद्धार्थचा विषय तिच्या आईला सांगितला, तेव्हा प्रेमिलाच्या आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. प्रेमिलाचा लग्नाविषयीचा निर्णय आईला अजिबात मान्य नव्हता. ज्या दिवशी प्रेमिलाने आईला लग्नाचा विषय सांगितला, त्याच्या दुसऱ्या दिवशी आईने उत्तर प्रदेशातून निघून थेट मुंबई गाठली. प्रेमिलाला पकडून तिने गावाकडे आणले. तिच्या लग्नाची इतर ठिकाणी बोलणी सुरू झाली. प्रेमिलाला तर सिद्धार्थबरोबरच लग्न करायचे होते. आईच्या ठाम नकारामुळे ते लग्न होणार नाही, हे निश्चित होते. प्रेमिलाने घरातल्या घरात दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, तरीही तिची आई तिचे ऐकायला तयार नव्हती.

एकदा भांडणांत बोलता बोलता आई प्रेमिलाला म्हणाली, ‘तू कुठेतरी एखाद्या मंदिरावर साध्वी म्हणून जा, पण मी त्या मुलासोबत तुझे लग्न करू शकत नाही. तो माझ्या अशा नात्यातला आहे की, त्या नात्यांत तुमच्या दोघांचं नातं नवरा-बायकोचं होऊच शकत नाही. बहीण-भावाचे होते. तुम्ही लग्न केलं, तर मी लोकांना काय तोंड दाखवू? समाजात माझी इज्जत राहणार नाही. तुझ्या लग्नाला कोणी येणार नाही. तुझ्या बहिणीचं लग्न होणार नाही. त्यावर प्रेमिला म्हणाली, ‘ठीक आहे. मी मंदिरात साध्वी म्हणून राहते’. प्रेमिलाच्या आईला वाटले, प्रेमात पडलेली ही तरुण मुलगी थोडीच मंदिरात साध्वी म्हणून राहणार आहे? एकीकडे प्रेमिलाची आई तिचं लग्न कुठं जमेल का, या विवंचनेत होती, तर दुसरीकडे प्रेमिला साध्वी बनण्यासाठी दीक्षा कुठे घ्यायची? त्याची काय काय नियमावली असते? कोणाकडे जावे लागते? याची सगळी माहिती काढून ठेवत होती.

एके दिवशी प्रेमिलाने तिच्या आईला सांगितले की, मी आता साध्वी म्हणून मंदिरामध्ये बसणार आहे. प्रेमिलाच्या आईला प्रेमिलाचा निर्णय ऐकून एकदम धक्काच बसला, पण प्रेमिला तिच्या निर्णयावर ठाम होती. आत्महत्या, सामाजिक प्रतिष्ठा, आईचे मत, नातेवाईकांचे मत, सिद्धार्थला धोका या सगळ्या शक्यतांवर मात करायची असेल तर, आईने रागात का होईना मला सुचवलेला साध्वी बनण्याचा पर्याय जिवंत राहण्यासाठी योग्य मार्ग ठरू शकतो. त्यातून मला आवडणाऱ्या श्रीकृष्णाची भक्ती करता येईल. सिद्धार्थच्या प्रेमाचे पावित्र्यही मला जपता येईल, या भावनेतून प्रेमिलाने साध्वी बनण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतरही प्रेमिलाची आई ‘मी सिद्धार्थशी लग्न लावणार नाही’, या मतावर ठाम होती.

प्रेमिलाला मुंबईवरून गावी नेताना प्रेमिलाची आई तिला सोबत घेऊनच सिद्धार्थला भेटली. तिने सिद्धार्थला तंबी देत मारहाण केली आणि बजावून सांगितलं की, माझ्या मुलीला मी विहिरीत ढकलून देईन, पण तुझ्यासोबत तिचं लग्न करणार नाही. तुझ्या आईवडलांनी गावाकडे काय प्रताप केलेत, हे माहिती आहे ना? तुझे आणि हिचे नाते काय आहे हे माहिती आहे ना? यानंतर प्रेमिलाशी बोलायचा किंवा भेटायचा प्रयत्न केलास, तर मी तिचा मुडदा पाडेन. मीही आत्महत्या करीन आणि त्याची सगळी जबाबदारी तुझ्यावर असेल’.

सिद्धार्थला वाटलं, काहीही झालं, तरी प्रेमिलावरचं आपलं प्रेम कमी होणार नाही. तिच्याशिवाय आपण इतर कोणावर प्रेम करू शकत नाही. तिच्यासोबत लग्न करू शकत नाही. ती जिथे कुठे असेल तिथे सुखी राहावी, या भावनेतून मोठ्या जड अंत:करणाने सिद्धार्थने प्रेमिलाला समंजसपणे निरोप दिला.

तिकडे वृंदावनमध्ये जाऊन प्रेमिला साध्वी बनली. सिद्धार्थच्या प्रेमाचं पावित्र्य राखण्यासाठी तिनं हा निर्णय घेतला होता. ही गोष्ट प्रेमिलाच्या मैत्रिणीकडून बऱ्याच दिवसांनी सिद्धार्थला कळली. सिद्धार्थने खूप शोध घेतल्यावर त्याला प्रेमिला भेटली, ती साध्वीच्या वेशात. घडलेला सगळा प्रकार तिने सांगितला. ‘तू तुझे आयुष्य आनंदाने जग. आता मी हा निर्णय कायम ठेवून आयुष्यभर श्रीकृष्णाचं ध्यान करत या वृंदावनमध्येच राहणार आहे’, असं प्रेमिलानं सिद्धार्थला सांगितलं.

सिद्धार्थ प्रेमिलाला म्हणाला, ‘माझ्या आयुष्याला तुझ्याशिवाय काहीच अर्थ नाही. आपलं प्रेम काही विसरून जाण्यासाठी नव्हतं किंवा काहीतरी मिळवण्यासाठीही नव्हतं. आपलं प्रेम हे जन्मोजन्मीच्या गाठी आयुष्यभर कायम राहाव्यात यासाठी झालं होतं. तू जो साध्वी बनण्याचा निर्णय घेतलेला आहेस, तसाच मीही साधू बनण्याचा निर्णय घेतो. साधू आणि साध्वी बनून आपण श्रीकृष्णाची भक्ती करत राहू. नवरा-बायको होऊ शकलो नाही तर काय झाले? श्रीकृष्णाचे भक्त म्हणून सोबत राहू.

दोन-चार दिवस प्रेमिलाने सिद्धार्थची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण सिद्धार्थ काही ऐकायला तयार नव्हता.

शेवटी सिद्धार्थने साधू बनण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या चार वर्षांपासून हे दोघे जण साधू-साध्वी बनून वृंदावनमध्ये तपस्या करत असतात. चार ठिकाणी भिक्षा मागतात. पोटापुरतं जेवढं मिळेल तेवढं खातात. रात्री वृंदावनच्या श्रीकृष्ण आश्रमात मुक्काम करतात. साधू आणि साध्वीचे पावित्र्य त्या दोघांनीही जपले आहे.

प्रेमिला म्हणाली, ‘मी लहानपणापासून कृष्णभक्त आहे. श्रीकृष्णच आपल्यासाठी सर्व काही आहे, या भावनेने मी आयुष्याची बावीस वर्षे काढली. अपघाताने का होईना मी पूर्णवेळ कृष्णभक्त होईन, असं कधी वाटलं नव्हतं. मी सिद्धार्थमध्येसुद्धा श्रीकृष्ण पाहायचे. सिद्धार्थच्या मला जपण्याच्या पद्धतीत मला श्रीकृष्ण दिसायचे. दुर्दैवाने सिद्धार्थ माझा होऊ शकला नाही, पण माझी श्रीकृष्णभक्ती सिद्धार्थच्या सहवासाने आणि माझ्या समर्पणाने कायम राहिली.

सिद्धार्थ म्हणाला, ‘अहो, जगण्यासाठी लागते तरी काय? सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही सुखी आहात का? हे खूप महत्त्वाचे आहे. मी आयटी इंजिनियर होतो. ती आयटी इंजिनिअर होती. आमच्या आयुष्याचे अंतिम ध्येय काय होतं? ते एकमेकांसोबत खूश राहायचं. मुंबईत राहिलो असतो, तर मोठ्या इमारतीमध्ये राहिलो असतो. आलिशान गाडीत फिरलो असतो. त्या सर्वांतसुद्धा सुख शोधणे हेच महत्त्वाचे ध्येय राहिले असते. इथे श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये सुख शोधायची गरजच भासत नाही. सुख हे आपोआपच मिळत जाते. माझे आणि प्रेमिलाचे प्रेम हे तेव्हाही होते, आताही आहे. तेव्हा त्या प्रेमात चांगुलपणाच्या आणाभाका घेत आकाशाला गवसणी घालणारे भौतिक सुखाचे स्वप्न पाहिले होते. आता त्या आणाभाका कायम आहेत. फरक इतकाच की, आता श्रीकृष्णाच्या भक्तीत विलीन होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या मार्गाने वाटचाल सुरू आहे’.

ते दोघेजण माझ्याशी बोलत असताना मी विचारले, ‘तुमच्या नातेवाईकांचे काय झाले? सिद्धार्थच्या घरच्यांनी विरोध केला नाही का?’ प्रेमिला म्हणाली, ‘जसं माझ्याकडे झालं, तसं त्याच्याकडेही झालं’. डोळ्यात अश्रू आणत, प्रेमीला म्हणाली, ‘एका वर्षानंतर माझी आई वारली. बहिणीची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. आईकडे फार काही नव्हतं. जे काही होतं, ते मी विकलं आणि आनंदात बहिणीचं लग्न केलं. सिद्धार्थला आई-वडील नव्हते. त्यानं त्याच्या मोठ्या भावाच्या नावावर त्याची सगळी मालमत्ता करून दिली आणि अगदी सहजतेनं, आनंदात माझ्यासोबत येऊन भगवे वस्त्र परिधान केले’.

मी त्या दोघांनाही अजून एक प्रश्न विचारला, ‘तुम्ही हे सगळं आपल्या प्रेमासाठी केलं का श्रीकृष्णासाठी?’ त्या दोघांचेही उत्तर अतिशय समर्पक होते. ते म्हणाले, ‘आम्ही जगत होतो श्रीकृष्णासाठी. आमचं प्रेमही श्रीकृष्णासारखं होतं आणि आम्ही आताही जे काही करतो ते श्रीकृष्णासारखं आणि श्रीकृष्णासाठीच करतो’.

सिद्धार्थ आणि प्रेमिला या दोघांचाही खूप छळ झाला होता. नियतीने आणि नातेवाईकांनी त्यांच्या अनेक प्रकारे परीक्षा पाहिल्या होत्या. त्या सगळ्या परीक्षांमध्ये सफल होता होता त्या दोघांनी प्रेमासाठी जे काही केलं ते अतुलनीय असंच होतं.

मी त्या दोघांचा निरोप घेऊन निघालो. निघताना माझ्या मनात एकच प्रश्न होता की, अजूनही किती सामाजिक प्रतिष्ठेच्या रेखा प्रेमाच्या आड येतील? त्यातून जे घडते, त्याचा आपण विचारही करू शकत नाही. तुमच्या अवतीभोवती असेच प्रेम करणारी अनेक जोडपी असतील. त्यांचे प्रेम अगदी राधा-मीरा श्रीकृष्णासारखं असेल. अशा जोडप्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी आपण निश्चितपणे मदत करणार ना?

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares