मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ईसीजी आयुष्याचा… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

सौ.अश्विनी कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ईसीजी ‘ आयुष्याचा ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

आयुष्य एकच,

पण…

रोज वेगवेगळे नवे निकाल देत राहतं ,

हे कस काय बर?

असे प्रश्न….

 

या निकालांची,

परीक्षा केव्हा दिली होती ?

 

कधी आठवतं,कधी नाही…

तेव्हा प्रश्नपत्रिका समोर आल्या की,

काही वाटायच्या अगदी सोप्या,

तर काही परत परत प्रश्न वाचत,

त्यावर नजर फिरवत ठेवणाऱ्या …. 

गोंधळात टाकणाऱ्या…

 

आयुष्यातील प्रश्नांची उत्तर,

शोधताना…..ती,

शांत राहून, व्यक्त होऊन ,कृतीतून,संवादातून,

संघर्षातून, आनंदातून, दुःखातून  लिहिली गेली…

आयुष्यावर!

 

डोळे मिटून स्तब्ध पडताच

आपल्या आयुष्यातील हालचालींची मोजमापं

दिसू लागली…

मधूनच थोडस तिरकस नजरेने,

जस ईसिजी मशीनकडे पाहतो

तस भूतकाळात पाहिला जीवनाचा ईसीजी…

अनेक डोंगर दऱ्याच दिसल्या…

त्या पार करण्याच्या प्रयत्नात मी,

कधीतरी काहीकाळ सरळ रेषांनी,

चकवाही दिला होता…

गात्र खचली असली तरी,

मन त्यांना प्रत्येक वेळी उठवायचं…

वेळी अवेळी मिळालेले, हेच ते निकाल…

शेजारच्या त्या मशीनमध्ये

होत असते जीवनाच्या ईसीजी ची नोंद.. 

अजूनही सुरू आहे ते मशीन,

सुरूच राहणार…

पण आता भीती वाटत नाही मशीनची…

मशीनने दऱ्या डोंगर दाखवले तरी,

मन शांत, शाबूत ,भक्कम आहे!

© सौ अश्विनी कुलकर्णी

मानसतज्ञ, सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491 Email – [email protected] 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आषाढी एकादशीचे मागणे… सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ आषाढी एकादशीचे मागणे… सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सौ.अंजली दिलीप गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

असा एक क्षण यावा

   की जिथे मुक्तिचाही ध्यास संपावा.

असा एक क्षण यावा

की जिथे विठ्ठल आणि आपण

यात भेद नसावा.

असा एक क्षण यावा

की जिथे आत्मानंदालाही

आनंद व्हावा.

असा एक क्षण यावा की

ज्ञानोबांच्या नेत्रानी विठ्ठल पहावा.

असा एक क्षण यावा की

नामदेवांच्या किर्तनाने विठ्ठलाच्या

अस्तित्वाचा वेध घ्यावा.

असा एक क्षण यावा की

नाथांच्या भक्तिभावाने विठ्ठल

प्रसन्न करून घ्यावा.

असा एक क्षण यावा की

तुकोबांच्या भाबड्या भक्तिने

विठ्ठलास बंधनात बांधावा.

असा एक क्षण यावा की

जनाईसम संसाररूपी जात्यावर

धान्य दळताना परमार्थ रूपी

पिठाचा बोध घ्यावा.

असा एक क्षण यावा की

सावत्या सम भक्तिचा मळा

फुलविताना कसदार मनाचा

कस लागावा.

असा एक क्षण यावा की जळी

स्थळी पाषाणी

विठ्ठल सोहळ्याचा अनुभव घ्यावा.

असा एक क्षण यावा की

अज्ञानाच्या अंधारी

दिवा ज्ञानाचा लागावा.

असा एक क्षण यावा की

भक्तिचा मोगरा फुलावा

  भक्तिचा मोगरा फुलावा.

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तुळस माझी भाग्याची —” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “तुळस माझी भाग्याची —…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

सखु बरोबर वारीला पंढरपूरला जायची तुळशीबाईची तयारी सुरू झाली होती .

पितळेचे तुळशी वृंदावन लख्ख  घासून घेतलं.  हळदीकुंकू वाहून पूजा केली. हार, फुलं घातली.

 “बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल 

श्री ज्ञानदेव तुकाराम 

पंढरीनाथ महाराज की जय “

अस म्हणून सखुनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतल.

 हा सोहळा बागेतली सगळी झाडं कौतुकानी बघत होती.

” किती ग भाग्यवान दरवर्षी वारी घडते तुला “.

” ये गं बाई जाऊन…”

” विठुरायाला रुक्मिणी मातेला आमचा नमस्कार सांग”

असं म्हणून सगळ्या झाडांनी तिला हात जोडले. 

” मी कुठली जाते ….सखुबाई दिवसभर मला डोक्यावर घेते म्हणून घडत बघा.येते आता…असं म्हणत  निरोप घेऊन तुळशीबाई निघाली वारीला….

खरंच तिला मनातून फार आनंद व्हायचा .ती या दिवसाची वाट पाहत असायची .दिंडीत चालताना चिपळ्यांचा, टाळांचा, विणेचा नाद ऐकू यायचा…

अभंग ,गौळणी, हरिपाठ,ओव्या कानी पडायच्या.

साध्याभोळ्या फुगड्या खेळणाऱ्या बाया बघून तिला समाधान वाटायचं .आनंदाने ती हरखुन जायची.वरूणराजा बरसायचा..ते पाणी अंगावर पडलं की तिला कृतार्थ झालो अस वाटायच.

दिंडीत चालताना शेजारच्या बाईच्या डोक्यावर पांडुरंग रुक्मिणी होती. तेव्हा तर तिच्या रुक्मिणी मातेबरोबर गप्पा झाल्या होत्या….

त्या दिवशी दिवसभर ती आनंदात होती .

सुरेखसा मोठा हार गळ्यात पडायचा. त्याच ओझ सखुबाईला वाटायचं नाही. ती कौतुकाने तिच्याकडे बघायची. तुळशी बाईच्या डोळ्यातून दोन टिपं गळायची….

” किती प्रेम करतेस ग “..म्हणून सखूची आलाबला घ्यावी असं तिला वाटायचं.

मुक्कामी पोचल्यावर खाली ठेवलं तरी येता जाता वारकरी श्रद्धेनी वाकून नमस्कार करायचे. त्यांच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळा बघून तिला संतोष वाटायचा.

लांबवर पालख्या दिसायच्या….

तो अनुपम  सोहळा किती बघु आणि किती नको अस तीला  वाटायच….. आपल्या भाग्याचा  तीला साक्षात्कार व्हायचा. बाया जाता जाता म्हणत असलेलं  कानी पडायचं.

 “तुळसा बाईचा हिरवा हिरवा पाला

 कसा बाई तिनी गोविंद वश केला”

 तेव्हा  डोळ्यासमोर श्रीकृष्णाच मोहक रूप  दिसायच…

वारी पंढरपूरला चालली आहे …तुळशी बाईला डोक्यावर घेऊन निघालेल्या बाया बापड्यांचे मला अपार कौतुक वाटतं.

 त्यांना माझा साष्टांग दंडवत.

त्यांच्यासाठी देवाला हात जोडून  विनवते…

“वारीत वाहता तुम्ही डोक्यावर तुळस…

 म्हणूनच दिसतो तुम्हा विठुरायाचा कळस…

 रुक्मिणी मातेला करते नवस…

 सुखी ठेव माझ्या या आया बहिणीस…

 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रत्येकाची “ अनंत चतुर्दशी”… लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

??

☆ प्रत्येकाची “ अनंत चतुर्दशी”लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

तुटपुंज्या पगारात पै पै बाजूला काढून गणपतीला गावाला नेणारे वडील आठवतात, जिच्या चपलेचा सोडल्यास इतर कुठलाही कुरकुर आवाज न करणारी आई आठवते, पहाटेच्या अंधारात वडिलांची विहिरीवरची आंघोळ, ते मंत्रपठण आठवतं, आईच्या आवरून घेण्यासाठीच्या हाका आणि आजीनी गोधडी बाजूला करून गालावरून फिरवलेला खरबरीत हात आठवतो, ‘झोपलाय तर झोपू दे गं, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता कळत नाही, अंग दुखत असेल, मुंबैहून यष्टीनी यायचं म्हणजे खायचं काम नाहीये, आरत्या व्हायच्या वेळेस उठेल बरोब्बर आणि मेले सगळे एकदम उठले तर पाणी कशात तापवशील एवढ्या सगळ्यांसाठी’ असं म्हणायची.

मला कायम प्रश्न पडायचा, असल्या खरबरीत हातांनी एवढे सुंदर, मऊसूत, एकसारखे पांढरेशुभ्र मोदक ती कशी काय करते? 

तिला विचारलं तर ती धपाटा घालून म्हणाली होती, ‘रांडेच्या, माया लागते रे त्यासाठी मनात, पारीला चिकटून येते मग ती, पारी हातात फिरते ना तेंव्हा देवाचं म्हणते मी, चिरा सांधतो रे तो सगळ्या, नावं माझं मेलीचं होतं’. 

आता यातलं कुणीही नाही. काय एकेक आठवणी असतात बघा, आईचा मोदक फुटू नये म्हणून मी तिच्याजवळ बसून देवाचं म्हणायचो लहानपणी.

 वेडेपणा नुसता सगळा.   

काय एकातून एक आठवत जातं बघा. आरत्या झाल्यावर आजीला नमस्कार केला की ती दोन तीन मिनिटांचा आशीर्वाद पुटपुटायची.

आजोबा जानव्याची किल्ली दाखवून लपवलेल्या खाऊची, गमतींची लालूच दाखवायचे आणि खुणेने म्हणायचे, ‘ये इकडे, तिचं संपायचं नाही’. 

सात दिवस हा हा म्हणता सरायचे.

विसर्जनाला जाताना आजी आजोबा नि:शब्द रडायचे.

लहानपणी वाटायचं त्यात काय रडण्यासारखं आहे, आता कळतं.

आपलाही काळ आता सरत चाललाय, एक दिवस आपल्यावर हीच वेळ, असंच वाटत असावं का?

आजोबा गणपती उचलताना म्हणायचे, ‘पुढच्या वर्षी मी नसलो तरी चिंतामणी करेल हो तुझं सगळं नीट, पाठीवर हात असू दे तुझा सगळ्यांच्या’. 

मग सगळे भरल्या डोळ्यांनी पाय ओढत नदीकडे जायचे. लहानपणी कळायचं नाही एवढं पण तेंव्हाही नदीवरून परत येताना काहीतरी हरवल्यासारखं, विसरून आल्यासारखं वाटायचं. 

दुसऱ्या दिवशी निघताना आज्जी तोंडावरून हात फिरवायची आणि बोळक्या तोंडानी आवाज करत पापी घ्यायची. 

आमच्या निघायच्या वेळेला आजोबा उगाच लक्षात नसल्यासारखं अंगणात कामं करत रहायचे. आम्हांला सोडायला पुलावर यायचे गड्यासोबत आणि गाडी सुटली की नदीवरून परत चालल्यासारखे हळू हळू परत जायचे. 

घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांचं विसर्जन करून सुद्धा खूप काळ लोटलाय आता.

 त्यांच्यामागे जमेल तेवढा उत्सव केला. पण त्यात मन काही रमलं नाही एवढं खरं. 

आयुष्याचे सरळ सरळ दोन भाग पडले, एक त्यांच्यासह, एक त्यांच्याशिवाय. आता उकडीचा मोदक तोंडात जाताना आजीच्या, आईच्या खरबरीत हाताचा स्पर्श ओठाला व्हावा असं वाटून जातं.

आता तो कितीही चविष्ट असला तरी घशाखाली आवंढ्याची सोबत असल्याशिवाय जात नाही.

माझंही वय विसर्जनाच्या आसपासच आहे म्हणा आता.

पाटावर बसून मीही तयार आहे.

पण विसर्जनाची मिरवणूक बघितली की मला हसू येतं. 

देवाला सुद्धा नंबर लागल्याशिवाय विसर्जन सोहळा नाही तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा!  

प्रत्येकाची ‘अनंत चतुर्दशी’ ठरलेली आहे…. ”कधी”? एवढाच काय तो जीवघेणा प्रश्नं. 

चला, आता एकूणच सगळं घाईनी आवरायला हवंय नाहीतर विनायकराव उखडायचे उगाच. 

(जवळ आलेल्या चतुर्दशीला नजरेआड करून, नव्हे तिच्या आगमनाची चाहूल टाळून चतुर्थीचा आभास निर्माण करणाऱ्या, आणि स्वतः “अनंत” असल्याची दिशाभूल करून घेणाऱ्या माझ्या पिढीला समर्पित…) 

लेखक : जयंत विद्वांस

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

आमचे घर एक मजली होते. ढग्यांचं घर अशी त्या घराला ओळख होती. 

ज. ना. ढगे म्हणजेच जनार्दन नारायण ढगे

उत्तम शिक्षक, प्रसिद्ध लेखक,साहित्यप्रेमी, तत्त्वचिंतक,(फिलॉसॉफर),संत वाङमयाचे गाढे अभ्यासक,प्रवचनकार,व्याख्याते आणि एक यशस्वी बिझनेसमन अशी त्यांची विविध क्षेत्रातील ओळख होती. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची म्हणजेच माझ्या वडिलांविषयी मी लिहीनच पण तत्पूर्वी माझं लहानपण ज्या घरात गेलं, ते घर, परिसर आणि तिथलं वातावरण आणि त्यातून झालेली आयुष्याची मिळकत हीही माझ्यासाठी खूप मोलाची आहे.

आठवणी खूपच आहेत. मनाच्या कॅनव्हासवर अनेक रेघारेघोट्यांचं जाळं चित्रित झालेलं आहे आणि आजही जेव्हा जेव्हा मन उघडं होतं तेव्हा तेव्हा या चित्रांचं पुन्हा एकदा सुरेख प्रदर्शन  मनात मांडलं जातं.

घराच्या खालच्या मजल्यावर दोन दोन खोल्यांचे स्वतंत्र असे खण होते. हल्लीच्या शब्दात म्हणायचे तर ब्लॉक्स होते. फ्लॅट्स हा शब्द या घरांसाठी उचित नाही.  फ्लॅट म्हटलं की एक निराळी संस्कृती, निराळे आकार, निराळी रचना, संपूर्णपणे वेगळीच जीवन पद्धती नकळतच उभी रहाते. फार तर दोन दोन खोल्यांची ती स्वतंत्र घरे होती असं म्हणूया आणि त्यात गद्रे आणि मोहिले हे आमचे दोन भाडोत्री रहात होते. वाचकहो!  भाडोत्री हा शब्दही मला आवडत नाही.  भाडोत्री या शब्दात दडलाय एक तुच्छपणा, काहीसा उपहास अगदीच टाकाऊ आणि नकारात्मक शब्द आहे हा असे मला वाटते. “ ते आमचे भाडोत्री आहेत.” असं म्हणणारा मला उगीचच गर्विष्ठ वाटतो.  कुठेतरी अहंकाराचा  दर्प तिथे येतो. अशावेळी खरोखरच मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान असला तरीही टेनन्ट हा शब्द भावना न दुखावणारा वाटतो. असो. सांगायचं होतं ते इतकंच की त्या खालच्या मजल्यावरच्या दोन स्वतंत्र घरात गद्रे आणि मोहिले यांचे परिवार भाड्याने राहत होते.  महिन्याला पाच रुपये असे भरभक्कम भाडे!  दोन्ही घरांना मागचं दार होतं आणि तिथेच एक मोरी होती. ती त्या दोघांकरिता सामायिक होती. कपडे धुण्यासाठी  एक घडवलेला काळा चौकोनी दगड आणि पाण्यासाठी नळही होता आणि मोरीच्या एका बाजूला कॉमन टॉयलेटही होतं.संडास म्हणण्यापेक्षा टॉयलेट बरं वाटतं.शिवाय त्यावेळी फ्लश नसायचे पण त्या काळात भाड्याने राहण्यासाठी ज्या सोयी सुविधा अपेक्षित होत्या त्या सर्व या घरांसाठी होत्या असं म्हणायला हरकत नाही आणि अशा या घरामध्ये हे दोन परिवार सुखाने राहत होते.

गद्रे होते ब्राह्मण आणि मोहिले होते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू.  गद्रे कट्टर कोकणस्थ  आणि मोहिले पक्के मांस मच्छी खाणारे. मोहिलेंच्या ताईंनी बोंबील तळले की गद्रे वहिनी मागचं दार धाडकन जरा जोरातच आपटून लावायच्या आणि दार आपटल्याचा आवाज आला की माझी आजी वरून गद्रे वहिनींवर रागवायची,” अहो दारं आपटू नका. दार मोडलं ना तर स्वतःच्या खर्चाने नवे दार बसवावे लागेल हे लक्षात ठेवा.”

अखेर  आम्ही घरमालक होतो ना?

पण अशा थोड्याफारच धुसफुसी होत्या बाकी सारी गोडी गुलाबी होती. गद्रे वहिनी त्यांच्या कोकणस्थित माहेराहून येताना फणस घेऊन यायच्या आणि त्याचे गोड,रसाळ गरे सगळ्या गल्लीत वाटायच्या.

पाऊस पडला की पहिल्या आठवड्यात शेवळं ही रानभाजी ठाण्यात मिळायची. अजूनही मिळते. या शेवळाची भाजी अथवा कणी मोहिले ताईंनी केली की त्या वाटीभर घरोघरी पाठवायच्या. वेगळ्या चवीची रुचकर भाजी आणि खूप मेहनतीची पण लहानपणी खाल्लेल्या या रानभाजीची चव आजही माझ्या रसानेवर तशीच्या तशी आहे.  ही अत्यंत गुंतागुंतीची आणि मेहनतीची भाजी करण्याच्या भानगडीत मी कधीच पडले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर याही भाजीचा एक इतिहासच आहे.

माझे वडील यास्तव खास सायकलवरुन बाजारात जाऊन टोपलीभर शेवळं घेऊन यायचे. बाजारात, ती पाऊस पडल्यावर एक दोनदाच मिळते म्हणून ही बेगमी करून ठेवायची. या भाजीची निवडून साफसफाई माझी आजी अत्यंत मन लावून करायची. ती शास्त्रशुद्ध  चिरून भर तेलात तळून ठेवायची आणि अशी ही चिरलेली तळून ठेवलेल्या शेवळाची भाजी निदान चार-पाच वेळा तरी वेगवेगळ्या प्रकाराने घरात शिजायची. या कामासाठी वडील,आई आणि आजी अत्यंत झटायचे आणि आम्ही ती चाटून पुसून खायचो. त्यावेळी खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी रेफ्रीजरेटर ही संकल्पना इतकी प्रचलित नव्हती. आणि अभावानेच पण ज्यांच्याकडे असायचा त्या ठाण्यातल्या धनवान व्यक्ती होत्या. आणि त्यांची घरे अथवा बंगले जांभळीनाका,नौपाडा,घंटाळी अशा उच्चस्तर वस्तीत असायचे. त्यांचा क्लासच वेगळा होता.   

मात्र अशी ही पारंपरिक आणि गुंतागुंतीची, प्रचंड मेहनतीची शेवळाची भाजी आजही माझी ताई आणि धाकटी बहीण निशा तीच परंपरा सांभाळत तितकीच चविष्ट बनवतात आणि तुम्हाला खरं वाटणार नाही पण आजही मी केवळ ती भाजी खाण्यासाठी पुण्याहून ठाण्याला बहिणीकडे जाते कारण शेवळाची भाजी हा माझ्यासाठी केवळ खाद्यपदार्थच नव्हे तर या चवीभोवती माझ्या बालपणीच्या रम्य आणि खमंग आठवणी आहेत.हे व्यावहारिक नसेल पण भावनिक आहे.आजही शेवळाची भाजी खाणं हा एक सामुहिक आनंद सोहळा आहे.

तर गद्रे आणि मोहिले याविषयी आपण बोलत होतो. 

मोहिल्यांची चारू ही माझी अतिशय जिवलग मैत्रीण. तिचे भाऊ शरद, अरुण शेखर हेही मित्रच होते. शेखर तसा खूप लहान होता आणि तो माझी धाकटी बहिण छुंदा हिचा अत्यंत आवडता मित्र होता याविषयीचा एक गंमतीदार किस्साही आहे. तोही आपण या माझ्या जीवन प्रवासात वाचणार आहोतच.

चारुच्या  वडिलांना भाई आणि आईला ताई असेच सारेजण म्हणायचे. भाई हे अत्यंत श्रद्धाळू आणि धार्मिक होते. साईबाबांवर त्यांची नितांत श्रद्धा आणि भक्ती होती.  ते कोणत्यातरी सरकारी कार्यालयात नोकरीला होते. पगार बेताचाच पण तरी चार मुलांचा प्रपंच ते नेटाने सांभाळत होते.  त्या वयात आम्हा मुलांना त्यांच्या प्रापंचिक समस्या जाणवत नव्हत्या. कधीतरी ताई आणि भाईंची झालेली भांडणं, शब्दांची आणि  भांड्यांची आदळआपट ऐकू यायची त्यावेळी चारू आमच्याकडे किंवा समोरच्या मुल्हेररकरांकडे जाऊन बसायची. गल्लीतली आम्ही सगळीच मुलं अशावेळी एकत्र असायचो. कधी ना कधी हे प्रत्येकाच्या घरी घडायचं आणि त्यावेळी नकळतच आम्ही सारी अजाण,भयभीत झालेली  मुलं अगदी जाणतेपणाने एकमेकांसाठी मानसिक आधार बनायचो.

भांडण मिटायचंच. तो एक तात्पुरताच भडका असायचा.  नंतर ताई निवांतपणे घराच्या पायरीवर येऊन बसायच्या आणि भाई जोरजोरात टाळ्या वाजवत साईबाबांची आरती म्हणायचे

 ।।माझा निजद्रव्य ठेवा 

     तुम्हा चरण रजसेवा 

     मागणे हेचि आता

     तुम्हा देवाधिदेवा।।

आजही ही आरती म्हणताना माझ्या डोळ्यासमोर सहजपणे टाळ्या वाजवणारे भाई येतात.

गल्लीत अण्णा गद्रे आणि गद्रे वहिनी हे जोडपंही  तिथल्या संस्कृतीत सामावलेलं होतं. अण्णांचा दूधाचा व्यवसाय होता. मला आता नक्की आठवत नाही पण त्यांचा आणखी काही जोडधंदाही  होता. अण्णांची मिळकत चांगली होती, काही जण गमतीने अण्णांवर टीका करीत. “गद्र्यांचा काय पाण्याचा पैसा”

दुधात पाणी घालून ते विकायचे म्हणून हा प्रहार असायचा.

वहिनी ही गोऱ्यापान, गुबगुबीत आणि हिरवट घारे डोळे असलेल्या एकदम टिपिकल कोब्रा महिला आणि घट्ट काष्ट्याचे लुगडं नेसलेल्या, ठुमकत चालणाऱ्या आणि आपण कोकणस्थ ब्राह्मण असल्याचा एक गर्व चेहऱ्यावर घेऊन वावरणाऱ्या वहिनी मला आजही आठवतात.  त्यांच्या हातच्या ताकाची चव मी कधीही विसरू शकणार नाही. पण त्यांच्याविषयी आता जेव्हा माझ्या मनात विचार येतो तेव्हा तीव्रतेने एक सलही बोचतो. या गद्रे दांपत्यांना लागोपाठ तीन मुली झालेल्या होत्या.

विजू, लता, रेखा. आम्ही साऱ्या अगदी गाढ  मैत्रिणीच होतो. या तिघींना आण्णांचा अतिशय धाक होता.अण्णांचं  मुलींवर प्रेम नव्हतंच असं काही मी म्हणू शकत नाही पण एक मात्र खरं की त्यांना मुलगा हा हवाच होता. मुली झाल्या म्हणून ते नेहमी दुःखीच असायचे. रेखाच्या पाठीवरही त्यांना एक दोन कन्यारत्नं झाली पण ती काळाने हिरावून नेली. त्यांना मूठमाती देऊन अण्णा जेव्हा घरी येत आणि  डोक्यावरून आंघोळ करत तेव्हा त्यांना कुठेतरी सुटल्याची भावना वाटत असावी. वहिनी काही काळ मुसमुसत कदाचित त्यांच्या मातृत्वाला झालेली जखम थोडी भळभळायची. गल्लीतली मंडळी मात्र म्हणायची “मुलगी जन्माला आली आणि अण्णांनी तिला अफू पाजली”

हे खूप भयंकर होतं पण त्यावेळी याचा अर्थ कळायचा नाही. खरं की खोटं हे ही माहीत नव्हतं पण या सगळ्यांमागे मुलीच्या जन्माचं दुःख होतं हे निश्चित आणि ते मात्र प्रखरतेने जाणवायचं,बोचायचं,प्रश्नांकित करायचं.

अखेर या दांपत्यास एक मुलगा झाला. त्याचे दणक्यात बारसेही झाले. गल्लीत अण्णांनी केशरयुक्त पेढे मन मुराद वाटले. आनंदी आनंद साजरा केला त्या मुलाचे नाव ठेवले मोरेश्वर आणि गल्लीत तो झाला सगळ्यांचा मोरया कधी मोरू, कधी मोर्‍या.

आणि अशा पार्श्वभूमीवर आम्ही पाच बहिणी होतो आणि माझी आजी अभिमानाने म्हणायची “माझ्या पाच नाती म्हणजे माझे पाच पांडव आहेत.”

 – क्रमशः भाग २. 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कापडं वारकऱ्यांची…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “कापडं वारकऱ्यांची…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

वारीचं कुतूहल काही केल्या उलगडतच नाही .प्रत्येक गोष्टीच कौतुक वाटत राहतं .

मला तर ह्या वारकऱ्यांच्या पांढऱ्या कपड्याचा पण वाटतं ….

त्याविषयी  विचारावं असं वाटलं. वारीला गेले होते तेव्हा त्यांच्याशी संवाद साधला .त्यातल्या काही जणांनी जे सांगितलं ते तुम्ही वाचा.

“आम्ही हे कपडे फक्त वारीलाच घालतो इतर वेळेस नाही”

“मला माझी बहीण घेऊन देते. तिच्या घरचं खटलं खूप मोठं आहे. तिला वारीला यायला कधीच जमत नाही. म्हणते…. तुला तरी कपडे घेते रे ….”

“माझी आई माझ्यासाठी शिवते. मशीन काम येत तिला.बघा ना “

असं म्हणून दादांनी उभे राहून पायजमा शर्ट  दाखवला मला…

“हा बघा  सोपाना  याचा भाऊ याचं लय  लाडकोड करतोय.. तोच देतो याला  नवीन कापडं  घेऊन”

“माझी बायको अंगणवाडीत शिक्षिका आहे. आमच्या गावी चांगली कापडं भेटत नाहीत. बायको तालुक्याला जाऊन माझ्यासाठी  घेऊन येते.”

एक एक जण सांगत होते. मी ऐकत होते. एकानी तर सांगितले की …

वारकऱ्यांनी वारीत घातलेले हे कपडे दुसरे लोक आनंदाने मागून नेतात .कौतुकाने घालतात ….

हे ऐकून तर माझं डोळे भरून आले. किती निर्मळ श्रद्धा …त्या कपड्याचं पण अप्रूप असाव… 

किती भक्तीभाव… आपली संस्कृती किती संवेदनशील आहे याचीच यातून आपल्याला प्रचिती येते.

लोकांना वारकऱ्यांच्या साध्या कपड्यातून सुद्धा विठ्ठलाशी जवळीक साधावीशी वाटते..

वारीला निघालेल्या आया बहिणी शेजारीच बसल्या होत्या. त्यांच्याकडे बघितलं सगळ्या जणींचे साधेसुधे कपडे होते. त्या आमचं बोलणं ऐकत होत्या. एकजण म्हणाली 

“पुरुषांची गोष्ट वेगळी असते. त्यांना पाहिजेतच तशी कापडं… आमच्या बायकांचं काय हो ….वारीत यायला मिळालं याचाच आम्हाला आनंद होतो बघा …..इथं आमची कापडं कोण बघतंय?”..

 शांत संयमीत  आवाजात त्या बोलत होत्या. खऱ्याखुऱ्या वारकरणी होत्या.  देहभान विसरून जातात या बायका……

 श्रद्धा ,भक्ती आणि विठूरायावरचं अढळ प्रेम त्यांना चालण्याच बळ देतं.

 त्यांच्या कपड्याकडे लक्ष जाण्यापेक्षा त्यांच्या आतल्या निर्मळ अंतःकरणाचे दर्शन मला झालं .

विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती डोक्यावर घेऊन ती उभी राहिली.

” कसं चालता हो इतकी जड मूर्ती डोक्यावर घेऊन ?मी विचारल

ती पटकन म्हणाली

” देवाचं कुठं ओझं असतय का?

 वारी काय काय शिकवते ना आपल्याला…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ पूर्णविराम म्हणजे अंत कसा असेल ? – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ पूर्णविराम म्हणजे अंत कसा असेल ? – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

6. डॉ मनीषा सोनवणे ही योगशिक्षक आहे. रस्त्यावर याचना करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात सुद्धा एक छान पहाट यावी, आनंद लहरी तरंगाव्या यासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रस्त्यावरील सर्व याचकांचा रस्त्यावरच योग अभ्यास घेतला.

हास्ययोगा घेऊन त्यांना थोडं हसवण्याचा प्रयत्न केला…!!! 

रस्त्यावर चालणाऱ्या या योग अभ्यासामध्ये घराबाहेर काढलेल्या अनेक “आईंचा” समावेश होता. 

मृत्यूचे अनेक पर्याय आहेत…. 

जन्म घ्यायचा तर आई शिवाय कोणताही पर्याय नाही… ! 

तुम्ही जगात कोणालाही भेटा….  आपल्याला नऊ महिने जास्त ओळखते, ती आपली आईच…!

या जगात सगळ्यात अडाणी कोण असतं तर ती आई… तिला हिशोब कळतच नाहीत..!

मुलांसाठी खाल्लेल्या खस्तांची नोंद ती कुठेही ठेवत नाही… 

पण हि नोंद दिसते तिच्या रापलेल्या हातावर…! चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवर.. !! 

आईला हिशोब कळतच नाहीत.. तरीही जगातली सर्वात मोठी गणितज्ञ तीच असते. 

कायम पोरांच्या सुखाची बेरीज करत, पोरांच्या आनंदाचा गुणाकार करते. भेगा पडलेल्या टाचा घेऊन, पदरात कायम भागाकारच घेऊन फिरते. आयुष्याच्या एका टप्प्यावर तिला मुलांकडून वजा केलं जातं. या टप्प्यावर मग ती “शून्य” होऊन जाते. 

संकटाच्या काळात मूल जेव्हा “एकक” म्हणून जगत असतं; त्यावेळी आधीची चुकलेली सर्व समीकरणे पुसून, ती त्या “एकक” मुलाच्या मागे उभी राहते आणि त्याला दशक बनवते… शतक बनवते…. सहस्त्र बनवते…! 

आई, शेवटी स्वतः मात्र शून्यच राहते…!!!

रस्त्यात सापडलेली आई नावाची “शून्ये” आपण पदरात घेत आहोत…!!!

उकिरड्यावर पडलेली, हीच शून्ये गोळा करता करता…. मीच कधी श्रीमंत झालो… मलाच कळलं नाही…! 

अन्नपूर्णा प्रकल्प

पूर्वी भीक मागणारी काही दांपत्य… यांच्याकडून आपण जेवण तयार करून घेत आहोत… (पोळी भाजी वरण भात) 

या जेवणाचा एक डबा रु 50 प्रमाणे आपणच त्यांच्याकडून विकत घेत आहोत. 

विविध हॉस्पिटलमध्ये अनेक गरीब लोक विविध योजनांखाली उपचार घेत आहेत परंतु त्यांना डबा आणून देणारे कोणीही नाही. अशा निराधार आणि निराश्रीत लोकांपर्यंत हे डबे आपण पोचवत आहोत. 

(रस्त्यात दिसेल त्याला “दे जेवणाचा डबा” असं आम्ही करत नाही, यामुळे ज्याला गरज नाही त्याच्याही हातात अन्न जाते आणि तो नंतर हे नदीपात्रात फेकून देतो.. अन्नाची नासाडी होते)

जेवणासोबतच पाण्याची बाटली आणि विविध सणासुदीला लाडू, पेढे, शिरा किंवा इतर तत्सम गोड पदार्थ त्यांना देत आहोत. 

खराटा पलटण

माझ्याकडे अशा अनेक महिला आहेत ज्यांना भिक मागायची नाही, काम करायचे आहे परंतु अंगात कोणतेही कौशल्य नाही. 

मी आदरणीय संत श्री. गाडगे बाबांचा भक्त आहे. गाडगेबाबा पूर्वी हातात खराटा घेऊन गावेच्या गावे स्वतः स्वच्छ करून, इतरांनाही करायला लावत असत. 

हिच कल्पना कपाळी लावून आपण  “खराटा पलटण” या नावाने प्रकल्प सुरू केला आहे. 

यात याचक महिलांना हाताशी धरून दिसेल तो सार्वजनिक अस्वच्छ भाग आम्ही सर्वजण मिळून स्वच्छ करत आहोत. 

या बदल्यात त्यांना पगार किंवा पंधरा दिवस पुरेल इतका किराणा देत आहोत. 

आमच्या सोबत काम करणाऱ्या या 100 महिलांना आपण युनिफॉर्म दिले आहेत. 

आज आपले हे लोक काम करून सन्मानाने जगत आहेत. 

आपण आंबा खातो पण त्याची कोय कधीही जपून ठेवत नाही… 

काही लोकांचं आयुष्य सुद्धा तसंच असतं…. 

त्यांची मुलं बाळ सूना नातवंड त्यांचा गर काढून घेतात आणि आयुष्याच्या शेवटी कोय म्हणून फेकून उकिरड्यावर फेकून देतात…

लोकांनी फेकलेल्या अशा कोयी आपण उचलत आहोत आणि पुन्हा त्यांना जमिनीत रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत… 

त्यांना खत पाणी घालून तुम्ही हापूसचं आंब्याचं झाड आहात… याची जाणीव करून देत आहोत ! 

मनातलं काही ….. 

टळटळीत दुपारी, कडाक्याच्या उन्हात तहानेनं जीव व्याकुळ झाला; की आपण दुकानातून वीस रुपयाची पाण्याची बाटली घेऊन तोंडाला लावतो. 

याच टळटळीत दुपारी आणि कडकडीत उन्हात तहानेनं जीव व्याकुळ झालेल्या रस्त्यावरील निराधार निराश्रित याचकांनी कुठे जायचं… ? पक्षी पाखरांनी कुठे जायचं…? 

याचसाठी मार्च एप्रिल मे आणि मध्य जून पर्यंत आपण रस्त्यावर ठिकठिकाणी माठ भरून ठेवले होते. 

पाणी भरण्याची जबाबदारी तिथल्याच एका याचकाला दिली होती. 

पक्ष्यांसाठी नारळाच्या करवंट्यांमध्ये पाणी भरून ठेवलं होतं. 

सुरुवातीला वाट्या घेऊन हे पाणी ठेवलं होतं… पण या वाट्या सुद्धा चोरीला गेल्या आणि नंतर माठही. 

मला गंमत वाटते चोरांची… या बिचाऱ्यांना काय चोरावं तेच कळत नाही. 

वाटी आणि माठ चोरून… ते विकून, किती पैसे मिळणार आहेत ? यातून किती आनंद मिळेल ?? 

चोरायचीच होती, तर एखाद्याची तहान चोरायची,  एखाद्या तहानलेल्या मुखात पाणी घातलं असतं, तर त्यातून आयुष्यभर पुरेल इतकं समाधान मिळालं असतं. 

स्वतःसाठी काही करून मिळवला जातो तो आनंद… परंतु दुसऱ्यासाठी काही करून मिळवलं जातात ते समाधान… !!! 

आनंद थोडा वेळ टिकतो…. समाधान चिरकाल…!!! 

माझ्या लेखांच्याही बाबतीत असंच होतं… माझ्या लेखांमध्ये काटछाट करून खाली स्वतःचे नाव टाकून अनेक लोक आपलाच लेख आहे, म्हणून बिनधास्त खपवतात, त्यावर नाटक काढतात, शॉर्ट फिल्म काढतात… त्यात माझ्या डोळ्यासमोर अनेकांना पुरस्कार मिळालेले मी स्वतः पाहिले आहेत, बातम्या वाचल्या आहेत. 

असो; हा झाला त्यांचा तात्पुरता आनंद…! 

पण माझे लेख चोरी करण्याऐवजी, माझं काम त्यांनी चोरी केलं असतं, एखाद्याची वेदना चोरी केली असती, तर मिळालं असतं ते आयुष्यभराचं समाधान…  त्यांनाही आणि मलाही…!!!  असो…,

मला अनेक वेळा विचारलं जातं, तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता ?  कोणत्या मंदिरात जाता ?  की मशिदीत जाता ?  की चर्चमध्ये जाऊन कॅण्डल लावता ?? 

मी या जगातला सगळ्यात भाग्यवान माणूस आहे… 

माझ्या हाती स्टेथोस्कोप असतो, तीच माझी आरती…  मी तोच ओवाळतो…!!! 

दरिद्री नारायणाला, मी जी वैद्यकीय सेवा देतो तोच मी वाहिलेला नैवेद्य…

वेदनेनं तळमळणाऱ्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू हाच मला मिळालेला प्रसाद… 

रस्त्याकडेला, फुटपाथ वर गलिच्छ अवतारात पडून माझी परीक्षा घेणाऱ्या प्रभुजींना, मी रस्त्यातच अंघोळ घालतो, तोच मी केलेला अभिषेक… !

देवा, तुझ्यावर लाखो लिटर दुधाचा अभिषेक घालण्याची माझी पात्रता नाही, औकात नाही… 

पण ओंजळीत बसेल इतकं दूध घेऊन मी तहानलेल्या बाळांच्या मुखात नक्की घालतो…  या बाळांच्या बोबड्या बोलात मी इतका रमतो की मला मंदिरात यायची आठवणच राहत नाही…. मला माफ कर देवा…!!!

थंडीत कुडकुडणाऱ्या लहान पोरांच्या अंगावर आम्ही चादर चढवतो… आणि म्हणून या अल्लाह, मस्जिद मध्ये कधी यायला जमलंच नाही… मुझे माफ करिये…!!! 

प्रभू येशू, चर्चमध्ये लावायची कॅन्डल, आम्ही कोणाच्यातरी मनात लावून आलो आहोत… Kindly forgive me… !!!

गुरुद्वारामध्ये मांडायचा लंगर आम्ही रस्त्यावरच मांडला आहे …. वाहे गुरुजी…. मैनु माफ कर दो…

आणि म्हणून मंदिर, मस्जिद, चर्च आणि गुरुद्वारा यापैकी कुठेही जायला मला जमतच नाही…! 

ही जी पूजा मांडली आहे, या पूजेचा तुम्ही सर्वजण अविभाज्य घटक आहात आणि म्हणून हा लेखाजोखा आपणास सविनय सादर ! 

शेवटी एका सुप्रसिद्ध वचनाचा आधार घेऊन म्हणावेसे वाटते, “मी त्या “देवाची” पूजा करतो ज्याला लोक “माणूस” म्हणतात… !!!” 

नतमस्तक मी आपणा सर्वांसमोर…!!! 

प्रणाम  !!!

— समाप्त—  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ पूर्णविराम म्हणजे अंत कसा असेल ? – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ पूर्णविराम म्हणजे अंत कसा असेल ? – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

मागे एका आजोबांशी बोलत होतो त्यांच्या बोलण्यात आलं, आता राहिलंय काय ? आता पूर्णविराम देण्याची वेळ आली बाबा… 

यावर माझी विचार चक्र सुरू झाली… पूर्णविराम म्हणजे खरंच अंत असतो का… ? पूर्णविराम दिल्यानंतरच नवीन वाक्याची सुरुवात होते… मग पूर्णविराम अंत कसा असेल ? 

पूर्णविराम म्हणजे पुन्हा नवीन वाक्य सुरुवात करण्याची उमेद…!!! 

ज्यांनी आपल्या आयुष्यांपुढे, थकून असे पूर्णविराम दिले आहेत, त्या पूर्णविरामानंतर आपण पुन्हा “श्री गणेशा” लिहून आयुष्याची सुरुवात त्यांना नव्याने करून देत आहोत. 

आमच्यात ही पात्रता तुम्हामुळे आली आणि म्हणून भेटलेल्या लोकांचे पूर्णविराम, अल्पविराम, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह, अनुस्वार, उकार, रूकार लेखाजोखाच्या स्वरूपात आपणास सविनय सादर ! 

  1. एक जूनला कापडी पिशवी प्रकल्प सुरू झाला. भीक मागणाऱ्या पाच लोकांना नवीन शिलाई मशीन घेऊन दिले, मला मिळणाऱ्या जुन्या कपड्यांचा वापर करून, आपण कापडी पिशवी शिवत आहोत….

पुलाखाली / झोपडपट्टीत किंवा आणखी जिथे जमेल तिथे हे आमचे पाच लोक कापडी पिशवी शिवत आहेत आणि इतर पाच याचक लोक कापडी पिशवी विकत आहेत. 

यातून प्रत्येकाला रोजचा पाचशे रुपयाचा व्यवसाय मिळत आहे. या एका प्रकल्पामुळे दहा कुटुंबं पोटाला लागली आहेत. 

“प्लास्टिक पिशव्या वापरू नका, कापडी पिशव्या वापरा” या अर्थाचे आपण तयार केलेले पुणेरी टोमणे घेऊन; समाजामध्ये माझे याचक लोक प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत प्रबोधन करत आहेत. 

रस्त्यावर भीक मागणाऱ्या आपल्या याचक मंडळींनी समाज प्रबोधन करावे, कापडी पिशव्या विकाव्या हा जगातील पहिलाच प्रकल्प असेल. 

  1. या महिन्यात काही अंध आणि अपंग याचकांना वजन काटा घेऊन दिला आहे. शनिवार वाड्याच्या भिंतीलगत आपले हे लोक वजन काटा घेऊन बसले आहेत. लोक येतात आणि वजन करून त्यांना पैसे देतात. भीक मागण्यापेक्षा हे केव्हाही चांगलं… !!!

लोकांनी केलेल्या “वजनामुळे” आपल्या लोकांच्या डोक्यावरचा “भार” हलका होईल हे निश्चित…! 

शनिवार वाड्याच्या भिंतीलगत अनेक लोक अनेक प्रकारचा व्यवसाय करत आहेत…. 

पूर्वी हे कधीतरी भीक मागत होते…. आज आपलं बोट धरून ते स्वाभिमानाने जगत आहेत. 

कुणी टॅटू काढतंय, कोणी पोस्टर विकतंय, कोणी चप्पल विकतंय, तर कोणी आणखी काय करतंय….! 

कधी इकडे आलात तर…. गरज असो नसो… त्यांच्याकडून एखादी वस्तू घ्या… 

यामुळे तुमचं फार काही जाणार नाही; परंतु त्यांना लाखमोलाचा आत्मसन्मान मात्र मिळेल ! 

पूर्व आयुष्याबद्दल विचारून त्यांना  लाजिरवाणं मात्र नको करू या…! 

  1. कोणाचाही आधार नसलेल्या एका ताईला नवीन हातगाडी घेऊन दिली आहे. या हात गाडीच्या सहाय्याने व्यवसाय करून आपलं घर ती चालवत आहे.

वर वर्णन केलेले पंधरा-वीस लोक… प्रत्येकाची स्वतंत्र कहाणी आहे… 

यांच्या हातातला कटोरा या महिन्यात सुटला आहे… 

हे मला भेटायला येतात त्यावेळी रडतच येतात… ! 

त्यांना काहीतरी बोलायचं असतं, पण त्यांना बोलताच येत नाही… 

आणि कान असून मी बहिरा होतो..

शब्द इथे थिटे पडतात पण अश्रू बोलू लागतात…. तेही ताठ मानेने…!!! 

शब्दातूनच सर्व काही व्यक्त होत असतं तर अश्रूंची गरजच राहिली नसती…!!! 

शब्दांच्या पलीकडचं मांडण्यासाठीच निसर्गाने अश्रू दिले आहेत…!!! 

रडण्याचा आशीर्वाद निसर्गाने फक्त माणसाला दिला आहे… 

ज्याच्या समोर रडावं… त्यानं आपल्या माथ्यावर प्रेमानं, मायेनं हात ठेवावे… आणि रडणं पूर्ण झालं की आपण त्याच्या चरणावर माथा ठेवावा… 

हे चरण जिथे सापडतील ती आपली माणसं…   तेवढीच आपली संपत्ती…. तोच खरा श्रीमंत… !!! 

बाकी घरदार, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, पद पैसा प्रतिष्ठा सगळं झूट…!!! 

शैक्षणिक

– माझ्या आयुष्यावर जे मी पुस्तक लिहिलं आहे… 

वर्षभर ते विक्री करतो…. त्या पैशाला हात लावत नाही,  परंतु एप्रिल मे जून जुलै या महिन्यात पुस्तक विक्रीतून मिळालेला सर्व पैसा भीक मागणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरतो. 

जे या अगोदर कधीही शाळेत गेले नाहीत अशा सर्व मुलांना मॉडर्न मराठी मिडीयम, शिवाजीनगर येथे ऍडमिशन घेऊन दिले आहे.

जी मुलं या अगोदर कोणत्यातरी शाळेत शिकत होती, तिथल्या सर्वांच्या फिया भरून झाल्या आहेत. 

सॉक्स युनिफॉर्म पासून दप्तरापर्यंत आणि दप्तरापासून कंपास पेटी पर्यंत सर्व बाबी मुलांना घेऊन दिल्या आहेत. 

आमचा एक मुलगा कॉम्प्युटर सायन्स करत आहे, दुसरी मुलगी एमबीए करत आहे, तिसरी मुलगी आयएएस करत आहे, चौथ्या मुलाची पोलीस भरतीसाठी नुकतीच नोंद केली आहे. 

याव्यतिरिक्त नुकताच बारावी पास झालेला मुलगा; त्याला स्पोर्ट्स टीचर व्हायचे आहे, समाजासाठी स्वतः घातक होता होता वाचलेला हा मुलगा त्याच्या मागील पिढीला घातक होण्यापासून वाचवत आहे.  “घातक” या लेखामध्ये त्याच्याविषयी सविस्तर सर्व काही लिहिलं आहे… 

आमच्या शैक्षणिक प्रकल्पात मदत करणाऱ्या अनेक घटकांपैकी एक घटक; चॉईस बुक शॉप चे मालक, श्री अजय कटारिया नुकतेच आपल्याला सोडून गेले… “अशी पाखरे येती”… या नावाने लेख लिहून त्यांना आदरांजली समर्पित केली आहे. 

वैद्यकीय

  1. अनेक वृद्ध लोकांना कानाला ऐकू येत नाही किंवा डोळ्यांना दिसत नाही, या कारणास्तव; रस्ता ओलांडताना किंवा इतर ठिकाणी त्यांचे रोड एक्सीडेंट होतात. यात कधी हात मोडतो कधी पाय मोडतो, कधी डोके फुटते, कधी इतर गंभीर दुखापत होते किंवा कधी कधी जीव सुद्धा जातो.

अशा अपघाताची कुठेही नोंद होत नाही… कोणालाही शिक्षा होत नाही… कारण त्यांना माणूसच समजलं जात नाही. असे लोक उपचाराविना रस्त्याकडेला तळमळत पडून राहतात. जखमांमध्ये अक्षरशः किडे पडतात. 

अशा सर्वांना या महिन्यात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, त्यांच्यावर उपचार केले, ऑपरेशन केले. या सर्वाचा खर्च संस्थेने उचलला आहे. 

बऱ्या झालेल्या लोकांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवलं आहे, तिथे त्यांना झेपतील असे व्यवसाय उघडून दिले आहेत. 

  1. एक्सीडेंट टाळता यावेत यासाठी, ज्यांना दिसत नाही, अशा वृद्ध याचकांना आपण डोळ्याच्या दवाखान्यात नेऊन तपासणी करून चष्मे देत आहोत, मोतीबिंदूचे ऑपरेशन करत आहोत. आज पावतो 2000 पेक्षा जास्त रुग्णांना दृष्टी मिळवून दिली आहे.

यात अनेक रुग्ण असे आहेत ज्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे सुद्धा शक्य नाही, अशांसाठी आपण आता रस्त्यावरच डोळे तपासणी सुरू केली आहे. 

  1. ऐकू येत नसल्यामुळे होणारे एक्सीडेंट रोखता यावेत; यासाठी”मांडके हियरिंग सर्व्हिसेस, पुणे” यांच्याशी आपण करार केला आहे. वृद्ध याचकांची आपण कानाची तपासणी करून त्यांना कानाची मशीन सुद्धा देत आहोत.
  2. कोणत्याही आजाराचे निदान करायचे झाल्यास रक्त – लघवी तपासणी, सोनोग्राफी एक्स-रे, सिटीस्कॅन यासारख्या बाबींची सुद्धा आवश्यकता असते. या तपासण्या न केल्यामुळे आजाराचे नेमके निदान कळत नाही आणि अचानकपणे मृत्यू होतात.

हे टाळण्यासाठी वरील सर्व तपासण्या आपण रस्त्यावरच करून घेत आहोत. ज्या तपासण्या रस्त्यावर होत नाहीत, त्या तपासण्या “रेड क्रॉस सोसायटी, पुणे” मधून आपण करून घेत आहोत. 

  1. संपूर्ण दवाखाना मोटरसायकलवर घेऊन भिक्षेकरी जिथे बसतात तिथेच उकिरडा फुटपाथ किंवा सुलभ शौचालय शेजारी दवाखाना रस्त्यातच मांडून बसतो. त्यांना रस्त्यावरच वैद्यकीय सेवा देतो. वैद्यकीय सेवा देता देता त्यांच्याच बरोबर जेवतो खातो, गप्पा मारतो … विनोद करतो, त्यांच्या सुखदुःखात समरस होतो.

ते काही काम करतील का ? याची चाचपणी करतो आणि त्यांना मग या आधारे आपण छोटे मोठे व्यवसाय टाकून देतो आहोत. 

पुणे आणि चिंचवड मिळून भीक मागणाऱ्या लोकांचे असे 60 स्पॉट निश्चित केले आहेत, रोज चार याप्रमाणे पंधरा दिवसात हे सर्व स्पॉट आपण कव्हर करत आहोत. 

“भिक्षेकरी” म्हणून न राहता; त्यांनी “कष्टकरी” व्हावे आणि कष्टकरी होऊन “गावकरी” म्हणून सन्मानाने जगावे… हा आपल्या कामाचा मूळ हेतू आणि गाभा आहे…!!!

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दर्शन…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “दर्शन…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मैत्रिणीचा फोन..

” कशी आहेस नीता? खूप दिवसांनी फोन करते आहे.”

” अगं ठीक आहे. रामरायाचं दर्शन करून आले.”

यावर अगदी आश्चर्याने ती म्हणाली

” काय सांगतेस काय?मला बोलली पण नाहीस..”

 त्यात काय सांगायचं मला काही कळेच ना…

” कधी ठरवलंस? मला विचारायचं तरी  . ..मी पण आले असते”

 ती रागवलीच ….

“अग सकाळी मनात आलं आणि जाऊन आले .”

“म्हणजे इथेच होय.. मग ठीक आहे. मला वाटलं अयोध्येला गेलीस का काय?”

सध्या सगळ्यांना राम म्हटलं की अयोध्याच आठवत आहे…

तीला म्हटल

” कधीतरी इथल्याही रामाला जायचं”

यावर ती म्हणाली

 “मी किती दिवसात इथल्या रामाच्या देवळात गेलेच नाहीये .जाईन एकदा”

” तुळशीबागेत जातेस ना ?मग जाऊन यायचं की”

” अगं  तिथं  गेलं की खरेदीच्या नादात लक्षातच येत नाही “

“असू दे ..जा  कधीतरी …”अस म्हणून मी फोन ठेवला.

मी बघितलं आहे..खूप जणी अयोध्येला जायला मिळालं नाही म्हणून दुःखीकष्टी.. आहेत.

खरतर ईथल्या देवळातल्या रामातही रामच आहे… कधीतरी जावं त्याच्या दर्शनाला.

 त्या मूर्तीतही तेच प्राणतत्त्व आहे.पण 

आपण मूर्तीच्या सौंदर्याकडे मंदिराच्या शिल्पातच दंग होत आहोत का?असे वाटते आहे.

 आपण टीव्हीवर मोबाईलवर अयोध्येचं मंदिर बघितलेलं आहे. जेव्हा जमेल तेव्हा जाऊ नाही जमलं तर जाणारही नाही.

 आपण जाऊ शकलो नाही अशी कित्येक ठिकाण आहेतच की ….

त्यासाठी वाईट कशाला वाटून घ्यायचं?

आता  पंढरीची वारी जवळ आलेली आहे. वारीला जायला वेळ नाही. इतकं चालणं जमणार नाही. रात्री वेगळ्या जागी झोप येणार नाही. हे आपलं आपल्याला माहित आहे. मग असं करा ना..

जेव्हा जमेल तेव्हा तुमच्या सोयीनुसार तुमच्या घराजवळ पांडुरंगाचे देऊळ आहे त्याला पायी जाऊन या .आपली आपण वारी करा. जाताना वारीचा भाव आपल्या मनात ठेवा …तो महत्त्वाचा आहे…

मनातल्या मनात विठुचा गजर करा,आरत्या, अष्टकं,  चार अभंग म्हणा…

बघा तुमचा तुम्हाला आनंद मिळेल.

लाखों वारकरी पायी जात आहेत. त्यांनाही टीव्हीवर ,व्हिडिओतून बघुया….त्यात समाधान मानू या..

आपला सख्याहरी फक्त पंढरपुरातच नाहीये .तो इथल्या देवळातल्या मूर्तीतही आपण पाहूया…

त्यासाठी शांतपणे बसू या…

डोळे बंद केले आणि मनोभावे त्याची आठवण केली की तो दिसतोच ..

जमेल तेव्हा अयोध्येला पंढरपूरला जरूर जा.

एक लक्षात ठेवा अमुक एक  देवळात जाणं हेच आपलं साध्य आहे का  ?  तिथे गेल तरच देव भेटणार आहे का? याचाही विचार करा.

रामराया कुठे आणि कशाकशात पाहायचा याचा शोध घ्या.

अंतरंगात डोकावून शांतपणे  मनापासून विचार करा .

पंढरीराया रामराया कुठे ना कुठे भेटेलच….

अयोध्येला पंढरपूरला गेला नाहीत तरी….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ छोटासा ब्रेक… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ छोटासा ब्रेक… ☆ श्री सुनील शिरवाडकर

एकाच ऑफिसमध्ये काम करत असुनही रामची आणि माझी भेट बर्याच वर्षांत झाली नव्हती.त्या दिवशी अचानकच तो भेटला.ऑफिसमध्येच.दाढी थोडीशी वाढलेली.. कपाळावर भस्माचे पट्टे.इकडचं तिकडचं बोलणं झालं. म्हटलं.. चल चहा घेऊ.

तर तो म्हणाला.. नको माझं पारायण चालु आहे.

“अजुन करतोस तु पारायण?”

“हो वर्षातुन दोन पारायण करण्याचा नियमच आहे माझा. गुरुपौर्णिमा,आणि दत्त जयंती.”

हो.माहीत आहे मला. पण अजुनही करतो म्हणजे विशेषच की. होतं का वाचन या वयात?”

“हं..आता सगळेच नियम नाही पाळले जात. पण करतो. जसं जमेल तसं”

रामच्या घरी पुर्वीपासुनच दत्त भक्ती. आता ‘गुरुचरित्र’ पारायण करणं म्हणजे त्याचे अनेक नियम.पारायण करणार्याची अंतर्बाह्य शुचिर्भूतता..सोवळे,ओवळे..वाचनाची लय..पारायण काळातील आहार.. ते पांढऱ्या धाबळीवर झोपणे.. पारायणानंतरचे उद्यापन, महानैवेद्य.

हे सगळं रामकडुन आता या वयात कसं होत असेल?

“हे बघ..जेवढं जमेल तेवढं करायचं.आता मी वाचनही संध्याकाळी करतो.दिवसभर ऑफिस झालं की मग घरी गेल्यानंतर स्नान करून वाचनाला बसतो.तेही खुर्चीत. मांडी घालुन आता खुप वेळ नाही बसता येत.नियम म्हणशील तर या काळात बाहेरचं काही खात नाही. आपल्या कडुन होईल तेवढं करायचं.अखेर भावना मोठी.

कारण गुरुचरीत्रातच तर म्हटलंय..

‘अंतःकरण असता पवित्र..

सदाकाळ वाचावे गुरुचरित्र’

एकीकडे पारायण सुरु असतानाच वारकर्यांना ओढ लागते ती पंढरीची.शेतकर्यांनाही जरासा विसावा, चेंज हवाच असतो ना!आता आषाढ सुरु झाला. वेगवेगळ्या संतांच्या पालख्या  पंढरपुरच्या वेशीजवळ येऊ लागतात.वर्तमान पत्रात फोटो, बातम्या येऊ लागतात.

पुण्यात ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे थाटात स्वागत.

‘आज सासवड मध्ये पालख्या पोहोचल्या.

वाखरी  गावात रिंगण रंगले..

पंढरपुरात पालख्या दाखल..

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्यात आली.

एकंदरीतच आषाढ महीना म्हणजे थोड्याशा विश्रांतीचा.आपल्या नेहमीच्या रुटीनपासुन वेगळं काही करण्याचा.ईश्वरभक्ती करण्याचा.निसर्गाच्या जवळ जाण्याचा.छोटासा ब्रेक घेण्याचा.

बर्याच कुटुंबात एक परंपरा असते.आषाढ महीन्यात देवीला नैवेद्य अर्पण करण्याची.गावाच्या वेशीवर असलेल्या ग्रामदेवतेला खिर पुरीचा नैवेद्य दाखवायचा.पावसाळ्यात साथीचे आजार जास्त प्रमाणात पसरतात.मग आपल्या लहानग्यांना त्याची बाधा होऊ नये यासाठी देवीला साकडे घालायचे.हा नैवेद्य बनवणे यालाच अनेक घरांमध्ये ‘आखाड तळणे’ असं म्हटलं जातं.

एकेकाळी व्यापारी वर्गासाठी हा महीना  लाडका असायचा.म्हणजे बघा.. दोन तीन महीन्याची लग्नसराई आता संपलेली आहे. पुर्वी आषाढात लग्न होत नसायचे. तर लग्नसराईत चांगला धंदा झालेला.मुलांच्या शाळा आता रेग्युलर सुरु झाल्या आहेत.वह्या, पुस्तके, दप्तर वगैरे ची खरेदी पण आटोपली आहे. गाठीशी बर्यापैकी पैसा.दोन तीन महीने धावपळ, दगदग झालेली.अर्थात ती पण हवीहवीशी. 

तर आता या महीन्यात आराम करायचा. सगळा आसमंत हिरवागार झालेला आहे.बाहेर छान पाऊस पडतो आहे. गावागावांत तर  निसर्ग बहरलेला आहेच.पण शहरांच्या आसपासही हिरवाई पसरलेली आहे ‌छोटे मोठे धबधबे कोसळत आहे.वर्षा सहलीसाठी पर्यटकांचे थवे बाहेर पडत आहे.

अगदीच काही नाही तर आपल्या बाल्कनीत बसुन चहाचे घोट घेत पावसाचा  आनंद घ्यायचा.बस्स..आपल्यासाठी जगायचं.मग श्रावण सुरु झाला..सणवार सुरु झाले की आहेच सगळ्यांची धावपळ.

आषाढात गिर्हाईकी नाही.. धंदा शांत.पण त्याचा खेद करायचा नाही. कारण त्या पिढीतल्या लोकांचं म्हणणंच असायचं..

‘आषाढ मंदा..तो सालभर धंदा’

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares