मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मला आलेला विचित्र अनुभव… – लेखिका – सुश्री वैदेही मुळये ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ मला आलेला विचित्र अनुभव… – लेखिका – सुश्री वैदेही मुळये ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

‘द केरला स्टोरी ‘ च्या पार्श्वभूमीवर मला आलेला अनुभव share करावासा वाटतोय, म्हणून हा लेख. 

नक्की वाचा. 

ही घटना कुठल्या दुसर्‍या शहरातील नाही तर मुंबईतली. मी शक्यतो कितीही घाईत असले तरीही काही गोष्टींची पडताळणी करते आणि मगच रिक्षा किंवा टॅक्सी यातून प्रवास करते. 

ही गोष्ट आहे एप्रिल महिन्यातली.  मी रिक्षेने प्रवास करत होते. (सर्व पडताळणी करूनच.) त्यातला रिक्षावाला- ‘ कुठून आलात, कुठे राहता, रोज याच वेळेत येता का,’ असे प्रश्न विचारायला लागला. मी स्पष्टपणे त्याला खडे बोल सुनावले. तो काही वेळ शांत बसला. परत थोड्यावेळाने ” या भागात ना मॅडम बस जात नाहीत. इतर रिक्षावाले पण जास्त पैसे घेतात.” अशी माहिती द्यायला त्याने सुरवात केली. 

माझं उतरायचं ठिकाण आलं. मी मीटरप्रमाणे त्याला पैसे द्यायला गेले.  तर त्याने चक्क 20 रुपये कमी घेतले. मी त्याला त्याचं कारण विचारलं तर म्हणाला, “आम्हाला पैसे नाही..  तुम्ही महत्त्वाचे आहात.” मला हे खटकलं. 

पुढे तो म्हणाला “ तुम्हाला साधारण किती वेळ लागणारे, मी थांबतो तुमच्यासाठी.”  मी म्हंटलं “ कशाला, मला 3 तास तरी लागतील.”   हे सांगितल्यावर देखील त्याची थांबायची तयारी होती. मी नको म्हंटलं तर म्हणाला “ मग तुमचा नंबर मला द्या मी फोन करतो.” आत्तापर्यंत हळू हळू सर्व प्रकार माझ्या लक्षात आला होता. त्यामुळे मी माझा नंबर न देता त्याचाच नंबर घेतला आणि नाव विचारलं. नाव माझ्या अपेक्षेप्रमाणेच निघालं- “हुसेन” 

तो पुढे काही बोलणार तेव्हाच मी नमस्कार करत म्हंटलं, “ दादा हे प्रकार थांबवा. श्रीराम तुमचं भलं करो.” 

हे म्हंटल्यावर अचानक त्याची खरी आपुलकी त्याच्या चेहर्‍यावर उमटली आणि तो निघून गेला. 

घटना साधी वाटते पण विचार केला आणि बुद्धी आणि डोळे उघडे ठेवले, तर किती गंभीर होती याचा अंदाज येईल. 

आणखी काही मुद्दे मी नमूद करू इच्छिते … 

– त्याचे दोन्ही कान टोचलेले होते. 

– त्याचं नाव आणि त्याचा पेहेराव, भाषा, यांचा ताळमेळ कुठेच जाणवत नव्हता.

– तो सगळे कामधंदे सोडून तीन तास थांबणार होता.(का???) याचा विचार तुम्ही करा. 

– मीटरपेक्षा 20 रुपये कमी.(पैसे वाचविण्यासाठी देखील एखादी मुलगी सहज फसू शकते.)

– नको तितकी आपुलकी. 

… या प्रत्येक मुद्द्यात मोठं कारस्थान आहे.  मी सावध होते म्हणून वाचले. प्रत्येक स्त्रीने सावध राहणं गरजेचं आहे.

या प्रसंगानंतर मी सेक्युलर नाही, तर सनातनी आहे याचा मला अधिक अभिमान वाटू लागला हे निश्चित. 

काळजी घ्या आणि ‘केरला स्टोरी’ नक्की पहा. 

धन्यवाद.

लेखिका : सुश्री वैदेही मुळ्ये

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “स्व सुलोचना – एक सात्विक पर्व संपले ” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “स्व सुलोचना – एक सात्विक पर्व संपले ” ☆ सौ राधिका भांडारकर 

(३०जुलै १९२८—०४जुन २०२३)

सिनेसृष्टीतील एक सात्विक पर्व संपलं. एक वात्सल्यमूर्ती काळाच्या पडद्यामागे हरपली.  एका महान कलावंताची प्रेमस्वरूप सफर संपली.

जिचं नाव घेताच कपाळी रेखीव चंद्रकोर, नाकात नथ, डोईवर काठाचा पदर, आणि डोळ्यात शीतल चंद्रप्रकाश असलेली एक अत्यंत तेजस्वी,  कर्तव्यनिष्ठ, करारी, तितकीच प्रेमळ, आणि सात्विक स्त्रीची मुद्रा नकळत उभी राहते, ती म्हणजे चित्रपट सृष्टीचा एक मोठा कालखंड गाजविणाऱ्या श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचीच.

चित्रपटसृष्टीत  त्या सुलोचना दीदी  म्हणून प्रसिद्ध होत्या. चार जून २०२३ रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली आणि अभिनयाचं एक दिव्य पर्व समाप्त झालं.

१९४३ साली  हिंदी चित्रपट सृष्टीत पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर सहकलाकार म्हणून त्यांनी अभिननयाची  सुरुवात केली.  त्यानंतर राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढी बरोबरही त्यांनी भूमिका केल्या. त्यांनी जवळजवळ ३०० हून अधिक मराठी — हिंदी चित्रपटात भूमिका केल्या.

वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, मराठा तितुका मेळवावा, साधी माणसं,  कटी पतंग हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट.

चित्रपटात त्या जेव्हा आल्या तेव्हा त्यांची  भाषा इतकी शुद्ध नव्हती. त्यांच्या बोलण्याची थट्टा व्हायची. भालजी पेंढारकर हे त्यांचे गुरु.  त्यांनी त्यांच्यासाठी एक संस्कृत मासिक लावलं.  ते वाचणं अतिशय क्लिष्ट काम होतं मात्र त्याबद्दल अजिबात तक्रार न करता त्यांनी ती मासिकं वाचली आणि भाषा शिक्षण, उच्चार शिक्षणाची अक्षरश: तपस्या पार पाडली. 

जशी भूमिका तसा अभिनय,तशीच संवादाची भाषेची भावपूर्ण नेमकी उलगड. सहज,अकृत्रीम हे त्यांचे खास वैशिष्ट्य.

वास्तविक त्यांचं मूळ नाव रंगु. जयप्रभा स्टुडिओत  काम करण्यात आल्यानंतर त्यांचे विशाल, भावपूर्ण डोळे पाहून भालजी पेंढारकरांनीच त्यांचे सुलोचना असे नामकरण केले आणि चित्रपटसृष्टीत सुलोचना याच नावाने त्यांना प्रसिद्धी मिळाली.

भालजींना त्या बाबा म्हणायच्या. त्यांच्याविषयी आदरपूर्वक बोलताना त्या म्हणतात,” बाबांनी आम्हाला घोड्यावर बसणं, तलवार चालवणं इत्यादी ऐतिहासिक भूमिका करताना आवश्यक असणाऱ्या गोष्टी शिकवल्या. एडिटिंग सुद्धा त्यांनी आम्हाला शिकवलं.”

सुरुवातीला त्या नृत्य प्रधान सिनेमात काम करत.  पण भाऊबीज या चित्रपटानंतर त्यांनी तशा प्रकारच्या भूमिका स्वीकारल्या नाहीत.  कारण एक दोन ठिकाणी समारंभात त्यांना अशी विचारणा झाली होती की त्या सिनेमात नृत्य का करतात?  तेव्हा त्यांनी सांगितले होते की त्या नृत्यकला शिकल्या  आहेत.  त्यावेळी त्यांना कोणीतरी म्हणालं की, “तुम्ही म्हणजे एक आदर्श स्त्री आहात.  तुमचे नृत्य पाहून आमच्याही पोरीबाळी नाचायला लागतील ते आम्हाला कसे चालेल?”

त्यावेळेचा काळ इतका आधुनिकतेकडे झुकलेला नव्हता. विचार मागासलेले होते.  पण त्यांच्याविषयी अशी भीती व्यक्त केल्यामुळे त्यांना फार वाईट वाटले आणि मग त्यानंतर त्यांनी चित्रपटात नृत्य करणे सोडून दिले.

सुलोचना दीदींनी  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनयाचा ठसा उमटवला.  त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांनी विशेषत:  आईच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले.  हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपट सृष्टीशी त्यांचे नाते जिव्हाळ्याचे राहिले.  त्या जशा पडद्यावर प्रेमळ सोशिक दिसत तशाच त्या लोकांतही एक सर्वांसाठी मायेचा आधार होत्या.  त्यांच्याकडे पाहता क्षणीच एक स्वच्छ, निर्मळ, पावित्र्याचाच अनुभव येत असे. खरोखरच त्यांच्या जाण्याने एक आई गमावल्याचं दुःख होत आहे.

त्यांचा सिने प्रवास अनेक दशकांचा.  त्यांनी अनेक नायिका  अभिनीत केल्या.

एका मुलाखतीत बोलताना त्या म्हणाल्या होत्या,” एक खंत आहे.  पेशवाईतल्या पार्वती बाई, अहिल्याबाई होळकर आणि झाशीची राणी या तीन भूमिका करायच्या राहून गेल्या,”

मराठी चित्रपट सृष्टीला त्यांनी मौलिक योगदान दिले.  प्रपंच चित्रपटासाठी राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना १९६३ साली  मिळाला.  महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम पुरस्कार, केंद्र शासनातर्फे पद्मश्री, मराठी चित्रपट महामंडळातर्फे चित्र भूषण आणि महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार —असे अनेक मानाचे तुरे त्यांच्या माथी  मिरवले.  जीवनगौरव,  लाईफ अचीवमेंट अॅवाॅर्ड ही त्यांना मिळाले.

असे हे चित्रपट सृष्टीतील एक निर्मळ, निखळ, विमल व्यक्तिमत्व.  काळ कोणासाठी थांबतो? अशा अनेक कलारत्नांना आपण आजवर मुकलो आहोत.  आज सुलोचना दीदींच्या रूपाने एक मायेची ज्योत  विझली पण कलाकारांचा अंत होत नसतो.  कलेच्या रूपात त्यांचं अस्तित्व अमर असतं.  सुलोचना दीदींनी  स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचाही दीर्घकाळ अभिनयाच्या माध्यमातून गाजवला.  त्यांच्या विविध भूमिकांचा रसिकांनी आस्वाद घेतला.  सत्वगुणाचा खरोखरच प्रत्यक्ष अनुभवच घेतला.  रसिकांच्या मनावर त्यांनी आनंदाचं राज्य केलं. आज त्या नाहीत.  एका महान, जाणत्या कलाकाराची जीवन यात्रा पूर्ण झाली.  त्यांना कृतज्ञता भावनांनी निरोप देऊया!  प्रेमपूर्वक, आदरपूर्वक श्रद्धांजली वाहूया!!🙏💐

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ रामाचं नाम… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ रामाचं नाम… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

कोणीही भेटलं की तो “श्रीराम” म्हणायचा. सोसायटीच्या वॉचमनपासून कंपनीच्या मालकापर्यंत सगळ्यांनाच हे ठाऊक होतं, आणि आताशा तर तो दिसला की आपसूकच तेही त्याच्या निमित्ताने रामनाम घेत असत. साधना वगैरे नाही, पण रोज एक माळ रामनाम तो घ्यायचा. त्याच्या मित्राला काही हे आवडायचं नाही, पटायचं नाही. “का करायचं असं ? याने तुला काय फायदा होतो ? तू हे कशासाठी करतोस ?” वगैरे प्रश्नांची तो मित्र याच्यावर सरबत्ती करायचा. 

तो एरवी त्या मित्राच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा, हसून सोडून द्यायचा. पण एके दिवशी मित्र खनपटीलाच बसला, “तुला काय मिळतं हे सारखं राम राम करून ? तुला काय तो राम दर्शन देतो का असं केल्याने ?”

“काही मिळण्यासाठी कशाला रामाचं नाव घ्यायचं ?” तो शांतपणे म्हणाला. “आणि दर्शन होण्याचंच म्हणशील तर अजून काही ते दर्शन झालं नाही, हे खरंच आहे. पण ते राहू दे. सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचं आहे. कुठे जाऊ ? मदुराई छान आहे का रे ?”

हा एकदम पर्यटनात कुठे घुसला, मित्राला बोध झाला नाही. पण मदुराई छान आहे हे त्याने ऐकलं होतं, त्यामुळे त्याने उत्साहाने या ठिकाणाला अनुमोदन दिलं. 

“गाडी घेऊनच जाईन म्हणतो. Long drive पण होईल. पण जायचं कसं ? रस्ता तर माहित नाहीये.”

“कसा रे तू असा भोटम् ? गुगल मॅप आहे की तुझ्या फोनमध्ये. ती बाई सांगेल तसा जात जा की.” मित्र कीव करत म्हणाला. 

“तू गेला आहेस का रे मदुराईला ?” त्याची पृच्छा.

“नाही बुवा. मला तो आपला हा म्हणाला होता – छान आहे मदुराई – म्हणून मी तुला सांगितलं.” मित्राची कबूली. 

“एक्झॅक्टली. तू मदुराईला गेलेला नाहीस, पण तो अमका अमका गेला आहे, त्याने तुला सांगितलं, म्हणून त्याच्या अनुभवावर विश्वास ठेवून तू ते मला सांगितलंस. तुला मदुराईचा रस्ता ठाऊक नाही, पण ज्या गुगल मॅपने हजारो जणांना योग्य मार्ग दाखवला त्या गुगल मॅपवर तुला विश्वास आहे. मलाही प्रत्यक्ष देव दिसला नाही, पण आमच्या गुरूंना नक्की देव दिसला आहे, त्यांनी सांगितलं आहे – ज्या गुरू परंपरेनं हजारो लाखोंना मार्गदर्शन केलं, त्या गुरू परंपरेने छातीठोकपणे सांगितलं आहे – नामस्मरण करा, तुम्हाला देवदर्शन होईल. विश्वास ठेवायला एवढं कारण पुरेसं आहे, नाही का ?”

या युक्तीवादाची यथार्थता पटल्याने मित्र निरुत्तर झाला. पण तरी त्याला अजून प्रश्न होतेच.  

“अरे, पण तू असे किती दिवस अजून राम राम करत राहणार ? इतकी वर्षे झाली तरी तुला जे हवंय ते अजून का मिळालं नाही ? आणि इतकी वर्षे झाली, तरी अजून फक्त राम राम वरच गाडी अडकली आहे तुझी ? इतकी वर्षं झाल्यावर काही वेगळं, काही नवीन, काही आणखी advanced करावं, असं नाही वाटत ? आणि तुला जर माहितीच नाही, तुला नक्की काय हवंय ते तर मग तुला समजणार तरी कसं की तुला जे हवंय ते तुला मिळालं म्हणून?” तो मित्र काही पिच्छा सोडत नव्हता. त्याची टकळी थांबतच नाही म्हटल्यावर त्याच्या सगळ्याच प्रश्नांची फायनल उत्तरं द्यायला त्याने सुरुवात केली. 

“तुला पुष्कर लेले माहित आहे ना ? शास्त्रीय संगीत – नाट्यसंगीत गायक ? ऑलरेडी त्यांचं बऱ्यापैकी नाव झाल्यानंतर, सवाई गंधर्व यांच्या गायकीचे बारकावे शिकण्यासाठी ते पुन्हा एका गुरूंकडे गेले – बहुतेक पंडित सत्यशील देशपांडे यांच्याकडे. तर नवीन काही शिकवण्याऐवजी, गुरुजींनी या ख्यातनाम गायकाला पुनश्च हरि ओम म्हणत, मूलभूत षड्ज लावायचा अभ्यास करायला सांगितलं. पुष्कर आश्चर्यचकित झाले. त्यांच्यासारख्या प्रथितयश गायकाला परत “सा” लावायला शिकायला सांगणं म्हणजे चार्टर्ड अकाऊंटंटला पहिल्यापासून बेरजा वजाबाक्या शिकायला सांगण्यासारखं होतं. पण गुरूंवर श्रद्धा ठेवून त्यांनी तो अभ्यास करायला सुरुवात केली. रोजचा रियाझ संपला की ते प्रश्नार्थक मुद्रेने गुरूंकडे पहायचे – काही सल्ला, सूचना किंवा कदाचित कौतुक ऐकू येईल या अपेक्षेने – पण दर वेळी गुरू स्थितप्रज्ञतेने सांगत – अभ्यास चालू ठेवा. 

तीन चार महिने असेच निघून गेले, आणि एक दिवस तो “सा” लागला – सापडला. गुरूंनी काही सांगायची गरजच लागली नाही. तो अनुभव, ती अनुभूती पुष्करना मिळाली – जाणवली. ते शहारले. त्यांनी गुरूंकडे पाहिले. मंद हसत गुरूंनी सांगितले – “ये बात ! अब इस षड्जको पकड कर रख्खो.

त्यामुळे जे मिळायला हवे आहे, ते मिळालं आपसूकच कळेल. कोणी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आता प्रश्न राहतो की जे हवं आहे ते अजून का गवसलं नाही.

“ तुझं असं होतं का रे ? टीव्हीवर जाहिरात चालली असते – अवघ्या पाच दहा सेकंदांचा खेळ – पण आपण तल्लीन होतो, त्या जाहिरातीने हसतो वा टचकन डोळ्यात पाणी येतं. ती तल्लीनता येणं महत्त्वाचं. आपण अजून पोटतिडीकीने राम राम म्हणत नाही रे. खच्चून भूक लागल्यावर लेकरू ज्या विश्वासाने आईला पुकारते, वस्त्रहरण होताना द्रौपदी ज्या आर्ततेने कृष्णाचा धावा करते, ते अजून होत नाही. इतकी वर्षे ती आर्तता, तो विश्वास माझ्या हाकेत आणायचा प्रयत्न करतोय, एवढंच.” तो म्हणाला, त्या मित्राला राम राम घातला, आणि आपल्या कामाला निघून गेला. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “कोसळलेली आभाळं सावरताना…!” —☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? मनमंजुषेतून ?

☆ “कोसळलेली आभाळं सावरताना…!” —  ☆ श्री संभाजी बबन गायके 

मानवी जीवनाच्या डोईवर मृत्यू नावाचं आभाळ कायमच कोसळण्याच्या बेतात असतं. जन्माच्या सोहळ्याची सांगता मृत्यूच्या अभ्रछायेखाली होताना दशदिशा काळवंडून गेलेल्या असतात. हे आभाळ कोसळतं तेव्हा मनाच्या पृष्ठभागावरचं सर्वच जमीनदोस्त होतं… आणि मनाच्या खोल समुद्राचा तळ भूकंपाच्या धक्क्यानं शतविक्षत होतो… आणि वेदनेच्या लाटा उसळी मारून वर येऊ पाहतात. हा अनुभव मरणा-याला येऊच शकत नाही, मात्र मरणा-याच्या रक्त-नात्यांना हा अनुभव विस्कटून टाकतो. अशा वेळी खांद्यावर ठेवला गेलेला हलका हात, पाठीवरून अलगद फिरणारी मायेची बोटं, कपाळावरून डोक्यावर हळूहळू स्पर्शत जाणारा एखाद्या थरथरत्या हाताचा तळवा. . वेदनांकित तळहाताच्या उपड्या पृष्ठभागावर एखाद्या हाताची सहज थपथप आणि कुणीतरी अतीव सहवेदनेने मारलेली मिठी… किती मोठा दिलासा असतो ! शब्द तर नंतर आणि तेही बिचारे गलितगात्र झालेले ! संवेदनेच्या फुलांतून सहवेदनेचा सुगंध अवतरतो तेव्हा आभाळ सुखावून जात असावं ! आपली स्वत:ची दु:खं एकवेळ सुसह्य असतीलही, पण दुस-याच्या दु:खाला सामोरं जाणं म्हणजे जणू श्वास रोखून पाण्याखालून चालत जाऊन पैलतीर गाठण्याएवढं गुदमरून टाकणारं. आणि एरव्ही हाताच्या अंतरावर दिसणारे हे पैलतीर अशावेळी क्षितीजाच्याही पल्याडची वाटतात… आणि असतातही ! 

जगण्यासारखीच मरणाचीही अनंत रूपे असतात. त्यातलं सर्वाधिक पवित्र मरण म्हणजे देशासाठी… परोपकारासाठी, दुस-याच्या प्राणांचे रक्षण करताना आलेलं ! ‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं… ’. या भगवंताच्या चिरंजीव आशीर्वादाचे फळ म्हणून असे मरण पावणारे स्वर्गास प्राप्त होतात. पण त्यांच्या मागे राहणा-यांना वेदनांच्या, विरहाच्या नरकास सामोरे जावे लागते… हेही खरेच ! आणि कोणी होऊ म्हटला तरी त्यांच्या या दु:खाचा वाटेकरी होऊ शकत नाही. शेवटी दु:ख हे अगदीच स्वतंत्र असते… स्वाभिमानी असते ! परंतू कुणी फुंकर घातल्यास हा दाह क्षणिक का होईना, गारवा अनुभवू शकतो… हे ही नसे 

थोडके !‍ कितीतरी वेळा दुखण्यापेक्षा कुणी फुंकर घालायला आलं नाही, याच्या वेदना अधिक असतात. बालकं त्यांच्या जखमेवर आई, आजी फुंकर घालते तेव्हा रडायची थांबतात ! कदाचित पुन्हा रडू लागतील, पण फुंकरीची आठवण मनाच्या कोप-यात जपून ठेवतील ! अंधाराला घाबरणारी मुलं, “आई, तु आहेस ना?” असं विचारत विचारत अंधाराला भिडतात तेव्हा ती कमाल आईच्या ‘असण्याची’ असते… लांबून का होईना !

रणभूमी मोठी चोखंदळ असते… निवडक देहांनाच आपल्या अंकावर विसावू देते. इथं प्राणांचं भय मुठीत घेऊन पावलं मागं खेचणारे तिचे नावडते ! तळहातावर शीर घेऊन मृत्यूला मरणमिठी मारण्यास धजावणारे देह जेव्हा नश्वरतेच्या काळोखात दिसेनासे होतात तेव्हा त्या देहांनी जीवनप्रवासात जोडलेले आप्तसंबंध सर्वाधिक क्षतिग्रस्त होतात. आई, बाप, पत्नी, अपत्यं, बहिण, भाऊ, मित्र… दु:खाची ही किती परिमाणं ! पण आई आणि पत्नी ही नाती सर्वांत हुळहुळी… मुळापासून हादरून जाणारी… काहीवेळा उन्मळूनही पडणारी ! 

अशी नाती वेदनेची न संपणारी वाट चालत असतात, तेव्हा त्यांना चार पावलं सोबत चालून सोबत करणं हे प्रत्येक सहृदय माणसाचं आद्य कर्तव्यच ठरावे ! आपण त्यांच्या त्यागाबद्दल त्यांच्याविषयी सदैव कृतज्ञ असावे ! जगाच्या व्यवहारात हा मृत्यूचा बाजार सदोदित गजबजत राहणार आहेच… पण या मृत्यूला संवेदनशीलतेचं कोंदण आपण सर्वजण मिळून देऊ शकलो तर मृत्यू ‘ अर्थपूर्ण ‘ होईल, नाही का? 

भारताच्या राष्ट्रपती महामहिम आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मू ह्या आपल्या प्रथम नागरीक आणि देशाच्या कुटुंबप्रमुख. हुतात्म्यांच्या आप्तांप्रती त्यांनी कृतीतून दर्शवलेली आत्मीयता, जिव्हाळा आणि सहवेदना आदर्शवत ठरावी. सर्वोच्च पदाचे शिष्टाचार, संकेत बाजूला सारून त्यांनी आपल्या गमावलेल्या माणसांच्या आठवणीने व्याकूळ झालेल्यांच्या खांद्यावर ठेवलेला हात, त्यांना दिलेलं आलिंगन, राष्ट्राच्या वतीने आभारार्थ जोडलेले हात ही दृश्ये खूप बोलकी आहेत… हे पाहून दिवंगत आत्मेही शहारून गेले असतील !

(हुतात्म्यांच्या कुटुंबियांसाठी काम करणारी खूप माणसं, संघटना आपल्या देशात आहेत. त्यांची संख्या वाढली पाहिजे, जनतेनेही यांना साथ द्यायला पाहिजे. किमान बलिदानाची दखल तरी घेतली पाहिजे. वेदना जाणावया जागवू संवेदना ! जय हिंद ! )

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आला सण  वटपौर्णिमेचा..! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

आला सण  वटपौर्णिमेचा..! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

गेल्या दहा वर्षात वटपौर्णिमेला वडाला जाऊन पूजा करणे बंद झाले माझे ! लग्नाची चाळीशी उलटून गेली आणि या पूजेबाबतच्या दृष्टिकोनात हळूहळू बदलही होत गेला. लग्न झाल्यावर नवीन सून म्हणून सासूबाई बरोबर नटून-थटून पूजेला गेले होते ते आठवलं ! जरीची साडी, अंगावर दागिने आणि चेहऱ्यावर सगळा नव्या नवतीचा साज घेऊन नदीकाठी असलेल्या वडावर पूजेला गेले होते. थोडा पाऊस पडल्यावरचे रम्य, प्रसन्न वातावरण, समोर कृष्णेचा घाट आणि वडाच्या झाडाभोवती सूत गुंडाळत फिरणाऱ्या उत्साही, नटलेल्या बायका असं ते वातावरण होतं ! धार्मिकतेची गोष्ट सोडली तरी त्या निसर्गातील आल्हाददायक वातावरणात चैतन्य भरून राहिलेले होते, त्यामुळे मन खरोखरच प्रसन्न झाले !

अशी काही वर्षे गेली आणि लहान मुलांच्या व्यापात वडावर जाणे जमेना. घराची जागा बदलली, त्यामुळे नदीकाठ आता दूर गेला होता. वडाची फांदी आणून त्याची पूजा करणे आणि दिवसभर उपवासाचे पदार्थ खाणे एवढाच वटपौर्णिमेचा कार्यक्रम होऊ लागला !

हळूहळू या सर्वातून मन बाहेर येऊ लागले. पतीचे आयुष्य वाढावे आणि सात जन्म हाच पती मिळावा म्हणून हे व्रत करणे ही गोष्ट अंधश्रद्धेचा भाग वाटू लागली. हिंदू धर्मात त्या त्या काळाचा विचार करून सणावाराच्या रूढी समाजात रुजलेल्या ! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला लहानपणी पिता, मोठेपणी पती आणि वृद्धापकाळी पुत्र अशा व्यक्तीचाच आधार आहे ही गोष्ट मनावर ठसलेली ! स्त्रीचा बराचसा काळ संसारात पतीबरोबर व्यतीत होत असल्याने पतीवरील निष्ठा सतत मनात राहणे हेही अशा पूजेला पूरक होते. पूर्वीच्या काळी स्त्रीला घराबाहेर पडणे फारसे मिळत नव्हते. त्यामुळे स्त्रियांना निसर्गाच्या सहवासात मैत्रिणी, नातलगांसह अशा सणाचा आनंद घेता येत असे.

यानंतरच्या काळात पावसाला जोरात सुरुवात होते. आषाढ, श्रावण महिन्यापर्यंत पावसाचा जोर असतो. हवामान प्रकृतीसाठी पोषक असतेच असे नाही, त्यामुळे उपवासाची सुरुवातही ज्येष्ठी पौर्णिमेपासूनच केली जाते आणि चातुर्मासात विविध नेम, उपास केले जातात.

‘वड’ हे चिरंजीवीत्त्वाचे प्रतीक आहे. या झाडाचे आयुष्य खूप ! तसेच वडाचे झाड छाया देणारे, जमिनीत मुळे घट्ट धरणारे आणि पर्यावरण पूरक असल्याने ते जंगलाची शोभा असते. वडाच्या पारंब्या त्याचे वंशसातत्यही दाखवतात. पारंबी रुजून वृक्ष तयार होतो. वडाचे औषधी उपयोगही बरेच आहेत. या सर्वांमुळे आपल्याकडे वड, पिंपळ, चिंच, आवळा, आंबा यासारख्या मोठ्या झाडांचे संवर्धन केले गेले. या सर्वाला धार्मिकतेचे पाठबळ दिले की या प्रथा समाजात जास्त चांगल्या रुजतात. जसे हिंदू धर्मात आपण नागपंचमी,नारळी पौर्णिमा, बैलपोळा,तुलसी विवाह यासारखे सण निसर्गातील प्राणी, वनस्पती यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतो.तशीच ही वडपौर्णिमा आपण पर्यावरणपूरक अशा वडाच्या झाडाबरोबर साजरी करतो. 

वटपौर्णिमेच्या पूजेमागे सत्यवान- सावित्रीची पौराणिक कथा सांगितली जाते. सत्यवान अल्पायुषी  आहे हे सत्य सावित्रीला समजल्यावर सत्यवानाचे आयुष्य मिळवण्यासाठी सावित्रीने तप केले. हे तप तिने वडाच्या झाडाखाली बसून केले. तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देवाने तिला वर मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्रीने एका वराने सासू-सासऱ्यांचे आयुष्य मागितले, तर दुसऱ्या वराने त्यांचे राज्य त्यांना परत मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. आणि तिसऱ्या वराने मी अखंड सौभाग्यवती राहावे हा वर मागितला. या वरामुळे सत्यवानाचे आयुष्य तिने परत मागून घेतले. सावित्रीचे हे बुद्धीचातुर्य आपल्यात यावे ही इच्छा प्रत्येक स्त्रीने या दिवशी व्यक्त केली पाहिजे !

अरविंद घोष यांचे ‘सावित्री’ हे महाकाव्य एम्. ए. ला असताना अभ्यासले. तेव्हा या सावित्रीची अधिक ओढ लागली. ‘सावित्री’ ही आपल्या जीवनाचे प्रतीकात्मक रूप आहे. एका शाश्वत ध्येयाकडे जात असताना कितीही संकटे आली तरी आपली निष्ठा ढळता कामा नये हेच ‘सावित्री’ सांगते. प्रत्येकाचे एक आत्मिक आणि वैश्विक वलय असते. जीवन जगताना आपल्या स्वतःच्या आत्म्याशी संवाद साधत साधत ‘ हे जगच परमात्मा स्वरूप असून आपण त्याचा एक अंशात्मक भाग आहोत ‘ हे चिरंतन सत्य समजून घेण्याचा प्रयत्न या ‘सावित्री’ त आहे.

कधीकधी मनात येतं की, स्त्रियांनीच का अशी व्रते करावी? उपास का करावे? पण अधिक विचार केला की वाटते, निसर्गाने स्त्रीला अधिक संयमी, सोशिक आणि बुद्धीरूप मानले आहे. स्त्री जननी आहे, त्यामुळे वंशसातत्याची जबाबदारी तिच्यावर आहे. सात जन्म हाच पती मिळावा ही भावना मनात ठेवली तरी स्त्री-पुरुष किंवा नवरा बायकोचे साहचर्य ह्या जन्मी तरी चांगल्या तऱ्हेने राहण्यास मदतच होते. पुनर्जन्म आहे की नाही याबद्दल खात्री नसली तरी आत्ताच्या जन्मात संसार सुखाचा होवो यासाठी तरी हे व्रत पाळायला किंवा एक सुसंस्कार मनात ठेवायला हरकत नाही ना?

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एका श्रीमंत गरिबाची गोष्ट… भाग – 2 ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

☆ एका श्रीमंत गरिबाची गोष्ट… भाग – 2 ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

डाॅ.भालचंद्र फडके 

(“जू तुमच्या मानेवर नेहमीच असते.” असं म्हणून स्त्रियांच्या रोजच्या जीवनातील विविध प्रकारच्या  जूचे त्यांनी वर्णन केले.)  इथून पुढे. 

पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात तेव्हा धुळे जिल्हा होता. धुळे जिल्ह्य़ातील महाविद्यालयीन प्रौढ शिक्षण कार्यक्रम अधिका-यांच्या जिल्हा बैठकीसाठी विभागातील आम्ही सगळे अधिकारी धुळयाला गेलो होतो. एका गेस्ट हाऊसमध्ये आदल्या रात्री आमचा मुक्काम होता. रात्रीचे जेवण आटोपल्यावर आम्ही सगळेजण झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी जिल्हा बैठक होती. रात्री साधारणत: एक वाजला असेल. मी सहज गेस्ट हाऊसच्या बाहेर पडलो. पुढच्या खोलीतला लाईट जळत होता. तिथे फडके सर होते. दुसऱ्या दिवशी सरांशी बोलताना समजलं की, काही दिवसांतच त्यांचं एक व्याख्यान होतं. त्याची टिपणे काढण्यासाठी सर रात्रभर जागे होते. 

गुजरातमधील एका विद्यापीठातर्फे  एक राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र होतं.आमच्या विभागातर्फे या चर्चासत्रासाठी मी जावं असं सरांनी सांगितलं. यापूर्वी चर्चासत्र, कृतिसत्रं वगैरेमध्ये भाग घेण्याचा मला बिलकुल अनुभव नव्हता. तेही महाराष्ट्र सोडून इतर राज्यात तर अजिबात नव्हता. सरांच्या या निर्णयाने मी पुरता भांबावून गेलो होतो. या चर्चासत्रासाठी कुलगुरूंची मंजूरी वगैरे तांत्रिक बाबी सरांनीच पूर्ण केल्या.

पुणे ते मुंबई आणि मुंबईहून सुरत असा प्रवास करत मी  सुरतमार्गे बलसाडला पोहोचलो. टीव्हीवर काळे कोट  घातलेली माणसं गंभीर चेह-याने चर्चासत्रात बसलेले मी पाहिले होते. इथं ते अनुभवलं. उद्घाटनानंतर लगेच मला पेपर सादर करण्यास सांगण्यात आलं. सगळं बळ एकवटून मी मनाचा हिय्या करून पेपर सादर केला. सुरवातीला वाटलं होतं तितकंसं अवघड वाटलं नाही. आपल्या ज्युनियर सहका-याला संधी देऊन त्यासाठी त्याला मदत करण्याची सरांची ती कार्यपध्दत मला आयुष्यात खूपच मौलिक वाटली. 

माझं लग्न रजिस्टर पध्दतीनं झालं. सर्व धार्मिक बाबींना यात फाटा दिला होता. काही निवडक लोकांसाठी  लग्न  झाल्यावर सायंकाळी रिसेप्शन ठेवलं होतं. सर आवर्जून आले होते. माझ्या आणि माझ्या पत्नीच्या हातात एक बाॅक्स त्यांनी ठेवला. ” सर,कोणताही आहेर किंवा भेटवस्तू आणू नयेत असं आम्ही पत्रिकेत म्हटलं होतं” असं मी सरांना बोललो.

“अहो शिरसाठ, हा आहेर नाही. मिठाई आहे ”  सरांनी  दिलेल्या मिठाईचा मी अव्हेर करू शकलो नाही.

भारतीय संविधानाचे निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत सरांनी काम केले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे केलेल्या धर्मांतराच्या वेळी झालेल्या नाटकाचे दिग्दर्शन सरांनी केले ही आठवण कुणीतरी मला सांगितली होती. बाबासाहेबांसोबत काम केल्याने सामाजिक परिवर्तन आणि समाजातील उपेक्षित, सर्वसामान्य माणसांविषयी सरांना वाटणारी कळकळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि संपूर्ण जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिली होती. भारतातील अनेक विद्यापीठांतून प्रौढ शिक्षण कार्यक्रम सुरू होता. मात्र ह्या कार्यक्रमातून साक्षरता प्रसाराबरोबरच समाजप्रबोधन आणि परिवर्तन घडवून आणण्याची दिशा सरांनी घालून दिली होती. त्यामुळेच गावोगावचे प्रौढ शिक्षण कार्यक्रम हे समाजपरिवर्तनाची केंद्रे बनली होती. यातून अनेक सामाजिक कार्यकर्ते तयार झाले. लोकांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी स्वावलंबी बनविणे हे प्रौढ शिक्षण कार्यक्रमाचे ध्येय बनले  होते. या कार्यक्रमातून अनेक ध्येयवादी कार्यकर्ते तयार झाले. सामाजिक अभिसरणाच्या अनेक यशोगाथा या कार्यक्रमातून उदयाला आल्या. मला चांगलंच आठवतं, विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण केंद्रातील प्रौढांचा एक आनंदमेळावा आम्ही दापोडी येथील जीवक संस्थेत आयोजित केला होता. विविध सामाजिक स्तरांवरील शेकडो स्त्री-पुरुष प्रौढ या मेळाव्यात सहभागी झाले होते.

साहित्य क्षेत्रात लिहू लागलेल्या अनेक नवोदित लेखक, कवींच्या पाठीशी सर नेहमीच उभे असत. त्यांना ते लिहिण्याला सतत प्रोत्साहन देत. दलित साहित्याचे ते खंदे समर्थक होते. खेडोपाडी, झोपडपट्टीतील अनेक दलित कार्यकर्त्यांना ते नेहमीच मदत करत .यामुळे ‘ दलित फडके’ अशी त्यांच्यावर टीका होई. मात्र समाजपरिवर्तनाचा झेंडा सतत खांद्यावर घेणा-या सरांनी अशा टीकाही हसत हसत स्वीकारल्या.

सर खूप आजारी होते. विभागातील आम्ही अनेकजण त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो होतो. सर बोलू शकत नव्हते. मात्र नेहमीप्रमाणे हसून त्यांनी आमचे स्वागत केले. अशाही स्थितीत डाव्या हाताने ते लिहीत होते. एका लढवय्या वीराची ती जिद्द नक्कीच प्रेरणादायी होती.

सर गेले, तरी त्यांच्या पत्नी हेमाताई आणि कन्या सई यांच्याशी माझा संपर्क होताच. विद्यापीठातून सेवानिवृत्त झाल्यानंतर एकदा मी माझे एक पुस्तक त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. फडके बाई थकल्या होत्या. मात्र मी पाहिलं की,आईची सेवा करणं हे आपलं जीवनकार्य समजून सई त्यांचं सगळं करत होत्या. बाईंनी लिहिलेलं पुस्तक- ‘ जीवनयात्री ‘ त्यांनी मला दिलं. हे पुस्तक मी अनेकदा वाचून काढलं. त्यातील त्यांचं एकूणच लिखाण वाचून वाटलं, हे पुस्तक त्यांनी शाईने नाही तर  डोळ्यातील अश्रूंनी लिहिलं आहे. या पुस्तकात बाईंनी सरांविषयी लिहिलंय. सर त्यांना म्हणायचे, ” तू  एखादया पाटलाची बायको व्हायची तर माझ्यासारख्या  गरीब  मास्तराची बायको झालीस ” बाईंना मात्र असं कधीच वाटलं नाही. आपल्या गोड स्वभावाने अनेक लोकांचं प्रेम सरांनी मिळवलं होतं. आर्थिक बाबतीत त्यांची स्थिती फारशी चांगली नव्हती. पण मनाने मात्र  ते नक्कीच अतिश्रीमंत होते.

— समाप्त — 

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एका श्रीमंत गरिबाची गोष्ट… भाग – 1 ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

☆ एका श्रीमंत गरिबाची गोष्ट… भाग – 1 ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

डाॅ.भालचंद्र फडके

डाॅ.भालचंद्र फडके. एक ज्येष्ठ मराठी साहित्यिक. विद्यार्थीप्रिय आणि समाजप्रिय प्राध्यापक. समाजातील अनेकांना प्रेरणा आणि साहाय्य दिलेला कल्पवृक्ष. 

याचबरोबर  सामाजिक परिवर्तन, लोकशिक्षण अशा अनेक क्षेत्रांत मुक्त संचार केलेल्या निस्पृह आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या सरांच्या सहवासाचा परीसस्पर्श ज्यांना लाभला त्यांच्या आयुष्याचे सोने झाले. फडके सर म्हणजे अमृताचा अथांग सागर. त्यांना पहाण्याचे आणि ऐकण्याचे भाग्य मला मिळाले… 

फडके सर हे मोठे साहित्यिक होते. मात्र त्यांचे एकही पुस्तक शाळेत माझ्या वाचण्यात आले नव्हते. याचं एक मुख्य कारण होतं की,शाळेतल्या पुस्तकांत  त्यांचे धडे नव्हते. हायस्कूल संपवून मी पुढे ओतूरमधील काॅलेजात गेलो. पुणे  विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सेंट्रल कॅम्पसाठी काॅलेजकडून माझी निवड झाली होती. कॅम्प विद्यापीठाच्या परिसरातच होता. विद्यापीठाच्या विस्तीर्ण आणि निसर्गरम्य वातावरणात आमचा मुक्काम होता. तिथं अनेक जणांची उत्तमोत्तम भाषणं ऐकली. फडके सर तेव्हा विद्यापीठाच्या  प्रौढ ,निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाचे  संचालक होते. ‘ सामाजिक परिवर्तन आणि युवकांची भूमिका’ अशा कुठल्याशा विषयावर ते तास दोन तास बोलले  रहाण्याच्या तंबूंबाहेरच्या उन्हात आम्ही ते मन लावून ऐकत होतो. अतिशय पोटतिडीकीने सर बोलत होते. सरांना मी पहिल्यांदाच पहात होतो. तरी यांना कुठंतरी मी पाहिलंय असं जाणवत होतं. टीव्हीवर किंवा कुठल्यातरी वर्तमानपत्रात मी सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांना पाहिलं होतं. त्यांच्यात आणि फडके सरांमध्ये मला खूप साम्य जाणवले. 

काॅलेजमध्ये शिकत असताना मी काॅलेजतर्फे चालणा-या राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमात संघटक आणि पर्यवेक्षक म्हणून काम केले. विद्यापीठात त्याच विभागाचे फडके सर संचालक होते. त्यावेळी सर्वसामान्य माणसं आणि कार्यकर्ते यांच्याविषयी सतत पत्रे ,निरोप आणि फोनवरून काळजी करण्याची त्यांची प्रवृत्ती मी अनुभवली.

बी.ए. झाल्यावर मी पुण्यातील कर्वे इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सर्व्हिसेस या संस्थेतून एम.एस.डब्ल्यू.केले.

नंतर मी पुणे विद्यापीठातील प्रौढ, निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून रूजू झालो. सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी सरांचा दांडगा लोकसंपर्क, सर्वसामान्य माणसांविषयी  कळकळ  आणि साध्या रहाणीतून त्यांची महानता  मी अनुभवली. आमच्या विभागातर्फ प्रौढ शिक्षण आणि विविध सामाजिक विषयांवर सतत चर्चासत्रे, कृतिसत्रे, परिसंवाद, प्रशिक्षण कार्यक्रम आणि विविध पातळ्यांवर परिषदा आयोजित केल्या जात. त्यावेळी समाजाच्या अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि नामवंत अभ्यासकांना सर आवर्जून घेऊन येत.

माझ्या मते १९८५  वर्ष असावं. देशातील प्रौढ ,निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने आयोजित केलेले पहिले ‘समर इन्स्टिटय़ूट’ आमच्या विद्यापीठात झाले. त्याचे संपूर्ण नियोजन फडके सरांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम हा केंद्राधारित होता. यात वस्ती किंवा गाव  हा आधार होता. यात तीस निरक्षरांना केंद्रात शिक्षण देणे अपेक्षित होते. मात्र एक अडचण सतत जाणवत होती. अनेक दुर्गम भागात निरक्षरता असूनही तीस निरक्षर एकत्र मिळवणे, इतके लोक एकत्र बसतील अशा जागेची उपलब्धता, साहित्याची उपलब्धता होणे अडचणीचे होते. प्रौढ शिक्षण कार्यक्रमातील ही अडचण लक्षात घेऊन एका नवीन कार्यक्रमाचे सूतोवाच फडके सरांनी समर इन्स्टिटय़ूटमध्ये केले. पुढे ‘ कार्यात्मक साक्षरता सामूहिक कार्यक्रम ‘ (Mass program for Functional Literacy)  देशभर कार्यान्वित  झाला. या कार्यक्रमाची बीजे मला फडके सरांच्या त्या भाषणातील मांडणीत दिसून येतात.  पुणे शहरातील विविध वस्त्यांतून विद्यापीठाने प्रायोगिक प्रौढ शिक्षण केंद्रे चालवली. मी या केंद्रांचा समन्वयक होतो. यावेळी या केंद्रातून अनेक उपक्रम राबवले गेले. त्यातून कार्यक्रमांचे नियोजन आणि व्यवस्थापन मी शिकलो.

फडके सरांची एक आठवण मला सांगावीशी वाटते. दिल्ली विद्यापीठातील प्रौढ ,निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाचे  संचालक डाॅ.एस.सी.भाटिया होते, त्यांनी सांगितलेली ती आठवण…

तेव्हाच्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी भाटिया सरांकडे सरकारच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाविषयी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यावेळी त्यांनी फडके सरांच्या नावाची सूचना मंत्र्यांना केली. सरकारच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाविषयी फडके सर अधिक प्रभावीपणे बोलू शकतील असा विश्वास त्यांनी मंत्र्याकडे बोलून दाखवला. मंत्र्यांना भेटायला फडके सर बुशशर्ट आणि पायात चप्पल घालून रेल्वेने गेले आणि सरकारला प्रौढ शिक्षण कार्यक्रमाविषयी परखड शब्दांत सुनावले होते.

बारामतीतील एका काॅलेजने प्रौढ शिक्षण कार्यक्रमाला मदत करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांचा एक दिवसीय मेळावा आयोजित केला होता. यासाठी सरांसोबत आम्ही विभागातील सर्वजण गेलो होतो. काॅलेजने आयोजित केलेला हा एक अभिनव उपक्रम  होता. तो अतिशय यशस्वी झाला. पुण्यात पोहचल्यावर सरांनी यावर मला एक लेख लिहायला सांगितलं .तो लेख त्यांनी सकाळ या नावाजलेल्या वर्तमानपत्रात प्रकाशित होण्यासाठी प्रयत्न केले.

सरांसोबत विभागातील आम्ही अनेक सहकारी नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर काॅलेजच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाला भेट देण्यासाठी गेलो होतो. काॅलेजमधील प्रौढ शिक्षण कार्यक्रम अधिका-यांनी विड्या वळणा-या कारखान्यातील प्रौढ शिक्षण केंद्रात आमची भेट आयोजित केली होती. एका हाताने विड्या वळत  तेथील निरक्षर महिला शिक्षण घेत होत्या. कामात मग्न असलेल्या महिलांना कसं शिकवायचं हे आव्हान होतं. फडके सरांनी ते आव्हान लिलया पेलले. .तिथल्या फळयावर सरांनी एक शब्द लिहिला- काजू.या शब्दावर सरांनी चर्चा सुरू केली. सरांनी महिलांना विचारलं,” काजू हा एक शब्द आहे.या शब्दांत दोन शब्द लपले आहेत. कोणते ?”

” का आणि जू ” उत्तर आले.

सर ‘का’ विषयी बोलले- “ जगात कोणतेही प्रश्न ‘का ‘या शब्दांतून निर्माण होतात ” असं सांगून ‘ जू ‘म्हणजे काय?”

असा प्रश्न त्यांनी विचारला.स्तब्धता पसरली.सरच म्हणाले, ” जू तुमच्या मानेवर नेहमीच असते.” असं म्हणून स्त्रियांच्या रोजच्या जीवनातील विविध प्रकारच्या  जूचे त्यांनी वर्णन केले.

– क्रमशः भाग पहिला. 

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सावित्री… लेखिका : सुश्री मानसी काणे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ सावित्री… लेखिका : सुश्री मानसी काणे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

यंदाची वटपौर्णिमा आता जवळ आलीय. यादिवशी प्रथेप्रमाणे वटसावित्रीची कथा वाचताना, दरवर्षी सावित्री मला नव्याने समजत जाते. खरं तर ही एक पुराण कथा! भोळ्या भाबड्या पतीभक्तीपरायण बायकांनी ती ऐकायची आणि श्रद्धेने माथा टेकवायचा.पतीचे प्राण यमाकडून परत आणणं म्हणजे का सोपी गोष्ट आहे? याबरोबरच सासऱ्यांचं अंधत्व दूर करणं, त्यांचं गेलेलं राज्य परत मिळवणं, आपल्या निपुत्रिक पित्यासाठी पुत्र लाभाचा वर मिळवणं…. हे सगळं त्या सावित्रीने केलं. आज तर्काच्या कसोटीवर घासून पाहिली तर यातली एकही गोष्ट आपल्याला पटणार नाही कदाचित.पण तरीही मी या कथेतले नवे नवे अर्थ शोधत राहते…आणि एका क्षणी मला समजतं ,की कोणतीही गोष्ट विपरीत परिस्थितीशी झगडून, आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा उपयोग करून, विनम्र भावाने, कधी विनवणी करून मिळवणं आणि मिळवलेल्या गोष्टीचा उपयोग संपूर्ण कुटुंबासाठी होईल, हे पाहणं म्हणजेच सावित्री असणं, सावित्री होणं !

सावित्री म्हणजे कोणी राजकन्या, राणी किंवा वनवासिनी नाही,तर प्रत्येक स्त्री म्हणजे सावित्री ! स्त्रीत्वाचं प्रखर तेज म्हणजे सावित्री! सत्यवान, वटवृक्ष किंवा यमधर्म ….हे सगळं निमित्तमात्र. अविरत प्रयत्न, आणि यशाचा ध्यास म्हणजे सावित्री !

सावित्री बुद्धिमान होती. पतिनिष्ठा, पातिव्रत्य, कर्तव्य, धर्म या बाबतीतली आपली मतं तिनं यमाला सांगितली. वेळप्रसंगी त्याची स्तुती केली आणि त्यामुळे प्रसन्न झालेल्या यमा कडून वेगवेगळे वर मिळवले. तिला केवळ आपल्या पतीचे प्राण नको होते ,तर त्यानं उत्तम प्रतीचं आयुष्य जगावं,असं वाटत होतं .मग आधी तिनं आपलं राज्य परत मिळवलं .मग सासऱ्यांची दृष्टी परत मिळवून राज्यकारभाराची व्यवस्था नीट राहील असं पाहिलं.पित्यासाठी पुत्र मागून त्याच्या राज्याचा भविष्यकाळ सुरक्षित केला. सत्यवानाचे प्राण परत नाही मिळाले तर पतीशिवाय आपणही जिवंत राहणार नाही म्हणून, आपल्याशिवाय जगणाऱ्या आपल्या लोकांसाठी तिनं हे वर मिळवले. मग यमाने सत्यवानाच्या प्राणाखेरीज कोणताही वर मागण्यास सांगितल्यावर मोठ्या चतुराईनं सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत, असा वर मागितला.आणि हा वर खरा होण्यासाठी यमाला सत्यवानाचे प्राण परत द्यावेच लागले.हा एक प्रकारचा गनिमी कावाच होता आणि या युद्धात ती जिंकली.

माझ्या आजूबाजूला असंख्य स्त्रिया वावरत असतात. आपल्या मनाला मुरड घालून मुलाबाळांच्या भवितव्यासाठी अनेक घरी उजाडल्यापासून मावळेपर्यंत धुणीभांडी, केरफरशी करणारी माझी कामवाली,जीवनाशी तिची  सुरू असलेली लढाई, मुलींना चांगलं सासर मिळवून देणं, त्यांची बाळंतपण करणं, मुलानं शिकावं म्हणून तिचा चाललेला अट्टाहास,हे सगळं मी रोज पाहते.तीस वर्षे नवऱ्याच्या दुर्धर आजारासह सर्व संसारिक जबाबदाऱ्या उत्तम पार पाडणाऱ्या माझ्या जिवलग मैत्रिणीचा संघर्ष मी पाहिला आहे. त्यासाठी अनेक सुखाच्या क्षणांचा तिने केलेला त्याग माझ्या डोळ्यासमोर आहे. अकाली गेलेल्या नवऱ्याच्या माघारी त्याची उरलेली जबाबदारी रात्रंदिवस कष्ट करून पार पडणारी माझी वहिनी तर माझ्यासमोरच आहे. या सर्वजणींना मी पाहते ,तेव्हा या  त्या सावित्रीपेक्षा कणभर ही कमी नाहीत, याबद्दल माझी खात्री पटते. आज नवऱ्याच्या बरोबरीने कष्ट करणाऱ्या मुली त्यांच्या ताणतणावाचा अर्धा भाग आपल्या खांद्यावर पेलतात, म्हणजेच त्या त्यांचं आयुष्य वाढवितात. मतिमंद, अपंग मुलांना मोठं करणाऱ्या मातांच्या कौतुकासाठी तर शब्दच अपुरे पडावेत.ज्या चिकाटीनं सत्यवानाचे प्राण परत मिळेपर्यंत सावित्री यमाच्या मागोमाग चालत राहिली, त्याच चिकाटीनं त्या इच्छित साध्य गाठण्यासाठी मुलांबरोबर रोज अग्निदिव्य करीत असतात.

सध्या सगळ्याच पुराणकथांना भाकडकथा समजण्याचा काळ आहे. त्यातले दृष्टांत काल्पनिक समजले जातात. पण, थोड्या वेगळ्या पद्धतीनं त्यांना  आधुनिक काळाशी जोडलं तर सत्ययुग,  द्वापारयुगातल्या या गोष्टी आजही लागू पडताना आपल्याला दिसतात. पुराणकालीन स्त्री सत्वाच्या, तपाच्या बळावर उभी असेल, तर आजची स्त्रीसुद्धा बुद्धी सामर्थ्याच्या आणि परिश्रमांच्या जोरावर आकाशाला गवसणी घालते आहे. आपल्याला जे हवे ते अविरत प्रयत्नांनी मिळवते आहे. आपल्या यशाने कुळाचे नाव वाढवते आहे. कोणतीही जबाबदारी स्वबळावर पार पाडण्याची ही कुवत म्हणजेच तर हे सावित्रीपण आहे.  आणि त्यासाठीचे प्रयत्न म्हणजेच वटसावित्रीचं व्रत आहे !

लेखिका : सुश्री मानसी काणे

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भगवंताची मिठी… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ भगवंताची मिठी… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

सोप्प नसतं हो, भगवंताचं होणं. प्रचंड निरागसता लागते, स्वच्छ मन लागतं. तुम्ही कधी भगवंताला मिठीत घेतलय का? नाही ना…. कधी सहज म्हणून कुणाला निरपेक्ष मदत केली आहे  का? करून बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. अतीव दुःखात कुणाला आधार दिलाय का? देऊन बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणाच्या उत्कर्षाचं कारण व्हा, कुणाच्या यशात भक्कम साथ द्या, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणी कुणाचं नसतं हो.. तरीही कुणाचं तरी व्हायला काय हरकत आहे? आई नसलेल्याची आई व्हा, कुणाची ताई व्हा, तर कुणाचा भाऊ.. मग बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणाच्या चेह-यावरचं हास्य बना, कुणाचे अश्रूंनी तुडुंब भरलेले डोळे पुसा, मग बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. वार्धक्याने थकलेल्या पायांना तुमच्या हातांची ऊब द्या, थरथर कापणारे हात समाधानाने आशिर्वाद देतील.. मग भगवंताने स्वतःहून मिठी मारल्यासारखं वाटेल. आज प्रत्येक जण पैसे कमवायच्या मागे लागलाय. स्वतःचं स्टेटस वाढवायचय् प्रत्येकाला.. कुणाच्यातरी आयुष्यात आपल्या वाटणीचा ओंजळभर आनंद देऊन तर बघा.. खात्रीने सांगतो त्यांच्या मनातलं तुमचं स्टेटस खूप उंचावर असेल, अन् त्याच वेळेस भगवंताच्या मिठीची चाहूल लागेल. व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या मुक्या जनावरांना पाणी द्या, अन्न द्या, ते आमरस नाही हो मागत.. तुम्ही दिलेल्या शिळ्या पोळीतच ते खूष असतात.. कधी स्वतः जवळची ताजी पोळी देऊन तर बघा, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. आपल्याकडे आपलं असं काय आहे? भगवंतानीच दिलेल्याचा आपण तोरा मिरवतो. मग त्यानी दिलेलं कघी कुणाला मनापासून द्या.. मग बघा … भगवंत मिठी मारल्याशिवाय राहणार नाही.

कवयित्री- अज्ञात

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी आजी… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

??

☆ माझी आजी… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

माझी आजी डोळ्यासमोर येते तेव्हा तिच्या आयुष्याच्या दोन चित्रमालाच डोळ्यासमोर येतात. एक तिचे स्वातंत्र्यपूर्व आयुष्य आणि दुसरं स्वातंत्र्यानंतरचे!

राधाबाई कृष्णाजी पेंडसे, आजोबांची दुसरी बायको ! पहिली फारच लवकर गेली आणि त्यानंतर आजोबांनी दुसरे लग्न केले. कोकणातली आई – बापा विना आजोळी वाढलेली दहा-बारा वर्षाची ती मुलगी आजोबांबरोबर लग्न करून थेट लांब कराची ला गेली ! नव्हता शिक्षणाचा गंध, नव्हता श्रीमंतीचा साज ! केवळ घराला जड होऊ नये म्हणून कोणीतरी लग्नाचा विचार केला आणि ती बोहल्यावर चढली. अशी ही साधीसुधी मुलगी कोकण सोडून दूरवर गेली एका मोठ्या बंगल्याची मालकीण म्हणून ! आजोबांची सरकारी नोकरी होती. ते ऑब्झर्वेटरीत नोकरीला असल्याने कराची जवळील मनोरा बेटावर त्यांचे वास्तव्य होते. दूरवरून येणाऱ्या बोटी, मचवे ह्यांना हवामानासंबंधीचे मार्गदर्शन करण्याचे काम असे. मॅट्रिक झाल्यानंतर नोकरी करणे गरजेचे होते त्यामुळे इतक्या लांब ठिकाणी ते नोकरीसाठी गेले. आजी वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षी कराचीला गेली. घरी नोकर चाकर होते. दहा-बारा खोल्यांचे घर होते, पण संसार मांडायला लागणारा आधार कुणाचा नव्हता ! आपल्या आपण सर्व शिकायचे. नवऱ्याच्या कडक शिस्तीत राहायचे आणि आज्ञा पालन करायचे एवढेच तिला माहिती ! कधीतरी कोकणात जायला मिळे, पण प्रेमाची माणसे कमीच होती. माहेरची चितळे.. परशुरामाच्या घाटीत राहणारी.. भाऊ वहिनी होते, पण परिस्थिती 

बेताचीच ! दारिद्र्य सगळीकडेच होते, पण भात आणि कुळीथाच्या पिठल्याला कमी नव्हतं ! घाटी उतरायची, चिपळूणला जायचं, काय असेल ते आंबे, फणस, रातांबे विकायचे. चार पैसे मिळत त्यातच बाजार करायचा ! अशा पद्धतीने कोकणातल्या कुटुंबांचा व्यवहार चालत असे.

लग्नानंतर आजी कराचीला गेली. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे दर दोन वर्षांनी एक बाळंतपण होत होतं. सहा मुलं झाली. तीन मुली, तीन मुलगे. सर्वांना एका ठिकाणी राहणं परवडणारे नव्हते ! मग दोन मुलं सातारला काकांकडे वाढली तर  चार मुले कराचीला वाढली. माझे वडील सर्वात मोठे! त्यांचे बालपण  ऐषारामात गेले. कारण आजोबांची नोकरी मानाची होती. मोठ्या मोठ्या इंग्रज साहेबांचा वावर भोवती असे.

राहणीमान चांगले ठेवता येई. कपातून चहा प्यायला मिळे. साहेब लोकांशी संपर्क असल्याने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. आजोबांना पुस्तकांची प्रचंड आवड होती. विशेष करून इंग्रजीची आवड होती. घरामध्ये पुस्तकांचे शेल्फ भरलेले असे. कराचीजवळचे मनोऱ्याचे घर म्हणजे लौकिक अर्थाने चांगले, सुसंपन्न स्थितीतील घर होते. शिक्षणाची मनापासून आवड असल्यामुळे आजोबांनी आजीलाही लिहा वाचायला शिकवले होते. घट्ट नऊवारी नेसणारी आमची आजी नाकी डोळी नीटस,  उंच, शिडशिडीत बांध्याची होती. मनोऱ्याला काही मराठी कुटुंबही होती. मोजकीच ब्राह्मण कुटुंब असल्यामुळे ही मंडळी एकमेकांना धरून असत. वडिलांचे बीएससी पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. युद्धाचा काळ असल्याने सेन्साॅर ऑफिसला नोकरी मिळाली होती. लवकरच लग्न होऊन त्यांचे बिऱ्हाड कराचीमध्ये झाले. त्यांच्याबरोबर माझे काका, आत्या ही मंडळी कराचीत घर करून राहिली. आजी मनोरा ते कराची अशा फेऱ्या मारत संसार करत होती.

याच दरम्यान भारताच्या फाळणीच्या गोष्टी सुरू होत्या. आजोबांची रिटायरमेंट झाली,  त्यांना कराचीमध्ये राहण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी कराचीला मोठे घर घेतले. आणि सर्व मंडळी त्या घरात राहू लागली पण १९४७ च्या सप्टेंबर मध्ये फाळणीनंतर अवघ्या एका महिन्यातच सर्व पेंडसे कुटुंबाला पाकिस्तान सोडावे लागले आणि भारतात आपल्या मूळ गावी आयनी मेटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथे निर्वासित म्हणून यावे लागले. इथून आजीच्या आयुष्याचा दुसरा कालखंड सुरू झाला ! कराचीचे, मनोऱा बेटावरचे साहेबी जीवन संपले आणि कोकणात आयनी- मेट्याजवळील पाटील वाडी या ठिकाणी आजोबांनी जागा घेतली.  त्या जंगलात झोपडीवजा घर बांधून आजी- आजोबा राहू लागले .मोठ्या बंगल्यात राहणारी आजी आता आजोबांबरोबर झोपडीत राहू लागली. मुलांच्या शिक्षणासाठी चिपळूणला बिऱ्हाड केले होते. पाटील वाडी आणि चिपळूण अशा फेऱ्या करत पुन्हा एकदा आजीच्या जीवनाला कलाटणी मिळाली. आजोबांना डायबिटीस होता. कोकणातील कष्टकरी जीवनात आणि निर्मळ वातावरणात त्यांचा डायबिटीस कंट्रोलमध्ये राहिला होता. माझी आजी या सगळ्याला तोंड देत मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी झटत होती. कष्टाची तर तिला कायमच सवय होती. डोक्यावर आंब्याच्या, फणसाच्या पाट्या घेऊन आजी खेडला विक्रीसाठी येत असे. ती दिवसाकाठी आठ दहा मैल सहज चालत असे. आसपासच्या लोकांना ‘निर्वासित म्हणून आलेले पेंडसे’ परिचयाचे होते. काही जण आपुलकीने त्यांना मदत करत असत.

अशीच जीवनाच्या खाचखळग्यातून आजीची वाटचाल ७० सालापर्यंत चालू होती. १९७० साली आजोबा गेले आणि पुन्हा एकदा आजी एकटी पडली.. ती अधूनमधून आमच्याकडे, काकांकडे, आत्याकडे येत जात असे, पण तिला तिथे जास्त काळ करमत नसे. स्वतंत्र विचाराची, कणखर स्वभावाची अशी आजी कोकणात एकटी घरी राही. एकदा ती घरात एकटी आहे असे पाहून चोरांनी कडी काढायचा प्रयत्न केला पण आजी इतकी धीट की तिला जाग आल्याने हातात काठी घेऊन ती दाराजवळ आली आणि चोराच्या हातावर  काठीने मारले. चोर पळून गेले. पण त्यानंतर मात्र तिच्या भाच्याने  तिला आपल्या घरी रोज रात्री झोपण्यासाठी नेण्याचे ठरवले. काही काळ असा गेला. पुढे माझ्या भावाला मुलगा झाला आणि आजीला पंतवंड झाले. त्यानिमित्ताने तिला पुण्यामध्ये आणले आणि परत कोकणात तिला जाऊ दिले  नाही.

आयुष्याचे असे दोन  कालखंड… एक कराचीचा आणि एक कोकणातला – दोन परस्पर विरुद्ध

तिने अनुभवले. नकळत या सर्व गोष्टींचा तिच्या मनावर परिणाम झाला होता. कधीतरी ती मनाने मनोऱ्याच्या घरी असे तर कधी कोकणात असे ! आयुष्यात घडलेल्या घडामोडींमुळे तिचे मन अस्वस्थ झाले होते. संकटांना तोंड देऊन ती थकली होती. तिच्याआधी माझे वडील गेले, त्यामुळे मुलगा गेल्याचे दुःख ती विसरू शकत नव्हती. आठवड्यातील सात दिवसातले चार-पाच दिवस तरी तिचा उपासच असे. पण  कष्ट केलेले तिचे शरीर या सगळ्याला तोंड देत होते. शरीर झिजले होते पण तिला कोणताही आजार नव्हता त्यामुळे थकत गेलेली आजी हळूहळू या सगळ्या मोहमायेतून  बाहेर पडली. झाडाचे जीर्ण पान जसे अलगदपणे गळून पडते, तशी माझी आजी म्हातारपणामुळे अनंतात विलीन झाली. माझ्या आत्त्याने पेंडसे कुटुंबाच्या आठवणींचे एक पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकाच्या आधारे मला माझ्या आजीचे हे चित्र डोळ्यासमोर उभे राहते !

तिच्या स्मृतीला माझा शतशः प्रणाम !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print