मराठी साहित्य – जीवनरंग ☆ छोटुली – भाग 5 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ छोटुली – भाग 5 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहीलं – कलाकाराच्या प्रत्येक हावभावावर टिकून राहिलेली असते. आज तेच कौशल्य त्यांना त्या रुसलेल्या मुलीची समजूत काढण्यासाठी वापरायचं आहे. आता इथून पुढे)

जेव्हा त्यांना पडद्यामागे ती मुलगी दिसली, तेव्हा त्यांना वाटलं, तो पडदा म्हणजे कैकेयीचं कोपभवन झालय. या पडद्यामागे सगळ्या शोचं राज्य डावावर लागलय. तिच्याजवळ ते गेले, पण ती मुळी बोलायलाच तयार नव्हती. जेव्हा त्यांनी अवीचं नाव घेतलं, तेव्हा मात्र तिने लगेच वळून पाहीलं आणि अशा नजरेने बघितलं की अवीचं नाव ऐकताच ती शांतीपूर्वक बोलायला तयार आहे. ते तिच्याशी अतिशय प्रेमाने बोलले. वेळेची नाजुकता, मुलीचं नाजुक वय, आणि ग्रँड फिनालेची नाजुकता, सगळं मिळून त्यांच्या बोलण्याच्या शैलीला अतिशय नाजुक बनवत होतं. आपला राग बाजूला ठेवून त्यांनी त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला. दोघांच्यामध्ये काही खूस-फूस झाली आणि अनाउंसमेंट केली गेली, ‘काही तांत्रिक अडचणीमुळे यावेळी शूटिंग होऊ शकत नाही. बरोबर एक तासाने शूटिंग सुरू होईल.’

अनाउंसमेंट ऐकताच एकदम चांगलाच गोंधळ माजला. व्ही. आय. पी. संतापले. प्रत्येक मिनिटाचे पैसे गोळा करण्यासाठी त्यांचे बुभूक्षित डोळे निर्मिती विभागाकडे टवकारून पहात होते.  गॅलरीत बसलेले प्रेक्षक, काही न करताही बेचैन झाले होते. ज्यांनी इतका वेळ धाव-पळ करून सेट लावला होता, त्यांची स्थितीही वाईट होती. सजावट, तंत्रज्ञ, मुख्य अतिथी, परीक्षक सगळ्यांचीच आपापली शान होती. आपापला थाट होता. आपआपल्या मागण्या होत्या. सगळ्यांना वाटत होतं, चॅनेल करोडोंनी  खर्च करतेय, ते केवळ त्यांच्यामुळे. परीक्षकांचं ग्लॅमर ही जशी काही कार्यक्रमाला दिलेली फोडणी होती. आशा तर्‍हेने ही फोडणी दिली जात होती, की त्यामुळेच पैसे परतले जाताहेत… भाजीच जशी… तंत्रज्ञांना वाटत होतं, त्यांची प्रगत टेक्नॉलॉजीच असं दृश्य सादर करताहेत आणि तेच यशाचं रहस्य आहे. तिकडे स्पर्धकांच्या आई-वडलांना वाटतय, त्यांच्या मुलांच्या प्रतिभेमुळेच शो चाललाय. सगळ्यांचीच पाची बोटे तुपात होती. 

ती लहान मुलं, ज्यांना लहानपणापासूनच या तणावात ढकललं गेलय, ती कधी असा विचार करत नव्हती, की त्यांच्यामुळेच हा शो चाललाय. ती नेहमीच घाबरलेली, भेदरलेली असत. त्यांना कधी आईकडून, कधी परीक्षकांकडून ओरडून घ्यावं लागे. विशेषत: स्क्रिप्ट लिहिणार्‍याकडून रागावून घ्यावं लागे. जे लिहिलं आणि पाठ करून घेतलं, ते बोलायचं राहिलं तर किंवा चुकीचं बोललं गेलं तर त्यांची धडगत नसे. सुरुवातीच्या ३-४ शोमध्ये सगळ्यांकडूनच स्वयंशिस्त पाळली जात होती. हळू हळू शो पॉप्युलर होत गेला, तशी चॅनेलची हुकुमशाही वाढत गेली. टी.आर.पी. जसजसा वाढू लागला, तसतसे वेगवेगळे कयास बांधले गेले. शोचा प्रत्येक विभाग हे यश आपल्यामुळेच मिळतय, असं मानू लागला. दृश्यांच्या परिकल्पनेत रचनात्मकता आणण्यासाठी अनेकदा धोकादायक दृश्येही दाखवली जाऊ लागली. मुलांना बॉलप्रमाणे इकडून तिकडे ढकलले जाऊ लागले. प्रेक्षक श्वास रोखून ते दृश्य बघू लागले.

यावेळी मिस्टर अरोरा मात्र शांत होते. एका वेळी एकच समस्या सोडवायची, असा त्यांचा नियम होता. सगळ्यांना बाजूला सारत ते, ज्या ठिकाणी अवी बसला होता, तिथे येऊन पोचले. त्याला घेऊन छोटुलीकडे आले. कोपर्‍यात रुसून बसलेल्या छोटुलीचे डोळे त्याला बघताच चमकले. ती अविबरोबर खेळण्यासाठी धावत – पळत आली.

क्रमश:….

मूळ लेखिका – डॉ. हंसा  दीप 

Contact- Dr. Hansa Deep, 1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON – M2N2W7 Canada

Ph. 001 647 213 1817  Email- [email protected]

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ छोटुली – भाग 4 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ छोटुली – भाग 4 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

( मागी भागात आपण पाहीलं -. त्या क्षणापासून उतावीळ होऊन ती  अविनाशाची वाट पाहू लागली. आता पुढे )

पायाने ताल देत रहायची. एकटी असतानासुद्धा ती ते करायची. आता गुरूमुळे परिपक्वता आली होती.

ती काही अडाणी नाही. तिला माहीत आहे, खरा शो तर आताच आहे. आत्तापर्यंत जे झालं, त्या सगळ्या रिहर्सल होत्या. पण आता तिला खेळायचय, म्हणजे खेळायचय. तिचे डोळे गर्दीत अवीला शोधत होते. तो दिसला नाही, तेव्हा तिचा विरस झाला. उत्साह मंदावला.

‘आई, अवी नाही आला?’

‘आलाय बेटा! मी त्याच्याबरोबर आणि त्याच्या आईबरोबर बोललेयसुद्धा!’

‘मला दिसत नाहीय. दाखव. कुठाय तो?’

‘आत्ता तू त्याला नाही भेटू शकणार बेटा!’

‘नाही. मी त्याला आत्ताच भेटणार!’

ती रडू लागली. मोठमोठ्याने. कार्यक्रमाचा सेट लावण्यासाठी धावपळ करणार्‍या सगळ्या लोकांच्या आरडा-ओरडयात तिचा आवाज काहीसा दबून गेला होता. तिच्याबद्दल विचार करण्यासाठी कुणापाशीच वेळ नव्हता. कोणी तिचं ऐकत नसेल, तर तिने तरी इतरांचं का ऐकावं? ती आपल्या दोस्ताला भेटण्यासाठी इकडे-तिकडे धावत-पळत असतानाच, तिने त्यांना धडक मारली. ते म्हणजे अरोरा साहेब. या शोचे डायरेक्टर. सगळेच त्यांना घाबरून असायचे. एक भयंकर माणूस. शेवटचा श्वास घेणार्‍यालाही सांगण्याची त्यांची हिम्मत होती, ‘आता तुला मारता येणार नाही. आधी शोचं शूटिंग पूर्ण कर. मग हवं तर मर किंवा काय हवं ते कर!’

अरोरांना धडक मारून ती जोरात धावत जाऊन एका पडद्यामागे लपली. ते इकडे-तिकडे मुलीला शोधू लागले. इकडे बाकीची सगळी तयारी झाली होती. माईक, लाईट,परीक्षक, श्रोते – प्रेक्षक, डेकोरेशन, प्रॉडक्शन सगळे अगदी तयारीत होते. उमेदवार गायब होता. गोंधळ झाला होता. सगळ्यांची धडधड वाढली होती. करोडो रुपये डावावर लागले होते. त्या चॅनेलचे आणि त्याच्याशी संबंधित प्रत्येकाचे.

सगळ्यात अधीक धक्का बसला होता, डायरेक्टर साहेबांना. ते स्तंभित झाले. या अनपेक्षित स्थितीतून बाहेर येण्यासाठी काही तरी करायला हवं होतं. शांतपणे मुलीशी बोलून त्यांना समजून घ्यायला हवं होतं की मुलगी मंचावर यायला का तयार नाही आहे? मुलगी आहे तरी कुठे? आई गोंधळून गेली. तिचा चेहरा पांढरा फाटक पडला. तिने धावत येऊन अरोरा साहेबांना सांगितलं, ‘मुलगी कुठे तरी लपून बसलीय.’ अरोरा साहेब तिला आश्वस्त करत म्हणाले, ‘आपण आपल्या जागेवर जाऊन बसा. मी बघतो.’

आई कशीबशी जाऊन बसली. पण तिला अतिशय काळजी वाटत होती. भात्यासारखा जलद गतीने श्वास चालू होता. दोघांची सत्वपरीक्षाच होती जशी काही. छोटुलीच्या आईचीही आणि अरोरा साहेबांचीही. छोटुली जिथे लपली होती, त्या दिशेने अरोरा साहेब पुढे निघाले. त्यांना आपल्या जीवनाबद्दल काही काही आठवू लागलं. फरक एवढाच की ही मुलगी अगदीच लहान होती आणि ते शाळा संपवून कॉलेजला जायच्या तयारीत होते. त्यावेळी त्यांच्या बाबतीत असंच काहीसं घडलं होतं. आई-वडलांचं स्वप्न होतं त्यांना डॉक्टर बनवण्याचं॰ पण त्यांना डॉक्टर बनण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यांना सिनेमात जायचं होतं. डायरेक्टर बनायचा होतं. आई-वडलांचा दबाव होता, म्हणून मेडीकलला गेले खरे, पण थोड्याच दिवसात, त्यांच्यावर लादलेला तो अभ्यास सोडून ते तिथून पळाले. घरच्यांचा विरोध झाला. खूप संघर्ष करावा लागला, तेव्हा कुठे आता सगळं ठाक-ठीक आहे. तरीही ते दिवस अजूनही त्यांचा पाठलाग करतात.

मुलीला नृत्य करायला आवडत असेल, तर ती आज नक्कीच नृत्य करेल. आवडत नसेल, तर नाहीच करणार. असाच काहीसा विचार मनात घोळवत, ते त्या मुलीला समजावायला निघाले होते. आता या प्रौढ वयापर्यंत येता येता, एवढा अनुभव त्यांच्या गाठीशी नक्कीच होता, की कुठल्याही कलाकाराला दररोज आपल्याच शैलीत काम करायला लावणं काही सोपी गोष्ट नव्हती. डायरेक्टरची तीक्ष्ण दृष्टी सगळीकडे फिरत असते. कलाकाराच्या प्रत्येक हावभावावर टिकून राहिलेली असते. आज तेच कौशल्य त्यांना त्या रुसलेल्या मुलीची समजूत काढण्यासाठी वापरायचं आहे.

क्रमश:….

मूळ लेखिका – डॉ. हंसा  दीप 

Contact- Dr. Hansa Deep, 1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON – M2N2W7 Canada

Ph. 001 647 213 1817  Email- [email protected]

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ छोटुली – भाग 3 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ छोटुली – भाग 3 (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागी भागात आपण पाहीलं – तिच्या दृष्टीने हे सगळं अस्वाभाविक होतं पण काही तरी नवीनदेखील होतं, जे तिला छान वाटत होतं. आता पुढे)

‘सल्लू’च्या कडक सूचना, वारंवार आरशात बघून आपल्या चेहर्‍यावरचे भाव दाखवणं तिला छान वाटत होतं आणि ती मजेत शिकत होती. जेव्हा ती थकायची किंवा तिला भूक लागायची, तेव्हा मग ती काहीच नीट करत नसे. ‘सल्लू’ जाणून होता की हे सगळे नियम, अडकाठ्या या मुलीसाठी नवीन आहेत. तोदेखील चोवीस-पंचवीस वर्षाचा तरुण होता आणि आपल्या करियरला या शोद्वारे नवीन परिमाण देऊ इच्छित होता. हळू हळू, त्या छोट्या मुलीची मन:स्थिती त्याच्या लक्षात आली आणि कुठल्याही प्रकारे धाक-दपटशा न दाखवता, मजेत तो तिला शिकवू लागला.

छोटुली, आपली आई, ‘सल्लू’ आणि तिच्या आगे-मागे कॅमेरे घेऊन धावपळ करणारे लोक यांचं ऐकायची, पण थकायची, पाय दुखायचे. भूक लागायची. खेळावसं वाटायचं. नाचावसं तर वाटायचंच वाटायचं, पण आपल्या मानाप्रमाणे. एका मागोमागच्या रिहर्सलनी तिच्या नाकात दम आणला होता. रिहर्सल एकदा नव्हे, दिवसातून किती तरी वेळा व्हायची. पार पार थकून जायची ती. तिला चीड यायची अशा रिहर्सल्सची. तिला चीड यायची ती चकमक कपड्यांची.

आई म्हणायची, ‘बस, आता हा एकच एपिसोड.’ पण हा एकच एपिसोड पुढे… पुढे… पुढच्या तीन महिन्यांपर्यंत चालतच राहिला. आईने तिला कधी लॉलिपॉप देऊन, कधी मनपसंत खेळणी देऊन, तिला फूस लावून, फुलवत- झुलवत ठेऊन, शोपूर्वी तयार ठेवलं. अनेकदा तिने आईसक्रीमसाठी हट्ट केला, पण तो मात्र तिने पुरवला नाही कारण आईसक्रीम खाऊन ती आजारी पडली असती, तर बरं व्हायला तीन-चार दिवस तरी लागले असते आणि मग शोचं सारं गणितच गडबडून गेलं असतं.

एका मागून एक शोच्या पायर्‍या चढत ती अंतीम फेरीपर्यंत येऊन ठेपली. आईसाठी आणि मुलीसाठीही हे सांभाळून ठेवण्याचे महत्वाचे दिवस होते. छोटुली इथे जेव्हा आली, तेव्हा जशी होती, तशीच आजूनही आहे पण आईच्या मात्र चालण्या- बोलण्या- वागण्यात खूप रुबाब आला आहे. मुलीची वाढती कीर्ती तिच्या व्यक्तिमत्वाला मोठं करत गेलीय. असं जेवण – खाण, असा थाटमाट पुन्हा कुठे मिळणार होता तिला? ज्या सामर्थ्यावर मुलगी इथपर्यंत येऊन पोचली होती, त्याच आधारावर आईचा गौरव वाढत चालला होता. मंचावर गेल्यावर मुलगी, लाजेल किंवा घाबरेल, किंवा स्टेप्स विसरून जाईल, अशी वाटणारी धाकधूक या अंतीम फेरीपर्यंत दृढ विश्वासात बदलली होती. मागच्या सार्‍या एपिसोडमधील तिचं सादरीकरण आणि परीक्षकांच्या प्रतिक्रिया यामुळे आईला खात्री वाटू लागली होती की छोटुलीच जिंकणार. दररोज फोन करून ती वडलांना प्रत्येक बारीक-सारीक गोष्ट सांगत असे. अंतीम फेरीसाठी तेही इथे येऊन पोचले. 

आई-वडलांचा उत्साह पराकोटीला जाऊन पोचला होता. आई वारंवार मुलीला संगत होती, ‘आज छान डान्स कर. मग उद्यापासून तुला जे करायचं असेल, ते कर. मग आपण आपल्या घरी जाऊ. खूप खेळू. मजा करू.’

आजचा दिवस सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा होता. सगळ्यांचं भाग्य अजमावण्याचा दिवस होता. शोच्या अ‍ॅंकरपासून कॅमेरावाले, सफाई कामगार, चहा आणणारा पोर्‍या,  सगळे काय होतय, ते बघण्यासाठी उत्सुक होते. सगळ्यांना मोठमोठ्या रकमा मिळणार होत्या. सगळ्यात मोठी रक्कम अर्थातच विजेत्याला मिळणार होती. जिंकणारी रक्कम डोळ्यापुढे ठेवून छोटुलीच्या  आई-बाबांनी किती तरी स्वप्ने रंगवली होती. आजची एकूण चकमक, दिमाख काही वेगळाच होता. फायनलला आलेल्या चार स्पर्धकांमध्ये छोटुली सगळ्यात लहान आहे, सगळ्यात चांगली नर्तक आहे, हे सगळेच जाणून होते. तिच्या चाहर्‍यावरचे भाव, तिचे बोलके डोळे, नयन विभ्रम जे काही सांगायचे, ते बेजोड असायचं. सगळ्यांना वाटत होतं, तीच पहिली येणार. तीच विजेती होणार.

त्यामुळेच चॅनेलने तिला डोक्यावर बसवलं होतं. तिला विचारलं गेलं की आई-वडलांव्यतिरिक्त ती आणखी कुणाला बोलावू इच्छिते? तिने जराही विलंब न लावता उत्तर दिलं होतं की ती  आपल्या छोट्या दोस्ताला अविनाशला बोलावू इछिते. त्या क्षणापासून उतावीळ होऊन ती  अविनाशाची वाट पाहू लागली. त्या क्षणापासून उतावीळ होऊन ती  अविनाशाची वाट पाहू लागली.

क्रमश:….

मूळ लेखिका – डॉ. हंसा  दीप 

Contact- Dr. Hansa Deep, 1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON – M2N2W7 Canada

Ph. 001 647 213 1817  Email- [email protected]

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ छोटुली – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ छोटुली – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागी भागात आपण पाहीलं – तिच्या चाहर्‍याचे भाव सुरांच्या  आरोहा-अवरोहाबरोबर असे काही बदलत जातात, जसं काही कुणी या बदालाचा रिमोटच तिच्या मेंदूत बसवून ठेवलाय आणि बटण दाबताच एकामागून एक मनमोहक भाव तिच्या चेहर्‍यावर उमटू लागतात. – इथून पुढे )

दिवसभर प्रतीक्षा केल्यानंतर एकदाचं छोटुलीच नाव पुकारलं गेलं आणि ती आईबरोबर मंचावर गेली. आईने तिला मंचावर सोडलं आणि ती मागे जाऊन उभी राहिली. मोठ्या मंचावर ठेवलेल्या तीन खुर्च्यांवर बसलेल्या तीन लोकांनी तिचं स्वागत केलं. प्रतिभावंत मुलांची निवड करणारे ते तिघे जज्ज होते. छोटुलीला तिचं नाव विचारलं गेलं. तिचं वय विचारलं गेलं. तिने नि:संकोचपणे उत्तर दिलं. तिचा जोरदार आवाज तिचा आत्मविश्वास प्रगट करत होता.  काही क्षणातच तिच्यासाठी म्यझिक सुरू झालं. ती पापणीही न लावता तिकडे बघत राहिली, जसं काही तिला हा प्रश्नच विचारला गेलाय. तिला त्याचं उत्तर द्यायचय आणि ती विचार करते आहे, बोलायचय आपण? ती अगदी गप्प उभी राहिली. कसलीच हालचाल न करता. गाणं बंद झालं. आईने तिच्याजवळ येऊन तिच्या कानात काही सांगितलं, तेव्हा तिने मान हलवली. पुन्हा एकदा गाणं लावलं गेलं आणि ती नाचू लागली. अगदी मोकळेपणाने नाचू लागली. तिच्या मनात जे जे येईल, तसतसं करू लागली. तिच्यासाठी आपली खुशी प्रगट करण्याचा तो एक मार्ग होता. दिवसभरची रांगेतील धक्काबुक्की, आणि अनेक प्रकारचे प्रतिबंध यामुळे ती वैतागली होती. आपला पदन्यासाचा शौक या मंचावर तिने मनसोक्त पुरा करून घेतला.

गाणं थांबताच ती पळत पळत आपल्या आईकडे गेली. परीक्षकांचे हावभाव पहाण्यासाठी, सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या होत्या. परीक्षक गप्प होते. चकित झाले होते.  जे आत्ता मंचावर पाहिलं, ते काय होतं? कसली जादू होती की चमत्कार. एक छोटीशी मुलगी … तिच्या चेहर्‍यावरचे भाव आणि पायांचं थिरकणं यातलं सामंजस्य विलक्षण होतं. अगदी अविश्वसनीय. एकदा नृत्य काय केलं, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पाच वर्षाच्या मुलीची लवचिकता कुठल्याही कसलेल्या नृत्यकाराची बरोबरी करत होती. 

त्या शांततेनंतर किती तरी वेळ टाळ्या वाजत राहिल्या. शोसाठी या मुलीची निवड होणारच, असंच त्या जणू सुचवत होत्या.

आता आई आणि वडील या दोघांना मिळून योजना बनवायची होती की छोटुलीजवळ कोण राहू शकेल? दोघांना रहाणं काही शक्य नव्हतं. शेवटी छोटुलीच्या वडलांनी ही जबाबदारी छोटुलीच्या आईवर टाकली आणि ते निघून गेले. चांगल्या हॉटेलमधल्या खोलीत रहाणं तिच्या आईसाठी स्वर्गसुखासारखं होतं॰ ती विचार करायची, मुलगी पुढे जावो, न जावो, पण जितके दिवस माय-लेकी इथे रहातील, तोपर्यंत मजा करतील. आई काम करायची खरी पण काम असंही नव्हतं की सुट्टी मिळू शकणारच नाही. बिनपगारी रजा घेणं काही अवघड नव्हतं. या संधीपुढे  तिच्या छोट्याशा नोकरीचं काही खास महत्व नव्हतं. ‘आज खाया वही मीठा, कल किसने देखा है’, हाच तिचा अगदी पहिल्यापासूनचा विचार होता आणि ती ‘आज’च्या आव्हानासाठी मनाने तयार होत होती.

चॅनेलतर्फे अनेक निर्देशांची यादी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. शोमध्ये सामील होणं हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती, त्यामुळे शोच्या कुठल्याही नियमांचं पालन करण्यात, त्यांना कुठलीच अडचण जाणवत नव्हती. एकदा मुलीने प्रस्तुतीकरणात सामील होऊन नंतर जरी ती बाहेर पडली, तरी त्यांच्या दृष्टीने ते पुरेसं होतं. जसजशी ती मोठी होईल, तसतसा तिची भविष्याची दिशा निश्चित करण्याच्या दृष्टीने, हा मजबूत आधार असेल॰ एक नवं पाऊल, नव्या आशेसह टाकलेलं…. त्यातून पुढल्या वाटचालीची रूपरेखा निश्चित करता येईल.

यानंतर छोटुलीला पुढच्या दोन आठवड्यातील दोन एपिसोडमध्ये नृत्य करायचं होतं पण आपल्या मनासारखं नाही, यात सल्लागार किंवा मार्गदर्शक सांगतील तसं करायचं होतं. प्रथम तर तिला कळलंच नाही की हे सल्लागार कोण आहेत? त्यांच्याकडे जायला ती का कू करू लागली. पण हळू हळू तिची त्यांच्याशी चांगली दोस्ती जमली आणि मग गमतीने ती आपल्या त्या सल्लागारांना, आपल्या गुरूंना ‘सल्लू’ म्हणू लागली. नाचायचं म्हणजे नाचायचं. मनसोक्त नाचायचं पण आता तिला त्यासाठी आपल्या गुरूबरोबर ताळ-मेळ ठेवायला हवा होता. तिच्या दृष्टीने हे सगळं अस्वाभाविक होतं पण काही तरी नवीनदेखील होतं, जे तिला छान वाटत होतं.

क्रमश:….

मूळ लेखिका – डॉ. हंसा  दीप 

Contact- Dr. Hansa Deep, 1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON – M2N2W7 Canada

Ph. 001 647 213 1817  Email- [email protected]

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ छोटुली – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ छोटुली – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

ती पाच वर्षांची छोटुली आहे. मुलीच्या जन्मानंतर, आपल्या मुलीसाठी ‘छोटुली’पेक्षा जास्त चांगलं नाव तिच्या मम्मी-पप्पांना सुचलंच नाही. दिवस-रात्र छोटुली म्हणता म्हणता, तिचं नाव छोटुलीच पडलं. तशी ती लहानच आहे, पण तिचे पाय असे काही थिरकतात, की जसे काही तिचे प्राण नृत्यातच वसलेले आहेत. चेहर्‍यावरचे भाव आणि शब्दांचा ध्वनी एकमेकांशी एकरूप होतात, तेव्हा तिचं नृत्य सुरू होतं. तेव्हा आतूनच उत्स्फूर्तपणे विभ्रम सुरू होतात. त्यासाठी कुठल्या तालमीची किंवा कुठल्या गुरूची आवश्यकता नसते. मम्मी-पप्पा जेव्हा तिला असं नाचताना बघतात, तेव्हा ते स्वत:कडे बघू लागतात. त्यांचा एक पायसुद्धा सुराबरोबर ताळ- मेळ साधत नाही आणि हिच्याकडे बघा. सारं शरीर न थांबता थिरकत रहातं. त्यांच्या शुष्क जमिनीवर हिरवळ पसरणारा हा कुठला नैसर्गिक चमत्कार त्यांच्या घरी उपजलाय. कुठल्याही प्रकारच्या आवाजाने तिच्या शरीरात जी हालचाल होते, ती बेजोड असते.  

शहरापासून दूर गावात राहूनही छोटुलीच्या मम्मी-पप्पांना कळलं की कुठलं तरी टी.व्ही. चॅनेल नृत्याच्या शोसाठी प्रतिभावंतांचा शोध घेते आहे, तेव्हा त्या दोघा पती-पत्नींनी आपल्या मुलीचं, आपलं, भाग्य अजमावण्याचा विचार केला. मग सगळ्याचा शोध घेतला गेला. शहरात जाऊन कुठे तरी पेइंग गेस्ट म्हणून रहाणं शक्य आहे. एक दूरचे नातेवाईक आहेत. रहाण्यासाठी जागा शोधायला ते मदत करू शकतील. प्रयत्न करायला काय हरकत आहे?

 सगळ्या गोष्टी वेळेवर होत गेल्या. रहाण्याची व्यवस्था, येण्या-जाण्याची व्यवस्था. रहाण्यासाठी त्या नातेवाईकाच्या घरीच सोय झाली, तेव्हा त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. अर्थात हे आश्वस्त होणं, शहरात पोचण्यापुरतंच होतं. पुढे अनंत अडचणी होत्या. त्या पार करायला हव्या होत्या, नाही तर मग घरी परतणं होतंचं. पै पै गाठीला जोडून शहरात पोचले तर खरे, पण त्यांना वाटू लागलं आपण खूप मोठी चूक केलीय. त्यांच्या मुलीचं नृत्य पाहून इतक्या मोठ्या शोसाठी कोण तिची निवड करणार? ही कला तिच्या आई-वडलांच्या अंगात नव्हतीच मुळी. तेव्हा आपल्या मुलीकडून याची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे, असंही त्यांना वाटू लागलं होतं, पण मुलीकडे लक्ष जाताच, त्यांना पुन्हा वाटू लागायचं, की काही तरी खास तिच्या नृत्यामध्ये आहे, तिच्या वयापेक्षा मोठं… खूप मोठं.. तिच्या आई-वडलांचे विचार एकसारखेच होते. ‘एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? जास्तीत जास्त काय होईल? तिची निवड होणार नाही. थोडे पैसे खर्च होतील. इतकी काही आपली खालावलेली परिस्थिती नाही की पैशाची  काही व्यवस्थाच करू शकणार नाहीत. होय-नाही करत ते शहरात येऊन पोचले. इथली चमक-दमक, गर्दीच गर्दी, सगळ्यांच्या टवकारलेल्या नजरा जणू म्हणत होत्या, ‘तुम्ही इथे का… तुम्ही इथे कसे… तुमचं इथे काय काम…!’  प्रत्यक्ष कुणीच काही बोलत नव्हतं .त्यांचा स्वत:चाच न्यूंगंड त्यांना पाऊल पुढे उचलण्यापासून परावृत्त करत होता. आस-पास दिसणारे चेहरे वाचायचा ते प्रयत्न करत होते. या सगळ्यातून वर येत, नाव-नोंदणी करून नंबर घ्यावयाच्या रांगेत ते उभे राहिले. त्यानंतर कधी त्यांना बोलावलं जाईल, याची ते प्रतीक्षा करत राहिले. या सगळ्याशी काहीच देणं- घेणं नसलेलेली ती मुलगी आपल्या स्वत:मध्येच मश्गुल होती. या नव्या वातावरणात आपल्या जुन्या, नेहमीच तिच्या बरोबर असलेल्या, टेडी बेअरशी खेळण्यात व्यस्त होती.

संध्याकाळ होऊ लागली होती. निवडीसाठी नृत्य सादर करायची तिची वेळ जवळ येऊ लागली होती. काही झालं, तरी आज निवडीची प्रक्रिया पूर्ण होणारच होती. आजच्या नृत्यासाठी तिला कुणी तयार केलेलं नव्हतं. तिला जसं हवं तसं, जे हवं ते ती करू शकणार होती. तिच्या आई-वडलांना या गोष्टीची खात्री होती की ती गर्दीला घाबरत नाही. जेव्हा सांगावं तेव्हा, जिथे सांगावं तिथे ती आपली नाचू लागते. न सांगताही. तिचं थिरकणारं अंग-प्रत्यांग थांबता थांबत नाही. घरीदेखील गाणं कानावर पडताच, त्याच्या सुर-तालाबरोबर ती नाचू लागते. तिच्या चाहर्‍याचे भाव सुरांच्या आरोहा-अवरोहाबरोबर असे काही बदलत जातात, जसं काही कुणी या बदालाचा रिमोटच तिच्या मेंदूत बसवून ठेवलाय आणि बटण दाबताच एकामागून एक मनमोहक भाव तिच्या चेहर्‍यावर उमटू लागतात.

क्रमश:….

मूळ लेखिका – डॉ. हंसा  दीप 

Contact- Dr. Hansa Deep, 1512-17 Anndale Drive, North York, Toronto, ON – M2N2W7 Canada

Ph. 001 647 213 1817  Email- [email protected]

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अश्रू …भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ अश्रू …भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे 

आणि आज वयाची विशी ओलांडल्यावर कधी नव्हे ते पप्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत होती. घरात तो  उत्साहाने वावरत होता. का तर त्याचा आज बेवडा बाप मेला होता. आयुष्यभर रखमाला म्हणजेच त्याच्या आईला मारहाण करणारा त्याचा हैवान बाप मेला होता. पप्या आज खूपच खुशीत होता. बाप मेल्याचं दुःख न करता तो घरात मोकळ्या मनाने वावरत होता. बापाचे दिवस न घालता, रखमाला न जुमानता त्याने चक्क घराच्या दाराशी एक गुढी उभारून मोकळेपणाने स्वातंत्रदिन साजरा केला. आज रखमाला पप्याचे एक वेगळेच रूप बघायला मिळत होते. पप्याच्या कोरड्या डोळ्यात एक विलक्षण चमक दिसत होती. त्याच्यात तिला आज एक घरातला कर्ता पुरुष दिसत होता. 

पप्या काही ना काही कामे करून रखमाच्या हातात पैसे आणून ठेवत होता. छोटी आता मोठी झाली तरी तिला तो छोटीच बोलत होता. तिला काही पाहिजे असेल ते प्रेमाने आणून देत होता. थोडा लोकांत मिसळायला लागला होता पण मोकळे पणाने जगणे त्याच्याकडून काही होत नव्हते. भूतकाळाचे भूत त्याच्या मानगुटीवरून काही जात नव्हते. आईवर आणि बहिणीवर खूप माया होती पण ती कधी त्याच्या तोंडून बाहेर पडत नव्हती आणि अशाच एका दिवशी वयात आलेली छोटी रखमाला आणि पप्याला सोडून गावातल्या एका मुलाबरोबर मुंबईला पळून गेली. पप्या स्वतः कोसळला पण रखमाला आधार दिला. आपलेच संस्कार कमी पडले असे रखमाला सांगून त्याने तिला धीर दिला. छोटीशिवाय त्याला घरात वावरणे मुश्किल होत होते. छोटी लहानाची मोठी त्याच्याच मांडीवर झाली आणि आता भुर्रकन उडूनही गेली. त्यानं स्वतःला सावरत रखमालाही सावरले पण त्याचे कोरडे डोळे काही ओले झाले नाहीत. 

एका वर्षाच्या आत मुंबईला गेलेली छोटी पोटुशी होऊन घरी परत आली ती कायमसाठी. काहीच काम करत नसलेल्या छोटीच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून तिला मुंबईला नेले आणि नवलाईच्या दिवसांची मौज करून पैसे संपल्यावर छोटीला एका ठिकाणी घर कामाला लावले. लग्न न करताच छोटीच्याच पगारावर भाड्याने घर वसवले आणि काही दिवसांनी दुसऱ्याच मुलीशी लग्न करून छोटीला परत गावाला पाठवून दिले. छोटीने रडत रडत तिची कर्मकहाणी ऐकवली. तिचा जगण्यावरचा विश्वास उडाला होता. एकसारखी जीव द्यायच्या गोष्टी करत असे. पप्याने तिला खूप समजवून धीर दिला पण  एक दिवस छोटीने मोठा निर्णय घेऊन घराच्या मागच्या विहिरीमध्ये स्वतःचा जीव देऊन केलेल्या पापाचे प्रायश्चित घेतले. पप्या आणि रखमाच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. पप्याच्या कोरड्या डोळ्यात दुःखाची झालर दिसली. पापण्या ओल्या न करता मनात रडण्याचे त्याचे कसब रखमाला जाणवले. 

त्याचे आतल्या आत रडणे, डोळ्यांत अश्रू न येणे, घुम्यासारखे वागणे ह्या गोष्टीतून त्याला बाहेर काढायचे रखमाने ठरविले आणि पप्याला एकदा तिने जवळ बसविले. मायेने त्याचा डोक्यात हात फिरवून कळकळीने बोलायला सुरवात केली ” पप्या राजा, का असा वागतोस. आता तरी तुझ्या भूतकाळातून बाहेर ये. मला माहित आहे तुझा लहानपणीचा काळ तुझ्या बापाने नासवला पण आता तो भूतकाळ आहे. झटकून टाक तुझ्या मानगुटीवरचे ते भूतकाळाचे भूत. झटकून टाक तुझ्या डोळ्यावरची झापडे. जरा उघडया डोळ्याने ह्या सुंदर जगाकडे बघायला शिक. ही  झोपडी म्हणजे जग नाही. बाहेर पडून जगाकडे नव्या नजरेने बघ. बाहेरचे जग खूप सुंदरआहे. त्या जगात खूप सुंदर, चांगल्या वर्तनाची माणसे ही आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेव आणि नवीन सुंदर आश्वासक असे तुझे भविष्य घडव. मनातले सगळे मळभ बाहेर काढ. आजपर्यंत मनात साचलेल्या अश्रूंना डोळ्यातून बाहेर पडायला वाट दे” आणि रखमाने रडत पप्याला जवळ घेऊन कवटाळले. पप्या रखमाच्या कुशीत शिरला आणि त्याच्या डोळ्यांतील अश्रूंचा बांध फुटला. पप्या रखमाला मिठी मारून खूप वेळ रडत होता. त्याच्या प्रत्येक अश्रूच्या थेंबामधून त्याचा बापाचा दुस्वास आणि त्याने भोगलेले वाईट क्षण जे त्याच्या मनातल्या एका कोपऱ्यात दडी मारून बसले होते ते बाहेर पडत होते. रखमाच्या अंगावर शहारे आले. पप्याच्या डोळयातील पाणी अबोल होते पण ते खूप काही बोलत होते. त्याच्या मुसमुसून रडण्याच्या प्रत्येक हुंदक्यातून त्याच्या बापाने नासवलेला त्याचा भूतकाळ बाहेर पडत होता. आज तो खऱ्या अर्थाने मोकळा झाला होता. आज पप्याला नवीन जन्म मिळाला होता. पुढील सुंदर आयुष्य घडविण्यासाठी त्याचा आज पुनर्जन्म झाला होता.

—-समाप्त.

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अश्रू …भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ अश्रू …भाग 1☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे 

रखमाला काही कळत नव्हते. रोज गप्प गप्प असणारा पप्या आज बाहेरून आला तो खुशीत दिसत होता. नेहमीच स्वतःच्या विचारात गुरफटलेला पप्या आज मात्र चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचे समाधान दाखवत घरात फिरत होता. नक्कीच काहीतरी विशेष घडले असणार त्याशिवाय पप्या एवढा मोकळा वागला नसता आणि काही वेळाने रखमाच्या कानावर बातमी आली ‘पप्याचा बाप मेला’.

पप्या रखमाचा पहिल्या नवऱ्यापासून म्हणजेच म्हादबाकडून  झालेला मुलगा. गावाच्या वेशीबाहेर म्हादबा आणि रखमाचे झोपडे होते. तीन ते चार जण जेमतेम झोपू शकतील एवढीच काय ती झोपडीची जागा. म्हादबाचे रखमावर खूप प्रेम. दिवसभर गावात जाऊन काम करून म्हादबा संध्याकाळी घरी येऊन रखमा बरोबर सुखाचे दोन घास खात होता. रखमाही म्हादबाला जे काही आवडते ते बनवून खायला घालत होती. सुखाने चाललेल्या त्यांच्या संसाराला पप्याच्या रूपाने पालवी फुटली. दोघेही पप्याला खूप शिकवून त्याला मोठे करण्याची स्वप्ने बघत असताना त्यांच्या संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली आणि म्हादबाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. रखमाला दोन वर्ष्याच्या पप्याला मोठा करण्यासाठी तिच्या मामाच्या ओळखीच्या सदू बरोबर दुसरे लग्न करावे  लागले.

सदू रखमापेक्षा पाच वर्षाने मोठा तर होताच पण काहीही काम करत नव्हता. दिवसभर दारू ढोसून कधी घरातच नाहीतर दारूच्या अड्ड्याच्या जवळच कुठेतरी पडलेला असायचा. रात्रीच्या जेवणाच्या वेळेला मात्र तो घरात जेवायला यायचा आणि रखमाने काही बनविले नसेल तर रखमाला मारहाणही करायचा. कसेबसे पप्याला सांभाळून रखमा गावात जाऊन दोन चार उणीधुणी करून घर चालवत होती. रात्री सदू आला की काही ना काही कारणाने आरडाओरडा करून रखमाला मारहाण हे रोजचेच झाले होते. एक वर्षा नंतर छोटीचा जन्म झाला. रखमाला आता दोन जीवांचा सांभाळ करावयास लागत होता. झोपडीच्या मागच्या बाजूला एक पडीक जागा होती तिथे रखमानी पालेभाज्या लावून, त्यांची मशागत करून, त्या गावात जाऊन, विकून त्याच्यावर गुजराण करावयास सुरवात केली. सदूचा रोजचा त्रास चालूच होता. रखमा कडे दारूसाठी पैशाची मागणी आणि त्यासाठी तिला मारहाण हे रोजचेच झाले होते. पप्या लहान होता पण त्याच्या डोळ्यात सदूबद्दलचा राग दिसत होता. लाल झालेले डोळे मोठे करून स्वतःचेच ओठ चावण्यापलीकडे त्याला काहीही करता येत नसे. 

पप्या जसा मोठा होत गेला तसा घुम्या होत गेला. शाळा नाही, दिवसभर घरात नाहीतर रखमाच्या मागे असायचा. रखमा पालेभाजी विकायला गावात गेली की छोटीला सांभाळायची जबाबदारी पप्यावर येत असे. रोज रात्री सदू आला की रखमाला मारहाण ही ठरलेलीच असायची तेंव्हा  छोटीला सांभाळायचे कामही पप्याच करायचा. तिला आपल्या मांडीवर थोपटून झोपवायचे हे त्याचे काम आता नित्यच झाले होते. छोटीवर त्याचे विलक्षण प्रेम होते. दिवसभर तिला तो मायेने सांभाळत तिची तो खूप काळजी घेत असे. पप्याला समज यायला लागली तसा त्याचा घुमेपणा वाढला. कोणाशीही न बोलता तो स्वतःशीच मग्न असायचा. त्याला मित्र तर नव्हतेच पण तो रखमाशीही फारसा बोलायचा नाही. बापाचे, हो. पप्याला जेंव्हा पासून समजायला लागले तेंव्हापासून सदूला तो बाप ह्या नावानेच संबोधित होता. तर बापाचे हे रोज रात्रीचे नाटक बघून बापाचा त्याला खूप राग यायचा. रखमाला बापाच्या त्रासातून बाहेर काढावयासे त्याला नेहमीच वाटत असे पण त्याचे लहान वय आणि कमजोर शरीर ह्यामुळे त्याची कुचंबना होत असे. लहान असल्यापासून पप्याचे डोळे मात्र नेहमीच कोरडे असायचे. त्याच्या डोळ्यात रखमाला कधी अश्रू दिसले नाहीत, की अश्रू डोळ्यातून बाहेर पडे पर्यंत सुकून जायचे हे काही रखमाला कळले नाही. 

वर्षांमागून वर्षे जात होती. शाळेत न जाता परिस्थिती जे शिकवत होती ते पप्या शिकत होता. घरातल्या पाळीव कुत्र्यांवर आपला जीव ओवाळून टाकत होता. भटक्या गुरांना खायला घालत होता. माणसांपासून दूर राहून मुक्या प्राण्यांशी मूकपणे संवाद साधत होता. त्यांच्यामध्येच राहून प्रेमाने त्यांना आपलेसे करत होता पण त्याचा घुमेपणा, एककेंद्री राहणे आणि अबोलपणा काही गेला नाही. 

क्रमशः …..

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खेळी…भाग 3 ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? जीवनरंग ?

☆ खेळी…भाग 3 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

(नवऱ्याच्या विनवणीनं तिनं मुलांना जवळ घेतलं आणि ती घरात परत गेली. )

हे आठवून रागिणीने एक विचार पक्का केला. तिने मधुराला शेवंताची सर्व हकीकत सांगितली आणि आज कोर्टात एकाच नव्हे तर दोन्ही मुलांचा ताबा रितेशला देण्याचा बेत सांगितला. हे ऐकून मधुरा रडू लागली.

” मॅडम,दोन्ही मुलांना देऊन मी काय करू? मला नाही जमणार ते.”

” मधुरा, तुम्ही आधी शांत व्हा. अहो तुमच्या दोघांच्या भांडणात मुलांची फरपट व्हायला नको. मुलं खूप लहान आहेत. निदान त्या बहीणभावांची तरी ताटातूट व्हायला नको. तुम्ही मुलांची काळजी घ्यायला सक्षम आहात. कोर्टही इतक्या लहान मुलांना आई पासून वेगळं करत नाही. घाबरू नका.पण विचार करा ना, कुठलंही लहानसं सुद्धा काम न करणारा रितेश दोन मुलांची जबाबदारी घेऊ शकेल का ?”

आता मधुरा थोडी शांत झाली. म्हणाली ,”खरं आहे मॅडम. रितेशला कसल्याच कामाची सवय नाही. मुलांचे तर त्याने काहीच केलेले नाही. भीतीमुळे तर मुलं त्याच्याजवळ पण जात नाहीत.आतातर ती दोघजण  त्याच्याकडे जायला मुळीच तयार होणार नाहीत.त्याचा नातेवाईकांशी संपर्क नाही,कुणाकडे येणं-जाणं नाही. इतकं कशाला त्याच्या या विक्षिप्त वागण्यामुळे त्याच्या आईवडिलांनी सुद्धा त्याच्याशी संबंध तोडलेले आहेत.सगळीकडूनच तो अगदी एकाकी पडलेला आहे.”

यावर रागिणी म्हणाली,”  हेच सांगतेय मी. अशा परिस्थितीत कोर्ट त्याला एवढ्या लहान मुलांचा ताबा देणार नाही. पण फक्त दुसऱ्यांनाच दोष देणाऱ्यांना स्वतःच्या कर्तव्याची जाणीव होऊ दे ना. वडील म्हणून दोन्ही मुलांची जबाबदारी त्याचीसुद्धा आहेच ना. तुमच्यावर सर्व ढकलून हा नामानिराळा राहू शकत नाही.”

 “बरोबर आहे मॅडम. पण मुलांच्या भवितव्याच्या बाबतही मी जबाबदाऱ्या,कर्तव्य असल्या व्यवहारांचा कसा विचार करू ? मी आई आहे त्यांची.” मधुरा कासावीस झाली होती.रागिणी म्हणाली,” मधुरा, मी तुमच्या भावना समजू शकते. पण कोर्ट प्रकरण म्हटलं की व्यवहार आलाच. तेव्हा आपण भावना जपूयात आणि त्याला व्यवहार जपू दे.”

” म्हणजे नक्की काय करायचं आपण ? “

 रागिणीने समजावलं,” आपल्या भांडणापायी मुलांची वाटणी होऊ नये. त्यांचे हाल होऊ नयेत. त्यांचे भावविश्व उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तुम्ही एकाच नाही तर दोन्ही मुलांचा ताबा वडिलांकडे देण्याला संमती द्यायची. आईच्या अधिकाराने तुम्ही  रितेशच्या वागण्यावर लक्ष ठेवायचे. त्यांनी मुलांची कसलीही आबाळ न करता नीट काळजी घ्यायची. यात थोडी जरी हेळसांड दिसली तरी त्याने मुलांचा ताबा तुम्हाला परत द्यायचा आणि मुलांवरचा त्याचा अधिकार सोडून द्यायचा,असे प्रतिज्ञापत्र मुलांचा ताबा घेतानाच त्यांनी कोर्टात लिहून द्यायचे.यामुळे त्याच्यावर कोर्टाचा अंकुश राहील. तुमचे मुलांशी नाते अबाधित राहणार आहे.काळजी करू नका.रितेश सारखी फक्त स्वतःचाच विचार करणारी माणसं अशा जबाबदाऱ्या घेणं आणि त्यासाठी कायद्याच्या कचाट्यात अडकायच्या भानगडीत पडत नाहीत. तो फक्त तुम्हाला त्रास देण्यासाठी हे करतो आहे. घटस्फोट घेऊन एकट्याने राहणे सुद्धा त्याला जमणार नाही. तो कोलमडून पडेल. बघा तुम्ही.”

” एकदम खरं हे आहे मॅडम. पण रितेश एवढा वाईट नाही हो.अहो सुरुवातीला आमचे खूप चांगले संबंध होते.कशामुळं हे संशयाचं भूत त्याच्या मानगुटीवर बसलंय कोण जाणे ? आपल्या या प्रस्तावामुळे हे भूत उतरून तो ताळ्यावर येणार असेल तर अशी संमती द्यायला माझी तयारी आहे . या प्रयत्नाने आमचा संसार जर पूर्वपदावर येणार असेल तर चांगलंच होईल. त्यासाठी मी रितेशला एक संधी अवश्य देईन. नाही तर आहेच‌”

 ” मधुरा, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा आता काळजी सोडा.” रागिणीने इतके समजावल्यावर  मधुराने मनातली धास्ती दूर ठेवत चांगल्या भविष्याच्या अपेक्षेने दोन्ही मुलांचा ताबा देण्याच्या विचाराला संमती दिली आणि ती कोर्टात जाण्यासाठी केबिन मधून बाहेर पडली.

समाप्त

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खेळी…भाग 2 ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? जीवनरंग ?

☆ खेळी…भाग 2 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

(मधुराकडे पाहताना रागिणीला एकदम शेवंताची आठवण झाली.)

रागिणीच्या घरासमोरच्या प्लॉटमध्ये वाॅचमन म्हणून तिचा नवरा आणि ती राहत होते. त्यांना तीन लहान मुले होती. शेवंता काही घरी घरकाम करी. नवरा रोज दारू पिऊन यायचा. त्यावरून दोघांचे भांडण व्हायचे.तो सतत तिला ‘घरातून चालती हो’ म्हणायचा. पण तिने कधी घर सोडले नाही. दारू उतरली की नवरा एकदम सरळसोट व्हायचा. एक शब्दही बोलायचा नाही.हे नेहमीचेच होते.

पण काल सकाळी दोघांचे भांडण आणि मुलांचे रडणे खूपच जोरजोरात ऐकू येऊ लागले. दंगा ऐकून रागिणीने पाहिले तर, शेवंता खरंच घर सोडून चालली होती. मागे धावणाऱ्या मुलांना धपाटे घालत दूर ढकलत होती.धाकट्या मुलाने तिच्या पायाला मिठी घातली. नवरा म्हणत होता,” जा,जा. चालती हो.”

शेवंता ओरडली,” चाललीयाच म्या. रोज मरमर राबायचं, वर आनि तुजा मार खायाचा.कंच्या द्येवानं सांगितलया.त्यापरास जातीया म्या.”

“अग, खुशाल जाना. कोन आडवतंय तुला?  तुजी आनि मुलांची ब्याद गेली ,का म्या माज्या मनापरमानं जगाय मोकळा हुईन.”

 शेवंता उसळलीच,” अरं वारं, र वा.बरा मोकळा व्हशील तू.म्या तशी सोडणार न्हाय तुला.  म्या कशाला मुलांना घेऊन जातीया? मुलं तुजी बी हाईत.ती तुजी तुला लखलाभ व्हवू देत. त्यांचं काय करायचं ते तुजं तू बग. म्या निघाले.”

 नवरा एकदम सटपटलाच.” काय म्हणालीस तू ?  ए माजी बाय, आसं काय करू नगस बग.आगं मुलांचं म्या काय करू?तू त्यांना गपगुमान घेऊन जा बग.”

 कमरेवर हात ठेवत शेवंता ठसक्यात म्हणाली,” आजाबात नेनार नाय. नीट आईक म्या काय सांगतीया ते.म्या नेनार नाय. या घरात लगीन करून येताना म्या येकलीच आली व्हती. आता जातानाबी म्या येकलीच जानार हाय. मुलांचं भ्या मला दावू नगस. म्या येकलीच जानार म्हनजे येकलीच जाणार.”

 आता मात्र नवऱ्याची दारू खाडकन उतरली. पुढे धावत तो शेवंताला अडवू लागला. हात जोडून गयावया करू लागला. मुलं पण तिला बिलगली. तो पुन्हा पुन्हा सांगत होता,” अगं,पुन्ना म्या दारुला हात लावनार न्हाई. खरं सांगतो.तुला तरासबी देणार न्हाई. पन तू घर मोडू नगस. चल घरात चल.” नवऱ्याच्या विनवणीनं तिनं मुलांना जवळ घेतलं आणि ती घरात परत गेली .

क्रमशः….

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खेळी…भाग 1 ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? जीवनरंग ?

☆ खेळी…भाग 1 ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

ॲडव्होकेट रागिणी ऑफिसात आजच्या कामांची कागदपत्रे पहात होती. तेव्हा मधुरा केबिनमध्ये आली.’नमस्कार मॅडम’, म्हणत समोरच्या खुर्चीत बसली.  मधुरा खूप दडपणाखाली दिसत होती. तिच्या आणि रितेशच्या घटस्फोटाची केस सुरू होती.आज मुलाच्या कस्टडी बाबत सुनावणी  होती.

मधुरा एका बँकेत चांगल्या पदावर होती.रितेश मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. आर्थिक सुबत्ता होती.त्यामुळे मोठं घर, गाडी सर्व उत्तम होते.मधुराच्या बॅंकेचे कर्ज असल्याने घर दोघांच्या नावावर होते.सहा वर्षांचा राजस आणि तीन वर्षांची रुंजी अशी दोन लहान मुले होती. सगळेच एकदम मस्त चालू होते. मधुरा सगळ्यांशी मिळून मिसळून रहात होती. सासू-सासर्‍यांशी तिचे वागणे अतिशय जिव्हाळ्याचे होते.

एकीकडे हे सगळं छान होतं.तर दुसरीकडे रितेशचा स्वभाव विचित्र होता. प्रत्येक गोष्टीवर तो शंका घेई. सतत त्यावरून तिला टोकत राही. खरंतर घरातल्या सर्व गोष्टी करणे,मुलांचे संगोपन, शाळा, स्वतःची नोकरी यामुळे मधुराची खूप ओढाताण होई.तरीही ती सतत हसतमुख असायची.पण रितेशला याबद्दल एका शब्दाचेही कौतुक नव्हते. स्वतः रोज कामावरून उशिरा यायचे आणि घरी आल्यावरही ऑफिसचे काम म्हणत फोनवर तासनतास बोलत बसायचे. तो घरात कसलीच मदत करीत नसे. पण तिच्या कामात मात्र सतत खोट काढीत असे. फोन करून सारखी तिची चौकशी करी.तिच्यावर संशय घेई. मधुराने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. पण आता तिला हा जाच वाटू लागला होता. तो तिच्यावर काहीही आरोप करायचा आणि त्याचे स्पष्टीकरण देता देता तिची दमणूक व्हायची.हा  मानसिक छळ आता तिच्या सहनशक्ती बाहेर जाऊ लागला होता.

स्वतःचा मूड असेल तर रितेश मुलांना जवळ घ्यायचा.नाहीतर त्यांचे अजिबात लाड करायचा नाही. मुलांना पण त्याचा लळाच नव्हता. घाबरून ती त्याच्यापासून दूर राहायची. हे सततचे वाद, भांडणं, संशय या कटकटींनी  मधुरा वैतागून गेली. एक दिवस तिने त्याला बजावले, ” हे बघ रितेश, ही बिनबुडाची भांडणं थांबव.  जरा आवर घाल स्वतःला. तू तुझं वागणं बदललं नाहीस तर मी घर सोडून जाईन.”

तिच्या धमकीने उलट तो खूषच झाला. त्याला हेच हवे होते. पण याबद्दल त्याने तिलाच दोष दिला.” खुशाल चालायला लाग. नवऱ्याला कसे खूश ठेवावे याची थोडी तरी अक्कल आहे का? सगळी माझ्या आयुष्याची वाट लावलीस आणि म्हणे हिनेच संसार सांभाळलाय.गरज नाही मला असल्या संसाराची .”

मधुरावरच ठपका ठेवत रितेशने तिला घरातून जायला सांगितले.ती मुलांसह माहेरी आली. मुले सोडून जाताना त्याला कसलाही अपराधीपणा किंवा दुःख वाटले नाही. उलट त्यानेच घटस्फोटासाठी कोर्टात केस केली. मुले लहान, अर्धवट झालेला संसार, आर्थिक व्यवहार एकत्रित आणि गुंतागुंतीचे यामुळे मधुराची या गोष्टीला मान्यता नव्हती. पण तो माघार घेत नव्हता. त्याच्या आई वडिलांनीही खूप समजावले. पण तो त्यांचेही ऐकत नव्हता.  त्यातच त्याने आता राजसची कस्टडी मागितली होती. मधुरा खूप घाबरून गेली. त्यासाठीच आज कोर्टात जायचे होते

मधुराकडे पाहताना रागिणीला एकदम शेवंताची आठवण झाली.  

क्रमशः….

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

सातारा 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print