मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भेट …. भाग दुसरा ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ.सुचित्रा पवार

?  जीवनरंग  ?

☆ भेट…. – भाग दुसरा ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(नव्ह कुणी मागितला जरी असता तरी स्वतः शिवाच गेला असता पण सुंदरला दिला नसता !)  — इथून पुढे —

त्यादिवशी असाच बैलगाडीला जुंपून त्याला नेहमीप्रमाणं शेतात नेला . शेंगांच्या रानातून शेंगाची पोती आणायची होती. निम्या रस्त्यात गेल्यावर ठेच लागल्याचं निमित्त होऊन सुंदर रस्त्यात कोसळला .शिवाचा जीव हलला , गाडीवरून उतरून त्याला त्यानं चुचकारल ,पाठीवरून हात फिरवला पण सुंदर उठायचं नाव घेईना .तिथंच बैलगाडी सोडून दुसरा बैल रस्त्याकडेला बांधून तो सुंदरला उठवायचा प्रयत्न करू लागला.पायात काटा मोडलाय का पाहिला पण कुठं काहीच झालं नव्हतं .शिवाच हातपाय गळून गेलं .तिथंच गळ्याला मिठी मारून त्यांन  हंबरडा फोडला . निरव शांततेत शिवाचा हंबरडा दूरवर घुमत राहिला .रस्त्यावरून येणा-जाणाऱ्यांनी बातमी घरात पोहचवली.जागेवरच डॉक्टर आणला .डॉक्टरनं इंजेक्शन दिलं .हा -हा म्हणता गाव गोळा झाला ,पण शिवाला काही सुचत नव्हतं.तो नुसता सुंदर …सुंदर करत उसासे टाकत होता . संध्याकाळी हळू हळू चालवत कसा तरी सुंदरला घरापर्यंत आणला .सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं . कुणी म्हणलं करणी झाली ,कुणी म्हणलं दिष्टवला .शिवा तर सुंदर जवळून रात्रंदिवस उठलाच नाही .सुंदरच्या टपोऱ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तसा त्याचा धीर सुटला .त्यान पण अन्नाचा कण घेतला नाही .अंगारा ,धुपारा ,दृष्ट काढून ,औषधं बदलून  झाली पण सुंदर शांत होता .केविलवाणे तो मालकाकड पाहत राही आणि एका सकाळी जमिनीवर मान टेकून सुंदर शांत झाला .शिवाने हंबरडा फोडला. कुणाचंही मन पिळवटून जावं असंच आक्रीत घडलं होतं .शिवा वेडा व्हायचाच बाकी होता .

त्यादिवसापासून त्याची झोप उडाली .जेवणावरून स्वत:वरून ,शिवारावरून मन उडलं .जिथं तिथं सुंदरच्या आठवणी त्याचा पाठलाग करत .रात्री अपरात्री उठून तो गोठ्यात जाई आणि सुंदरच्या जागेवर विमनस्क बसून राही .लोकांनी समजूत काढली ,शालुच्या माहेरच्यांनी समजूत काढली पण तो स्वतःच्या मनाला समजावू शकत नव्हता की सुंदर त्याच्या गोठ्यातून जीवनातून गेलाय .

शालूला रात्रंदिवस धन्याची  चिंता लागून राहिली .त्याचं मन तिलाही वळवता येत नव्हतं कारण सुंदर त्याचं काळीज होतं अन काळजाशिवाय मनुष्य कसा जगेल ? चालतं बोलतं आत्माहीन प्रेतवत अवस्था होती शिवाची . तिला धास्ती लागून राहिली होती त्याच्या जीवाचं काही बरं वाईट नाही ना होणार ? देवाचा धावा रात्रंदिन चालूच होता.

गेल्या राखीपौर्णिमेला राखी बांधायला माहेरी गेल्यावर सहजच तिचं लक्ष गोठ्यातल्या वासराकड गेलं अन तिच्या सर्वांगातून एक अनामिक लहर चमकली .सुंदरचंच दुसरं रूप होतं ते ! अन तिच्या मनात एक कल्पना आली .हा शेवटचा उपाय होता धन्याला सुंदरच्या आठवणीतून भानावर आणायचा .

तिनं भावाला -महादूला सविस्तर कल्पना दिली .बहिणीच्या संसाराची त्याला पण काळजी होतीच .प्रयत्न किती यशस्वी होणार हे तिला माहीत नव्हतं पण शिवाला दुःखातून सावरण्याचा हा एकच मार्ग तिच्याकडे शिल्लक राहिला होता .आणि म्हणूनच ती महादूची वाट बघत अस्वस्थपणे आत -बाहेर फेऱ्या घालत होती .

घुंगराच्या आवाजाने ती भानावर आली अन पटकन आरतीचं ताट आणायला आत गेली . लगबगीनं तिनं पाटीत खिचडा  ओतला आणि उंबऱ्यावर येऊन सुंदर ss म्हणून हाक दिली. नवा कोरा रंगीत कंडा , कासरा अन घुंगुर बांधून महादू दारात वासराला घेऊन हजर होता  .घुंगराचा आवाज अन ‘सुंदर’ हाक ऐकून शिवा दचकून गोठ्यातून बाहेर आला. शालून वासराला ओवाळून तोंडात खिरीचा घास दिला डोक्यावर हात फिरवला अन खिचडा खायला दिला .शिवा निश्चल होऊन पहात होता . शालू वासराच्या पाठीवर हात फिरवत त्याच्याशी बोलत होती ,”सुंदर तुझ्या धन्यान काय अवस्था करून घीतल्या बघ ,तूच समजवून सांग बा मी कुणाकड बघून जगू ? झालं ती वाईटच! आम्हाला तर काय बरं वाटतय का र? पण त्याचा आपल्याजवळचा शेर तेव्हढाच हुता  तेला आपण काय करणार ?आपण प्रयत्न केलंच ना ? आता सावरायला हवं ,तूच सावर तुझ्या धन्याला ! ती बघ तुझी जागा ” म्हणत शालून गोठ्यात त्याच्या जागेकडं बोट केलं तिचा कंठ दाटून आला; तिनं वासराच्या गळ्यात हताशपणे हात टाकले तिचे डोळे भरून वाहू लागले.

शिवाला त्याचं लहानपण आठवलं असाच तो सुंदरच्या गळ्यात हात टाकून बोलायचा. थेट सुंदरच होता तो दुसरा !तेच डोळे ,तीच पांढरी शुभ्र सशासारखी गुबगुबीत अंगकांती …”सुंदर sss “पुन्हा एकदा त्यानं आर्त हाक दिली .. गळ्याला मिठी मारली लहान मुलासारखी अन अश्रूला वाट दिली .महादू गळ्यातल्या टॉवेलन डोळे पुसत राहिला .सुंदर शिवाचे हात प्रेमाने चाटू लागला अन मघापासून गच्च दाटून आलेलं आभाळ आता धाडधाड कोसळू लागलं …

समाप्त 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भेट …. भाग पहिला☆ सौ. सुचित्रा पवार

सौ.सुचित्रा पवार

?  जीवनरंग  ?

☆ भेट…. – भाग पहिला ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

तिन्हीसांज झाली होती ,अस्वस्थपणे शालू उंबऱ्यातून स्वैपाकघरात अन पुन्हा अंगणात येरझाऱ्या घालत होती .आकाशात ढगांची गच्च दाटी झालेली अन अजूनच अंधारून आलेलं .गोठ्यात अंधार भुडुक होता अन शिवा -तिचा कारभारी गुडघ्यात मान घालून बसला होता .शेजारी सापती ,घुंगुरमाळ उदास पडलेली  बघून तिच्या पोटात कालवून येत होतं पण ..पण ती हतबल होती .चूल पेटली होती . घरोघरी जनावरांच्या अंघोळीचा अन सजावटीचा कार्यक्रम सुरू होता .आज खिचडा !  तिनेही चुलीवर खिचडा शिजत घातला होता ,करडई उखळात कुटून दूध काढून ठेवले होते , खीर रटरटत होती ; जनावरं ओढ्यावर नेऊन धुवून आणली होती ,शिंगांना हुरमुस लावून रंगवली ,पण तिला  कशातच  आनंद वाटत नव्हता. घरधण्याची  तसली अवस्था बघून तिला उदास वाटत होते ,तिच्या परीनं तिनं समजूत काढली होती पण ..पण त्याच्यात काय फरक पडत नव्हता आणि कुणी समजूत काढून ती निघणारही नव्हती .गेलं आठ दहा महिने झालं त्याचं शिवारातून ,जितराबावरून लक्ष उडल होतं ,इतकंच काय स्वत:वरून सुद्धा त्याचं लक्ष उडलं होतं . सगळी काम शालूनच पार पाडली होती ,औंदा पेरणी पण शालूनच पार पाडली होती पण पिकं कितकीशी वाढलीत ? हे बघायला सुद्धा तो शेतापर्यंत गेला नव्हता .अन का नाही अशी अवस्था होणार ?त्याजागी कुणी असता तर त्याचीही अवस्था अशीच झाली असती शालू विचारात गढली .सुंदर आणि धन्या बरोबरच वाढलं होतं आत्या सांगायच्या सुंदरच्या आणि तिच्या कारभाऱ्याच्या साऱ्या कहाण्या ! 

घरच्या गाईपासूनच सुंदर झाला होता .नावाप्रमाणच सुंदर देखणा होता . पांढऱ्या शुभ्र सशासारखी कातडी ,टपोर डोळ ,गुबगुबीत शरीर .. शिवाला त्याचा खूप लळा  होता .दिवसरात्र तो सुंदरला जपायचा ,कुठून कुठून गवत आणायचा ,कणिक खुराक ,गोठ्यात बसायला स्वच्छ जागा ..एखाददिवशी जरी सुंदर उदास वाटला  तर शिवा शाळेतच जायचा नाही ,सुंदरला माळावर  पळवल्याशिवाय त्याला चैन पडायचा नाही, सुंदरन काही खाल्ल्याशिवाय शिवा तोंडात घास घ्यायचा नाही .सुंदर मोठा धष्टपुष्ट झाला अन शेतीची काम  करू लागला .शालू अन त्याच्या लग्नाच्या वेळीसुद्धा त्यानं सुंदरकडं एव्हढंस पण दुर्लक्ष केलं नव्हतं .वरातीच्या गाडीला तो  सजून धजून ओढत होता . तिथंच तिची  सुंदरशी ओळख झाली होती .

सकाळी उठल्या उठल्या पहिलं तो सुंदरचच दर्शन घ्यायचा ,त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवायचा ,तोही धण्याचं हात चाटायचा ,तोंड वर करून लाड करून घ्यायचा . त्याच्यामागचं शेण सारून त्याला कोरड्या जागेत बांधून मगच धन्याच्या दिवसाची सुरुवात व्हायची .काळजाचा तुकडाच होता जणू ! शिंगांना सुबक आकार ,त्यांचा लाल रंग , कंडे ,घुंगुरमाळ ,बैलपोळ्यासाठी रंगीत झूल ,रंगीत गोंडे कित्ती कित्ती हौस!  सुंदरला काही झालं की शिवाचा जीव खालवर व्हायचा .सुंदरला चारापाणी केल्याशिवाय तो तोंडात घास घ्यायचा नाही .

दिवाळीत गोठा साफ करून रंगरंगोटी व्हायची ,गोठ्यालाच दिव्याच्या माळा लावायच्या .वसुबारसेला पूजा ,पुरणपोळीचा घास असायचा सुंदरला.सुंदर जणू धाकटा भाऊच होता धन्याचा !  बैलपोळ्याची तर त्याला कित्ती हौस  ! आठ दिवसापासूनच तो त्या तयारीत असायचा . लाडक्या सुंदरला  सगळ्या माळावर हुंदडू द्यायचे. हिरव्यागार कुरणावर मनसोक्त चरून झालं की मग आपोआपच त्यो ओढ्याकडं जायचा मनसोक्त पाणी प्यायचा , मग कंबरभर पाण्यात उतरून शिवा सुंदरला स्वच्छ धुवायचा .आधीच स्वच्छ पांढरी त्याची कात अजूनच झळाळायची .आठ दिवस त्याला कुठल्याच कामाला लावत नसे.    रस्त्यानं सुंदर निघाला की सगळे बघत उभं रहात .दररोज संध्याकाळी मीठ मिरच्यांनी दृष्ट उतरून चुलीत फेकायची .तिला पण सुंदरला जपावं लागायचं ,सुंदरचा दु:स्वास धन्याला अजिबात खपायचा नाही .

खरे तर सुंदर दिसायला देखणा होताच पण तो कष्टाळू अन गुणी पण तितकाच होता .त्याला कधी चाबूक ओढलेला तिनं  बघितलं नव्हतं .शेतीच्या कामाला नेहमी सुंदरच्या जोडीला दुसऱ्याचा बैल भाड्यानं असायचा ,गाडी जुपताना पण भाड्याचाच बैल असायचा सुंदरच्या जोडीला ;पण सुंदरला कुणी भाड्यानं मागायचं धाडस केलं नव्हतं ;नव्ह कुणी मागितला जरी असता तरी स्वतः शिवाच गेला असता पण सुंदरला दिला नसता !

क्रमशः ——

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जोगीया ☆ श्री आनंदहरी

Best Bhojpuri Video Song - Residence w

? जीवनरंग ❤️

☆ जोगिया ☆ श्री आनंदहरी ☆

(गदिमा यांच्या ‘जोगीया’ कवितेचे कथारूप)

मैफिलीची वेळ झाली होती.. झुंबर आणि दिवे प्रज्वलित झाले होते.. गालिचा व्यवस्थित अंथरला होता.. लोड, तक्के.. सारी बैठक व्यवस्था सज्ज झाली होती.. कळीदार पाने, सुपारी, चुना कात, लवंग, वेलदोडे यांनी भरलेली पानांची तबके बैठकांसमोर ठेवलेली होती..  तिच्या येण्याचे प्रवेशदाराला लागूनच साजिंद्यांची बैठक.. सारे काही जय्यत तयार होते. तिच्या नृत्य- गायनावर, सौंदर्यावर फिदा असणारे, तिच्यावर जीव ओवाळून टाकणारे रसिक येऊन विराजमान झाले होते, वाद्ये जुळवली गेली होती. फक्त तिच्या येण्याची प्रतीक्षा होती. साऱ्या रसिकांचे डोळे ती यायची त्या प्रवेशदाराकडे लागून राहिले होते. तिचे आरसपानी सौन्दर्य पिऊन डोळ्यांत साठवायला अनेक डोळे आतुर झाले होते.

जशी वेळ पुढे पुढे सरकत होती तशी रसिकांमध्ये अस्वस्थता ,कुजबुज, चुळबूळ वाढू लागली होती पण अजून ती काही आली नव्हती. सखी तिच्या जागेवर बसून होती.. ‘ खरे तर असे कधी होत नाही. बाईजी अगदी वेळेवर बैठकीत येतात.. अगदी रसिक आल्यावर लगेच..’ तिच्या न येण्याने मनात काळजी दाटून आली तशी सखी अस्वस्थपणे उठली आणि तिच्या खोलीकडे गेली .

” बाईजी, चला खूप उशीर झालाय, सगळेजण तुमच्या येण्याची आतुरतेने वाट पाहतायत.”

हलकेच दार वाजवत सखीने तिला हाक मारली. तिने दार उघडले. सखीने पाहिले. ती रोजच्यासारखीच तयार झाल्याचे दिसत होते. ‘ बाईजी तयारच आहेत… पण काहीशा वेगळ्या का वाटतायत ?’  सखीच्या मनात तिला पाहताच विचार आला.

” आज मैफिल नाही होणार. सगळ्यांची माफी मागून जायला सांग .”

एवढेच बोलून तिने दार दडपून बंद केले होते. बंद दारापुढे सखी काही क्षण थबकली होती. सखीला तिच्या वागण्या- बोलण्याचा धक्काच बसला होता.

सखीने हात जोडून माफी मागत,  बाईजींना बरे वाटत नसल्याने मैफिल होणार नसल्याचे सांगितले.

पानांची तबके पुढे सरकवत पान घेण्याची आणि दुसऱ्या दिवशी येण्याची विनंती केली. कुणी पान घेऊन, कुणी तसेच निराश मनाने परतले. साजिंदेही गेले तसे मुख्य दार पुढे करून ‘ बाईजींकडे विचारपूस करायला जावं की नको ?… नकोच. बाईजीं जरा अस्वस्थच वाटल्या .. पण नको जायला.. त्यांना वाटलं तर बोलावतीलच..’ असा विचार करून सखी स्वतःच्या खोलीकडे गेली.

सखी बोलवायला आल्यानंतर दार लावून ती कसल्यातरी विचारात भान हरपून गेल्यासारखी मंचकावर येऊन बसली… ‘ आज तरी तो यावा ..’ तिचे मन म्हणत होते. तिला तो यावासा वाटत होता पण त्या दिवसापासून तो कधीच आला नव्हता.

तिच्या मनात तो दिवस..दिवस नव्हे ती रात्र वारंवार एखाद्या चलचित्रासारखी तरळून जात होती.

त्यादिवशी नेहमीप्रमाणेच मैफिल मस्त रंगली होती. रसिक तिच्या नृत्य-गायनाचा आस्वाद घेत होतेच पण त्याचबरोबर तिचे आरसपानी सौन्दर्य, कमनीय काया कवेत घेण्याची आस बाळगत डोळ्यांत साठवत होते. तिने भैरवी रागातील ठुमरी गायला सुरवात केली..

*आ जा सावरिया,

रसके भरे तोरे नैन, सावरिया ।

दिन नही चैन मोहें, रात नही निंदिया,

तडपत हूँ बिन रैन, सावरिया ।।

सारी मैफलच मंत्रमुग्ध झालेली. तिने भैरवी घेतलीय याचेही भान कुणाला राहिले नव्हते. सारे भावशब्दांत रंगलेले असतानाच ती मैफलीचा निरोप घेऊन आपल्या खोलीत आली. स्वर थांबले, सतार मूक झाली. हळूहळू एकेकजण भानावर येऊन तृप्त मनाने स्वरांच्या लहरीवर स्वार होत त्या संमोहनातच बाहेर पडू लागला. सारे परतले. दिवे मंद केले गेले. इतकावेळ नृत्य-नादात रमलेली, रुणझुणणारी  पैंजणेथकून  विसालीी..काही क्षणातच सरल्या मैफिलीचे उदास अस्तित्व बैठकीच्या खोलीत भरून राहिले. थकलेले साजिंदे बाहेर पडले तसे सखीने दार पुढे लोटले, बैठकीतील दिवा मालवला आणि आपल्या खोलीत गेली.

ती रतिक्लांत होऊन एकटीच मंचकावर पहुडली होती. तिच्या खोलीतला प्रकाशही थकल्यासारखा मंद झाला होता. ती स्वतःच्याच विचारात गढून गेली होती. जीव जगवण्यासाठी आपला देह विकावा लागावा, आपल्या चारित्र्याचा असा बाजार मांडायची वेळ आपल्यावर यावी याची खंत एकटेपणात तिच्या मनाला जाळत असायची. स्वतःच्या विचारात असताना तिला कुणाची तरी चाहूल लागली तशी तीखोलीच्या दाराशी  आली. समोरून अंधारातून कुणीतरी येत होते. तिला आश्चर्य वाटलं. ही वेळ कुणी येण्याची नव्हती. तन-मन तृप्तीच्या नशेत परत जाण्याची होती. तो समोर आला. नवख्यासारखा बुजलेला… ती त्याला धीर येण्यासाठी छानशी हसली.

तो काहीसा दबकतच तिच्याजवळ आला आणि म्हणाला,

” माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,राणी…”

कमलदलासारखे ओठ जरासे विलगून ती हसली. अनेकजण तिला असेच म्हणायचे, अजूनही म्हणतात. अगदी सुरवातीच्या काळात तिला ते खरं वाटायचं, मन फुलून यायचं. पण नंतर मात्र तिला त्या वाक्याचा अर्थ मनाशी, हृदयाशी नसून देहोपभोगाशी आहे हे कळून चुकले होते.

ती हसत म्हणाली,

 ” थांबा, विडा देते ,तो घ्या आणि उद्या या.. थोडा जास्त दाम घेऊ यान..”

तिने विडा बनवायला पान हातात घेतले आणि वर पाहिलं. तो काही न बोलता झटकन अंधारात विरून जावा तसा गेला होता. काही क्षण ती त्याला इकडे-तिकडे शोधत राहिली. दुसऱ्या दिवशी त्याची वाट पाहिली. वाट पहातच राहिली. तो आलाच नाही.

तिच्या भांग भरल्या मनात, जीवनात तोप्रीतीची  तुळस लावून गेला होता. आपण त्याला नीट पाहिलेही नाही ही जाणीव तिच्या मनाला खात राहिली. एकटेपणात त्याच्या शब्दांची, नीट न पाहिलेल्या त्याच,ी आठवण तिला सतावत राहिली. आसावल्या डोळ्यांनी ती त्याची वाट पहायची त्याने, एकदा… एकदा तरे यावे, भेटावे असे तिला वाटत होत.पण  तो आलाच नाही.

वर्षे लोटत राहिली पण तो मात्र ध्रुव ताऱ्यासारखा तिच्या मनाकाशात अढळ स्थानी राहिला होता. तो दिवस हाच.. ती सारे काही सोडून याच दिवशी व्रतस्थ राहून त्याची वाट पाहत राहायची.

सखी बोलवायला आली तेंव्हा तिने खोलीचे दार दडपून बंद केले होते पण मनाची दारे मात्र सताड उघडली गेली होती.. फक्त त्याच्यासाठी.   फक्त त्याच्यासाठीच तिने विडा बनवला. तो येणार नाही हे जाणवत असूनही ती मंचकावर त्याची वाट पाहत बसली होती.. सारी रात्र ती तशीच त्याची वाट पाहत बसून राहिली होती. आतुर झालेले मन त्याला साद घालत होते.

आन मिलो इकबार सजनवा ।

याद में तोरी रैन बिताई

सून लो जिया की पुकार ।।

तिच्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या होत्या.. गालावरून आसवे ओघळत होती.. तिचे आर्त स्वर तिच्या मनात आणि खोलीत भरून राहिले होते.असा जोगीया कधीच रंगत नव्हता..कधीच  रंगला नव्हता.

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ दांपत्य स्वप्न.. अनुवाद ☆ सुश्री सुमती जोशी

सुश्री सुमती जोशी

☆ जीवन रंग ☆ दांपत्य स्वप्न.. अनुवाद ☆ सुश्री सुमती जोशी ☆

एक

सुधीर आला होता. त्याच्या हातात गुलाछडीच्या फुलांचा गुच्छ. चेहऱ्यावर हसरा भाव. पंख पसरून मन जणू उडू उडू पहात होतं.

आल्याबरोबर सुधीर म्हणाला, “हासी, आज एक खुशखबर आहे. काय देशील सांग. नाहीतर सांगणार नाही.”

हासी म्हणाली, “सांगा ना प्लीज.”

“मला काय देशील ते आधी सांग.”

“मी आणखी काय देणार? तुमच्या रुमालावर छान कशिदा काढून देईन. मला एक सुरेख नमुना मिळालाय.”

“नाही, ते मला पसंत नाही.”

“मग काय हवंय तुम्हाला? चॉकलेट आहे. ते देऊ शकेन.”

“चॉकलेट घेऊन संतुष्ट व्हायला मी लहान बाळ आहे का?”

हासी हसू लागली. म्हणाली, “मला ऐकायचं नाही. कशिदा काढून द्यायला तयार होते, चॉकलेट द्यायची इच्छा होती, त्यामुळे जर आपलं…”

सुधीर म्हणाला, “आता मी निघतो.”

हासीनं पुन्हा विचारलं, “सांगत का नाही?”

“एक वस्तू मिळाली तर सांगू शकेन. तीच, जी त्या दिवशी मागितली होती.” असं म्हणून अर्थपूर्ण नजरेनं तो हासीकडे बघू लागला.

हासी लाजली पण तिने सावरून घेतलं. म्हणाली, “आपल्याला सांगून ठेवतेय, ते जमणार नाही.”

सुधीरच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर तिला भीती वाटली. सुधीर म्हणत होता, “मला वाटलं होतं हसत हसत मी बातमी सांगेन. पण जमलं नाही. मला क्षमा करा. तुझं लग्न साँतरागाछीच्या त्या तरुणाशी ठरलाय.”

असं सांगून सुधीर निघून गेला.

हासीनं पुन्हा हाक मारली, “सुधीरदा ऐकून जा.”

सुधीर परत आला नाही.

 

दोंन

अलका आलीय.

तीच अलका जिला भेटण्यासाठी अजय दिवसभर वाट बघत राही – केव्हा संध्याकाळ होईल आणि ती येईल!

अलका येऊन म्हणाली, “अजयदा इंग्लिशमध्ये ‘पेट’ या नावाची एखादी कथा आहे का?”

अजय म्हणाला, “आहे. पेट म्हणजे माथा.”

“खरं आहे का हे?”

“डिक्शनरी काढून बघ. पेट म्हणजे माथा.”

“आमची वरुणादी बरोबर सांगतेय ना!”

अजय म्हणाला, “ठीक आहे, मुंडकं याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात?”

अलका डोळे मिचकावत म्हणाली, “हेड.”

“हेड म्हणजे माथा.”

“मुंडकं म्हणजेही माथा.”

अजय हसून म्हणाला, “हेच का तुझं बांगला भाषेचं ज्ञान! माथा आणि मुंडकं म्हणजे एकच वस्तू!”

अलकानं हसून विचारलं, “फरक काय?”

गंभीर होत अजय म्हणाला, “तुझ्यात आणि पाँची धोपानी यांच्यात काही फरक आहे का सांग पाहू. दोघीही मुलीच आहेत.”

अलका विचारू लागली, “पाँची धोपानी कोण?”

“तुझ्या गल्लीच्या वळणावर धोब्याची मुलगी आहे ना! लहान वयाची – तुझ्याच वयाची असेल.”

तिरकसपणे अलका म्हणाली, “अलीकडे बघतेय अजयदा सगळ्याच गोष्टी बारकाईने बघू लागलेयत. धोब्याची मुलगीही सोडली नाही!”

अजय म्हणाला, “होना! स्वत:ची वस्तू चांगली आहे याची खात्री करून घ्यायला नको का?”

“स्वत:ची वस्तू कोणती?”

“आहे एकजण.”

अलका अचानक अस्वस्थ होऊन जवळचं टेबल आवरू लागली.

काहीही कारण नसताना अजय खिडकीतून बाहेर बघत राहिला.

****

दोन स्वप्नं दोघांनी बघितली.

दोघं घनिष्ठ होत शेजारी शेजारी झोपलेयत.

हासीचा हात अजयच्या छातीवर.

हासी आणि अजय – नवरा-बायको.

 

वनफूल यांनी लिहिलेल्या ‘युगल स्वप्न’ या बंगाली कथेचा भावानुवाद सुमती जोशी.

अनुवाद – सुश्री सुमती जोशी

मोबाईल ९८३३२२२१०६. ई-मेल आयडी [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घेणेकरी… भाग ४ ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ घेणेकरी… भाग ४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

कोर्ट तारखा अपील चालुच होतं..

मी आशा बाळगून होते कधीतरी दयाळची माणसं येतील .जीकेला सामानासकट रस्त्यावर आणतील.

त्यांना घाबरुन जीकेची दातखीळ बसेल.तो लोटांगण घालुन पपांची माफी मागेल.

पण धक्का यालाही बसायचा होता…

दयाळच्या वेटींग हाॅलमधे मी बराच वेळ बसुन होते.

दुसर्‍या दिवशी केस होती .कुणापुढे होती ते सांगायचं होतं.आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच.

तिथे अनेक लोक होते.  क्षणभर वाटलं आपण यातले नाही.. का आलो आपण इकडे..?

भेटीची ठरवलेली वेळ उलटून गेली होती. मी आल्याची सूचनाही आत गेली होती.तरी इतका वेळ?

बेचैनी उदासी ताण वाढत होता.क्षणभर वाटलं,दार ढकलुन आत जावं…

अन्  तेव्हढ्यात..

चक्क जीकेच आतून बाहेर आले.तेही रूबाबात.

त्यांनी मला पाहिलही पण दुर्लक्ष केलं.ते दयाळच्या माणसांशी लगटीने बोलत होते.जणु ही सारी माणसं त्यांच्या किती जवळची आहेत हे जाणूनबुजुन मला दाखवत होते…

मी आजारी असताना मला स्वत: डाॅक्टरकडे घेउन जाणारे, हाॅस्पीटलमधे रोज फुलं घेउन येणारे हे जीके…

आणि बंद दारापलिकडचा माझा बालमित्र दयाळ.

कोण खरं? कोण खोटं? कोण आपलं? कोण परकं..?

हे शहाणपण आपल्याला मिळवता आलं नाही याची खूप खंत वाटली.. सत्य श्रद्धा निष्ठा भावना चारित्र्य नीति हे सारं किती बेगडी आहे ..कांटेरी कुंपण आहे भोवती. कसे जाणार आपण या पलिकडे..

काळ वहात राहिला.सत्याला एका किनार्‍यावर ठेवून.

“कर्माची फळे याच जन्मी फेडावी लागतात…!!”

अक्षरे. वाळुतली.

पपा गेले. जीजीही गेली.पापांच्या पाचपाखाडीच्या प्राॅपर्टीवर जीके सौख्यभरे नांदताहेत.

दयाळचाही गूढ मृत्यु झाला.अपघात की खून…? सत्य बाहेर आलेच नाही…

अशाच सुन्न क्षणी,माझंही जीवन निवृत्तीच्या वाटेवरच आता..

मीनाचा फोन आला. 

“अग! परवा जीके आले होते…”

पपांच्या अंत्यदर्शनाला जीके आले असताना याच मीनाने दु:खाच्या आवेगात त्यांना अक्षरश: हकलवुन लावले होते..!!

“आता काय हवंय् त्यांना?”

“अग! आईजवळ बसले..खूप रडले .मी माझा चांगला मित्र गमावला…”वगैरे बरच बोलत होते.”

“काही खरं नाही .जीके म्हणजे सापाची जात..आईला म्हणाव काही विश्वास ठेवु नकोस  ..”

“अग!  ऐक तर खरं..”

नंतर जीके खूप डबघाईला आले..धंदा बुडाला. देणी थकली.मुलीनं आत्महत्या केली.मुलगा विचारत नाही,.

सुन शिव्या देते…”

“मग..भोग म्हणाव कर्माची फळे आता..”

“त्याने एक प्रस्ताव आणलाय. दहा लाख रुपये मागतोय्  तो..सर्व रिकामं करुन निघुन जाणार आहे..”

“पण आई कुठून देणार दहा लाख?चोर..घुसखोर..वरुन आपणच पैसे द्यायचे? हा कुठला न्याय?”

“अजय म्हणतोय् ही प्राॅपर्टी आता कमर्शीयल एरीयात येते.विकली तर जबरदस्त किंमत येईल..आईही म्हणतेय्

तिच्याही आयुष्याची किती वर्षे राहिली आहेत.!

या कोर्ट कचेर्‍या किती वर्षे चालणार   ..सगळीच अनिश्चितता! अशा पद्धतीने जर मिटत असेल हे प्रकरण

तर संपवा हे सारं…”

मीना बरंच पटवत होती.

मला पटत होतं म्हणण्यापेक्षा वैचारिक बैठक बदलणं

क्रमप्राप्त होतं…

किंतु होतेच.

हे तरी कशावरुन खरे?

ही नवी फसवणुक कशावरुन नसेल..

आणि समजा नसली तर सत्याचा विजय झाला असे म्हणायचे का?जीकेला जे क्लेश भोगावे लागले ती त्याच्या गुन्ह्याची मिळालेली शिक्षा का?

मग कुठलाच गुन्हा न केलेल्या,संस्कृतीच्या नीतीच्या तत्वांच्या वर्तुळात असलेल्या आपल्याला ही इतकी वर्षे

मन:स्तापाची शिक्षा का झाली…?

पपा एकदा म्हणाले होते..”जीके माझा मागच्या जन्मीचा घेणेकरी आहे….”

तर्कशुद्ध मनाला नाही ना पटत…?

तरीपण म्हणावे लागते …”असेल..”

समाप्त

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घेणेकरी… भाग ३ ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ घेणेकरी… भाग ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

म्हणूनच मी दयाळकडे जायचं ठरवलं.

एकेकाळची आमची विशेष गट्टी.. नंतर आयुष्य बदलली .

वाटा वेगळ्या झाल्या. कळलेही नाही. एकेकाळचा मळक्या कपड्यातला, अर्धी चड्डी घालणारा ,गोट्या खेळणारा दयाळ एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष होतो काय, वेगवेगळ्या ऊलाढालीतून प्रचंड वृत्तपत्रीय प्रसिद्धी मिळवून एका  मोट्ठ्या जनसमुदायाचा विश्वासार्ह नेता होतो काय..सगळंच अकल्पित..!

कित्येक वर्षांनी मी त्या गल्लीत जात होते…आपलं जुनं बालपणीचं नंतर कुणालातरी विकलेलं घर या निमीत्ताने पहायला मिळेल याची सुप्त ओढही होती.

पण ती गल्ली, अवतीभवतीचा परिसर परिसर पूर्ण बदलला होता.ओळखीच्या काहीच खुणा ऊरल्या नव्हत्या. दयाळचे चाळवजा घरही पार बदललं होतं..

तिथे एक इमारत उभी राहिली होती.एका राजकीय पक्षाच्या कार्यालयाचा नवा दिमाखदार चेहरा त्याला लाभला होता.

 दयाळला मी बदलेल्या रुपात पाहण्याचा प्रयत्न करत होते!!

एका गोष्टीचं खूप समाधान वाटलं.दयाळनं मला चटकओळखलं.

निवांत वेळ दिला. बाळपणीच्या आठवणींनी दोघही मोहरलो…

मग म्हणाला,

“बोल आता काय सेवा करु तुझी?..”

मग मी त्याला माझ्या येण्याचा उद्देश सांगितला.

घडलेली सगळी घटना सविस्तरपणे कथन केली.

त्याने शांतपणे ऐकून घेतली.म्हणाला,

“पपांसारख्या व्यक्तिच्या बाबतीत असे घडायला नको होते.किती सच्च्या दिलाचे तत्वनिष्ठ सरळ रोखठोक!! खूप आदर आहे माझ्या मनात त्यांच्याबद्दल…”

“दयाळ यातून काही मार्ग निघेल का?”

“निघेल ना! जीकेसारख्या माणसाला समज देउन सर्वसामानासह रस्त्यावर आणणं तसं आम्हाला काहीच कठिण नाही..”

“मग कर ना तसेच…”

“हो! करुच ग तेही. पण थोडे दिवस जाउदेत. कोर्टात दाखल केलेली केस कुणाच्या न्यायालयात ऊभी राहते ते बघू. सगळे लोक आपल्या हातातले आहेत .निकाल आपल्याच बाजुने लागेल. नाहीतर अखेर आमचे मार्ग आहेतच. तू नको काळजी करूस. ही समस्या माझ्याच घरची…आता..”

दयाळकडुन परतताना मी थोडीशी “ना इथे ना तिथे.” या मन:स्थितीत होतेच….

दयाळचं अश्वासन मला आशावादी बनवत होतं!

खरं म्हणजे सरळ मार्गाने. खाचखळगे टाळून जगणारी आपण माणसं. गुंडगिरी, दादागिरी, दडपशाही हे काही आपल्या जगण्याचे घटक नाहीत.पण कुणीतरी आपल्यासाठी परस्पर हे करणार आहे आणि तेही केवळ आपल्या मैत्रीखातर या जाणीवेनं मला कुठेतरी सुरक्षित

वाटत होतं. दुनियेत टिकून रहायचं असेल तर कधीतरी हाही पर्याय स्वीकारावा लागतो असे स्वत:चीच समजुत घालणारे विचार मनात गर्दी करु लागले होते….

दयाळच्या भेटीचा सर्व वृत्तांत मी पपांना सांगितला.

त्यांची प्रतिक्रिया शून्य…

जीजी म्हणाली “याची जन्मी भोगेल तो…”

त्यानंतर मी वेळोवेळी दयाळला फोन केले. तो व्यस्तच असायचा. म्हणायचा “मी करतो तुला दहा मिनीटात फोन…”

दहा मिनीटांनी दयाळ कुठल्या मीटींगमधे अडकलेला असायचा.. नाहीतर एखाद्या खेड्यावर निघुन गेलेला असायचा. कुठे दंगली, मारामार्‍या राजकीय, पक्षीय पेच सोडवण्यात तो गुंतलेला असायचा.

आणि त्याने म्हटल्याप्रमाणे त्याने मानल्या प्रमाणे त्याची ही घरचीच समस्या सोडवायला त्याला वेळच नव्हता……….

लहानपणचा  गोट्या खेळणारा, मळक्या चड्डीतला माझ्याबरोबर कधी भांडणारा, कधी मजेत

भाजलेल्या  भुईमुगाच्या शेंगा खाणारा दयाळ आता बदलला होता… हे जाणवत होतं..

आपलं राजकारणातलं ज्ञान पेपर वाचण्यापूर्त..

प्रत्यक्षात एखादी राजकीय व्यक्ती खरोखरच जनतेसाठी किती असते.. किती खरी असते, किती  खोटी असते याचा अनुभवच नसतो….

क्रमश:….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घेणेकरी… भाग २ ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ घेणेकरी… भाग २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

मग आमच्या घरी एक वेगळीच वर्दळ सुरु झाली.काॅन्ट्रॅक्टर्स बिल्डर्स आर्कीटेक्ट्स,इंजीनीअर्स…

रात्रंदिवस पपा आणि जीके प्लॅन्स पाहुन चर्चा करीत.

एक रचनात्मक  कृतीचा आराखडा तयार झाला.

अडचणी समस्या होत्या .पण त्यावर मात करण्याच्या योजनाही होत्या…

पपा भराभर चेक्स फाडायचे.काॅन्ट्रॅक्टरने सबमीट केलेल्या बीलांवर सह्या करायचे.संदेह शंका आलीच तर त्यांची सडेतोड आणि समर्थनीय ऊत्तरे जीकेंकडे असायचीच.

सगळं काही सुरळीत योग्य पद्धतीने चालले होते.

उपक्रमाला हवा तसा आकारही आला होता.

कधीकधी पपांना काही गोष्टी स्वीकारताना जड जात होतं.पण जीके सांगतात ना मग ठीकच असणार..

एकदा रात्री जीकेंचा फोन आला.

“एक प्राॅब्लेम आलाय् .ए विंगच्या बांधकामाला म्युनिसीपालिटीने आॅब्जेक्शन घेतलय् .काही पाडावं लागेल.बरंच आर्थिक नुकसान होइल आपलं..बांधकामाची मेजरमेंट्स बदलतील.बुकींग झालंय् .अॅडव्हान्स घेतलेत.”

“अरे पण याला जबाबदार कोण?इंजीनीअर्स आर्कीटेक्ट यांना हे समजायला हवं होतं..”

“हे बघ,तू इतका एक्साईट होऊ नकोस. मार्ग काढु आपण..”

“कुठला मार्ग?”

“अरे वजन ठेवायचं.टाउन प्लॅनींगवाल्यांचा चुका काढण्यामागचा हेतुच हा असतो.तुला पटत नाहीत या गोष्टी.पण काही ईलाज नाही रे बाबा..जगात हेच चाललंय्…”

मग आंजारुन गोंजारुन जीके पपांचा गळ बरोबर पकडायचे..

जीजी म्हणायची “जीके सरळ नाहीय् लुच्चा लबाड आहे…”

पण पपा तिला सहज झटकायचे.मुळात आपल्याला कोण कशाला फसवेल?आणि तंत्र, कायदे, तरतुदी या सगळ्यांचा चौफेर विचार आपणही करतोच की..तेही जागरुकपणे .सज्ञानाने,फसवण्याचा प्रश्नच कुठे येतो?

शिवाय कुंपणच शेत खायला लागलं तर…!

पण कुंपणही शेत खातं..!!

कुठल्यातरी क्षणी आपल्याच चांगुलपणाचा, ठेवलेल्या विश्वासाचा फायदा घेउन आपल्याच माणसाने डोळ्यावर हात ठेवलेला असतो म्हणून आपण फसतो.

हे पपांना जेव्हां जाणवलं तेव्हां फार उशीर झाला होता.

आजकाल जीके प्रश्नांची ऊत्तरे नीट देत नाही ..

हिशेबाची उडवा उडवी करतो..

कागदपत्रं दाखवत नाही..

कायदेशीर बाबींचा पाठपुरावा केला तर त्याचे त्यावर भाष्यच नसते..

आजकाल तर तो  परस्परच निर्णय ,घेतो, अॅॅग्रीमेंटस करतो   ..

पपा खूप अस्वस्थ झाले…

अंतर पडले दर्‍या निर्माण झाल्या.

विश्वासाचे धागे तुटले…मूळातच ते धागे कच्चे होते..!रंग जाणारे होते,हे कळेपर्यंत काय आणि किती खर्ची झालं याचं गणित जेव्हां मनासमोर मांडलं गेलं तेव्हां प्रचंड

मानसिक धक्का बसला…

गणित चुकलं..

इतक्या मोठ्या प्राॅपर्टीचा घुसखोरीने ताबा घेउन जीकेने जेव्हां अत्यंत बेदरकार शब्दांत पपांना सांगितलं,”

“आज तरी तू माझं काही बिघडवू शकत नाही.मी घुसखोर आहे आणि ही प्राॅपर्टी तुझी आहे हे तुला कोर्टात पुराव्यानिशी सिद्ध करावं लागेल..”

पाठीत खंजीर खुपसला जणु..विश्वास ,मैत्रीचा डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा क्षणात कोसळला.संतापाचा रागाचा ज्वालामुखी तर भडकलाच पण त्याहीपेक्षा विश्वासघाताची वेदना अधिक तापदायक होती.जपलेल्या भावनांचा चक्काचुर झाला होता..

“अरे! तुझ्यावर मी विश्वास ठेवला,एक क्षणही आपल्याला एकमेकांशिवाय चैन पडत नव्हतं! किती क्षण किती सुखदु:खं आनंद एकत्र साजरी केली…

शेअर केली.हे सारं तू विसरलास?की नुसतं मैत्रीचं नाटक होतं ते?”

कशाचा काही उपयोग नव्हता.एखादा जमिनीतला झरा नाही का सुकून कोरडा ठणठणीत होत!! भावनेचा ओलावाच निघुन गेला..!

पपांना वेदना होती ती केवळ प्रचंड आर्थिक नुकसानाचीच नव्हती तर बिनदिक्कत डोळ्यात धूळ फेकून झालेल्या फसवणुकीमुळे त्यांच्या अस्मितेलाच ठेच पोहचली होती. आपल्यासारख्या जाणकार व्यक्तीला कुणी असा धोका देऊ शकतो हे धक्कादायक होते.

 त्यानंतर त्यांना जे अनुभव आले ते याहुनही त्रासदायक होते.

 कोर्ट,कायदा,केस,वकीलपत्र..पुरावे साक्षीदार..या सर्वांशी आता नव्याने ओळख व्हायची होती.

 राजे वकील म्हणजे पपांच्या बैठकीतले.

“ही केस तुच लढव ..!”असं हक्काने पपांनी त्यांना सांगितले.मात्र त्यांनी सरळ नकार न देता, मी तुला चांगला वकील देतो..जो अशा केसेस हाताळण्यात तरबेज आहे…”

 आणि मग हेही लक्षात यायला लागले की जीकेने सर्वच बाबींची किती विचारपूर्वक तयारी केली होती! साधारणपणे ज्या ज्या नामांकीत वकीलांकडे  पपा जाण्याची शक्यता होती त्या सर्वांना जीकेने आधीच विकत घेतले होते! पपांची विद्वत्ता, प्रतिष्ठा,समाजातील स्थान लौकिक याचा काहीही उपयोग झाला नाही…

पपांनी प्रेस मीटींगही घेतली.पत्रकार आलेही.चहा नाश्ता याचा आनंदे सुहास्य समाचार घेतला.घटनेचा विचारपूर्वक आढावा घेतला…अश्वासन देउन ते परतले.

जीकेचा गुन्हा उघडकीस येईल.त्याचा गवगवा होऊन निदान जीकेची बदनामी तर होईल..??

पण पेपर उघडला तेव्हां डोळेच फाटले.

फक्त चार ओळींचा बातमीवजा मजकूर..तोही संदिग्धपणे लिहिलेला.जीकेंच्या नावाचा उल्लेखही नाही.

आता हे प्रकरण न्यायालयात दाखल आहे ..इतकच..

क्रमश:….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घेणेकरी… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ घेणेकरी… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

ज्या कारणासाठी मी दयाळकडे जाण्याचे ठरवले तेव्हां अशा प्रकारच्या कामासाठी मला त्याच्याकडे जावं लागेल असं वाटलंही नव्हतं ..!!

पपांनी तर प्रथम विरोधच केला.त्यांचं म्हणणं,

“हा मार्ग आपला नव्हे. कायद्याने जे करायचं ते आपण करु.कायदा हातात घेणं हे आपल्यासारख्यांचे काम नाही. तो आपला पिंडच नव्हे. विलंब लागेल पण सत्य उघडकीस येईल. सत्याचा विजय कधी ना कधी होतोच.”

“कधी ना कधी म्हणजे कधी? संपूर्ण आयुष्य गेल्यावर? आणि हे बघा, दयाळ माझा बालमित्र आहे.गेल्या काही वर्षात खूप काही बदललं असलं तरी तो मैत्री विसरणार नाही. शिवाय तसा एकेकाळी तो आपल्या कुटुंबाशी ही जवळचा होता…!”

“कर तुला काय करायचे ते..”

पपा एकच वाक्य म्हणाले आणि माझ्यासमोरुन उठून गेले मला माहीत होतं ,हा मार्ग खोटे पणाचा धोक्याचाही आहे.

पण ज्या गोपाळकाकांना धडा शिकवण्यासाठी मी दयाळकडे जाणार होते त्यांनी तर आपल्याशी खोटेपणाच केला नं..?धोका दिला..धोक्याला धोक्यानेच ऊत्तर. हेच बरोबर.चांगुलपणा शिष्टाचार नीतीमत्ता यांच्या व्याख्या बदलल्यात.आपल्याला जर दुनियेत टिकायचं असेल तर आपणही आपले मार्ग बदलले पाहिजेत.

त्यामुळे पपांच्या विरोधाला न जुमानता मी दयाळची भेट घ्यायचं ठरवलं.

जी. के. म्हणजेच गोपाळकाका पपा त्यांना म्हणायचे, “अरे जी.के. म्हटलं की कसं रुबाबदार वाटतं. तू एव्हढा बिझनेसमन, पैसेवाला. हाय स्टेटसवाला, अनेक संस्थांचा अध्यक्ष… आणि गोपाळ काय? छे! हे नाव नाही शोभत तुला..

जीकेंचा आमच्या घरात कुटुंबीयासारखाच वावर असायचा.पपांना तर हरघडी त्यांची गरज वाटायची.

अगदी घरातल्या शुभकार्यापासून ते आजारपणं, इतर अडीअडचणी, समस्या, प्रवासाला निघायचं असेल तर त्याची तयारी करण्यापासून सर्व कामात पपांना जीके हवे असायचे, आणि तेही हजर  असायचे तत्परतेने..

अर्थात हे एकतर्फी नव्हतं. पपांचेही तितकेच त्यांच्यासाठी सहकार्य असायचे. दोघांच्यात सामंजस्य,विश्वास प्रेम मैत्री होती…!!

पण जीकेंचा आमच्या घरातला वावर ,त्यांची दोस्ती जीजीला मात्र खटकायची.जीके आले की तिची आतल्या खोलीत धुसफुस सुरु व्हायची. पण जीके मात्र जीजीला विचारायचे, “काय आज्जी कशा आहात..? बरं आहे ना सगळं.?”

जीजी मात्र म्हणायची,हो.बराय् ..बरं नसायला काय झालय?..”

पण ती पपांना नेहमी म्हणायची,

“या माणसापासुन सावध रहा बरं.. मला काही तो दिसतो तसा वाटत नाही..”

जीजीचं खास नेटवर्क होतं.ती घरातच असायची पण तिच्या फ्रेंडसर्कलमधे फळवाले भाजीवाले ,रानभाज्या घेउन येणारे कातकरी आदीवासी असत.ते घरोघरी जात.

त्यांच्याकडुन जीजीला आतल्या गोटातल्या बातम्या मिळत.जीकेंबद्दल बरेच वेडेवाकडे तिला कळले होते..

म्हणून ती पपांना वेळोवेळी सावध करायची. पण परिणामी सगळं शून्य ठरलं… पपांची पाचपाखाडीची प्राॅपर्टी डेवलप करण्याची कल्पना जीकेंचीच.

“एखादी सोसायटी बनवू. नाहीतर शाॅपींग काॅम्प्लेक्स.. खाजगी कार्यालय.. अरे तुझी ही जागा सोन्याचा तुकडा आहे…”

पपा म्हणायचे ,”मला आता काही व्याप वाढवायचा नाही बाबा..मला वेळही नाही ..माझ्या व्यवसायाचं काम वाढलय्..शिवाय आता नवीन काही झेपेल असं वाटत नाही…”

“अरे! ती काळजी सोड. मी आहे ना! माझ्याकडे माणसं आहेत. तयार टीम आहेत आणि सुटसुटीत योजना आहेत..”

नंतर जीके म्हणाले, “हे बघ शासकीय धोरणांचा काही भरोसा नाही.रस्तारुंदीकरणाचा प्रस्ताव आला तर नगरपालिकेचच आक्रमण व्हायचं.बांधकाम असलेली जागा तशी सुरक्षित असते!”

क्रमश:….

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा ‘ वळण ‘ – भाग – पाच ☆ श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ कथा ‘ वळण ‘ – भाग – पाच ☆ श्री आनंदहरी ☆

राधाबाईंना कुणाची तरी चाहूल लागली तसे त्यांनी पटकन कळशीतून ओंजळभर पाणी घेऊन चेहयावर हबकारा मारला. पदराने चेहरा पुसण्याच्या निमित्ताने डोळेही टिपले. कळशा उचलून घेतल्या आणि घरी परतण्यासाठी वळली.

” काय गं आज दुपारचे आलीस पाण्याला? “

” सकाळी पाणी थोडंचं न्हेलं होतं “

राधाबाई काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून उत्तर  देऊन झपाझप निघाल्या. जाताना त्यांनी पुन्हा एकदा  एखाद्या जिवलग मैत्रिणीचा निरोप घ्यावा अशा नजरेने पाणवठ्याकडे पाहिले.

कितीक सासुरवाशीणींचा सखा-सोबती असणारा, अंतरातील गुज जाणणारा, मनातील दुःख हलकं करणारा तो अबोल पाणवठा कितीतरी त्यांच्या मनात घर करून राहिला होता.

राधाबाईंना मनात त्या सून म्हणून घरात आल्या त्या दिवसांच्या आठवणी तरळून गेल्या. त्यांचं मन पाणवठ्यापाशी थबकून राहिले.

‘आता प्रत्येक घरात नळाचे पाणी येतंय, आजकालच्या सुनां खरंच दुर्दैवी. त्यांच्या जीवनात मनातलं दुःख हलकं करणारा कुठला आलाय पाणवठा आणि  भरू पाहणाऱ्या डोळ्यांना वाहू देऊन रितं करणारी कुठं आहे त्याची सोबत? मनातला ताण घालवणारा, व्यक्त भावनांची दुसरीकडे कुठेही वाच्यता न करता, टिंगल टवाळी न करता सारं काही स्वतःजवळ ठेवणारा अबोल जिवलग सोबती त्यांना कुठं आहे?’ 

राधाबाईंच्या मनात विचार आला आणि नकळत त्यांच्या मनात ऋतुजाबद्दल, त्यांच्या सुनेबद्दल कणव निर्माण झाली. आपण सासरी गेलो तेंव्हा आपल्याला कधी गप्पा माराव्याशा वाटल्या, काही बोलावसं वाटलं तर त्यासाठी,आपलं मन मोकळं करण्यासाठी, मनातल्या माहेरच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी  नणंदेसारखी जिवाभावाची मैत्रीण होती.सासूबाई किंवा कुणी काही बोलले तर मनातलं सांगायला, रितं व्हायला पाणवठ्यासारखा सोबती होता पण ऋतुजाने कुणाशी गुज करायचं? कुणाजवळ मन मोकळं करायचं? घरातच असणाऱ्या नळाजवळ?

राधाबाईंना आठवलं, मन रितं करून पांवठयावरून परतताना घराकडे जाताना एक वळण होते. त्या वळणापाशी जेव्हा त्या येत तेंव्हा त्या थबकत. वळल्यानंतर न दिसणाऱ्या पाणवठ्याकडे क्षणभर पहात, त्यावेळी त्या स्वतःच्याच मनाला निश्चयपूर्वक बजावत, ‘ आपण कधी आपल्या सुनेला तिच्या माहेरच्यांच नाव घेऊन असे टोचून बोलायचं नाही हं..कधीही नाही.’

हॉलमध्ये सोफ्यावर बसल्या बसल्या राधाबाईंच्या मनातील आठवणींनीची कुपी उघडली गेली होती. त्या त्यात रमून गेल्या होत्या. त्यांनी हळूहळू साऱ्या आठवणी परत कुपीत भरून ठेवल्या. मनातला पाणवठा हळूच कुपीत ठेवताना त्याकाळी पानवठयावरून येताना वळणावरून वळताना केलेला निश्चय त्यांनी केला ‘यापुढं ऋतुजाला तिच्या आईवडिलांचे, माहेरचं नाव घेऊन कधीच बोलायचं नाही. ‘ त्यांना खूप बरे वाटले. मन काहीसे निवांत झाले. त्यांनी जपाची माळ घेतली आणि शांत झालेल्या मनाने त्या जप करत बसल्या.

किचनमधून भांडे पडल्याचा आवाज ऐकू आला तशा जपाची माळ टीपॉयवर ठेवून राधाबाई उठल्या आणि झटकन किचनमध्ये गेल्या. दुपारचा चहा करायचा म्हणून गॅसवरून गरम दुधाचे भांडे उतरताना ऋतुजच्या हातून ते चिमट्यातून निसटून कट्ट्यावर पडले होते. साऱ्या कट्ट्यावरून दुधाचे ओघळ सिंकच्या दिशेने वाहू लागले होते. कट्ट्याजवळच्या ब भिंतीच्या टाईल्सवर दुधाचे काही शिंतोडे उडाले होते.

झाल्या चुकीची जाणीव होऊन ऋतुजाच्या डोळ्यांत पाणी आले होते. घाबरून जाऊन पडलेले भांडे गडबडीत उचलायचा प्रयत्न करायला गेलेल्या ऋतुजाच्या बोटांना जोराचा चटका बसला होता..

राधाबाईंना फक्त सांडलेले दूध दिसले.

त्या रागाने म्हणाल्या,

“अगं s अगं,हे काय? सांडलस सारे दूध?  व्यवस्थित काम करायचं वळणच लावले नाही तुला तुझ्या आईने, त्याला तू तरी काय करणार म्हणा? “

पाणवठ्याच्या वळणावरून ‘वळणं ‘ राधाबाईंना जमलंच नाही.

समाप्त

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा ‘ वळण ‘ – भाग – चार ☆ श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ कथा ‘ वळण ‘ – भाग – चार ☆ श्री आनंदहरी ☆

नणंद आणि राधाबाई गजग्याचा खेळात रमून गेल्या होत्या. नणंद तर एकदमच खुश झाली होती. घरातून परसदारी आलेल्या सासूबाईकडे राधाबाईंचे लक्षच गेले नाही. सासूबाई दोन क्षण खेळ पहात थांबल्या आणि पुढच्याच क्षणी त्यांनी रागात हाक मारली.

” सुनबाई ss !”

खेळता खेळता सासूबाईंची हाक आल्यावर राधाबाई दचकल्या.. हातात गोळा केलेले गजगे खाली टाकून चटकन उभ्याच राहिल्या.

” घरात पाण्याचा थेंब नाही आणि तू खेळत बसलीयस ?  ती एक लहान आहे पण तुला तरी कळायला हवं. तुझी तरी काय चूक म्हणा.. तुझ्या आई-वडिलांनी वळणच लावलं नाही म्हणल्यावर तू तरी काय करणार.. घरात काडीचं म्हणून लक्ष नाही..”

सासूबाई रागात म्हणाल्या आणि तिच्याकडे रागाने पहात वळून तणतणतच घरात निघून गेल्या. सासूबाईंच्या आवाजाने भानावर आलेल्या राधाबाई  सासूबाईंच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आश्चर्याने आणि दुःखाने पाहतच राहिल्या. डोळ्यांच्या कडात टचकन पाणी दाटलं. ‘ आजवर सासूबाई असे कधीच लागट, रागाने बोलल्या नव्हत्या … मग आजच कशाकाय बोलल्या?’

नणंदेलाही आईच्या बोलण्याचे आश्चर्य वाटत होते. आई सहसा अशी चिडून बोलत नाही हे तिला ठाऊक होते.. मग आजच ? आपल्यामुळे वहिनीला बोलणे खावे लागले याची अपराधी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती.

” वहिनी, माझ्यामुळे तुला आईचं बोलणं खावं लागलं. “

इवलंसं तोंड करून नणंद राधाबाईंना म्हणाली. तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं होतं. तिच्या पाठीवर हात ठेवून हसण्याचा प्रयत्न करीत राधाबाई म्हणाल्या,

” नाही गं, तसं काही नाही. अगं, आज पाणी जास्त खर्च झालंय .. पाणी आणायला हवं हे माझ्याच लक्षात नाही राहिलं. “

” चल, मी पण येते.. दोघी मिळून पटकन पाणी आणूया. “

” नको, तुझा अभ्यास राहिलाय करायचा.. तो कर.  मी आणते जाते पाणी. “

” वहिनी असे करूया, पाणी आणू पटकन मग करते ना मी अभ्यास.”

”  जा आधी बस अभ्यासाला नाहीतर आई तुला आणि मला दोघींनाही बोलतील…” 

हो- नाही करत नणंद गजग्यांची टोपली घेऊन घरात गेली.

नणंद पाठमोरी झाली तसे राधाबाईंच्या डोळ्यांत टचकन् पाणी आले. त्यांनी नणंदेसमोर मनाला घातलेला बांध फुटला होता. काही क्षण त्या तिथंच घराकडे पाठ करून उभ्या राहिल्या. डोळ्यांतून घळाघळा पाणी येत होते.

‘ भरल्या घरात तुला रडायला काय होतं गं ? ‘

लग्नाआधी लहानपणी कधितरी त्या रडत असताना पाठीत धपाटा घालून रागाने आई म्हणाली होती ते त्यांना आठवले. त्यांनी  पटकन डोळे पुसले. घरात जाऊन दोन कळशा घेतल्या आणि पाणी आणायला पाणवठ्यावर गेल्या.

पाणवठ्यावर  दुसरे कुणीच नाही याचे त्यांना खूपच बरे वाटले. त्या कळशा  बाजूला ठेवून तिथल्या दगडावर बसल्या. ‘ कधी नव्हे ते सासूबाई अशा कशा बोलल्या ? आपलं काय चुकले ? ‘ त्यांना सासूबाई आपल्याला बोलल्या यापेक्षा आपल्या आई-वडिलांना त्यांनी दूषणे दिली याचे जास्त दुःख होत होते. मनात परत तो प्रसंग पुन्हा जागा झाला आणि घरातून बाहेर पडताना आवरलेले अश्रू पुन्हा वाहू लागले.

काही वेळ त्या तशाच बसून राहिल्या होत्या. अचानक घरात पाणी नाही याची त्यांना आठवण झाली तशा त्या उठल्या. पाणवल्या डोळ्यांनीच त्यांनी काळशीला दोराचा फास लावला आणि आत सोडली. दुसरी कळशीही पाण्यात सोडून वर काढली. दोन्ही कळशा उचलून घेणार तेव्हा त्यांना जाणवले..कळशा तर अर्ध्यामुर्ध्याच भरल्यात. आपल्याच नादात राहिल्याने  कळशा पूर्ण भरायच्याआधीच आपण वर काढल्यात हे ध्यानात येताच एक कळशी दुसऱ्या कळशीत ओतून ती भरून घेतली आणि रिकामी कळशी परत सोडून भरून घेतली. दुःखाचा उमाळा काही वेळाने ओसरला. त्यांनी स्वतःला सावरले तरीही

‘सासूबाई आज अचानक असे कसे बोलल्या ?’ हा प्रश्न काही त्यांच्या मनातून जात नव्हता.

क्रमशः….

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print