मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कुलूप… ☆ सौ.प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

? जीवनरंग ?

☆ कुलूप… ☆ सौ.प्रभा हर्षे

आज नाना अगदी खुशीत होते. सकाळच्या प्रसन्न हवेत मित्रांसोबत छान चालणं झालं,  अण्णाकडे इडली चटणीच्या नाष्ट्याबरोबर चहा  झाला, रोजच्या सारखा सुहास ही भेटला आणि आता नाना घरी यायला निघाले .. …. नाही, जरा चुकलंच ..  नाना मेधाच्या घराकडे निघाले.

आपल्या घराकडे बघत बघतच नाना पुढच्या बिल्डिंगमध्ये शिरले. खरं तर स्वतःचं घर सोडून मुलीच्या घरी रहायला येताना नानांना अगदी कसनुसं झालं होतं .. अपरध्यासारखं वाटत होतं.  पण केतनने आपल्या समंजस वागण्याने त्यांचा संकोच दूर केला. केतन म्हणजे नानांचा लाडका जावई. 

नाना फिरून परत आले तेव्हा केतन दारातच उभा होता

“ बरं  झालं नाना आलात ते, मी आता कुलूपच लावत होतो, तुम्ही दिसलात म्हणून थांबलो. बरं .. विजूताई येऊन गेल्या आहेत. सगळा स्वयंपाक तयार आहे. तुम्ही वेळेवर जेवून घ्या काय ! मला परत यायला नऊ  तरी नक्की वाजतील, तसं मेधाला सांगा प्लीज ..” ..  केतन भराभरा सर्व गोष्टी सांगत होता.

“ हो, नक्की सांगतो. आणि तू सावकाश जा, पळू नको ! “  नाना हसतच म्हणाले व जवळच्याच खुर्चीवर विसावले. आता तासभर पेपर वाचन, जमलं तर एक डुलकी ! आणि  मगच अंघोळ व देवपूजा  !

का कोण जाणे पण आज अचानक नानांना नानींची फार आठवण येत होती.. पुढच्या महिन्यात  नानींना जाऊन चार वर्षे होतील. सुहासचे, नानांच्या मुलाचे लग्न त्या असतांनाच झाले होते. एक गोड नातही झाली होती या आजी-आबांना. तिच्या लडिवाळ सहवासात दोघांचे निवृत्त आयुष्य छान रमले होते. पण …. पण तिच्या दुसऱ्या  वाढदिवसाच्यानंतर नानी अचानक हार्ट फेलने गेल्या.  नाना फार फार एकटे पडले. 

मुलगा सुहास आणि सून प्रिया .. दोघांचेही रुटीन लवकरच पूर्ववत झाले… पण नाना ? …. नानी गेल्या होत्या त्यांना एकटं सोडून. बाकी सगळं तसंच होतं, पण प्रेमाचा ओलावा मात्र बघता बघता सुकून गेला होता. त्यांची सून -प्रिया फार तापट होती. तिला राग अजिबात आवरत नसे.. आणि रागाच्या भरात  एकदा बोलायला लागली की समोरच्याचा मुळी विचारच करत नसे. नानी होत्या तेव्हा न बोलता सगळं सावरून घेत होत्या .. आणि आता त्या नव्हत्या.  बारीक सारीक गोष्टीवरून घरात कूरकूर सुरु झाली . 

एक दिवस अशीच तिची विनाकारण चाललेली चिडचिड मेधाच्या कानावर पडली.                 

“का आणि कुणावर इतकी रागवली आहेस प्रिया ?”  नानांना भेटायला आलेल्या मेधाने प्रेमाने विचारले.

“काय सांगू आता ? माझं नशीबच असं. सगळा त्रास फक्त मला एकटीला होतो, चिडू नको तर काय करु ?? “ एवढंच बोलून तणतणत प्रिया तिच्या रूममध्ये निघून गेली.  

प्रियाचं ते तिरकस बोलणं ऐकून नाना बेचैन झालेले मेधाच्या लक्षात आले . काहीतरी निश्चित विचार करून समजुतीच्या स्वरात ती नानांना म्हणाली, “ नाना, लहानपणी तुम्ही नेहेमी अगदी अभिमानाने म्हणायचात ना की माझ्यासाठी माझा मुलगा आणि मुलगी यात काही फरक नाही म्हणून… मग आता ते आचरणात आणून दाखवा बघू .. “ — काही न कळून नाना तिच्याकडे बघायला लागले.

“मी काय म्हणते नाना, तुम्ही आमच्याकडे रहायला चला. खरं सांगू का .. तुमचा नातू होस्टेलवर गेल्यापासून आमचं घर अगदी रिकामं रिकामं वाटायला लागलंय.. कंटाळवाणं वाटायला लागलं आहे. केतन तर गप्प गप्पच असतो बऱ्याचदा. तुम्ही आमच्याकडे राहायला आलात ना तर घरात जरा जान येईल. आमच्या. आणि हो, मलाही तुमचा सहवास लाभेल .. जरा सोबत होईल. चला ना नाना ! इतका विचार करण्यासारखं काय आहे यात ? “  

नानांनाही थोडा बदल हवा होता. सुनेची सततची चिडचिड नकोशी वाटत होती. पण म्हणून असं मुलीकडे रहायला जायचं ? नानांचा पाय घरातून निघत नव्हता.. काही झालं तरी नानीच्या असंख्य आठवणी होत्या त्या घरात .. काय करावं हे त्यांना कळत नव्हतं. पण मेधाचा तो अगदी मनापासूनचा आग्रहही त्यांना मोडावासा वाटत नव्हता. मनाला नकळत दिलासा वाटायला लागला होता. 

पण मेधा तिच्या प्रस्तावावर ठाम होती. तिने त्यासाठी प्रियाची मूक संमती मिळवली व लगेच नानांची बॅग भरली.  केतन .. तिचा नवरा .. तो तर आधीपासूनच नानांचा लाडका विद्यार्थी होता ! अत्यंत हुषार, नम्र, आणि महत्वाचं म्हणजे माणसं जपणारा ! नाना आपल्या घरी रहायला येणार या विचारानेच  त्यालाही फार आनंद झाला.

मेधा आणि सुहास दोघांचेही फ्लॅट्स शेजारशेजारच्या बिल्डिंगमध्ये होते. त्यामुळे नानांच्या रोजच्या सकाळ संध्याकाळ मित्रांच्या कट्ट्यावर जाऊन गप्पा मारणे या कार्यक्रमातही  काही बदल झाला नाही. सकाळी फिरायला व संध्याकाळी बागेत नानांचा वेळ छान जात असे.

आता त्यांचे आयुष्य बरेच स्थिरावले होते. दिवस आनंदात .. निवांतपणे जात होते.  पण एक दिवस अचानक संध्याकाळी घाबऱ्या घाबऱ्या सुहास मेधाकडे आला आणि घाईघाईने त्यांना म्हणायला लागला ..

“ नाना, आत्ताच्या आत्ता घरी चला ! “

“ अरे हो , पण झाले काय ? आधी इथे बस बघू जरा.. आणि प्रिया ..  छकुली .. त्या दोघी कुठे आहेत ? “

सुहासचा आवाज ऐकून मेधाही लगेच बाहेर आली.

“ ताई, अगं बघ ना हे काय झालंय ! “

सुहास अगदी रडवेला झाला होता. तितक्यात प्रिया व छकुलीही तिथे आल्या. मेधाच्या गळ्यात पडून प्रिया एकदम रडायलाच लागली. नानांना पाहून छकुलीने धावत जाऊन त्यांच्या गळ्याला घट्ट मिठी मारली.

नाना दिग्मूढ होऊन पहात राहिले होते. सुहास खाली मान घालून  गप्प बसला होता. नेमकं काय झालं होतं  हे कळतच नव्हतं त्यांना. काही क्षण असेच असह्य शांततेत गेले.

मग आधी हळूहळू प्रिया शांत झाली.  नानांच्या जवळ जाऊन बसली .. रडवेल्या आवाजात त्यांना म्हणाली .. “ नाना, मला माफ करा. मी चुकले. त्यादिवशी मी खूप रागावले. फक्त त्यादिवशीच नाही – बरेचदा अशीच वागते मी. पण काय करू? राग आला की माझ्या मेंदूचे आणि जिभेचे कनेक्शन सुटूनच जाते, मी तोंडाला येईल ते वाट्टेल तसे बोलते. त्या दिवशी मी तुम्हाला उद्देशूनच म्हणाले होते की ‘ जिवंत कुलूप आहेत नुसते, फक्त दाराला लटकत राहायचं , बाकी काही काम करायचं नाही.’ .पण नाना माझं फार फार चुकत होतं. मी हे विसरले होते की बाकी काही नाही तरी आहे ते राखण्याचे काम हे जिवंत कुलूप उत्तम तऱ्हेने करत असते.. म्हणजे …. म्हणजे  इतके दिवस छकुलीला तुमच्यावर सोडून मी निर्धास्त फिरत होते.  मला असंच वाटायचं की मलाच एकटीला सगळं काम पडतं. कुणीच मला जरासाही हातभार लावत नाही. पण माझ्या हे लक्षात येत नव्हतं की तुम्ही घरातले काम केले नाहीत तरी छकुलीला संभाळण्याचे मोठे काम करत होतात ! आणि तेही अत्यंत मनापासून आणि प्रेमाने ! हे मी कधी लक्षातच घेतले नाही. तुमच्या या मोलाच्या मदतीचे महत्व कधीच माझ्या लक्षात आले नाही नाना. पण त्यासाठी मी मनापासून तुमची माफी मागते. तुम्ही परत आपल्या घरी चला. पुन्हा मी कधीच अशी चिडचिड करणार नाही . मी माझा स्वभाव बदलायचा प्रयत्न करीन .. अगदी नक्की आणि मनापासून. परत मी अशी इतकी चिडले तर तुम्ही माझा कान धरा, पण असं घर सोडून जाऊ नका ना नाना “ ..  प्रिया खरंच अगदी काकुळतीला येऊन बोलत होती.

“अग ,पण झालंय काय , ते तर सांगशील ? “

“तसं झालं नाही काही, पण होऊ शकलं असतं.. अगदी होता होता बचावली छकुली आणि आम्हीही . “   

“अगं आधी शांत हो आणि नीट सांग बघू .. काय झालंय ते “

“काय झालं, मी नेहेमीसारखी खाली भाजी आणायला गेले होते. छकुली घराच्या दारापाशी बसून खेळत होती. दार उघडंच होतं…  मी लगेचच परत येणार होते ना. पण दार उघडं आणि घरात छकुली एकटी .. हे बघून शेजाऱ्यांचा पेपरचे बिल मागायला आलेला मुलगा आपल्या घरात शिरला व त्याने दार लावून घेतले.
छकुलीला उचलून पलंगावर ठेवतच होता तो.. पण तितक्यात मी दार उघडून आत गेले. नशिबाने मी ल्याचची किल्ली घेऊन गेले होते..  दार उघडून मी आत शिरले..  पाहिले तर हा प्रकार ! मी छकुलीकडे धाव घेतली, पण तेवढ्यात तो पळून गेला. मी त्याला ओळखते. पण नाना, छकुली खूप घाबरली आहे ! ‘ आई, त्या काकाने असं का केलं मला ‘  असं सारखे विचारते आहे ! आता मी तिला काय सांगू ? “

प्रिया परत रडायला लागली . मेधाने तिला जरा शांत केले आणि म्हणाली .. “ अगं प्रिया, नानांना घरातल्या कामाची सवय नाहीये. शाळेची नोकरी, ट्युशनस् आणि त्यांचे सोशल वर्क यामुळे ते सतत बाहेर असत. घरातले सगळे काम आईच करायची, आम्ही पण मदत करायचो. पण आता आई नाहीये.  तू जर नानांना सांगितलस ना की ‘ नाना जरा हे काम करता का ? ‘  तर ते नाही म्हणणार नाहीत. त्यांना आपणहून काही सुचत नाही गं. हे लक्षात घे, त्यांना  थोडे संभाळून घे, बघ मग .. सगळं व्यवस्थित होईल. नको रडूस. “

नानांनी काहीच न बोलता आपली बॅग भरली व छकुलीचा हात धरून नाना त्यांच्या घरी परत निघाले…   पण नानांच्या मनातून या चार महिन्यांमधल्या आठवणी काही जात नव्हत्या. राहून राहून ते विचार करत होते  ‘ तेव्हा आपलं काय चुकलं होतं — आणि आज आपण परत त्या घरी चाललो आहोत हे तरी नक्की बरोबर आहे का ? त्या घरात आता आपलं नक्की स्थान काय असणार आहे ?  खरोखरच आपण फक्त एक कुलूप असणार आहोत का ? लोखंडासारखं निपचित लटकत रहाणारं एक जिवंत कुलुप?‘ 

सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ किंमत – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ किंमत – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(नशिबाने शेठजींना दुसरा माणूस मिळाला.पण तो चार हजार पगारावर अडून बसला.शेवटी राजूशेठना त्याचं ऐकावं लागलं.येत्या सोमवारपासून तो कामावर येणार होता.) – इथून पुढे 

सोमवार उजाडला.शेठजी दुकानात आले.अजून ग्राहकांची वर्दळ सुरु व्हायची होती.प्रदीपला दुकानात पाहून त्यांना आश्चर्य वाटलं

“काय रे विचार बदलला की काय तुझा?”

प्रदीप हसून म्हणाला

“नाही शेठजी.या नवीन दादांना काम समजावून सांगायला आणि सगळ्यांना शेवटचं भेटून घ्यायला आलोय”

“बरं बरं” 

प्रदीप आणि तो नवीन माणूस आत गेला.शेठजी खुर्चीवर बसत नाही तो एक आलिशान कार दुकानासमोर उभी राहिली.आजची सकाळ एका दांडग्या ग्राहकाने सुरु होणार याचा शेठजींना आनंद झाला.

” बोला साहेब “ती व्यक्ती आत आल्यावर शेठजी म्हणाले

” प्रदीपला घ्यायला आलोय”

शेठजींनी एकदा कारकडे पाहिलं.एका मामुली सफाईकामगाराला घेण्यासाठी हा देखणा माणूस एवढी आलिशान कार घेऊन यावा याचं त्यांना आश्चर्य वाटलं.या माणसाकडे तर प्रदीप कामाला लागला नाही?

“प्रदीप कोण आपला?”त्यांनी साशंक मनाने विचारलं

” प्रदीप मुलगा आहे माझा”

“काय्यsssप्रदीप तुमचा मुलगा?”

तेवढ्यात प्रदीप बाहेर आला.आल्याआल्या त्याने वेगाने धावत जाऊन त्या माणसाला मिठी मारली

” पप्पाsss” असं त्याने म्हणताच 

त्या माणसाने त्याला मिठीत घेतलं आणि तो ढसाढसा रडू लागला.सगळे सेल्समन,नोकर जमा झाले.प्रदीपही रडत होता.हे काय गौडबंगाल आहे हे कुणाला कळेना.थोडा वेळाने प्रदीप जरा बाजुला झाला तसा तो माणूस म्हणाला.

” शेठजी मी ओंकारनाथ.माझी धुळ्यात चटईची फँक्टरी आहे.दोन इंडस्ट्रीयल वर्कशाँप आहेत.अगोदर मीही एक कामगार होतो.मेहनतीने आणि देवक्रुपेने फँक्टरीचा मालक झालो.मी गरीबी पाहिली आहे.कित्येक दिवस उपाशी राहून आयुष्य काढलं आहे.पण आमची मुलं तोंडात चांदीचा चमचा घेऊन आली आहेत.त्यांना पैशाची,श्रमाची,माणसांची किंमत नाही.हा माझा अति लाडावलेला मुलगा माझ्या फँक्टरीत यायचा.तिथल्या कामगारांवर रुबाब करायचा.लहानमोठा बघायचा नाही.वाटेल ते बोलायचा.माझ्या कानावर आलं होतं पण एकूलत्या एक मुलावरच्या प्रेमापोटी मी चुप बसायचो.एक दिवस त्याने लिमीट क्राँस केली. आमच्या सफाई कामगाराला वाँशरुम नीट साफ केलं नाही म्हणून सगळ्या कामगारांसमोर शिव्या दिल्या.साठी उलटलेला तो माणूस.त्याच्या मनाला ते लागलं.तो माझ्याकडे रडत आला आणि “माझा हिशोब करुन टाका.मला आता इथे रहायचं नाही “असं म्हणू लागला.माझं डोकं सरकलं.मी याला बोलावलं.म्हाताऱ्याची माफी मागायला लावली तर हा आपल्या मस्तीत.सरळ माफी मागणार नाही म्हणाला.मी उठून त्याच्या मुस्काटात मारली आणि त्याला म्हणालो की तुझ्यात एवढी मग्रुरी आहे ना तर तू मला महिनाभर सफाईचं काम करुनच दाखव.त्याने माझं चँलेंज स्विकारलं पण आपल्याच फँक्टरीत सफाई करण्याची त्याला लाज वाटत होती.मला म्हणाला मी जळगांवला जातो आणि तिथे काम पहातो.मीही संतापात होतो म्हणालो तू कुठेही जा.पण हेच काम करायचं आणि महिन्याने मला सांगायचं कसं वाटतं ते!त्याचा एक गरीब शाळकरी मित्र जळगांवच्या समता नगरात रहातो.त्याच्याकडे तो आला.तुमच्या दुकानात कामाला लागला.मला फोन करुन त्याने हे सांगितलं. मला वाईट वाटलं.शेवटी बापाचं मन ते.पण म्हंटलं उतरु द्या याची मस्ती.अशीही त्याला सुटीच होती.रिकाम्या टवाळक्या करण्यापेक्षा आयुष्य किती खडतर आहे हे तरी शिकेल.म्हणून मी काहीही चौकशी केली नाही.मागच्या आठवड्यात त्याचा फोन आला खुप रडला.म्हणाला ‘मी आता खुप सुधारलो आहे.मी आठवड्याने परत येतो घरी’ मी म्हंटलं ‘मीच येतो.बघतो तुझं दुकान आणि तू कायकाय काम करत होतास ते’ म्हणून आज मी ते बघायला आणि त्याला घ्यायला आलोय”

राजूशेठ ते ऐकून अवाक झाले. म्हणाले

” तरीच मला वाटत होतं की हा मुलगा सफाईच्या कामाला योग्य नाहिये.पण हा काम तर छान करत होता”

प्रदीप हसला

“नाही शेठजी.मला सुरवातीला काम जमत नव्हतं पण या सगळ्या काकांनी मला खुप मदत केली.मी डबा आणत नव्हतो कारण मित्राची आई खरंच आजारी असायची पण महिनाभर यांनी त्यांच्या घासातला घास मला भरवला.माझ्याकडून खुप चुका व्हायच्या पण ते माझ्यावर कधी रागावले नाहीत.मला त्यांनी खुप सांभाळून घेतलं”

प्रदीप परत रडायला लागला तसं भास्करने त्याला जवळ घेतलं.

“अरे बेटा आपण सगळेच पोटापाण्यासाठी नोकरी करतो ना?मग आपण एकमेकांना सांभाळून घ्यायला नको?”

” हो काका.पण मला हे समजत नव्हतं.आता ते कळायला लागलं.पप्पा तुम्ही मला म्हणत होते ना की मला पैशाची, श्रमांची किंमत नाही म्हणून.मला इथं आल्यावर मेहनतीची ,पैशांची,माणसांची,अन्नाची सगळ्यांची किंमत कळायला लागलीये.पप्पा शेठजींची तीन मोठी दुकानं आहेत जळगांवात, पण त्यांना कसलाही गर्व नाही.ते कुणाशीच कधीही वाईट वागले नाहीत.कारण त्यांना माणसाच्या कष्टाची जाणीव आहे.त्यांच्या घरी काहीही कार्यक्रम झाला की ते दुकानात सगळ्यांना मिठाई वाटायचे.कधीही गरीब -श्रीमंत असा भेदभाव त्यांनी केला नाही “

“बेटा हेच मला हवं होतं.तुला ते शेवटी कळलं यातच मला समाधान वाटतंय” 

” चला साहेब तुम्हांला दुकान दाखवतो” राजूशेठ प्रदीपच्या वडिलांना म्हणाले “आणि भास्कर जरा सगळ्यांसाठी मिठाई घेऊन यायला सांग.आज एक बिघडलेला मुलगा माणसात आलाय याचा मलाही खुप आनंद होतोय” 

ते तीन मजली भव्य दुकान पाहून प्रदीपच्या वडिलांना प्रदीपच्या मेहनतीची कल्पना आली.त्यांचे डोळे भरुन आले.आलेली मिठाई खाऊन झाल्यावर ते म्हणाले.

“चला मंडळी.आता निघायची वेळ आली.तुम्ही सर्वांनी माझ्या या नाठाळ मुलाला सांभाळून घेतलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.आणि हो पुढच्या महिन्यात प्रदीपचा वाढदिवस आहे.तुम्ही सगळ्यांनी धुळ्याला पार्टीला जरुर यायचं आहे.गाडी करुनच या सगळे.खर्चाची काळजी करु नका.गाडीचा खर्च मी करेन.”

प्रदीप उठला .सगळ्या सेल्समन आणि नोकरांच्या पाया पडला.मग शेठजींकडे आला तसं शेठजी त्याला जवळ घेऊन म्हणाले

“बेटा तुझ्या वडिलांनी आणि तु ही नव्या पिढिसाठी एक आदर्श घालून दिलाय”

प्रदीप आणि त्याचे वडील गाडीत जाऊन बसले तसे सर्वजण त्यांना निरोप द्यायला बाहेर आले.गाडी निघाली.निरोपाचे हात हलले.

प्रत्येकजण आत येऊन आपापल्या कामाला लागला.शेठजींना काऊंटरवर  बसल्यावर आपल्या अशाच बिघडलेल्या मुलाची आठवण झाली. सध्या तो पुण्यात इंजीनियरींग करत होता.तो करत असलेले रंगढंग,त्याला लागलेली व्यसनं त्यांच्या कानावर आली होती.त्याला सुधारण्यासाठी प्रदीपसारखं काही करता येईल का याच्या विचारात ते गढून गेले.

– समाप्त – 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ किंमत – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ मुलगी – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

      “दुकानात सफाई कामासाठी त्वरीत मुलगा पाहिजे” अशी पाटी वाचून तो दुकानात शिरायला लागला तसं सिक्युरिटी गार्डने त्याला अडवलं. “काय पाहिजे?”

      त्याने शांततेने बोर्डाकडे बोट दाखवलं. गार्ड समजला. आत हात दाखवून म्हणाला “राजू शेठ समोरच बसलेत त्यांना भेटून घे.”

      अस्वस्थ मनाने तो आत शिरला. समोरच काऊंटरवर राजूशेठ कस्टमरकडून पैसे घेण्यात गुंतले होते. कस्टमर गेल्यावर त्यांची नजर त्याच्यावर पडली. “बोला..”

       “ते… तुम्हांला सफाई कामासाठी मुलगा पाहिजे आहे ना?”

        “हो. तू करणार आहेस का?”

त्याने मान डोलावली. राजूशेठने त्याच्याकडे निरखून पाहिलं. पंधरासोळा वर्षाचा गोरागोमटा स्मार्ट मुलगा. कपडे मात्र साधारण होते. दुकानाच्या सफाईसाठी योग्य आहे असं त्यांना वाटेना. “तुझं नांव?”

“प्रदीप”

“वडील काय करतात?”

“रिक्षा चालवतात”

“कुठे रहातोस?”

“समता नगर”

“ठिक आहे .तीन हजार देऊ तुला महिन्याला.खाडे करायचे नाहीत.खाड्याचे पैसे आम्ही कापून घेतो”

” हो चालेल “

तेवढ्यात ग्राहक आल्यामुळे राजशेठ ओरडून म्हणाले “अरे भास्कर. याला दुकान दाखवून दे.काम समजावून सांग”

भास्कर आला.त्याने प्रदीपला ते तीन मजली दुकान फिरुन  दाखवलं

” तुला सकाळी आठ वाजताच यावं लागेल.फ्लोरींग, काचेची कपाटं,काऊंटर्स,वाँशरुम सगळं साफ करावं लागेल.हे कपड्याचं दुकान आहे.इथे थोडीही धुळ चालत नाही. ग्राहक येतांना धुळ घेऊन येतात.त्यामुळे वारंवार झाडू मारणं,कपड्याने पुसणं करावं लागतं.रात्री आठनंतरच तुला घरी जाता येईल”

प्रदीपने मान डोलावली.

“जा आता.सकाळी आठ वाजताच ये”

प्रदीप गेला.त्याला जातांना पाहून राजूशेठला परत एकदा तो सफाईकामाला योग्य नाही असंच वाटून गेलं.”ठिक आहे.पाहू दोनचार दिवस.नाही पटला तर हाकलून देऊ” ते मनाशीच बोलले.

प्रदीप दुसऱ्या दिवशी आला.त्याने काम करायला सुरुवात केली पण त्याने कधीच सफाईचं काम केलेलं नाही हे त्याच्यासोबत आलेल्या नोकरांच्या लक्षात आलं.ते त्याला वारंवार सुचना देऊ लागले.दहा वाजले.दुकान उघडण्याची वेळ आली तरी त्याची सफाई झाली नव्हती.ते तरी बरं शेठ अकरा वाजता यायचे.नाहीतर त्यांनी प्रदीपला फाडून खाल्लं असतं.दुकान सुरु झालं.साडेअकराला भास्कर वाँशरुमकडे जायला निघाला तर वाँशरुमच्या दाराजवळ बसून प्रदीप रडत होता.

“काय रे काय झालं?का रडतोय?”

“नाही.काही नाही” प्रदीपने डोळे पुसले

” तुला काम जमत नाही असं मनोज सांगत होता.कधी काम केलं नाही वाटतं?”

“नाही”

“गरीबी वाईट असते बाबा.काहीही कामं करायला लावते.जमेल जमेल.तीन चार दिवस हाल होतील.मग सवय होऊन जाईल.काही रडू नको.घरी कोण काम करतं?”

” आई आणि बहिण”

” तरीच.कळलं ना कसा त्रास होतो ते?”

प्रदीपने मान डोलावली.

दुपारी भास्कर कस्टमर नाही असं पाहून जेवायला बसला त्याचं लक्ष प्रदीपकडे गेलं.

” काय रे जेवायचं नाही का?”

प्रदीपने नकारार्थी मान हलवली.

“का?डबा नाही आणला का?”

” नाही”

” ये मग इकडे.आपण दोघंही जेवू”

” नको.मला भुक नाहिये”

“अशी कशी भुक नाही.सकाळपासून काम करतोय.चल मुकाट्याने ये खायला”

तेवढ्यात दोन सेल्समनही डबा घेऊन आले.प्रदिपचा डबा नाही हे पाहून त्यांनी दोन दोन पोळ्या आणि भाजी प्रदिपला एका ताटलीत काढून दिल्या.भुक नाही म्हणणाऱ्या प्रदीपने पाच पोळ्या खाल्ल्या.

“उद्यापासून डबा आणत जा.काय!” भास्करने दम भरला.

“ते…आई आजारी असते त्यामुळे आणता येत नाही”

तिघा सेल्समननी एकमेकांकडे पाहिलं.एक जण म्हणाला

” काळजी करु नको.आम्ही आणत जाऊ तुझ्यासाठी पण”

प्रदीप काही बोलला नाही.

चारपाच दिवस प्रदीपला काम जमत नाहिये हे पाहून बाकीच्या सेल्समननी त्याला बरीच मदत केली .कुणी काऊंटर पुसून घेतले ,कुणी काचेची कपाटं साफ केली,तर कुणी पंखे,लाईटस्.आठवडाभरात प्रदिपला बऱ्यापैकी काम जमायला लागलं.पण बाकीच्यांनी मदत करणं सोडलं नाही. राजूशेठला ही गोष्ट माहित नव्हती त्यामुळे प्रदीपच्या कामावर ते समाधानी होते.भास्करला त्यांनी दोनतीनदा त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा भास्कर म्हणाला “चांगला आहे पोरगा कामाला.मेहनती आहे “

लग्नाचा सिझन होता.ग्राहकांची वर्दळ प्रचंड वाढली.प्रदीपचं कामही वाढलं.वारंवार दुकान झाडणं,पुसणं यात दिवस कसा निघून जायचा कळायचं नाही.पंधरा दिवस झाले आणि अबोल प्रदीप दुकानात रुळला.आता तो मोकळेपणाने बोलत होता.फुरसत असली की तो सेल्समनना मदत करायचा.ढिगाने पडलेल्या साड्या,बेडशीट्सच्या घड्या करुन ठेवायचा.ग्राहकांना पसंत न पडलेले रेडिमेड कपडे बाँक्सेसमध्ये व्यवस्थित पँक करुन ठेवायचा.महिना झाला.राजूशेठने प्रदीपच्या हातात तीन हजार ठेवले तेव्हा त्यांना प्रदिपचे डोळे भरुन आल्याचं जाणवलं.

” काय रे काय झालं?”

” काही नाही. पहिला पगार आहे ना म्हणून…”

“अच्छा..”

त्याने डोळे पुसले.शेठजींना आठवलं या महिन्यात प्रदिपने एकही दिवस खाडा केला नव्हता.उलट सिझनमुळे कधी रविवारीही दुकान सुरु असायचं तेव्हा तो स्वतःहून दुकानात येऊन काम करायचा.त्याच्या कामावर खुश होऊन राजूशेठने त्याचा पगार चार हजार करायचं ठरवलं.

सोमवार उजाडला.राजूशेठ दुकानात आले.देवांच्या फोटोंची पुजा करुन ते कँशकाऊंटरवर बसत नाही तोच प्रदीप त्यांच्याकडे आला.नमस्कार करुन म्हणाला

“शेठजी माझे बारावीचे क्लासेस पुढच्या आठवड्यापासून सुरु होताहेत तर मी हा आठवडाभरच काम करु शकणार आहे”

शेठजींना धक्का बसला.

“अरे पण तू दुकानात काम करुनही क्लासेस करु शकतो.संध्याकाळी लवकर सोडत जाऊ आपण तुला”

“नाही शेठजी.क्लासेस सकाळी आणि संध्याकाळीही असतात”

आता मात्र शेठजी रागावले.आता पुन्हा दुकानाच्या सफाईसाठी मुलगा बघणं आलं.याच गोष्टीचा त्यांना तिटकारा होता.एकतर माणसं मिळायची नाहीत. मिळाली तरी पैसा देऊनही टिकायची नाही.

“तुला असं एकच महिना काम करायचं होतं तर तसं बोलला का नाहीस?आता या आठदहा दिवसाचा पगार तुला मिळणार नाही” ते रागावून म्हणाले

प्रदीप हसला

“काही हरकत नाही शेठजी”

शेठजींना आश्चर्य वाटलं.एक एक दिवसाच्या पगारासाठी भांडणारी,खाड्याचे पैसे कापले म्हणून वादविवाद घालणारी माणसं त्यांनी बघितली होती.या पोराने तर सहजगत्या त्यावर पाणी सोडलं होतं.नाहीतरी आजकालच्या तरुण पोरांना पैशाची किंमत असतेच कुठे!

नशिबाने शेठजींना दुसरा माणूस मिळाला.पण तो चार हजार पगारावर अडून बसला.शेवटी राजूशेठना त्याचं ऐकावं लागलं.येत्या सोमवारपासून तो कामावर येणार होता.

– क्रमशः भाग पहिला  

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एस ए ग्रुप… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ एस ए ग्रुप … – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(संगीता आपल्या मावसभावाच्या संपर्कात होती, ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये पोचायच्या आधी प्रणिताचा बेड तयार होता.) – इथून पुढे — 

ॲम्बुलन्स हॉस्पिटलजवळ आली. लगेच मनीषने सर्व कागदपत्र हॉस्पिटलच्या ऑफिसमध्ये नेऊन दिले. दोन मिनिटात प्रणिता स्पेशल रूममध्ये ऍडमिट झाली. मग भराभर सर्व टेस्ट घेतल्या गेल्या. ऑक्सीजन सिलेंडर जोडला गेला, अंगात भराभर इंजेक्शन दिली गेली. सलाईन मधून औषधं दिली गेली.

रात्री दहाच्या सुमारास मनिषच्या मोबाईलवर प्रणिताच्या भावाचा फोन आला, मनीषने त्याला ज्युपिटर हॉस्पिटल जवळ बोलावले. तिचा भाऊ हॉस्पिटलकडे आला, त्याची व मनीषची ओळख झाली. मनीषने त्याला आपल्या एस ए ग्रुप मधील मंडळीची ओळख दिली.

भाऊ – कशी आहे तिची तब्येत? आणि कोठे अपघात झाला आणि कसा?

वंदना – तिचा अपघात झाला नाही, पण ती काल सकाळी फोन उचलेना तेव्हा मी तिच्या घरी गेले.  तेव्हा ती बेशुद्ध पडली होती. मी लगेच आमच्या ग्रुपवर ही बातमी कळवली आणि तिला काल दुपारी वाशीमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि मग सायंकाळी या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले.

तिचा फेसबुक वर पाहिलेला फोटो आणि पोलिसांनी फोडलेले दार या सर्व गोष्टी तिच्या भावापासून लपविल्या.

भाऊ – मग डॉक्टरांचे काय म्हणणं आहे?

मनिष – सध्या आम्हाला कोणाला तिला भेटायला देत नाही आहेत, त्यामुळे डॉक्टरांचे म्हणणे एवढ्यात कळणार नाही. ती शुद्धीवर आली की सर्व काही कळेल. तिची आई येते आहे का?

भाऊ –हो, आरती माझ्या आई बाबांना घेऊन येते आहे. एवढ्यात पुण्यापर्यत आली आहे.

संगीता – तिचे बाबा पण येत आहेत का, बरं झालं .

तोपर्यंत प्रणिताच्या बाबांचा फोन भावाच्या मोबाईलवर आला. तिच्या भावाने आपण हॉस्पिटलजवळ पोहोचल्याचे सांगितले. तिची सर्व मित्रमंडळी म्हणजेच त्यांचा एस ए ग्रुप तिच्यासाठी धडपडत आहे, त्यामुळे तुम्ही सावकाश आनंदाने या असा निरोप दिला.

आत डॉक्टर्स प्रांणिताच्या ऑक्सिजन लेवलवर लक्ष ठेवून होते, ब्लडप्रेशर वर येण्यासाठी धडपडत होते.

बाहेर एस ए ग्रुपचे शंभराहून जास्त मेंबर्स चांगल्या बातमीची वाट पहात होते. तसेच प्रणिताची आई वडील येणार, त्याची वाट पहात होते.

पहाटे चार वाजता हॉस्पिटलकडून सांगण्यात आले की प्रणिताची ऑक्सिजन लेव्हल 90 पर्यंत आली आहे, ब्लडप्रेशर नॉर्मल होत आहे. एस ए ग्रुपच्या मेंबर्सनी आनंदाने जल्लोष केला. प्रणिताच्या भावाच्या डोळ्यात अश्रू आले. कोण कुठलीही अनोळखी मुले, नाटक सिनेमाच्या वेडापोटी इकडे जमा झाली आहेत, अजून पाय स्थिर नाहीत, आज काम आहे तर उद्या नाही अशी परिस्थिती, पण प्रेमाने एकमेकाला धरून राहिले आहेत 

पहाटे चार वाजता आरती प्रणिताच्या आई-बाबांना घेऊन हॉस्पिटल जवळ आली. प्रणिताचा भाऊ बाहेर होताच. काळजीत पडलेल्या तिच्या आई-बाबांना त्याने धीर दिला, तसेच तिची तब्येत संकटातून बाहेर पडल्याचे त्याने त्यांना सांगितले. ही सर्व मुलं प्रणिताची मित्रमंडळी, तिच्यासारखी नाटक सिनेमा मालिकाच्या वेडापायी घरदार सोडून या पट्ट्यात राहत आहेत. कधी जेवण मिळते कधी नाही. कधी काम असते कधी नसते. पण सर्वजण एका ग्रुपवर  मैत्री सांभाळतात. आज सकाळपासून हीच मंडळी प्रणिताच्या आजूबाजूला आहेत. या मंडळींना कळले की ती रूममध्ये बेशुद्ध पडली आहे. त्यावेळीपासून ही मुलं ती बरी होण्यासाठी धडपडत आहेत… प्रणिताच्या आईने सर्वाकडे प्रेमाने पाहिले, बाबा पण सदगदित झाले.  त्यांनी मनिषच्या खांद्यावर थोपटले.

एव्हडयात हॉस्पिटल मधून बातमी आली, प्रणिता शुद्धीवर आली आहे. एस ए ग्रुप ने आनंदोत्सव सुरू केला. सकाळी सहा वाजता प्रणिताच्या आईला तिला भेटायची परवानगी मिळाली. आईला बघतल्यावर प्रणिता पुन्हा रडू लागली. मग तिचे बाबा, भाऊ आत गेले. प्रणिताच्या लक्षात येत नव्हते, आपण कुठे आहोत? आजूबाजूला सलाईन, ऑक्सीजन मॉनिटर  दिसतो आहे, म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये असणार. मग आपल्याला इकडे कुणी आणले?

सकाळी नऊ वाजता डॉक्टरांची टीम तपासण्यासाठी आली. त्यांनी तिला तपासले आणि आता ती संकटातून बाहेर आल्याचे तिच्या आई-बाबांना सांगितले. बाबांनी डॉक्टरांना विचारले .. 

“पण ती बेशुद्ध का झाली?

डॉक्टर – तिला ड्रग्सचे व्यसन आहे, ड्रग्सचा जास्त डोस तिच्या शरीरात गेला होता, आता ड्रग्सपासून तिला लांब ठेवायला हवे. ती वेळेत या हॉस्पिटलमध्ये पोचली म्हणून.. अन्यथा तिचा कालच अंत झाला असता.

प्रणिताचे आई-बाबा सुन्न झाले. काय आपल्या या मुलीची परिस्थिती? प्रणिताच्या बाबांच्या मनात आले, आपण सुद्धा तिच्या या परिस्थितीला जबाबदार आहोत. तिची आवड निवड आपण लक्षात घेतली नाही. तिच्याशी संबंध तोडले. तिच्या आईला पण तिला भेटायला बंदी केली. जर तिच्या आवडीला आपण सुद्धा प्रोत्साहन दिले असते, तर ती एकटी पडली नसती. प्रणिताची आई गप्प बसून होती, तिचा भाऊ पण गप्प बसून होता, ड्रगचे व्यसन लागलेल्या आपल्या या बहिणीला त्यातून कसे बाहेर काढायचे याचा तो विचार करत होता. प्रणिताची आई मनात म्हणत होती, आपल्या घरी किंवा माहेरी कुणाला सुपारीचे सुद्धा व्यसन नाही, उलट तिचे बाबा कोण व्यसनी दिसला तर त्याचे व्यसन कसे सुटेल, यासाठी धडपड करतात, आणि आमची मुलगी….

दुपारी प्रणिता पूर्णपणे शुद्धीवर आली, पण आता तिच्या ड्रग्स घेण्याची वेळ झाली होती, त्यामुळे ती रेस्टलेस होऊ लागली, आळोखे पाळोखे देऊ लागली, तिची बुबूळ वर खाली होऊ लागले. पुन्हा डॉक्टर धावत आले, त्यानी तिला झोपेचे इंजेक्शन दिले तशी ती झोपी गेली.

दुपारी प्रणिताचे बाबा आणि भाऊ बाहेर आले, बाहेर एसए ग्रुपचे मेंबर्स उभे होते. एवढ्या कडकडीत दुपारी सुद्धा 50 पेक्षा जास्त मंडळी बाहेर उभी असल्याचे पाहून बाबांना गहिवरून आले.

बाबांनी मनीषला जवळ घेऊन सांगितले,

” डॉक्टर म्हणतात तिला ड्रग्सचे व्यसन लागले आहे. मघा ती जागी झाली, पुन्हा तिचे शरीर ड्रग्स मागू लागले, ती रेस्टलेस झाली, डॉक्टरांनी झोपेचे इंजेक्शन देऊन झोपून ठेवले आहे, पण पुढे काय? या ड्रग्सच्या विळख्यातून ती बाहेर कशी पडणार?

एस ए ग्रुप मधील पूर्वा बोलू लागली

” अंकल, याकरता तिला व्यसनमुक्ती केंद्रात ठेवायला हवे. माझा मामेभाऊ असाच ड्रगच्या विळख्यात अडकला होता, पण पुण्यातील डॉक्टर अवचटांच्या व्यसनमुक्ती केंद्रात त्याच्यावर योग्य उपचार झाले आणि तो त्याच्या व्यसनातून बाहेर पडला. तुम्ही जर हो म्हणालात तर मी माझ्या भावाकडे चौकशी करून थोड्या वेळात तुम्हाला सांगते.” 

प्रणिताच्या बाबानी होकार देताच तिने त्वरित आपल्या भावाला फोन लावला. त्याच्याकडून व्यसनमुक्ती केंद्राचा फोन नंबर घेतला. आणि तेथूनच व्यसनमुक्ती केंद्राला फोन लावून प्रणिताची केस सांगितली. व्यसनमुक्ती केंद्राने प्रणिताला आपल्या केंद्रात आणण्याची परवानगी दिली. चार दिवसांनी प्रणिता ठणठणीत बरी झाली आणि आई बाबा, भाऊ यांनी तिला व्यसनमुक्ती केंद्रात नेण्याची तयारी केली. प्रणिताचे आई बाबा एस ए ग्रुप मेंबर्सना भेटले. “ तुमच्यासारखी धडपडी प्रेमळ मुलं आहेत म्हणून जगात माणुसकी शिल्लक आहे हे म्हणायचे, “ असे म्हणताना ते भावुक झाले. “ या एसए ग्रुप मुळेच माझी मुलगी मला मिळाली, असेच एकत्र रहा, एकमेकांसाठी धावा, एकमेकांना मदत करा. तुमचे उपकार न फेडण्यासारखे “.  प्रणिताची आई सर्वाना सांगलीत येण्याचे आमंत्रण देत राहिली.

शेवटी प्रणिता आपल्या ग्रुप मेम्बर्सना भेटली, विशेष करून वंदना आणि मनीष, त्यांनी धावपळ करून घर फोडून आपल्याला हॉस्पिटल मध्ये नेले नसते तर….

प्रणिता व्यसन मुक्ती केंद्रात जाताना पुन्हा सर्व एस ए ग्रुप हजर होता. सर्वांनी तिला निरोप दिला.

त्या व्यसनमुक्ती केंद्रात ती दीड वर्ष राहिली पेशंट म्हणून, व्यसनातून पूर्ण बाहेर पडली आणि त्याच व्यसनमुक्ती केंद्रात मार्गदर्शक म्हणून काम करू लागली.

पण तिच्या मनात एस ए ग्रुप बद्दल कृतज्ञता कायम राहिली.

– समाप्त – 

 © श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एस ए ग्रुप… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ एस ए ग्रुप … – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(अर्ध्या तासात मनीष आणि वंदना पोलीस स्टेशन वर पोहोचली, तोपर्यंत  S A ग्रुपमधील अनेक जण पोलीस स्टेशन कडे जमा झाले होते.) – इथून पुढे — 

ही सर्व मंडळी येताच पोलिसांची जीप तिच्या घरच्या दिशेने निघाली. त्याच्या पाठोपाठ S A ग्रुप मधील मेंबर्स पण निघाले. पोलिसांनी तिची चाळ शोधून काढली, दार आतून बंद केलेले होते. पोलिसांनी धक्के मारून दार उघडले. पोलिसांच्या मागोमाग या ग्रुपमधील मेंबर्स पण आता घुसले.दार उघडताच अस्ताव्यस्त अवस्थेत प्रणिता कॉटवर पडलेली दिसली, लेडी पोलीस पुढे झाली, तिने तिला हलवायचा प्रयत्न केला, मग तिने तिची नाडी चेक केली आणि सर्वांकडे वळून ती म्हणाली, ” नाडी संथ आहे पण लागते आहे, तिला हॉस्पिटलला तातडीने न्यायला लागेल.” 

मनिषने मघा येताना एका राजकीय पक्षाचे ऑफिस जवळच असल्याचे पाहिले होते, त्यामुळे मनिष धावत खाली उतरला आणि त्या ऑफिसमध्ये गेला. सुदैवाने त्या पक्षाची ऍम्ब्युलन्स बाजूच्याच गल्लीत पार्क केलेली होती, त्याने ड्रायव्हरला ती चाळीखाली आणायला सांगितली. महिला पोलीस आणि वंदनाने तिला उचलून जिन्यातून  खाली घेतले. एव्हाना एस ए ग्रुप मेंबर्सना हा पत्ता कळला होता, त्यामुळे त्या ग्रुपमधील बरीच मंडळी जमा होऊ लागली… ..  ऍम्ब्युलन्स पुढे, त्यात लेडी पोलीस सोबत वंदना होती आणि पाठोपाठ एस ए ग्रुप्स मधील पुरुष स्त्रिया आपापल्या गाडीतून येत होती. 

ऍम्ब्युलन्स गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि पोलिसांनी प्रणिताला ऍडमिट केले.

मेडिसिन डिपार्टमेंटच्या मुख्य डॉक्टरांनी तिला तपासले. तिची नाडी मंद चालू होती, ब्लड प्रेशर खूपच खाली गेलं होतं, ऑक्सिजन लेव्हल चिंताजनक होती.

सोबत असलेल्या वंदनाला डॉक्टर म्हणाले,  ” खूपच क्रिटिकल कंडिशन आहे, बहुतेक हिने भरपूर ड्रग्स घेतले असण्याची शक्यता आहे, वाचण्याची शक्यता कमी आहे.  हिचे जवळचे नातेवाईक असतील तर त्यांना बोलावून घ्या.” 

वंदनाला प्रश्न पडला, हिची फारशी ओळखच नव्हती, मग हिचे नातेवाईक शोधायचे कसे? हिचे गाव तालुका ही काही माहित नाही. एवढ्यात वंदनाच्या लक्षात आले, ‘ मगाशी हा तिच्या रूममध्ये तिच्या कॉटवर असलेला मोबाईल मी माझ्या पर्समध्ये टाकला  होता.’  वंदनाने आपली पर्स उघडून प्रणिताचा मोबाईल बाहेर काढला. तो आता चालू कसा करायचा हे तिला कळेना. मग अनेक युक्त्या वापरून  (नेहेमीच्या ) तिने तिचा मोबाईल उघडला. तिचे कॉल उघडून कोणी ओळखीचे नाव येते का ती पहात होती, एवढ्यात  तिला ‘ आई ‘ असे नाव दिसले. वंदनाने ओळखले हा प्रणिताच्या आईचा नंबर असणार.

 तिने मनीषला आणि संगीताला तिच्या मोबाईलमधला आईचा नंबर दाखवला. मनीष तिला म्हणाला ” तूच तिच्या आईला फोन कर, ती सिरीयस आहे असे सांगू नको, तिचा अपघात झाला आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे असे तिच्या आईला सांग “.  संगीताचे पण तसेच म्हणणे होते. यावेळेपर्यत त्यांच्या एस ए ग्रुप मधील बरीच मंडळी जमा झाली होती. त्या ग्रुपमधील श्याम, अनुजा यांचं पण तेच म्हणणं, ‘ तू फोन कर आणि तिच्या आईला न घाबरवता कळव आणि ती मंडळी मुंबईत येत असतील तर येउ दे.’ 

मग वंदनाने ‘ आई ‘ या फोनवर फोन लावला.

आई – काय ग, नवीन काही काम मिळत आहे का?

वंदनाला कळले ..  फोन प्रणिताचा म्हणून तिच्या आईला फोनवर प्रणिता वाटली असणार.

वंदना – काकू, मी प्रणिताची मैत्रीण वंदना, मी आणि तिने अनेक मालिकामध्ये एकत्र काम केले आहे.

आई – अग मग प्रणिता कुठे आहे?

वंदना – काकू, प्रणिताला लहानसा अपघात झाला आहे. आता ती तशी बरी आहे. पण डॉक्टरनी तिला बोलायला बंदी केली आहे.

आई – अरे बापरे, काय झालं प्रणिताला ?….  असं म्हणून प्रणिताची आई रडू लागली.

वंदना – अहो काकू ती बरी आहे, पण तिला आईची आठवण येत आहे, म्हणून मी फोन केला. तुम्ही कुठे राहता?

आई – सांगलीला.

वंदना – तुम्ही मुंबईला येऊ शकता काय?

आई रडत रडत म्हणाली, “अग, ही आमचं न ऐकता घर सोडून गेली, तिचे बाबा तिचे नाव घेत नाहीत, आमचा मुलगा पुण्यात असतो, मी कशी येणार सांग.” 

वंदनाने “बर ‘ म्हंटल आणि ती एस ए ग्रुप मेंबर्स जवळ आली. आता सुमारे साठ लोकं जमली होती, सगळी नाटक सिनेमाच्या मोहापोटी आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कुठून कुठून आलेली, अजून जम बसत नाही,  पण एका ग्रुपमार्फत एकमेकांना धरून राहिलेली. एवढ्यात मनिष म्हणाला ..  ” पण तिच्या आईला आणावेच लागेल, तिच्या बाबांचा आणि भावाचा नंबर मिळाला तर त्याला पण घेऊन येऊ. पण यांचे नंबर कसे मिळतील.? “

“ वंदना, तू अजून कॉन्टॅक्ट लिस्ट बघ, कोणी ओळखीचे भेटते का बघ.:किंवा तिचे जास्तीत जास्त कॉल कुणाला गेलेत ते बघ “. 

वंदनाने परत मोबाईल उघडला, तेव्हा आरती नावाच्या मुलीला तिचे रोज फोन जात होते हे लक्षात आले.

वंदनाने आरतीला फोन लावला.

आरती – काय ग प्रणे, आज शूटिंग नाही वाटतं, आता कॉल केलीस म्हणून विचारते.

— वंदनाने तिला आपण प्रणिताची मैत्रीण असल्याचे सांगितले आणि प्रणिताला अॅक्सिडेंट झाला म्हणून तिचा फोन आपल्याकडे असल्याचे सांगितले. सुदैवाने आरती सांगलीतील तिची लहानपणापासूनची मैत्रीण निघाली. ती म्हणाली ‘ मी प्रणालीच्या आईला घेऊन एक तासात निघते.’ 

तिने प्रणालीच्या भावाचा नंबर दिला.

प्रणालीच्या भावाचा नंबर मिळाला. वंदना मनिषला म्हणाली, “मनीष, तिच्या भावाला तू फोन कर “. 

मनिषने तिच्या भावाला फोन लावला, आपल्या बहिणीचा नंबर दिसला म्हणून त्याने उचलला नाही. मग तो नंबर मनीषने आपल्या फोनवरून लावला. त्या नंबरावरून त्याने फोन उचलला.

मनीष – मी मनिष बोलतोय, ठाण्यावरून. तुमची बहीण प्रणिता हिला लहानसा अपघात झालाय, आता ती बरी आहे, पण तिच्या घरचे तिच्याजवळ असावे म्हणून तिच्या मोबाईलमधून तुमचा नंबर घेतला आणि तुम्हाला फोन लावला.

प्रणिताचा भाऊ – खरंतर गेली दोन वर्षे मी तिच्याशी बोललेलो नाही. तिने घेतलेला निर्णय आम्हाला पसंत नव्हता म्हणून. पण ती माझी बहीण आहे. तिला बरे नसेल तर मला तिकडे यावेच लागेल. मी माझ्या आईला कळवतो.

मनिष – आम्ही तुमच्या आईला कळवले आहे. बहुतेक ती प्रणिताची मैत्रीण आरती हिच्याबरोबर ठाण्याला येते आहे.

भाऊ – मग ठीक आहे, मी पण माझ्या आईला फोन करून सांगतो. पण माझी बहीण खरोखर बरी आहे ना? काही काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे का?

मनीष – काळजी करण्यासारखी परिस्थिती नाही. पण हॉस्पिटलमध्ये तिच्या घरचे कुणीतरी सोबत असायला हवे, आम्ही मित्रमंडळी जास्त वेळ राहू शकत नाही, म्हणून मी फोन केला.

भाऊ – मी लगेच निघतो. ठाण्याजवळ आलो की तुम्हाला या मोबाईलवर फोन करतो. मग मला कुणीतरी घ्यायला या.

मनिष – यायला लागा, ठाण्यात जवळ आला की मला फोन करा. तुम्ही कसे येणार आहात ते पण कळवा.

— अशा रीतीने प्रणिताचा भाऊ ठाण्यात येत होता.

वंदना – मनीष आपण आता वाशीमध्ये असताना तू तिच्या भावाला ठाण्याला ये असे का सांगितलेस?

मनीष – याचे कारण म्हणजे या हॉस्पिटलमध्ये तिची व्यवस्थित ट्रीटमेंट होईल असे मला वाटत नाही. तेव्हा आपण तिला पोलिसांची परवानगी घेऊन ठाण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावे हे बरं .

वंदना – हो हे खरे आहे, पण आपल्या ग्रुपच्या सर्व मेंबर्सचे मत घ्यायला हवे.

मनीषने सर्व एस ए ग्रुप मेंबर्स ना जवळ बोलावले.

मनीष – ग्रुप मेंबर्स, प्रणिताची कंडिशन अजून क्रिटिकल आहें, या हॉस्पिटलमध्ये फारश्या सुविधा नाहीत, तेव्हा आपण तिला ठाण्यात ज्युपिटरमध्ये शिफ्ट करू. .तुमचे काय मत आहे? 

श्याम – होय, बरोबर आहे. लवकर हालचाल करायला हवी.

संगीता – त्या हॉस्पिटलमध्ये माझा मावसभाऊ सर्जरीमध्ये डॉक्टर आहे. तो या वेळेस ड्युटीवर असेल. मी त्याला फोन करून लक्ष देण्यास सांगते. संगीताने आपल्या मावसभावाला फोन लावला. मनीष आणि वंदना तिथल्या डॉक्टर्सना इथून डिस्चार्ज मिळविण्यासाठी भेटायला गेली. मनोज ऍम्ब्युलन्स शोधू लागला. त्याला सुसज्ज ऍम्ब्युलन्स मिळाली. पंधरा मिनिटात वाशीच्या हॉस्पिटलमधून डिसचार्ज घेऊन प्रणिताला ठाण्यात शिफ्ट केले गेले, ऍम्ब्युलन्स पाठोपाठ एस ए ग्रुप्स मेंबर्स स्कूटर, मोटरसायकल घेऊन जात होते.

संगीता आपल्या मावसभावाच्या संपर्कात होती. ऍम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये पोचायच्या आधी प्रणिताचा बेड तयार होता.

– क्रमशः भाग दुसरा. 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एस ए ग्रुप… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ एस ए ग्रुप … – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

सकाळी आठ वाजता वंदनाला जाग आली, तिला आज शूटिंगला जायचं नव्हतं ..  नाहीतर गजर लावून उठायची तिला सवय. गेले पाच दिवस तिला सहाच्या शूटिंगसाठी हजर राहावं लागे, सेटवर सहा वाजता पोहोचायचं तर तिला पाचची ट्रेन पकडावी लागे. तिचा शॉर्ट कधी कधी रात्री आठ वाजता यायचा, कधी यायचा पण नाही, पण तिच्यासारख्या नवीन एक्ट्रेसना हजर रहावच लागे. दिलेले कपडे घालून दिवसभर तिथे बसायचे, जेवायचे. सोबतच्या कनिष्ठ कलाकारांबरोबर गप्पा झोडायच्या. कंटाळा आला की एखादी सिगरेट ओढायची. एवढे करून दिवसाला जेमतेम अडीच हजार रुपये हाताला टेकायचे.

रात्री उशीर झाला तर टॅक्सी करून यावे लागे, म्हणजे त्याच्यात सहा सातशे रुपयाची फोडणी. रात्रीचे जेवण करायचा कंटाळा म्हणजे बाहेरच कुठल्यातरी गाड्यावर खावे लागे. त्याचे दोन अडीचशे रुपये.

वंदना विचार करत होती, शेवटी शिल्लक काय राहते. सेटवर मोठ्या कलाकारांचे लाड आणि आम्हा ज्युनिअर कलाकारांना लाथा. पण विचारतो कोण? आपण सोडलं तर एकापेक्षा एक कलाकार जागा घ्यायला टपून बसलेले आहेत. सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी आपली परिस्थिती. करोना साथीनंतर कामे कमी झाली. आपल्याकडे एक नाटक होते ते बंद झाले. त्या नाटकाचे महिन्याला दहा प्रयोग झाले तर निदान महिन्याला पंधरा हजार रुपये मिळायचे. ते पण नाटक बंद. आता फक्त राहिली ही एक मालिका. या मालिकेला फारसा टीआरपी नाही, म्हणजे ही मालिका पण कधी राम म्हणेल सांगता येत नाही. वरळीच्या घोस्ट सप्लायर्सकडून ही मालिका आपल्याला मिळाली होती. मुंबईत असे अनेक कलाकार सप्लाय करणारे एजंट आहेत. आपण सहा एजंटाकडे मेंबर्स झाले आहे, त्यांना प्रत्येकी दर महिन्याला दोन हजार रुपये द्यावे लागतात. आपल्यासारखे हजारो न्यू स्ट्रगलर  त्यांचे मेंबर आहेत. ते सुचवतील तेव्हा आपल्याला काम मिळतं .

वंदनाने आळोखेपाळोखे दिले आणि ती बेडवरून बाहेर आली, समोरील टेबलवर काल रात्री प्यालेला बियरचा टिन तसाच पडला होता. तिने तो उचलला आणि वेस्ट बॉक्समध्ये टाकला. त्या एका रूममध्येच ती राहत होती, त्याच रूममध्ये ती गॅसवर चहा कॉफी करत होती आणि एक छोटीशी बाथरूम तिला होती.

वंदनाने गॅस पेटवून त्यावर पाणी गरम  केले, त्यात कॉफी पूड टाकली, दूध नव्हतेच त्यामुळे तिने तशीच कॉफी बनवली आणि एका कपात ओतून ती पिऊ लागली. तिने मोबाईल उघडला आणि आपला ग्रुप वाचू लागली, त्या एरियात राहणाऱ्या नवीन धडपड करणाऱ्या नाटक टीव्ही मालिका मधील कलाकारांचा ग्रुप होता, त्याचे नाव होते, S A  ग्रुप म्हणजेच strugllar actors ग्रुप. या ग्रुपमधील नेहेमीचे मेसेज, कुणाला कुठे काम मिळालं, कुणाचं काम बंद झालं, कुठल्या actors सप्लायरकडे जास्त निर्माते आहेत, अमीर खानचें कुठे शूटिंग सुरु होणार आहें, चोप्रा कुठला सिनेमा घेऊन येत आहेत, त्यांना जुनिअर actors किती लागतील वगैरे. हे नेहेमीचे मेसेज वाचून वंदनाला कंटाळा आला, तिने फेसबुक ओपन केल आणि ती वरखाली करू लागली.

एवढ्यात तिचे लक्ष एका फोटोकडे गेलं, बेडवर पडलेल्या एका तरुणीचा फोटो होता, मुलगी अस्ताव्यस्त पडली होती. वंदनाने निरखून पाहिले आणि ती मनात म्हणाली,  ” अरे ही तर प्रणिता नांदे, सहा महिन्यापूर्वी मराठी मालिकेच्या सेटवर दोन दिवस आपल्यासोबत होती. नंतर तिची कधी भेट झाली नाही, पण ती या फेसबुकमध्ये काय करते, असे म्हणून वंदनाने तिने लिहिलेले वाचले आणि  तिला धक्का बसला.

प्रणिताने लिहिले होते… ” आज माझा या जगातील शेवटचा दिवस, मी पुरती निराश झाले आहें, आईवडीलांशी भांडून मी मुंबईत आले पण माझा लोकांनी गैरफायदा घेतला. कामे मिळत नाहीत, माझ्याकडे पैसे नाहीत. अलविदा “ .

वंदनाने बारकाईने फोटो पाहिला, तिचा गाऊन मांड्यांपर्यंत वर आला होता, एक हात कॉट खाली लोंबत होता, वंदनाच्या काळजात धडधड सुरु झाली, ही पोरगी जिवंत आहे का नाही, असा तिला प्रश्न पडला. ती राहते कुठे हे तिला माहित नव्हते किंवा तिचा नंबर नव्हता. काही करून तिच्यापर्यत पोहोचायला हवे हे तिला कळत होते, ती आपल्या S A ग्रुप वर आहे की नाही, हेही तिला माहित नव्हते. तिने ग्रुपचा ऍडमिन मनिषला कॉल लावला. मनिष गाडीत होता.

वंदना – मनिष, अरे प्रणिता नांदे नावाची मुलगी तुला माहित आहें का, आपल्यासारखीच आहें, दोन तीन वर्षांपूर्वी कुठूनतरी आलेली.

मनीष – तिचे काय?

वंदना –अरे तिने फेसबुक वर पोस्ट टाकली आहें, आपला या जगातील शेवटचा दिवस म्हणून, तिचे विचित्र फोटो टाकलेत, ती जिवंत आहें का ते कळत नाही, आपण तिला शोधायला हवं, तू तिला ओखतॊस काय?

मनीष – मी तिला ओळखत नाही पण तिचे नाव ऐकल्यासारखे वाटते, आपल्या ग्रुपची मेंबर आहे का ते पाहावे लागेल.

वंदना – ग्रुपची मेंबर वगैरे ते लांबचे रे, ती मेंबर असो वा नसो, तिचा जीव वाचवायला हवा, याकरता तिच्यापर्यंत ताबडतोब पोहोचायला हवे.

मनीष – मग ग्रुपवर तशी बातमी टाक, फेसबुक वरून तिचे फोटो घे आणि ते आपल्या ग्रुपवर घे. कुणाला तिचा फोन नंबर माहिती आहे का ते विचार. तसेच ती कुठे राहते हे माहिती आहे का विचार. मी आता वांद्र्याला चाललो आहे. पुढे काय होते ते मला कळव.

मनीष ने फोन बंद केला, वंदनाने फेसबुक वरून प्रणिताचे फोटो घेतले आणि  S A ग्रुप च्या व्हाट्सअप वर टाकले, तसेच तिचा मोबाईल नंबर आणि तिचा पत्ता कुणाला माहिती असल्यास कळवण्यास सांगितले.

थोड्याच वेळात ग्रुप वर धडाधड मेसेज येऊ लागले. बऱ्याच जणांनी तिच्याबरोबर काम केले होते. संगीता जाधव जवळ तिचा मोबाईल नंबर होता. तो तिने ग्रुप वर टाकला. तसेच तिने वंदनाला फोन लावला.

संगीता –अग वंदना, आम्ही दोघं दोन महिन्यापूर्वी एका बेब सिरीज मध्ये होतो, दोन दिवसाचे काम होते त्यावेळी तिच्याकडून मी हा तिचा नंबर घेतला होता. पण ती राहते कुठे हे मला माहीत नाही. पण माझ्या अंदाजाने ती वाशीच्या आसपास राहत असावी. तिचा कोणीतरी बॉयफ्रेंड होता, त्याच्यासोबत ती रिलेशन मध्ये होती. पण त्यांचे आता फारसे जमत नव्हते. म्हणून तो आता आपल्या मूळ घरी गेला होता. म्हणून ही डिप्रेशन मध्ये गेल्यासारखे वाटत होते.

वंदना – पण ती राहते कुठे? तिला तातडीने शोधायला लागेल नाहीतर ती जीवाचे काही बरे वाईट करून घेईल.

मनीषा – मी आणखी काही लोकांना संपर्क करून तिचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न करते आणि मग तुला कळविते.

मनीषाने फोन ठेवला, आता ग्रुप वर अनेकांचे मेसेज येत होते, अनेक जण तिला ओळखत होते पण कुणालाच तिचा पत्ता माहित नव्हता किंवा ती मुद्दामच कुणाला पत्ता देत नव्हती. थोड्यावेळाने मनीषचा फोन आला. त्याला स्टेशनवर  प्रभात भेटला होता. प्रभातचे म्हणणे हल्ली तिचे पिणे फार वाढले होते, हल्ली ती कुणाच्याही गाडीत दिसायची.  तिची मनस्थिती ठीक नसल्याचे प्रभातला वाटत होते.

… वंदनाने मग तिच्या फोनवर फोन करण्याचे प्रयत्न केले. पण पलीकडून कुणी फोन उचलत नव्हते.

थोड्यावेळाने मनीष वंदनाच्या रूमवर आला, तिचा पत्ता मिळत नसेल तर तिच्या फोनवरून पोलीस तिचा पत्ता शोधू शकतात असे त्याचे म्हणणे. मनीषने पोलीस स्टेशनचा फोन नंबर आणला होता. त्याने पोलीस स्टेशनला फोन नंबर देऊन या फोनची मालकीण फोन उचलत नसल्याचे त्यांना कळवले. तसेच तिच्या जीवाचे काही बरे वाईट होण्याची शक्यता पण त्याने पोलिसांना सांगितली. पंधरा मिनिटांनी पोलीस स्टेशन वरून फोन आला, त्या मोबाईल नंबरवरून त्यांनी तिचा पत्ता शोधून काढला होता. वाशीच्या सेक्टर 20 मध्ये ती रहात होती असे त्यांना कळले.

वंदनाने त्वरित ही बातमी S A ग्रुप वर टाकली आणि पोलीस स्टेशनकडे आपण आणि मनीष जात असल्याचे पण ग्रुप वर टाकले. अर्ध्या तासात मनीष आणि वंदना पोलीस स्टेशन वर पोहोचली, तोपर्यंत  S A ग्रुपमधील अनेक जण पोलीस स्टेशन कडे जमा झाले होते.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कसा विसरलास तू? ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

❤️ जीवनरंग ❤️

कसा विसरलास तू? ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

संध्याकाळ कधीची उलटून गेलेली. रात्रीचा दुसरा प्रहर उदासपणे जात असलेला. समोर टेबलावर सुरकुतलेला लाल गुलाब मन्या एकटक पाहात असलेला. एक मोठी आशा, मोठं स्वप्न बाळगून सकाळीसच  खरेदी केलं होतं ते. प्रेमाचं प्रतिक असलेलं फूल आता मलूल होऊन पडलेलं. सकाळीस घेतलं त्यावेळेस एकदम ताजंतवानं, रसरशीत, निम्मं उमललेलं जे हात त्याचे हकदार होते त्या हातात विसावण्यासाठी आसुसलेलं. योग्य वेळेची वाट पाहात पाण्याच्या बाटलीत स्थिरावलेलं होतं. सकाळपासूनचं आठवत मनीष स्तब्ध बसून असलेला. 

मनातल्या मधूर भावना व्यक्त करण्यासाठी मनीषने मनापासून तयारी केली होती. चिंगीच्या आवडीच्या रंगाचा शर्ट त्याने आदल्याच दिवशी खरेदी केला होता. टायची गाठ परफेक्ट कशी बांधायची याचं प्रात्यक्षिक तर कितीतरी वेळा मनीषने करून पाहिलं होतं. बुटांना पॉलिश करून चमकवून ठेवलं होतं अगोदरच. आजचा दिवस तसा खासच पॉलिश्ड राहण्याचा. दाढी तर दोनदा केली होती. परफ्यूमची निवडही चिंगीच्या पसंतीने केलेली. आता तसं यापुढे सगळं एकमेकांच्या पसंतीचंच करायचं असं ठरवून झालेलं. बस त्यावर शिक्कामोर्तब वेगळ्या पद्धतीने आजच्या दिवशी, प्रेमीजनांच्या दिवशी करायचं असं ठरलेलं. बस संध्याकाळ होण्याचीच वाट पहायची होती.

वाट पाहाणं किती अवघड असतं हे कुणी प्रेमीजनांनाच विचारावं. सकाळच्या उत्साहाची जागा दुपारी उत्कंठेने घेतलेली. दुपारी घड्याळाचे काटे नेहमीपेक्षा हळूहळू सरकत असलेले. हा वेळेचा अपव्यय नाही का?  मनीषला वाटत होतं. तास सेकंदांचं गणित बिघडलंय की काय?  की वेळेनं मुद्दामहून छळण्याचं ठरवून संथपणे मार्गक्रमणा करण्याचं चालवलंय, असे प्रश्न. कितीदा तरी मनीष खोलीतून गेलेरीत, गेलेरीतून खोलीत. सारखी घालमेल. सारखं मनात यायचं किती मोलाचे क्षण असतील ना ते जेव्हा  चिंगी काहीतरी बोलेल मी काहीतरी बोलेन. हात हाताशी घेऊ. नाहीतर डोळ्याला डोळा भिडवून गप्पच राहू , निदान काही क्षण. बेचैनीतच टळून गेली दुपार.

मनीष व चिंगीचं लहानपणापासूनचे  सख्य. दोघांचे कुटुंब परिचित असलेलं. लहानपणीची मैत्री शाळेपासूनची. अगदी पहिलीपासूनची. एकमेकांना पूरक असलेली. तशी चढाओढ ही असायची. कोण परिक्षेत किती गुण मिळवतो ते. कधी चिंगी पुढे असायची कधी मनीष. शाळेचे दिवस असेच सरले चढाओढीत. मग आले कॉलेजचे दिवस अन् दोघांचं जगच बदललं. ते वयच तसं धोक्याचं का काय म्हणतात तसं. सोनेरी स्वप्नांवर स्वार होण्याचं. शाळेत असताना पुस्तके वही दिली घेतली जायची, कॉलेजमधेही दिली घेतली जात असणारी मात्र त्यातील अक्षरांचे संदर्भ बदलत असलेले. हे सगळं नकळत घडत असलेलं. काहीतरी विचित्र असं. नेहेमीसारखं साधं सरळ नव्हे तर आतून आतून येणारं. जवळीक लहानपणापासूनची पण हे तर हवंहवसं, मनापासूनचं. यावर कधीतरी बोललंच पाहिजे व ते आजच हा निर्णय दोघांचा. 

मनीष तसा सकाळपासून संभ्रमात पडलेला. चिंगीशी संध्याकाळी काय बोलावं कसं बोलावं यावर विचारच करत बसलेला. टेबलावर चिठ्ठ्यांचा ढीग. ओळीवर ओळी लिहून झालेल्या पण मनाला एकही पटेना. कविताही करून झालेल्या. त्याही फिक्या वाटत होत्या. शाळेत निबंधात पैकीच्या पैकी गुण मिळवणारा मनीष आज अडखळत होता. खरंतर प्रेमाची भाषा किती गोड, नाजूक, तरल अशी पण नेमकं आजच  असं का वाटावं की आपण योग्य तेच बोललं पाहिजे. चुकीचं असं ओठांतून बाहेर पडता कामा नये. काही अधिक उणे बोललं गेलं तर सगळं मुसळ केरात जायचं. ही अनामिक भीति व हुरहुर. मनीष त्रस्त. 

संध्याकाळ झाल्यावर मनीषने मनाला आवरलं. नाहीच काही जमलं तर आय लव यू तरी म्हणायचं. वेलेंटाइन वीकमधले सर्व डेज जरी साजरे करणं जमलं नसलं तरी आजचा दिवस संस्मरणीय करायचाच असं मनाशी पक्कं ठरवून तो बाहेर पडला. नेहेमीच्या कॉफी शॉपमधील  कॉर्नरचं टेबल त्यानं बुक करून ठेवलं होतं. तेथून रस्यावरनं वाहणारी वाहतूक स्पष्ट दिसत असे. कोपऱ्यावरचं लाल हिरवं पिवळं होणारं सिग्नल, काचेच्या तावदानातून दिसणाऱ्या नियोन साईनच्या पाट्या, जोडीला कॉफी शॉपमधील मंद सुरावट त्या कोपऱ्यावरच्या टेबलावर बसलं की जिवंतपणा आणायच्या. कॉफी शॉपमधील मंद सुरावटीशी ताल जुळवत मनीष चिंगीची वाट बघत बसला. हातात तब्बल पावणे दोनशे रुपये मोजून आणलेलं गुलाब, साडेतीन हजाराचे टायटनचे घड्याळाचे गीफ्टपेक, अंगभर दरवळत असलेलं परफ्यूम, व मनात उमटणारी आंदोलने, एक सुंदर भाववाही क्षण जवळ येत असल्याची जाणीव घेऊन मनीष  रस्त्याकडे अनिमिष नजरेनं बघत बसला. चिंगी आलीच नाही. 

मनीष हिरमुसला. संध्याकाळ सरली. रात्र झाली. मनीषने ठरवलं चिंगीच्या घरी जाऊन येऊ. चिंगीच्या कॉलनीत शिरत असताना त्याने पाहिलं, चिंगी आकाश बरोबर बाईकवरून येत होती.  दोघं एकमेकांशी बोलतही होती. मनीष तडक घरी आला. गीफ्टपेक व गुलाब त्याने टेबलावर टाकले. गुलाब कोमेजत आलेले. त्या गुलाबाची किंमत पावणे दोनशे रूपयांपेक्षा कैक अधिक होती. डोळ्यांच्या कडेला आलेले अश्रू सावरण्याच्या प्रयत्नात एकटक तो लालजर्द गुलाबाकडे पाहात पाहात तसाच झोपी गेला. सकाळी जाग आली तर ते लाल गुलाब अजूनही हाताशीच.  ते फूल डस्टबीनमधे टाकण्यासाठी मनीष बाल्कनीत गेला अन् पाहतो तर  चिंगी गेटजवळ ऊभी. मनीष तसाच धावत खाली गेला व चिंगीला घेऊन आला. “ काल का नाही आलीस? “  मनीषचा नाराजीचा सूर. “ अरे, काल मावशीची तब्येत बिघडली. हॉस्पिटलला ठेवावं लागलं. दिवस त्यातच गेला. तुला कळवणंही जमलं नाही. रात्री आकाशने घरी सोडलं.  नाराज असशील ना? “ चिंगीच्या प्रश्नावर काय बोलावं तेच मनीषला सुचेना. “अगं ते काल व्हेलेंटाईन डेचं आपलं….. “ मनीषचं म्हणणं तोडत चिंगी म्हणाली, “ जाऊ दे ते डेजबीज, आज काय आहे ते सांग ! “  मनीष पुन्हा बावचळला. त्याच्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे मिश्किलपणे पाहात चिंगी उत्तरली, “ अरे आज माझा वाढदिवस नाही का? कसा विसरलात तू? आणि यापुढे विसरलास तर गाठ माझ्याशी आहे आयुष्यभर !! “ मनीष म्हणाला मंजूर, आजपासून १४ फेब्रुवारी नव्हे १५ फेब्रुवारी माझ्यासाठी लाखमोलाची. “ आणि चिंगीच्या मनगटावर घड्याळ बांधत म्हणाला,” तुझ्या मनगटावरचं हे घड्याळ मला सदैव ते आठवून देईल. “

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांताक्लॉज – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ सांताक्लॉज – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(मेरी उत्कृष्ट ग्रेडस् मिळवून डॉक्टर झाली. आयर्लंडच्या एका विख्यात हॉस्पिटलमध्ये तिला जॉब मिळाला.) – इथून पुढे – 

रोझीला धन्य धन्य झाले.कोणत्या कठीण परिस्थितीतून आपलं हे लेकरू शिकलं, वेळ प्रसंगी अर्धपोटी राहून जिद्दीने ही डिग्री मिळवली हे आठवून रोझीच्या डोळ्यात पाणी आलं. मायकेलकडे रोझी गेली आणि म्हणाली, “ मायकेल, मेरी आता हॉस्पिटलच्या  क्वार्टर्सवर राहायला जाईल. मीही मग तिकडेच जाईन तिच्या बरोबर. तुम्ही फार एकटे पडाल हो. आपली ही चाळ पण किती खिळखिळी झालीय. तुम्हीही आता थकत चाललात. पुढच्याच महिन्यात आम्ही मेरीच्या हॉस्पिटलला शिफ्ट होऊ. काळजी घ्या मायकेल. काहीही लागलं तर फोन करा. मी दर आठवड्याला इकडे चक्कर  मारीनच. “ मायकेल म्हणाले, “  मी ठीक आहे ग रोझी. काळजी नको करू माझी. आपल्या मित्राची मुलगी एवढी शिकून डॉक्टर झाली याचं किती समाधान वाटतंय म्हणून सांगू. “ मायकेलने डोळे पुसले. “ मी मात्र माझ्या छोट्या मैत्रिणीची आठवण विसरू शकणार नाही. किती ग गुणी लाघवी तुझी पोर.”

मायकेल जास्त जास्त थकले. दरम्यान अनेक गोष्टी घडल्या. मेरीला रॉबिनने  लग्नाची मागणी घातली. तो तिच्याच हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून काम करत होता.  अगदी साधेपणाने रॉबिन मेरीचं चर्च मध्ये लग्न झालं. मेरीने मुद्दाम मायकेल अंकलला आपल्या कारमधून लग्नाला नेलं होतं. लग्न लागल्यावर त्यांना मिठी मारून ती म्हणाली, “ अंकल, माझ्या आयुष्यातल्या सगळ्या सुख दुःखाच्या प्रसंगाला तुम्ही साक्षीदार आहात. मला आहेच कोण तुमच्या शिवाय? “ मायकेलच्या डोळ्यात पाणी आलं. ही गरीब, पित्याचं छत्र लहानपणीच हरपलेली मुलगी आता किती मोठी झाली, त्यांच्या मनात आलं. रॉबिन आणि मेरीला आशीर्वाद देत ते म्हणाले, “ सुखात रहा रे मुलांनो. आईला नीट संभाळ ग मेरी. तिनेही फार कष्ट काढलेत बरं.”  हळूहळू चालत अंकल गाडीत बसले. मेरीने त्यांना घरी पोचवले. ती पडकी मोडकळीला आलेली चाळ बघून तिला भडभडून आलं. अंकल एक मिनिट ! तुम्ही माझ्याकडे येता का  राहायला? हीअसली चाळ कधी पडेल सांगता येत नाही हो. बहुतेक सगळे लोक ही जागा सोडून गेलेत. नका राहू इथे. माझ्याकडे या ना. मी सांभाळेन तुम्हाला.” अंकल म्हणाले  “ नको ग मेरी. बरा आहे मी इथेच. काही वाटलं तर बघू मग पुढे. “ हळूहळू पावलं टाकत अंकल घरात शिरले.

याही गोष्टीला पाच वर्षे झाली. मेरीने पोस्ट ग्रॅज्युएशन केले. दर पंचवीस डिसेंम्बरला आता तिला पोस्टाने थोडेसे पैसे येत. नोट वर पत्ता मात्र लिहिलेला नसे. ते पैसे बघून मेरीचे डोळे भरून येत. हा हितकर्ता आपल्याला भेटायला हवाच असं मनापासून वाटत राही तिला.

त्या दिवशी अतोनात बर्फ पडलं.  रस्ते बर्फमय झाले. मेरीला त्या दिवशीऑफ होता म्हणून ती घरीच होती. अचानक तिचा फोन घणघणला. पलीकडून कोणीतरी बोलत होते. “ हॅलो डॉ मेरी ना? मी मायकेलचा शेजारी बोलतोय. मायकेल आत्ता बर्फावरून घसरून पडले. त्यांना आम्ही तुमच्या हॉस्पिटलला आत्ता ऍडमिट करायला निघालोय. तुम्ही लक्ष ठेवा “ फोन बंद झाला.मेरीने हॉस्पिटलला फोन केला. स्टाफला सगळ्या सूचना दिल्या. ‘ मायकेल नावाचे पेशन्ट आले की लगेच मला कॉल करा ‘ असं सांगितलं. डिसेंबर महिना होता तो. हाडं गोठवणारी थंडी आणि तुफान बर्फवृष्टी ! मायकेल ऍडमिट झाल्याचा सिस्टरचा फोन आला. मेरी तसल्या बर्फवृष्टीत गाडी चालवत हॉस्पिटलला पोचली. तिने मायकेलना बघितलं. नशिबाने आज रॉबिनची हॉस्पिटल ड्यूटी होती. भराभर सगळे एक्स रे, बाकीच्या तपासण्या झाल्या. हाडे ठिसूळ झाल्याने अंकलला हिप बोनचे फ्रॅक्चर झाले होते.

त्यांचे वय आणि इतर परिस्थिती बघता हे ऑपरेशन फार रिस्की होते. अर्धवट ग्लानीत होते मायकेल. मेरीने त्यांना उत्तम रूममध्ये भरती करून घेतले. रॉबिन म्हणाला “ यांचे हे ऑपरेशन करणं फार धोक्याचं आहे ग .पण न केलं तर जास्तच धोक्याचं आहे. ते उरलेलं सगळं आयुष्य मग बेडला खिळून रहातील .न जाणो एक टक्का चान्स आहे, कदाचित ऑपरेशन करून ते निदान वेदनामुक्त होतील आणि थोडे चालू तरी शकतील.” वेदनाशामक औषधे देऊन मायकेलना झोपवून ठेवलं. मेरी आणि रॉबिन सर्वतोपरी त्यांची काळजी घेत होते. त्यांची परिस्थिती ऑपरेशन सहन करण्याइतपत झाली की चार दिवसांनी रॉबिन त्यांची सर्जरी करणार होता. मायकेलने त्या दिवशी मेरी आणि रॉबिनला बोलावलं. “ मुलांनो,आता माझे हाल नका करू. तो येशू मला बोलावतो आहे. मला ऑपरेशन करून आणखी यातना नका देऊ. मी यातून वाचणार नाही.” रोझीही हे ऐकत होती. “ असं नका म्हणू मायकेल. तुम्हाला आपला रॉबिन नक्की बरं करेल.”

“ नको रोझी. माझीच आता जगायची इच्छा उरली नाही. मी आत्ता शुद्धीवर आहे तेवढ्यात बोलून घेतो. मग काय होणारे तो येशूच जाणे ! “ मायकेलला धाप लागली. ते थकून पडून राहिले. मेरी त्यांच्याजवळ बसली. मायकेलने तिला सांगितलं, “ माझ्या उशीखालचे पाकीट दे ग ! “ मेरीने  पाकीट त्यांच्या हातात दिलं .”उघड ते.” मेरीने पाकीट उघडलं. त्यात एक मोठ्या रकमेचा चेक होता. “मला जगात कोणीच नाही. तूच माझ्या आयुष्यात हिरवळ होतीस. तुझ्या छोट्या जगात तू मला सामावून घेतलंस पोरी. रोज  पायरीवर बसून मीही तुझी वाट बघायचो. तुझी शाळा,ते रुसवे फुगवे सगळं तू मला सांगायचीस. तू डॉक्टर झाल्याचा मला किती आनंद झाला म्हणून सांगू. फार सुख दिलंस मला माझ्या एकाकीआयुष्यात.” मायकेल पडून राहिले. “आणखी एक पाकीट असेल बघ त्यात. उघड ते. “ जराशाने मायकेल म्हणाले. त्या पाकिटात अगदी छोटी, नेहमी पंचवीस डिसेंबरला न चुकता येणारी रक्कम होती.   मेरीला एकदम साक्षात्कार झाला .. अरे ! आपल्याला इतकी वर्षे न चुकता ख्रिसमस गिफ्ट देणारे दुसरे तिसरे कोणी नसून मायकेल अंकलच होते.

मेरीला हुंदके आवरेनात.रोझी आणि रॉबिनही सदगदित झाले. मेरीने मायकेलला मिठी मारली आणि म्हणाली ,” का हे इतके वर्ष लपवून ठेवलंत हो अंकल? मी पोरकी होते ..  मला वाईट वाटेल म्हणून ना?   माझी फी भरलीत, मला किती मदत केलीत हो न बोलता ! कसे फेडू मी तुमचे उपकार? किती मोठं मन तुमचं ! आता तुम्ही बरे झालात की माझ्या घरीच नेणार मी तुम्हाला. पुरे झालं त्या पडक्या घरात  रहाणं. एवढं तरी करू दे ना मला …. आजपर्यंत अज्ञात राहिलेल्या या उपकारकर्त्या सांताक्लॉजसाठी “ मेरी बोलत होती आणि बघितलं तर मायकेलचे  प्राण केव्हाच निघून गेले होते. मेरीने  बघितलं तर तो दिवस होता पंचवीस डिसेंबर.  मेरीला आपल्या आयुष्याची सगळी कमाई देऊन तिच्याच हातात आपली मान ठेवून तिचा उपकारकर्ता सांता क्लॉज निघून गेला होता.  पुन्हा कधीही तिला गिफ्ट देऊन न भेटण्यासाठी !

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सांताक्लॉज – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ सांताक्लॉज – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

छोटी मेरी पायरीवर बसून आजूबाजूचा आनंदात साजरा करत असलेला नाताळ बघत होती..मुलं फटाके उडवत होती, मिठाया खात होती.नवे कपडे घालून चर्चला जाणार होती..मेरी हे बघत होती.तिची ममा अजून कामावरून आलेली नव्हती.  मेरीला आता खूप भूक लागली.घराची किल्ली तिच्याकडे होती. छोटीशी खोली त्या दोघींची.आणि किती छोटे विश्व सुद्धा. चार वर्षांपूर्वीचं मेरीचं जग किती वेगळं आणि सुंदर होतं. तिचे पपा ममा आणि मेरी.खूप लाड करत तिचे पपा ..लाडकी एंजल होती मेरी त्यांची.  पपाना चांगली नोकरी होती आणि खुशीत रहात ते तिघे. कामावरून घरी येताना  अचानक पपाना एका ट्रकने उडवलं आणि हॉस्पिटलला नेण्याआधीच सगळं काही संपलं होतं. त्या दिवसापासून मेरी आणि तिची आई रोझीचे सुखाचे दिवस  संपून गेले.  चांगल्या कॉन्व्हेंट  स्कूल मधून मेरीचं नाव काढलं आणि साध्या कॉर्पोरेशनच्या शाळेत तिला नाईलाजाने रोझीने प्रवेश घेऊन दिला.रोझी फार शिकली नव्हती.एका मॉल मध्ये तिला सकाळी आठ ते आठ अशी बारा तास नोकरी करावी लागे.  पिचून जाई रोझी या कामाच्या रगाड्यात.घरी आल्यावर तिला नवीन  काही करायची उमेद रहात नसे.मॉल मध्ये उद्या एक्सपायर होणारे ब्रेड अंडी असे पदार्थ तिला फुकट घरी आणता येत.मेरी लहान होती तरीअतिशय समजूतदार होती.तिने कसलाही हट्ट कधी केला नाही की नवे कपडे मागितले नाहीत.किती गुणी लेकरू होतं ते.तिला पोटाशी धरून रोझी अश्रू ढाळे. आपल्या चिमुकल्या हातानी मेरी ममाचे अश्रू पुसे आणि म्हणे, रडू नको ग ममा. मी खूप शिकेन आणि खूप पैसे मिळवींन.मग बघ, आपण मोठ्या घरात जाऊ.’ रोझीला आणखीच उमाळे येत.मेरीच्या शाळेत अतिशय उत्तम ग्रेडस् असत.शिक्षक रोझीला म्हणत तिला या शाळेत नका हो ठेवू.फार हुशार आहे मेरी.चांगल्या शाळेत तिचे शिक्षण आणखी छान नाही का होणार?’रोझी खिन्न हसून म्हणे,सर,ते बरोबर आहे पण मी एवढी फी कुठून आणू?शिकेल इथेच. असेल तिच्या नशिबात तेच होणार ना . मेरी सातच तर  वर्षाची होती.चाळीतल्या घराशेजारी  मायकेल अंकल रहात. एकटे होते अंकल. पायरीवर सणाच्या दिवशी उदास बसलेली ती छोटी मुलगी बघून पोटात तुटलं त्यांच्या.. मेरीचे वडील जोसेफ आणि मायकेल चांगले मित्र होते. दुसऱ्या दिवशी पंचवीस डिसेंबर!  आज नाताळ बाबा हळूच मुलांना सरप्राईज गिफ्ट देणार.मेरीने आईला विचारलं” ममा,खरंच का ग इतक्या लांबून मुलांना भेटायला येतो ख्रिसमस बाबा?मला भेटेल तो?मी सांगेन मग त्याला , मला माझे पपा  आणून दे परत .बाकी नको   मला काही.’रोझीच्या डोळ्यात पाणी आलं.तिने आज मेरीला आवडतात म्हणून केक आणले होते.जा मेरी ,शेजारी मायकेल अंकलला नेऊन दे.’मेरीने मायकेलला डिश नेऊन दिली.मायकेलने हे सगळं संभाषण ऐकलं होतं.फार वाईट वाटलं त्याला.मनात एक विचार आला त्याच्या. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून मेरी बघते तर तिच्या उशाशी छान पुस्तकं एक  बाहुली आणि थोडा खाऊ होता.मेरीला इतका आनंद झाला.’ममा कधी ग आला नाताळ बाबा?कधी ठेवल्या त्याने या गिफ्ट्स?का माझे पपा येऊन ठेवून गेले?’रोझीही आश्चर्यचकित झाली.पण लेकीच्या आनंदात तीही सहभागी झाली.ते चिमुकलं घर आनंदाने  भरून गेलं.दुरून बघणाऱ्या मायकेलच्या डोळ्यात  आनंदाश्रू आले.आपण आता या लेकरासाठी एवढं दर वर्षी करायचंच असं त्याने मनाशी ठरवलं.हे रोझीला समजलं असतं तर तिला आवडलं नसतं. तिच्या  स्वाभिमानाला धक्का लागला असता. रोज शाळा सुटली की ममा येईपर्यंत मेरी पायरीवर बसे.शेजारी मायकेल अंकल कधीकधी येऊन बसत.तिला  छान गोष्टी सांगत.तिचा अभ्यास घेत.

आजोबांसारखा एक दोस्तच मिळाला मेरीला.मेरी वरच्या वर्गात उत्तम मार्क्स मिळवून जात होती.अजूनही दर वर्षी ख्रिसमस ला तिला हव्या त्या गोष्टीअचूक कोण ठेवून जातं हे तिला समजलं नव्हतं.कितीवेळा ती जागत बसायची पण नेमकी तिला पहाटे झोपच लागून जायची. मेरी मोठी होत होती. आता सांता क्लॉज चे फारसे नाविन्य राहिले नव्हते तिला.पण दर वर्षी  बरोबर पंचवीस डिसेंबरला येणारी   छोटी मोठी भेट वस्तू मात्र येतच राहिली.मेरीला बारावीत सुंदर मार्क्स  मिळाले. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला मेरिट वर प्रवेश मिळाला तिला.रोझीला अत्यानंद झाला.पण ही फी तरी तिला कुठे परवडणार होती?’ममा, फक्त चार वर्ष ग.आपण कशीही काढू.पण यावेळी मला नाही म्हणू नको ना.  मी  स्कॉलरशिप साठी प्रयत्न करीन.चर्च थोडी फी भरेल पण मी मेडिकलला जाणारच.’मेरीचा निर्धार कायम होता. पहिल्या वर्षाची फीची सोय झाली.मेरी त्यावर्षी कॉलेजमध्ये पहिली आली. त्या वर्षी पुढची फी माफ झाली तिला.पण बाकीचे खर्च आ वासून उभेच होते.पुस्तकं इतकी महाग होती  आणि काहीकाही तर विकत  घ्यावी लागणारच होती.मेरी आणि रोझी चिंतेत पडल्या.लायब्ररीत त्या पुस्तकावर इतके क्लेम्स होतें की मेरीला ते मिळणे अशक्यच वाटलं. बरं स्वस्त नव्हतं ते पुस्तक. काही  पौंडस मध्ये होती किंमत त्याची.  मेरीने जुनं कोणाचं मिळतं का म्हणून कॉलेज बोर्डवर नोटीस लावली.तिला मुळीच अपेक्षा नव्हती कोणी प्रतिसाद देईल.चार दिवसांनी तिला उत्तर मिळाले, माझ्याकडे आहे हे.येऊन घेऊन जा.’अत्यानंदाने मेरी त्या नोटीस लिहिणाऱ्या मुलाला भेटूनआली. रॉबिन नाव होतं त्याचं. तो मेरीच्या पुढे दोन वर्षे होता आणि म्हणाला’अग, चुकूनच हे राहिलं माझ्याकडे. माझीपुस्तकं मी मागच्या मुलांना देऊन टाकतो.मेरी म्हणाली,मला दर वर्षी विकत देत जाशील का?मी निम्मे पैसे देऊन घेईन सगळी.मला फार गरज आहे रे.पण मी बुडवणार नाही तुझे पैसे.’रॉबिनला  ही गरीब हुशार मुलगी मनापासून आवडली.अग, विकत काय?तशीच नेत जा.मला काही कमी नाही आणि तुला उपयोग होत असेलतर मला आनंदच होईल मेरी.’रॉबिन ने तिला आपली जर्नल्स पण दिली.

अत्यानंदात मेरी घरी आली.त्या 25 डिसेंबर ला तिच्या उशाशी पुढच्या फी इतके पौंड्स होते. मेरीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.हा कोंण देवदूत हे करतो याचे कोडे तिला सुटले नाही.शेजारच्या मायकेल अंकलला ती घडलेली प्रत्येक गोष्ट सांगत असे.तेच एक जिवलग होते तिला.दुसरं होतंच कोण?  आणि मायकेल अंकल ती सांगेल ते सगळं ऐकून घेत.ती म्हणाली,’ अंकल मला आयुष्यात एकदा तरी या सांताक्लॉज ला भेटायचं आहे.त्याचे आभार मानायचे आहेत हो.’मायकेल अंकल हसले आणि म्हणाले,तुझी इच्छा आहे ना?मग होईल ही पण पूर्ण.’ मेरी उत्कृष्ट ग्रेडस् मिळवून डॉक्टर झाली. आयर्लंडच्या एका विख्यात हॉस्पिटलमध्ये तिला जॉब मिळाला.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “हे दान देऊ कसं ?” – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “हे दान देऊ कसं ?” – भाग – २ श्री संभाजी बबन गायके 

(पण भिकारी? नको रे देवा ! पण आयुष्य थांबलं नाही…वीस वर्षे निघून गेली.) इथून पुढे —

“आत ये!” तिने त्याला विनवलं. “नाही येता यायचं…घरात!” त्याने निर्धारानं सांगितलं. “तु फक्त भिक्षा दे झोळीत…निघायचं आहे पुढच्या गावाला.” त्याच्या आवाजात कोरडेपणा होता कमालीचा. संन्यस्त धर्म स्विकारल्यावर जन्माचं नाव आणि गाव,घर त्यागावं लागतं.

“मी नाही देणार तुला भिक्षा तु घरात आल्याशिवाय.!” ती म्हणत राहिली. त्याच्यामागे उभा असलेला म्हातारा संन्यासी पुढे झाला आणि म्हणाला,”माई,आईनं भिक्षा दिल्याशिवाय संन्यासदीक्षा पूर्ण होत नाही संन्याशाची! नको अडवू याची वाट!” “आमच्या मेळ्यात कसा पोहोचला माहित नाही हा पोरगा…पण म्हणाला बैरागी व्हायचंय तुमच्यासारखं!” “आम्ही म्हणालो, विचार कर. सोपा नाही हा मार्ग. सारंकाही सोडावं लागेल. तर म्हणाला, सोडण्यासारखं सोबत नाहीच आहे काही!” मग आमचाही नाईलाज झाला. आला तेंव्हा मिसरूडही फुटलं नव्हतं नीटसं. आमच्यासोबत राहिला,सेवा केली आमची. पण नाव,गाव सांगत नव्हता. आठवत नाही म्हणाला” म्हातारा बैरागी सांगत होता.

तो तरूण आणि तो म्हातारा मग घरासमोरच्या पारावर जाऊन बसले. शेजारच्या गावात खबर पोहोचली आणि त्याची मोठी बहिणही धावत आली…भावाला पाहायला. ती त्याच्या गळ्यात पडली तसं त्याने तिला दूर सारलं…”दूर रहा,माई!” तो म्हणाला! बघणा-या महिलांनी डोळ्यांना पदर लावले. पुरूषांनी सुस्कारे सोडले आणि ते स्तब्ध उभे राहून नुसते पहात राहिले. त्यांना माहित होते की आता उशीर झालाय…हा आता परत येणार नाही संसारात.

आई म्हणत राहिली…इथंच रहा…तुला हवं ते कर देवाचं. मी आडवी येणार नाही…फक्त माझ्या नजरेसमोर रहा….माझे डोळे मिटून जाईपर्यंत !

त्याने हातातलं सारंगी वाद्य पुढे घेतलं आणि तारा छेडल्या…एक दीर्घ आलाप घेतला. तिनेही हे गाणं शेकडोवेळा ऐकलं होतंच…पण आज त्यातला अर्थ तिला उमगता उमगता टोचणी लावून जात होता. राजा गोपीचंद…विशाल स्नानकक्षात प्रात:स्नानासाठी सोन्याच्या चौरंगावर बसलेला आहे. त्याच्या अनेक पत्नी,दासी मंगलस्नानाची तयारी करताहेत. तरूण,सुंदर,रूबाबदार गोपीचंद…त्याची आई मैनावती राजप्रासादाच्या एक मजल्यावरून खालचे हे दृश्य पहात उभी होती. तिचा पती अगदी असाच दिसायचा…पण अकाली मृत्यूने त्याला खाल्लं होतं. गोपीचंदही असाच संसारसुखात रममाण होत होत एकेदिवशी मरणाचा उंबरठा ओलांडून जाईल…काही अर्थ नाही या उपभोगांमध्ये! त्यापेक्षा यातून लवकरात लवकर विरक्त झालेलं बरं. मैनावती गुरू गोरखनाथांचा उपदेश आठवत आठवत गोपीचंदाकडे पहात होती. तिच्या डोळ्यांतून टपकलेले गरम अश्रू तिच्या गालांवरून ओघळून नेमके खाली पडले ते गोपीचंदाच्या अंगावर. तो चमकला. त्याने मैनावतीचे मनोगत जाणून घेतले. आणि संन्यासधर्म स्विकारण्याचा पक्का निर्धार केला. हे इतरांसाठी प्रचंड धक्कादायक असंच होतं. गुरू गोरक्षनाथांनी गोपीचंदला दीक्षा देताना अट घातली की स्वत:च्या घरून भिक्षा मागून आण तरच तु संन्यासी होऊ शकशील….त्याने ती अट पाळली आणि वैराग्याची वाट चालू लागला!

पण मी तर मैनावती नाहीये ना? मला माझा मुलगा हवाय…त्याचा संसार बघायचाय…नातवंडं मांडीवर खेळवायचीयेत…मी नाही ना याला भिक्षा देऊन संन्यासी होऊ देणार! गाण्यातल्या भर्तृहरी आणि गोपीचंदाच्या कथा ऐकता ऐकता ती मनाशी झुंजत होती….पण ती जिंकू शकली नाही!

“माई,तु नाही भिक्षा घातलीस तर माझं जीवन अपुरं राहील. मी आधी तुझ्या एकटीचाच मुलगा होता..आता हे सारं जगच माझं आई झालं आहे..नको अडवूस मला” तो म्हणत राहिला…गर्दी वाढत गेली..वेळ पुढे सरकत राहिली. “उशीर होईल पुढच्या मुक्कामाला पोहोचायला…आणि अजून झोळी रिकामीच आहे..माई!” त्याने निर्वाणीचं सांगितलं!

तिने थरथरत्या हातांनी त्याच्या झोळी दाणे घातले आणि त्याच्या पायांवर कोसळली…”पुन्हा या स्वामीजी…यापुढे भिक्षेला नाही म्हणणार नाही!” ती म्हणाली. त्याने उजवा हात उंचावून आशीर्वाद दिला आणि तो पुढे निघाला….ती त्याच्या मागे चार पावलं चालून थबकली…आपण तर काही या मार्गावर जाऊ शकणार नाही!…तो वळणावर दृष्टीआड होईपर्यंत ती हात जोडून उभी होती…तिला तिच्या संसारात पुन्हा परतावंच लागणार होतं!

(ही नुकतीच घडलेली सत्यकथा. वीस वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा असा अचानक आईसमोर संन्यासी बनून उभा राहिला तेंव्हा त्या आईच्या हृदयाची काय अवस्था झाली असेल? पण असे झाले खरे. आणि असे अनेकवेळा घडलेलेही आहे. खाऊन, पिऊन घ्या, मजा करा कारण आपण उद्या मरणार आहोत! असा काहीसा पाश्चात्य विचार. तर हे खाणं, पिणं, मजा एक ना एक दिवस संपून जाणार आहे, यात गुंतून राहून कल्याणाचा मार्ग विसरून जाऊ नका…आपण कधीही मरून जाऊ शकतो.. त्याआधी अध्यात्माचा विचार करा,वैराग्याचा विचार करा असं काहीसं सांगू पाहणारी आपली संस्कृती. अर्थात हा ज्याचा त्याचा विचार. कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे मालक असणारे जैन तरूण तरूणी का बरं सर्वसंगपरित्याग करून साधुत्वाचा मार्ग अनुसरत असतील? का बरं सर्व ऐहिक सुखांचा त्याग करून काहीजण वैराग्याचा मार्ग जवळ करत असतील? जगाला मायाजाळ म्हणावे की मायाजळ? असो. जे भावलं ते मांडलं शब्दांत. 

– समाप्त  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print