मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘बा…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ ‘बा…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

हिंदुजा हाॅस्पिटलमध्ये एका नातेवाईकाला भेटून अंजली बाहेरच्या दिशेनं भराभर निघाली होती. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ती तिथं आली होती आणि आता सात वाजून गेले होते.  ठाकुर्लीला घरी पोचायचं म्हणजे

साडेआठ तरी होणार या विचारात तिची पावलं वेगानं पडत होती. त्यामुळे आजूबाजूला बसलेल्या लोकांकडे तिचं  लक्ष नव्हतं. पण कशी कोण जाणे तिची नजर बाजूला उभ्या असलेल्या एका बाईकडे गेली आणि ती क्षणभर  थबकली. गुजराती साडी नेसलेल्या त्या बाईचा चेहरा एकदम ओळखीचा वाटला, पण नेमकं कुठे पाहिलंय तिला हे काही आठवत नव्हतं. त्या बाईच्या चेहऱ्यावरही ओळखीचे भाव उमटले आहेत असं  वाटलं,

पण उलगडा होत नव्हता.

तेवढ्यात ती बाईच म्हणाली, दादर स्टेशनलाच जाणार ना, चला सोबतच जाऊ. मी रोज सकाळी बघते ना तुम्हाला ठाकुर्ली स्टेशनवर. आणि अंजलीची ट्यूब पेटली. रोज सकाळी ती ९.०२ ची लोकल पकडायला ठाकुर्ली स्टेशनला दोन नंबर प्लॅटफॉर्मवर यायची, तेव्हा एक नंबर प्लॅटफॉर्मवर

लेडीज फर्स्टक्लास समोरच्या बाकावर ही बाई बसलेली असायची. तिच्या बाजूला तिचा मुलगा वाटेल असा एक पुरूष उभा असायचा. काही वेळा ही बाई  हळू आवाजात काहीतरी बोलत असायची त्याच्याशी, पण एकतर ती  गुजरातीत बोलत असायची आणि अंजली गाडी पकडण्याच्या घाईत, त्यामुळे ती दोघं काय बोलतात, हे कधी कळण्याचा प्रश्नच नव्हता आणि अंजलीला त्याच्याशी काही देणं – घेणंही नव्हतं.

बाई तशी सज्जन, घरंदाज वाटत होती. दादर पर्यंत टॅक्सीनं  सोबत जायला अंजलीची काही हरकत नव्हती.

म्हणून दोघी टॅक्सीनं दादरला आल्या. त्या बाईनं उतरताना पटकन टॅक्सीचे पैसे दिले, तशी अंजलीला संकोच वाटला. तिनं निदान अर्धे पैसेतरी घ्यावे, म्हणून अंजलीनं सुचवलं.’ राहू दे ना बेटी,’ असं म्हणत तिनं हातानं अंजलीला थोपवलं, तसं अंजलीचा नाईलाज झाला. प्लॅटफॉर्मवर समोरच दादर – कल्याण गाडी उभी होती. ठाण्यानंतर ती स्लो असल्याने अंजलीला ठाकुर्लीला उतरायला सोईचीच होती. तिच्या पाठोपाठ ती गुजराती बाईही लेडिज फर्स्टक्लासमध्ये चढली आणि अंजलीच्या समोरच्या सीटवर बसली. ऑफिस टाईम उलटून गेल्याने गाडीला गर्दीही बेताची होती.

त्या बाईनं अंजलीला विचारलं कोण अ‍ॅडमिट आहे हाॅस्पिटलमध्ये? तसं अंजलीनं आपल्या चुलत काकांची बायपास शस्त्रक्रिया झाली असल्याचं सांगितलं. तिनंही मग साहजिकच त्या बाईंची चौकशी केली.’  हं, कोण म्हणून सांगू बेटा? म्हटलं तर मुलगा, म्हटलं तर काहीच नातं नाही. ऋणानुबंधाच्या गोष्टी आहेत बेटा या.’ अंजलीच्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव आणि उत्सुकता बघून त्यांनी बोलायला सुरुवात केली.

त्यांचं नाव हंसाबेन जयंतीलाल जैन असं होतं. त्यांची अंबरनाथ ते ठाणे परिसरात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची सात-आठ दुकानं होती. त्यांचे पती आणि दोन्ही मुलं हा सगळा व्याप सांभाळत होते. डोंबिवलीत, ठाकुर्लीला त्यांचा स्वतःचा प्रशस्त बंगला होता. दोन्ही मुलं, सुना, नातवंडं असा मोठा परिवार होता. लग्न झालेली मुलगी पलक, नाशिकला होती.

बेटी, या पलकचं आणि रितेशचं लग्न ठरलं होतं. रितेशचं कुटुंब अहमदाबादचं. तिथे त्यांचा कापडाचा मोठा धंदा होता. पण रितेशच्या बाबांनी स्वतःच्या मर्जीने प्रेमविवाह केला, म्हणून घरातल्यांनी त्यांना घरातून आणि धंद्यातूनही बेदखल केलं. रितेशची आई गुजरातीच, पण गरीब घरातली होती. तिला सासरच्यांनी स्वीकारलं नाही. म्हणून रितेशचे आई-वडील सुरतला आले आणि त्यांनी तिथं कापड व्यवसायात आपलं बस्तान बसवलं. काही वर्षांनी तिथंच मोठं घरही बांधलं. रितेशला कापड धंद्यात रस नव्हता. त्याला ज्वेलरीच्या धंद्याचं आकर्षण होतं. बारावी झाल्यावर नशीब आजमावायला आणि या धंद्याचा अनुभव घ्यायला तो मुंबईत आला. सुरतच्या जयंतीलालच्या कोणा नातेवाईकाच्या ओळखीने तो जयंतीलालजींच्या व्यवसायात पगारी मदतनीस म्हणून काम करू लागला. डोंबिवलीत भाड्याचं घर घेऊन राहण्याचा त्याचा विचार होता. पण जयंतीलालजींचा बंगला भरपूर मोठा होता. त्यांनी त्यातलीच एक खोली रितेशला राहायला दिली. त्याचं जेवणही या कुटुंबातच होत होतं. एवढ्या दहा जणांच्या कुटुंबात एक माणूस काही जड नव्हता.  हंसाबेनही रितेशला आपल्या मुलांसारखंच वागवत होत्या.

हळूहळू रितेश धंद्यात पारंगत झाला. तोआता स्वतःचं दुकान काढण्याची तयारी करत होता. भांडवल जमा करत होता. त्याला हिऱ्यांची विशेष पारख होती, हे जयंतीभाईंच्या लक्षात आलं होतं आणि त्याचं त्यांना कौतुकही वाटत होतं.

पलकचंही शिक्षण बारावीपर्यंत झालं होतं. मग तिनं ज्वेलरी डिझाईनचा कोर्स केला होता. घरच्याच व्यवसायात आपल्या कौशल्याचा उपयोग ती करू लागली होती. तिने डिझाईन केलेल्या दागिन्यांना लोकांची पसंती मिळत होती आणि मागणी वाढत होती.

तिच्या लग्नाच्या दृष्टीने हंसाबेनची मुलांची चाचपणी करायला सुरुवात केली होती. रितेशचा विचार करायला काय हरकत आहे, असं हंसाबेनच्या डोक्यात आलं आणि त्यांनी तसं आपल्या नवर्‍याला सुचवलं देखील.

रितेशच्या एकूण प्रगतीवर जयंतीलाल खूष होतेच. तेव्हा रितेशशी आधी बोलून मग त्याच्या आई-वडिलांशी बोलायचं त्यांनी ठरवलं.

इकडे एकाच घरात राहात, संपर्कातअसल्याने, हंसाबेनची पलक आणि रितेशही एकमेकांना आवडू लागले होते. त्यामुळे रितेशच्या पसंतीचा प्रश्न सहज सुटला. रितेश त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा.त्यामुळे त्याच्या पसंतीला ते हरकत घेणार नव्हतेच. शिवाय पलकला नाकारण्यासारखं काही नव्हतंच. तिचं दिसणं, वागणं-बोलणं सारंच लाघवी होतं. शिवाय व्यवसायाचं ज्ञानही रितेशच्या धंद्यात उपयोगी पडणार होतं. आता फक्त मुहुर्त काढायचाच अवकाश होता. पण आपण ठरवतो एक आणि होतं भलतंच, तसंच झालं बघ!

लग्नानंतर आई-वडिलांनी आपल्या सोबत राहावं अशी रितेशची इच्छा होती. त्यांनाही त्यात आनंदच होता. त्यांचे बाकीचे नातेवाईक आधीच  दुरावलेले होते. आपला तिथला व्यवसाय बंद करून रितेशसोबत

राहायला येण्याचं त्यांनी आनंदानं मान्य केलं होतं. रितेशही त्या दृष्टीने डोंबिवली – ठाणे परिसरात घर आणि दुकानासाठी जागा शोधत होता.

मार्च २००३ची गोष्ट आहे ही!  सुरतचं आपलं दुकान विकून ते पैसे घेऊन रितेशचे आई-बाबा इकडे यायला निघाले.  संध्याकाळी मुंबई-सेंट्रलला उतरून टॅक्सीने ते दादरला आले आणि तिथून ठाकुर्लीला  येण्यासाठी त्यांनी दुसरी ट्रेन पकडली.  सुरतचा रितेशचा एक मित्र पण  त्यांच्यासोबत होता. त्याला दादरला जायचं होतं. त्यानेच त्यांना दादरला गाडीत बसवून दिलं आणि दुकानात फोन करून आई-बाबा येत असल्याचं  रितेशला कळवलं होतं. म्हणून पलक आणि रितेश दोघंही त्यांना घ्यायला ठाकुर्ली स्टेशनवर येऊन उभे राहिले. पण नशिबाने डाव साधला. मुलुंड स्टेशनला त्यांची ट्रेन पोचत असतानाच त्या गाडीत बाॅम्बस्फोट झाला. रितेशचे आई-वडील त्यातच गेले.

देह इतके छिन्न विच्छिन्न झाले होते की ओळख पटवणंही मुश्किल होतं.

रितेशच्या मित्राला बाॅम्बस्फोट झाल्याचं कळलं आणि दुसर्‍या दिवशी सकाळी तो डोंबिवलीला आला. त्याच्या मदतीनेच  कपड्यांच्या अवशेषावरून  रितेशच्या आईबाबांची कशीबशी ओळख पटली.

या प्रसंगाने रितेशला जबरदस्त मानसिक धक्का बसला. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याला आई-वडिलांशिवाय कोणंच नाही ना! त्याची स्मृती नष्ट झाली. तो फक्त मला बा म्हणून मिठी मारायचा आणि विचित्र रडायचा. माझा हात घट्ट धरून ठेवायचा. बाकी कोणालाच तो ओळखेना. तीन-चार वर्षे त्याच्यावर उपचार चालू होते. त्यानंतरही त्याची स्मृती परत आली नाही. तो ठीक होईल का नाही याबाबत डाॅक्टरही निश्चित सांगू शकत नव्हते. आम्ही त्याच्या काका वगैरेंना शोधून, संपर्क करून, सर्व परिस्थिती सांगितली, पण त्यांनी जराही आपुलकी दाखवली नाही, या पोरक्या मुलासाठी. मग आम्हीच त्याला सांभाळायचं ठरवलं. बाम्हणून गळ्यात पडून रडणार्‍या लेकराला मी कसं दूर करणार? आईचं ह्रदय आहे ना माझं, लेकराचं दुःख जाणणारच ना?

पलकची कशीबशी समजूत घालून आम्ही तिला लग्नाला तयार केलं आणि सगळी खरी हकीकत सांगून

नाशिकच्या शहा कुटुंबात तिचं लग्न करून दिलं. तिचं सगळं आता मार्गी लागलंय.

रितेशवर उपचार करण्यात आम्ही कोणतीच कसर ठेवली नाही. मोठमोठे न्यूरोसर्जन झाले, मानसोपचारतज्ज्ञ झाले. देवधर्म, नवस, कोणी काय सांगेल ते सगळं केलं. असंच एका मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं म्हणून मी त्याला ठाकुर्ली स्टेशनवर घेऊन गेले. जिथे मी रोज सकाळी तुम्हाला दिसते ना तिकडे तो मला ओढत घेऊन गेला. तिथे बसून खूप ओक्साबोक्शी रडला मला मिठी मारून! नंतर कसंबसं दादापुता करून मी त्याला घरी घेऊन गेले. पण त्या दिवसानंतर त्याचं रडणं- ओरडणं हळूहळू कमी झालं.बोलत काही नव्हता, पण मी दिलेलं शांतपणे खायला लागला. औषधही कटकट न करता घ्यायला लागला, पण मी दिली तरच! बाकी कोणाला जवळ फिरकू देत नसे की कोणाचं काही ऐकत नसे. मी लहान लेकरासारखं त्याला सांभाळलं.माझी सत्त्वपरीक्षाच होती. तो झोपल्याखेरीज मला इतर काही करताच यायचं नाही. मग मी रोजच सकाळी त्याला ठाकुर्ली स्टेशनला घेऊन येऊ लागले. एकदा सकाळी तिथे नेऊन आणलं की दिवसभर तो शांत राहतो.

औषधांचा उपयोग म्हणा की आणखी काही! पण हळूहळू तो कामापुरतं बोलू लागला, म्हणजे जेवण दे, आता झोपतो वगैरे. त्याला मागचं काही आठवत नाही. पण आता स्वतःचं स्वतः व्यवस्थित करतो. यांच्यासोबत दुकानात जाऊन  नुसता शांतपणे बसून राहतो. पण आता आमचंही वय वाढतंय. हे सगळं कुठवर झेपणार?

आता जर्मनीतून कोणी न्यूरोसर्जन आणि मानसोपचार तज्ज्ञ आले आहेत हिंदुजा हाॅस्पिटलमध्ये . त्यांनी खूप विचित्र पेशंटना बरं केलं आहे. आम्ही रितेशला आधीही इथे ट्रिटमेंटसाठी नेलं होतं. इथले डाॅक्टर्स त्याच्या केसचा अभ्यास करत आहेत. त्यांनीच या विशेषज्ञांना बोलावून घेतलं आणि आम्हाला कळवलं.  चोवीस तास एक नर्स असतेच. डाॅक्टरही येऊन-जाऊन असतात. शिवाय माझ्या घरच्यांनाही माझी काळजी वाटते ना.रात्रीचं मला इथे थांबू देत नाहीत. आणि त्यांनाही थोडावेळ दिला पाहिजे ना मी? म्हणून संध्याकाळी घरी परत जाते. सकाळी लवकर उठून इथे येते. दोन दिवसांपूर्वी रितेशला इथे अ‍ॅडमिट केलंय. बघू त्याला काही फायदा होतो का?

पण माझं  आईचं वेडं मन एकीकडे असंही म्हणतं की त्याला काही आठवत नाही तेच बरंय ना? सगळं आठवलं तर माझं लेकरू हे दुःख पेलू शकणार नाही ग! आणि त्यातून त्याला सावरायला माझी ताकदही पुरी पडेल की नाही कोणजाणे. हंसाबेनच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.

ऐकता ऐकता अंजलीचेही डोळे भरून आले होते. कोणावर कधी काय वेळ येईल, खरंच सांगता येत नाही.

बाहेर बघण्याच्या बहाण्याने तिने आपले अश्रू पुसले आणि तेवढ्यात  ठाकुर्लीचा बोर्ड तिला दिसला, गाडी स्टेशनात शिरून थांबत होती.

गाडीतून उतरताना तिने अगदी सहजपणे हंसाबेनचा हात धरून त्यांना उतरवलं आणि मनोमन या बाला साष्टांग नमस्कार घातला.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग ३ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

?जीवनरंग ?

☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग ३ ☆ सौ अंजली दिलीप गोखले

तिकडे सुश्रिया झाडाच्या फांदीवर बसून मस्त झोके घेत होती. तिथून तिला स्वयंपाकघरात काम करणारी आई दिसत होती. तिची स्वयंपाक करायची गडबड सुरू होती. सुश्रिया पंख पसरून मस्त भरारी मारून आली. हिरवी हिरवी झाडं, त्यावरची रंगीबेरंगी नाजूक नाजूक फुलं तिला खूप आवडली. तिच्या पलीकडच्या फांदीवर एक पक्षी चोचीनं किडा खात होता. ईऽऽई सुश्रिया मनात म्हणाली. आपण आता किडे खायचे? पटकन ती आपल्या घराच्या खिडकीजवळच्या फांदीवर आली. आईच्या पोळ्या करून झाल्या होत्या. आता तिच्या आवडीच्या काचर्या करत होती. सुश्रियाच्या पोटात आता कावळे ओरडायला लागले. अं! आता मो आत कशी जाणार? पोळी कशी खाणार? सुश्रियाला रडायला आलं. तेवढ्यात आई म्हणाली, “ए सुश्रिया, इतकं वाकडं रडवेलं तोंड करून का बसलीस? ये बरं पटकन पोळी खायला.” सुश्रियानं डोळे किलकिले करून पाहिले. अरेच्चा! पुस्तक वाचता वाचता डुलकी लागली अन् स्वप्न पडले की काय? बरे झाले, आपण पक्षी नाही ते!”

दुसर्या दिवशी सगळ्यांनी आपले मनोगत वाचून दाखवले. बाई एकदम खूष! “शाब्बास मुलांनो, सगळ्यांनी छान लिहीलंय आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना आपण मानव असल्याचे महत्त्व समजलंय. हो ना! आता एक मुलगा म्हणून, मुलगी म्हणून तुमच्याकडे जे सुप्त गुण आहेत ते ओळखून ते वाढवण्याचा प्रयत्न करा. कसं ते बघा हं, आर्यनकडे घोड्यासारखी चपळता आहे. त्याचा उपयोग त्याने बॅडमिंटन सारख्या खेळात करून शाळेला, राष्ट्राला आणि देशाला बक्षीस मिळवून द्यायचं, देशाचं नाव उज्ज्वल करायचं. अवनी, सुश्रियाला उडायला आवडतं, त्यांनी त्यांना जे करायला येतं, आवडतं, त्यामध्ये उंच भरारी घ्यायची. राधानं मनीमाऊ सारखं नुसतं झोपायचं नाही, तर जे करायचं ते तल्लीन होऊन, एकाग्रचित्तानं करायचं.  ती गाणी छान म्हणते, पेटी वाजवते. ते चांगल्यात चांगलं करायचं. रमाला वाचायला आवडते ना, तिने मोठ्या लोकांची, शास्त्रज्ञांची चरित्रे वाचायची आणि खूप अभ्यास करून पहिला नंबर मिळवून शास्त्रज्ञ व्हायचं, शोध लावायचा आणि आमचा ऑल राऊंडर अथर्व इतका हुशार आहे, त्याच्याकडे इतकी शक्ती आहे की तो काहीही करू शकेल. बाॅडी बिल्डर होईल, क्रिकेटीयर होईल किंवा डाॅक्टर, इंजिनियरसुद्धा बनेल. तुम्ही सगळी मुलं खूप हुशार आहात. त्या हुशारीचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करा आणि आपल्या शाळेला, देशाला खूप मोठ्ठं करा. ठीक आहे? आता आपण उद्या भेटू.”

सगळ्यांचे मोबाईल बंद झाले. पण प्रत्येकाच्या डोळ्यांपुढे खूप मोठ्ठं होण्याचं स्वप्न दिसत होतं.

 – समाप्त –

© अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग २ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

?जीवनरंग ?

☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग २ ☆ सौ अंजली दिलीप गोखले

आपले दोन्ही हात उंचावत अथर्व ओरडला, “हेऽऽ किती छान. आजी, आई आता मला कोणी डिस्टर्ब करू नका हं. बाईंनी सांगितलंय त्याचा मी विचार करणार आहे” आणि हाताची घडी घालून डोळे मिटून विचार करायला लागला. प्रत्येकाच्या घरी तीच अवस्था. अथर्वला वाटलं, खरंच मी हत्तीचं पिल्लू झालो तर मला क्रिकेट खेळता येईल का? प्रत्येक बाॅलला सिक्सर हाणीन. वाॅव केवढा स्कोअर होईल माझा. सचिन आणि कोहलीपेक्षा जबरदस्त! पणऽ पण हत्ती झालो तर ह्या घरी कसं राहता येईल मला? आई, बाबा, आजी कसे भेटतील? माझ्या बर्थडे ला आई केक कसा देणार? बाबा नवीन शर्ट कसे आणतील? नको रे बाबा, मी आहे तो अथर्वच चांगला.

तिकडे रमाही स्वप्नामध्ये रमली. “आहाऽऽ मासा झाले तर मला सारखे पोहायला मिळेल. पाण्यातले इतर मासे माझे मित्र-मैत्रिण होतील. ओऽ पण खायचे काय? आईनं इडली, लाडू केले तर मला कसे खायला मिळणार? आणि पाण्यात सारखं राहून सर्दी झाली तर? ताप आला तर? नको रे बाबा, कोरोनाचं संकट नकोच आपल्याला. त्यापेक्षा बाबा सांगतात तसे घरी राहू आणि स्वस्थ राहू. शिवाय गाणी म्हणता येणार नाहीत. पुस्तकं वाचायला मिळणार नाहीत. नको बाई, मी आपली रमाच बरी.”

आर्यनच्या डोळ्यांपुढे सगळ्या हायस्पीड गाड्यांपुढे आपण पांढराशुभ्र घोडा होऊन सुसाट धावतोय, हे चित्र दिसायला लागले. क्षणात त्याच्या मनात विचार आला, ओऽ, पण दमल्यावर खायचे काय? ओन्ली ग्रीन ग्रास?! ओ, नो नेव्हर! पटकन त्याने आपल्या पळत्या पायांना ब्रेक लावला. नको रे बाबा, घोडा झालो तर नो बॅडमिंटन, नो स्कूल आणि हो, त्या आजी-आजोबांकडेही जायला मिळणार नाही. तिकडे झाडावर चढता येणार नाही. धमाल करता येणार नाही. आपले फ्रेंड्स भेटणार नाहीत. आपण घोडा झालो तर आई रडेल, बाबा कुठे शोधतील? नाना-नानी किती काळजी करतील? आपण आहोत तसेच चांगले आहोत.”

राधाही खुशीखुशीत आपल्या अंगाचं वेटोळं करून आपलं मऊ मऊ पांढरं शुभ्र अंग चाटत मनीमाऊ होऊन कोपर्यात बसली. पटकन डोळे मिटून गेले आणि झोपही लागली तिला. थोड्या वेळानं काठी घेऊन आई आली आणि “शुक शुक, जा गं मने” म्हणून तिच्यावर उगारली. “म्याऊ, नको गं आई, मारू नको मला” म्हणून रडायला लागली. आईनं हलवून जागं केलं राधाला. “राधा, उठ आज बाईंना लिहून द्यायचंय ना? उठ” “ओऽ म्हणजे मी राधाच आहे तर. देवा, मला राधाच राहू दे हं! मनी माऊ नको.” म्हणत राधा उठली.

खिडकीतून टक लावून बाहेर बघत असलेली अवनी एकदम सुंदरसे फुलपाखरू होऊन या फुलावरून त्या फुलावर भिरभिर उडायला लागली. आपले नाजूक नाजूक रंगीबेरंगी पंख तिला खूप आवडले. आऽहाऽ किती छान वाटतंय. फुलांवर अलगद बसायला मस्त वाटतं, पण गुलाबाच्या झाडाचा टोकदार सुईसारखा काटा बोचला तर? पंख फाटला तर? बापरे, काय करायचे? घरी कसे जायचे? अरेच्चा, आजीने आपल्याला बिस्कीटे बरणीत भरायला सांगितलीत ना? पण आता तर हात नाहीत! कशी भरू बिस्कीटं? “आगं अवनी, किती तंद्री लावून बसलीस! एक काम आजीचं करत नाहीस.” आई पाठीत धपाटा घालत म्हणाली. भानावर येत अवनी आपल्या हातांकडे पाहात हसत म्हणाली, “अगं, नो प्रॉब्लेम, भरते मी आता. बागेत उडून आले गं जराशी, पण पुन्हा नाही हं जाणार.” अवनीच्या या असल्या येडपट बोलण्याकडे आई आश्चर्याने पाहातच राहिली.

क्रमशः…

© अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग १ ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

?जीवनरंग ?

☆ स्वप्न – मोठं होण्याचं… – भाग १ ☆ सौ अंजली दिलीप गोखले

पिंजर्यात कोंडलेल्या प्राण्यांप्रमाणे या वर्षी सगळ्या मुलांची अवस्था झाली होती. सारखे सारखे घरी बसून कंटाळा आला होता. गणपती आले आणि गेले सुद्धा! मुलांना काॅलनीमधल्या, बिल्डींगमधल्या गणपतीबाप्पाची आरती मनसोक्त करायला मिळालीच नाही. प्रसादाच्या खाऊची गंमत नाही की कुठली स्पर्धा नाही. बाप्पा घरी गेल्याबरोबर घरी बसून ऑनलाईन शाळा सुरू.

अथर्वनं आज ठरवलंच होतं, बाईंना आज काही म्हणजे काही शिकवू द्यायचं नाही. काहीतरी वेगळं करायचं. मोठ्या उत्साहात तो स्क्रीनसमोर बसला. वर्गातली सगळी मुलं दिसल्यावर बाईंनी बोलायला सुरूवात केली. “मुलांनो, आज तुम्हाला असं वाटतंय ना गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हालाऽ” “नको तो अभ्यास, नको ते शिकणे”. अथर्व जोरात ओरडला, “होऽय. नकोच आहे अभ्यास.”

आई-बाबांनी आणि आजींनी चमकून अथर्वकडे पाहिलं. आज काय झालं याला? एवढा जोरात का ओरडतोय? तेवढ्यात तिकडे बाई पण जोरात म्हणाल्या, “आज मुळी नाहीच करायचा अभ्यास.” सगळी मुलं खुष. अथर्वच्या चेहर्यावर आनंद पसरला. बाई आता काय सांगताहेत, याकडे मोठ्ठे डोळे करून तो पहायला लागला आणि मनापासून ऐकायला लागला. बाई म्हणाल्या, “तुम्ही सगळ्यांनी उद्या मला, तुम्हाला आपण काय असतो तर आवडलं असतं, ते सांगायचं. म्हणजे बघा हं, अवनीला वाटतं, मी फुलपाखरू असायला पाहिजे होतं. रमाला वाटतं, मी पाण्यातला मासा असते तर किती छान झालं असतं. आर्यन सांगेल तो घोडा असता तर गाडीपेक्षा जोरात, हाय स्पीडनं धावला असता. राधा म्हणेल, नाही बाई, मी आपलं मनीमाऊचं पिल्लूच होणार. सुश्रियाला पक्षी होऊन उंच आकाशात उडायला आवडेल. अथर्वला वाटेल हत्तीचं पिल्लू होऊन सोंडेनं पाणी मारायला मिळेल. जंगलात फिरायला मिळेल. ओके? आता सगळ्यांनी मोबाईल बंद करायचा आणि शांतपणे विचार करायचा. आपल्याला काय वाटतं, ते वहीमध्ये लिहायचं आणि उद्या वाचून दाखवायचं. अंडरस्टूड?”

क्रमशः…

© अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – आज मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलंच आहे की.दहा किलोच्या साखरेच्या जड पिशव्या तुम्ही का वहायच्या?तेही या वयात?वहिनी नोकरीसाठी रोज मिरजेला जा-ये करते.गॅरेजच्या कामासाठी  दादाचंही मिरजेला जाणं येणं असतंच ना?एक दिवसाआड का होईना त्याचा मोटारसायकलवरुन

एखादातरी हेलपाटा होतोच. मग ही कामं त्या दोघांनी का नाही करायची? मी आज वहिनीशी स्पष्टपणे बोलणारच आहे ह्या विषयावर..”

“ए..वेडी आहेस का तू?तू..तू तिला यातलं कांहीही बोलायचं नाहीss”

“का नाही बोलायचं ?दादाशी तरी मी बोलणारच.त्याला चांगली खडसावून विचारणार.”)

“सावू..,हे बघ,तू रागाच्या भरात कांही बोलशील आणि दूधात मिठाचा खडा पडावा तसं सगळंच नासून जाईल.ऐक माझं.तू लक्ष घालावंस असं खरंच कांही नाहीय..”

हे खरं की खोटं तिला समजेचना.ती अगदी हळवी होऊन गेली.आण्णांच्या काळजीने तिचे डोळे भरून आले.

“सावू, काय झालं?” ती त्यांना बिलगली आणि हमसाहमशी रडत राहिली. ते पाहून आण्णा विचारात पडले.तिला हलक्या हाताने थोपटत राहिले. आपल्या या हळव्या मुलीचा त्यांना आधार वाटला आणि तिची काळजीही..

“सावू, हे बघ,शांत हो. मी जे सांगतो ते नीट ऐक. तुझ्या वहिनीने घरी कामासाठी दोन बायका ठेवलेल्या आहेत.त्यांच्या मदतीने सगळी घरकामं तीच करते.सगळं आणणं-सवरणं, बाजारहाट दादा बघतो.’तुम्ही आज अमुक एक काम करा’ असं त्या दोघांपैकी कुणीच मला आज पर्यंत कधीच सांगितलेलं नाही. अंगणातला केर काढायला मी पहिल्यांदा हातात झाडू घेतला तेव्हा तुझ्या वहिनीनेच तो माझ्याकडून काढून घेतला होता. रात्री त्या दोघांना सगळं आवरून झोपायला खूप उशीर व्हायचा. तरी मी केर काढू नये म्हणून दोघांपैकी कोणीतरी लवकर उठून ते काम करू लागला.अखेर एके दिवशी त्या दोघांना समोर बसवून मी माझ्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं आणि फक्त ते तेवढंच काम माझ्याकडे घेतलं. मी तेवढंच काम प्रयत्नपूर्वक करू शकतो म्हणून मी ते करतो”

“आणि त्या साखरेच्या दहा किलो ओझ्याचं काय?”

“ती शुगरमिलच्या शेअर्सवरची साखर होती. शेवटची तारीख जवळ येत होती आणि दोन तीनदा प्रयत्न करूनही दादाच्या वेळा जमत नव्हत्या. एकदा मी त्यांना ‘हवं तर मी आणतो’असं म्हटलं तर तोच ‘साखर फुकट जाऊ दे पण तुम्ही जायचं नाही’असंच म्हणाला होता.आज शेवटची तारीख होती. मी मोकळा होतो म्हणून त्यांना न सांगता मीच आपण होऊन गेलो होतो.मी जायला नको होतं हे त्या  पिशव्या प्रथम उचलल्या तेव्हा समजलं..”

सविता विचारात पडली. हे सगळं असंच असेल?आण्णा खूप सोशिक आहेत हे ती विसरू शकत नव्हती.ते त्या दोघांना पाठीशी घालत नसतील कशावरून? सविताच्या हळव्या मनात रुतून बसलेला हा प्रश्न आण्णांच्या गावीच नव्हता.

“सावू, तुला सांगू?तुझ्या आईचं आजारपण म्हणजे कसोटीच होती एक.माझी आणि दादाची नसेल एवढी तुझ्या वहिनीची.पण ती त्या कसोटीला पूर्णपणे उतरलीय.सगळी रजा आधीच संपल्यानंतर ती दोन महिने बिनपगारी रजा घेऊन घरी थांबली होती.मी तुझ्या वहिनीला खूपदा सुचवलं होतं ‘आपण सावूला बोलून घेऊ. थोडे दिवस ती रजा घेईल’असं.पण तुझी वहिनी ‘इतक्यात नको’ म्हणाली होती. ‘सविताताई आपल्या हुकमाचा एक्का आहेत. तो आत्ताच कशाला वापरायचा? होईल तितके दिवस मी मॅनेज करते. अगदी अडेल तेव्हा त्या आहेतच’ असं ती म्हणायची.याच बाबतीत नाही सावू,तिने एरवीही स्वतःपुरता विचार कधीच केलेला नाही. तुला सांगू? अशी एखादी वेळ येते ना तेव्हाच माणसाची खरी परीक्षा होत असते.त्या सगळ्याकडे पहाणारी आपली नजर मात्र स्वच्छ हवी.”

सविताला हे पटत होतं पण स्वीकारता येत नव्हतं.  “माझ्यावरील प्रेमापोटी सावू,आज तू त्या दोघांवर मात्र तुझ्याही नकळत अन्याय करत होतीस. म्हणून तुला हे सगळे सांगावं लागलं.जसा मी तसेच सावू ते दोघेही तुझेच आहेत. आजवर तुझी आई सोडली तर मनातली एक गोष्ट मी बाकी कुणाजवळ कधीच बोललो नाहीय. आज तुला मात्र ते सांगणं गरजेचं वाटतंय.”

“कोणती गोष्ट आण्णा?”

“तुझा विश्वास नाही बसणार सावू,पण तुझ्या वहिनीच्या हातचा स्वैपाक मला कधीच आवडायचा नाही.तुझ्या आईच्या हातच्या चवीनं मला लाडावून ठेवलं होतं.तुझ्या वहिनीनं स्वैपाक केला असेल,तेव्हा ती आसपास नसताना ,तुझी आई न बोलता माझ्या आवडीचं कांहीबाही रांधून मला खाऊ घालायची.आज ती नाहीय.पण कसं कुणास ठाऊक,आता मात्र तुझ्या वहिनीनं केलेल्या स्वैपाकाची चव मला वेगळी पण चांगली वाटते.पूर्वीची गोष्ट वेगळी होती.हीसुध्दा सगळं मनापासून आणि प्रेमाने करते हे जाणवल्यानंतरची आजची गोष्ट वेगळी आहे.फरक आपल्या दृष्टिकोनात असतो सावू. खरं सांगायचं तर सगळी माणसं आपलीच असतात.आपण त्यांच्याकडे त्याच आपुलकीने पाहिलं तर खऱ्या अर्थाने ती आपली होऊन जातात. नाहीतर मग नातेबंध तुटायला वेळ नाही लागत.एक सांगतो ते कायम लक्षात ठेव.नाती जवळची लांबची कशीही असोत, ती नाजूक असतात. त्यांना ‘हॅंडल वुईथ केअर’ हे लेबल मनोमन लावूनच टाकायचं. तरच ती हलक्या हाताने जपता येतात.नात्यांचं खरं महत्व तुझी आई गेली तेव्हा मला समजलं. सावू.एकटा, केविलवाणा होऊन गेलो होतो गं मी.पण तुझ्या दादा-वहिनीने मला समजून घेतलं. सांभाळलं. म्हणूनच त्या दुःखातून इतक्या लवकर मी स्वतःला सावरु शकलो.

त्या दोघांवर अचानक टाॅर्चचा प्रकाशझोत पडला आणि दोघेही दचकले.

“गप्पा संपल्या की नाही अजून ?”दादाने हसत विचारलं.दादा वहिनी दोघंही त्यांना न्यायला आले होते. तोवर भोवताली  इतकं अंधारून आल्याचं त्याना समजलंच नव्हतं. सविताचं मन तर कितीतरी दिवस अंधारातच बुडून गेलं होतं.पण आण्णांच्या बोलण्यामुळे तो अंधार मात्र आता विरून गेला होता.सगळं कसं लख्ख दिसू लागलं होतं. सविता तटकन्  उठली. पुढे झेपावली. वहिनीच्या गळ्यात पडून बांध फुटल्यासारखं रडत राहिली.ती असं का करतेय दोघांनाही समजत नव्हतं.

“आण्णा, काय झालंय हिला असं अचानक?” दादानं विचारलं.

तिला काय झालंय ते फक्त आण्णांनाच माहीत होतं.पण ते सगळं त्यांनी गिळून टाकलं. स्वतःशीच हसले.

“काही नाही रे.तिला तिच्या आईची आठवण झाली असेल.  म्हणून हिला बिलगलीय.”

आण्णा बोलले ते अनेकार्थांनी खरं होतं. निदान आज, या क्षणापुरती तरी वहिनी तिची आईच झाली होती जशी काही. सविता हा क्षण मनात अतिशय हळुवारपणे जपून ठेवणार होती…!!

– पूर्णविराम –

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 2 ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र – “सावू.. तू?.. तू इथे कशी?” कपाळावरचा घाम रुमालाने टिपत त्यांनी विचारलं. त्यांच्या थकून गेलेला निस्तेज चेहरा क्षणात उजळला.)

“मुद्दाम तुम्हाला भेटायलाच आलेय.”

” हो..पण असं अचानक?”

” तुम्हाला भेटावं असं तीव्रतेने वाटलं, आले. कसे आहात तुम्ही?”

“कसा वाटतोय?”

“खरं सांगू? तुम्ही खूप थकलायत आण्णा”. तिचा आवाज भरून आला. तेवढ्यात समोरून बस येताना दिसली न् मग सविता काही बोललीच नाही. बसमधे सगळेच गावचे. ओळखीचे. सगळ्यांसमोर मोकळेपणाने बोलणं तिला प्रशस्त वाटेना.बसमधून उतरल्यानंतर मात्र ती घुटमळत उभी राहिली.)

“आण्णा,आपण…आपण लगेच घरी नको जायला.”

“का गं?”

“वाटेत शाळेजवळच्या देवळात थोडावेळ बसू.मग घरी जाऊ. मला तुमच्याशी  थोडं बोलायचंय.”

“अगं बोल ना.घरी जाता जाता बोल. घरी गेल्यानंतर निवांत बोल.”

“नाही…नको”

“लांबचा प्रवास करून आलीयस.ऐक माझं.आधी घरी चल.हात पाय धू. विश्रांती घे.मग बोल.घाई काय आहे एवढी?”

सविताला पुढे कांही बोलताच येईना.

तिला असं अचानक दारात पाहून तिच्या वहिनीलाही आश्चर्य वाटलं.

“सविताताई ,हे काय? असं अचानक?” बोलता बोलता तिच्या हातातली बॅग घ्यायला वहिनी पुढे झाली आणि बॅगेऐवजी सविताच्या हातातल्या त्या दोन जड पिशव्या पाहून चपापली.तिच्या कपाळावर उमटलेली सूक्ष्मशी आठी आणि आण्णांकडे पहातानाची तिच्या नजरेतली नाराजी सविताच्या नजरेतून सुटली नाही. सविताने त्या दोन जड पिशव्या तिच्या पुढे केल्या.मग मात्र वहिनीने त्या हसतमुखाने घेतल्या.

“आधी कळवलं असतंत तर मोटारसायकल घेऊन हे आले असते ना हो मिरजस्टॅंडवर तुम्हाला घ्यायला ” तिच्या बोलण्यात सहजपणा होता पण  सविताला तो सहजपणे स्वीकारता येईना.

” मुद्दामच नाही कळवलं. अचानक रजा मिळाली.आले. आण्णांना भेटावसं वाटलं म्हणून रजा घेतलीय” वहिनीकडे रोखून पहात ती म्हणाली .चहापाणी आवरलं तसं ती उठली .

“वहिनी, थोडं देवळापर्यंत जाऊन पाय मोकळे करून येते.”

” बरं या”.    

“चला आण्णा..”                                                                                                                                                                             

“आण्णा..?..ते कशाला..?”  वहिनी आश्चर्याने म्हणाली.

” का बरं?त्यांना का नाही न्यायचं?” सविताने चिडून विचारलं.तिच्या आवाजातला तारस्वर वहिनीला अनोळखीच होता. ती चपापली.कानकोंडी झाल्यासारखी चुळबुळत राहिली.    

“तसं नाही सविताताई..”

“मग कसं?”आता गप्प बसायचं नाही हे सविताने ठरवूनच टाकलं होतं.पण वहिनी वरमली.

” तुम्ही जा त्याना घेऊन,पण अंधार व्हायच्या आत परत या “

सविता रागाने तिच्याकडे पहात राहिली.फट् म्हणताच ब्रह्महत्या होणार पण त्याला आता तिचा नाईलाज होता.

“आण्णांना हल्ली डोळ्यांना कमी दिसतं.मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय.म्हणून म्हटलं.फार अंधार करू नका.”

“आण्णाs?”त्यांच्याकडे पहात सविताने आश्चर्याने विचारले. ते मानेनेच ‘हो’ म्हणाले.  आणि खाली मान घालून त्यांनी चप्पल पायात सरकवली. ते पाहून वहिनी क्षणभर घुटमळली. मग न बोलता आत निघून गेली.

देऊळ येईपर्यंत आण्णा गप्पच होते आणि सविताही.

“मला आधी का कळवलं नाहीत?आॅपरेशनचं?”

“त्याचं काय अगं? अजून कधी करायचं तेही ठरलं नाहीय.डॉक्टर करा म्हणाले की लगेच करायचं. आणि हल्ली मोतीबिंदूचं ऑपरेशन पूर्वीसारखं अवघड नसतं अगं.तू उगाच काळजी करतेस.”

” आण्णा, तुम्ही रोज घरी काय काय कामं करता?” तिने मुद्द्यालाच हात घातला.

“मी..मी काम असं नाही गं…”

” काहीच करत नाही?”        

“तसं म्हणजे… करतो आपलं मला जमेल ते..जमेल तसं..”

“कां?”तिने तीव्र शब्दात विचारलं.

“कां म्हणजे? बसून काय करायचं?” त्यांच्या घशात आवंढाच आला एकदम.ते गप्प बसले.

“तुम्हाला घरकामाची सवयही नाही न् आवडही नाही हे ठाऊक आहे मला.वहिनीला जमत नसेल तर चार बायका ठेव म्हणावं कामाला.तिने तुम्हाला कामं का लावायची?”

“तुला..सारंग बोललेत का हे सगळं?”

“त्याने कशाला सांगायला हवं?आज मीही स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलंच आहे की.दहा किलोच्या साखरेच्या जड पिशव्या तुम्ही का वहायच्या?तेही या वयात?वहिनी नोकरीसाठी रोज मिरजेला जा-ये करते.गॅरेजच्या कामासाठी दादाही मिरजेला जात असतोच ना?एक दिवसाआड का होईना दादाचा मोटारसायकलवरून एखादातरी हेलपाटा असतोच की. मग ही कामं त्या दोघांनी का नाही करायची? मी आज वहिनीशी स्पष्टपणे बोलणारच आहे ह्या विषयावर..”

“ए..वेडी आहेस का तू?तू..तू तिला यातलं कांहीही बोलायचं नाहीss”

“का नाही बोलायचं ?दादाशी तरी मी बोलणारच.त्याला चांगली खडसावून विचारणार”

क्रमश:… 

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ कथा – ‘हॅंडल वुईथ केअर…’ – भाग – 1 ☆ श्री अरविंद लिमये

नात्यांमधल्या रेशीमगाठींची गोष्ट…

रजेचं अचानक जमून आलं आणि सविता लगोलग निघाली. नेहमीसारखं रिझर्वेशन वगैरे करायला उसंतच नव्हती.

“जपून जा. काळजी घे.उगीच त्रागा करू नको. मन शांत ठेव. सगळं ठीक होईल” निघतानाचे सारंगचे हे शब्द आणि आधार आठवून सविताला आत्ताही भरुन आलं. सविता आज पुणे-मिरज बसमधे चढली ती ही अस्वस्थता सोबत घेऊनच.समक्ष जाऊन आण्णांना भेटल्याशिवाय ही अस्वस्थता कमी होणारच नव्हती. आण्णा म्हणजे तिचे वडील. तिचं माहेर मिरज तालुक्यातल्या एका बर्‍यापैकी समृद्ध खेड्यातलं. मिरजस्टँडला उतरून सिटी बसने पुन्हा तासाभराचा प्रवास करावा लागे.एरवी ती माहेरी जायची ते कांही फक्त आई आणि आण्णांच्या ओढीनेच नव्हतं. तिच्या एकुलत्या एका भावाच्या संसारात तिलाही मानाचं स्थान होतंच की.पण आजची गोष्ट वेगळी होती.ती निघाली होती ते तशीच वेळ आली तर आण्णांना कायमचं पुण्याला घेऊन यायचं हे मनाशी ठरवूनच.सारंगचाही या तिच्या निर्णयाला विरोध नव्हता.    

‘एखाद्या माणसाच्या असं जाण्यानं, नसण्यानं, त्याच्या असतानाचे संदर्भ इतक्या चटकन् बदलू शकतात?’ तिला प्रश्न पडला. आई अचानक गेली तेव्हापासूनच ह्या सगळ्याची सुरुवात झाली होती.आज माहेरी जाताना सविता म्हणूनच अस्वस्थ होती. आण्णांच्याबद्दल तर सविता थोडी जास्तच हळवी होती. त्याला कारणही तसंच होतं. आण्णांमुळेच माहेरी शिक्षणाचे संस्कार रुजले होते.आर्थिक परिस्थिती बेतासबात असूनही शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी मुलगा आणि मुलगी असा भेद कधीच केला नव्हता.म्हणून तर सवितासारखी खेड्यातली एक मुलगी इंजिनिअर होऊ शकली होती आणि पुण्यात एका आय टी कंपनीत बाळसेदार पगार घेत आपल्या करिअरला आकार देत होती.आण्णा गावातल्याच एका शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते.घरी पैशाचा ओघ जेमतेमच असे.तरी स्वतः काटकसरीत राहून आईआण्णांनी सविता आणि तिचा दादा दोघांनाही इंजिनियर केलं होतं. आण्णांच्या संस्कारांचा फायदा त्यांच्या सुनेलाही मिळाला होताच. सविताचा भाऊ ऑटोमोबाईल इंजिनिअर झाला आणि त्याची स्वतःची आवड म्हणून तिथे गावातच त्यांने गॅरेज सुरू केले होते. तो कष्टाळू होता आणि महत्त्वाकांक्षीही.त्यामुळेच त्याच्या लग्नाचं पहायला सुरुवात केली तेव्हा त्याला खूप चांगल्या मुली सांगून आल्या होत्या.पण त्या खेड्यात रहायची त्यांची तयारी नसायची.मग गावातल्याच एका ओळखीच्या कुटुंबातली अनुरूप मुलगी त्याने पसंत केली.ती लग्नाआधी बीएससी झाली होती. हुशार होती. आण्णांनीच तिला बी.एड् करायला प्रवृत्त केलं. लगेच मिरजेच्या एका शाळेत जॉबही मिळाला.असं सगळं कसं छान, सुरळीत होतं. परवापरवापर्यंत तरी तसं वाटलं होतं,पण आई अचानक गेली …आणि ..? 

वहिनीला नवीन नोकरी लागली होती तेव्हा मिरजेला रोज जाऊन येऊन करता करताच ती मेटाकुटीला येई. पण तेव्हा घरचं सगळं बघायला सविताची आई होती.ती होती तोपर्यंत घरात कसले प्रश्नच नव्हते जसे कांही. तेव्हा घरात भांड्याला भांडं लागलं असेलही कदाचित पण त्यांचे आवाज सवितापर्यंत कधीच पोचले नव्हते.

आई गेली.तिचं दिवसकार्य सगळं आवरलं  तेव्हाच बदल म्हणून सविता-सारंगने आण्णांना ‘थोडे दिवस बदल म्हणून पुण्याला चला ‘ असा आग्रह केला होता. पण ते ‘पुन्हा पुढे बघू ‘ म्हणाले न् ते तसंच राहीलं.      

आई गेल्यानंतर पुढे दोनतीन महिन्यांनीच दिवाळी होती.चार दिवस आधी फराळाचे डबे देऊन सविताने सारंगला आपल्या माहेरी पाठवलं होतं. सारंग तिथे गेला म्हणून आपल्याला सगळं समजलं तरी असंच तिला वाटत राहिलं. कारण तिकडून सारंग परत आला ते हेच सगळं सांगत. तो रात्रीचा प्रवास करून सकाळी तिकडे पोहोचला तेव्हा आण्णा अंगण झाडून झाल्यावर  व्हरांड्यातला केर काढू लागले होते.सारंगला अचानक समोर पाहून ते थोडे कावरेबावरे झाल्यासारखे वाटले.  थोडे थकल्यासारखेही.पण मग काहीच न घडल्यासारखं हसून त्यांनी सारंगचं स्वागत केलं होतं.  हे ऐकलं तेव्हा सविताला धक्काच बसला .आण्णा आणि घरकाम? शक्य तरी आहे का हे? निवृत्तीनंतर ते बागेत काम करायचे.त्यांना वाचनाची आवड होती. वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच नव्हता. असं असताना ते न आवडणारी,न येणारी कामं या वयात आपण होऊन करणं शक्य तरी आहे का?हे सगळं वहिनीचंच कारस्थान असणार हे उघड होतं.तिचं जाऊ दे पण दादा? त्याला कळायला नको?सविता पूर्वकल्पना न देता यावेळी माहेरी निघाली होती ते यासाठीच. आण्णांशीच नव्हे,दादावहिनीशीही या विषयावर बोलायचं आणि तशीच वेळ आली तर आण्णांना कायमचं पुण्याला घेऊन यायचं हे तिने ठरवूनच टाकलं होतं. मिरजेला उतरताच सिटी बसस्टाॅपवर ती येऊन थांबली आणि तिला अचानक आण्णाच समोरून येताना दिसले.हातात दोन जड पिशव्या घेऊन ते पायी चालत बस स्टॉपकडेच येत होते. त्याना त्याअवस्थेत पाहून सविताला भरूनच आलं एकदम. ती कासावीस झाली.तशीच पुढे झेपावली.

“आण्णा त्या पिशव्या द्या इकडे.मी घेते.” पाच पाच  किलो साखरेच्या त्या दोन जड पिशव्या होत्या.सविताच्या तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली.

“सावू…तू..तू इथे कशी?” कपाळावरचा घाम रुमालाने  टिपत त्यांनी विचारले.त्यांचा थकून गेलेला निस्तेज चेहरा क्षणांत उजळला.

” मुद्दाम तुम्हाला भेटायलाच आलेय.”

“पण असं अचानक?”

“हो.भेटावं असं तीव्रतेने वाटलं,आले.कसे आहात तुम्ही?”

“कसा वाटतोय?”

“खरं सांगू? तुम्ही..खूप थकलायत आण्णा.” तिचा आवाज भरून आला.  

तेवढ्यात समोरून बस येताना दिसली न् मग सविता कांही बोललीच नाही. बसमधे सगळेच गावचे.ओळखीचे. सगळ्यांसमोर मोकळेपणाने बोलणे तिला प्रशस्त वाटेना.बस मधून उतरल्यानंतर मात्र ती घुटमळत उभी राहिली.

क्रमश:… 

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ Hospitalisation – एक असेही जुगाड… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ Hospitalisation – एक असेही जुगाड… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

“पारस, मारू एक काम कर ने, ” जुलै महिना चालू होता आणि अहमदाबाद येथील सान्नीध्य हॉस्पिटलच्या डॉ पारस यांना त्यांच्या एका डॉक्टर मित्राचा – जिग्नेशचा फोन आला होता.

“माझे दोन NRI पेशंट आहेत, ते ऑक्टोबर महिन्यात भारतात आहेत आणि त्यांना फुल बॉडी चेकप करायचे आहे. त्यांना एक दिवसासाठी admit करून घे, त्यांच्या रिकाम्या पोटीच्या fastingवाल्या टेस्टस् तू सकाळी करून घे, दुपारी १२ – १ पर्यंत ते रूममध्ये असतील, तोपर्यंत जेवणानंतरच्या टेस्टस् उरकून घे. ते झालं की मग दिवसभर त्यांना काय आपल्या शहरात फिरायचं असेल, त्यांची कामं करायची असतील ती ते करून घेतील, संध्याकाळी – रात्री आले, विश्रांती घेतली की दुसऱ्या दिवशी सकाळी तपासण्यांचे निकाल घेऊन ते डिस्चार्ज घेतील. हो जाएगा ये ?”

यात नाकारण्यासारखं काहीच नव्हतं, रूम्स उपलब्ध होत्या. मित्राने डॉ पारस यांना त्या दोघांचे फोन नंबर पाठवले, पारस यांनी त्या नंबरवर चाचण्यांची नावे, त्यांचे दर, आधी किती वेळ काही खायचं नाही, हॉस्पिटलमधील वेगवेगळ्या रूमचे दर वगैरे सर्व माहिती पाठवली.

पेशंटकडून त्यांची नावं, कोणत्या तारखेला टेस्ट करायच्या, कोणत्या टेस्ट करायच्या, कोणती रूम हवी ही सर्व माहिती व त्यानुसारचे पूर्ण पेमेंट आले, हॉस्पिटल रूम बुक झाली, पेशंटना आणण्यासाठी विमानतळावर अँब्युलन्स पाठवण्याची नोंद झाली, हे सर्व पारस यांनी मित्राला कळवलं आणि पारस यांच्या दृष्टीने तो विषय संपला.

पुढच्या आठवड्याभरात प्रत्यक्ष पेशंटकडून वा डॉक्टर मित्रांमार्फत अशा आणखी दोन तीन admission बद्दलच्या पृच्छा आल्या आणि नंतरही येतच गेल्या. सर्वच चौकशा ऑक्टोबर महिन्यासाठीच्या होत्या, आणि नोंदी नीट तपासल्यावर कळलं की या सर्व चौकशा १५ ऑक्टोबरला admit होण्यासाठीच होत्या.

काही NRI होते तर काही भारतातूनच वेगवेगळ्या गावांतून शहरांतून येणारे पेशंटस् होते. बघता बघता त्या तारखेच्या हॉस्पिटलच्या सर्व रूम बुक झाल्या.

रविवार असल्याने लोकांना सोयीचे असेल असं आधी डॉ. पारस यांना वाटलं, पण देशविदेशातून अनेकांना, तब्बल दोन महिन्यांनंतरच्या एकाच ठराविक दिवशी आपल्या आरोग्याची चिंता का वाटणार आहे हा प्रश्न डॉक्टरांच्या आकलन शक्तीपलीकडचा होता. त्यांच्या डोक्याला या प्रश्नाचा चांगलाच भुंगा लागला. न राहवून, दोन दिवसांनी जेव्हा डॉ. जिग्नेशची त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांनी हा प्रश्न विचारलाच,

“ए जिग्नेस, आ पंदरमा अक्तूबरनी आ सू वात छे ? दूनियाभरसे आकर उसी दिन लोग admit हो रहे हैं ? मेरा तो उस दिन हॉस्पिटल फुल हो गया है. “

जिग्नेश पारसच्या निरागसतेवर गडगडाटी हसला, म्हणाला, ” पारस, कभी तो मेडिकल जर्नलके अलावाभी कुछ पढा करो. अरे इथे राहूनही तुला जर १५ ऑक्टोबर २०२३ चे दिनमहात्म्य माहीत नसेल तर कसं व्हायचं ?”

पारस, आधी होता त्यापेक्षा जास्त, बुचकळ्यात पडला.

“अक्तुबरसे क्रिकेट वर्ल्ड कप शुरू हो रहा है, पारस, और पंदरा तारीख को अपने शहरमें भारत पाकिस्तान का डे नाईट मॅच है. सारे हॉटेल्स, जो मन मे आए वो रेट्स बता रहे हैं, जो रूम पाच दस हजारका है, उसके लिये पचास हजार – लाख रुपये बोल रहे हैं और लोग उतने पैसे दे भी रहे हैं. “

या सगळ्या प्रकारात कोण्या एका अनामिक सुपीक डोक्यात, या अशा जुगाडाच्या आयडियेची, स्वार्थ आणि परमार्थ एकत्र साधणारी ही कल्पना आली…..

… दुपारी २:३० ते रात्री जवळजवळ १२ पर्यंत सामना असणार. त्यामुळे सकाळच्या वेळात आरोग्याच्या चाचण्या करून घ्यायच्या, झोपण्यापुरते हॉस्पिटलमध्ये यायचं आणि दुसऱ्या दिवशी परत जायचं, तेही हॉटेलच्या दरांपेक्षा अगदीच माफक दरात – जेमतेम दहा हजारांत. मॅच बघणंही होईल आणि हेल्थ चेकअपही……. जिग्नेश सांगत होता, आणि पारस तोंडाचा आ वासून ऐकत होता.

विमानतळावर लोकांना receive करण्यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या गाड्या येतात, मात्र १५ ऑक्टोबरला अँब्युलन्सने विमानतळ सोडणारे प्रवासी खूपच जास्त असतील असा विचार त्यांच्या मनात आला, आणि ते खुदकन हसले.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘प्रश्नचिन्ह…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ ‘प्रश्नचिन्ह…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

शैलाताईंच्या डोळ्यांना धार लागली होती. विचार करकरून डोकं भणभणून गेलं होतं. त्यांची नजर वारंवार ईशाकडे जात होती. ईशा त्यांची नात आपल्या कॉटवर शांत झोपली होती. तिच्या निष्पाप चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. मान एका बाजूला कलली होती आणि तोंडातून लाळ गळत होती. एरवी वारंवार तिचं तोंड स्वच्छ करणाऱ्या शैलाताई आज मात्र स्तब्ध बसून होत्या. आपल्या नशिबात अजून काय काय  वाढून ठेवलंय कोण जाणे!

रामराव आणि शैलाताईंना तीन मुलगे. संजीव, संकेत आणि सलील. तिन्ही मुलांची लग्न होऊन त्यांनी स्वतंत्र संसार थाटले होते. संजीव मुंबईत, संकेत सांगलीत आणि सलील दुबईत. रामरावांच्या निधनानंतर संजीव आईला आपल्या घरी घेऊन आला होता. संजीवची बायको सानिकाशी त्यांचं छान जमायचं. इतर दोघी सुनांशीही भांडण नव्हतं, पण जवळीकही नव्हती तेवढी! नाशिकचं घर त्यांनी बंदच ठेवलं होतं.

ईशाच्या जन्मानंतर खरं तर घर किती आनंदात होतं. पण  लवकरच ती गतीमंद असल्याचं निदान झालं आणि तिचं संगोपन हेच एक आव्हान म्हणून उभं ठाकलं. त्याच सुमारास संजीवला एका मल्टिनॅशनल कंपनीत ऑफर आली आणि चांगलं  भारी पॅकेज मिळालं. त्यामुळे मग ईशाकडे लक्ष देण्यासाठी, सानिकानं आपला जॉब सोडला. शैलाताईंची मदत होतीच.

आणि गेल्याच वर्षी कंपनीच्या कामानिमित्त उत्तराखंडला जायला निघालेल्या संजीवचं विमान कोसळलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. शैलाताई आणि सानिका या आघाताने कोलमडून गेल्या. कंपनीकडून आर्थिक मदत मिळाली पण सानिकाला काहीतरी धडपड करणं भागच होतं, घर चालवण्यासाठी!  शैलाताई एकट्या ईशाला कश्या सांभाळणार? हेही एक प्रश्नचिन्ह होतंच!

या संकटांचा मुकाबला करायच्या प्रयत्नात असतानाच  कोविडमुळे लॉ कडाऊन सुरू झाला. सानिकाच्या नोकरीच्या प्रयत्नांना त्यामुळे खीळ बसली. औषधं, दूध, भाजीपाला आणण्यासाठी,  अधून-मधून तरी सानिकाला घराबाहेर पडावं लागतंच होतं. सहा महिने कसेबसे गेले आणि तिलाही कोविडनी गाठलं आणि आठवड्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या सानिकाचा मृतदेहही घरी आणता आला नाही. संकटाच्या या मालिकेमुळे शैलाताई  दुःखानं पिचून गेल्या होत्या. 

कोविडमुळे एकमेकांकडे जाणंही बंद होतं. शेजारी – पाजारीदेखील दुरावले होते. माणुसकीच्या नात्याने कोणी-ना-कोणी जमेल तशी मदत करत होते. पण त्यांनाही मर्यादा होतीच. मुलं-सुना, नातेवाईक फोनवरून संपर्क साधत होते, पण रोजचा गाडा तर शैलाताईंनाच हाकायचा होता.ईशाला आता एखाद्या गतीमंद मुलांसाठीच्या संस्थेत दाखल करावं, असं त्यांच्या दोन्ही मुलांनी आडून आडून सुचवलं होतं. पण आपल्या या दुर्दैवी नातीला असं एकटं कुठेतरी ठेवायला, शैलाताईंचं मन तयार होत नव्हतं. शिवाय कोविडमुळे तेही सोपं नव्हतंच! एक-एक दिवस त्या कसाबसा ढकलत होत्या. 

आता आणखी सहा महिन्यांनंतर बाहेरची परिस्थिती हळूहळू निवळायला लागली होती. दुकानं, दळणवळण काही प्रमाणात सुरू झालं होतं. लोक  मास्क लावून घराबाहेर पडायला लागले होते. सर्व निर्बंध काही प्रमाणात शिथिल होऊ लागले.

अश्याच एका दुपारी त्यांच्या फ्लॅटची बेल वाजली. दाराची साखळी अडकवून त्या बाहेर डोकावल्या तर बाहेरच्या माणसानं आपलं ओळखपत्र दाखवलं. तो संजीवच्या कंपनीतून आला होता. त्याच्यामागे एक गोरटेला, मध्यम उंचीचा माणूसही होता. तो परदेशी वाटत होता.

एवढ्यात शेजारचे शिंदेकाका पण घरातून बाहेर आले. त्यांनी मग त्या दोघांची चौकशी केली आणि शैलाताईंना दार उघडायला हरकत नाही असं सांगितलं. घरात येताच तो परदेशी वाटणारा माणूस, शैलाताईंच्या पायावर लोळण घेऊन ओक्साबोक्शी रडायला लागला. त्या तर या प्रकाराने भांबावून गेल्या. तो काहीतरी बोलत होता पण त्यांना त्याची भाषा समजेना.मग संजीवच्या कंपनीतल्या माणसाने सगळा उलगडा केला.

हा परदेशी माणूस अकिरो.. जपानी होता. संजीवबरोबर तो कंपनीत कामाला होता. दोघांची पोस्टही सारखीच होती. उत्तराखंडला मिटिंगला खरंतर  अकिरोच जाणार होता. पण त्याची आई अत्यवस्थ असल्याचा फोन आल्यामुळे, तो अचानक सुट्टी घेऊन तातडीने जपानला गेला. त्याच्याऐवजी संजीव मिटिंगला गेला पण वाटेतच तो अपघात झाला. लॉकडाऊनमुळे अकिरो जपानमध्येच अडकून पडला. पण संजीवच्या मृत्यूला आपणच कारणीभूत झालो, अशी अपराधी भावना त्याला छळू लागली. पहिली संधी मिळताच तो भारतात आला आणि आज संजीवच्या घरी आला होता.

शैलाताईंना तर काय बोलावं तेच कळत नव्हतं. शिंदेकाकांनी त्या दोघांना शैलाताईंच्या सद्यस्थितीची कल्पना दिली. अकिरो खूपच भावुक झाला होता. आपल्या हावभावांद्वारे तो जणू शैलाताईंची माफी मागत होता. ईशाकडे बघून त्याचे डोळे सतत पाझरत होते. परत भेटायला येण्याचं आश्वासन देऊन ते दोघे निघून गेले.

आणि आज सकाळी ते दोघे परत आले. त्याने आणलेल्या प्रस्तावावर काय निर्णय घ्यावा या दुविधेत शैलाताई सापडल्या होत्या. अकिरोने ईशाला दत्तक घेण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याने व्हिडिओ कॉल करून आपलं घर आणि बायको व मुलगा यांची ओळख शैलाताईंना करून दिली. तो ईशाला जपानला आपल्या घरी घेऊन जाणार होता. त्यांच्या देशात अशा दिव्यांग, गतीमंद मुलांसाठी खूपच सुविधा उपलब्ध होत्या. आपल्याकडून नकळत का होईना पण जो अपराध घडला, त्याचं प्रायश्चित्त घेण्याची संधी मिळावी, अशी त्याची आणि त्याच्या कुटुंबीयांची विनंती आहे, हेच तो शैलाताईंचे पाय धरून सांगत होता.

एकीकडे ईशाचं सुरक्षित भवितव्य तर दुसरीकडे तिची आपल्यापासून कायमची ताटातूट, यात कशाची निवड करावी याचं उत्तर शोधण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. 

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाचवा कोपरा… भाग – 2 ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? जीवनरंग ?

☆ पाचवा कोपरा… भाग – 2 ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

(मित्रांशी गप्पा मारून , नेट वरून श्रद्धा ताईंनी “मित्र परिवार” वृद्धाश्रम निवडला. आणि एक दिवस निश्चयाचा उजाडला.) इथून पुढे — 

रात्रीच त्यांनी बॅग भरून ठेवली . दोन साड्या , दोनतीन मोजके ड्रेसेस आणि काही डायऱ्या , पुस्तकं , पेन बॅगेत टाकलं . बँकेचं पासबुक, चेकबुक , ए.टी.एम. कार्ड , आधार कार्ड , पॅनकार्ड , पासपोर्ट एका पाऊच मधे घातलं . ब्रश ,पेस्ट ,पावडर , टिकलीचं पाकीट , कंगवा घेतला. बॅग हॉलमधे ठेवली. 

त्यांना मिळालेल्या एका छोट्या कपाटातील सामान वेगळ्या सुटकेस मधे भरून ठेवले . कपाट रिकामं केलं .

सर्वांचा सकाळचा नाश्ता , डबे तयार करून ठेवले. देवाची पूजा केली . 

तोवर सकाळी तिघंही उठले . “आई ही बॅग ? कुठे निघालीस ?” असं मुलाने विचारलं . श्रध्दाताईने “मित्र परिवारचा” पत्ता सांगितला . म्हणाल्या , ” अरे वाईट वाटून घेऊ नका. सोहमला खोली हवीय. ती मी रिकामी केलीय. माझे अनेक मित्र मैत्रिणी आहेत परिवारात . स्वतंत्र खोली आहे तिथं. माझं छान निभेल तिथे. आणि याच शहरात आहे की मी. ही सोय आहे रे तात्पुरती .” 

मुलगा दुखावला , पण सूनबाईला मात्र मनातून आनंद झाला होता. विना औषधीने खोकला गेला होता. सोहम आता मोठा असल्याने तो शाळेतून आल्यावर फ्लॅटचा दरवाजा उघडून आत येऊ शकत होता. सोहम लहान असतानाचे तिचे गरजेचे दिवस संपले होते.

लगेच ताईंनी कॅब बुक केली. कुणाचेच चेहरे न वाचता त्या लिफ्टने खाली आल्या.

मित्र परिवारात त्यांचं छान स्वागत झालं . दोन तीन दिवसातच त्या तिथे रुळल्या . नवीन तंत्रज्ञानाशी त्यांनी नोकरीत असतानाच जुळवून घेतलं होतंच . इथे आणखी टेक्नोसॅव्ही मित्र मिळाले. सोशल मिडियावर त्या ॲक्टिव्ह झाल्या. पेन्शन होतीच. तब्येतीची कुरकुर नव्हती. आता त्यांनी खरंखुरं आयुष्य जगायला सुरुवात केली होती. 

इथे आल्यानंतर काही दिवसांतच एका पूर्वी लिहिलेल्या कादंबरीचं त्यांनी पुनर्लेखन केलं . रीतसर त्याचं पुस्तक झालं , ” पाचवा कोपरा ” .तीनच महिन्यात त्यांना तब्बल तीस लाखांची कमाई त्यांच्या पुस्तकाने करून दिली होती.

सकाळी त्यांनी ते चेक्स पेन्शन अकौंटला न टाकता मुलासोबतच्या अकौंटला टाकले. त्यांच्याच बँकेचे चेक्स असल्याने ते लवकरच जमा झाले . लंच ब्रेकमधे अचानक तीस लाखांचा क्रेडिट मॅसेज बघून मुलाचे डोळेच विस्फारले. त्याला कळेना हे कुठले पैसे? कारण एवढी मोठी रक्कम गोंधळात टाकणारी होती.

ऑफिसमधे सांगून त्याने सरळ बँक गाठली. तेव्हा त्याला एवढंच कळलं , की कुठल्या तरी प्रकाशन संस्थेचे ते चेक्स आहेत. पण आईकडे कसे? याचं उत्तर त्याला लगेच मिळालं नाही. तो घरी आला, पण पैशाबद्दल तो कुणाशी काहीच बोलला नाही .

कविता , कथा , कादंबरी , वैचारिक असं लेखन ताई करीतच राह्यल्या . आजवर मनात साठलेलं आता अक्षर रूप घेत होतं. पुस्तकं प्रकाशित होत होती.

काही काळातच ताईंच्या अकौंटने एक कोटीची रक्कम पार केली . 

मुलाला बँकेचे क्रेडिट मेसेजेस येतच होते.

साहित्याच्या बागेतलं असं कोणतंच फूल नव्हतं , की ते ताईंजवळ नव्हतं . सर्व साहित्य प्रकारांवर त्यांचं प्रभुत्व होतं. सर्वत्र संचार होता ताईंचा.

आताशा रोजच वृत्तपत्र , टी व्ही वर ताई असायच्या. आणि मुलाला सर्व उलगडा होऊ लागला . मात्र आईला भेटायला जाण्याची हिंमत त्याच्यात नव्हती.

आवडत्या छंदात रमल्याने ताईंची तब्येतही आता छान होती. पैसा, आणि प्रसिद्धी चारही बाजुंनी येत होती. आताशा त्यांना कार्यक्रमांना “हो ” म्हणणं कठीण होई इतके कार्यक्रम येऊ लागले. प्रसिद्धीच्या वलयानं ताई आणखीच तेजस्वी झाल्या होत्या.

मुलाला सुनेला त्यांची चूक कळली होती. पण ते बोलू शकत नव्हते. 

अशातच एक दिवस त्यांचे मुलाला पत्र आले . त्यांनी लिहिले होते ,” बाळ, सूनबाई आणि सोहम् ला धन्यवाद द्यायचेत मला. तुझ्या घरातून बाहेर पडल्यावरच मी स्वतः ला ओळखू शकले . तेही या वृद्धाश्रमात . आता मी खरी जगतेय. केवळ अन्न , वस्त्र , निवारा म्हणजे जगणं नव्हे . कला आणि साहित्याच्या क्षेत्रातल्या वावराने मला “मी ” कळले . माझ्यातली ऊर्जा मला जिवंत ठेवू शकली . तुम्हाला हवा तेवढा पैसा तुम्ही वापरून आता फोर बीएचके असं मोठं घर घेऊ शकता . कारण आपलं अकौंट जॉईन्ट आहे. आयदर ऑर सर्व्हायवर ऑपरेशन आहे. तू कितीही पैसे काढू शकतोस. तसेही शेवटी ते तुझेच आहेत. मला आता घराची गरज नाही . इथे मला ते मिळालंय . आणि महत्वाचं म्हणजे सम वैचारिक मित्र परिवार मिळाला . फक्त एक काम करशील माझं . काही आठवणीतले गरम कपडे आणि दुर्मिळ अशा आवश्यक पुस्तकांची एक बॅग तुझ्या घरीच आहे. शक्य असेल तर इथे आणून दे. तेवढीच भेट होईल आपली. बाळा , घराचा थकलेला *पाचवा कोपराही कधी कधी खूप उपयोगी ठरतो , हे लक्षात ठेव. सर्वांना आशीर्वाद ! थांबते. “

मराठी शब्दांची आणि वृद्धाश्रमाची ताकद आता बाळला आणि सुनबाईला कळली होती.

वृद्धाश्रम या शब्दाकडे कणव म्हणून बघितलं तर दया येते . संधी म्हणून बघितलं तर उत्तम तऱ्हेनं जगता येतं हे श्रद्धाताईंनी सिद्ध करून दाखवलं होतं. 

सकाळी वृद्धाश्रमाच्या अंगणात ताई मित्रांसोबत चहा घेत बसल्या होत्या. तेवढ्यात दाराशी रिक्षा थांबली . रिक्षातून सुप्रसिद्ध कवयित्री विजया ब्रह्मे उतरत होत्या . आणखी एक पाचवा कोपरा स्वतःला सिद्ध करणार होता.

– समाप्त – 

© प्रा.सुनंदा पाटील

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print