ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ 5 ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? 5 ऑक्टोबर – संपादकीय  ?

५ ऑक्टोबर :   प्रसिद्ध लेखक आणि संपादक श्री. यदुनाथ थत्ते यांचा जन्मदिन……

लोकप्रिय समाजवादी नेते, “ चले जाव “ चळवळीत तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसेनानी, आणि राष्ट्रसेवादलासाठी मोठेच योगदान ज्यांनी दिले, असे श्री. यदुनाथ थत्ते हे एक प्रसिद्ध लेखकही होते. त्यांनी लिहिलेली — डॉ. होमी भाभा, नील्स बोहर, सी. व्ही. रमण, जगदीशचंद्र बोस, यांची चरित्रे खूप प्रसिद्ध झाली. याव्यतिरिक्त, साने गुरुजी, यशाची वाटचाल, आटपाट नगर होते, आपला वारसा, चिरंतन प्रकाश देणारी ज्योत – म. गांधी, समर्थ व्हा – संपन्न व्हा, विनोबा भावे, अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. स्वेट मार्डेन यांच्या “ पुशिंग टू दि फ्रंट “ या पुस्तकावर त्यांनी लिहिलेली “ पुढे व्हा “ ही तीन भागातली पुस्तकमालाही प्रचंड लोकप्रिय ठरली होती. 

सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक म्हणून ओळखले जाणारे श्री. थत्ते यांनी पत्रकारिता आणि संपादन या क्षेत्रांमध्येही मोठे काम केले होते. “ साधना “ या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते अनेक वर्षे संपादक होते. श्री यदुनाथ थत्ते यांना भावपूर्ण आदरांजली.  

 

५ ऑक्टोबर :  प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री अनुराधा पोतदार यांचा स्मृतीदिन ….. 

(१५/१२/१९२७ – ०५/१०/२०१३)

‘आवर्त’,  ‘कॅक्टस’, ‘मंझधार’ इ. काव्यसंग्रह लिहिलेल्या कवयित्री श्रीमती अनुराधा पोतदार यांनी,  कुसुमावती देशपांडे , संजीवनी मराठे ,बालकवी,  वि. म. कुलकर्णी यांचे कविता- संग्रह संपादित केले आहेत. तुकाराम- काथात्म साहित्य, तसेच ,” दत्तकवी आणि जीवन चरित्र “ ही पुस्तकेही त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी एकूण सहा पुस्तकांचे संपादन केले आहे. साहित्याचा वारसा त्यांना परंपरेनेच लाभला होता .  कवी दत्त हे त्यांचे आजोबा, तर प्रसिद्ध साहित्यिक वि. द. घाटे हे त्यांचे वडील. भाषेवर त्यांचे प्रचंड प्रभुत्व होते. व्यवसायाने प्राध्यापक असणाऱ्या अनुराधा पोतदार यांना अनंत काणेकर, कुसुमाग्रज, शि. म. परांजपे यांच्या नावाने दिले जाणारे तसेच अन्यही काही पुरस्कार लाभले होते .  अनुराधा पोतदार यांना  त्यांच्या आजच्या  स्मृतीदिनी  मनःपूर्वक श्रद्धांजली . 

 

सौ मंजुषा सुनीत मुळे 

(ई–अभिव्यक्ती संपादक मंडळकरिता)

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ 4 ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? 4 ऑक्टोबर – संपादकीय  ?

( १६/१०/१९०७ — ४/१०/८२ ) 

प्रसिद्ध कवी कै. श्री. सोपानदेव चौधरी यांचा स्मृतीदिन–—-

कवयित्री बहिणाबाई यांचे हे सुपुत्र स्वतः एक उत्तम कवी होते. कविता लोकांपर्यंत पोहोचायला हवी या उद्देशाने १९२० च्या दशकात तेव्हाच्या काही नावाजलेल्या कवींनी रविकिरण मंडळाची स्थापना केली होती. सोपानदेव चौधरी हे या मंडळाचे सक्रीय सभासद होते. नुसते कविता-वाचन करण्याऐवजी, कविता जर गाऊन सादर केली तर ती लोकांपर्यंत जास्त प्रभावीपणे पोहोचेल या विचाराने, सोपानदेवांनी आपल्या कविता चाल लावून सादर करण्यास सुरुवात केली. आणि रसिकांना हा प्रयोग फारच आवडला. पुढे हा एक पायंडाच पडला. सोपानदेवांच्या अशा बऱ्याच कवितांची झालेली गाणी प्रसिद्ध आहेत. एकच उदाहरण द्यायचे झाले तर, “ आली कुठूनशी कानी , टाळ मृदूंगाची धून “ –हे गाणे, जे रसिकांच्या मनात कायमचे नोंदले गेले आहे. 

——सोपानदेवांनी केलेले एक अतिशय महत्वाचे काम आवर्जून सांगायलाच हवे. त्यांच्या आई बहिणाबाई यांच्या, साध्या- सोप्या आणि सहज शब्दात जीवनाचे तत्वज्ञान सांगून जाणाऱ्या कितीतरी असामान्य काव्यरचना, आणि त्यापैकी काही कवितांची झालेली गाणी अतिशय लोकप्रिय झालेली आहेत हे आपण सगळेच जाणतो. बहिणाबाई स्वतः अशिक्षित होत्या. त्यामुळे त्यांना सुचणारं काव्य त्या काम करता करता म्हणायच्या. अर्थातच त्या कविता कुठेही लिहिलेल्या नव्हत्या. त्यांच्या अवतीभवतीच सोपानदेव असायचे. त्यामुळे त्यांच्या कानावर सतत त्या कविता पडायच्या. ते  मोठे झाल्यावर आपल्या आईच्या कविता आठवून आठवून त्यांनी कागदावर उतरवल्या, आणि म्हणून त्या महान कवयित्रीचे अप्रतिम काव्य रसिकांपर्यंत पोहोचले, आणि याचे पूर्ण श्रेय सोपानदेवांना जाते.  

कवी सोपानदेव चौधरी यांना मनःपूर्वक आदरांजली.  आजच्या अंकात वाचूया त्यांची “ आमुची लिपी “ ही मराठीची लिपी म्हणून आणि बोली म्हणून असलेली वैशिष्ठ्ये सांगणारी एक वेगळीच कविता. 

सौ मंजुषा सुनीत मुळे 

(ई–अभिव्यक्ती संपादक मंडळकरिता)

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ स्व द. मा. मिरासदार – विनम्र  श्रद्धांजली ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

(जन्म १४ एप्रिल, १९२७ – मृत्यू ०२ ऑक्टोबर २०२१)

? स्व द. मा. मिरासदार – विनम्र  श्रद्धांजली? 

मराठीती ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विनोदी लेखक आणि कथाकार द. मा. मिरासदार यांचे वृद्धापकाळाने काल दि.02/10/2021 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचे २४ कथासंग्रह आहेत. प्रामुख्याने ते विनोदी लेखक व कथाकथानकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचे काही गंभीर कथासंग्रह आहेत आणि काही ललित लेख संग्रहही प्रसिद्ध आहेत. १९६२पासून त्यांनी व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील यांच्याबरोबर कथाकथनाचे कार्यक्रम सुरू केले. या त्रयींनी३००० पेक्षा जास्त कार्यक्रम केले. महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेर, इतकंच काय कॅनडा – अमेरिका इथेही त्यांचे कार्यक्रम झाले. व्यंकूची शिकवणी,माझ्या बापाची पेंड, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी इ. त्यांच्या कथांनी महाराष्ट्राला खळखळून हसवले. त्यांची पात्रे  इब्लिस, बेरकी, वाहयात, टारगट क्वचित भोळसट आहेत. त्यांच्या कथातून ग्रामीण जीवनाचं दर्शन होते.

एक डाव भुताचा,ठकास महाठक या २ चित्रपटांच्या संवाद लेखनाबद्दल त्यांना पारितोषिक मिळालं. याशिवाय आणखी १६ चित्रपट कथा त्यांनी लिहिल्या. परळी वैजनाथ येथे १९९८ साली झालेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना पुणे महानगर पालिकेचा वाल्मिकी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य संस्कृतिक मंडळाचा विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता.

विनोदी कथा,पटकथा लेखन याबरोबरच त्यानी श्री.शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्यासह कथाकथनाची प्रथा महाराष्ट्रात रुजवली व लोकप्रिय केली.
जगणं सुसह्य करणा-या या थोर साहित्यिकास ई-अभिव्यक्तीच्या वतीने त्यांना विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली, शब्दांजली..???

श्रीमती उज्ज्वला केळकर

(ई–अभिव्यक्ती संपादक मंडळकरिता)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ 3 ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? 3 ऑक्टोबर – संपादकीय  ?

म.वा. धोंड (मधुकर वासुदेव धोंड ) हे मराठीतले जेष्ठ समीक्षक. आज त्यांचा जन्मदिन. (३ऑक्टोबर १९१४) ज्ञानेश्वरीच्या चिकित्सक विश्र्लेषणापासून मर्ढेकरांच्या कवितांच्या शोधापर्यंत आपल्या विचक्षण समीक्षेबद्दल त्यांची ख्याती होती, असे ‘संजीव वेलणकर’म्हणतात. आपल्या मर्मग्राही लेखणीने मराठी समीक्षा क्षेत्रावर यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवला. मूलगामी संशोधनाची जोड त्यांच्या समीक्षेला होती. ‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’ या त्यांच्या ग्रंथाला १९९७ चा साहित्य अ‍ॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला. ज्ञानेश्वरी स्वरूप, तत्वज्ञान आणि काव्य ( साहित्य आणि समीक्षा) , मराठी लावणी (समीक्षा) , जाळ्यातील चंद्र, तरीही येतो वास फुलांना, काव्याची भूषणे इ. पुस्तकांची त्यांनी निर्मिती केली. त्यांचा स्मृति दिन ५ ऑक्टोबर २००७ ला आहे.

☆ ☆ ☆ ☆ ☆

कारवारमध्ये  २२ सप्टेंबर १९०९  मध्ये दत्ता तुकाराम बांदेकर या अवलिया साहित्यिकाचा जन्म झाला. कानडी भाषेत ७ बुकं शिकून, मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवणारे हे एक आगळ्या प्रतिभेचे आणि वेगळ्या प्रकृतीचे मराठी लेखक. त्यांचा स्मृतीदिन आज ३ ऑक्टोबरला आहे. (१९५९)

आचार्य आत्रे यांचा ते उजवा हात होते. साप्ताहिक नवयुगमध्ये ते ‘रविवारचा मोरावळा’ हे सादर लिहीत. त्यांच्या लेखनात सामान्य माणसाचे दैनंदिन जीवन, त्यांच्या भानगडी यावर चुरचुरीत भाष्य असे. टवाळकीच्या ढंगात लिहिलेली त्यांची सदरे, त्यावेळी खूप गाजली. ‘सख्या हरी’ या टोपण नावाने त्यांची सदरे प्रकाशित होत. ‘आक्काबाईचा कोंबडा’, जग ही रंगभूमी’, ‘घारुआण्णांची चंची’ ही त्यांची सदरे अतिशय लोकप्रिय झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचे ते लाडके लेखक झाले. ते स्वत: मात्र प्रसिद्धी पाराङ्मुख होते.

श्रीमती उज्ज्वला केळकर

(ई–अभिव्यक्ती संपादक मंडळकरिता)

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गुगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ 2 ऑक्टोबर – संपादकीय – दि . २ ऑक्टोबर — आपल्या देशातल्या दोन महान नेत्यांची जयंती  ☆

? 2 ऑक्टोबर – संपादकीय – दि . २ ऑक्टोबर — आपल्या देशातल्या दोन महान नेत्यांची जयंती ?

स्व महात्मा गांधी 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी दिलेले महत्वाचे योगदान सर्वच भारतीय जाणतात. १५० वर्षे पारतंत्र्यात असणाऱ्या देशाला शांतीपूर्ण मार्गाने स्वातंत्र्य मिळवून देता येईल हा त्यांचा ठाम विश्वास त्यांनी अनेकांच्या मनावर बिंबवला. “ जनहो खादी वापरा “ हा ‘ स्वदेशी ‘ वस्तूंना पुरस्कृत करणारा संदेश लोकांना देतांना त्यांनी स्वतःपासून तो अमलात आणण्यास सुरुवात केली. भारतीयांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून आवाज उठवत त्यांनी कितीतरी सत्याग्रहांचे नेतृत्व केले. तसेच अनेक सामाजिक सुधारणा करण्यात ,अस्पृश्यता-निवारण मोहिमेत, जातीय एकता प्रस्थापित करण्याच्या मोहिमांमध्ये ते नेहेमीच सक्रीय होते. त्याहीआधी , म्हणजे वयाच्या २४ व्या  वर्षी ,भारतीय व्यावसायिकांचे न्यायालयीन सल्लागार म्हणून ते दक्षिण आफ्रिकेला गेले होते, जिथे ते तब्बल २१ वर्षे राहिले. तिथे राहणाऱ्या भारतीयांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी मनापासून प्रयत्न केला. त्यांना तिथे वांशिक वर्णभेदाला तोंड द्यावे लागले. पण त्यांचे अहिंसावादाचे तत्व त्यांनी सोडले नाही. आणि  त्याच मार्गाने स्वतःच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा तिथल्या भारतीयांना दिली. १९१५ साली गोपाळ कृष्ण गोखले या उदारमतवादी नेत्याच्या सल्ल्याने ते भारतात परतले. आणि भारतात राजकीय कार्य करण्यास सुरुवात केली. मा. श्री. गोपाळ कृष्ण गोखले यांना ते आपले “ राजकीय गुरु “ मानत असत. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना ‘ महात्मा ‘ ही उपाधी दिली. तसेच १९४४ साली सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा त्यांना “ राष्ट्रपिता “ म्हणून संबोधले  होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सत्तास्थापनेच्या वेळी मात्र ते स्वतः सत्तेपासून लांब राहिले. अशा या थोर नेत्यास अतिशय आदरपूर्वक श्रद्धांजली. 

स्व लाल बहादूर शास्त्री 

१९०४ साली वाराणसी येथे एका प्राथमिक शिक्षकांच्या घरी लाल बहादूर यांचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षी ऐकलेल्या गांधीजींच्या भाषणाने ते प्रभावित झाले. पुढे काशी विद्यापीठात अध्ययन करून त्यांनी शास्त्री ही पदवी मिळवली. पण त्या आधीपासूनच, विदेशीवर बहिष्कार आणि स्वदेशीचा वापर याचा पुरस्कार करण्यात त्यांचा खूप पुढाकार होता. पुढे समानतेचे सूत्र हाती धरून शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा करण्याचे ध्येय त्यांनी निश्चित केले होते. “ सर्व्हन्टस ऑफ दि पीपल्स “ सोसायटीचे सदस्य म्हणून काम करता करता ते पुढे त्या सोसायटीचे अध्यक्ष झाले — आणि असा त्यांच्यातला ‘ विधायक कार्यकर्ता ‘ घडत गेला. तेव्हाच्या काँग्रेसचे मवाळ  धोरण त्यांना मान्य नव्हते. पण विशेष म्हणजे सत्तेची लालसाही कधीच नव्हती. तरीही पुढे त्यांना आधी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्रीपद, नंतर काँग्रेसचे सचिवपद, मग रेल्वेमंत्रीपद सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. पण एका रेल्वे-अपघाताची नैतिक जबाबदारी स्वतःची असल्याच्या धारणेने त्यांनी आपणहून ते मंत्रिपद सोडले. १९६४ साली पं. नेहरू यांच्या निधनानंतर त्यांना एकमताने पंतप्रधानपद बहाल केले गेले. ही जेमतेम दीड वर्षांची त्यांची  कारकीर्द भारतीयांच्या कायम लक्षात राहील यात शंका नाही. कारण याच काळात पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, पण भारताने त्यांना नमवले. याच काळात “ जय जवान , जय किसान “ या त्यांच्या घोषवाक्याने पूर्ण देश भारावून गेला. पण हे युद्ध संपल्यानंतर अगदी काहीच महिन्यात त्यांचा मृत्यू झाला. देशासाठी त्यांनी केलेल्या अनेक महत्वाच्या कार्यांसाठी त्यांना मरणोत्तर “ भारतरत्न “ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले. खरं तर हा त्या पुरस्काराचा गौरव होता असेच म्हणावेसे वाटते. अशा या महान नेत्यास अतिशय भावपूर्ण आदरांजली .

आज २ ऑक्टोबर हा सुप्रसिद्ध भारतीय अर्थशास्त्रज्ञ श्री.  चिंतामण द्वारकानाथ तथा सी. डी. देशमुख यांचा स्मृतिदिन….. भारतीय रिझर्व्ह बँकेचे तिसरे, आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर असणारे श्री. देशमुख हे पंडित नेहेरुंच्या, स्वतंत्र सार्वभौम भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातले पहिले अर्थमंत्री होते. त्याहीआधीच, म्हणजे  १९४४ साली, ब्रिटिश भारताच्या शासनाने त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना “ सर “ हा किताब बहाल केला होता. १९४३ ते १९४९ या काळात ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असतांना, १/१/१९४९ रोजी या बँकेचे राष्ट्रीयीकरण झाले.  भाषावार प्रांतरचना करतांना सरकारने बेळगाव आणि कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून त्यांनी अर्थमंत्रीपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. ते संस्कृत- पंडित होते. कालिदासाच्या “ मेघदूताचा “ त्यांनी केलेला समवृत्त काव्यानुवाद, उत्कृष्ट अनुवाद म्हणून वाखाणला गेला आहे. कै. श्री. देशमुख यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.   

सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

संपादक मंडळ प्रतिनिधी  

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ 1 ऑक्टोबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

? 1 ऑक्टोबर – संपादकीय ?

आज  नाट्यछटाकार ‘दिवाकर’  यांचा स्मृतीदिन (१जाने. १९३१)  त्यांचे नाव शंकर काशीनाथ गर्गे. नाट्यछटा  वङ्मय प्रकारचे ते जनक. एक प्रसंग, एकच पात्र, पण दुसर्‍या एका पत्राशी किंवा अनेकांशी बोलत आहे, असे  नाट्यछटेचे स्वरूप असते. हा गद्य लघु वङ्मयाचा प्रकार आहे. त्यांनी ५१ नाट्यछटा लिहिल्या. त्यांच्या नंतर तुरळकपणे नाट्यछटा लिहिल्या गेल्या असल्या तरी या क्षेत्रात नंतर नाव घेण्याइतकं कुणी झालं नाही.त्यांचा जन्म १८ जानेवारी १८८९चा.

* * * * * 

आज लोकप्रिय अनुवादक उमा कुलकर्णी यांचा जन्मदिन. त्यांनी कन्नडमधील श्रेष्ठ, साहित्यिकांच्या गाजलेया पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला आहे. वस्तूत: त्यांचा पदवीचा विषय ड्रॉईंग आणि पेंटिंग असा आहे. १९८१- १९८३मध्ये त्यांनी एस.एन.डी.टी मधून आर्ट आणि पेंटिंगची एम.ए. ही पदवी घेतली.

१९८२ मध्ये त्यांचा ‘तनमानाच्या भोवर्‍यात’ हा पहिला अनुवाद प्रसिद्ध झाला. ज्ञानपीठ परितोषिक विजेते शिवराम कारंथ यांची ही कानडीत गाजलेली कादंबरी. त्यानंतर आत्तापर्यंत त्यांची अनुवादाची ५५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवराम कारंथ, भैरप्पा, गिरीश कार्नाड इ. कन्नडमधील श्रेष्ठ लेखकांच्या पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला आहे. आपल्या अनुवादाच्या अनुभवावर त्यांनी अनुवादु – संवादु हे पुस्तक लिहिले. याला साहित्य अ‍ॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘पर्व’ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, याशिवाय महाराष्ट्र फाऊंडेशनचा इ. तेरा-चौदा पुरस्कार त्यांच्या विविध पुस्तकांना मिळाले आहेत. त्यांची लेखणी अजूनही लिहिती आहे.

* * * * * 

Best Bhojpuri Video Song - Residence wआज थोर साहित्यिक ग.दि माडगूळकर यांचा जन्मदिन (२१ सप्टेंबर). कविता, कथा, ललित  लेख, पटकथा, इ. साहित्य प्रकारात लीलया त्यांची लेखणी फिरली.  ते उत्तम अभिनेतेही होते. सुरुवातील ते वि. स. खांडेकरांचे लेखनिक होते. नंतर ते चित्रपट व्यवसायात शिरले. त्यांनी १५८ मराठी चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या. त्यातील कथा, पटकथा, संवाद त्यांचेच होते. २५ हिन्दी चित्रपटांसाठी त्यांनी कथा लिहिल्या. तूफान और दिया, दो ऑँखे बारह हात, नवरंग, गुंज उठी शहनाई या गाजलेल्या चित्रपटांच्या कथा त्यांच्याच होत्या.

अनेक गीतातून त्यांनी  सोप्या शब्दात जगण्याचे तत्वज्ञान सांगितले. उदा. दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, उद्धवा अजब तुझे सरकार इ.

त्यांनी २००० च्या वर चित्रपट गीते लिहिली. त्यांनी ४० पुस्तके लिहिली. त्यापैकी चैत्रबन (चित्रपट गीते), जोगिया ( कविता संग्रह) आणि मंतरलेले दिवस ( आत्मवृत्त ) यांना महाराष्ट्र सरकारची पारितोषिके मिळाली होती.

त्यांचे गीतरामायण खूप गाजले. त्याचप्रमाणे त्यांनी गीत गोपाल ही श्रीकृष्णाच्या चरित्रावरील आणि गंगाकाठ ही पेशवाईवरची संगीतिका लिहिली. 

१९७३ साली यवतमाळ इथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांचा गौरव केला होता.

आज वाचा सबकुछ ग.दी.मा.

 

प्रस्तुती  उज्ज्वला केळकर

(ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ करता)

संदर्भ : कर्‍हाड शिक्षण मंडळ ‘साहित्य साधना’ दैनंदिनी / गूगल गुरुजी

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ 30 सप्टेंबर – संपादकीय  -जागतिक अनुवाद दिन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

 ☆ 30 सप्टेंबर- संपादकीय ☆  

?संपादकीय  -जागतिक अनुवाद दिन?

आजचा दिवस “ जागतिक अनुवाद दिन “ म्हणून गौरवला जातो. “ अनुवाद “ हा एक “साहित्यप्रकार“ म्हणून रुजवून, त्याला जागतिक साहित्यविश्वात मानाचे असे अढळपद मिळवून देणाऱ्या आणि त्या स्थानाला सातत्याने गौरव प्राप्त करून देणाऱ्या सर्व अनुवादकांना ई – अभिव्यक्ती साहित्यमंचातर्फे आदरपूर्वक प्रणाम आणि हार्दिक शुभेच्छा

 

उज्ज्वला केळकर

संपादक मंडळ ( मराठी विभाग )

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ 27 सप्टेंबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

 ☆ 27 सप्टेंबर- संपादकीय ☆  

? स्व कविता महाजन ?

(5 सितंबर 1967 – 27 सितंबर 2018) 

आज स्व कविता महाजन यांचाही स्मृतिदिन. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर१९६७ला नांदेड इथे झाला. त्यांची लेखणी कविता, कथा, कादंबरी, लेख, बालसाहित्य, अनुवाद – लेखन आणि

संपादन अशा विविध क्षेत्रात फिरली. लेख – ग्रॅफिटी वॉल, कविता  – धुळीचा आवाज, कादंबरी ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम, बालकथा जोहानाचे रंग, वारली लोकगीतांचा संग्रह इ. पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सवेदनाशील आणि व्यवस्थेविरुद्ध लढणारी लेखिका म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या ब्र, भिन्न, कुहू या कादंबर्‍या खूप गाजल्या. ‘ब्र’चा हिन्दी, ‘भिन्न,’ चा कानडी ‘कुहू’ चा इंग्रजी मधे अनुवाद झाला. ‘रजई’या इस्मत चुगताई च्या कथासग्रहाच्या अनुवादाला साहित्य अ‍ॅकॅडमीचा पुरस्कार मिळाला, त्याचप्रमाणे त्यांच्या साहित्याला न.ची. केळकर, काकासाहेब गाडगीळ, ना. ह.आपटे, यशवंतराव चव्हाण इ. अनेक पुरस्कारही मिळाले.

      प्रस्तुती  उज्ज्वला केळकर

ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ करता  

चित्र साभार – कविता महाजन – विकिपीडिया (wikipedia.org)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति – संवाद ☆ 25 सप्टेंबर – संपादकीय ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

 ☆ 25 सप्टेंबर- संपादकीय ☆  

? स्व बाळकृष्ण हरी  कोल्हटकर  ?

25 सप्टेंबर – मराठीतील सुप्रसिद्ध नाटककार बाळ कोल्हटकर (बाळकृष्ण हरी  कोल्हटकर) यांचा आज जन्मदिन (जन्मदिनांक 25 सप्टेंबर 1926).  ते उत्तम नाटककार होते. दिग्दर्शक, अभिनेते होते आणि उत्तम कवीही होते. अनेक नाटकात त्यांची स्वत:ची पदे आहेत. त्यांची नाटके कौटुंबिक आणि भावनाप्रधान आहेत. 

वाहतो ही दुर्वांची जुडी, दुरितांचे तिमिर जावो, देव दीनाघरी धावला, वेगळं व्हायचय मला इ.त्यांची गाजलेली नाटके. त्यांनी 30 हून अधिक नाटके लिहिली.

त्यांच्या  दुरितांचे तिमिर जावो या अतिशय प्रसिद्ध नाटकामधील एक गीत—-

तू जपून टाक पाऊल जरा

जीवन सुख-दु:खाची जाळी

त्यास लटकले मानव कोळी

एकाने दुसर्‍यास गिळावे

हाच जगाचा न्याय खरा

हीच जगाची परंपरा 

तू जपून टाक पाऊल जरा–

जीवनातल्या मुशाफिरा ।।

 

पापपुण्य जे करशील जगती 

चित्रगुप्त मागेल पावती

पापाइतुके माप ओतुनी 

जे केले ते तसे भरा. ।।

 

निरोप जेव्हा येईल वरचा

तेव्हा होशील सर्वांघरचा  

तोवर तू या रिपू जगाचा

चुकवून मुख दे तोंड जरा।।

 

दानव जगती मानव झाला 

देवाचाही दगड बनविला 

कोण कोठला  तू तर पामर

चुकून तुझा करतील चुरा ।।

 

तू जपून टाक पाऊल जरा —–

 

प्रस्तुती – उज्ज्वला केळकर, सम्पादिका  – ई – अभिव्यक्ती (मराठी)

चित्र साभार – कोल्हटकर, बाळ (बाळकृष्ण हरी) – profiles (marathisrushti.com)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

ई-अभिव्यक्ति: संवाद ☆ मनोगत – यह ई-अभिव्यक्ति परिवार……☆ श्री सूरज कुमार सिंह

श्री सूरज कुमार सिंह 

ई-अभिव्यक्ति संवाद में प्रतिभाशाली युवा लेखक श्री सूरज कुमार सिंह जी से प्राप्त उनकी मनोभावनाओं को काव्य स्वरुप में पाकर आज मैं निःशब्द हूँ। इस अपार स्नेह  को पाकर मैं अत्यंत भावुक हो गया हूँ, मेरे नेत्र नम हैं और उनके उद्गारों को उसी स्वरुप में आपके समक्ष प्रस्तुत कर रहा हूँ। आप सब का स्नेह ही मेरी अमूल्य पूँजी है जो मुझे कठिन समय में भी पुनः उठ कर चलने के लिए प्रेरित करती है। मैं अत्यंत भाग्यशाली हूँ  कि मुझे ई-अभिव्यक्ति के सम्माननीय वरिष्ठ सदस्यों का आशीर्वाद एवं  सभी सदस्यों का स्नेह प्राप्त हो रहा है। ईश्वर से यही प्रार्थना है कि आप सब का स्नेह ऐसे ही मिलता रहे एवं माँ सरस्वती की कृपा बनी रहे। 

? ई-अभिव्यक्ति परिवार के सभी सदस्यों का ह्रदय से आभार?   

 – हेमन्त बावनकर  

 ? मनोगत – यह ई-अभिव्यक्ति परिवार…… ?

ऐसे हैं हमारे हेमंत सर

साहित्य ही जीवन है जिनका

जिनके लेखन मे करुणा अपार है

शब्द मात्र पर्याप्त नही

इन सज्जन की अभिव्यक्ति को

मेरा नमन इन्हे बारंबार है

 

प्रिय हेमंत सर हमारे

तीक्ष्ण धूप मे हैं छाँव जैसे

इसी छाँव तले

हमारी कल्पनाएं यूँ ही पले

 

सपने न बस देखे

पर किए उन्हे साकार

इस प्रकार खड़ा हुआ

यह ई-अभिव्यक्ति परिवार

 

जीवन रहा है चुनौतियों से भरपूर

हर चुनौती को सहज स्वीकारा है

यूँ ही नही बने आदर्श हमारे

इनके संकल्प से तो

मुश्किल से मुश्किल दौर भी हारा है

 

है यह एक परिवार बड़ा

इसके मुखिया आप हैं

हम तो हैं बस इसकी कड़ियां हैं

कड़ियां जोड़ने वाली डोर आप हैं

 

आशा यह भी रखता हूं कि

जब भी मेरी कलम चले

सबसे उम्दा रचनाएं प्रस्फुटित हों

और अभिव्यक्तियों के इस उपवन मे

उनकी सुगंध घुले

 

© श्री सूरज कुमार सिंह

रांची, झारखंड 

≈ सम्पादक श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares
image_print