पोखरण येथे १९७४ आणि १९९८ ला भारताने अणुचाचणी घेतली, त्या दोन्ही दिवशी बुध्दपौर्णिमा होती.
१९७४, इंदिरा गांधींच्या कार्यकाळात भारताने सर्वप्रथम अणुचाचणी घेतली, त्या संपूर्ण प्रकल्पाला *’Operation Smiling Buddha’ (‘हसरा बुध्द’) असं नाव देण्यात आलं होतं.
अणुचाचणी यशस्वी झाली आहे, हे सांकेतिक भाषेत पंतप्रधानांना कळवण्यासाठी ‘The Buddha Has Smiled’ (‘बुध्द हसला आहे’) हा कोड वापरण्यात आला होता.
१९९८ ला अटलजींच्या कार्यकाळात झालेल्या अणुचाचणीचे वैज्ञानिक सल्लागार होते – एपीजे अब्दुल कलाम. यशस्वीतेनंतर त्यांना सर्व शास्त्रज्ञांच्या चमूने ‘बोधीवृक्षाखालील ध्यानस्थ बुध्दा’ची प्रतिमा भेट म्हणून दिली होती.
१९९८ च्या प्रकल्पावर काम केलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीशी पूर्वी माझी भेट झाली. खूप माहिती मिळवल्यावर, वरील बाबींवर आधारलेली मी एक शंका सरांना विचारली,
— “सर, बुध्द हे तर अहिंसेचे प्रणेते आणि अण्वस्त्र हे तर महाविनाशक, हिंसेचं सगळ्यात विक्राळ स्वरूप जगाने हिरोशिमा-नागासाकीच्या अणुहल्ल्यात बघितलं. मग अण्वस्त्रसज्ज होताना, भारताने ‘बुध्द’ या प्रतीकाचा वापर का केला? हे विसंगत नाही का?”
सर हसले आणि त्यांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली —
एका गावाकडे जाणारे दोन रस्ते होते. एक जवळची वाट आणि एक वळणाने गेलेली लांबची वाट.
जवळच्या वाटेवर नागाचं मोठं वारूळ होतं. नाग क्रूर होता. वाटेवर कुणी दिसलं की तो दंश करत असे. माणसं जागीच मरत. नागाने अशी अनेक माणसं मारली होती. लोकांनी अखेर ती वाट वापरणंच बंद केलं. गावकरी, गावाला येणारे जाणारे प्रवासी, सर्वजण लांबच्या वाटेने जात.
एकदा त्या गावात एक योगी आला. मोठा सिद्धपुरूष होता. गावक-यांनी योग्याकडून ज्ञान-उपदेश घेतला, त्याचं आतिथ्य केलं. योगी निघाला, तेव्हा गावक-यांनी त्याला जवळच्या वाटेने न जाण्याचा, लांबचा रस्ता पकडण्याचा सल्ला दिला. योग्याने कारण विचारलं, तेव्हा गावक-यांनी नागाची हकीकत सांगितली.
योगी म्हणाला, “मला मृत्यूची भीती नाही. मी नागाला वठणीवर आणतो. चला माझ्या मागोमाग.”
गावक-यांना वाटलं, हा भलताच सिद्धपुरूष दिसतोय. काही चमत्कार पहायला मिळणार, म्हणून गावकरी त्याच्या पाठोपाठ गेले.— योगी वारुळापुढे जाऊन उभा राहिला, गावकरी भयाने जरा दूर थांबले.
आपल्या वाटेवर कुणी आलंय हे बघून नागाचा संताप झाला. नागाने चवताळून फणा काढला, योग्याला डसणार तोच योगी म्हणाला – “मला मारून तुझा फायदा काहीच होणार नाही. उलट तुझ्या भक्ष्यासाठी जमवलेलं तुझं हे बहुमोल विष मात्र वाया जाईल. नुकसान माझं नाही, तुझंच आहे.”
नागाला आश्चर्य वाटलं. पहिल्यांदा त्याला कुणीतरी न भिणारा भेटला होता.
नाग म्हणाला, ” ही वाट माझी आहे. इथे कुणालाही येण्याची परवानगी नाही.”
योगी म्हणाला, “हा तुझा अहंकार आहे. तुझ्या जन्माच्या आधीही हे गाव आणि ही वाट अस्तित्वात होती. उलट तुझ्या भीतीने लहान मुलं, म्हातारे, रुग्ण, या सर्वांना दूरच्या वाटेनं जावं लागतं. किती लोकांचा जीव घेतलायस तू. सोडून दे ही हिंसा. अहिंसेचा मार्ग धर. लोकांना दंश करणं सोडून दे. ते तुझं भक्ष्य नाहीत.”
नागाला हे पटलं. त्याने अहिंसेचा मार्ग पत्करला. गावकरी आनंदले. योगी तिथून निघून गेला. ती वाट पुन्हा वापरात आली.
काही महिने गेले. योगी परिव्रजा करत परतीच्या मार्गावर होता. पुन्हा ते गाव लागलं. नागाशी भेट होईल म्हणून योगी त्या मार्गाने गेला, वारुळापाशी पोचला.
नाग वारूळाजवळ रक्तबंबाळ अवस्थेत, विव्हळत पडलेला दिसला. योग्याने त्याच्या या अवस्थेचं कारण विचारलं, तेव्हा नाग रडत म्हणाला —
“तुमचं ऐकून मी दंश करणं सोडून दिलं आणि लोक हा रस्ता वापरू लागले. मी त्यांना कुठलाही त्रास देत नाही. पण टवाळखोर लोक मला काटे टोचतात. मला लाथाडून निघून जातात. लहान मुलंसुध्दा मला बोचकून गंमत बघतात.”
योगी म्हणाला, ” तू इतक्यांचे जीव घेतलेस, त्या कर्माचं फळ तुला मिळतंय. बघ, लोकांच्या मनात किती घृणा निर्माण केली होतीस तू स्वतःबद्दल.”
नाग वैतागत म्हणाला, “असंच सुरू राहिलं तर हे लोक जीव घेतील माझा. काय रुबाब होता माझा पूर्वी, तुमच्या अहिंसेच्या उपदेशाने वाटोळं केलं माझं.”
मग योगी म्हणाला—
“बाबा रे, दंश करू नकोस असं मी सांगितलं होतं. पण फुत्कार करण्यापासून तुला कोणी रोखलं होतं? कुणी त्रास देऊ लागल्यावर, तू केवळ फणा उभारून फुस्स केलं तरी समोरचा भीतीने दहा पावलं मागे सरकला असता. तुझी ही अवस्था अहिंसेमुळे नाही, तर अहिंसेचा तू चुकीचा अर्थ लावल्यामुळे आहे.”
गोष्ट संपली. सर म्हणाले, ” भारताने घेतलेली अणुचाचणी हा स्वसंरक्षणासाठी केलेला फुत्कार होता असं समज. कारण दुबळ्या लोकांच्या अहिंसेला किंमत नसते. तिबेट अहिंसावादी राष्ट्र. दुबळे राहिल्यामुळे चीनने गिळंकृत केलं. अखेर दलाई लामांना आश्रय दिला तो भारताने…..
…. स्वतः बलशाली असल्यामुळेच भारत अहिंसेच्या पुजा-यांना आश्रय, संरक्षण देऊ शकतो.”
त्या नागाला कितपत कळलं होतं ठाऊक नाही. मला मात्र पुरेपूर कळलं.
मला दिनांक 31 मार्च२३ रोजी ब्रह्मनाळला व्याख्यानाला जाण्याचा योग आला. त्यानिमित्ताने आनंदमूर्ति स्वामींची माहिती मिळाली .ती येथे देत आहे
आनंदमूर्ती स्वामींचे मूळ नाव अनंतभट होते. रघुनाथ स्वामी हे त्यांचे गुरु. रघुनाथ स्वामी एकदा परगावी गेले.आनंदमूर्तींना त्यांचा शोध घेण्यासाठी तीन वर्षे लागली. तीन वर्षानंतर ते भेटले तेव्हा दोघांना खूप आनंद झाला. स्वामी म्हणाले, अनंता, तीन वर्षे बायको मुले एकटी सोडून माझे स्वतःसाठी तू वणवण फिरलास ही एक तुझी तपसाधना झाली. माझ्यावरची तुझी निष्ठा पाहून मला खूप आनंद झाला तू माझ्या अंतर्यामीच्या आनंदाची मूर्ती आहे. आज पासून आम्ही तुला आनंदभट न म्हणता आनंदमूर्ती असेच नाव ठेवत आहोत. आम्ही तीन वर्षे जी साधना केली त्याचे पुण्यफल तुझे पुढील सात पिढ्यांचे योगक्षेम सुव्यवस्थित चालावेत म्हणून आशीर्वाद पूर्वक तुला अर्पण करीत आहे. यापुढे तुझ्या तोंडून जे शब्द निघतील ते सत्य होतील. आणि तसेच झाले. चिकोडीत सौ. कुलकर्णी बाई त्यांच्या दर्शनास आल्या. स्वामींनी आशीर्वाद दिला .”पुत्रवती भव”. बाई म्हणाल्या स्वामी माझे वय 60 आहे. स्वामी म्हणाले मी आशीर्वाद दिला तो सहजस्फूर्त होता.
अंतर्यामीच्या आत्म्याचे बोल आहेत. हे सत्य होणारच. दुसरे असे की एखाद्याने शाप दिला तर त्याला उ:शापाचा उतारा देऊन मुक्त करता येते. परंतु दिलेला शुभाशीर्वाद परत घेता येत नाही .तुम्हाला एक वर्षाचे आत मुलगा होऊन वंश वाढेल हे निश्चित. त्याप्रमाणे त्या बाईंना मुलगा झाला. त्यांचा वंश पुढे वाढत गेला.
रघुनाथ स्वामी आणि आनंदमूर्ती तीन वर्षांनी वसगडे येथे परत आले. अनेक भक्त स्वामींना गाई भेट देत. संध्याकाळचे स्नान संध्या करण्यासाठी स्वामी नदीवर जात. येताना दान मिळालेल्या गाई ,दुपारी रानात चरायला सोडलेल्या गाई स्वामी परत आणून गोठ्यात बांधीत.गाईंचे गोठ्याजवळ एक मोठी चतुष्कोनी शिळा होती. त्यावर बसून स्वामी ध्यानधारणा करत. पुढे त्या शिळेवर मारुतीची मूर्ती स्पष्ट दिसू लागली. स्वामींचे समाधीनंतर त्या स्वयंभू मारुतीची शिळा ग्रामस्थानी आजच्या श्री लक्ष्मी मंदिरात स्थापन केली. त्या शिळेला श्री रघुनाथ स्वामी असे संबोधतात. त्या मूर्तीची नित्य पूजाअर्चा करतात.रघुनाथ स्वामी आनंदमूर्तीना घेऊन संगमावर आले. स्वामी म्हणाले हे संगमस्थान पवित्रांमध्ये पवित्र आहे. देह त्यागास हे स्थळ उत्तम आहे.
स्वामी म्हणाले एका व्यक्तीने कितीही कार्य केले तरी ते अपुरेच असते .पुढच्या लोकांनी ते कार्य पुढे चालू ठेवले पाहिजे. जगदोध्दाराचे जे कार्य अपुरे राहिले ते तू पुढे चालू ठेव. जनता जनार्दनाला जप ,तप, भक्ती मार्गाचा उपदेश करून आत्मोद्धाराचा मार्ग दाखव. स्वराष्ट्र आणि स्वधर्म याची जाणीव देऊन त्याच्या रक्षणाची त्यांच्या मनात प्रेरणा उत्पन्न कर. आनंदमूर्तीना उपदेश करून स्वामींनी देहत्याग केला. त्यांच्या इच्छेप्रमाणे देह दहनाकरता संगमावर आणला. पण ब्रह्मनाळचे ग्रामस्थांनी परगावचे प्रेत म्हणून आपल्या गावी दहन करण्यास नकार दिला. मग आनंदमूर्तिनी संगमाकाठी ४० हात लांब रुंद जागा पंधरा होन देऊन विकत घेतली. त्या ठिकाणी स्वामींच्या पार्थिव देहाचे यथाविधी दहन केले. दहनस्थानी उत्तर कार्य करून स्वामींच्या पादुका स्थापन केल्या. पादुकांवर आच्छादन म्हणून त्यावर वृंदावन बांधले. बांधकाम वरच्या थरापर्यंत येताच वृंदावन थरारले आणि वृंदावनाचा थर पूर्णपणे पडला. असे चार वेळा झाले. आनंदमूर्ती पादुकांसमोर एक दिवस एक रात्र निर्जली उपोषण करीत बसले. स्वामी, वृंदावन बांधण्याची आमची मनोमनीची इच्छा आहे. कृपावंता, कृपा करून बांधकाम पूर्ण होऊ द्या. लाडक्याची इच्छा जाणून स्वामींनी पहाटे स्वप्नात दृष्टांत दिला. यापुढे बांधकामात व्यक्त येणार नाही. वृंदावनाचे बांधकाम सुरू झाले. रंग दिला. एका बाजूस शिवपंचायतन आणि दुसऱ्या बाजूस रामपंचायतनाची चित्रे रेखाटली. वास्तु्पूजा केली. आरती झाली. कीर्तन सुरू झाले आणि वृंदावन डोलले. फुलांचे हार हालले. वृंदावनाचा हा पहिला डोल.रघुनाथ स्वामींनी आनंदमूर्तींना निर्याणापूर्वी संगमस्थानी आश्वासन दिल्याप्रमाणे आपल्या जागृत अस्तित्वाची जाणीव दिली. श्री समर्थ रामदास स्वामींना हे कळले. ते ब्रह्मनाळला आले. पादुकांची पूजा केली आणि वृंदावनाचा डोल झाला. स्वामींना खूप आनंद झाला. ते म्हणाले
जळघी गिरिशिळांनी सेतु बांधी तयाचे |
नवल नच शिवाही ध्यान ते योगियाचे ||
अभिनव जगी तुझी कीर्ती आनंदमूर्ती |
अचळ दगड प्रेमे डोलती थोर ख्याती ||
रघुनाथ स्वामींच्या पहिल्या वर्षाची पुण्यतिथी होती. त्यादिवशी चाफळहून रामदास स्वामी, वडगाहून जयराम स्वामी, निगडीहून रंगनाथ स्वामी, कराडचे निरंजन स्वामी, अनेक अन्य साधुसंत, स्वामी ,वैदिक ब्राह्मण ,कथा- कीर्तनकार, भक्त मंडळी आली. सर्वांनी शिधा आणला होता. तो एकत्र करून भात व वरण फळे करून तो दिवस “फळ पाडवा” म्हणून साजरा केला .भाद्रपद शुद्ध द्वितीयेचा पुण्यतिथीचा दिवस उत्साहात संपन्न झाला. तिसरे दिवशी रामदास स्वामींच्या सांगण्यावरून गोपाळकाला केला. त्या दिवशी स्वतः रामदासांनी कीर्तन करून पहिला पुण्यतिथी उत्सव पूर्ण केला.
आनंदमूर्तींनी कांही आरत्या रचल्या. त्यातून बरीच माहिती मिळते. सध्या तिथे पाडवा ते दशमी उत्सव असतो. रहायला खोल्या बांधल्या आहेत. अनेक लोक त्या ठिकाणी येऊन रहातात. सेवा करतात. दहा दिवस सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. राम जन्माचे कीर्तन झाले की तिथे डोल होत असे. दगड चुन्यात बांधलेल्या वृंदावनाचा डोल हे लोकांना पटत नव्हते. अनेकांनी प्रत्यक्ष पाहूनच खात्री केली होती. आनंदमूर्तींना खूप परीक्षा द्याव्या लागल्या. एकदा चोर त्यांच्या मागे लागले पण त्या चोरांना यांच्याबरोबर दोन धनुर्धारी तरुण दिसले. त्यामुळे त्यांना चोरी करता आली नाही. त्यांनी सांगलीत पोचल्यावर आनंदमूर्तींना ते धनुर्धारी कोण असे विचारले. तेव्हा आनंदमूर्तींना काहीच कल्पना नव्हती. ते म्हणाले आमचे गुरु रघुनाथ स्वामींनी ही अघटित घटना घडवून आणली. धनुर्धारी रूपात तुम्हास त्यांचे दर्शन झाले. तुम्ही पुण्यवान आहात. आता हा व्यवसाय सोडा आणि चांगले आयुष्य जगा. चोरांनी ते ऐकले.
स्वामींना आपल्या अवतार समाप्तीची जाणीव होऊ लागली. थोरला मुलगा कृष्णाप्पा याला बोलावून त्यांनी माझ्यामागे गुरु रघुनाथ स्वामींच्या पादुकांची पूजा, ब्रम्हनाळ गावचे इनाम, मठ, शेती, स्थावर जंगम मालमत्तेची व्यवस्था, वार्षिक उत्सव, आल्या गेल्या भक्तांची वास्तव्य व भोजनाची कायम व्यवस्था करण्यास सांगितले. त्याला समोर बसवून कानात तत्वमसी-“सोऽहं”मंत्राचा उपदेश केला. भूमध्यावर अंगठ्याने दाब देताच त्याची समाधी लागली. काही वेळानंतर त्याच्या डोळ्यास पाणी लावून त्यांनी समाधी उतरवली. व सांगितले तू दिवसा संसार व देवस्थानचा व्यवहार व ब्राह्ममुहूर्ती जप ,तप, ध्यान करत रहा.
आनंदमूर्तींनी पूजा आटोपली. बाहेर भक्तमंडळींना सांगितले आज वैकुंठ चतुर्दशीचा दिवस. या पुण्यदिवशी आम्ही देह त्याग करणार. देह त्यागानंतर सत्वर ब्रम्हनाळ येथे श्री गुरु रघुनाथ स्वामींचे वृंदावनासमोर आमचा देह दहन करा. नरसोबाच्या वाडीचे नारायण स्वामी दर्शनास आले असता ते दोघांच्या वृंदावनामध्ये बसून ध्यान करू लागले आणि दोन्हीही वृंदावने डोलू लागली.
ब्रम्हनाळ मठाची उपासना श्रीरामाची. इथे रामनवमी ,महाशिवरात्र, रघुनाथ स्वामी व आनंदमूर्तींचे पुण्यतिथी उत्सव व अन्य काही लहान उत्सव कार्यक्रम होतात. सज्जनगडचे श्रीधर स्वामी सुद्धा ब्रह्मनाळला आले होते . त्यावेळी डोल पाहून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ज्या ज्या वेळी वृंदावन समाधीसमोर वेद घोष होतो व भक्तिभावाने भजन, कीर्तन, नाम संकीर्तन, प्रवचने, साधुसंत करतात व ब्रह्मनिष्ठ योगी ,तपस्वी पुरुष दर्शनास येतात त्यावेळी वृंदावन डोलते असा अनुभव आहे.
नरसोबाच्या वाडीचे नारायण स्वामी दर्शनास आले असता ते दोघांच्या वृंदावनामध्ये बसून ध्यान करू लागले आणि दोन्हीही वृंदावने डोलू लागली.
परम कठीण शीला- डोलवी वृक्ष जैसा |
जननी जठर कोषी जन्मला कोण ऐसा ||
हरिभजन प्रतापे ख्याती झाली दिगंती |
अनुदिनु स्मरचित्ता श्री आनंदमूर्ती ||
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ : ऋचा : १ ते ५ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ (अनेक देवतासूक्त)
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : ऋचा १ – ५ : देवता १ प्रजापति; २ अग्नि; ३-५ सवितृ
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील चोविसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेले असल्याने हे अनेक देवता सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिली ऋचा प्रजापतीला, दुसरी ऋचा अग्नीला, तीन ते पाच या ऋचा सवितृ देवतेला आणि सहा ते पंधरा या ऋचा वरुण देवतेला आवाहन करतात.
या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी प्रजापती, अग्नी आणि सवितृ या देवतांना उद्देशून रचलेल्या पहिल्या पाच ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
भग॑भक्तस्य ते व॒यमुद॑शेम॒ तवाव॑सा । मू॒र्धानं॑ रा॒य आ॒रभे॑ ॥ ५ ॥
मनुजांना त्यांच्या भाग्याचा तूच देशी भार
भाग्य आमुचे आम्हा द्याया यावे हो सत्वर
लक्ष्मीप्राप्ती तुझ्या कृपेने आम्ही लक्ष्मीधर
धनसंपत्ती राशीवरती आम्ही असू सुस्थिर ||५||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
☆ इस्रोचे आणखी एक दमदार पाऊल ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆
स्रोचे आणखी एक दमदार पाऊल :::
इस्रोचे पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यान बनविण्याच्या दिशेने दमदार पाऊल
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) २ एप्रिल २०२३ रोजी पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यानाच्या स्वयंचलित भू अवतरण मोहिमेची यशस्वी चाचणी घेतली. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील हवाई परीक्षण केंद्रात (aeronautical test range-ATR) ही चाचणी घेण्यात आली. त्यामुळे आता प्रक्षेपण यानाच्या स्वयंचलित भू अवतरणाची क्षमता इस्त्रोने प्राप्त केली असून पुनर्वापरयोग्य प्रक्षेपण यान मोहिमेची ही सुरुवात आहे असे म्हणायला हरकत नाही.
भारतीय हवाई दलाच्या चीनुक हेलिकॉप्टरचा एक अधिभार म्हणून RLV (reusable launch vehicle) ने सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी उड्डाण भरले आणि समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटरची उंची प्राप्त केली. RLV च्या मोहीम व्यवस्थापन संगणक आज्ञेनुसार (mission management computer command) ठरविलेले अवतरणाचे मापदंड (landing parameters) प्राप्त झाल्यावर RLV ला मध्यआकाशात चीनुक पासून वेगळे करण्यात आले. RLV ला वेगळे करण्याच्या दहा मापदंडमध्ये स्थिती, वेग,उंची आदि गोष्टींचा समावेश होतो. RLV ला वेगळे करणे स्वायत्त (autonomous) होते. एकात्मिक दिक् चलन, मार्गदर्शन आणि नियंत्रण प्रणालीचा (integrated navigation, guidance and control) वापर करून RLV ने उपगम (approach) आणि अवतरण (landing) प्रयुक्त्या (maneuvers) केल्या आणि भारतीय वेळेनुसार सात वाजून चाळीस मिनिटांनी ATR च्या धावपट्टीवर यशस्वीरीत्या स्वायत्त अवतरण केले.
अंतराळ वाहन पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करत असताना जी परिस्थिती असते अगदी तशाच परिस्थितीत म्हणजे उच्च वेग, विनाचालक आणि परतीच्या मार्गावरून अचूक अवतरण अशा परिस्थितीत -जणूकाही अंतराळ वाहन अंतराळातून परतत आहे- स्वायत्त अवतरण पार पाडण्यात आले.
कक्षीय पुनर्प्रवेश अंतराळ वाहनास त्याच्या परती च्या मार्गावर जमीन सापेक्ष गती (ground relative velocity), अवतरण प्रणालीच्या ऋण प्रवेगाचा दर (sink rate of landing gears- हा साधारण तीन फूट प्रतिसेकंद असतो ) आणि विमान क्षितिज समांतर असतांना त्याच्या दिशा बदलाचा अचूक दर (precise body rate – हा सर्वसाधारण तीन डिग्री प्रती सेकंद असतो ) वगैरे जे अवतरण मापदंड (landing parameters) असायला हवेत त्या सर्वांची या प्रयोगात पूर्तता झाली. RLV LEX (Reusable Launch Vehicle Landing Experiment) साठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता होती. त्यामध्ये अचूक दिक् चलन हार्डवेअर व सॉफ्टवेअर, स्युडोलाईट1 प्रणाली, का बँड रडार अल्टीमिटर, NavIC रिसिव्हर, स्वदेशी अवतरण प्रणाली, एरोफॉइल हनिकोंब फिन आणि ब्रेक पॅरेशूट प्रणाली वगैरे गोष्टींचा समावेश होतो. या प्रयोगामुळे वरील सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सिद्धता आपण करू शकलो.
जगात पहिल्यांदाच एखादे विमान हेलिकॉप्टरद्वारा ४.५ कि. मी. उंचीवर नेऊन धावपट्टीवर स्वायत्त अवरोहण करण्यासाठी सोडण्यात आले. RLV हे एक अंतरीक्ष विमान असून त्याचे उच्चालन व अवरोध यांचे गुणोत्तर (lift to drag ratio) कमी असते. त्यासाठी उपगम (approach) समयी सर्पण कोन (glide angle) मोठा असणे आवश्यक असते. हे साध्य करण्यासाठी अतीवेगाने म्हणजे साधारण ताशी ३५० कि.मी. ने अवतरण करावे लागते.
LEX मध्ये विविध स्वदेशी प्रणालींचा वापर करण्यात आला आहे. स्युडोलाईट प्रणालीवर आधारित स्थानिक दिक् चलन(navigation) प्रणाली, उपकरणयोजना (instrumentation) आणि संवेदक (sensors) प्रणाली वगैरे अनेक गोष्टी इस्रोने विकसित केल्या आहेत. का बँड रडार अल्टीमीटर सहित असणाऱ्या अवतरणाच्या जागेच्या अंकीय उत्थान प्रारूपामुळे (Digital Elevation Model-DEM) उंचीसंबंधीची अचूक माहिती मिळते. विस्तृत पवन बोगदा चाचण्या (Extensive wind tunnel tests) आणि CFD प्रतिरूपविधानांद्वारा (Simulations) उड्डाणाआगोदरच RLV चे वायुगतिकी वैशिष्ट्यचित्रण (Aerodynamic Characterization) करता आले. RLV LEX साठी विकसित केलेल्या समकालीन (Contemporary) तंत्रज्ञानामुळे इस्रोच्या इतर वापरत असलेल्या प्रक्षेपकांच्या प्रक्षेपणाच्या खर्चात बचत होणार आहे.
ISRO ने मे २०१६ मध्ये HEX (Hypersonic Flight Experiment) मिशनमध्ये RLV-TD (Reusable Launch Vehicle-Technology Demonstrator) या विमानाच्या पुन: प्रवेशाचे प्रात्यक्षिक दाखवले होते. हायपरसॉनिक सब-ऑर्बिटल वाहनाच्या पुन:प्रवेशाने पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन विकसित करून इस्रोने एक मोठी उपलब्धी प्राप्त केली होती. HEX मध्ये, वाहन बंगालच्या उपसागरावर एका काल्पनिक धावपट्टीवर उतरले. धावपट्टीवर अचूक लँडिंग हा एक पैलू होता जो HEX मिशनमध्ये समाविष्ट नव्हता. LEX मोहिमेमध्ये अंतिम उपगम टप्पा (Final approach phase) गाठता आला त्या बरोबरच परतीच्या उड्डाणमार्गाने पुनःप्रवेशासाठीचे स्वायत्त, उच्चगतीच्या (३५०कि.मी.प्रती तास) अवतरणाचे प्रात्यक्षिक पण पार पाडण्यात आले. LEX ची सुरुवात २०१९ मध्ये एकात्मिक दिक् चलन चाचणीने झाली. त्यानंतरच्या वर्षांत अनेक अभियांत्रिकी प्रारूप चाचण्या व बंधनस्त टप्पा चाचण्या (Captive Phase Tests)पार पाडण्यात आल्या.
ISRO सोबत IAF, CEMILAC, ADE, ADRDE यांनी या चाचणीसाठी हातभार लावला. IAF टीमने प्रोजेक्ट टीमसोबत हातात हात घालून काम केले. डॉ.एस उन्नीकृष्णन नायर, संचालक, व्हीएसएससी, आणि श्री श्याम मोहन एन, कार्यक्रम संचालक, एटीएसपी यांनी मार्गदर्शन केले. डॉ. जयकुमार एम, प्रकल्प संचालक, RLV हे मोहिमेचे संचालक होते आणि श्री मुथुपांडियन जे, सहयोगी प्रकल्प संचालक, RLV हे मोहिमेचे वाहन संचालक होते. यावेळी ISTRAC चे संचालक श्री रामकृष्ण उपस्थित होते. अध्यक्ष, ISRO/सचिव, DOS श्री एस. सोमनाथ यांनी चाचणी पाहिली आणि सर्वांचे अभिनंदन केले.
LEX मुळे भारताचे पुन: वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाचे स्वप्न वास्तवतेकडे जाण्यास सुरुवात झाली आहे.
टीप :
1.स्युडोलाईट – हे स्युडो सॅटेलाईट शब्दाचे संक्षिप्त रुप आहे. हा खरा उपग्रह नसतो पण सर्वसाधारणपणे उपग्रहाच्या कार्यक्षेत्रात असणारी कामे करतो. बहुतेकदा स्युडोलाईट्स हे लहान पारेषकग्राही-transceivers- असतात व त्यांचा उपयोग GPS प्रणालिला पर्यायी प्रणाली स्थानिक पातळीवर निर्माण करण्यासाठी केला जातो.
☆ – ‘गदिमांची आई !’— प्रत्यक्षातली व गाण्यातली… — ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
आईवर गदिमांचं अपार प्रेम ! त्यांची आई बनूताई ही विलक्षण करारी स्त्री. ‘माडगूळ्यात’ तिचा अतिशय दरारा. अख्ख्या गावात तिच्या शब्दाला वजन. नंतर ‘कुंडल’मधे रहाताना तर ती संपूर्ण कुटुंबाचं ‘कवचकुंडल’च बनली. एकदा, गदिमांच्या वडिलांना, गावच्या मामलेदारीण बाईनं घरचं पाणी भरायला सांगितलं म्हणून बनूताईनं चारचौघात तिला थप्पड मारली व ‘पुन्हा घरची कामं सांगायची नाहीत’ असा सज्जड दम भरला. आत्यंतिक गरिबीतही मुलांमधला स्वाभिमान तिनं जोपासला. पण एके दिवशी घरात खायला काहीच नव्हतं तेव्हा मठातल्या गोसाव्यासमोर पोरांसाठी पदर पसरण्यातही संकोच मानला नाही. ती स्वतः ओव्या रचत असे. गदिमा आपल्या गीतांना, ‘आईच्या ओव्यांच्या लेकी’ म्हणत असत. ‘वाटेवरल्या सावल्या’मधे त्यांनी आईच्या अनेक हृद्य आठवणी सांगितल्या आहेत. आईचं व्यक्तित्व असं प्रभावी असल्यानं, गदिमा मातृभक्त झाले नसते तरच नवल.
सिनेगीतं ही कथानुसारी असतात हे खरंच. पण गदिमांचं ‘मातृप्रेम’ त्यांच्या गीतातून अगदी ठळकपणे जाणवतं.
‘वैशाख वणवा’ मधे ‘आईसारखे दैवत सा-या जगतावर नाही’ हे गीत त्यांनी लिहिलं आहे. त्यात,
‘नकोस विसरु ऋण आईचे
स्वरुप माऊली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरुन तियेचा
होई उतराई’
अशा ओळी त्यांनी लिहिल्या. स्वतः ‘थोर पुरुष’ ठरुन मातृऋणातून ते उतराई झाले.
‘खेड्यामधले घर कौलारु’ मधे ‘माजघरातील उजेड मिणमिण.. वृध्द कांकणे करिती किणकिण’ असे भावोत्कट शब्द लिहून ‘दूरदेशीच्या प्रौढ लेकराच्या’ वाटेकडे डोळे लावून बसलेली आई त्यांनी रंगवली. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ हे गीत तर ‘मातृत्वाचं सायंकालीन स्तोत्र’च आहे. ‘लिंबलोण उतरु कशी असशी दूर लांब तू’ हे गाणंही आईच्या सनातन वात्सल्याचं हृदयस्पर्शी शब्दरुप आहे.
‘आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला‘ या बालगीतात,
‘कुशीत घेता रात्री आई
थंडी वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे
सुगंध तिचिया पाप्याला’
हे शब्द लिहिताना त्यांना आपलं लहानपण आठवलं असेल का?
‘वैभव’मधल्या ‘चांद किरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा’ या गाण्यात गीताची नायिका, ‘खिडकीतून हळूच डोकावून माझ्या माऊलीची मूर्त न्याहळा’ असं चंद्रकिरणांना विनवते. ‘पाडसाची चिंता माथी, करी विरक्तीची पोथी’ अशा ओळी यात गदिमांनी लिहिल्या आहेत.
‘त्या तिथे पलीकडे माझिया प्रियेचे झोपडे’ हे संपूर्ण गीत रुपकात्मक आहे असं प्रतिपादन नरहर कुरुंदकरांनी केलं होतं. यात ‘वळणावर अंब्याचे झाड एक वाकडे’ म्हणजे ‘वृध्द वडील’ आणि ‘कौलावर गारवेल वा-यावर हळू डुलेल’ मधली ‘गारवेल’ म्हणजे ‘आई’ असा अर्थ त्यांनी लावला होता. उन्हापावसापासून घराला आडोसा देणारी ही ‘गारवेल’ रंगवताना गदिमांच्या नजरेसमोर कदाचित ‘कुंडल’मधली ‘बनूताई’ही असेल.
गदिमांच्या सिनेगीतात मातृमहात्म्याच्या अशा अनेक पाऊलखुणा आढळतील. त्यांची भावगीतं, कविता यातून तर असे भरपूर संदर्भ वेचता येतील.
‘तुझ्या वंदितो माउली पाऊलांस’ ही ‘मातृवंदना’ तर त्यांनी खास स्वतःच्या मातेसाठीच लिहिली होती.
‘धुंद येथ मी स्वैर झोकितो’ या गाण्यात ‘एकीकडे बाळाला अमृत पाजणारी आई आणि दुसरीकडे मद्यरुपी विष रिचवणारा तिचा पती’ असा पराकोटीचा विरोधाभास त्यांनी रेखाटला होता. आपल्या जीवनातदेखील असा दाहक विरोधाभास घडेल याची त्यांना कल्पनाही नसेल. बनूताईना ‘आदर्श माता पुरस्कारानं’ गौरवलं जात असतानाच घरी त्यांच्या लाडक्या ‘गजाननानं’ … गदिमांनी या जगाचा निरोप घेतला. (14 डिसेंबर 77) केवढा हा दैवदुर्विलास !
गदिमांच्या अंत्यसंस्कारावेळी सुधीर मोघेंनी ‘मातृवंदना’ मधे चार पंक्तींची भर घातली…
‘क्षमा मागतो जन्मदात्री तुझी मी
निघालो तुझ्या आधी वैकुंठधामी’
सुखाने घडो अंतीचा हा प्रवास
तुझ्या वंदितो माऊली पाऊलांस !’
लेखक : धनंजय कुरणे
9325290079
संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈