मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वैश्विक गणेश यात्रा: चीन मधील ‘भगवान विनायक’ ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

 ☆ वैश्विक गणेश यात्रा: चीन मधील ‘भगवान विनायक’ ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆ 

चीन म्हणजे पोलादी पडद्याआडचा देश. या अश्या चीन चे आणि भारताचे संबंध फार प्राचीन आहेत. प्राचीन म्हणजे किती जुने..? काही निश्चित सांगता येणं कठीण आहे. पहिल्या शतकात चीन मध्ये असलेल्या हिंदू मंदिरांचे पुरावे मिळाले आहेत. मात्र हिंदू धर्माचा प्रादुर्भाव चीन मध्ये या पेक्षा ही आधी झाला असावा.

आज सुध्दा चीन मध्ये अनेक हिंदू मंदिरं आहेत. आणि जिथे हिंदू मंदिरं आहेत, तिथे गणरायाची उपस्थिती ही असतेच असते. चीन च्या ह्या हिंदू मंदिरांमध्ये श्री गणेशाच्या अनेक प्राचीन मूर्ती आहेत. येथे गणेशाला बुध्दी आणि समृध्दी ची देवता मानलं जातं. 

चीन च्या फुजियान प्रांतात, क्वांझाऊ शहरात, जवळपास वीस हिंदू मंदिरं आहेत. ही सारी मंदिरं साधारण दीड हजार वर्ष जूनी आहेत. त्या काळात चीन चा, भारताच्या तामिळ भाषिक क्षेत्राशी मोठा व्यापार चालायचा. आजच्या तामिळनाडू मधून अनेक वस्तु चीन ला जायच्या, आणि चीन हून साखर आणि इतर पदार्थ आयात केले जायचे. स्वाभाविकतः या क्वांझाऊ शहरात मोठ्या संख्येने तामिळ व्यापारी आणि त्यांची माणसं राहायची. त्यांनीच ही मंदिरं बांधली. (२०१९ च्या डिसेंबर मध्ये चीन चे राष्ट्रपती शी जिनपिंग भारतात आले असताना, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या बरोबर ची एक बैठक तामिळनाडू च्या ‘महाबलीपुरम’ येथे ठेवली होती. सातव्या आणि आठव्या शतकात, पल्लवांच्या काळात, भारत आणि चीन मधील व्यापार येथून होत होता, त्याला उजळणी देण्यासाठी महाबलीपुरम ची निवड केलेली होती). सन ६८५ च्या आसपास, तेग राजवंश्या च्या काळातली ही मंदिरं आहेत. या मंदिरांमध्ये नंतर स्थानिक चीनी लोक ही यायला लागले आणि पूजा करायला लागले. या मंदिरांवर मेंदारिन (चीनी), संस्कृत आणि तामिळ भाषेतील शिलालेख आहेत. या सर्व मंदिरांमध्ये भगवान गणेश विराजमान आहेत. चीन च्या गंसू प्रांतात तुन-हुयांग (की दुन-हुयांग) शहरातील बौध्द मंदिरांमध्ये श्री गणराय, कार्तिकेयांबरोबर दिसतात.    

चीन च्या उत्तर भागात झालेल्या उत्खननात जी गणेश प्रतिमा मिळाली आहे, ती कार्बन डेटिंग च्या अनुसार सन ५३१ ची आहे. चीन च्या अगदी दक्षिण टोकावर असलेले गुआंगदोंग (Guangdong) हे बंदर (port) आहे तर क्वांझाऊ किंवा चिंचू ही सुध्दा बंदरांची शहरं आहेत. तामिळ व्यापारी, सागरी मार्गाने, याच बंदरांच्या रस्त्याने चीन मध्ये यायचे. स्वाभाविकतः या सर्व बंदरांच्या आसपास अनेक हिंदू मंदिरांचे अवशेष आजही मिळतात. या शहरातील पुरातत्व संग्रहालयांमध्ये भगवान शंकर, गणेश, दुर्गा देवी इत्यादींच्या अनेक प्रतिमा आहेत. 

सागरी मार्गाशिवाय, भारतीयांचे चीन ला जायचे इतरही मार्ग होते. आसाम च्या कामरूप हून, ब्रम्हदेशाच्या रस्त्याने भारतीय व्यापारी चीन ला जायचे. काश्मीर च्या सुंग-लिंग हून चीन ला जाणारा अजून एक मार्ग होता. दुसर्‍या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत, दीडशे हून जास्त चीनी विद्वानांनी भारतातील संस्कृत ग्रंथांचा चीनी भाषेत अनुवाद करायला आपल्या जीवनाचे ध्येय बनवले होते. वेदांना चीनी भाषेत ‘मांग – लून’ (ज्ञान आणि बुध्दीचे विज्ञान) म्हटले जाते. अनेक ‘संहिता’ आणि ‘शास्त्रांचा’ अनुवाद चीनी भाषेत उपलब्ध आहे. गंमत म्हणजे यातील काही ग्रंथ असे आहेत, जे भारतात आलेल्या मुस्लिम आक्रांतांनी नष्ट केले होते, परंतु यांचा चीनी अनुवाद उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, ‘सांख्यकारिका’ हा ग्रंथ मूळ संस्कृत मध्ये कुठेही सापडत नाही. मात्र त्याचा चीनी अनुवाद – ‘जिन की शी लून’ (Jin Qi Shi Lun) उपलब्ध आहे. आता या चीनी ग्रंथाचा पुन्हा संस्कृत भाषेत अनुवाद केला गेला आहे. असे इतरही ग्रंथ आहेत. 

आज सुध्दा चीन मध्ये, चीनी भाषा बोलणारे, परंतु हिंदू जीवन पध्दती आणि परंपरा मानणारे लोकं राहतात. यांची संख्या तुलनेने कमी आहे. म्हणून चीन च्या पाच प्रमुख पंथांमध्ये यांचा समावेश नाही. परंतु हा समुदाय आज सुध्दा भारतीय सण आणि उत्सव उत्साहाने साजरा करतो. ‘गणेश उत्सव’ हा चीनी पध्दती ने साजरा केला जातो.  

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कशी येते मॅच्युरिटी..? ☆ संग्राहिका – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

? इंद्रधनुष्य ?

 ☆ कशी येते मॅच्युरिटी..? ☆ संग्राहिका – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

(परिपक्व व्यक्तिमत्व)

  • माणूस जेव्हा दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्ये बदल घडवायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस जेव्हा जास्त बोलण्याऐवजी समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस त्याच्या समोरचे लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • प्रत्येक माणसाचा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा स्वतःचा असा विशिष्ट दृष्टिकोन असतो हे समजायला लागते तेव्हा माणसाकडे मॅच्युरिटी येते.
  • प्रत्येकवेळी आपणच शहाणे असल्याचा आविर्भाव आणणे माणूस जेव्हा बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस काळानुसार बदल स्विकारुन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानून तक्रारी करणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस जेव्हा जबाबदाऱ्या घ्यायला आणि चुकांमधून पुढे जायला शिकतो,तसेच आपल्या चुकांचे खापर इतरांवर फोडणे बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस इतरांवर जळण्याऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस इतरांची स्वतःसोबत तुलना बंद करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस रागावर नियंत्रण ठेवून समजूतदारीने वागण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.
  • माणूस निर्णय घेतल्यानंतर चंचलपणे न वागता घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने उभे राहायला शिकतो तेव्हा त्याच्याकडे मॅच्युरिटी येते.

परिपक्व असणे म्हणजेच प्रत्येक प्रसंगात समजूतदारीने निर्णय घेणे.

आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या.

सर्वानी आनंदात राहा. आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.

संग्राहिका – डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सोंड नसलेला एकमेव गणपती ! ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ सोंड नसलेला एकमेव गणपती ! ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पहायला मिळते.

गणपतीच्या अन्य रुपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही.

मात्र, दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी,  म्हणजे मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे. मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ हे मंदिर आहे. 

‘आदी विनायक मंदिर ‘ असे या मंदिराचे नाव आहे. 

गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या या मूर्तीमुळे याला  आदी गणपती ”  असे संबोधले जाते.

|| गणपती बाप्पा मोरया ||

संग्रहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जगातील सर्वात उंच गणेश मूर्ती ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ जगातली सर्वात उंच गणेशमूर्ती ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

गणपतीच्या उंचीच्या बाबतीत बोलायचं झालं, तर जगातली गणपतीची सगळ्यात उंच मूर्ती भारतात नाही, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

थायलंडच्या ख्लॉन्ग ख्वान्ग शहरामध्ये जगातली सगळ्यात मोठी गणपतीची मूर्ती आहे. या शहरामध्ये गणेश इंटरनॅशनल पार्क बनवण्यात आलं आहे, तिकडेच ही ३९ मीटर उंच गणपतीची कांस्याची मूर्ती आहे.

गणपतीच्या मूर्तीच्या डोक्यावर कमळाचं फूल आणि त्यामध्ये ओम लिहिलं आहे. या मूर्तीला कांस्याच्या ८५४ वेगवेगळ्या भागांपासून बनवण्यात आलं आहे. गणपतीच्या मूर्तीसह हे पार्क बनवायला २००८ ते २०१२ अशी ४ वर्ष लागली. थायलंडमध्ये जी ४ फळं पवित्र मानली जातात, त्या फळांना गणपतीच्या हातात ठेवण्यात आलं आहे. यामध्ये फणस, आंबा, ऊस आणि केळ्याचा समावेश आहे. 

थायलंडमध्ये आंब्याला समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. गणपतीच्या पोटावर सापाने वेटोळे घातले आहेत, तर बाप्पाच्या सोंडेमध्ये लाडू आणि पायाखाली उंदीर आहे. थायलंडमध्येही गणपतीला ज्ञान आणि बुद्धीमत्तेची देवता म्हणून मानलं जातं.

थायलंडमध्ये गणपतीची ही मूर्ती नेमकी बनवली कोणी याचा किस्साही रंजक आहे. थायलंडमधली अयोध्या म्हणजेच अयुथ्या साम्राज्याबाबत विस्ताराने वाचलं असता, याचे दाखले मिळतात. या साम्राज्यामध्ये चाचोएंगशाओ नावाचं शहर १५४९ मध्ये वसवण्यात आलं होतं. याच शहराची चाचोएंगशाओ असोसिएशन ही संस्था धार्मिक आणि सामाजिक कार्य करायला नेहमीच पुढे असते. या असोसिएशनचे अध्यक्ष पोल जेन समाचाई वानीशेनी यांनी जगातली गणपतीची सगळ्यात मोठी मूर्ती बनवायचं ठरवलं. यानंतर त्यांनी जागा शोधायला सुरूवात केली. 

संस्थेला ख्लॉन्ग ख्वान्ग शहरात ४० हजार वर्ग मीटर जागा निश्चित करण्यात आली. ही जमीन सुपीक आणि कृषीप्रधान क्षेत्र असल्यामुळे ही जागा गणपतीची मूर्ती स्थापन करण्यासाठी निवडण्यात आली. सगळ्यात आधी या जागेवर इंटरनॅशनल गणेश पार्क बनवण्यात आलं. यानंतर मग मूर्ती बसवण्यात आली. 

चाचोएंगशाओ असोसिएशनने इकडे एक सेंट्रल म्युझियमही बनवलं आहे. स्थानिक इतिहासाचं संवर्धन आणि सुरक्षिततेसाठी हे म्युझियम बनवण्यात आलं. या भागामध्ये कित्येक शतकांपासून हिंदू संस्कृतीही नांदत आहे. 

मागच्या काही वर्षांपासून थायलंडच्या बँक पॅकांग नदीच्या आसपासचं क्षेत्र सगळ्यात मोठं पर्यटन क्षेत्र झालं आहे. त्यामुळे तिथले लोक आंतरराष्ट्रीय देवाची सगळ्यात मोठी मूर्ती तिकडेच असावी, अशी मागणी करत होते. अखेर गणपतीची मूर्ती बसवण्यावर सगळ्यांची सहमती झाली. 

गणपतीची जगातली सगळ्यात मोठी मूर्ती तिथले प्रख्यात मूर्तीकार पिटक चर्लेमलाओ यांनी तयार केली आहे. 

गणपतीची ही मूर्ती जगातली सगळ्यात उंच असून अजूनपर्यंत कोणीही यापेक्षा उंच मूर्ती असल्याचा दावा केला नसल्याचं असोसिएशनने सांगितलं आहे.

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लाईफ मॅनेजमेंट ☆ संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ लाईफ मॅनेजमेंट ☆ संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर ☆ 

लाइफ मॅनेजमेंट ?

प्रोफेसरने भांड्यात पाणी टाकून त्यामध्ये बेडूक टाकला, यानंतर ते भांडे तापायला ठेवले, पाणी गरम झाल्यानंतर बेडकाचे काय झाले, प्रोफेसरने असे कां केले ???——–

एका कॉलेजमध्ये “फिलॉसफीचे” एक प्रोफेसर शिकवायचे…ते वेगवेगळ्या पध्दतींनी विद्यार्थ्यांना आयुष्यातील लहान-लहान गोष्टी समजावण्याचा प्रयत्न करायचे…

एक दिवस प्रोफेसरने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना बोलावले आणि म्हणाले की, आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट समजावणार आहे.

सर्व विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत व बघत होते.

प्रोफेसरने पाण्याने भरलेले एक भांडे घेतले आणि त्यामध्ये बेडूक टाकला. पाण्यात जाताच बेडूक आरामात पोहू लागला. यानंतर प्रोफेसरने ते भांडे तापायला ठेवले.

भांड्यातील पाणी हळुहळू गरम होत होते. भांड्यामध्ये जो बेडूक होता तो पाण्याच्या वाढत्या तापमानानुसार स्वतःला अॅडजस्ट करत होता. हळुहळू पाणी जास्त गरम होत होतं, पण बेडकाला काहीच फरक पडत नव्हता. तो स्वतःला तापमानानुसार तयार करत होता.

काही वेळानंतर पाण्याचे तापमान खूप वाढले आणि पाणी उकळू लागले. तेव्हा बेडकाचीहि सहनशक्ती संपली. त्याला त्या भांड्यात थांबणे कठीण झाले. तेव्हा बेडकाने उडी मारुन भांड्याबाहेर येण्याचा प्रयत्न केला.

बेडकाने पूर्ण शक्ती लावूनहि त्याला त्या भांड्यातून बाहेर पडता आले नाही. प्रोफेसरने तात्काळ त्या बेडकाला बाहेर काढले. प्रोफेसरने विद्यार्थ्यांना विचारले की, बेडूक भांड्याबाहेर उडी कां मारु शकला नाही ???

सर्वांनी वेगवेगळी उत्तरे दिली.

तेव्हा प्रोफेसर म्हणाले – बेडूकाची इच्छा असती तर तो पाणी तापायला ठेवल्याबरोर बाहेर येऊ शकत होता. पण बेडूक स्वतःला वातावरणानुसार ऍडजेस्ट करण्याचा प्रयत्न करत होता. जेवढे तो सहन करु शकत होता, तेवढे त्याने केले.

पण जेव्हा त्याला वाटले की, जीव वाचवण्यासाठी बाहेर पडावेच लागेल, तेव्हा तो उडी मारु शकला नाही, कारण अॅडजस्ट होण्याच्या प्रयत्नात त्याची सर्व एनर्जी नष्ट झाली होती. जर मी त्याला बाहेर काढले नसते, तर बेडूक मरुन गेला असता.

लाइफ मॅनेजमेंट ?

प्रोफेसरने आपल्या विद्यार्थ्यांना ऐकवले – 

सर्व लोकांसोबत असेच होते. आपण नेहमी आपल्या परिस्थितीशी जुळवून घेतो. पण त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही. पण जेव्हा आपण पूर्णपणे परिस्थितीमध्ये अडकतो तेव्हा आपल्याला वाटते की, मी योग्य वेळी बाहेर पडायला पाहिजे होते. पण तोपर्यंत वेळ गेलेली असते.

 बोध—— योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला म्हणजेच जीवन जगण्याची कला होय.

संग्राहक – सुश्री मानवी केळकर/श्री माधव केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆  स्टोव्ह ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ स्टोव्ह  ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

स्टोव्ह मध्ये राॅकेल भरायला नरसाळे, पत्र्याची नळी असलेला पंप,पुढे काही वर्षांनी प्लॅस्टिकचा फुग्याचा व काॅक असलेला पंप आल्यावरचा आनंद विसरणे शक्य आहे का ? 

जमिनीवर थोडेफार सांडलेल्या राॅकेलचा वास अजूनही चांगला आठवतो आहे.

स्वयंपाक करताना अन्नाला राॅकेलचा वास येऊ नये म्हणून घेतलेली काळजी.

आईचे आपल्या कुटुंबावर किती प्रेम आहे, हे आता जाणवते.

स्टोव्ह पेटवण्यासाठी काकडा व तो बुडवण्यासाठी बिटको काला दंत मंजन च्या छोट्या रिकाम्या झालेल्या काचेच्या बाटलीत राॅकेल भरून ठेवायचे. 

काडेपेटी व ती ठेवण्यासाठी हिंगाची रिकामी झालेली पत्र्याची डबी असा सगळा थाट असायचा. 

पीन करणे एक कौशल्याचे काम होते. हात अगदी सरळ धरून. पीन वाकडी होणार नाही याची काळजी घ्यावी लागत असे जर पीन निपलमधे तुटली तर सगळाच खोळंबा व्हायचा. त्याकरीता निप्पल पाना, सायकलची तार, कातडी वायसर इत्यादी हत्यारे घरीच ठेवलेली असायची. 

स्टोव्हची टाकी गळत असेल तर तिथे लावण्यासाठी  501 नं.चा साबण बार. 

स्टोव्ह बिघडल्यावर घरातली होणारी चिडचिड तर विचारूच नका आणि दुरूस्त करून आणल्यावर आईची प्रसन्न मुद्रा, ओसंडून वाहणारा आनंद पाहिला की घरातली माणसे अगदी खूष व्हायची. 

स्वयंपाक झाल्यावर आईने सोडलेला सुस्कारा जितका मनाला शांत करतो ना अगदी तसाच शांतपणा स्टोव्हची चावी सोडल्यावर येणारा स्सूsssssss आवाजही खूप मनाला प्रसन्न करणारा होता.

मित्रांनो कोणाकोणाच्या आठवणी जाग्या झाल्या?

 

संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऋणानुबंध ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ ऋणानुबंध ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

गेल्या आठवड्यात एका आजींच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहोळ्याला गेले होते. या आजींना दोन मुलगे, पैकी एक डॉक्टर (अस्थीरोगतज्ञ) आणि दुसरा चार्टर्ड अॅकाउंटंट. दोन्ही मुलगे सुना व उच्चशिक्षित नातवंडे या सर्वांनी मिळून एका पंचतारांकित हॉटेल  मधे थाटात सोहळा आयोजित केला होता. आजींच्या दोन्ही मुलांनी अगदी थोडक्यात जी आजींची जीवनकहाणी आम्हा उपस्थितीतां समोर मांडली, आणि त्यातून ऋणानुबंध कसे असतात, ते ऐकून आमच्या अनेकांच्या डोळ्यांमधून पाणी वाहिले.

आजींचे हे दोन्ही मुलगे जुळे. हे मुलगे दोन वर्षांचे असताना आजींवर वैधव्याची कु-हाड कोसळली. एकत्र कुटुंबात या आजींना केवळ आश्रीत हा दर्जा मिळाला. “आम्ही तीन खाणारी तोंडे पोसतो” असे उद्गार ऐकवले जाऊ लागले.

सांगली जवळच्या छोट्या खेड्यात पंचवीस माणसांच्या कुटुंबा साठी राब-राब राबून पहाटे पाच ते रात्री आकरा वाजे पर्यंत कामे करून पण शिव्या खाणेच आजींच्या नशीबात आले.

एक दिवस मुले पाच वर्षांची झाल्यावर पहाटे अगदी चुपचापपणे आजी दोन्ही मुलांना घेऊन बाहेर पडल्या आणि पुण्याला आल्या. दोन दिवस चुलतबहिणी कडे राहून लगेच त्यांनी सदाशिव पेठेत भाड्याची खोली एका वाड्यात घेतली. आजींनी पोळपाट लाटणे हाती घेऊन स्वैंपाकाची कामे मिळवली. हाताला अत्यंत चव होती त्यामुळे कामे भरपूर मिळू लागली. मुलांना नू. म. वि. शाळेत घातले.

मुले अत्यंत गुणी. परिस्थिती समजून कधीही आईजवळ कोणताच हट्ट केला नाही.

आजी डेक्कन वर डॉ. बापट यांच्या घरी स्वैपाकाचे काम करायच्या. अत्यंत विश्वासू व सुगरण बाई बापट कुटुंबियांना भलतीच आवडली. त्यांची मुले पण आजींच्या मुलांच्या बरोबरीची होती व हे डॉक्टर पतीपत्नी दिवसभर कामात असल्यामुळे त्यांना घर व मुलांकडे बघायला विश्वासू माणसाची गरज होती. म्हणून त्यांनी आजी व त्यांच्या मुलांना बंगल्यात आऊटहाऊस मधे रहायला जागा दिली. आजींच्या रहाण्याची सोय झाली सज्जन माणसांचा पाठिंबा मिळाला.

दोन्ही मुले अतिशय हुशार. चौथी व सातवीची पण शिष्यवृत्ती मिळवून पुढे गेली. आजींच्या कष्टाळू वृत्ती मुळे बापट कुटुंबियांना पण सोयीचे झाले. “माझी मुले उच्चशिक्षित झालीच पाहिजेत” हा आजींनी ध्यास घेतला होता. दहावीला मुलांनी मेरिटलिस्ट मधे नाव मिळवले आणि पेपर टाकणे, दुधाच्या पिशव्या टाकणे करत करत पुढील शिक्षण चालू केले. बापट कुटुंबियांनी पण दोन्ही मुलांच्या शिक्षणाला आर्थिक हातभार लावला.

मग आजींनी केलेल्या बचतीतून तसेच बापट मंडळी यांच्या मदतीने कोथरूडला अगदी छोटासा फ्लॅट घेतला, पण बापट यांचे काम मात्र त्या करतच होत्या. दोन्ही मुले उच्चशिक्षित होऊन गुणी सुना घरात आल्या. बापटांची मुले अमेरिकेत स्थायिक होऊन Greencard Holder झाली, आणि अमेरिकन पत्नी दोघांनी शोधली. बापट पती-पत्नी पण वृद्ध झाली आणि Problem म्हणजे त्यांच्या मुलांना भारतात येऊन आईवडील यांची काळजी घ्यायला पण वेळ नाही.

Knee-Replacement Operation, Spinal cord Operation सारखी मोठी Operations होऊनही मुलांनी साधी चौकशी पण केली नाही. मात्र आजींच्या डॉक्टर मुलाने तर स्वतः ऑपरेशन होताना त्याच्या सहकार्यां बरोबर लक्ष घालून खूप काळजी घेतली आणि दुस-या मुलाने पण दर वेळी खूप मदत केली.

आजींच्या सोहळ्याला बापट पतीपत्नी आले होते पण स्वतः श्री. बापट तर Wheel Chair वरून आले होते.

आता शेवटी असे समजले की, आजींच्या दोन्ही मुलांनी मिळून जो कोथरूडला मोठ्ठा बंगला बांधला आहे, त्या मधे वरच्या दोन खोल्यां मधे त्या दोन्ही मुलांनी बापट पतीपत्नी यांना आणले. आणि आजींची दोन्ही मुले त्यांची उतकृष्ट काळजी घेतात. बंगल्यातील तळमजल्यावर आजींचे कुटुंब जणू गोकुळ नांदते आहे. आजींची नातवंडे बापट पतीपत्नी यांना पण “आजीआजोबा” असेच म्हणतात.

सकाळसंध्याकाळ वरती ताजा स्वैपाक जातो. बापट काकाकाकू पण आयुष्याच्या संध्याकाळी समाधानी जीवन जगत आहेत.

“ऋणानुबंध

म्हणतात ते हेच असावेत ना ?

सत्य घटना… आपल्या पुण्यातली. डोळे भरून वाचावी अशी.

संग्रहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही .. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

पियाँटिक ह्या जनरल मोटर्स च्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली.

——” माझ्या गाडीला व्हेनीला आईसक्रीम आवडत नाही.”

जनरल मोटर्स ने साहजिकच ह्या तक्रारीकड़े दुर्लक्ष केले. 

काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीने हीच तक्रार केली. 

यावेळी जनरल मोटर्स ने त्याची चौकशी करायची ठरवले. त्यांनी त्या व्यक्तीला त्याची तक्रार व्यवस्थित सांगणयास सांगितले.

—–व्यक्तीने उत्तर दिले की तो, त्याची पत्नी आणि मुले रोज जेवण केल्यावर आईसक्रीम खायला जातात. रोज वेगवेगळे फ्लेवर घेतात. पण ज्या दिवशी ते व्हेनीला फ्लेवर घेतात त्या दिवशी त्यांची गाड़ी सुरु होत नाही.

जनरल मोटर्सने ‘ असे होउच शकत नाही ‘ असा दावा केला आणि दुर्लक्ष केले. इतर लोकांनी आणि कंपन्यानीसुद्धा त्या व्यक्तीची चेष्टा केली.

——काही दिवसांनी त्या व्यक्तीने परत हीच तक्रार केली. आता मात्र जनरल मोटर्सपुढे त्याची चौकशी करण्याशिवाय पर्याय नव्हता.

त्यांनी आपला एक इंजीनिअर त्या व्यक्ती कड़े पाठवला. इंजीनिअरने गाड़ी चेक केली. सगळे व्यवस्थित  असल्यामुळे नाईलाजाने त्याला त्या व्यक्तीसोबत रहावे लागले. रात्री आईसक्रीम खायला जाताना इंजीनिअर पण सोबत गेला. आईसक्रीम खाऊन सगळे घरी आले. दुसऱ्या दिवशी परत आईसक्रीम खायला गेले. व्यक्तीने व्हेनीला आईसक्रीम आणले —- आणि काय आश्चर्य त्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे गाड़ी सुरुच झाली नाही. 

——-इंजीनिअरने परत गाड़ी चेक केली पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तीने सांगितलेली तक्रार खरी आहे.

कंपनीने इंजीनियर ला तिथेच राहून नीट लक्ष देण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंजीनिअरने प्रत्येक गोष्टीची पाहणी करायला सुरवात केली. रोज त्या व्यक्तीबरोबर आईसक्रीम खायला गेल्यावर काही दिवसानंतर इंजीनिअरच्या लक्षात आले की ती व्यक्ती  जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते, तेव्हा त्याला गर्दीमुळे वेळ लागतो. पण व्हेनीला फ्लेवरला जास्त मागणी असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळे काउंटर होते आणि सर्विस पण तत्पर होती.  त्यामुळे तो ते घेऊन लवकर येतो. आणि नेमकी हीच गोष्ट इंजीनिअरला पाहिजे होती. त्याने त्या गोष्टीवर खुप अभ्यास केला. तेव्हा लक्षात आले की ती व्यक्ती  जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते,  तेव्हा त्याला यायला वेळ लागतो. तोपर्यन्त गाडीचे इंजिन थोड़े गार होते, आणि गाड़ी पुन्हा लगेच चालू होते. पण ती व्यक्ती  जेव्हा व्हेनीला फ्लेवर घेते,  तेव्हा तो लगेच परत येतो. त्यामुळे गाडीच्या इंजिनला गार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे इंजिन मधील पेट्रोलचे इव्हेपरेशन होते आणि ते ब्लॉक होते व परत चालू होत नाही. 

——आणि मग गाडीच्या इंजिनला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. जगातील अग्रमानांकित कंपनी मर्सेडीज़ने कार्ल बेंझ व विलिअम मेयबैकच्या मदतीने 1901 साली आपल्या ‘मर्सेडीज़ 35’ साठी पहिला रेडिएटर बसवला, जो आजही इंजिनचा अविभाज्य भाग आहे.

——–एकादी फालतु वाटणारी गोष्टसुद्धा जगाला किती पुढे घेऊन जाते हेच यातून सिद्ध होते.

म्हणून—दृष्टिकोन बदला….. परिस्थिती बदलेल…… ! ??

 

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तुरटी जवळ ठेवा !! ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

?इंद्रधनुष्य? 

☆ तुरटी जवळ ठेवा !!  ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला.

ती सांगत होती,

“आत्ताच तासभर योगासनं करून आले आणि तुला फोन केला.”

फोनवर ती बरेच काही बोलत होती. बोलता बोलता ती म्हणाली,

“पंधरा- वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण मला वाकडं बोलली ते अजून मनातून जात नाही.”

मला हसूच आलं.

आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा- वीस वर्षांची जळमटे मनात शाबूत ठेवतो. हा गलथानपणा बरेचजण वेळोवेळी करत असतात.

खरंतर आपल्या लक्षात ठेवण्यासारख्या कितीतरी गोष्टी असतात , पण आपण आपल्या मेंदूत वाईट गोष्टींचा भरणा भरपूर करत असतो.

कधी कधी माणसं मनात नसतानाही सहज काही बोलून जातात.  आपल्या मनाला ते लागतं.  आपण वेळीच ते झटकून टाकत नाही. अंगावर झुरळ आलं, की आपण ते लगेच झटकून टाकतो.  आपल्याला झुरळाची किळस वाटते.

तसंच, आपल्याबाबत कुणी किळस वाटणारे शब्द वापरले, तर तेही झुरळासारखे झटकून टाकता आले पाहिजेत.  आपला मेंदू म्हणजे काही गोडाऊन नाही की, वाटेल त्या गोष्टी आपण साठवून ठेवाव्यात…

जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आपला मेंदू आहे. आपलं लहानपण, आपलं तरुणपण, त्यात घडलेल्या चांगल्या गोष्टी मेंदू जपतो. वेळोवेळी आपल्याला तो स्मरण करून देतो. आपण त्या स्मरणरंजनात रमून जातो. कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं तर कधी ओठांवर हसू.

जगताना आपल्याला एवढा चांगला आधार देणारा मेंदू आपण नको त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतो.

आपण आपल्या मेंदूवर सतत अन्याय करतो.

मेंदूला वाचा नसते.  तो मुका असतो. त्याला काही कळत नाही. पण हृदयाला मन असते.  त्याला तरी ते कळले पाहिजे.

काही माणसं स्पर्धेसाठी आपल्याशी शत्रुत्व घेतात ती गोष्ट वेगळी. अशावेळी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लढले पाहिजे.

पण ९०-९५ टक्के गोष्टी अशा असतात, की त्या आपल्या आयुष्यात फारशा गंभीर नसतात. त्या वेळीच सोडता आल्या पाहिजेत.

मेंदू सृजनशील आहे, त्यातच त्याला गुंतवून ठेवले पाहिजे.

ज्या गोष्टी सृजनशील गोष्टींशी निगडीत नाहीत, त्यांना वर्तुळाबाहेर ठेवले पाहिजे.

आपलं मन आनंदी असणं, आपलं घर, आपले कुटुंबीय, आपले जवळचे मित्र आनंदी असणं, हेच तर आयुष्य आहे.

या पलीकडे काय असू शकते?

लहानपणी माझी आई सांगायची, पाणी गढूळ झाले, की त्यात तुरटी फिरवावी. गाळ खाली बसतो. स्वच्छ पाणी मिळते——

———–मन गढूळ करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. अशावेळी त्या मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवता आली पाहिजे..

 

संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जाने कहा गये वो दिन.. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ जाने कहा गये वो दिन.. ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

वेळ रात्री नऊ साडेनऊची. घराघरांमधल्या हॉलमधे टिव्ही, मालिकांचे घाणे टाकत असतो. बथ्थड डोक्याच्या मठ्ठ मराठी मालिका.. कपिल शर्माचा कॉमेडी शो, हवा येऊ द्या.. असं काही तरी चाललेलं असतं. माणसं बायकांचं, बायका माणसांचं सोंग घेऊन प्रेक्षकांचं मन रमवण्याचा प्रयत्न करत असतात. ढॅण– ढॅण  करत जाहिराती अंगावर येऊन कोसळत असतात. त्या सगळ्या गचक्यात जेवणं उरकणं चालू असतं. कोणी एकीकडे मोबाईलमधे डोकं खूपसून दूर कोणाशी तरी चॅट करत असतं. त्या नादात ताटात काय चाटतोय त्याचं भान नसतं. हे झालं आताच्या काळातलं चित्र.

 —— साधारण पन्नासएक वर्षांपूर्वी मध्यमवर्गीय घरांमधे रात्रीचं चित्र कसं असायचं बरं?

 ——-सुट्टीत, उन्हाळ्यात किंवा असंच कोणी टूम काढली की तिन्हीसांजेला मुलांची अंगत पंगत व्हायची. आपापल्या घरून ताटं घेऊन मुलं कोणाच्या तरी अंगणात किंवा गच्चीत जमायची. हसत खेळत पाखरांची पंगत उठायची. कधी जेवणानंतर लगेच मामाचं पत्र सुरू व्हायचं. नदी की पहाड… डबा ऐसपैस.. अरिंग मिरिंग लोंगा तिरिंग…गाई गोपी उतरला राजा… भोज्जा…

नऊ साडेनऊ म्हणजे तर झोपायची वेळ असायची.. आठ साडेआठलाच अंथरूणं टाकणे नावाचा कार्यक्रम सुरू व्हायचा. गाद्या घालून झाल्या की मच्छरदाण्या लावणे. पण त्या आधी मुलांच्या कोलांटउड्या व्हायच्या. हा कार्यक्रम साधारणपणे कोणी मोठ्या माणसाने डरकाळी वजा इशारा देईपर्यंत चाले. मग मच्छरदाणी प्रकरण सुरू होई.  मच्छरदाण्यांची ठराविक दोरी ठराविक खिळ्यांनाच बांधावी लागायची. त्यामुळे ज्याचं काम त्यालाच करावं लागायचं. असं कोणीही आलं आणि मच्छरदाणी बांधली असा मामला नसायचा. मच्छरदाणी बांधली की आपलं सगळं सामानसुमान घेऊन मच्छरदाणीत शिरावं लागायचं. मग सारखं आत बाहेर करता यायचं नाही. कारण मग डास आत घुसायचे. तरी झोपण्यापूर्वी एखादा डास शिरलेलाच असायचा. मग प्रत्येक जण आपापल्या मच्छरदाणीत रांगत टाळ्या पिटतोय असं दृष्य दिसायचं. 

पण रात्रीची खरी मजा तर उन्हाळ्यात असायची.. गच्चीवर झोपण्याची. रोडच्या कडेला असलेल्या ओट्यावर पण बिनधास्तपणे झोपायचे लोक. अंगणातही झोपायचे. पण गच्चीवरचा मामला काही औरच. ब-याचदा माळवदाची घरे असत. जिना वगैरे असेलच असंही नसायचं. एखादी मोडकीशी शिडी असायची. मोठाली पोरं अंथरूणं वर न्यायची. बारकाली पोरं त्यांना मदत करायची. मोठी माणसं–महिला वर्ग खालचं कडीकुलपं बघून शेवटाला येत. तोपर्यंत वर अंथरूणं पडलेली असत. कधी पोरं संध्याकाळीच अंथरूणं घालून ठेवत. रात्रीपर्यंत ती गार पडलेली असत. ट्रांझिस्टर्स तेव्हा नवीनच आलेले होते. मग ठराविक स्टेशनं लावली जात. विविध भारतीवर, सिलोनवर जुन्या गाण्यांचा कार्यक्रम,भुले बिसरे गीत, बेलाके फूल वगैरेअसायचे.. रफीचा मधाळ आवाज, ‘खोया खोया चांद’ म्हणत आकाशातल्या चांदला थबकायला भाग पाडायचा. किशोर… सुधा मल्होत्रा, ‘कश्तीका खामोश सफर’ घडवायचे. त्या काळच्या निवेदकांच्या आवाजातही वेगळाच खानदानी ठहराव असायचा..शब्दांची लडिवाळ नाजूक बोटं जणू  झोपेची जादू करताहेत असे त्यांचे निवेदन असायचे.  वातावरणातल्या शांततेचा लहेजा सांभाळून त्यांचं ऩिवेदन चालायचं.. गाणी ऐकता ऐकता कधी निद्रादेवी कवळायची कळायचं पण नाही.

आता रफी, रेडीओ, खोया खोया चांद.. कश्तीका खामोश सफर.. सगळंच खामोशीच्या पडद्याआड गेलं. गच्चीवर झोपणं. अंथरूणं घालणं. तांब्या भांडं, ओडोमॉस घेऊन…  ट्रांझिस्टर घेऊन वर जाणं. आकाशाकडे बघत पूरवैया अनूभवत  रेडिओ ऐकणं, व्याधाचं नक्षत्र शोधणं.. चंद्राच्या डागांमधे ससा-हरीण शोधणं… सगळं वेडगळपणाचं वाटावं इतकं विज्ञानाने लोकांना शहाणं करून सोडलं. 

नवनवीन शोधांनी माणसाची आयुष्याची लांबी वाढली पण त्यातली खोली हरवली.  लोकसंख्या भरभर वाढली.अंगण तेवढंच राहिले आणि त्याचे हकदार वाढले. 

ऐंशीच्या दशकात आधी टिव्ही ने माणसं गिळली. नंतर मोबाईलने.  दोघांनी मिळून मुलांचं तर बालपणच खाऊन टाकलं. सुरुवातीला टिव्हीचा एकच चॅनल होता– तोही संध्याकाळी पाचला सुरू व्हायचा.  पण आख्खा वाडा, बिल्डींग त्याच्यासमोर एकवटायची. तल्लीन व्हायची. आता शेकडो चॅनल्स आले, तरीही मन रमत नाही. रिमोट घेऊन, ‘घे पुढं.. घे मागं’..असं तासभर करावं तरी दर्जेदार म्हणावं असं काही सापडत नाही. सज्जन लोकांऐवजी दुर्जन पात्रांची चलती आली. परोपकारी लोकांना कोणी विचारेनासं झालं आणि ज्याच्या अंगी जास्त उपद्रव- मूल्य त्याला दहशतीपोटी का होईना.. जास्त मान, अशी वेळ आली…सगळ्यांमधे एकप्रकारचं चिंबावलेपण आलं. जुन्या शांत जगरहाटीचा ठहराव सगळा वाहून गेला. 

चटणी भाकरी जाऊन पिझ्झा पास्ता आला. घरी आयाबायांनी निगुतीनं केलेल्या शेवया गेल्या आणि ‘टू मिनिट नुडल्स’ आल्या. दिवाळी दस-याला घर माणसांनी भरायचं. आता प्रत्येकाला नियतीने वेगवेगळ्या खुंटीवर टांगून टाकलं.  पैसा खूप आला, पण सुख समाधान मात्र हरवलं. जाहिरातींनी माणसं हावरट बनवली. शोभेच्या वस्तू… सामानाने घरं भरली..पण कोठीची खोली रिकामी झाली. स्पर्धा, अहंकार ह्यांनी माणुसकी.. जगण्यातला आनंद हिरावून घेतला. चंद्राला भाऊ मानणा-या बायका आणि चंद्राला मामा म्हणणारी पोरं हळू हळू नामशेष झाली. त्याच चंद्रावर आता प्लॉट्सची विक्रीपण सुरू झाली. काळाने सगळ्यांमधली हळवी नाती पुसून टाकली. आणि निव्वळ चौकस चिकित्सक पिढी जन्माला आली. मार्कांच्या शर्यतीत माहितीचा पूर आला.. ज्ञान मात्र कुठे तरी तोंड लपवून बसलं. पैसे कमवायला शिकवणारे कारखाने उभे राहिले,  पण जगणं शिकवणारं कोणी राहिलं नाही..  

यंत्रयुगाने माणसाचा वेळ वाचेल अशी यंत्रे तर दिली,  पण जगण्यातली फुरसतच हरवून गेली——

——–अशा वेळी आपसूकच मनात येतं—- “ दिल ढुंढता.. है.. फिर वही… फुरसतके रातदिन…”

—–ज्या कुणी लिहिलंय –फार सुंदर व वास्तव आहे 

 

संग्राहक – श्री सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

Please share your Post !

Shares
image_print