मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमूल डेअरी, न्यूझीलंड आणि – I too had a dream… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ अमूल डेअरी, न्यूझीलंड आणि – I too had a dream… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

“मॅडम, थोडं स्पष्ट बोलतो, राग मानू नका. पण सगळे हिंदुस्तानी एकाच वेळी जर हिंद महासागरात नुसते थुंकले जरी ना, तरी तुमचं अख्खं न्यूझीलंड पाण्यात बुडून जाईल. हे ध्यानात ठेवा आणि आम्ही काय करायचं आणि काय नाही, हा शहाणपणा आम्हाला शिकवू नका.” 

न्यूझीलंडच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याला, बहुधा प्रत्यक्ष राजदूताला हे परखड बोल सुनावले होते अमूलचे तत्कालीन सर्वेसर्वा डॉ. व्हर्गीस कुरियन यांनी… 

प्रसंग होता दिल्लीतील एका कार्यक्रमातील… 

कुरियन यांनी तेव्हा नुकतीच अमूलची सूत्रे हाती घेतली होती, आणि जास्तीत जास्त दुधावर प्रक्रिया (milk processing) करण्यासाठी ते धडाक्यात कामाला लागले होते. स्वाभाविकच, भारत आणि भारतीय ज्यांच्या उत्पादनांची मोठी बाजारपेठ होती, अशा बड्या देशांच्या पोटात दुखू लागलं होतं. 

त्या संदर्भातच, कोणी न विचारताच, न्यूझीलंडच्या एका अधिकारी महिलेने, कुरियन यांना अनाहुत सल्ला दिला होता – ” भारतासारख्या देशाने दुग्ध प्रक्रियेसारख्या तांत्रिक आणि किचकट क्षेत्रात शिरण्याचे दु:साहस करू नये. स्वित्झर्लंड, न्यूझीलंडसारख्या तज्ञ मंडळींकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि ती निभावण्यास तेच समर्थ आहेत.”

कुरियन यांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी त्या महिलेला तडकाफडकी सुनावले. 

हे असं सुनावणं ही सोपी गोष्ट नव्हती.

न्यूझीलंड त्याकाळी दुग्ध  उत्पादन व दुग्ध प्रक्रिया क्षेत्रात अव्वल होता. त्यांचे तंत्रज्ञान अद्ययावत होते. उत्पादन, प्रक्रिया आणि तंत्रज्ञान या सगळ्याच क्षेत्रांत भारताचे स्थान कुठेच नव्हते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला दुधाची भुकटी (milk powder) पुरवणाऱ्या देशात न्यूझीलंड अग्रेसर होता. 

उन्हाळ्यात, जेव्हा दुधाचे उत्पादन कमी झालेले असते, तेव्हा दुधाची कमतरता भासू नये म्हणून, भारतातील अनेक राज्यांत दुधापासून मिठाई बनवण्याला कायद्याने मनाई होती, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात दूध पाठवण्यास मनाई होती. 

न्यूझीलंडची तांत्रिक श्रेष्ठता वादातीत होती. स्वतः कुरियन कॉमनवेल्थ देशांतील कोलंबो प्लॅन शिष्यवृत्ती अंतर्गत न्यूझीलंड येथील मॅस्सी विद्यापीठात  Plant Design and Dairy Engineering  शिकले होते.

या पार्श्वभूमीवर अशा दादा देशाला ललकारणं हा कदाचित निव्वळ वेडेपणाच होता. 

पण कुरियन यांनी हे आव्हान स्वीकारले. ” एक दिवस असा येईल की भारत न्यूझीलंडला दुग्धजन्य पदार्थ निर्यात करेल,” आपल्या ” I, too, had a dream ” असे या आत्मचरित्रात ते लिहून ठेवतात.

कुरियन निव्वळ दिवास्वप्नं पाहणारे नव्हते. बोलून मग – “अरे बापरे, हे मी काय बोलून बसलो ?” – असा विचार करणारे नव्हते, विचार करून बोलणारे होते. ते कामाला लागले.

१९७० साली भारतात ‘Operation Flood – white revolution ‘ – दुग्धक्रांती – सुरू झालं. भारतातील दूध आणि प्रक्रिया केलेले दुधाचे पदार्थ यांचे उत्पादन लक्षणीयरीत्या वाढू लागलं. 

दुधासाठी आयातीवर अवलंबून असलेला भारत, आता नुसता स्वयंपूर्ण झाला नव्हता, तर जगात सर्वात जास्त दूध निर्माण करणारा देश झाला होता, दूध उत्पादने निर्यात करणारा देश झाला होता.

— आणि २००९ साली, भारताने न्यूझीलंडला दुग्धजन्य पदार्थ निर्यात करायला सुरुवात केली. 

दुग्ध प्रक्रिया ही आता न्यूझीलंडची मक्तेदारी राहिली नव्हती. 

कुरियन यांनी पाहिलेले हे स्वप्न, त्यांच्या हयातीतच, पूर्ण झाले होते.

ता. क.:  २०१७ साली, आपले “अमूल” न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाचे प्रमुख पुरस्कर्ते (sponsorer) झाले. “Third world country आहात, दुग्ध प्रक्रियेच्या नादी लागू नका” असं ज्या न्यूझीलंडने भारताला सांगितलं, त्याच भारताच्या “अमूल” चा लोगो न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या T Shirt वर अभिमानाने झळकू लागला. अमूलच्या श्रेष्ठतेवर शिक्कामोर्तब झालं.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ८८५ वर्षे जतन  केलेले पार्थिव : श्री मिलिंद  चिंचोळकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ८८५ वर्षे जतन  केलेले पार्थिव : श्री मिलिंद  चिंचोळकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆

नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी रामानुजाचार्य यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले.  पण फारच थोड्या व्यक्तींना माहीत असेल की रामानुजाचार्य यांचे पार्थिव गेले ८८५ वर्षे जतन करून ठेवलेले आहे. 

जगभरातील सर्वांनाच इजिप्तच्या राजांचे मृतदेह (ममी) आणि भारतातील गोव्यातील सेंट झेवियरचे संरक्षित मृतदेह पाहून आश्चर्य वाटते…. परंतु फारच कमी लोकांना हे माहित असेल की इजिप्तच्या राजांचे मृतदेह गुंडाळण्यासाठी ज्या विशिष्ट कापडाचा वापर केला जात असे त्या कापडाला हल्ली मसलीन म्हणून ओळखलं जातं ते कापड मसली(मच्छली पट्टणम) श्रीरंग पट्टणम म्हणजेआपल्या भारतातूनच आयात केले गेले होते.  

श्रीरंगम (जिल्हा: तिरुचिरापल्ली, तामिळनाडू) येथील “श्रीरंगनाथस्वामी मंदिर”, ज्यात भारतातील सर्वात मोठे मंदिर प्रासाद असल्याची मान्यता आहे, येथे स्वामी रामानुजाचार्य (१०१७ – ११३७) यांचे पद्मासन घातलेल्या अवस्थेतील भौतिक शरीर आहे, जे “विशिष्ठाद्वैत” तत्त्वज्ञानाचे महान आचार्य आणि श्रीवैष्णव परंपरेचे प्रणेते होते. त्यांचे ८८५ वर्षे जतन केलेले भौतिक शरीर या ठिकाणी बघायला मिळू शकते. हे भौतिक शरीर श्रीरंगनाथस्वामी मंदिराच्या पाचव्या परिक्रमा-मार्गावर असलेल्या “श्री रामानुज मंदिराच्या” दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात संरक्षित आहे. स्वामी रामानुजाचार्य १२० वर्षे आयुष्य जगले… सन ११३७ साली त्यांनी पद्मासन अवस्थेत समाधी घेतली होती. स्वतः श्रीरंगनाथस्वामींच्या आदेशानुसार, रामानुजाचार्यांच्या शिष्यांनी त्या अवस्थेत त्यांचे भौतिक शरीर जतन केले. या संरक्षित शरीरात डोळे, नखे वगैरे स्पष्ट दिसतात.  या शरीरावर कुजण्यापासून संरक्षण करण्यासाठी दररोज कोणताही अभिषेक केला जात नाही.  वर्षातून दोनदा हे शरीर औषधी वनस्पतींनी स्वच्छ केले जाते आणि त्या वेळी शारीरिक शरीरावर चंदन आणि केशर लावले जाते. हे उल्लेखनीय आहे की या पवित्र स्थानाचा प्रचार गोवा किंवा इजिप्तसारखा केला जात नाही. रामानुजाचार्यांनी वापरलेले एक भांडे आपण अजूनही आत बघू शकता.

संदर्भ :  मिलिंद चिंचोळकर यांचा चेपू भिंतीवरील लेख. 

प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका वादळाशी झुंज… शब्दांकन : श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ एका वादळाशी झुंज… शब्दांकन : श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

निसर्गाच्या रौद्र रुपापुढे मानव नेहमीच खुजा ठरत आलेला आहे. आपलं विज्ञान किंवा आपला अभ्यास कितीही प्रगत झाला तरी निसर्गात घडणाऱ्या अनेक विध्वंसक गोष्टींची भविष्यवाणी अजूनही आपल्याला योग्य रीतीने करता येत नाही. त्यामुळेच अश्या नैसर्गिक आपत्तीमधे सगळ्यात महत्वाचे ठरते ते आपत्ती व्यवस्थापन आणि त्या आपत्तीचा मागोवा घेणं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगातील वातावरणात प्रचंड बदल गेल्या काही वर्षात झाले आहेत. तपमानात होणारे उतार-चढाव अधिक तीव्र झाले आहेत. त्यामुळेच वारे, पाऊस आणि एकूणच त्यांची निर्मिती यांच्या चक्रावर याचा खूप मोठा परीणाम होतो आहे. या सर्व बदलांचा परिणाम म्हणजे चक्रीवादळ.

भारताला ७५१६ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर तर एका टोकाला हिंद महासागर अश्या तिन्ही बाजूने भारत पाण्याने वेढलेला आहे. साहजिक वातावरणातील बदलांचा प्रभाव हा भारतावर पडणार हे उघड आहे. चक्रीवादळांच्या निर्मितीत अनेक गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्यातील सगळ्यात महत्वाचं असते ते समुद्राच्या पाण्याचे तापमान. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील पाण्याचं तपमान हे पश्चिम किनारपट्टीपेक्षा जवळपास २ ते ३ डिग्री सेल्सिअस ने जास्ती असते. त्यामुळेच आजवर प्रत्येक वर्षी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांची निर्मिती होत होती. पण गेल्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंगने अरबी समुद्राचं तपमान हे वाढत चाललं आहे. त्यामुळेच क्वचित येणाऱ्या चक्रीवादळांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांचा अभ्यास असं दर्शवतो की अरबी समुद्रावरील वादळांच्या संख्येत ५२% टक्के, तर चक्रीवादळांच्या निर्मितीत तब्बल १५०% टक्यांची वाढ दिसून आली आहे.

एखादं चक्रीवादळ निर्माण झालं तर ते किती संहारक असेल? त्याचा रस्ता कसा असेल? किंवा त्याने किती नुकसान होईल? याचा निश्चित अंदाज आजही बांधता येत नाही. कारण चक्रीवादळ मजबूत किंवा कमकुवत होण्यास मदत करणार्‍या विशिष्ट चढउतारांमुळे त्याचे मॉडेल्स त्याच्या तीव्रतेचा फारसा आधीच अंदाज लावू शकत नाहीत. जिकडे त्याची निर्मिती होते तिथली अप्पर एअर डायव्हर्जन्स, विंड शीअर आणि कोरडी हवा यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. चक्रीवादळ निर्माण झाल्यावर त्याला रोखता येणं अशक्य आहे. ते आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व गोष्टींची विलेव्हाट लावल्याशिवाय उसंत घेत नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळेच जेव्हा अशी चक्रीवादळं नागरी वस्तीच्या दिशेने येणार असतील तर त्याचा अंदाज जर आपल्याला आधी बांधता आला तर खूप मोठी मनुष्य आणि वित्त हानी टाळता येऊ शकते.

गेल्या काही दशकात याच कारणांसाठी भारताने अनेक उपग्रह अवकाशात वातावरणाच्या या बदलांचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले आहेत. भारताच्या आजूबाजूच्या प्रदेशात वातावरणात होणाऱ्या अनेक बदलांचा वेध घेऊन हे उपग्रह सतत याची माहिती भारतात प्रसारित करत असतात. याच माहितीच्या आधारे चक्रीवादळांची निर्मिती आणि त्यांची दिशा तसेच त्यांच्या शक्तीचा अंदाज लावला जातो. 

भारताच्या याच तांत्रिक प्रगतीमुळे ११ जून २०२३ ला भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) ने अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याची चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचं स्पष्ट केलं. १२ जून २०२३ उजाडत नाही तोच भारताच्या उपग्रहांच्या मिळालेल्या माहितीतून या चक्रीवादळाचं रूपांतर (Extremely severe cyclone) अत्यंत तीव्र चक्रीवादळात झाल्याचं स्पष्ट केलं. या तीव्र चक्रीवादळाचं नामकरण ‘चक्रीवादळ बिपरजॉय’ असं करण्यात आलं. बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिलेलं होतं. याचा बांगला भाषेत अर्थ होतो ‘आपत्ती’ (disaster). अत्यंत तीव्र चक्रीवादळात एखाद्या वादळाचा तेव्हाच समावेश होतो जेव्हा त्यातील वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी १६८ ते २२१ किलोमीटर / तास इतका प्रचंड वाढलेला असतो.

चक्रीवादळ बिपरजॉय भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडक देणार हे लक्षात आल्यावर तातडीने या वादळाच्या ताकदीचा अंदाज केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात आला. महाराष्ट्र किंवा गुजरात या राज्यांना सगळ्यात जास्त धोका असल्याचं स्पष्ट झालेलं होतं. पण नक्की कुठे ते धडक देणार याबद्दल अंदाज बांधता येणं कठीण होतं. १३ जून आणि १४ जूनला त्याने घेतलेल्या वळणामुळे हे वादळ गुजरात मधील कच्छ, सौराष्ट्र भागात धडक देणार हे स्पष्ट झालं. त्यानंतर वेगाने सर्वच पातळीवर सरकारी आणि प्रायव्हेट यंत्रणांना सावध केलं गेलं. या चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता यात प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्त हानी होण्याची  शक्यता होती. पण केंद्र सरकार ज्यात पंतप्रधानांपासून, रक्षा मंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान कार्यालय आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांनी राज्य सरकारच्या सहकार्याने वेळीच नागरिकांना सतर्क केलंच, पण त्यापलीकडे एका मोठ्या बचाव मोहिमेला सुरवात केली.

ज्या भागात चक्रीवादळ बिपरजॉय धडकणार होतं तो भाग इंडस्ट्रिअल हब होता. जामनगर मधे जगातील सगळ्यात मोठी रिफायनरी कार्यरत आहे, तर इतर अनेक इंडस्ट्रिअल कंपन्या आणि तेल, वायू क्षेत्रातील ऑइल रीग्स इकडे कार्यरत होत्या. त्या सर्वांना वेळीच सावध करून त्या सर्वांचं काम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. चक्रीवादळ बिपरजॉय साधारण १५ जून २०२३ च्या संध्याकाळी त्या भागात आदळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याच्या दोन दिवस आधीच या सर्व कामांना बंद करण्यात आलं. ज्यातून होणारं नुकसान हे तब्बल ५०० कोटी प्रत्येक दिवसाला इतकं जास्त होतं. या शिवाय एकही मनुष्य हानी न होऊ देण्याचं लक्ष्य सर्व सरकारी यंत्रणांना देण्यात आलं होतं. भारतीय सेना, वायूदल, नौदल, तटरक्षक दल यांच्या सह एन.डी.आर. एफ. आणि एस. डी. आर. एफ. च्या सर्व टीम ना सज्ज राहण्याचे आदेश दिले गेले होते. अवघ्या २ दिवसात सुमारे १ लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.

चक्रीवादळ बिपर जॉयच्या येण्याने कोणत्याही नैसर्गिक स्थितीला सामोरं जाण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व स्तरावर कार्यान्वित करण्यात आली. मग तो धुवाधार पाऊस असो वा वारा, पूर असो वा भूस्खलन. ६३१ मेडिकल टीम्स, ३०० पेक्षा अजस्ती ऍम्ब्युलन्स, ३८५० हॉस्पिटल बेड्स कोणत्याही जखमी व्यक्तींना उपचारांसाठी तयार ठेवण्यात आले. तब्बल ११४८ गरोदर महिलांना हॉस्पिटलमधे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दाखल करण्यात आलं. त्यातील ६८० जणींची प्रसूती झाली. याशिवाय सर्व स्तरावर अभूतपूर्व अशी उपाय योजना केली गेली. त्यामुळे अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय ने गुजरातच्या किनारपट्टीला काल रात्री अंदाज लावल्याप्रमाणे धडक दिल्यावर सुद्धा आज हा लेख लिहिला जाईपर्यंत कोणतीही मनुष्य हानी झाल्याचं वृत्त नव्हतं. ( दोन जणांना आपल्या गुरांना वाचवताना मृत्यूला सामोरं झाल्याची घटना घडलेली आहे. पण त्याचा संदर्भ चक्रीवादळाशी आहे का हे स्पष्ट झालेलं नाही.)

भारत इसरो आणि इतर अवकाशीय यंत्रणांवर कोट्यवधी रुपये का खर्च करतो याचं उत्तर द्यायला काल दिलेली वादळाशी झुंज पुरेशी आहे. इसरोच्या आधुनिक उपग्रहांमुळे वातावरणात घडणाऱ्या अश्या घटनांचा योग्य वेळी अंदाज आल्यामुळे योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अचूक अंदाज, केंद्र सरकार आणि राज्य सरकराची योग्य वेळेत टाकली गेलेली पावलं, अतिशय सुयोग्य नियोजन, भारताच्या तिन्ही दलांसोबत एन.डी.आर. एफ. आणि एस. डी. आर. एफ. आणि तटरक्षक दलाच्या लोकांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याची जबाबदारी, यामुळे भारताने अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपर जॉय ला मात दिली आहे. या वादळाशी एकदिलाने भारतीय होऊन झुंज देणाऱ्या त्या अनामिक लोकांना माझा कडक सॅल्यूट.

जय हिंद!!!

शब्दांकन : श्री विनीत वर्तक

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्त्री वैज्ञानिक- डॉक्टर कमलाबाई सोहोनी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ स्त्री वैज्ञानिक- डॉक्टर कमलाबाई सोहोनी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी 

इसवी सन १९३३. बंगलुरू (बंगलोर ) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही शास्त्रीय संशोधनाला वाहून घेतलेली नावाजलेली संस्था. द्रष्टे उद्योगपती श्री यश यांनी १९११ साली स्थापन केलेल्या या संस्थेमध्ये फक्त निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असे.

इन्स्टिट्यूटच्या खूप मोठ्या आवारामध्ये घनदाट झाडीने वेढलेली दगडी इमारत शोभून दिसत होती. तिथल्या प्रशस्त ऑफिसमध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी व्ही रामन हे  संस्थेचे डायरेक्टर राखाडी रंगाचा सूट टाय आणि डोक्याला फेटा बांधून रुबाबदारपणे बसले होते. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज झळकत होते. नारायणराव भागवत  आपली लेक कमला हिला घेऊन सर रामन यांना भेटायला आले होते.  स्वतः नारायणराव व त्यांचे बंधू माधवराव हे दोघेही इथेच संशोधन करून एम. एससी झाले होते. संस्थेच्या स्थापनेपासून त्या दिवसापर्यंत एकही विद्यार्थ्यांनी तिथे आली नव्हती.

सर सी. व्ही. रामन यांनी स्पष्टपणे त्या दोघांना सांगितले की, ‘शास्त्रीय संशोधन हे स्त्रियांचे क्षेत्र नाही. म्हणून कमलाला प्रवेश नाकारण्यात आला आहे.’

लहानसर चणीची, नाजूक, गोरी, व्यवस्थित नऊवारी साडी  नेसलेली, केसांची घट्ट वेणी घातलेली कमला धीटपणे ,शांत पण ठाम  स्वरात म्हणाली,

‘सर, मी बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये बी. एससी फर्स्ट क्लास फर्स्ट आले आहे. इथल्या प्रवेशाचा निकष पूर्ण केला आहे. मला पुढील शिक्षणाची संधी नाकारून तुम्ही माझ्यावर आणि माझ्यानंतर इथे शिकू इच्छिणाऱ्या इतर मुलींवर अन्याय करीत आहात. मी मुंबईला परत जाणार नाही. इथेच राहणार. तुमच्या दारापुढे सत्याग्रह करीन.’

सर रामन यांनी या मुलीतले वेगळेपण ओळखले. कमलाला इन्स्टिट्यूटमध्ये एक वर्षासाठी प्रोबेशनरी स्टुडन्ट म्हणून प्रवेश मिळाला. साधीसुधी दिसणारी ही मराठी मुलगी, श्रीनिवासय्या या तिच्या गुरूंनी घेतलेल्या अनेक कठोर परीक्षांमध्ये  उत्तम पद्धतीने उत्तीर्ण झाली. दिवसाकाठी १८ तास बौद्धिक व शारीरिक काम त्यांना करावे लागे. संध्याकाळचे दोन तास  कमलाबाईंना त्यांचे आवडते टेनिस खेळण्यासाठी मिळत.  पार्टनर म्हणून  त्या तिथल्या मदतनीसाबरोबरच खेळत असत .

नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांचे प्रबंध वाचून त्या टिपणे काढीत.  शंका निरसनासाठी त्या परदेशी  शास्त्रज्ञांना पत्र लिहून प्रश्न विचारत. एखाद्या मित्राला समजवावे अशा पद्धतीने या शास्त्रज्ञांनी त्यांचे शंकानिरसन केले.  कमलाच्या अभ्यासातली तळमळ त्यांना जाणवली होती. शंभराहून अधिक सायन्स रिसर्च पेपर्स कमलाबाई यांच्या नावावर आहेत.

कमलाबाईंचे कर्तृत्व पाहून सर रामन यांनी कमलाबाईंजवळ मोकळेपणाने कबूल केले की,’आता मी माझी चूक सुधारणार आहे. यापुढे इन्स्टिट्यूटचे दरवाजे लायक विद्यार्थीनींसाठी नेहमी खुले राहतील.’ शिवाय ते स्वतः कमलाबाईंबरोबर टेनिसचे दोन- चार सेट्स खेळू लागले.

पुढे केंब्रिजमध्ये अध्ययन करून कमलाबाईंनी पीएच. डी मिळविली. तिथेच राहून काम करण्याची संधी  नाकारून त्या भारतात परतल्या.

बंगलोरला असताना त्यांनी, ज्या बालकांना मातेचे स्तन्य मिळत नाही त्यांच्यासाठी गाढवीणीच्या दुधाचा विशिष्ट घटक विशिष्ट प्रमाणात मिळवून पोषणमूल्य असलेल्या  दुधाचा शोध लावला . कडधान्य व त्यातील प्रथिने यावर संशोधन केले. कुन्नूर येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन’ मध्ये त्यांनी ब समूहातील जीवनसत्वावर काम केले. नीरा या नैसर्गिक रुचकर पेयातील तसेच ताडगूळातील पोषक घटक शोधला. १९६७ मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट संशोधनाचे राष्ट्रपती पदक मिळाले .महाराष्ट्र सरकारच्या आरे मिल्क डेअरी प्रकल्पासाठी त्यांनी एकही पैसा मानधन न घेता संपूर्ण मार्गदर्शन केले. दुधाची प्रत व गुरांचे आरोग्य सांभाळण्याचे मार्गदर्शन केले.

कमलाबाईंनी मुंबईला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये जीव रसायनशास्त्र विभाग नव्याने उघडला तिथे १९४९ ते १९६९ अशी वीस वर्षे संशोधन व अध्यापन केले. एमएससी पीएच.डीच्या अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कमलाबाई व दुर्गाबाई या सख्या बहिणी. लहानपणीच मातृसुखाला पारख्या झालेल्या दोघींच्यातला जिव्हाळा मैत्रिणीसारखा होता. आणि बुद्धी तेजस्वी होती.

दिल्ली येथील ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या सुवर्ण महोत्सवात त्यांचा सत्कार करून  मानपत्र व पारितोषिक देण्यात आले. सत्काराला उत्तर देताना,  ‘शास्त्रीय संशोधनाचा देशासाठी पूर्ण उपयोग करा. ते लोकांच्या व्यवहारात आणा’ असे त्यांनी तळमळीने सांगितले. नंतर तिथल्या चहापानापूर्वीच कमलाबाई अकस्मात कोसळल्या आणि तिथेच वयाच्या ८६ व्या वर्षी मृत्यू पावल्या . कमला नावाच्या ज्ञानदेवीला सरस्वतीच्या दरबारात भाग्याचे मरण आले.

भारतात कमलाबाईंमुळे शास्त्रीय संशोधन क्षेत्राचे दरवाजे स्त्रियांसाठी उघडले गेले. जगभर अनेक  स्त्रिया शास्त्रीय संशोधन क्षेत्रात महत्त्वाचे काम  करीत आहेत. परंतु या क्षेत्रात महिलांना कमी महत्त्व मिळते. त्यांनी सिद्ध केलेले स्थानसुद्धा त्यांना नाकारले जाते ही वस्तुस्थिती आहे.

१९३३ साली आपल्या बुद्धिमान लेकीच्या, शास्त्रीय संशोधन करण्याच्या इच्छाशक्तीला सक्रिय पाठिंबा देणारे, विश्वासाने तिला एकटीला  इन्स्टिट्यूटच्या पुरुषप्रधान संस्कृतीच्या हवाली करून रातोरात मुंबईला परतणारे नारायणराव भागवत, पिता म्हणून नक्कीच आदरास पात्र आहेत.

चित्र साभार विकिपीडिया 

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बाग – श्री समर्थ  रामदास ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆ बाग – श्री समर्थ  रामदास ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

श्री समर्थ रामदास स्वामी लिखित ‘बाग’ प्रकरण अवश्य वाचावे या प्रकरणात समर्थांनी तब्बल २९५ झाडांची नावे सांगितली आहेत.  एका संताचा वनस्पती शास्त्राचा अभ्यास आज आपल्याला थक्क करून सोडणारा आहे.  

 

प्रसंग निघाला स्वभावें । 

बागेमध्ये काय लावावे ।

म्हणूनि घेतली नावे । 

काही एक ॥

 

कांटी रामकांटी फुलेकांटी । 

नेपती सहमुळी कारमाटी ।

सावी चीलारी सागरगोटी । 

हिंवर खैर खरमाटी ॥

 

पांढरफळी करवंदी तरटी ।

आळवी तोरणी चिंचोरटी ।

सिकेकाई वाकेरी घोंटी । 

करंज विळस समुद्रशोक ॥

 

अव्हाटी बोराटी हिंगणबेटी ।

विकळी टांकळी वाघांटी ।

शेर निवडुंग कारवेटी । 

कांटेशेवरी पांगेरे ॥

 

निरगुडी येरंड शेवरी । 

कासवेद कासळी पेरारी ।

तरवड उन्हाळ्या कुसरी । 

शिबी तिव्हा अंबोटी ॥

 

कांतुती काचकुहिरी सराटी ।

उतरणी गुळवेल चित्रकुटी ।

कडोची काटली गोमाटी । 

घोळ घुगरी विरभोटी ॥

 

भोंस बरु वाळा मोळा । 

ऊंस कास देवनळा ।

लव्हे पानि पारोस पिंपळा । 

गुंज कोळसरे देवपाळा ॥

 

वेत कळकी चिवारी । 

ताड माड पायरी पिंपरी ।

उंबरी अंबरी गंभिरी । 

अडुळसा मोही भोपळी ॥

 

साव सिसवे सिरस कुड । 

कोळ कुंभा धावडा मोड ।

काळकुडा भुता बोकडा । 

कुरंडी हिरंडी लोखंडी ॥

 

विहाळ गिळी टेंभुरणी । 

अवीट एणके सोरकिन्ही ।

घोळी दालचिनी । 

कबाबचीनी जे ॥

 

निंबारे गोडे निंब । 

नाना महावृक्ष तळंब ।

गोरक्षचिंच लातंब । 

परोपरीची ॥

 

गोधनी शेलवंटी भोंकरी । 

मोहो बिब्बा रायबोरी ।

बेल फणस जांब भरी । 

चिंच अंबसोल अंबाडे ॥

 

चांफे चंदन रातांजन । 

पतंग मैलागर कांचन ।

पोपये खलेले खपान । 

वट पिंपळ उंबर ॥

 

आंबे निंबे साखरनिंबे । 

रेकण्या खरजूरी तूंते दाळिंबे ।

तुरडे विडे नारिंगे । 

शेवे कविट अंजीर सीताफळे ॥

 

जांब अननस देवदार । 

सुरमे खासे मंदार ।

पांढरे जंगली लाल ।

पुरे उद्वे चित्रकी ॥

 

केळी नारळी पोफळी । 

आवळी रायआवळी जांभळी ।

कुणकी गुगुळी सालफळी ।

वेलफळी माहाळुंगी ॥

 

भुईचांफे नागचांफे मोगरे ।

पारिजातक बटमोगरे ।

शंखासुर काळे मोगरे ।

सोनतरवड सोनफुले ॥

 

जाई सखजाई पीतजाई । 

त्रिविध शेवंती मालती जुई ।

पाडळी बकुळी अबई । 

नेवाळी केतकी चमेली ॥

 

सुर्यकमळिणी चंद्रकमळिणी ।

जास्वनी हनुमंतजास्वनी ।

केशर कुसुंबी कमळिणी । 

बहुरंग निळायाति ॥

 

तुळसी काळी त्रिसेंदरी । 

त्रिसिंगी रायचचु रायपेटारी ।

गुलखत निगुलचिन कनेरी ।

नानाविध मखमाली ॥

 

काळा वाळा मरुवा नाना । 

कचोरे गवले दवणा ।

पाच राजगिरे नाना । 

हळदी करडी गुलटोप ॥

 

वांगी चाकवत मेथी पोकळा ।

माठ शेपु खोळ बसळा ।

चवळी चुका वेल सबळा ।

अंबुजिरे मोहरी ॥

 

कांदे मोळकांदे माईणमुळे ।

लसूण आलें रताळें ।

कांचन कारिजे माठमुळे । 

सुरण गाजरें ॥

 

भोंपळे नाना प्रकारचे । 

लहानथोर पत्रवेलीचे ।

गळ्याचे पेढ्या सांगडीचे । 

वक्र वर्तुळ लंबायमान ॥

 

गंगाफळ काशीफळे क्षीरसागर ।

सुगरवे सिंगाडे देवडांगर ।

दुधे गंगारूढे प्रकार । 

किनऱ्या रुद्रविण्याचे ॥

 

वाळक्या कांकड्या चिवड्या ।

कोहाळे सेंदण्या सेंदाड्या ।

खरबूजा तरबुजा कलंगड्या ।

द्राक्षी मिरवेली पानवेली ॥

 

दोडक्या पारोशा पडवळ्या ।

चवळ्या कारल्या तोंडल्या ।

घेवड्या कुही-या खरमुळ्या ।

वेली अळूचमकोरे ॥

 

अठराभार वनस्पती । 

नामे सांगावी किती ।

अल्प बोलिलो श्रोतीं । 

क्षमा केली पाहिजे ॥

 

– श्री समर्थ रामदास स्वामी

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “यमक…” ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ “यमक…” ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

ज्योतिताईंनी एकदा विचारलं, “एका ओळीने शेवट झाला की पुढच्या कडव्याची सुरुवात त्याच ओळीनं होते, या काव्यप्रकाराला काय म्हणतात?”  माझा हक्काचा स्रोत  म्हणजे आई-दादा!

दादांचा फोन बंद होता आठ दिवसांपासून! जाम बेचैन झाले. म्हणून आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट करून ठेवलं. पाचव्या मिनिटाला दादांचा फोन! 

“अगं, आत्ताच फोन सुरू झाला आणि तुझा मेसेज वाचला. ऐक, यमकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तू म्हणतेस ते दाम-यमकाच्या जवळपास जाणारं यमक असेल, असं आई म्हणत्ये.”

मागून मला आईच्या नाजूक गुणगुणण्याचा आवाज आला. आईची स्मरणशक्ती अफाट! कोणतीही कविता पाठ असते. 

‘श्रीपति झाला दशरथ-सुत राम दशाननासि माराया|

मा राया जनकाची होय सुता त्रिजगदाधि साराया|

सारा या प्रभुची हे 

लीला गाती सदैवही सुकवी|

सुकवी भवजलिं निधितें निरुपमसुख रसिक जन मनीं पिकवी|’ 

(पहिल्या ओळीचा शेवट ती पुढच्या ओळीची सुरुवात. पण अर्थ वेगळा.) 

दादा म्हणाले, “हे बघ ऐक!” त्यांनी तोवर, ते आठवीत असतानाचं (आईला ८४ वर्षे पूर्ण होतील आता. दादा ८६ वर्षांचे!) मराठीचं पुस्तक आणलं होतं.  पाय प्रचंड दुखतात त्यांचे! पण ब्रिज आणि भाषा हे विषय आले की, त्यांना पंख लाभतात! 

तर कुमार भा. वि. जोशी, इयत्ता आठवी, असं लिहिलेलं पुस्तक हातात घेऊन त्यांनी मला यमकाचे प्रकार सांगितले. ते थोडक्यात इथे मांडत आहे. 

१) एकाक्षरी यमक:  

एक्या पदे भूमि भरोनि थोडी

दुजा पदे अंडकटाह फोडी

(डी ला डी हे एकाक्षरी यमक) 

२) द्व्यक्षरी

 दे तीसरा पाद म्हणे बळीला

म्हणोनी पाशी दृढ आकळीला

(ळीला हे द्व्यक्षरी) 

३)चतुराक्षरी

बाई म्यां उगवताच रवीला

दाट घालुनि दही चरवीला

त्यात गे फिरवितांच रवीला

सार काढुन हरी चरवीला

(काय अफाट आहे ना हे!  प्रत्येक ‘चरवीला’ वेगळा आशय मांडतो.) 

४) मग एकाचा अन्त्य आणि दुसऱ्याचा आदि चरण सारखा. 

सेवुनि संतत पाला, संत तपाला यदर्थ करतात

तो प्रिय या स्तवना की, यास्तव नाकीहि तेंचि वरितात

५) दामयमकाचं उदाहरण वर दिलंच आहे. 

६) पुष्पयमक: प्रत्येक चरणात यतीच्या ठिकाणी येणारं यमक. 

सुसंगति सदा घडो… पडो.. झडो… नावडो

 ७) अश्वघाटी: घोड्यासारखी गती असलेलं यमक. 

वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो

(वाजत गाजत साजत आजत याजत, अशी गंमत आहे.) 

मज मागे मत्स्यांचा हा रिपु-शशि-राहु-बाहु राणा हो

८) युग्मक यमक हा भन्नाट प्रकार आहे. 

पायां नमी देइन वंश सारा

पा या न मी दे इनवंशसारा

(इन म्हणजे सूर्य, इनवंशसार म्हणजे सूर्यवंशात जन्मलेल्यांचं सार म्हणजे राम!)

९) समुद्रक यमक

हेही अफाट प्रकरण आहे. – 

अनलसमीहित साधी राया, वारा महीवरा कामा

अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा

(हे पृथ्वीपते धर्मा, वारा जसे अग्नीचे कार्य साधतो, तसे तुला  साह्य करण्यास मी सदैव तयार आहे. हे धीरा, बलरामही हवे तर येतील. मग वराका (बिचारी) मा (रुक्मिणी) तुझ्या साह्यास का येणार नाही?)

अशा यमकांत चमत्कृती असते. पण काव्याचा ओघ नसतो. हे काव्य कृत्रिम असलं, तरीही हे प्रतिभेचंच देणं, लेणं आहे हे निःसंशय!

मी हे सगळं प्रथमच वाचलं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित माहीत असेल. पण नसेल तर माहिती व्हावी म्हणून पाठवत आहे.  यमक याविषयी आणखी माहिती मिळाली तर जरूर शेअर करा.

संग्राहक : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त): ऋचा १ ते ४ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त): ऋचा १ ते ४ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २९ (इंद्रसूक्त) – ऋचा १ ते ४ 

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – इंद्र 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील एकोणतिसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी इंद्र देवतेला आवाहन केलेले  असल्याने हे इंद्रसूक्त म्हणून ज्ञात आहे.

आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या पहिल्या चार ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद ::

यच्चि॒द्धि स॑त्य सोमपा अनाश॒स्ता इ॑व॒ स्मसि॑ ।

आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ १ ॥

सत्यस्वरूपी उदार इंद्रा आम्हा नाही मान

धेनु नाही अश्वही नाही सवे नाही पशुधन 

यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी

जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||१||

शिप्रि॑न्वाजानां पते॒ शची॑व॒स्तव॑ दं॒सना॑ ।

आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ २ ॥

सामर्थ्याधिपति देवेंद्रा उदार प्रतापी देवा

तुझ्या कृपेचा अमुच्या वरती वर्षाव व्हावा 

यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी

जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||२||

नि ष्वा॑पया मिथू॒दृशा॑ स॒स्तामबु॑ध्यमाने ।

आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ ३ ॥

नजर फेकती एकसारखी परस्परांवरती

दोघींना त्या निद्रिस्त करी नको त्यांस जागृती

यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी

जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||३||

स॒सन्तु॒ त्या अरा॑तयो॒ बोध॑न्तु शूर रा॒तयः॑ ।

आ तू न॑ इंद्र शंसय॒ गोष्वश्वे॑षु शु॒भ्रिषु॑ स॒हस्रे॑षु तुवीमघ ॥ ४ ॥

सारे अमुचे शत्रू असू दे सदैव निद्रेत

अमुचे स्नेही अमुच्यासाठी राहो जागृत

यांच्या संगे असंख्य भोग्य साधने आम्हा द्यावी

जगतामध्ये ऐपत अमुची सर्वश्रेष्ठ व्हावी ||४||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/e-0yGCwDZeo

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1, Sukta 29, Rucha 1 – 4

Rugved Mandal 1, Sukta 29, Rucha 1 – 4

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अर्जेंटिनामधील हस्तिनापूर… – लेखक – श्री ल. ग. पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ अर्जेंटिनामधील हस्तिनापूर… – लेखक – श्री ल. ग. पटवर्धन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकेतील एक देश, असून “ब्युनोस आयर्स” हे त्याचे राजधानीचे शहर. त्यापासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर, रम्य वनराजीमध्ये हस्तिनापूर नावाचे अर्जेंटिअन नागरिकांनी वसवलेले स्थान आहे. त्याचे क्षेत्रफळ बारा एकरांचे असून तेथे बारा हिंदू देवतांची देवळे बांधलेली आहेत. तितके अर्जेंटिअन लोक तेथे वास्तव्यास असतात.

त्यांमध्ये श्री गणेश, श्री कृष्ण, सूर्यदेव, श्री नारायण आणि शिव यांची अस्सल हिंदू पद्धतीची बारा देवळे असून, हस्तिनापूर नावाला शोभेल असे पांडवांचेही एक देऊळ आहे. हस्तिनापूर हे अक्षरश: देवांच्या राहण्यासाठीच बांधलेले स्थान वाटते. सर्वत्र स्वच्छ व आल्हाददायक वातावरण, रोजवूडची हिरवीगार झाडे, निर्मळ व शांत वातावरण. आवाज हा फक्त झाडांवरील घरट्यांत राहणार्‍या पक्षांच्या कूजनाचा ! भक्तगणांत मृदू व तालबद्ध भजनांचा आवाजही नियमित वेळी उमटत असतो. बगीच्यातील पांढर्‍या दगडांतील उभी गणेशाची मूर्ती, आपले चित्त आकृष्ट करून घेते.

देवळे अर्जेंटिअन लोकांनीच 1981चे सुमारास बांधली. ती हुबेहूब हिंदू देवळांप्रमाणे आहेत. तेथील हिंदू संप्रदायाची स्थापना ‘अल्डा अलब्रेच्ट’ (ALDA ALBRECHT) या साध्वीने केली. तिने हिंदू तत्त्वज्ञानाचा प्रसार अर्जेंटिअन लोकांमधे केला व ती त्यांची ‘गुरू’ झाली. तिने पुष्कळ लिखाण केले असून वानगीदाखल ‘हिंदू संत आणि त्यांची शिकवण’ (The Saints and Teachings of India’), ‘हिमालयातील योग्यांची शिकवण’ ही त्‍यांची पुस्‍तके होत.

‘गुस्टाव कॅनझोब्रेट’ (Gustavo Conzober) हा तिचाच शिष्य होय. सांप्रत तो हस्तिनापूर कॉलेजचा डायरेक्टर आहे. त्याला वयाच्या सतराव्या वर्षांपासून हिंदू तत्त्वज्ञानाची गोडी लागली.  ब्युनोसआयर्स येथील भारतीय वकिलातीने नोव्हेंबर 2010 मध्ये फेस्टिवल ऑफ इंडिया’चे आयोजन केले होते, त्यावेळी ‘दक्षिण भारतातील देवळांचे शिल्पशास्त्र’ या विषयावर त्याचे भाषण झाले. तो स्थानिक कंपनीचा मॅनेजर असून (चरितार्थ चालण्यापुरता) बाकी सर्व वेळ तो हस्तिनापूर संस्थेच्या कार्यास देतो. त्याला हिंदू वेद-उपनिषदे यांचे चौफेर ज्ञान असून तो ऑगस्ट 2011 मध्ये भारत भेटीवर आला होता. ती त्याची दुसरी भारतभेट होती.

देवळांची निगा राखणार्‍या आणि करणार्‍या बारा अर्जेंटिअन पुजार्‍यांव्यतिरिक्त दर आठवड्याच्या शेवटी जवजवळ शंभर तरी अर्जेंटिअन लोक निव्वळ ज्ञानप्राप्तीसाठी येतात. म्हणूनच हस्तिनापूरला ‘आध्यात्मिक ज्ञानकेंद्रा’चे स्थान प्राप्त झाले आहे. लोक तेथे तत्त्वज्ञान शिकतात, ग्रंथालयात बसून विविध पुस्तकांचे वाचन करतात. ‘योगा’चे धडे देतात, ध्यानाचे धडे गिरवतात आणि भजने म्हणतात.

देवळांच्या आवारापलीकडे गायी चरत असतात. त्या अर्जेंटिनामध्ये असूनही निर्भय वाटतात; येवढेच नव्हे तर त्या मधून मधून देवळांकडे न्याहाळून पाहत आहेत असेही भासते ! त्यांचे चित्त शांत, स्थिर व भीतीमुक्त वाटते, कारण त्यांना आपणास कोणी धरून नेऊन आपण कापले जाऊ व लोकांचे भक्ष होऊ अशी भीती नसते. हस्तिनापूरमध्ये फक्त ‘शाकाहारा’चे पालन केले जाते. तेथे कोणी ‘स्वामी’, ‘गुरू’ नसून संस्थेत ज्ञान, शांतता आणि ब्रह्मज्ञान यांचा सतत अभ्यास सुरू असतो. प्रसिद्धी पराड.गमुख असे हे लोक आहेत ! वास्तविक त्यांच्यामध्ये इंजिनीयर्स, प्रोफेसर्स आहेत, पण ते फावल्या वेळात संस्थेत येऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतात.

तेथे गौतम बुद्धाचे, कुमारी मेरीचे, डिमेटर (Demeter ) या ग्रीक देवाचे, आणि एक देऊळ ‘सर्व पंथांचे’ आहे. तेथे कोणत्याही विवक्षित धर्माचा प्रसार करण्यात येत नाही. येणार्‍या ‘भक्तांना स्वत:चा मार्ग’ निवडण्याची मुभा आहे. तेथे विविध कार्यशाळांचे, सेमिनार्सचे आयोजन करून एकांतवासाचे महत्त्व समजावले जाते. ‘गणेशचतुर्थी’ व ‘वैशाखी’ हे उत्सव साजरे केले जातात. रेडिओद्वारे येथील कार्यक्रमांचा प्रसार करण्याची योजना आहे.

हस्तिनापुरातील देवळात पुजारी (बडवे), दानाची पेटी इत्यादी गोष्टी नाहीत ! भक्त लोक येतात, मंत्रपठण करतात, भक्तिगीते गातात, ध्यान करतात. मेडिटेशन हॉल आहे. योगविद्येसाठी तीन वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असून, दर आठवड्यातून एकदाच शिकवले जाते. तेथे अडीच हजार विद्यार्थ्यांची सोय असून, शंभर शिक्षक भारतीय तत्त्वज्ञान आणि एकशेवीस शिक्षक ‘योग’साधना शिकवतात.

‘हस्तिनापूर फाऊंडेशन’ तर्फे हिंदू तत्त्वज्ञानावर बरीच पुस्तके प्रकाशित करण्यात आली असून, भगवदगीता , योगसूत्रे , उपनिषदे, श्रीभागवत, भक्तिसूत्रे यांची भाषांतरे पण केली गेली आहेत.

अगदी अलिकडे ‘स्पॅनिश’ भाषेत ‘श्रीमहाभारता’ चे भाषांतर प्रसिद्ध झाले आहे. तीन भाग प्रसिद्ध झाले असून एकूण बारा भाग प्रसिद्ध करायचे ठरले आहे. प्रत्येक भाग अंदाजे पाचशे पृष्ठांचा असेल.

ब्युनोस आयर्स मध्ये ‘हस्तिनापूर फाऊंडेशन’ची सोळा केंद्रे असून तीन इतरत्र आहेत. खेरीज उरुग्वे, बोलिव्हिया आणि कोलंबिया येथेही केंद्रे स्थापन केली गेली आहेत. (http://en.hastinapura.org.ar ) या वेबसाईटवर आधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल.

लेखक : ल. ग. पटवर्धन

पुणे 

दूरभाष – (020) 25384859,  इमेल : – [email protected]

माहिती संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-२ ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-२ ☆ श्री राजीव गजानन पुजारी

७. आदित्य एल-१ वरील वैज्ञानिक अभिभार

सूर्याचा सांगोपांग अभ्यास करण्यासाठी या मोहिमेत सात अभिभारांच्या संचाचा समावेश करण्यात आला आहे.

अ )दृश्यमान उत्सर्जन रेषा किरिटालेख (Visible Emission Line Coronagraph- VELC) हा अभिभार प्रभामंडल आणि प्रभामंडलामधील वस्तूमान उत्सर्जनाच्या (Coronal Mass Ejection- CME) गतीशीलतेचा अभ्यास करणार आहे.

ब ) सौर अतिनील प्रतिमाग्राहक दुर्बीण ( Solar Ultra-violet Imaging Telescope – SUIT)

हा अभिभार निकट अतिनील (near infra-red) वर्णपटात सूर्याच्या दीप्तीमंडल (photosphere) व वर्णमंडल (chromosphere) यांच्या प्रतिमा घेईल व निकट अतिनील वर्णपटातच सौर विकिरणाच्या  (solar irradiance)  फेरबदलांची मोजणी करेल.

क,ड ) आदित्य सौरवारे कण प्रयोग (Aditya Solar-wind Particle Experiment- ASPEX) आणि आदित्यसाठीचा प्लाविका विश्लेषक संच (Plasma Analyser Packge for Aditya- PAPA)

हे अभिभार सौर वारे व ऊर्जावान आयन्स (energetic ions) व त्यांचे वितरण (distribution) यांचा अभ्यास करतील.

इ, फ ) सौर निम्न ऊर्जा क्ष किरण वर्णपटमापक (Solar Low Energy X-ray Spectrometer – SoLEXS) आणि उच्च ऊर्जा एल-१ परिभ्रमणीय क्ष-किरण वर्णपटमापक (High Energy L1 Orbiting X-ray Spectroscope अर्थात HEL1OS)

हे अभिभार सूर्यापासून निघणाऱ्या क्ष किरणांच्या उद्रेकांचा विस्तृत क्ष-किरण ऊर्जा श्रेणीत अभ्यास करतील.

ग ) चुंबकीयक्षेत्रमापक (Magnetometer)

 हा अभिभार L-१ बिंदूच्या ठिकाणी अंतर्ग्रहीय चुंबकीय क्षेत्र मोजेल.

आदित्य एल – १ वरील सर्व अभिभार संपूर्णपणे स्वदेशी असून ते देशभरातील विविध प्रयोगशाळांद्वारा विकसित केले गेले आहेत. बेंगलोर स्थित भारतीय खगोल भौतिकी संस्थेने VELC उपकरण विकसित केले आहे. पुणे स्थित आंतर विद्यापीठ खागोलशास्त्र व खगोल भौतिकी केंद्राने SUIT हे उपकरण विकसित केले आहे. अहमदाबाद स्थित भौतिक संशोधन प्रयोगशाळेने ASPEX हे उपकरण विकसित केले आहे. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र, तिरुअनंतपुरमच्या अंतराळ भौतिकी प्रयोगशाळेने PAPA हा अभिभार विकसित केला आहे. बेंगलोर स्थित यू. आर. राव उपग्रह केंद्राने SoLEXS व HEL1OS हे अभिभार विकसित केले आहेत. तर बेंगलोर स्थित इलेक्ट्रो ऑप्टिक्स प्रणाली प्रयोगशाळेने Magnetometer हा अभिभार विकसित केला आहे. हे सर्व अभिभार इस्रोच्या विविध केंद्राच्या निकट सहकार्याने विकसित करण्यात आले आहेत.

लॅगरेंज बिंदू – 

दोन पिंडांच्या गुरुत्वाकर्षणीय प्रणालीसाठी लॅगरेंजबिंदू असे बिंदू आहेत जेथे एखादी लहान वस्तू ठेवल्यास ती तेथे स्थिर राहते. दोन पिंडांच्या प्रणालीसाठी, जसे की सूर्य व पृथ्वी, अंतराळातील हे बिंदू अंतराळयानाद्वारा कमीत कमी इंधन वापरून ते स्थिर ठेवण्यासाठी वापरले जाऊ शकतात. तांत्रिकदृष्ट्या लॅगरेंज बिंदूला दोन मोठ्या वस्तूंमधील गुरुत्वाकर्षणीय बल हे लहान वस्तूला त्यांच्याबरोबर जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अपकेंद्रीय बलाशी तुल्यबळ असते. द्विपिंड गुरुत्वाकर्षणीय प्रणालीसाठी एकंदर पाच लॅगरेंज बिंदू असतात व ते एल १, एल २,एल ३, एल ४, एल ५ असे ओळखले जातात. एल १ हा लॅगरेंज बिंदू सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये, त्यांना जोडणाऱ्या रेषेवर असतो व त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सूर्य व पृथ्वी यांच्यामधील अंतराच्या एक टक्का एवढे असते. 

९.आदित्य एल-१ चे प्रक्षेपण व त्याचे एल-१ पर्यंतचे मार्गक्रमण :

इस्त्रोद्वारा आदित्य एल -१ मोहिमेचे प्रक्षेपण पीएसएलव्ही प्रक्षेपका द्वारा सतीश धवन अंतरिक्ष केंद्र -शार (SDSC-SHAR) श्रीहरीकोटा येथून ऑगस्ट २०२३ मध्ये केले जाईल. सुरुवातीला अंतराळयान पृथ्वी समीप कक्षेमध्ये (Low Earth Orbit-LEO) स्थित केले जाईल. नंतर कक्षा जास्त लंबवर्तुळाकार (elliptical) केली जाईल. त्यानंतर यानावर असणाऱ्या प्रणोदन प्रणालीचा (propulsion system) उपयोग करून त्याला एल-१ कडे प्रक्षेपत केले जाईल. जसजसे यान एल -१ कडे जात जाईल तसतसे ते पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्राच्या प्रभावातून (Gravitational Sphere Of Influence) बाहेर पडेल. गुरुत्वीय क्षेत्राच्या प्रभावा बाहेर पडल्यावर पर्यटन टप्पा (cruse stage) सुरू होईल व सरते शेवटी यान एल-१ भोवतालच्या मोठ्या आभासी कक्षेत अंत:क्षेपित केले जाईल प्रक्षेपणापासून ते एल-१ मध्ये अंत:क्षेपित केला जाण्याचा काळ हा चार महिन्यांचा असेल.

१०)अंतराळातून सूर्याचा अभ्यास का करायचा? 

सूर्य विविध तरंग लहरींमध्ये प्रकाश उत्सर्जित करीत असतो. त्याबरोबरच तो अनेक ऊर्जा भरीत कण व चुंबकीय क्षेत्र यांचेही उत्सर्जन करीत असतो. पृथ्वी भोवतालचे वातावरण त्याचप्रमाणे तिचे चुंबकीय क्षेत्र सूर्यापासून उत्सर्जित झालेल्या हानिकारक लांबींच्या तरंग लहरी, सौरकण व सौरचुंबकीय क्षेत्र यांसाठी ढाल म्हणून काम करतात. सूर्यापासून निघणारी प्रारणे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नसल्यामुळे पृथ्वीवरील उपकरणांद्वारे त्या प्रारणांचा शोध घेता येणार नाही आणि या प्रारणांच्या मदतीने केला जाणारा सूर्याचा अभ्यास करता येणार नाही. परंतु पृथ्वीपासून दूर म्हणजे अंतराळातून निरीक्षण करून या प्रारणांच्या मदतीने सूर्याचा अभ्यास करता येतो. त्याचप्रमाणे सौरवाऱ्याचे कण आणि सूर्यापासून प्रसारित होणारे चुंबकीय क्षेत्र आंतर्ग्रहीय अवकाशातून प्रसारित होताना त्याचे मोजमाप करण्यासाठी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा परिणाम होणार नाही अशा जागेची आवश्यकता भासते. यासाठी सूर्याचा अभ्यास अंतराळातून करणे श्रेयस्कर असते.

११)आदित्य एल-१ मोहीम सूर्याचा अभ्यास करण्यासाठीची परिपूर्ण मोहीम आहे का?

या प्रश्नाचे स्वाभाविक उत्तर ‘नाही’ असेच आहे. हे उत्तर फक्त आदित्य एल-१ साठीच खरे नाही तर इतर कोणत्याही अंतराळ मोहिमेसाठी ते तितकेच खरे आहे. याचे कारण अवकाशात वैज्ञानिक अभिभार वाहून नेणाऱ्या यानाला वस्तुमान, ऊर्जा व आकारमान यांच्या मर्यादा असतात. त्यामुळे यानावर मर्यादित क्षमतेच्या मर्यादित उपकरणांचा संच पाठवता येतो. आदित्य एल-१ च्या बाबतीत सर्व निरीक्षणे लॅगरेंज बिंदू एल-१ या ठिकाणाहूनच केली जाणार आहेत. उदाहरणार्थ सूर्यापासून निघणारी प्रारणे, चुंबकीय क्षेत्र, सौरवारे आदि गोष्टी बहुदैशीक असतात.  त्यामुळे यांपासून सर्व बाजूंनी वितरित होणाऱ्या ऊर्जेचे मोजमाप आदित्य एल-१ द्वारा करता येणार नाही.  आणखी एक लॅगरेंज बिंदू जो एल-५ म्हणून ओळखला जातो तो पृथ्वीकडे येणाऱ्या  प्रभामंडलीय वस्तुमान उत्सर्जन आणि अंतरिक्ष वातावरणाच्या अभ्यासासाठी सुयोग्य बिंदू आहे. तसेच सूर्याच्या ध्रुवबिंदूंचा अभ्यास आपल्या तंत्रज्ञानातील मर्यादांमुळे म्हणावा तेवढा झालेला नाही. सूर्याच्या ध्रुव प्रदेशातील गतिशीलता व चुंबकीय क्षेत्र हे सौरघटनाचक्रे निर्माण होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात असे मानले जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्याच्या अंतरंगात व त्याच्याभोवती घडणाऱ्या विविध घटनांचा अभ्यास करण्यासाठी विविध तरंगलांबींमध्ये बाहेर पडणाऱ्या सौर प्रारणांच्या ध्रुवीकरणांची निरीक्षणे करणे आवश्यक आहे, जे आदित्य एल-१ करू शकणार नाही.

– समाप्त – 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ इस्रोची “आदित्य एल -१” मोहीम – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी

 १. सूर्य 

सूर्य हा आपल्या सर्वात जवळचा तारा आणि सौरमंडलातील सर्वात मोठा गोलक आहे. त्याच्या अनेक नावांपैकी आदित्य हे एक नांव आहे. सूर्याचे वय ४.५ अब्ज वर्षे आहे. हा हायड्रोजन व हेलियम वायूंचा अति उष्ण व तेजस्वी अंतरिक्ष गोलक आहे. तो पृथ्वीपासून १५० दशलक्ष किलोमीटर अंतरावर असून तो आपल्या सौरमंडळाचा ऊर्जा स्त्रोत आहे. आपणास माहीतच आहे की सौरशक्ती शिवाय पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व शक्य नाही. सूर्याचे गुरुत्वाकर्षण सूर्यमालेतील सर्व वस्तूंना एकत्र ठेवते. सूर्याच्या मध्यवर्ती भागाला गाभा (core) म्हणतात. तेथील तापमान अगदी १५ दशलक्ष अंश सेंटीग्रेड पर्यंत पोहोचू शकते. या तापमानाला तेथे अण्विक संमिलन (nuclear fusion) नावाची प्रक्रिया घडते. या प्रक्रियेमुळे सूर्याला अव्याहत ऊर्जा मिळत असते. आपणास दिसणाऱ्या सूर्याच्या पृष्ठभागाला दीप्तीमंडल (photosphere) म्हणतात हा सापेक्षरित्या ‘थंड’ असतो. येथील तापमान ५५०० अंश सेंटीग्रेड एवढे असते.

.सूर्याचा अभ्यास कशासाठी?

सूर्य हा आपला सर्वात जवळचा तारा आहे. त्यामुळे इतर ताऱ्यांच्या तुलनेत त्याचा अभ्यास आपणास सांगोपांगपणे करता येतो. सूर्याच्या अभ्यासामुळे आपल्याला आपल्या आकाशगंगेतील इतर ताऱ्यांविषयी तसेच इतर विविध दीर्घिकांमधील  ताऱ्यांविषयी खूप अधिक माहिती मिळू शकते. सूर्य हा खूप चैतन्यशील तारा आहे. आपण पाहतो त्यापेक्षा त्याचा विस्तार खूप मोठा आहे. त्याच्यावर सतत उद्रेक होत असतात, तसेच तो सौरमंडळात अमाप ऊर्जा उत्सर्जित करीत असतो. जर असे उद्रेक पृथ्वीच्या दिशेने घडत असतील तर त्यामुळे आपल्या भूमंडळावर (पृथ्वी जवळचे अंतरिक्ष) दुष्परिणाम होतात. अंतराळयाने आणि दूरसंवाद प्रणालींवर त्यांचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे अशा उद्रेकांविषयी आगाऊ सूचना मिळणे श्रेयसस्कर असते. याशिवाय एखादा अंतराळवीर जर थेटपणे या उद्रेकात सापडला तर त्याच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. सूर्यावर घडणाऱ्या औष्णिक व चुंबकीय घटना अगदी टोकाच्या असतात. त्यामुळे ज्या गोष्टी आपण प्रयोगशाळेत शिकू शकत नाही त्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी सूर्य ही एक नैसर्गिक प्रयोगशाळा आहे.

.अंतरिक्ष वातावरण

आपल्या पृथ्वीवर सूर्य उत्सर्जन, उष्णता, सौरकण आणि चुंबकीय क्षेत्र यांद्वारे सतत परिणाम करत असतो. सूर्याकडून सातत्याने येणाऱ्या सौरकणांना सौर वारे म्हणतात व ते प्रामुख्याने उच्च उर्जायुक्त प्रकाशकणांनी (photons) बनलेले असतात. आपल्या संपूर्ण सौरमंडळावर सौर वाऱ्यांचा परिणाम होतो. सौरवाऱ्यांबरोबरच सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा पण पूर्ण सौरमंडळावर परिणाम होतो. सौरवाऱ्यांसोबतच सूर्यावर होणाऱ्या उद्रेकांचाही सूर्याभोवतालच्या अंतराळावर परिणाम होतो. अशा घटनांच्या वेळी ग्रहांजवळील चुंबकीय क्षेत्र व भारीतकण यांच्या वातावरणात बदल घडतो. पृथ्वीचा विचार केला तर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र व अशा उद्रेकांनी वाहून आणलेले चुंबकीय क्षेत्र यांच्यातील अन्योन्यक्रियेमुळे पृथ्वीजवळ चुंबकीय अस्वस्थता (magnetic disturbance) निर्माण होते, त्यामुळे अंतरिक्ष मालमत्तांच्या (space assets) कामात विघ्न येऊ शकते.

पृथ्वी व इतर ग्रह यांच्या भोवतालच्या अंतरिक्षतील पर्यावरणाच्या स्थितीमधील सतत होणारे बदल म्हणजे अंतरिक्ष वातावरण होय. अंतरिक्ष वातावरण जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण अंतराळात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत. पृथ्वीनजीकच्या अंतरिक्ष वातावरणाच्या अभ्यासामुळे आपणास इतर ग्रहांनाजीकच्या अंतरिक्ष वातावरणाच्या वर्तनाचा अंदाज येईल. 

.आदित्य एल-१ संबंधी माहिती

आदित्य एल-१ ही सूर्याचा अभ्यास करण्यासाठी योजलेली अंतराळस्थित वेधशाळा वर्गाची पहिली भारतीय मोहीम आहे. हे अंतराळयान सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या  लँग्रेजीयन बिंदू १ (एल-१) च्या आभासी कक्षेत (halo orbit) स्थित करण्यात येणार आहे.  हा बिंदू पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. एल-१ भोवतालच्या आभासी कक्षेत यान स्थिर केल्यामुळे ते कोणतेही पिधान (occultation)  किंवा ग्रहण (eclips) यांचा अडथळा न येता सतत सूर्याभिमुख राहून  सातत्याने सूर्यावरील घडामोडींवर लक्ष ठेवू शकेल. या यानावर सात अभिभार आहेत. हे अभिभार विद्युतचुंबकीय आणि कणशोधक (electromagnetic and particle detectors) वापरून सूर्याचे दीप्तीमंडल (photophere), वर्णमंडल (chromosphere) आणि प्रभामंडल किंवा किरीट (corona) यांचा अभ्यास करतील. एल -१ या सोयस्कर बिंदूचा फायदा घेऊन चार अभिभार थेट सूर्याचा वेध घेतील व उरलेले तीन अभिभार एल -१ या लँग्रेज बिंदू जवळील सौरकण आणि चुंबकीय क्षेत्र यांचा अभ्यास करतील. आदित्य एल-१ वरील अभिभारांमुळे आपणास सूर्याच्या वातावरणाच्या सर्वात बाहेरच्या थराचे म्हणजेच प्रभामंडल किंवा किरीट याचे (corona) अति तप्त होणे, प्रभामंडलामधील वस्तूमानाचे उत्सर्जन (Coronal Mass Ejection- CME), सौरज्वालांपूर्वीच्या व सौरज्वालांवेळच्या घडामोडी व त्यांची वैशिष्ट्ये , सूर्याभोवतालच्या वातावरणाची गतिशीलता (dynamics), सौर कणांचे व चुंबकीय क्षेत्रांचे ग्रहांदरम्यानच्या माध्यमातून प्रसारण (propagation)आदि गोष्टींची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळेल.

आदित्य एल-१ ची महत्वाची वैज्ञानिक उद्दिष्टे

अ ) सूर्याचा सर्वांत बाहेरचा थर (प्रभामंडल) अतीतप्त का होतो (coronal heating) याचा अभ्यास करणे.

ब ) सौर वाऱ्यांच्या (solar winds) प्रवेगाचा अभ्यास करणे.

क ) प्रभामंडलामधील वस्तुमानाचे उत्सर्जन (Coronal Mass Ejection-CME), सौर ज्वाला (solar flares) आणि पृथ्वीसमीप हवामानाचा (near earth space weather) अभ्यास करणे.

ड ) सौर वातावरणाची जोडणी (coupling) व गतीशीलता (dynamics) यांचा अभ्यास करणे.

इ ) सौर वाऱ्यांचे वितरण (distribution) आणि तापमानातील दिक् विषमता (anisotropy) यांचा अभ्यास करणे.

६. या मोहिमेची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये

अ ) यावेळी प्रथमच संपूर्ण सौर तबकडीचे अतिनील समीप (near ultra violate) वर्णपटात निरीक्षण.

ब ) सौर तबकडीच्या अगदी समीप जाऊन (साधारण १.०५ सौर त्रिज्या) प्रभामंडला मधील वस्तूमान उत्सर्जनाच्या (Coronal Mass Ejection-CME) गतीशीलतेचा अभ्यास करणे व त्यावरून CME च्या प्रवेगीय भागातील माहिती मिळविणे.

क ) यानावरील कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारा सूर्याचे इष्टतम (optimised) वेध घेऊन व इष्टतम विदासाठा (data volume) वापरून प्रभामंडलामधील वस्तूमान उत्सर्जन व सौरज्वाला यांचा शोध घेणे.

ड ) विविध दिशांना केलेल्या निरीक्षणांद्वारे सौर वाऱ्याच्या ऊर्जा दिक् -विषमतेचा अभ्यास करणे.

— क्रमशः भाग पहिला 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares