मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जयंत नारळीकर : गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही… भाग -१- लेखक : अज्ञात ☆ माहिती संग्राहक– श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ जयंत नारळीकर : गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही… भाग – १  – लेखक :  अज्ञात ☆ माहिती संग्राहक– श्री अमोल अनंत केळकर

विज्ञानकथा मराठी भाषेमध्ये आणून लोकप्रिय करणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली आहे, ही बाब विज्ञानाविषयी लिहिणाऱ्या सर्व लेखकांसाठी सन्मानजनक आहे. जयंत नारळीकर हे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ.. त्यांनी संशोधनासोबत साहित्याची देखील सेवा अतिशय जिव्हाळ्याने केली आहे. मराठी वाचकांत विज्ञानाची आवड रुजवण्यामध्ये नारळीकर यांच्या विज्ञानकथांचा खूप मोठा वाटा आहे. विज्ञानकथा लिहिणं हा खूपच अवघड विषय… कारण एकाच वेळेस तुम्हाला विज्ञान आणि कल्पनाशक्ती यांची सांगड घालावी लागते. आजच्या विज्ञानकथांमधून भविष्यातील विज्ञान जन्म घेत असते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. जयंत नारळीकर यांचे संमेलनाध्यक्षपद म्हणजे साहित्याचा हा विज्ञानाच्या दिशेने होणारा प्रवास खूप दिलासा देणारा…

विज्ञान समजून घ्यायला त्या व्यक्तीची मातृभाषाच सर्वात उत्तम पर्याय असतो. इंग्रजीत जेव्हा एखादी माहिती मिळते तेव्हा मेंदू प्रथम त्याचे रूपांतर मायबोलीमध्ये करतो आणि समजून घेतो. वेळ आणि परिश्रम दोन्हींचा अपव्यय.. सदर ज्ञान मातृभाषेत उपलब्ध असल्यास जास्त सहजगत्या आत्मसात होते असे नारळीकर म्हणायचे.. मराठी भाषा ही नारळीकर यांच्यासाठी पावित्र्याची नाही तर जिव्हाळ्याची बाब आहे. त्यामुळे त्यांच्या कथेत इंग्रजी शब्दाऐवजी अट्टाहासी मराठी शब्द वापरायचा द्राविडी प्राणायाम त्यांना करावा लागला नाही. भाषेच्या सहजतेमुळे त्यांचे लिखाण वाचले गेले आणि विज्ञानकथा हा साहित्य प्रकार मराठीत लोकप्रिय झाला. मराठी साहित्याचे विश्व खऱ्या अर्थाने विस्तारणारी व्यक्ती साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली आहे याचा अगदी “दिलसे” आनंद झाला आहे. ❤️

‘चार नगरांतील माझे विश्व’ या जयंत नारळीकर यांच्या आत्मवृत्ताला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकात त्यांची जडणघडण कशी झाली हे समजून घेता येते. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूरात झाला. विद्वत्ता ही जणु त्यांच्या घरामध्ये पाणी भरत होती. मोठा जयंत आणि छोटा अनंत असे आटोपशीर कुटुंब. आई सुमती संस्कृत भाषेमधील पंडिता. तसेच एसराज या वाद्यावर त्यांची हुकूमत. (एसराज म्हणजे काय पाहायचे असेल तर सत्येंद्रनाथ बोस यांची पोस्ट पहा. ) प्रसिद्ध सांख्यिकी विजय शंकर हुजुरबाजार हे जयंतरावांचे मामा.

जयंत आणि अनंत दोघे आईला ‘ताई’ म्हणायचे आणि वडिलांना ‘तात्या’. रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ. रँग्लर ही पदवी लय मोठी. केंब्रिज विद्यापीठामध्ये दरवर्षी गणित विषयात पहिल्या वर्गात पास होणारे रँग्लर म्हणवले जातात. जयंतराव आणि त्यांचे वडील हे दोघे पण रँग्लर. ❤️वि. वा. नारळीकर खूपच हुशार. वि. वा. यांचे आईन्स्टाईनने मांडलेल्या सापेक्षतावाद सिद्धांतावर प्रभुत्व होते. त्यांना १९२८ साली BSc मध्ये ९६% मार्क पडले होते. त्यांना केंब्रिजमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी जे. एन. टाटा स्कॉलरशिप मिळाली. त्यांची हुशारी पाहून कोल्हापूर संस्थानाने त्यांना इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी मदत केली, परत आल्यावर संस्थानात नोकरी करायची या अटीवर.

कोल्हापूरच्या जवळील “पाचगाव” हे नारळीकर यांचे मूळगाव. जयंतरावांचे आजोबा वासुदेवशास्त्री भिक्षुकी करून पोट भरत होते. मात्र वि. वा. यांनी घराण्याचे नाव रोशन केले. घराण्याच्या नावाची पण एक मजा आहे. त्यांच्या घरी असलेल्या आंब्याच्या झाडाला म्हणे नारळाएवढे आंबे लागत.. म्हणून यांचे नाव नारळीकर. अशी दंतकथा लहानपणापासून ऐकली असल्याचे जयंतराव सांगतात, मात्र त्यांनी कधी ते झाड पाहिलेले नाही. त्यांचा जन्म जरी कोल्हापूरच्या रांगड्या मातीत झाला असला, तरी त्यांचे कुटुंब वाराणसी येथे स्थलांतरित झाले होते. रँग्लर वि. वा. नारळीकर यांना बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभागप्रमुखपदी निमंत्रित करण्यात आले होते. कोल्हापूर संस्थानाने दिलेली रक्कम परत करून वि. वा. १९३२ मध्ये वाराणसी येथे स्थायिक झाले होते.

घरात मोठ्या माणसांचा राबता. विनोबा भावे ते गोळवलकर गुरुजी अशी दोन ध्रुवावरील माणसे त्यांच्या घरी यायची. (दाढी ही एकच सामाईक बाब असावी त्यांच्यात, जसे रविंद्रनाथ टागोर आणि आपल्या भाऊमध्ये आहे. भाऊचे नाव सांगायला नको ना) सी. डी. देशमुख यांच्यासारखा अर्थतज्ज्ञ असो, वा सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखा शिक्षणतज्ज्ञ.. दीनानाथ दलाल यांच्यासारख्या जगप्रसिद्ध चित्रकार असो वा पु. ल. देशपांडे यांच्यासारखा हरफनमौला… तुकडोजीमहाराज असो वा रँग्लर परांजपे (पहिले भारतीय रँग्लर) कोणतीही महत्त्वाची मराठी व्यक्ती वाराणसीमध्ये आली तर नारळीकर कुटुंबाकडे त्यांचे जेवण ठरलेले असे. रँग्लर परांजपे यांची मुलगी शकुंतला, नात सई परांजपे (होय त्याच.. सुप्रसिद्ध दिग्दर्शिका.. जयंतराव आणि त्या समवयस्क) यांचे देखील येणेजाणे होते. जयंत नारळीकर यांचा ८० वा वाढदिवस आयुकामध्ये साजरा झाला, तेव्हा सईने त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्याच एका विज्ञानकथेवर एक नाटक बसवून सादर केले होते.

लहानपणी आई जयंत, अनंत यांना गणिताची कोडी घालत असे.. त्यामुळे त्यांना गणित आवडायला लागले. आई दोघांना रोज झोपण्यापूर्वी इंग्रजी, मराठी मधील नामांकित लेखकांच्या गोष्टी क्रमशः भागात सांगत असे. मात्र उत्सुकता ताणली गेली की पोरं थोडीच २४ तास वाट पाहणार.. सकाळी उठल्यावर पुस्तक हाती घेणे आणि गोष्टीचा फडशा पाडणे. यातूनच जयंतरावांना वाचनाची आवड लागली. (पोरांना पुस्तक वाच म्हणले की वाचत नाहीत.. त्यापेक्षा ही आयडिया भारी आहे राव, ट्राय केली पाहिजे आपण पण.. ) सुमतीबाई यांचा भाऊ मोरेश्वर हुजुरबाजार हा एमएससी करण्यासाठी वाराणसी येथे नारळीकर कुटुंबात तीन वर्षं राहिला होता. तेव्हा घरातील फळ्यावर रोज मोरुमामा जयंतसाठी एक गणितीय कोडे लिहून ठेवायचा.. जोवर ते सुटत नाही, तोवर जयंतला चैन पडायची नाही. त्यामुळे शाळेतील गणिताचा अभ्यास आधीच झालेला असायचा. ❤️

जयंत आणि अनंतचे शिक्षण वाराणसी येथे हिंदी माध्यमात सुरू झाले. हिंदी ही रोजची व्यवहार भाषा.. घरात मराठी भाषा बोलली जायची, मराठी पाहुण्यांची वर्दळ, वर्षा दोनवर्षाने सुटीमध्ये महाराष्ट्र भेट व्हायची.. त्यामुळे मराठी एकदम पक्की. इंग्रजी पुस्तकातील गोष्टी वाचूनवाचून या भाषेची पण तयारी, तर सकाळ-संध्याकाळ संस्कृत श्लोकांचे पाठांतर.. जयंतराव लहानपणीच बहुभाषिक झाले. एका रात्री सर्वपल्ली राधाकृष्णन जेवायला आले असताना या दोघा भावांनी शंकराचार्यांचे दशश्लोकी स्तोत्र सादर करायचा प्रयोग केला. एका खोलीत बसून पेटीच्या साथीवर हे दोघे गात आहेत.. आणि बाहेर लॉनमध्ये बसलेली मंडळी गप्पा मारणे थांबवून हे ऐकत आहेत.. त्यांना वाटले की गाणे आकाशवाणीवर सुरू आहे. स्तोत्र संपल्यावर त्यांना समजले की, अरे ही तर या दोघा भावांनी केलेली गुगली आहे. दोघांचे गाण्याचे, पठणाचे आणि उच्चारांचे खूप कौतुक झाले. प्रयोग प्रचंड यशस्वी.

रस्त्यावर डोंबा-याचा पायाला काठी बांधून चालण्याचा खेळ पाहिला. घरी तसेच करायचा प्रयत्न आणि विशेष म्हणजे त्याला ताई तात्यांचे प्रोत्साहन आणि सहाय्य. दोन्ही पोरं पायांना काठी बांधून चालायला लवकरच शिकली देखील. अर्थात लहानपणी अनेक अयशस्वी प्रयोग देखील केले आहेत. गाद्यांवर उड्या मारताना एकदा अंदाज चुकला आणि उडी थेट पलीकडल्या काचेच्या कपाटावर.. तेव्हा घुसलेल्या काचेचा व्रण आजही जयंतरावांच्या पायावर आहे. त्यासोबत बालपणातील अजून एका घटनेची आठवण त्यांच्या हृदयावर कोरली आहे. नारायणराव व्यास हे नारळीकर कुटुंबाचे स्नेही. त्यांचे नेहमी येणेजाणे. दररोज लाड करणारे व्यासमामा एक दिवस वेगळ्या मूडमध्ये होते. जयंत आणि अनंत दोघांना बोलून सांगितले की तुम्ही दोघे खूप ऐदी आहात.. सगळे आयते पाहिजे तुम्हाला.. घरातले काहीच काम करत नाही. अभ्यास करताना देखील दिसत नाही.

कधीही बोलून न घेण्याची सवय असलेले जयंत, अनंत या गोष्टीने खूपच नाराज झाले. व्यासमामा तेवढ्याने थांबले नाहीत, तर त्यांनी वि. वा. आणि सुमतीबाई यांचीदेखील हजेरी घेतली. तुम्ही मुलांना धाक लावत नाही, अशी तक्रार केली. वि. वा. म्हणाले “हे दोघे शाळेमध्ये कायम वरचा नंबर काढतात. त्यामुळे कधी बोलायची गरज पडली नाही. ” व्यासमामा म्हणाले, “आता अभ्यास सोपा आहे म्हणून ठीक. पण कष्ट करायची सवय लागली पाहिजे. ” झाले… तात्यांचा खटका पडला आणि रोज पहाटे उठून चार तास अभ्यास करायचे फर्मान काढले गेले. दोघा भावांनी तेव्हा मामांचा किती उदोउदो केला असेल काय माहित.. पण हीच अभ्यासाची सवय जयंत, अनंत यांना जीवनात यशस्वी करून गेली. जयंतराव आज व्यासमामांबाबत कृतज्ञता व्यक्त करतात. ❤️

मॅट्रिक परीक्षेत घवघवीत यश मिळवून जयंतराव उत्तीर्ण झाले, मात्र त्यांच्यापुढे एक प्रश्न उभा राहिला. गणित, विज्ञानासोबत संस्कृतची आवड होती. सर्वच विषयात चांगले मार्क होते. पण मॅट्रिकच्या पुढे संस्कृत आणि विज्ञान हे दोन्ही विषय एकत्र घेता येत नाहीत. एकतर आर्ट्स घ्या किंवा सायन्स. (आपल्याकडे लयच बंधन.. बाहेर देशात तसे नाही. जेनिफर डॉडनाने बायोकेमिस्ट्री विषय घेऊन आर्टसची पदवी मिळवली होती) नारळीकर म्हणतात, “अशी विभागणी चुकीची आहे. आजच्या स्थितीत कलाशाखेचा विज्ञानशाखेशी संवादच उरत नाही, म्हणून उपविषय निवडणे ऐच्छिक असावे. ”

बनारसमध्येच महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले. घरात वडील वैज्ञानिक असल्याने कोणत्याही संकल्पनेचा शेवटपर्यंत पिच्छा करायची सवय लागली. अनेक दिग्गज शास्त्रज्ञांची व्याख्याने विद्यापीठात आयोजित केली जात होती. बुद्धीला नवी क्षितिजे खुणावत होती. १९५७ साली बी. एसस्सी. च्या परीक्षेमध्ये अभूतपूर्व, उच्चांकी गुण प्राप्त करून जयंतराव विद्यापीठात पहिले आले. वडीलांप्रमाणे जयंतरावांना देखील टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठात जाण्यासाठी बोट पकडली.

केंब्रिज येथे त्यांनी बीए, एमए व पीएचडी या सर्व पदव्या मिळवल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. रँग्लरची परीक्षा लय भारी. परीक्षार्थी विद्यार्थ्याने जीव मुठीत घेऊन हॉलच्या मध्यभागी ठेवलेल्या स्टूलावर बसायचे (या ट्रायपॉडमुळे ही परीक्षा ‘ट्रायपॉस’ परीक्षा या नावाने देखील ओळखली जाते.) समोर प्रश्नांची फेरी झाडायला प्राध्यापकांची फौज. चहूबाजूंनी हल्ला करून बिचाऱ्या विद्यार्थ्याला जेरीस आणणारी.. विद्यार्थ्याच्या ज्ञानाची खरी कसोटी पाहिली जाते. या परीक्षेत जो टिकला, तोच जिंकला. १९५९ मध्ये बी ए (ट्रायपॉस) परीक्षेच्या वेळी जयंतराव अपघातग्रस्त होते. पायाला प्लास्टर.. मात्र त्यांनी सर्व प्राध्यापकांना अशी उत्तरे दिली की, त्या परीक्षेत जयंतराव सर्वात पहिले आले. म्हणजे सिनियर रँग्लर झाले. बापसे बेटा सवाई. ❤️

स्टीफन हॉकिंग आणि नारळीकर दोघे एकाच वेळी केंब्रिज विद्यापीठात विद्यार्थी होते. जयंतरावांच्या एक दोन वर्षं मागे होता स्टीफन. त्यांची भेट स्टीफन केंब्रिजमध्ये यायच्या आधीच झाली. १९६१ मध्ये इंग्लंडमधल्या रॉयल ग्रीनिच ऑब्झर्व्हेटरीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विज्ञान परिषदेमध्ये जयंतराव व्याख्यान देत होते. तेव्हा ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून आलेल्या स्टीफनने सर्वात जास्त प्रश्न विचारले होते. याच विज्ञान परिषदेत दोघांनी टेबलटेनिसचा एक सामना देखील खेळला, ज्यात जयंतराव विजयी झाले होते. (तेव्हा स्टीफनचा आजार जास्त बळावला नव्हता) स्टीफनची आठवण सांगताना जयंतराव म्हणतात, “विद्यार्थीदशेत असलेला स्टीफन पाहता तो नंतर एवढे मोलाचे संशोधन करेल असे वाटले नव्हते. तेव्हा तो अगदी सामान्य विद्यार्थी होता. त्याने त्याच्यामधले ‘बेस्ट’ नंतर बाहेर काढले. ” १९६६ साली नारळीकर यांना ॲडम पारितोषिक मिळाले. स्टीफन हॉकिंग, रॉजर पेनरोज यांच्यासोबत विभागून. खुद्द स्टीफन हॉकिंग यांनी फोन करून नारळीकर यांना ही बातमी दिली होती. गणितात मिळणारी टायसन, स्मिथ आणि ॲडम अशी तीनही बक्षिसे नारळीकरांनी पटकावली.

एम ए करत असताना जयंतरावांनी सन १९६० मध्ये खगोलशास्त्रसाठी असलेले टायसन पारितोषिक मिळवले. तर पीएचडी करताना सन १९६२ मध्ये स्मिथ पारितोषिक देखील पटकावले. १९६३ साली पीएचडी पूर्ण केली. पीएचडी करताना जयंत नारळीकर यांना सर फ्रेड हॉएल यांचे मार्गदर्शन लाभले. हॉएल हे संशोधनातील मोठे नाव. आइन्स्टाइनने मांडणी केलेला बिगबँग सिद्धांतातील त्रुटी काढून दाखवणारा हा शास्त्रज्ञ. अनेक वर्षं बिगबँग समर्थक आणि हॉएल यांच्यात वादाच्या फेरी होत होत्या.. कधी या गटाची तर कधी त्या गटाची सरशी होत होती. नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल मात्र यांच्यासोबत “कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी” मांडली आणि या वादावर पडदा पडला.

आइन्स्टाइन म्हणतो की, विश्व विस्तारत आहे. आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्याने प्रसंगी सिद्धांताला स्थिरांकाचे ठिगळ देखील लावले आहे. तरीही ताऱ्यांच्या जन्माचे गणन करताना काही गणितीय त्रुटी राहून जातात. यावर हॉएलने आक्षेप घेतले. मात्र नारळीकर आणि हॉएल यांनी संशोधन केले असता असे लक्षात आले की विश्व वेळोवेळी प्रसरण देखील पावते आणि आकुंचन देखील. (पुढे हबल दुर्बिणीने घेतलेल्या छायाचित्रांवरून हे सिद्ध देखील झाले. ) हा शोध खूप महत्त्वाचा होता. एका भारतीय शास्त्रज्ञाने आइन्स्टाइनवर मात केली, ही बाब “१६ वर्षे वयाच्या देशासाठी” खूप महत्त्वाची होती. (देशाला स्वातंत्र्य मिळून जेमतेम १६ वर्षे झाली होती. ) भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ जाहीर केला. १९६५ साली जेव्हा ते काही महिन्यासाठी भारतात आले, तेव्हा त्यांना बघायला तोबा गर्दी.. जयंत नारळीकर हे खूप मोठे स्टार झाले होते.. लालबहाद्दूर शास्त्रींनी देखील त्यांना आश्वासन दिले की, ‘तुम्हाला जेव्हा भारतात कायमचे परत यावे असे वाटेल, तेव्हा मला सांगा.. तुम्ही म्हणाल त्या संस्थेत तुम्हाला नोकरी मिळेल. ‘ 

– क्रमश: भाग पहिला 

जय गणित, जय विज्ञान

#richyabhau

#नारळीकर_जयंत

आपला ब्लॉग : https://richyabhau. blogspot. com/ 

माहिती संग्राहक : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ब्रह्मघोटाळा… कवी : आचार्य अत्रे ☆ माहिती संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ ब्रह्मघोटाळा… कवी : आचार्य अत्रे ☆ माहिती संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

“ब्रह्मघोटाळा” या सिनेमासाठी १९४९ साली आचार्य अत्रे यांनी एका हास्यस्फोटक अंगाईगीताची रचना केली होती. ते गाणं तुम्ही कधी वाचलं किंवा ऐकलं आहे कां? नसल्यास वाचा आणि ऐका.

☘️ निज रे निज बाळा… – गीतकार – आचार्य अत्रे ☘️

संगीत  :  दादा चांदेकर

गायक :  वसंत एरिक

☘️ 

निज रे निज बाळा, मिट डोळा,

सांगु तुला किती वेळा

निज रे निज बाळा

 

झोके देऊनि रे, बघ आला

हाताला मम गोळा

वाजवु कां आता, हाडांचा

माझ्या घुंगुरवाळा

 

वाजुनि तोंड असे, कां रडसी

अक्राळा विक्राळा

तुझिया रडण्याने, बघ झाली

आळी सारी गोळा

 

रडसि कशास बरे, मिळे आता

स्वातंत्र्यहि देशाला

काही उणे नसता, होशिल तू

मंत्री बडा कळिकाळा

 

लाल संकटाचे, रशियाचे

वाटे का भय तुजला

देऊ पाठिंबा, आपण रे

नेहरू सरकाराला

 

काळ्या बाजारी, बागुल तो 

काळा काळा बसला

थांबव हा चाळा, ना तर मी

घेऊन येईन त्याला

 

तुझिया रडण्याचे, हे गाणे

नेऊ का यूनोला

अमेरिकेमधुनी, येऊ कां

घेऊन ॲटम गोळा

 😀

 

कवी : आचार्य अत्रे

माहिती संग्राहक : श्री सुहास सोहोनी 

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जगणे, अनुभवणे, आणि विचार करणे…” – लेखक : श्री यशवंत सुमंत ☆ प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “जगणे, अनुभवणे, आणि विचार करणे…” – लेखक : श्री यशवंत सुमंत ☆ श्री जगदीश काबरे ☆

जगण्याशिवाय अनुभवांना सामोरे जाता येत नाही. अनुभवाशिवाय विचार संभवत नाही. आणि विचारांशिवाय जगणे उमगत नाही. जगणे अनुभवणे आणि विचार हे असे अन्योन्याश्रयी आहेत. सोयीसाठी आपण कधी कधी त्यांची फारकत करतो. पण या फारकतीचा अतिरेक झाला की ‘विचारांपेक्षा अनुभव श्रेष्ठ’ किंवा अनुभव व्यक्तिसापेक्ष म्हणून मर्यादित तर विचार सार्वत्रिक म्हणून व्यापक यांसारख्या दर्पोक्ती ऐकू येऊ लागतात. अनुभव व विचार यांच्यातील सहकार्य धूसर होत जाऊन अनुभववादी विरुद्ध विचारवादी असे द्वंद्व सुरू होते. या द्वंद्वयुद्धाची नशा योद्ध्यांना धुंद बनवते.

सामान्य माणूस मात्र या द्वंद्वाला काही काळानंतर कंटाळतो. या कंटाळण्यातून त्याचे तीन प्रतिसाद संभवतात.

1) तो विचारांबाबत ‘सिनिक’ – तुच्छतावादी बनतो 

2) तो आपले व्यक्तिगत अनुभवच निव्वळ कवटाळून ते सार्वत्रिक सत्य म्हणून सांगू लागतो व स्वतः बंदिस्त होतो 

3) तो स्वतःचे अनुभव नाकारता नाकारता स्वतःलाही नाकारू लागतो. हे व्यक्तित्वाचे खच्चीकरण असते.

आपण बंदिस्त होण्याचे कारण नाही. तुच्छतावादीही असता कामा नये आणि स्वतः च्या अनुभवांचा अकारण धिक्कारही करता कामा नये. स्वतःलाच पुसून टाकण्याइतके किंवा नाकारण्याइतके आपले आणि कोणाचेही आयुष्य कवडीमोलाचे नसते. दुःख, अपमान, संकट, जीवन उद्ध्वस्त करणारे अनुभव प्रत्येकाच्या वाट्याला कमीअधिक प्रमाणात येतातच. त्यांना चिवटपणे सामोरे जायला हवे. हे सामोरे जाण्याचे बळ शेवटी विचारच आपल्याला देतात. कारण विचार हा आपण आपल्याशी केलेला तर्कशुद्ध आणि विश्वसनीय संवाद असतो. इतर विचारांची सोबत व मार्गदर्शन हा संवाद अधिक प्रगल्भ बनवते. म्हणूनच माणसाला विचारदर्शनाची गरज लागते.

एकदा आपण आपली ही गरज ओळखली की मग आपल्याला भेडसाविणारे अनेक स्वतः संबंधीचे व समाजासंबंधीचे प्रश्न समजू लागतात. त्यांच्या नजरेला नजर देण्याची ताकद आपल्याला लाभते. विचारांचा व विचारदर्शनांचा आदरपूर्वक स्वीकार वा त्यांना विधायक नकार देण्याची ऋजुता आपल्यापाशी येते. ही ऋजुता आपल्याला स्वतःच्या व इतरांच्याही जीवनाचा आदर करायला शिकवते. या आदरभावातून आपण विनम्र होतो. ही विनम्रता आपल्याला स्वागतशील बनवते.

स्त्रीवादी काय किंवा अन्य आधुनिक विचारदर्शनांची ओळख का करून घ्यायची, तर आपल्या जगण्याचे संदर्भ आपल्या लक्षात यावेत म्हणून. विचारांचे जगण्याशी असलेले नाते असते ते हेच. हे नाते जे नाकारतात ते एका परीने जीवनच नाकारित असतात. वाढत्या आत्मनिवेदनाच्या व आत्याविष्काराच्या या जमान्यात वास्तविक विचारांचे श्रद्धेने उत्तरोत्तर स्वागत व्हायला हवे. त्यांचा उत्सव साजरा व्हायला हवा. पण असे न होता विचारांबाबतची तुच्छता का वाढावी, विचारांच्या अंताची भाषा का बोलली जावी, माहितीच्या स्फोटाने कर्णबधिरता व संवेदनशून्यता का यावी हे प्रश्न विचारल्याशिवाय आधुनिक विचारदर्शनांशी संवाद होणार नाही.

लेखक : श्री यशवंत सुमंत

प्रस्तुती : श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुमती देवस्थळे… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ सुमती देवस्थळे… ☆ श्री सुनील शिरवाडकर

ही कहाणी आहे मागील पिढीतील एक अत्यंत अभ्यासु व्यक्तीमत्व म्हणजे सुमती देवस्थळे यांची. जन्म २७ डिसेंबर १९२७ चा. शालेय शिक्षण पुण्यात. शालेय शिक्षण झाल्यावर त्यांनी एस. पी कॉलेजला बी. ए. ला अँडमिशन घेतली. पहिल्या वर्षाचा रिजल्ट लागला आणि सुमती परांडे हे नाव कॉलेजमध्ये सर्वतोमुखी झाले. कॉलेज मध्ये असताना त्यांनी नाटकात कामे केली आणि अचानकच त्यांचे लग्न ठरले.

सोलापुरच्या देवस्थळे यांचा हा मुलगा. मुंबईत रेल्वेत होता. कायमस्वरूपी नोकरी. लग्न जमण्यासाठी एवढे पुरेसे होते.

पण..

जोडा शोभणारा नव्हता हेही तितकेच खरे. देवस्थळे तसे निरागस.. पापभिरू.. आणि थोडासा न्युनगंड देखील. जोडीला शारिरीक दुर्बलता (असावी).

त्याउलट सुमतीबाईंचे व्यक्तीमत्व आकर्षक.. हुशार.. आत्मविश्वासाने ओतप्रोत भरलेल्या.

१९४७-४८ चा काळ. इंटरपर्यंत शिकलेली २० वर्षाची ब्राह्मण मुलगी. सर्वसामान्य पणे परीस्थितीला शरण गेली असती. संसारात रमुन गेली असती. पण इथेच सुमतीबाईंचा वेगळापणा जाणवतो.

त्यांनी नोकरी करायचं ठरवलं. जिथे रहात त्याच आवारात एक शाळा होती. समाजातील निम्न स्तरावरील मुलांची. त्या मुलांना त्यांनी शिकवायला सुरुवात केली.

नोकरी सुरू झाली आणि त्यांना पुढची पायरी खुणावू लागली. आहे त्यात समाधान मानणे हा त्यांचा स्वभावच नव्हता. नवर्याला मिळणाऱ्या पैशात निगुतीने संसार करणे हा त्या काळातील रिवाज त्यांनी झुगारला. आपण पदवीधर व्हायला हवे असे त्यांना वाटु लागले. आणि त्यांनी रुईया कॉलेजला प्रवेश घेतला.

दोन वर्षे मन लावून अभ्यास केला आणि मराठी, संस्कृत हे विषय घेऊन त्या विद्यापीठात पहिल्या आल्या.

मग पुढची पायरी.. एम. ए. तिथेही दैदिप्यमान यश.

छोट्या छोट्या विषयांवर लेखन करताना ६०-६१ च्या दरम्यान त्या बी. एड. झाल्या. आणि साधना कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये प्राध्यापिका, शिक्षण तज्ञ म्हणून रुजु झाल्या.

आता घरी सतत विद्यार्थ्यांचा राबता. त्यांना मार्गदर्शन.. कॉलेजची नाटके बसवणं हेही सुरू. सुटीच्या दिवशी तासनतास वाचन.. लेखन.

प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी स्वतःची गुणवत्ता सिध्द केली. त्यांचं व्यक्तिमत्त्व आता झळाळून उठलं. मध्यम उंची.. सुदृढ बांधा.. करारी चेहरा. जे करायचं ते पुर्णत्वानंच.

एकिकडे स्फुट लेखन करताना त्यांनी वैश्विक प्रतिभावंतांची चरित्र लिहिण्यास सुरुवात केली. अल्बर्ट श्वाईटझर, मँक्झिम गॉर्की यांची त्यांनी लिहिलेली चरित्रे गाजली. टॉलस्टॉयचं ‘वॉर अँड पीस’ वाचलं आणि त्या झपाटुन गेल्या. त्याची स्वभाव वैशिष्ट्ये.. तरल संवेदनक्षमता.. आणि शारीरिक बलदंडताही यामुळे त्या आकर्षिल्या गेल्या.

त्यांना आपल्या गुणांची जाणीव होती. बुद्धिमत्तेचं भान होतं. त्यांनी टॉलस्टॉयचं चरित्र लिहिण्यास घेतलं. खरंतर आताशा त्यांना तब्येत साथ देत नव्हती. वारंवार आजारपणाला तोंड देत होत्या त्या. मुलीनं एका दलिताशी लग्न केलंय हा सल मनाला होताच. हे पुस्तक लिहीताना कदाचित त्यांना जाणवलं असणार.. हे आपलं शेवटचं पुस्तक.

स्वाभाविकच आयुष्यभर कमावलेलं भाषावैभव, संवेदना, मानसिक ऊर्जा सगळं सगळं त्यांनी वापरलं.

कौटुंबिक पातळीवर अपयश आलेलं असताना त्यांनी एक गोष्ट ठरवली होती.. आपलं आयुष्य सर्वसामान्यां सारखं नसावं. पण ते नेमकं कसा असावं याचा शोध आयुष्यभर त्या घेत राहील्या.

‘स्वांत सुखाय’ लिहिलेलं ‘टॉलस्टॉय.. एक प्रवास’ हे पुस्तक मराठी साहित्यात एक मानदंड ठरलं. या पुस्तकाला इतके पुरस्कार मिळतील.. आपल्याला मानसन्मान, प्रसिद्धी मिळेल याची त्यांना जाणीवही नसणार.

शालांत परीक्षेनंतर मुलीचे लग्न करुन देण्याचा तो काळ. अश्या काळात लग्नानंतर पतीची कोणतीही साथ नसताना आपली गुणवत्ता सिध्द करणाऱ्या सुमतीबाई देवस्थळी या कर्तबगार स्त्री-रत्नाला आजच्या महिला दिनी वाहिलेली ही एक आदरांजली..!

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ यमक…. – माहिती संग्राहक : नंदसुत ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ यमक…. – माहिती संग्राहक : नंदसुत ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

यमक… 

ज्योतीताईंनी एकदा विचारलं, “एका ओळीने शेवट झाला की पुढच्या कडव्याची सुरुवात त्याच ओळीनं होते, या काव्यप्रकाराला काय म्हणतात? ” माझा हक्काचा स्रोत म्हणजे आई-दादा!

दादांचा फोन बंद होता आठ दिवसांपासून! जाम बेचैन झाले. म्हणून आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट करून ठेवलं. पाचव्या मिनिटाला दादांचा फोन!

“अगं, आत्ताच फोन सुरू झाला आणि तुझा मेसेज वाचला. ऐक, यमकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तू म्हणतेस ते दाम-यमकाच्या जवळपास जाणारं यमक असेल, असं आई म्हणत्ये. “

मागून मला आईच्या नाजूक गुणगुणण्याचा आवाज आला. आईची स्मरणशक्ती अफाट! कोणतीही कविता पाठ असते.

‘श्रीपति झाला दशरथ-सुत राम दशाननासि माराया ।

मा राया जनकाची होय सुता त्रिजगदाधि साराया ।

सारा या प्रभुची हे लीला गाती सदैवही सुकवी ।

सुकवी भवजलिं निधितें निरुपमसुख रसिक जन मनीं पिकवी ।’ 

(पहिल्या ओळीचा शेवट ती पुढच्या ओळीची सुरुवात. पण अर्थ वेगळा)

दादा म्हणाले, “हे बघ ऐक! ” त्यांनी तोवर, ते आठवीत असतानाचं (आईला ८४ वर्षे पूर्ण होतील आता, दादा ८६ वर्षांचे! ) मराठीचं पुस्तक आणलं होतं. पाय प्रचंड दुखतात त्यांचे! पण ब्रिज आणि भाषा हे विषय आले की त्यांना पंख लाभतात!

तर कुमार भा. वि. जोशी, इयत्ता आठवी, असं लिहिलेलं पुस्तक हातात घेऊन त्यांनी मला यमकाचे प्रकार सांगितले. थोडक्यात इथे मांडत आहे.

१) एकाक्षरी यमक:

एक्या पदे भूमि भरोनि थोडी

दुजा पदे अंडकटाह फोडी

(डी ला डी हे एकाक्षरी यमक)

२) द्व्यक्षरी

दे तिसरा पाद म्हणे बळीला

म्हणोनी पाशी दृढ आकळीला

(ळीला हे द्व्यक्षरी)

३) चतुराक्षरी

बाई म्यां उगवताच रवीला

दाट घालुनि दही चरवीला

त्यात गे फिरवितांच रवीला

सार काढुन हरी चरवीला

(काय अफाट आहे ना हे! प्रत्येक ‘चरवीला’ वेगळा आशय मांडतो!)

४) मग एकाचा अन्त्य आणि दुसऱ्याचा आदिचरण सारखा.

सेवुनि संतत पाला, संत तपाला यदर्थ करतात

तो प्रिय या स्तवना की, यास्तव नाकीहि तेंचि वरितात

५) दामयमकाचं उदाहरण वर दिलंच आहे.

६) पुष्पयमक: प्रत्येक चरणात यतीच्या ठिकाणी येणारं यमक.

सुसंगती सदा घडो… पडो.. झडो… नावडो

७) अश्वघाटी: घोड्यासारखी गती असलेलं यमक.

वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो

(वाजत गाजत साजत आजत याजत, अशी गंमत आहे.)

मज मागे मत्स्यांचा हा रिपु-शशि-राहु-बाहु राणा हो

८) युग्मक यमक हा भन्नाट प्रकार आहे.

पायां नमी देइन वंश सारा

पा या न मी दे इनवंशसारा

(इन म्हणजे सूर्य, इनवंशसार म्हणजे सूर्यवंशात जन्मलेल्यांचं सार म्हणजे राम! )

९) समुद्रक यमक (पूर्ण यमक)

हेही अफाट प्रकरण आहे. – 

अनलस मी हित साधी राया, वारा महीवरा कामा ।

अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा ॥

(-मोरोपंत)

हे (पृथ्वीपते) धर्मा, वारा जसे अग्नीचे कार्य साधतो, तसे तुला साह्य करण्यास मी सदैव तयार आहे. हे धीरा, (बल)रामही हवे तर येतील… मग वराका (लक्ष्मी/संपत्ती) तुझ्या सहाय्यास का येणार नाही?

अशा यमकात चमत्कृती असते; पण काव्याचा ओघ नसतो. हे काव्य कृत्रिम असलं, तरीही हे प्रतिभेचंच देणं, लेणं आहे हे निःसंशय!

आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित माहीत नसेल, माहिती व्हावी म्हणून पाठवत आहे. यमक याविषयी कोणास आणखी काही माहिती मिळाली, तर जरूर शेअर करा.

┉❀꧁꧂❀┉

माहिती संग्राहक : नंदसुत

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भिजल्या रानात अंतराळ अवतरते तेव्हा!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

भिजल्या रानात अंतराळ अवतरते तेव्हा! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

श्री. बजरंग निंबाळकर

भिजल्या रानात अंतराळ अवतरते तेव्हा!

मध्यरात्र उलटून गेली तरी आणखी बरंच रान भिजवायचं शिल्लक होतं. वीज जायच्या आधी सगळं वावर ओलं झालं तरच बरं. नाहीतर ह्या असल्या उन्हात ज्वारी काही तग धरणार नाही हे नक्की!

शिवारात स्मशान शांतता. माणूस नजरेस पडण्याची शक्यता नव्हतीच. झालंच तर भक्ष्य शोधायला बाहेर पडलेला एखादा सरपटणारा जीव जवळून जाईल तेव्हढाच. त्याच अंधारात काम करायचं.. पहाटेपर्यंत. गार हवा आणि डोईवर चांदण्याने भरलेलं आकाश. एरव्ही जमिनीकडे डोळे लावून बसणारे त्याचे डोळे मात्र आज वारंवार आभाळाकडे पहात होते. आज काही चतुर्थी नव्हती.. चंद्र पाहण्यासाठी! पण आकाश तसे निरभ्र होते. एखादा एकाकी, केस पांढरे झालेल्या म्हाता-यासारखा चुकार ढग चंद्रासमोरून जायचा, त्याच्याकडे एकदा बघून घ्यायचं.. त्याच्यात एखादा आकार शोधायचा! मोकळ्या रानात एकाकी असताना करायचं तरी काय? दूरवर कुणाच्या शेतातल्या विहिरीवरची मोटार तेव्हढी कानावर येत होती… ती बिचारी यांत्रिक. आपलं काम इमानेइतबारे करीत पाणी ओढत राहणे, हे तिला ठावे!

आधुनिक तंत्रज्ञानाची कृपा… मोबाईल नावाचं, तळहातावर मावेल एवढं यंत्र, जगाच्याच नव्हे तर विश्वाच्या गोष्टी याचि देही… आणि डोळा दाखवत राहते.. त्याचा मोठा आधार आहे आजकाल. नाही तर पूर्वी रेडीओवर काम भागवावे लागे… त्याचीही बिचा-याची प्रसारण वेळ ठरलेली असायची!

त्याला त्याचे सीमेवरचे दिवस आठवले. शत्रूकडे नजर ठेवत तासान तास उभे राहायचे… अंधार, बर्फ, थंडी, उष्णता यांपैकी काहीच कामाच्या मध्ये येत नसे… मात्र एकाकीपणा जीवघेणा असायचा. डोळ्यासमोर घर आलं की आपण आता जिथे उभे आहोत तिथून घरापर्यंतचं अंतर दिसायचं.. आता निघालं तर किती वेळात पोहचू? असाही विचार यायचा. इथून घरी जाता तरी येईल का असाही विचार येऊन जायचाच… नोकरीच अशी की कशाचा भरवंसा देता येणार नाही.

त्याने मोबाईल मध्ये वेळ पाहिली. सुदैवाने इंटरनेट जिवंत होते… बाकी गाव झोपी गेल्याने रेंजवर ताण कमी असावा…. अजून तसा अवकाश होता थेट प्रक्षेपण सुरु व्हायला… पण आपलं आधीच सुरु केलेलं बरं म्हणून त्याने चिखल माखल्या हातानेच मोबाईलवर गुगल सुरु केलं! ती तिथून निघाली आहे… सतरा तासांनी पोहोचेल… एक दीड तास शिल्लक होता ते सतरा तास खतम व्हायला! इंग्रजीत काहीबाही सांगत होते ते लोक… त्यात त्याला हवं ते नाव उच्चारलं गेलं की बरं वाटत होतं. त्या नावाच्या उच्चाराबरोबर त्याला आणखी एक नाव सारखं सारखं आठवत होतं…. ती अशीच परत येताना जमिनीपर्यंत सदेह पोहचू शकली नव्हती… आज असं नाही ना होणार? शेवटी यंत्र आहे हे… दगा देऊ शकतंच!

शेतातल्या त्या अंधारात त्याच्या चेह-यावर मोबाईलचा उजेड जास्तच स्पष्ट होता आज. पण अधून मधून त्याची नजर आभाळाकडे जाई! सा-या जगाचं आभाळ एकच असलं तर इथून सगळं आभाळ काही नजरेस पडणार नव्हतं.. पण तरीही वाटेकडे डोळे लावणे म्हणतात ते असं प्रत्यक्षात होत होतं..!

थेट प्रक्षेपणात थोडा आवाज वाढला म्हणून त्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर वरून अत्यंत वेगाने काहीतरी खाली येताना दिसू लागले… ताशी सत्तर हजार किलोमीटर्स एवढा वेग आहे, असं ऐकू आलं. पाहता पाहता ती वस्तू खाली आली आणि तिला दोन पंख फुटले… वेग कमालीचा कमी झाला.. थोड्यावेळाने आणखी दोन पंख उमलले!

अथांग, स्थिर निळा समुद्र. लाटा सुद्धा श्वास रोखून होत्या… आणि ती पाण्याला स्पर्श करती झाली… जमिनीला नाही पण जमिनीवरच्या पाण्याला तरी तिचा स्पर्श झाला होता! पहाटेची ४ वाजून २३ मिनिटे झाली होती…. ती सुखरूप बाहेर आल्याची वेळ त्याने आवर्जून पाहून ठेवली…. आपलं कुणीतरी खूप दिवसांनी, जीवावरच्या संकटातून वाचून परतल्याचा आनंद त्याच्या चेह-यावर झळकत होता… शिवारातल्या वाफ्याताल्या पाण्यामध्ये चंद्रही चमकत होता आणि याचा चेहराही!

खूप दिवसांपूर्वी त्याने ऐकले, वाचले आणि पाहिले होते…. आपली एक महिला दूर अंतराळात अडकून पडली आहे. आपली म्हणजे भारतीय वंशाची.. आणि आता अमेरिकी झालेली अंतराळवीरांगना… सुनीता विल्यम्स. आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेली ही शूर महिला आज परतणार, उद्या परतणार म्हणून नऊ महिने तिथंच स्थानबद्ध झाल्यासारखी झालेली. तिला परत आणण्याचे प्रयत्न झाले पण त्यातले काही अयशस्वी ठरले. तिच्या परतण्याचा कार्यक्रम निश्चित झाल्यापासून हा गडी त्या बातमीकडे लक्ष ठेवून होता…. ती परत सुखरूप माघारी आल्यावर जणू तिच्याएवढाच आनंद त्यालाही झाला!

त्या रात्री त्या शिवारात ती बातमी कुणाला सांगावी तर तिथे कुणी नव्हतं.. त्याने आपल्या उजव्या हाताची मूठ बंद केली… तो हात उंचावला आणि कोपरापासून खाली खेचला… बहोत अच्छे… तो उद्गारला! आणि दुस-याच क्षणी त्याच्या मनात कल्पना चावलाची छबी तरळून गेली… ती सुद्धा अशीच परत यायला पाहिजे होती!

(भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स या गेली नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकून पडल्याच्या बातम्या सर्वच देशप्रेमी आणि सहृदय माणसांना तशा अस्वस्थच करत होत्या. त्या परत येण्याच्या प्रक्रियेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. आमचे स्नेही आणि भारतीय सैन्यात मोलाची कामगिरी बजावून निवृत्त झाल्यानंतर लेखक, पत्रकार, प्राणिसेवक, समाजसेवक म्हणून कार्यरत असणारे, सेनादलाची प्रतिमा उंचावल्याबद्दल सन्मानित झालेले श्री. बजरंग तुकाराम निंबाळकर अजूनही शेतात राबतात. त्यांनी शेतीला पाणी पाजता पाजता सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास मोबाईलवर थेट अनुभवला. त्यावेळी त्यांच्या झालेली त्यांच्या मनाची अवस्था बरेच काही सांगून जाते… त्यात देशाबद्दलचे प्रेम तर प्रकर्षाने दिसते.. शेवटी एकदा सैनिक बनलेला माणूस अखेरपर्यंत सैनिकच असतो, हे खरे. जय हिंद, निंबाळकर साहेब!)

(फेसबुकवर आलेल्या पोस्टवर आधारित)

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “१८ मार्च : जागतिक चष्मा दिवस” – संकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “१८ मार्च : जागतिक चष्मा दिवस” – संकलन : श्री मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

दृष्टिदोष सुधारावयाचे किंवा हानिकारक किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करणारे ‘चष्मा’ एक साधन. वर्तुळाकृती, अंडाकृती अथवा इतर विविध आकार असलेल्या तारेच्या किंवा प्लॅस्टिकच्या व भिंग बसविण्यासाठी मधे भोक असलेल्या दोन चकत्या डोळ्या समोर ठेवून त्यांना नाकाजवळच्या बाजूस जोडून तो जोड नाकावर नीट बसेल असे करतात. चकत्यांच्या कानाकडील बाजूंना काड्या जोडून त्या कानावर घट्ट बसवितात. चकत्यांत योग्य प्रकारची भिंगे बसविली म्हणजे नेहमी पाहण्यात येत असलेला चष्मा तयार होतो.

इतिहास

काचेच्या गोल भांड्यात पाणी भरून त्याचा उपयोग वस्तू मोठी दिसण्यासाठी पूर्वीचे लोक करीत असत असा उल्लेख ग्रीक व रोमन लेखक करतात, असे इ. स. १५० मध्ये क्लॉडियस टॉलेमस यांनी वर्णन केले आहे. जुनी हस्तलिखिते वाचताना आणि त्याच्या प्रती तयार करताना पूर्वीचे धर्मगुरू जाड भिंगे वापरीत. १२८२ साली निकोलस बुलेट या धर्मगुरूंनी एका करारावर स्वाक्षरी करताना चष्मा वापरला होता. रॉजर बेकन यांनी पारदर्शक स्फटिक किंवा काच यांचा उपयोग अधू दृष्टी असणाऱ्यांना होईल असे म्हटले असल्यामुळे चष्म्याच्या शोधाचे श्रेय त्यांना दिले जाते. पण सु. १२७० मध्ये मार्को पोलो यांनी चीन देशाच्या सफरीत येथील लोक दृष्टी सुधारण्यासाठी भिंगे वापरतात, असा उल्लेख केलेला आढळतो. पंधराव्या शतकात अंतर्गोल भिंगे वापरण्यास प्रारंभ झाल्यावर लघुदृष्टिदोष असणाऱ्यांनाही त्याचा फायदा होऊ लागला. काचेची भिंगे वापरण्यास प्रारंभ झाल्यापासून विसाव्या शतकातील भिंगाची व चष्म्याची प्रगती अनेक टप्प्यांनी झालेली आहे. चकत्यांत बसविलेल्या भिंगांना दांडी बसविली गेली. चष्म्याच्या शोधानंतर तीन साडेतीन शतकांनी तो कानावर घट्ट बसेल अशा तऱ्हेने काड्या जोडण्याची कल्पना १८२७-३० च्या सुमारास एडवर्ड स्कार्लेट यांनी काढली. त्यानंतर सु. १७४९ मध्ये दुर्बिणी सारखे चष्मे प्रचारात आले. एकच भिंग वापरण्याची प्रथा १८०६ पासून सुरू झाली आणि स्प्रिंगच्या साहाय्याने फक्त नाकावरच घट्ट बसून राहील असा दोन भिंगांचा चष्मा १८४० पासून प्रचारात आला. प्रत्यक्ष डोळ्यावरच चिकटून राहतील अशा स्पर्श भिंगांची कल्पना १८४५ साली सर जॉन हर्शेल यांनी पुढे मांडली. कर्करोगाने बुबुळ दूषित झाले असताना स्पर्श भिंगाचा संरक्षक व चष्म्या सारखा उपयोग होतो हे म्यूलर या जर्मन गृहस्थांनी यशस्वीपणे दाखवून दिले. या भिंगाचे कॉन्टॅक्ट लेन्स (स्पर्श-भिंग) हे नाव यूजीन फिक या स्विस वैद्यांनी सुचविले.

दृष्टिदोष

विविध कारणांमुळे डोळ्यांत अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात व त्यांचा दृष्टीवर परिणाम होतो. चाळीस वर्षाच्या वयानंतर जवळचे दिसण्यास किंवा वाचण्यास त्रास होतो याला दीर्घदृष्टी म्हणतात. जवळचे दिसण्यास त्रास पडणे हे लक्षण सर्वसाधारणपणे वृद्धपणात आढळते. डोळ्यातील भिंगाचा लवचिकपणा कमी झाल्यामुळे, अन्य रोगामुळे, विशिष्ट जीवनसत्त्वाच्या उणेपणामुळे डोळ्यांच्या रचनेशी संबंधित असलेल्या स्नायूंच्या हालचाली सुसंगत होत नसल्याने अनेक दृष्टिदोष निर्माण होतात. ज्या प्रकारचा दृष्टिदोष झालेला असेल तो दूर करणारा चष्मा तयार करता येतो.

गोलीय भिंगे

नेत्र अनुकूलन सवयीने व सहकार्याने होते याचा उपयोग जवळची वस्तू पाहताना होतो. अनुकूलन कमी झाले म्हणजे वाचताना किंवा बारीक कामावर दृष्टी लावताना त्रास होऊ लागतो. योग्य अशी बहिर्गोल भिंगे वापरली म्हणजे नेत्रपटलावर प्रकाशकिरण केंद्रीभूत होऊन दोष दूर होतात. अनुकूलन सुधारले म्हणजे हा दोष जाऊन दूरच्या वस्तू स्पष्ट दिसू लागतात. एरवी त्या अस्पष्ट दिसतात. लघुदृष्टिदोषात नेत्रगोलाची लांबी वाढल्यामुळे लांबच्या वस्तूवरून येणारे समांतर किरण नेत्रपटलावर न पडता त्याच्या पुढे केंद्रित होत असल्यामुळे ती वस्तू अस्पष्ट दिसते. योग्य अंतर्गोल भिंग (ऋण शक्तीचे) वापरले म्हणजे किरणांचे अपसरण वाढून हे किरण नेत्रपटलावरच केंद्रित होतात.

चित्याकृती भिंगे

दृष्टिवैषम्य हा दोष मोठ्या प्रमाणात आढळतो. या दृष्टिदोषात नेत्रपटलावर केंद्रीकरण होत नसल्यामुळे सर्व अंतरांवरील वस्तू अस्पष्ट दिसतात. दरम्यानच्या कोनात दृष्टी काम करू शकत असली, तरी डोकेदुखी व डोळ्यावरचा ताण या तक्रारी राहतात. दृष्टिवैषम्य चित्याकृती (दंडगोलाकार) भिंग वापरून दूर करता येते.

लोलक बहुकोनी भिंगे

कमी शक्तीचे लोलक वापरून आपाती किरणांची दिशा बदलता येते. यांचा उपयोग काणे डोळे सुधारण्यासाठी करतात. दोन्ही डोळे एकमेकांना सोईस्कर रीतीने राहतील अशा दिशेला वळविले म्हणजे प्राकृत (नेहमीची) दृष्टी कायम राहते. लोलकाचा उपयोग नेत्रगोलाच्या बाहेरील स्नायूंच्या पक्षाघातावर करतात.

द्विकेंद्री भिंगे

लघु आणि दीर्घदृष्टिदोष असणारांना वारंवार चष्म्याची आलटापालट करावी लागते. हा त्रास द्विकेंद्री भिंगे एकत्र बसवून घालवितात. १९०४ साली दोन भिंगांचा पूर्ण मिलाफ करून किंवा अखंड काचेत द्विकेंद्री भिंगे तयार करण्यात येऊ लागली. दोन्ही भिंगांचा बाहेरील पृष्ठभाग एकसारखा असतो. पण लहान भिंगाच्या आतल्या पृष्ठभागाला जास्त वक्रता असते. त्याने वाचता येते किंवा जवळचे पाहता येते.

त्रिकेंद्री भिंगे

यात लांबचा, मध्यावरचा आणि जवळचा असे तीन वेगवेगळ्या शक्तीचे विभाग असतात. मध्य विभागाच्या खालचा आणि वरचा विभाग सारख्याच शक्तीचा असला, तरी त्यांची प्रकाशीय केंद्रे मात्र वेगवेगळी असतात. ही भिंगे दोन डोळ्यांतील विषम प्रणमन दोष दूर करण्यासाठी वापरतात.

विशेष प्रकार

उष्ण भट्ट्यांजवळ काम करणाऱ्यांच्या, काचेचे फुंककाम करणाऱ्यांच्या, धातूंचे रस गाळणाऱ्यांच्या व इतर तत्सम कामे करणाऱ्यांच्या डोळ्यांना अवरक्त प्रारणा पासून इजा होऊ नये म्हणून विशिष्ट प्रकारचे चष्मे वापरतात. जंबुपार प्रारणा पासून वितळजोडाची (वेल्डिंगची) कामे करणाऱ्यांना, या प्रारणाचा उपयोग करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या व रुग्णांच्या डोळ्यांना, विशिष्ट परिस्थितीनुसार डोळ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून विविध प्रकारचे चष्मे तयार करतात. क्ष-किरणांपासून अपाय होऊ नये म्हणूनही चष्मे वापरतात.

प्रायोगिक अवस्थेतील चष्मे

१) अंधांसाठी चष्मा

विशिष्ट रंगाशी विशिष्ट स्वराची सांगड घालणे, दुय्यम रंगांच्या स्वरांचे मिश्रण होणे आणि यांचा संबंध सवयीने लावता येणे या तत्त्वावर डी. बी. फॉस्टर या शास्त्रज्ञांनी अंधांसाठी एक चष्मा तयार केला आहे. या चष्म्यात नेहमीच्या भिंगा ऐवजी प्रकाशीय गाळण्या बसविलेल्या असतात. त्यांवर पडणाऱ्या प्रकाशाचे तीन प्राथमिक रंगांत पृथक्करण होते. या प्रकाशाचे प्रकाशविद्युत घटकाच्या साहाय्याने ध्वनीत रूपांतर होऊन कानाला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाने त्याची संवेदना मेंदू पर्यंत पोहोचते. अंधांना अशा चष्म्याच्या साहाय्याने संचार करणे सुलभ होईल.

२) अंतरानुसार बदलणारा चष्मा

द्विकेंद्री भिंगांच्या साहाय्याने जवळच्या व लांबच्या वस्तू एकाच चष्म्याच्या साहाय्याने पाहता येणे शक्य असते. तथापि या चष्म्यापेक्षाही अधिक सुधारलेला चष्मा ब्रिटन मधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेतील मार्टिन राइट या शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. ज्या अंतरावरील वस्तू पहावयाची असेल, त्या अंतराला योग्य प्रकारे जमवून घेणारी भिंगे या चष्म्यात बसविण्यात आलेली आहेत.

संकलन : श्री मिलिंद पंडित, कल्याण

(संदर्भ : मराठी विश्वकोश/गोखले, श्री. पु. टोळे )

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सैनिकांचा धर्म !!! – मूळ इंग्रजी लेखक : लेफ्टनंट कर्नल दिलबाग सिंग दबास (सेवानिवृत्त) ☆ मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? इंद्रधनुष्य ?

☆ सैनिकांचा धर्म !!! – मूळ इंग्रजी लेखक : लेफ्टनंट कर्नल दिलबाग सिंग दबास (सेवानिवृत्त) ☆ मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

इंद्रधनुष्य 

२ ) “ सैनिकांचा धर्म “ इंग्रजी लेखक : लेफ्ट. कर्नल दिलबाग सिंग दबास मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट 

१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले तेंव्हा ‘४ राजपुताना रायफल्स बटालियन’चे सुभेदार रिछपाल राम दोन महिन्यांच्या रजेवर गावी आलेले होते. गुडगांव जिल्ह्यातल्या त्यांच्या बर्डा गावामध्ये, घरटी किमान एक तरी आजी-माजी सैनिक होताच. बर्डा गावाला ‘फौजियों का गांव’ म्हणूनच ओळखले जात असे.

युद्ध सुरु होताच, बर्डा गावातल्या जवानांना सुट्टी रद्द झाल्याच्या तारा येऊ लागल्या. एक-एक करून बहुतांश जवान आपापल्या पलटणीसोबत युद्धभूमीकडे रवाना होऊ लागले.

काही दिवस गेल्यानंतरही सुभेदार रिछपाल राम यांना त्यांच्या बटालियनकडून बोलावणे आलेले नसल्याने ते अस्वस्थ होते. अखेर एके दिवशी त्यांनी स्वतःच ठरवले की मी बटालियनमध्ये परतणार. त्यांची पत्नी जानकीने त्यांना तार येईपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला, पण ते ऐकेनात. त्यांचे म्हणणे होते की, एकतर पोस्टातून त्यांची तार गहाळ झाली असावी किंवा ती चुकीच्याच पत्त्यावर पाठवली गेली असावी.

त्यांचा हेका एकच होता – “पलटणीच्या आणि देशाच्या मिठाला जागण्याची वेळ आलेली असताना, नुसते वाट पाहत स्वस्थ बसणे हा सैनिकी धर्मच नव्हे!”

टांग्यात बसून पत्नीचा निरोप घेताना सुभेदार रिछपाल राम तिला म्हणाले, “मैं उल्टो आऊँगो, मोर्चो जीत के आऊँगो। और जे उल्टो ना आ पायो तो ऐसो कुछ कर जाऊँगो, के म्हारी पूरी बिरादरी तेरे पे गर्व करेगी।” (मी परत येईन आणि जिंकूनच येईन. पण जर मी परत नाही येऊ शकलो तर असं काहीतरी करेन, ज्यामुळे आपल्या सर्व समाजाला तुझा अभिमान वाटेल!”)

दुर्दैवाने, सुभेदार रिछपाल राम युद्धभूमीवरून कधीच परतले नाहीत. परंतु, स्वतःचे प्राण आपल्या पलटणीवरून आणि देशावरून ओवाळून टाकण्यापूर्वी, त्यांनी पत्नीला दिलेले वचनही पाळले होते. मरणोपरांत ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ देऊन त्यांच्या शौर्याचा सन्मान केला गेला.

साठ वर्षे लोटली आणि १९९९ साल उजाडले. जम्मू-काश्मीरमध्ये कारगिलवर युद्धाचे ढग दाटून येऊ लागले. ‘१७ जाट’ बटालियनचे काही जवान व अधिकारी रजेवर होते. आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसताच, बटालियनचे अडज्युटन्ट, मेजर एच. एस. मदान यांनी सगळ्यांना तारा पाठवून परत बोलवायला सुरुवात केली.

१७ जाट बटालियनच्या ‘डेल्टा’ कंपनीचे कमांडर, मेजर दीपक रामपाल हेदेखील दीर्घकालीन रजेवर होते. सप्टेंबर १९९९ मध्ये होणाऱ्या स्टाफ कॉलेज प्रवेश परीक्षेसाठी ते कसून तयारी करत होते. बटालियनचे सीओ, कर्नल यू. एस. बावा यांची अशी इच्छा होती की मेजर दीपकच्या अभ्यासामध्ये शक्यतो व्यत्यय येऊ नये. त्यांनी मेजर मदान यांना सांगितले, “दीपकला इतक्यात तार पाठवू नकोस. जरा चित्र स्पष्ट होऊ दे. गरज पडलीच तर आपण त्याला ऐनवेळी बोलावून घेऊ. “

एके दिवशी बटालियनच्या ‘ऑप्स रूम’मध्ये बसलेल्या कर्नल बावांना धक्काच बसला. पाठीवर रकसॅक घेतलेले मेजर दीपक रामपाल ‘ऑप्स रूम’मध्ये येऊन दाखल झाले.

“अरे दीपक, तुला आम्ही परत बोलावलं नव्हतं. तू कसा काय आलास?” असे सीओ साहेबांनी विचारताच मेजर रामपाल उत्तरले, “सर, पाकिस्तान्यांच्या घुसखोरीची बातमी मी रेडिओवर ऐकली. ‘४ जाट’चे मेजर सौरभ कालिया आणि त्याच्या गस्ती पथकाला पाक घुसखोरांनी हालहाल करून मारल्याचं वृत्तही मी वर्तमानपत्रात वाचलं. हुतात्मा सैनिकांच्या शवपेट्या त्यांच्या गावापर्यंत आल्याचं दृश्यही टीव्हीवर दिसलं. त्यानंतर मी काय करायला हवं होतं असं तुमचं म्हणणं आहे, सर?”

बटालियनमध्ये परतल्यानंतर दोन आठवड्याच्या आतच मेजर दीपक रामपाल आपल्या डेल्टा कंपनीसह अत्यंत दुर्गम अशा ‘व्हेल बॅक’ टेकडीवर चाल करून गेले. पाक घुसखोरांनी त्या टेकडीवर मजबूत पकड घेतलेली होती. एक रात्रभर चालेल्या हातघाईच्या लढाईनंतर मेजर दीपक आणि त्यांच्या शूरवीर जाटांनी ‘व्हेल बॅक’ टेकडी काबीज केली.

मेजर दीपक रामपाल यांच्या असाधारण शौर्य आणि असामान्य नेतृत्वाबद्दल त्यांना ‘वीर चक्र’ प्रदान करून सन्मानित केले गेले.

देशाला आपली खरी गरज असताना, हक्काच्या रजेसारख्या मामुली सवलतीचे महत्व ते काय? सुभेदार रिछपाल राम आणि मेजर दीपक रामपाल ही फक्त दोन नावेच आहेत. भारतीय सैन्यदलांमधल्या प्रत्येक जवानांचे जीवनसूत्र ‘राष्ट्र सर्वोपरि’ हेच असते. पलटणीच्या खाल्लेल्या मिठाला वेळप्रसंगी जागणे हाच खरा धर्म! 

मूळ इंग्रजी लेखक : लेफ्टनंट कर्नल दिलबाग सिंग दबास (सेवानिवृत्त)

मराठी अनुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ निर्वाण षटकम्॥ – मराठी भावानुवाद : आद्य शंकराचार्य ☆ भावानुवादक : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ निर्वाण षटकम्॥ – मराठी भावानुवाद : आद्य शंकराचार्य ☆ भावानुवादक : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मनो बुद्ध्यहंकारचित्तानि नाहम् न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे

न च व्योम भूमिर् न तेजॊ न वायु: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥

*

न च प्राण संज्ञो न वै पञ्चवायु: न वा सप्तधातुर् न वा पञ्चकोश:

न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायू चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥

*

न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ मदो नैव मे नैव मात्सर्य भाव:

न धर्मो न चार्थो न कामो ना मोक्ष: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥

*

न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खम् न मन्त्रो न तीर्थं न वेदा: न यज्ञा:

अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥

*

न मृत्युर् न शंका न मे जातिभेद: पिता नैव मे नैव माता न जन्म

न बन्धुर् न मित्रं गुरुर्नैव शिष्य: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥

*

अहं निर्विकल्पॊ निराकार रूपॊ विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्

न चासंगतं नैव मुक्तिर् न मेय: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥

*

भावानुवाद :: 

निर्वाण षटक

मन, बुद्धी मी ना अहंकार चित्त 

कर्ण ना जिव्हा, नाही नासा न नेत्र

व्योम न धरित्री, नसे तेज वायू

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||१||

*

न मी चेतना ना असे पंचवायू

नसे पंचकोष मी ना सप्तधातू

मी वाचा न हस्त ना पादोऽन्य गात्र

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||२||

*

न संतापी द्वेषी नसे लोभ मोह

नसे ठायी मत्सर ना मी मदांध

धन-धर्म-काम ना मी मोक्षातीत

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||३||

*

न मी पुण्य-पाप न सौख्य न दुःख

नसे मंत्र, तीर्थ न वेद ना यज्ञ

नसे अन्न वा ना भरविता न भोक्ता

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||४||

*

मज मृत्युभय ना न जाणे मी जाती 

मला ना पिता-माता मी तर अजन्मी

नसे बंधू स्नेही गुरु शिष्य नसती

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||५||

*

विकल्पाविना मी न आकार मजला 

मी सर्वव्यापी इन्द्रियात वसला

बंध मला ना मज नाही मुक्ती

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||६|| 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पुण्यविजय ते दूरदर्शन…” – माहिती संकलक : अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “पुण्यविजय ते दूरदर्शन…” – माहिती संकलक : अनामिक ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

पुण्यविजय – – ते दूरदर्शन 

🏷️ सन 754 : पुण्याचे नाव होते ‘पुण्य-विजय’.

🏷️ सन 993 : ‘पुनवडी’ हे पुण्याचे नाव पडले.

🏷️ सन 1600 : मूळच्या वस्तीला ‘कसबा पुणे’ हे नाव होते.

🏷️ सन 1637 : पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली – सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या.

🏷️ सन 1656 : पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली होते.

🏷️ सन 1663 : मंगळवार पेठ वसली.

🏷️ सन 1703 : बुधवार पेठ वसली.

🏷️ सन 1714 : पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरू.

🏷️ सन 1721 : बाजीराव पेशवे यांचेकडून पुण्याची पुनर्बांधणी सुरू.

🏷️ सन 1730 : शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला.

🏷️ सन 1734 : पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ वसवली.

🏷️ सन 1749 : पर्वतीवरील देवालय बांधले.

🏷️ सन 1750 : वेताळ पेठ वसवली, कात्रज तलाव व वेशी बांधण्यात आल्या.

🏷️ सन 1755 : नागेश पेठ वसवली. पर्वती तळे बांधले.

🏷️ सन 1756 : गणेश व नारायण पेठा वसवल्या.

🏷️ सन 1761 : लकडी पूल बांधण्यात आला.

🏷️ सन 1769 : सदाशिव व भवानी पेठा वसवल्या गेल्या.

🏷️ सन 1774 : नाना, रास्ता व घोरपडे पेठा वसवल्या.

🏷️ सन 1790 : फडणवीस वेस उभारण्यात आली.

🏷️ सन 1818 : इंग्रजी अंमल सुरू. खडकी कटक स्थापना.

🏷️ सन 1856 : पुणे-मुंबई लोहमार्ग सुरू झाला. व अभियांत्रिकी कालेजची स्थापना.

🏷️ सन 1857 : पुणे नगरपालिकेची स्थापना.

🏷️ सन 1869 : सर डेव्हिड ससून रुग्णालय कार्यान्वित.

🏷️ सन 1875 : संगम (वेलस्ली) पूल वाहतुकीस खुला.

🏷️ सन 1880 : खडकवासला धरण बांधून पूर्ण.

🏷️ सन 1881 ते 1891: मुठा उजवा कालवा खोदण्यात आला.

🏷️ सन 1884 : डेक्कन कॉलेजची स्थापना.

🏷️ सन 1885 : फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना.

🏷️ सन 1886 : पुणे-मिरज लोहमार्ग सुरू झाला.

🏷️ सन 1915 : आर्यन चित्रपटगृह सुरू झाले.

🏷️ सन 1916 : नगरपालिकेने नगररचनेचे काम हाती घेतले.

🏷️ सन 1915 ते 1925 : लक्ष्मी व टिळक रस्ता तयार व त्यांची सुधारणा.

🏷️ सन 1919 : पुण्यात भुयारी गटारांची योजना हाती घेण्यात आली.

🏷️ सन 1921 : पुण्याला वीजपुरवठा सुरू. नव्या पुलाचे बांधकाम.

🏷️ सन 1941 : सिल्व्हर जुबिली मोटर ट्रान्सपोर्टतर्फे नागरी बससेवा सुरू.

🏷️ सन 1950 : पुणे महानगरपालिकेची स्थापना. पी. एम. टी. ची बससेवा सुरू.

🏷️ सन 1952 : पुणे विद्यापीठाची स्थापना.

🏷️ सन 1953 : पुणे आकाशवाणी केंद्र सुरू.

🏷️ सन 1961 : पानशेत धरण फुटले.

🏷️ सन 1973 : सिंहगडावर टी. व्ही. टॉवर सुरू झाला. पुण्यात दूरदर्शन दिसू लागला.

 

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares