काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण सिद्ध करणारी रात्र !
नाशिक येथील सुयोग हॉस्पिटल मध्ये नेहमीप्रमाणे पेशंट व नातेवाईक यांची ये जा सुरू होती. हॉस्पिटलमध्ये कर्तव्यदक्ष डॉक्टर कैलास राठी व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर रीना राठी हे नेहमीप्रमाणे आपले राऊंड घेत होते. डॉक्टर रीना आपल्या बाल रुग्णांची तपासणी करावयास निघून गेल्या. राउंड संपवून त्या परत डॉक्टर कैलास राठी यांच्या केबिन कडे येत असताना त्यांना ‘ती’ व्यक्ती पळताना दिसली. अरे ही व्यक्ती अशी का पळत असावी एवढा क्षणभर विचार मनात येईपर्यंत मागून कर्मचाऱ्यांचा पकडा ! पकडा त्याला त्याने सरांना मारले ! असा आरडाओरडा सुरू झाला. हे ऐकताच रीनाच्या डोक्यात त्याने हातापायी केली असेल असेच आले, परंतु त्यांनी डॉक्टर कैलास यांच्याकडे धाव घेतली. पाहते तर काय ? सगळीकडे जणू रक्ताचा सडा पडला होता. तिचा जीवन साथी खाली पडला होता. तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
क्षणभर डोळ्यापुढे अंधारी आली, पण क्षणभरच! पुढच्या क्षणी ही सावित्री यमाशी दोन हात करायला सज्ज झाली. आपल्या वैद्यकीय क्षेत्राच्या प्रदीर्घ अनुभवाने व समय सूचकतेने तिने सगळे उपचाराचे चक्र फिरवले. हॉस्पिटलचा सगळा स्टाफ आपल्या लाडक्या सरांना सावरायला पुढे सरसावला व डॉक्टर रीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू झाले.
परंतु त्या क्रूर, विकृत व्यक्तीने कोयत्याचे एवढे वार केले होते की रक्त कुठून येत आहे हेच कळेना! डॉक्टर कैलास यांच्या डोक्यावर व मानेवर एवढे जीव घेणे वार केले होते की कुठल्या घावावर प्रथम उपचार करावा असे झाले. परंतु डॉक्टर राठी यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत झालेला स्टाफ व डॉक्टर रीना यांच्या सूचनेनुसार अजिबात वेळ न घालवता उपचार सुरू झाले. एखादा सामान्य व्यक्ती अशा हल्यानंतर कुठलाच नसता पण हे डॉक्टर कैलास राठी, खरोखरच लढवैये व जबरदस्त इच्छाशक्तीचे धनी ! संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले असताना आपल्या पत्नीस काय उपचार द्यावे ही सूचना देत होते! जातीचे डॉक्टर ते !
पतीवर उपचार करताना डोक्यात फक्त त्यांना वाचवण्यासाठी काय काय करावे लागणार हेच विचार चक्र रीना यांच्या डोक्यात सुरू होते व त्या अन्वये त्या स्टाफला बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन सूचना देत होत्या. आपल्या सगळ्या भावना बाजूला जाऊन एक डॉक्टर बनवून त्यांनी एक ना अनेक बाबी लक्षात घेऊन डॉक्टर कैलास यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये ताबडतोब हलवण्याचा निर्णय घेतला व आपली समय सूचकता दाखवली. हा हा म्हणता ही वार्ता सगळीकडे पसरली. नातेवाईक, मीडिया, राजकारणी, समाजकारणी, शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर, विविध स्तरातील व्यक्ती अपोलो हॉस्पिटलच्या बाहेर जमा झाली. डॉक्टर राठी यांच्यावर झालेल्या प्राण घातक हल्ल्याचा निषेध होऊ लागला.
आयसीयू मध्ये अपोलो हॉस्पिटलचे निष्णात डॉक्टर्स व सुयोग हॉस्पिटलच्या तज्ञांची टीम यांनी आपले शर्थीचे प्रयत्न सुरू केले व डॉक्टर राठी यांच्यावर उपचार सुरू झाले.
आता या सावित्रीच्या, रीनाच्या लढाईचा दुसरा पर्व सुरू झाला. कैलास राठी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ती खरोखरच भयानक रात्र होती डॉक्टर रीना यांनी प्रण केला की सकाळचा स्कॅन होईपर्यंत मी पाण्याचा घोट ही घेणार नाही! इकडे राठी कुटुंबातील व्यक्तींच्या जीवाची घालमेल काय सांगावी ? घरी त्यांची आई लेकाच्या जीवासाठी देवाला साकडे घालत होती. डॉक्टर राठी यांचे अपत्य वृंदा व राम दोघांना तर धक्क्यातून सावरणे अवघड झाले होते. परंतु आई-वडिलांनी दिलेली सकारात्मक दृष्टी व विचारसरणी त्यांना सांगत होती आमचे वडील यातून हमखास सुखरूप बाहेर पडतील! सकाळी ही वृंदा, सावित्रीची लेक सहा वाजताच पोहोचली आपल्या आई-वडिलांकडे ! सात वाजता स्कॅन चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर या सुकन्याने आपल्या आईला प्यायला पाणी दिले रात्रभर नाना विचारांचे काहूर मनात असलेल्या व अस्वस्थ मन झालेल्या सगळ्यांना आशेचा किरण दाखवण्यासाठी ही हिम्मतवान सावित्री उभी राहिली. आपल्या डोळ्यातील अश्रू कुठेतरी आत लपवून, आत्मविश्वासाने भरलेल्या डॉक्टर रीनाने सगळ्यांना एकच सांगितले बी पॉझिटिव. . कैलास शंभर टक्के बाहेर पडणारच आहे, नव्हे त्याला यातून बाहेर पडावेच लागेल. तुम्ही सगळे फक्त देवाचे नामस्मरण करा व विश्वास ठेवा की कैलास सुखरूप आहे ! सुखरूप आपल्यासमोर येतील ! काय हा विश्वास !काय तो देवावर भरोसा! सगळे काही प्रशंसनीय ! चोहो बाजूने देवाचा धावा सुरू झाला. डॉक्टर आपल्या विज्ञानाने व परिवार आपल्या प्रार्थनेने कैलास यांच्यावर उपचार करू लागले. इथे प्रत्ययास आले देव तारी त्याला कोण मारी?
डॉ. कैलास उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. परंतु हे डॉ कैलास पेशंटच्या भूमिकेत येतच नव्हते. त्यांच्यातला डॉक्टर सजक होता. आपले औषध उपचार ते सजक पणे करून घेत होते.
आय सी यु मध्ये डॉक्टर रीना यांच्या बरोबरीने डॉ. प्राजक्ता ही आपल्या सरांच्या उपचारासाठी डोळ्यात तेल टाकून रात्रीचा दिवस करत होती. डॉ. राठी यांना वाचण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
यातच डॉ. कैलास यांच्या प्रकृती च्या काळजीने त्यांना मुंबई येथे हलवावे असे सांगण्यात येऊ लागले. परंतु, सगळी परिस्थिती पाहता, सगळे निष्णातडॉक्टर वरच्या विश्वासाने डॉ रीना यांनी खूप नम्रपणे हे नाकारले व स्वतःच्या जबाबदारीवर डॉक्टर कैलाश यांचे सर्जरी पुण्यभूमी नाशिकमध्ये डॉक्टर एखंडे व डॉक्टर बिर्ला यांच्याकडून करण्याचे निश्चित केले. त्यांच्या निर्णय क्षमतेला सलाम !
सर्जरी करावयाचे ठरल्यापासून विविध स्तरातील लोकांकडून प्रार्थना होऊ लागली. इथे जात पात, धर्म भेद कुठल्या कुठे पळाला! उगवच्या मुस्लिम बांधवांनी त्यांच्यासाठी नमाज अदा केली! बोहरी समाजाकडून त्यांच्यासाठी पवित्र जल आले! हिंदू समाजात विविध धार्मिक विधी सुरू झाल्या ! राठी कुटुंबांनी माणूस कमावल्याची ही साक्ष होती. राठी दाम्पत्यांनी कधी कोणाचे वाईट चिंतले नाही. आपल्या परिने ते सर्वांना नेहमीच मदत करत आले त्यांच्या सत्कर्माचा त्यांनी केलेले संचितकर्माचे फळ म्हणजे डॉक्टर कैलास यांचे ऑपरेशन सुखरूप पार पडले.
आजपर्यंत हजारो बालकांना डॉक्टर रिना यांनी व अनेक पीडित रुग्णांना डॉक्टर कैलास यांनी प्राण दान दिले आहे. ते त्यांचे कर्तव्य जरी असले तरी देवाने त्यांचे प्राण वाचवून त्यांच्या सत्कर्माचे फळ त्यांना दिले. ह्या लढ्यात रिनाला खंबीर पाठिंबा होता तो वसू दीदी, पिटू दीदी, उगाव येथील राठी परिवार, सातपूर चा मुंदडा परिवार मालेगाव चा कलंत्री परिवार व तिचा सर्व मित्र परिवार ज्यांच्या शुभेच्छा मुळे ती ही लढाई जिंकु शकली. र्डॉक्टर रीना राठी या सावित्रीने एका आईसाठी त्यांचा मुलगा, बहिणींसाठी भाऊ व मुलांसाठी वडील, सुयोग हॉस्पिटलचा कुटुंबप्रमुख व आपले सौभाग्य आपल्या जिद्दीने, समय सूचकतेने व सकारात्मक विचाराने परत आणले ! व्हेंटिलेटर निघेपर्यंत अन्नाचा दाणाही न खाणाऱ्या रीनाला व तिला साथ देणाऱ्या तिच्यासाठी उभ्या असलेल्या तिच्या परिवाराला माझे त्रिवार वंदन !
शब्दांकन. . . ममता प्रितेश पोफळे
प्रस्तुती : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
मानवी संस्कृतीच्या वाटचालीत टारझनची अगदी प्राथमिक हुंकाराची भाषा ते कविकुलगुरू कालिदासांनी ज्या हिरे, माणके, पाचूनी नटलेल्या भाषेत लिहिले ती देववाणी संस्कृत हा किती हजार वर्षांचा, कदाचित काही लाख वर्षांचा प्रवास असेल! किंवा अलीकडचे उदाहरण घ्यायचे झाल्यास ग्रीक, लॅटीन, जर्मनमधील काही शतके पूर्वीचे साहित्य, शेक्सपियर, होमर, ख्रिस्तोफर मार्लोव्हची किंवा मराठीतील गडकरी, कानेटकर, कुसुमाग्रज यांची नाटके, माडगूळकर, खेबुडकर, शांता शेळके यांच्या कविता हा प्रवास पाहीला तरी चकित व्हायला होते.
किती ढोबळ, ओबडधोबड प्रकारचा संवाद करत करत माणूस किती सूक्ष्म भावना दोन बोटात पकडणा-या भाषेपर्यंत पोहोचलाय ते विस्मयकारक आहे. दुर्दैवाने अलीकडे मात्र माणसाच्या या आतल्या प्रगतीकडे क्वचितच पाहिले जाते. ‘भाषा म्हणजे केवळ संदेश-वहनाचे साधन आहे’ इतका उथळ, सवंग विचार करणारे लोक मोठमोठे विचारवंत म्हणून मिरवतात !
हल्ली नेहमी चर्चा होते ती केवळ भौतिक आणि तंत्रवैद्यानिक प्रगतीची! या प्रगतीचा विचार केला तर डोळ्यासमोर काय येते? या प्रगतीचे पुरावे म्हणजे केवळ लहानमोठी अगणित यंत्रे आणि अनिर्बंध उपभोगाच्या वस्तू! पण माणसाच्या ‘मनाच्या आत’ घडणा-या अतितरल, सूक्ष्म, अमूर्त, अदृश्य गोष्टींबद्दल, त्यांच्या अभिव्यक्तीसाठी अनेक पिढ्यांनी कल्पकतेने निर्माण केलेले शब्द, व्याकरण, भाषा, अनेक सृजनशील संकल्पना यात साधलेल्या प्रगतीबद्दल कुठे चकार शब्द ऐकू येत नाही. बाहेरचे जग अधिकाधिक सुंदर, आकर्षक, सोयीचे आणि उपभोग्य करण्यासाठी धडपडणा-या माणसाला त्याची ‘आतली धडधड’ अगदीच नगण्य वाटू लागली आहे का?
दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेच द्यावे लागते. कारण ७/८ हजार वर्षाच्या नोंदीकृत इतिहासात कोणत्याही संस्कृतीचे संरक्षण, संवर्धन आणि पुढील पिढीकडे संवहन करण्याच्या कामात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडणा-या भाषेकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष! जागेच्या अभावामुळे आपण या विषयावर फार सखोल विचार करणार नाही तरी आज साहित्य प्रामुख्याने ज्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचते ती मनोरंजनाची क्षेत्रेसुद्धा भाषेच्या संवर्धनाबाबत काय चित्र उभे करत आहेत? मग त्यात सिनेमा आला, नाटके आली, कथा-कादंब-या आल्या, नितांत सुमार दर्जाच्या पण मोठ्या समुदायावर प्रभाव टाकणा-या टीव्ही मालिका आल्या! सगळीकडचे चित्र चिंताजनकच आहे. या सर्वांनी कोणतीच भाषा शुद्ध ठेवली नाही. मानवी मनोव्यापाराच्या नेटक्या अभिव्यक्तीचे साधन किती खीळखिळे करून ठेवले आहे!
उत्तम मराठी शब्द असताना त्यांना हटवून तिथे इंग्रजी किंवा हिंदी शब्द घुसवणे, मराठीचे व्याकरण नष्ट करून तिथे हिंदी आणि इंग्रजीचे व्याकरण लादणे किंवा एकंदर व्याकरणच नष्ट करून टाकणेही जोरात सुरु आहे. नाही म्हणायला परवाच गुलजारजींना दिलेले ज्ञानपीठ पारितोषिक हा भाषाप्रेमींसाठी एक दिलासा म्हणता येईल. हिंदी आणि उर्दू भाषेच्या सौंदर्याचा जो परिचय गुलजार यांनी कोट्यावधी भारतीयांना करून दिला त्याला तोड नाही!
अशा वेळी आज मराठी सिनेमातली गाणी चक्क आई-बहिणीवरील शिव्यांनी (‘आईचा घो’…) सजवणारे बेछूट दिग्दर्शक तेजीत आहेत. हिंदीत तर चक्क हॉटेलमधील एखाद्या भुरट्या गुंडाने दिलेली ऑर्डरच गाण्याची ओळ बनते आहे (‘ए गणपत, चल दारू ला…(चित्रपट : ‘शूट आउट अॅट लोखंडवाला’)
त्या पार्श्वभूमीवर पुन्हा आठवतात ती अभिजात मराठीतली नाटके, जुनी गाणी! या लेखकांनी, गीतकारांनी चिरेबंदी वाड्यापासून थेट रस्त्यावरच्या माणसातही उच्च साहित्यिक अभिरुची निर्माण केली होती.
असेच एक नाटक होते ‘कट्यार काळजात घुसली.’ वर्ष १९६७. लेखक आणि गीतकार पुरुषोत्तम दारव्हेकर. या संगीत नाटकात एकापेक्षा एक अशी ८ गाणी होती. सर्वश्री पंडीत प्रसाद सावकार, जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपांडे, भार्गवराम आचरेकर यांनी गायलेली ही गाणी अतिशय लोकप्रिय झाली.
‘कट्यार’मधले एक गाणे म्हणजे सूर्यदेवाची स्तुती होती. दारव्हेकर मास्तरांनी ते इतक्या उच्च मराठीत लिहिले की त्याला गाणे म्हणण्यापेक्षा ‘सूर्याचे स्तोत्र’ म्हणायला हवे! राजकवी भा.रा.तांबे यांनी सूर्यास्ताचे हुरहूर लावणारे वर्णन करताना ‘सायंकाळची शोभा’ या कवितेत म्हटले होते ‘कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा’ आमच्या दारव्हेकर मास्तरांनी मात्र राजकवींना परवडू शकणारा महागडा धातू न वापरता सूर्य चक्क लोखंडाचा कल्पलेला होता! ते सूर्याला तेजाचे भांडार असलेला, कमालीचा तप्त झाल्याने प्रकाशमान बनलेला ‘लोहाचा गोल’ म्हणतात.
सूर्यदेवाची स्तुती करताना ते म्हणतात, ‘तू तर आकाशाचा राजा आहेस. तुझ्या दिव्य तेजाने अवघे अवकाश उजळले आहे. तू दिवसाला प्रकाशित करणारे दिव्य रत्नच आहेस.’ –
‘तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज,
दिव्य तुझ्या तेजाने, झगमगले भुवन आज.
हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज.’
सूर्य उगवला की क्षणार्धात त्याचे अब्जावधी किरण सगळीकडे पसरतात. त्यातून जणू अग्निबाणच फेकले जात आहेत असे वाटते. पण हा अग्नी विनाशकारी नाही. उलट तो जणू अमृताचे थेंब बनून संपूर्ण सृष्टीतील अणुरेणूंना प्रकाशमान करतो!
यातील ‘अमृताचे कण’ ही कवीने दिलेली केवळ सुंदर उपमाच नाही तर ते जीवन-साखळीमागचे वैज्ञानिक सत्यही आहे! पृथ्वीवरील जीवसृष्टीला जिवंत ठेवणारे अन्न फक्त वनस्पती पुरवतात! आणि वनस्पतींचे जगणे आणि वाढ शक्य होते ती ‘फोटो-सिंथेसिस’ या फक्त सूर्यप्रकाशातच शक्य होणा-या प्रक्रियेमुळे!
‘कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती.
अमृतकण परि होउन अणुरेणु उजळिती.
तेजातच जनन मरण, तेजातच नविन साज.
हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज.’
हैड्रोजन वायूवर होणा-या अण्विक प्रक्रियेतून हेलियम तयार होऊन त्याच्या अमर्याद उर्जेतून सूर्य प्रकाशित होत असतो. ही प्रक्रिया अविरत सुरु असते म्हणून कवीने म्हटले, ‘तेजातच जनन मरण, तेजातच नवीन साज.’ किती यथार्थ वर्णन!
‘पॅराडाईस लॉस्ट’मधल्या जॉन मिल्टनसारख्या शैलीत कवी पुढे जबरदस्त विराट प्रतिमासृष्टी उभी करतो. आपल्याला दिसू लागते की आकाशाचा राजा सूर्य त्याच्या सिंहासनावर विराजमान झाला आहे. सगळे ग्रह, म्हणजे त्याचे मंत्री, त्याच्या दिव्य सभागृहात आसनस्थ झाले आहेत. कवी पुढे म्हणतो-
‘हे तेजोनिधी, तुझा प्रकाश भलेही प्रखर आहे, दाहक आहे, पण तोच तर रोज सर्व सृष्टीला संजीवन देतो. तुझी कृपा आम्हावर अशीच राहू दे. आम्ही जिला ‘भूमाता’ म्हणतो त्या पृथ्वीवर जीवसृष्टी अशीच वाढत राहू दे. तूच तिची लाज राख कारण तूच या सृष्टीचा अधिपती आहेस.’
‘ज्योतिर्मय मूर्ति तुझी, ग्रहमंडळ दिव्यसभा,
दाहक परि संजीवक तरुणारुण किरणप्रभा,
होवो जीवन विकास, वसुधेची राख लाज.
हे दिनमणि व्योमराज, भास्कर हे गगनराज.’
असे साहित्य वाचताना, ऐकताना कल्पनेची केवढी भव्यता अनुभवता येते, केवढा स्वर्गीय आनंद वाटतो! पण पाठोपाठ विचार येतो आज मराठी मनातील न्यूनगंडामुळे किती पिढ्या अमृताशी पैजा जिंकणारी ही ज्ञानदेवांची भाषा सोडून इंग्रजी माध्यमात शिकली त्यांना यातले किती शब्द कळतील आणि किती अडतील? केवढ्या आनंदाला ही मुले कायमची मुकली आहेत! शेवटी ‘कालाय तस्मै महा:’ म्हणावे की ‘राजा कालस्य कारणम’ ते कळत नाही !
त्यांच्या शिघ्र कवित्वाबद्दल कै.कवी रेंदाळकर यांना शंका होती.म्हणून एके दिवशी अचानक ते साधुदासांच्या घरी पोचले ,आणि त्यांना म्हणाले तुमचं शिघ्र कवित्व म्हणजे ढोंग आहे, जर खरेच आपण शिघ्र कवी असाल तर मला अत्ताच्या अत्ता कविता करून दाखवा.या वर साधुदास त्यांना म्हणाले मला विषय तरी सांगा, कशावर कविता करू ते.तर रेंदाळकर म्हणाले, कवितेवर कविता करून दाखवा बघू.
क्षणभर हाताची हालचाल करून ते म्हणले,”हं घ्या लिहून आणि त्यांनी ही कविता सांगितली …
*
कवीने कविता मज मागितली
करण्या बसल्या समयी कथिली
*
कविता मज पाहुनिया रुसली
तरि आज करू कविता कसली
*
कविता स्वच काय विण्यामधले
म्हणून मज छेडूनी दावू भले
*
कविता गुज बोल मनापुरता
प्रिय तू बन मी करितो कविता
*
कविता मधुराकृती का रमणी
म्हणुनी तिज पाहू तुझ्या नयनी
*
कविता करपाश जिवाभवता
मृदू तू बन मी करितो कविता
*
कविता वद काय वसंत-रमा
म्हणुनी तुज दावू तिची सुषमा
*
कविता द्युती-लेख मतीपुरता
पटू तू बन मी करितो कविता
*
कविता वद काय कारंजी-पुरी
म्हणुनी करुनी तुज देऊ करी
*
कविता मकरंद फुलपुरता
अली तू बन मी करितो कविता
*
कविता सखया न गुलाब कळी
तुज की मृदू गंध तिचा कवळी
*
कविता कवी -चंदन- धूप- बली
बन मारुत तू कविता उकली
…..
आणि आता ही दुसरी कविता केली आहे कवियत्री संजीवनी मराठे यांनी. कविता स्फुरते कशी म्हणून सुंदर कविता त्यांनी केली आहे.
*
कशी अचानक जनी प्रकटते मनांतली उर्वशी
मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी
*
कुंभ रसांचे शिरी घेऊनी शब्दांच्या गौळणी
नजरेपुढतीं ठुमकत येती रुपवती कामिनी
*
हंसती रुसती विसावती कधी तरंगती अंबरी
स्वप्नसख्या त्या निजाकृतीचा वेध लाविती उरी
*
त्याच्या नादे करु पाहते पदन्यास मी कशी
मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी
*
हे स्वरसुंदर जीवनमंदिर कुणी कसे उभविले
मी न कुणाला दावायची शिलालेख आंतले
*
समयीमधली ज्योत अहर्निश भावभरे तेवते
तिच्या प्रकाशी कुणापुढे मी हितगुज आलापिते
*
कशी नाचते कीर्तनरंगी हरपुन जाते कशी
मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी.
तेंव्हा आनंद घ्या या दोन्ही कवितांचा आजच्या कविता दिनी ……
☆ दुःखद सुख… लेखक – श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
तंत्रज्ञान, बदलत्या प्रथा यामुळे बरच बदलून जातं आणि अनेक गोष्टी, धंदे, माणसं हरवून जातात कालौघात. परवा काही कारणाने आळंदीला गेलो होतो तेंव्हा तिथे वासुदेव दिसला घाटावर. तसंही शहरात तो पूर्वी फार दिसायचा असं नाही पण धूमकेतूसारखा अधून मधून दिसायचा. पोलिसाचा किंवा इतर कुठला वेष घेऊन येणारे बहुरूपी तर आता दुर्मिळ झाले. सगळं खोटं आहे हे माहीत असलं तरी त्यांच्या मागून हिंडायला मजा यायची. वासुदेवाच्या टोपीत ती धूळ खालेल्ली मोरपिसं तो बदलतो कधी की तो मुगुट तो तसाच धुतो असा मला प्रश्न पडायचा. श्रावणात ‘आsssघाडा, दुर्वा, फुलं’ अशी हाक भल्या पहाटे यायची. ‘सुया घ्ये, पोत घ्ये, मनी घ्ये, फनी घ्ये’ अशी -हिदम असलेली हाळी तर किती वर्षात ऐकलेली नाही. आपल्या अंगणात फतकल मारून बसून गोधडी शिवून देणा-या बायका गायब झाल्या.
अप्पा बळवंतला एका लाकडी फळीवर रेमिंग्टन, गोदरेजचे टाईपरायटर ठेवून वन प्लस फोर अशा कॉप्या काढणारे कधीच अस्तंगत झाले. त्यांची कडकट्ट चालणारी बोटं आणि कागद वर सरकवून परत पहिल्या जागी मशीन घेऊन यायचा स्पीड मी बघत बसायचो. स्टुलावर बसून मान पाठ एक करून कडेच्या कागदात डोकावत किंवा आधी मॅटर काय ते समजून घेऊन टाईप करून द्यायचे ते. कुठे गेले असतील, काय काम केलं असेल नंतर त्यांनी. लहानपणी मला कंडक्टर झालो तर खूप पैसे मिळतील असं वाटायचं. असतात एकेकाच्या विक्षिप्त कल्पना, मला कुठलाही धंदा बघितला लहानपणी की वाटायचं, हे काम जमेल का आपल्याला, यात साधारण श्रीमंत होण्याएवढे पैसे मिळत असतील का? जाकीट घालून रस्त्यात मिळेल त्या जागी बसून आपल्या कळकट्ट भांड्यांना ब्युटी पार्लरमधे नेऊन आणल्यासारखे कल्हई करणारे कल्हईवाले गायब झाले. लहानपणी चाळीत तो फकीर यायचा रात्री, हातातल्या धुपाटण्यावर ती उद आणि धुपाची पावडर फिसकारली त्याने की जो पांढरा धूर आणि वास येतो तो अजून विसरलेलो नाही.
रात्री दहाच्या सुमारास एकजण पान विकायला यायचा. मस्स्स्साला पान दहा पैसे, स्पेशल मस्स्साला पंधरा पैसे. जेमतेम अर्ध पान, चुना, काताचा, सुपारीचा तुकडा, बडीशेप, स्पेशल मधे गुलकंद अत्तर लावल्यासारखं असायचा. एकजण तळलेले पापड विकायचा. सणसणीत मोठे पापड असायचे, दहा पैशाला एक, पाच पैसे दिले तर अर्धा पापड. चोपटण्याने अंगण करण्यात मजा होती. एसटी स्टँडवर तांब्याची कानकोरणी घेऊन फिरणारे दिसत नाहीत आता. काय तन्मयतेने ते काम करायचे. भुयारातून काहीतरी नक्की निघणार अशा आशेवर असलेल्या इतिहास संशोधकासारखे ते कानात डोकवायचे. रस्त्यात कुठल्या तरी झाडाखाली मोठी पेटी घेऊन सायकल दुरूस्तीवाले बसायचे. दोन्ही बाजूला एकेक दगड ठेऊन तो हवा भरायचा पंप उभा ठेवलेला असायचा. एकेकाळी पीसीओच्या त्या चौकोनी ठोकळ्याबाहेर लोक रांग लावून उभी रहायचे. आतल्याचं बोलणं लवकर संपावं आणि माझ्यानंतर बाहेर कुणाचाही नंबर असू नये हे प्रत्येकाला वाटायचं.
शाळेच्या बाहेर एक म्हातारी बसायची वाटे लावून, चिंचा, चन्यामन्या, बोरं, काळी मैना, भाजके चिंचोके, पेरू, बाहुलीच्या गोळ्या असायच्या. एक काला खट्टा, रिमझिम, ऑरेंज, लेमन, वाळा अशी सरबताची गाडी असायची. बर्फाचे गोळे विकणारे क्वचित दिसतात अजून. छत्री दुरुस्त करणारे कुठे गेले काय माहीत. एखादी टेकस मारली चपलेला तर पैसे न घेणारे पूर्ण पिकलेले चप्पल दुरुस्तीवाले आजोबा तर कधीच गेले. चार आणे तास मिळणारी सायकलची दुकानं गायब झाली. आपल्याला नको असलेले कपडे घेऊन चकचकीत भांडी देणा-या बार्टर सिस्टीम फॉलो करणा-या बोहारणी कुठे गेल्या असतील? सीताहरणाला कारण ठरलं म्हणून अंगात चोळी न घालता आपल्या पाटा, वरवंटा, जात्याला टाकी लावून द्यायच्या त्या वडारणी दिसणं शक्य नाही. कडेवर एक पोर आणि डोक्यावर विक्रीसाठी पाटा वरवंटा असायचा. त्या वरुटा म्हणायच्या त्याची मजा वाटायची. काही शब्द पण गायब झाले याची खंत वाटते. मायंदाळ, वळचण, हाळी, बैजवार, औंदा, बक्कळ असे अनेक शब्द असतील. मूळ विषय तो नाही, त्यावर परत कधी.
‘बाई, तुझं मन चांगलं आहे, तू देवभोळी आहेस, मनात पाप नाही, दानी आहेस पण तुला यश नाही’ अशी पाठ केलेली कॅसेट लावणारे कुडमुडे ज्योतिषी कंटाळवाणी दुपार हसरी करायचे. चाळीत तुम्हांला सांगतो, वल्ली असायच्या एकेक. एका ज्योतिषाला ‘लग्न कधी होईल सांगा’ म्हणत दोघींनी हात दाखवला, त्याने पण सहा महिन्याच्या आत पांढ-या घोड्यावर बसून राजकुमार येईल एवढं सोडून सगळा सोनसळी भविष्यकाळ रंगवला. घसघशीत दक्षिणा मिळणार म्हणजे अजून घरं फिरायची गरज नाही हे त्याच्या चेह-यावर दिसत होतं. ‘तुझा मुडदा बशीवला भाड्या’ म्हणत त्यांनी आजूबाजूला खेळणारी आपापली पोरं दाखवली आणि त्याला हुसकवून लावलं. दक्षिणा बुडली त्यापेक्षा आपलं ढोंग उघडकीला आलं याचा राग त्याने मार बसणार नाही इतपत शिव्या देऊन काढता पाय घेतला. बाबाजी का बायोस्कोप मधे ‘मेरा नाम जोकर’मधे दिसला तेंव्हा आठवला. क्षणिक खेळ असायचा पण डोळ्यांभोवती दोन्ही हात धरून त्या नळकांड्यात डोकावण्यात अप्रूप होतं.
फक्त दिवाळीला पोस्त मागणारे गुरखे नाहीसे झाले. रात्री फिरताना क्वचित दिसायचे. क्वचित येणारं कार्ड देणारे आमचे पोस्टमन इंदोंस अशी हाक मारायचे. आमचा पत्त्यातला चाळ नंबर कितीही चुकीचा टाकलात तरी पत्र यायचंच आमच्याकडे. त्यांनी कधीही आमच्याकडे पोस्त मागितली नव्हती. सायकलच्या मधल्या दांड्याला ग्राईंडिंग व्हील लावून मागच्या कॅरिअरवर बसून पेडल मारत चाकू, सुरे, कात्र्यांना धार लावणारे गायब झाले. आता भंगार कच-यात टाकतो पण आधी भंगारवाले यायचे, द्याल ते घायचे. प्लास्टिक बाटल्या, बरण्या, पत्र्याचे डबे, ते देतील ती किंमत. स्टोव्ह रिपेअरवाले एक वेगळीच गंमत असायची. दुरुस्तीत फार रॉकेल संपू नये ही काळजी असायची बाईला आणि हा बाब्या फारफार पंप मारून बर्नर तापवून लालबुंद करायचा. आतली काजळी काढून बर्नर फिट करून हवा भरून पिन मारली की बोर्नव्हिटा प्यायल्यासारखा स्टोव्ह झळाळता पेटायचा पण त्याचा आनंद अल्पकाळ साजरा व्हायचा आणि महिनाभर रॉकेल पुरवायला हवं या काळजीने ती बाई किल्ली सोडून पहिल्यांदा स्टोव्ह बंद करायची.
या सगळ्यात रात्री दारोदार फिरून ‘अन्न वाढा हो माय’ म्हणणारे भिकारी नाहीसे झाले याचा मला आनंद आहे खूप. सगळे काही उपाशी मेले नसतील, जगण्यासाठी, पोटाची आग भागवण्यासाठी त्यांनी काहीतरी तजवीज केली असेलच. पण ती हाक बंद झाली ते बरं झालं. आम्ही चाळीत रहायचो तिथे रात्री साधारण नऊनंतर एक बाई यायची. तुम्ही द्याल ते ती घ्यायची. ती कुणाच्या दरवाज्यासमोर उभी रहायची नाही, सर्वसमावेशक अशी ती हाळी द्यायची, मग ज्याच्याकडे उरलं असेल तो तिला हाक मारून ते द्यायचा. पोळी, भाकरी, भातासाठी एकच पिशवी असायची. भाजी, आमटी जे काही असेल ते सगळं ती एकाच वाडग्यात घ्यायची. संतमहात्म्यांचे किस्से आपण ऐकतो की ते सगळं अन्न एकत्र करून खायचे पण इथे चव काय आहे यापेक्षा भुकेची आग मोठी होती. कालौघात काही गोष्टी नष्ट होतात ते बरच आहे. चांगल्या गोष्टी नाहीशा होतात या दुःखापेक्षा वाईट गोष्टी संपतात त्याचा आनंद जास्त असतो.
ही किंवा आत्ता लगेच न आठवलेली माणसं हरवली म्हणून अडून काहीच राहिलं नाही पण गतायुष्याचा ती एक भाग होती. मागे वळून पहाताना काही नेमकं आठवतं तसंच भारंभार संदर्भ नसलेलं ही आठवत राहतं. त्या प्रत्येक गोष्टीशी काही ना काही तरी चांगली वाईट आठवण जोडलेली असते. माणसाला अमरत्व नाही हे वरदान आहे. किती गर्दी झाली असती नाहीतर. आयुष्याच्या प्रवासात अशा अनेक गोष्टी हरवतात. माणसं हरवतात ते वाईट.
प्रत्येकजण या प्रवासात उतरून जाणार मधेच कधीतरी हे माहित असतं, काहीजण काही न सांगता घाईने उतरून जातात, काही लपून बसतात, काही दिसतात पण आपण त्यांना हाक मारू शकत नाही. न सांगता उतरून गेलेल्या, सोडून गेलेल्या, दुरावलेल्या, हरवलेल्या माणसांच्या आठवणींनी मन सैरभैर होतं. डोळ्यात नकळत पाणी दाटतं. अशावेळी काय करायचं? प्रवासात करतो तेच करायचं. खिडकीतून बाहेर बघायचं, हलकेच डोळे पुसायचे आणि दिसतंय त्यात हरवून जायचं. आपणही कुणाच्या तरी विश्वात त्यांच्या दृष्टीने हरवलेले असू शकतो या वाटण्यात पण एक दुःखद सुख आहे.
आपल्यासारखंच कुणाच्या डोळ्यात पाणी असतंच की, माणसं काही फक्त आपलीच हरवत नाहीत.
लेखक – श्री जयंत विद्वांस
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
(महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव गोपाळराव काशीराव गायकवाड.)
१८७५ ते १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द – १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
बडोद्याचे लोकप्रिय महाराज खंडेराव यांचे निधन झाल्यावर त्यांचे बंधू मल्हारराव गादी सांभाळू शकले नाहीत, कारण त्यांच्यावर बंधूंच्या हत्येचा कट केल्याचा आरोप होता आणि त्या साठी त्यांना अटक देखील झाली होती. खंडेराव महाराजांची मुले लहान वयात निवर्तली असल्याने त्यांच्या विधवा पत्नी महाराणी जमानाबाईसाहेब यांनी कुटुंबातील अन्य मुलांचा दत्तक घेण्यासाठी शोध सुरु केला. नाशिक जवळील कौळाणे येथील काशीराव त्यांच्या तीन मुलांना १)आनंदराव २)गोपाळराव ३) संपतराव याना घेऊन बडोद्याला आले. तिथे तिघांचीही परीक्षा घेण्यात आली, त्यांना विचारले की ‘तुम्हाला इथे का आणले आहे माहीत आहे का?गोपाळराव म्हणाले मला इथे राज्य करण्यासाठी आणले आहे त्या उत्तराने संतुष्ट होऊन त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला.
दिवाण, सर टी. माधवराव यांनी सयाजीरावांना राज्यकारभाराचे शिक्षण दिले. २८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाय योजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणा सुरळीत केली, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३), न्याय व्यवस्थेत सुधारणा केल्या, . ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली (१९०६). गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभुवन’ ही संस्था स्थापन केली. त्यांनी ‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. सयाजीरावांनी ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली. त्यांनी संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली;. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. भारतामध्ये सर्वप्रथम आपल्या राज्यामध्ये अनेक ग्रंथालये स्थापन केली. त्यांनी स्वतः ग्रंथालय शात्राचे शिक्षण घेतले. खऱ्या अर्थाने ते भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक आहेत.
सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरीही मोठी आहे. पडदा पद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्या विक्रय बंदी, मिश्र विवाहाचा पुरस्कार, स्त्रियांना वारसा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यता निवारण, विधवा विवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या. घटस्फोटासंबंधीचा कायदा हा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).
बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू. लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत, (कमाठी बाग) सयाजी उद्यान., सुरसागर तलाव, खंडेराव मार्केट, वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे.
प्रजेची पाण्याची गरज भागवण्यासाठी त्यांनी अजवा या ६२ दरवाज्यांच्या धरणाची निर्मिती केली. त्या वेळी बडोद्याची लोकसंख्या एक लाख होती तरी पुढचा अंदाज घेऊन तीन लाख लोकांना पुरेल एवढा पाणीसाठा करण्याची दूरदृष्टी त्यांनी दाखवली.
त्यांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. लो. टिळक, बाबू अरविंद घोष या थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता, असे म्हटले जाते. ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले.
‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
प्रजाहितदक्ष राजा हा शब्द सार्थ ठरवणाऱ्या महाराजा सयाजीराव (तिसरे) याना मानाचा मुजरा.
पूर्वी सत्यनारायण पूजा, सप्तशतीचा पाठ, लघुरुद्र, हे सर्व पुरुष करत असत. 1975 साली थत्ते मामांनी स्त्रियांनी हे शिकायला हरकत नाही असा विचार मांडला. त्यावर बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. अर्थातच तेव्हाच्या समाज रचनेनुसार हे स्वाभाविक होते. तरीसुद्धा मामांनी उद्यान प्रसाद पुणे येथे खास स्त्रियांसाठी हे वर्ग सुरू केले.
स्वाभाविकच स्त्रियांचा प्रतिसाद अल्प होता. स्त्रियांच्या मनातील भीती, घरातून विरोध, वेळ कसा काढायचा, शिवाय संस्कृत भाषा…. इत्यादी अनेक अडचणी समोर दिसत होत्या. मात्र काही स्त्रियांना घरातून परवानगी मिळाली आणि त्या वर्गाला आल्या.
पहिली बॅच सुरू झाली. त्यात आमच्या गुरु मालती जोशी होत्या. सदाशिव पेठेत अनाथ विद्यार्थी गृहासमोर असलेले नरसिंहाचे देऊळ बाईंचे आहे. त्या तिथेच राहत आहेत. मुळातच हुशार असल्याने त्या भराभर शिकत गेल्या.
थत्ते मामांनी सर्वांना प्रार्थने पासून सर्व शिकवले. संसाराची जबाबदारी सांभाळून हे सर्व तोंड पाठ करायचे होते. त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागली .
आठ दहा बायका हे शिकल्या.थत्ते मामांना अतिशय आनंद झाला. जोशीबाई अनेक वर्ष थत्तेमामांबरोबर पुजा पाठ करायला जात होत्या.
काही वर्षानंतर त्यांनी स्वतःचे वर्ग त्यांच्या घरी सुरू केले. अत्यंत अल्पशा फी मध्ये त्या शिकवत असत.
बाईंचा एक अलिखित नियम होता..
की जे शिकवलं असेल ते पुढच्या वेळी म्हणून दाखवायचे .आम्ही 55 ते 60 वर्षाच्या होतो. खूप वर्षांनी पुस्तकं अभ्यासासाठी हातात घेतली होती. पाठ असलं तरी बाईंच्या समोर म्हणून दाखवताना चुका व्हायच्या.
बाई गप्पा मारायच्या, चहा करायच्या, लाडू खायला द्यायच्या पण पाठांतर केलेच पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचा. कडक शिस्त असायची.चुकलं तर परत म्हणावे लागे.
बाईंची आम्हाला भिती वाटायची. नंतर त्यात गोडी वाटायला लागली. पाठांतराची सवय झाली….प्रेरणा द्यायला बाई होत्याच…
अनेक जणी बाईंच्या कडे शिकून तयार झाल्या . बाईंच्या बरोबर आम्ही पुण्यात आणि बाहेरगावी कार्यक्रम केले. त्यातल्या काहीजणी आता इतरांना शिकवत आहेत.
महाशिवरात्रीच्या आधी मृत्युंजयेश्वर मंदिरात आम्ही रुद्र म्हणायला जातो. गणेश जयंतीच्या उत्सवात एके दिवशी सारसबाग गणपती समोर ब्रह्मणस्पती म्हणायला जातो. बाईंच्या बरोबर देवीच्या देवळात सप्तशतीचे पाठ करायला जातो हे सर्व सेवा म्हणून करतो.हे बाईंच्या मुळे शक्य झाले आहे.
आज शांतपणे घरी बसून श्री सूक्त, पुरुष सूक्त ,त्रिसुपर्ण, विष्णुसहस्त्रनाम, शीव महिम्न म्हणताना अपार आनंद होतो … बाईंनी आम्हाला हा बहुमूल्य ठेवा दिलेला आहे.
पन्नास वर्षांपूर्वी थत्ते मामांनी बायकांच्यावर विश्वास ठेवला. आणि त्या पण हे करू शकतात हे सिद्ध करून दाखवले. आज त्यांची पण आठवण येत आहे. थत्ते मामांना माझा विनम्र नमस्कार.
त्यांनी लावलेले हे झाड आज बहरलेले आहे .आज अनेक स्त्रिया पौरोहित्य करत आहेत .
याचे श्रेय मामांना जाते.
खरं तर घरं संसार, मुलं बाळं, आला गेला ..हे सगळं सांभाळून बाईंनी हे शिकवायला सुरुवात केली हे किती विशेष वाटते.
शिवाय त्याचा कुठेही गर्व अभिमान नाही शांतपणे प्रेमाने त्या शिकवत राहिल्या.
बाईंच्या 95 व्या वर्षाच्या वाढदिवसाच्या दिवशी 17 जानेवारीला आम्ही सर्वांनी परत एकदा बाईंचा घरी सगळ्यांनी जमुन वर्ग भरवला .
स्तोत्र, अथर्वशीर्ष म्हंटले. बाई आमच्याबरोबर म्हणत होत्या.
शेवटी बाईंनी आशीर्वाद मंत्र म्हटला तेव्हा डोळे भरून आले होते. ..
अखेर आज तात्या गेले ; आमचे तात्या सावरकर गेले ! मृत्यूशी जवळ जवळ ऐंशी दिवस प्राणपणाने झुंज देतां देतां शेवटी तात्या कामास आले. मृत्यूची अन तात्यांची झुंज गेली साठ वर्षे चाललेली होती. दहा साली तात्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले, तेव्हां त्यांनी स्पष्टच सांगितले की ,
की, घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
लब्ध प्रकाश इतिहास – निसर्ग माने,
जे दिव्य, दाहक म्हणून असावयाचे,
बुध्याची वाण धरिले करी हे सतीचे !
तात्या सावरकर कोण आहेत हे पुष्कळांना माहीत नाही. तात्या हे कवि आहेत, कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत, लघुकथाकार आहेत. निबंधकार आहेत. मराठी प्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेते. त्यांच्या लेखनाचे एकंदर आठ खंड असून त्यांची साडेपांच हजार पाने होतात. मराठी भाषेत विपुल लेखन करणारे पुष्कळ लेखक होऊन गेले आहेत. हरि नारायण आपटे, विठ्ठल सीताराम गुर्जर, नाथ माधव इत्यादी. पण तात्या सावरकरांएवढे प्रचंड लेखन करणारा एकही लेखक मराठी भाषेत आजपर्यंत होऊन गेलेला नाही. तात्यांची गम्मत ही कीं ते नुसते क्रांतीकारक नव्हते,ते केवळ कवी आणि कादंबरीकार नव्हते . ते निबंधकार आणि नाटककार नव्हते. ते भारतीय इतिहासांतील एक चमत्कार होते. इंग्रजांनी हा देश जिंकून निःशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची नि पराक्रमाची राखरांगोळी झाली. ती राख पुन्हा पेटवून तिच्यातून स्वातंत्र्य प्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला , त्या ज्वलजहाल क्रांतिकारकांचे वीर सावरकर हे नि:संशय कुल पुरुष आहेत. भारतीय शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन सावरकर जन्माला आले.इतिहासाच्या धगधगत्या कुंडामधून त्यांचा पिंड आणि प्रद्न्य तावून सुलाखून निघाली.
सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराची धग देशातून नष्ट झालेली नव्हती. किंबहूना वासुदेव बळवंत फडक्यांच्या आत्मयज्ञाच्या वातावरणामध्येच सावरकरांचा जन्म झाला. चाफेकर बंधूनी दोन जुलमी इंग्रज अधिकाऱ्यांचे क्रांतिदेवतेच्या चरणी बलिदान केले. त्यांच्या प्राणज्योतीने चेतविलेलें यज्ञकूंड भडकवीत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे असा सावरकरांना साक्षात्कार झाला. घरातल्या अष्टभुज्या देवीपुढे त्यांनी शपथ घेतली कीं, ” देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता मरतो झुंजेन !” वयाच्या चौदाव्या वर्षी मृत्यूला आव्हान देण्याची प्रतिज्ञा सावरकरांनी केली, आणि ती विलक्षण रीतीने खरी करून दाखविली. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने जाण्याची केवळ प्रतिज्ञा करूनच सावरकर स्वस्थ बसले नाहीत तर त्यासाठी त्यांनी क्रांतिकारकांच्या गुप्तमंडळाची स्थापना करून श्री शिवजयंतीच्या आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने क्रांतिकारकांची त्यांनी संघटना निर्माण केली. अग्निरसाच्या कारंज्याप्रमाणे स्वातंत्र्याची pज्वलज्जहाल काव्ये सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेमधून उचंबळू लागली. स्वातंत्र्यलक्षुमीला ‘ अधिरुधिराचे स्नान घातल्यावाचून ती प्रसन्न होणार नाही ह्या मंत्राची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची मुहूर्तमेढ सावरकरांनी ह्या शतकाच्या प्रारंभी रोवली ही गोष्ट महाराष्ट्र विसरू शकत नाही ! सात सालच्या अखेरीपासून देशांत बाॅम्बचे आणि पिस्तूलाचे आवाज ऐकू यावयाला लागले. बाॅम्बचे पहीले दोन बळी आठ सालच्या प्रारंभी खुदिराम बोस ह्या अठरा वर्ष्यांच्या क्रांतिकारक तरूणाने मुझफरपूर येथे घेऊन सशस्त्र क्रांतीचा मुहूर्त केला. सत्तावनी क्रांतीयुद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतीकारकांना त्यावेळी बजावले की , ‘ १० मे १८५७ रोजी सुरु झालेला संग्राम अद्याप संपलेला नाही. सौंदर्य संपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा देदीपयमान मुगुट जेव्हां चढेल, तेंव्हाच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल. ! ‘ अश्या रीतीने वयाच्या अवघ्या पंचविसाव्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार बनले. आठ सालच्या जुलै महिन्यात लोकमान्य टिळकांना सहा वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यानंतर विलायतेमधील भारत मंत्र्यांचे सहाय्यक सर कर्झन वायली ह्यांना एका मेजवानीच्या प्रसंगी मदनलाल धिंग्रा ह्या पंचवीस वर्षांच्या तरुणाने गोळ्या घालून ठार केले. नाशिकचे कलेक्टर जॅक्सन ह्यांना भर नाटक गृहांत अनंत कान्हेरे नि त्याचे दोन सहकारी ह्यांनी गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर लंडनमध्ये आपले क्रांतिकार्य निर्वेधपणे करणे सावरकरांना शक्यंच नव्हते.
अडीच महिन्यानंतर त्यांना पकडून ‘ मोरिया ‘ बोटीतून स्वदेशी पाठविण्यात आले असताना त्यांनी मार्सेल्स बंदरात एका पहाटे पोलिसांचा पहारा चुकवून बोटींमधून समुद्रांत उडी मारली. ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सुवर्ण कळसच होय. ही त्यांची उडी त्रीखंडात गाजली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटला भरून त्यांना दोन जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्यावेळी सावरकर अवघे अठ्ठावीस वर्षांचे होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते. म्हणूनच ‘ भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी ‘ असे त्यांना म्हटले जाते. क्रांतिकारक सावरकरांचे अवतारकार्य येथे समाप्त झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळी जर सावरकर युरोपमध्ये मोकळे असते, तर ” आझाद हिंद “चा झेंडा त्यांनी सुभाषबाबूंच्या आधी तेथे फडकविला असता ह्यात काय संशय ? म्हणून आम्ही म्हणतो की भारताच्या सशस्त्र क्रांतीचा सावरकर हे ‘ पाया ‘ आणि सुभाषचंद्र हे ‘ कळस ‘ आहेत ! भारतात गेल्या दीडशे वर्षात अनेक क्रांतिकारक होऊन गेले. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातंच नव्हें , पण जगात झालेला नाही. वीर सावरकरांनी हजारो पाने लिहिली. उत्कृष्ट लिहिली. तुरुंगामध्ये दहा हजार ओळी तोंडपाठ करून एका आचाऱ्याच्या मार्फत त्या भारतात पाठवल्या.
मानवी जीवनात असा एकही विषय नाही, ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही. त्र्याऐंशी वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना आता जीवनांत रस म्हणून राहिला नाही. आत्मार्पण करण्याचे विचार त्यांच्या मनांत येऊ लागले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधुसंतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला. कुमारील भट्टाने अग्निदिव्य केले. आद्य शंकराचार्यांनी गुहाप्रवेश केला. वैष्णवाचार्य गौरांग प्रभूंनी जगन्नाथपुरीच्या शामल सागरांत ‘ हे कृष्ण, हे श्याम ‘ असा आक्रोश करीत प्रवेश करून जलसमाधी घेतली. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदीला समाधी घेतली. समर्थ रामदासांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर अन्नत्याग करून रामनामाच्या गजरात आत्मार्पण केले. एकनाथांनी गंगेमध्ये समाधी घेतली.
तुकोबा ‘ आम्ही जातो आमच्या गावा ! आमुचा रामराम घ्यावा ! ‘ असे म्हणत वैकूंठाला गेले. त्याच प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पंण करविण्याचे ठरविले. कारण, त्यांना ह्या आयुष्यांत इतिकर्तव्य म्हणून कांहीच उरले नाही.
धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।
कर्तव्यं मे न विद्यते किंचीत
धन्यो ऽ हम । धन्यो ऽ हम ।
प्राप्तव्यम सर्वमद्य संपन्नम
लेखक : आचार्य अत्रे.
दैनिक मराठा : दिनांक २७ मार्च १९६६.
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈