मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ठेविले अनंते तैसेचि रहावे??? – भाग – १ ☆ डॉ गोपाळकृष्ण गावडे ☆

डॉ गोपाळकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

ठेविले अनंते तैसेचि रहावे??? – भाग – १  ☆ डॉ गोपाळकृष्ण गावडे ☆

ठेविले अनंते तैसेचि रहावे? – हा कसला निराशावाद?

कसला निराशावादी आणि निष्क्रियता आणणारा विचार आहे हा! म्हणजे मनुष्याने कसली प्रगती करायचीच नाही की काय? तुकाराम महाराजांनी अभंग लिहला म्हणून काय झाले? त्यानुसार चालले तर संपूर्ण समाज आळशी होईल.

तुकाराम महाराजांच्या या अभंगावर समाजातील महत्त्वाकांक्षी लोकांमधून असा सूर उठताना दिसतो.

आजच्या इंजिनिअरला पहिली औद्योगिक क्रांती आणणाऱ्या वाफेच्या इंजिनची आकृती सुद्धा काढता येणार नाही. कारण निरोपयोगी ज्ञान लगेच नष्ट होते. तुकाराम महाराजांनी तिनशे वर्षांपूर्वी एका अभंगात लिहून ठेवलेले हे ज्ञान मनुष्य जातीसाठी इतके निरूपयोगी असताना अजून नष्ट कसे झाले नाही? मला मोठा प्रश्न पडे.

त्याची आज मिमांसा करू. आधी पूर्ण अभंग वाचू —- (गाथा – अभंग क्रमांक 1191)

*

हेचि थोर भक्ती आवडती देवा| 

संकल्पावी माया संसाराची ||

*

ठेविले अनंते तैसेचि रहावे| 

चित्ती असू द्यावे समाधान||

*

वहिल्या उद्वेग दुःखची केवळ| 

भोगणे ते फळ संचिताचे ||

*

तुका म्हणे घालू तयावर भार| 

वाहू हा संसार देवापायी ||

*

आता अर्थ समजून घेऊ.

हेचि थोर भक्ती आवडती देवा| 

संकल्पावी माया संसाराची ||

आधी संसार म्हणजे काय ते समजून घेऊ.

संसार म्हणजे ही जगत. प्रत्येक जीव आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी देणे घेणे व्यवहार करत असतो. या व्यवहाराद्वारे प्रत्येक जीव आपला निर्वाह करतो. ज्या वातावरण आणि परिस्थिती मध्ये जीवांचा जन्म, वावर, व्यवहार आणि मृत्यू होतो त्याला संसार असे म्हणतात. असे म्हणतात की हे संपूर्ण संसार ही मायेची उत्पत्ती आहे.

आता माया म्हणजे काय ते समजून घेऊ.

माया हे ईश्वरी शक्तीपासून निर्माण झालेले तत्व असून ते प्रत्येक जीवाच्या बुद्धीत अविद्या रूपी भ्रम निर्माण करते.

अविद्या रुपी भ्रम काय आहे? तो भ्रम कशा बाबतीत होतो?

जीवाच्या अस्तित्वाच्या नेमके स्वरूप समजून घेण्याच्या प्रक्रियेत हा भ्रम निर्माण केला जातो.

हे ब्रम्हांड एक ऊर्जेने भरलेल्या एका बिंदू मधून निर्माण झालेले आहे. म्हणून सर्व जगात ऊर्जमय आहे.

1) जड निर्जीव ऊर्जा – निर्जीव पदार्थांच्या अणू मध्ये वास करणारी ऊर्जा. अणू जरी वर वर पदार्थ (matter) भासत असला तरी अणू ज्या मूलभूत कणांपासून बनलेला आहे त्यांचे स्वरूप फक्त ऊर्जा आहे.

2) जड सजीव ऊर्जा – सजीव शरीरीतील अणू मध्ये वास करणारी ऊर्जा. शरीर हे एक जटिल मशीन आहे. उत्क्रांतीच्या हजारो वर्षांच्या काळात जीवांचे शरीर एक जटिल मशीन मध्ये बदलले आहे. तरी हे मशीन स्वतः चालू शकत नाही. त्याला कुणी तरी एक चालक लागतो. म्हणून या शरीर रुपी मशीनला जड (चालवली जाणारी) ऊर्जा असे म्हणतात.

3) चेतन ऊर्जा- सजीव शरीराच्या जन्म, स्थिती, मृत्यू आणि पुनर्जन्म यासाठी कारणीभूत असलेली ऊर्जा. ही ऊर्जा शरीर नावाच्या जटिल यंत्राला चालवते. म्हणून या ऊर्जेला चेतन ऊर्जा असे म्हणतात. या ऊर्जेला जीवात्मा असे म्हणतात.

सत् म्हणजे जी आपले स्वरूप कधीही बदलत नाही अशी स्थायी ऊर्जा. चेतन ऊर्जा कधीही आपले स्वरूप बदलत नाही. म्हणून चेतन ऊर्जा सत् ठरते. सत् अर्थात चेतन ऊर्जा हे प्रत्येक जीवाच्या अस्तित्वाचे स्थायी स्वरूप आहे.

जी ऊर्जा आपले स्वरूप सतत बदलत राहते तिला असत् असे म्हणतात. जड सजीव ऊर्जा अर्थात शरीर आणि जड निर्जीव ऊर्जा अर्थात पाच महाभूते यांच्या मध्ये सतत स्थित्यंतर होत असते. चेतन ऊर्जेच्या प्रभावाखाली पंच महाभूते एकत्र येऊन शरीर नावाचे जटिल यंत्र निर्माण करतात. चेतन ऊर्जेने शरीर या जड सजीव ऊर्जेची साथ सोडली म्हणजे शरीर मृत होते. मृत शरीर अल्पावधीत विघटित होऊन परत पंच तत्वात सामील होते. अशा प्रकारे शरीर असत् ठरते.

शरीर असत् असले तरी ते व्यक्त स्वरूपात असते. सत् आत्मा मनुष्य बुद्धीला अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे आत्मा ही केवळ कल्पना असून शरीर हेच माझ्या अस्तित्वाचे खरे स्वरूप आहे असे भ्रम निर्माण होतो. बुद्धीने स्वीकारलेले अनुभवसिद्ध सत्य ज्ञान म्हणजे विद्या. स्वतःच्या अस्तित्वाचे खरे स्वरूप (आत्मा) बुद्धीला मान्य असणे म्हणजे विद्या.

स्वतःच्या अस्तित्वाचे खरे स्वरूप बुद्धीला मान्य नसणे आणि त्या ऐवजी भलत्याच तत्वात (शरीरा) स्वत्व शोधणे या प्रकाराला अविद्या असे म्हणतात.

स्वतःच्या अस्तित्वाचे खरे स्वरूप समजून घेताना परमेश्वरी शक्ती प्रमाणांचे मायाजाल मांडून मनुष्य बुद्धीला भ्रमित करते. असा भ्रमित मनुष्य अविदया स्विकारून शरीरामध्ये आत्मभाव ठेवायला लागतो. जीवाच्या बुद्धीने शरीरात आत्मभाव शोधला की शरीराच्या गरजा म्हणजे शरीराचे संवर्धन (पालन, पोषण, रक्षण) आणि प्रजनन याची जबाबदारी मनुष्यावर पडते. शरीरा संवर्धन आणि प्रजनन करण्याची प्रकृती मनुष्यामध्ये निर्माण होते. प्रत्येक जीवाच्या हातून शरीर संवर्धन आणि प्रजनन यासारख्या मूलभूत गोष्टी घडल्या तर प्रजातीचे संवर्धन होते. मनुष्य सोडून इतर प्राण्यांमध्ये बुद्धीचा विकास फारसा झालेला नसल्यामुळे ते अविद्येला सहज बळी पडतात आणि आपल्या अल्पमतीप्रमाणे शरीरामध्येच आत्मभाव ठेवतात. मनुष्य जन्मात बुद्धीचा विकास झालेला असल्यामुळे विचारांचे स्वातंत्र्य येते आणि ही अविद्या दूर करण्याची संधी मिळते. पण मायेच्या प्रभावामुळे बहुतेक मनुष्यांच्या आयुष्यातून ही संधी चुकते.

मायेच्या प्रभावाखालील मनुष्यबुद्धी शरीरामध्ये आत्मभाव ठेवते. विकसित झालेली मनुष्यबद्धी विविध गोष्टींचे संकलन करून शरीर संगोपन आणि प्रजनन सोपे करण्याची धडपड करत राहते. किंबहुना उत्क्रांतीच्या काळात मनुष्य बुद्धीचा विकासच संकलनासाठी झालेला आहे. आज मनुष्य बुद्धीचा उपयोग करून सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंधांचे संकलन करतो. मनुष्यबुद्धी सत्ता, संपत्ती, संतती, प्रतिष्ठा, आरोग्य आणि नातेसंबंधांचे संकलन करताना काही रोल अथवा भूमिका स्वीकारते. मनुष्य निभावत असलेल्या प्रत्येक भूमिकेची त्याच्या मनात एक प्रतिमा निर्माण होते. या प्रतिमेच्या आकारालाच अहं आकार अर्थात अहंकार असे म्हटले जाते. मायेच्या भ्रमातून निर्माण होणाऱ्या अविद्येच्या प्रभावाखाली असलेली मनुष्यबुद्धी हळूहळू या बाह्य अहंकारातही आत्मभाव शोधू लागते. अशा प्रकारे शरीराच्या निर्वाहासाठी चाललेल्या धडपडीतून अहंकार निर्माण होतात. मनुष्य आपले प्रकृतीदत्त आणि बुद्धीदत्त कर्तव्य करताना शरीर आणि इतर बाह्य अहंकारात आत्मभाव ठेऊन जगाशी देवाण-घेवाण व्यवहार करत असतो. त्यातून त्याच्या भोवती जे विश्व निर्माण होते त्यालाच संसार असे म्हटले आहे. मनुष्य स्वतःचे खरे अस्तित्व विसरून नातेसंबंध किंवा व्यावसायिक भूमिकेतून निर्माण झालेले अहंकार हेच आपण आहोत असे मानू लागते. अशा बाह्य अहंकारामध्ये आत्मभाव निर्माण झाल्यास त्या अहंकारातून निर्माण होणाऱ्या अपेक्षा आणि कर्तव्य पूर्ण करण्याची जबाबदारी मनुष्यावर येऊन पडते. नातेसंबंध किंवा व्यावसायिक भूमिकेतून निर्माण झालेले बाह्य अहंकार तर शरीरापेक्षाही कमी वेळ टिकत असल्याने ते तर पूर्णतः असत् असतात.

परमेश्वरी शक्तीच्या मायेतून अविद्या जन्माला येते. जीवाच्या अस्तित्वाचे खरे स्वरूप सत् अर्थात अनादी-अनंत आत्मा असते. पण मायेमुळे मनुष्य बुद्धी असत् ला सत् मानू लागते. असे अज्ञान स्वीकारणे हिच ती बुद्धीची अविद्या.

शिव आणि शक्ती मिळून अर्धनारी नटेश्वर परमेश्वर तयार होतो. शिव-शक्ती परम आत्मा असून जगत त्यांचे भौतिक शरीर आहे. शिव मध्ये सृष्टीच्या निर्वाहाचे संपूर्ण ज्ञान असूनही तो निसर्ग असतो. शिवाची शक्ती शिवाच्या त्या ज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून सृष्टीचा निर्वाह चालवणारी क्रियाशील ऊर्जा असते. अशा प्रकारे शक्ती परमेश्वरी शरीराचा निर्वाह चालवते. या परमेश्वरी शरीराच्या निर्वाहासाठी या शरीरात म्हणजे सृष्टीत सतत सृजन, स्थिती आणि नाश चालू असतो. ज्या गोष्टी जीर्ण होऊन नष्ट झालेल्या असतात त्यांच्या जागी नवीन गोष्टी जन्म घेत असतात. पण ऊर्जेच्या संवर्धनाच्या नियमानुसार कुठलीही ऊर्जा नष्ट करणे शक्य नसल्याने गोष्टींचा जन्म, स्थिती आणि मृत्यू म्हणजे केवळ ऊर्जेचे स्थित्यंतर असते. गरजेनुसार जन्म, स्थिती आणि नाश करण्याची जबाबदारी शक्तीवर असते. शक्ती जीवांच्या माध्यमातून हे काम करून घेते. जीवांनी आपल्या अस्तित्वाचे खरे स्वरूप विसरून शक्तिच्या या कामासाठी स्वतःला झोकुन द्यावे यासाठी शक्ती मायेचा निर्माण करते. जर सामान्य जीवाने शरीर आणि इतर अहंकारात आत्मभाव शोधला नाही तर शरीर संगोपण, प्रजनन आणि यश संकलन सारखे कार्य करण्यात उदासीनता निर्माण होते. तसे झाल्यास त्या जीवाच्या शरीराचा, त्या प्रजातीचा आणि पर्यायाने सृष्टीचा निर्वाह होणे अवघड होईल. म्हणून परमेश्वरी शक्तीने माया निर्माण केली गेली. सर्व जीवनामध्ये केवळ मनुष्य आपल्या विकसित बुद्धीने हे मायाजाल समजून घेऊन त्याच्या वर उठू शकतो.

प्रत्येक प्रजाती ही शक्तीचे सृजन असून ते ठराविक काळ टिकणे तिच्यासाठी आवश्यक असते. त्यासाठी प्रत्येक जीवाने शरीर संगोपण आणि प्रजनन करणे आवश्यक असते. जीवाला तशी प्रेरणा मिळत रहावी म्हणून माया जीवाच्या बुद्धीत अविद्या निर्माण करते. मग प्रत्येक जीवाच्या बुद्धीला शरीर आणि अन्य बाह्य अहंकार म्हणजेच मी स्वतः आहे असे वाटू लागते. मग ती बुद्धी स्वतःचे (शरीर आणि इतर बाह्य अहंकारांचे) अस्तित्व टिकवण्यासाठी शरीर संगोपण आणि प्रजननाचे मुलभुत कार्य तसेच यश संकलनाचे वाढीव कार्य करू लागते. त्यातून जीवाचे आणि पर्यायाने प्रजातीचे संवर्धन होते.

अशा प्रकारे माया संसाराच्या निर्वाहासाठी आवश्यक असल्याने तिचा पूर्णतः त्याग करणे शक्य नाही. पण तिच्या निर्मितीच्या उद्देशाकडे तटस्थपणे पाहत मनुष्याने स्वतःला तिच्या वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करावा. शरीरात आत्मभाव जरी ठेवला नाही तरी शरीराचा निर्वाह संसाराच्या निर्वाहासाठी गरजेचा आहे याचे भान ठेऊन भ्रमात राहून नव्हे तर जागरूक राहून शरीर संगोपन करावे. परमेश्वरावर भक्ती ठेऊन परमेश्वराचे सृजन टिकवण्यासाठी जबाबदारी म्हणून शरीर संगोपन करावे. शरीर संगोपन सोपे व्हावे आणि योगमार्गला प्रतिष्ठा मिळावी म्हणून यश संकलन सुद्धा करावे. जगरहाटी चालवण्यासाठी परमेश्वराची माया उपयुक्त आहे असे मानणारे भक्त परमेश्वराला आवडतात.

ठेविले अनंते तैसेचि रहावे| 

चित्ती असू द्यावे समाधान||

मायेच्या प्रभावाने सर्व जीव शरीर या अहंकारात म्हणजे असत् मध्ये आत्मभाव ठेवतात. मग जीवनामध्ये शरीर संगोपन आणि प्रजनन करणारी प्रकृती निर्माण होते. या प्रकृतीच्या प्रभावाने असा जीव स्वतःच्या म्हणजे या शरीराच्या गरजा पुर्ण करण्यासाठी धडपड करतो. शरीराचे पालन, पोषण, रक्षण आणि प्रजनन अशा प्रकृतीदत्त कर्तव्य करण्याच्या बदल्यात प्रकृती जीवाच्या आदिम मेंदू (lymbic system) मध्ये अशी संप्रेरके तयार करते की जीवाला अशा कृतीतून सुख मिळू लागतो. अन्न, पाणी, निवारा, शरीरसंबंध या क्रियांमधून मिळणारा हाच तो आनंद आहे. या प्रकृतीदत्त कर्तव्याच्या विरुद्ध वर्तन केल्यास जीवाच्या मनात आधी अनुभवलेले हे सुख मिळवण्यासाठी व्याकुळता निर्माण होते. त्यामुळे कुठलाही जीव अन्न, पाणी, निवारा, शरीरसंबंध यापासून फार काळ लांब राहू शकत नाही. या प्रकृतीदत्त कर्तव्याची वेळोवेळी पूर्ती झाल्याने जीवाचे शरीर संगोपन आणि प्रजनन होते. प्रजातीच्या सर्व जीवांनी असे प्रकृत्तीदत्त कर्तव्यपूर्ती केल्यामुळे प्रजातीचे संवर्धन होते.

मनुष्य सोडून इतर प्रत्येक जीव केवळ प्रकृतीच्या शरीर संगोपण आणि प्रजनन या दोन नियमांनी बांधलेला आहे. पण उत्क्रांतीच्या काळात मनुष्य प्राण्यांमध्ये बुद्धीचा विकास झाला. त्यामुळे मनुष्याला प्रकृती सोबत बुद्धीच्या अधीन राहून काम करावे लागते. आता हे बुद्धी काय प्रकरण आहे ते पाहू.

मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात मनुष्याचा व्यवहार सुद्धा इतर प्राण्यांप्रमाणे शरीर संगोपन आणि प्रजनन करणाऱ्या प्रकृतीदत्त इच्छेने (lymbic system) नियंत्रित होत असे. या लिम्बिक सिस्टीम मध्येच शरीराचे पालन, पोषण, रक्षण आणि प्रजनन करण्याची मूलभूत अंत:प्रेरणा निर्माण होते. ही लिम्बिक सिस्टीम मनुष्य प्राण्यामध्येही असते. उत्क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातच मनुष्य प्राण्याला जाणवले की शरीर संगोपन आणि प्रजननासाठी पूरक गोष्टींचे संकलन करून ठेवले तर हे प्रकृतीदत्त कार्य सोपे होते. मग गोष्टींचे संकलन करण्यासाठी आवश्यक असा विचार करू शकणारा मेंदूचा भाग हळूहळू विकसित होऊ लागला. या भागाला आम्ही डॉक्टर नियोकॉर्टेक्स (Neocortex) असे म्हणतो. या भागामुळे परिस्थितीचे पूर्ण आकलन करून संकलनासाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता मनुष्यामध्ये निर्माण झाली. या क्षमतेला बुद्धी असे म्हटले गेले. मनुष्यामध्ये बुद्धीचे मुख्य कार्य प्रकृतीदत्त कर्तव्य सोपे व्हावे म्हणून गोष्टींचे संकलन करणे आहे.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ गोपाळकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर, पाटिल हॉस्पिटल, सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘‘डॉ. जयंत नारळीकर…… अत्यंत साध्या जगण्याची गोष्ट!’’ – लेखिका : सुश्री कल्याणी गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘‘डॉ. जयंत नारळीकर…… अत्यंत साध्या जगण्याची गोष्ट!’’ – लेखिका : सुश्री कल्याणी गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

आकाशगंगा या आयुकाच्या (म्हणजे Inter University Centre for Astronomy and Astrophysics – IUCAA) हाउसिंग कॉलनीमध्ये राहायला गेले तेव्हा डॉ. जयंत नारळीकर व सौ. मंगला नारळीकर यांच्या समोरचेच घर माझ्या भाग्याने मला मिळाले. असा दुर्मिळ शेजार आम्हाला लाभला होता. डॉ. नारळीकरांची एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी म्हणून सुमारे दहा वर्ष काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांचे शेजारी म्हणून राहण्याचीही. सरांचे नाव आणि कीर्ती इतकी मोठी की नव्याने कामाला सुरुवात केली तेव्हा त्याचे दडपणच मनावर अधिक होते. पण सर वागायला इतके साधे की कित्येकदा त्यावर विश्वासच बसत नसे.

ऑफिसमध्ये ते वेळेआधी दहा मिनिटे पोहचलेले असत. घड्याळाच्या काट्याबरहुकूम मेल पहाणे, मेलला उत्तरे म्हणून डिक्टेशन, पत्रे टाइप झाली की सह्या, रोज कोणत्यावेळी कोण येणार यासंबंधीचा दिवसाचा आराखडा त्यांच्यासमोर दिला जाई. त्यानुसार ते त्या त्या संबंधीचे कागदपत्र मागवून स्वत:जवळ ठेवून घेत.

सरांच्या भेटीला येणार्‍या लोकांमध्ये देशोदेशीचे शास्त्रज्ञ, सरकारी अधिकारी, विद्यापीठातील मान्यवर, देशी- परदेशी विद्यार्थी, त्यांच्या हाताखाली शिकणारे विद्यार्थी, आयुकातील अधिकारी यांच्याबरोबरच खेडेगावातून आलेले विद्यार्थी व त्यांचे पालक अशी विविधता असे. पण सर्वाना सारख्याच सन्मानाने वागविले जाई.

एकदा एका खेडेगावातल्या विद्यार्थ्याला भेटायला पाच मिनिटे उशीर झाल्याने अस्वस्थ होऊन एक एक पायरी गाळून भराभर वर आलेले सर मला अजून आठवतात.

विविध वर्तमानपत्रे, मासिके इत्यादि ठिकाणी त्यांचे लेख छापून येत. त्यांनी लेख देण्याचे कबूल केले की ठरलेल्या तारखेच्या आधी सुमारे 15 दिवस लेख पूर्ण झालेला असे व तो हस्तलिखित लेख पाठविण्यासाठी मजकडे येई. अक्षर इतके सुंदर आणि लेखात एकाही ठिकाणी – अक्षरश: एकाही ठिकाणी- कधीही खाडाखोड नसे. खरे तर कित्येकदा वाटे लेख मराठी असो वा इंग्रजी – टाइप करण्याऐवजी त्यांच्या अक्षरातच छापावा!

उत्तरे डिक्टेट करताना त्यांचे बारकाव्यांकडे असलेले लक्ष मला चकित करीत असे. एकदा त्यांनी मला सांगितले कोणताही शब्द संक्षिप्त स्वरूपात वापरण्यासंबंधीचा एक नियम आहे. उदा. Professor या शब्दाचे संक्षिप्त रूप Prof. करताना त्याच्यापुढे पूर्णविराम दिलाच पाहिजे कारण त्या संक्षिप्त रूपात त्या शब्दाची पहिली काही अक्षरेच घेतली आहेत; पण Doctor या शब्दाचे संक्षिप्त रूप Dr करताना पुढे पूर्ण विरामाची गरज नसते कारण त्यात Doctor या शब्दातील पहिले D शेवटचे r हे अक्षर वापरलेले आहे. हे मी शाळेत किंवा पुढे विद्यापीठातही कधीच शिकले नव्हते.

सरांना कामासाठी देशी-विदेशी दौरे करावे लागत. त्यावेळी त्यांचे संपूर्ण वेळापत्रक तारखेनुसार व त्या त्या दिवसाच्या वेळेनुसार टाइप केले जात असे. त्यातही त्यांनी केलेली एक अप्रतिम सोयीची गोष्ट विसरणे केवळ अशक्य. जिथे जिथे भेट ठरलेली आहे त्या त्या संस्थेचा पत्ता, फोन क्रमांक, इ-मेल पत्ता, गावाचे पूर्ण नाव व पिनकोड तसेच ज्या व्यक्तीला भेटायचे आहे त्या व्यक्तीचेही पूर्ण नाव, अधिकारपद, कार्यालयाचा तसेच असल्यास घरचा फोन क्रमांक, इ-मेल इत्यादी गोष्टी टाइप करून ते सर्व कागद एका आकारात कापून त्याला जरासे जाड कागदाचे कव्हर करून त्याचे शर्टाच्या खिशात किंवा पाकिटात सहजपणे मावेल अशा आकाराचे लहानसे पुस्तक त्यांनी मला करायला सांगितले होते. त्याची नंतर सवयच होऊन गेली. कोणताही पत्ता, फोन शोधण्यात विलंब लागू नये म्हणून ही खबरदारी. गंमत म्हणजे ते प्रवासाहून परत आले की पत्त्याच्या संदर्भातील काही बदल असेल तर त्यांच्या छोटेखानी पुस्तकात तो टिपलेला असे व त्यामुळे माझ्याजवळ असलेल्या पत्त्यात त्यानुसार बदल करणेही सोपे जाई व सर्व माहिती अद्ययावत राहात असे.

प्रवासाच्या वेळी कधी विमान किंवा ट्रेन उशिरा निघणार आहे म्हटले तर सर त्यांच्याकडे असलेल्या पोस्टकार्डावर किंवा आंतर्देशीय पत्रांवर त्यांना आलेल्या विद्यार्थ्याच्या प्रश्नांना उत्तरे लिहायला सुरुवात करीत.

विद्यार्थी सरांना भेटले की त्यांची स्वाक्षरी मागत. सर त्यांना सांगत ” नुसती सही देण्यापेक्षा तुम्ही पत्राने एखादा प्रश्न विचारा. त्याचे उत्तर मी तुम्हाला पाठवीन आणि त्यावर माझी सही असेल ” हा शास्त्रशुद्ध विचारांचे बीज लहानपणापासून रुजविण्या संदर्भात केलेला सततचा आग्रहच!

आयुकासारख्या संस्थेचे डायरेक्टर म्हणून काम करणे, सकाळी दणकून टेनिस खेळणे, शिकविणे, विविध ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून जाणे, स्वत:ची पुस्तके लिहिणे, लेख लिहिणे, मराठी विज्ञान परिषदेचे काम पहाणे, समाजात विज्ञानदृष्टी यावी यासाठीचे अव्याहत प्रयत्न, – पंचमहाभूते – यांसारख्या विषयावर आयुकात शिबिर घेणे, व्याख्याने देणे. सतत इतके बिझी असूनही सर कधी ‘ओव्हर टाइम’ करत ऑफिसात थांबल्याचे मला आठवतच नाही. क्वचित कधी इतर आलेल्या अधिकार्‍यांमुळे विलंब झाला तरच!

आयुकामध्ये असताना आमच्या ‘आकाशगंगे’त होळी, दिवाळी असे सण साजरे होत. सरांना गुलाल माखताना संकोचल्यासारखे होई पण ते मात्र एकदम शांतपणे उभे रहात असत. दिवाळीचे जेवण आयुकाच्या कॅण्टीनमधून तयार होऊन येई. पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच ते असल्यामुळे ताटे-वाटी-पेले ज्याचे त्याचे घरून आणणे आवश्यक होई. कारण भांडी धुवायला कॅण्टीनमधली मुले नसत. 8 वाजता जेवणाची वेळ ठरलेली असेल तर 8ला पाच कमी असतानाच सर हातात ताट-वाटी घेऊन इतर सर्वासारखे हजर.

आयुकात काम करणार्‍या लोकांच्या व्यक्तिगत छंदांविषयीसुद्धा ते जागरूक असत. त्यांना देशोदेशीहून येणार्‍या पत्रांवर परदेशी तिकिटे असत. त्यातील तिकिटे ते न विसरता कापून आणून माझ्याकडे देत व ‘अमुक अमुक व्यक्तीला हे द्या’ असे आवर्जून सांगत. एखाद्याचे एखाद्या वाचनासंबंधीचे वेड त्यांना ठाऊक असे व त्यासंबंधी काही लेख, माहिती आल्यास ते ती त्या व्यक्तीपर्यंत न विसरता पोहचवीत.

एकदा त्यांच्या घरी निरोप सांगायला गेले तेव्हा सर किंवा मंगलाताई दोघेही घरी नव्हते. सरांच्या सासूबाई स्वयंपाकघरात होत्या. त्यांच्याकडे निरोप दिला. तेव्हा त्या भांडी जागेवर लावण्यात गुंतल्या होत्या. मला म्हणाल्या, ‘पाहिलीत का आमच्या जावईबापूंची करामत? ’ म्हटले, ‘काय झाले? ’ तर त्या म्हणाल्या, ‘काल आमच्या घरी 15-20 माणसे जेवायला होती. सरांना कामानिमित्त बाहेर जावे लागल्यामुळे त्यांना मंगलाला कोणतीच मदत करता आली नाही. म्हणून रात्री जेवणे उरकल्यानंतर त्यांनी ही सगळी काचेची नाजूक भांडी, प्लेट्स धुवून ठेवली आहेत. ’ ‘एल’ आकाराच्या दोन ओट्यावर केवढी मोठी भांडी, प्लेट्स इत्यादी धुवून ठेवलेली होती! आपला कामाचा वाटा चुकवू नये हे त्यांच्या रक्तातच भिनलेले! आपला कामाचा काही वाटा घरकामातही असतो हे मन:पूर्वक मानणारे सरांसारखे किती मान्यवर पुरुष तुम्हाला भेटतील?

सरांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांना कोणतीही शंका – अगदी कोणतीही शंका विचारली तर त्यासंबंधी उपहास न करता ते अत्यंत सोप्या पद्धतीने त्याचे उत्तर देत. गणपतीने म्हणजे गणेशमूर्तीने दूध प्यायल्याची अफवा देशभर पसरली होती तेव्हाचा प्रसंग. सरांना यासंबंधी प्रश्न विचारण्यासाठी आयुकामध्ये एकावर एक फोन येऊ लागले. शेवटी सरांनी मूर्तीच्या सोंडेने प्रत्यक्ष दूध कसे खेचले जाऊ शकते यासंबंधीची शास्त्रोक्त माहिती सांगणारे छोटेखानी भाषण केले व ते लोकांर्पयत पोचवले. वैज्ञानिक विचारांचा अखंड पाठपुरावा जणू रक्तात भिनलेला!

आयुकाच्या इमारतीचे बांधकाम चालू असताना आयुकाच्या आवारात न्यूटन, आइनस्टाइन, आर्यभट्ट, गॅलिलिओ इत्यादी पुतळे ठेवण्यात आले. फूको पेंडय़ूलम (foucault pendulum) सौरघड्याळ इत्यादी शास्त्रीय माहिती देणारी उपकरणेही ठेवली गेली. अनेक विद्यार्थ्याच्या ज्ञानात या गोष्टी पाहण्यानेसुद्धा भर पडते. या सर्वांमध्ये सरांनी दाखवलेली खरी रसिकता म्हणजे आयुकाच्या कॅण्टीनमध्ये लावलेला एक बोर्ड – ‘The discovery of a new dish does more for human happiness than the discovery of a star! ’ – by Brillat Savarin – हे ते वाक्य, जीवनाबाबतीतले सत्य सांगणारे!

कॅण्टीनमध्ये लावण्यासाठी हे वाक्य निवडणारा माणूस स्वत: आंतरराष्ट्रीय ख्यातीचा शास्त्रज्ञ आहे, हे विशेष!

अंतराळ विज्ञानातल्या सरांच्या अजोड कामगिरी खेरीजचे हे किती विविध गुण!

माणसे मोठी होतात ती उगीच नाही!!

लेखिका : सुश्री कल्याणी गाडगीळ

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ We are extremely sorry, officer! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

We are extremely sorry, officer! ☆ श्री संभाजी बबन गायके 

लेफ्टनंट किरण शेखावत madam, जय हिंद!

 खरं तर to be sorry म्हणजे एखाद्या घटनेबद्दल, गोष्टीबद्दल मनातून वाईट वाटणे, दिलगीर वाटणे, सहानुभूती वाटणे इत्यादी अर्थ असतो. Sorry म्हणणे म्हणजे माफ करा असा अर्थ अजिबात होत नाही. त्यासाठी to beg (somebody’s) pardon, to apologise अशी क्रियापदे आहेत! म्हणून किरण madam, we beg your pardon!

 तुम्ही या आपल्या प्राणप्रिय हिंदुस्तान देशासाठी प्राणार्पण करून आज मितीला सुमारे दहा वर्षे आणि दोनेक महिने झाले आहेत. काल अचानक तुम्ही हुतात्मा झाल्याच्या फेसबुक पोस्ट्स मोठ्या संख्येने दिसू लागल्या! आपल्याकडे एकतर प्रत्यक्ष युद्धात (म्हणजे आजपर्यंत सुरु असलेल्या युद्धासारख्या) सैनिक मृत्यू पावल्याशिवाय त्याला फारसे महत्त्व देण्याची सर्वसाधारण पद्धत नाही. काही लोक हुतात्मा सैनिक, त्यांचे कुटुंबीय यांचेविषयी, संबंधित सैनिकाच्या बलिदान दिवशी काही लिहित असतात, हे ही खरे आहे.. पण हे प्रमाण अत्यल्प म्हणावे इतके थोडे आहे! असो.

त्यामुळे काल आणि आज तुमचे फोटो आणि तुम्हांला वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजलीच्या फेसबुक पोस्ट्स दिसल्या तेंव्हा लगेच तुमच्या बलिदानाची तारीख पाहिली… २५ मार्च २०१५! शिवाय तुमचा जन्मदिन सुद्धा १ मे रोजीच होऊन गेला होता!

भारतीय नौसेनेत कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेल्या तुम्ही पहिल्या महिला सैनिक अधिकारी ठरल्याचे त्यावेळी मुद्दाम नमूद करण्यात आले होते, हे आठवले! २०१५ मध्ये सोशल मिडिया आजच्या इतका फैलावलेला आणि मुख्य म्हणजे पैसे देणारा नसावा… म्हणून तुमची ही बातमी देशभर फारशी चर्चिली गेली नसावी!

पण या वर्षी ऑपरेशन सिंदूर दरम्यान अचानक तुमचे छायाचित्र आणि तुमच्या हौतात्म्याची बातमी दिसू लागली. उगम कुठे झाला हे नाही समजले.. पण अनेक देशप्रेमी नागरीकांनी ही बातमी शेअर केली, हजारो लोकांनी comments केल्या… संपूर्ण देशभरात अशा हजारो पोस्ट्स प्रसिद्ध झाल्या असतील! पण या कुठल्याही पोस्ट मध्ये तुमचे बलिदान २०१५ मध्ये झाल्याचा उल्लेख नाही. काही comments कर्त्यांनी या बाबीचा उल्लेख केला.. पण त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. अनेक लोकांनी वरची comment आहे तशी copy करून paste केली आणि इतरांच्या comments त्यांनी वाचल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली नाही! ऑपरेशन सिंदूर मध्येच हे बलिदान झाल्याचा समज झाल्या असण्याची दाट शक्यता आहे!

तुमच्या बलिदानाविषयी कुणी पोस्ट करत असेल, तर त्याला आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही! परंतु सध्याच्या गंभीर परिस्थितीत २०१५ मध्ये झालेल्या दुर्घटनेबाबत संदिग्ध पोस्ट करण्यामागे सरळ उद्देश असण्याबाबत शंका घेण्यास वाव आहे! पोस्ट वर जितक्या comments, जितके shares तितका पोस्ट करणा-यास followers, आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता अधिक हे आता लोकांना ठाऊक झालेले आहे… तुमचे बलिदान वापरून जर अशा पोस्ट केल्या असतील तर, यासारखे दुर्दैव आणि हरामखोरी दुसरी नसावी!

Madam, तुमचे पती सुद्धा नौसेनेतच अधिकारी आहेत. त्यादिवशी तुम्ही डॉर्नियर जातीच्या विमानात Flight Observer म्हणून उड्डाण केले होते… आणि हे एक प्रशिक्षण उड्डाण होते. तुमच्यासोबत लेफ्ट. अभिनव नागोरी साहेब आणि कमांडर निखील जोशी साहेबही होते. तुम्ही मुळच्या राजस्थानी, पण जन्म मुंबईतला. वडील सुद्धा नौसेनेत असल्याने तुम्ही त्यांच्या नेमणुकीच्या शहरात अर्थात विशाखापट्टनम मध्ये शास्त्र शाखेची पदवी मिळवून नंतर तुम्ही काही काळ एका बँकेत नोकरी केली आणि पुढे २०१० मध्ये भारतीय नौसेनेत दाखल झालात… लेफ्टनंट बनलात. Intelligence Warfare अर्थात हेरगिरीवर आधारीत/हेरगिरी विरोधी युद्धकौशल्यात तुम्ही निपुण होतात. २०१५ मध्ये प्रजासत्ताक दिनी केवळ महिलांचा समावेश असलेल्या पहिल्याच सैनिकी पथकात तुम्ही शानदार संचलनही करण्याचा मान मिळवला होता. तुमचे ते विमान दुर्घटनाग्रस्त झाले… समुद्रात कोसळले… लेफ्ट. नागोरी साहेब आणि तुम्ही मृत्युमुखी पडलात… कमांडर जोशी साहेबांना समुद्रातील मच्छिमारांनी वाचवले. तुमचा मृतदेह मात्र खोल समुद्रात विमानाच्या अवशेषांमध्ये सापडला. तुमच्या बलिदानाला सल्यूट! तुमच्या विषयीची पोस्ट अशा प्रकारे आणि ती देखील आजच्या परिस्थितीमध्ये केवळ विशिष्ट हेतूसाठी वापरली जाणे, हे खूप चुकीचे आहे. याबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतो…! (यामुळे तुमच्याविषयी अधिक लोकांना समजले हे खरे असले तरी तुमच्या बलिदानाची सविस्तर माहितीही या अधिकच्या लोकांना समजणे गरजेचे होते!)

गेल्या काही दिवसांत सोशल मिडीयावर नतद्रष्ट आणि अतिउत्साही लोकांनी Artificial Intelligence च्या साहाय्याने बनवलेले विडीओस ‘टाकून’ काय मिळवलं असेल ते सांगण्याची गरज नाही. तिकडे पाकिस्तानात सुद्धा असाच digital खेळ सुरूच आहे. हे झाले सामान्य लोकांच्या सोशल मिडीयाच्या वापराचे. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांचा तर full season सुरु असल्याचे चिन्ह आहे. काही वाहिन्या उत्तम काम करताना दिसतात, मात्र त्यांनाही स्फोटक, रोमांचकारी वातावरण निर्माण करण्यावाचून राहवत नाही. एखादी ब्रेकिंग न्यूज दाखवण्याआधी सायरनचा आवाज ऐकवण्याची काय गरज? आणि बातमी ती काय? … अमकी अमकी बैठक सुरु होणार आहे! म्हणजे कुठेही जाऊ नका.. आमचे(च) channel पाहत रहा.. असा आग्रह! अनेक वाहिन्या आज तक असेच करीत आलेल्या आहेत, नको तेवढे एक पाऊल पुढे जात आहेत, प्रेक्षकांना नको एवढे डोळे उघडे ठेवायला भाग पाडत आहेत. यापेक्षा आकाशवाणी, वर्तमानपत्रे यांचा जमाना बरा होता, असे म्हणायची वेळ आली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे memes, विनोदी वाक्यरचना करणा-या ‘सर्जनशील’ लोकांना तर ऊत आलेला आहे. आय. पी. एल. सामना पहिल्यासारखी काहींची त-हा आहे. फटाके वाजवले तर लोकांमध्ये विनाकारण घबराट निर्माण होऊ शकते, हा साधा विचारही लोकांच्या मेंदूत येत नाही. यासाठी पोलिसांना आदेश जारी करावे लागतात… आपण कसे लढणार आहोत शत्रूशी? असे?

(पाकिस्तानी सैन्य आणि अतिरेकी संघटना तिथल्या सरकारचे ऐकत नाही, हे आताच (पुन्हा एकदा) सिद्ध झाले आहे. रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग यापुढे भारतापुढे असणार आहे… हे वास्तव आहे. म्हणून सामान्य लोकांनी जबाबदारी ओळखून वागणे हिताचे आहे!)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ याला तिळही नाही पहिला इतिहास… लेखिका : अॅड. सीमंतिनी नूलकर ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ याला तिळही नाही पहिला इतिहास… लेखिका : अॅड. सीमंतिनी नूलकर ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडचा शुष्क काटेरी वनांनी वेढलेला आणि कमी पावसाचा लिंब, बाभळीचं रुई-घाणेरीचं प्राबल्य असलेला प्रदेश म्हणजे माण तालुका. हा भाग दुष्काळी म्हटला जातो पण तो दुष्काळी नसून कमी पावसाचा प्रदेश आहे. पाणथळी गवताळ प्रदेश आहे.

खरंतर माण नावाचं गाव जगाच्या नकाशावर कुठेच नाही. या तालुक्यातील महत्त्वाची गाव आहेत दहिवडी, म्हसवड. मात्र माण नावाची नदी आहे. माणची जीवनदायिनी गंगा म्हणून तिला म्हणतात ‘माणगंगा’ आणि या परिसरात एक विशिष्ट चिकण माती आढळते. तिलाही ‘माण’ असं म्हटलं जातं. माणचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत असलेला शंभू महादेव इथं डोंगरी नांदतो. शिखर शिंगणापूरला! शिखर शिंगणापूरची स्थापना केली शिंगणराजे यादवांनी. १२१० ते १२४७ च्या दरम्यान. म्हणून या स्थानाचे नाव शिखरशिंगणापूर. माणच्या डोंगरावर माणच्या मुकुटातला मानाचा तुरा असलेलं हे स्थान आहे.

ग. दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकरांची ही जन्मभूमी. या परिसराचं अतिशय चपखल वर्णन गदिमांनी केलेलं आहे.

“नजीक नाझरे श्रीधर कवींचे, नदी माणगंगा 

नित्य नांदते खेडे माझे धरुनी संतसंगा 

तिळही नाही खेड्याला या पहिला इतिहास

शिल्पकलेची, ताम्रपटाची कशास मग आस 

निळा जलाशय नाही येथे, नाही उद्यान 

अन्नासाठी मात्र हिरवळे भोवती वन l 

या अशा “तिळही नाही पहिला इतिहास” अशा प्रदेशात एक अजूबा आहे. किरकसाल! त्याला नळीचा माळ असंही म्हटलं जातं. किरकसाल, भोजलिंग, कुरण, डांबी डोंगर, अम्भेरी घाट, वर्धनगड, महिमानगड, कुळकजाई, कुक्कुडवाड असा हा विस्तीर्ण प्रदेश, विस्तीर्ण माळरान आहे. उन्हाळ्यात या विस्तीर्ण माळराना वरच्या गवताचं पार वाळवण होऊन गेलेलं असतं.

या माण देशाचं काव्यमय वर्णन गदिमांनी केलय तसं चित्रमय वर्णन, व्यंकटेश माडगूळकरांनी केलेलं आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी बनगरवाडीचं केलेलं वर्णन म्हणजे माण देशाचे व्यक्तीचित्रणच आहे. ते म्हणतात, “माळरानावर वाळून पडलेलं गवत सूर्याच्या पहिल्या किरणांनी उबदारत जातं आणि अगदी थोड्या पावसाच्या शिडकाव्याने गवत, अगदी नको नको तिथं उगवतं. सर्वत्र हिरवा झगझगीत रंग दिसू लागतो. ”

हिमयुगानंतर पृथ्वी हळूहळू उबदार होऊ लागली. त्या वेळी म्हणजे हजारो वर्षांपूर्वी गवताळ प्रदेश जन्माला आले. अंटार्टिका सोडता, सर्वत्र हे गवताळ प्रदेश आहेत. आफ्रिकेत सवाना, उत्तर अमेरिकेत प्रेअरी, दक्षिण अमेरिकेमध्ये पंपा, मध्य आशियात स्टेपे, ऑस्ट्रेलियातील रेंजलँडस अशा वेगवेगळी नावं या गवताळ प्रदेशांना आहेत. या गवताळ प्रदेशांनीच माणसाला शेतीसाठी सुपीक माती दिली. कार्बन संचयनाची निसर्गाने दिलेली जबाबदारी ही गवताळ माळरानं नेकीनं पार पाडतात. अनेक प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पतींचे अधिवास म्हणजे ही गवताळ कुरणं. खरं म्हणजे हे गवताळ प्रदेश म्हणजे सर्वात श्रीमंत परिसंस्था! स्थानिक स्थलांतरित पक्ष्यांचा, फुलपाखरांचा, लांडग्या तरसांसारख्या गवताळ प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांचा अधिवास. या प्रदेशातले निसर्गप्रेमींसाठीचे खास हॉटस्पॉट म्हणजे डांबीचे खोरे, जांभळहेळ, नळीचा माळ आणि किरकसालची पाणथळ. या परिसरात ‘निळे जलाशय’ नसले तरी येराळवाडी, पिंगळी, रानंद, देवापुर धरण, दर्जाई तलाव असे पाणसाठे आहेत. पाणथळ जागा आहेत.

जैवविविधतेने संपन्न अशी विस्तीर्ण माळराने आणि पाणथळींमुळे या भागाचं जैवविविधतेच्या दृष्टीने, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व वाढलं आहे. या हॉटस्पॉटचे, दिशादर्शक फलक काही ठिकाणी आहेत. त्यांची स्थानिक नावं लांडग्याचं बिळ, ससे होलन. नावातूनच तिथं कोण असतं ते कळत.

किरकसाल संवर्धन प्रकल्प आता अंगापिंडानी भरलाय. किरकसालच्या रहिवाशांनी, त्यांचं गाव ‘आदर्श गाव’ बनवण्याचा विडा तर उचलला आहेत पण इथल्या जैवविविधतेच्या संवर्धनाचा, संरक्षणाचा गावकऱ्यांनी वसा घेतला आहे. या परिसरातील वनखात्याचे लोक, चिन्मय सावंत, विशाल काटकर यांच्यासारखे निसर्गप्रेमी यांना, आणि खुद्द गावक-याना लोकसहभागातून या श्रीमंतीची जपणूक करायची आहे.

माण देशाची स्वतःची म्हणून एक गोडवा असलेली भाषा आहे. भिगपाऊस, तिरकसतुंबा, हेळ अशा विशिष्ट शब्दांनी ही भाषा सजली आहे. तसाच इथल्या पक्षी-पाखरांच्याही स्थानिक नावात एक वेगळाच गोडवा आहे. इथं झोकांड्या “खात जाणारी” म्हणण्यापेक्षा “झोकांड्या खात उडणारी” झोकांडी चिमणी दिसते. माळरानावर भांडण मांडून बसलेले सातभाई दिसतात. ते सारखे कोकाटतात म्हणून “कोकाटे”. माळटिटवी तर बस्तान बसवूनच आहे. मोठी लालसरी, रेखांकित भारीट, मॉन्टेग्युचा भोवत्या, खडकी लावा, धाविक एक न दोन! बेलन्सची फटाकडी आहे. 200 पेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद या परिसरात झाली आहे. सातारा जिल्ह्यातील प्राच्यचंडोलची पहिली नोंद इथेच झाली. स्थलांतरित पक्ष्यांत कवड्या गप्पीदास, सायबेरियन गप्पीदास, सामान्य खरूची, रिचर्डची तिरचिमणी आहे. मोठ्या टपोर डोळ्याचा करनावक आहे.

साधारण 30-35 किंवा कदाचित जास्त वर्षांपूर्वी, या भागात, मायणीच्या जलाशयावर येणाऱ्या स्थलांतरित रोहित पक्ष्यांना पहायला मी पहिल्यांदा गेले होते. आता अगदी शिवडी पासून अनेक ठिकाणी रोहित येत असतात. खानपान आटपून संध्याकाळी ते रोहित पक्षी जेव्हा जलाशयावर उतरण्या आधी आकाशात गोलाकार फिरत असतात तेव्हा एकत्र उडताना, त्यांच्या पंखांनी वारा कापल्यावर येणारा एक विशिष्ट आवाज, केवळ अनुभवण्यासारखा असतो. त्यांच्या पंखाखालून दिसणारा लाल केशरी रंग अजूनही माझ्या डोळ्यापुढून हलत नाही. तेव्हा नुकते नुकते रोहीत पक्ष्यांच्या मागावर जाण्याचं वेड रुजत होतं. शोधत शोधत गेलो. इथे ‘रोहित पक्षी’ कुठे दिसतील, असं शेळ्या मेंढ्या चारणाऱ्या गुराख्यांना विचारलं. त्यांना काही उमगलेलं दिसेना. मग विचारलं, “अग्निपंख पक्षी आहेत का इथं? ” तरीही चेहऱ्यावर भाव नाही. मग आमचं आपसातच बोलणं झालं कि कुठे दिसायचे हे फ्लेमिंगो? तर त्या गुराख्यातल्या एकजण म्हणाला, ” असं म्हना की. फिलिंमेंगो बघाय जायचं हाय. ” ही माझी या परिसराची पहिली भेट. नंतर या मायणीच्या जलाशयात रोहित पक्षांना आवडणाऱ्या खाद्य वनस्पतीचे प्रमाण कमी होत गेलं. वर्दळ वाढली. त्यांचा रहिवास डिस्टर्ब झाला तो झालाच. आता तिकडे रोहित फारसे येत नाहीत. आले तरी येराळवाडी, राजापूरच्या जलाशयावरती त्यांचा मुक्काम असतो. पूर्वी माळढोक, तणमोरही खूप दिसायचे. या गवताळ प्रदेशात पक्षी पूर्वी होते याचा एक पुरावा म्हणजे महादेवाच्या मंदिरात असलेले मोर, बदक यांचे कोरीव शिल्प.

हा प्रदेश पक्ष्यांचा कॉरिडॉर आहे. सात, आठ प्रकारची स्थलांतर करून येणारी बदकं इथल्या पाणथळी जागांवर दिसतात. भुवई बदक, थापट्या बदक, तलवार बदक अशी कितीतरी बदकं. दुर्दैवाने यातली काही एनडेंजर्ड लिस्ट मध्ये आहेत.

हा काही फक्त पक्ष्यांचा देश नव्हे.. चतुरांचाही आहे. हिरवे झगझगीत चतुर मुरमुटीची तुरट पानं खाताना दिसतात. फुलपाखरांचाही आहे. गदिमांच्या शब्दात सांगायचं तर, ‘कळी कळीवर डंख मारत, गंध पोखरणाऱ्या’ फुलपाखरांचा हा देश. फुलपाखरांच्या ११० प्रजातींची नोंद इथं झाली आहे. मोठा चांदवा नळीच्या माळावर थिरकत उडतो. गदिमा म्हणतात,

“एक पाखरू बाग थिरकवी 

पिडा देतच फुले हरखवी” 

‘चट्टेरी भटक्या’ रानोमाळ भटकत असतो. उन्हाचे कवडसे गवतावर पडावे तसा “कवडस” दिसतात. पण ते स्थिर नसतात. उडत असतात. अधून मधून “खंडित रूपरेखा” दिसतेच. ‘मयूर भिरभिरी’ रानोमाळ भिरभिरते. महाराष्ट्र राज्याचे राज्यफुलपाखरू आहे “नीलवंत” ब्ल्यू मरमॉन. जवळजवळ तळ हाताएव्हढे, आकाशाच्या निळाईत, मोरपीशी निळा मिसळलेला, अशी स्वतःची म्हणून एक निळीछटा मिरवणारं आहे हे फुलपाखरू!

सरपटणारे साप, जमिनीलगत राहणारे, सरडे, ससे, घोरपडी हे प्राणी आहेतच. तरस खोकड आहेत. गवत्या, मांज-या, रसेल कुकरी अशा निम विषारी, बिनविषारी सर्पांपासून फुरसे, घोणस अशा अव्वल विषारी सर्पांचाही, हा अधिवास आहे.

दिवस चढत जातो तसं माणदेशातलं ऊन निबर होत जातं. थोडक्या पावसावर समाधान मांडणारा हा प्रदेश. माणदेशी माणसांना ढगही मेंढरा सारखेच भासतात. तेवढ्यानेही जनावरांना हिरवं बाटूक चघळायला मिळतं. तेवढ्याच थोडक्या पावसावर गवत फुलांचं सूक्ष्म सौंदर्य बहरून येत.

या प्रदेशाचं गवताळ प्रदेश म्हणून स्वतःचं एक महत्त्वाचं स्थान आहे. एक संस्कृती आहे. इथं गजी नृत्याची कित्येक वर्षांची परंपरा आहे. यात्रा-जत्रा, सणउत्सव, समारंभ जोशपूर्ण, ढोल आणि गजी नृत्या शिवाय पार पडतच नाहीत. किरकसालच्या ग्रामस्थांना याची मनोमन जाणीव आहे. त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी किरकसाल आदर्श गाव बनवलं आहे. किरकसाल संवर्धन प्रकल्पाचे काम जोमानं सुरू आहे. “गाव पक्षी” असलेलं कदाचित हे एकमेव गाव. स्वच्छता राखणारा खाटिक किरकसालचा “गाव पक्षी” आहे. लांडगे इथल्या माळरानाचे सम्राट. पण ही प्रजातीही धोक्यात आली आहे. जाणीव जागृती म्हणून आवर्जून “लांडगा दिन” ही इथं साजरा केला जातो. या प्रदेशात पर्यटक यावे, पर्यटन वाढावे म्हणून अनेकजण प्रयत्नशील आहेत. पक्षी निरीक्षणासाठी, लांडग्यांच्या सायटिंग साठी इथं जावं. इथं येणाऱ्यानी आवर्जून गावरान ज्वारी-बाजरीची भाकरी, हुलग्याची आमटी खावी.

या प्रदेशात मेंढ्यांच्या लोकरी पासून ‘जेन’ बनवलं जातं. ब्रॅण्डेड गालीचे त्यापुढे ते काय? बाळ लोकरी पासून बनवलेलं जेन तर अगदी मुलायम. जमिनीवर अंथरून, पाठदुखी वगैरे विसरून निर्घोर झोपावं. बचत गटांच्या माध्यमातून आणि श्रीमती चेतना सिन्हा यांच्या मार्गदर्शनातून गोधड्या करून त्यांची विक्री होते.

माण देशाला फारसा इतिहास नसेल पण उज्ज्वल भविष्य नक्कीच आहे.

व्यंकटेश माडगुळकरांनी अजरामर केलेल्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीचे श्री राम देशमुख यांनी इंग्लिश मध्ये भाषांतर केलं आहे… ”The village had no walls “. कोणताही आड पडदा न ठेवणारा, कोणत्याही भिंती नसलेला माण देश सगळ्यांचं खुल्या दिलानं स्वागत करायला आसुसला आहे..

लेखिका : Adv. सीमंतिनी नूलकर

 ssnoolkar@gmail. com

प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

medhasahasrabuddhe@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ५ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ५  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

यत्प्राप्य न किञ्चिद्वाञ्छति, न शोचति, न द्वेष्टि, न रमते, नोत्साही भवति ॥ ५ ॥

अर्थ : जे (भक्तिप्रेम) प्राप्त करून (तो पुरुष) अन्य (कशाचीही) किंचितही इच्छा करीत नाही (कोणाकरताही) शोक करीत नाही, (कोणाशीही) द्वेष करीत नाही, (कोणत्याही विषयात, वस्तूत किंवा व्यक्तीमध्ये) रममाण (आसक्त) होत नाही, कोणत्याही (लौकिक कार्यात) उत्साहयुक्त होत नाही.

सदानाम घोष करु हरी कथा, लेणे माझ्या चित्ता समाधान ॥धृ. ॥

सर्व सुखाल्यालो अलंकार, आनंद निर्भय डुलतसे ॥१॥

असो ऐसा कोठे आठवच नाही, देहीच विदेही भोगू दशा ॥२॥

तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप, लागो नाही अंगा पाप पुण्या ॥३॥

(संदर्भ: अभंग क्रमांक ३२५४, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

जो साधक नामस्मरण भक्ति अथवा कोणतीही भक्ति करतो, त्याला सर्व सुख प्राप्त होतात, तो निर्भय होतो, जो गुण दोषांपासून तो मुक्त होतो, अर्थात त्यामुळे अधिकाधिक निर्भय होत जातो. त्याची अंतिम स्थिती अशी होते की तो अग्निप्रमाणे तेजःपुंज होतो, त्यामुळे त्याला या नश्वर जगातील सुखदुःखे त्रास देऊ शकत नाहीत. भक्तीमुळे काय मिळत किंवा काय मिळवायला हवं, त्याचा उहापोह संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात केला आहे.

एका मनुष्य झोपला होता. त्याला एक स्वप्न पडलं, त्यात तो राजा झालेला होता. प्रचंड ऐश्वर्य होतं, दासदासी होते, अनेक प्रकारची सुख होती…, काही काळ तो राजा राहिला, पण तेवढ्यात त्याला त्याच्या बायकोने हाक मारली…, तो उठला आणि कामाला लागला…, तो काही त्याच्या बायकोवर रागवत बसला नाही….! त्या मनुष्याला दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वप्न पडले, त्यात तो भिकारी झाला होता, त्याला कोणीच भीक घालत नव्हते, सर्वत्र त्याला लोकं टाळत होते…, खूप त्रासला होता तो… इतक्यात गजर वाजला आणि तो झोपेतून जागा झाला आणि आपले नित्य व्यवहार करू लागला….! या दोन्ही स्वप्नांचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही कारण त्याला माहीत होते की आपण स्वप्न पाहिले आहे, स्वप्नांत राजा झालो काय किंवा भिकारी झालो काय, याने काय फरक पडतो….!

साधना वृध्दिंगत होत गेली की भक्ताची भूमिका बदलत जाते, नश्वर जगातील सुखदुःखे, लाभहानी, त्याला तुच्छ वाटू लागतात कारण हे जग त्याला स्वप्नवत वाटू लागते, याचा परिणाम असा होतो की त्याची इच्छा (वांछा) मरून जाते…, ज्याप्रमाणे भीक मागण्याची वेळ आली म्हणून दुःख करीत नाही, तसा तो शोकही करीत नाही. स्वप्नच असल्याने मनुष्य तेथे रमत देखील नाही. त्याच्या चित्तवृत्ती जीर्ण होऊ लागतात. त्यामुळे तो कोणत्याच गोष्टी अतिउत्साह दाखवत नाही, जे प्रारब्धाने वाट्याला येईल, ते आनंदाने स्वीकारतो…. आणि नित्य आनंदात राहतो…

असा भक्त आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट भगवतांचा प्रसाद म्हणून स्वीकारतो, स्वाभाविक त्याचे जीवन प्रसादरूप होऊन जाते….! !

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. ५

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप…’ – माहिती प्रस्तुतकर्ता : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप…‘ – माहिती प्रस्तुतकर्ता : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

मागच्याच महिन्यात आठ तारखेला रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात अंजली हेळकर प्रसूतीसाठी दाखल झाली. चिरेखाणीवर काम करणाऱ्या अंजलीची हिमोग्लोबिन पातळी होती केवळ सहा. त्यामुळे प्रसूतीसाठी रक्त पुरवणे गरजेचे होतेच. लगेचच रक्तगटाची तपासणी केली गेली. आणि रिपोर्टमध्ये ‘ओ’ पॉझिटिव्ह रक्तगटाची नोंद झाली. सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पण खरी मेख पुढेच होती. ‘ओ’ गटाचे रक्त चढवण्यासाठी ‘मॅच’ करण्यात आले पण ते मॅच झालेच नाही. नेमका काय प्रकार झाला हे कळेना. मग पुन्हा एकदा लॅब टेक्निशियन आणि वैद्यकीय टीमच्या सल्ल्याने एक टेस्ट केली गेली. या टेस्टनंतर कळलं की हा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ आहे. आता मात्र सगळे हादरले. कारण हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट.

जगभरात केवळ 400 लोक या रक्तगटाचे आहेत. त्यातले भारतात केवळ 179. या रक्तगटाचा शोध मुंबईत लागल्यामुळे त्याला ‘बॉम्बे ब्लड’ ग्रुप हे नाव मिळाले.

आता रत्नागिरीत हा रक्तगट कुठे आणि कधी मिळणार हा प्रश्न होता. मग सोशल मीडियावर या रक्तगटाची गरज असल्याचा मेसेज फिरवण्यात आला.

योगायोगाने सांगलीच्या विक्रम यादव या तरुणाच्या हाती हा मेसेज पडला. विक्रमचा स्वतःचाच रक्तगट होता बॉम्बे ब्लड. मेसेज वाचताच विक्रमने चक्क दुचाकीवर रत्नागिरी गाठले. त्वरित रक्त मिळाल्याने आज अंजली आणि तिचे बाळ सुखरूप हाती लागले आहे. नंतर विक्रमचा जिल्हा शासकीय रूग्णालया मार्फत सत्कार देखील करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. आर. आरसुळकर सांगतात, हिमोग्लोबीन कमी असल्याने अंजलीची परिस्थिती नाजूक होती. तिला रक्त दिलं गेल्याने तिच्यात लवकरच सुधारणा होईल. बॉम्बे ब्लड ग्रुप असल्याचे लवकर कळत नाही. सुरूवातीला तो ओ पॉझिटीव्ह म्हणून दाखवतो, मात्र ओ पॉझिटीव्ह जेव्हा मॅच होत नाही तेव्हा तो बॉम्बे ब्लड ग्रुप आहे का, याची खात्री करावी लागते.

बहुतेकांना ओ, बी, ए पॉझिटीव्ह – निगेटीव्ह ब्लड ग्रुप माहिती असतात. पण यापलीकडे आणखी एक ब्लड ग्रुप असेल याची माहिती फारशी नसते. देशातील नाही तर संपूर्ण जगातील दुर्मिळ असा हा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’. या गटाचे रक्तदाते अत्यंत कमी असल्यामुळे हे रक्त उपलब्ध करणे ही मोठी समस्या आरोग्य यंत्रणेला भेडसावते.

आपला रक्तगट दुर्मिळ आहे हे विक्रमही जाणून आहे. स्वत:च्या दुचाकीमागे त्याने ठळक अक्षरात ‘बॉम्बे ब्लड ग्रुप मोफत सेवा’ असे लिहूनच ठेवले आहे. सामाजिक बांधिलकीतून विक्रम करत असलेले कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. विक्रम सांगतो, ‘माझा ब्लड ग्रुप जगातील दुर्मिळ गट असल्याची कल्पना असल्यानेच मी मदतीसाठी आलो. रक्तदान केल्याने माझे रक्त कमी झाले नाही तर वाढले आहे. तसेच आता मला एका मातेचे, बाळाचे आशिर्वाद लाभले आहेत’.

विक्रम यादव यांचा संपर्क क्र. – 9970018001

(जास्तीत जास्त शेअर करा.)

माहिती प्रस्तुतकर्ता : अज्ञात 

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “प्रतिक्रिया आणि प्रतिसाद…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “प्रतिक्रिया आणि प्रतिसाद…☆ श्री जगदीश काबरे ☆

प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यात नेमका फरक काय ? खरं तर दोन्हीही प्रत्युत्तरे… एखाद्या घटनेवर व्यक्त होण्यासाठी केलेली एक क्षणैक कृती आणि दूसरी कालांतराने केलेली कृती.. प्रतिक्रियेत विचाराला संधी नाही. आधी करून मोकळे व्हायचे, मग मागचा पुढचा विचार. अनेकदा ती स्वसंरक्षणार्थ घडते… कधी बचावात्मक पवित्रा, तर कधी आक्रमणात्मक हल्ला. पण क्षणाचीही उसंत न दवडता घडते, ती प्रतिक्रिया… ‘आरे ला का रे म्हणणे’ म्हणजे प्रतिक्रिया.

प्रतिसादाचे तसे नाही. तेथे वेळ आणि विचार महत्वाचा. समोरच्याच्या विधान आणि कृतीचा पूर्ण परामर्श घेऊन, त्यातील गर्भितार्थ जाणून घेऊन, ठरवून केलेली क्रिया म्हणजे प्रतिसाद. प्रतिसाद म्हणजे एक बुध्दीबळाचा डाव. माणसाला अर्थपूर्ण जगायचे तर प्रतिसाद सक्षम आणि विचारी हवा. अंगाशी येणारा विषय टाळायचा असेल तर प्रतिक्रिया तीक्ष्ण हव्यात. गरज असते ती दोहोंमध्ये समन्वय साधण्याची आणि कुठे काय वापरायचे याचे तारतम्य ठेवण्याची. प्रतिक्रियेत बरेचदा तारतम्य आणि ताळतंत्र सुटते. भान हरपून शब्द चुकीचे वापरले जातात, प्रसंगी भाषा शिवराळ होते आणि मस्करीची कुस्करी होते.

प्रतिसाद ही अभ्यासाने साध्य करावयाची गोष्ट आहे, तर प्रतिक्रिया ही ‘स्व’ला जपण्यासाठी होणारी नैसर्गिक उर्मी आहे. माणसाच्या बुध्दीमत्तेचा जसजसा विकास होत गेला आणि तो जसजसा वानाराचा नर होत गेला तसतशी त्याच्या प्रतिसादात उत्क्रांती होत गेली. प्रतिक्रिया मात्र त्याच्या उगमाच्या वेळी जशा होत्या तशाच राहिल्या आणि पुढची अनेक शतके त्या तशाच रहातील. म्हणूनच नराचा नरोत्तम होण्यासाठी त्याच्या प्रतिसादामध्ये सकारात्मक गुणवत्ता वाढीस लागली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने अंतर्भूत होऊन कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करतांना थोडासा विचार करण्याची गरज आहे. महत्वाचे म्हणजे विचाराने केलेली कोणतीही कृती म्हणजे प्रतिसाद हा क्षणिक प्रतिक्रियेच्या प्रत्युत्तरापेक्षा अधिक लाभदायी ठरतो, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

©  श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ इतिहासातील चिरंजीवाची पूर्णाहुती… लेखक : श्री संतोष भोसेकर ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे  ☆

तात्या टोपे 

? इंद्रधनुष्य ?

☆ इतिहासातील चिरंजीवाची पूर्णाहुती… लेखक : श्री संतोष भोसेकर ☆ प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे ☆ 

१८५७ च्या क्रांति युद्धातील शूर सेनानी तात्या टोपे यांचे देशासाठी बलिदान करून अमर झाले ते आजच्याच दिवशी.

रामचंद्र पांडुरंग भट हे तात्या टोपे यांचे मूळ नाव. ते नाशिक जिल्ह्यातील येवले या गावचे. तात्यांचे वडील पेशव्यांच्या पदरी चाकरीला होते. नानासाहेब आणि तात्या बालपणी एकत्र खेळले, एकत्र मोठे झाले. लहानपणापासूनच तात्या टोपे अत्यंत स्वाभिमान साहसी वृत्तीचे होते. त्यांचे शौर्य पाहून बाजीराव पेशवे त्यांच्यावर खुश असताना एकदा तात्यांचे कौतुक करताना नवरत्नांनी मढवलेली एक मोठी टोपी तात्यांच्या मस्तकावर ठेवली आणि तेव्हापासून तात्या टोपे म्हणू लागले.

१८५७ च्या काळात तात्या टोपे नानासाहेबांच्या दरबारात लेखनिक म्हणून कामाला होते. उठावाच्या वेळी इंग्रजांनी कानपूरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले. नानासाहेबांचा पराभव झाला. तेव्हा मात्र तात्या टोपे यांनी आपल्या हातातील लेखणी खाली ठेवली आणि हाती तलवार घेतली.

नानासाहेब पेशव्यांना बिठुरहून फत्तेपूरला पाठवून स्वतः इंग्रजांशी लढत तात्या टोपे बिठुरलाच राहिले. इंग्रजांबरोबर त्यांची प्रचंड लढाई झाली त्यात तात्या टोपेंचा पराभव झाला. निवडक सैन्यासह दुथडी भरलेल्या गंगेत तात्यांनी उडी टाकून पैलतीरावरील फत्तेपुरला पोहोचले. तेथे नानासाहेब व तात्या टोपे यांनी मिळून कानपूर जिंकून घेतले. या सुमारास झाशीवर सर ह्यू रोज याने हल्ला चढवला. राणी लक्ष्मीबाईंनी तात्या ंची मदत मागितली. राणीच्या साहाय्यासाठी आपल्या सैन्यासह तात्या टोपे झाशीला गेले.

तात्या टोपे जवळ उत्तम संघटन चातुर्य होते. त्यांना हिंदी, उर्दू, मराठी, संस्कृत आणि सही पुरते इंग्रजी इत्यादी भाषा अवगत होत्या. इंग्रजांशी समोरासमोर न लढता गनिमी पद्धतीने लढण्याचे युद्ध पद्धती त्यांनी ठरवली. प्रचंड मोठा झंजावात केला. तात्या टोपे यांना पकडण्यासाठी इंग्रजी सैन्य धडपडत होते. त्यांना तिन्ही बाजूंनी घेरले. नर्मदा ओलांडून तात्या टोपे यांनी इंग्रजांना हुलकावणी दिली. ते इंग्रजांच्या दृष्टीने धोकेबाज ठरले होते. त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी जिवाचे रान केले. रिचर्ड मीड ने तात्या टोपे यांना पकडण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. तात्या टोपे यांचे मित्र मानसिंग हा फितूर झाला. मानसिंगने तात्यांचा विश्वासघात केला. त्यांने मीडच्या ताब्यात तात्या टोपे यांना स्वाधीन केले.

१८ एप्रिल १८५९ ग्वाल्हेर जवळील शिवपुरी येथे दुपारी चार वाजता फाशी देण्यासाठी तात्या टोपे यांना आणले. फाशीचा दोर स्वतःच्या हाताने गळ्यात भोवती अडकवला. मानेचा दोर आवळला गेला आणि क्षणार्धात…. सहस्रावधी देश बांधवांच्या डोळ्यात दुःखाश्रू उभे राहिले. सारा देश दुःख सागरात बुडाला. इंग्रजी सत्तेला आव्हान देणारा हा भारताचा स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्याचा झेंडा हाती घेऊन फाशी गेला. त्याचा मृतदेह सायंकाळपर्यंत तसाच लटकत होता.

१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाततील होमकुंडात तात्यांची शेवटची आहुती पडली. स्वातंत्र्यवीर सावरकर “१८५७ च्या स्वातंत्र्यसमर” ग्रंथात म्हणतात…

तो फास रक्ताने भिजला आणि देश अश्रूंनी ओलाचिंब झाला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अत्यंत कष्ट सोसले हाच त्याचा अपराध होता. देशद्रोही विश्वासघाताच्या दुतोंडी चालीचे हे बक्षीस त्यांना मिळाले आणि त्यांचा शेवट एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे फासावर लटकविला. तात्या, तात्या ह्या असल्या दुर्दैवी देशात तुम्ही कशाला जन्म घेतला? ह्या दुर्बळांच्या अश्रूंसाठी आपण रक्त सांडावे खरोखर कसला हा महागडा सौदा!!

गनिमी काव्याच्या रणपंडिताला शतशः प्रणाम.

लेखक : श्री संतोष भोसेकर

प्रस्तुती – सौ. मेधा सहस्रबुद्धे

पुणे

मो  9420861468

medhasahasrabuddhe@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भिशी झाडांची… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ भिशी झाडांची… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘झाडांची भिशी’ ही कल्पना अनेकांना नवीन वाटेल. — – – 

झालं असं, यशवंत पेठकर नावाचे डॉक्‍टर शाळेपुढील जागेत शाळेच्या परवानगीनं वृक्षारोपण करीत होते. त्यांचे मित्र डॉ. सचिन पुराणिक यांनी ते पाहिलं. शाळेपुढं झाडं लावण्याची त्यांची कृती सचिन यांना अभिनव वाटली. पण एकट्या-दुकट्यानं हे काम केलं, तर त्याला व्यापक स्वरूप येणार नाही, काहीतरी वेगळी कल्पना लढवली पाहिजे, असं त्यांच्या मनानं घेतलं.

एका-दोघांनी झाडं लावण्यापेक्षा ही सामूहिक कृती व्हायला हवी, पण त्यासाठी पैसे हवेत. ते कसे उभे करायचे?

डॉ. सचिन यांचा आपल्या मित्रांवर भरवसा होता. त्यांनी काही मित्रांना झाडांच्या भिशीची कल्पना सांगितली. सगळ्यांनी ती उचलून धरली आणि पाहता पाहता ती आकाराला आली. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्वांनाच स्वतः झाडं लावण्यासाठी वेळ देणं शक्‍य नव्हतं. शिवाय त्या झाडांचं संगोपनही करण्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. सगळ्यांनी मिळून त्यावर तोडगा काढला.

🌲🌳

दोन वर्षांत सोलापुरात ७०० झाडं लावण्यात आली आणि ती सगळी जिवंत आहेत.

🎄🌳🌴

अशी आहे भिशी….

सुरवातीला बारा डॉक्‍टरांनी मिळून सुरू केलेल्या या भिशीमध्ये आता ८८ सदस्य आहेत. त्यातील अनेक जण उद्योजक, इंजिनिअर, आर्किटेक्‍ट किंवा अन्य व्यवसायांतील आहेत.

🌳🌲

 प्रत्येकाकडून दरमहा दोनशे रुपये घेऊन महिन्याला दोन लकी ड्रॉ काढले जातात. ज्यांच्या नावाचा ड्रॉ निघाला, त्यांच्या पसंतीची योग्य वाढ झालेली रोपं खरेदी केली जातात.

🌱 🎋 🪴

त्यांच्याच सूचनेनुसार वृक्षारोपणाची जागा निश्‍चित केली जाते. त्याची निगा आणि संगोपनाची जबाबदारी ठरवली जाते. त्यानुसार कधी समारंभपूर्वक, तर कधी साधेपणानं लागवड केली जाते.

🌱🌿🌳🌴

भिशीच्या पैशातून रोपखरेदी, जाळीचे किमान पाच फुटांचे ट्री गार्ड खरेदी केले जाते. ड्रॉ निघालेल्या सदस्याच्या घराच्या, बंगल्याच्या आवारात रोप लावले जाते. तेथे जागा नसल्यास शाळा किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी ते लावले जाते.

 🌲🌳🎄🌴

सोलापुरातील विविध शाळा या मंडळींना आपल्या शाळेत वृक्षारोपणाची विनंती करतात. रेंज फॉरेस्ट ऑफिसर संजय माळी यांना ही संकल्पना समजली. दिवंगत ‘वृक्षमित्र’ बाबूराव पेठकर आणि पर्यावरणतज्ज्ञ सिद्राम पुराणिक या सगळ्यांनी या उपक्रमाला मार्गदर्शन केले.

🎄🌲🌳🌴🌴

दोन वर्षांत सातशे झाडं स्वखर्चाने लावणाऱ्या या निसर्गप्रेमींची दखल राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही घेतली. त्यांनी या ग्रुपमधील काही सदस्यांना मुंबईला निमंत्रण देऊन ही कल्पना समजून घेतली. त्यांच्यापुढे झालेल्या सादरीकरणामुळे हा उपक्रम आणखी जोमाने सुरू झाला.

🌵🌲🌳

हिमाचल प्रदेशात एक लाख औषधी वृक्षांची लागवड केलेल्या योगी अरविंद यांना या उपक्रमाची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी सोलापूरला आवर्जून भेट देऊन या मंडळींना मार्गदर्शन केले.

🎄🌾🎋

झाडांचा वाढदिवस लावलेल्या झाडांची महिन्यातून दोनदा तपासणी केली जाते. रोप व्यवस्थित रुजले आहे की नाही ते पाहिले जाते. बऱ्याचदा रोप रुजत नाही, तेव्हा दुसरे रोप लावले जाते. लागवडीला वर्ष पूर्ण झालेल्या झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो. झाडाचं संगोपन करणाऱ्यांचे कौतुक केले जाते. हा उपक्रम सोलापूरकरांना आवडला आहे. आता कित्येक जण आपल्या वाढदिवशी किंवा लग्नाच्या वाढदिवशी झाडं लावण्याचा संकल्प करतात व या उपक्रमात सहभागी होतात.

🌳🌲🌴🎄

डॉ. सचिन यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती वाढत आहे. एकाच ग्रुपमध्ये अधिकाधिक सदस्य वाढवण्यापेक्षा शहराच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळे भिशी ग्रुप व्हावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यामुळे आणखी ग्रुप तयार झाले आहेत. झाडं लावणाऱ्यांची सावली झाडंच सांभाळतात.

🌲🌴

असा हा उपक्रम पाहता म्हणावे लागेल…….

🌳🌴

कवी नारायण सुमंत यांच्या शब्दांत सांगायचे, तर ‘फुलता आले नाही त्यांनी फुलवून जावे थोडे, रुजण्याजोगे झाड पाहून लावीत जावे झाडे.

🎄🌳 🌴

जीवनाच्या शोधात आपण मृत्यूच्या किती जवळ आलो आहोत, याचा या मंडळींनी इतका सुंदर विचार करून अमलात आणला आहे.

🌳🪴🌲🌳

कारण आज लोकांना खूप उकाडा जाणवत आहे पण एसी कधी घेणार याची चिंता आणि विचार माणूस आज करत आहे. भारतात ५०० कोटी झाडांची गरज आहे आणि ही फक्त सुरुवात आहे. ४५ सेंटीग्रेड ते ४९ सेंटीग्रेड हे तापमान ५५ सेंटीग्रेड ते ६० सेंटीग्रेड व्हायला वेळ लागणार नाही.

🎄🌳🌲🌴

५६ सेंटीग्रेड वर मानव जगणार नाही हे आपल्याला समजून घ्यावे लागेल आणि रोपे लावावी लागतील.

 🌾🌿🌴🌳आत्तापासूनच झाडे लावा कारण एक झाड मोठे होण्यासाठी पाच ते सात वर्षे लागतील. आता पाऊस येणार आहे. दोन झाडे नक्की लावा सर्व काही सरकारवर सोडू नका.

🎄🌲🌳🌴

ज्यांना जमेल त्यांनी वरील प्रमाणे भिशी सुरू करा झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाढवा.. 🙏

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता गाडगीळ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “थांबणे…” – लेखक –  डॉ अनिल अवचट ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “थांबणे…” – लेखक –  डॉ अनिल अवचट ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

कुठे..?

केव्हा..?

कसे थांबावे..?

ही एक कला आहे.

ती सर्व कलांमध्ये लागू होते..!

कविता, कथा, कादंबरी, चित्र, शिल्पात कुठे थांबायचे याला संयम आणि विवेक लागतो. अन्यथा आशय भरकटत जातो. तसे जीवनातही घडते.

माझ्याभोवती तरुणपणी अलौकिक माणसे होती. त्यांच्यामुळेच ही जाणीव मला होत गेली. विंदा करंदीकर माझे शेजारी आणि प्रतिभावंत कवी. एकदा त्यांनी ठणकावले की, आता मी लिखाण बंद करतो आहे. आणि त्यांनी शब्द पाळला.

स्वत:शी प्रामाणिक राहून या निर्णयापर्यंत यावयास धारिष्ट्य तर लागतेच; पण विसर्जनाची बूजही लागते. तसेच तात्या माडगूळकरही होते. तेही माझे मित्र होते. आयुष्याच्या उताराला लागले तेव्हा या उमद्या लेखक, चित्रकार, शिकारी आणि प्रवासी माणसाने हाच मार्ग अवलंबला. ते म्हणायचे, ‘गड्या, जगण्याची आतून उमेद राहिली नाही…! ‘

विंदा शेवटपर्यंत प्रसन्न राहिले. भाजी, मासे आणायला आम्ही सोबतीने जात असू. मासेवाल्या बाईशी घासाघीस करायला त्यांना मजा येत असे. तेव्हा त्यांच्यातला कवी बहुदा त्यांच्या पिशवीत त्यांनी लपवून ठेवलेला असे. तितक्याच आत्मीयतेने ते संगीतात रमत. तसेच तात्या होते. संध्याकाळी आम्ही गप्पा मारीत फेरफटका मारीत असू. तेव्हा त्यांच्यातल्या अद्भुत लेखकाची सावली कुठेही त्यांच्याबरोबर चालत नसे. उरलेले जीवन एखाद्या कवितेसारखे गुणगुणत ही माणसे कुठलेही आविर्भाव न घेता जगले.

पु. ल. देशपांडे यांनीही वेळेनुसार आवराआवर केली. देणग्या देऊन, पुस्तके/ पुस्तकांचे हक्क त्यांनी वाटून टाकून ते मुक्त झाले आणि उरलेले आयुष्य एक गिफ्ट ळाल्यासारखे हसत जगले.

‘जोपर्यंत लोकांना वाटते आपण अजून खेळावे, तीच थांबण्याची योग्य वेळ असते…! , ‘ हे सुनील गावस्करचे वाक्य तंतोतंत यात बसते. कोठे थांबावे हाच संयम त्यात आहे.

विद्वान तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणजे आमचे आबा. त्यांचा व्यासंग, प्रभुत्व, त्यांची जाण, अभ्यास, समाज सुधारण्यासाठीचे त्यांचे दीर्घ कार्य सर्वानाच ठाऊक आहे. त्यांच्या सहवासात मला हेच जाणवते. या प्रचंड ज्ञानाच्या ग्रंथसंग्रहालयातून ते अचानक जुन्या महाबळेश्वरच्या घरी गेले. ड्रायव्हरला सांगितले, ‘सकाळी काही घाई नाही. ‘ ड्रायव्हर जेव्हा आत आला तेव्हा छातीवर हात ठेवून आबांचे विसर्जन झाले होते.

ज्ञानी आणि भक्कम जीवनाचा अर्थ कळलेले हे ऋषीच म्हणावे लागतील. साहित्य सहवासात संध्याकाळी फिरताना गंगाधर गाडगीळ एकदा भेटले. गाडगीळ हे ब्रिटिश शिस्तीतले होते. सगळं नीटनेटके, वेळेवर असायचे, जसे त्यांचे वाड:मय आणि आयुष्य होते. त्या संध्याकाळी त्यांचा ड्रेसदेखील इस्त्री केलेला, तंतोतंत होता. त्यांच्या मदतीला बरोबर नोकरही होता. मला त्यांनी थांबवले आणि म्हणाले, ‘मिस्टर अवचट, बरे झाले आत्ताच भेट झाली…! आता पुढे भेट शक्य नाही. ‘

‘परदेशी चाललाय का…? , ‘ मी विचारले. ‘नाही. आत्ता सारे थांबवले आहे. लिखाण आणि इतर गोष्टी व्यवस्थित आवरल्या आहेत. औषधे बंद केली आहेत. आता एकेक मित्रांना भेटतो आहे. थँक्यू, तुमचा सहवास लाभला…! ‘

ते शांतपणे नोकराबरोबर फाटकापाशी चालत गेले. त्याच आठवड्यात ते गेल्याचा निरोप आला. या लोकांनी हे विसर्जन किती समजूतदार आणि अलिप्तपणे स्वीकारले होते.

ओशोंनीही अत्यंत वेगळ्या संदर्भाने विसर्जनावर लिहिले आहे. Abandoning करणे, सोडून देणे अशी सारी अंगे या विसर्जनात येतात. ओशोंनी शेवटी सांगितले, माझ्या गळ्यात घातलेल्या माळा फेकून द्या. संन्याशी भगवे कपडे काढून टाका. स्वत:चा संन्यास स्वत: शोधा. जे मौनात विसर्जित होते तेच चांगले संगीत…! त्यांच्या या वाक्यातच जीवनाच्या संगीताचे अर्थ सामावले आहेत.

जगण्याच्या या शर्यतीत प्रत्येक जण निराळे मार्ग शोधतो. बहुतेकांना ते आयते हवे असतात. कोणाच्या तरी खांद्याची, दैवताची डोके ठेवण्याची त्यांची गरज असते. पण विसर्जन हा तुमच्या बौद्धिक पातळीचा, मनाचा एक भाग आतल्या आत असतो; जो भाग एखादा गुरू प्रसाद म्हणून तुमच्या हातात देत नाही.

वयाप्रमाणे जीवनाशी सामील होणे यातच खरी ग्रेस आहे. अंगणात उन्हात तांदूळ निवडत बसलेल्या, साईसारखी त्वचा झालेल्या प्रेमळ आजीमध्ये ती ग्रेस असते.

कोऱ्या हॅण्डमेड पेपरवर रंगाचा पहिला ठिपका टाकल्यावर तो हळुवार पसरत जातो. पुन्हा अनेक रंगांत तो मिसळत जातो. त्याच्या कंट्रोल्ड ओघळांनी किंवा छटांनी एक चित्र बनते. कधी ते देखणे दिसते, कधी जमत नाही. हे महत्त्वाचे नाही. ती प्रोसेसच दैवी असते. त्या कागदावरच्या रंगाच्या प्रत्येक ठिपक्यात पारदर्शक विसर्जनाचे क्षण तरंगत असतात.. बदलत राहतात. विघटन हे अलौकिक अ‍ॅबस्ट्रॅक्ट नॅचरल चराचरातील मौनच असते.

समतया वसुवृष्टि विसर्जनै

जंगलात, ऋतुचक्रात हे सामावलेले असते. हत्तीला कळते आपले दिवस संपायला आलेत. कळपातून तो अपरात्री गुपचूप पाय न वाजवता निघतो आणि पूर्वीच शोधलेल्या गुप्त ठिकाणाकडे तो चालत राहतो. तो तेथे पोहोचतो आणि स्थिर उभा राहतो. त्याचा एवढा प्रचंड बलवान देह हळूहळू काही दिवसांत संपतो आणि मातीशी एकरूप होतो…

हे विसर्जन…!!!

झाडाचे पिकले पिवळे पान फांदीवरून निसटते. हवेत तरंगत मौनाच्या प्रार्थनेसारखे जमिनीवर अलगद टेकते आणि विसर्जित होते. अगदी हळुवारपणे. विसर्जन ही मौलिक गिफ्ट आहे.

आजकाल लोकाना कुठे थांबावे हेच समजत नाही. जीव संपला तरी हावरटपणा जात नाही. छाती फुटेपर्यंत लोक धावत असतात मागे वळून बघत नाही. स्वत:ची पर्वा नसते का..? तर जेवढे कमवता येईल तवढे पदरात पाडून घ्यायचे पण एक दिवस सर्व असुनही सर्व संपल्यासारखे दिवस येतात तेव्हा हातात फक्त निराशा आणि अंधारच दिसतो. ऐश्वर्य येते पण ते भोगायची मनस्थिती नसते. मग जीवनभर एवढे पळून काय उपयोग झाला. शेवटी हे सगळे मायाजाल न संपणारे आहेत. त्यातून आपणच ठरवून विरक्त होणे केव्हाही चांगलेच…!!!

विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण तेवढा पण वेळ आपल्याला नाही…!!!!

लेखक : डॉ अनिल अवचट 

(डॉ. अनिल अवचट यांची मृत्यूपूर्वीची शेवटची पोस्ट) 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares