मराठी साहित्य – विविधा ☆ देव आहे तरी का? — लेखिका : सौ सुनंदा म जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

🌸 विविधा 🌸

☆ देव आहे तरी का? — लेखिका : सौ सुनंदा म जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

देव आहे तरी का?

जगात सर्वत्र लोक खूप संभ्रमात आहेत. गोंधलेले आहेत की, इतकी सगळी क्रूरता समाजात उघडपणे वावरत असताना, देव गप्प का? देव आहे तरी का? आणि तो असला तर आंधळा-बहिरा-मुका आहे का?

हल्ली लोकांचे स्वच्छंदी वागणे, घसरती सामाजिक नैतिक मूल्ये, देशादेशामधील युद्धे, देशांतर्गत विविध गटांमध्ये वैर, गल्लोगल्ली घडत असलेले अपराध, अपहरण, घरफोड्या, लुटालूट इ. सर्व पाहून लोकांना आश्चर्य तर वाटतेच पण त्यापेक्षा शंकाच जास्त वाटते की, हे सर्व देव का घडू देतो? त्याला हे दिसते की नाही? तो काही करत का नाही? तो आंधळा-बहिरा-मुका आहे का? तो आहे तरी का नाही?

अर्थात आपल्या सर्वांना हे माहित आहे की, देवाने काही ते सर्व दुष्कृत्य सुरू केलेले नाही. हे सर्व अनर्थ वारंवार घडतात कारण आपण देवाकडे दुर्लक्ष करतो. आज समाजात दुष्टता आहे, अन्याय आहे, कारण लोक स्वार्थी, लोभी, कामलोलुप, हावरे व अधाशी आहेत. आपली खरी समस्या ही आहे की, हल्ली मोठ्यामोठ्या शहरातील सामाजिक स्थिती गुन्हेगार निर्माण व नियंत्रित करीत आहेत.

हे गुंड बँका, लुटतात. पैसे घेऊन कोणाचाही खून करतात, जाळपोळ करतात, व बलात्कार करतात. हे काही एका दिवसात जादूने निर्माण झालेले नाही. ते तुमच्या आमच्या घरातच निर्माण झालेले आहेत. कदाचित आपल्या शाळा-कॉलेजमध्ये ते शिकले असतील. आपल्याच समाजात वावरत मोठे झाले. कदाचित त्यांच्या लहानपणापासून लहान-मोठ्या चुकांसाठी आपण त्याला क्षमा करीत आलो. शेजारच्या कंपौंडमधून पहिल्यांदा जेव्हा मुलांनी आंबा तोडून आणला तेव्हा, आपण म्हणालो, “जाऊ द्या! लहान आहेत! ” त्यांच्या दुसऱ्या-तिसऱ्या अपराधाकडेही आपण दुर्लक्ष केले. कारण त्यांना आपण अजूनही शिक्षण-प्रशिक्षण देत आहोत, अशी आपली धारणा होती. हळूहळू वाढत्या वयाबरोबर त्यांच्याकडून सहज घडणाऱ्या अपराधांचे स्वरूपही अधिक गंभीर झाले. ट्रेनमधील उपकरणे तोडणे, सीट-कव्हर फाडणे, खरेदीच्या निमित्ताने दुकानातील वस्तू उचलणे, लायब्ररीच्या पुस्तकातील पाने फाडणे, कट्ट्यावर बसून मुलींची छेड काढणे, मारामारी करणे ह्या सर्व गोष्टी त्यांच्या तारुण्यातील उत्साहाचे मात्र निरूपद्रवी प्रकटन आहे, असे आपल्याला वाटते. गंभीर गुन्हाची नोंद होऊन केस चालली तरी कोर्ट त्यांना वीस वर्षाची कठोर शिक्षा न करता, वय लहान असल्यामुळे फक्त दोन वर्षे तुरुंगात ठेवण्याचा दंड देत असे. त्यावेळी ही देव आंधळा-मुका-बहिरा होता का? देव होता तरी का?

आपल्या नैतिकतेचा कणा असा मोडला जात होता. ऋषी- संस्कृतीचा अनादर केला जात होता. राष्ट्रीय सन्मान धुळीला मिळत होता. आपल्या आध्यात्मिक वैभवाचा अपमान होत होता. आणि हे करणारे आपणच विचारत होतो, ” अरे! देवा आहे कोठे? तो आंधळा-बहिरा-मुका आहे का?

मिसरूड फुटायला लागली व तरुण दाढी करायला लागला म्हणजे त्याला देशातील लक्षावधी लोकांचे भवितव्य ठरवण्याची योग्यता आपोआप प्राप्त होत नाही. सामाजिक व राजनैतिक क्षेत्रात कार्य करण्याचे योग्य प्रशिक्षण तरुणांना मिळाले पाहिजे. त्यांच्यात असणारा उत्साह दांडगा आहे. महत्त्वाकांक्षा नक्की महान आहेत. पण फक्त तेवढ्यासाठी त्यांचा उदोउदो होणं आश्चर्यकारक वाटत. ज्येष्ठ लोकांमधील समृद्ध अनुभवाची उणीव ते कशी भरून काढतील?

अपरिपक्व व अनुभवहीन असे पुढारी समाजाचे नेतृत्व करू लागतात. आणि सर्व क्षेत्रात गोंधळ माजतो. व्यापार, अर्थव्यवस्था, उत्पादन, शिक्षण, धर्म संस्कृती… कोठेच काहीही नीट राहत नाही. महागाई उच्चांक गाठते, बेरोजगारी वाढते, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई नेहमीचीच बाब होते. आपणच हे घडवून देतो आणि वर विचारतो, “अरे! देवा आहे का? असला तर तो आंधळा-बहिरा-मुका आहे का?

आपल्या देशातील तरुणांवर आपण अन्याय करीत आहोत. आईच्या कुशीतून घाईघाईने काढून त्याला पार्लमेंटमध्ये, डायरेक्टरच्या खुर्चीत आणि गल्लीबोळातील मंडळ राजकारणाच्या नेतृत्वाच्या आसनांवर बसवीत आहोत. आणि ते ज्या अनियंत्रित, बेफाम तरुणांच्या जमावाला उद्युक्त करून विनाशाच्या दिशेने घेऊन जातात. त्यांच्यापेक्षा हे काही अधिक शहाणे नसतात. हे स्वतः बेताल, बेफाम आणि बेपर्वा असल्यामुळे परिणाम विनाशकारी असतात.

बंद, दंगली जाळपोळ इ. च्या माध्यमातून लोकांना खूप गोष्टींचा त्याग करावा लागतो. पण त्यातून काहीही सामाजिक उपलब्धी होत नाही. प्रगती होत नाही. गरिबी, उपासमार वाढते. इतकेच नव्हे राष्ट्रीय सुरक्षिततेलाही तडा जातो. आणि आपण विचारतो, “देव आहे का? तो आंधळा-बहिरा-मुका आहे का?

स्वातंत्र्याच्या संकल्पनेत आपण हास्यस्पद मूर्खपणाच्या परिसीमेपर्यंत ताणले आहे. पाहिजे आहे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, Freedom is not in doing what you like, but in liking everything you have to do. आवडेल ते करायला मिळणे नव्हे, तर जे करावे लागत आहे त्यात आवड निर्माण करणे म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याच्या नावाखाली ज्याला जे करावयाचे आहे ते तो करतो. जे बरळायचे आहे ते बरळतो. आपल्यासमोर काही आदर्शच नाहीत. आपल्यात काही शिस्तच नाही. देव नाहीच असं आपण वागतो आणि देव आहे का? असलाच तर तो काय आंधळा-बहिरा-मुका आहे का? असे विचारतो.

काहीही करून समाजाने आता भानावर आले पाहिजे. आणि तेही लवकरात लवकर शाळा-कॉलेजामधून मुलांना काय शिक्षण मिळत आहे, हे पालकांनी पाहिले पाहिजे. पाल्याच्या प्रत्येक कृतीसाठी पालकांनी स्वतःला जबाबदार समजले पाहिजे. समाजात अपराध्यांची एक नवीन जात निर्माण होऊ लागली आहे. जिच्यामुळे असंख्य लहान मुले भिकारी बनवत आहेत, अपराधी बनवत आहेत, अपंग बनवत आहेत, बळी जात आहेत.

हल्लीची मुले देवळात जायला तयार नाहीत. त्यांना धर्माबद्दल आपुलकी नाही. संस्कृती बद्दल जाणून घेण्याची इच्छा नाही. अध्यात्मिक मूल्यांची चाड नाही, असे आपण रोजचेवर फार ऐकतो. आणि असाहाय्यपणे खांदे उडवून गप्प बसतो. ज्या संस्कृतीचे नेतृत्व राजकीय पुढाऱ्यांकडून झाले पाहिजे. तिचीच लक्तरे ते पार्लमेंटमध्ये सर्रास उडवित आहेत. आणि आपण म्हणतो…

कोणत्याही समाजाची प्रगती शांती शक्ती समृद्धी आणि संपत्ती, तसेच आरोग्य, शिक्षण व कायदा- सुव्यवस्था हे सर्व समाजातील दक्षतेनेच शक्य आहे. जे तरुण निर्धारित नियमांचे उल्लंघन करतात व त्यामुळे सामाजिक विनाशाला आमंत्रित करतात, ते अत्यंत भयंकर अपराधी मानले गेले पाहिजेत. ते ‘खोडकर मुलं’ नव्हेत. सुधारणेच्या पलिकडील ‘अपराधी’ आहेत. त्यांचे लाड करता कामा नये. त्यांना क्षमा करून उपयोग नाही. त्यांच्या अपराधांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे विनाश ओढवणे आहे.

या, स्वयंशिस्त व आत्मसंयम असणाऱ्या लोकांचा एक नवा देश निर्माण करूया. जो शक्तीने तरूण आणि बुद्धीने ज्येष्ठ असेल. सर्वांनी परस्पर प्रेमाने एकत्र येऊन श्रम करूया. उत्पादने वाढवूया. न्यायाने प्रत्येकाला त्याच्या अधिकारानुसार समृद्धी आणि ऐश्वर्याचा वाटा देऊया.

नक्कीच, देवसुद्धा मग आंधळा-बहिरा-मुका राहणार नाही. तो आहे. तो आता येथे आहे. तो नेहमीचआपल्याबरोबर आहे.

०००००

लेखिका : सौ सुनंदा म जोशी

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वटपौर्णिमेचे बदलते स्वरूप ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

?विविधा ?

☆ वटपौर्णिमेचे बदलते स्वरूप ☆ सौ. मुक्ता महेश अभ्यंकर ☆

वट पौर्णिमा हा महाराष्ट्र, गोवा या पश्चिम भारतीय राज्यांमध्ये विवाहित महिलांनी साजरा केलेला हिंदू उत्सव आहे.

अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राज्याची कन्या सावित्री हिचा शाल्व राजा धृमत्सेन ह्याचा पुत्र सत्यवान ह्याच्या शी विवाह झाला. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहित असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.

सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसा होते तेव्हा सावित्रीने उपवास करून व्रत केले. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्रीचे व्रत करतात.

भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री ही आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.

पूर्वी बायकांना घराबाहेर जायची परवानगी न्हवती. सणावारांच्या मुळे त्यांना घराबाहेर जाऊन पूजाअर्चा करून चांगले वस्त्र परिधान करून सख्यांना भेटायची संधी मिळावी हा हेतू साधून हे व्रत केले जायचे.

तीस वर्षा पूर्वी मला माझ्या मैत्रिणी बरोबर हे व्रत करायला जायची संधी मिळाली. गणपतीच्या मंदिरात वटवृक्ष असल्यामुळे वटपौर्णिमेच्या पूजे साठी बायकांची तिथे खूप गर्दी झाली होती.

मंदिराबाहेर पाच फळे व फुले विकायला विक्रेते बसले होते. खरे तर ती फळे खूप कोवळी होती व खाण्या लायक ही न्हवती तरीही ती सुवासिनींची ओटी भरण्यासाठी विकत घेतली जात होती.

पूजेसाठी रांगा लावून सगळ्या बायका थांबल्या होत्या. मधल्या वेळात काही बायका आपल्या नवऱ्या व सासूबद्दल कुरबुरी व तक्रारी सांगत होत्या. सासरी त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल ही सांगत होत्या. तिथे आलेल्या काहीजणी आपल्या संसारात तितक्याशा सुखी न्हवत्या व एक रीती रिवाज म्हणून व्रत करत होत्या. भरजरी साड्या, दागिने व गर्दी ह्या मुळे कधी एकदा पूजा संपते असेच बहुतेक जणींना झाले होते. नंतर नंतर गर्दी एवढी वाढली की वडा भोवती प्रदक्षिणा घालतांना एकमेकींचे धागे वडा भोवती गुंडाळून कशीबशी पूजा पूर्ण केली गेली. त्यात काही जणी मनापासून तर काही एक रीत म्हणून किंवा लोकांना काय वाटेल पूजा केली नाहीतर म्हणून तिथे पुजेसाठी आल्या होत्या.

खरतर नवऱ्या बायकोच्या नात्यात संवाद, विश्वास, आणि समजूतदारपणा महत्त्वाचे आहे. नवरा बायकोचे नाते हे प्रेमाने, आपुलकीने, आणि एकमेकांचा आदर करून टिकून राहावे व अडीअडचणीच्या वेळी त्यांनी एकमेकांना साथ द्यावी हे महत्वाचे आहे. नवऱ्यासाठी व्रत करणे उपवास करणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

नंतरनंतर ह्या पूजेला बदलते स्वरूप आले. बाजारात वडाच्या फांद्या विकत मिळू लागल्या व सुवासिनी ह्या फांद्या विकत घेऊन त्याची पूजा करू लागल्या. काहीकाही जणी घरात फांदी विकत आणून दहा पंधरा जणी एकत्र जमून पुजा करून फराळ करू लागल्या. काही बायका आपल्या सोयीप्रमाणे कामाच्या ठिकाणी वडाचे झाड शोधून हे व्रत पुर्ण करू लागल्या.

काही घरात ज्यांची मुलगी परदेशात आहे ते आभासी पद्धतीने म्हणजे व्हिडिओ कॉल करून पूजा करून हे व्रत करायच्या.

आता तर ह्या पूजेला एक इव्हेंट म्हणून पाहायला लागले आहेत. सोसायटी मध्ये सुवासिनी एकत्र जमून ही पूजा करतात. सेल्फी, फोटोचा कार्यक्रम व कुठे तरी बाहेर हॉटेल मधे उपवासाचे खाणे हे सगळे आठवड्या पूर्वीच नियोजन करून हे व्रत केले जाते.

ह्या कार्यक्रमात ड्रेस कोड, एका प्रकाराच्या साड्या परिधान करणे एकत्र जमुन गुजगोष्टी करणे हे हि तितकेच महत्वाचे असते.

एकूण काय पूर्वीचे व्रत असो किंवा आत्ताचे सेलिब्रेशन असो ह्यात सुवासिनींनी एकत्र येणे आपले सुखदुःख एक मेकांना सांगणे, आपले मन मोकळे करणे एकमेकींना कठिण प्रसंगी आधार देणे, वेळ प्रसंगी एकमेकींना मदत करणे एवढे साध्य झाले तरी वटपौर्णिमा खऱ्या अर्थाने साजरी झाली असे म्हणता येईल.

© सौ. मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

🔅 विविधा 🔅

देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर  ☆

देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार…

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जुना सिनेमा मराठी होता ही गौरवास्पद बाब चित्रपटांबद्दलच्या चर्चेत अनेकदा दुर्लक्षित राहते. तो होता खुद्द दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली दिग्दर्शित केलेला ‘राजा हरिश्चंद्र’. तो मूकपट होता तर पहिला मराठी बोलपट आला १९३२साली,  स्व. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘अयोद्ध्येचा राजा.’

परदेशात गाजलेल्या भारतीय चित्रपटांबद्दलच्या चर्चेतही  अनेकदा असेच होते. आपल्याला वाटते मराठी चित्रपट म्हणजे फक्त महाराष्ट्रात चालणारे सिनेमा. राजकपूरचा ‘मेरा नाम जोकर’ रशियात लोकप्रिय झाल्याने केवळ तोच परदेशात जास्त लोकप्रिय झालेला अभिनेता होता असा सर्वसाधारण समज असतो.  पण मराठी सिनेमांचाही गौरवशाली इतिहास आहेच. दुर्दैवाने त्याचा तितका गवगवा झालेला नाही.

आता ‘प्रपंच’ असे अत्यंत घरगुती नाव असलेला मराठी सिनेमा चक्क चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता हे कुणाला खरे वाटेल का? पण ते सत्य आहे. हल्लीसारखा तेंव्हा चीन स्वस्त पण तकलादू वस्तूंसाठी किंवा त्याच्या राक्षसी विस्तारवादासाठी प्रसिद्ध नव्हता! तेंव्हा चीन प्रसिद्ध होता तो प्रचंड लोकसंख्या आणि विचित्र मांसाहारी पदार्थांच्या सवयींसाठी!

तिथले सरकार कम्युनिस्टांचे, त्यामुळे एखादी समस्या समोर आली की तिचा इलाज लगेच करण्याचे धोरण. आपल्यासारखे ‘याला काय वाटेल?’ ‘तो काय म्हणेल?’ ‘बाबू गेनूसारखी न्यायव्यवस्थाच  समस्यानिवारणाच्या रस्त्यात आडवी पडेल का?’ हे प्रश्न त्या सरकारला कधीच पडत नसत. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी तातडीने पाउले उचलायची म्हणून आधी प्रबोधनाचे अभियान सुरु केले! आणि हेच कारण होते आपला ‘प्रपंच’(१९६१) चीनमध्ये  लोकप्रिय होण्यामागचे.

प्रपंचमध्ये दिग्दर्शकांनी त्याकाळी बहुतेक कुटुंबांत असलेल्या अपत्यांचा अतिरिक्त संख्येचा विषय हाताळला होता. चीनी सरकारला ही बाब आवडली. म्हणून त्यांनी लगेच संपूर्ण सिनेमा चीनी भाषेत डब करून घेतला! मग चीनी लोकांनी तो थियेटरबाहेर अक्षरश: मोठमोठ्या रांगा लावून पाहिला.

त्याचे असे झाले. गदिमांनी लिहिलेल्या कथेवर देव आनंदने ‘एक के बाद एक’ (१९६०) नावाचा सिनेमा काढला. अर्थात हिरो होते देव आनंद. त्याने सोबत शारदाला घेतले आणि दिग्दर्शनाचे काम राजऋषी यांच्याकडे सोपवले. सिनेमा साफ पडला. अनेकांच्या मते, देव आनंदने गदिमांच्या  कथेत खूप बदल केले होते.

मग गदिमांनी त्या कथानकावर एक कादंबरी लिहिली. ती गोविंद घाणेकरांना आवडली आणि त्यातून निघाला प्रपंच! दिग्दर्शक ठरले मधुकर पाठक आणि कलावंत होते सीमा देव, आशा भेंडे, सुलोचना लाटकर,  कुसुम देशपांडे, अमर शेख, श्रीकांत, शंकर घाणेकर, जयंत धर्माधिकारी.

कथा, पटकथा, संवाद सगळे गदीमांचेच होते. सिनेमा गाजला. त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक ‘स्वर्णकमल’ मिळाले. याशिवाय सर्वोत्तम फिचर फिल्मसाठीचे ‘गुणवत्ताधारक सिनेमाचे’ तिस-या क्रमांकाचे प्रमाणपत्रही मिळाले.

प्रपंचमध्ये गदिमांनी लिहिलेले एक भजनवजा गीत होते. आजही ते रसिकांच्या मनात अजरामर आहे. सुधीर फडकेंनी अतिशय भावूकपणे गायलेल्या या गाण्याला संगीतही त्यांचेच होते. विषय मात्र वेगळाच होता. जसे आपले काही संत महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठूरायाला काहीही बोलू शकतात, कधी तर शिव्याही देतात आणि तरीही त्यांचे त्यांच्या ईश्वराशी असलेले अत्यंत लडिवाळ नाते तसेच टिकून राहते तसे हे गाणे होते. यात गदिमा विठ्ठलाला फक्त कुंभार म्हणून थांबले नव्हते, त्यांनी त्याला ‘वेडा कुंभार’ म्हणून घोषित केले होते!

केवळ एखाद्या भारतीय धर्मातच शक्य असलेले भक्त आणि देवातले गंमतीशीर प्रेमळ नाते या गाण्यात फुलवले असल्याने आकाशवाणीवर सकाळच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात अख्ख्या महाराष्ट्राने हे गाणे असंख्य वेळा ऐकले आहे. गदिमांचे ते शब्द होते-     

“फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार.”

विश्वाचा ‘हा जगड्व्याळ पसारा त्या निर्मिकाने कशासाठी निर्माण केला असेल?’ असा प्रश्न प्रत्येक चिंतनशील मनाला कधी ना कधी पडलेलाच असतो. गदिमांनी तोच काव्यरूपाने खुलवून आपल्यापुढे ठेवला  आहे. ते करताना त्यांच्यातला भारतीय अध्यात्माची सखोल जाण असलेला विद्वान लपत नाही. मानवी शरीर हे पंच महाभूतातून निर्माण झाले आहे हे सत्य कविवर्य अगदी कुणालाही सहज समजेल इतके सोपे करून सांगतात. मग विठ्ठलाला म्हणतात तू ही मानवी मडकी निर्माण करून त्यांची रास रचून ठेवतोस, त्यांची संख्या तरी केवढी! अक्षरश: अमर्याद! –

माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा. तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार.

त्यात पुन्हा भारतीय अध्यात्माने सांगितलेले सर्व प्राणीयोनीतले  मानवी जन्माचे महत्वही ते ‘आभाळच मग ये आकारा’ असे म्हणून सूचित करतात. तू एकाच साच्यातून आम्हाला घडवतोस तरीही प्रत्येकाचे नशीब वेगळेच असते. कुणा भाग्यवान माणसाच्या मुखात भगवान श्रीकृष्णासारखे लोणी पडते तर कुणा दुर्दैवी व्यक्तीच्या तोंडात निखारे पडतात. ही टोकाची विषमता, हा वरून तरी आम्हाला वाटणारा घोर अन्याय तू का सुरू ठेवतोस? बाबा, सगळे तुझे तुलाच माहित!

घटाघटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्याविणा ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार.

जाता जाता गदिमा हेही सांगतात की अगणित कल्पांपासून देव ‘निर्मिती, वर्धन आणि विनाशाचे’ तेच काम करत आला आहे. ना त्याच्या निर्मितीला अंत, ना विनाशाला! जर सगळे नष्टच करायचे आहे तर मग ‘हे सगळे नसते उद्योग तू करतोसच कशाला’? असे एखाद्या धीट अभंगकर्त्याप्रमाणे ते विठ्ठलाला विचारतात- 

‘तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू, तूच ताडीसी. न कळे यातून काय जोडीसी, देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार.’

निरीश्वरवादाचा आधारच विश्वाची वरवर वाटणारी अर्थहीनता आहे. बुद्धी असलेल्या सर्वांनाच पडू शकणारे प्रश्न गदिमांनी विचारले आहेत. पण ते कुणा भणंग संशयवाद्यांचे वितंडवाद घालण्याचे मुद्दे  नाहीत. ते एका भाविकाने आपल्या निर्माणकर्त्यासमोर निरागसपणे ठेवले प्रश्न आहेत. गाण्याचे शेवटचे वाक्य आपल्या डोळ्यासमोर निरागस अंध व्यक्तींचे अर्धवट संकोची स्मितहास्य असलेले, अश्राप चेहरे  आणते. मन गलबलते. देवाचा रागही येतो. पण तिथेच तर मेख आहे.

त्याने डोळे दिलेत आणि त्यापुढे अंधारही दिलेला आहे तो कशाला? खरे तर तेच प्रश्नाचे उत्तर आहे. निर्मात्याने आपल्या अपत्यापुढे मुद्दाम ठेवलेले ते रोचक आव्हान आहे. नुसते डोळे असून थोडाच कुणी डोळस ठरतो? मानवाने आयुष्याचा सदुपयोग करून अंतिम ज्ञानाची प्राप्ती करावी म्हणून तर समोर अज्ञानाचा अंधार ठेवला आहे. चर्मचक्षु असोत नसोत, आपणच पुरुषार्थ करून आपले ज्ञानचक्षु जागृत करणे,  सत्य जाणून घेणे यासाठीच तर सगळा उपद्व्याप असायला हवा. गदीमांनी उदाहरण जरी अंध व्यक्तीचे घेतले असले तरी हेतू माणसाचे अज्ञान स्पष्ट करणे हा आहे. त्यातूनच सत्य जाणून घेण्याचे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय अधोरेखित करणे हा त्यांचा हेतू आहे. आणि तोच तर गाण्याचा संदेश आहे. 

(हा लेख दै. प्रहारमध्ये छापून आलेला आहे. कॉपीराईट कायदा लागू. आवडल्यास लेखकाच्या नावासहच शेयर करावा.)

लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे

मो. 7208633003

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com 

a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५९ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र-“नव्या जागी रुजू व्हाल तेव्हा शेगावला जाऊन महाराजांचे आशीर्वाद घेऊन मगच रुजू व्हा. सगळं छान होईल. ” काकू म्हणाल्या.

मीही हेच ठरवलं होतं. काकूंच्या तोंडून जणूकांही गजानन महाराजच ‘तथास्तु’ म्हणालेत असं वाटलं आणि मी निश्चिंत झालो!

पण हे वाटतं तेवढं सोपं नसून या नंतर येणारा प्रत्येक क्षण माझी कसोटी पहाणारा ठरणार आहे याची पुसटशीही कल्पना मला नव्हती!)

काकूंचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. बोलाफुलाला गांठ पडावी तसं त्याच संध्याकाळी मला रिलीव्ह व्हावं लागलं. सामानाची बांधाबांध, रात्रीच्या प्रायव्हेट लक्झरी स्लीपिंग कोचचं रिझर्वेशन हे व्याप होतेच.. पण सर्व स्टाफ मेंबर्सच्या आपुलकीच्या सहकार्यामुळे सगळं सुरळीत पार पडलं. अकोला ब्रँचचा चार्ज ज्या परिस्थितीत मला घ्यावा लागणार होता याचा विचार केला तर तिथं काय वाढून ठेवलं असेल याच विचाराने मी एरवी अस्वस्थ झालो असतो. पण आश्चर्य म्हणजे रात्रभर मनात या कशाचंच दडपण नव्हतं. उद्या अकोल्याला पोचल्यानंतर तातडीने चांगल्या लॉजचा शोध घेऊन, सकाळी ब्रॅंचला रिपोर्ट करण्यापूर्वी शेगावला जाणं कसं जमवायचं याचेच विचार मनात होते. मी अकोल्याला बसमधून उतरलो तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. तो गुरुवार असणं हा मला एक शुभशकूनच वाटला. मनानं उभारी धरली तरी आदल्या संपूर्ण दिवसभराची दगदग आणि रात्रभराच्या प्रवासातलं जागरण यामुळे शांत झोप नव्हतीच. सगळं शरीर ठणकत होतं. पण आता झोपून चालणार नव्हतं. मी वेळ न दवडता रिक्षा करून स्टॅंडपासून जवळचंच एक लॉज गाठलं, तेव्हा पहाटेचे सव्वा चार वाजले होते.

“इथून शेगावला पहिली बस कधी आहे? ” चेकइनच्या फॉर्मॅलिटीज सुरू असतानाच मी रिसेप्शनला विचारलं.

“आत्ता पाच वाजता. नंतर साधारण दीड दोन तासांच्या अंतरानं. “

‘आता आराम करायच्या मोहात पडायचं नाही. कांहीही झालं तरी पाचची बस चुकवायची नाही.. ‘ मी स्वतःलाच बजावलं आणि…. ,

“रूमवर गरम चहा पाठवून द्या लगेच आणि गरम पाणी असेलच ना आंघोळीसाठी? ” मी विचारलं.

किमान या दोन साध्या गोष्टी माझ्यासाठी त्या क्षणी तरी अत्यावश्यकच होत्या.

“कॅन्टीन सहाला सुरू होईल साहेब.. आणि गरम पाणी सात नंतर. “

यावर बोलण्यासारखं काही नव्हतंच. नाईलाजाने मी रूम गाठली. पाय धुऊन कपडे बदलले. तातडीनं शेगावच्या बससाठी बाहेर पडणं आवश्यक होतं आणि माझं थकलेलं शरीर तर अंथरुणाला पाठ टेकायला आसुसलेलं होतं! ही बस चुकली तर सगळं वेळापत्रकच विस्कळीत होणार होतं पण त्याला आता नाईलाज होता. कारण आंघोळ न करता शेगावला जाणं योग्य वाटेना. अखेर आता तातडीने शेगावसाठी निघणं शक्य नाही हे मी मनाविरुद्ध स्वीकारलं आणि अंथरुणाला पाठ टेकली. तो एकच क्षण आणि त्यानेच जादूची कांडी फिरवावी तसं झालं! सहजच माझं लक्ष समोरच्या भिंतीकडे गेलं आणि समोर जे पाहिलं त्या दृश्यानेच गारूड केलं. मी भान हरपून पहातच राहिलो! त्या संपूर्ण भिंतीवर गजानन महाराजांचं खूप मोठ्ठं अतिशय जिवंत असं चित्र रंगवलेलं होतं! त्यांच्या मिष्कील हसऱ्या नजरेने ते माझ्याकडेच पहात असल्याचा भास मला झाला न् मी ताडकन् उठून बसलो. घड्याळ पाहिलं. साडेचार वाजून गेले होते. बॅग उचकटून मी घाईघाईने टॉवेल /कपडे घेऊन बाथरूमकडे धावलो. गार पाण्याचे चार तांबे अंगावर घेऊन आंघोळ उरकली. तेवढ्यानंही प्रवासाचा शीण निघून गेल्यासारखं मन प्रसन्न झालं. घाईघाईने कपडे बदलून, सॅक घेऊन बाहेर धावलो. रिसेप्शनजवळ किल्ली दिली आणि गडबडीने बाहेर पडलो. जवळपास रिक्षा दिसत नव्हती आणि रिक्षासाठी थांबायला माझ्याकडे वेळ नव्हता. स्टॅन्ड जवळ आहे हा अंदाज होताच. मी क्षणाचाही विलंब न लावता स्टॅंडच्या दिशेने धाव घेतली तेव्हा पावणेपाच वाजून गेलेले होते. स्टॅण्ड जवळ जाताच त्याक्षणीच्या अनिश्चित परिस्थितीत धीर न सोडता निकराचा एक शेवटचा प्रयत्न म्हणून थेट स्टॅंडवर जाऊन चौकशी करून प्लॅटफॉर्म शोधण्यात वेळ न घालवता मी बसेस् बाहेर पडतात तिथून आत जायचा निर्णय घेतला. त्या दिशेने धावत फारतर दोन-चार पावलेही गेलो नसेन तेवढ्यांत समोरून एक बस बाहेर पडताना दिसली. प्रयत्न करूनही अंधारात बस वरचा बोर्ड दिसत नव्हता. पुढे झेपावत हात हलवून मी बस थांबवायचा केविलवाणा प्रयत्न केला. बस थांबली. कंडक्टरने दार उघडलं. बस कुठं जाणाराय याची चौकशी केली. आश्चर्य म्हणजे ती शेगावला जाणारीच बस होती. मी गडबडीने बसमधे चढलो न् पाहिलं तर बस पूर्ण रिकामी होती. बसमधे फक्त कंडक्टर. जणू खास माझ्यासाठीच ती बस सोडलेली असावी तसा मी एकटाच प्रवासी आहे हे लक्षांत येताक्षणी मनाला स्पर्शून गेलेलं अतीव समाधान तोवरच्या धावपळीचा सगळा शीण नाहीसा करणारं होतं! !

आजवरच्या असंख्य प्रवासांमधला तो प्रवास मी कधीच विसरू शकणार नाही. तो प्रवास फक्त शेगावचा नव्हता. कारण मी थेट महाराजांपर्यंत जाऊन पोचल्याचा आभास निर्माण व्हावा असे अनेक अनुभव पुढे अकोल्याच्या माझ्या त्या अल्प वास्तव्यात मला आले. अकोल्यातलं जेमतेम सहा महिन्यांचं माझं वास्तव्य. या दरम्यान दर पौर्णिमेला शेगावला दर्शनाला जाण्याचे योग सहज जुळून येत असत. शेगावहून मुद्दाम आणलेली गजानन महाराजांची पोथी मी याच अल्पवास्तव्यात सर्वप्रथम वाचली, तेव्हा.. ‘ तू स्वतःच ती पोथी एकदा वाच म्हणजे तुझं तुलाच समजेल हे गजानन महाराज कोण ते‌.. ‘ हे माझ्या ताईचे शब्द शब्दश: खरे झाल्याची मनाला स्पर्शून गेलेली अनुभूति मला अनेक अर्थाने समृध्द करणारी होती! माझ्या अंतर्मनातला तो आणि गजानन महाराजांसारख्यांचं अवतारी रूप यांच्यामधलं अद्वैत मला लख्खपणे जाणवलं ते ही पोथी वाचल्यानंतरच!

‘आपल्या घरी चालत आलेला दत्तसेवेचा राजमार्ग सोडून ताई ही पोथी कां वाचते? ‘ या त्यावेळी केवळ अज्ञान आणि अहंकारातून माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर ही पोथी वाचूनच मला मिळालं! किंबहुना माझ्या मनातल्या तेव्हाच्या त्या प्रश्नातली निरर्थकताही मला नेमकी जाणवली. जसा कांही तो प्रश्न मी महाराजांनाच विचारला असल्यासारखं त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर महाराजांनी १९ व्या अध्यायात मला दिलं असल्याचं प्रथम वाचनातच माझ्या लक्षात आलं. या अध्यायात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी आपल्याला भेटायला येणार असल्याचा संकेत गजानन महाराजांना मिळतो तेव्हा गजानन महाराज त्यांच्या सेवेकऱ्याला यांची पूर्वकल्पना देताना म्हणतात, ” अरे बाळा, उदयिक माझा बंधू येतो देख मज साठी भेटण्या, त्याचा आदर करावा l” ती भेट कशी तर फक्त कांही सेकंदांची! ‘एकमेकांसी पहाता, दोघे हसले तत्वता l हर्ष उभयतांच्या चित्ता, झाला होता अनिवार ll ‘ असं नेमक्या शब्दातलं त्यांच्या भेटीचे वर्णन!

ही नजर भेट होताच एकमेकांकडे पाहून स्मितहास्य आणि.. ” बंधो, आम्ही निघतो.. ” असे टेंबे स्वामी महाराजांचे अनुमती मागणारे मोजके शब्द आणि त्यानंतर गजानन महाराजांनी होकारार्थी मान हलवताच त्यांचे निघून जाणे… सगळंच अतर्क्य! श्री गजानन महाराज आणि टेंबे स्वामी महाराज दोघेही समकालीन आणि दोघांचेही नियत कार्य पूर्ण होताच त्यांची झालेली अवतार समाप्ती! या अवतारी पुरूषांच्या अवतारकार्याचे प्रयोजन आणि नियोजन या दोन्हींमागचं गूढ म्हटलं तर अनाकलनीय पण तरीही सहजसोपंसुध्दा! आता हेच पहा ना. श्री. टेंबे स्वामी अतिशय कर्मठ आणि गजानन महाराज अतिशय साधे, सोवळ्या-ओवळ्याचा कसलाच विधिनिषेध न बाळगणारे… आणि तरीही त्या दोघांमधे हे सख्य आणि हे अद्वैत कसं? हाच प्रश्न त्यांच्या सेवेकऱ्याच्या मनात निर्माण झाल्याचे जाणवताच त्या शंकेचे निरसन करताना कर्म, भक्ती आणि योग या परमेश्वरापाशी नेणाऱ्या तीनही वाटांचं गजानन महाराजांनी केलेले नेमकं निरूपण मुळातूनच वाचावं असंच आहे. माझ्या अंतर्मनातल्या ‘ तो’ चं खरं स्वरूप मला लख्खपणे जाणवलं म्हटलं ना ते हे सगळं समजून घेतल्यानंतरच, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं!

“नव्या जागी रुजू व्हाल तेव्हा शेगावला जाऊन महाराजांचे दर्शन घ्या आणि मगच रूजू व्हा. सगळं छान होईल” असं काकू मला म्हणाल्या होत्या. मीही तेच ठरवलं होतं. म्हणूनच काकूंच्या तोंडून गजानन महाराजच ‘तथास्तु’ म्हणालेत असंच मला वाटलं होतं. यातल्या ‘सगळं छान होईल’ म्हणजे नेमकं काय आणि कसं याचा प्रत्यय, कलियुगातला एखादा चमत्कार घडावा तसाच माझ्या अकोल्यातील वास्तव्यात लवकरच मला अगदी अकल्पितपणे येणार होता‌, पण त्याबाबतीत मी स्वत: मात्र तेव्हा अनभिज्ञच होतो! !

क्रमश:…  (दर गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “भारतीय आधुनिक पंचदर्शने (Indian Renaissance)” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “भारतीय आधुनिक पंचदर्शने (Indian Renaissance)☆ श्री जगदीश काबरे ☆

हा १९व्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि बौद्धिक जागरणाचा काळ होता. याला भारतीय पुनर्जागरण असेही म्हणतात. या काळात भारतात पाश्चात्त्य विचारसरणी आणि भारतीय परंपरांचा समन्वय घडून आला, ज्यामुळे समाज सुधारणा, शिक्षणाचा प्रसार, धार्मिक सुधारणा आणि राष्ट्रीय जागृतीला चालना मिळाली.

या भारतीय ‘पंचदर्शना’ ची प्रमुख वैशिष्ट्ये:

  1. सामाजिक सुधारणा: यात बालविवाह, सतीप्रथा, विधवांच्या दुरवस्थेसारख्या सामाजिक कुरीतींविरुद्ध आवाज उठवला गेला. राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथेविरुद्ध लढा दिला आणि १८२९ मध्ये सतीप्रथा बंदी कायदा लागू झाला. ते आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जातात. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवापुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. तर आगरकरांनी विधवांच्या दुरावस्थेचे विदारक सत्य मांडले. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला.
  2. धार्मिक सुधारणा: महात्मा फुले, आगरकर, महर्षी विठ्ठल शिंदे, स्वामी विवेकानंद, काही प्रमाणात सावरकर यांनी परंपरागत हिंदू धर्मातील अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना आव्हान देण्यात आले. राजा राममोहन रॉय यांनी ब्रह्मो समाज (१८२८) स्थापन करून एकेश्वरवाद आणि तर्कशुद्ध धार्मिक विचारांना प्रोत्साहन दिले. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज (१८७५) स्थापन करून वैदिक धर्माचा पुरस्कार केला आणि मूर्तिपूजा, जातीप्रथा यांना विरोध केला.
  3. शिक्षणाचा प्रसार: याच काळात पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रभाव वाढला, विशेषतः इंग्रजी शिक्षण देणारे राजा राममोहन रॉय यांनी कोलकात्यात हिंदू कॉलेज (१८१७) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तर महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी प्रयत्न केले.
  4. राष्ट्रीय जागृती: टिळक, गांधी, नेहरू यासारख्या राजकीय धुरीणांनी भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना आणि राष्ट्रीय अस्मिता जागृत केली. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ (१८८२) मधील “वंदे मातरम्” गीताने स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा पाश्चात्त्य जगात – विशेषत: १८९३ च्या शिकागो धर्मसभेत प्रचार केला.
  5. साहित्य आणि पत्रकारिता: या काळात बंगाली, हिंदी, मराठी, तमिळ अशा प्रादेशिक भाषांमध्ये नवीन साहित्य निर्माण झाले. पत्रकारितेने सामाजिक आणि राजकीय जागृतीला चालना दिली. उदा. , राजा राममोहन रॉय यांचे “संवाद कौमुदी” आणि “मिरात-उल-अखबार” यांनी सुरुवातीच्या काळात केलेल्या जागृतीच्या कामगिरीचा विशेष उल्लेख करायला हवा.

या काळाने भारतीय समाजाला आधुनिकतेच्या दिशेने नेले आणि स्वातंत्र्यलढ्याचा पाया घातला. जातीप्रथा, अंधश्रद्धा यांना आव्हान देत सामाजिक समानतेचा विचार पुढे आला. शिक्षण आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारतीय समाजात नवीन विचारांचा उदय झाला. हे खरे असले तरी या ‘पंचदर्शना’ चा प्रभाव मुख्यतः शहरी आणि उच्चवर्गीय समाजापुरता मर्यादित राहिला. ग्रामीण भागात त्याचा प्रभाव कमी होता. काही सुधारणांना परंपरावादी समाजाकडून विरोधाला सामोरे जावे लागले. पण भारतीय ‘पंचदर्शना’ नी भारताला सामाजिक, धार्मिक आणि बौद्धिकदृष्ट्या नवीन दिशा दिली, हे मान्यच करावे लागेल. यामुळे भारतीय समाजात आधुनिकता, तर्कशुद्धता आणि राष्ट्रीय जागृतीचा उदय झाला, ज्यामुळे स्वातंत्र्यलढ्याला गती मिळाली.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “सगळ्याच पातळ्यांवर आपण तळ गाठणार आहोत का?” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸 

☆ “सगळ्याच पातळ्यांवर आपण तळ गाठणार आहोत का?” ☆ सुश्री शीला पतकी 

काळ बदलतोय.. काळ बदलतोय.. काळाची गती वाढली आहे… काळाबरोबर आपण चालल पाहिजे.. ही सगळी वाक्य मागची पिढी ऐकते आहे आणि वाटतंय ह्या काळाच्या वेगाबरोबर आपल्याला धावता येणार नाही पण प्रयत्न तर करायलाच पाहिजे आणि ते करताना या काळाची चाहूल घेतो की चाललय काय? .. तर सर्वच क्षेत्रांमध्ये खाली येणे सुरू आहे….!

कौटुंबिक क्षेत्रात तेच घडले आहे संवाद उरला नाही माणसं एकत्र राहत नाहीत म्हणजे एकत्र असलेली चार माणसही (भली मोठी कुटुंब एकत्र असलेली संपली आहे त्याचा उल्लेख मी करत नाही)एकमेकांशी बोलत नाहीत प्रत्येकाजवळ घराच्या कुलपाची चावी आहे ज्याच्या त्याच्या सवडीने घरामध्ये जो तो प्रवेश करतो घरातला रांधण कमी आणि बाहेरून मागवणं खूप झाले आहे आणि तेच मुलांना आवडते त्याचे धोके अनेकदा दिसतय पण आधुनिकतेची झापडं लावलेल्या आपल्याला ती दिसत नाहीत. अनेक मोठ्या नावावरती घरी येणारे अन्न हे वाईट टाकावू पदार्थापासून बनवणल्याचे लक्षात आले आहे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले प्रत्येक धोके माध्यमाने दाखवले आहेत. घरची वाळवणं, साठवणं, हे तर संपलेच आहे पण आरोग्य त्याचे काय? आरोग्य चांगले राहावे म्हणून वर्कआउट करणे व्यायाम करणे गाजर काकडी बीट खाणे, फ्रुट्स खाणे, कमीत कमी जेवण घेणे हे सर्व चालू आहे पण ही फॅशन आहे पुरेसा योग्य आहार नसल्यामुळे टिकाऊ पिढी तयार नाही हे अर्थात माझे मत आहे…!!!!

कपड्यांच्या बाबतीतही तेच आहे. फाटक्या कपड्यांना ऐश्वर्य आले आहे. कमी कपड्यांना सौंदर्य म्हटले जात….. आणी खूप खूप काही..!

मनोरंजनाच्या बाबतीत तेच आहे चित्रपटांना कथा नाहीत, उद्दिष्ट नाही, प्रबोधन नाही, गाण्यांना अर्थ नाही, संगीत कर्कश्य आहे, आवाजातली मधुरता असूनही वापरली जात नाही. काही मराठी नाटकं सोडली तर अनेक ठिकाणी चांगले विषय नाहीत चित्रपटांचे तेच आहे पण अगदी छोट्या प्रमाणावरती नवनवीन प्रयोग मात्र चांगले केले जातात उदा. अभिवाचन, एखाद्या कवीच्या कवितांचे गायन वाचन हे कार्यक्रम दर्जेदार आहेतच पण त्याबरोबर स्टँड अप कॉमेडी नावाखाली जे काही अचकट विचकट चालले आहे ते न बघवणारे न ऐकवणारे आहे. एका कार्यक्रमाचे नाव पहिले ‘हलकट ‘हेच जर कार्यक्रमाचे नावाचे तर किती अवघड आहे ना? कॉमेडी करणारा मुलगा सरळ म्हणाला…. अगदी स्टेजवरून पब्लिकमध्ये संवाद साधताना व ब्रेकप बद्दल बोलतोय आणि मुलीला म्हणतो पाळीच्या वेळेला येऊन सांग आणि अख्खे थेटर त्याच्यावर हसतय… फार वाईट वाटलं. तरुण हे सादर करत असतील आणि तरुणांनाही आवडत असेल तर मग आपण कुठे जाणार आहोत? विनोदाबद्दल बोलताना असं म्हटलं जातं की विनोद अश्लील किंवा वाईट नसतो त्याचे नातेवाईक वाईट असतात म्हणजेच चिल्लर विनोद पण आता त्याच नातेवाईकान सुळसुळाट माजवला आहे! चांगल्या उत्तम मराठी वाहिनी वरचे शो हे अश्लीलते कडे जाणारे आहेत लोकांना बोलवून त्यांची खेचाखेची करणारे आहेत. हास्य जत्रा नावाच्या कार्यक्रमात परवा खूप वाईट विनोद झाला जरा बरा वाटणारा कार्यक्रम होता पण… उघडे बाबांना बघायला नागडे जाऊ… या वाक्याने कार्यक्रमाचा स्तर खाली येऊ लागला हे लक्षात आले.

शिक्षण शिक्षण क्षेत्रात असेच आहे मराठी माध्यमाच्या शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. रिझर्वेशन मुळे येणाऱ्या प्रमुखाला कदाचित व्यवस्थापनाचे ज्ञान नसते आणि मग शाळा आणि त्याचे व्यवस्थापन ढासळायला सुरुवात होते शिक्षक चांगलेच असतात काम करून घेणार हुशार हवा चांगल्या अभ्यासू मुख्याध्यापकाच्या अभावी काही शाळा गळती लागल्यासारख्या झाल्या आहेत. ग्रामीण भागातून मात्र हे चित्र खूप चांगले आहे तिथे अनेक उत्तम प्रयोग करणारे शिक्षक आढळतात तेवढे समाधान वाटते.

बाकी सरकारी कामकाज राजकारण याबाबत काय आणि किती बोलावे? धाकटे शहाणे झाले आणि फुकट्याच राजकारण आले. अशी अवस्था आहे भ्रष्टाचारात तर न्यायालय सुद्धा मागे नाही मग न्याय कोणाकडे मागावा पक्ष बदलू लबाडांच्या टोळ्या तयार झाल्यात आणि त्या नवनविन नावाने सरकारं तयार करीत आहेत आणि पाच वर्ष काय तर एकमेकांना अश्लील शब्दात शिव्या देणे वाटेल ते बोलणे म्हणजे मला एकाने विचारले आपल्या वेळेला माझा आदर्श नेता हा निबंध होता आता कुणावर लिहावे? मी म्हणलं नाही आता असा निबंध येतच नाही ते काय वेडे आहेत का? असले निबंध द्यायला…. अशी मजा आहे मी मुख्यमंत्री झालो तर या निबंधाचे पहिल वाक्य असेल अनेकांची युती केलेली माझे सरकार मी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करेन आहे की नाही गंमत! … वर्तमानपत्र किंवा मीडिया, माध्यम आपली जबाबदारी विसरून कोणाच्यातरी खुंट्याला बांधले गेले आहेत मग त्याचीच भलावण करतात नागरिकांचे प्रश्न मांडणे हे त्यांच्या गावीही नाही नकारात्मक बातम्या… सकारात्मक घडते पण दिसत नाही कारण त्याला प्रसिद्धी नाही. ते म्हणतात ना खोट्याला हजार पाय आहेत आणि सत्य पांगळे करून टाकले आहे तशी गत झाली आहे…. देशभक्ती हा विषय शाळेत नाही आता उदाहरण तरी कोणाचे द्यावेत आम्ही शाळेत शिकत असताना देशभक्तीपर कविता असे थोरांची चरित्र असत. बाबू गेनू देशासाठी कसा मेला.. नंदुरबारचा शिरीष कुमारचा धडा अंगात स्फुरण देऊन गेला. “पुर्खोंसे चला आई यही हमारी परीपाठी है प्राण दिया है मगर नही दि कभी देश की माटी है! “या सारखी गाणी आता मुलांच्या ओठावर नाहीत हे दुर्दैव आहे हे सारे पाहून वाटते आपण तळ गाठायला चाललोत का? तुम्हाला काय वाटतय…?

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अपेक्षा… ☆ सौ. ज्योती विलास जोशी ☆

सौ. ज्योती विलास जोशी

? विविधा ?

☆ अपेक्षा… ☆ सौ. ज्योती विलास जोशी 

अपेक्षाभंग झाला की विनोद घडतो, अपेक्षाभंग आश्चर्यही घडवतो आणि हाच अपेक्षाभंग दुःखाचं मूळ आहे. अपेक्षा छोटीशी, खूप मोठी, किमान, वाजवी अशा अनेक प्रकारची.. किती वेगवेगळी रूप आहेत अपेक्षेची. अपेक्षांच माध्यम विचारच आहेत त्या विचारांची पोत सुधारली पाहिजे. जेणेकरून मन शांत, सुरक्षित भयरहित आणि निरोगी राहील. नाहीतर मात्र अपेक्षा ही मनशांतीच्या वाटेवरची अडसरच ठरते…..

अपेक्षा करायच्याच नाहीत का मग? लहान असताना हीच अपेक्षा रडण्याचे शस्त्र वापरून पूर्ण करून घेता येते. छोटी अपेक्षा बघता बघता विशाल रूप धारण करते…. हटवादी होऊ लागते… आणि मग त्याखाली सुखाचे क्षण, कृतज्ञता, जिव्हाळा, नाती, परिपक्वता सृजनशीलता गाडले जातात. या अपेक्षांना जेव्हा तडा जातो तेव्हा दुःख शेजारी येऊन बसतं. अपेक्षा भंगाचा डोंगर म्हणजेच हे दुःख… त्यामुळं सतत मनात येणारे नकारात्मक विचार मनावर इतके हावी व्हायला लागतात की सकारात्मक विचारांना शोधण्याचा विचारही मन करू शकत नाही. मनपाखरू खट्टू होतं, आजारी पडतं… शरीर नियंत्रित करणार्या ह्या मनातील बिघाड शरीरावर प्रतिबिंबित होतो पर्यायाने शरीरही थकतं.

हीच अपेक्षा अहंकाराचं देखील मूळ आहे. कधी एखाद्या व्यक्तीची आपल्याकडून असलेली, कधी आपली दुसऱ्याकडून असलेली अशी ही अपेक्षा! ह्या अपेक्षांना मात्र एक मर्यादा हवी… फुग्याला त्याच्या क्षमते बाहेर फुगवलं तर तो जसा फुटतो तसा या वाजवी अपेक्षांचा फुगा फुटला तर नैराश्याची हवा आसमंत व्यापते. अपेक्षांच्या ओझ्याखाली मन दबलं जाऊ लागतं आणि प्रश्नाचे उत्तर न सापडल्याने चिडचिड वाढते.

अपेक्षा करणं हा मनुष्य स्वभाव धर्म आहे.

आई वडिलांची मुलाकडून, सासूची सुनेकडून, गुरुची शिष्याकडून अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. अशा प्रकारच्या अपेक्षांना हक्काची एक झालर आहे. त्या गृहीत धरल्या जातात. आपण आपल्या बद्दल ठेवलेल्या अपेक्षांशी जर मैत्री केली तर नकळतच अपेक्षा आणि आपलं मन यांच्या सुसंवाद सुरू होतो आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनातल्या भावभावनांचं व्यवस्थापन करायचा जणू अपेक्षा चंग बांधते.

नात्यात एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा, थोडी जास्त जवळीक असण्याची झालेली सवय त्यामुळे आपल्याला आपलंसं केल्याची आपली भावना सुंदर असते पण परिस्थिती नेहमी तशी राहत नाही. अपेक्षेपेक्षा जास्त अपेक्षा हे या नात्यातला अडसर ठरते.

आपल्या दुसऱ्यांच्या बद्दल असणाऱ्या अपेक्षांबाबत मात्र स्थितप्रज्ञ राहिलेलं बरं! जिथं आपलं मन ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याला इथे प्रयत्न करावे लागतात तिथे दुसऱ्या बद्दलच्या अपेक्षांवर आपला अंकुश असू शकत नाही त्यामुळे याबाबतीत अलिप्ततेचे धोरण शहाणपणाचं…..

शेवटी अपेक्षाभंग हे दुःखाचे मूळच! नाही का?

©  सौ ज्योती विलास जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कोरे पत्र… ☆ सौ शालिनी जोशी☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ कोरे पत्र… ☆ सौ शालिनी जोशी

चांगदेव पासष्टी वाचली. चांगदेवानी संत ज्ञानेश्वरांना कोरे पत्र पाठवले. त्याचे उत्तर म्हणून संत ज्ञानेश्वरानी त्याच कागदावर ६५ ओव्या लिहून चांगदेवाना पाठविल्या. ६५ ओव्यात केलेला आत्मबोध म्हणून चांगदेव पासष्टी. यावरून पत्र या प्रकाराविषयी मनात कुतुहून निर्माण झाले. पत्र म्हटलं की एक ठराविक साचा डोळ्यासमोर येतो. सुरुवातीला मायना, मध्ये मजकूर व शेवट समारोपाचे शब्द व लिहिणाऱ्याचे नाव किंवा सही. पण येथे तर कोरे पत्र. मला वाटते भारताच्या इतिहासातले हे एकमेव कोरे पत्र असावे. आणि त्याच कागदावर त्याला संत ज्ञानेश्वर उत्तरही पाठवतात. ये हृदयीचे ते हृदय घातले असा हा उपदेश. ‘तत् त्वं असि’. जगातले अक्षर वाङ्मय ठरला. येथे चांगदेवानी कोरे पत्र पाठवून आपली योग्यता सिद्ध केली आहे. कोरेपण म्हणजे रितेपण, स्वच्छपणा, निरहंकारता आणि ज्ञानग्रहण क्षमता. हा पत्रातील नि:शब्द भाव संत ज्ञानेश्वरानी ओळखला आणि म्हणून त्यावर ज्ञानाची अक्षरे उठली.

दुसरे पत्र डोळ्यासमोर येते ते रुक्मिणीने श्रीकृष्णाला पाठवलेले पत्र. श्रीकृष्णाच्या रूपागुणाचे, सामर्थ्याचे, कर्तुत्वाचे वर्णन करणारे आणि श्रीकृष्णांबरोबर विवाहाची तीव्र इच्छा व्यक्त करणारे प्रेमपत्रच हे. रुक्मिणीने सात श्लोकात लिहून एका ब्राह्मण सेवकाबरोबर पाठवूण दिले आणि त्वरीत उत्तराची अपेक्षा ही व्यक्त केली. कारण घरातल्यांनी शिशुपाला बरोबर लग्न ठरवले होते. गडबड सुरू होती. ‘कुठून व कसे माझे हरण करा’ हे कळवणारे मोठ्या चातुर्यांना दिलेले उत्कट श्रीकृष्ण प्रेम व्यक्त करणारे हे पत्र. इतके की श्रीकृष्ण उत्तराच्या फंदात न पडता लगेच सैन्य घेऊन कौडिण्यपूरला निघाले. मोठे युद्ध करून रुक्मिणीचे हरण केले. पुढे विवाह झाला. असे हे कौंडिंण्यपूरहून द्वारकेपर्यंत आलेले पत्र.

आणखी आठवतो तो समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांच्यामधील पत्रव्यवहार. गुरुशिष्यांमधील हा पत्र व्यवहार. ‘ निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू’ अशी सुरुवात असलेल्या पंधरा ओव्यातील हे पत्र. हे मराठी पत्र साहित्याचे भूषण असेच आहे. शिवाजी महाराजांचा यथार्थ गौरव त्यात समर्थ करतात. राजकर्तव्य, परमार्थ उपदेश आणि हे राज्य ‘श्रीं’ चे आहे ही जाणीवही दिली आहे. स्वराज्याची प्रेरणा दिली.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर १६८१ मध्ये संभाजी राजांना हृदय पिळवटून टाकणारे ओवीबद्ध पत्र समर्थांनी लिहिले. ‘उग्र स्थिती सांडावी, सौम्य स्थिती धरावी’, अशा शब्दात शिवरायांकडून प्राप्त झालेल्या श्रेष्ठ वारशाची त्यांना आठवण करून दिली. संभाजी महाराजांच्या वर्तनाने स्वराज्याला हादरा बसणार की काय या घोर चिंतेने व्याकुळ झालेल्या विरागी संताचे ते पत्र. त्यावरून त्यावेळच्या खरा इतिहास कळतो.

अशाप्रकारे पत्र हा एक वाङ्मय प्रकार आहे. त्यात वैविध्य आहे मुख्यत: याचे दोन प्रकार दिसतात, औपचारिक व अनौपचारिक. औपचारिक म्हणजे संस्थात्मक, कार्यालयीन कामकाजाविषयी, ठराविक पद्धतीने लिहिलेली आणि अनौपचारिक ही घरगुती, नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना, जवळच्या संबंधितांना लिहिलेली. अनौपचारिक पत्रे प्रेम आणि भावना व्यक्त करतात. पत्र हे संदेश कळविण्याचं एकमेव साधन त्यांकाळी होते.

इंग्रजांच्या काळात भारतात पत्र वाटण्याची पोस्टाची सुनियोजित पद्धत सुरू झाली. तीच सध्या ही प्रचलित आहे. यापूर्वी माणसांबरोबर तर कधी घोडेस्वारांबरोबर लखोट्यात घालून पत्रे पाठविली जात. पक्षांबरोबर पत्रे पाठवल्याचे उल्लेखही आढळतात. हे सर्व त्रासाचे होते. पण आता वाहनांच्या सोयीमुळे पोस्टाचे पत्र वाटण्याचे काम सुलभ झाले आहे. खेडोपाड्यापर्यंत पत्राद्वारे संपर्क साधता येतो.

अनौपचारिक पत्राला विषयाचे बंधन नाही. लिहिणारा आणि वाचणारा दोघांचे हृदय त्यात ओतलेले असते. त्यामुळे कधी आनंद तर कधी दुःख. हळूहळू या पत्राना साहित्याचे रूप आले. साने गुरुजींची श्यामची पत्रे, सुधेस पत्रे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली. कवी अनिल व कुसुमावती देशपांडे यांच्यामधील पत्र व्यवहारांचे संकलन झाले. नेहरूंचे इंदिरेस पत्रे प्रसिद्ध आहेत. विनोबांची पत्रे पुस्तक आहे. तसेच रवींद्रनाथ टागोर, चिपळूणकर, कर्वे, आंबेडकर, लक्ष्मीबाई टिळक इत्यादी मोठ मोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या पत्रांचे खंड प्रसिद्ध झाले आहेत. वर्तमानपत्रातही वाचकांची पत्रे’ असे एक सदर असते. एकंदरीत पत्र लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पत्रात उमटते. पु. ल. देशपांडे यांची बोलकी पत्रे अपूर्वाई व पुर्वरंग मध्ये आहेत.

आता e mail, whatsapp यामुळे पारंपरिक पत्र पद्धत लोप पावल्यात जमा झाली आहे. पत्रांना दोन-चार ओळीचे स्वरूप आले. भावभावनांचे काम emojis करतात. मुले ‘आईचे पत्र हरवले. ते मला सापडले’ असा खेळ खेळत तोही काळाच्या पडद्याआड गेला. पत्र ज्या वर लिहितात ती पोस्टाची कार्डे, आंतर्देशीय, पाकिटे ही ही पुराण वस्तू म्हणून म्युझियममध्ये बघावी लागतील. ‘हाय पत्रा तुझी कहाणी! ‘

 ©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग पहाट – भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ निसर्ग पहाट – भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

… (काहीवेळा नागराजाचं दर्शन मिळत असे. पण कोणत्याही प्राणीमात्राचं भय नव्हतं.

जिओ और जीने दो

चं साम्राज्य मुक्तपणे

नांदत होत. येथे ना त्यांना भय ना माणसाला!) …

आजूबाजूला साखर कारखाने असले तरी, बरीच गुऱ्हाळ गूळ करण्यात पटाईत.

गुऱ्हाळाच्या बाजूने जाताना त्याचं एक प्रकाराचा विशिष्ट वास येत होता. त्यांचं काम सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत चालत होत. येणारा जाणारा उसाचा रस पिऊन तृप्त पणे ढेकर देत जातं होता. जाताना गरम गूळ व काकवी पण घेउन जातं असे. त्याला कोणताही मज्जाव नव्हताच.

तस दिस कासराभर वर सरकलेला. सुरव्या डोक्यावर आलेला. राबणारे हात पाय, मर्गळलेल्या अवस्थेत. अंगावर घामाच्या धारा, अंग काळ मेचकूट झालेलं. अंगावर अर्धी चड्डी आणि मांजरपाटाचे खोळ उर्फ बदामशर्ट कपडे पण रापलेले. कळकट झालेले.

सगळे राबणारे कष्टकरी, शेतकरीआपापल्या पाणवठ्यावर आली यथेच्छ मनसोक्त गार पाण्यात अंघोळ केली. अंग घासणीला चपटा दगड होताच. कोणी विहिरीत कोणी ओढ्यावर, कोणी शेतातील पंपावर. असं सगळे चांलेले.

अंघोळ होताच त्यांची पावलं तरतर आपापल्या पालाकडे वळली. त्यांच्या अंगात तर तरी आलेली. पोटात भूख लागलेली. केव्हा एकदा भाकर खाईन असं झालेलं.

कष्टकऱ्यांनी घरून आणलेली शिदोरी सोडलेली. काही जणांच्या बायका डोईवरून बुट्टीत जेवण बांधून आणलेलं. त्या पण आपल्या धन्यासोबत जेवण करत असतं. राबणारी गडी जेवण करून सुस्त होत. वाम कुक्षी साठी तिथंच झाडाखाली आडवे होत असतं.

काहीजण चंची सोडून सुपारीचे खांड तोंडात टाकीत, पानाचं देठ खुडून त्याला अंगठ्यानं चुना लावून तोंडाखाली दाबत असतं. त्यावर तंबाकूची चिमठ पण अलगद ओठा आड करत असतं. घटकाभर विश्रांती झाली की, परत ताजेतवाने होत अन कामाला लागतं असतं.

कोण भांगलण, कोण कोळपणी, कोण पाणी पाजण, अशी सगळी काम करत. इकडे त्यांच्या बायका पण जनावरांना चारायला सोडून घरात हातभार लावत असतं. काही बायका मळ्यातील माळवं तोडून आपली टोपली भरून घेत असतं. घरात थोडी ठेवून उरलेले माळवं बाजारात विकत असतं.

दिवस मावळत होता, तश्या सावल्या ही जरा लांबलचक पडत होत्या. दिवस मावळायला आला.

मावळतीला सप्तरंगाची उधळण चालू होतीच. हवेत गारठा जाणवू लागतं होताच.. पिवळा, नारंगी, निळा, केशरी, सूर्य एकदम मोठा लाल भडक दिसतं होता.

कातरवेळ, सांज वेळ जवळ येत होती. सूर्य मावळला. पक्ष्यांची गडबड चालू झाली. आपापल्या घराकडे परतण्यांची घाई सुरु होतीच. चित्र विचित्र आवाज असमंतात निघत होते. मध्येच पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची माळ शिस्तबद्ध पण जरा वेगाने मावळतीकडे जातं होती. जणू शुभ्र फुलांचा हार घेउन रान देवतेला घालण्यासाठी निघाले होते. मध्येच खंड्या उच्च स्वरात निनादत होता. सुतार पक्ष्याची टकटक थांबलेली. एव्हाना सायंकाळ होऊन थंडी वाढलेली. तश्यातच कातरवेळ साधत काही तरुणाई अंधाराचा फायदा घेत, अडोश्याला गप्पा मारत दिल जमाई चालली होती. गुपचूप कारभार चालू होता.

तारांगण सजल होत. वट वाघूळ परत आडव्या तिडव्या रेषा काढत झाडात गप्प होत होती. घुबडाचा विशिष्ट आवाज भय कम्पित करत होता.

टिट्वीच्या केकटण्याने शांतता भन्ग करीत होत्या.

बरीच मंडळी आपल्या पांदीच्या रस्त्याने घर जवळ करीत होती. दोन्हीही कडच्या उंच झाडीत रातकीड्यांची सनई चालू होती. रस्त्याने जाणारी जनावरे त्यांच्या गळ्यातील वाजणारे घुंगुराचे आवाज लायबद्ध ध्वनीने रस्ता मोकळा करून देत होता. थंडीने आता धुक्याची चादर घातली होती. मोरांच्या केका परत साद देत होत्याच. कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज गावची वेस आल्याचे साक्ष्य देत होता. गावात सगळीकडे दिवाबत्ती केल्याने धुसर लाल प्रकाश धुक्यात दिसतं होता. घरातील छपरातून धुराचे लोट चुली पेटल्याची खात्री होती. धूर आणि धुके यामुळे हवेत कुंद पणा जाणवत होताच.

जनावर आपापल्या जागी दावणीत गेली. मालकांनी त्यांना दोरखंडनी बांधलं.

पुढ्यात कडवळ ची वैरण टाकून दिली. काहीजण चरवीत पाणी घेउन धारा काढत बसलं. समोर पेंड ठेवली. आणि म्हसराच्या पाठीवर थाप मारून काचळ पाण्यानी धुवून घेतलं. दुधाची कासंडी भरताना चूळ चुळ आवाज घुमत होता. धारा काढून, घरी दूध ठेऊन, उरलेले दूध डेअरीत घालण्यासाठी मोर्चा वळवला. दूध घालून झाल्यावर चौकातल्या वडाच्या पारावर जोतो येऊन बसकण मारत होताच. गावातील अबाल वृद्ध आधीच येऊन बसलेली.

तस वडाचे झाड हे जणू त्यांना आधारवडच होता. वडाच झाड हे कित्येक वर्षांपासून त्यांचा आणि त्यांच्या सुख दुःखाचा सोबती होता. कित्येक गावच्या डोई ह्या वडानी पाहिल्या होत्या.

बरीच मंडळी जमली होती. त्यांच्या शिळोप्याच्या गप्पा टप्पा चालू होत्या. लहान मुले पण इकडून तिकडे हुंदडत होती. वडाच्या परंब्या धरून मूलं त्याला लोम्बकाळत होती.

कष्ट करून कामानी दमलेले हात चिलीम पेटवून आस्वाद घेत होती. चिलीम एका हातातून दुसऱ्या हातात फिरत होती.

कोण चंची सोडून पान तंबाकुची देवाण घेवाण करीत होती. कोण तंबाकूंचा बार भरून अंतराळी बोलत होता. वडाच्या झाडाला ही गम्मत नवी नव्हती. त्यालापण हा विरंगुळा वाटतं होता. त्यांच्या गप्पा तो कित्येक वर्षे ऐकत होताच.

एव्हाना थंडीची लाट वाढली होती. प्रत्येकजण आपल्या मनातील दुःख ओकत होता. हे सार पुराण पुरुष वड ऐकत होता. त्यालाही त्या गोष्टीची सवय झाली होती. वेळ होईल तस प्रत्येकाने आपापली घर जवळ केली. घरात आल्यावर दरवाजे पण बंद केले.

वड एकटाच थंडीत स्तब्ध राहिला होता. धुक्याची शालं त्यांनी पण पांघरली होती. त्यालाही एकटा राहायची सवय झालेली. उन्ह पाऊस, थंडी वारा, धुके, दिवस रात्री आणि चांदणं ह्याची त्यानं कधीच तक्रार केली नव्हती. गावच्या कित्येक पिढ्या त्यांनी बघितल्या पण पुराण पुरुषाने सगळ्यांना आश्रय दिला. आश्रय देण्यात तो धन्यता मानत होता. कित्येक पक्ष्यांची घरटी त्यानं अंगा खांद्यावर खेळवली. साप माकडासारखे प्राणी अंतकरणाने जवळ केले. तो पुराण पुरुष एकमेव सर्व घटनाचा साक्षीदार होता! आहे!!  आणि राहील!!! 

 – समाप्त –

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ निसर्ग पहाट – भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 विविधा 🌸

☆ निसर्ग पहाट – भाग – १ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

नीरव शांतता! होय, पहाटेची नीरव शांतता! ज्यात रव नाही, आवाज नाही, सगळे कसे स्तब्ध. आकाशात धूसर चंद्रबिंब, अंधुक चांदणे, हवेत बोचरी थंडी. गर्द सर्द धुके. शुभ्र दुलई लपेटून घेतलेली अवनी. रात किड्यांची किरकिर. अधून मधून, दवबिंदूंचा सडा चोहीकडे पसरलेला. हिरवीगार गवत पाती, त्यावर दवबिंदू चिकटलेले.

चंद्रकिरणात मोत्यांचे दाणे होऊन चमकतं होते. ते जसं काही आपल्या तोऱ्यात ऐटीत मिरवत होते. अगदी अमूल्य दागिन्यांच्या कोंदणात बसलेला वाटतं होता.

अजुनी रातकिड्याचे साम्राज्य होतच. सोबत रात पक्ष्यांची फडफड चालूच होती. थंडगार वाऱ्याची झुळूक, अंगावर काटा आणणारी होती. ओढ्याच्या पाण्याचा खळखळ आवाज, एखाद्या सौभाग्यवतीच्या चूड्यागत किणकिणत होता. झाडावर, वेलीवर चमकणारे काजवे. कुठे कुठे फुलू पाहणाऱ्या कुंद कळ्या उमलत होत्या. पश्चिमेला लककणारा शुभ्र शुक्रतारा, त्याचं लोभस व्यक्तिमत्व, हिऱ्याच्या खड्यागत पाजळणारे शुभ्र दुधाळ रेषा! टप्पोऱ्या मोगऱ्या सारखा शुक्रतारा, समवेत गगनातील असंख्य तारका,

चमचमणाऱ्या चंद्रकळा साडीगत आकाशाच रुपड सजलेलं होत. नखशिकांत शांत श्रान्त अवनीचे रूप, मुके पण बोलके होते.

गर्द झाडी पलीकडे डोंगर रांगा. आकाशात दिसणारी नक्षत्रे जणू स्वर्गच पृथेवर अवंतरला आहे की काय, असं वाटणारे विहंगम दृश्य, जें डोळ्यातपण सामावत नव्हते.

उगवतीचे साक्ष देणारे, काही बदलणारे, आकाशी, किंचित जांभळा, केशरी, किंचित तांबूस छटानी उघडत असताना, किरमिजी रंग मध्येच पारवा रंगानी उजळीत होता. तर पाण्यात बर्फ वितळल्यासारखा शुक्रतारा अस्पष्ट होत लुप्त पावत होता. मध्येच पक्ष्यांचा थोडा आवाज, हालचाल. चिमण्यांचा चिवचिवाट, इतर पक्ष्यांची वर्दळ वाढत होतीच.

कडेला प्राजक्ताचा सडा लक्ष वेधून घेत होता. त्याचा चोहीकडे सुगंध पसरला होता. बाजुलाच शुभ्र तगर उमलू पहात होती. त्याच्या अर्धोन्मिलीत पाकळ्यांवर फुलंपाखरांचे गुंजारावं चालू होते. जास्वंद लाल भडक रंगात उमलला होता. मध्येच वटवाघूळ आपले अस्तित्व दाखवत आडवी तिडवी गवसणी घालत बाजूच्या झाडावर लुप्त होत होता. रानफूलं टवटवीत बहरली होतीच. वेलीवर विविध रंगाची फुलं चित्त वेधून घेत होती.

ओढ्याच्या कडेला मोरांच्या केका साद घालत होत्या. त्याचे ऐटीत मान वर करून चालायचे पदललित्यपूर्ण होत.

निळसर मान, डोके, डोक्यावर तुरा, मोरपीसांचा रंग तर अप्रतिम! कोणत्याही कारखान्यात तयार नं होणारा रंग!!  मध्येच भारद्वज पक्षी हा विचारमग्न वाटतं होता. त्याची शोधक नजर काहीतरी शोधत होती. उगवतीला झुंजू मुंजू झालं असेल नसेल, तसे चिमण्यांचा चिवचिवाट जास्त वाढला होता. शुभ्र बगळे एका रांगेत मिरवणूक काढीत, शिस्तीत एकाच वेगात मार्गक्रमण करीत होते.

तांबड फुटलं तसं घराचे आळसावलेले दरवाजे उघडू लागले. घराघरात दिवे लागले आणि छपरातून धूर बाहेर पडू लागला. काही ललना सडा समार्जन साठी बाहेर आल्या. पलीकडे मंदिरातून घंटेचा किणकिणाट ऐकू येऊ लागला. छपरातून येणारा धूर आणि दाट धुके एकत्र मिसळून हवा कुंद करीत होत्या.

नमाजाची बांग आणि कोंबड्याची बांग एकत्र ऐकू येत होती. त्यातच परव्याची घुटर घूम, चिमण्याचा चिवचिवाट, घंटानाद ह्याचा सरगम. पृथेला जाग आल्याची नांदी होती. त्यात शुभ्र धुक्याची चादर आणि बोचरी थंडी जाणवत होतीच.

सोनेरी किरणांची वरात, सहस्त्रकर रश्मीनें बाहेर पडत होती. काही कवडसे धारण करीत, अवनीला अलिंगन देत. तिच्या मस्तकाचे चुंबन घेत. लालिमा पसरली होती. त्यातच गाई, म्हशीचे हंबरणे, त्यांच्या गळ्यातील घुंगरूचे आवाज येत होते.

पांणंदीकडे जाणारी वाट, त्या वाटेवर वर्दळ वाढली होती. काही धुसर आकृत्या, शेतीकडे जाणारे काही शेतकरी पण त्यात दिसतं होते. धुक्यात भिजलेल्या पाऊल वाटा, बैल गाडीचे चाकूर पडलेली वाट. परत तोच तो भारद्वाज परत पांणंदीच्या कडेला तांबडे डोळे लाल् सर पंख घेउन उभा होता. कदाचित शुभ दर्शन देण्यासाठी अवतरला होता. पांदीच्या दोहो बाजूनी शेंड एकमेकांना गच्च मिठीत घेउन बसलेली. गुंतलेली. ते कमी म्हणून काय, त्यातच अनेक लता वेलींनीआपला संसार उभा केलेला होता शेंडच्या आधाराने. त्या वेलीवर पांढरी आणि लाल चुटुकदार पाने पाहुन डोळ्यास समाधान देत होते.

शिवाय अनेक रंगीं बेरंगी फुलं पाखराची गर्दी झालेली. रंग लुब्ध पाखरे रुंजी घालण्यात गुंग होती. त्यांना मधुरसाची चटक जाणवत होतीच. मध्येच कुठं तरी फडया निवडुंग आपल्या ताठ मानेने काट्यासह अस्तित्व दाखवत होता. बाभळीची झाडे त्यात भरीस भर म्हणून शोभून दिसतं होती. आपला कणखर मजबूत बांधा त्यांना प्रिय असावा. पिवळ्या जर्द फुलांची आरास आणि लोंबणाऱ्या लांब शेंगा असंख्य काटेरी जाळ विणलेला हा प्राणी अगदी तटस्थपणे दिमाखात उभा होता, अगदी पुराण पुरुषा सारखा! त्याच्या अंगावर असलेल्या अनेक गाठी मुळे प्रांजळं वाटतं होता. त्याच्या गाठीतून झिरपणारा चिकट स्त्राव, त्यावर फिरणाऱ्या शिस्तबद्ध काळ्या मुंग्या!

तशी ही पायावाट तुडवून तुडवून मळवाट झालेली. धुरळा आणि दहिवर ह्यांनी चिकट झालेली होती.

मध्येच आम्र वृक्षावर कुहू कुहू अशी साद येत होती. आंब्याला आलेला मोहर त्यातून निघणारा सुगंध जाणवत होता. लहान लहान कैऱ्या लांब देठावर बसून हेलकावे घेत होत्या. नजर पण खेचून घेत होत्या. सोबत राघू मैनेची जोडी त्यांच्याच दिमाखात! हिरव्या कैऱ्यावर चोच मारत मिठू मिठूची भाषा आळवीत होता. लाल लांब बाकदार चोच पोपटी अंगरखा घातलेली जोडी सालसपणे आपल काम चोखपणे करत होती.

जवळच्या विहिरीवर येणारा मोटेचा आवाज, पाटात पडणारे पाणी सळसळत जातं होत. बैलाच्या घुंगरांचा आवाज आणि मोटकऱ्याची गाणी शांतता भग्न करीत होती.

विहिरीच्या कडेला भिंतीतून फुटलेला पिंपळ विहिरीवर छत्र धरण्यासाठी अवतरला असावा. त्याच्या फांद्यावर लोंबकळणारी असंख्य सुगरणीची घरटी, अधोमुखी होती. घरट्यात असणारे चिमुकले जीव खाली वर करत आपल्या आईची वाट बघत होते. काहीतरी खायला मिळेल अशा आशेने धडपड करीत होते.

पाटातील पाण्यात बगळे चोच मारून खाद्य आराधना करण्यात त्यांचा थवा मशगुल. अवचित मोरांची फडफड आणि केका घुमत होत्या.

सकाळ होऊन एक कासरा भर सुरव्या वर आलेला.

तसं थंडीच्या हवेत ऊबदारपणा जाणवू लागला. पांदीच्या वाटेवरील वर्दळ वाढू लागली. मळ्यात चाललेली काम झोपडीतून येणारा धूर त्याची साक्ष देत होता.

वाड्या वस्तीवर जाग आली. तशी गावात अन गावकुसा बाहेर वर्दळ वाढली. एव्हाना सुरव्या देवाने धरतीवर लाल मळवट भरला होता. धुक्याची चादर कमी होऊन, हवेत ऊबदारपणा जाणवत होताच. लोक उन्हात येऊन बसू लागले. थंडीत उब हवी होती. पांणंदी कडे वर्दळ वाढत होती. थंडी आणि धुक्याने मातीत ओलावा धरला होता. धुके ओसरले होते. पाणंदीत बैलगाडी, जनावरे ओढ्या कडे चरायला जातं होती. मध्येच शेळ्या, मेंढरं आणि सोबत कुत्रा असं तांडा धनगर हाकीत होता. मेंढया मध्येच तांडा सोडून हिरव्या चार्यावर लुब्ध होत होत्या. त्यांना परत हाकून धनगर वाट तुडवत होता. त्याच्या हातात लांब काठी, आणि खांद्यावर घोंगड त्यावर पुढ माग अडकवलेली शिदोरी होती.

वरच्या अंगाला शेतमळा फुलला होता. गव्हाच रान हिरवगार होत. त्याला लागून मका, कणसं टरारून फुगली होती. कोबीचे गड्डे वर येऊ बघत होते.

 त्याला लागून पिवळा धमक झेंडू उठून दिसतं होता. एकूण नजारा मन पवित्र करीत होता. बाजूला अखंड वाहणारा गोड्या पाण्याचा ओढा वहात होता. त्याच पाणी झुळझूळ वाहत होतच. पाण्यात काही पक्षी विहार करत, आपले खाद्य शोधत होते. ओढ्याच्या दोन्ही बाजूला गच्च हिरवी गार झाडी, त्यात ह्यो लपलेला ओढा. दाट हिरव्या गार झाडीत पक्ष्यांची अनेक घरटी नांदत होतीच.

मनमोहक मोर लांडोर सुखनैव बांगडतं होते. अवचित उतरणारे त्यांचा समूह लक्ष वेधत होता. खंड्या ओढ्या कडेला बसून एखादी मासोळी अबदार चोचित पकडून खाद्य संस्कृती जोपसत होता. अधून मधून लाव्हा व तित्तर उडत जातं होते अन गप्प होत होते.

ओढ्याच्या दोन्हीही कडेला असणारी हिरवीगार शेती. त्यातील घरे सुद्धा टूमदार वाटतं होती. मका, गहू, हळद, मिरची, आणि ऊस त्यात सर्व प्रकारच्या भाज्या व काही ठिकाणी फुलांचे ताटवे इत्यादीनी डोळ्यात स्वर्गीय सुख आनंद भोगणारा बळीराजा, त्यात त्यांना मिळालेले निसर्गाचे वरदान.

अधून मधून कुठतरी झाडाखाली चालेलल मोराचे नृत्य. हे निसर्ग वैभव सुख त्यांना कायमच मिळत होत. एवढंच नव्हे तर सर्प आणि सर्पिण ह्यांचं गळ्यात गळा घातलेलं शृंगार नृत्य पण त्यांच्या नशिबी होत. विविध पक्ष्यांचे आवाज ओढ्यातील पाण्याचा आवाज यांची जुगुलबंद ध्वनी नेहमीचीच. त्यात त्यांना अप्रूप असं काही वाटतं नव्हतं! दोन्हीही बाजूला ओढ्यात धुनी भांडी घासली जातं होती. तेथील बायकांचा राबता पण नेहमीचा. मध्येच कोणी बाल चमू येऊन पाण्यात मनसोक्तपणे जल क्रीडा करीत होता.

त्यांचं बालपण असं जपलं जातं होत. घरातील झाडून सारी जनावरे येथेच येऊन पाणी पीत होती. चरत होती. दुभतं देत होती. दही दुधाचा महापूर ओसंडून वाहत होता. मूळबाल खाऊन राबून धष्ट पुष्ट होत होती.

ओढ्याचा उतरणीला शेळ्या मेंढया यांचा मुक्त संचार. मुबलक खाद्य मीळत होत. 

चुकून एखाद सलिंद्र बाहेर पडत होत. काहीवेळा नागराजच दर्शन मिळत असे. पण कोणत्याही प्राणी मात्राचं भय नव्हतं.

जिओ और जीने दो ‘ चं साम्राज्य मुक्तपणे नांदत होत. येथे ना त्यांना भय ना माणसाला!

क्रमशः… 

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares