मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग पहिला ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग पहिला ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

 एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये ! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत आहे. ही सर्व प्रतिभा त्या त्या कवींची आहे. मराठी भाषेबद्दल आदर वाढविणाऱ्या या प्रयोगाबद्दल सर्वांचे आभार—- 

—–मकरंद करंदीकर

विंदा करंदीकर यांची मूळ कविता (जी मुळात लईभारी हे 🙂 ). मराठीच्या बहिणी असलेल्या अनेकानेक भाषांमधे. 

विठ्ठल (मूळ कविता)

पंढरपूरच्या वेशीपाशी

आहे एक छोटी शाळा

सर्व मुले आहेत गोरी

एक मुलगा कुट्ट काळा ॥

दंगा करतो मस्ती करतो

खोड्या करण्यात आहे

अट्टल

मास्तर म्हणतात करणार काय?

न जाणो असेल विठ्ठल ॥

 ©️ विंदा करंदीकर

============

 इट्टल – (नगरी बोली)

पंडरपुरच्या येसिपासी

हाये येक छुटी साळा

सर्वी पोरं हायेत गुरी

योक मुल्गा कुट्ट काळा

दंगा कर्तो मस्ती कर्तो

खोड्या कर्ण्यात बी आट्टल !

मास्तर म्हंती करनार काय ?

न जानू ह्यो आसन इट्टल !!! 

काकासाहेब वाळुंजकर

     – अहमदनगर

==============

इट्टल – (मराठवाडी बोली)

पंडरपूरच्या येशीपशी

हाय बारकी साळा एक

सगळी पोरं हायत गोरी

कुट्ट काळं त्येच्यात एक

आगावपणा करतंय पोराटगी करतंय

आवचिंदपणाबी करण्यात हाय 

आट्टल…

गुरजी मनत्यात करावं काय?

एकांद्या टायमाला आसंलबी इट्टल!

डॉ.बालाजी मदन इंगळे

        – उमरगा

===============

इठ्ठल – (लेवा गणबोली)

पंढरीच्या येशीपाशी

आहे एक छोटुशी शाया

सर्वे पोऱ्हय गोरे

एक पोऱ्या कुट्ट काया 

दंगा करतो मस्ती करतो

खोड्या कऱ्यात आहे अट्टल

मास्तर म्हने करे काय

न जानो अशीन इठ्ठल

प्रशांत धांडे

   – फैजपूर

=======

ईठ्ठल  – (अहिराणी रुपांतर)

पंढरपूरना शीवजोगे

एक शे धाकली शाया;

सम्दा पोरे शेतस गोरा

एक पोर्‍या किट्ट काया ||

दांगडो करस, मस्त्या करस

खोड्या कराम्हा शे अट्टल;

मास्तर म्हने काय करो ?

ना जानो हुई ईठ्ठल  ||

नितीन खंडाळे 

   – चाळीसगाव

==========

इठ्ठल – (तावडी अनुवाद)

 पंढरपूरच्या येसजोय

आहे एक छोटी शाया

 सम्दे पोरं आहेती गोरे

  एक पो-या कुट्ट काया ll

 दंगा करतो मस्ती करतो

 खोड्या क-यामधी आहे अट्टल

 मास्तर म्हनता करनार काय?

ना जानो असीन इठ्ठल  ll

प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे

     – जळगाव

==============

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी एक भूमिगत -भाग २ :: लेखक – कै. वासुदेव त्र्यंबक भावे ☆ प्रस्तुती – श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? वाचताना वेचलेले ? 

☆ मी एक भूमिगत -भाग २ :: लेखक – कै. वासुदेव त्र्यंबक भावे ☆ प्रस्तुती  – श्रीमती सुधा भोगले ☆  

(असा उपयोग बरेच ठिकाणी झाला व यश आले (च्या पुढे)?)

दि. ३१-१२-४२ रोजी मी भिवंडीत होतो. मात्र वर्तमानपत्रे मी फरारी झालो आहे असे सांगत होती. मी फरारी आहे असे जाहीर झाल्यानंतर सरकारने अगदी फोटो सहित माझी सर्व माहिती गोळा केली. व पोलिसांजवळ दिली. अखेर हुलकावण्या देता देता २२-१-१९४३ रोजी मला मुंबईत अटक झाली. मी भाई कोतवाल कटात आहे अशी बहुधा त्यांची खात्री झाली होती. मला ते त्या कटात गुंतवणार होते आणि म्हणूनच त्यांनी माझी भिती घेतली असावी. साळवी फौजदारानी अटकनाट्याचा सर्व खुलासा केला. एक फोटो दाखवला तो आमच्या चर्चा मंडळातला होता. माझे विद्यार्थी श्री सिकंदर अन्सारी यांनी फोटो काढला होता. त्यांच्याजवळून शाळेतल्या कोणी शिक्षकाने तो मागून घेतला आणि अवघ्या दहा रुपयात तो पोलिसांना देऊन टाकला. देशभरातील मोठ्या शहरात माझा तपासासाठी पोलिस गेले होते.  बक्षीसही जाहीर झाले होते. श्री. होनावर यांना मला पकडल्याबद्दल बक्षीसाचे पैसे मिळाले. माझ्या नावावर पैसे जमा करतो म्हणाले.  पण मी ती रक्कम गुप्त संघटनेकडे जमा करा असे सांगितले, ते त्यांनी मान्य केले. मी मात्र त्या प्रलोभनापासून अलिप्त राहिलो. विसापूर जेलमध्ये असताना माझी बहिण भेटायला आली. हे गाव अगदी आडवळणावर होते.  वाहनाची सोय नव्हती. त्यामुळे भेटायला येणाऱ्यांना खूप त्रासाचे पडे. नियमानुसार भेटीची वेळ सायंकाळी चार ते पाच अशी होती. मला ऑफिसात बोलवण्यात आले. श्री नूलकर जेल सुपरिटेंडेंट होते. ते मला नियम सांगून नियमाप्रमाणे तुला तुझ्या बहिणीला भेटता येणार नाही असे म्हणाले. मी तत्वभ्रष्ट व्हावे असा ते प्रयत्न करीत असावेत. मी नियम मोडून भेटीला जाण्याचा स्पष्ट नकार दिला. शेवटी थोड्या वेळाने मला परत जेलर श्री निकोल्स यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी मला भेटण्याची परवानगी दिली. माझी सुटका होत नव्हती, म्हणून माझी आई फार कष्टी होती. पण तरीही कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून तत्वभ्रष्ट होण्याचा मोह मी निग्रहाने टाळला. माझ्या आईला सुटका न होण्याचे कारण कळावे म्हणून घरची मंडळी सचिवालयापर्यंत धडक मारून आली होती. सरकारने फार गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवले असे त्यांना सांगण्यात आले.’ माफी मागितली तरच विचार करू’,– माझ्या वडीलबंधूनीच त्यांना नकार दिला. ते म्हणाले,’इथे आम्हाला ही अट मान्य नाही, तिथे तो तर अजिबातच तयार होणार नाही!’ आईचे सांत्वन करण्यासाठी पूज्य सानेगुरुजी आमच्या घरी आले होते. त्यांचे उत्तम स्वागत झाले होते.. गहिंवरून ते माझ्या आईला म्हणाले होते, ‘तुमचे कसे सांत्वन करू? आम्ही सारे सुटलो, बाहेर आलो. तुमचा मुलगा मात्र इतके दिवस झाले तरी सुटत नाही!’ गुरुजींना खरे कारण माहीत असून सुद्धा ते कारण सांगू शकले नाहीत. 15 जानेवारी 1946 रोजी मी जेलमधून सुटलो. तब्बल साडेतीन वर्षानंतर मी मोकळी हवा चाखीत होतो. आमच्या स्वागतासाठी श्री. ग. प्र प्रधान आले होते. माझी सुटका झाल्यानंतर माझ्या आईला आणि सर्वांना आनंदाचे भरते येणे सहाजिकच होते. मी घरी आलो. घरच्या माणसांचा आनंद त्यांनी सत्यनारायणाची पूजा करून व्यक्त केला. गावातील वयोवृद्ध नागरिक, श्री. नानासाहेब जोग यांनी आमच्या घरी येऊन गळ्यात हार घालून माझा सत्कार केला. असाच सत्कार त्यांनी 1932 आली सुटून आलो तेव्हा ही केला होता. आणि माझा सामान्य माणसासारखा जीवनक्रम चालू झाला. भिवंडीतील उर्दू शाळेत त्यांनी मला नोकरीसाठी आग्रहाने परत बोलावले. मी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांत प्रिय शिक्षक होतो. 

मी देशभक्त नव्हतो. सत्तेची किंवा पैशाची हाव कधीच नव्हती. संघटनेत काम करण्याची इच्छा होती. त्या माध्यमातून समाजात नैतिक मूल्यांची जोपासना करण्याची इच्छा होती. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मूल्याधिष्ठित जीवनावर कोणाची निष्ठाच दिसत नव्हती. आज स्वातंत्र्य मिळाले आणि उद्या लगेच निष्ठा नाहीशी झाली असे नव्हे. लोकशाही राबवता राबवता हळूहळू सत्ता आणि संपत्ती या रिंगणात आयुष्य फिरू लागले. माझ्यासारखे तत्व पाळणारे अनेक लोक होते. त्यांना खड्यासारखे बाहेर टाकून देण्यात आले. आमच्यासारख्यांची तत्त्वनिष्ठा नव्या राजकारणी लोकांना पेलण्यासारखी नव्हती. मी किंवा माझ्यासारखे अनेक लोक नव्या राजकारणाने सामावून घेतले असते तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. आम्ही सत्ता आणि संपत्तीच्या मोहात पडलो नसतो असे वाटत आहे. त्यामुळे असे म्हणायला, आम्हाला जागा मात्र नक्की आहे की ध्येयनिष्ठ दूर न करता त्यांना सामावून घेतले असते तर वेगळेच काही घडले असते.  

भारत माता की जय!भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो !!!

समाप्त

प्रस्तुती श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी एक भूमिगत -भाग १ :: लेखक – कै. वासुदेव त्र्यंबक भावे ☆ प्रस्तुती  – श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? वाचताना वेचलेले ? 

☆ मी एक भूमिगत -भाग १ :: लेखक – कै. वासुदेव त्र्यंबक भावे ☆ प्रस्तुती  – श्रीमती सुधा भोगले ☆  

(माझे वडील कै. वासुदेव त्र्यंबक भावे. यांनी 1930 ते 1946 या कालावधीत स्वातंत्र्य संग्रामात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या ‘ मी एक भूमिगत ‘ या पुस्तकातील काही लेखांचे उतारे आणि त्या मंतरलेल्या क्षणांचा मागोवा घेतला आहे. यामुळे स्वातंत्र्य संग्रामात अनेक अज्ञातांनी केलेल्या त्यागाची ओळख होईल. या छोटेखानी पुस्तकास कै. ग. प्र. प्रधान सर या साहित्यिक व विचारवंत मित्राची प्रस्तावना लाभलेली आहे.)  

माझे नाव वासुदेव त्र्यंबक भावे. माझा जन्म ६ जून १९१५ चा. आमचे कुटुंब बऱ्याच पिढ्या भिवंडीत राहत होते. माझे मोठे बंधू श्री. बाबजी त्र्यंबक भावे हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, त्यामुळे घरात राष्ट्रीय वृत्ती आणि देशसेवेचे वळण होते. त्याच वळणात मी वाढलो व माझा देशसेवेचा पिंड तयार झाला. त्या अनुषंगाने एक निर्भीडपणा व शिस्तही अंगी आपोआपच बाणली गेली. भिवंडीत इंग्रजी शिक्षणाची किंवा अन्य प्रकारच्या शिक्षणाची सोय नव्हती. परिस्थिती मुळे राष्ट्रीय पाठशाळेत शिक्षणासाठी गेलो. माझ्या वरच्या देशसेवेच्या संस्कारांचे दृढीकरण या राष्ट्रीय शाळेत झाले. भिवंडी येथे 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात मला भाग घ्यायला मिळाला. 1931 साली गांधीजी गोलमेज परिषदेला जाऊन आल्यावर कायदेभंगाची चळवळ पुन्हा सुरू झाली. तेव्हा आमची पाठशाळा सरकारी अवकृपेला बळी पडली. मी मात्र भिवंडीस परत आलो. 

काही दिवसांनी मला नगर होऊन पत्र आले. माझे मित्र डॉक्टर गोविंद जोग व श्री. न. पू. जोशी यांचे ते पत्र होते. त्यांनी मला आग्रहपूर्वक नगरला परत बोलाविले होते. नगरला परत आल्यानंतर मी चळवळीचे काम सुरू केले. रोज सायंकाळी गांधी मैदानात मुलांना जमवू लागलो. सायंफेरी सुरु केली. बुलेटीन काढू लागलो. सत्याग्रह करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सभेची व्यवस्था ठेवू लागलो. नगर मधील बऱ्याच लोकांना सत्याग्रह केल्यावरून पकडण्यात आले होते. त्यामुळे 3 जून 1932 रोजी कोणी सत्याग्रहीच मिळेना. म्हणून उर्वरित काँग्रेसचा सर्वाधिकारी म्हणून गांधी मैदानात मीच सत्याग्रह केला. मला ताबडतोब पकडण्यात आले. दुसऱ्या दिवशी मला सहा महिने सक्तमजुरी ही ठोठावण्यात आली. मी नगर पोलीस कस्टडीत होतो. तेथे रोज चक्कीचे काम करावे लागे. ७0 पाऊंड ज्वारी पीसावी लागे. तीन तासात ते काम पूर्ण करावे लागे. शेवटी शेवटी पोटातील आतडी गोळा होत व फार त्रास सहन करावा लागे. एवढ्या धान्यातून फक्त भुसा म्हणून साधारण अर्धा किलो काढावा लागे. सहा महिन्यांची शिक्षा संपल्यानंतर मी भिवंडीस परत आलो.

आता उपजीविकेसाठी काहीतरी करणे आवश्यक होते. भिवंडी येथील अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये माझ्याजवळ असलेल्या कांदिवली व अमरावती येथील शारीरिक शिक्षण परीक्षांच्या जोरावर मला व्यायाम शिक्षकाची नोकरी मिळाली. श्री. ग. बा नेवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 1939 मध्ये एक ‘अभिनव चर्चा मंडळ’ स्थापन झाले होते. व्यायाम शाळेत येणाऱ्या आम्हा सर्व तरूणांचा त्यात सहभाग होता. पुढे सर्वजणांनी ‘चले जाव’ लढ्यात भाग घेतला. 8 ऑगस्ट 1942 च्या ‘चले जाव’  ठरावाच्या गोवालिया टँक वरील ऐतिहासिक अधिवेशनाला आम्ही सारे गेलो होतो. अभिनव चर्चा मंडळातील आमचा एक ग्रुप फोटो, आम्हाला पकडण्यासाठी पोलिसांच्या उपयोगी पडला. चळवळीच्या कामाचे दोन भाग होते. एक म्हणजे बुलेटीन-प्रचारसभा यांच्याद्वारे सरकार विरोधी वातावरण तयार करणे. दुसरी म्हणजे शासन यंत्रणा कमकुवत करणे व ती बंद पाडणे. अनायसेच माझी श्री भाई कोतवालांशी गाठ पडली. एका फार मोठ्या योजनेच्या संदर्भात, मी श्री कोतवालांच्या छावणीवर गेलो होतो. टाटा पॉवर हाऊस व पाण्याचे नळ तोडण्याचा कार्यक्रम होता. कोतवालांच्या छावणीत बॉम्बसदृश्य पदार्थ करून त्याचा उपयोग कचेऱ्यात व विशेषतः रेकॉर्ड रूममध्ये ठेवण्याची योजना होती. असा उपयोग बरेच ठिकाणी झाला व यश आले.

—-क्रमश:

प्रस्तुती श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाकी शिल्लक… ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

? वाचताना वेचलेले ?

☆ बाकी शिल्लक… ☆ प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर ☆ 

“माझे साहित्य कोण वाचतात कितीजण वाचतात,हे कळत नसले तरी कुठेतरी माझे साहित्य जीवनाबद्दल कुतुहल जागृत करेल तेव्हढ्यासाठी तरी जगण्याची सूक्ष्मशी ईर्षा निर्माण करील अशी आडूनआडुन  मला आशा वाटत असते.पण तेव्हढ्यासाठीच मी लिहीतो का?

नाही.

लिहीणे ही माझीच मानसिक गरज आहे. विधात्याने मी जन्माला येताना मला सर्जनाची (कमी —अधिक)  शक्ती दिली आहे.ती शक्ती मला स्वस्थता देत नाही.मलाही ती स्वस्थता नको असते.ती स्वस्थता जेव्हां येईल तेव्हां माझ्या जगण्यातला अर्थ निघून गेलेला असेल.अशी मला भीती वाटत असते…..”

जयवंत दळवी (बाकी शिल्लक)

प्रस्तुति – सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे

? वाचताना वेचलेले ?

☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे ☆ 

दारात उभे म्हातारपण

त्याला आत घेणार नाही

उत्साहाने बाहेर भटकेन

त्याकडे लक्ष देणार नाही!१!

 

उभा राहूदे दारात त्याला

ढुंकूनही  बघणार नाही

आजही मी तरुण आहे

त्यास घरात घेणार नाही!२!

 

जन्मा बरोबर असलेला

मृत्यू मला ठाउक आहे

उत्साहाने बाहेर भटकेन

जरी तो माझ्या मागे आहे!३!

 

विसरेन जन्म तारीख

म्हातारपणाला  थारा नको

किती मी चंद्र पाहिले

त्याचा हिशोब ठेवायला नको!४!

 

सुरकुतलेल्या चेहऱ्यावर

तारुण्याची चमक असेल

उत्साहाने काम करण्याची

हातापायात धमक असेल!५!

 

प्रेम देईन प्रेम घेईन

मित्रांच्या सहवासात राहीन

दररोज संध्या झाली की

एकच पेय प्रेमरस पीईन!६!

 

हाकला त्या म्हातारपणाला

जन्म तारीख विसरून जा

सकाळ झाली की खिडकीतून

कोवळे उन पहात जा!७!

 

दारात उभे म्हातारपण

त्याला आत घेणार नाही

उत्साहाने बाहेर भटकेन

त्याच्याकडे लक्ष देणार नाही!८!

 

प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ४ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ४ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[11]

चांदण्यांच्या            

या लक्षावधी ठिणग्या

उसळवणारी

ती अंधाराची ज्वाला

कुठली असेल?

 

[12]

सळसळणार्‍या या पानांसवे

सळसळतात बघ विचार माझे

प्रकाशाचा स्पर्श होतो

आणि काळजात गाणी फुटतात.

नीळाईत या आकाशाच्या

कृष्णडोहात अन् कालौघाच्या

हलकेच तरंगत जाताना

सर्वांसह अनाम बनून…

किती खूश

किती प्रसन्न आहे मी

 

[13]

आपल्या प्रेमिकासाठी

आपला विशाल मुखवटा

उतरून ठेवतं विश्व

आणि किती चिमुकलं होतं ते

चिरंतनाच्या

एखाद्या चुंबनाइतकं…

एखाद्या गीताइतकं….

 

[14]

वसंतातलं फूल बनून

फुलू दे.. फुलू दे..’

शिशिरातलं पान बनून

गळू दे.. गळू दे..

≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कृष्णावळ…. ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ कृष्णावळ…. ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज आमच्या सासूबाई म्हणाल्या पोह्यांसाठी 2 कृष्णवळ द्या. मी ऐकतच राहिलो. मग त्या म्हणाल्या अहो म्हणजे कांदे !

कांद्याला कृष्णवळ म्हणतात हे मला पाहिल्यानंदीच समजले.

कृष्णावळ….. अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द !

आजकाल कोणीही नाही वापरत !

कृष्णावळ चा अर्थ कांदा !

कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे.

कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो… आणि आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो.

शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत.

ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ म्हणतात.

कृष्ण आणि वलय या दोन शब्दांचा संधी होऊन हा मराठी शब्द तयार झाला आहे.

पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार  व  पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो… आहे की नै गंमत…

डोळ्यातून पाणी काढणारा कांदा किती वेगळ्या उंचीवर गेला ना कृष्णावळ या शब्दामूळे !

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनाच्या घराचा पाहुणचार ☆ संग्राहक – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ मनाच्या घराचा पाहुणचार ☆ संग्राहक – सुश्री मीनल केळकर ☆ 

एक सुंदर अनुभव. “मनातल्या घरात” (Self – Introspection)

आपण मनातल्या घराला कधी भेट दिली आहे कां ???

एका ठिकाणी बसून करमत नाही. मग उगाच आपण, इथे तिथे फिरायला जातोच की !!! मग ती  पर्यटन स्थळ असतील किंवा कोणाच्या तरी घरी !!! याच्या त्याच्या घरी, या ना त्या कारणाने आपण पाहुणा म्हणून जातोच. मग मी ठरवले, कां नाही आपण आपल्याच मनाच्या घराचा पाहुणचार घेऊन यावा ???

हो, हो, चक्क स्वतःच्याच मनाच्या घरचा पाहुणचार !!! आपणच आपल्या मनाच्या  घराला भेट द्यावी म्हंटले, बघावे तरी काय आणि कसं ठेवलंय हे मनाचे घर !!! कोण, कोण रहातात तिथे ???  कसे स्वागत होत ते ???

ठरल्याप्रमाणे मनाच्या घराच्या दारापर्यंत पोहचलो. अगदी छोटेसे होते, पण छान होते !!! आत काय असेल, या उत्सुकतेने दार वाजवले, तर आतून आवाज आला, “कोण आहे ???? काय पाहिजे ????” असा प्रश्न आतून विचारला जाईल याची कल्पना नव्हती पण खरंच आपण कोण आहोत, हे त्याला सांगितल्या शिवाय तो आपल्याला आत तरी कसा घेणार ???

मी ही सांगितले, “मी स्व आहे रे !!! ज्याचे तू कध्धी ऐकत नाही. ज्याच्याशी तू सतत वाद घालत असतोस, ज्याच्याशी तू दिवस रात्र गप्पा मारत असतो तो मी !!!”

आतून आवाज आला, ” बरं…. बरं…उघडतो दार !!!” दार उघडल्या नंतर आत पाहिले, तर गडद अंधार होता. म्हणून मी विचारले, ” कां रे एवढा अंधार ???” तेव्हा तो म्हणाला, ” तुमच्याच कृपेने !!! मी म्हंटले, ” माझ्या कृपेने ??? तर तो म्हणाला, “हो !!! तुझ्याच कृपेने !!! कारण इथे उजेड तेव्हा पडेल, जेव्हा तू सकारात्मक विचारांचे दिवे लावशील.”

मी ही जरा ऐटीतच म्हणालो, “ठीक आहे… ठीक आहे !!! लावतो दिवे” म्हणत, पुढे सरकलो. थोडं पुढे चाचपडत गेलो तर काय !!! तिथं असंख्य खोल्या होत्या. अगदी कोंदट वातावरण होते. मी त्याला पुन्हा विचारले, “काय रे, त्या खोल्यात काय दडलंय ???”

तो पुन्हा म्हणाला, ” बघ की उघडून एक एक खोली, कळेल काय आहे ते.” मग मी हळूच एका खोलीचे दार उघडले.  आणि…फडफड करत अनेक रागीट चेहरे समोर आले. जणू काही ते मला गिळंकृतच करणार आहेत. मी पटकन दार लावले. तेव्हा तो म्हणाला, ” काय झालं ??? दार कां लावले ???” मी म्हंटले, ” कसले भयानक होते रे ते !!! ” तर तो पुन्हा हसत म्हणाला, ” तुम्हीच गोळा केले आहेत ते !!! तुम्ही ज्यांचा ज्यांचा तिरस्कार करता, ज्यांचा राग करता, त्यांची संख्या किती आहे ते कळलं कां ??? तुम्हीच केलेली मेगा भरती आहे ती !!!”

हुश्श…..अरे बापरे !!! पुढचं दार उघडायचे धाडसच होईना, पण म्हंटले आता आलोच आहे तर उघडावे. तिथे ज्या काही घटना पहिल्या त्याने तर घामच फुटला. तो पुन्हा मिस्कीलपणे म्हणाला, ” काय, काय झालं… ??? मी म्हंटले, “अरे बाबा, हे काय ??? तो पुन्हा म्हणाला, ” तू तुझ्या आयुष्यात सतत दुःखद आठवणीच गोळा करीत गेलास, त्याला मी तरी काय करणार ??? आता तर साठवून ठेवायला या खोल्यासुद्धा अपुऱ्या पडत आहेत.”

तिथं अशा किती तरी खोल्या होत्या, ज्यांना उघडायच धाडस माझं झालं नाही. मग त्याने त्या उघडून दाखवल्या, ही भीतीची खोली, ही द्वेष, ईर्षा, वाईट विचारांची, मतभेदांची, गैरसमजांची खोली अशा अनेक खोल्या पाहिल्या, सर्वच्या सर्व अंगावर येत होते.

आता मात्र माझं डोकं गरगरायला लागले, अस्वस्थता वाढली होती. किती भयावह होत ते सर्व !!! त्यामुळे पुढं काय आहे, हे बघण्याची इच्छाच होत नव्हती. हे सारं भयाण बघून अंगाला काटा आला होता. स्वतःचाच तिरस्कार वाटत होता.

मी त्याला म्हंटले, “मी जातो आता. मला काही बघायचं नाही आता.” तो म्हणाला, ” थोडं…थांब, आलाच आहेस तर हे पण बघून जा.”

थोडी हिंमत दाखवत आम्ही पुढच्या दिशेने निघालो….तिथं संपूर्ण जाळ लागलेला होता…मग थोडं पुढे गेलो आणि पाहिलं तर काय….आहा…..हा हा…स्वर्ग सुख मिळावं असं वातावरण होत, तिथं प्रेम होतं, तिथं माया होती, तिथं आनंद होता, उत्साह होता, नवीन नवीन कल्पनांचा बाजार होता. सुख, समाधान शांती ने भरलेले, अगदी नयन दिपून टाकेल असं सर्व काही होते.

मी म्हंटले, “काय रे हे इतकं सुंदर आहे, हे तू मला आधी कां नाही दाखवलं ???” तर तो मिस्कील पणे हसत म्हणाला, ” अहो, तुमचं मनातलं खरं घर तर हेच आहे.” मग मी म्हणालो, ” जे आधी पाहिलं, ते काय होतं ???” तो पुन्हा हसत म्हणाला, ” त्या…त्या…तुम्ही अतिक्रमण करत वाढविलेल्या खोल्या आहेत. तुम्ही केलेला राग, इर्षा, द्वेष, भीती, नावडती माणसं, नावडत्या आठवणी याची जी साठवणूक केली, ती या सुंदर घराच्या प्रवेशद्वारा पुढे पहारेकरी बनून बसले आहेत, जे तुम्हाला इथं पर्यंत येण्यास अडवत आहेत.”

क्षणभर विचार केला, खरंच की आपणच आपल्या सुख, आनंदाच्या कडे जाणारा रस्ता, या नकारात्मक गोष्टींची साठवणूक करून अडवलेला आहे. मनाच्या घराचा पसारा आवरायला वेळ लागणार होता पण ठरवलं की, आता या अडथळा बनून बसलेल्या खोल्यांची साफसफाई करायची. तिथं सकारात्मक विचारांचे दिवे लावायचे आणि सुख समाधान, शांती कडे जाणारा मार्ग सोपा करायचा.

बरं झालं. आज मनाच्या घरात फिरून आलो, नाहीतर आपल्या मनावर नकारात्मक विचारांचे अतिक्रमण झालेले आहे हे कळलंच नसतं.

मनाच्या घरचा पाहुणचार खूप काही शिकवून गेला. आपल्या मनाचं घर, दुसऱ्याच्या हातात द्यायचं नाही. स्वतःच्या घराची साफसफाई स्वतःच करायची.

संग्राहक – सुश्री मीनल केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ओंजळीतली चांदणफुले – सौ.  पुष्पा जोशी ☆ प्रस्तुति – श्री  प्रमोद वर्तक

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ ओंजळीतली चांदणफुले – सौ.  पुष्पा जोशी ☆ प्रस्तुति – श्री  प्रमोद वर्तक ☆ 

पुस्तकाचे नाव – ओंजळीतली चांदणफुले

लेखिका –  सौ पुष्पा जोशी

प्रकाशक – राजा प्रकाशन, मुंबई.

पाने  – १०४

 किंमत – रु १२५

जीवनसेतू

अनादिकाळापासून मानवाला जीवनाबद्दल प्रेम आहे, ओढ आहे. जीवनाविषयी त्याच्या मनात दडलेले कुतूहल त्याला नव्या नव्या वाटा शोधण्याची उर्मी  देते. साहस करण्याची वृत्ती आणि प्रवास करण्याची प्रवृत्ती यामुळे  मानवाने दळणवळणाच्या अनेक सोयी व साधने निर्माण केली आहेत. त्यातील पूर्वापार साधन म्हणजे ओढे, नद्या, खाड्या, समुद्र ओलांडून जाण्यासाठी बांधलेले अनेक प्रकारचे पूल! रामायण काळातील वानरसेनेने श्रीरामांसाठी बांधलेला समुद्रसेतू म्हणजे दुष्ट शक्तिचा विनाश करण्यासाठी समूह शक्तिने उभारलेला सेतू  होता.

लहान  गावांमध्ये पावसाळी झरे, ओढे किंवा पाण्याचे छोटे प्रवाह ओलांडण्यासाठी झाडांचे मजबूत ओंडके किंवा बांबू त्या प्रवाहावर बसवून साकव घालण्याची पद्धत आहे. हिमालयातील कितीतरी दुर्गम गावांमध्ये पोहचण्यासाठी अनेक खळाळते ,रुंद प्रवाह ओलांडावे लागतात. तिथे प्रवाहच्या दोन्ही तीरांना जोडणारा एक मजबूत लोखंडी दोर बांधलेला असतो. त्यावरील कप्पीच्या सहाय्याने बांबूच्या टोपलीत बसून ते प्रवाह पार केले जातात.

इंग्रजांना मुंबई बेट आंदण मिळाले. त्यांचा पसारा वाढू लागला तेव्हा त्यांनी माहिम- वांद्रे इथल्या खाडीमध्ये भर घालून तेव्हाची बेटे जोडण्यासाठी पूल बांधले. वसई -भाईंदरच्या खाडीवरील रेल्वेचा जुना पूल इंग्रजी आमदानीतला आहे.शंभराहून अधिक वर्षे इमानेइतबारे सेवा करुन तो पूल आता निवृत्त झाला आहे. त्या खाडीवर आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेले दोन नवीन पूल पाहत तो सेवानिवृत्त पूल  स्थितप्रज्ञासारखा उभा आहे. असाच एक  जुना जाणता पूल म्हणजे कोलकत्याचा हावडा ब्रिज. तिथेही आता एकावर एक दोन नवीन पूल बांधण्यात आले आहेत. दुसऱ्या महायुद्धातील एका घटनेवर आधारित ‘ब्रिज आॅन द रिव्हर क्वाॅय’हा एक गाजलेला युद्धपट होता.

ब्रह्मपुत्रा नदी(नद)वर बांधलेला साडेतीन किलोमीटरचा पूल ही आपल्या लष्करी अभियंत्यांची करामत आहे. त्या पुलावरून ब्रह्मपुत्रेचा वेगवान खळाळता प्रवाह ओलांडताना मानवी जिद्द व तंत्रज्ञान यापुढे आपण नतमस्तक होतो. वांद्रे- वरळी सी लिंक ब्रिज हा मुंबईचा मानबिंदू आहे. या सागरी सेतूवरील सहा मिनिटांचा प्रवास म्हणजे भारतीय अभियंते, तंत्रज्ञ, कामगार व त्यांना साथ देणारे देशी-परदेशी हात यांच्या जिद्दीची, श्रमाची यशोगाथा आहे. रात्री प्रकाशाने उजळून निघणाऱ्या  त्यावरील त्रिकोणाकृती केबल्स म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या फडफडणाऱ्या सोनेरी-रुपेरी पताकाच! अशा अनेक पुलांमुळे वाहतुकीच्या सोयी सुविधांमध्ये भर पडते हे निश्चित पण असे पूल बांधत असताना मजुरांपासून ते वरिष्ठ अभियंत्यांपर्यंत  सर्वजण आपला जीव धोक्यात घालून ही कामे उभी करीत असतात. सागरी सेतू बांधताना समुद्राची भरतीओहोटीची वेळ सांभाळणे, निसर्गाच्या लहरीमुळे केलेले काम फुकट जाणे, मेट्रो रेल्वेसाठी पूल बांधताना जमिनीच्या पोटात खूप खोलवर उतरून कामे करणे या प्रकारचे अनेक धोके असतात. अशा कामांवर होणाऱ्या अपघातात जीव गमावलेल्यांची संख्या बरीच मोठी असते. या सोयी सुविधांचा वापर करताना आपण या साऱ्यांची कृतज्ञ आठवण ठेवली पाहिजे.

मेघालयची राजधानी शिलाॅऺ॑गहून थोडे दूर घनदाट जंगलात एक ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ आहे. दगड, गोटे यांनी भरलेल्या मोठ्या खळाळत्या ओढ्याच्या दोन्ही बाजूला जंगली रबराची झाडे आहेत.( या झाडांपासून रबर मिळत नाही.) या रबर प्लांटची जाडजूड, लांब , भक्कम मुळं ओढ्यामध्ये  बांबू रोवून त्यावरून एकमेकात गुंफली आहेत.मुळांच्या कित्येक  वर्षांच्या वाढीमुळे, तसेच त्यांना दिलेला आधार व आकार यामुळे त्या मुळांचा मजबूत डबलडेकर ब्रिज तयार झाला आहे.आसपासचे गावकरी ओढा ओलांडण्यासाठी त्या पुलाचा उपयोग करतात. कित्येक ट्रेकर्स त्या पुलावरून चालण्याचा थरार अनुभवतात. परदेशी प्रवाशांना या ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ चे खूप आकर्षण आहे .कारण जगात फारच क्वचित ठिकाणी असे जिवंत पूल आहेत. गणित आणि विज्ञान यांची उत्तम सांगड घालणारा कीटक म्हणजे मुंगी. जंगलातील जवळ जवळ असलेल्या दोन उंच झाडांवरून खाली-वर करण्याऐवजी या मुंग्यांनी आपले डोके वापरून झाडांची पाने व तंतू यांचा वापर करून आपल्या कामसू वृत्तीने या दोन्ही झाडांना जोडणारा पूल तयार केला होता आणि त्यावरून त्यांची शिस्तबद्ध वाहतूक सुरू होती.

थेम्स नदीवरील लंडन ब्रिजशिवाय लंडन चे चित्र पूर्ण होत नाही. मावळत्या सूर्यकिरणात अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोचा गोल्डन ब्रिज झळाळत असतो. जपानमधील अकाशी इथला सस्पेन्शन ब्रिज हा गोल्डन ब्रिजहूनही मोठा आहे. स्वीडनमध्ये पंधरा पुलांच्या खालून आमची क्रूझची सफर होती. त्यातला एक ब्रिज संपूर्ण तांब्याच्या पत्र्याने बांधलेला आहे. सूर्यकिरणे त्यावरून परावर्तित होऊन त्याचे लालसर प्रतिबिंब खालच्या पाण्यात पडले होते. कोपनहेगन या डेन्मार्कच्या राजधानीच्या शहरातून एक चिमुकली नदी वाहते. तिच्यावर चारशे वर्षांपूर्वी बांधलेला पूल चक्क संगमरवराचा आहे. त्याचा पादचारी पूल म्हणून अजूनही वापर होतो. तुर्कस्तान मुख्यतः  आशिया खंडात येतं. पण तुर्कस्तानमधील इस्तंबूलचा थोडासा भाग युरोप खंडात येतो.इस्तंबूलच्या एका बाजूला असलेल्या बास्पोरस या खाडीवरील पुलाने युरोप  आणि आशिया हे दोन खंड जोडले जातात. या खाडीवरील क्रूझ सफारीमध्ये युरोप आशियाला जोडणारा हा सेतू छोट्या-छोट्या लाल निळ्या दिव्यांनी चमचमत असताना दिसतो.

जीवन व्यवहार सोयीस्कर होण्यासाठी मानवाने जसे अनेक पूल बांधले तसेच जीवनगाणे अर्थपूर्ण होण्यासाठी मानवाला सहृदयतेचे सेतू उभारणे आवश्यक असते. जीवनामध्ये संकुचितपणाच्या भिंती उभारण्यापेक्षा मैत्रीचे पूल उभारणे हे केव्हाही श्रेयस्कर ठरते. काही विशिष्ट कामाकरता माणसे एकत्र येतात तेव्हा त्यातून तात्पुरत्या सहवासाचे साकव उभारले जातात. तर कधी त्यातूनच प्रदीर्घ मैत्रीचे पूल उभे राहतात. पती-पत्नीमधील भावबंधनाचा पूल, कौटुंबिक नात्यांचा जिव्हाळ्याचा पूल भक्कम असावा लागतो. समाजकार्य उभे करताना क्रियाशील कार्यकर्त्यांचा समविचाराचा पूल असतो. समान छंद, आवडीनिवडी असणारे त्यांच्या त्या छंदामुळे एकत्र येऊन त्यातून मैत्रीचा पूल बांधला जातो. राष्ट्रा- राष्ट्रातील वैज्ञानिक प्रगती, माहिती- तंत्रज्ञान यांच्या वाहतुकीचे पूल हे जग जोडणारे असतात. मानवाच्या प्रगतीला नव्या दिशा दाखविणारे असतात.

माणसा माणसांमधल्या या पुलांना सामंजस्याचे भरभक्कम खांब असावे लागतात. गैरसमज, कटुता, द्वेष, अहंभाव यांच्या भिंती टाळता आल्या तरच हे पूल उभे राहतात. वेळप्रसंगी आपला अट्टाहास बाजूला ठेवण्याचा, आपल्या मतांना मुरड घालण्याचा, सहनशीलतेचा टोल या पुलांसाठी भरावा लागतो. अशा मानवी पुलांवर एखादं हक्काचं, आपुलकीचं विश्रांतीस्थान असेल तर तिथे थोडावेळ थांबून गतप्रवासाचा आढावा घेता येतो आणि पुढील वाटचालीसाठी नवी उमेद, मार्गदर्शन, शक्ती मिळते.

मानवनिर्मित, निसर्गनिर्मित आणि सुरेल मानवी जीवनासाठी आवश्यक अशा या पुलांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व पुलांना स्वतःची अशी एक गती असते.लय असते. ही लय,ही गती म्हणजे जीवन वाहते ठेवण्याचा मूलमंत्र असतो.ही लय ज्याला सापडली त्याचे जीवन गतिमान, प्रवाही ,आनंदी होते आणि ही लय जीवनाला विलयापर्यंत सांभाळून नेते.

प्रस्तुति –  श्री प्रमोद वर्तक

सिंगापूर

मोबाईल-9892561086

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिटायर्ड माणूस – स्व. पु.ल. देशपांडे ☆ प्रस्तुति – सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ रिटायर्ड माणूस – स्व. पु.ल देशपांडे ☆ प्रस्तुति – सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

वाचक..सौ.अंजली दिलिप गोखले

स्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (पु. ल. देशपांडे)

जगांत सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस…! …. पु.लं.

 

रिटायर्ड माणसांनो,

भावांनो,सहकाऱ्यांनो…

 

जगांत सर्वात लक्ष न देण्याजोगा

प्राणी म्हणजे “रिटायर माणूस” होय..!

 

पु.लं च्या भाषेत सांगायचं म्हणजे

 

पुण्यांच्या दुकानदारांच्या नजरेतून

सगऴ्यांत दुर्लक्षीत प्राणी म्हणजे

गिऱ्हाईक अगदी त्याचप्रमाणे

समजा…!

 

गरिब बिचारा,भांबावलेला,

बावरलेला,काहिसा आत्मविश्वास हरवलेला असा हा प्राणी असतो..!

 

कोणे एके काळी या माणसाचे

पण सुगीचे दिवस असतात.

त्याचा रूबाब! वाखाणण्याजोगा असतो.

सर्व गोष्टी हातात मिळत

असतात.

घरी व कार्यालयात देखील..

 

टेबलावरून फायली फिरत

असतात,मोठ्या मोठ्या

करारांवर सह्या होत असतात.

नुसती बेल वाजवलीना तरी

तीन तीन शिपाई धावत येत

असतात.एक चहा घेऊन.

एक बिस्कीटं घेऊन,तर एक

बडीशोप घेऊन..!

 

अहाहा…त्या शिपायाच्या

चेहऱ्यावर भाव असतो,

तो हा,की साहेब हे फक्त

आपल्याचसाठीच्…

 

आणि आता,टेबलावर

मिरच्यांची देठं काढली जातात,भेंडी पुसली जाते. लसणाच्या पाकळ्या मोकळ्या होतात…!

अरेरे… किती हा विरोधाभास?

 

रिटायर्ड माणसाला कुठंही डोकं चालवायला वा मध्ये घालायला बंदी असते,कधी कधी मला,तर

वाटतं, की रिटायर्ड माणूस त्याचं डोकं फक्त उशीवर टेकवायलाच वापरत असावा सध्या…बिच्चारा…!

 

कुणी समदु:खी माणूस त्याला

घरी भेटायला आलाच,तर हिंदी

चित्रपटात यात्रेत हरवलेला भाऊ भेटल्यावर नायकाला जो आनंद होतो,अगदी तसाच किंबहूना त्याहून जास्त आनंद रिटायर्ड माणसाला होतो.पण त्यांचं.बोलणं किचनचा सी.सी. टिपत असतो,हे त्याच्या ध्यानी नसतं…

 

आपल्या सुगीच्या दिवसांत हा

माणूस कट्टयावर मित्रांसमवेत

हास्य विनोद करत असतो.

मधून मधून नेत्र व्यायामही

सुरू असतो,तोच बिचारा

आता मंदिराच्या कट्टयावर वा

वाचनालयाच्या ओट्यावर

विसावलेला असतो…

 

ज्या चौपाटीवर सणसणीत

भेळ,रगडा,बर्फाचा गोळा

खातांना नजर भिरभीरत

ठेवलेली असते,गार वार वारा

अंगावर घेत रिटायर्ड लाईफ नंतरच्या आयुष्याची स्वप्न रंगवलेली असतात,तिथेच चटई टाकून योगा करायची वेळ आलेली असते…

 

दिवसभरांत टोमणे ऐकावे

लागतात,ते शेजारचे बघा,या वयातही किती फीट व धीट

आहेत…नाही तर..तुम्ही बघा,

भित्रे काळवीट..वगैरे वगैरे…!

 

अरे कांय,आहे कांय हे…!?

 

एक नवीन मुद्दा मला कळलांय,तो तुम्हाला सांगतो. या रिटायर्ड माणसांचा उल्लेख पुराणांत म्हणजे महाभारतात सुध्दा आला आहे….

चक्रावलात नां..?

मग ऐका…समोर सागराप्रमाणे पसरलेला विशाल सैन्याचा समुह,त्यातले स्नेही,आप्तेष्ट पाहून अर्जुन जेव्हा युध्द करायला नकार देतो,तेंव्हा कृष्ण भगवान अर्जुनाला

म्हणतात…

 

अर्जुना असा रिटायर्ड

माणसासारखा हताश व

निराश होऊ नकोस.उठ व

लढायला सज्ज हो…!!

 

पुढं कालांतरानं रिटायर हा

शब्द गीतेतून वगळण्यांत

आला.कां,तर “भविष्यांत

रिटायर्ड लोकांच्या भावना

दुखाऊ नयेत”.

 

बघा,लोकहो…!त्या काळांत

पण यांच्या भावनांची कदर

केली जात होती आणि आता

सुकलेल्या पालापाचोळ्या प्रमाणे त्या पायदळी तुडवल्या जातात…अरेरे…!!

 

सरते  शेवटी भगवंतानं रिटायर्ड लोकांना हताश न होण्याचा मार्ग सुचवला..

भगवान म्हणाले…!

 

अरे वत्सा,रिटायर्ड माणसा…!

हताश व निराश होऊ नकोस,

मी तुला फंड व पेन्शन या

दोन गुळाच्या वेेली देतो,जो

पावेतो त्या तुझ्याकडं आहेत,

तोवर तुला मरण नाही…

 

मरण नाही,म्हणजे खरं मरण

नाही,रोजच्या जीवनात तू ज्या

यातना वा अपमान भोगशील,

त्या यातना तुझ्याकडं असलेल्या,या दोन शस्रांनी सुसह्य होतील…

फंड व पेन्शन जो पावेतो

तुझ्याकडे आहेत,तो पर्यंत सारे

तुझे असतील….

 

उठ,वत्सा उठ आणि आयुष्याच्या संग्रामास तयार हो. उठ…!!

 

खाडकन जाग आली…!

 

भानावर आलो.आणि की

माझी ती दोन शस्र जागेवर

आहेत,की नाही हे बघण्यासाठी अंथरूणातून बाहेर आलो…

 

माझ्या सर्व सेवानिवृत्त (रिटायर )झालेल्या व होऊ घातलेल्या मित्रांना समर्पित..?

 

संग्राहक – सौ.अंजली दिलिप गोखले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print