आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते, चुकतो तो चिन्हांचा वापर.
बेरीज,वजाबाकी, गुणाकार,भागाकार ही चिन्हं योग्य पद्धतीने वापरली की उत्तर मनासारखे येते.
आयुष्यात कुणाशी बेरीज करायची, कुणाला केंव्हा वजा करायचे, कधी कुणाशी गुणाकार करायचा आणि भागाकार करताना स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजले की उत्तर मना-जोगते येते.
आणि हो, मुख्य म्हणजे जवळचे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट यांचा हातचा एक समजू नये, त्यांना कंसात घ्यावे ! कंस सोडविण्याची हातोटी असली की गणित कधीच चुकत नाही.
प्रस्तुति – कालिंदी नवाथे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ व्यक्त – अव्यक्त….वैशाली ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
मनुष्य आणि इतर प्राणी यांच्यामधील महत्वाचा फरक म्हणजे, शब्दांनी समृध्द मनुष्य शब्दांद्वारा आणि शब्दांशिवायही आपल्या भावना व्यक्त करु शकतो. अव्यक्त राहूनही परस्परांना समजून घेणारं नातं खूप छान फुलतं—शब्दांचे खतपाणी घालण्याची फार गरजच नसते.
पण सतत असं राहून चालणार नाही. काही विशिष्ट प्रसंगातच हे योग्य ठरतं.
एरवी वेळोवेळी व्यक्त होणं खूप आवश्यक—नाहीतर मग संवाद संपू शकतो. आणि कुठेतरी गैरसमजाचे बीज नकळतं रोवल्या जातं.
व्यक्त होणा-यांचे ही वेगवेगळे प्रकार असतात. कोणी स्वतःबद्दल काहीच सांगू इच्छीत नसतं—व्यक्तच होत नाही. तर कोणी सतत व्यक्त होत राहतं.—या दोन्ही परिस्थितीमध्ये हवा तसा संवाद शक्यच होत नाही.
संतुलीतपणे व्यक्त होणं ही एक कलाच आहे. कुठे केव्हा किती बोलावं, व्यक्त व्हावं, हे कळणं खूप आवश्यक—-
याचबरोबर व्यक्त कोणासमोर व्हायचं, हे देखील तितकंच महत्वाचं —समोरची व्यक्ती कुठलेही मत न लादणारी, पूर्वग्रह न ठेवता, निरपेक्षपणे ऐकणारी हवी. व्यक्त होणा-याबरोबरच ऐकणाराही प्रगल्भ हवा. तेव्हाच एखाद्या कठीण प्रश्नातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य मिळतं.
व्यक्त अव्यक्त दोहोंमधुन असावा संवाद—
प्रत्येक नात्यामधील मिटेल मग वाद—-
——वैशाली
संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
सांगली
मो. – 8806955070
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ वैद्यानां शारदी माता – वैद्य अश्विन सावंत ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆
या सूत्राचा अर्थ असा की वैद्यांसाठी शरद ऋतु हा मातेप्रमाणे असतो. शरद ऋतुमध्ये (म्हणजे ऑक्टोबर हिटच्या उष्म्याच्या दिवसांमध्ये) रोगराई एवढ्या मोठ्या प्रमाणात बळावते की त्यामुळे वैद्य-डॉक्टर मंडळींसाठी तो सुगीचा काळ ठरतो.
वर्षाऋतुनंतर येणारा शरद ऋतु म्हणजे पावसाळ्यातील शीत-आर्द्र (थंड-ओलसर) वातावरणानंतर येणारा उष्ण-दमट वातावरणाचा उन्हाळा. बरं, वातावरणात होणारा हा बदल हळूहळू झाला तरी त्याचा परिणाम तितक्या तीव्रतेने होणार नाही. मात्र मागील काही वर्षांपासुन (तुम्हीं-आम्हीं भूमातेची कत्तल चालवली आहे तेव्हापासुन) हा वातावरणबदल अचानक होऊ लागला आहे. काल-परवापर्यंत पाऊस व थंड वातावरण आणि लगेच एक-दोन दिवसात अंगाची काहिली करणारा उन्हाळा!याला काय म्हणायचे? या अचानक होणा~या बदलाबरोबर शरीराने कसे काय जमवून घ्यायचे?
कधी कधी तर दिवसा आकाशात सूर्य तळपत असतो, उकाडा वाढतो,घामाच्या धारा वाहू लागतात आणि अचानक सायंकाळी वारे वाहू लागतात, ढग जमून येतात,काळोख दाटून येतो आणि पाऊस पडू लागतो किंवा रात्री ढग गडगडायला लागतात,विजा चमकू लागतात व धुवांधार पाऊस पडू लागतो. कोणता ऋतु समजायचा हा?दिवसा उन्हाळा-रात्री पावसाळा?
निसर्गात असे विचित्र बदल चोविस तासांमध्ये होत असतील तर शरीराने त्या बदलांबरोबर कसे जुळवून घ्यायचे? वातावरणातल्या या अकस्मात बदलांबरोबर जुळवून घेण्याची शरिराची धडपड म्हणजेच या दिवसात दिसणारे आजार! याचमुळे काश्यपसंहितेने ’ऋतुमध्ये होणारा अकस्मात बदल’ हे शरीर-संचालक वात-पित्त-कफ या तीन दोषांमध्ये विकृती होण्याचे एक महत्त्वाचे कारण सांगितले आहे आणि ते आयुष्य क्षीण करण्यास कारणीभूत होते असेही म्हटले आहे.
दुसरीकडे जरी पाऊस थांबला तरी शरदात वाढलेली सूर्यकिरणांची तीव्रता वर्षा ऋतुमध्ये ओलसर-गार वातावरणाची सवय झालेल्या शरीराला सहन होत नाही. शरीरातला ओलावा (मोईश्चर) सुर्याच्या उष्णतेमुळे सुकून जातो . ओलावा कमी झाल्याने शरीरातले विविध स्त्राव संहत होतात.पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने पित्त सुद्धा तीव्र होते. एकंदरच शरदातल्या उष्म्यामुळे शरीरात उष्णता (पित्त) वाढून शरीर विविध पित्त विकारांनी त्रस्त होते. त्यात तुम्ही जर उन्हाळा सुरु झाला म्हणून वर्षा ऋतुला (पावसाळ्याला) अनुकूल झालेल्या आपल्या आहारविहारामध्ये अचानक बदल केलात तर तो बदल शरीराला अधिकच रोगकारक होईल आणि या नाही तर त्या पित्तविकाराने त्रस्त व्हाल, त्यात पुन्हा तुम्ही पित्त (उष्ण) प्रकृतीचे असाल तर अधिकच!
शरद ऋतुमध्ये एकंदर शरीराभ्यन्तर परिस्थिती अशी असते आणि लोकांमध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसतात की शरीरामध्ये केवळ पित्ताचा नाही तर पित्ताबरोबरच वात व कफ अशा तीनही दोषांचा प्रकोप होतो की काय अशी शंका येते. वास्तवात हारीतसंहितेने शरद ऋतुमध्ये कधी कधी, काही-काही शरीरांमध्ये वात-पित्त-कफ या तीनही दोषांचा प्रकोप सुद्धा होतो असे म्हटले आहे. तीनही दोषांचा प्रकोप म्हणजे शरीर विकृत आणि विविध रोगांना आमंत्रण.
त्यामुळेच या दिवसांत कुटुंबामधील एकतरी सदस्य काही ना काही आरोग्य-तक्रारीने त्रस्त असतो. म्हणूनच तर शरदऋतु हा अनेक आजार निर्माण करुन वैद्यांना भरपूर रुग्ण पुरवून त्यांना खुष ठेवतो, म्हणून त्याला वैद्य-डॉक्टरांची काळजी घेणारी आई ,या अर्थाने ’वैद्यानां शारदी माता’ असे संबोधले आहे.
( मानवी आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या ऋतुचर्या या विषयाची सविस्तार माहिती देणाऱ्या ऋतुसंहिता या वैद्य अश्विन सावंत लिखित आगामी पुस्तकामधून)
संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ अनोखे व्रत नवरात्रीचे ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
खरं तर हा लेख नसून मनापासून केलेलं एक आवाहन आहे.
नवरात्रात अनेक व्रते केली जातात. कोणी नऊ दिवस उपवास करतात,गादीवर झोपणं वर्ज्य करतात.वहाणा वापरत नाहीत, तर कोणी नऊ दिवस जोगवा मागतात. हल्ली एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. तसा तो वाईट नाही, पण त्याचा अतिरेक झाला आहे. मुख्य म्हणजे हा प्रकार धार्मिक नाही . कोण्या एका व्यापाऱ्याने स्वतःचा व्यवसाय वाढावा म्हणून नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या, ड्रेस वापरण्याची टूम काढली आणि सर्वांनी ती डोक्यावर घेतली. प्रत्येकीला ते सहज शक्य आणि परवडणारे असतेच असे नाही. कुणीतरी असली धार्मिक आधार नसलेली प्रथा चालू करतात आणि सर्वजण ती अंधपणे आचरणात आणतात. ह्या प्रथांची रूढी बनते
चला तर आपण नवीन प्रथा सुरू करूया. नवरात्रातला प्रत्येक दिवस सत्कारणी लावायचा असे आपण व्रत घेऊया. उतायचे नाही मातायचे नाही, घेतला वसा टाकायचा नाही हे पक्के करू या.
पहिला दिवस-या दिवशी आपण स्वतःपासून सुरुवात करुया, स्वतःचे लाडकोड स्वतः पूर्ण करू या, हवं ते खाऊया आणि आवडते छंद जोपासूया. पण मनाशी एक गोष्ट पक्की करायची की मन मारायचं नाही, कुठलीही इच्छा दडपायची नाही. कुठल्याही कारणाने पुढे ढकलायचे नाही.
दुसरा दिवस– हा दिवस आपल्या जवळच्या लोकांचे लाड.कौतुक करण्यात घालवूया. त्यांना आठवणीने त्यांचं तुमच्या आयुष्यातलं महत्त्व जाणवून देऊया. प्रत्येकाला हे मनापासून ऐकायचं असतं.
तिसरा दिवस– हा दिवस देऊया मैत्रिणींना आणि स्नेह्यांना. दुरावले असतील तर फोन करा. जवळ असतील तर एकत्र जमून आनंदात वेळ घालवा. ” माझ्यासाठी मैत्री किती महत्वाची आहे “ ही भावना त्यांच्यापर्यंत पोचू द्या.
चौथा दिवस- या दिवशी गरजू व्यक्तींना मदत करायची. ही मदत पैसे, वस्तू, शब्द कोणत्याही स्वरुपात चालेल. मग ती व्यक्ती वृद्धाश्रम- अनाथ आश्रम येथील चालेल_
पाचवा दिवस – विद्या “ व्रत “ आहे असं म्हणूया. शिक्षणासंदर्भात जिथे जेवढी जमेल तशी मदत करू या. विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य द्या, किंवा कुणाला काही शिकवा. शाळेला, ग्रंथालयाला मदत करा.
सहावा दिवस – हा दिवस राखून ठेवूया मुक्या प्राण्यांसाठी. ” गोशाळांना” भेट द्या. प्राण्यांना स्वतः चारा खाऊ घाला. प्राणी संस्थांना मदत करा.
सातवा दिवस – हा दिवस निसर्गासाठी ठेवूया. एक तरी रोपटे लावूया, आणि निसर्गाचे संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखू या
आठवा दिवस – हा देशासाठी ठेवू या. माझा देश, माझे राष्ट्र, माझा जिल्हा यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करूया. आपला परिसर स्वच्छ ठेवू या. सरहद्दीवरील सैनिकांना दोन प्रेमाचे शब्द पाठवूया
नववा दिवस- ” पूर्णाहुतीचा” दिवस. सर्व वाईट चालीरीती, रुढी आणि दुष्ट विचारांची आहुती देऊ या. सकारात्मक विचारांच्या पुरणाच्या दिव्यात माणुसकीच्या ज्योती लावून त्याआदीशक्तीची आरती करु या. आपुलकीचा, एकात्मतेचा गोड प्रसाद वाटू या.
दहावा दिवस – सीमोल्लंघनाचा दिवस. आप़ण केलेल्या निर्धाराप्रमाणे, आपले मन नकारात्मक विचारांचा उंबरठा ओलांडून पुढे गेले आहे का हे बघा. मन मोकळं करा, लिहा बोला पण व्यक्त व्हा. कारण विचार आणि कृती बदलणे हेच खरे सीमोल्लंघन होय .मग आनंदाचा सोनेरी दसरा आपल्या आयुष्यात कायम असेल आणि प्रसन्न झालेल्या आदिशक्तीचा कृपाशिर्वाद ही पाठीशी असेल.
—-ही सगळं करताना त्या त्या दिवसाच्या रंगाचे कपडे परिधान करू नका असे नाही. पण नुसता कपड्याचा रंग बदलण्यापेक्षा आपले मळकट झालेले विचार बदलूया.
☆ देणाऱ्याची भूमिका कशी असावी? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
आमच्या जी. एस्. मेडिकल कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापटांच्या एकत्रित काव्यवाचनाचा कार्यक्रम ठेवला होता. शनिवार दुपार होती ती. कार्यक्रम रंगला. संपला. मी या मंडळाचा त्या वर्षाचा कार्यवाह. मानधनाची पाकिटे तिन्ही कविवर्यांना दिली.
विंदा म्हणाले, “तुमचे हाडाचे हॉस्पिटल कुठे आहे?”
“टाटाच्या समोर… जवळच आहे…. पाहायला जायचं आहे का कुणाला? …” मी म्हणालो.
विंदांचा वाटाड्या होऊन आम्ही ऑर्थोपेडीक सेंटरमध्ये गेलो. काही रुग्णांचा मुक्काम तिथे अनेक महिने असायचा. विशेषतः फ्रॅक्चरचे रुग्ण. घरात संडासापासूनच्या सोयीची कमतरता. त्यामुळे हॉस्पिटलात सक्तीचा निवास. नवीन पेशंट्सचा दट्ट्या असायचा. मग वॉर्डातले काही पेशंट्स पॅसेजमध्ये यायचे. पॅसेजमधून वॉर्डाबाहेरच्या मोकळ्या जागेत.
विंदाना ज्या बाईंना भेटायचं होतं त्या अशाच एका पॅसेजमध्ये होत्या. शाहीर अमर शेखांच्या पत्नी. आम्ही त्यांना “शोधून” काढलं. विंदांनी त्यांची चौकशी केली. खिशातून पाकीट काढलं. आमच्या मंडळाने दिलेल्या मानधनाच्या पाकिटात त्यांनी जिना चढतानाच थोडे पैसे (स्वतःजवळचे) भरले होते. ते पाकिट त्यांनी बाईंच्या हातात दिलं.
“औषधासाठी होतील म्हणून शिरूभाऊंनी दिले आहेत. मी आज इथे कार्यक्रमाला येणार होतो. म्हटलं नेऊन देतो.”
थोड्या वेळाने आम्ही बाहेर पडलो. मीही विंदांबरोबर बसस्टॉपवर आलो. विचारू की नको अशा मनातल्या गोंधळावर मात करत मी प्रश्न विचारला. तोही घाबरतच.
“तुम्ही त्यांना मदत केलीत, पण शिरूभाऊंचे नाव का सांगितलंत?…”
शिरूभाऊ म्हणजे बहुधा त्यांचे मित्र श्री. ना. पेंडसे असावेत.
विंदांनी त्यांच्या खास नजरेने माझ्याकडे आरपार बघितलं.
“असं बघा… घेणाऱ्याचं मन आधीच बोजाखाली असतं की आपल्याला कुणाकडून तरी मदत घ्यावी लागतेय… अशावेळी याचक होतं मन. देणाऱ्याकडून समोरासमोर घेताना त्रास वाढतो. कमी नाही होत… अशावेळी आपण निरोप्या झालो तर समोरच्याचा त्रास वाढत तरी नाही… शेवटी महत्त्वाचं काय… त्या व्यक्तीला मदत मिळणं… कुणी केली हे नाही….”
माझी विंदांशी काही ओळख नाही. ही आमची शेवटची भेट. पण माझ्या मनात त्या वेळी लागलेले हजारो वॅटचे लाईट अजून विझलेले नाहीत.
देणाऱ्याने देताना, घेणाऱ्याच्या भूमिकेत स्वतःला नेणे …. ते सारे क्लेष क्षणभर अनुभवणे ….. पुन्हा देण्याच्या भूमिकेत येणे … आणि “इदं न मम” असं म्हणत यज्ञवृत्तीने दान करणे.
मी empathy ची व्याख्या मानसशास्त्राच्या पुस्तकातून शिकण्याआधी कवीकडून शिकलो याचा मला अभिमान आहे…
डॉ. आनंद नाडकर्णी
(विषादयोग)
संग्राहक : सुहास पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
तू नऊ दिवस नऊ रंग परिधान केलेस किंवा नाही केलेस तरी, हे कबूल आहे की, तू आहेस म्हणून रंगहीन आयुष्य रंगीत होतं!
केवळ शास्त्रात सांगितलंय म्हणून नाही, तर त्यानिमित्ताने वर्षभर कपाटात पडून राहणाऱ्या जरीच्या साड्या बाहेर पडून तुला उत्साहाने नेसायला मिळतात हे सत्य नाकारू शकत नाही!
दांडिया खेळलीस किंवा नाही खेळलीस, तरी आपण हे नाकारू शकत नाही की घरातील सर्वांच्या आयुष्याचा खेळ केवळ तू आयुष्यात असण्याने सुखकर होतो!
तू नऊ दिवस उपवास कर किंवा उठता बसता उपवास कर, तरी सर्वांना हे माहिती आहे की घरातल्यांची उपासमार होऊ नये म्हणून तू आयुष्यभर तुझ्या जीवाचं रान करतेस!
तू घट बसव किंवा तुझ्या देवीला फुलांनी सजव, पण पुरुषांच आयुष्य मात्र तूच सजवलं आहेस!
तू दिवा लाव किंवा पणती लाव, पण या विश्वाच्या निर्मितीपासून तुझ्यामुळेच पुरुषांच्या आयुष्यात प्रकाश आहे!
थोडक्यात काय तर…
तूच धरती आहेस…
तूच आकाश आहेस…
तूच सुरुवात आहेस…
आणि शेवटही तूच आहेस!
तुझ्याच कुशीत जन्माला येऊन तुझ्याच कुशीत विसावून निर्धास्तपणे आयुष्य जगणाऱ्या समस्त पुरुषांनी तुझ्यातील स्त्रीत्वाला सलाम करायला हवा!
प्रत्येक स्त्री मधील नारी शक्तीला मानाचा मुजरा!!
संग्रहिका – सौ.अंजली दिलिप गोखले
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ मैत्री मैत्रीच असते ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी☆
एकदा एका माकडाला ?अति दु:खामुळे मरण्याची इच्छा झाल्यावर; त्यानं झोपलेल्या सिंहाचे ? कान ओढले.
सिंह उठला आणि रागानं गर्जना केली की, “ हे धाडस कोणी केलं ?
स्वतःच्या मृत्यूला स्वत:हून कुणी बोलावलं ? “
माकड : “ मी कान ओढले. महाराज, सध्या मला कोणी मित्रच नसल्यामुळे मी खूप उदास आहे?; आणि मला मरण पाहिजे आहे, तुम्ही मला खाऊन टाका.”
सिंहानं हसून विचारलं ?: “ माझे कान ओढतांना, तुला कोणी पाहिलं तर नाही ना ?” ?
माकड : “ नाही महाराज.”
सिंह : “ मग ठीक आहे. आता असं कर. आणखी पाच-दहा वेळा माझे कान खेच, खूपच छान वाटतंय रे !”
या कथेचे सार :— एकटा राहून जंगलाचा राजाही कंटाळतो.
यावरून स्पष्ट होतं की मैत्री ही हवीच. म्हणून आपण आपल्या मित्रांच्या सतत संपर्कात रहा, ? त्यांचे कान ओढत रहा, म्हणजे चेष्टा मस्करी करत रहा. ? मेसेज येणे भाग्याचे समजा, कोणीतरी आपली आठवण काढतंय. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, देवाण घेवाण करा. आनंद देण्यात घेण्यात असतो. कंटाळवाणे होऊ नका. वयाला विसरा, मजा करत रहा. संसार प्रपंच तर सगळ्यांनाच आहे.
विश्वास ठेवा की, तुमचं मन जर नेहमी आनंदी असेल तरच आपण नेहमी निरोगी राहू.
मैत्री – श्रीमंत किंवा गरीब नसते, मैत्री शिकलेली वा अडाणी कशीही असो – मैत्री मैत्रीच असते.
सहज वाटले मन मोकळं करावं ☺️.
संग्राहक : सुहास सोहोनी
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈