☆ ‘गंभीर मनोवृत्तीने विचार करता…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी असलेल्या शाळेत आयोजित केलेल्या एका समारंभात, एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी एक भावनिक भाषण दिलं — जे ऐकणाऱ्यांच्या मनात कायमचं कोरलं गेलं.
शाळेचं व तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केल्यानंतर त्या वडिलांनी विचार मांडला :
“जेव्हा निसर्गाच्या प्रवाहात बाहेरून कोणतीही ढवळाढवळ होत नाही, तेव्हा निसर्गाची व्यवस्था पूर्णत्वाकडे झुकते.
पण माझा मुलगा, हर्बर्ट, इतर मुलांप्रमाणे शिकू शकत नाही. त्याला गोष्टी समजत नाहीत. मग त्याच्या बाबतीत निसर्गाची व्यवस्था कुठे आहे? “
प्रश्न ऐकून सगळं सभागृह सुन्न झालं. वडील पुढे बोलू लागले:
“माझा विश्वास आहे की, हर्बर्टसारखं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अक्षम मूल जेव्हा या जगात येतं, तेव्हा आपल्याला मानवतेचं खरं रूप पाहण्याची संधी मिळते — कारण अशा मुलाला इतर लोक कसे वागवतात, त्यातून ती मानवता प्रकट होते. “
त्यांनी एक प्रसंग सांगितला.
एकदा ते आणि हर्बर्ट एका उद्यानाजवळून चालत असताना, काही मुलं बेसबॉल खेळत होती.
हर्बर्टने वडिलांना विचारलं :
“बाबा, तुम्हाला काय वाटतं? ते मला खेळायला देतील का? “
वडिलांना माहीत होतं की, बहुतेक मुलांना हर्बर्टसारखा मुलगा आपल्या संघात नको असतो. पण त्यांना हेही जाणवले की, हर्बर्टला थोडा वेळ खेळायला दिलं तर त्याला सामावून घेतल्याची भावना आणि स्वीकृतीचा आत्मविश्वास मिळेल.
वडील मुलांपैकी एकाकडे गेले आणि विचारलं,
“हर्बर्टला थोडं खेळता येईल का? “
त्या मुलाने इकडं तिकडं पाहिलं आणि म्हणाला, “आम्ही सहा धावांनी मागे आहोत, आणि आठव्या इनिंगमध्ये खेळ चालू आहे. ठीक आहे, त्याला आमच्या संघात घ्या. नवव्या इनिंगमध्ये त्याला फलंदाज म्हणून ठेवू. “
हर्बर्ट हळूहळू स्मितहास्य करत बेंचकडे गेला, संघाचा जर्सी चढवला. त्याच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
हर्बर्टच्या चेहऱ्यावरचं आनंदाचं प्रतिबिंब बाकीच्या मुलांनीही पाहिलं — आणि त्याच्या वडिलांच्या डोळ्यातला अभिमानसुद्धा.
नवव्या इनिंगची सुरुवात झाली. हर्बर्टने हातमोजा घालून उजव्या फील्डमध्ये उभं राहत खेळायला सुरुवात केली. त्याच्याकडे कुठलाही बॉल आला नाही, तरी तो फक्त खेळात असल्यानेच इतका आनंदी होता की चेहऱ्यावर हसू ओसंडून वाहत होतं, आणि वडील प्रेक्षकांतून जल्लोष करत होते.
नवव्या इनिंगमध्ये संघाने काही धावा केल्या. आता, दोन बॅट्समन बाद, तिन्ही बेस भरलेले — आणि हर्बर्ट फलंदाजीसाठी तयार होता.
हा निर्णय — हर्बर्टला फलंदाजीची संधी देणं — जिंकायची संधी गमावणं होतं. तरीही त्याला ती संधी दिली गेली.
सर्वांना माहीत होतं की, हर्बर्टला बॅट नीट पकडता येत नाही, तर बॉल मारणं तर दूरची गोष्ट होती.
पण बॉलरला लक्षात आलं — समोरचा संघ हर्बर्टला आनंद देण्यासाठी जिंकण्याची संधी सोडत आहे.
त्याने बॉल अगदी हळू फेकला — जसा हर्बर्टला मारता येईल असा.
पहिल्या प्रयत्नात हर्बर्टने मारण्याचा प्रयत्न केला, पण चुकला.
दुसऱ्यांदा, त्याने बॉल मारला — अगदी सौम्यपणे — आणि बॉल पिचरच्या पुढ्यात थांबला.
पिचर सहज बॉल पकडून पहिल्या बेसवर फेकून हर्बर्टला आऊट करू शकत होता. पण त्याने बॉल मुद्दामहून पहिल्या बेसमनच्या डोक्यावरून उंच फेकून दिला.
सर्व प्रेक्षक ओरडू लागले:
“हर्बर्ट, पहिल्या बेसकडे धाव घे, धाव घे! “
हर्बर्ट धावत गेला — ते अंतर त्याने कधीच गाठलं नव्हतं.
“दुसऱ्या बेसकडे धाव घे! “
परत एका खेळाडूने — तो सर्वात लहान मुलगा होता— बॉल पकडला आणि जाणलं की तो ‘हिरो’ बनू शकतो. पण त्यालाही जाणवलं की हर्बर्टसाठी मोठं काहीतरी घडतंय. त्याने बॉल तिसऱ्या बेसमनच्या डोक्यावरून फेकला.
हर्बर्ट धावत जाऊन होमप्लेटवर पोहोचला — हात वर करून उभा राहिला — विजयी हसत. त्याचे वडील त्याचं कौतुक करत उभे होते.
आणि तेव्हा दोन्ही संघांच्या खेळाडूंनी त्याला मिठी मारली — जणू त्यानेच ‘ग्रँड स्लॅम’ मारून सामना जिंकवला!
वडील डोळ्यातून अश्रू ढाळत म्हणाले—
“त्या दिवशी या मुलांनी मिळून खऱ्या प्रेमाचं आणि मानवतेचं एक अद्वितीय उदाहरण जगापुढे ठेवलं. “
हर्बर्ट पुढचा उन्हाळा पाहू शकला नाही. त्या हिवाळ्यातच तो गेला. पण त्याच्या मनात मात्र एकच गोष्ट कायम राहिली — तो एकदा ‘हिरो’ झाला होता.
आईने त्याला आनंदाश्रूंत मिठी मारली होती — आणि त्याच्या वडिलांचा हसतमुख चेहरा हे त्याला आयुष्यभर पुरेसं होतं.
—
एक छोटंसं शेवटचं सांगणं:
आपण दररोज शेकडो विनोदी मेसेज एकमेकांना पाठवतो. पण जेव्हा आयुष्याचं खरं सौंदर्य सांगणारे, प्रेम आणि माणुसकी शिकवणारे संदेश येतात — ते पुढे पाठवताना आपण थोडं थबकतो.
तुम्ही जर हा मेसेज कोणाला पाठवायचा का, याचा विचार करत असाल — तर ज्या व्यक्तीने तुम्हाला तो पाठवला, त्याला विश्वास आहे की आपल्यामध्ये बदल घडवण्याची ताकद आहे. म्हणून तुमच्या संपर्कात असलेली प्रत्येक व्यक्ती हे ऐकण्याच्या योग्यतेची आहे.
कोणीतरी एक शहाणा माणूस म्हणाला होता:
“प्रत्येक समाजाची खरी कसोटी ही तिथल्या सर्वांत दुर्बल घटकांशी तो कसा वागतो यावरून होते. “
लेखक: अज्ञात
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “बासरी” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
बासरी तयार करण्यासाठी लागणारा बांबू हा तिथी पाहून तोडतात.
पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथींना बांबू तोडला तर त्याला हमखास कीड लागते, असं बासरी तयार करणारे सांगतात.
त्याचं कारण म्हणजे या तिथींमध्ये शेवटी ‘मी’ येतो. याच ‘ मीपणाच्या ‘ अहंकारातून कार्यनाश होतो आणि बासरी टिकत नाही, असा समज आहे.
कृष्णाचं आवडतं वाद्य बासरी. एकदा कृष्णाच्या सगळ्या सख्या, म्हणजे समस्त गोपी बासरीवर चिडल्या आणि म्हणाल्या, ‘आम्ही त्या कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आजूबाजूला वावरतो, पण तो आम्हाला साधा भावही देत नाही. तू तर एवढी साधी; ना रूप ना काही. पण तो तुला सतत ओठांशी धरून असतो. तू अशी काय जादू केली आहेस त्याच्यावर? ‘
बासरी हसली आणि म्हणाली, ‘तुम्ही माझ्यासारख्या व्हा, मग कृष्ण तुम्हालाही जवळ घेईल. ‘
अर्थ न कळून गोपींनी बासरीकडे पाहिलं… बासरी पुढे म्हणाली, ‘मी अगदी सरळ आहे; ना एखादी गाठ… ना एखादं वळण… मी पोकळ आहे. त्या पोकळीतूनच माझ्यातला अहंकार गळून पडलाय.
माझ्या अंगावरच्या सहा छिद्रांतून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे रिपू मी काढून टाकले आहेत.
मला स्वत:चा आवाजही नाही. माझ्या सख्यानं फुंकर मारली, तरच मी बोलते.
तो जशी फुंकर मारतो, तशी मी बोलते. ‘ यावर गोपी निरुत्तर झाल्या.
अहंकाररहित शरीर (जीवन)…
हीच श्रीकृष्णाची बासरी होय!
ज्याने आपल्या जीवनातून अहंकार घालवला, ‘मी’पणाला आपल्यापासून दूर केलं, त्याचंच जीवन हे शांतीपूर्ण, सुखमय, आनंदमय व त्यागमय झालंय आहे. आणि तोच मनुष्य अध्यात्माच्या मार्गावर आरूढ झाल्याशिवाय राहत नाही. तो एकनिष्ट श्रीकृष्णभक्ती मध्ये तल्लीन होऊन, नश्वर सुखाचा त्याग करून, खऱ्या सुखाचा, आनंदाचा अनुभव करतो…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपल्या आयुष्यात सजीव भेटतातच. तशाच काही निर्जीव गोष्टीही अवचित, अचानक भेटतात. पण निर्जीव तरी कशा म्हणू? कारण अशा वस्तू कधी सुखावतात, अल्लद मोरपीस फिरवतात. काही रडवतात. काही तर आपल्या आठवणींचा अगदी आतला, आतला कप्पा उघडून देतात. पुनःप्रत्ययाचा आनंद देतात.
अशा अचानक, अवचित गाठ पडलेल्या अलक कथा…
अण्णासाहेब सकाळचे फिरून आले. सूनबाई एप्रिलच्या कडकडीत उन्हात आमची परंपरागत सोन्याची जर असलेली पैठणी दांडीवर ऊन दाखवायला घालत होती.
अण्णासाहेब तिकडून जात असताना दांडीवरच्या पैठणीने त्यांच्या अंगाशी लडिवाळपणे घसट केली. “आलात फिरून, दमला असाल, ” पाठोपाठ बोलण्याचा भास.. गर्रकन अण्णासाहेब 65 वर्ष मागे गेले.. अंगापेक्षा बोंगा मोठा असूनही पैठणी सावरत असलेली कावेरी आठवली. क्षणभर त्या पैठणीला हळूवार कुरवाळत म्हणाले “आज अचानक गाठ पडे. “
सूनबाईच्या नजरेतून सासऱ्यांच्या डोळ्यांत आलेले पाणी सुटले नाही. तिचेही डोळे पाणावले.
2. दिवाळीची साफसफाई चालू होती. माळ्यावरचे सामान खाली आले होते. नको असेल ते सामान काढून टाकायचे, असे ऑडिट चालू होते. एवढ्यात चांदीची मूठ असलेली सामानातली काठी उचलून चार वर्षांचा नातू घोडा घोडा खेळायला लागला. शांताक्का ती काठी पाहून खूप मागे जाऊन पोचल्या. नातवाचे खेळून झाल्यावर ती काठी हातात धरून शांताक्का कितीतरी वेळ नुसत्याच बसून होत्या. कुठूनसा आवाज येत होता, “वापर तू आता, फिरायला जाताना असू दे आधाराला. “
काठीचे निमित्त.. पण एवढ्या वर्षांनी “आज अचानक गाठ पडे” असे वाटून मन भूतकाळात फिरून आले.
आई खूप आजारी होती. शेवटचेच आजारपण. भेटायला गेले तेव्हा मला क्षीण आवाजात म्हणाली, “ताई, तुला काय देऊ ग? हातातल्या दोनच बांगडयांपैकी एक तू घेऊन जा,” असे म्हणून काढत होती.
“आई ग, बांगडी नको ग.. तुझी आठवण म्हणून तुझी एक मऊसूत नऊवारी साडी घेऊन जाते.. त्याची छानशी गोधडी शिवून रोज पांघरूण म्हणून वापरेन. तेवढीच तू कायम माझ्या अगदी जवळ असशील ना ग.”
आई गेली, पण होती माझ्या अगदी जवळच. गोधडी थोडी जीर्ण झाली तरी मी वापरत होते. एकदा लेकाने नवीन छान पांघरूण आणले आणि म्हणाला “आता हे वापर आई. ” त्याचे मन मला मोडवले नाही. पण अंथरुणाच्या तळाशी मी गोधडी ठेवून दिली होती. माझ्या आईची आठवण.
नातसुनेला मुलगा झाला. यांच्या माॅडर्न जमान्यात दुपटी शिवायला छान मऊसे काही सापडेनाच. मग मीच माझ्या आईच्या गोधडीची चार दुपटी शिवली..
आत्ता तो गुलाम तिच्यावरच पहुडला आहे.. जणू काही त्याची खापरपणजी त्याला अंगाई म्हणत जोजावत आहे..
मनोमन मी आणि आई बाळाजवळ बसलो होतो.. “आज अचानक गाठ पडे”.
4. मी सोळाच वर्षांची होते.
नुकतीच अकरावीची परीक्षा झाली होती आणि तेव्हाची फॅशन म्हणून आम्ही सगळ्या मैत्रीणींनी मिळून उंच टाचाच्या चपला खरेदी केल्या होत्या.. टाॅक टाॅक करत रुबाबात चालायचे स्वप्नरंजन होते तेव्हाचे.. दोनच महिन्यांत माझे लग्न ठरले(तेव्हाचा काळ). आम्ही दोघे उंचीने जवळपास सारखेच होतो. झाले! टाॅक टाॅक चालायचे स्वप्न पूर्ण झालेच नाही. उंच टाचांच्या चपला बासनात गुंडाळून ठेवल्या. परवाच नातीला त्या सापडल्या..
म्हणाली, “आज्जी तू का नाही वापरल्यास ग? आता घालत जा.”
दोन्ही पायांची कनी Replacement झाली होती. आणि आत्ता त्या टाॅक टाॅक अवचित समोर आल्या. “आज अचानक गाठ पडे”.
5. मोबाईल ची लांब रिंग वाजली. बंगलोरहून मावसभाऊ बोलत होता. लग्न होते त्याच्या लेकाचे. त्यासाठी त्याला आमच्या आईच्या पिढीतील एका नातेवाईकांचा पत्ता हवा होता. खूप जुने असल्यामुळे मोबाईल मध्ये त्यांचा काँटॅक्ट मिळणे अशक्यच होते. म्हणूनच त्याने मला फोन केला होता.. माझ्याजवळ माझ्या आईची डायरी होती. आणि मोबाईलच्या जमान्यातही मी ती वेळोवेळी अपडेट करत होते.
त्याला हवा होता तो पत्ता मी दिला आणि सहज म्हणून डायरी चाळत होते.
तेव्हा त्या डायरीतून टुपकन दोन जुनी पोस्टकार्डं माझ्या मांडीवर पडली.. माझ्या नमू आणि कुसुम मावशांनी लिहिलेली पत्र होती ती.. काय नव्हते त्या पत्रांमधे? अगदी वरच्या टोकापासून ते थेट पत्त्याच्या लाईनपर्यंत गिचमीड करून मजकूर ठासून भरलेला होता.. ती नुसती गिचमीड नव्हती. तर त्यात ओतप्रोत माया, प्रेम, काळजी भरून वाहात होती.. ओसंडत होती.
आजच्या मोबाईलच्या जमान्यातील इमोजी, खोटे खोटे वरपांगी मेसेजेस, वाढदिवसानिमित्त आणि मेल्या-गेल्यां बद्दल खोटी सहानुभूती.. या पत्रांच्या पार्श्वभूमीवर सगळेच कसे उघडे बोडके पडले होते..
जुना पत्ता शोधता शोधता मला माझ्या जिवाभावाच्या, माझ्यावर निखळ, निस्वार्थी प्रेम आणि माया करणाऱ्या मावशा भेटल्या.. कित्ती तरी वेळ आम्ही बोलत होतो.. “आज अचानक गाठ पडे.. आज अचानक गाठ पडे.”
लेखिका : श्रीमती प्राची पेंडसे
प्रस्तुती : श्रीमती राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘अंतिम सत्य : म्हाताऱ्यांसाठी…’ – लेखक :डॉ. शिरीष राजे ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै☆
☆
१) पुरुष म्हातारा होतो, स्त्रिया वयस्कर होतात.
२) पुरुषाने त्याच्या मुलामुलींची लग्ने पार पाडल्यानंतर, कुटुंबातील इतर सदस्यांच्या आर्थिक स्थैर्याची काळजी घेतल्यानंतर, त्याचे कुटुंबातील जेष्ठ आणि श्रेष्ठ स्थान संपुष्टात येते.
३) नंतर त्याला कुटुंबावर एक ओझे म्हणूनच वागवले जाते. एक विक्षिप्त, कटकट्या, अप्रत्याशित म्हातारा म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते.
४) त्याने पूर्वी मुलांच्या व पत्नीच्या संदर्भाने घेतलेल्या कठोर निर्णयाची चिरफाड या काळात करीत त्याला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी दोषीच ठरवले जाते. त्याने जर खरोखर चुका केल्या असतील तर देवच त्याचे रक्षण करो.
५) वयस्कर स्त्रीकडे मात्र मुलांकडून व सुनांकडून सहानुभूतीने पाहीले जाते, कारण तिच्याकडून करुन घेण्यासारख्या गोष्टी अजूनही असतात.
६) वयस्कर स्त्री योग्य वेळी म्हाताऱ्याची पार्टी सोडून मुलांच्या व सुनांच्या पार्टीत निघून जाते.
७) म्हातारा वयाने जास्त असल्यास, त्याच्यानंतर मुलगा आपल्यापासून दूर जाऊ नये, आपली काळजी घ्यावी म्हणून वयस्कर स्त्री सुनेशी जमवून घेते.
८) पुर्वायुष्यामधे कितीही कर्तृत्व गाजवलेले असो, त्याची पुण्याई म्हातार्याच्या कामी येत नाही.
९) वयस्कर स्त्री मात्र पुर्वपुण्याईचे व्याज खाऊ शकते.
१०) ज्यांची वंशपरंपरा असलेली भरपूर शेती आहे (की ज्याचा मुलाबाळांना मोह पडू शकतो) त्यांची अवस्था थोडी बरी असते. ज्यांनी आपल्या पश्चात मुलांच्यात भांडणे नकोत म्हणून खातेफोड केलेली असेल तर त्यांच्याही नशिबी वर सांगितल्याप्रमाणेच हाल असतात. शक्यतो खातेफोड करुच नये.
११) कोणत्याही हॉस्पिटलमधे जाऊन बघा. म्हातारा ॲडमिट आहे की म्हातारी हे नातेवाईकांच्या पाणावलेल्या डोळ्यांवरून लगेच कळते. म्हातारा ॲडमिट असेल तर मुलगी सोडून कोणाच्याही डोळ्यात पाणी नसते.
१२) तात्पर्य : वय झाल्यावर पुरुषाने स्वतःसाठी इतरांकडून अपेक्षा न करता जगण्याचे कौशल्य शिकावे. पुरुषच जन्मभर विद्यार्थी असतो हे लक्षात ठेवावे. या जगात कोणीच कोणाचे नसते हे लक्षात घेऊन सर्वांतून अलिप्त राहून स्वावलंबी, स्वाभिमानी जीवन जगावे.
१३) माझा सल्ला, इतरांसाठी जगलेले आठवू नका, उगाळू तर अजिबात नका.
१४) पुराणातसुद्धा कोणत्या स्त्रीने वानप्रस्थाश्रम, संन्यास स्विकारल्याचा दाखला नाही.
१५) संन्यास व वानप्रस्थाश्रम हे पुरुषांसाठीच स्मृतींनी सांगितले आहेत. याचे महत्त्व लक्षात घ्या. आपले पूर्वज दूरदृष्टीचे होते याची खात्री पटेल.
☆
लेखक: डॉ. शिरीष राजे, मानस शास्त्रज्ञ.
प्रस्तुती: श्री. ब्रह्मानंद पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ हक्काचं ठिकाण… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
☆
“एक दोन तरी असायलाच हवीत हक्काची ठिकाणं.
“अरे तुझा चेहरा आज असा का दिसतोय? “
” काही नाही रे… “
” नाही कसं? काय झालंय? बोल ना.. “
आणि मग मनात साचलेलं सगळं मळभ त्याच्याजवळ रिकामं होतं. एखादी गच्च कोंबून भरलेली बॅग रिकामी करावी तसं आणि मग जादूची कांडी फिरवल्यागत मन क्षणार्धात एकदम मोकळं होऊन जातं.
हेच.. हेच ते “हक्काचं_ठिकाण”.. My Happy Place!!
फक्त आठवून बघा अशी कोणती हक्काची ठिकाणं आपल्या जवळ आहेत? मनाला उभारी, खराखुरा विसावा देणारी.. एक एक आठवत चला. एकदम फ्रेश वाटेल! त्या व्यक्तीसोबतचे संवाद किंवा गमतीजमती एखाद्या सिनेमासारख्या तुमच्या डोळ्यांपुढून तरळून जातील. कुठल्या एखाद्या मैत्रिणीसोबत मन हलकं फुलकं होतं तर एखाद्या मित्रासोबत खळखळून हसलं जातं, भावासोबत बालपणीच्या आठवणी, चिडवाचिडवी.. तर एखाद्या नातेवाईकांसोबत साहित्यिक चर्चा… sooo coool असं feeling देणारी ही ठिकाणं!
अशी मोजकीच पण हक्काची ठिकाणं प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असतात. आई वडील तर खास हक्काचेच. त्याशिवाय मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण,
भावजय, दीर, नणंद, cousins, नातेवाईक.. कुणीही असू शकतं तुमचं हक्काचं ठिकाण, Your true Happy Place!
जिथे आपुलकी, जिव्हाळा तर असतोच, पण सोबत असते संजीवनी.. मनाला जिवंत करणारी! किंवा अगदी एखादा व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा.. जिथे नुसतं डोकावलं, नुसता एक virtual फेरफटका मारला तरी मन एकदम relax होतं!
निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर एकदम फ्रेश वाटतं तसंच आपल्या या हक्काच्या ठिकाणी.. त्यांच्या सहवासात एकदम relax, fresh वाटतं. मन हलकं हलकं होऊन जातं. अगदी मोरपिसासारखं! तिथे कुठलाच आडपडदा नसतो किंवा show-off ही नसतो. अगदी मनातलं हृदयातलं सहज बोलता येतं, व्यक्त होता येतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या अशा हक्काच्या ठिकाणी तुम्हाला समजून तर घेतलं जातंच, पण महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्यांच्याकडून Judge केलं जात नाही. आणि म्हणूनच अशा व्यक्तींच्या सहवासात तुम्हाला अगदी निवांत, मन मोकळं वाटतं.
“तुमको देखा, तो ये खयाल आया
जिंदगी धूप, तुम घना साया! “
ही हक्काची ठिकाणंही अगदी अशीच.. सावली देणारी, विश्रांती देणारी.. थकल्याभागल्या जिवाला आणि मनाला! आणि गंमत म्हणजे अशी माणसं आरशासारखी असतात. गुण आणि दोष दोन्ही दाखवणारी. म्हणून जास्त विश्वास!
अशी हक्काची ठिकाणं अगदी जिवापाड जपूssssन ठेवायला हवीत.. हिऱ्या माणकां पेक्षा जास्त! ती हरवायला नकोत, आयुष्याच्या गडबडीत. कारण यांची फक्त साथही लाख-मोलाची! Loneliness किंवा एकटेपणा दूर करणारी.. म्हणूनच “तुझ्याशी बोलून खूssssप बरं वाटतं, ” हे त्यांना नक्की सांगायालाच हवं.
कुणाचीही आत्महत्या कानावर आली की वाटून जातं, की मन मोकळं करायला त्यांच्या जवळ असं एकही हक्काचं ठिकाण नसेल, जिथे अगदी खरंखुरं व्यक्त होता येईल? कारण व्यक्त होणं ही प्रत्येकाचीच सर्वात मोठी गरज! त्याशिवाय मोकळा श्वास कसा घेता येणार?
आपण आपल्या आयुष्यातली सगळी हक्काची ठिकाणं तर जपावीच पण आपणही कुणाचं तरी हक्काचं ठिकाण नक्कीच असायला हवं! नाही का?
“खूsssssप बरं वाटलं ना वाचून? मग friends आणि सर्व हक्काच्या ठिकाणांना जरूर शेअर करा आणि सांगा ‘खूsssप बरं वाटतं तुझ्यासोबत’! “
लेखक : अज्ञात
प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “सेवानिवृत्ती…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
☆
नोकरीनंतर निरुपयोगी म्हणजेच ‘रिटायर्ड’ झाल्यानंतर सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर वेळ घालवणे ही एक भीषण समस्या बनली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लोकांनी विविध मार्ग आणि पद्धती शोधून काढल्या आहेत.
काही ‘कष्टाळू ब्रँड’चे लोक निवृत्ती नंतर लगेचच चित्रपटातील ‘रामू काकां’च्या भूमिकेत येतात आणि सकाळी लवकर उठून खांद्यावर टॉवेल टाकून घराची साफसफाई आणि स्वयंपाकघर साफ करायला लागतात.
उरलेल्या दिवसात ते त्यांच्या बायकोसाठी ‘वाहन चालक’ म्हणून सेवा देतात आणि बाजारात खरेदी किंवा चित्रपट वगैरे दाखवतात. अशा लोकांच्या पत्नींनी पूर्वजन्मात काही चांगले कर्म केले असावे, ज्याचे फळ म्हणून त्यांना ही सुखासीन परिस्थिती प्राप्त झाली आहे.
असेही काही लोक आहेत जे निवृत्तीनंतर अचानक अतिधार्मिक बनतात आणि ते यापूर्वी कधी मंदिरात डोकावलेही नसले तरीही सकाळ संध्याकाळ दोन दोन तास विविध मंदिरात पूजा आणि भजन कीर्तन करण्यात घालवतात. अशा लोकांना आपण नोकरीस असताना केलेल्या सर्व गैरकृत्यांच्या पापांतून आता निस्तरले जात असल्याची भावना होत आहे.
सेवानिवृत्तांचा असा आणखी एक वर्ग आहे, ज्यांच्यामध्ये निवृत्तीनंतर अचानक वाल्मिकी आणि तुळशीदासांचे आत्मे प्रवेश करतात आणि ते रातोरात ‘कवी’ च्या भुमिकेत येतात. हे लोक सोशल मीडियावर असे विचार लिहितात की त्यांचे मित्र या काव्य-प्रदूषणाने त्रस्त राहतात पण नाइलाजाने ‘व्वा व्वा’ म्हणणं भाग पडतं.
अशी काही थोर माणसे सुद्धा बघायला मिळतात, ज्यांच्यात ‘राजकारणाचा किडा’ नेहमी धुमाकूळ घालत राहतो आणि नोकरीच्या कार्यकाळात ‘आपण जनतेत खूप लोकप्रिय होतो, ‘ असा त्यांना भ्रम निर्माण होतो आणि निवृत्त होताच ते एखाद्या राजकीय पक्षाशी किंवा नेत्याशी हातमिळवणी करतात व एखाद्या गटात सामील होऊन निवडणूक लढवतात आणि निवडणुकीत आपटले की ते खूप संतापतात, पण त्यांना हे क्वचितच माहीत असते की नोकरीत असताना त्यांची होणारी विचारपूस किंवा त्यांना ‘मिळणारा मान, होणारा आदर’ हा त्यांच्या आसनस्थ पदामुळे त्यांच्या लाळघोटेपणा करणाऱ्या चमच्यांनी पसरवलेला खोटा आभास होता. मग ते अनेकदा पक्षाच्या कार्यालयाबाहेर लाह्या किंवा चणे खात असताना दिसतात.
निवृत्त वृद्धांचा एक मोठा वर्ग असा देखील आहे जे कुटुंबात कदाचित ‘नकोशे झालेले’ आहेत आणि म्हणूनच त्यांना घराबाहेर पडण्याचा एक अनोखा मार्ग सापडतो. सकाळी दहा वाजता ते स्वत:ची व कुटुंबातील सर्वांची बँकेची पासबुके जमा करतात आणि कुठल्यातरी बँकेत प्रवेश करून त्या पासबुकांच्या नोंदी काढण्यात आणि बँकेच्या वातानुकूलित वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी दिवसाचे एक दीड वाजवतात. हे लोक बँकेच्या ग्राहकांपेक्षा जास्त तेथील कर्मचारी असल्यासारखे दिसतात आणि बँक कर्मचाऱ्यांचे जगणे ते कठीण करुन सोडतात.
वरील सर्व श्रेण्यांव्यतिरिक्त, मोठ्या संख्येने सेवानिवृत्त लोकांची आवडती ठिकाणे म्हणजे शेजारची उद्याने, जिथे ते सकाळ-संध्याकाळ फिरण्याच्या बहाण्याने जमतात आणि त्यांच्यापैकी कोणीही नोकरीत असताना आपापल्या क्षेत्रात कधीही सकारात्मक काम केले नाही, हे साफ विसरून सरकारला शिव्याशाप देण्याचे त्यांचे आवडते कार्य करत राहतात व दीर्घकाळ हळहळ व्यक्त करत असतात.
आमच्या अनेक सेवानिवृत्त बांधवांना हे सर्व अजिबात आवडत नाही आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ घरातच राहायला आवडते. अशा लोकांसाठी त्यांच्या सुना व मुलांनी वेळ घालवण्याचे चांगले साधन शोधून ठेवले आहे. आपल्या लहान मुलांना त्यांच्याकडे सोपवून सर्व काळजींपासून मुक्त होऊन ते ऑफिस, मार्केट आणि थिएटरमध्ये जातात आणि हे निवृत्त भाऊ लगेच ‘आजोबा’ च्या भूमिकेमध्ये येतात आणि आपल्या मुलांसाठी ते अत्यंत उपयुक्त आणि कामाचे व मौल्यवान असल्याचे सिद्ध करतात.
ज्यांची मुले-मुली कुठेतरी परदेशात आहेत, तिथे गेल्यावरही हे लोक महिनोनमहिने उत्तम ‘बाळ संगोपन’ सेवा दिल्याबद्दल कृतज्ञ होत आहेत.
यांतील असेही काही आहेत की निवृत्त झाल्यावरही ज्यांचे चेहरे मोहरे अजूनही तेजस्वी, ओजस्वी आणि समाधानाच्या ओघवत्या तेजाने चमकत आहेत. अशांच्याभोवती त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी ते सतत लोकांच्या गर्दीने वेढलेले आहेत. त्यांना आदराने, भेटवस्तू दिल्या जात आहेत.
काही सेवानिवृत्त लोक त्यांचे नोकरीत असतानाचे ‘कारनामे’ ऐकवण्यासाठी ‘श्रोते’ शोधत बागेत फिरतात, कारण बायको त्यांच्या या भाकडकथांना कंटाळालेली असते आणि मुलगा व सून मोबाईलमधून डोकंही वर काढत नाहीत.
काही सेवानिवृत्त लोक कार्यालयातील सवय झालेल्या फुकट चहाची तलफ भागवण्यासाठी जवळपासच्या चौकातील चहाची टपरी आणि जुन्या मित्रांच्या शोधात फिरत आहेत. घरात तर शुगर आणि वाढत्या वयाचे दाखले देत त्यांच्या चहा पिण्यावर बंधन घालण्यात आले आहे.
मला आशा आहे की आपण या वर्णनात स्वत: कुठे बसतो ते शोधत आहात.
मी स्वतः माझी जागा आणि काम निवडण्यासाठी प्रत्येक युक्तीचा अवलंब करत आहे. उंट कोणत्या बाजूवर बसणार हे बघू या..
तुम्हा सर्वांचे निवृत्ती नंतरचे जीवन सुखमय, आनंदी व स्वास्थ्यपूर्ण राहो
हीच सदिच्छा…
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर