मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फुटपाथ फ्रेंडली बाईक” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “फुटपाथ फ्रेंडली बाईक” ☆ श्री सुधीर करंदीकर

सध्या ट्रॅफिक जॅमचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच भेडसावत असतो. टू व्हीलर वाले / फोर व्हीलर वाले जॅममधून सुटका करून घेण्याकरता नवनवीन पर्याय शोधत असतात. आणि बरोबरच आहे – म्हणतातच ‘necessity is the mother of invention’. सिग्नल तोडणे, उलटीकडून जाणे, स्पीड लिमिट न पाळणे, लेन तोडणे, या पर्यायांची संध्या चांगलीच चलती आहे. सगळ्यांच्या समोर एकच ध्येय असतं – मी कसा पुढे जाईन? इतरांशी या “मी” ला काहीही देणे घेणे नसते.

मध्यंतरी एक पर्याय पुढे आला आणि तो म्हणजे, फुटपाथवरून टू व्हीलर नेणे. थोडासा जरी ट्रॅफिक अडला, की, लगेच बाईकवाले भराभर बाजूच्या फुटपाथवर गाड्या चढवतात आणि वाटेल तेव्हा पुन्हा रोडवर येतात. फुटपाथवर ‘keep left’ किंवा ‘speed limit’ ही बंधने नसतात, त्यामुळे सगळेच आबादी – आबाद असते.

शहरांमध्ये आता बहुतेक रस्त्यांवर छान फुटपाथ केलेले आहेत. पण त्यावर चालणाऱ्यांपेक्षा, इतर लोकांचेच राज्य असते. त्यामुळे चालणारे फुटपाथवरून मार्ग शोधत शोधत पुढे जात असतात. चालणाऱ्यांना रस्ता क्रॉस करणे अशक्य झाले आहे, रस्त्यावर चालणे अशक्य आहेच, आणि फुटपाथवर पण चालायला जागा नाही, म्हणून म्हणतात, रस्त्यावरचा सगळ्यात बिचारा प्राणी म्हणजे चालणारी मंडळी.

आणि आता बाईकवाले फुटपाथवर आल्यामुळे, पायी चालणाऱ्यांची बिचारेपणाची लेव्हल अजूनच खालावली आहे. बिचारी मंडळी नेहेमीच वर बघतात आणि देवाकडे मदतीची अपेक्षा करतात. आणि झालं असचं – चालणाऱ्यांची याचना वर पोहोचली – देख तेरे संतान की हालत क्या हो गयी भगवान, अब फुटपाथ पर चलना भी नसीब नही! देवाला अडचण समजली आणि सगळ्या फुटपाथवर दोन्ही बाजूला, अधे – मधे, स्टीलचे चकचकीत खांब बसले. चालणारे खुश झाले. खांबामधून गाडी घालता येत नाही, म्हणून टू व्हीलर वाले नाराज झाले आणि पुन्हा रस्त्यावर आले.

कॉम्प्युटर वर व्हायरस – अँटी व्हायरस जसे सुरूच असते, तसेच देवाकडे ऋषी- मुनी पण साकडे घालत असतात आणि दानव पण. आता टू व्हीलर वाल्यांनी वर बघून याचना केली – ‘देख तेरे संतान की हालत क्या हो गयी भगवान, अब फुटपाथपर बाईक चलाना भी नसीब नही’. वरच्याला सगळ्यांचीच काळजी असते, कारण सगळी त्याचीच लेकरे. देवांनी तथास्तु म्हटले आणि टू व्हीलरकरता पर्याय पुढे आला —

आम्ही मेन रोडनी मार्केट कडे चालत निघालो होतो. फुटपाथ वर खांबांमुळे टू व्हीलरची वर्दळ नव्हती, त्यामुळे बिन्धास चालत होतो. पुढच्या चौकात, डावीकडच्या रस्त्यावर बरीच गर्दी दिसली. काय आहे? हे, बघायला म्हणून आम्ही डावीकडे वळलो. थोडं पुढे छोटं ग्राउंड आहे. तिथे एका परदेशी कंपनीने तयार केलेल्या फूटपाथ – फ्रेंडली बाईकचा डेमो दाखवणार होते. नावावरून काहीच अर्थ बोध होत नव्हता. बघितल्याशिवाय उत्सुकता संपणार नव्हती. मी आणि काही पर्याय नसल्यामुळे बायको, गर्दीतून वाट काढत पुढे गेलो. कुणिही प्रेमात पडेल, अशी एक नवी कोरी दणकट बाईक समोरच दिमाखात उभी होती.

तिथले मार्केटिंग मॅनेजर (महेश) जाहिरातपर भाषण करत होते. टू व्हीलरवाल्यांकरता खुशखबर – खुशखबर. फुटपाथवर बाईक चालवा. एका भाग्यवान व्यक्तीला पहिली फ्री ट्रायल मिळणार! नंतर काही जणांना मिळणार, पेड ट्रायल. कोण आहे तो भाग्यवान? हीच वाक्ये पुन्हा पुन्हा ऐकवणे सुरु होते. प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर, ‘मीच तो भाग्यवान’ असे भाव दिसत होते. बायको म्हणाली, तुम्ही या भानगडीत पडू नका, तुम्हाला ती गाडी पेलवणार नाही. ‘कौन है वो भाग्यशाली’, ‘कौन है वो भाग्यशाली’, अशा गर्जना सुरु होत्या. मी गाडीकडे बघितलं आणि माझ्याकडे बघितलं. गाडीचे वजन माझ्या वजनाच्या तिप्पट तरी नक्कीच असणार. नेहेमी म्हणजे इतरवेळेला, मी कितीही भाग्यशाली असलो, तरी, आज, ‘तो मी नव्हेच’ हे पक्के होते.

“वो कौन है”… “वो कौन है”…., किसको ट्रायल दी जाय, असं म्हणत म्हणत, महेश चौफेर नजर टाकत होते. माझ्यावर त्याची नजर स्थिर झाली, आणि, “यही तो है वो” अशी जाणीव महेशला आतून झाली असावी. लगेचच त्यांनी हात माझ्याकडे करून, “सर, आप आगे आईये” अशी घोषणा केली. महेश नक्की कुणाला सर म्हणतोय हे समजण्याकरता मी आजूबाजूला बघायला लागलो. बाजूचा मुलगा म्हणाला, “काका यु आर लकी”, तुम्हालाच बोलावलं आहे. हे काम आपलं नव्हे, हे मला चांगलं समजतं होतं, पण आलेली संधी वाया का घालवायची! हा पण विचार मनात आला. द्विधा मनस्थिती असली, की, मी नेहेमी अंतर मनाचा सल्ला घेतो.

मी (मनात डोकावून) : काय करू?

आतून : जा बिन्धास, मी आहे.

मी : ती बाईक पेलणं मुश्किल आहे.

आतून : भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आज तर तुझ्या मागे बसणार आहे.

माझं आतल्या मनाशी बोलणं बायकोच्या लक्षात आलं असावं. तिनी मला बेस्ट लक दिलं आणि मी लगीच पुढे गेलो. महेशनी टाळ्या वाजवून माझं स्वागत केलं. सगळ्यांनीच जोरदार टाळ्या वाजवल्या.

ग्राउंडमध्ये फुटपाथसारखा लांबपर्यंत भाग आखून तयार केला होता. त्यावर, फुटपाथवर लावले आहेत, तसे स्टीलचे खांब लावलेले होते. महेशनी त्या फुटपाथवर बाईक आणली. मला डेमो समजावून सांगितला आणि बाईकवर बसायला सांगितले. गाडी स्टॅन्ड वरुन काढून, पलीकडे पाय टाकतांना, माझा थोडा तोल गेल्यासारखे जाणवले, पण तेवढ्यापुरतेच, कारण लगेच जाणवलं, की, मागे कुणीतरी बसले आहे. मागे आहे, याची खात्री करायला, मी दोन्ही पाय थोडे वर उचलले, पण गाडी स्थिर होती. मी बिन्धास झालो.

मी बाईक सुरु केली आणि २०-२५ फुटावर असलेल्या स्टीलच्या खांबांपर्यंत नेली आणि थांबवली. तिथे महेशचा सहकारी उभा होता. सीटच्या खाली असलेलं एक बटन त्यांनी दाबलं. बटन दाबताच हँडलचे दोन्ही भाग आतल्या बाजूला फोल्ड झाले. मी हळूहळू बाईक खांबातून थोडी पुढे नेली, आणि सीट खालचे बटन दाबले. हॅण्डल पुन्हा अनफोल्ड झाले. गाडी सुरु करून मी पुढे निघालो. एन्ड पॉइंटला पोहोचलो आणि गाडी मागे वळवली. खांबांपर्यंत आलो, गाडी थांबवली, बटन दाबून हॅण्डल फोल्ड केले, गाडी पुढे घेऊन हॅन्डल अनफोल्ड करून गाडी पुढे सुरु केली आणि महेशपर्यंत पोहोचलो. सगळ्यांनीच जोरदार टाळ्या वाजवून गाडीचं आणि माझं कौतुक केलं. मी खाली वाकून टाळ्या आणि कौतुक माझ्या मागे बसलेल्या मनातल्या व्यक्तीकडे पास केल्या.

महेशच्या टीममधल्या एका सुंदरीनी मला मोठा बुके दिला आणि बाईकवर माझ्या मागे बसून सेल्फी काढला. महेशनी मला एक गिफ्ट बॉक्स दिला. मी सगळ्या टीमचे आभार मानले.

महेश : सर, ही गाडी लवकरच मार्केटला येईल. तुमचा मोबाईल नंबर आणि इमेल या फॉर्ममध्ये भरून द्या. तुम्हाला स्पेशल डिस्काउंट दिल्या जाईल. तुम्ही स्वतः गाडी घ्या किंवा ऑफर कुणाला पास करा.

मी फॉर्म भरून दिला, मला बुके देणाऱ्या मॅडमला थँक्स म्हणालो. आणि महेशला आणि सगळ्या उपस्थितांना हात घालून बाय-बाय केले, आणि आम्ही निघालो.

परत जात असताना डोक्यामध्ये सहज विचार आला – अशा सुधारणांमुळे टू व्हीलरवाल्यांची जरी सोय होणार असेल, तरी अशा पळवाटा कुणाच्याही अंतर-मनाला नक्कीच पटणार नाहीत. स्वतःच्या सोयीकरता नियमातून पळवाट कशी काढता येईल, हीच आपण काळाची गरज तयार केली आहे आणि आम जनतेच्या काय गरजा आहेत, हे लक्षात घेऊनच शोध लावणारे त्यावर काम करत असतात. आणि म्हणूनच फुटपाथ फ्रेंडली बाईक तयार होतात. पळवाटांमुळे माझा थोडा वेळ वाचतही असेल, पण अपघात वाढतात हे नक्की. या अपघातात, आज कदाचित मी नसेन, पण उद्याच्या अपघाताचे काय? परवाचे काय? तेव्हाच्या अपघातात आपण असू शकतो, आपली बायको / मुले / आईवडील / जिवलग असू शकतात, हा विचार जर मनात रुजला, तर सगळेच चित्र बदलू शकते. जर प्रत्येकानेच ठरवले, की, मी वाहतुकीचे सर्व नियम पाळणार, तर बदल्यात मिळणार काय आहे? मिळणार आहे, अपघात शून्य वाहतूक.

आणि त्याकरता आपण प्रत्येकानी म्हणजे प्र – त्ये – का – नी काय करायचे आहे, तर अगदी सोपे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहेत. काय आहेत ते नियम? तर, सिग्नल पाळणे / नो एंट्रीत न जाणे / स्पीड लिमिट पाळणे / आणि अर्थात फुटपाथवर गाडी न घालणे.

या सगळ्यामुळे आपला जाण्याचा वेळ थोडा वाढेल, थोडे लवकर निघावे लागेल. हा बदल स्वीकारून जर आपण वर बघून जर प्रार्थना केली : देख तेरे संतान की हालत क्या हो गयी भगवान – ट्रॅफिक के सभी नियम फॉलो तो कर रहे है, लेकिन ट्रॅव्हल का टाईम बहुत बढ गया है.

आपली प्रार्थना ऐकून देव नक्कीच तथास्तु म्हणेल. आणि योग्य असा छान पर्याय बाहेर येईल. आपल्या सगळ्यांच्या या अशा मानसिक बदलाकरता सगळ्यांना शुभेच्छा आणि..

फुटपाथ फ्रेंडली बाईकला – बाय बाय.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ना खाऊंगा ना खाने दूंगा! ☆ डॉ. स्वाती बापट ☆

डॉ. स्वाती बापट

अल्प परिचय 

डॉ. स्वाती बापट

एमबीबीएस, एमडी (बालरोग)

  • मूळ गाव सोलापूर येथेच प्राथमिक, माध्यमिक व वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण.
  • पतीच्या सैनिकी सेवेनिमित्त भारतात ठिकठिकाणी तात्पुरते वास्तव्य.
  • गेल्या तीस वर्षांपासून आजतागायत पुण्यात बालरोगतज्ज्ञ म्हणून व्यवसाय.
  • एकंदर जीवनातील, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवांवर आधारलेले विपुल स्फुटलेखन स्वतःच्या ५ ब्लॉग्सवर प्रकाशित.

??

☆ ना खाऊंगा ना खाने दूंगा! ☆ डॉ. स्वाती बापट

आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री, श्री. नरेंद्र मोदीजींनी काही काळापूर्वी ही घोषणा केली आणि त्याचे देशभरामध्ये बरेच पडसाद उमटले. राजकारणामध्ये कोणता नेता काय घोषणाबाजी करतो आणि त्या घोषणा प्रत्यक्षात किती पाळल्या जातात, याबाबत आपण कोणीच न बोललेले बरे. पण “ना खाऊंगा ना खाने दूंगा! ” ही घोषणा मात्र माझ्या मनाला भावली होती.

माझ्या मते, वरकमाई करणे ही एक वृत्ती किंवा स्थायीभाव असतो. ज्याच्यामध्ये तो असतो, तो कुठे ना कुठेतरी उफाळून येतोच. यावरून लहानपणी ऐकलेली एक गंमतशीर गोष्ट आठवली. एका राजाच्या दरबारामध्ये एक खाबूनंदन, लाचखोर कर्मचारी होता. त्याला कुठल्याही खात्यात नेमले तरी तो वरकमाई करत असल्याच्या तक्रारी राजाकडे यायच्याच. पण त्या चतुर माणसाला कधीही रंगेहाथ पकडता आलेले नसल्याने राजाला त्याला कामावरून काढूनही टाकता येत नव्हते. शेवटी राजाने त्याला समुद्रकिनारी बसायला सांगितले आणि प्रत्येक दिवसभरामध्ये समुद्रात उठणाऱ्या लाटा मोजण्याचे काम दिले. थोड्याच दिवसांत पुन्हा या महाशयाविरुद्ध राजाकडे तक्रारी यायला सुरुवात झाली. समुद्राच्या काठी बसून हा कुणाकडून आणि कशी लाच खात असेल? या बद्दल राजाला भलतेच कुतूहल वाटले. “राजाने मला समुद्राच्या लाटा मोजण्याचे काम दिलेले आहे. तुमच्या जहाजाच्या हालचालीमुळे, या सरकारी कामात व्यत्यय येत आहे’ अशी सबब सांगून हा महाभाग किनाऱ्यावर आलेल्या प्रत्येक जहाजाच्या कप्तानाकडून पैसे खात होता! त्यामुळे पैसे खाण्याची वृत्ती असलेला मनुष्य कुठल्या तरी मार्गाने पैसे खाणार हे निश्चित.

आनंदने, म्हणजे माझ्या नवऱ्याने, २६ वर्षे सेनाधिकारी म्हणून नोकरी केली, आणि कर्नल पदावर असताना, त्याने ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. सैन्याच्या नोकरीमधे वरकमाई करण्याचे प्रसंग तसे कमीच येतात. त्यातून सैन्याच्या शिस्तीमधे असे काही करताना पकडले गेल्यास कडक कारवाई होण्याची जबरदस्त भीती असतेच. तरीदेखील, ‘लाचखोरी’ हा स्थायीभाव असलेल्या, सैन्यातल्याही काही लोकांबाबत, लाच खाणे, लाच देणे किंवा इतरही गैरप्रकार क्वचितप्रसंगी कानावर येतातच. आनंदने चार वर्षे, अलाहाबाद येथील सर्विसेस सिलेक्शन बोर्ड (SSB), म्हणजेच सेनाधिकारी निवड समितीवर काम केले. तीन अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीमधील तो एक सदस्य असे. त्याकाळी अलाहाबाद रेल्वे स्टेशनवर काही भुरट्या एजंट लोकांचा सुळसुळाट होता. सेनाधिकारी होण्यासाठी आलेल्या उमेदवारांना अलाहाबाद स्टेशनवर उतरल्या-उतरल्या हे एजंट लोक गाठत असत. “आम्ही तुमची निवड करून देण्यासाठी मदत करू. परंतु, त्यासाठी निवड समितीतील अधिकाऱ्यांना काही पैसे द्यावे लागतात. सेनाधिकारी म्हणून तुमची निवड न झाल्यास, तुमच्याकडून घेतलेली अर्धी रक्कम तुम्हाला परत मिळेल” असे आमिष दाखवून अनेक उमेदवाराकडून ते एजंट पैसे घेत असत. प्रत्यक्षात, सेनाधिकारी निवडण्याची प्रक्रिया अत्यंत निष्पक्षपणे होईल याची दक्षता घेतलेली असते. त्यासाठी निवडसमितीवरील अधिकाऱ्यांवर, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे बरीच बंधनेही घातलेली असत. परंतु, सेनाधिकारी निवड प्रक्रियेमध्ये सरसकट लाचखोरी चालत असल्याचा गैरसमज उमेदवारांमधे पसरवून, मधल्यामधे ते लबाड एजंटस भरपूर कमाई करत असत. कधी-कधी निवडसमितीच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्नही व्हायचा. त्या काळात आनंदलाही एक-दोन वेळा लाच देण्याचा प्रयत्न झाला होता. लाच घेण्याच्या किंवा देण्याच्या सक्त विरोधात असल्यामुळे, आनंद त्या प्रलोभनाला कधीच बळी पडला नाही.

वैयक्तिक पातळीवर ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा! ‘ हे तत्व काटेकोरपणे पाळणे आपल्या देशामधे तसे अवघडच आहे. या घोषणेचा पहिला भाग, म्हणजे लाच न खाणे, एकवेळ शक्य आहे. कारण त्या गोष्टीवर बऱ्याच अंशी स्वतःचे नियंत्रण असू शकते. पण काही ‘मलईदार’ सरकारी खात्यांमधे, लाच न खाणारा कर्मचारी इतरांना नकोसा असतो. कधी-कधी अशा कर्मचाऱ्याला वरचेवर बदली, सहकाऱ्यांकडून होणारी कुचेष्टा, वरिष्ठाकडून अपमानास्पद वागणूक, अशा अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. आजही कित्येक सरकारी कामांमधे, लाच दिल्याशिवाय योग्यप्रकारे आणि वेळच्यावेळी काम होत नाही हे आपण ऐकतो. म्हणूनच, सामान्य माणूस, ‘ना खाने दूंगा’ हे तत्व सहजी पाळू शकत नाही. किंबहुना, सर्वसामान्य भारतीय नागरिकाला लायसेन्स काढण्यापासून ते पासपोर्ट मिळवण्यापर्यंत, सर्व कामे, थोडीफार लाच देऊन करून घेण्यामध्ये फारसे काही गैर वाटत नाही. परंतु दुर्दैवाने, लाच देऊनसुध्दा एखादे काम व्यवस्थित होईलच याची खात्री नसते. १५ वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रामधे वास्तव्यास असलेल्या एका अमराठी सेनाधिकाऱ्याला येथील रहिवासी दाखला (डोमिसाईल सर्टिफिकेट) हवे होते. अनेक वेळा विहित नमुन्याचा अर्ज आणि योग्य शुल्क भरूनही महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला त्याला काही केल्या मिळत नव्हता. शेवटी नाईलाजाने त्याने एका एजंटला गाठले व ६००० रुपये देऊन आपले काम करून घेतले. पण प्रत्यक्षांत जेंव्हा त्याच्या हातात दाखला आला तेंव्हा त्यावर ‘भारत देशाचा रहिवासी’ इतकेच लिहून आले होते! झालेल्या चुकीबाबत चौकशी केली असता त्या एजंटने हात वर केले. त्यानंतर त्या एजंटने पुन्हा ६००० रुपये उकळले आणि मगच त्या अधिकाऱ्याला दाखला मिळाला!

आमच्यापुरते बोलायचे तर, ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा ‘ या तत्वाचे पालन करण्यासाठी मी आणि आनंद, कसोशीने प्रयत्न करतो. लाचखोरीच्या संदर्भातील ही घोषणा आठवण्यासाठी एक कारण नुकतेच घडले. काही दिवसांपूर्वी एका रिसॉर्टमधे, सुमारे ऐंशी वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत आमच्या मुलाचे ‘डेस्टिनेशन वेडिंग’ झाले. लग्नाचे मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर शेवटच्या रात्री, आम्ही एक कॉकटेल पार्टी ठेवलेली होती. त्या रिसॉर्टकडे मद्यविक्रीचा कायमस्वरूपी परवाना नसल्यामुळे आमच्या पार्टीसाठी एका दिवसाचा परवाना काढणे आवश्यक होते. एक्साईज खात्याच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करून आणि ३८०० रुपये शुल्क भरून तो परवाना मिळवता येतो, ही खात्रीशीर माहिती आनंदला मिळालेली होती. परंतु, रिसॉर्टवाल्यानी तो परवाना काढून देण्यासाठी १५००० रुपये मागितले. अर्जासोबत लागणाऱ्या विहित शुल्काव्यतिरिक्त वरचे पैसे ‘एक्साईज’ खात्याच्या अधिकाऱ्यांना द्यावेच लागतात, त्याशिवाय परवाना मंजूर होतच नाही’ अशी माहिती रिसॉर्टच्या व्यवस्थापकाने पुरवली. अर्थात लाच घेणे-लाच देणे, हे आमच्या तत्वाच्या विरुद्ध असल्याने आम्ही योग्य मार्गानेच परवाना काढायचे ठरवले.

कार्यक्रमाच्या बरेच दिवस आधी आनंदने त्या परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली. ते करतानाही बऱ्याच बारीक-सारीक अडचणी आल्या. त्या साईटवर अपलोड करावी लागणारी कागदपत्रे व फोटो अमुक इतक्या आकाराचेच आणि तमुक फॉरमॅटमधेच असणे अनिवार्य होते. ती कागदपत्रे योग्य आकार व फॉरमॅटमधे बसवून साईटवर अपलोड करेपर्यंत, तो सर्व्हर डाऊन होई. मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागे. अशा अनंत अडचणी पार करत-करत शेवटी एकदाचा तो अर्ज त्या वेबसाईटवर अपलोड झाला. त्यानंतर परवाना शुल्क भरण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्याच दुसऱ्या एका वेबसाईटवर जाणे आले. त्यामध्येही अनेक अडचणी पार केल्यानंतर अखेर ते शुल्क भरले गेले. एक-दोन दिवसातच रिसॉर्टच्या व्यवस्थापकाचा आनंदला फोन आला, “साहेब, तुम्ही परवान्यासाठी आमच्या रिसॉर्टच्या नावे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर इथल्या एक्साईज ऑफिसातून मला असे सांगण्यात आले आहे की गावातल्या काही संघटना ओल्या पार्ट्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे परवाना मिळायला अडचण येऊ शकते. त्यासाठी आपण कार्यालयात येऊन भेटावे असे तिथल्या कर्मचाऱ्याने मला सांगितले आहे. ” मात्र आनंदने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. काही दिवसानंतर ऑनलाईन परवाना मंजूर झाला व आनंदने घरीच त्याचा प्रिंटाऊटही काढून घेतला. दुसऱ्या दिवशी रिसॉर्टच्या व्यवस्थापकाचा आनंदला पुन्हा फोन आला, “साहेब, एक्साईज डिपार्टमेंटच्या क्लार्क बाईंनी सांगितले आहे की ऑफिसात पैसे भरून परवान्याची प्रत घेऊन जा. त्यासाठी मला पाच-दहा हजार रुपये सोबत घेऊन जावे लागेल. तर कसे करायचे? ” आनंदने त्या व्यवस्थापकाला सांगितले, “त्या ऑफिसमधील क्लार्क बाईंना ठणकावून सांगा की योग्य शुल्क भरून मंजूर झालेल्या परवान्याची प्रत माझ्याकडे आहे. तरीही वर काही पैसे हवे असल्यास त्या बाईंनी तसे लेखी द्यावे किंवा मला मेसेज करावा. ” त्यानंतर मात्र आनंदला कुणाचाही फोन आला नाही, आणि सर्व नियमांचे पालन करून आम्ही आयोजित केलेली कॉकटेल पार्टीही निर्विघ्नपणे पार पडली.

लग्नाच्या निमित्ताने ठरवलेले सर्व कार्यक्रम आनंदात पार पडावे, अशी आमची इच्छा होती. “देऊन टाका ना वरचे पाच-दहा हजार रुपये. परवाना मिळवण्याची कटकट तरी वाचेल. ” असा सल्ला देणारे लोकही आम्हाला भेटले. पण “ना खाऊंगा ना खाने दूंगा! ” या तत्वाला मुरड घालायला आम्ही तयार नव्हतो. आमचा बराच वेळ आणि श्रम खर्ची पडले असले तरी ती इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद त्याहून खूप मोठा होता.

लाच देणे-घेणे हे अनेक देशवासीयांच्या रक्तात भिनले आहे हे पदोपदी जाणवते. आपल्यापैकी प्रत्येकाने थोडी अधिक धडपड करून, जर “ना खाऊंगा ना खाने दूंगा’ हा मंत्र जपला तरच काहीतरी फरक पडेल असे वाटते.

© डॉ. स्वाती बापट

एमबीबीएस, एमडी (बालरोग)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी पूजा अपूर्ण आहे! —  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ माझी पूजा अपूर्ण आहे! —  लेखक – अज्ञात ☆ अनुवाद व प्रस्तुती  –  सुश्री प्रभा हर्षे

पूजेसाठी रोज मी सोवळे स्वच्छ करतो! पण जोपर्यंत विकारांच्या मलीनतेपासून मन स्वच्छ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवासमोर पांढरी रांगोळी काढतो! पण त्या पांढर्‍या रंगाप्रमाणे माझे मन धवल, निर्मळ होत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज देवांवर मी पाणी घालतो, अभिषेक करतो! पण मनातल्या आसक्ती वर मी जोपर्यंत पाणी सोडत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ दिवा लावतो!

पण जोपर्यंत समाधानी वृत्तीचा नंदादीप मी मनात लावत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ उदबत्ती लावतो! पण संसारतापाने मंदपणे जळत असताना चित्तशुद्धीचा अंगारा जोपर्यंत मला लाभत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवाजवळ कापूर जाळतो! पण त्या कापराच्या वडीप्रमाणे मनातले कुविचार क्षणात जळून जात नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज आरती करताना मी देवाचा गुणगौरव करतो! पण माझ्या आजूबाजूच्या माणसांमधले गुण जोपर्यंत मी शोधत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

रोज मी देवासमोर स्थिर बसुन तासभर ध्यान करतो! पण जोपर्यंत माझ्या चंचल चित्तवृत्ती स्थिर होत नाहीत, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

वृक्षवेलींनी प्रयत्नपूर्वक निर्मिलेली फुले मी देवाला रोज वाहतो! पण माझ्या कष्टसाध्य सत्कर्माची फुले मी जोपर्यंत समाजाला वाटत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

देवासमोर मी रोज प्रसाद ठेवतो!

पण त्याने मला दिलेला हा जीवनरूपी प्रसाद परोपकारी वृत्तीने मी इतरांना देत नाही, तोपर्यंत माझी पूजा अपूर्ण आहे!

— का.. कसं कोण जाणे.. एक दिवस माझं मलाच हे सगळं जाणवलं.. खरं तर खटकलंच. मग मी स्वतःच स्वतःला विचारलं – – 

बघ तुला जमतं का? ……

तू उपवास कर किंवा नको करूस मर्जी तुझी. जीभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझ्या मोहांवर मात्र ताबा मिळव, बघ तुला जमतं का…

तू देवळात रोज जा किंवा नको जाऊस.. इच्छा तुझी. तिथे नतमस्तक झाला नाहीस तरी चालेल, पण तुझ्या अहंकारावर मात्र कर मात, बघ तुला जमतं का…

तू सोवळं मान किंवा नको मानूस, हक्क तुझा.. ते सर्व मानलं नाहीस तरी चालेल, पण तुझे आचार मात्र ठेव पवित्र, बघ तुला जमतं का…

तू १ माळ जप, स्वाध्याय कर, शास्त्र वाच किंवा नको वाचूस.. निवड तुझी. त्यासाठी वेळ नसला तरी चालेल, पण आपल्या माणसांची मनं जरूर वाच, बघ तुला जमतं का…

तू मंदिरात सेवेला ये किंवा नको येऊस.. आवड तुझी, त्यासाठी सवड नसली तरी चालेल, पण सेवेत असलेल्या भक्तांमधे देव पाहायला नक्की शिक, बघ तुला जमतं का???

माझी मनोमन पक्की खात्री झाली आहे आता की …. माझी पूजा अपूर्णच आहे ….

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती  –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आजी, आजची आणि कालची – लेखक : श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ आजी, आजची आणि कालची – लेखक : श्री पराग गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

काही दिवसांपूर्वी एका मॉल मध्ये गेलो होतो. ठाण्याचा अतिशय सुप्रसिद्ध मॉल. तरुणाईची पसंती असलेला. कुटुंबवत्सल जोडप्यांची आवडीची जागा.

 मुलांना घेऊन फिरायला, खरेदीला आणि खादाडीला भरपूर वाव देणारी आणि त्यासोबतच खिसा हलका करणारी. पोरांच्या भाषेत hangout आणि chill करण्यासाठी perfect place.

 या मॉल नामक जागेच्या मी जरा दहशतीतच असतो. एक तर भयंकर तंगडतोड होते उगाचंच. चकाचक दुकानं आणि नावाजलेले brands बघत नुसतं गरगर फिरतो आपण.

नको असलेल्या अनेक वस्तू, महागडे कपडे, चपला आणि बरंच काही ओझं घेऊन मग सगळ्यात वर असलेल्या खादाडीच्या विभागात पोहोचतो.

खाण्याचे एवढे विविध प्रकार पाहून हा भुलभुलैय्या बरा, की चक्रव्यूह बरा, अशी शंका यावी अशी परिस्थिती.

अशा गोंधळलेल्या अवस्थेतच लेकीने सूत्रं हातात घेतली आणि मॅकडॉनल्ड्स च्या दुकानात ती अदृश्य झाली. मी आणि बायको बावचळलेल्या अवस्थेत इकडेतिकडे बघत बसलो शुंभासारखे. माझ्या भिरभिरणाऱ्या नजरेला तेवढ्यात ‘ ते ‘ दिसले.

एक आधुनिक, पण नवथर आज्जी आणि दोन नातवंडं, साधारण एकाच वयाची. जुळी असावीत बहुतेक, असं त्यांच्याकडे बघून वाटत होतं.

लाल T-Shirt, (बायकोच्या मते टोमॅटो रंग, लाल नव्हे) जीन्स आणि तोकडे, रंगवलेले केस. पायात Nike चे बूट आणि खांद्याला भारी पर्स लटकावलेली आजी.

पोरांची वेशभूषा पण आजीच्या पेहरावाला साजेशी. उच्चभ्रू, सुखवस्तू कुटुंबाचे प्रतिनिधी, तिघेही.

आजीच्या हातात पिशव्या पण होत्या खरेदीच्या. नातवंडांना घेऊन आली होती धमाल करायला ही नव्या युगाची नवी आजी. काळ कुठलाही असला तरी दुधाच्या सायीवरची माया मात्र अबाधित असते याची खात्री पटवून देणारी.

मुलांना दटावून, शांत बसा, मी आलेच असं म्हणून आजीही अदृश्य झाली मॅकडोनाल्डस मध्ये. पोरांची चुळबूळ, खोडकरपणा सुरूच होता, पण नशिबाने जागा सोडून पळत नव्हती इकडे तिकडे.

गोंडस, लोभस छानशी मुलं होती अगदी. टुकुरटुकूर बघत होती इकडेतिकडे विस्फारल्या डोळ्यांनी. आजीबरोबर यायचा असा त्यांचा पहिलाच अनुभव असावा बहुतेक. मी बघत होतो त्यांच्याकडे आणि माझीच तंद्री लागली.

मलाही माझी आजी आठवायला लागली. नऊवारी लुगडं नेसलेली, पायात चपला अगदी कधीतरीच घालणारी, पांढऱ्या केसांचा सुपारीएवढा का होईना पण अंबाडा घालणारी. अंघोळीला अंग धुणं, पोलक्याला झंपर, नाहीतर चोळी म्हणणारी. आमची सालस आजी.

आजची आजी घेऊन आली होती नातवंडांना मॅकडोनाल्डस मध्ये खाऊ घालायला. आमच्या आजीच्यावेळी ही असली चैन नव्हती आणि आमची तशी कधी अपेक्षाही नव्हती.

तसलं काही नव्हतंच हो तेंव्हा. खेळून दमल्यावर आजी काहीतरी खायला द्यायची. कधी राजगिऱ्याचे लाडू, कधी एखादा रव्याचा लाडू, घावन नाहीतर थालीपीठ, पोह्याचा पापड कुस्करून घातलेले दडपे पोहे किंवा कधी पोळीचा लाडू. काहीच नाही तर गुळ घातलेले दही दूध पोहे, आणि आम्ही खात असताना बघत बसायची कौतुकाने.

माझी दहावीची परीक्षा होती, तेंव्हा आमच्याकडे मुक्कामाला होती दहा दिवस आणि रोज नवा पदार्थ करून खाऊ घालायची पेपर संपवून आल्यावर.

अमृताची चव असायची तिच्या साध्यासुध्या घरगुती पदार्थाना. इतर काही सोडा, पण बाहेरचे वडे, भजी आणि सामोसे पण खाल्लेले नाही स्मरत मला.

नाही म्हणायला, पुण्यात असताना, रविवारी सकाळी एकाद्या छानश्या बेकरीचे गरमागरम पॅटिस मात्र असायचे बदल म्हणून, कधीतरी. ते पण भारी वाटायचे तेंव्हा.

आता टाळ्याला चिकटणारं त्यातलं वनस्पती तूप, प्राण कंठाशी आणतं. नको वाटतं खायला, पण तेंव्हा ती परमोच्च चैन असायची.

आज्या नऊवारीतून पाचवारीत संक्रमित झाल्या. त्यावेळी पण प्रचंड विरोधाला त्यांना सामोरं जावं लागलं म्हणे, पण म्हणतात ना, change is the only constant in life ‘ या न्यायाने विरोधावर मात करून त्या जिंकल्या.

पुढची अवस्था होती पंजाबी ड्रेसची. तो बदल मात्र बऱ्यापैकी विनासायास झाला आणि आता जीन्स वाली आजी पण समाजाने विनातक्रार स्वीकारली. आपल्या समाजाची ती प्रगल्भता आहे, निश्चितच.

अंबाडा ते दोन वेण्या, मग एका वेणीचा शेपटा आणि आता पार्लर मध्ये जाऊन छानपैकी कापलेले, रंगवलेले केस. हे स्थित्यंतर पण जाणवण्याजोगं.

आजोबांचं पण तसंच संक्रमण झालं असणार. कोट, टोपी, पगडी, उपरणं ते सदरा लेंगा, शर्ट पॅन्ट आणि आता जीन्स, शॉर्ट्स आणी t-shirt.

हम बदल रहें है. निश्चितच.

तेव्हढ्यात लेकीची हाक आली, बाबा… दोन हातात दोन बर्गर चे ट्रे, त्यात fries आणि Coke असं सगळं सावरीत ती येत होती. मी उठून ते घेतलं तिच्याकडून आणि ती तिसरा ट्रे आणायला पळाली.

आधुनिक आजी पण ते सगळं सावरीत त्यांच्या टेबलाकडे वळली आणि नातवंडांशी गप्पा मारत, ते खाण्यात तिघेही गुंग झाले.

मी पण मग दडपे पोहे आणि घावन विसरून बर्गर हाती घेतला. French Fries, ketchup मध्ये dip करून खायला लागलो. पर्यायच नव्हता.

विचार केला, उसासे टाकून काय उपयोग? जमाना बदल रहा है, हमें भी बदलनाच पडेगा.

चला, ‘ जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका’ ही केशवसुतांची तुतारी आठवून बदल स्वीकारून मार्गक्रमण करुया. त्यातच सुख आहे…

लेखक : श्री पराग गोडबोले 

 (९३२३२ ७७६२०)

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

सांगली – ४१६ ४१६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “कन्यादान …. असेही!!” – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कन्यादान …. असेही!!” – भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(आईच्या मार्गदर्शनानुसार, आमच्या लोकांनी तयार केलेले बुके आम्ही सर्व लोकांना घेण्याची विनंती करू, देणगी म्हणून ते जे काही मूल्य देतील ते आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पगार म्हणून दिला जाईल.)– इथून पुढे 

  1. लिक्विड वॉश

कपडे आणि भांडी सोडून सर्व डाग (फरशी, किचन कट्टा, गाड्या, टॉयलेट, खिडकीच्या काचा, टीव्ही अथवा इतर वस्तूंच्या ग्लासेस, आणखीही बरेच काही) साफ करणारे लिक्विड वॉश आपले लोक या ठिकाणी तयार करणार आहेत.

यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान आणि फॉर्म्युला मेहता सोप कंपनी यांनी आपल्याला विनामूल्य देऊ केले आहे.

हे लिक्विड वॉश आपण, समाजामध्ये लोकांनी घ्यावे यासाठी विनंती करणार आहोत,

यातून मिळणारा निधी, पगार देण्यासाठी वापरणार आहोत.

  1. फेकलेल्या कपड्यांपासून कापडी पिशव्या तयार करणे… प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासाठी समाजाला विनंती करणे

ज्यांना शिवणकला येते अशा वृद्धांना आपण या ठिकाणी बसवून त्यांच्याकडून कापडी पिशव्या शिवून घेणार आहोत. अंध आणि अपंग लोकांना या पिशव्या विकायला लावणार आहोत.

समाजामध्ये प्लास्टिक पिशव्या न वापरण्याविषयी भिक्षेकर्‍यांच्या माध्यमातून आवाहन करणार आहोत.

या सर्वातून जे देणगी मूल्य मिळेल तो निधी, पिशव्या शिवणाऱ्या, पिशव्या विकणाऱ्या आणि समाजात प्रबोधन करणाऱ्या लोकांना आपण देणार आहोत.

– – तर असे या प्रकल्पाचे… आमच्या संसाराचे प्राथमिक स्वरूप आहे…!  

भविष्यात हळूहळू आणखीही प्रकल्प या माध्यमातून सुरू करण्याचे डोक्यात आहे बघूया कसं जमतं ते…!  

ज्यांच्या आयुष्यात अंधार आहे ते लोक दुसऱ्यांनी दिलेल्या उसन्या प्रकाशावर आतापर्यंत चालत होते, या प्रकल्पाच्या माध्यमातून, स्वतःच्या काळ्याकुट्ट आयुष्याच्या मध्यरात्री, ते स्वतःच सूर्य म्हणून उगवतील… स्वयंप्रकाशित होतील… स्वयंपूर्ण होतील… आणि स्वतःच्या प्रकाशात चालायला सुरुवात करतील आणि म्हणून या प्रकल्पाचे नाव *’मध्यरात्रीचे सूर्य…!!! “

आपल्या या लोकांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून…

  1. प्रत्येक व्यक्तीस रुपये 200 प्रतिदिन देणार आहोत
  1. सकाळचा चहा नाष्टा आणि दुपारचे जेवण.
  1. याचसोबत कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल इतका कोरडा शिधा / किराणा इ. काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस देणार आहोत.

आपल्या आशीर्वाद आणि शुभेच्छा यामुळे हा प्रकल्प भरभराटीस येईल असा विश्वास आहे!  

माझ्यासाठी हा प्रकल्प नव्हेच, ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींच्या जगण्याचा हा सोहळा आहे.

आपली साथ आणि सोबत आजपर्यंत मिळाली तशीच ती इथून पुढे सुद्धा लागणार आहे, आपण नेमकी कशी मदत करू शकता हे येत्या दोन दिवसात पुन्हा कळवतो.

मध्यरात्रीचे सूर्य पत्ता : 

Jayanti Apartments Hos Soc Swami Vivekanand Rd and Bibwewadi Kondhwa Rd/Sitaram Thakare Rd. Bibvewadi, Pune

(आमची काम करणारी मंडळी सोमवार ते शनिवार (रविवारी सुट्टी) 11 ते 4 या वेळात इथे असणार आहेत, सकाळची रस्त्यावरची कामे करून दुपारी दीड ते चार या दरम्यान मी तिथे असेन)

नेमकं काय घडलं त्या दिवशी – – 

– अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत प्रोडक्शन सुरू झाले पाहिजेच हा माझा हट्ट होता.

– या दिवशी प्रकल्पात करू इच्छिणारे 50 दिव्यांग आजी आजोबा यांनी येथे हजेरी लावली.

– संपूर्ण एप्रिल महिन्यात, कोणत्या बस स्टॉप वर जायचे, कोणत्या बसमध्ये बसायचे, कुठे उतरायचे, कंडक्टरला काय सांगायचे, तिकीट कसे काढायचे, ते किती असते, कुठे उतरायचे याचे ट्रेनिंग झाले.

– सेंटरवर आल्यानंतर माझे लोक काम करतील की नाही हे माझे चॅलेंज नाहीच, बसचा पास काढून देऊन सुद्धा, व्हीलचेअर घेऊन, ज्यांना दंडाला धरल्याशिवाय उभे राहता येत नाही अशा माझ्या माऊलींनी बस मध्ये कसे बसायचे, प्रवास कसा करायचा, सेंटरवर कसे पोचायचे हे माझे मुख्य चॅलेंज आहे, आणि यावर मला तोडगा सुचत नाही.

– सर्वांसाठी एक प्रायव्हेट बस करायची म्हटलं, तर ते कमीत कमी महिन्याचे 80 हजार रुपये घ्यायचे म्हणतात… डोनेशन मधून मिळालेले पैसे फक्त बससाठी द्यायची माझी इच्छा नाही.

बघू…. तर हे सर्व दिव्य करून 50 आजी आजोबा आणि दिव्यांगलोक अक्षय तृतीयेला कामासाठी हजर झाले.

– फुलांचे वर्गीकरण करणे, पावडर करणे, गिफ्ट आर्टिकल तयार करणे अशी अनेक कामे अक्षय्य तृतीयेला सुरू झाली.

– अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आई-वडिल, ज्यांनी जागा दिली ते दानिश भाई, जे हा प्रकल्प चालवायला मदत करणार आहे ते विपुल भाई, लिक्विड वॉश चे सर्व तंत्रज्ञान देणारे मेहता भाई, आणि ज्यांनी सर्व मशीन दिले असे निलेश लिमये, सेंचुरी एन्का यांच्या हस्ते सर्व मशीनची पूजा केली.

– इथे काम करणाऱ्या सर्वांना आपण आयडेंटीटी कार्ड आणि युनिफॉर्म दिला आहे.

– काम केलेल्या सर्व वृद्ध आजी आजोबा आणि दिव्यांग यांना पुरणपोळी तूप आणि चितळे यांची लस्सी दिली आहे, कोरडा शिधा दिला आहे.

लेख वाढत चालला आहे… आता थांबतो…

30 एप्रिल… संध्याकाळी, सेंटरला कुलूप लावताना एका मान्यवरांनी विचारले, ‘उद्या सुट्टी का मग? ‘ 

‘का? कसली सुट्टी? उद्या काय आहे? ‘ मी म्हणालो.

‘उद्या एक मे… कामगार दिन… कामगारांना सुट्टी द्यायची असते.. ‘ ते म्हणाले.

मी त्यांना म्हणालो, ‘ काम करायला आलेले आमचे भिक्षेकरी हे कामगार नाहीत, प्रकल्पाचे पार्टनर आहेत, सुट्टी कामगार घेतात… पार्टनर नाहीत…! ‘ 

यानंतर सेंटरला कुलूप लागले आणि त्यांच्या तोंडालाही…!  

आपले स्नेहांकित,

 

डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनवणे 

डॉक्टर फॉर बेगर्स

– समाप्त –

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२९ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२९ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

जागृत दैवत.. माय माझी जोगेश्वरी…

माझे काका (अण्णा)दुपारी मंदिरात ओट्यावर विश्रांती घ्यायचे. दुपारी बारानंतर गुरव जोगेश्वरीचा पोशाख बदलायचे. एकदा आम्ही भावंड तिथेच लपंडाव खेळत होतो. दोन्ही दरवाजे बाराला बंद व्हायचे. गुरव काहीतरी आणायला म्हणून वरच्या मजल्यावर गेले आणि दोन मिनिटातच खाली आले तेव्हां त्यांच्या लक्षात आलं, देवीचा चांदीचा मुकुट गायब झाला आहे. त्यावेळी फोन नव्हते. पण फरासखाना अगदी जवळ होता. आमच्यातल्याच एका जाणत्याला काकांनी तिकडे पिटाळलं, पोलिसांचं भलं मोठ्ठ पथक धावत आलं, काहीजण मंदिराचा कोपरान् कोपरा धुंडाळू लागले काहींनी मंदिराला घेराव घातला, तर काही पोलिसांनी उलट सुलट प्रश्न विचारून आमची भंबेरी उडवली. पोलीस पथक, अथक दोन दिवस धावपळ करीत होते पण यश आले नाही, आणि काय सांगू तुम्हाला!  एक दिवस अचानक चोर मुकुट घेऊन देवीसमोर उभा राह्यला. त्यानी लोटांगण घालून देवीपुढे नाक घासले, डोळ्यातून घळघळा पश्चातापाचे अश्रू ओघळत होते. शब्द फुटले, ” आई मी चुकलो, मी चोरी केली माझ्या हातून पाप घडलंय, पण मला मुकुट परत आणून देण्याची सद्बुद्धी तू दिलीस. मला क्षमा कर देवीआई, माझे अपराध पोटात घाल. ” देवी पुढे क्षमा याचना करणाऱ्या त्याच्या भोवती पोलिसांनी घेराव घातला. चोर पुराव्यानिशी अगदी सहज सांपडला होता आपणहून तो पोलिसांच्या समोर आला आणि म्हणाला, ” इन्स्पेक्टर साहेब बेड्या घाला मला, फटके मारून माझी ‘ ‘खाल ‘उडवा, माझ्या कडून फार मोठं पाप, घडलंय मी अपराधी आहे. मला या पापाचं प्रायश्चित्त मिळायलाच हवं. असं म्हणून त्यानी बेड्या घालून घेण्यासाठी हात पुढे केले, थरथरत्या पायांनी कसंबसं उभं रहात तो म्हणाला, ” पण साहेब मी तुम्हाला एक विनंती करतो, मला फक्त अर्धा कप चहा आणि एक बनपाव द्याल का? दोन दिवसाचा उपाशी आहे हो मी!  या पोटासाठी चोरी केली. रात्रभर तळमळत होतो मी. चोरी केल्याची टोचणी मनाला पोखरत होतीच, अपराधी भावनेने, मानसिक ओढाताणीने, उपासमारीने मला ग्लानी आली, मी जमिनीवर कोसळलो. — आणि आणि –पहाटे जोगेश्वरी माझ्या स्वप्नात आली आणि म्हणाली, “उठ!  माझा मुकुट परत मंदिरात नेऊन ठेव. ” सत्य की स्वप्न मला कळेना, साहेब, उठायची पण ताकद नव्हती माझ्या अंगात, मी जागा झालो आणि एक प्रकारचं चैतन्य आलं माझ्या हातापायात. खरं सांगतो, मी आईसमोर कसा? कधी? आलो हे मला कळलंच नाही. ” पश्चातापाने रडणाऱ्या त्या तरुणाला बेड्या घालण्यासाठी, आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी पोलीस सरसावले. इतका वेळ शांतपणे हा प्रकार बघत असलेले माझे काका आता पुढे झाले, आणि म्हणाले, “इन्स्पेक्टर साहेब मला कल्पना आहे कायद्याने तुमचे हात बांधले गेले आहेत. चोरांनी आपणहून गुन्हा कबूल केला तरी तो कायद्याने गुन्हेगारच ठरतो. पण बेडया ठोकण्याआधी माझी तुम्हाला एक कळकळीची, हात जोडून विनंती आहे, फक्त, फक्त दहा मिनिटं थांबा, ह्याला थोडा वेळ द्या, अपराधी बेकारी मुळे सैरभैर झाला होता, त्यातून उपासमार, पोटात अन्नाचा कण नाही. साहेब माणूस चोरी कां करतो? तर पोटासाठी. रिकाम्या पोटात कावळे ओरडत असतात तेव्हांच रिकाम्या डोक्यात सैतान शिरतो. आणि मग सदविवेक बुद्धी मागे पडून माणसाच्या हातून गुन्हा घडतो. भरल्या पोटी कोण कशाला करेल हो चोरी? जोगेश्वरी च्या दरबारातून त्याला उपाशी जाऊ देऊ नका, फक्त थोडावेळ थांबा. समोरच्या गुंडींच्या हॉटेलमधून मी चहा पाव मागवला आहे, तो या तरुणाला पोटभर खाऊ द्या मग खुशाल त्याला फरासखान्यात न्या”. माझ्या काकांचं बोलणं ऐकून भीतीने आणि भुकेने थरथर कापणारा तो तरुण माझ्या काकांच्या पायावर कोसळला. त्याला प्रेमाने उठवत अण्णा म्हणाले, ” उठ बाळा! माझ्या पाया कशाला पडतोस? जोगेश्वरी आईचे पाय धर. ही सारी तिची कृपा. तिनेच तुला विवेक बुद्धी दिली आहे. ” आणि मग पुन्हा एकदा तो कैदी जोगेश्वरीच्या पायाशी कोसळला. अश्रुंचा अभिषेक माय माऊलीच्या चरणावर झाला.

मंडळी आपणही त्या जोगेश्वरी माय माऊलीच्या चरणावर नतमस्तक होऊ या.

– क्रमशः भाग २९ 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सत्य पण… परंतु…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? मनमंजुषेतून ?

☆ “सत्य पण… परंतु…” ☆ श्री जगदीश काबरे

परीक्षेत चांगले “गुण” सगळ्यांनाच मिळवावेसे वाटतात…

परंतू “गुणवत्ता” वाढवावीशी वाटत नाही.

 

“सुविचारां”चा सुकाळ आहे…

परंतू त्यांच्या “आचारणा”चा दुष्काळ आहे.

 

“कचरा” सर्वांनाच नकोय…

परंतू “स्वच्छता” कुणालाच ठेवावीशी वाटत नाही.

 

“भ्रष्टाचारा”पासून मुक्ती हवीय…

परंतू “नियम” मात्र कुणालाच पाळावेसे वाटत नाहीत.

 

“मरायचं” एकदा सर्वाना आहे…

परंतू “मरावंस” कोणालाच वाटत नाही.

 

“धर्म” सगळ्यांनाच हवा आहे…

परंतू “अंधश्रद्धा” सोडावीशी वाटत नाही.

 

“अन्न” सर्वांनाच हवंय…

परंतू “शेती” शेतकऱ्यालाही करावीशी वाटत नाही.

 

“पाणी”” सर्वांनाच हवंय…

परंतू “पाणी” वाचवावेसे कोणालाच वाटत नाही.

 

“सावली” सर्वांनाच हवीय…

परंतू “झाडे” लावावी, ती जगवावी असे कोणालाच वाटत नाही.

 

“सून”” सर्वनाच हवी आहे…

परंतु “मुलगी” वाचवावीशी कोणालाच वाटत नाही.

 

“विज्ञाना”चे सगळे फायदे हवे आहेत…

परंतु “वैज्ञानिक दृष्टिकोन” मात्र रुजवावासा वाटत नाही.

 

आजचे विदारक सत्य असे आहे…

परंतु विचार कोणालाच करावासा वाटत नाही.

 

©  श्री जगदीश काबरे 

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “कन्यादान …. असेही!!” – भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ कन्यादान …. असेही!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नाकी डोळी छान, साडेपाच फूट उंच, वर्ण गोरा, स्वयंपाकात निपुण, अत्यंत सोज्वळ, डबल ग्रॅज्युएट, सासू-सासरे घरात चालणार आहेत, नवऱ्याला सरकारी नोकरी नसली तरी चालेल, फक्त निर्व्यसनी हवा… इतके गुण असलेली मुलगी, लग्न होत नाही म्हणून दहा वर्षे घरात बसलेली…

काही कारणाने तिला कोणी पसंत करत नाही किंवा तिला तो पसंत पडत नाही….

असं न सांगता येणारं दुखणं…

अशा या मुलीच्या बापाला जो काही त्रास असेल, तोच मला त्रास!

भीक मागणारे आमचे वृद्ध आणि दिव्यांग आई-वडील, आजी-आजोबा यांना काम करण्याची इच्छा आहे परंतु कोणी काम देत नाही, यांच्या पुनर्वसनासाठी रोजगार केंद्र निर्माण करावे यासाठी जागा (स्थळ) शोधतो आहे, परंतु गेली दहा वर्षे कोणी “स्थळ” देत नाही.

काहींनी आम्हाला रोजगार केंद्र सुरू करण्यासाठी “स्थळे” पाठवली, पण ती स्थळे आम्हाला पसंत नव्हती.

जी “स्थळे” आम्हाला पसंत होती… त्यांनी काही ना काही स्वरूपात माझ्याकडे बराच “हुंडा” मागितला…!

नोकरी सोडून वर संशोधन करणारा मी बाप… इतका हुंडा या “स्थळांसाठी” देणं मला कसं परवडेल?

याच परिस्थितीत श्री दानिश भाई धावून आले आणि मध्यरात्रीचे सूर्य या नावाचे रोजगार केंद्र नव्हे, आमची मुलगी त्यांनी आपल्या पदरात घेतली…

बिबवेवाडी येथील स्थळ दिले, नववधूचा विवाहापूर्वी करतात तो मेकअप करून दिला, इथे टीव्ही, फ्रिज, कार्पेट अशा सर्व बाबींचा इंतजाम केला. तोरणे लावली, हार फुले माळा लागल्या, “संसाराला” लागतील त्या सर्व गोष्टी दिल्या…!

खऱ्या अर्थाने त्यांनीच कन्यादान केले…!

मी माझ्या डोक्यावरची पगडी त्यांच्या पायाशी ठेवली… त्यांनी ती उचलून परत माझ्या डोक्यावर घातली…

नावातच “दान” आणि “इश” असलेल्या माणसा पुढे पगडीच काय, संपूर्ण आयुष्य बहाल केले तरी त्यांचे उपकार फिटणार नाहीत…!

तर 30 एप्रिल 2025 रोजी, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर, हा सोहळा संपन्न झाला.

दहा वर्षांपूर्वी भीक मागणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण व रोजगार केंद्र सुरू करायचे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले. आमच्या वृद्ध आणि दिव्यांग आई-वडील आणि आजी आजोबा यांच्यामार्फत या रोजगार केंद्रात अक्षय तृतीयेच्या दिवसापासून प्रोडक्शन सुरू झाले.

या सोहळ्याविषयी पुढे लिहिलेच आहे, परंतु मला एवढीच एक “मुलगी” नाही… इतरही अनेक मुलींची अर्थ प्रकल्पांची… जबाबदारी बाप म्हणून माझ्या डोक्यावर आहे.

त्या विषयी अगदी थोडक्यात सांगतो, : 

– अत्यंत गंभीर अवस्थेतील 5 रस्त्यावर पडलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, त्यांचे जीव वाचले आणि त्यांना आपापल्या गावी स्वखर्चाने पाठवले.

– एक धडधाकट (भीक मागणारा) मुलगा, याला श्री भाटे यांच्या वृद्धाश्रमात नोकरी मिळवून दिली आहे. तिथल्या आजी आजोबांची तो सेवा करेल. मी श्री आणि सौ भाटे यांचा ऋणी आहे.

– रस्त्यावर पडलेल्या आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या अनेक लोकांना अन्नपूर्णा प्रकल्पातून रोज जेवण दिले आहे.

– अनेक आजा मावश्या यांच्याकडून (खराटा पलटण) सार्वजनिक स्वच्छता करून घेऊन त्यांना किराणा (Grocery) दिला आहे.

– या महिन्यात जवळपास 900 लोकांना वैद्यकीय सेवा, लॅब टेस्ट तसेच वैद्यकीय उपकरणे दिली आहेत.

आणखी सुद्धा बरंच काही आहे…

पण सध्या आमच्या मुलीचा नवीन संसार सुरू झाला आहे… त्याचं कौतुक यावेळी जास्त आहे, म्हणून त्याविषयी जास्त सांगतो…

तर, आपणा सर्वांच्या मदतीने शुभाशीर्वादाने, भिक्षेकर्‍यांच्या पुनर्वसनासाठी वाहिलेले पहिले “प्रशिक्षण व रोजगार केंद्र” अक्षय्य तृतीयेला सुरू झाले

आता नेमका काय आहे हा प्रकल्प ते सांगतो…

याचना करत; भिक मागत जगणाऱ्या लोकांना कोणताही रोजगार उपलब्ध होत नाही, या कारणामुळे त्यांना प्रशिक्षण देऊन, त्यांच्याकडून काही प्रॉडक्ट तयार करून घेऊन, त्यांच्या “हाताला काम” आणि “पोटाला अन्न” सन्मानाने देण्यासाठी हा प्रकल्प निर्माण केलेला आहे.

या प्रशिक्षणा दरम्यान कोणालाही इजा होऊ नये, प्रदूषण कमीत कमी व्हावे किंबहुना प्रदूषणाला आळा बसावा आणि कमीत कमी भांडवलात जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे

या आधारावर खालील चार प्रकल्प या जागेत सुरू असतील* 

  1. रस्त्यावर पडलेल्या फुलांची पावडर (चुर्ण)

डोक्याला लावण्यासाठी आयुर्वेदिक तेल, विविध आजारांवर उपयुक्त असे मसाजसाठी तेल, अनेक मलम, त्वचेची निगा राखणारे क्रीम यासाठी अनेक फार्मा कंपन्यांना खरोखरच्या फुलांची पावडर (Natural/ Organic)हवी असते.

धार्मिक स्थळांमध्ये किंवा रस्त्यावर पडलेल्या अशा फुलांचे निर्माल्य / कचरा आमचे भीक मागणारे लोक (तरुण मुलं) फिरून आम्हास देतील, किलोच्या भावाने आपण त्या विकत घेऊन त्यांना पैसे देऊ.

वृद्ध आणि दिव्यांग लोक बैठ्या स्वरूपात रंगानुसार या फुलांचे वर्गीकरण करतील.

* यानंतर या फुलांचे शुद्धीकरण करून, विशिष्ट तापमानात सुकवून फुलांची पावडर (चूर्ण / फाईन पावडर) केले जाईल. *

* स्वच्छतेचे सर्व निकष पाळून (Extremely hygienic conditions) याचे पॅकिंग केले जाईल, त्यावर स्टिकर लावले जाईल. *

आयुर्वेदिक प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना, तयार झालेली फुलांची ही नैसर्गिक पावडर आपण देणार आहोत.

आपल्या या प्रकल्पात स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधले जात आहेत….

रस्त्यावरचा कचरा आणि निर्माल्य उचलले जाईल… (जे नदीत जाते आणि नद्या प्रदूषित होतात) 

कचरा आणि निर्माल्या मधून तयार होणारी लक्ष्मी… कितीतरी भुकेल्यांची भूक भागवून अन्नपूर्णा होईल… भीक मागणाऱ्या लोकांना स्वयंपूर्ण बनवून सन्मानाने जगण्याचा आशीर्वाद देईल!

  1. शोभेचा बुके

तुळशी बागेत खोटे परंतु अत्यंत आकर्षक मोती मिळतात, सोन्यासारख्या दिसणाऱ्या तारा मिळतात. माझी आई या सर्व बाबींचा उपयोग करून अत्यंत सुंदर असा एक बुके तयार करते. फुलांचा बुके कितीही महाग असला आणि छान असला तरी तो चार दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही. आपण कोणालाही तो भेट दिला तरी ती व्यक्ती, पुन्हा कचऱ्यात फेकून देते.

माझी आई, जो बुके बनवते, तो दिसतो इतका सुंदर, की कुणीही प्रेमात पडावं…!

आणि याचे सौंदर्य किमान पाच वर्षे टिकते.

आईच्या मार्गदर्शनानुसार, आमच्या लोकांनी तयार केलेले बुके आम्ही सर्व लोकांना घेण्याची विनंती करू, देणगी म्हणून ते जे काही मूल्य देतील ते आपल्याकडे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पगार म्हणून दिला जाईल.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… अंजु.. भाग – ४३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… अंजु.. – भाग – ४३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

अखेर तुझी झुंज संपली. आज तू अनंतात विलीन झालीस.

या चिरनिद्रेत तुझ्या सार्‍या यातना, वेदना मिटून गेल्या. तुला अखेरचा अश्रुपूर्ण निरोप देताना म्हणेन, ‘ जिथे असशील तिथे सुखात रहा. ’ 

आठवणी खूप आहेत. साठ पासष्ट वर्षांची आपली निखळ मैत्री. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपण एकत्र होतो. त्यात निरागस बालपण होतं, तारुण्यातलं उमलणं होतं. दोघींच्याही वैवाहिक जीवनातले असंख्य क्षण, अनुभव, भलं-बुरं-आनंदाचं-दु:ख्खाचं सारं सारं सतत अगदी या संध्यापर्वातही कालपर्यंत शेअर केलं.

मैत्रीतली पारदर्शकता आपण सतत जपली.

तू अमेरिकेला गेलीस पण हे साता समुद्राचे अंतर सुद्धा आपल्यात मात्र अंतर पाडू शकले नाही.

अगदी परवा परवाच तू म्हणालीस, “तुझी आणि माझी मैत्री” हाच माझा खरा आनंदाचा ठेवा..!! “

अंजु, मी सुद्धा हेच म्हणेन. आपल्या या मैत्रीनेच आपल्याला घडवलं.

तुझी जीवनाबद्दलची सकारात्मकता, सदैव आनंदातच राहण्याची वृत्ती, एखाद्या गुलाबदाणीसारखा, गुलाबपाणी शिंपडणारा तुझा सहवास मला लाभला. मी किती भाग्यवान!!

झुंजार वृत्तीने तू या असाध्य व्याधीशी हसतमुखाने, स्वीकृत भावनेने लढत होतीस. कायम प्रसन्न राहिलीस. तुझा खिलाडुपणा, सारं काही सहज आणि आनंदाने विनातक्रार स्वीकारण्याचा तुझा स्वभाव शेवटच्या क्षणापर्यंत टिकून होता.

आजकाल तुझा, खूप दिवस फोन आला नाही, मेसेज आला नाही की काळीज धडधडायचं. तुला फोन करण्याचं धाडसही व्हायचं नाही. “नो न्यूज ईज अ गुड न्यूज” असं समजून शांत रहायचा मी प्रयत्न करायची. आणि मग एक दिवस तुझा फोन यायचा,

“मी अगदी बरी आहे. मस्त आहे. चिंता नको करुस. इतक्यात नाही जाणार. अगं! उरलेले दिवस फक्त आनंदच वेचणार. “

मग खूप गप्पा. काॅलेजचे दिवस. त्या टिंगल टवाळ्या, काही गंमतीदार लोकांच्या आठवणी आणि खूप काही. तेव्हां माझेही जडावलेले श्वास स्थिर व्हायचे. तू खूप चांगल्या मूडमध्ये होतीस.

म्हणालीस, “ऐक हं! तुला एक छान गाणं म्हणून दाखवते.. ” किती सुंदर, भावपूर्ण, मधुर आवाजात गायचीस!

ते सूर मी माझ्या मनात ठेवलेत.

अंजु, आता तुझे नसणे सोसणं कठीण असलं तरी मी ठरवलंय्, रडायचं नाही. तुझ्या आठवणीतच रमायचं मी ठरवलंय्. तुझ्या मैत्रीचं दान तू मला दिलंच आहेस. तू नसलीस तरी माझी झोळी रिकामी नाही.

शांता शेळकेंच्या शब्दात तूही हेच म्हणत असशील ना?

असेन मी नसेन मी

तरी असेल गीत हे

फुलाफुलात येथल्या

उद्या हसेल गीत हे…

बाय अंजु.. निजधामी या सुखी रहा.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डिकी… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆

श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ डिकी… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

प्रत्येक चार चाकी वाहनात सामान ठेवण्यासाठी छोटीशी जागा असते. त्या डिकीत आपण आपले सामान ठेवत असतो. चोखंदळ लोकं त्या डिकीची धारण क्षमता पाहून गाडीची निवड करीत असतात….!

समजा गाडीला डिकी नसती, तर मनुष्याला सामान मांडीवर ठेवून प्रवास करावा लागला असता, आणि तो सुखावह झाला असता…?

पहा कल्पना करून….

जीवनप्रवास आनंदाने करायचा असेल तर आपल्या मनावरील, मनातील, मनाच्या आजूबाजूचे ओझे ठेवायला एखादी डिकी शोधून ठेवायला हवी, नाही का?

© श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares