मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अभावातले ऐश्वर्य…!!! ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

अभावातले ऐश्वर्य…!!!  ☆ सुश्री शीला पतकी 

आज सकाळी नातीने विचारले “ आजी अभाव म्हणजे काय ग ?.. “ मला जरा कौतुकच वाटले. मराठी काही शब्द जाणून घेण्याची तिला इच्छा आहे, चांगली गोष्ट आहे.

मी तिला सांगितलं, “ अभाव म्हणजे एखादी गोष्ट नसणे.. गोष्टीची कमतरता.. त्याला अभाव म्हणतात. म्हणजे म्हणजे वाईटच की.. असं नाही ग. तुझ्यात दुर्गुणाचा अभाव आहे याचा अर्थ तुझ्याजवळ खूप चांगले गुण आहेत.. म्हणजे अभाव म्हणजे नसणे आणि त्या नसल्यामुळे खूप चांगल्या गोष्टीसुद्धा घडत असतात.. “ ती उड्या मारत निघून गेली आणि मी विचार करत राहिले….

आमच्या पिढीमध्ये तर किती अभाव होते. पण त्या अभावाने मला वाटतं आम्ही समृद्ध झालो. पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन खोल्यांची घरे, त्या दोन खोल्याच्या घरामध्ये सात आठ माणसे अगदी आरामात एकत्र राहत होतो. स्वयंपाक आणि बसण्याची खोली.. तीच झोपण्याची खोली.. तीच अभ्यासाची खोली.. तेच पाहुणेरावळे येऊन बसण्याची खोली. पण त्यामुळे सर्वांमध्ये सतत संवाद राहिला. वादही झाले पण संवाद होत राहिला, त्यामुळे जवळीक वाढली. त्या संवादातून काही खूप चांगल्या गोष्टी घडल्या. आठवणी राहिल्या, प्रेम वाढलं. आठ बाय आठच्या खोलीमध्ये सहा माणसांनी झोपणं.. मग त्यासाठी केलेली ती तडजोड, सकाळी लवकर उठणे.. या सगळ्या गोष्टींनी उलट एक समृद्धी दिली. जास्त वेळ झोपण्याची मुभाच नव्हती. सकाळी अंथरूण पांघरूण काढून त्या खोल्या पुन्हा बैठकीत सजवून ठेवायचे असायचं. बेडरूमचे पुन्हा स्वयंपाक घर व्हायचे. त्यामुळे गोष्टी वेळेत होत असत. सार्वजनिक बाथरूम अंघोळी पटापट सात-साडेसातपर्यंत आटपून जात असतात त्यामुळे धुणे नऊपर्यंत काठीवर जाणे, साडेदहाला जेवायला बसणे, शाळेला जाणे, आल्यावर अभ्यास करणे, मग शुभंकरोती पर्वचा, आठपर्यंत जेवण आणि नऊला पुन्हा झोपणे … त्यामुळे सर्वांना उत्तम आरोग्य लाभले. डॉक्टरकडे जायची वेळ फारशी आलीच नाही. अभावानेच एक चांगली जीवनशैली दिली आणि त्यामुळे निरामय आरोग्याचे वरदान लाभले.. !

लहानपणी पिझ्झा बर्गर हॉटेलला जाणे ह्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या. जे काही असेल ते घरी आणि मग या घरच्या स्वच्छ खाण्याने चणे फुटाणे, शेंगदाणे वाटाणे चिंच निवडून झाल्यानंतर चिंचुके चुलीत भाजून ते खाणे, आंब्याच्या कोईमधील पांढरा भाग भाजून तो खाल्ल्यामुळे कितीतरी कार्बोहायड्रेट किंवा त्यातील उपयुक्त रसायन पोटात गेली. कैरी चिंचा बोरे ही त्या त्या काळातली सहज उपलब्ध होणारी फळे … सोलापुरात तरी फळ नावाची गोष्ट म्हणजे फक्त केळी… आजारी माणसाला द्राक्ष मोसंबी संत्र्याचे दर्शन.. कलिंगड सीजनमध्ये दोन ते तीन वेळा आणलं जायचं. मग ते कलिंगड चंद्रकोरीप्रमाणे कापून एक एक फोड प्रत्येकाला मिळायची, ती पार बुडापर्यंत खायची. आज आता ते सांगतात की त्यातला पांढरा भाग फार उपयुक्त असतो. आम्ही तेव्हा तो खात होतो. त्यानंतर उरलेल्या काळ्या पाठी.. त्या धुऊन आमची आई त्याला मीठ हळद लावून उन्हात वाळवत असे आणि ते तळून त्यावर मीठ तिखट टाकले की उन्हाळ्यात ते खायला खूप सुंदर लागायचे. कोंड्याच्या पापड्या वाफेवरच्या पापड्या, पापडाचे पीठ.. त्याचे गोळे खाणे.. त्यामुळे उडदाचे पीठ पोटात जायचे. विविध डाळींचे सांडगे भाज्या म्हणून ते खाल्ले जायचे. बटाट्याचे घरी केलेले वेफर्स, बटाट्याचा कीस हे सगळं स्वच्छ मटेरियल असायचं. पैशाचा अभाव होताच पण हॉटेलात जाण्याची पद्धत नव्हती, त्यामुळे घरी करण्याचे पदार्थ यावर भर जास्त असायचा. लोणच्याच्या बरण्या भरून तयार असायच्या.. मुरंबे लोणची गुळांबा उन्हाळ्यातील पन्हे.. सब्जा घातलेले लिंबाचे सरबत.. याने पोटाला थंडावा मिळायचा. आतासारख्या थम्सअपच्या बाटल्या आणून पिणे हे त्या काळात नव्हतंच. आजच्या तुमच्या समृद्धीचा अभाव आम्हाला बळकट करून गेला. ताजे विटामिन मिळायचे. घरच्या दह्याचे सुंदर ताक.. लोणी काढल्यावर हातावर मिळणारा लोण्याचा तो गोळा.. आतासारखे ते पिवळट कागदातले लोणी नव्हते याला तुम्ही बटर म्हणतात.. अस्सल नवनीत आम्ही खाल्ले आहे.. शेवयाचे नूडल्स करता तुम्ही किंवा न्यूडल्स आणून यात मसाला घालून खाता.. आमच्याकडे शेवयाची मस्त अटीव दुधातली खीर पौष्टिक म्हणून ती उपयोगी पडेल किंवा पडली आहे. कधीकाळी डब्यात प्रिझर्वेटिव्हसह भरलेला श्रीखंड तुम्ही विकत आणता, मनाला आलं की बॉक्स आणायचा, फोडायचा आणि ताटात श्रीखंड… श्रीखंडासाठी दूध आटवून दही लावणे.. त्याचा चक्का आणि मग केशर बदाम पिस्ता घातलेले ते उत्तम श्रीखंड.. त्याची चव अप्रतिम असायची आणि शुद्ध सात्विक.. बाजारी मिळणाऱ्या श्रीखंडाच्या अभावामुळे आम्हाला घरचे सुंदर श्रीखंड खायला मिळाले. तशीच अटीव दुधाची निर्भेळ बासुंदी.. कधीतरी वडील हलवाई गल्लीत नेऊन आम्हाला बासुंदी खाऊ घालत असत, पण पुढे त्यात टीपकागद घालतात असे कळल्यापासून ते बंद झाले. आता सर्रास भेसळीशिवाय काही मिळतच नाही… बोर चिंचा पेरू गोन्या चीगुर याने आम्हाला कुठलंही विटामिन कमी पडू दिलं नाही. उंबराच्या झाडाची उंबरे फोडून किड्यांना बाहेर जाऊ देऊन झटकून झटकून खाण्यामुळे आमची इम्युनिटी वाढली. कच्ची उंबरे खाल्ल्याने आयुष्यभर पुरेल इतके पोटॅशियम मिळाले. सांजा, पुरणपोळी, सांज्याची पोळी या प्रकाराने भरपूर प्रमाणात गुळ पोटात गेल्याने लोहाची कमतरता भासली नाही. आमच्या पिढीत 90% लोकांचे हिमोग्लोबिन 12 /13 च्या पुढेच आहे. बळकट हाडे कणखर आहेत

मुख्य म्हणजे घरात सगळ्यांनी काम करण्याची पद्धत होती. प्रत्येक कामाला बाई नव्हती. पैशाचा अभाव होताच. प्रत्येकाने आपापली कामं करायची, शिवाय घरात वाटून दिलेली कामे करायची.. त्यामध्ये अगदी लहान असणाऱ्यांना कपबशा विसळण्यापासून काम असे… मैदानात खेळायला भरपूर जायचं.. बिन पैशाचे सगळे खेळ.. कुठलेही साहित्य कधी खेळायला लागले नाही. खेळणी विकत आणणे हा प्रकारच नव्हता असल्या गोष्टीवर घालायला पैसाच नव्हता. रद्दीतला कागदसुद्धा व्यवस्थित बांधून ठेवून तो रद्दीमध्ये घालणे आणि त्याचे पैसे करून त्यातून ग्रंथालयाची फी भरणे.. कारण उन्हाळ्यात आपण वाचनालय लावले तर पैसे आपणच या पद्धतीने जमा करावे लागत. पैशाच्या अभावाने कितीतरी गोष्टी आम्हाला शिकवल्या.. त्या वाचनातून आम्ही समृद्ध झालोत. रद्दीच्या वह्या वापरल्यामुळे कागदाची किंमत कळली.. प्रदूषणाला हातभार लावला नाही आम्ही. वापरा आणि फेकून द्या हा प्रकारच आमच्या वेळेला नव्हता त्यामुळे वस्तूंचा पुनर्वापर होत राहिला. प्लॅस्टिकची पिशवी कचऱ्यात गेली नाही. पुड्याला बांधून आलेले दोरे ते लगेच बंडल बांधून घरात एका विशिष्ट ठिकाणी ठेवले जाईल तेच दोरे हार तुरे बांधायला उपयोगी पडायचे. फाटलेल्या कपड्याच्या चौकटी शिवून त्याचे घरामध्ये पुसायला कापड व्हावयाचे. टिशू पेपरच्या नावाखाली भसाभसा कागद पुसून कचऱ्यात टाकणे हे आमच्या वेळेला नव्हतं. पायपुसणी वगैरे नव्हती.. अशाच कापडांचे मिळून एक जाड पाय पुसणे तयार व्हायचे आणि ते सुती असल्याने त्याच्यामध्ये पाणी शोषून घेतले जावयाचे. सोडा साबण घालून आठवड्यातनं फरशी स्वच्छ धुवायची.. कोणतेही डिटर्जंट लागलं नाही कारण तेव्हा ते नव्हतंच. अशा या अभावाच्या जमान्यात घरचं खाण्याची समृद्धी लाभली. उत्तम वाचन झाले. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे अवलोकन झाले. नाटक कीर्तन गायन नकला मेळे हे सर्व मनोरंजनाचे प्रकार मोफत उपलब्ध होते ज्याने आमचं आयुष्य समृद्ध केले. ऑनलाइन काही नव्हतं किंवा प्रत्यक्ष बाजारात जाऊन खरेदी करावी लागायची त्यामुळे शहाणपण आले, चतुराईने खरेदी करता आली. माणसांची संपर्क वाढला. काही जणांचा तर अगदी जन्मोजन्मीच्या ओळखी आणि दृढ संबंध निर्माण झाले.

त्या काळातल्या अभावाने सर्वार्थाने आम्हाला समृद्ध केले एवढे मात्र खरे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टीव्ही आणि मोबाईल नव्हते, ॲमेझॉन नव्हतं, ॲप नव्हते. बाप सांगेल ते मुकाट्याने ऐकायचं.. आईच्या चरणाची नतमस्तक व्हायचं.. आजी आजोबांच्या प्रेमात नाहून निघायचं.. भावंडाशी प्रसंगी भांडायचं आणि प्रेम करायचं…..

…. पैशाच्या अभावाने ही केवढी मोठी समृद्धी आम्हाला दिली.. अभावातले ऐश्वर्य लाभणारी आमची शेवटची पिढी … 

असो … ‘ कालाय तस्मैय नमः ‘

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनोरुग्णतेच्या दिशेने… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ मनोरुग्णतेच्या दिशेने… ☆ श्री संदीप काळे ☆

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारा माझा एक मित्र मराठवाड्यातील लातूर या जिल्हयात वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाला. तो मुंबईला असताना त्याची नेहमी भेट व्हायची. आता तो लातूरला गेल्यामुळे त्याची भेट दुर्लभ झाली आहे. म्हणून मी त्याला भेटण्यासाठी मुद्दाम लातूरला गेलो.

दुपारी डब्बा खात असताना तो एका व्यक्तीची ओळख करून देत मला म्हणाला, ‘हे राजीव कुलकर्णी, अमेरिकेत होते. अमेरिकेत त्यांनी भाडेतत्त्वावर जमीन घेऊन खूप वर्ष कसली. आता कुलकर्णी काही कारणास्तव लातूरमध्ये वापस आले आहेत. माझे जवळचे मित्र आहेत’.

मी कुलकर्णी यांना नमस्कार केला. बराच वेळ गप्पा मारल्यावर कुलकर्णी वरिष्ठ अधिकारी असलेल्या माझ्या मित्राला म्हणाले, ‘मी खूप अडचणींत आहे. त्यातून मार्ग कसा काढावा यासाठी मी येथे आलो आहे’.

ते वरिष्ठ अधिकारी मित्र म्हणाले, ‘बोला ना’.

माझ्याकडे बघत ते मित्र दबक्या आवाजात म्हणाले, ‘माझा मुलगा समर्थ आता आठवीला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो व्यसनाधीन झालाय. आम्ही अमेरिकेत खूप इलाज केले, पण उपयोग झाला नाही. म्हणून आम्ही अमेरिका सोडून पुन्हा गावी लातूरला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला’.

माझे अधिकारी मित्र त्यांना म्हणाले, ‘तो इतका व्यसनाच्या आहारी गेला, तेव्हा तुम्ही काय करत होतात?’

कुलकर्णी म्हणाले, ‘मी माझ्या शेती उपक्रमात होतो. माझी बायको यमुना नोकरी करायची. तो नाना प्रकारचे व्यसन करायचा. आम्हाला कळू न देता गोळ्या खायचा’.

कुलकर्णी त्यांच्या मुलाच्या व्यसनाधीनतेचे किस्से सांगत होते आणि आम्ही अवाक् होऊन ऐकत होतो. कुलकर्णी यांच्या आपबीतीने माझे हातपाय एकदम गळून गेले. आम्ही एकदम नि:शब्द झालो. सर्व सांगून झाल्यावर कुलकर्णी यांनी खिशातला रुमाल काढून आसवांनी डबडबलेले डोळे पुसले.

माझ्याकडे बघत माझा तो अधिकारी मित्र म्हणाला, ‘या स्वरूपाच्या तक्रारी माझ्याकडे दररोजच्या आहेत. आईवडीलांना मुलांकडे बघायलाही वेळ नाही, आणि सहज करता येतात म्हणून मुले व्यसनांचे अनेक प्रयोग करतात. ‘

अधिकारी मित्राने बेल वाजवून शिपायाला बोलवले. ते त्या शिपायाला म्हणाले, ‘जरा विजयकुमार यादव सर यांना फोन करून बोलावून घ्या’.

शिपाई गेला. कुलकर्णी यांनी सांगितले की अमेरिकेसह भारतातही पालकांच्या लाडामुळे, दुर्लक्षामुळे लहान लहान मुले खूप मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन झाली आहेत. अनेक मुले व्यसनाधीनतेच्या मार्गावर आहेत. नशील्या पदार्थांच्या सेवनाबरोबर मोबाईल, टीव्हीच्या अतिवापरामुळे अनेकांचा कसा सत्यानाश झाला. आज दहावीच्या आतमधली ३० टक्के मुले व्यसनाधीनतेच्या आहारी गेल्याचे कुलकर्णी आणि वरिष्ठ अधिकारी मित्राच्या बोलण्यातून समजले.

इतक्यात यादव सर आले. यादव सरांची ओळख करून देताना अधिकारी मित्राने सांगितले, ‘हे यादव सर. यांनी आजवर तब्बल दोन पिढ्यांना व्यसनाच्या खाईत जाण्यापासून वाचवले आहे. मी अनेक वेळा त्यांच्या व्यसनमुक्ती सेंटरला जाऊन आलो. मी अनेक माणसं त्यांच्याकडे पाठवली. यादव सरांनी अनेकांचे संसार वाचवण्याचे काम केले आहे. त्यांच्या कामाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ‘ वरिष्ठ अधिकारी मित्र आणि कुलकर्णी यांनी त्यांच्या मुलाची सर्व परिस्थिती यादव सरांना सांगितली.

यादव सर म्हणाले, ‘लहान मुलांच्या व्यसनाचा प्रकार खूप वाढलाय. बरं, या मुलांचे काय करायचे हा प्रश्न आहे. मोठ्या माणसांप्रमाणे त्यांना कोणत्याही व्यसनमुक्ती केंद्रात ठेवता येत नाही. लहान मुलांसाठी खूप कडक कायदे आहेत. त्यामुळे या लहान मुलांचं काहीही करता येत नाही. न्यायाधीश, जिल्हाधिकारी, समाज कल्याण अधिकारी, पोलीस अधिकारी या सगळ्यांनाच रोज त्यांच्याकडे येणाऱ्या लहान मुलांच्या व्यसनाधीनतेवर करायचे काय हा प्रश्न पडतो आहे. ‘

वरिष्ठ अधिकारी असलेले मित्र मला म्हणाले, ‘संदीपराव, तुम्ही एकदा जाऊन यादव सर करत असलेलं काम पाहून या. तुमच्या लक्षात येईल, त्यांचं काम किती मोठे आहे!’

अधिकारी मित्र यादव सरांविषयी भरभरून बोलत होते. मलाही यादव सर यांचे काम जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. कुलकर्णी यांना यादव सरांनी त्यांच्या मुलाला व्यसनाधीनतेतून बाहेर कसे काढायचे, याबाबत योग्य तो सल्ला दिला. त्या मुलांचे समुदेशन कसे करायचे, कोणते औषध द्यायचे हे सांगितले. मुलाला वेळ देणे, मुलावर खूप प्रेम करणे, त्यांना समजून घेणे किती गरजेचे आहे, हे यादव सर यांनी समजावून सांगितले. ‘तुम्हाला जर या मुलांना खरंच व्यसनातून बाहेर काढायचे असेल तर, तुम्हाला वैयक्तिक त्यांना वेळ द्यावा लागेल. तरच ती बाहेर येतील, अन्यथा येणार नाहीत. ‘

अधिकारी मित्र आणि कुलकर्णी हे दोघे बोलत बसले. मी उठलो आणि यादव सरांसोबत त्यांच्या आंबेजोगाई रोडवर असलेल्या व्यसनमुक्ती सेंटरमध्ये जाऊन पोहोचलो. दारू, गांजा अशा अनेक व्यसनांच्या आहारी गेलेल्या शेकडो लोकांचे तिथे इलाज केले जात होते.

लातूर मधलं हे व्यसनमुक्तीचं सेंटर कसं सुरू केलं? त्या एका सेंटरचे अनेक सेंटर कसे झाले? राज्यभरातले व्यसनमुक्तीचे यादव सरांचे काम भारतभर कसे पोहोचले? आणि आज एक दोन हजार नाही तर तब्बल साठ हजारांहून अधिक लोकांना व्यसनमुक्त कसे केले, याचा खूप मोठा इतिहास यादव सरांनी माझ्यासमोर ठेवला.

प्रचंड आत्मविश्वास, प्रत्येकाचे चांगले करायची भावना आणि माझा जन्म देण्यासाठीच झाला आहे, ही उदात्त भावना, यातून यादव सरांचे काम कुठलीही प्रसिध्दी न करता देशाच्या कानाकोपऱ्यांत पोहचले आहे.

डॉ. विजयकुमार यादव (9372346476) उच्चशिक्षित, मोठ्या घरात जन्मलेले, एका शिक्षकाचे सुपुत्र. तरुण वयामध्ये आजूबाजूला असलेली व्यसनाधीन मंडळी यामुळे व्यथित होऊन ‘मी आयुष्यभर लोकांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी कार्य करेन’, या निर्धाराने पेटून उठलेले यादव सर यांनी १९९९ला लातूरमध्ये ‘जीवनरेखा प्रतिष्ठान‘ नावाची एक संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून ‘जीवनरेखा व्यसनमुक्ती केंद्र’, ‘एकात्मिक व्यसनाधीनता पुनर्वसन केंद्र’ आणि ‘व्यसनमुक्तीचे पुनर्वसन केंद्र’ असे दोन सेंटर लातूरमध्ये सुरू केले. पैसे मिळोत वा न मिळोत, व्यसनग्रस्त माणसाला व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले.

जसजसं काम वाढत गेलं, तशी काही अंशी शासनाची मदतही मिळू लागली. पण शासनाच्या तुटपुंज्या मदतीवर काही भागेना. स्वतःच्या जवळचे जे काही होते ते सरांनी अनेक वेळा विकायला काढले, पण सेंटरच्या माध्यमातून चालत असलेले काम काही थांबू दिले नाही.

दारू, गांजा आणि वेगवेगळ्या रसायनांचे सेवन करून त्याच्या आहारी गेलेले, पेट्रोलचा वास घेणारे, व्हाइटनरपासून ते चप्पल पॉलिश करण्याच्या क्रिमला व्यसनाचे साधन बनवणारे असे अनेक महाभाग त्या व्यसनमुक्ती सेंटरमध्ये होते. कोणी दारूच्या व्यसनापायी वडिलांची होती नव्हती ती सगळी शेती विकली. कोणी दारूच्या व्यसनातून अनेक ठिकाणी चोरी केली. कुणाला दारूच्या व्यसनामुळे वेगवेगळे आजार झाले होते. गांजाच्या व्यसनामुळे अनेकांचे आयुष्य बरबाद झाले होते.

एक दोन नाही, हजार नाही, तर ६० हजार लोकांना व्यसनांच्या विळख्यातून यादव सर यांनी बाहेर काढले आहे. तिथं असणाऱ्या प्रत्येक माणसावर स्वतंत्र चारशे पानांचा ग्रंथ होऊ शकेल, इतकं व्यसनांमुळे त्यांचे आयुष्य खंगून गेले होते.

प्रत्येकाची करूण कहाणी ऐकून असं वाटत होतं की, या जगात प्रचंड आनंद आहे, पण तुम्हाला जर एखादं व्यसन जडलं तर ते व्यसन कॅन्सरपेक्षाही खतरनाक असतं, हे तिथल्या प्रत्येक माणसाच्या पाणावलेल्या डोळ्यांतील आसवांना पाहून जाणवत होते.

यादव सर त्यांच्या कामात व्यग्र झाले. एका केंद्रात असलेली एक व्यक्ती संपूर्ण ट्रीटमेंट घेऊन घरी निघाली होती. त्या व्यक्तीला निरोप देण्यासाठी सोबतचे अनेकजण गेटपर्यंत आले होते.

मी त्या माणसाला विचारले, “काय झाले? तुम्ही कुठले? आता सुटले का व्यसन?”

तो माणूस मला म्हणाला, “मी राजीव रस्तोगी. मी ट्रक डायव्हर होतो. मित्रांच्या संगतीने दारूच्या व्यसनात बुडालो. शेवटी ज्या मित्रांची दारू यादव सर यांच्या सेंटरमुळे सुटली, त्याच मित्रांनी मला पैसे गोळा करून इकडे पाठवले. आज निर्व्यसनी बनून एक नवे आयुष्य मी सुरू केले आहे. कपाळावर टिळा आणि गळ्यात माळ हे सारे काही केंद्रात मिळणाऱ्या शिकवणीतून शक्य झाले. माणूस कितीही श्रीमंत किंवा कितीही गरीब असो, तो एकदा व्यसनाच्या आहारी गेला की त्याच्या जगण्याला काहीही अर्थ उरत नाही. मला दोन मुली आहेत. त्या कधी मोठ्या झाल्या आणि कधी त्यांचे लग्न झाले, हे मला कळलेच नाही. दारूपायी आयुष्य कसे उध्वस्त झाले, हे समजलेच नाही”, असे म्हणत राजीव रडत होते. बाकी सर्व जण त्यांची समजूत काढत होते. राजीव गेले. त्यांना पाठवताना त्यांचे सर्व मित्र भावुक झाले होते. मी यादव सर यांच्याकडे निघालो.

यादव सर यांच्याकडे असताना एक व्यक्ती तिथल्या सर्वांना घेऊन समुपदेशनाचे धडे देत होती. त्याचे समुपदेशन ऐकत राहावे असेच होते. त्या सेंटरमध्ये औषधाशिवाय वाचन, चिंतन, मनन, कीर्तन, हे सारे काही होते.

मी यादव सर यांच्याकडे गेलो. समुपदेशन करणारे सरही तिथे आले. त्या सरांची ओळख करून देताना यादव सर म्हणाले, “हा माझा मुलगा कृष्णा यादव. सर्व कामं आता हाच पाहतो. “

अजून एका मुलीला यादव सरांनी जवळ बोलावले. तिची ओळख करून देत ते म्हणाले, “ही कान्होपात्रा नखाते. चंद्रपूरची आहे. पुण्याच्या दवाखान्यात अधिकारी आहे. आमच्याच नर्सिंग कॉलेजमध्ये शिकली आहे. नखाते यांच्यासारख्या १५० मुली दरवर्षी आमच्या कॉलेजमधून प्रशिक्षित होऊन बाहेर पडतात. आम्ही जो सेवाभाव ठेवून काम उभे केले आहे, त्या कामाला ह्या सर्व मुली हातभार लावतात. पाचवीच्या मुलांपासून ते ७५ वर्षांच्या व्यक्तीपर्यत सर्वांच्या व्यसनाचे प्रकार खूप वेगवेगळे आहेत. “

अतिशय चिंताग्रस्त चेहरा करून यादव सर म्हणाले, “एपीजे अब्दुल कलाम यांनी देशाला महासत्तेच्या दिशेने जाण्याचा कानमंत्र दिला खरा, पण प्रचंड प्रगती आणि सहजतेने, निष्काळजीपणाने आम्ही खूप गतीने मनोरुग्णतेच्या दिशेने वाटचाल करतोय. अनेक ठिकाणी हेच चित्र आहे”. यादव सर खूप तळमळीने बोलत होते आणि मी खूप हतबल होऊन ऐकत होतो.

यादव सरांचे काम समजून घेताना रात्रीचे अकरा कधी वाजले, ते कळलेच नाही. यादव सरांचा निरोप घेऊन मी परतीच्या मार्गाला लागलो. यादव सर, त्यांचे वडील रघुनाथ यादव, सरांची आई भगीरथबाई आणि आता तिसरी पिढी, म्हणजे यादव सरांचा मुलगा कृष्णा यादव हे सर्व कुटुंबीय सुरू केलेले काम खूप नेटाने पुढे नेत आहेत. समाजात बदल घडवून आणण्यासाठी असे अनेक यादव परिवार आपल्या आसपास आहेत, ज्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे, बरोबर ना? 

© श्री संदीप काळे

संस्थापक, व्हाईस ऑफ मेडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…खवय्येगिरी, पुणेकर…’ भाग-२६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी… खवय्येगिरी, पुणेकर…’ भाग-२६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

खवय्येगिरी, पुणेकर…

गणेशोत्सव बघायला बाहेर पडल्यावर दणकून चालल्यावर सणकून भूक लागायची. अर्ध शतकापूर्वी पुणेकरांनाही बाहेरचं खाण्याचा शौक होता, पण अर्थाजनाला मर्यादा असल्यामुळे पदार्थ घेण्याला आणि खाण्यालाही निर्बंध असायचा. आप्पा बळवन्त चौकातून पुढे गेल्यावर भडभुंजाची भट्टी लागते. आतल्या बाजूला सतत भट्टी रसरसलेली असायची. 1 की. ज्वारी तांदूळ घेऊन, आई, काकू तिथून लाह्या फोडून आणायच्या. लालबुंद झालेल्या मोठ्या कढईत वाळू टाकून त्यात जोंधळे टाकले की फटाफट चांदण्यासारख्या चांदणी आकाराच्या शुभ्र लाह्या उमलून यायच्या. एरवी कंटाळा करणारे आम्ही, इथे मात्र आवर्जून जायचो कारण वाळूच्या उबेतून बाहेर पडलेले गरमागरम चणे फुटाणे, लाह्यांचे प्रकार बोकणा भरून खाता येत होते ना! म्हणून तर ही धडपड. तर अशा भडभुंज्याकडे हारीनें लावलेली आमच्या बजेटमध्ये बसणारी, कोरडी भेळ घेऊन आम्ही गणपती बघायला बाहेर पडल्यावर, पायाबरोबर तोंडही चालायचे. आमच्या मोठ्या बहिणी, जातांना बरोबर वर्तमानपत्र घ्यायच्या. नाहीनाही! वाचायला नाही हो! भेळ पसरून खायला पेपर हवा ना, अहो! तेव्हा कुठे होत्या पेपर डिश ? एखाद्या ओट्यावर ठाण मांडून कागदावरच्या कोरड्या भेळेच्या दहा मिनिटात फडशा पाडत होतो आम्ही. भेळ वाल्याकडची सणसणीत मिरची खातांना डोळे पांढरे झाले तर, बरोबर घेतलेल्या प्रवासी फिरकीच्या तांब्यातलं पाणी एका दमात रिकामं व्हायचं. तेव्हां काही आता सारखा बिसलेरीचा शोध लागला नव्हता. आमचा आपला स्वच्छ, चकचकीत घासलेला फिरकीचा तांब्याच बरा होता. पुण्यात सगळे गणपती बघायला, अगदी अख्ख पुणं पालथं घातलं जायचं. खाऊ गल्लीतली कोपऱ्यावरची हॉटेलं आम्हाला खुणवायची हो! पण बजेट ? हॉटेल बिल बसायला हवं ना त्यात! मग काय भेळेवरच भागवून आम्ही पुढे सरकायचो.

टिळक रोडवरचं जीवन, बादशाही, फडतरे चौकातले स्वीट होम, सदाशिव पेठेजवळचं पेशवाई, दत्त उपाहारगृह, आनंद विलासची मिसळ, घावन, संतोष भुवनची पुरी भाजी आणि बेडेकरांची प्रसिद्ध मिसळ हे सारं सारं काही नजरेआड करून प्रभा विश्रांती गृहाकडे आमचे पाय वळायचे. कारण तिथला बटाटेवडा स्वस्त आणि मस्त असायचा. तो वडा मात्र आम्ही दणकून हादडायचो. कारण तो चवदार आणि फ्रॉकच्या खिशाला परवडेल असा म्हणजे फक्त चार आण्याला मिळायचा. चवीला चवदार चटणी असायचीचं वाढणाऱ्याला जरा मस्का मारला की दोन चमचे चटणी जास्तच मिळायची.

श्रीमंत पोरं मात्र केसांचा कोंबडा उडवत, बापाच्या पैशावर, सिगरेटचा धूर सोडत, इम्प्रेशन पाडायला पोरींना रीगल, गुडलक कॅफे, सनराइज, पुना कॉफी हाऊस, मध्ये स्पेशल ‘च्या’प्यायला घेऊन जायची. सोळाव्या वरीसातलं धोक्याचं पाऊल, या रेस्टॉरंट मध्येच घसरायचं. म्हणजे प्रेमात पडायचं. त्यावेळी ‘मेळे’ असायचे. गजानन वाटवे, जोस्ना भोळे यांचा कार्यक्रम ऐकण्याऐवजी, ‘केला इशारा जाता जाता ‘करण्यातच प्रियकर प्रेयसींचा वेळ जायचा. तिकडे चोरून बघत कानाडोळा करुन आम्ही आप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी परिसरात यायचो. पण घरी परततांना अचरबचर न खाण्याने, मन आणि पोट शांत असायचं.

जास्तीत जास्त पाच रुपये खर्च करणारे आम्ही, आजच्या पिढीला दोन, पाच हजार खर्च करून बिल देतांना बघतो नां, तेव्हां आम्ही अचंबित होतो. बाई गं! खाण्यावर हा केवढा खर्च?त्यांचेही बरोबर आहे म्हणा खाण्याचे दिवस आहेत त्यांचे. आणि मिळवतायेत पण ते तेवढे पैसे. माझ्या भावाला शरद आप्पाला आणि बहिणीला लीलाला कुलकर्णी भेळ फार आवडायचीनु. म. वि हायस्कूल कडे जातांना आनंदाश्रमाच्या अलीकडे छोट्याशा कोपऱ्यात श्री. कुलकर्णीनी आपला भेळेचा संसार मांडला होता. वाहनं चुकवत ओल्या वेळेचे बोकणे भरतांना भेळ खाणाऱ्यांची त्रेधा तिरपीट उडायची पण ती ‘हटके’ भेळ खायला लोकं सहाच्या आत धडपडत हजेरी लावायचीचं. कुलकर्णी भेळ, गोड आणि चविष्ट बनवायचे पण त्यांच्या जिभेवर मात्र तिखट होतं. त्यांचा काटेकोर नियमच होता, सहानंतर, भेळेच दुकान बंद होणार आहे. सहाच्या पुढे काटा गेल्यावर ते स्पष्ट सांगायचे, “वेळ संपली, आता तुम्ही निघा. उद्या भेटू. ” शिष्ठ वाटणारे हे कुलकर्णी मनाने उमदे होते. दुर्दैवाने माझा भाऊ स्वर्गवासी झाला. त्याची नेहमी तिथे हजेरी असायची. माझ्या वडिलांची काही उधारी तर राह्यली नाही ना?असं विचारायला नंतर माझा भाचा हेमंत त्यांच्याकडे गेला व वडील नसल्याची दुःखद बातमी त्यांनी कुलकर्णींना सांगितल्यावर ते ताडकन उठले, हेमंतला जवळ घेऊन सगळ्यांसमोर उभं करून म्हणाले, ” ह्याला म्हणतात संस्कार. शरद माजगावकरांनी कधीच उधारी ठेवली नाही. लोक उधारी बाकी ठेवतात, पैसे बुडवतात. तोंड लपवतात पण हा त्यांचा मुलगा वडिलांच्या पश्चात त्यांची उधारी राह्यली आहे का? हे विचारायला इथे आला आहे. अशी पितृऋण फेडणारी मुलं ह्या जगांत आहेत. मग तुम्ही सांगा! कोण म्हणतं आजची पिढी बेजबाबदार आहे म्हणून. सगळे गिऱ्हाईक कुलकर्णीच्या कौतुकाने भारावले. आणि माझ्या भाच्याकडे कौतुकाने बघायला लागले. अशी होती ती सुसंस्कारित त्यावेळीची पिढी. त्यांच्या संस्काराच्या पायावर आजच्या आदर्श पिढीची इमारत उभी आहे, नाही का! भेळवाल्या कुलकर्णींना आणि वाचकहो तुम्हालाही धन्यवाद.

– क्रमशः भाग २६   

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “आनंद शांततेतला…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “आनंद शांततेतला…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आम्ही मैत्रिणी दापोलीला ट्रीपला गेलो होतो. तिथे उंच सावळा तरतरीत असा शंकर आम्हाला गाईड म्हणून मदत करत होता. तो अत्यंत नम्र आणि शांत होता. तिथेच राहणारा असल्याने त्याला पूर्ण दापोली माहीत होते. दिवसभर तिथे हिंडलो. संध्याकाळी शंकरने सहजपणे विचारले,

” तुम्हाला डॉल्फिन बघायला आवडेल का?”

” इथे दिसतात?”

” हो… पण पहाटेच समुद्रात लांबवर जावे लागेल मग तुम्हाला डॉल्फिन दिसतील. “

“खरच.. का? आम्ही परत विचारले. “

“हो… मात्र अगदी सकाळी लवकरच निघूयात “

आम्ही” बरं ” म्हणालो. खुश झालो होतो.

शंकर यायच्या आत आम्ही सगळ्याजणी तयार होतो. भल्या पहाटे निघालो. तेव्हा समुद्रात मोठ्या लाटा येत होत्या. जोरात आवाज येत होता. समुद्र खवळला होता. ईतका की.. त्या आवाजाची भिती वाटत होती…

तो म्हणाला, ” जसं जसं पुढे जाऊ तसा समुद्र शांत होत जातो. काळजी करू नका. “

समुद्रात आतं आतं जायला लागलो. खरचं मग आवाज कमी कमी झाला. गाणी, गप्पा सुरू होत्या.

एका ठराविक ठिकाणी गेल्यावर त्याने बोट थांबवली. वरती निळं आभाळ आणि खाली निळाशार समुद्र… बाकी आसपास काहीही नव्हते.

तो म्हणाला…

“आता कोणी एक शब्दही बोलू नका. काही वेळातच तुम्हाला डॉल्फिन दिसायला लागतील.. “

क्षणातच शांतता पसरली एकदम निरव शांतता….

खरोखरच ती जाणवत होती अजून काही क्षण गेले…..

आसपासचे पाणी स्थीर झाले..

आणि अचानक समोरच पाण्यावर डॉल्फिन दिसायला लागले…

त्यांचा तो खेळ कितीतरी वेळ आम्ही पाहत होतो…

काहीतरी वेगळेच अनुभवायला मिळाले…

त्या अफाट समुद्रात चोहीकडे पाणी फक्त आमची बोट…..

आणि ते डॉल्फिन ते सुळकन् पाण्याच्या वर येत होते. नाचत होते. परत आत जात होते. त्याचे पाणी कारंजा सारखे ऊडत होते.

काही वेळेस शांतता असायची आणि परत त्यांचा खेळ सुरू होऊन तो रंगात यायचा…

सहज नैसर्गिक असं त्यांचं चालू असेल पण ते बघताना विलक्षण गंमत वाटत होती.

आम्ही त्यात रंगुन गेलो होतो…….

इथे डॉल्फिन बघायला मिळतील असे आम्हाला वाटलेच नव्हते. त्यामुळे अजूनच आनंद झाला होता.

“चला निघूया आता… “

असा शंकरचा आवाज आल्यावर आम्ही भानावर आलो.

कोणाला परत जावं अस वाटत नव्हतं.. पण बराच वेळ झाला होता निघणं भाग होतं..

येताना शंकरनी परत बोट थांबवली म्हणाला,

” तुम्हाला अजून एक गंमत दाखवतो खाली बघा”

आम्ही सगळ्याजणी खाली बघायला लागलो..

तिथे समुद्राचा तळ दिसत होता.. नितळ स्वच्छ…

रंगीबेरंगी दगड, वाळू, नाजूक असे शंख शिंपले… त्यातले छोटे छोटे रंगीबेरंगी मासे ईकडे तिकडे जात होते. त्यांचा अनुपम्य खेळ चालला होता..

स्तब्धच झालो…

खाली त्यांच अस एक जग होत…

अगदी भारावून गेलो होतो…

किती तरी वेळ बघत होतो..

विलक्षण गोड निरामय आनंद देणार असं ते होतं.

त्या शांततेतला आनंद आम्ही घेतला………

निसर्ग शिकवतो आपल्याला कोलाहाला पासून दूर दूर जायचे.

नि:शब्द शांत बसायचे…

मगच आतले ते अनाकलनीय गूढगर्भी….

कधी न जाणवलेले दिसते….

स्पंदने जाणवतात…

शब्दांची आवश्यकता नसते….

आज पहाटे शंकरची आठवण आली. त्यानी दाखवले म्हणून आम्ही ते पाहू शकलो त्याचा अर्थ समजून घेऊ शकलो. असे दाखवणारा शंकर भेटला… याचाही मला आनंद झाला. निघताना आम्ही त्याचे खूप कौतुक केले… त्याला दिलेले बक्षीस तो घेत पण नव्हता.. शांतपणे हसत होता.. आम्हीच त्याला बळजबरीने ते घ्यायला लावले…

मनात आलं तो अनुभव आपल्याला परत कसा बरं मिळेल…. विचार केल्यावर एक लक्षात आलं… त्यासाठी बाहेरच जायला हव अस नाही.. घरी पण शांत बसता येईल की… म्हटलं बघू प्रयोग करून…

शांतपणे बसले. मनात आलं आज आपल्याच अंतरंगातच जरा डोकावून बघू…

हळूहळू आत जायला लागले

मन शांत करत खोलवर गेले

होतं का ते पारदर्शी?

होतं का ते स्वच्छ?

लक्षात आलं ती जबाबदारी माझी बाहेरचं जग खूप बघून झालं आता पुरे…

अर्थात हे इतकं सोपं नाही आचरणात आणणं त्यातूनही अवघड..

पण लक्षात आलं..

ही वाटचाल करताना मार्गदर्शन करायला शिकवायला आपले संत आहेतच….

रामदास स्वामींची आठवण झाली…

” बैसोनी निवांत शुद्ध करा चित्त तया सुख अंतपार नाही येऊनी अंतरी राहील गोपाळ सायासाचे फळ बैसलीया”

ऋषीमुनी निसर्गाच्या एकांतात जाऊन तप का करत असतं याचा थोडासा उलगडा झाला…

प्रयत्न करत राहू…

कधी न बघितलेले डॉल्फिन आम्हाला बघायला मिळाले….

इथेही असंच काहीतरी आनंदाच गवसेल…

माहित नसलेलही काही समजेल… ही श्रद्धा ठेवूनच प्रयत्न करायचा फळ देणारा तो आहेच…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

पुणे

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फोनकाका…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? मनमंजुषेतून ?

☆ फोनकाका…☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

” फोनकाका…. “

“ नमस्कार, बोला… “

फोनकाका कधीच ‘हॅलो’ म्हणायचे नाहीत. त्यांचं फोनवरचं बोलणं ‘ नमस्कार ‘ म्हणतच सुरू व्हायचं.

मला फार आवडायचं ते.

फोनकाकांचं खरं नाव मधूकाका दांडेकर. ते आता आठवावं लागतं. कारण, आमची आख्खी बिल्डींग,

त्यांना ‘फोनकाका’ म्हणूनच ओळखायची. ओनरशीपच्या ऊमेदीच्या काळातली आमची बिल्डींग.

अवतीभवती भरपूर रिकामी जागा. सगळी मध्यमवर्गीय घरं. कुठल्यातरी वाड्यातून नाहीतर चाळीतून इथं आलेली… इथला ‘फ्लॅट’ घेताना ‘फ्लॅट’ झालेली साधी माणसं.

आपली मूळ अघळपघळ संस्कृती न विसरलेली. खाजगीपणाचा संसर्गजन्य रोग इथं पसरला नव्हता.

सगळ्या फ्लॅट्सची दारं सताड उघडी असायची. पंचवीस तीस पोरांचा धुडगूस सतत चालायचा.

दांडेकरांचं घर तेवढं उच्चभ्रू वाटायचं. बाकी कुठल्याही फ्लॅटमधे न दिसणारी एक वस्तू… अनमोल, अलौकिक… ती मधुकाकांच्या घरी होती. काळा कुळकुळीत फोन. कोकिळेने कुहू कुहू करावं, तसा ट्रिंग ट्रिंग वाजायचा.

लहान असताना मला, श्रीमंतीची भारी भारी स्वप्न पडायची. स्वप्नात मी मोठ्ठा माणूस झालेला असायचो.

मला गाडी, बंगला काहीही दिसायचं नाही. दिसायचा तो फक्त, पुढच्या खोलीत ठेवलेला फोन.

खरंच, फोन असणं मोठेपणाचं लक्षण असायचं तेव्हा. फोनकाकांचं पेठेत मोठ्ठं किराणामालाचं दुकान.

घरी आणि दुकानात दोन्हीकडे फोन. सकाळी सकाळी फोनकाकांचे पुण्यामुंबैला ट्रंककाॅल चालायचे.

ट्रंककाॅल म्हणजे गावजेवण. भावांच्या चढऊतारानुसार फोनकाकांचा आवाज फिरायचा.

आम्ही खाली खेळत असायचो. सगळं ऐकू यायचं. आम्ही तालासुरात फोनकाकांच्या आवाजाची नक्कल करायचो.. अगदी फोनकाकांची चिलूसुद्धा. फोनकाका कधीही रागवायचे नाहीत. खिडकीतून खाली बघत आपल्या सफरचंदी गालातल्या गालात हसायचे.

एकदा गंमतच झाली. आम्ही खाली खेळत होतो. खेळता खेळता माझी फोनकाकांची नक्कल चालूच होती… 

” नमस्कार, बोला… “.. मी फाॅर्ममधे.

एकदम फोनकाकांची हाक. ” कौत्या, वर ये जरा.. “.. चिडका आवाज. माझी तंतरली. मी घाबरत घाबरत वर..

‘ बस… एक फोन येईल आता. माझ्या सासूचा. माझ्या आवाजात बोलायचं.

‘ सध्या दुकानात दिवाळीची गडबड आहे. डिसेंबरात येवू.. ‘.. असं सांगायचं.. “

मी डिट्टो फोनकाकांसारखं बोललो… फोनकाका खूष. मूठभर काजूचा प्रसाद घेवून खाली पळालो.

संध्याकाळी मातोश्रींनी पाठीचा पाटा-वरवंटा केला.

” मेल्या, काय मिळवलंस असा आवाज काढून? दीड वर्ष झालं, चिलूची आई माहेरी गेली नाहीये.

मधुभाऊजींचा आवाज काढून, नाही जमणार म्हणालास, थांब तुझ्या कानात फोनची ट्रिंग ट्रिंग वाजवते. “

नंतर खरंच चार दिवस माझ्या कानात ट्रिंग ट्रिंग ऐकू यायचं.

 

एरवी फोनकाकांचं घर म्हणजे चावडी. सतत कुणीतरी बसलेलं असायचं. स्वयंपाकघरात चहाचं आधण सदैव ठेवलेलं. कुणाचा तरी फोन आलेला. कुणाचा तरी यायचा असायचा. फोनकाकांच्या घरानं कधी तक्रार केली नाही. घरचं कार्य असल्यासारखं फोनकाका निरोप द्यायचे.

कधीतरी बाबांचा फोन यायचा. फोनकाकांची हाक ऐकू यायची.

” भार्गवा कर्दनकाळ बोलावतोय रे… “.. कर्दनकाळ म्हणजे बाबांचे बाॅस. बाबा पळत पळत फोनकाकांकडे.

 

बिल्डिंगमधील कित्येक पोरींच्या लग्नाचा होकार फोनकाकांकडनंच समजायचा.

मला अजूनही आठवतंय. वैशूताईचे बाबा फोनकाकांकडे बसलेले. रात्री आठची वेळ. ते फोनकडे डोळे लावून बसलेले. तिकडून पसंती यायची होती.

फोन वाजला. फोनकाकांनी घेतला. काही न बोलताच ठेवून दिला.

” आप्पा, योग नाहीये रे.. ” वैशूताईचे बाबा डोळे पुसत घरी गेले.

मी बिल्डींगभर सांगत सुटलो.

” मी वैशूताईच्या बाबांना रडताना बघितलंय. “

तेव्हा काही नाही वाटलं. आता आठवलं की स्वतःचीच लाज वाटते.

महिनाभरानंतरची गोष्ट. मी वैशूताईकडे बसलेलो. फोनकाका धावत धावत आले… 

” आप्पा, नशीब काढलं पोरीनं. वहिनी साखर आणा आधी. आपली वैशू पसंत आहे त्यांना. आत्ताच नवऱ्या मुलाच्या काकाचा फोन आला होता. ” एवढं बोलून फोनकाकांचे डोळे वहायला लागले.

मला कळलंच नाही… ‘ एवढी मोठी माणसं आम्हा लहान मुलांसारखी, सारखी रडतात काय ?’

एकदा रात्री पावणेबारा वाजता आमचं दार वाजलं. बाहेर फोनकाका. मी जागा झालो.

हलक्या आवाजात बाबांशी काहीतरी बोलले. बाबांच्या डोळ्यात पाणी. फोनकाकांनी बाबांच्या हातात, एक खाकी पुडकं दिलं. आई तर रडायलाच लागली. फोनकाका बाबांना घेवून स्टॅन्डवर गेले. मी तसाच झोपलो.

दुसऱ्या दिवशी कळलं. गावाकडनं फोन आला होता. माझी आजी सिरीयस होती. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायचं होतं. फोनकाकांनी दहा हजार रुपये आणून दिलेले. बाबा नको नको म्हणत होते.

फोनकाकांनी ऐकलंच नाही. फोनकाका म्हणजे, फोनबाप्पा वाटायचे आम्हाला.

हळूहळू आम्ही मोठे झालो. काॅलेजात जायला लागलो. एके दिवशी सकाळी फोनकाकांनी बोलावलं.

” कौत्या, ही पमा कोण ?” मी जीभ चावली.

” काल रात्री फोन आला होता तिचा. तुला मुद्दामहून बोलावलं नाही. तुझा बाप होता ना घरात. बस इथं फोनजवळ. साडेसातची वेळ दिलीय तिला. आवाजावरनं चांगली वाटत्येय पोर. बघ, काही जमतंय का ?”

आयुष्यात मी पहिल्यांदा लाजलो.

.. जमलं. पमाशीच जमलं माझं. आधी आमचे गुपचूप फोन. मग दोन्ही व्हीलन बापांची समजूत.

साखरपुडा… लग्न… हनीमूनला गेल्यानंतर घरी केलेला फोन… सगळी फोनकाकांची कृपा.

एवढंच काय, मृण्मयीचा जन्म झाल्याची बातमी सुद्धा पहिल्यांदा फोनकाकांनाच समजली.

मृण्मयीचा जन्म झाला त्याचवर्षी फोनकाकांच्या चिलूचं लग्न झालं. चिलूशिवाय जगणं फोनकाकांना फार जड गेलं.

याच काळात बिल्डींगीत फोनची संख्या वाढली. घरटी फोन आला. फोनकाकांचं काम संपलं.

आता तर… पंधरा वर्ष झाली बिल्डींग सोडून. मृण्मयी दहावी झाली यंदा. तिला काल नवीन सेलफोन घेवून दिला.

” बाबा, पहिला फोन मी तुला करणार. “.. गॅलरीतनं तिनं फोन लावला.

मी उचलला.

” नमस्कार, बोला…. ” एकदम जीभ चावली. कधी सवय लागली, कुणास ठाऊक ? एकदम फोनकाकांची आठवण आली.

‘ते काही नाही. उद्या रविवार आहे. भेटून येवू यात. सगळेच जाऊ यात… ‘

ठरलं तर.

फोनकाकांचा नंबर पाठ होताच. मी डायल केला. पलीकडनं कापरा आवाज आला.

” नमस्कार, बोला…. “

माझ्या डोळ्यातून पाणी.

‘ एवढी मोठी माणसं लहान मुलांसारखी रडतात कशी ? ‘

– – तेव्हा नव्हतं कळलं.

पण आता कळलं – – 

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काय काय विसरलो… कवी – अज्ञात ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ काय काय विसरलो… कवी – अज्ञात ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स, चिअर्स म्हणून 

ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो,

पण जेवणापूर्वी ‘वदनी कवळ’ आणि 

श्रीरामाचे नाव घ्यायला विसरलो ll१ll

*

वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक,

फ्रुटपंच प्यायला शिकलो,

पण आपोष्णी घ्यायला विसरलो,

सार-सुधारस विसरलो ll२ll

*

चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून,

तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो,

पण शेवयाची खीर 

आवडीने खायला विसरलो ll३ll

*

हाताने वरण भात, ताक भात 

कालवून खायची लाज वाटू लागली,

आणि काट्या चमच्याने पुलाव्याची शिते गोळा करून 

तोंडात घालायला शिकलो ll ४ll

*

पाव भाजीवर अमूलचा 

जाड लगदा घालायला शिकलो,

पण गरम वरण भातावरची 

तुपाची धार विसरलो ll५ll 

*

पुलाव, बिर्याणी, फ़्राईड राइस,

जिरा राइस खायला शिकलो,

पण मसाले भात, वांगी भात म्हणजे काय.. ?? 

ह्या नातवंडांच्या प्रश्नाना उत्तर देताना पार अडखळलो ll६ll

*

पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर 

ताव मारायला कधीच विसरलो

आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम,

टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो ll७ll

*

दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे 

तुकडे करून खायला शिकलो,

पण आईने शिकवलेले,

एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार मात्र विसरलो ll८ll

*

सँलड या भपकेदार नावाने 

झाडपाला खायला शिकलो,

पण कोशिंबीर, चटणी,

रायते आणि पंचामृत खायचे विसरलो ll९ll

*

इटालिअन पिझ्झा, पास्ताची अन 

तेलात लोळणाऱ्या पंजाबी भाज्यांची चटक लागली,

आणि आळूचे फतफते पातळ भाजी,

भरली वांगी अन् बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली ll१०ll

*

मठ्ठा, ताक, सार आता आवडेनासे झाले 

आणि फ्रेश लेमन ज्यूस,

सोडा किंवा लस्सी का नाही. ?? 

म्हणून विचारू लागलो ll११ll

*

साखर भात, गव्हाची खीर, लापशी 

इतिहास जमा कधीच झाली अन 

स्वीट, स्वीट म्हणून आईस्क्रीम 

स्लाईसची गुलामी स्वीकारली ll१२ll

*

मसाल्याचे वास हातावर तसेच ठेवून,

पेपर नँपकीनने हात, तोंड पुसायला शिकलो 

पण पाण्याने खळखळून 

तोंड धुवायला मात्र साफ विसरलो ll१३ll

*

फॉरवर्ड झालो फॉरवर्ड झालो म्हणून जगाला दाखवताना 

स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, निसर्गदत्त भारतीय संस्कृतीला (जाणुन बुजुन) विसरलो…

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… कविता आणि मी- भाग – ४० ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… कविता आणि मी – भाग – ४० ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

कविता आणि मी

कळत नकळत आपल्या जीवनाची जडणघडण होत असताना कुणाकुणाच्या आपल्या आयुष्यातील जागा ठळकपणे ठरत जातात. आपले कुटुंबीय, आपले गुरुजन, आपले सखे सोबती, अफाट निसर्ग, इतकेच नव्हे तर आपले प्रतिस्पर्धी, विरोधक यांना सुद्धा आपल्या जीवनात कोणते ना कोणते स्थान असतेच.

माझेही जीवन यापेक्षा वेगळे नाही. पण जेव्हा जेव्हा मी सखोलपणे माझ्या वर्तमान आणि गतायुष्याचा विचार करते तेव्हा मला जाणवतं की मला आयुष्यात खूप काही मिळालं ते भाषिक साहित्यातून. कथा, कादंबऱ्या, कविता, चरित्रं, ललित साहित्याचा हात धरूनच मी वाढले आणि गद्य आयुष्य जगत असताना पद्यांनी माझ्या भोवती सदैव एक हिरवळ जपून ठेवली.

या माझ्या जीवनात कवितांचे स्थान काय याचा विचार करत असताना मनात आलं ही कविता तर माझ्यासोबत जन्मानंतरच नव्हे तर जन्मापूर्वीही होतीच की! मातेच्या उदरात वाढत असताना

। ये ग ये ग विठाबाई।

। दहीभाताची उंडी घालीन तुझ्या तोंडी।

।कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम।

।हले हा नंदाघरी पाळणा।

किंवा 

।कन्हैया बजाव बजाव मुरली। अशी अनेक गाणी माझ्या आईने तिच्या उदरात वाढणाऱ्या गर्भाला गोंजारून म्हटलीच असणार आणि ते नाद ते शब्द माझ्यात, गर्भात असतानाच झिरपले नाही का?

त्याच माझ्या मातेने मांडीवर थोपटतनिज निज रे लडिवाळा” किंवा ये ग गाई गोठ्यामध्ये बाळाला दूध दे वाटीमध्ये” “आडगूळ मडगूळ सोन्याचं कडगुळं” अशी कितीतरी बडबड गीतं गाऊन मला जोजवलं, वाढवलं.

“ उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले डोळे तरी मिटलेले अजूनही”

असेच म्हणत मला झोपेतून जागं केलं. त्यावेळच्या या बाल कवितेने जीवनातला केवढा तरी मोठा आशय नंतर दाखवलाही.

जेवू घालताना तिने

“ चांदोमामा चांदोमामा भागलास का?” म्हणत माझ्या मुखी अमृततुल्य वरण भाताचे घास भरवले.

कधी रडले, कधी रुसले तर,

रुसु बाई रुसु कोपऱ्यात बसू तिकडून आला बाई कोणीतरी खुदकन हसू” शिवायलहान माझी बाहुली मोठी तिची सावली”

“ पाऊस आला मोठ्ठा पैसा झाला खोटा”

“ ये ग ये ग सरी माझे मडके भरी” अशा अनेक गीतांनी माझं बालपण बहरलं. मला सदैव हसवलं, आनंदी ठेवलं आणि संस्कारितही केलं.

केव्हातरी रात्र उलटून गेली… बालपण सरलं पण कवितांनी कधीच सोबत सोडली नाही. त्यावेळी अंकुरलेल्या कोवळ्या प्रीतीच्या भावना जाणवणारे उद्गार मीही कागदावर उतरवले असतील. त्या कविता मात्र फक्त माझ्या आणि माझ्या अंतर्मनात घुमणारी स्पंदने होती.

त्यावेळी 

“जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पाहते” या काव्य शब्दांनी माझ्याही मनातली अव्यक्त, अनामिक हुरहुर जाणवून दिली होती.

आयुष्याचे कितीतरी टप्पे ओलांडले. तळपत्या उन्हात रस्त्यावरचे वृक्ष जसे सावली देतात ना तशी शितल छाया मला केशवसुत, पाडगावकर, विंदा, बोरकर, ग्रेस, वसंत बापट, शांताबाई, बहिणाबाई, इंदिरा संत आणि कितीतरी…. यांच्या कवितांनी दिली.

विमनस्कपणे स्वपदे उचलीत

रस्त्यातुन मी होतो हिंडत 

एका खिडकीतून सूर तदा पडले 

दिड दा दिड दा दिड दा…

केशवसुतांच्या या सतारीच्या बोलांनी तर कित्येक वेळा माझ्या आयुष्यात दाटलेला काळोख दूर केलेला आहे.

“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा

पाठीवर हात ठेवून नुसते लढ म्हणा.. ”

या काव्यांने तर जादूच केली म्हणा ना! सकारात्मक जीवन जगण्यासाठी जणूं काही मजबूत दरवाजे उघडून दिले..

झाकळूनी जळ गोड काळीमा पसरे

लाटांवर

पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर 

किंवा 

हिरवे हिरवे गार गालिचे 

हरित तृणांच्या मखमलीचे 

त्या सुंदर मखमाली वरती 

फुलराणी खेळत होती…

बालकवींच्या या कवितांनी तर निसर्गाशी मैत्रीच घडवली. वृक्षवेलींशी संवाद साधला.

“लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते”

या बहिणाबाईंच्या रसाळ काव्यपंक्तींतून तर जीवनातल्या तत्त्वज्ञानाचे कोडे अगदी सहजपणे सोडवले. काळ्या मातीशी नातं जोडलं.

कवी ग्रेस संपूर्णपणे नाही उमगले. पण

“ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता

मेघात अडकली किरणे हा सूर्य सोडवत होता…”

या ओळींनी मन अक्षरशः घनव्याकुळ झाले.

हा रस्ता अटळ आहे 

अन्नाशिवाय कपड्याशिवाय 

ज्ञानाशिवाय मानाशिवाय

कुडकुडणारे हे जीव 

पाहू नको, डोळे शिव!

नको पाहू जिणे भकास

ऐन रात्री होतील भास 

छातीमध्ये अडेल श्वास

विसर यांना, दाब कढ

माझ्या मना बन दगड…

विंदांनी तर खिळे ठोकावे तसे शब्द आणि विचार मनावर अक्षरशः ठोकले. आणि दमदारपणे जगण्याची कणखर प्रेरणा दिली.

“माझी मैना गावाकडे राहिली

माझ्या जीवाची होतीया काहिली” शाहीर अण्णाभाऊंच्या या कवितांनी तर अनेक वेदनांना उघडं केलं.

“होऊ दे जरा उशीर सोडतोस काय धीर रात संपता पहाट होई रे पुन्हा

देवाक काळजी रे माझ्या देवाक काळजी रे …

गुरु ठाकूर यांचे हे गीत खरोखरच मनातले अंधारलेले कप्पे क्षणात उजळून टाकतात. आधार देतात.

अशा कितीतरी कविता …

आयुष्यात उचललेल्या प्रत्येक पावला सोबत येत गेल्या. कविता माझ्या जीवनात सदैव सावली सारख्या सोबत असतात.

“तेरी आवाज मे कोई ना आये

तो फिर चल अकेला रे,

यदि सभी मुख मोड रहे सब डरा करे 

तब डरे बिना ओ तू मुक्तकंठ

अपनी बात बोल अकेला रे

तेरे आवाज पे कोई ना आये तो फिर चल अकेला रे 

रवींद्रनाथ टागोरांच्या या कवितेने जीवन वाटेवरचे काटे अगदी सहजपणे वेचायला शिकवले, नव्हे त्या काट्यांनाच बोथट केले.

कवितांचे आपल्या जीवनात स्थान काय याविषयी काही भाष्य करताना मी वर्ड्सवर्थच्याच शब्दात म्हणेन

FOR OFT WHEN ON MY COUCH I LIE

IN VACCANT OR IN PENSIVE MOOD 

THEY FLASH UPON THAT INWARD EYE

WHICH IS THE BLISS OF MY SOLITUDE

AND THEN MY HEART WITH PLEASURE FILLS

AND DANCES WITH THE DAFFODILS….

जेव्हां मी एकटी असते, उदास लेटलेली असते तेव्हां खरोखरच —रेताड, रुक्ष वाळवंटात ठिकठिकाणी उगवलेली सोनेरी डॅफोडील ची फुले जशी मनाला प्रसन्न करतात तसं कवितांनी माझं मन टवटवीत ठेवलं.

अंगणात प्राजक्ताचा सडा बरसावा तसे कवितांनी माझ्या आयुष्यात आनंदाचे शिंपण केले.

कवितांच्या अथांग सागराने माझी जीवन नौका डुबु दिली नाही. तिला पैल तीरावर सांभाळून नेले.

जोडीदाराच्या हातात हात घालून पैल तीर गाठतानाही सुहास पंडितांच्या या काव्यपंक्तीच मनावर रेंगाळतात.

धकाधकीच्या जीवनातले 

क्षण शांतीचे वेचून घेऊ 

तुडुंब भरले कुंभ सुखाचे

हासत पुढच्या हाती देऊ

खूप जाहले खपणे आता

जपणे आता परस्परांना

खूप जाहला प्रवास आता

गाठू विश्रांतीचा पार जुना….

मातीतून मातीकडे जाताना, मातीत पेरलेल्या या महान कवींच्या कवितांनी आयुष्यभर दीपस्तंभा सारखी सोबत केली. बेडा पार किया..

– क्रमश: भाग ४०

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जागतिक हास्य दिवस – ४ मे २५” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

??

☆ “जागतिक हास्य दिवस – ४ मे २५” ☆ श्री सुधीर करंदीकर

आज मे महिन्याचा पहिला रविवार. काय खासियत असते याची सांगा बरं !

सकाळी सकाळी कॉलेज मैत्रीण छाया हिचा फोन आला – अरे आज काय खास आहे, ते विसरला का ? दरवर्षी तुझा या दिवशी मला पहिला फोन असतो आणि आपण जोरदार हसत सुटतो.

मी : विसरलो मुळीच नाही. मी तुला फोन करणार एवढ्यात शाळेतल्या एका मैत्रिणीचा जागतिक हास्य दिन म्हणून फोन आला. मग बराच वेळ आमचे हसणे आणि बोलणे सुरू होते. तो फोन संपला आणि मी तुला फोन लावणार तेवढ्यात तुझा फोन आला.

छाया : ठीक आहे. पण पुढच्या वर्षी पहिला फोन आणि पहिलं बोलणं माझ्याशीच झालं पाहिजे. चलो, let us start laughing.
आणि आमचे हसणे आणि गप्पा सुरू झाल्या …..

मंडळी, जागतिक हास्य दिवस म्हणून एकच दिवस न हसता, आपण रोजच काहीतरी कारण शोधून, निमित्त शोधून, हसायलाच पाहिजे.

असं म्हणतात –

  • life is worth living as long as there is laugh in it
  • a day without laughter is a day wasted
  • laughter is a good for health and it is one of the best medicines in the world

एवढे सगळे फायदे असूनही लोक हसत नाहीत, यावर मुंबईचे डॉक्टर कटारिया यांनी १९९८ साली एक सोपा तोडगा काढला. आणि तो म्हणजे दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिवस साजरा करायचा. त्यांनी असा विचार केला की एक दिवस सगळ्यांनीच हसल्यामुळे सगळ्यांना त्यामध्ये मिळणारा आनंद समजेल आणि लोक हळूहळू रोजच हसायला लागतील. जगामधल्या जवळजवळ ७० देशांमध्ये याच दिवशी हास्य दिन साजरा केला जातो.

हसण्यामुळे —

  • मनावरचा ताण कमी होतो
  • आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते
  • हार्ट अटॅक चा धोका कमी होतो
  • चेहऱ्यावर चमक येते आणि आणखीन एक खूप छान महत्त्वाचा फायदा म्हणजे – smile is a spiritual perfume you spray on others.

आता तुम्ही म्हणाल – नुसत्या हसण्यामुळे एवढे फायदे होतात तरी कसे ?

मेडिकल सायन्स याचे उत्तर देते ते असे –

आपण हसायला लागलो की आपल्या मेंदू मधून डोपामाईन, सेरोटीनीन, ऑक्सीटोसिन हे फील गुड हार्मोन्स रिलीज होतात आणि त्यामुळे मन प्रसन्न होते.

तसेच हसण्यामुळे मेंदू मधून एंडोर्फिन्स हे हार्मोन्स पण रिलीज होतात, आणि हे नॅचरल पेन किलर चे काम करतात. त्यामुळे स्ट्रेस कमी होते.

हे विचार जर पटले तर कोणीही हे पॅकेज एक दिवस घेऊन थांबणार नाही, हे नक्की. 

आणि हे फ्री पॅकेज रोजच मिळवण्याकरता सगळीच मंडळी रोजच हसणार हे पण तेवढेच नक्की.

काही जणांकडून एक प्रश्न असाही येऊ शकतो, कि – आजकाल घरामध्ये काय, किंवा ऑफिसमध्ये काय, किंवा मित्रांबरोबर काय, जेवढ्यास तेवढे बोलणे / कामापुरते बोलणे, एवढेच होत असते. अघळपघळ गप्पा आणि हसणे, हे कधीच होत नाही. नेपोलियन यांच्या डिक्शनरी मधून जसा त्यांनी अशक्य शब्द बाद केला होता, तसाच आपल्या डिक्शनरी मधून हसणे हा शब्द बाद होत चालला आहे आणि त्यामुळे हसायला कारणच मिळत नाही, तर काय करू?

यावर पण सोपे उत्तर आहे, ते असे –

विनोद ऐकून हसता येतं (युट्युब, फेसबुक वगैरेंची  मदत सहजपणे मिळू शकते), विनोदी वाचन करून हसता येतं, विनोदी सिनेमा बघून हसता येतं, लहान मुलांशी खेळताना हसता येतं, मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारताना मनसोक्त हसता येतं (माझं रोजचं भरपूर हसणं याच माध्यमातून होत असतं), माझी तीन पुस्तके “म्हैस” आणि “काही आहे का ? काही आहे का?” आणि “हसती खेळती बायको“ ही ॲमेझॉन वर प्रकाशित झाली आहेत. त्यातल्या गोष्टी वाचून भरपूर हसता येईल. मला फोन करा आणि ही पुस्तके ॲमेझॉन कडून कुरियरने तुमच्या घरी दोन दिवसांमध्ये हजर होतील.

आणि अगदीच नाही तर आरशामध्ये स्वतःकडे बघून पण हसता येतं. आणि ते पण जमत नसेल तर मला फोन करा,आपण भरपूर हसू.

काही जणांना आपण हसल्यामुळे आपले पिवळे दात दिसतील, अशी भीती वाटणे साहजिक आहे, कारण  “हसतील त्याचे पिवळे पिवळे दात दिसतील” ही म्हण लगेच त्यांच्या मनात येणार. या कारणाकरता डिस्टर्ब होण्याचं काहीच कारण नाही.

मी लिहिलेला “चूळा भरूया आणि निरोगी राहूया” हा लेख जरूर वाचा, आणि त्यामध्ये डॉक्टरांनी सुचवले आहे त्याप्रमाणे चूळा भरा, म्हणजे दात दाखवायची भीती तर वाटणार नाहीच, उलट हसून आपले स्वच्छ दात दाखवावेत असे वाटेल.

चला तर मग, आता कुठलेही कारण न शोधता,                   

start 1….2…3.. &   4

हा हा हा हा

हा हा हा हा हा हा

हा हा हा हा हा हा हा             

हा हा हा . . . . . .

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ त्या दिवशी पहलगामला मी असते तर काय केलं असतं?- लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ त्या दिवशी पहलगामला मी असते तर काय केलं असतं?- लेखिका : सुश्री शेफाली वैद्य ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे 

पहलगामच्या हिंदूंना टारगेट करणाऱ्या इस्लामी दहशतवादी हल्ल्यामुळे गेले काही दिवस प्रचंड अस्वस्थ आहे. त्यातच काल रात्री मला स्वप्न पडलं—

पहलगामच्या त्या हिरव्यागार कुरणात मी उभी आहे आणि ती थंडगार बंदुकीची नळी माझ्या चेहऱ्यावर रोखलेली आहे. नळीच्या पलीकडे आहेत क्रूर, थिजलेले, थंड डोळे, कमालीच्या द्वेषाने भरलेले.

मी घामाघूम होऊन जागी झाले, पहाटेचे दोन वाजले होते. छातीत अजून धडधडत होतं, मनात एकच प्रश्न घोळत होता — 

खरंच जर माझ्यासोबत असं काही घडलं असतं, तर मी काय केलं असतं? 

मी जर त्या दिवशी, त्या वेळी पहलगामला असते तर मी काय केलं असतं? 

जीव वाचवण्यासाठी मी माझी बिंदी काढून फेकली असती का?

माझा विश्वास, माझी श्रद्धा त्यागून मी कलमा उच्चारला असता का? ज्यांनी असं केलं त्यांना मी मुळीच दोष देत नाही. आपण साधी माणसे आहोत, सैनिक नाही. मृत्यूला धीरोदात्तपणे सामोरं जायला आपल्याला कोणीच शिकवलेलं नाही आणि जीव जायची भीती ही एक अतिशय प्रबळ नैसर्गिक भावना आहे.

त्या दिवशी पहलगामला मी तशी वागले असते का की कधीतरी मृत्यू येणारच आहे, आणि मी काहीही केलं तरी त्या इस्लामी हैवानांसाठी मी काफीरच आहे आणि मी काहीही बोलले तरी ते मला मारून टाकणारच आहेत हे जाणवून मी शक्य तितक्या धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरी गेले असते? 

किंवा — सगळ्यात वाईट — काय करावं हे न उमजून मी थिजून गेले असते का? भीतीने माझी मनगटं आणि मेंदू एकदम गोठून गेला असता का?

त्या दिवशी पहलगामला मी असते तर काय केलं असतं?

प्रामाणिकपणे सांगायचं तर, ह्या प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही.

मला आशा आहे की असं काही दुर्दैवाने माझ्या बाबतीत घडलंच असतं तर देशासाठी एकविसाव्या वर्षी हातात शस्त्रे घेणाऱ्या माझ्या स्वातंत्र्यसेनानी वडिलांची मी लेक ठरेन, त्यांचा वारसा मी खाली पडू देणार नाही. मरायच्या आधी प्रतिकारासाठी एक दगड तरी उचलायचा मी प्रयत्न करेन.

 पण ही फक्त माझी आशा आहे

जेव्हा आपण आपल्याच उबदार बिछान्यात सुरक्षीत झोपलेलो असतो आणि येणारा आवाज ही फक्त पंख्याची घरघर असते, गोळीबाराचा आवाज नाही, तेव्हा शौर्याच्या वल्गना करणं फार सोपं असतं.

सत्य हे आहे — की आपल्यापैकी कोणालाही नक्की माहिती नाही की आपण त्या दिवशी, त्या जागी असतो तर त्या क्षणाला कसे वागलो असतो.

धैर्य हा एक असा स्नायू आहे —जो संकटाच्या क्षणी वापरायची वेळ येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीवही होत नाही.

त्या दिवशी पहलगामला मी असते तर काय केलं असतं हे मी नक्की सांगू शकत नाही पण एक गोष्ट मात्र मी नक्की सांगू शकते.

आपण हिंदू एक समाज म्हणून फार काळ ह्या खोट्या समजुतीत जगतो आहोत की आपल्या बाबतीत हे कधीच घडणार नाही. धर्म की जीवन ह्यांपैकी एकच गोष्ट आपल्याला कधीच निवडावी लागणार नाही. आपल्याला माहिती आहे की भारतातल्या लाखो-करोडो हिंदूंना कधी ना कधी हा निर्णय घ्यावा लागला होता, कधी बंदुकीच्या भीतीने, कधी तलवारीच्या, कधी बलात्काराच्या.

आपण इतिहास वाचलाय, पण आपण सोईस्करपणे तो विसरून जातो कारण सत्य कटू असतं. म्हणून आपण आपल्या डोळ्यांवर धर्मनिरपेक्षतेची पट्टी बांधतो आणि सर्वधर्मसमभावाची अफूची गोळी घेऊन निवांत जगत असतो, अशी एखादी घटना घडेपर्यंत.

धर्म की जीव हा निर्णय हिंदूंना घ्यावा लागणं हे एक जिवंत, जळतं विदारक सत्य आहे. हा आपला इतिहास आहे, वर्तमान आहे आणि नीट डोळे उघडून पाहीलंत तर भविष्य तर आहेच आहे.

हे सत्य पहलगाममध्ये मृत्यू पावलेल्या त्या २६ लोकांच्या कुटुंबांसाठी वास्तव आहे.

हे त्या नवविवाहित मुलीचं सत्य आहे जिने फक्त पाच दिवसांच्या अंतरामध्ये ज्या अग्नीला साक्षी ठेवून ज्याच्याशी विवाह केला, त्याच अग्नीच्या चीतेमध्ये त्याचे पार्थिव जळताना पाहिले.

हे वास्तव त्या लहान मुलाचं सत्य आहे — ज्याने आपल्या वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलंय, इस्लामी दहशतवाद्यांनी त्यांची पॅंट उतरवलेल्या अवस्थेत.

हे सत्य उद्या तुमचं-माझंही वास्तव होऊ शकतं. कुठेही, कधीही, केव्हाही.

हे काळीज विदीर्ण करणारं वास्तव कोणताही हॅशटॅग, कोणताही मेणबत्ती मोर्चा, कोणतीही शांतता परिषद, कोणतेही सेक्यूलरिजमचे प्रदर्शन मिटवू शकणार नाही.

आणि कृपया भ्रमात राहू नका —

आपल्या शत्रूला सेक्युलरीजमशी काहीही घेणंदेणं नाही. ‘अमन का तमाशा’ मध्येही त्यांना काही स्वारस्य नाही.

त्यांच्यासाठी आपण फक्त ‘काफिर’ आहोत.

एक लक्ष्य. एक बळी. जन्नत मध्ये जायचा एक परवाना.

बस. इतकीच त्यांच्या लेखी आपली किंमत.

आपण कितीही गोंडस शब्द वापरले, कितीही भाईचारा च्या घोषणा दिल्या तरी हे वास्तव बदलणार नाही, कारण आपण त्यांना भाई मानलं तरी त्यांच्यालेखी आपण चाराच आहोत.

खूप काळ आपण भित्रेपणाला ‘सहिष्णुता’, आणि दुर्बलतेला ‘शांती‘ म्हणून गोंजारत राहिलो आहोत. आपल्याला वाटतं की आपण शांतीपूर्ण सहअस्तित्वाच्या घोषणा दिल्या, तर आपल्याला काही होणार नाही.

हा आपला गैरसमज आहे.

त्या दिवशी पहलगामला मी असते तर काय केलं असतं ह्या प्रश्नाला ह्या घडीला माझ्याकडे उत्तर नाही. पण मला निदान हा प्रश्न तरी पडलाय.

तुम्ही हे कधी स्वतःला विचारलंत का?

कधी माझ्यावर अशी दुर्दैवी वेळ आलीच तर मी आई दुर्गेकडे प्रार्थना करते की जेव्हा तो क्षण येईल — (आणि तो येणारच आहे, आज नाही तरी अजून तीसेक वर्षांनी) — तेव्हा मला मान ताठ ठेवून मृत्यूला उघड्या डोळ्यांनी सामोरं जाण्याचं सामर्थ्य मिळो, प्रतिकार करण्याचे मनगटात बळ मिळो.

ज्या शूर हिंदू पूर्वजांच्या प्रतिकारामुळे मी आज हिंदू नाव लावतेय त्यांच्या उष्ण रक्ताची उकळी माझ्याही नसांमधून अशीच वाहो.

मरायचंच असेल तर गांडूळ म्हणून नाही, तर फणा काढणारा नाग म्हणून मृत्यू येवो! 

#NeverForgetPahalgam #NeverForgetNeverForgive #उद्या_ते_तुमच्यासोबत_होऊ_शकते

लेखिका : सुश्री शेफाली वैद्य 

प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “चिमणी… !!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “चिमणी… !!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एक होती चिमणी, नाजुक… छान ! हिचे आईवडिल लहानपणीच वारले. बहिण भाऊ कुणीच नाही…,

कालांतराने एका चिमण्याबरोबर तीचं लग्न लागलं. दोघांनी मिळुन काडी काडी जमवुन एक घरटं बांधलं…. काटकसरीनं का होईना चिमणा – चिमणीचा सुखानं संसार चालु होता.

चिमणा रोज दाणा पाणी मिळवण्यासाठी दिवसभर फिरुन कष्ट करायचा…. चिमणी मागं घरटं सांभाळायची…. !

ठिक ठाक चाललं होतं…

चिमणा चिमणीला तसं पाहिलं तर कुणीच नव्हतं… ना नात्यातलं ना गोत्यातलं… चिमण्याला चिमणीचा…. अन् चिमणीला चिमण्याचाच काय तो आधार…!

दोघांनाही खूप वाटायचं… आपल्या घरात पण एक छोटं पिल्लु असावं… दोघांव्यतिरिक्त कुणी आणखी तिसरं असावं… त्याच्या इवल्याशा चोचीत घास भरवावेत… चिवचिवाट करुन पिल्लानं घरटं डोक्यावर घ्यावं… आणि आपण ते डोळे भरुन पहावं… पण… पण… का कोण जाणे, त्यांची ही इच्छा कधीच पुर्ण झाली नाही… या एकाच गोष्टीची खंत दोघांनाही आयुष्यभर छळत राहिली… जाळत राहिली… विशेषतः चिमणीला जास्त… !

दिवस सरत होते… चिमणी मनातुन कुढत होती, आयुष्यात कुणीच सख्खं उरलं नव्हतं… किमान स्वतःचं पिल्लू तरी असावं एवढीच माफक अपेक्षा… पण ती ही पुर्ण होत नव्हती… चिमणा खुप समजावून सांगायचा चिमणीला… पण उपयोग नसायचा…

दिवस पुढे पुढे पळत होते, या दोघांनाही मागं टाकुन…

एव्हढ्या मोठ्या रानात आजुबाजुला इतर घरटी पण होती… पण सगळ्या गर्दित हे दोघे मात्र एकटेच…

उमेदीचं वय निघुन गेलं… जाताना भेट म्हणुन म्हातारपण देवुन गेलं… एकटेच जगा असा निःशब्द शाप देवुन गेलं… !

चिमणा आता थकला होता म्हातारपणामुळं, आणि चिमणीही… !

चिमण्याला आताशा काही काम होत नव्हतं… पंख थकले होते… पायात त्राण नव्हतं… मिळेल त्यात भागवत, एकमेकांना सावरत, एकमेकांना आवरत दोघंही जगण्याची लढाई लढत होते… न हरता… !

एके दिवशी चिमणा अन्न शोधायला बाहेर निघाला घरट्यातुन… जातांना चिमणीला त्या दिवशी आवर्जून म्हणाला… काळजी घे स्वतःची… म्हातारी चिमणी मनातुन चरकली… म्हणाली, आज असं काय बोलताय ? चिमणा तीचा हात हातात घेवुन म्हणाला, आयुष्यात कधीच काही देवु शकलो नाही तुला… सुखसमृद्धी तर नाहीच नाही… पण एक पिल्लु ही तुझ्या पदरात टाकु शकलो नाही मी….. माफ कर मला… करशील ना… ?

चिमण्याला हुंदका आवरेना… घराबाहेर पडवेना… चिमणी हळुच जवळ आली, तीने वृद्ध चिमण्याचा हात हातात घेतला, म्हणाली… “ पदर रिकामा कुठंय माझा… ? तुमच्या प्रेमानंच पदर माझा काठोकाठ भरलाय हे काय कमी आहे ? आयुष्यभर साथ दिलीत, पडले तर हात दिलात… मी संपुर्ण सुखी आहे, आनंदी आहे, समाधानी आहे…” 

….. यानंतर घरट्यातुन कितीतरी वेळ चिमणा चिमणीचे हुंदके ऐकु येत होते… बोलत कुणीच नव्हतं, पण हजार शब्दांना जे जमणार नाही ते एका हुंदक्यात साठलं होतं… एकमेकांच्या अश्रुत दोघांचेही म्हातारे पंख भिजुन गेले… !

खुप वेळानं, चिमणी हातातुन हात सोडवत, पदर हातात घेवुन म्हणाली, “ आता फक्त अजुन एकच दान या पदरात टाका…. मला कधीच एकटीला टाकुन कुठं जावु नका… शेवटपर्यंत…. मरेपर्यंत सौभाग्यवती म्हणुनच मला राहु द्या… द्याल ना हे दान मला ? बोला ना, गप्प का… ?”

चिमण्यानं निष्प्राण डोळ्यांनी चिमणीकडे पाहिलं, तिच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर चिमण्याकडं नव्हतं….

आपला सुरकुतलेला थरथरता हात त्यानं चिमणीच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाला… सुखी रहा…. !!!

चिमणी सुखावली, म्हणाली, “ तुम्ही सोबत असाल, यातच माझं सुख आहे, तुम्ही सोबत रहाल ना कायम?” 

….. चिमणीच्या प्रश्नाला उत्तर द्यायला चिमणा होताच कुठं… ? चिमणा केव्हाच भुर्र उडुन गेला… परत कधीही न येण्यासाठी…

चिमणी टाहो फोडुन चिमण्याला प्रश्न विचारत राहिली…. हातात हात घेवुन तो परत येईल या आशेनं मूक हुंदके देत राहीली…. पण चिमणा त्यादिवशी चिमणीला एकटीला सोडुन गेला तो गेलाच… परत आलाच नाही… ! आता चिमणी ख-या अर्थानं एकटी पडली…

रानातले “डोमकावळे” आता जागे झाले… या कावळ्यांनी एकट्या पडलेल्या म्हाताऱ्या चिमणीला टोचा मारायला सुरुवात केली… त्यांना तिचं काडीकाडीनं बनवलेलं घरटं हवं होतं…

चिमणी या डोमकावळ्यांशी आधी लढली… मग रडली आणि नंतर कोलमडली… !

निगरगट्ट “काळ्या” कावळ्यांनी तिला घरातून हुसकुन लावलं…. चिमणीचा एकुलता एक आधार… तिचं घरटं, ते ही गेलं…. आता चिमणी आली रस्त्यावर…

कुणाच्याही अंगणात पडलेले दाणे चोचीत घ्यायचे… त्या दिवसाचं पोट भरायचं… जागा मिळेल तिथे अंग टाकायचं… भोगलेल्या यातनाच इतक्या भयंकर की शरीर निगरगट्ट झालेलं,… उन वारा पाउस कशा कशानंही त्रास व्हायचा नाही…. मन तर त्याहुन बधीर… सुख आणि दुःख दोन्ही सारखंच…. !

दुस-याच्या अंगणात दाणे वेचतांना कुणी हुसकुन लावायचं, कुणी शिव्याशाप द्यायचं…. कुणी दगड मारायचं तर कुणी टोमणे…. दगडापेक्षा हे टोमणेच लागायचे जास्त…. पण करणार काय, भुकेला “लाज” नसते… !

चिमणी आभाळाकडं बघायची… चिमण्याच्या आठवणीनं धो धो रडायची… पण तिचे डोळे पुसायला वेळ होताच कुणाकडं… ?.. आणि म्हणुन देवाकडं रोज रोज मरणाचं दान मागत बसायची….

जग चालविणारा जो कुणी असेल, तो या अशा शापित चिमण्यांना जन्माला का घालतो ?

माणसानं आस्तिक असावं की नास्तिक ? मला वाटतं, माणसानं याहीपेक्षा वास्तविक असावं….. !

…… तर, ही चिमणी एक दिवस माझे मित्र श्री. भापकर, नगरसेवक तथा स्थायी समिती अध्यक्ष खडकी यांना दिसली….

पंख तुटलेल्या असहाय चिमणीला पाहुन, पहाडासारख्या या कणखर माणसाला पाझर फुटला,…

त्यांनी मला फोन केला, डाॕक्टर पंख तुटलेल्या या माऊलीला पंख द्यायचे आहेत…. बघा काहीतरी……. एवढं बोलुन फोन कट्…. पुढचं बहुतेक बोलूच शकले नसावेत ते…. !

मी या जर्जर चिमणीला भेटलो…. शून्य नजर, भकास चेहरा आणि मेलेलं मन…. ती काही बोलेचना…

तिच्या वेदनांवर माझ्याकडं कुठलंही औषध नव्हतं,.. डाॕक्टर असण्याची लाज वाटली मला…!

कशीबशी जेमतेम माहिती कळल्यानंतर, मला तिची दुखरी नस जाणवली आणि मी ती बरोब्बर पकडली….

हातात हात घेवुन मी तो जादुचा शब्द वापरला….. ” आई…. “! 

तिचा चेहरा झरझर बदलला…. ती अविश्वासाने पाहु लागली…. त्यात कौतुक होतं, प्रेम होतं, माया होती….

‘आई’ या एकाच शब्दानं जादू केली…. इतकं फास्ट काम करणारं जगातलं दुसरं औषध मला माहिती नाही…

.. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हटलं, “ आई, आजपासून तु माझी आई, इथुन पुढची तुझी सर्व जबाबदारी माझी…. मला पोरगा म्हणुन स्विकारशील…. ?”

…. आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी झुरली, ती गोष्ट अचानक पुढं आल्यावर ती भांबावली…. तिचा विश्वास बसेना…. शब्द सुचेना….. त्… त्… प्… प्…. करायला लागली…. मला तिची ही अवस्था बघवेना…. मी सरळ तिला माझ्या छातीशी धरलं…. !

यानंतर जे घडलं… ते इथं शब्दांत मांडण्यास मी असमर्थ आहे…. पण पहायला साक्षीदार म्हणुन कोसळणारा पाउस होता आणि सोबत आमचे हुंदकेही….

सहज आभाळाकडं लक्ष गेलं…. एक पक्षी आमच्या डोक्यावरुन घिरट्या मारत होता…. हा त्या आजीचा चिमणा तर नसावा… ? माय लेकरांची भेट पाहणारा…. मूल हवंय म्हणत तडफडून गेलेला….. अतृप्त आत्मा तर नसावा… ?.. माहित नाही….

या वृद्ध चिमणीला आता स्वतंत्र आणि स्वतःचा आसरा देणार आहे….

एका वृद्धाश्रमात या माऊलीची सोय करणार आहोत….

इथून पुढं कुणाच्याही अंगणात आता ही माऊली जाणार नाही भिक मागत… सन्मानानं जगेल….

या माऊलीस अत्यंत सन्मानानं कारमधुन या वृद्धाश्रमात घेवुन जात आहे…. !

शुक्रवारी पुन्हा भेटण्याचं आश्वासन देऊन मी निघालो…. मागुन हाक आली, “ बेटा, तु इतकं करतोयस माझ्यासाठी…. मी तुला काय देवू ?”

मी म्हटलं “ तू आई माझी…. पोरगा म्हणून स्विकार केलास माझा… याहुन मोठं मला काहीच नाही…. !”

ती म्हणाली, “ काय तरी घे…”

म्हटलं, “ काय देशील आता ?”

म्हणाली, “ तू माग…. ”

म्हटलं, “ तुझे पंख दे…. ”

“ अरे बेटा, तुटलेत हे पंख, तुझ्या कामाचे नाहीत ते…”

म्हटलं, “ माझे नवीन पंख तु घे, तुझे जुने पंख मला दे…. ज्या पंखांनी तुला इथवर आणलं, त्याची किंमत खुप आहे माझ्यासाठी…. या पंखांवरती मी जग जिंकेन…. !”

“ तुटलेल्या पंखांनी जग कसा जिंकशील ? “ तिचा भाबडा प्रश्न… !

म्हटलं, “ आज तुझा मुलगा म्हणुन नवीनच जन्म झालाय माझा…. तूच माझी आई आणि तूच माझं जग…. ! 

आता दुस-या कुठल्याही जगाला जिंकायची गरजच नाही मला…. ! “

… “ अरे बेटा “.. म्हणत ती पुन्हा माझ्या गळ्यात पडली आणि मी त्या जुन्या तुटलेल्या पंखांवरुन हात फिरवत राहिलो…. कितीतरी वेळ…. !

पाऊस पुन्हा पुन्हा पडतच होता… कितीतरी वेळ… !!! 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares