मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रियुनियन .. भाग  1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ रियुनियन .. भाग  1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

लंडनच्या इस्ट एंड ला केबल स्ट्रीट वर असलेले ते शंभरी पार केलेले रेस्टोरेन्ट कम बार. नाव होते ‘पॉल्ज लाउंज’. तसा हा लंडनचा लो-मार्केट असलेला भाग. जास्त करून लंडनचा कामगार वर्ग व मध्यम वर्ग यांनी व्यापलेला. तिथे हे रेस्टॉरंट गेली ११० वर्षे अव्याहतपणे चालू कसे राहिले हेच खरेतर आश्चर्य होते. 

साहजिकच होते. इस्ट एंडचे बहुतेक सारे जुने  पब, बार व रेस्टॉरंट जाउन आता त्यांच्या जागा केएफसी, मँकडोनल्ड्स, पिझ्झा एक्सप्रेस, स्टारबक्स यासारख्या विदेशी मल्टीनैशनल कंपन्यांच्या आउटलेट्सनी घेतली होती. हे रेस्टॉरंट मात्र शतक पूर्तीनंतरही अद्याप टिकून होते.

आज या रेस्टॉरंट चे एक टेबल दुपारच्या बारा वाजता रिझर्व होते. ते ज्यांच्यासाठी आरक्षित होते ते एकेकजण बाराच्या आसपास  येउ लागणार होते. 

रिचर्ड टैक्सी मधून आला. एका हातात एक मोठी कैरी बैग व दुस-या हातात काठी टेकत तो रेस्टॉरंट मधे शिरला. रेस्टॉरंट चा हेड वेटरने समोर येउन त्यांचे स्वागत केले. 

त्याने आदराने रिचर्डला विचारले. 

‘माफ करा…आपण 65 इयर्स रियुनीयन साठी आले आहात का?’ 

‘होय..अगदी बरोबर. माझे मित्र आधीच आलेत का?’ त्याने उत्सुकतेने विचारले. 

क्रमशः….

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पितृपक्ष …भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ पितृपक्ष  …भाग 3 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे 

( जे वातावरण कर्णिक वकीलांनी मृत्युपत्र वाचल्यावर बदलले होते ते पूर्ववत हसते खिदळते झाले)  इथून पुढे —-

जे काही आपण करतोय ते तात्यांच्या मनाविरूद्ध होत आहे हे  संदेशला कळत होते. तात्यांनी  सांगितले होते लग्न कर.  पण  ते आता तरी पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभा असलेल्या संदेशला योग्य वाटत नव्हते, नाही त्याला ते पटतच नव्हते. आत्ता तात्या गेले. आता जरा उसंत घेऊन त्याला स्वतःचे आयुष्य जगायचे होते. तात्या असताना त्याचा दिवस रात्र तात्यांसाठीच जात होता. आता कुठच्याही बंधनात संदेशला अडकायचे नव्हते. तसा  त्याचा आयुष्याकडे बघायचा  दृष्टीकोन वेगळा आहे. त्याला त्याच्या आयुष्याच्या कॅनव्हासवर रंगांची उधळण करायचीच नाही. त्याला फक्त नी फक्त निसर्गाच्या जवळ जायचे आहे– ते पण एकटे. कोणाच्याही साथी शिवाय. तो आणि निसर्ग , बस अजून कोणीही त्याला नको आहे. आता हे सगळे शक्य आहे.  पण त्यासाठी तात्या गेल्यावरही  त्यांचे मन मोडायला लागणार होते आणि त्याचाच त्याला त्रास होत होता. 

अशातच आता पितृपक्ष आला आणि तात्यांच्या तिथीला जेवणाचे ताट ठेवायची वेळ परत आली. आज ही तेराव्याला घडले तेच घडत होते. पानातील प्रत्येक पदार्थ तात्यांना आवडणारा ठेवला होता तरीही कावळे काही पानाला शिवत नव्हते. 

——-” काव, काव …….,काव, काव,काव ” संदेश कावळ्यांना बोलावून कंटाळला होता. आजूबाजूला कावळे दिसत होते पण पानाजवळ काही येत नव्हते. ह्याचा आत्ताच सोक्षमोक्ष लावायचा असं ठरवून संदेश ठेवलेल्या पानाच्या जवळ गेला. डोळे मिटले आणि संदेशने मनातून तात्यांचा स्मरण केले आणि मनातच बोलायला लागला, नाही जरा अधिकारवाणीनेच बोलायला लागला. ” तात्या, ज्या दिवशी तुम्ही माझ्या लग्नाविषयी बोललात तेंव्हाच मी तुम्हांला सांगितले होते की  ते शक्य नाही. तुम्ही जोपर्यंत होतात तो पर्यंत तुमच्या सगळ्या इच्छा मी पुऱ्या केल्या. तुम्हाला काही कमी पडू नये ह्या साठी मी कायम प्रयत्नशील असायचो. माझे ऐन उमेदीतले दिवस मी तुमच्यासाठी, तुम्हाला काही कमी पडू नये म्हणून दिले.  तुमच्या आजारपणात तुमच्या सोबतीने काढले. तुमचा मुलगा म्हणून ते माझे कर्तव्यच होते आणि तुम्ही जिवंत असेपर्यंत मी ते व्यवस्थित निभावले.  पण आता तुम्ही गेल्यावरही  माझ्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी असे अडून राहिला असाल तर ते शक्य नाही.  मी तुमचं ऐकणार नाही. तुम्ही जिवंत असेपर्यंत तुमच्या प्रत्येक भावनांचा, तुमच्या विचारांचा मी मान राखला.  पण आता ते शक्य नाही. मी लग्न करणार नाही. अजून एक गोष्ट– प्रॉपर्टीची. माझ्यासारख्या एकट्या माणसाला तुमच्या सगळ्या फिक्स डिपॉझिट आणि नावावरच्या जागेची खरंच गरज नाही. त्यापेक्षा मला माझ्या बहीण -भावांबरोबर असलेले संबंध चांगले ठेवण्यात इंटरेस्ट आहे. अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना आणि मुख्यतः पैसा, यामुळे आमची नाती बिघडू शकतात. तात्या मला आता आनंदी राहायचं आहे. स्वार्थ आणि मोठेपणा सोडून मला फक्त नी फक्त आनंद द्यायचा आहे आणि आनंद घ्यायचा आहे. ह्यासाठी तुमचे मन मोडले तरी चालेल. आता मी  तुमचे ऐकणार नाही. आत्ता जर ठेवलेल्या पानाला कावळा शिवला नाही, तर ह्यापुढे कधीही तुमच्या तिथीला मी तुमच्यासाठी पान ठेवणार नाही. मला क्षमा करा. जमल्यास मला माफ करा. “

——-एवढे बोलून संदेश मागे फिरला. दहा पावलं चालून गच्चीच्या दरवाज्यापर्यंत पोहचला. गच्चीतून तो खाली पायऱ्या उतरणार तेवढ्यात त्याने मागे वळून बघितले. कावळा ठेवलेल्या पानाला शिवला होता. कावळ्याच्या चोचीत जिलेबी होती. तात्यांनी संदेशला माफ केले होते. संदेश खुश झाला होता—–आता दरवर्षी पितृपक्षात संदेशला तात्यांसाठी पान ठेवायला लागणार होते.

समाप्त

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पितृपक्ष …भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ पितृपक्ष  …भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे 

(तसे मी माझा मित्र कर्णिक वकिलाकडे माझे मृत्युपत्र बनवून ठेवले आहे.) इथून पुढे —- 

संदेशने तात्यांना मध्येच थांबवत बोलायला सुरवात केली. ” काय तात्या, अहो मी आता पन्नाशीला  आलोय. आता काय माझ्या मागे लागता. माझे लग्नाचे वय गेले आणि हो तुम्ही अशी निर्वाणीची भाषा करू नका. तुम्हांला काहीही होणार नाही. पुढच्या दोन तीन दिवसात तुम्ही बरे होणार आहात. आजच डॉक्टरांशी मी बोललो.  त्यांनीच सांगितले की कालचे सगळे रिपोर्ट खूप चांगले आले आहेत. तुम्हाला ह्या आठवड्यात हास्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार आहे.”. तात्या गालातल्या गालात नुसते हसले. 

तीन दिवसांनी तात्या परलोकवासी झाले. एक आठवडा संदेश घरात होता. त्या कोपऱ्यातल्या मिणमिणत्या समईकडे एकटक बघत राहायचा. घरात तात्यांची एवढी सवय झाली होती, की आता तात्या घरात नाहीत हे संदेशला स्वतःला पटवून द्यायला थोडा वेळ जावा लागला. 

तेराव्याला समीर, त्याची बायको, मुले, तसेच संध्या आणि तिची मुले होती. संध्याच्या मिस्टरांना त्यांच्या ऑफिसमध्ये काम असल्याने तेराव्याला यायला जमले नव्हते. तात्यांचे मित्र कर्णिक वकीलही आले होते. तेराव्याचे विधी पार पडले तसे समीर आणि संदेश कावळ्यासाठी पान घेऊन चाळीच्या गच्चीत गेले. आजूबाजूला कावळे दिसत होते पण एकहीजण पानापाशी येत नव्हता. पानात तात्यांचे सगळे आवडते पदार्थ ठेवले होते. जिलेबी, गुलाबजाम, रसमलाई,  तरीही कावळा काही ताटाला शिवत नव्हता. अर्ध्या तासाच्या वर काव काव करूनही काही उपयोग झाला नाही. खाली सगळे जेवणासाठी खोळंबले होते. लहान मुलांना भुका लागल्या होत्या. कावळा पानाला  न शिवायचा संदेशला अंदाज आला होता. तात्या जाण्याचा तीन दिवस आधी जे काही तात्या बोलले होते त्याची त्याला आठवण झाली. तो तसाच खाली आला. त्याच्या मागून समीरही खाली आला. घरात सगळे त्यांची वाट बघत होते. लहान मुलं  जेवणासाठी खोळंबली  होती. जेवणाची पाने वाढूनच तयार होती. संदेश आणि समीरने काही न बोलता जेवायला सुरवात केली. 

तेराव्याचे जेवण झाले आणि कर्णिक वकिलांनी विषय  काढला. ” समीर, संदेश आणि संध्या …. हे बघा  तात्यांनी जाण्याच्या आधी माझ्याकडे येऊन त्यांचे मृत्युपत्र बनवले होते. त्यांच्या सांगण्यानुसार तेराव्या दिवशी त्याचे वाचन करायचे आहे. तुमची संमती असेल तर मी त्याचे वाचन करू का ?” समीरनं लगेच संमती दिली.  पण संदेश बोलला, ” एवढी  घाई कशाला. तात्या आत्ताच  तर गेले आहेत. सावकाशीने वाचून दाखवा.”  पण समीरने त्याला अडवत सांगितले,  ” कशाला वेळ काढायचा. आजच ऐकू या. नाहीतरी आज आपण तिघे एकत्र आहोतच, परत मुद्दाम भेटण्यापेक्षा आत्ताच वाचन  होऊन जाऊ दे. तात्यांनी कोणाला काय दिले आहे ते तरी कळेल “. कर्णिक वकिलांनी तिघांसमोर पूर्ण मृत्युपत्राचे वाचन केले. त्याच्याखाली असलेल्या तात्यांच्या आणि साक्षीदारांच्या सह्या दाखवल्या.  

समीरचा चेहरा बदलला होता. संध्या काही न बोलता चेहरा पाडून बसली. थोडा  वेळ शांतता होती आणि अचानक समीरने आक्रमक भूमिका घेऊन विरोध दर्शविला. ” हे काय ? असे थोडेच असते. सगळे संदेशला दिले म्हणजे मी आणि संध्या काय तात्यांची मुले नाहीत काय ? कर्णिक काका माझा ह्या मृत्युपत्राला विरोध आहे. मला तरी हे मान्य नाही. अग संध्या तुला हे मान्य आहे का ? बोल ना काहीतरी  ”  समीरच्या आवाजात फरक पडला होता. तो आवाज सुद्धा जरा जास्तच आक्रमक झाला होता. संदेशनेच कर्णिकांना सांगितले, ” काका विसरा हो ते तात्यांचे मृत्युपत्र. मला काही एकट्याला ह्या सगळ्याची गरज नाही. जे काही असेल त्याचे आम्ही तीन वाटे करून घेऊ आणि तसे पेपर बनवायचे असतील तेव्हा आम्ही तुमच्याकडे येऊ.”  संदेशने तापणाऱ्या वातावरणाची हवा थंड केली. होऊ घातलेल्या संघर्षाच्या आगीवर पाणी शिंपडले. संदेशच्या बोलण्याने समीर आणि संध्याच्या चेहऱ्यावर स्मित झळकले आणि जे वातावरण कर्णिक वकीलांनी मृत्युपत्र वाचल्यावर बदलले होते ते पूर्ववत हसते खिदळते झाले. 

क्रमशः….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पितृपक्ष  …भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ पितृपक्ष  …भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे 

“काव, काव ……. काव, काव, काव”

गेले वीस मिनिट्स संदेश काव काव करतोय,  पण एकही कावळा ठेवलेल्या पानाला शिवायला येत नव्हता. तरीही बरे तात्यांना जिलेबी आणि मठ्ठा आवडत असे म्हणून मुद्दाम मुंबादेवी जिलेबीवाल्याकडून जिलेबी आणली होती.  तरी पण कावळा काही  पानाजवळ येत नव्हता. त्याच्या बिल्डिंग मधल्या सोपानकर आणि जोशीने ठेवलेल्या पानांना कावळा लगेच शिवला होता. हे असे का होते ते मात्र संदेशला पुरते माहित होते—-

तात्या जाऊन आता दहा महिने झाले असतील. पण अजूनही संदेश त्या धक्यातून बाहेर पडला नव्हता. संदेशला एक मोठा भाऊ समीर आणि एक बहीण संध्या. संध्या लग्न होऊन तिच्या संसारात मग्न होती, आणि समीरने पण बँकेतील नोकरी करत लोन घेऊन विरारला स्वतःचा २ बेडरूमचा फ्लॅट घेतला होता आणि आपल्या बायको आणि दोन लहान गोंडस अशा मुलांबरोबर संसारात खुश होता. समीरने नवीन फ्लॅट घेतला तेंव्हा तात्यांना दाखवायला नेले होते. पण त्याने  तात्यांना ‘  गिरगावातील चाळ सोडून कायमचे माझ्याकडे या ‘ असे कधीही म्हटले नव्हते. समीरने तात्यांना जरी सांगितले असते तरी तात्यानी ते कधी ऐकले ही नसते. तात्यांचे जवळजवळ संपूर्ण आयुष्य हे चाळीमध्ये गेले असल्याने चाळ सोडून तात्या कुठेच रहायला तयार नव्हते. 

वयाच्या  विसाव्या वर्षीच गावावरून मुंबईला आलेल्या तात्यांनी लहानसहान कामे करता करता ‘बेस्ट’ मध्ये कंडक्टरची नोकरी मिळवली आणि रिटायर्ड होइपर्यंत इमानेइतबारे लोकांची  सेवा केली. त्याच नोकरीवर तात्यांनी या  तिन्ही भावंडाना शिकवून मोठे केले. आईच्या अकस्मात निधनाने तात्या खचले. त्यांच्या पाठीच्या ताठ कण्याने बाक घेतला. रिटायर्ड होईपर्यंत तर तात्यांना काही ना काही आजाराने ग्रासले होते. 

वाडीतल्याच एका मुलीने  संदेशच्या प्रेमाला बाजूला करून तिच्या बॉस बरोबर लग्न केले आणि संदेशचा प्रेमावरचा विश्वासच उडाला. संदेशने लग्न न करता तात्यांबरोबर तात्यांसाठी चाळीतच रहायचे असे ठरविले. लग्न कर, लग्न कर अशी तात्यांची भुणभुण नेहमीच असायची.  पण त्याकडे संदेशने कायम दुर्लक्षच केले. संदेशने लग्न केल्यावर तात्या काही चाळ सोडून नवीन जागेत आले नसते, आणि एखादी चांगली शिकलेली मुलगी चाळीत राहायला तयार झाली नसती.  त्यामुळे संदेशने लग्नाचा विचार कायमचा सोडून दिला आणि तो तात्यांबरोबर रहात होता. 

गेले तीन वर्षे तात्यांच्या आजाराने डोकं खूपच वर काढलं होतं . प्रोस्टेटच्या त्रासाने तात्या ग्रासले होते. उपचार, ऑपरेशन हे चालूच असायचे.  त्यामध्ये डायबिटीस असल्याने खाण्यावरही बंधन होती. गोड खायला बंदी होती तरी तात्या न ऐकता रोज काही ना काही गोड खातच  असत. वेळेवर गोळ्या घेऊन स्वतःच स्वतःची काळजी घेत असत. 

आज कावळा ठेवलेल्या पानाला शिवत नाही हे पाहून संदेशला दहा महिन्याआधीचा काळ डोळ्यसमोर आला. शेवटचा एक महिना तात्या हॉस्पिटलमध्येच होते. समीर दोन दिवसांनी एक चक्कर मारायचा, बाकीचा वेळ संदेशच हॉस्पिटलमध्ये थांबत होता. तात्या गेले, त्याच्या तीन दिवस आधी तात्यांनी संदेशला जवळ बसविले. संदेशचा हात हातात घेऊन तात्या बोलायला लागले, ” संदू, आता मी काही जास्त दिवस बघीन असे वाटत नाही. मला माहित आहे माझ्या काळजीपोटी तू लग्न केले नाहीस. माझी नको तेवढी सेवा तुझ्याकडून झाली आहे. एका बापाच्या  आपल्या मुलाकडून ज्या काही अपेक्षा असतात, तशा  माझ्या सगळ्या अपेक्षांना तू पूर्तता दिलीस. आता फक्त तुला एकच काम माझ्यासाठी  करायचे आहे.  ते पण मी गेल्यावर— तुझं  पुढचं आयुष्य असे एकट्याने न काढता तू लग्न कर. आपली चाळीतली जागा मी तुझ्याच वाटणीला ठेवली आहे. तू तुझा जो काही प्रिंटिंगचा धंदा करतोयस तो आता वाढव. त्यासाठी मी माझ्या पाच लाखाच्या फिक्स्ड डिपॉसिट्स पण तुझ्याच नावावर करून ठेवल्या आहेत. तसे मी माझा मित्र कर्णिक वकिलाकडे माझे मृत्युपत्र बनवून ठेवले आहे.

क्रमशः ….

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माया आभाळाची… भाग-2 ☆ श्री बिपीन कुलकर्णी

श्री बिपीन कुलकर्णी

☆ जीवनरंग ☆ माया आभाळाची… भाग-2 ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆ 

एके दिवशी तिन्ही सांजेच्या करकरीत वेळी माय ला अचानक तिच्या सुनेचा फोन आला. त्या फोनने माय हादरली. हेलपाटली. बापाने बघताच तो माय ला सावरायला धावला. त्याला तो निरोप समजताच बाप थरारला. भीतीने गारठून गेला… केविलवाणा होत निःशब्द झाला. माय सुनेशी दोन वाक्य बोलली आणि ती ही गंभीर झाली. बापाच्या चेहऱ्यावर उमटलेली व्याकुळता माय ला स्पष्ट दिसली. तिने विचार केला आणि त्याला घेऊन माय निघाली. पाचव्या मिनिटाला माय आणि बाप त्यांच्या सुने समोर उभे होते. तिची सून समोर शांत बसली होती…. हॉस्पिटल मध्ये.

लेकाला भयंकर अपघात झाला होता.काय आणि कसं घडलं हे त्या दोघांनी सुनेकडून सविस्तर जाणून घेतलं. बापाला सगळं कळताच तो मूक झाला. शेवटी काहीही झालं तरी बाप तो बापच … प्रत्यक्ष जन्मदाता. आता मात्र बापाने सगळी सूत्र आपल्या हातात घेतली.डॉक्टरांना भेटून एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेतला. अत्यंत धीराने बायको आणि सुनेला सावरून धरलं. ट्रीटमेंट दरम्यान लेकाला रक्ताची गरज पडली. आज बापाने आपल्या शरीरातील अर्ध्याहून अधिक रक्त लेकाच्या धमन्यांत घातलं. शेवटी रक्त बापाचंच होतं. रक्ताला रक्त जुळलं. बापाचं नशीब आणि माय ची पूर्व- पुण्याई थोर… .लेक मरणाच्या दारातून परत आला.

आज त्या माय-बापाचा लेक घरी येणार होता; त्याच्या जन्मघरी. माय त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती. त्या गच्च भरलेल्या आभाळाखालच्या हिरव्या पानापानात लपलेल्या पायवाटेवर आभाळ कोसळत होतं आणि पाना पानांत लपलेल्या  वळणदार पायवाटेकडे तिचे डोळे खिळले होते. इतक्यात अस्पष्टशा आकृत्या हलताना दिसल्या. काही मिनिटात ते तिघेही समोर उभे राहिले.लेक एका हातात कुबडी घेऊन तर दुसरा हात बापाच्या गळ्यात टाकून उभा होता. आज तो बाप त्याच्या लेकासाठी कुबडी झाला होता. हळूहळू बाहेरील झड थांबली आणि धूसरलेलं वातावरण स्वच्छ झालं. घरात मात्र त्या चौघांच्या डोळ्यांतील सरीला खंड नव्हता. आभाळातली  सोनेरी किरणे आता काळ्या ढगांना भेदून त्या माय बापाच्या घरात प्रसन्नपणे विखुरली होती. आज बापच आभाळ झाला होता …

लेक पूर्णपणे बरा होईपर्यंत डोळ्यांच्या नेत्रज्योती त्या बापाने चार महिने अखंड तेवत ठेवल्या होत्या. चार महिन्यात बापाने लेकाला तळहातावर झेलले होते आणि घरात सुनेला मुलीचा मान देऊन त्या बापानेच त्रिकोणाचा चौकोन पूर्ण केला होता. शेवटी बाप तो बाप असतो आणि त्याची अव्यक्त माया..?

 ती तर ‘ आभाळ माया ‘ .. खरं ना …?

© श्री बिपीन कुळकर्णी

मो नं. 9820074205

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ माया आभाळाची… भाग-1 ☆ श्री बिपीन कुलकर्णी

श्री बिपीन कुलकर्णी

☆ जीवनरंग ☆ माया आभाळाची… भाग-1 ☆ श्री बिपीन कुलकर्णी ☆ 

गच्च भरलेल्या आभाळाकडे ती माय तिच्या गच्च भरलेल्या डोळ्यांतून पहात होती. आभाळ आणि डोळे कधीही कोसळतील अशी स्थिती. तशातही ओथंबून फुटू पाहणाऱ्या आभाळात एक सोनेरी किरण प्रकटला आणि त्याने भोवतालच्या गर्द काळ्या मेघांना आभेत लपेटून टाकले. क्षणभरच … पण तेवढ्या क्षणांत त्या माय च्या  काळ्याभोर डोळ्यांतसुद्धा एक आशेच्या किरणाची लकेर उमटून गेली. हळू हळू धूसर असलेलं विरत गेलं आणि धुक्याचा पडदा हटावा तसं गत आयुष्य लक्ख दिसू लागले…

लेकराच्या ट्याहाने तिच्या आयुष्याचं सार्थक झालं होतं. लेकराचा बापही खुश होता. तिघांचं तीन कोनी आयुष्य सुखनैव पणे दौडत होतं. लेक दिसामाजी मोठा होत होता. तो आपलंच  ऐकेल आणि आपल्या मताप्रमाणे वागेल ह्याबद्दल बाप निश्चिन्त होता. परंतु लवकरच लेकाचे स्वतंत्र विचार बापाला ठळकपणे जाणवू लागले होते. लेकराने त्याच्या करियरचे निर्णय स्वतः घेऊन मग बापाला सांगितले, मात्र बापाच्या कपाळावरची आठी आणि चेहऱ्यावर स्पष्ट उमटलेली नाराजी मायला कळून चुकली. पुढच्या आयुष्यात आता काय भोगावं लागणार ह्याची कल्पना माय ने उराशी बांधली. तिला एखाद्या निर्णयात सहभागी करून घ्यायचं अशी त्या बापाची पद्धत आणि सवयही नव्हती. बाप लेक समोर आले की मायचं काळीज लककन हलायचं. त्या क्षणी पुढ्यात काय वाढून ठेवलंय ह्या विचाराने तिचा मेंदू भिरभिरायचा. बाप, लेक आणि माय तिघे जणू त्रिकोणाच्या तीन कोनाच्या पॉईंट वर जगत होते. लेकाने ठरवल्याप्रमाणे त्याचं करियर घडवलं. त्याची नोकरी सुरु झाली… आणि बापाने हिशोब मांडायला सुरवात केली. माय च्या आयुष्याची चव अजूनच बेचव आणि अळणी झाली. अगतिकपणे माय सगळं सहन करीत होती… उद्याच्या आशेने. तिच्या हातात फक्त तेवढंच उरलं होतं…

आता पावेतो बाप लेक दुरावले होतेच, त्यातच एके दिवशी लेकाने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या स्वभावाप्रमाणे अमलातही आणला. आज मात्र माय हरली. दैवा पुढे आणि नशिबापुढे तिने हात टेकले. हतबलतेने ती दिवस ढकलत राहिली. अचानक एके दिवशी लेक एका मुलीला घेऊन माय ला भेटायला आला. माय समजली. तिने निमूटपणे सुनेची खणानारळाने ओटी भरली आणि आपल्या लग्नात मिळालेल्या स्त्री धनातून सोन्याचा एक हार आणि दोन बांगड्या तिच्या ओटीत टाकल्या. बापाची धुसपूस सुरु झाली होतीच ती अजून वाढली. त्या मुली मुळे तो नात्यापुरता का होईना पण सासरा झाला होता. माय मोठ्या आशेने बापाकडे पहात होती. अपेक्षा होती लेक व सुनेला त्याच्याकडून मिळणाऱ्या आशीर्वादाची.  5-10 मिनिटे शांततेत गेल्यावर लेक दहाव्या मिनिटाला त्याच्या बायकोला घेऊन घरातून बाहेर पडला. केवळ बायकोच्या हट्टाखातर तो घरी आला होता. माय ने तिच्या सुनेला तेवढ्या वेळात जोखले होते. ती सुनेच्या समंजसपणावर खुश होती. बाप नेहमी प्रमाणे माय लेकरांपासून अलिप्त होता. काळ वेळ आपल्या गति प्रमाणे आणि त्या लेकाचा बाप त्याच्या गतित. माय ला मात्र काळवेळच  काय पण कशाचच बंधन नव्हतं. तिच्या दृष्टीने सगळंच थांबून राहिलं होत.आता तर कशाचाही फरक माय ला पडत नव्हता. माय नेहमी म्हणायची, देव एका हाताने काढून घेत असेल तर दुसऱ्या हाताने नक्कीच काहीतरी देत असतो. पण तो काय देतोय ते उमजून समजून प्रसाद म्हणून स्वीकारलं पाहिजे. माय असं काही बोलायला लागली की लेकाला ती शापित यक्षिणी वाटायची . अहो, खरंच होतं ते … तिच्या संसारातली शापित यक्षिणीच होती ती… तिच्या लेकाला एकच समाधान म्हणजे सासू- सुनेचे सख्य. पण तो तीन कोनांचा त्रिकोण .. त्रिकोणच राहिला होता. चौकोन व्हायची सुतराम शक्यता नव्हती.बाप बदलायला तयार नव्हता आणि लेक? त्याचा तर प्रश्नच नव्हता . कालाय तस्मै नमः … कदाचित काळच त्रिकोणाचा चौकोन करेल ह्या आशेवर माय जगत होती आणि…

क्रमशः …

© श्री बिपीन कुळकर्णी

मो नं. 9820074205

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ☆ तिघंच ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ तिघंच ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

“मि. भागवत, मी काय सांगणार आहे, हे तुम्हाला ठाऊकच आहे. आता त्याचे फारच थोडे दिवस राहिलेत. किती, ते सांगता येणार नाही. तो हॉस्पिटलमध्ये राहिला, तर आम्हाला फायदाच आहे. पण त्याच्याकडे बघून जीव तुटतो. म्हणून सांगतो, त्याचे उरलेले दिवस घरच्या वातावरणात जाऊ देत. तो आनंदी राहील, याची काळजी घ्या. ही इज अ ब्रेव्ह बॉय!  मला कधीही कॉल करा. मी लगेचच येईन.रोज रिपोर्ट करत जा.”

“थँक यू, डॉक्टर.”

त्याला पार्टी आवडते, म्हणून मॉम -डॅडनी पार्टीज अरेंज करायचं ठरवलं. रोज वेगवेगळे ग्रुप्स, रोज वेगवेगळ्या थिम्स, रोज वेगवेगळे मेन्यू, रोज त्याच्या आवडीचे वेगवेगळे केक. आमंत्रणं देताना ‘त्याच्या तब्येतीचा विषय काढू नका, प्लीज.’अशी विनंती करायला विसरायचे नाहीत ते.

अशीच धमाल चालली होती. तोही व्हीलचेअरवरून पार्टीत सामील होत होता.लोक मॉम -डॅडच्या अपरोक्ष त्यांच्या धैर्याची प्रशंसा करत होते.

“खर्च वाढतोय ना रे?”

“जाऊदे गं. लोन घेऊ लागल्यास. पुढे आयुष्य पडलंय लोन फेडायला. पण त्याचा क्षण- न- क्षण आनंदात गेला पाहिजे.”

“हो रे. खुश असतो तो या जल्लोषात.”

त्या दिवशी सर्वांत शेवटी निघाली, मॉमची आतेबहीण. तिला निरोप देताना दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या.

ती निघाल्यावर तोंड धुवायला जाण्यापूर्वी मॉम त्याच्या खोलीत डोकावली.

तसा उशीर झाला होता ;पण तो जागाच होता.

“मॉम, डॅडलाही बोलव  ना.”

तेवढ्यात रुमालाने तोंड -डोळे पुसत डॅडही आलाच.

“मॉम, डॅड, मला ठाऊक आहे-डेथ कोणत्याही मोमेन्टला मला घेऊन जाईल. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे. मला उरलेले दिवस, उरलेल्या मोमेन्ट्स तुमच्याबरोबर घालवायच्या आहेत. फक्त तुमच्याबरोबर. पार्टीत तुम्ही दोघं हरवूनच जाता. मला मिळतच नाहीत.

आजपासून तुम्ही दोघं माझ्याबरोबरच थांबा. मॉम, आजपासून सिस्टर नाही, तू मला भरव. डॅड, तू मला बुक्स वाचून दाखव. आपण तिघं गेम्स खेळूया. प्लीज.

सिस्टर खूप चांगली आहे. शी केअर्स फॉर मी. शी टेक्स गुड केअर ऑफ मी. पण तिला रूमच्या बाहेर थांबायला सांगा. इकडे फक्त आपण तिघंच राहूया. तिघंच.”

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भेट …. भाग दुसरा ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ.सुचित्रा पवार

?  जीवनरंग  ?

☆ भेट…. – भाग दुसरा ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(नव्ह कुणी मागितला जरी असता तरी स्वतः शिवाच गेला असता पण सुंदरला दिला नसता !)  — इथून पुढे —

त्यादिवशी असाच बैलगाडीला जुंपून त्याला नेहमीप्रमाणं शेतात नेला . शेंगांच्या रानातून शेंगाची पोती आणायची होती. निम्या रस्त्यात गेल्यावर ठेच लागल्याचं निमित्त होऊन सुंदर रस्त्यात कोसळला .शिवाचा जीव हलला , गाडीवरून उतरून त्याला त्यानं चुचकारल ,पाठीवरून हात फिरवला पण सुंदर उठायचं नाव घेईना .तिथंच बैलगाडी सोडून दुसरा बैल रस्त्याकडेला बांधून तो सुंदरला उठवायचा प्रयत्न करू लागला.पायात काटा मोडलाय का पाहिला पण कुठं काहीच झालं नव्हतं .शिवाच हातपाय गळून गेलं .तिथंच गळ्याला मिठी मारून त्यांन  हंबरडा फोडला . निरव शांततेत शिवाचा हंबरडा दूरवर घुमत राहिला .रस्त्यावरून येणा-जाणाऱ्यांनी बातमी घरात पोहचवली.जागेवरच डॉक्टर आणला .डॉक्टरनं इंजेक्शन दिलं .हा -हा म्हणता गाव गोळा झाला ,पण शिवाला काही सुचत नव्हतं.तो नुसता सुंदर …सुंदर करत उसासे टाकत होता . संध्याकाळी हळू हळू चालवत कसा तरी सुंदरला घरापर्यंत आणला .सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं . कुणी म्हणलं करणी झाली ,कुणी म्हणलं दिष्टवला .शिवा तर सुंदर जवळून रात्रंदिवस उठलाच नाही .सुंदरच्या टपोऱ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तसा त्याचा धीर सुटला .त्यान पण अन्नाचा कण घेतला नाही .अंगारा ,धुपारा ,दृष्ट काढून ,औषधं बदलून  झाली पण सुंदर शांत होता .केविलवाणे तो मालकाकड पाहत राही आणि एका सकाळी जमिनीवर मान टेकून सुंदर शांत झाला .शिवाने हंबरडा फोडला. कुणाचंही मन पिळवटून जावं असंच आक्रीत घडलं होतं .शिवा वेडा व्हायचाच बाकी होता .

त्यादिवसापासून त्याची झोप उडाली .जेवणावरून स्वत:वरून ,शिवारावरून मन उडलं .जिथं तिथं सुंदरच्या आठवणी त्याचा पाठलाग करत .रात्री अपरात्री उठून तो गोठ्यात जाई आणि सुंदरच्या जागेवर विमनस्क बसून राही .लोकांनी समजूत काढली ,शालुच्या माहेरच्यांनी समजूत काढली पण तो स्वतःच्या मनाला समजावू शकत नव्हता की सुंदर त्याच्या गोठ्यातून जीवनातून गेलाय .

शालूला रात्रंदिवस धन्याची  चिंता लागून राहिली .त्याचं मन तिलाही वळवता येत नव्हतं कारण सुंदर त्याचं काळीज होतं अन काळजाशिवाय मनुष्य कसा जगेल ? चालतं बोलतं आत्माहीन प्रेतवत अवस्था होती शिवाची . तिला धास्ती लागून राहिली होती त्याच्या जीवाचं काही बरं वाईट नाही ना होणार ? देवाचा धावा रात्रंदिन चालूच होता.

गेल्या राखीपौर्णिमेला राखी बांधायला माहेरी गेल्यावर सहजच तिचं लक्ष गोठ्यातल्या वासराकड गेलं अन तिच्या सर्वांगातून एक अनामिक लहर चमकली .सुंदरचंच दुसरं रूप होतं ते ! अन तिच्या मनात एक कल्पना आली .हा शेवटचा उपाय होता धन्याला सुंदरच्या आठवणीतून भानावर आणायचा .

तिनं भावाला -महादूला सविस्तर कल्पना दिली .बहिणीच्या संसाराची त्याला पण काळजी होतीच .प्रयत्न किती यशस्वी होणार हे तिला माहीत नव्हतं पण शिवाला दुःखातून सावरण्याचा हा एकच मार्ग तिच्याकडे शिल्लक राहिला होता .आणि म्हणूनच ती महादूची वाट बघत अस्वस्थपणे आत -बाहेर फेऱ्या घालत होती .

घुंगराच्या आवाजाने ती भानावर आली अन पटकन आरतीचं ताट आणायला आत गेली . लगबगीनं तिनं पाटीत खिचडा  ओतला आणि उंबऱ्यावर येऊन सुंदर ss म्हणून हाक दिली. नवा कोरा रंगीत कंडा , कासरा अन घुंगुर बांधून महादू दारात वासराला घेऊन हजर होता  .घुंगराचा आवाज अन ‘सुंदर’ हाक ऐकून शिवा दचकून गोठ्यातून बाहेर आला. शालून वासराला ओवाळून तोंडात खिरीचा घास दिला डोक्यावर हात फिरवला अन खिचडा खायला दिला .शिवा निश्चल होऊन पहात होता . शालू वासराच्या पाठीवर हात फिरवत त्याच्याशी बोलत होती ,”सुंदर तुझ्या धन्यान काय अवस्था करून घीतल्या बघ ,तूच समजवून सांग बा मी कुणाकड बघून जगू ? झालं ती वाईटच! आम्हाला तर काय बरं वाटतय का र? पण त्याचा आपल्याजवळचा शेर तेव्हढाच हुता  तेला आपण काय करणार ?आपण प्रयत्न केलंच ना ? आता सावरायला हवं ,तूच सावर तुझ्या धन्याला ! ती बघ तुझी जागा ” म्हणत शालून गोठ्यात त्याच्या जागेकडं बोट केलं तिचा कंठ दाटून आला; तिनं वासराच्या गळ्यात हताशपणे हात टाकले तिचे डोळे भरून वाहू लागले.

शिवाला त्याचं लहानपण आठवलं असाच तो सुंदरच्या गळ्यात हात टाकून बोलायचा. थेट सुंदरच होता तो दुसरा !तेच डोळे ,तीच पांढरी शुभ्र सशासारखी गुबगुबीत अंगकांती …”सुंदर sss “पुन्हा एकदा त्यानं आर्त हाक दिली .. गळ्याला मिठी मारली लहान मुलासारखी अन अश्रूला वाट दिली .महादू गळ्यातल्या टॉवेलन डोळे पुसत राहिला .सुंदर शिवाचे हात प्रेमाने चाटू लागला अन मघापासून गच्च दाटून आलेलं आभाळ आता धाडधाड कोसळू लागलं …

समाप्त 

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भेट …. भाग पहिला☆ सौ. सुचित्रा पवार

सौ.सुचित्रा पवार

?  जीवनरंग  ?

☆ भेट…. – भाग पहिला ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

तिन्हीसांज झाली होती ,अस्वस्थपणे शालू उंबऱ्यातून स्वैपाकघरात अन पुन्हा अंगणात येरझाऱ्या घालत होती .आकाशात ढगांची गच्च दाटी झालेली अन अजूनच अंधारून आलेलं .गोठ्यात अंधार भुडुक होता अन शिवा -तिचा कारभारी गुडघ्यात मान घालून बसला होता .शेजारी सापती ,घुंगुरमाळ उदास पडलेली  बघून तिच्या पोटात कालवून येत होतं पण ..पण ती हतबल होती .चूल पेटली होती . घरोघरी जनावरांच्या अंघोळीचा अन सजावटीचा कार्यक्रम सुरू होता .आज खिचडा !  तिनेही चुलीवर खिचडा शिजत घातला होता ,करडई उखळात कुटून दूध काढून ठेवले होते , खीर रटरटत होती ; जनावरं ओढ्यावर नेऊन धुवून आणली होती ,शिंगांना हुरमुस लावून रंगवली ,पण तिला  कशातच  आनंद वाटत नव्हता. घरधण्याची  तसली अवस्था बघून तिला उदास वाटत होते ,तिच्या परीनं तिनं समजूत काढली होती पण ..पण त्याच्यात काय फरक पडत नव्हता आणि कुणी समजूत काढून ती निघणारही नव्हती .गेलं आठ दहा महिने झालं त्याचं शिवारातून ,जितराबावरून लक्ष उडल होतं ,इतकंच काय स्वत:वरून सुद्धा त्याचं लक्ष उडलं होतं . सगळी काम शालूनच पार पाडली होती ,औंदा पेरणी पण शालूनच पार पाडली होती पण पिकं कितकीशी वाढलीत ? हे बघायला सुद्धा तो शेतापर्यंत गेला नव्हता .अन का नाही अशी अवस्था होणार ?त्याजागी कुणी असता तर त्याचीही अवस्था अशीच झाली असती शालू विचारात गढली .सुंदर आणि धन्या बरोबरच वाढलं होतं आत्या सांगायच्या सुंदरच्या आणि तिच्या कारभाऱ्याच्या साऱ्या कहाण्या ! 

घरच्या गाईपासूनच सुंदर झाला होता .नावाप्रमाणच सुंदर देखणा होता . पांढऱ्या शुभ्र सशासारखी कातडी ,टपोर डोळ ,गुबगुबीत शरीर .. शिवाला त्याचा खूप लळा  होता .दिवसरात्र तो सुंदरला जपायचा ,कुठून कुठून गवत आणायचा ,कणिक खुराक ,गोठ्यात बसायला स्वच्छ जागा ..एखाददिवशी जरी सुंदर उदास वाटला  तर शिवा शाळेतच जायचा नाही ,सुंदरला माळावर  पळवल्याशिवाय त्याला चैन पडायचा नाही, सुंदरन काही खाल्ल्याशिवाय शिवा तोंडात घास घ्यायचा नाही .सुंदर मोठा धष्टपुष्ट झाला अन शेतीची काम  करू लागला .शालू अन त्याच्या लग्नाच्या वेळीसुद्धा त्यानं सुंदरकडं एव्हढंस पण दुर्लक्ष केलं नव्हतं .वरातीच्या गाडीला तो  सजून धजून ओढत होता . तिथंच तिची  सुंदरशी ओळख झाली होती .

सकाळी उठल्या उठल्या पहिलं तो सुंदरचच दर्शन घ्यायचा ,त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवायचा ,तोही धण्याचं हात चाटायचा ,तोंड वर करून लाड करून घ्यायचा . त्याच्यामागचं शेण सारून त्याला कोरड्या जागेत बांधून मगच धन्याच्या दिवसाची सुरुवात व्हायची .काळजाचा तुकडाच होता जणू ! शिंगांना सुबक आकार ,त्यांचा लाल रंग , कंडे ,घुंगुरमाळ ,बैलपोळ्यासाठी रंगीत झूल ,रंगीत गोंडे कित्ती कित्ती हौस!  सुंदरला काही झालं की शिवाचा जीव खालवर व्हायचा .सुंदरला चारापाणी केल्याशिवाय तो तोंडात घास घ्यायचा नाही .

दिवाळीत गोठा साफ करून रंगरंगोटी व्हायची ,गोठ्यालाच दिव्याच्या माळा लावायच्या .वसुबारसेला पूजा ,पुरणपोळीचा घास असायचा सुंदरला.सुंदर जणू धाकटा भाऊच होता धन्याचा !  बैलपोळ्याची तर त्याला कित्ती हौस  ! आठ दिवसापासूनच तो त्या तयारीत असायचा . लाडक्या सुंदरला  सगळ्या माळावर हुंदडू द्यायचे. हिरव्यागार कुरणावर मनसोक्त चरून झालं की मग आपोआपच त्यो ओढ्याकडं जायचा मनसोक्त पाणी प्यायचा , मग कंबरभर पाण्यात उतरून शिवा सुंदरला स्वच्छ धुवायचा .आधीच स्वच्छ पांढरी त्याची कात अजूनच झळाळायची .आठ दिवस त्याला कुठल्याच कामाला लावत नसे.    रस्त्यानं सुंदर निघाला की सगळे बघत उभं रहात .दररोज संध्याकाळी मीठ मिरच्यांनी दृष्ट उतरून चुलीत फेकायची .तिला पण सुंदरला जपावं लागायचं ,सुंदरचा दु:स्वास धन्याला अजिबात खपायचा नाही .

खरे तर सुंदर दिसायला देखणा होताच पण तो कष्टाळू अन गुणी पण तितकाच होता .त्याला कधी चाबूक ओढलेला तिनं  बघितलं नव्हतं .शेतीच्या कामाला नेहमी सुंदरच्या जोडीला दुसऱ्याचा बैल भाड्यानं असायचा ,गाडी जुपताना पण भाड्याचाच बैल असायचा सुंदरच्या जोडीला ;पण सुंदरला कुणी भाड्यानं मागायचं धाडस केलं नव्हतं ;नव्ह कुणी मागितला जरी असता तरी स्वतः शिवाच गेला असता पण सुंदरला दिला नसता !

क्रमशः ——

© सौ.सुचित्रा पवार

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जोगीया ☆ श्री आनंदहरी

Best Bhojpuri Video Song - Residence w

? जीवनरंग ❤️

☆ जोगिया ☆ श्री आनंदहरी ☆

(गदिमा यांच्या ‘जोगीया’ कवितेचे कथारूप)

मैफिलीची वेळ झाली होती.. झुंबर आणि दिवे प्रज्वलित झाले होते.. गालिचा व्यवस्थित अंथरला होता.. लोड, तक्के.. सारी बैठक व्यवस्था सज्ज झाली होती.. कळीदार पाने, सुपारी, चुना कात, लवंग, वेलदोडे यांनी भरलेली पानांची तबके बैठकांसमोर ठेवलेली होती..  तिच्या येण्याचे प्रवेशदाराला लागूनच साजिंद्यांची बैठक.. सारे काही जय्यत तयार होते. तिच्या नृत्य- गायनावर, सौंदर्यावर फिदा असणारे, तिच्यावर जीव ओवाळून टाकणारे रसिक येऊन विराजमान झाले होते, वाद्ये जुळवली गेली होती. फक्त तिच्या येण्याची प्रतीक्षा होती. साऱ्या रसिकांचे डोळे ती यायची त्या प्रवेशदाराकडे लागून राहिले होते. तिचे आरसपानी सौन्दर्य पिऊन डोळ्यांत साठवायला अनेक डोळे आतुर झाले होते.

जशी वेळ पुढे पुढे सरकत होती तशी रसिकांमध्ये अस्वस्थता ,कुजबुज, चुळबूळ वाढू लागली होती पण अजून ती काही आली नव्हती. सखी तिच्या जागेवर बसून होती.. ‘ खरे तर असे कधी होत नाही. बाईजी अगदी वेळेवर बैठकीत येतात.. अगदी रसिक आल्यावर लगेच..’ तिच्या न येण्याने मनात काळजी दाटून आली तशी सखी अस्वस्थपणे उठली आणि तिच्या खोलीकडे गेली .

” बाईजी, चला खूप उशीर झालाय, सगळेजण तुमच्या येण्याची आतुरतेने वाट पाहतायत.”

हलकेच दार वाजवत सखीने तिला हाक मारली. तिने दार उघडले. सखीने पाहिले. ती रोजच्यासारखीच तयार झाल्याचे दिसत होते. ‘ बाईजी तयारच आहेत… पण काहीशा वेगळ्या का वाटतायत ?’  सखीच्या मनात तिला पाहताच विचार आला.

” आज मैफिल नाही होणार. सगळ्यांची माफी मागून जायला सांग .”

एवढेच बोलून तिने दार दडपून बंद केले होते. बंद दारापुढे सखी काही क्षण थबकली होती. सखीला तिच्या वागण्या- बोलण्याचा धक्काच बसला होता.

सखीने हात जोडून माफी मागत,  बाईजींना बरे वाटत नसल्याने मैफिल होणार नसल्याचे सांगितले.

पानांची तबके पुढे सरकवत पान घेण्याची आणि दुसऱ्या दिवशी येण्याची विनंती केली. कुणी पान घेऊन, कुणी तसेच निराश मनाने परतले. साजिंदेही गेले तसे मुख्य दार पुढे करून ‘ बाईजींकडे विचारपूस करायला जावं की नको ?… नकोच. बाईजीं जरा अस्वस्थच वाटल्या .. पण नको जायला.. त्यांना वाटलं तर बोलावतीलच..’ असा विचार करून सखी स्वतःच्या खोलीकडे गेली.

सखी बोलवायला आल्यानंतर दार लावून ती कसल्यातरी विचारात भान हरपून गेल्यासारखी मंचकावर येऊन बसली… ‘ आज तरी तो यावा ..’ तिचे मन म्हणत होते. तिला तो यावासा वाटत होता पण त्या दिवसापासून तो कधीच आला नव्हता.

तिच्या मनात तो दिवस..दिवस नव्हे ती रात्र वारंवार एखाद्या चलचित्रासारखी तरळून जात होती.

त्यादिवशी नेहमीप्रमाणेच मैफिल मस्त रंगली होती. रसिक तिच्या नृत्य-गायनाचा आस्वाद घेत होतेच पण त्याचबरोबर तिचे आरसपानी सौन्दर्य, कमनीय काया कवेत घेण्याची आस बाळगत डोळ्यांत साठवत होते. तिने भैरवी रागातील ठुमरी गायला सुरवात केली..

*आ जा सावरिया,

रसके भरे तोरे नैन, सावरिया ।

दिन नही चैन मोहें, रात नही निंदिया,

तडपत हूँ बिन रैन, सावरिया ।।

सारी मैफलच मंत्रमुग्ध झालेली. तिने भैरवी घेतलीय याचेही भान कुणाला राहिले नव्हते. सारे भावशब्दांत रंगलेले असतानाच ती मैफलीचा निरोप घेऊन आपल्या खोलीत आली. स्वर थांबले, सतार मूक झाली. हळूहळू एकेकजण भानावर येऊन तृप्त मनाने स्वरांच्या लहरीवर स्वार होत त्या संमोहनातच बाहेर पडू लागला. सारे परतले. दिवे मंद केले गेले. इतकावेळ नृत्य-नादात रमलेली, रुणझुणणारी  पैंजणेथकून  विसालीी..काही क्षणातच सरल्या मैफिलीचे उदास अस्तित्व बैठकीच्या खोलीत भरून राहिले. थकलेले साजिंदे बाहेर पडले तसे सखीने दार पुढे लोटले, बैठकीतील दिवा मालवला आणि आपल्या खोलीत गेली.

ती रतिक्लांत होऊन एकटीच मंचकावर पहुडली होती. तिच्या खोलीतला प्रकाशही थकल्यासारखा मंद झाला होता. ती स्वतःच्याच विचारात गढून गेली होती. जीव जगवण्यासाठी आपला देह विकावा लागावा, आपल्या चारित्र्याचा असा बाजार मांडायची वेळ आपल्यावर यावी याची खंत एकटेपणात तिच्या मनाला जाळत असायची. स्वतःच्या विचारात असताना तिला कुणाची तरी चाहूल लागली तशी तीखोलीच्या दाराशी  आली. समोरून अंधारातून कुणीतरी येत होते. तिला आश्चर्य वाटलं. ही वेळ कुणी येण्याची नव्हती. तन-मन तृप्तीच्या नशेत परत जाण्याची होती. तो समोर आला. नवख्यासारखा बुजलेला… ती त्याला धीर येण्यासाठी छानशी हसली.

तो काहीसा दबकतच तिच्याजवळ आला आणि म्हणाला,

” माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे,राणी…”

कमलदलासारखे ओठ जरासे विलगून ती हसली. अनेकजण तिला असेच म्हणायचे, अजूनही म्हणतात. अगदी सुरवातीच्या काळात तिला ते खरं वाटायचं, मन फुलून यायचं. पण नंतर मात्र तिला त्या वाक्याचा अर्थ मनाशी, हृदयाशी नसून देहोपभोगाशी आहे हे कळून चुकले होते.

ती हसत म्हणाली,

 ” थांबा, विडा देते ,तो घ्या आणि उद्या या.. थोडा जास्त दाम घेऊ यान..”

तिने विडा बनवायला पान हातात घेतले आणि वर पाहिलं. तो काही न बोलता झटकन अंधारात विरून जावा तसा गेला होता. काही क्षण ती त्याला इकडे-तिकडे शोधत राहिली. दुसऱ्या दिवशी त्याची वाट पाहिली. वाट पहातच राहिली. तो आलाच नाही.

तिच्या भांग भरल्या मनात, जीवनात तोप्रीतीची  तुळस लावून गेला होता. आपण त्याला नीट पाहिलेही नाही ही जाणीव तिच्या मनाला खात राहिली. एकटेपणात त्याच्या शब्दांची, नीट न पाहिलेल्या त्याच,ी आठवण तिला सतावत राहिली. आसावल्या डोळ्यांनी ती त्याची वाट पहायची त्याने, एकदा… एकदा तरे यावे, भेटावे असे तिला वाटत होत.पण  तो आलाच नाही.

वर्षे लोटत राहिली पण तो मात्र ध्रुव ताऱ्यासारखा तिच्या मनाकाशात अढळ स्थानी राहिला होता. तो दिवस हाच.. ती सारे काही सोडून याच दिवशी व्रतस्थ राहून त्याची वाट पाहत राहायची.

सखी बोलवायला आली तेंव्हा तिने खोलीचे दार दडपून बंद केले होते पण मनाची दारे मात्र सताड उघडली गेली होती.. फक्त त्याच्यासाठी.   फक्त त्याच्यासाठीच तिने विडा बनवला. तो येणार नाही हे जाणवत असूनही ती मंचकावर त्याची वाट पाहत बसली होती.. सारी रात्र ती तशीच त्याची वाट पाहत बसून राहिली होती. आतुर झालेले मन त्याला साद घालत होते.

आन मिलो इकबार सजनवा ।

याद में तोरी रैन बिताई

सून लो जिया की पुकार ।।

तिच्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या होत्या.. गालावरून आसवे ओघळत होती.. तिचे आर्त स्वर तिच्या मनात आणि खोलीत भरून राहिले होते.असा जोगीया कधीच रंगत नव्हता..कधीच  रंगला नव्हता.

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print