मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लाइटर – कथा – भाग 2 – लेखक – श्री देवा गावकर ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

? जीवनरंग ❤️

☆ लाइटर – कथा – भाग 2 – लेखक –  श्री देवा गावकर ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

( मागील भागात आपण बघितले –  लाइटरचे दोन तुकडे झाले तेवढ्यात तिथे भीमराम आला आणि जोराने ओरडला  ” हे काय केले तुम्ही , हा साधासुधा लाइटर नव्हता या लाइटर मध्ये एक दुष्ट आत्मा कैद होता . आता आपले काही खरे नाही . चला पळा इथून ”  आता इथून पुढे )

भीमराव आपल्या मित्रांसोबत बाहेर गेला . त्या रात्री भीमराव आपल्या भावाच्या भीतीने घरी गेलाच नाही . दुसऱ्या दिवशी सकाळी भीमराव घरी गेला घराचा दरवाजा उघडाच होता . तो आत गेला तर  त्याचा भाऊ जमिनीवर मृत पडलेला होता . तो मोठ्याने रडू लागला पण आता रडून काय फायदा त्याच्या चुकीमुळे त्याने आपल्या भावाला गमावला होता . भावाच्या मृत्यूने त्याच्या मनावर खुप मोठा परिणाम झाला . त्याने ठरवले या पुढे दारू आणि सिगरेटला हात सुद्धा लावायचा नाही .

त्याने आपले सगळे लक्ष तांत्रिक विद्येकडे केंद्रीत केले . खूप दिवस कठोर परिश्रम केल्यावर आता तो सुद्धा आत्म्यांना कैद करण्याच्या विद्येत निपूण झाला . पण त्याच्या समोर आता खूप मोठे संकट उभे होते . गावातील लोकांना शामरावाचा आत्मा दिसत होता . लोकांकडे त्याचा आत्मा सिगरेट आणि लाइटर मागत होता .

भीमरावाने खूप प्रयत्नाने शामरावाच्या आत्म्याला एका लाइटर मधे कैद केले . दुसऱ्या दिवशी तो शामरावाच्या आत्म्याला मुक्त करणार होता . पण तो लाइटर कुठे तरी हरवला .     कदाचीत तो लाइटर कोणीतरी तुमच्या गावात आणला आहे आणि त्या लाइटर मधे असलेल्या शामरावाच्या आत्म्याला नकळत बाहेर काढले आहे . जोपर्यंत त्याचा आत्मा त्या लाइटर मधे कैद होत नाही तो पर्यंत तो या गावात भटकत राहणार .शामरावाला  फक्त त्याचा भाऊच कैद करू शकतो पण त्यासाठी अगोदर तो लाइटर शोधावा लागणार . “

“लाइटर तर आम्ही शोधू शकतो पण भीमराव कुठे मिळणार आम्हाला ? ” लोकांनी त्या तांत्रिकाला प्रश्न केला .

” तुम्ही फक्त लाइटर शोधा भीमराव इथेच आहे ” .

तांत्रीकचे बोलणे ऐकून लोक सर्वत्र बघत म्हणाले ” इथे ? पण इथे तर कोणीच दिसत नाही . कुठे आहे भीमराव ? “

” तुमच्या समोर . होय मीच आहे भीमराव . त्या दिवशी मी त्या लाइटरच्या शोधात सरपंचाच्या घरात गेलो होतो .  त्या दिवशी जर तुम्ही माझे ऐकले असते तर आज तुमच्यावर ही वेळ आलीच नसती . त्याच दिवशी मी त्याला कैद केला असता . अजुनही वेळ गेलेली नाही. लवकरात लवकर तो लाइटर शोधा नाहीतर अनर्थ होईल.”

लाइटर शोधण्यासाठी लोकांना जास्त त्रास झाला नाही ,लाइटर सरपंचाच्या घरीच सापडला . लाइटर हातात घेऊन तांत्रीक मंत्र म्हणत गावभर फिरत होता . त्याच्या पाठोपाठ गावातील लोक चालत होते . तांत्रीक पिंपळाच्या झाडाखाली थांबला . त्याला तिथे शामरावाची आत्मा असल्याचा आभास झाला असावा . तो झाडाकडे बघत जोर जोरात मंत्र म्हणू लागला . जसा जसा मंत्राचा वेग वाढत होता तसतसा लाइटर पकडलेला तांत्रिकाचा हात थरथर कापत होता . ५ – १० मिनीटे  न थांबता तो जोरात मंत्र म्हणत होता . मंत्र म्हणता म्हणता अचानक तो शांत झाला आणि लाइटर आपल्या पिशवीत ठेवतं म्हणला ” आता घाबरण्याची गरज नाही शामरावाचा आत्मा लाइटरमधे बंद झालेला आहे . ” इतका वेळ शांत असलेला सरपंच त्याला म्हणाला ” नीट ठेवा तो लाइटर परत बाहेर नाही आला पाहिजे तो आत्मा “

तांत्रीक म्हणाला ” तुम्ही काहीच काळजी करू नका सरपंच साहेब तो आत्मा आता कधीच बाहेर नाही येणार ” .

” मग तो कोण आहे ? ” सरपंचाने  समोर बोटाने इशारा केला .

समोर शामराव हातात सिगरेट घेऊन उभा होता . लोक त्याला बघून घाबरले . यावेळी तांत्रीकाला सुद्धा घाम फुटला होता .

” किती भयानक आणि मायावी आहे शामरावाचा आत्मा. तो बघा आपल्या  मागे पण आहे त्याचा आत्मा ” सरपंच मागे बघत म्हणाला .

लोकांनी मागे वळून पाहिले तर तिथे पण शामराव होता . आता तर लोक खूपच घाबरले होते त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता . लोकांपेक्षा जास्त तांत्रिक घाबरला होता .

लोकांना घाबरलेले पाहुन सरपंच म्हणाला ” घाबरण्याची गरज नाही . इथे आत्मा वगैरे काही नाही . हे दोघे जुळे भाऊ आहे  शामराव आणि भीमराव . “

” मग हा कोण आहे ? ” लोकांनी तांत्रीकाकडे बोट करत विचारले .

सरपंच म्हणाले, ” हा  एक हिर्‍यांचा स्मग्लर आहे . परदेशातून ह्याचे साथीदार  लाइटर मध्ये हिरे लपवून इथे पाठवतात . एका रात्री  पोलिस  याच्या मागे लागले होते म्हणून याने लाइटर खिडकीतून माझ्या घरात फेकून दिला होता . तोच लाइटर घेण्यासाठी हा दुसऱ्या दिवशी तांत्रीकाचा वेष घेऊन माझ्या घरात घुसला होता . पण त्यावेळी तुम्ही याला ढोंगी म्हणून गावातून हाकलून लावला . त्याच दिवशी मला तो लाइटर खिडकी जवळ सापडला . तो इतर लाइटर पेक्षा वेगळा होता आणि पेटत पण नव्हता म्हणून मी तो उघडला  त्यात मला हिरे सापडले . मी लगेच पोलिसांना फोन केला . पोलिसांनी मला रात्री घडलेल्या घटने बद्यल सांगितले . आणि विचारले  “त्या दिवशी कोणी अनोळखी माणूस गावात आला होता का ? ”   मी त्यांना सांगितले ” एक तांत्रीक माझ्या घरात आला होता पण लोकांनी त्याला ढोंगी समजून हाकलून लावला . ” पोलिसांना माझे बोलणे ऐकून खात्री पटली की  तो स्मग्लरच तांत्रीक बनून माझ्या घरी आला होता . पोलिसांना माहित होते तो लाइटरमधे असलेले हिरे घेण्यासाठी परत नक्की येणार या गावात . मग पोलिसांनी आपले काही गुप्तचर या गावात पाठवले . त्यांनीच या जुळ्या भावांचा पडदा उघड केला . मग काय पोलिसांच्या भितीने या दोघांनी तांत्रिकाची सगळी हकीकत सांगितली. तांत्रीकाने खुप चांगला प्लान केला होता ते हिरे परत मिळवण्यासाठी पण त्याला त्याच्या नशीबाने साथ दिली नाही आणि शेवटी तो पोलिसांच्या सापळ्यात अडकला .. ‘’ सरपंच बोलायचे थांबले. एव्हाना पोलिसांनी त्या तिघांच्या हातात बेड्या ठोकल्या होत्या.

 – समाप्त –

लेखक – श्री देवा गावकर  

संग्राहिका –  सुश्री पार्वती नागमोती

मो. ९३७१८९८७५९

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लाइटर – कथा – भाग १ – लेखक – श्री देवा गावकर ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

? जीवनरंग ❤️

☆ लाइटर – कथा – भाग १ – लेखक –  श्री देवा गावकर ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

शांतीपूर गाव आपल्या नावाप्रमाणे शांततेत नांदत होते . पण एक दिवस असे काही घडले ज्यामुळे गावातील शांतता नाहीशी झाली . त्या गावात  एक तांत्रीक आला होता आणि तो सरपंचाच्या घरात  सापडला. तो लोकांना सांगत होता ” मी त्या घरात असलेल्या एका दुष्ट आत्म्याला पकडण्यासाठी आत गेलो होतो . ” पण लोकांना वाटले तो ढोंगी आहे आणि चोरी करण्यासाठी सरपंचाच्या घरी गेला असावा म्हणून गावातील लोकांनी त्याला मारहाण केली .  त्याने परत लोकांना विनंती केली ” मला त्या आत्म्याला कैद करण्यासाठी मदत करा, नाहीतर ती आत्मा गावातच भटकत राहणार आणि इतरांना त्रास देणार . “

लोकांनी तर अगोदरच त्याला ढोंगी ठरवला होता मग त्याच्या सांगण्यावर लोक कसे विश्वास ठेवणार होते? लोकांनी त्याचे ऐकले नाही आणि त्याला हाकलून लावला .

त्याच रात्री गावातील एक माणुस सिगरेट ओढत होता तेव्हा त्याच्या जवळ एक अनोळखी माणूस  आला आणि म्हणाला ” शंकरराव मला पण एक सिगरेट दे ना “

” कोण आपण ? आणि मला कसे काय ओळखता? मी तर तुम्हाला या आधी कधी पाहिलं पण नाही . ” शंकररावाने उलट प्रश्न केला .

“माझे नाव शामराव मी आता याच गावात राहणार . ” त्याने उत्तर दिले .

” पण तुम्ही मला कसे ओळखतात ? ” शंकररावाने परत प्रश्न केला .

“मी या गावातील सर्व लोकांना ओळखतो . गावात राहणार म्हटल्यावर सगळ्या गावकऱ्यांची ओळख असायलाच पाहिजे नाही का? ” शामराव शांतपणे म्हणाला .

“हो ते बरोबरच आहे म्हणा तुमचं पण राहणार कुठे तुम्ही ? “

“ते पिंपळाचे झाड दिसते ना तिथेच राहणार . ” असे म्हणत तो शंकररावाच्या हातातील सिगरेट घेऊन पिंपळाच्या झाडाकडे जाऊ लागला .

शंकरराव त्याला बघतच राहिला . बघता बघता तो त्या पिंपळाच्या झाडावर चढू लागला . शंकरराव त्याचे  हे वागणे बघून थोडा घाबरला पण त्याचे लक्ष अजूनही शामरावाच्या हालचालींवर खिळून होते . शंकरराव त्याला बघत होता तेवढ्यात मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला . शंकररावाने  वळून पाहिले तर मागे शामराव हातात विडी घेऊन उभा होता .

शंकररावाचे लक्ष परत पिंपळाच्या झाडावर गेले तर तिथे कोणीच नव्हतं . शंकरराव आता मात्र खुपच घाबरला . तो थरथरत्या पावलांनी पळू लागला . त्याच्या मागे शामराव धावत होता . शामराव जोराने ओरडत होता . ” शंकरराव सिगरेट तर दिली आता लाइटर कोण देणार? ” .

शंकरराव एकदाचा पळत पळत आपल्या घरी पोहचला . त्याला अशा अवस्थेत पाहुन घरचेही चिंतीत झाले . त्याने घडलेला प्रकार सर्वाना सांगितला .

त्या रात्री त्याला झोपच लागत नव्हती . परत परत शामरावाचा चेहरा त्याच्या डोळ्यांपुढे येत होता . त्याची नजर खिडकीवर पडली तिथे त्याला कोणाची तरी सावली दिसत होती . त्याची खिडकी जवळ जाण्याची हिंमत होत नव्हती . शेवटी तो देवाचे नाव घेत घेत खिडकी जवळ गेला आणि खिडकी उघडली बाहेर शामराव हातात सिगरेट घेऊन उभा होता . शंकररावाला बघताच तो म्हणाला ” शंकरराव लाइटर द्या ना लाइटर ” . शंकरराव जागीच कोसळला .

दुसर्‍या दिवशी त्याने घडलेला सगळा प्रकार गावात सांगितला . तेव्हा गावातील आणखीन काही लोकांनी त्या रात्री त्यांच्या सोबत घडलेले अनुभव सांगितले .

तो सगळ्या लोकांकडे लाइटर मागत होता. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . लोकांना तांत्रीकाला मारल्याचा पश्चाताप होऊ लागला . त्यांना आता खात्री पटली होती की तो तांत्रीक खरोखर सरपंचाच्या घरात आत्म्याला पकडण्यासाठी आला होता . लोकांना वाटत होते कदाचीत तो आत्मा शामरावाचा असावा आणि तांत्रीकाने सांगितल्याप्रमाणे आता त्याचा आत्मा गावात भटकत असून सर्वांना त्रास देत असावा.

लोकांनी त्या तांत्रीकाला शोधून परत गावात आणण्याचे ठरवले. लोकांनी त्या तांत्रीकाला शोधण्याची मोहिम सुरु केली . लोकांनी खुप शोधाशोध केली शेवटी तो एका शेजारच्या गावात त्यांना सापडला . सर्वात अगोदर लोकांनी त्याची क्षमा मागितली आणि गावात घडलेल्या सगळ्या घटना त्याला सांगितल्या आणि लोक त्याला  आपल्या गावात घेऊन गेले. त्यांनी तांत्रीकाला त्या आत्म्या बद्दल विचारले .

तांत्रीकाने एक लांब श्वास घेतला आणि सांगायला सुरवात केली ” शामराव आणि भीमराव हे दोघे भाऊ होते . त्यांचे वडिल एक तांत्रीक होते आणि आपली विद्या त्याने आपल्या दोघा मुलांना शिकवली होती. वडिलांच्या मृत्युनंतर भीमराव व्यसनाच्या आहारी गेला. तो आपल्या मित्रांसोबत सिगरेट आणि दारू पिण्यात वेळ वाया घालवायचा.

दुसरीकडे शामराव आपल्या तांत्रीक विद्येत भर घालत होता. तो गावोगावी फिरून भटकत असलेल्या आत्म्यांना एका लाइटर मधे बंद करायचा आणि एका  विशिष्ट ठिकाणी नेऊन त्यांना आपल्या मंत्राद्वारे मोक्ष प्राप्ती करण्यास मदत करायचा.  एक दिवस शामराव कुठेतरी बाहेर गेला होता म्हणून भीमरावाने पार्टी करण्यासाठी त्याच्या घरी मित्रांना बोलवले होते. मित्र आल्यावर भीमराव दारू आणायला बाहेर गेला होता. त्याचे मित्र सिगरेट पेटवण्यासाठी लाइटर शोधू लागले. लाइटर शोधता शोधता ते शामरावाच्या खोलीत गेले. तिथे त्यांना एक लाइटर मिळाला. पण खूप प्रयत्न करून सुद्धा तो लाइटर पेटत नव्हता. लाइटर पेटत नाही म्हणून रागाने त्यांनी तो जोरात जमिनीवर आपटला . लाइटरचे दोन तुकडे झाले तेवढ्यात तिथे भीमराम आला आणि जोराने ओरडला  ” हे काय केले तुम्ही, हा साधासुधा लाइटर नव्हता या लाइटर मध्ये एक दुष्ट आत्मा कैद होता. आता आपले काही खरे नाही. चला पळा इथून “

क्रमशः भाग १

लेखक – श्री देवा गावकर  

संग्राहिका –  सुश्री पार्वती नागमोती

मो. ९३७१८९८७५९

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उथळ पाणी — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ उथळ पाणी — भाग 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

(“अमोल, अशी काय रे ही तुझी मैत्रीण? कशी वागते बोलते. नवरा बिचारा बरा वाटला.”

अमोल हसत म्हणाला, “ मुक्ता,अशीच आहे ग ती लहानपणा पासून.) — इथून पुढे —-

अमोलने मुक्ताला तिची आणि आपली सगळी हकीगत सांगितली. अगदी,मी तिला लग्नाचे विचारले होते,हेही त्याने खुलेपणाने सांगितले मुक्ताला.

मुक्ता हसली,आणि म्हणाली, “ अमोल कठीणच झाले असते तुझे.. ही तुझ्या आयुष्यात आली असती तर..  काय रे तो मेक अप आणि उथळ रहाणी. अमोल, पश्चाताप तर नाही होत ना, माझ्या सारख्या साध्यासुध्या मुलीशी लग्न केल्याचा?” 

अमोल गंभीरपणे म्हणाला, “ मुक्ते,तू आयुष्यात आलीस आणि मला कळून चुकले की,संध्याला विचारणारा मी किती मूर्ख होतो ग त्यावेळी. पण ते काफ लव्ह ग. काही तरी समजतं का त्या वेड्या वयात? देवानंच वाचवलं बरं मला.” 

मुक्ता हसली आणि म्हणाली, “ गम्मत केली रे. पण खरोखरच काही माणसे किती उथळ असतात ना… विशेषतः बायका ! मेकअप, साड्या, खरेद्या, पार्ट्या,,यापलीकडचं जगच माहीत नसतं त्यांना. बुद्धी, व्यवहार हेही आयुष्यात महत्वाचे असते, बाईला स्वतःची आयडेंटिटी हवीच, हे कसे रे लक्षात येत नाही त्यांच्या? मग आपण,आपली मुले फारच वेगळे  आहोत .. यांच्या बेगडी जगापेक्षा.”

” नाही  मुक्ता. तू फार सुंदर आहेस. किती साधी पण सुरेख राहतेस. काय सुरेख चॉईस असतो तुझा. माझे कपडेही तूच निवडतेस. परवा आपल्या ऑफिसमध्ये आलेल्या डेलिगेट्समधला परेरा विचारत होता 

‘ सर,हा शर्ट फार सुंदर दिसतोय तुम्हाला. आणि मुक्ता मॅडम ची साडी काय सुरेख दिसतेय त्यांना’ .”

मुक्ता म्हणाली, “ बरं बरं !उठा आता. मैत्रीण बघून पोट जरा जास्तच भरले की काय? “ 

दोघेही हसतहसत हॉटेलबाहेर पडले.

अमोल मुक्ताची कंपनी खूपच सुंदर जम बसवू लागली होती. आता त्यांना कंपनी वाढवायची वेळ आली.   रिक्रुटमेन्ट करताना, त्यांनी ऍड दिली आणि होतकरू हुशार मुलं  इंटरव्ह्यूसाठी येऊ लागली. त्यांचे सीव्ही, जॉब एक्सपिरिअन्स बघून अमोल प्रभावित झाला. खरोखरच योग्य अशी सहा मुलंमुली त्यांनी शॉर्टलिस्ट केली. आता दोनच पोस्ट शिल्लक होत्या.

अचानक रिसेप्शनिस्टने कॉल करुन सांगितलं, “ सर, कोणीतरी संध्या कपाडिया म्हणून मॅडम तुम्हाला भेटायचं म्हणताहेत. आधी अपॉइंटमेंट घेतली नाहीये.” 

अमोल म्हणाला, “ बाहेर कोणी आता नाहीये ना? मग पाठव  त्यांना आत.” 

संध्या ऑफिसमध्ये.. अमोलच्या केबिनमध्ये आली.

अमोलने अदबीने म्हटले, “ बस ना संध्या. काय काम होतं?” 

संध्या म्हणाली, ” वावा! मस्तच आहे रे तुझा थाटमाट. छानच सजवलीय तुझी ही केबिन.”

“अग, कराव्या लागतात या गोष्टी संध्या. पण मी मात्र आहे तसाच आहे अजूनही. बरं, बोल. काही काम होतं का? “

“ अरे, परवा आपली भेट झाली ना, तर माझे मिस्टर म्हणाले, बडी असामी  दिसते ही, तुझा मित्र.

 आपल्याला आपला माल एक्स्पोर्ट करायला हे मदत करतील का? “ 

अमोल विचारात पडला.

“ कसले आहे तुमचे मॅन्युफॅक्चरिंग संध्या? मला मिस्टर कपाडियांशी बोलावे लागेल. “ 

“ हो हो जरूर. कधी पाठवू त्यांना?” 

अमोलने त्यांचा सेल नंबर लिहून घेतला, आणि म्हणाला, “ मीच कॉन्टॅक्ट करीन त्यांना.” 

अमोलने त्यांना फोन केला आणि त्यांच्या  मालाची सॅम्प्लसही घेऊन यायला सांगितले.  मिस्टर कपाडिया त्याला अजिबात आवडले नाहीत. ती त्यांची बोलण्याची पद्धत, सतत मी मी  करण्याची वृत्ती त्याला मुळीच आवडली नाही. त्यांनी मशिनरीच्या पार्टसची आणलेली सॅम्पल्स त्याने ठेवून घेतली आणि म्हणाला , ” मी ही माझ्या  क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटकडून तपासून घेईन आणि मगच त्याबद्दल बोलूया.”

लोचट हसत कपाडिया म्हणाले, ” काय  साहेब ! कुठे एवढी बारीक झिगझिग करता? तुमचे कमिशन आपण जास्त देऊ की.”

अमोलला संताप अनावर झाला, पण तो आवरत अमोल म्हणाला, “ असे होणार नाही. तुमचा माल उत्कृष्ट असेल तर तसे समजेलच. या तुम्ही.”

अपेक्षेप्रमाणे कपाडियांचे पार्टस अत्यंत निकृष्ट होते. अमोल ते कधीही परदेशातच काय, पण  इथेही कोणाला विकू धजला नसता. त्याने  कपाडियाना ते परत घेऊन जायला सांगितले, आणि  गोड बोलून आपली असमर्थता व्यक्त केली.

 दुसऱ्याच दिवशी  त्याच्या ध्यानीमनीही नसताना, अचानक संध्या त्याच्या केबिनमध्ये वादळासारखी घुसली.

 अमोल अवाकच झाला तिला बघून.

“बस संध्या, बस ना.” 

“ नको! तुझ्याकडे बसायला नाही आले मी. माझ्या नवऱ्याचा अपमान केलास  तू काल? आमचे प्रॉडक्ट निकृष्ट आहे असे म्हणालास? आज आम्ही बाजारात केवढी पत राखून आहोत, आणि हेच पार्टस सगळीकडे विकले जातात, हे माहीत नाही का तुला? काय रे ?  मोठा  बिझनेसमन आहेस ना तू? उलट तुलाच मदत होईल म्हणून आम्ही हे प्रपोजल दिले तुला.”

अमोलला भयंकर संताप आला. “ संध्या ज्यात तुला काडीची अक्कल नाही, त्यात तू बोलूच नकोस.तुझ्या नवऱ्याने आणलेले प्रॉडक्ट अत्यंत भिकार  आहे आणि ते कोणीही एक्स्पोर्ट करणार नाही.  मला माझी एवढे वर्ष कमावलेली पत घालवायची नाहीये.” 

संध्या आणखीच संतापली आणि म्हणाली, ” मी तुला नकार दिला म्हणूनच ना तू आता  सूड उगवतो आहेस? असा इतका तरी काय मोठा झाला आहेस श्रीमंत? त्याहीवेळी बरोबरच होता माझा निर्णय.. तुला नाही म्हणण्याचा.” 

आता मात्र अमोलला हसायलाच आले.

” संध्या, तुझ्यात काहीही बदल झाला नाही. आहे तशीच अजूनही  महामूर्ख आणि पैशाच्या मागे लागलेली अत्यंत उथळ बाई राहिलीस. वयाबरोबर माणसाला समजूतदारपणा, गांभीर्य येते म्हणतात. पण तुझ्यात  मात्र  एक कणही नाहीये ते. मला राग नाही , पण कीवच येते आहे तुझी. अजून शहाणी हो. डोळे उघडून, मिस्टर कपाडिया नक्की काय करतात ते बघ. तू तर शिकली नाहीसच, पण निदान नवऱ्यावर आंधळा   विश्वास ठेवू नकोस. त्यांना किती कर्जे आहेत, हा पोकळ डोलारा कधी कोसळेल तेही माहीत नाही, तरी तू मला दोष देतेस? खूप ऐकून घेतले आत्ता तुझे, पण ते केवळ आपण बालमित्र आहोत म्हणून. बस झाले. होती तशीच मूर्ख राहिलीस तू. जा आता.”

संध्याच्या चेहऱ्यावर राग, आश्चर्य, दुखावलेपण अशा संमिश्र भावना होत्या. पण अमोलने त्याकडे अजिबात लक्ष न देता, तिला  ताबडतोब जायला सांगितले. त्यावेळी तिने नकार देऊन आपल्यावर उपकारच केले असेच वाटले त्याला.

शांतपणे त्याने मुक्ताला आपल्या केबिनमध्ये बोलावून, हा सगळा प्रकार सांगितला.

मुक्ता म्हणाली, “अमोल,अगदी उत्तम केलेस तू. जिवापाड मेहनत घेऊन आपण ही कंपनी उभी केलीय. असल्या लोकांकडे लक्ष देऊन तू तुझे मनस्वास्थ्य बिघडून देऊ नकोस. सोडून दे रे. हाही एक अनुभव यायचा होता तुला. अरे आपल्या म्हणवणाऱ्या लोकांकडून असेही धडे मिळायला हवेतच ना !”

अमोलने कृतज्ञतेने मुक्ताकडे पाहिले… “ किती शहाणी आणि समंजस आहेस मुक्ता तू.” 

मुक्ता हसली आणि म्हणाली, “ बरं बरं. पुरे आता माझी स्तुती. चल आपण मस्त बाहेर जाऊया. तुला बरं वाटेल.” 

“आम्ही आज लवकर जातोय. पुढच्या अपॉइंटमेंट्स उद्या घे “ असे रिसेप्शनिस्टला सांगून मुक्ता आणि अमोल ऑफिस बाहेर पडले.

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उथळ पाणी — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

?जीवनरंग ?

☆ उथळ पाणी — भाग 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

काशीबाईंच्या चाळीत चार मजले होते. मध्ये मोठा चौक आणि  चारी बाजूना तीन तीन मजली  बिल्डिंग्ज.चाळ आता अगदी जुनी झाली होती आणि बरेच लोक ती सोडून दुसरीकडे रहायलाही गेले होते.अमोल आणि  संध्या यांच्या खोल्याही अगदी लागून लागूनच होत्या. दोघांच्या शाळा वेगळ्या,वेळा वेगळ्या.अमोल नऊ वर्षाचा आणि संध्या सातची. अमोल अभ्यासात अतिशय हुषार !  संध्याला सतत म्हणायचा,  “ किती उनाडक्या करतेस संध्या. देवाने चांगली बुद्धी दिलीय,तर वापर कर की तिचा. छान मार्क्स मिळव.”

संध्या मान उडवून म्हणायची, “ नको रे बाबा. मला कुठे स्कॉलर व्हायचंय तुझ्यासारखं? मी आहे अशीच बरी आहे. पोटापुरते मार्क्स मिळवून पास होतेय ना, बस झालं की.” 

संध्याला आरशात बघण्याचा  विलक्षण सोस. घरी असलेल्या पारा उडालेल्या आरशात सतरा वेळा, माना वेळावून बघणे आणि  पावडर लावून नाना नखरे करणे, हाच छंद संध्याचा. संध्याची आई  वैतागून जायची. बिचारी चार घरी पोळ्या आणि स्वयंपाक करून महिना कडेला न्यायची. संध्याचे वडील एका दुकानात साधे सेल्समन होते. अमोलची घरची परिस्थिती मध्यमच होती, पण संध्याइतकी वाईट नव्हती.

त्यादिवशी अंगणात खेळ अगदी रंगात आला होता. अमोल गॅलरीत उभा राहून बघत होता. संध्या भान विसरून खेळत होती .अमोलने संध्याला हाक मारून वर बोलावले.

“का रे बोलावलेस? किती रंगली होती आमची लगोरी.”

अमोल म्हणाला, “ एवढी मोठी झालीस तरी अक्कल नाही अजून. खुशाल मुलांच्यात  खेळतेस? मूर्ख कुठली. एक तरी मुलगी आहे का बघ तुझ्या बरोबर? किती मूर्खपणा करशील संध्या? नीट अभ्यास कर. तोच येणार आहे आयुष्यात उपयोगाला. कधी  समजणार हे तुला?” 

“ तुला काय करायचंय रे ? माझं मी बघून घेईन.” संध्या मान उडवत म्हणाली. 

मुलं मोठी होत होती. संध्या वयात आली आणि आणखीच सुरेख दिसायला लागली. अल्लडपणा मात्र तिळमात्र कमी झाला नव्हता. अमोल उत्तम मार्क्स मिळवून कॉलेजला गेला. त्याला हे चाळीत राहणे,सतत आयुष्याशी तडजोडी करणे झटकून टाकायचे होते. त्यासाठी एकच उपाय म्हणजे सपाटून अभ्यास करणे आणि  चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे. त्या दृष्टीने प्रयत्न करताना दिवसाचे चोवीस तास कमीच पडत अमोलला. संध्याने आर्टस् ला प्रवेश घेतला. काहीच ध्येय नसताना आणि कोणतेही प्रयत्न न करता,कसे उत्तम मार्क्स मिळणार होते संध्याला?

अमोलला ती भेटली तेव्हा मनापासून हळहळला अमोल. “ काय हे मार्क्स संध्या ! अग, जरा लक्ष दिले असतेस तर सुरेख मार्क्स मिळून सायन्स ला नसती का मिळाली ऍडमिशन?”

संध्या म्हणाली, “ छे रे.कोण करणार ती मगजमारी.मी बरी आहे रे ! तू उगीच नको काळजी करू माझी.”

अमोल  उत्तम मार्क्स मिळवून पवईला गेला. फार अभिमान वाटला, त्याच्या आई वडिलांना. आता अमोल मागे वळून बघणार नाही,ही खात्रीच झाली त्यांची ! अमोलने संध्याला गाठले, आणि म्हणाला,” आज येशील माझ्या बरोबर हॉटेलमध्ये? माझ्या  रिझल्टची पार्टी करू आपण.”

… संध्या अमोलबरोबर आनंदाने हॉटेलमध्ये गेली. अमोलने तिला विचारले, “संध्या तू खूप आवडतेस मला. मी आवडतो का तुला? अजून आपण लहान आहोत, पण मोठे होऊन मी सेटल झाल्यावर लग्न करशील माझ्याशी?” 

संध्या म्हणाली, “ काय ? लग्न ? आणि तुझ्याशी?.. काहीही काय…. माझ्या आयुष्याच्या कल्पना खूप वेगळ्या आहेत. तुला त्यात जागाच नाही. मी माझ्या रूपाच्या बळावर बघच कसा रिची रिच नवरा पटकावते ते… मला उबग आलाय या दरिद्री भिकार आयुष्याचा. आणि देवाने दिलेले हे रूप हीच माझी जमेची बाजू आहे. मी त्याचा वापर करणार आणि श्रीमंत नवरा पटकवणार. माझी स्वप्न पुरी करायला तुला सात जन्म लागतील. मी कधीही तुझा विचार करणार नाही लग्नासाठी. एका चाळीतून उठून पुन्हा  दुसऱ्या चाळीतच जाणार नाही मी ! थँक्स फॉर पार्टी हं। पण तुला बेस्ट लक तुझ्या भविष्यासाठी.” — अमोलचा अपमान करून संध्या तिथून गेली.

अमोलने आपले लक्ष पूर्णपणे अभ्यासावर केंद्रित केले. स्कॉलरशिप टिकवायची तर त्याला उत्तम ग्रेडस  मिळायलाच हव्या होत्या ना. त्याला संध्याच्या उथळपणाचा संताप आला आणि कीवही आली. आयुष्यात असे शॉर्टकट्स शोधून हिच्या  हाती काहीही  लागणार नाही, हे त्याने ओळखले. त्याने तिचा विचार मनातून काढून टाकला. अमोल  बीटेक् उच्च श्रेणीत पास झाला. संध्या एव्हाना बी.ए.. होऊन कुठेतरी नोकरी करत होती. अमोलला  खूप छान नोकरी मिळाली आणि अमोलने मोठा ब्लॉक बुक केला. अमोल आणि त्याचे आईवडील चाळ सोडून ब्लॉकमध्ये राहायला गेले. चाळीशी त्यांचा मग संबंधच उरला नाही. अमोल आता  त्याच्या नोकरीत खूप व्यग्र होता.

काळाची बरीच पाने उलटली मग…….  

अमोलने त्याच्याच कंपनीतल्या हुशार आणि  इंजिनिअर असलेल्या मुक्ताशी लग्न केले. मोठी मोठी पदे भूषवीत अमोल आता एका मोठ्या कंपनीचा एम डी झाला होता.

त्याच्या कानावर गोष्टी येत होत्या पण चाळीशी त्याचा काहीच संबंध येत नव्हता. मध्यंतरी त्याने ऐकले, संध्याने एका गुजराथी मुलाशी लग्न केले,आणि खूप श्रीमंतीत ,सुखात आहे ती. अमोलला बरे वाटले, आणि संध्याचे स्वप्न पुरे झाल्याचा आनंदही त्याला  मनापासून झाला. अमोलची मुलं मोठी झाली. मोठा आशिष उच्च शिक्षणासाठी परदेशी गेला आणि मुलगी लग्न होऊन सासरी दिल्लीला गेली.

मध्यंतरी अमोलला मुंबईला कामानिमित्त जावे लागले. मुक्ता आणि अमोल दोघेही ऑफिसचे काम संपवून,  फोर्टमधल्या पॉश हॉटेल मध्ये जेवायला गेले. पलीकडच्या टेबलावरची बाई त्यांच्याकडे निरखून बघत होती. तिच्याबरोबर तिचा नवरा असावा बहुतेक. न राहवून ती अमोलच्या टेबल जवळ आली आणि म्हणाली, “तुम्ही अमोल ना?”

“ अरे.. तू संध्या ना ? कित्ती वर्षांनी भेटतोय ग आपण ! मुक्ता,ही संध्या. आम्ही अगदी बालमित्र आहोत हं,चाळीत रहात होतो तेंव्हापासूनचे ! “

संध्याला भेटून अमोलला मनापासून आनंद झाला. संध्या मजेत दिसत होती. पक्की शेठाणी झालेली दिसत होती.भरपूर मेकअप,दागदागिने,लठ्ठ सुटलेले श्रीमंत शरीर.

“ या तुझ्या मिसेस ना? काय करतात या?”

मुक्ताला जरा राग आला ,पण ती म्हणाली, “ संध्याताई, मीही तुमच्या मित्राच्याच कंपनीत आहे हं।आम्ही  दोघांनी आठ वर्षांपूर्वी, अमोल एक्स्पोर्ट-इम्पोर्ट कंपनी सुरू केली आहे. 

संध्याचा नवराही एव्हाना त्यांच्याजवळ आला होता.

“ बाप रे ! ती इतकी मोठी  इम्पोर्ट एक्स्पोर्ट कंपनी तुमची आहे? अमोलभाई, ग्रेटच. संध्या, अगं केवढे मोठे नाव आहे यांच्या कंपनीचे मार्केट मध्ये. खूप छान वाटले,तुम्हा दोघांना भेटून.” संध्याचा नवरा अगदी सरळपणे म्हणाला.

“असेल बाई! मला त्यातले काही समजत नाही. आपल्याला आज पार्टीला जायचंय, लक्षात आहे ना?आणि खरेदीही करायचीय अजून !” संध्याने  दुर्लक्ष करत म्हटले, आणि निरोप घेऊन ती निघून गेली.

मुक्ताला अगदी संताप आला तिचा.

“अमोल, अशी काय रे ही तुझी मैत्रीण? कशी वागते बोलते. नवरा बिचारा बरा वाटला.”

अमोल हसत म्हणाला, “ मुक्ता,अशीच आहे ग ती लहानपणापासून.”

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ संगम… ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

 

? जीवनरंग ?

☆ संगम…  ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

“ग्रॅनी, ग्रॅनी”, अशा हाका ऐकू आल्या आणि वंदनाच्या गळ्यात दोन लाडिक हात पडले. गळामिठी घालत इरानं वंदनाच्या गालावर ओठ टेकले.

“इथं काय करतीस? कम कम मीट माय फ्रेंड्स.”, म्हणत इरानं तिला ओढतच हॉलमध्ये आणलं. हॉलमधल्या प्रशस्त सोफ्यावर तिच्या दोन फ्रेंड्स बसल्या होत्या. वंदनाच्या मते पसरल्या होत्या. त्यांचे आधुनिक कपडे त्यांना पसरू देत नव्हते. तरीही त्यातल्यात्यात त्या पसरल्या होत्या. काव्या आणि सौम्या अशा नावांनी स्वतःची ओळख त्यांनी सांगितली खरी. पण आवाजात माधुर्य नव्हतं ना वागण्यात मार्दव. दोघींनीही ‘हाय’ म्हणून हात हालवला. वंदना देखील ‘हाय’ असं म्हणत एका बाजूच्या खुर्चीवर टेकली. त्या मऊ आलिशान खुर्चीवर बसताना ती थोडी सुखावलीच. पाठ आणि मान छान टेकवता येत होती. खांद्यांना रग लागत नव्हती. शिवाय खुर्चीची उंची अशी होती की तिचे गुडघेही कुरकुरले नाहीत. शेजारीच बसलेल्या माधुरीला ती म्हणाली देखील,” हा तुमचा सोफा छान आहे हो.” “आई,अहो सोफा नाही बरं,काऊच म्हणायचं.”, त्यांच्याकडं हलकेच हसून बघत माधुरीनं सांगितलं. वंदनानं हसून मान हलवली.

वंदना मुंबईत राहणाऱ्या आपल्या लेकाच्या, मोहनच्या घरी आली होती. आल्यापासून ती बघत ‌होती.  वंदना तशी सुशिक्षित होती, समंजस होती. हिरानंदानी संकुलातला हा फ्लॅट आलिशान होता. कोल्हापूरातील तिचं घर काही तसं लहान नाही. पण ते तसं साधंसुधं आहे. बाहेरच्या खोलीत ठेवलेल्या खुर्च्या उठता बसता तिच्या गुडघ्यांसारख्याच कुरकुरतात. तिला दाखवायला नेलं तेव्हा तर सतरंजीवर मांडी घालून बसली होती ती. इरा अशी खाली बसेल का? ‘मॉम आय वोंट. माझा ड्रेस स्पाॉईल होईल ना.’ इरावर चुकुन कुठं तरी खाली बसायचा प्रसंग आला तर ती कशी बोलेल या कल्पनेनं तिला हसू आलं. ओठांवर आलेलं हसू दाबून ती माधुरीला म्हणाली, “अगं यांच्यासाठी काही खायला आणते.” “आई,” माधुरी म्हणाली, “तुम्ही आणलेला चिवडा लाडू देऊ यांना. चला, मी पण येते.”

दोघी किचनमधे आल्या. वंदनानं डबा काढेपर्यंत माधुरीनं प्लेट्स काढल्या. फराळाचे पदार्थ छान मांडले. ट्रेमधून ते बाहेर गेले. सेंट्रल टेबलवर विराजमान झाले. चिवचिवाट करत त्या दोघींनी आनंदानं त्यांचा स्वाद घेतला. मग काचेच्या ग्लासमधून आलेल्या विकतच्या बाटल्यांमधल्या रंगीत सरबताचा रसास्वाद घेऊन त्या गेल्या. जाताना एकमेकिंना शेकहॅंण्ड देऊन, गळामिठी घालायला त्या विसरल्या नाहीत. वंदनाच्या गळ्यात पडून तिलाही चिवडा खूप टेस्टी होता सांगायला विसरल्या नाहीत. अंधार पडू लागला होता. पण ‘हा s s य’ ‘ बा s s य’, ‘सी यू टुमारो s s ‘ करत बाळ्या पळाल्या. 

‘टेक केअर’, असं म्हणत माधुरीनं पसारा आवरायला घेतला. काही वेळानं वंदनाच्या लक्षात आलं की काव्या आणि सौम्याच्या आईचे मुली घरी पोचल्याचे मेसेजेस माधुरीला आले आहेत. पिढी बदलली, राहणीमानात बदल झाला, वागण्या बोलण्यात आधुनिकता आली तरी मनातली काळजी तीच आहे. वंदनाचे ओठ समाधानानं हसले.

रात्री जेवणं झाल्यावर ओटा-टेबल आवरताना वंदनाच्या शब्दकोशात भर पडली. किचन कॅबिनेट, बोऊल, स्पून, डस्टबीन, थ्रॅश. . .

दोन चार दिवसात तिचा शब्दकोश समृद्ध झाला. दोन चार दिवसात ती या जीवनपद्धतीला काहीशी सरावली. घरातील प्रत्येक सदस्याला स्वतंत्र खोली. अर्थात कपडेपट, कॉट, अभ्यासाचं टेबल, बाथरूम सगळंच स्वतंत्र. मोहनची दोन्ही मुलं आपापल्या खोल्यांमध्ये. मुलांना माधुरीनं तशी शिस्त चांगली लावली होती. सवयी चांगल्या लावल्या होत्या. पण एकूणच आधुनिकतेचं वारं वहात होतं.

शुक्रवारची सकाळ आली तसं विकेंड प्लॅनिंग सुरू झालं. शनिवार रविवार वेळ कसा घालवायचा याचा विचार. एक दिवस आऊटिंग!! घरातली चूल बंद. भटकंती, मूव्ही, ट्रेकिंग, रिसॉर्ट, वॉटर गेम्स् इ. इ. कधीतरी यायचं आणि उपदेश करत रहायचं. नको गं बाई. असा विचार करत वंदना या सगळ्यात सामिल झाली. जमेल तेवढ्यात सहभागी झाली. छोटा नऊ वर्षांचा नातू चिंटू तिच्या जास्त जवळ आला. दोस्तीच झाली त्याची आजी बरोबर.

ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेलेला मोहन रविवारी रात्री परत आला. रात्री तो वंदनाच्या खोलीत आला. काहीतरी वेगळं सांगायचं असलं की आईच्या मांडीवर डोकं ठेवून सांगत असे. तो खोलीत आला तेव्हा चिंटू आजीच्या मांडीवर झोपला होता. वंदनानं ओठावर बोट ठेवून चिंटूला हळूच खाली ठेवलं.

 “अरे व्वा! साहेबांनी माझी उशी पळवली वाटतं.”असं म्हणत त्यानं आईच्या मांडीवर डोकं टेकलं आणि काही न बोलताच तो झोपी गेला. त्याच्या चेहऱ्यावर शांत, समाधानी भाव होते. गप्पा मारत मारत झोपायची त्याला सवय होती. काल आल्यापासून तो बघत होता. बऱ्याच गोष्टींमधला बदल त्याला जाणवला.

संध्याकाळी जेवताना इरा आणि चिंटू टेबलवर जेवायला बसले होते. गरम गरम भाकरी,पिठलं, लसूण चटणी, भात असा साधा बेत. पण आजी बरोबर गप्पा मारत चवीनं जेवण चालू होतं. महत्त्वाचं म्हणजे टी. व्ही. बंद होता. इरा तिच्या शाळेत शिकवलेल्या कवितेविषयी सांगत होती. आणि चिंटू लक्ष देऊन ऐकत होता. जेवल्यानंतर आजीच्या पदराला हात पुसत चिंटूची गोष्टीसाठी गडबड सुरू झाली. इरा आईला ओटा आणि टेबल आवरायला मदत करू लागली.

माधुरीनं त्याला सांगितलं की, “आई आल्यापासून सगळे एकत्र जेवतात. शिवाय आजीला चालत नाही तर तू आजीसाठी करशील तेच आम्हालाही दे असा आग्रह धरतात. काही तरी जादू आहे हं आईंच्या कडं.  आजीची आणि नातवंडांची गट्टी जमलीय अगदी.”  माधुरीचा सूर थोडा चेष्टेचा असला तरी ती खूष होती हे लक्षात येतंच होतं.

बघता बघता वंदनाला मोहनकडं येऊन पंधरा दिवस झाले. आज ती परत जाणार होती. महालक्ष्मीसाठी घरातून बाहेर पडण्याची वेळ होईपर्यंत दोन्ही नातवंडं आजी भोवती फिरत होती. त्यांनी बाबांच्या कडून दिवाळीला कोल्हापूरला जायचं कबूल करून घेतलं होतं. आजीकडून शिवाजीच्या गोष्टी ऐकायच्या होत्या. किल्ला करायचा होता. इराला मोठी रांगोळी काढायला शिकायचं होतं. इथून पुढं प्रत्येक दिवाळी कोल्हापूरला साजरी होणार होती आणि मे महिना मुंबईत, हो. . ‌ पण दरवर्षी निदान एक तरी किल्ला बघायला जायचंच. . अशा अनेक नवीन गोष्टी पक्क्या वदवून घेऊनच वंदनाला कोल्हापूरला परतायची परवानगी मिळाली होती. या पंधरा दिवसांत आधुनिक राहणीमान आणि जुन्या सवयींचा प्रयत्नपूर्वक मेळ घालण्यात वंदनाला थोडंसं यश मिळालं होतं. दोन पिढ्यांचा संगम झाला होता. नातवंडांच्या साखरगप्पा आठवत वंदनाचा प्रवास सुरू झाला.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन नं : 9665669148 ईमेल : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका कर्जाची परतफेड – भाग 3 – सुश्री मालती जोशी ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ एका कर्जाची परतफेड – भाग 2 – सुश्री मालती जोशी ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पहिले – या अनोख्या जिद्दीची गोष्ट मॅडमच्याही कानावर गेली. त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि मग मला म्हणाल्या, `जया तिच्या अबोध मनात सगळ्यांसठी काही ना काही करण्याची इच्छा घर करून राहिलीय. तिचं मन मोडू नको. . तिला सांग, की तिने तिच्या वर्गातील मुलींना अभ्यासात मदत करावी.’ आता इथून पुढे )

ही व्यवस्था सगळ्यांनाच आवडली. रामकुँवर जशी वॉर्डाचीच झाली. दिवसभर हिंदी, इंग्रजी, इतिहासाची प्रश्नोत्तरे वाचून दाखवायची. कुणी सांगितलं, तर सायन्समधला भागही पुन्हा वाचून दाखवायची. खरं तर तो काही तिचा विषय नव्हता. कधी कुणासाठी डेस्कमधली वही शोधून आणायची. कधी कुणासाठी लायब्ररीच्या पुस्तकातील काही भाग लिहून काढायची. याशिवाय जरा करमणूक म्हणून मासिकांचं वगैरे वाचन व्हायचं. औषध देणे,  मोसंब्याचा रस काढून देणे,  ताप बघणे,  कपाळाला बाम लावणे याही गोष्टी साईड बिझनेसप्रमाणे चालू असायच्या.

परीक्षा सुरू होईपर्यंत सगळ्या बिछान्यातून उठल्या होत्या. तरीही आजारी असताना जो अभ्यास झाला होता,  त्याचा खूपच आधार वाटत होता. जेव्हा त्या मुक्तकंठाने रामकुँवरला धन्यवाद देत,  तेव्हा तिचा चेहरा आनंदाने फुलून यायचा.

२२ मार्चला परीक्षा संपल्या. मुली हॉस्टेल सोडून जाण्याच्या दोन दिवस आधी अश्रू आणि विषदात बुडून गेले. दर वर्षी मला या करुण प्रसंगातून जावं लागतं. मुलीची सासरी पाठवणी करण्याचं दृश्य डोळ्यापुढे येतं. पण चुकूनही मनात अशी इच्छा होत नाही  की या नापास होऊन पुन्हा अभ्यासाठी इथे याव्या.

रामकुँवरने जाण्याची कोणतीच घाई दाखवली नाही. विचारलं,  `दीदी मी तीन-चार तारखेला गेले तर चालेल?’

`माझी काय अडकाठी असणार? पण बोअर होशील. तुझ्याबरोबरीच्या सगळ्या निघून जातील.’

`जाऊदेत. मला हे जीवन पुन्हा कधी जगायला मिळणार, म्हणून जास्तीत जास्त इथे राहू इच्छिते’.

माझं मन भरून आलं. माझी सम्मती घेऊन तिने ४ एप्रीलला भावाला नेण्यासाठी पत्र लिहीलं. मग माझ्याकडे येऊन म्हणाली, `दीदी बाकीच्या मुलींच्या परीक्षा अजून व्हायच्या आहेत. मी त्यांच्या कामात थोडी मदत करू?’                                                                                                           

`काय विचार करून मी तिला हो म्हंटलं कुणास ठाऊक?  मग एक आश्चर्य माझ्यापुढे आलं. तीन पावलात पृथ्वी व्यापणार्‍या वामनाची कथा अनेक वेळा ऐकली होती. पण दोन हातात सगळं हॉस्टेल व्यापणारं आश्चर्य माझ्या डोळ्यांनी पाहू लागले.

प्रथम तिने हॉस्टेलचे सारे नियम लक्षात घेऊन आशाकडून भोजन कक्षाची,  मीनाकडून प्रार्थना कक्षाची,  सुलभाकडून घंटा देण्याची…. अशी सारी कामे आपल्या हातात घेतली. सकाळी पाच वाजता उठायची आणि रात्री साडे दहा वाजता घंटा देऊन झोपायची. लहान मुलींच्या वेण्या घालायची. बिछाने स्वच्छ करायची. नंतर टेबल, ड्रॉवर वगैरे ब्रासोने पॉलीश करायची. मग त्यांना हिशोब समजावत माझ्या खुर्चीच्या कव्हरवर भरतकाम करायची.

`अग, जरा आराम कर!’  मी म्हणायची. `घरी जाऊन आरामच तर करायचा आहे.’

खुर्चीचंकव्हर तयार झालं. खुर्ची झाडून पुसून तिने नवीन कव्हर घातलं. टेबलक्लॉथदेखील नवीन घातला.

मॅडम खूप दिवशांनी त्या दिवशी राउंडलाआल्या. बहुतेक कुठे तरी एक्झॅमिनर म्हणून गेल्या असाव्यात. माझ्या खोलीपुढून जाताना थबकल्या.

`जया काय आहे?  तुझी खोली एकदम चमकतेय!’

`जी. हे सगळं रामकुँवरचं कर्तृत्व आहे. तिला भीती वाटली, की मी तिला विसरून जाईन, म्हणून माझ्या कपाटापासून दरवाजापर्यंत तिने सारी खोली आपल्या रंगात रंगवली. आता सकाळ संध्याकाळ तिची आठवण केल्याशिवाय इलाज नाही!’  मी म्हंटलं.

`व्हेरी गुड’  मॅडमनी तिच्या भरतकामाची प्रशंसा करत म्हंटलं. `पण दीदीवर मेहेरबानी आणि आमच्यासाठी काहीच नाही! खरं सांग,  माझ्यापेक्षा यांचाच आरडा-ओरडा तुला जास्त ऐकून  घ्यावा लागलाय नं?’  मॅडम हसत हसत म्हणाल्या.

रामकुँवर जशी संकोचाने धसून गेली होती. मग हळूच म्हणाली, `आपल्याला… आपल्याला काही देण्याचा विचार तर मी करूच शकत नाही!’

श्रद्धेने ओतप्रोत भरलेलं हे वाक्य ऐकून मॅडमनी तिला जवळ घेतलं आणि मिठी मारली. रुबाबदार गौरवर्णीय व्यक्तिमत्वापुढे तिचं बुटकं,  सावळंसं शरीर मोठं गमतीदार वाटत होतं.

मॅडम दाटलेल्या गळ्याने म्हणाल्या. `आम्ही रामकुँवरला यासाठी लक्षात ठेवू, की तिने आम्हाला काहीच दिले नाही.’  आणि त्यांनी तिच्या माथ्यावर आपले ओठ टेकले.

मॅडमना इतकं भावविव्हळ झालेलं मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं.

– समाप्त – 

मूळ लेखिका – सुश्री मालती जोशी  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका कर्जाची परतफेड – भाग २ – सुश्री मालती जोशी ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ एका कर्जाची परतफेड – भाग २ – सुश्री मालती जोशी ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर 

(मागील भागात आपण पाहिले –  ती गेल्यानंतर मॅडम म्हणाल्या, `ही चोरी आहे. विशुद्ध चोरी. पैसे परत नाही मिळणार. लिहून ठेव. आता प्रश्न असा , की पुढे काय करायला हवं?’  आता इथून पुढे)

‘ती पुन्हा पैसे मागवायला तयार नाही.’ मी म्हंटलं.

‘ती तयार झाली,  तरी मी तिला मागवू दिले नसते. असा विचार करा, हा आपल्या संस्थेवर कलंक आहे.’  त्या म्हणाल्या.

`मग काय करायचं?  दहा –पंध्रा रुपयाची गोष्ट असती, तर…’

`तू पण दिले असतेस, होयनं?  मग मी नाही का देऊ शकणार?  पण हा काही समस्येवरील उपाय नाही झाला. बरं असं करा,  प्रार्थनेनंतर सगळ्या मुलींना थांबायला सांग. मी येईन.’

मी घाईघाईने हॉस्टेलवर परत आले आणि प्रार्थना हॉलचं निरीक्षण केलं. या महिन्यात प्रार्थना हॉलची जबाबदारी किरणवर होती. ती मोठ्या भक्तिभावानेसगळी तयारी करत होती. मोठ्या मॅडम येणार आहेत हे कळल्यावर तिने धूप-दीप पात्र आणखी चमकवली. दोन-चार उदबत्त्या जास्तीच लावल्या. भजन करण्यासाठी निशा आणि माणिकची निवड केली. त्यामुळे भजन जरा नीट ताला-सुरावर म्हंटलं जाईल. मॅडमचं काय सांगाव? कधी गुपचुप येऊन बसतील कळणारही नाही. कारण प्रार्थनेच्या वेळी कुणी तरी उठून त्यांना सन्मानाने बसवावं,  हे त्यांना आवडतनसे. नेहमी गुपचुप येऊन बसायच्या.

प्रार्थना संपल्यावर बघितलं,  मॅडम येऊन खिडकीत बसल्या आहेत. ती त्यांची आवडती जागा होती. त्यांनी तिथूनच बोलायला प्रारंभ केला. प्रथम या चोरीसाठी त्या सगळ्यांवर खूप रागावल्या. रामकुँवरच्या निष्काळजीपणाबद्दल तिलाही थोड्याशा रागावल्या. सदाचाराबद्दल एक चांगलंसं भाषण दिल्यानंतर म्हणाल्या, ` चोरी हॉस्टेलमध्ये झालेली आहे आणि चोर सापडला नाही. तेव्हा ही आपल्या सगळ्यांची सामुहिक जबाबदारी आहे. याचा दंड आपल्या सर्वांना द्यावा लागेल. सगळ्यात आधी तुमच्या दीदीला या दंडात सहभागी व्हावं लागेल. त्या असताना अशी घटना घडली, ही मोठी शरमेची गोष्ट आहे. माझी अशी इच्छा आहे, की त्यांनी दहा रुपये माझ्यापाशी जमा करावे.’

मुली अगदी स्तब्ध, शांत झाल्या. मला जरा तिरक्या मजरेने मॅडमकडे पहावसं वाटलं, पण हसू फुटलं, तर सगळा मुद्दामहून केलेल्या बनावाचा प्रभाव संपून जाईल.

`तुम्हा मुलींनाही या नुकसानीतला थोडा वाटा उचलावा लागेल. आपल्याकडे ७२ मुली आहेत. एक रामकुँवर आणि प्रायमरी स्कूलमधल्या मुली सोडल्या,  तर संख्या होते ६०. प्रत्येक मुलगी उद्या सकाळी आठ आठ आणे दीदीपाशी जमा करेल.’ आणि मग माझ्याकडे बघत म्हणाल्या, `उद्या नऊवाजेर्पंत माझ्याकडे पैसे आले पाहिजेत. दहा रुपये दंड मी भरेन. माझ्या अनुशासनात जरूर काही तरी कमतरता राहिली असणार, म्हणून आपल्याला अशी खोडी काढाविशी वाटली. मी आशा करते, की भविष्यात मला भारी दंड भरावा लागणार नाही.’

मॅडम जाताच मुलींच्यात खुसफुस सुरू झाली. कुणी मॅडमची प्रशंसा करत होतं, कुणी चोराला शिव्या-शाप देत होतं. कुणी कुणी ही रामकुँवरचीच चलाखी आहे असे म्हणत होत्या. कुणी कुणी हे अन्यायकारक आहे, असेही म्हणत होत्या पण मॅडमनी खरोखरच इतकी सुंदर व्यवस्था केली होती,  की दुसर्‍या दिवशी ९ वाजेपर्यंत सगळी रक्कम जमा झाली आणि रामकुँवरच्या फॉर्म भरण्यात कुठलीच  अडचण आली नाही.

त्या दिवशी मॅडमच्या भाषणानंतर रामकुँवरच्या चेहर्‍यावर विषादाचे जे ढग जमा झाले, ते हटले नाहीत. तिच्या चेहर्‍यावर नेहमी विलसणारा प्रसन्नपणा कुठे तरी लोप पावला होता. ती विझल्या विझल्यासारखी झाली होती. मॅडमनी आपल्या कल्पनेप्रमाणे सर्वांना सांकेतिक शिक्षा केली होती,  पण प्रत्यक्षात रामकुँवरच केवळ शिक्षा भोगत होती. असहाय्य मानसिक व्यथेने तिचं व्यक्तिमत्व करुण बनलं होतं. माझ्या अनुपस्थितीत मुली काही उपहासदेखील करत असतील, पण माझ्यापर्यंत काही तक्रार आली नाही.

जानेवारीच्या  दुसर्‍या आठवड्यात, दर महिन्याप्रमाणे तिच्या भावाची दहा रुपयाची मनीऑर्डर आली. तोच मालगाडीसारखा पत्ता.    

`मुक्काम इंदूरला पोचल्यावर…मेट्रनबाईसाहेबांकडून रामकुँवरला मिळावी.’

नेहमीप्रमाणे मी हसत हसत रामकुँवरला बोलावलं. तिने सही केली. नोट घेतली. पण आपल्या खोलीत न जाता तिथेच उभी राहिली.

मी नेहमीप्रमाणे टेबलवर हिशेबाचं रजिस्टर पसरून बसले होते.

`दीदी’ तिने माझं लक्ष वेधून घेतलं.

`काय?’

तिने काही न बोलता पैसे टेबलावर ठेवले.

`हे काय?’

`आपले पैसे. आपण माझ्या फीसाठी त्यावेळी दिले होते.’ ती चाचरत म्हणाली.

`वेडीच आहेस! अग, तो तर माझा दंड होता. तो काय कुणी परत देतं? ‘

`मला माहीत आहे,  तो कसला दंड होता. ती माझ्यासाठी वर्गणी गोळा केली जात होती. आपण माझे पैसे नाही ठेवून घेतलेत, तर मला खूप वाईट वाटेल.’

`तुला वेड लागलय. मला पैसे देऊन तू तुझा खर्च कसा चालवशील? आणि असं बघ, मी एकटीनं तर दिला नाही नं? बरोबर आहे नं?’

मी कदाचित तिच्या मर्माला स्पर्श केला. ती स्फुंदून स्फुंदून रडू लागली. `सगळ्यांनी दिले. मला माहीत आहे. मी त्यांच्यासाठी काही करू शकणार नाही. त्यांच्या उपकाराची फेड कधीच करू शकणार नाही. दीदी,  आपल्याला कल्पना नाही,  मी या गोष्टीचा किती विचार करते. मी खरोखर कशाच्या तरी लायक असते…’

बाप रे! ही गोष्ट तिच्या मनात इतकी आतपर्यंत जाऊन बसली असेल, याची कल्पना नव्हती. योयोगाने मॅडम त्याच वेळी राउंडला आल्या होत्या आणि माझ्या खोलीच्या उंबरठ्याशी उभं राहून सगळं दृश्य बघतहोत्या.

`आता काय?’  माझ्या नजरेला नजर भिडवत त्यांनीविचारलं.

` या बुद्दूरामला समजावत होते. कशी बहकल्यासारखी बोलते आहे.’ असं म्हणत मी सगळी स्थिती समजावून सांगितली.

राउंड अर्धवट टाकूâन त्या माझ्या खोलीत येऊन बसल्या.

`रामकुँवर’  

`जी…’

`वाल्मिकी रामायण वाचलयस?’

`अं… नाही.’  ती म्हणाली.

मला आश्चर्य वाटलं. आता हे रामायण मधेच कुठून टपकलं. मॅडम विनाकारण तर काही बोलणार नाहीत.

`आणखी थोडी मोठी झालीस की जरूर वाच. खूप चांगलं काव्य आहे्. अनेक हृदयस्पर्शी प्रसंग त्यात आहेत. जसं हा एक प्रसंग! हनुमान जेव्हा सीतेचा शोध घेऊन लंकेतून परत येतो,  तेव्हा श्रीराम गद्गद् होऊन म्हणतात, याच्या उपकाराची फेड कशी करावी?  त्यांना काही कळत नाही. शेवटी ते म्हणतात, ‘उपकाराचं ओझं वागवत राहणंच चांगलं, कारण जेव्हा आपण उपकाराची  परतफेड करू इच्छितो, तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे उपकारकर्त्यावर विपत्ती,  संकट येवो,  अशी कामना करतो,  कारण का, तर उपकाराची परतफेड करता येईल. म्हणून उपकाराच्या परतफेडीची भावना सोडून दिली पाहिजे.’

‘कळलं ना रामकुँवर!’  मॅडम बोलायचं थांबताच मी म्हंटलं. `आता असले मूर्खपणाचे विचार मनातून काढून टाक आणि आभ्यासाला लाग. यावेळी टेस्टमध्ये तुला कमी मार्क मिळाले होते. ही काही चांगली गोष्ट नाही.’

यावर काहीच न बोलता ती हळूहळू खोलीबाहेर पडली. मला वाटलं, मॅडमनी किती सुंदर शब्दात तिला समजावून सांगितलं,  कारण यानंतर हळूहळू तिचा चेहरा,  तिचा व्यवहार पहिल्यासारखा सहज होऊ लागला. तिचं मनमोकळं हसू हॉस्टेलभर गुंजत राहिलं. मलाही सुटका झाल्यासारखं वाटलं.

फेब्रुवारीत अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी लिव्ह सुरू झाली होती. तसंही फायनलला असलेल्या मुलींवर माझा जीव जरा जास्तच जडतो. या सुट्टीच्या काळात चांगलं रामराज्य स्थापन व्हायचं. दिवसाचे चोवीस तास तर अभ्यास करणं शक्य नसायचं. मोठ्या मुश्किीलीने त्या दोन वाजेपर्यंत अभ्यास करायच्या. मग तर्‍हेतर्‍हेचे नाश्ते बनत, किंवा मग मागवले जात. छोटी छोटी प्रहसनं,  नाटकं,  नकला होत. रामकुँवर नेहमी मोठा घुंघट ओढून एक लोकनृत्य करायची,  तेव्हा मुलींची हसून हसून पुरेवाट व्हायची. मला वाटलं,  ती आता वर्गणी एकत्र केल्याची गोष्ट विसरून गेलीय. पण तो माझा भ्रम होता. लवकरच ही गोष्ट माझ्या लक्षात आली.

छोट्या वर्गातली एक मुलगी कुठून कुणास ठाऊक गालगुंडाचा आजार घेऊन आली. बघता बघता वसतिगृहात अजाराची रिले रेस सुरू झाली. त्यासगळ्यांची सुश्रुषा करता करता  माझी आणि इतर स्टाफचीदमछाक झाली. खूप प्रयत्न करूनही आम्हाला प्रायव्हेट नर्स मिळाली नाही आणि सरकारी हॉस्पिटलच्या नरकात मुलींना पाठवायला मॅडम तयार नव्हत्या.

एक दिवस रामकुँवर मला म्हणाली, `दीदी,  मला आपली मदत करू द्या नं!’

मी नेहमीप्रमाणेच तिला मधुर असं फटकारत म्हंटलं, `तुझी परीक्षा डोक्यावर येऊन ठेपलीय. अभ्यासाठी तसाही वेळ पुरेसा होत नाही आणि तुला इन्फेक्शन झालं तर?’

`आपण इन्फेक्शनची चिंता करू नका. मी या बाकीच्यांच्या प्रमाणे नाही. मला आजपर्यंत कधी ताप आला नाही. राहिली अभ्यासाची गोष्ट. मला फर्स्ट क्लास आजपर्यंत कधी मिळाला नाही. आताही मिळणार नाही. सेकंड क्लासची गॅरेंटी देते.’

तरीही नकारार्थी मान हलवली,  तर ती धरणंच धरून बसली.

`ठीक आहे. मग मी पण अभ्यास करणार नाही. फेल झाले,  तरी चालेल.’

या अनोख्या जिद्दीची गोष्ट मॅडमच्याही कानावर गेली. त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि मग मला म्हणाल्या, `जया तिच्या अबोध मनात सगळ्यांसठी काही ना काही करण्याची इच्छा घर करून राहिलीय. तिचं मन मोडू नको. . तिला सांग, की तिने तिच्या वर्गातील मुलींना अभ्यासात मदत करावी.’

क्रमश: २

मूळ लेखिका – सुश्री मालती जोशी  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एका कर्जाची परतफेड – भाग १– सुश्री मालती जोशी ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ एका कर्जाची परतफेड – भाग १– सुश्री मालती जोशी ☆ (भावानुवाद) – सौ. उज्ज्वला केळकर 

डिसेंबरची एक थंड संध्याकाळ. हॉस्टेलमध्ये सात ते नऊ अभ्यासाची वेळ होती. वातावरणात एक सुखद शांती होती. दिवसभरच्या धबडग्यानंतर मी आरामखुर्चीत विसावले होते. पायांवर पातळशी वुलन शाल होती आणि हातात हर्मिनाब्लॅकचं`गोल्डन मून ऑफ आफ्रिका’ हे पुस्तक.

एवढ्यात वाटलं,  दरवाजात काही तरी खुस-फुस चालू आहे. पुस्तकांवरून नजर न हलवता मी म्हंटलं `येस कम इन..’

रोहिणी आणि सुजाता घाबरत घाबरत आत आल्या.

`हं! बोला!’

दोघी एकमेकींच्या तोंडाकडे पाहू लागल्या. `अग, ब! म्हणजे सकाळी मनीऑर्डर आली, ते तर नव्हेत?’

होय! तेच. मनीऑर्डर घेऊन तिने ते पैसे लगेचच डेस्कमध्ये ठेवले होते. शाळेची बस चुकेल म्हणून.

`वेडीच आहे, माझ्याजवळ द्यायचे ना! तिला म्हणावं,  नीट बघ. एखाद्या पुस्तकात ठेवले असतील.’

`संध्याकाळपासून आत्तापर्यंत सगळी पुस्तके,  सगळ्या वह्या तिने पुन्हा पुन्हा बघितल्या. बिछाना,  पेटी काही सोडलं नाही.’ सुजाता म्हणाली.

`ठीक आहे. जा तू! तिला माझ्याकडे पाठव.’ मी वैतागून म्हंटलं. इतका चांगला प्रसंग चालू होता पुस्तकात. यांनी सगळी मजाच घालवून टाकली.

दोघी जणी दरवाजापर्यंत गेल्या. रोहिणी जराशी थबकली आणिम्हणाली,     

`आम्ही तिच्या रूममध्ये राहणार्‍या मुलींवर तर संशय येणार नाही ना?’ तिचा चेहरा मोठा करुण झाला होता. स्वाभाविकच होतं. बड्या बापाची बेटी होती ती.

`ते बघू या नंतर. तुम्ही तिला इकडे पाठवा.’

त्या दोघी गेल्या. आता मी रामकुँवरची वाट पाहत होते. सकाळी मनीऑर्डर घेताना तिचा सावळा चेहरा कसा प्रफुल्लित झाला होता,  ते मी विसरले नव्हते. पुढच्या आठवड्यातच हायर सेकंडरी परीक्षेचा फॉर्म भरायचा होता. फॉर्म फीची रक्कम ४८रुपये तिचा शिपाई असलेला भाऊ एकदम पाठवू शकेल, यावर तिचा विश्वासच नव्हता. मॅडम म्हणाल्या होत्या, की फॉर्म फीची व्यवस्था होईल. नंतर हप्त्या-हप्त्याने पैसे परत देता येतील.

मला खरोखर तिचे पैसे घेणार्‍या, या नीच मनोवृत्तीच्या व्यक्तीचा भयंकर राग आला. अनुसूचित जातीतील मुलांना मिळणार्‍या  शिष्यवृत्तीच्या आधारे ती आमच्या शाळेत शिकत होती. घराकडून दर महा येणार्‍या १०-१५ रुपयांमध्ये ती तेल,  साबण, वह्या, पुस्तकांचा खर्च मोठ्या कुशलतेने भागवत असे आणि महत्वाचं म्हणजे तिच्या कपाळावर कधी आठी म्हणून नसे.

हे नुकसान मात्र खूप मोठं होतं. त्यामुळे तिच्या धैर्याचा बांध तुटून गेला होता.

१०-१५ मिनिटे झाली असतील. रामकुँवर दरवाजाशी उभी होती. साधी साडी. डोकं, हात पदराने झाकलेले. एखाद्या गाठोड्यासारखीच दिसत होती.

`तू स्वेटर नाही घातलास?’

`स्वेटर मी शाळेत जाताना घालते. रात्रंदिवस घातला, तर मळतो ना!’  तिने दबलेल्या आवाजात म्हंटलं.

हे उत्तरही नेहमीचच. पण कर्तव्य म्हणून मला कधी कधी टोकावं लागे. जास्त जोरात विचारलं असतं,  तर म्हणाली असती,  इथे चादर पांघरूनही काम भागतं, किंवा मग आमच्या गावाकडे इतकी थंडी असते,  की त्यापुढे ही काहीच नाही. तिचं एक तत्व होतं. इथे कसं का दिसेना,  शाळेतनीट-नेटकं,  व्यवस्थित दिसलं पाहीजे.

`हे रुपये हरवल्याचं काय चक्कर आहे?’  मी मूळ विषयाकडे येत विचारलं.

अश्रूंचा महापूर पुन्हा उसळला. माझ्या सांत्वनेच्या शब्दानंतर तिने पुन्हा तीच हकिकत सांगितली. मी तिच्या निष्काळजीपणाबद्दल हळुवारपणे एक उपदेशाचा डोस तिला पाजला, पण तरीही समस्या आपल्या जागी तशीच होती. प्रश्न केवळ हरवलेल्या पैशांचाच नव्हता. पैशाची पुन्हा व्यवस्था व्हायला हवी होती. मी म्हंटलं, ’ फॉर्म भरायला अजून एक आठवडा आहे. तुझ्या भावाला पत्र लिहीलंस तर पोचेल नं?’     

तिने आपल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहीलं. `आपण इथेही शोध घेऊच या!’  तिला आश्वस्त करत मी म्हंटलं. `पण तुझ्या भावाला वेळेवारी माहीत होणं गरजेचं आहे.’

`दीदी’,  तिने थोडं थांबून म्हंटलं,  `मी परीक्षा पुढल्या वर्षी देईन, पण घरून पुन्हा पैसे मागवण्याचा विचारही करू शकत नाही.’  आणि तीपुन्हा स्फुंदून स्फुंदून रडू लागली. ही समस्या तिच्यासाठी खरोखरच मोठी असणार, अन्यथा घराच्या बाबी ती कधी जिभेवर आणत नसे. सहनशीलता हे तिचं मोठं वैशिष्ट्य होतं. त्यामुळेच ती आपल्या मैत्रिणींमध्ये प्रिय झाली होती.

या वसतीगृहात दोन जागा आदीवासी आणि अनुसूचित जाती-जमातीच्या मुलींसाठी आरक्षित होत्या. माझ्यासाठी या मुली म्हणजे डोकेदुखीच होती. बिचार्‍या एकदम वेगळ्या वातावरणतून,  वेगळ्या संस्करातून इथे आलेल्या असायच्या. या नव्या वातावरणात काहीशा विक्षिप्तासारख्या वागायच्या. कुणी आपला वेगळा ग्रूप बनवत. कुणी अ‍ॅडजेस्ट होऊ न शकल्याने भांडखोर बनत.

रामकुँवर या सगळ्यांपेक्षा वेगळी होती. ती सहावीत असताना आमच्याकडे आली. तिने लवकरच हे नवं वातावरण आपलसं केलं. तिची भाषा बदलली. रहाणी नीट-नेटकी झाली पण तिने आपली वेशभूषा बदलली नाही. आपल्या बरोबरीच्या मुलींशी कधी ईर्षाही केली नाही. आपल्या आनंदी स्वभावामुळे ती सगळ्यांची लवकरच लाडकी बनली.

   तिला खोलीत परत पाठवून मीपुन्हा या समस्येबद्दल विचार करू लागले. सगळ्यात आधी विचार आला,  तो म्हणजे खोल्या-खोल्यात जाऊन झडती घेण्याचा. परंतु तो विचार लगेचच सोडून दिला,  कारण नोटांचे नंबर काही टिपून ठेवलेले नव्हते. मग त्याच त्या,  असं कसं ओळखणार? या शिवाय झडती घेण्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. मागच्या वर्षी राधिका त्रिवेदीचा वुलनचा बेबी सेट सापडत नव्हता. आठ दिवसानंतर शहरातून रोज शाळेत येणार्‍या तिच्या एका मैत्रिणीने तो परत केला. राधिकेने स्वत:च तो तिला दिला होता आणि ती विसरून गेली होती.

पण या गोष्टीबाबत आम्हाला अनेक पालकांच्या नाराजीच्या पत्रांशी सामना करावा लागला होता. रामकुँवरच्या खोलीत एक कलेक्टरची मुलगी होती,  तर दोघी जणी एका सुप्रसिद्ध वकिलाच्या बहिणी होत्या. त्यांच्याबाबतीत ही फारशी चिंतेची बाब नव्हती,  पण तिच्या जातीच्याच विद्यार्थिनी हे शत्रुत्व गावा-घरापर्यंत न्यायच्या.

१० -१५ रुपयांची गोष्ट असती, तर मीपण दिले असते,  पण ५०रुपये खूप मोठी रक्कम होती. माझा पगार सगळा माझा नव्हता. घरात अनेक डोळ्यांच्या जोड्या त्याची प्रतिक्षा करत.

   दुसर्‍या दिवशी मी सगळ्या नोकरांची फौज जमा करून विचारणा केली. पण सगळ्यांनी डोळ्यातून पाणी काढून आणि शपथा घेऊन अशी नाटकं  केली,  की मीच घाबरून गेले. मग मीस्वैपाकघरात सगळ्या एकत्र जमल्यावर रागावून एक भाषण दिलं. मग म्हंटलं, की चुकून किंवा चेष्टा करायची म्हणून,  किंवा दुष्ट बुद्धिने का होईना,  पण जर कुणी पैसे घेतले असतील, तर दोन दिवसातमाझ्या टेबलाव रआणून ठेवावे. याबद्दल कुणालाही काहीही कळणार नाही. माझ्यावर विश्वास नसेल,  तर गुपचुप माझ्या टेबलावर ठेवून जा. मी त्यातच समाधान मानीन. दोन दिवस मोठ्या आशेत आणि उत्कंठेत सरले. मी खोलीच्या बाहेर बाहेरच जास्त वेळ राहिले, म्हणजे चोराला पैसे ठेवण्याची संधी मिळेल. पण निराशाच पदरी पडली.

तिसर्‍या दिवशी मी प्रिन्सिपॉल मॅडमकडे गेले. त्यांचा बंगला हॉस्टेलच्या परिसरातच होता. जेव्हा माझ्यापुढे काही समस्या निर्माण होते,  तेव्हा मी त्यांच्याकडेच जाते. इतक्या मोठ्या चोरीची गोष्ट तशीही लपून राहणं शक्यच नव्हतं.

त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं. मग रामकुँवरला बोलावून विचारलं की तिचं कुणाशी भांडण तर झालं नाही? किंवा कुणाला तिच्यबद्दल ईर्षा तर वाटत नाही?  पैसे ठेवताना खोलीत कोण कोण होतं,  आठवतय का?

तिने सगळ्या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक दिली.  

ईर्षेबद्दल विचारलं असता ती थोडीशी हसून म्हणाली,  ‘माझ्याशी कोण ईर्षा करणार? आणि कशासाठी्?’

   ती गेल्यानंतर मॅडम म्हणाल्या, `ही चोरी आहे. विशुद्ध चोरी. पैसे परत नाही मिळणार. लिहून ठेव. आता प्रश्न असा , की पुढे काय करायला हवं?’

क्रमश: १

मूळ लेखिका – सुश्री मालती जोशी  

मराठी अनुवाद – सौ उज्ज्वला केळकर मो. ९४०३३१०१७०

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अखेर जमलं आमचं लेखिका – सुश्री अनिता मेहेंदळे ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

? जीवनरंग ❤️

☆ अखेर जमलं आमचं लेखिका – सुश्री अनिता मेहेंदळे ☆ सुश्री पार्वती नागमोती ☆

एकदा घरात समजलं की माझे काही प्रेम बिम नाहीये.सो हिला मुलगा बघायला हरकत नाही.तेव्हा माझे नाव दोन तीन वधुवर सूचक मंडळात घातले.आईचे फोन चालू झाले तिथे ,पत्रिका शिक्षण घरची माहिती वगैरे वगैरे.त्यात एक स्थळ बरे वाटले म्हणून मग मुलाच्या घरी फोन लावला.मुलाचे वडील प्रसिद्ध नाट्य अभिनेता असल्याने त्यांचे  प्रयोग बाहेरगावी असत. सो ते असतील तेव्हा शक्यतो मुलीला बघणे कार्यक्रम करू असा तिकडून निरोप आला.

अत्यंत बोअर अशी सकाळी ८,३० ची आणि रविवारची वेळ घेतली.मी साडी नेसणार नाही या विषयावर वाद झाल्याने आई आधीच चिडली होती आणि बाबांना सांगितलं होतं की तुम्ही उगीच फार बडबड करू नका.ते खूप बोलतात कारण.आणि मुलगा आवडला तर मी रुमालाची घडी घालीन आणि नाही आवडला तर रुमाल चुर्गळून टाकीन मग तुम्ही समजाल की किती वेळ बसायचं तिथे ते.

हे सगळं ठरवून आम्ही तिघे मुलाच्या घरी पोचलो .मुलाला बघून माझी विकेट गेली होती.त्याची आई खूप प्रश्न विचारत होती आणि त्या गोंधळात माझा रुमाल कुठेतरी पडला.

आता बाबांची मात्र झाली पंचाईत त्यांना कळेना की मुलगा आवडला का नाही.मुलगा इतका शांत होता आणि मी पहिल्यांदा च भेटल्याने मी नेहमी सारखी बोलत नव्हते.मुलींनी फार बोलायचं नसतं  . शास्त्र अस्ताय ते ……  बऱ्याच साधेपणानं कार्यक्रम झाला.निघताना आम्ही काय ते कळवू असे कोणीच कोणाला म्हटले नाही.

तिथून येताना या मुलाच्या घराजवळ आमचे एक जोशी नावाचे काका ओळखीचे होते.एक म्हणजे चौकशी पण होईल आणि उद्या मुलीशी बोलून तुला सांगतो असे ठरवून त्यांच्याकडे निरोप देऊन आम्ही घरी आलो.

घरी आधी रुमालाने दगा दिला आणि म्हणून मला काहीच कळू शकले नाही म्हणून बाबा चिडले होते.आणि मुला ने काहीच प्रश्न विचारले नाहीत म्हणजे नकार असणार हे आईनी पक्कं केलं होतं. पण मला मुलगा मनापासून आवडला होता. बाबांनी त्या जोशी काका ना आमचा होकार सांगितला फोन करून.नेमके त्याच दिवशी त्यांचे वडील आजारी झाले आणि त्यामुळे जोशी त्या मुलाकडे आमचा होकार न कळवताच गावाला गेले.

मुलाकडे आम्ही काहीच निरोप न दिल्याने मुलीकडून नकार असेल असे ते समजून गेले.मध्ये ३ दिवस गेले . कोणाचा च कोणाला काही निरोप नसल्याने हा विषय थांबला.

माझा मात्र संयम सुटत चालला होता. मी ठरवले की किमान नकार तर येऊ देत म्हणून मी मुलाच्या घरी फोन केला.मुलाच्या आईने फोन घेतला.मी वेगळं नाव ,मुलीचे नाव शिक्षण सांगितले.कधी येऊ आम्ही मुलीला घेऊन असे विचारले.तर तुम्ही २ दिवसांनी या.असे त्या बोलल्या.म्हणजे आम्हाला नकार होता हे ओघाने आलेच पण प्रयत्न सोडला नाही दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी फोन केला .मुलीचे नाव मधुरा आहे. लेले आडनाव आहे. आम्हाला पत्रिका बघायची आहे.तर ऊद्या येऊ का.आणि आम्ही बाहेर गावचे आहोत.सो नकार असेल तरी लगेच सांगा.म्हणजे आम्ही इथली पुढची मुलं बघू.तरी मुलाची आई ही हो हो करत होती.आपण परवा भेटू असे सांगून मुलाच्या आईने फोन ठेवला.आता मात्र मला रडू यायला लागले.

शेवटचा प्रयत्न करून बघू म्हणून मी रात्री ८ ला फोन केला.अपेक्षा अशी होती की ,,तो,, फोन घेईल.तर पुन्हा आईसाहेब च फोन वर.मग मी उगीच तुमच्या इथले जोशी आहेत ना त्यांचे आम्ही फॅमिली फ्रेंड आहोत. मुलगी पुण्यात असते आणि आम्ही दोघे नगरला असतो.आणि काहीतरी नाव ठोकून दिलं. पण परिणाम चांगला झाला ,लगेच त्याच दिवशी मुलाच्या आईसाहेब तिथल्या जोशी काकांच्याकडे गेल्या आणि ८ वाजता जो फोन केला त्यांची तुम्हाला काय माहिती आहे.आणि ते तुमच्या कशा ओळखीचे हे विचारू लागल्या तेव्हा ते म्हणाले, की मी नाही ओळखत कोण सांगताय त्यांना.त्या आधी जे अमुक तमुक होते, ते माझ्या परिचयाचे आहेत. मग माझ्या बाबांचे नाव सांगितले,तेव्हा ते म्हणाले की  दुसऱ्या  दिवशीच ते होकार सांगून गेले होते पण मी नेमका गावाला गेलो आणि निरोप देणे राहिले.

आता सगळी चक्र फिरली मग मुलाच्या वडलांचा आमच्या घरी फोन आला की जरा निरोपाचा गोंधळ झाल्याने आम्हाला काही समजले नाही. मुलाला पण  मुलगी आवडली आहे तर एकदा भेटू.

एकदा कशाला मी तर माळ घेऊनच तयार होते.तरी शक्य तितके नम्र भाव ठेवून मी ‘तुम्ही म्हणाल तसं …’ असलं काही तरी उत्तर दिलं.

दुसऱ्याच दिवशी मुलाकडे गेलो .मला तर आपण काय भारी काम केलं याचा फील होता.पण मुलाची आई मात्र ,माझ्या आईला ,,अहो याचा की नाही जबरदस्त योग होताच लग्न ठरायचा .कित्ती फोन आले तुम्ही येऊन गेलात तेव्हापासून आणि माझ्याकडे बघत मीच सांगितलेली नावं आणि माहिती  सांगू लागल्या. मला किती हसू आणि किती नको असं झालं. पण आमच्या स्मार्ट फादरांच्या लक्षात आले.त्यांनी घरी आल्यावर विचारलं की काय आहे भानगड? मग मी सगळं खरं काय घडलं ते बाबांना आणि आईला सांगून माफीसुद्धा मागितली.

याच मुलाशी पुढे लग्न झाल्यावर त्यालासुध्दा सगळं सांगून टाकलं. त्याची तर हसून हसून पुरती वाट लागली. त्यानंतर सुद्धा सासूबाई हा किस्सा पुन्हा पुन्हा सांगत असत आणि कित्ती हो डिमांड होता तुमच्या मुलाला म्हणून मी कौतुक करत असे .आणि नंतर जाम हसत असे.  

विशेष टिप्पणी –

सून झाल्यावर काही दिवसांनी सासूबाई आणि सासरे यांना माझा हा कारभार सांगितला. सासरे खूप हसले पण सासूबाई मात्र जरा चिडल्या.( पुढे  मात्र सगळे गोष्टीत सांगतात त्या प्रमाणे आम्ही सुखाने राहू लागलो.)

लेखिका –  सुश्री अनिता मेहेंदळे

संग्राहिका –  सुश्री पार्वती नागमोती

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “सात कुलुपे आणि चावी” – श्री कमलेश भारतीय ☆ (भावानुवाद) सौ. गौरी सुभाष गाडेकर☆

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ सात कुलुपे आणि चावी – श्री कमलेश भारतीय ☆ (भावानुवाद) सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

श्री कमलेश भारतीय

मूळ हिंदी कथा 👉 “सात ताले और चाबी”

“ए मुली, तू कुठे आहेस?”

“सात कुलुपांत बंद.”

“काय? कुठली कुलुपं?”

“पहिलं कुलूप – आईच्या गर्भावरचं. मुश्किलीने ते तोडून जीवन मिळवलं.”

“दुसरं?”

“भावाबरोबरचं प्रेमाचं कुलूप. मुलगा लाडका. आणि मुलगी म्हणजे आईवडिलांची, कुटुंबाची विवशता.”

“तिसरं कुलूप?”

“शिक्षणाच्या दारांवरची कुलुपं -माझ्यासाठी.”

“पुढे?”

“माझ्या रंगीबेरंगी, सुंदरसुंदर कपड्यांवरही कुलुपं.हे नाही घालायचं, ते नाही नेसायचं. घरंदाज मुलींसारखी राहत जा. असे कपडे घालतात मुली?”

“आणि मग?”

“समाजाच्या नजरांचे पहारे. चालते कशी? जाते कुठे?असं का करते? तसं का करते?”

“आणखी?”

“गायीसारखं ढकलून लावलेलं लग्न. माझ्या पसंतीवर कुलुपंच कुलुपं. चुपचाप सांगतील, त्याच्याशी लग्न कर.आणि आमचा पिच्छा सोड.”

“अजून?”

“पत्नी झाल्यावरही कुलुपंच कुलुपं. हे नको करूस. ते नको करूस. माझे पंख व माझ्या स्वप्नांना कुलुपं. कोणतीही झेप घेऊ शकत नाही. बंधनंच बंधनं.”

“आता आहेस कुठे?”

“सात कुलुपात बंद.”

“ही कुलुपं लावली कोणी?”

“सांगितलं ना.ज्याला ज्याला शक्य झालं, त्याने त्याने लावली.”

“उघडणार कोण?”

“मीच उघडणार. दुसरं कोण?”

☆ ☆ ☆ ☆ ☆

मूळ हिंदी कथा – “सात ताले और चाबी” – मूळ लेखक – श्री कमलेश भारतीय  

भावानुवाद –  सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print