मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्यादं….भाग -2 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ प्यादं….भाग -2 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

झोपताना पाचवीपासूनची भारती माझ्या मनात तरळत होती.तिची तीन भावंडं आमच्या शाळेत होती. अनिता, भारती, कमल नि धाकटा उदय.सगळी मुलं हुशार होती नि शिक्षकांची आवडती पण. वडील शेतमजुरी करणारे, आई विटांच्या कारखान्यात विटा उचलायला जायची. मुली सुट्टीच्या दिवशी आईबरोबर कामाला जायच्या. भांडी घासायलाही जायची आई.

‘दोन तास लागतात भांडी घासायला, पण आई म्हनते, ‘जेवायला ताटं वाडून देत्यात दोन, दोन. म्हनून परवडतय. ‘ दुसऱ्याच्या अन्नावर पोसले ल्या ह्या मुली, पण गटगुटीत होत्या. काळ्या पण तेजस्वी.दात पांढरे शूभ्र, केस काळेभोर, डोळे चमकदार.

भारतीची बुध्दीमत्तेची चमक  शिकवताना जाणवायची. तिच्या अशुध्द बोलण्यातूनही तिची समज लक्षात यायची. शिरिष पैंचा पप्पांबद्दलचा धडा वाचताना ती गालात हसायची. ‘गुलमोहोर ‘वाचताना भरून यायची, गणित सोडवताना डोळे मोठे करून विचार करायची, इतिहास समरसून ऐकायची. अभ्यासाची तळमळ इतकी की, मधल्या सुट्टीत उद्यांचा अभ्यास पुरा करताना दिसायची. आपल्याला घरी काम असतं त्यामुळे इतर मुलींसारखा वेळ फुकट घालवता नये हा तिचा सूज्ञपणा बघून कौतुक वाटायचं. अशा भारतीचं शिक्षण बंद व्हायची वेळ आलेली.अडचण अगदी विचित्र होती. घरचं अठराविश्व दारिद्रय, बहिणीचं अवेळी मरणं, नि बाळाचं संगोपन  हे सगळं नेमक शिकायची खूप हौस असलेल्या भारतीच्याच वाट्याला का यावं?भारती इतकी मोठी नव्हती करखीी ह्या अडचणीतून मार्ग  काढून शिकेल.आपणच काहीतरी करायला हवं. मला चैन पडेना. मार्ग सुचेना. जो सुचे त्यांत अनेक अडथळे होते. प्रश्न मला एकटीला सोडवता आला नसता. अनेकांना समजावून सांगायला हवं होतं.बोलणी खायला लागली असती.प्रयत्न करून, अडथळे पार करून

भारतीचं शिक्षण सुरु झालं, पण ती पास झाली नाही तर सगळं मुसळ केरात.वाटलं, जाऊदे. तिचं नशीब तिच्याबरोबर. आपल्या डोळ्यासमोर ही मुलगी आहे म्हणून, अशा कितीतरी मुलीना आवड असून शिक्षण सोडावं लागतं त्याला आपण काय करतो.पण पुन्हा भारतीचे केविलवाणे शब्द कानात भुणभुण करीत होते.

‘मला लई म्हंजे लई वाटतंय, दहावी नि फुढबी शिकावं मग तुम्ही म्हणता तसं डीएड व्हावं, आपल्याच शाळंत नोकरी मिळेल.राखीव म्हटल्यावर एडमिशन, नोकरी ह्यात अडचण येनार न्हाई. न्हवं का बाई?’

मीच तिच्या समोर अनेक वेळा रंगवलेली स्वप्नं ती मला ऐकवत होती. पण त्या प्रकाशमय शूभ्र चित्रावर एक अटळ  असा काळा बोळा फिरला होता. त्यात दोष तर कोणाचाच नव्हता. आईवडिलांना कामावर जायलाच हवं होतं,दोन महिन्याच्या बाळाला कोणीतरी संभाळायला पाहिजेच. भारतीची धाकटी भावंडं लहानच होती, शेजारघरंही ‘हातावर पोट’असणारी.

मी पुन्हा भारतीकडे गेले तेव्हा तिला म्हटलं’अग भारती, अनिताचं सासर खातंपितं आहे ना?बायका कामाला नाही जात तिथल्या. सासू नाही सांभाळणार बाळाला?’

अनिताच्या आईनेच दिलं उत्तर.’बाई, अनिताची सासू?लई वांड. ह्या गोजिरवाण्या नातवाला कदी बगायलाबी येत न्हाई. उलटी म्हनतिया, सुनेच्या बाळतपनात लय पैसा ग्येला.अनिता वारली त्याचं त्यास्नी कायच न्हाय. न्हाई बाई कोवळ्या लेकराला त्या राक्षसनीकडं द्येनार.’

‘बरोबर आहे तुमचं. पण मग भारतीचं शिक्षण?बंदच होणार.’

‘बाई,तुमास्नी माझ्या बद्दल येव्हढ वाटतय खरं, पर आमचा बाबा काय म्हनतो,’आता शिकुन तर काय मोठी धन लावनार हाय पोरगी घरच्या अडचनीपेक्षा पोरीच्या शिक्षनाला म्हत्व देऊन आमास्नी कुटं झेंडे लावायचेत!’

‘ आई जरा हळहळती तरी. म्हनती ‘पोरीला शिकायची हौस हाय म्हनून वाटतय्’तर बाबा म्हनतो,’काय हौसबीस  र्हात न्हाय. संसारात पडली की आपसूक हौस जिरती.’.

 क्रमशः…

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्यादं….भाग -1 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ जीवनरंग ☆ प्यादं….भाग -1 ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

दहावीचा नवा वर्ग. मी हजेरी घेतली. गैरहजर मुलांची नावं लक्षपूर्वक पाहिली. २० जून उगवला तरी भारती भोसले ही मुलगी शाळेत आली नव्हती. ‘भारतीच्या शेजारी कोण रहाते ग?’ मी मुलींना विचारलं.

‘ह्यी रहाते बाई.’

ह्यी म्हणायची मंगल उभी राहिली.

अग, ह्या भारतीला काही आहे का काळजी? दहावीचं वर्ष आहे, शाळा सुरु होऊन दहा दिवस झाले, पहिल्या दिवसापासूनच शिकवायला सुरुवात झालीय, मागे पडलेला अभ्यास केव्हा भरून काढणार ती?जबाबदारीची जाणीव आहे की नाही तिला?’

मी तडातडा बोलत होते. जशी काही भारतीच माझ्यासमोर उभी होती.

माझं बोलणं  संपल्यावर मंगल शांतपणे म्हणाली, ‘बाई, ती येनार न्हाई आता.’

‘का? काय झालंय तिला?’

‘तिची बहीण होती ना अनिता म्हनायची, ती वारली.’

‘वारली? केव्हा?’

‘मे महिन्यात. बाळंतपणात गेली.’

मी हबकून खुर्चीवर बसले. वारलेली अनिता दोन वर्षांपूर्वींची आमची विद्यार्थिनीच होती. कशी बशी दहावी झाली नि तिचं लग्न झालं होतं. ती एव्हढीशी कोवळी पोरगी चक्क वारलीच?

‘अग, अशी कशी वारली? कुठल्या हास्पिटलमध्ये होती?काय झालं तरी काय?’    ‘तिला ताप आला नि डोक्यात गेला.’ एकेक करीत सगळ्याच मुली बोलायला लागल्या. अनिता कशी वारली ते सांगायला लागल्या. मला समजून घ्यायचं होतं पण बाळंतपणाचा विषय म्हटल्यावर वर्गातल्या मुलांनी माना खाली घातल्या होत्या. ‘वर्गात बाई कसला तरीच विषय बोलत्यात ‘असंहोऊ नये म्हणून मी माझी अनिताबद्दलची हुरहुर मनात  दाबून ठेवली. ३५ मिनिटांचा वळ अभ्यासाशिवाय  फुकट (?) जाऊ नये म्हणून मी एक ठोकळा शिक्षिका झाले. फळा पुसत मी म्हटलं, ‘बरं, भारतीला म्हणावं, वाईट झालं खरं, पण आता काय करणार? गेलेलं माणूस काय परत येणारेय का? आपलं दुःखं बाजूला ठेऊन रोजचे व्यवहार पार पाडायलाच हवेत ना?शाळेत ये म्हणावं म्हणजे विसरायला होईल.’

‘पर बाई अनिताचं मूल जगलंय् नि ते संभाळायला भारतीला घरी रहायला पाहिजे. ‘

बापरे! आता मात्र अनिताचं मरणं, बाळाचं जगणं, नि भारतीचं शाळेत न येणं माझ्या मनात खोलवर शिरलं. माझा थंडपणा मलाच जाणवला. शाळा सुटल्यावर भारतीच्या घरी गेले. घर म्हणजे एक दहा फुटाची खोली. अंगण मात्र सारवलेलं,  एका काळयामेळ्या फडक्यात एक तान्हं मूल आ ऊ करीत पडलेलं होतं. शेजारची एक शेंबडी पोरगी बाळाला खुळखुळा वाजवून खेळवत होती.

‘भारती, काय  करतेयस ग?’मी हाक मारीत दारातून आत गेले.

भारती परकराचा ओचा सोडीत, त्याला हात पुसतच बाहेर आली.

‘अगबाई! बाई तुम्ही?’ असं म्हणत तिने मला बसायला पाट दिला. चुलीतला धुरकटलेला जाळ पेटवून ती आली. तिने बाळाला मांडीवर घेतलं नि ती त्याला थोपटत बसली. बाळ गाढ झोपलं.

मैदानावर खो खो खेळताना चपळाईने पळणाऱ्या भारतीचं ते मोठं आईपण बघून माझा जीव भरून आला. काय बोलाव कळेचना.

रडवेल्या स्वरात तीच मग म्हणाली.’बाई, कळलं ना तुम्हास्नी सगळं?

माझी शाळा आता बंदच झाली म्हणायची. मला लई म्हंजे लई वाटतय् शाळेत यावं, पर ह्याला कुटं ठ्येवनार?त्याची आई आमच्या पदरात टाकून गेली, बोळ्याने दूध घालावं लागत हुतं, आता चमच्यानी पितय. बाटली आनायचीय. ‘पं

भारती प्रौढ बाईसारखी बोलत होती. तिला खूप सांगायचं होतं, आपल्यासाठी बाई घरी आल्या याची अपूर्वाई वाटत होती. आपल्या शिक्षणाचं काय करायचं याची काळजी ऐकवायची होती. तिने मग माझ्यासाठी चहा ठेवला. ‘बाई चालल न्हव बिनदुधाचा? दूध न्हाई.’

‘चालेल ग. पण कशाला चहा?’ असं म्हणत मी कडू चहाचा घोट गिळला. नि थातूरमातूर काही तरी सांगून मी घरी आले.

                   क्रमशः…

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जगावेगळी…भाग-2 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

 ☆ जीवनरंग ☆ जगावेगळी…भाग-2 ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

एका गलितगात्र पण स्वाभिमानी आईची कथा….

(पूर्वसूत्र:- ती संपूर्ण रात्र तिने टकटकीत जागून काढली.दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाण्यासाठी मुलगा घराबाहेर पडला, त्याच्या पाठोपाठ फाटक्या पिशवीत जुनेरं कोंबून हिने बाहेरचा रस्ता धरलान्.. आपल्या सुनेचा निरोपसुद्धा न घेता.)

एकटेपणाचा बाऊ न करता तिने पुन्हा पदर खोचला. पुन्हा पोळपाट-लाटणं हातात घेतलं. पण ते हात आता पूर्वीसारखे खंबीर नव्हते. थरथरत होते. मग गरजेपोटी कधी कुणी तिला कामावर ठेवून घेत राहिलं. ती राहिली. चुकतमाकत स्वैपाक करू लागली. पण पूर्वीची चवीची भट्टी पुन्हा कधी जमलीच नाही. मग कधी बोलणी बसायची. कामं सुटायची किं पुन्हा दुसरं घर. ती फिरत राहिली. फिरत फिरत इथं आली. या समोरच्या घरी. तिने पूर्वी जोडून ठेवलेल्या. पानसे वकिलांच्या या घरची बाळंतपणं, वकिलीण बाईंची आणि त्यांच्या लेकीसुनांची सुद्धा कधीकाळी हिनेच केलेली. हे घर तिला पुन्हा भेटलं आणि एक दिवस तिच्या मुलाला पानसे वकिलांचं पत्र आलं….

‘तुझी आई आता आमच्या घरी आहे. कामाला नव्हे,रहायला. जेवायला. कारण कामं करण्याची शक्ती आता तिच्या जवळ नाहीये. ती असती तरी तिने कामं का आणि किती दिवस करायची हे प्रश्न आहेतच. तू शिकलास. मोठा झालास. बऱ्यापैकी पैसे मिळवतोयस. हे सगळं तुझ्या आईने आपल्या घामाचं आणि कष्टांचं खत घालून पिकवलंय. तिला त्या खताची किंमत हवीय. होय. तुझ्याकडून पोटगी. का? दचकलास? मी वकील म्हणून तिने मला शब्द टाकलाय. मी तिचं वकीलपत्र घेतलंय. एका पैशाचीही अपेक्षा न ठेवता. एक आई आपल्या मुलाविरुध्द कोर्टात केस गुदरतेय आणि तेही त्याच्यासाठी आयुष्यभर केलेल्या कष्टांचे पैसे उतारवयात कष्ट न करता पोटगीरूपाने परतफेड म्हणून मिळावेत यासाठी, हेच मला नवीन होतं. आणि एक आव्हानसुद्धा. मी ते आव्हान स्वीकारायचं ठरवलंय. तू तिला न्याय देऊ शकला नाहीयस. न्यायदेवता काय करते पाहू. ती आंधळी जरुर आहे, पण तुझ्यासारखी निगरगट्ट नाहीये. तुझ्या आईच्या चरितार्थासाठी आवश्यक ती रक्कम तू तिला आमरण द्यावीस म्हणून ही नोटीस तुला विचारासाठी योग्य वेळ द्यायचा या सद् भावनेने या खाजगी पत्राद्वारेच पाठवतोय. योग्य निर्णय घे.’

पत्र त्यानं वाचलं.फाडून टाकलं. पुढे रितसर नोटीस आली. केस कोर्टात उभी राहिली. जगावेगळी म्हणून खूप गाजली सुद्धा. पानसेवकिलानी तिचं वकिलपत्र घेतलं तेव्हाच खरं तर निकाल निश्चित होता. तोच लागला. गेलं वर्षभर दरमहा नियमित पैसे पाठवताना आईने आयुष्यभर पै पै साठी केलेले कष्ट आता त्याला स्वच्छ दिसतायत. सूनसुद्धा सायीसारखी मऊ झाली. म्हणाली .. “यापेक्षा त्यांना मूला-सुनेचं प्रेम देणंच जास्त स्वस्त पडेल आपल्याला..”

त्यालाही ते पटलंय. तो तिला न्यायला आलाय. होय. मीच. अचानक आलेला प्रेमाचा उमाळाच फक्त माझ्या मनात आहे असं मी म्हणत नाही. त्याबरोबरच थोडा व्यवहारही आहे.पानसेवकिलानाच मी  म्हटलं होतं, तुम्हीच सांगा तिला. म्हणाले…,

“जा असं मी तिला कुठल्या तोंडाने सांगू? मी तिला न्याय मिळवून दिलाय.तिच्यावर अन्याय कसा करू!”

त्यांचंही बरोबर आहे. आता आत डोकवायला पाहिजे मलाच. मन तिथं केव्हाच जाऊन पोचलंय. पावलंच घुटमळतायत.त्यांना वाटतंय, ‘आपल्या चेहऱ्यावरचा व्यवहार तिला पुसटसा जरी दिसला तर! आणि समजा.. नाही दिसला,तरी.. ती.. येईल? तुम्हीच जाताय का?डोकावताय त्या घरी? जा आणि सांगा तिला,..

‘तुझा मुलगा तुला.. न्यायला.. आलाय..!’…..

(समाप्त)

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जगावेगळी…भाग-1 ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ जीवनरंग ☆ जगावेगळी…भाग-1 ☆ श्री अरविंद लिमये☆

(एकटेपण दु:खदायक असणार हे माहित असूनही ते टाळण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण टाकायला ती तयार नव्हती.अशाच एका जगावेगळ्या गलितगात्र तरीही स्वाभिमानी आईची ही कथा…..)

जा. त्या घरात डोकावून या. आपल्या संसारासाठी, मुलासाठी रक्ताचं पाणी केलेली, थकली भागलेली एक म्हातारी आई आत आहे….! आलात डोकावून..?

मलाही जायचंय. मन तिथं केव्हाच जाऊन पोहोचलंय. पावलंच घुटमळतायत. सारखी आठवतीय, तिच्या मुलाचं लग्न ठरलं होतं तेव्हाची ती.थकल्या शरीरानं पण प्रसन्न मनानं पदर खोचून उभी राहिली होती. तिच्या संसाराचं स्वप्न विरता विरताच पोराच्या सुखी संसाराचं स्वप्न तिच्या म्हातार्‍या नजरेसमोर तरळलेलं होतं.

तीन मुलींच्या पाठीवरचा वाचलेला असा हा एकुलता एक मुलगा. तिन्ही मुलींनी उघडण्या पूर्वीच आपले डोळे मिटलेले. आल्या,आणि आईच्या काळजाचा एकेक लचका तोडून आल्या पावलीच निघून गेल्या. तेव्हापासून हिचे डोळे पाझरतच राहिलेत. कधी त्या जखमांची आठवण म्हणून, कधी पोराला दुखलं खुपलं म्हणून, पुढे नवरा आजारी पडला म्हणून, नंतर तो गेला म्हणून आणि नंतर नंतर हा सगळा भूतकाळ आठवूनच.

मुलाचं लग्न ठरलं, तेव्हा त्या क्षणापर्यंत अप्राप्य वाटणारी तृप्ततेची एक जाणिव तिच्या मनाला स्पर्शून गेली.. पण.. ओझरतीच..! लक्ष्मी घरी आली, पण समाधानाने डोळे मिटावेत एवढी उसंत कांहीं तिला मिळालीच नाही. लक्ष्मी घरी आली तेव्हा तिला वाटलं होतं.. आता मांडीवर नातवंड खेळेल.. सुख ओसंडून वाहील.. घर हसेल. पण.. तिचं सुखच हिरमुसलं.

माप ओलांडून सून घरी आली तेव्हा तिला एकदा डोळे भरून पहावी म्हणून हिने नजर वर उचलली, तेव्हा सुनेच्या गोऱ्यापान कपाळावर एक सुक्ष्मशी आठी होती. होती सुक्ष्मशीच..पण ती हिच्या म्हाताऱ्या नजरेत सुध्दा आरपार घुसली. मन थकलं, तशी शरीराने कुरकुर सुरु केली. पण अंथरूण धरलं तर सुनेच्या कपाळावरचं आठ्यांचं जाळं वाढेल म्हणून ती उभीच राहिली. थकलीभागली, पण झोपली नाही….

आलात डोकावून? कशी आहे हो ती? आहे एकटीच पण आहे कशी? हे प्रश्न कधी हवे तेव्हा, हवे त्यावेळी डोकावलेच नव्हते त्याच्या मनात.मुलाच्या. लक्ष्मी हसली तो खुलायचा. ती रुसली तो मलुलायचा. घरी आलेली ती नाजूक गोरटेली मोहाचं झाडच बनली होती जणू. ही फक्त पहात होती. आपला मुलगा आणि त्याची सावली यातला फरक तिला नेमका समजला. लग्न झालं तेव्हापासून तो हिच्यापुरता मेलाच होता. जिवंत होती ती त्याची सावली. सावली.. पण आपल्याअस्तित्वाने चटकेच देणारी..!

पहिल्यापासून अबोलच तो. बोलायचा फार कमी. हवं-नको एवढंच. आता तर तेही नव्हतं. आयुष्यभर काबाडकष्ट करून आईच्या अंगावरचं मांस सगळं झडलंच होतं.. पण तिच्या हाडांची कुरकुर त्याला कधी जाणवलीच नाही. बाहेरची काम बंद केली होती पण घटत्या शक्ती न् उतरत्या वयाच्या तुलनेत घरची कामं दुपटीने वाढली होती. मूर्तिमंत सोशिकताच ती. बोलली काहीच नाही. गप्प बसली.

घरात खाणारी तोंडं ही तीनच. पैसा उदंड नव्हता पण कमी नव्हताच. खरेदी, साड्या,  सिनेमे सगळंच तर सुरू होतं. सिगारेटचा धूर तर सतत दरवळलेलाच असायचा. काटकसर ओढाताण कुठे दिसत नव्हतीच आणि या कशाचबद्दल तिची तक्रारही नव्हती. पण हिच्या गुडघ्यावर खिसलेलं पातळ खूप दिवस उलटून गेल्यानंतरसुद्धा जेव्हा त्या दोघांच्या   नजरपट्टीत आलं नाही तेव्हा हिच्या मनावर पहिला ओरखडा उठला. कुणाची दृष्ट लागावी एवढं खाणं नव्हतंच हिचं. पण भूक मारायचं औषध म्हणून अंगी मूरवलेली चहाची सवय मात्र अद्याप सुटलेली नव्हती.एक दिवस पहाटे पहाटे डोळा लागला तो सकाळी उशिरा उघडला. पाहिलंन् तर दोघांचा चहा झालेला. चूळ भरुन पदराला हात पुसत ती आंत आली तेव्हा हिच्या चहाचं आधण सूनेनं आधीच स्टोव्हवर चढवलेलं होतं. हिने पुढे होऊन दूध कपात घेऊन चहा गाळलान् तर गाळणं पूर्ण भरून वर चोथा उरलाच. इथं दुसरा ओरखडा उठला. आधीच अधू झालेलं मन रक्तबंबाळ झालं. पोराला हाक मारलीन् तीसुद्धा रडवेली.

“एका कपभर चहालासुद्धा महाग झाले कां रे मी?”

“काय झालं?”

“बघितलास हा चहा? उरलेल्या चौथ्यात उकळवून ठेवलाय. एवढं दारिद्र्य आलंय का रे आपल्याला? जड झालेय मी तुम्हाला?”

तो गप्प. एक बारीकशी आठी कपाळावर घेऊन त्याने आपल्या बायकोकडे पाहिलंन्. ती उठली. तरातरा पुढे झाली. सासूनं गाळून ठेवलेला चहा एका घोटात पिऊन टाकलान् आणि तोंड सोडलंन्.

“विष देऊन मारत नव्हते मी तुम्हाला. चहाच होता तो. पटलं ना आता? एक गोष्ट माझी मनाला येईल तर शपथ. आपापलं काही करायचं बळ नाहीय अंगात तर एवढं. ते असतं तर रोज खेटरानंच पूजा केली असतीत माझी. आजवरचं आयुष्य काय अमृत पिऊन काढलं होतंत? या चहाला नाकं मुरडायला? बोलली आणि ढसाढसा रडायला लागली. आता खरं तर रडायचं हिनं पण ही रडणंच विसरली. मुलगा शुंभासारखा उभाच होता. ही जागची उठली. आत जाऊन पडून राहिली. चहा नाही,पाणी नाही, जेवण नाही.. अख्खा दिवस मुलानं बायकोची समजूत काढण्यात घालवला आणि तिन्हीसांजेला तो आईकडे डोकावला.

“आई, तू हे काय चालवलंयस?”

“मी चालवलंय?”

“हे बघ, मला घरी शांतता हवीय. काहीही काबाडकष्ट न करता तुला वेळेवारी दोन घास मिळतायत ना? तरीही तू अशी का वागतेयस? थोडंसं सबुरीनं घेतलंस तर कांही बिघडेल?”

उपाशी पोटी मुलाच्या तोंडून दोन वेळच्या घासांचं अप्रूप तिनं ऐकलं आणि ती चवताळून ताडकन् उठली. पण तेवढ्या श्रमानेही धपापली.

“सबुरीनं घेऊ म्हणजे काय करू रे? तुम्ही जगवाल तशी जगू? मन मारून जिवंत राहू? अरे, ती सून आहे माझी. कुणी वैरीण नव्हेs. आजवर वाकडा शब्द वैऱ्यालासुध्दा कधी ऐकवला नव्हता रे मी. स्वतःच्या संसाराकरता हातात पोळपाट लाटणं घेऊन मी चार घरं फिरले त्याची हिला लाज वाटतेय होय? का माझ्या पिकल्या केसांची न् या वाळक्या शरीराची?”

“आई..पण..”

“हे बघ, मला वेळेवर दोन  घास नकोत पण प्रेमाचे दोन शब्द तरी द्यायचेत.मी काबाडकष्ट केले ते मला दोन घास मिळावेत म्हणून नव्हतेच रे. ते तर मिळालेसुध्दा नाहीत कितींदा तरी. कारण मिळालेल्या एका घासातला घास काढून तो मी आधी तुला भरवला होता रे. वाढवला, लहानाचा मोठा केला..”

ऐकलं आणि सून तीरा सारखी आत घुसली.

“हे बघा, पोराला वाढवलं, मोठ्ठ केलं ते तुमच्याच ना? उपकार केलेत? आम्हीसुद्धा आमची पोरं वाढवणारंच आहोत. उकिरड्यावर नेऊन नाही टाकणार..”

“सुनबाई, बोललीस? भरुन पावले. तुला मी डोळ्यांसमोर नकोय हेच वाकड्या वाटेने आज सांगितलंस? पण एक लक्षात ठेव. स्वयंपाकांच्या घरातूनसुद्धा आज पर्यंत फक्त मानच घेतलाय मी. अपमानाचं हे असलं जळजळीत विष तिथंसुद्धा मला कधी कुणी वाढलं नव्हतं आजपर्यंत.मी माझ्या पोराला वाढवलं. मोठं केलं. उपकार नाही केले. कर्तव्यच केलं. खरं आहे तुझं. पण त्या कर्तव्याची दुसरी बाजू तुम्ही टाळताय. तुम्ही माझं देणं नाकारताय. तुमचा संसार तुम्हाला लखलाभ. मला एक खोली घेऊन द्या. कुडीत जीव आहे तोपर्यंत चार पैसे तिथं पाठवा. उपकार म्हणून नकोsत. केलेल्या कर्तव्याची परतफेड म्हणूनच”

“होs पाठवतो नाs. खाण नाहीये कां इथं पैशांची..! हंडा सापडलाय आम्हाला  गुप्तधनाचा. तो उपसतो आणि पाठवतो बरंs पाठवतो.”

सून तणतणत राहिली. सिगारेटचा धूर हवेत सोडत मुलगा शून्यात पहात राहिला. ती संपूर्ण रात्र तिने टकटकीत जागून काढली. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जाण्यासाठी मुलगा घराबाहेर पडला, त्याच्या पाठोपाठ फाटक्या पिशवीत जुनेरं कोंबून हिने बाहेरचा रस्ता धरलान्..आपल्या सुनेचा निरोपसुद्धा न घेता. एकटेपणाचा बाऊ न करता तिने पुन्हा पदर खोचला. पुन्हा पोळपाट-लाटणं हातात घेतलं. पण ते हात आता पूर्वीसारखे खंबीर नव्हते. थरथरत होते. मग गरजेपोटी कधी कुणी तिला कामावर ठेवून घेत राहिलं. ती राहिली. चुकतमाकत स्वैपाक करू लागली. पण पूर्वीची चवीची भट्टी पुन्हा कधी जमलीच नाही. मग कधी बोलणी बसायची. कामं सुटायची किं पुन्हा दुसरं घर. ती फिरत राहिली. फिरत फिरत इथं आली. या समोरच्या घरी. तिने पूर्वी जोडून ठेवलेल्या.

क्रमशः…

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-5 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

 ☆  जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-5 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

दर पंधरा दिवसांनी डॉक्टर त्याचे चेकिंग करत होते. त्याचा आता छान प्रतिसाद मिळत होते. त्याचं डोकं आता दुखत नव्हते व जखमही बरी होत आली.असंच वर्ष पार पडलं आणि मग त्याला डॉक्टरांनी दहावीच्या परिक्षेला बसण्याची परवानगी दिली. त्याची शाळाही नीट सुरू झाली.

त्याने मनापासून अभ्यास केला आणि तो परिक्षेला बसला. त्याला ८८टक्के मार्क पडले. मग त्याने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्स साईडला प्रवेश घेतला. त्याने छान प्रगती केली. त्याला बारावीला ८५टक्के मार्क पडले. मग त्याने कॉमर्सची डिग्री करता करता सी.ए.ची (एन्ट्रन्स) प्रवेश परिक्षा दिली. ती तो पास झाला. नंतर सी.ए. च्या पुढील परिक्षा व बी.कॉम. चीही डिग्री परीक्षा सर्व चागल्या मार्कांनी पास झाला. त्याने सी.ए.ला ८०टक्के व बी.कॉम.ला ८२टक्के मार्क पडले. नंतर त्याने बाबांच्या ओळखीच्या एका सी.ए. च्या हाताखाली अनुभवासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोडी थोडी कामंही करायला सुरुवात केली.

विश्वासराव व त्यांचा मित्र यांच्या म्हणण्यानुसार त्याने ८-१० ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. तिथे त्याची तिथे संगणकाची व लेखी परिक्षा चांगली होत असे. पण तोंडी परिक्षेत त्याला काही नीट उत्तरं पटकन देता आल्यामुळे त्याची निवड होत नव्हती. त्यामुळे तो थोडा नाराज झाला. नोकरीचा नाद सोडून देतो असे म्हणू लागला. पण त्याचे मित्र, आई, बाबा, शिक्षक, त्यांच्या बरोबर काम करीत असलेल्या सर्वांनी व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या बाबांच्या मित्रांनी त्याची समजूत काढली. नंतर त्याने एका कंपनीचा अर्ज भरला. तिथे संगणकाच्या व लेखी परिक्षेत चांगल्या तऱ्हेने पास झाला. आणि मग त्याला त्या कंपनीने इंटरव्ह्यूला  बोलावल्यावर तो तिथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं थोडी थोडी हळूहळू दिली व काही ठिकाणी अडखळत बोलू लागला. तर त्यांना असे वाटले की तो घाबरत आहे. पण तसे नव्हते.मग तिथे एका अधिकाऱ्याला शंका आली म्हणून त्याने त्याचा बाकीचा परफॉर्मन्स पाहीला. सर्व सर्टिफिकेटस् पाहीली. तेव्हा, त्याला दहावीच्या वर्षी एक वर्ष गँप व डॉक्टरांच्या रजेच सर्टिफिकेट दिसलं. मग त्याने सर्व चौकशी केली. तेव्हा कळलं की त्याच्या बोलण्यावर ऑपरेशनचा परिणाम झाल्यामुळे तो असा बोलतो. मग त्याचा  स्पेशल केस म्हणून इंटरव्ह्यूमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं लिहून द्यायला सांगितले. ती सर्व बरोबर आली. आणि त्याला ती नोकरी मिळाली. पुढे त्याने ५-६वर्षे नोकरी केली. नंतर त्याने स्वतः ची फर्म काढली. त्याला अनुरूप, छानशी सहचारिणी मिळाली. त्यांच्या सहजीवनाची बाग प्रज्ञा व अमोल या दोन फुलांनी फुलली. आणखी काय हवे! झाली पहा परिपुर्ती.

समाप्त.

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-4 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

 

☆ जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-4 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

दिड वाजता आजी-आजोबा व काकू जेवणं आटोपून दवाखान्यात आली. त्यांनी आपण दवाखान्यात थांबतो म्हणून सांगून विश्वासराव, नमिता, व काकांना घरी पाठवले. ती घरी गेली जेवली. सर्वांनी थोडावेळ विश्रांती घेतली. साडेचारला विश्वासराव कामावर गेले. जाताना त्यांनी नमिताला दवाखान्यात सोडले. तिने चहा आणला होता. तो सर्वांनी घेतला. दिपक त्याचवेळी शुध्दीवर यायला लागला होता. पण डॉक्टरांनी त्याला परत विश्रांती मिळावी म्हणून पेनकिलर व सलाईन लावले. रात्री परत विश्वासराव व काका दवाखान्यात थांबले व आजी-आजोबा, काकू, नमिता घरी गेली. मंगळवारी सकाळी १० वाजता गाठीचे रिपोर्ट आले. त्यात काहीच दोष निघाला नाही. त्यामुळे सर्वजण निश्चिंत झाली. मग डॉक्टरांनी दिपकला जखम भरून येण्याची व आराम मिळेल अशी औषधे सुरू केली. त्याला मंगळवारपासून हळूहळू जेवणही नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आले. तो नीट उठून आपापला हिंडूफिरू लागल्यावर १० दिवसांनी सर्व नीट चेकिंग करून टाके काढून औषधांच्या व इतर सुचना देऊन घरी सोडले. त्यावर्षी त्याला शाळेतील दहावीच्या परिक्षेला बसू नको म्हणून सांगून गँप घेण्यास सांगितले. वर्षभर दिपकला डॉक्टरांची ट्रिटमेंट सुरू होती. डॉ. वझेंनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या बोलण्यावर थोडासा परिणाम झाला होता. फार नाही पण काही जोडाक्षरे तो पटकन उच्चारू शकत नसे व थोडा सावकाश बोलत असे. बाकी सर्व छान होते. दर पंधरा दिवसांनी डॉक्टर त्याचे चेकिंग करत होते. आता त्याचा प्रतिसादही छान मिळत होता.

क्रमशः….

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – धन्य सेवक ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – धन्य सेवक ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? लघु बोध कथा?

कथा १८. धन्य सेवक

अनंतपुर नावाच्या नगरात कुंतिभोज नावाचा राजा राज्य करत होता. एकदा तो आपले मंत्री, पुरोहित व इतर सभाजनांसह सभेत  सिंहासनावर बसला होता. त्यावेळी कोणी एक हातात शस्त्रास्त्रे असलेला क्षत्रिय सभेत येऊन राजाला प्रणाम करून म्हणाला, “महाराज, मी धनुर्विद्येचा खूप अभ्यास केलेला आहे. पण मला कोठेही काम न  मिळाल्याने  दुःखी आहे म्हणून आपणा जवळ आलो आहे.”  राजाने त्याला रोज शंभर रुपये वेतन देण्याचे कबूल  करून स्वतःजवळ ठेवून घेतले.  तेव्हापासून तो रात्रंदिवस राजभवनाजवळ वास्तव्य करत होता.

एकदा राजा रात्रीच्या समयी राजवाड्यात झोपला असताना कोण्या एका स्त्रीचा आक्रोश त्याला ऐकू आला. तेव्हा त्याने त्या क्षत्रिय सेवकाला  बोलावून त्याबद्दल चौकशी करण्यास सांगितले.  त्यावर सेवक म्हणाला, “ महाराज,  गेले दहा दिवस मी हा आक्रोश ऐकतोय. पण काही कळत नाही. जर आपण आदेश दिला तर मी याविषयी माहिती काढून येतो.”  राजाने त्याला त्वरित परवानगी दिली. हा सेवक कुठे जातो हे बघण्याच्या विचाराने राजा वेषांतर करून त्याच्या पाठोपाठ जाऊ लागला.

एका देवीच्या देवळाजवळ जवळ बसून रडणारी एक स्त्री पाहून सेवकाने विचारले, “तू कोण आहेस? का रडतेस?”  तेव्हा ती स्त्री म्हणाली, “मी कुंतिभोज राजाची राजलक्ष्मी आहे. तीन दिवसांनंतर राजा मृत्यू पावणार आहे. त्याच्या निधनानंतर मी कुठे जाऊ?  कोण माझे रक्षण करील?  या विचाराने मी रडत आहे.” “राजाच्या रक्षणार्थ  काही उपाय आहे का?”  तसे सेवकाने पुन्हा पुन्हा विचारल्यावर ती स्त्री सेवकाला म्हणाली, “जर स्वतःचा पुत्र या दुर्गादेवीला बळी दिलास तर राजा चिरकाळ जगेल.” “ठीक आहे.  मी आत्ताच पुत्राला आणून देवीला बळी देतो” असे म्हणून सेवकाने घरी येऊन मुलाला सगळा वृत्तांत सांगितला. पुत्र म्हणाला, “तात, या क्षणीच  मला तिकडे घेऊन चला. माझा बळी देऊन राजाचे रक्षण करा. राजाला जीवदान मिळाले तर त्याच्या आश्रयाला असणारे अनेक लोक सुद्धा जगतील.”

सेवकाने मुलाला देवळात नेऊन त्याचा बळी देण्यासाठी तलवार काढली. तेवढ्यात स्वतः देवी तिथे प्रकट झाली व सेवकाला म्हणाली, “तुझ्या साहसाने मी प्रसन्न झाले आहे. मुलाचा वध करू नकोस.  इच्छित वर माग.”  सेवक म्हणाला, “ हे देवी, कुंतिभोज राजाचा अपमृत्यू  टळून त्याने चिरकाळ प्रजेचे पालन करीत सुखाने जगावे असा मला वर दे.” “ तथास्तु!”  असे म्हणून देवी अंतर्धान पावली.  त्यामुळे खूप आनंदित झालेला सेवक मुलाला घरी ठेवून राजभवनाकडे निघाला. इकडे वेषांतरित राजा घडलेला प्रसंग पाहून सेवकाच्या दृष्टीस न पडता राजभवनात उपस्थित झाला. सेवक राजभवनात येऊन राजाला म्हणाला, “महाराज, कोणी एक स्त्री पतीशी भांडण झाल्याने रडत होती. तिची समजूत काढून तिला घरी सोडून आलो”. राजा त्याच्या ह्या उपकारामुळे खूप खुश झाला व त्याने सेवकाला सेनापतीपद बहाल केले.

तात्पर्य – खरोखरच श्रेष्ठ सेवक आपल्या स्वामीवर ओढवलेल्या संकटाचे निवारण करताना प्राणांची सुद्धा पर्वा करीत नाहीत.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-3 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-3 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

विश्वासराव एक यशस्वी उद्योजक होते. त्यांचा बिल्डणली. रक्ताची सोय केली. व दिपकच्या शाळेत त्याच्या शिक्षकांना त्याच्या आजाराची व ऑपरेशनची सर्व माहिती  सांगितली. गैरहजेरीचा एक महीन्याचा अर्ज लिहून दिला. मग त्यांनी दिपकला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारी सकाळी७वाजता दवाखान्यात दाखल केले. तेथे डॉ. सानेंनी दिपकला ऑपरेशनची सर्व कल्पना दिली. मगच ते तयारीला लागले.ऑपरेशन करणार हे ऐकून दिपकही थोडा घाबरला. पण आईशी बोलल्यावर तो शांत झाला. विश्वासराव ९.३० वाजता दवाखान्यात आले. ते डॉ. सानेंना जाऊन भेटले. तेथे डॉ. वझे. व डॉ. सतीश देवही हजर होते. त्या सर्वांशी विश्वासरावांच बोलणं झालं. औषधे यादीप्रमाणे आहेत की नाही ते पाहीले. लगेचच लागणारी औषधे काढून घेतली व बाकीची विश्वासरावांना परत दिली. तेवढ्यात भूल देणारे डॉ. कोदेही आले. दिपकला १०.३० लाऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले.

बाहेर नमिताचा व इतर सर्वांचा सारखा ‘ओम नमःशिवाय’ चा जप सुरू होता. नमिता मनातून थोडी घाबरली होती. पण ती तशी खंबीर होती. तब्बल तीन तासांनी ऑपरेशन संपले. डॉ. वझेंनी ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येऊन ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचे सांगितले. थोड्या वेळाने डॉ. साने, व डॉ. देव ही बाहेर आले. सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकले. एक काळजी थोडी कमी झाली.

अर्ध्या तासाने दिपकला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणले. ऑपरेशनच्यावेळी त्याला रक्त व सलाईन चालू होते. सलाईन नंतरही चालूच होते. त्याला शुद्धीवर यायला बराच वेळ लागणार होता. कारण ऑपरेशन तसं मेजर व त्यात रिस्कही खूप होती. गाठीचा रिपोर्ट आल्याशिवाय पुढील औषधोपचार करता येणार नव्हते. दिपकला आय.सी.यू. मधेच ठेवण्यात आले.

क्रमशः….

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-2 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

☆ जीवनरंग ☆ परिपुर्ती – भाग-2 ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

रात्री कामावरून आल्यावर त्याला आजोबांनी परत ह्या गोष्टीची आठवण करून दिली. तेव्हा मग त्यांनी त्या द्रुष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली. विश्वासनी आपली कामं हाताखालच्या माणसांना आखून दिली. मग त्याला थोडा मोकळा वेळ मिळाला.

दिपकला प्रथम विश्वासरावांनी त्यांच्या फँमिली (डॉ.साने.)डॉक्टरांना दाखवले. त्यांना सर्व तपासण्या केल्या. नाक, कान, घसा, छाती याची तपासणी केली. रक्त, लगवी, थुंकी हे पण तपासले. एक्स-रे काढले. ह्या सर्व तपासणीत काहीच निघाले नाही. या सर्व गडबडीत २-३ दिवस गेले. काहीच निदान नीट होत नव्हतं. सर्व रिपोर्ट तर नॉर्मलच येत होते. त्यामुळे डॉक्टरांनी फक्त डोकेदुखी तात्पुरती कमी होण्यासाठी तेवढ्या गोळ्या लिहून दिल्या. कुणालाच काही सुचत नव्हते.

“ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय” सारखा नमिताचा, आजोबांचा जप सुरू होता. आजींनी तर देव पाण्यातच ठेवले होते. सर्वजण बेचैन होते. सर्वांची शंकरावर त्यांच्या कुलदैवतावर अपार श्रद्धा होती. सर्वजण त्याचीच आराधना करत होते. सगळे काळजीत बुडून गेले होते.

नवससायास करून झालेला कुलदिपक आजारी होता. कितीही पैसे खर्च करण्याची विश्वासरावांची तयारी होती. पण खरे आजाराचे निदान होत नव्हते. आज दिपकचं डोक थोड कमी दुखत होतं आणि दिपकचे काका दिपकजवळ दवाखान्यात थांबले होते. म्हणून नमिता-विश्वास दोघेही घरी आली होती. थोडी विश्रांती घेऊन विश्वास जरा कामावर चक्कर टाकून येणार होता. आणि नमिता स्वयंपाक करून जेवणाचा डबा घेऊन दवाखान्यात जाणार होती. तेवढ्यात दवाखान्यातून दिपकच्या काकांचा फोन आला. डॉ. सानेंनी दिपकचे ‘सिटिस्कँन’ करण्याचे ठरवले होते व त्याच्या मेंदूची तपासणी करण्यासाठीही डॉ. वझे यांना मेंदूच्या स्पेशालिस्टना कॉल केला होता. विश्वासने फोन ठेवला आणि परत दवाखान्यात जाण्यासाठी तयार होत असतानाच त्यांनी नमिताला हाक मारली,

“नमिताs, नमिता अगं, चल आवर लवकर. परत दवाखान्यात जायला हवं. दिपकला तपासायला मेंदूचे स्पेशालिस्ट डॉ. वझे येणार आहेत. त्याच सिटिस्कँनही करणार आहेत. आई-बाबाss आम्ही येतो हो.”

नमिता दहा मिनिटात जेवणाचा डबा भरून घेऊन तयार झाली. विश्वासने ड्रायव्हरला गाडी बाहेर काढायला सांगितली. २५-३०मिनीटात दोघेही दवाखान्यात हजर झाली. आत जाऊन पाहतात तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तयारी सुरू होती. वॉर्डबॉयच्या मदतीने दिपक स्ट्रेचरवर झोपला व सिटिस्कँन करायला घेऊन गेले. त्याचबरोबर त्याच्या मेंदूचेही फोटोही काढले. सर्व तपासणी नीट झाल्यावर डॉक्टर बाहेर आले. त्यांनी विश्वासरावांना व काकांना कंन्सल्टींग रुममध्ये बोलावून घेतले. थोड्यावेळाने दिपकला त्याच्या रुममध्ये वॉर्डबॉयनी आणून सोडले. त्याच्याजवळ नमिता थांबली आणि विश्वासराव व दिपकचे काका डॉक्टरांबरोबर गेले. डॉ. वझे व डॉ. साने दोघे कन्सल्टींग रुममध्ये होते. त्यांनी दोघांना तिथे खुर्चीवर बसवून घेतले व कॉंम्प्युटरवर मेंदूचा फोटो दाखवून एका ठिकाणी छोटीसी लिंबाएवढी लहान गाठ दिसत होती. ती पॉइंटिंग करून दाखवली. आणि डॉ. वझे विश्वासरावांना म्हणाले,

“दिपकचं ऑपरेशन करून ही गाठ काढायला हवी. त्या गाठीची तपासणी करायला हवी.

 क्रमशः….

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आपला हिस्सा (अनुवादीत कथा) ☆ मूळ कथा – अपना हिस्सा – श्री विजय कुमार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ ☆ आपला हिस्सा (अनुवादीत कथा) ☆ मूळ कथा – अपना हिस्सा – श्री विजय कुमार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

‘अरे यार, या सुमेशला काय म्हणावं तरी काय? इकडे डायबेटीस आहे, पण आपल्या हिश्श्याची मिठाई काही सोडत नाही. बघ .. बघ… तिकडे बघ… रसगुल्ला आणि बर्फीचे दोन पीस उचलून गुपचुप आपल्या पिशवीत ठेवलेत.’ विनोदाची नजर सुमेशकडे लागली होती.

‘मुलांसाठी घेतली असेल. आपल्याला काय करायचय.’ मी म्हंटलं, ’तू आपला खा. पी. आणि पार्टीची मजा घे.’

‘याला कुठे लहान मुले आहेत? म्हणजे एक-दोन पीसमध्ये खूश होऊन जातील.’ विनोद म्हणाला. ‘बघ .. बघ… आता समोसा पिशवीत ठेवतोय. मोठा कंजूष माणूस आहे. जे खाल्लं जात नाही, ते लोक प्लेटमधे तसंच ठेवतात. पण हा कधी टाकत नाही. कुणास ठाऊक, घरी जाऊन काय करतो त्याचं?’

‘काय वाटेल ते करेल. त्याची मर्जी. त्याच्या वाटणीचं आहे ते सगळं. तुझंसुद्धा लक्ष ना, या असल्याच गोष्टींकडे असतं.’

‘ते बघ! तो सगळं सामान घेऊन चाललाय. बघूयात काय करतोय!’ विनोद हेरगिरी करण्याच्या मागे लागला.

‘जाऊ दे ना रे बाबा,’ मी टाळाटाळा करत म्हंटलं.

‘चल रे बाबा,’ म्हणत त्याने मला जवळ जवळ ओढतच बाहेर नेलं।

बाहेर आल्यावर आम्हाला दिसलं, रसगुल्ला, बर्फी, सामोसे वगैरे घातलेली पिशवी, गेटपाशी उभ्या असेलया दोन मुलांकडे देत होता. ती मुले जवळच्याच झोपडीत रहात होती आणि आस-पास खेळत होती.

मी म्हंटलं, ‘ बघ! आपल्या हिश्श्याचा उपयोग याही तर्‍हेने करता येतो. ‘ विनोद काही न बोलता नुसता उभा होता.

 

मूळ कथा – ‘अपना हिस्सा’ –   मूळ  लेखक – श्री विजय कुमार,

सह संपादक ‘शुभ तारिका’ (मासिक पत्रिका), अंबाला छावनी 133001, मोबाइल 9813130512

अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares