मराठी साहित्य – काव्यानंद ☆ निशाशृंगार… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ निशाशृंगार… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

काव्यानंद:

शृंगार हा रसांचा राजा आहे, रसपती आहे.  प्रेम— रती हा शृंगाराचा स्थायीभाव.  शृंगार उत्तान असेल, सात्विक असेल अथवा वियोगातला विप्रलंभ शृंगार असेल  पण मानवी जीवनातच नव्हे तर अवघ्या निसर्गातच या रसराजाचं दर्शन होत असतं.  गीतकार आणि कवी मंडळींचा तर हा लाडका विषय.  मग त्यात प्रेम, संध्याकाळ, नदीकाठ, समुद्रकिनारा तर असतातच पण अग्रभागी असतो तो चंद्र!  प्रियतमेच्या नजरेतला प्रियकर. चित्तवृत्ती फुलवणारी चंद्र, चांदणं, यामिनी यांची शेकडो गीत आज पर्यंत रचली गेली आहेत.  अगदी  महान कवी कालीदासांचे मेघदूत हे काव्य विप्रलंभ शृंगारचे एक अप्रतिम उदाहरण आहे.  असंच एक सुंदर शृंगार गीत घेऊन येत आहेत डॉ. निशिकांत श्रोत्री.  या गीताचं शीर्षक आहे निशाशृंगार ( निशिगंध काव्यसंग्रह)

☆ – निशाशृंगार – डॉ निशिकांत श्रोत्री ☆

असुन रंग काळा रुपेरी हा साज सजली निशा

नटूनी थटूनि घेऊनि येई धुंदी नशा।।ध्रु।

 

हिर्‍यांची कटी मेखला दिव्य शोभे

आकाशगंगा सजविण्यास लाभे

शेल्यावरी कृष्ण नक्षत्र शोभे

अलंकार सजवीत रजनीस या ।१।।

 

जरी रात्र काळी निशानाथ भाळी

किती कौतुकाने मिरवी झळाळी

रिझविण्यास कांता निशा सज्ज झाली

लपेटूनिया भवती दाही दिशा ।।२।।

 

रजनीकांत प्रणये निशा तृप्त झाली

धुंदीस बघुनी हवा कुंद झाली

तृप्त शशांक धन्य ती रजनी

संपन्न हो प्रीतीचा हा वसा ।।३।।

डाॅ. निशिकान्त श्रोत्री.

हे गीत वाचत असताना अक्षरशः अंगावर मोरपीस फिरतं. इतकं नाजूक, इतकं कोमल आणि तरल शब्दातले हे गीत सहजपणे एका धुंद लहरीत तरंगायला लावतं.

असून रंग काळा रुपेरी

हा साज सजली निशा

 नटूनी थटूनि  घेऊनि

 येईल धुंदी नशा …

यात प्रत्यक्ष निशा— रात्रच प्रियतमेच्या भूमिकेत आहे. ही निशा कशी? तर कृष्णवर्णी काळी.  पण तिनेही रुपेरी साज चढवलेला आहे. नटलेली, थटलेली चंदेरी चांदण्याचा पेहराव घातलेली निशा प्रणय भावनेने धुंद झालेली भासत आहे.

 *हिऱ्यांची कटी मेखला दिव्य शोभे

 आकाशगंगा सजविण्यास लाभे

 शेल्यावरी कृष्ण नक्षत्र शोभे

अलंकार सजवीत रजनीस या …

 

प्रथम याओळींचा अन्वयार्थ लावूया.

कटी, हिर्‍यांची मेखला दिव्य शोभे

सजविण्यास आकाशगंगा लाभे

कृष्ण शेल्यावरी नक्षत्र शोभे

अलंकार सजवीत रजनीस या…

खरोखरच ही चार चरणे  वाचल्यानंतर प्रथम मनात येतं ते

जे न देखे रवी ते देखे कवी

 किती सुंदर कल्पनांची ही शब्दसरी!

 निशेच्या साज शृंगारकडे पाहताना कवी म्हणतात, या निशेच्या कमनीय कटीवर— कमरेवर जणूं काही आकाशगंगारूपी हिऱ्यांची  साखळी आहे. आकाशगंगा म्हणजे तारका समूहाचा डोळ्यांना लुब्ध करणारा नभातला एक लांबलचक पट्टाच. आज कवीच्या नजरेत मात्र ही आकाशगंगा  काळ्या निशेचा  हिऱ्यांचा कमररपट्टाच आहे. आकाशातलं चमचमणारं चांदणं, निशेच्या काळ्या शेल्यावर कसं चंदेरी बुट्ट्यांसारखं शोभिवंत वाटत आहे.  खरोखरच या कृष्णवर्णी रजनीने हेच अलंकार चढवून स्वतःला नटवले आहे, सजवले आहे. ते कुणासाठी बरे? पाहूया पुढच्या कडव्यात.

 जरी रात्र काळी निशानाथ भाळी

 किती कौतुकाने मिरवी झळाळी

 रिझविण्यास कांता निशा सज्ज झाली

 लपेटुनिया भवती दाही दिशा…

ही प्रियतमा रात्रीच्या रूपात आहे. ती काळी आहे. पण तिच्या भाळावर —कपाळावर मात्र चमचमणारा, लखलखीत, प्रकाशमय असा शशांक आहे. किती कौतुकाने, अगदी मालकी हक्कानेच ती तिच्या निशानाथाची झळाळी मिरवत आहे!  तिच्या संपूर्ण काळ्या रंगालाच त्याने उजळवून टाकलेले आहे.

 रिझविण्यास कांता या ओळीतला कांता हा शब्द खूपच रसभरीत आहे. प्रणयात किंवा प्रणय भावनेत धुंद झालेली स्त्री ही कांता असतेच. पण या ठिकाणी कांता याचा अर्थ प्रियकर हा आहे आणि या प्रियकराला रमविण्यासाठी ही रजनी पहा कशी  दाही दिशांचं वस्त्र लपेटून तयार झाली आहे.  ही ओळ इतकी तरल आहे की ती वाचताना असे वाटते की प्रणयोत्सुक प्रियतमा जणू कुठल्याशा पारदर्शक वस्त्रातून तिचं कायिक सौंदर्यच प्रियकराला दाखवत आहे.

  रजनीकांत प्रणये  निशा तृप्तझाली

  धुंदीस बघुनी हवा कुंद झाली

 तृप्त शशांक धन्य ती रजनी

 संपन्न हो प्रीतीचा हा वसा…

वा! क्या बात है कविराज?  या काव्यपंक्ती वाचताना मला क्षणभर खजुराहोची कामोत्सुक, शंकर-पार्वतीच्या कामक्रीडेची शिल्पच पाहते आहे की काय असेच वाटले. किती नाजूक! किती तरल हा प्रणय! आणि प्रणय क्रीडेचा हलकेच गाठलेला तो शिखरबिंदू! एक तृप्तीचा क्षण जो रजनीकांताशी झालेल्या काम क्रीडेनंतर निशेने अनुभवलेला. आणि निसर्गातलं हे धुंद प्रणयमग्न युगुल पाहून वातावरणातल्या हवेलाही कशी नशा चढली आहे. तीही कुंद—धुंद झाली  आहे.

ये राते ये मोसम ये चंचल हवा…जणू काही कुठल्यातरी अज्ञात अस्तित्वाच्या अंतरातूनच अस्फूटपणे उद्गार उमटतात,

 तृप्त शशांक धन्य ती रजनी

 संपन्न हो प्रीतीचा हा वसा ..

हा चंद्र ही तृप्त आणि ही रजनीही धन्य!

समागमातला आनंद,मीलनाची आकंठ तृप्ती!

खरोखरच एका दिव्य, रसमय, तरल शृंगाराचा हा सोहळाच जणू काही संपन्न झालेला आहे!

अहाहा! कविराज, खुदा की कसम लाजवाब है।

निशाशृंगार हे गीत म्हणजे चेतनागुणोक्ती अलंकाराचं एक मूर्तीमंत सुंदर उदाहरणच. चेतनागुणोक्ती हा अगदी भावयुक्त अलंकार आहे.  अचेतन गोष्टीला चेतनामय मानून तिला सचेतनाचे गुणधर्म जोडणे हे या अलंकाराचे वैशिष्ट्य आहे.  याकरिता परानुभूती कौशल्याची गरज असते. या अलंकारामुळे कवीच्या कल्पनेला खूप वाव मिळतो आणि कविता अंगोपांगी बहरते.

डॉ. श्रोत्री यांच्या प्रस्तुत निशाशृंगार या गीतात हे प्रकर्षाने जाणवते.  निशा म्हणजे रात्र. एक काळाचा प्रहर खरंतर. पण कवीने या कृष्णकाळ्या रात्रीलाच प्रियतमेच्या रूपात पाहिले आहे.  इथे निशा ही प्रणय धुंद प्रियतमा आणि रजनीनाथ हाच प्रियकर आहे आणि त्यांच्या रुपेरी प्रणायाला गुंफणारं हे अप्रतिम काव्य.  इथे हवेला सुद्धा चैतन्य रूप दिलेले आहे. वास्तविक चेतनागुणोक्ती अलंकार आणि रूपक हे तसे एकमेकात गुंतलेलेच असतात असे का म्हणू नये?  निशाशृंगार या गीतात चेतनागुणोक्ती अलंकार साधणारी निशा, निशानाथ, आकाशगंगा, मेखला, कृष्ण शेला, दिशा ही सारी रूपकेच आहेत आणि ती या गीतात चेतना रूपात आहेत. सचेतन आहेत.

डॉ. श्रोत्रींची ही रजनी जशी निसर्गाने बहाल केलेल्या अलंकाराने झळाळत आहे तसेच हे काव्यही साहित्यालंकाराने सजलेले आहे.

यात आकाशगंगेला निशेच्या कटीवरच्या मेखलेची उपमा दिलेली आहे.किंवा आकाशगंगा म्हणजे जणू काही निशेच्या कटीवरची मेखलाच भासे, असा उत्प्रेक्षा अलंकारही यात आहे.

लपेटूनिया भवती दाही दिशा या काव्यपंक्तीत साधलेला श्लेष अलंकार फारच बहारदार आहे.

एका अर्थी या काळ्या निशेने दाही दिशांचे हे उंची, भरजरी वस्त्र प्रियकराला रिझवण्यासाठी लपेटलेले आहे तर दुसऱ्या अर्थी दाही दिशांचे वस्त्र म्हणजे दिक् + अंबर म्हणजे दिगंबर.  प्रियकराला रिझविण्यासाठी सज्ज झालेली निशा ही दिगंबरावस्थेत आहे.  विवस्त्र आहे आणि या विवस्त्रतेत तिचे समर्पण आहे.   दिशारुपी वस्त्रातला हा श्र्लेष अलंकार थक्क करणारा आहे.  कवीच्या अफाट कल्पनाशक्तीला,दृष्यात्मक प्रतिभेला(visualisation)  दाद द्यावी तितकी थोडीच आहे.

रात्र काळी— निशानाथ भाळी— किती कौतुकाने मिरवी झळाळी या काव्यपंक्तीतला अनुप्रासही अत्यंत लयकारी आहे.  तसेच शोभे— लाभे, भाळी— झळाळी ही स्वरयमके गीताला गेयता देतात.  गीतातल्या ध्रुवपदाशी जुळणारी नशा— दिशा— वसा ही यमकेही सुरेख आणि सहज आहेत. गीताला एक अंगभूत चाल देणारी आहेत. शिवाय या शृंगारिक रात्रीचं एक प्रकारे सुरेख वर्णनच या काव्यात केलेले आहे.  स्वभावोक्तीची ही झलक फारच काव्यात्मक आणि सुंदर आहे.

हे गीत वाचताना सहजच म्हणा अथवा चोरटेपणाने म्हणा उगीचच पर्यायोक्ती अलंकाराचा अविष्कार ही जाणवतो. पर्यायोक्ती अलंकार म्हणजे आडवळणाने किंवा मिस्कीलपणे सांगितलेली गोष्ट . यात अशी कुठली दडलेली गोड गोष्ट आहे की जी कवीला सांगायची आहे?  कवी राजांची माफी मागून अथवा परवानगी गृहीत धरूनच लिहिते, न जाणो या रजनी— शशांकची ही प्रणय घटिका म्हणजे कवीचा स्वतःचाच  काव्यात्मक आधार घेऊन व्यक्त केलेला मधुर अनुभव असेल का?  कारण काव्य हे अनुभूतीतून आणि संवेदनशील मनातूनच प्रसवतं. म्हणून या काव्यात परानुभूतीपेक्षा स्वानुभूतीही जाणवते.   कारण निशा, रजनीकांत हे गीतातले शब्द थोडेसे वैयक्तिक वाटले मला.  कवीच्या नावाशी साधर्म्य साधणारे.  असो अतिरंजीतपणा नको आणि उगीच विनोदही नको.

या पलीकडे जाऊन एकच म्हणेन की शृंगार रसाचे सौंदर्य खुलवणारं, अलंकारिक पण बोजड नसलेलं हे काव्य आहे. उत्तान आणि सात्विक शृंगाराची ही सुरेख सरमिसळ आहे. म्हणून अश्लीलता अजिबात नाही. वाचक अगदी त्रयस्थपणे  कोमल, अत्यंत हळुवार, अलवार, सुंदर प्रणय भावनेच्या प्रवाहात सहजपणे तरंगत राहतो आणि हेच या काव्याचे परमोच्च यश आहे.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ दिपवाळीचे लक्ष्मीपूजन… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ दिपवाळीचे लक्ष्मीपूजन… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ दिपवाळीचे लक्ष्मीपूजन… स्व. वि. दा. सावरकर ☆

लक्ष्मीपूजन करू घरोघर आम्ही जरी भावे

प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे

आणि इंग्रज पूजी जरि ना लक्ष्मीची मूर्ती

राबे रिद्धिसिद्धी त्याच्या दाराशी तरि ती

काय बंधुंनो, कारण? रुसली भारतलक्ष्मी कां?

लाथाडुनि दे पूजा अमुची शतकांची देखा

कारण आम्ही सुमें अर्चितो परि ना सुमनानें

विनवू परि ना, विष्णुसम तिला जिंकु विक्रमाने

लक्ष्मीपूजन करावया जैं करितो स्नानाला

परका साबू, परकी तेलें लावू अंगाला

परदेशीचे रेशीम त्याचा मुकटा नेसोनी

देवघरी परदेशी रंगे रंगीत बैसोनी

विदेशातली साखर घालुनि नैवेद्या दावू

अशा पूजनें प्रसन्न होईल लक्ष्मी हे भावू

साबू नेई कोटी, कोटी तेल रुपाया ने

नेई लुटोनी विदेश कोटी अन्य उपायाने

विलायती जी साखर नैवेद्यासी लक्ष्मीच्या

आणियली ती नेत विदेशी कोटी रुपयांच्या

अशा रीतीने लक्ष्मी दवडुनि दाराबाहेरी

लक्ष्मीपूजन करीत बसतो आम्ही देवघरी

आणि विदेशी नळे, फटाके, फुलबाजा अंती

उडवुनि डिंडिम पिटू आपल्या मौर्ख्याचा जगती

अहो हिंदुंनों, कोटी कोटी रुपयांची या दिवशी

लक्ष्मी पूजावयासि लक्ष्मी धाडू विदेशासी

म्हणुनि आम्ही जरी पुजू घरोघर ही लक्ष्मी भावें

प्रसन्न पूजेने ना होता लक्ष्मी रागावे

तरी हिंदुंनों, घरात लक्ष्मी आधी आणावी

विदेशीसि ना शिवू शक्यतो वृत्ती बाणावी

देशी तेलें, देशी साबू, देशी वस्त्रानें

देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्रानें

स्वदेशलक्ष्मी पूजू साधुनि जरी मंगलवेळ

गजान्तलक्ष्मी हिंदुहिंदुच्या दारी डोलेल

 – वि दा सावरकर

रसग्रहण

परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातल्याशिवाय या देशाची भरभराट होणार नाही; ही वस्तुस्थिती सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी स्वा. सावरकरांनी ही कविता १९२५ साली रचली. दिवाळीसारख्या सणांच्या वेळी सावरकरांनीच स्थापन केलेल्या हिंदुसभेचे कार्यकर्ते, मेळावे घेऊन, अशा कविता गाऊन, समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न करायचे. सर्वसामान्य जनतेला कळावी, पचावी, रुचावी म्हणून सावरकरांनी या कवितेत अगदी सोपी शब्दयोजना केलेली दिसते. तसेच लोकांना सहज पटतील असे दैनंदिन व्यवहारातील दाखले ते देतात. मात्र कितीही सोपी शब्दरचना केली तरी त्यांच्यातला शब्दप्रभू कुठेतरी डोकावतोच. उदा. ‘सुमनें’ वरचा श्लेष किंवा ‘मूर्खता’ साठी वापरलेला शब्द ‘मौर्ख्य’.

लक्ष्मीपूजनादिवशी घराचा दरवाजा उघडा ठेवला की लक्ष्मी घरात येते असा समज आहे. याचाच उपयोग करून कवी सांगतात की, परदेशी फटाके, तेल, साबण, साखर अशा वस्तू वापरून तुम्ही लक्ष्मीला केवळ दरवाजाबाहेरच नव्हे तर देशाबाहेर घालवीत आहात. आपलाच कच्चा माल कवडीमोलाने घेऊन, त्यांच्या देशात बनलेल्या वस्तू हे इंग्रज आपल्याला विकतात व कोट्यावधी रुपये भारतातून लुटून नेतात. अशा परिस्थितीत लक्ष्मी तुमच्या आमच्यावर कशी प्रसन्न होईल. ती रुसून परदेशीच निघून जाणार. याउप्पर आणि परदेशी फटाके वाजवून तुम्ही जणु आपल्या मूर्खतेचा डिंडोराच पिटता. म्हणून हे देशबंधूंनों, आधी देशाबाहेर  जाणाऱ्या लक्ष्मीला थांबवा म्हणजेच एका अर्थाने आधी लक्ष्मीला घरांत घेऊन या व मग तिची पूजा करा.

कविता संपता संपता का होईना पण ‘देशी साखर, देशी अस्त्रे, देशी शस्त्राने’ या ओवीत त्यांच्यातला क्रांतिकारक डोकावतो. ते म्हणतात, देशी वस्त्रे नेसून, देशी साखरेने नैवेद्य बनवून, देशी अस्त्राशस्त्रांने आपण स्वदेशलक्ष्मीची पूजा करू. म्हणजेच स्वातंत्र्यलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण सशस्त्र आंदोलन करू. देश स्वतंत्र झाल्यानंतरच हिंदुस्थानातील प्रत्येकाकडे गजान्तलक्ष्मी नांदेल, देशाची भरभराट होईल.

हे विचार जवळ जवळ १०० वर्षांनंतर, सद्यपरिस्थितीत देखिल अचूक लागू पडतात. आपण पहातो की दिवाळी आली की चिनी बनावटीच्या वस्तूंचा बहिष्कार  करण्याची टूम निघते पण विविध कारणांमुळे हे फारच कमी प्रमाणात  साधलं जातं. म्हणूनच महान, द्रष्ट्या कवींच्या कविता ह्या सार्वकालिक असतात असं म्हटलं जातं.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ सायंकाळी रानात चुकलेले कोंकरू… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ सायंकाळी रानात चुकलेले कोंकरू… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सायंकाळी रानात चुकलेले कोंकरू... स्व. वि. दा. सावरकर ☆

कां भटकसी येथें बोले। कां नेत्र जाहले ओले

कोणी कां तुला दुखविलें। सांग रे

 

धनी तुझा क्रूर की भारी । का माता रागें भरली

का तुझ्यापासुनी चुकली । सांग रे

 

हा हाय कोंकरु बचडें। किती बें बें करुनि ओरडे

उचलोनि घेतलें कडें। गोजिरें

 

कां तडफड आतां करिसी। मी कडें घेतलें तुजसी

चल गृहीं चैन मग खाशी। ऐक रे

 

मी क्रूर तुला का वाटे। हृदय हें म्हणुनि का फाटे

भय नको तुला हें खोटें। ऐक रे

 

हा चंद्र रम्य जरि आहे। मध्यान् रात्रिमधी पाहे

वृक वारुनि रक्षिल ना हें। जाण रे

 

तो दूर दिसतसे कोण। टपतसे क्रूर बघ यवन

गोजिरी कापण्या मान। जाण रे

 

कमी कांही न तुजलागोनी। मी तुला दूध पाजोनी

ही रात्र गृहीं ठेवोनी। पुढति रे

 

उदईक येथ तव माता। आणिक कळपिं तव पाता

देईन तयांचे हातां। तुजसि रे

 

मग थोपटुनी म्यां हातें। आणिलें गृहातें त्यातें

तो नवल मंडळींना तें। जाहलें

 

कुरवाळिति कोणी त्यातें। आणि घेति चुंबना कुणि ते

कुणि अरसिक मजला हंसते। जाहले

 

गोजिरें कोंकरु काळें। नउ दहा दिनांचे सगळें

मऊमऊ केश ते कुरळे। शोभले

 

लाडक्या कां असा भीसी। मी तत्पर तव सेवेसी

कोवळी मेथी ना खासी। कां बरें

 

बघ येथें तुझियासाठीं। आणिली दुधाची वाटी

परि थेंब असा ना चाटी। कां बरें

 

तव माता क्षणभर चुकली। म्हणुनि का तनू तव सुकली

माझीही माता नेली। यमकरें

 

भेटेल उद्यां तव तुजला। मिळणार न परि मम मजला

कल्पांतकाल जरि आला। हाय रे

 

मिथ्या हा सर्व पसारा। हा व्याप नश्वरचि सारा

ममताही करिते मारा। वरति रे

 

ह्या जगीं दु:खमय सारें। ही बांधव, पत्नी, पोरें

म्हणुनिया शांतमन हो रे। तूं त्वरें

 

तरि कांही न जेव्हां खाई। धरुनियां उग्रता कांही

उचटिलें तोंड मी पाही। चिमुकलें

 

हळु दूध थोडके प्यालें। मग त्वरें तोंड फिरवीलें

कोंकरुं बावरुन गेले। साजिरें

 

स्वातंत्र्य जयांचे गेलें। परक्यांचे बंदी झाले

त्रिभुवनीं सुख न त्यां कसलें। की खरें

 

लटकून छातिशीं निजलें। तासही भराभर गेले

विश्व हें मुदित मग केलें। रविकरें

 

घेउनी परत त्या हातीं। कुरवाळित वरचेवरतीं

कालच्या ठिकाणावरती। सोडिलें

 

तों माता त्याची होती। शोधीत दूर शिशुसाठीं

दगडांचे, तरुंचे पाठीं। हाय रे

 

हंबरडे ऐकू आले। आनंदसिंधु उसळले

स्तनी शरासारखें घुसलें। किती त्वरें

 

डोलतो मुदित तरुवर तो। सप्रेम पक्षी हा गातो

तोकडा प्रतिध्वनि देतो। मुदभरें

 

हे प्रभो, हर्षविसी यासी। परि मला रडत बसवीसी

मम माता कां लपवीसी। अजुनि रे

कवी – वि दा सावरकर

रसग्रहण

नवतरुण सावरकरांनी ही कविता १९०० साली म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी लिहिली आहे. ओवी या करूणरसाला पोषक अशा छंदात ही कविता बांधलेली आहे. हे काव्य जरी करूणरसाने युक्त असलं तरिही, कवीने एक सुखान्त प्रसंग यात रेखाटला आहे. हे शब्दचित्र त्यांनी इतकं हुबेहुब रंगवलं आहे की, चलचित्राप्रमाणे तो प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर घडताना आपण पाहू शकतो. ‘तरि कांही न जेव्हां खाई। धरुनियां उग्रता कांही

उचटिलें तोंड मी पाही। चिमुकलें’ या ओळी वाचताना तर याची प्रचिती येऊन, वाचकाच्या चेहर्‍यावर हसू आल्यावाचून रहात नाही.

ही कविता वाचताना मला शाळेतलं स्वभावोक्ती अलंकाराचं ‘मातीत ते पसरले अति रम्य पंख, केले उदर वरी पांडुर निष्कलंक’ हे प्रसिद्ध उदाहरण आठवलं. पण इथे केवळ शब्दचित्र नाही तर, त्याच्या अनुषंगाने, कवीचे हळुवार मन, त्यांचे प्राणी प्रेम, कणव, पशुहत्येला असणारा त्यांचा विरोध यांचं दर्शन होतं. कवीच्या हृदयात दडलेलं मातृवियोगाचं दुःख व त्या दुःखाला असलेली अध्यात्मिक किनार यांचंदेखील या निमित्तानं प्रकटीकरण होतं. फक्त वैयक्तिक  दुःखाला नाही तर, पारतंत्र्यात राहणाऱ्या सार्‍या भारतीयांच्या दुःखाला पण ही कविता स्पर्शून जाते.’त्रिभुवनीचं सुख सुद्धा स्वातंत्र्य गमावलेल्यांना आनंद देऊ शकत नाही’ असं कवी सांगतात.

सावरकरांना शब्दप्रभू किंवा भाषाप्रभू का म्हटलं जातं याची प्रचिती याही कवितेत येते. उदाहरणार्थ, ‘वृक वारुनि रक्षिल ना हे’ (म्हणजे मी तुझी भूक भागवून तुझे रक्षण करीन) किंवा ‘

विश्व हे मुदित मग केले। रविकरें’ (सकाळ झाली, ही साधी गोष्ट किती गोड शब्दात सांगितली आहे). कोंकराला आई भेटल्यानंतर फक्त त्या दोघांनाच वा कवीलाच आनंद झालेला नाही तर, या आनंदात निसर्ग  सुद्धा सहभागी झाला आहे, ‘डोलतो मुदित तरुवर तो। सप्रेम पक्षी हा गातो’ असं कवी म्हणतात.

अशी छंदबद्ध व यमक, स्वभावोक्ती अशा अलंकारांनी नटलेली तसेच जाता जाता सहजपणे ‘संसार दुःखमय आहे’, विश्वाचा पसारा मिथ्या आहे’ अशी त्रिकालाबाधित सत्य सांगणारी कविता सावरकर एवढ्या कोवळ्या वयात लिहितात यावरूनच त्यांच्या बुद्धीची झेप दिसून येते. त्रिवार नमन!!

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?... स्व. वि. दा. सावरकर ☆

पौर्वात्य खंड अवघें जित यत्प्रतापें

दारिद्रय आणि भय कांपति ज्या प्रतापें

नाशासि पारसिक तेहि पलांत गेले

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

तें जिंकी पारसिक, दे जगता दरातें

जें दिग्जयी बल तुझेंहि शिकंदरा, तें

ध्वंसीत रोम तव राजपुरीं रिघालें

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

साम्राज्य विस्तृत अनंत असेंचि साचें

त्याही महाप्रथित रोमपत्तनाचें

हूणें हणोनि घण चूर्णविचूर्ण केलें

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

हा उन्नती अवनतीस समुद्र जातो

भास्वान् रवीहि उदयास्त अखंड घेतो

उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

जे मत्त फारचि बलान्वित गर्ववाही

उद्विग्न- मानस उदासहि जे तयांहीं

हें पाहिजे स्वमनिं संतत चिंतियेलें

विश्वात आजवरि शाश्वत काय झालें?

     कवी – वि दा सावरकर

रसग्रहण

ही कविता ‘वसंततिलका’ या अक्षरगणवृत्ते बांधलेली आहे. एकवीस मात्रा व १४ अक्षरांच्या ओळी असणारे हे वृत्त वीर रस व शौर्य भावनेला पोषक आहे. प्रत्येक ओळीच्या शेवटी दोन गुरू (प्रत्येकी दोन मात्रांची दोन अक्षरे) येत असल्यामुळे कोणताही विचार, वाचक अथवा श्रोत्यांवर ठसविण्यासाठी ही वृत्तरचना उपयुक्त आहे. सावरकरांची ‘माझे मृत्युपत्र’ ही कवितादेखिल याच वृत्तात निबद्ध आहे. जाता जाता सावरकर निर्मित ‘वैनायक’ वृत्ताचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. त्यांनी अंदमानात असतांना रचलेल्या ‘निद्रे’, ‘सायंघंटा’, ‘मूर्ती दुजी ती’, ‘मरणोन्मुख शय्येवर’ यासारख्या कांही कविता तसेच ‘कमला’ व ‘गोमंतक’ (उत्तरार्ध) ही दीर्घ काव्ये त्यांनी स्वनिर्मित ‘वैनायक’ वृत्तांतच रचलेली आहेत. एखाद्याच्या प्रतिभेचा संचार किती विविध प्रांतात असावा! अलौकिक!!

प्रस्तुत कविता सावरकरांनी, पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना, १९०२ साली ‘आर्यन विकली’ साठी रचली. कालांतराने ती ‘काळ’ मध्येही प्रसिद्ध झाली. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं १९ वर्षांचं! खरं तर हे वय, निसर्गात भरून राहिलेल्या सौंदर्याचं वर्णन करणार्‍या कविता किंवा शृंगाररसाने युक्त प्रेमकविता करण्याचं! पण सावरकरांनी मातृभूमीलाच मन वाहिलेलं असल्यामुळे, तिच्या स्वातंत्र्या शिवाय दुसरा कोणताच विचार त्यांच्या मनात येत नसावा. प्रखर बुद्धीमत्ता घेऊन जन्माला आलेल्या या तरूणाने, आपलं तारुण्य स्वातंत्र्य देवतेच्या चरणी अर्पण केलं होतं. अफाट वाचन, चिंतन, मनन यामुळे त्यांच्या या बुद्धीमत्तेला तेज धार आलेली होती. त्यामुळेच कोवळ्या तरूण वयात ते शाश्वत/ अशाश्वत यासारख्या विषयावर भाष्य करू शकतात. ते म्हणतात या विश्वात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही. मग ती चांगली असो वा वाईट, हवीशी असो वा नकोशी! याच्या पुष्ट्यर्थ ते निरनिराळी उदाहरणे देतात.

आपल्या पराक्रमाने ज्यांनी अवघ्या पौर्वात्य खंडावर राज्य केलं, ज्यांच्या राज्यात सुखशांती व सुबत्ता नांदत असे अशा पारसिक म्हणजेच पारशांचं साम्राज्य सिंकंदराने नष्ट केले. म्हणजेच त्यांना जिंकून, त्यांचं शिरकाण करून तसेच धर्मांतर करायला लावून आपलं मुस्लीम साम्राज्य स्थापन केलं. अशा जगज्जेत्या सिकंदराचं जे सत्ताकेंद्र होतं, त्या ग्रीसवर कालांतराने रोमन लोकांनी कब्जा केला. परंतु पुढे जाऊन हूणांच्या रानटी टोळ्यांनी या अजिंक्य समजल्या जाणाऱ्या रोमन साम्राज्याचे तुकडे तुकडे केले. अशा प्रकारे उन्नती पाठोपाठ अवनती येतेच. जे जे म्हणून निर्माण होते, ते ते कालांतराने नष्ट होतेच. जे उदयाला येते त्याचा अस्त होणार हे ठरलेलेच आहे. हे ठसविण्यासाठी ऐतिहासिक दाखल्यांपाठोपाठ कवी, समुद्राची भरती ओहोटी, सूर्याचा उदयास्त असे निसर्गातले परिचित दाखले देतात आणि विचारतात, या विश्वात काय चिरंतन राहिलं आहे? ही गोष्ट बलवान, गर्विष्ठ, उन्मत्त यांच्याप्रमाणेच उदास, उद्विग्न असणाऱ्यांनी देखिल लक्षात ठेवली पाहिजे. कोणतीच स्थिती वा परिस्थिती, मग ती ऐहिक असो वा भावनिक, कायम रहात नाही. ती बदलतेच.

या कवितेतून सर्व भारतीयांना कवी विश्वास देऊ इच्छित असावेत की, भारतमातेची ही दुःस्थिती बदलणार व स्वातंत्र्याचा सूर्योदय होणार हे निश्चित!

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कथा… सौ. उज्वला केळकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ कथा… सौ. उज्वला केळकर ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

रसग्रहण

जे सत्यात नसते ते कधी कधी स्वप्नात दिसते. स्वप्ने कुणीही पहावीत.  कधी कधी स्वप्ने इतकी सुखद असतात की ती संपूच नयेत, त्यातून जाग येऊ नये असेच वाटते.  पण तसे होत नाही.  सुखद स्वप्नांतून सत्यात आल्यानंतर पुन्हा एकदा मळकट वास्तवाची जाणीव मनाला कातरते. काहीशा अशाच भावनांना निरखून लिहिलेली सुश्री उज्ज्वला केळकर यांची ही कविता…

☆ – कथा – सौ. उज्वला केळकर  ☆

मरगळल्या दिशा

गच्च भरलेलं आभाळ

आंधारा वर्ग अधिकच काळवंडलेला

पिसाट वारा छ्प्पर फाडून आत आलेला.

फुटक्या कौलारातून  निथळणारं पाणी

उसवल्या बाहीतून ठिबकतय खांद्यावर

उठवतय शहारा अंगावर.

पोरं टोरं

कळकट, मळकट

केस विस्कटलेली, शर्ट फाटलेली

बसली आहेत, निमूटपणे

कथा ऐकत

कुणा सुशील, सुंदर राजकान्येची

तिला पळवून नेणार्‍या

कुणा दुष्ट भयंकर राक्षसाची

प्रेमळ यक्षाची आणि धाडसी राजपुत्राची.

आणि मग सारा वर्गच जातो बनून यक्षनगरी

चमचमणारी, झगमगणारी

प्रेमळ गुरुजी वाटतात, यक्षांचे राजे

वाटा दाखवणारे, वर देणारे

सारी मुलेच मग बनतात राजपुत्र

भरजरी पोशाख ल्यालेले, तलवार घेतलेले

आणि निघतात सोडवायला

त्या सुशील, सुंदर राजक्न्येला

आणि इतक्यात

शाळेचा शिपाई येतो राक्षस बनून.

घंटेची आरोळी ठोकून,

टाकतो सारी कथाच विस्कटून 

टाकतो सारी कथाच विस्कटून.  

मुक्तछंदातील ही कविता वाचल्यानंतर आपण कुठल्याशा अविकसित,दैन्यावस्थेतल्या दलीत, पीडीत अशा भागात जाऊन पोहोचतो.  तिथले  जीवन अत्यंत निकृष्ट,निकस आहे.  कुठल्याही प्रगतीच्या खाणा खुणा नसलेल्या या भागातल्या शाळेत शिकून जीवनाला फुलवू  पाहणाऱ्या, आकार देऊन पाहणाऱ्या लहान मुलांच्या केविलवाण्या राज्यात व्यथित अंतकरणाने जातो.

मरगळल्या दिशा गच्च भरलेलं आभाळ

अंधारा वर्ग अधिकच काळवंडलेला

पिसाट वारा छप्पर फाडून आत आलेला

फुटक्या कौलारातून निथळणारं पाणी

उसवल्या बाहीतून ठिबकतय खांद्यावर

उठवतय शहारा अंगावर

या काव्यपंक्तीतून कवियत्रीने स्वतःच्या मनातल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत..  असे एक वातावरण जे खरं म्हणजे स्वतः अनुभवलेलं  नसल्यामुळे प्रत्यक्ष दिसणाऱ्या विदारक दृश्यामुळे त्यांचे मन हेलावते. 

एका खेड्यातल्या शाळेचं हे चित्र. आधीच तेथील लोकांचे जीवन दिशाहीन, मरगळलेलं.  त्यातून आकाश ढगांनी भरलेलं, अंधारलेल्या वर्गात अधिकच काळोख आणणारं. नुसतं एवढंच नाही तर त्यातून छप्पर पाडणारा सुसाट वारा आणि गळणारे पाणी जे फाटक्या कपड्यातल्या विद्यार्थ्यांना भिजवत आहे.  त्या बाल विद्यार्थ्यांची ही  शैक्षणिक दशा पाहून कवियत्रीच्या अंगावर अक्षरश: शहारे उभे राहतात.

कळकट मळकट

केस विस्कटलेली शर्ट फाटलेली

बसली आहेत

निमुटपणे

कथा ऐकत

हे कळकट, मळकट, केसावर कधीही कंगवा न फिरवलेली विस्कटलेल्या केसांची, फाटक्या कपड्यातील मुले मात्र गुपचुप शांत बसून गुरुजी सांगत असलेल्या कथेत रमली आहेत.

कुणी सुशील सुंदर राजकन्येची

तिला पळवून नेणाऱ्या

कुणा दुष्ट भयंकर राक्षसाची

प्रेमळ यक्षाची आणि धाडसी राजपुत्राची

गुरुजी सांगत असलेल्या कथेत एक सुंदर राजकन्या आहे.ती सुशीलही आहे. तिला कुणा दुष्ट, भयंकर राक्षसाने पळवलेले आहे. मात्र तिच्या रक्षणासाठी प्रेमळ यक्ष— सेवक, तसेच धैर्यवान राजपुत्र ही आहेत.

 आणि मग सारा वर्गच जातो बनून यक्षनगरी

चमचमणारी झगमगणारी

प्रेमळ गुरुजी वाटतात यक्षाचे राजे

वाटा दाखवणारे वर देणारे

या कथेच्या माध्यमातून ती सारी कळकट मुले खरोखरच मनाने एका जादुई नगरीत— जी चमचमणारी लखलखणारी आहे  तिथे जाऊन रमतात. त्या झगमगाटाने प्रफुल्लित होतात.  त्या क्षणी कथा सांगणारे गुरुजी म्हणजे मुलांना त्या यक्ष नगरीचे सम्राट वाटतात आणि तेच आपल्या आयुष्याची वाट आखणार आहेत, सुंदर जीवनासाठी आशिष देणार आहेत याची खात्री मुलांना वाटते.

 सारी मुलेच बनतात राजपुत्र

 भरजरी पोशाख ल्यालेले

 तलवार घातलेले

 आणि निघतात सोडवायला

 त्या सुशील सुंदर राजकन्येला

कथेत रमलेल्या मुलांना आता वाटायला लागते की ते स्वतःच राजपुत्र आहेत. त्यांच्या अंगावर भरजरी पोशाख आता आहेत.  हातात तलवारी आहेत आणि राक्षसाच्या तावडीत सापडलेल्या सुंदर राजकन्येला सोडवण्यासाठी ते आता समर्थ आहेत.

या चार ओळी म्हणजे उज्वला ताईंच्या या काव्यातला गर्भितार्थ  सांगणाऱ्या, शिखर गाठणाऱ्या ओळी आहेत. वरवर  ही जरी परिकथा वाटत असली, सरळ सरळ अर्थ सांगणारी राजकन्येची गोष्ट  वाटत असली तरी त्या कथेशी मनाने जोडल्या गेलेल्या मुलांचे स्वप्नविश्व, भाव विश्व फुलवणारी आहे. भरजरी पोशाख, तलवारी,राजकन्या,राजपुत्र, राक्षस हे रूपकात्मक शब्द आहेत. यातून कधीतरी मरगळलेल्या जीवनाला सौंदर्य आणि गळून गेलेल्या मनाला आत्मविश्वास मिळण्याची आशा दिसून येते. या कथेतील सुंदर राजकन्या म्हणजे एक सुरेख जीवन आणि राक्षसांच्या तावडीत सापडलेली राजकन्या म्हणजेच या सुंदर जीवनावरचे दारिद्र्याचे मळकट आवरण आणि  ते दूर करण्याचं बळ आपल्याही हातात आहे हा विश्वास त्या मुलांना मिळतो.

आणि इतक्यात

शाळेचा शिपाई येतो राक्षस बनून

घंटेची आरोळी ठोकून

टाकतो सारी कथाच विस्कटून

टाकतो सारी कथाच विस्कटून…

कथेतला सुखद शेवट कल्पित असतानाच तास संपल्याची घंटा शिपाई वाजवतो आणि घंटेचा तो कर्कश्श आवाज ऐकल्यानंतर सुंदर कथेचा सारा पटच उधळून जातो. कथा तिथेच अर्धवट विस्कटून जाते.

इथे उज्वला ताईंनी शाळेच्या शिपायाला राक्षसाची उपमा दिली आहे.  आणि हा राक्षस रुपी शिपाई म्हणजेच मुलांच्या आयुष्यातलं दुःखद वास्तव आहे. राजकन्या, राजपुत्राची कथा म्हणजे सुखद स्वप्न आणि तास संपल्याची घंटा म्हणजे वास्तवाची जाणीव. पुन्हा तेच नैराश्य. तीच उदासीनता.तेच मळकट दैन्य. दिशाहीन आयुष्य.

आणि त्यातूनच उमटणारे अनेक विदारक प्रश्न. या मुलांची आयुष्यं कधी उजळणारच नाहीत का? या मुलांना सुंदर भविष्य बघण्याचा अधिकारच नाही का? प्रगतीचे वारे यांच्यापर्यंत कधी पोहोचणार? शहरे यच्चयावत सुविधांनी सजत असताना खेडोपाडीचे हे दैन्य दूर करण्याचे आवश्यक कार्य कोण, कधी आणि कसे करणार?

उज्ज्वला ताईच्या  कथा या सरळ साध्या कवितेतून जणू  त्यांनी सहृदयतेने  संवेदनशील सामाजिक प्रश्नांनांच स्पर्श केलेला आहे.  काव्यातल्या प्रत्येक ओळीतून झिरपणाऱ्या वेदनांना त्यांनी एक लक्षवेधी सामाजिक स्वरुप दिलेले आहे. आपण सारे आपल्याच  सुखात रमलो आहोत पण आपल्या झोळीतील काही गोजीरवाणी सुखे, आनंद या नुसतेच स्वप्न पाहणाऱ्या मुलांच्या  ओंजळीत कधी पडणार?

या   कवितेतून व्यक्त होणारी उज्वला ताईंची सामाजिक जाणीव, कळकळ ही वंदनीय आहे.

जाता जाता इतकेच म्हणेन,” एक सुंदर संदेश देणारी, डोळे उघडे ठेवून आजूबाजूचे जग सह नुभूतीने पाहायला लावणारी दमदार, अर्थपूर्ण कविता— कथा.”

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

पूर्वपिठीका –

इंग्रज सरकारला विनंती करून, त्यांच्या अटी मान्य करून अंदमानातून मुख्य हिंदुस्थानात येण्यामागचा सावरकरांचा मुख्य उद्देश राष्ट्रसेवा हाच होता. त्यांना माहित होतं की अंदमानात जेलमधून राहून आपण देशासाठी कांहीच करू शकणार नाही. तेच हिंदुस्थानच्या मुख्य भूमीवरून आपण अप्रत्यक्षरित्या का होईना स्वातंत्र्यचळवळीचा भाग होऊ शकू. निदान या कार्यासाठी लोकांना प्रेरित  करू शकू. त्यासाठी अखिलहिंदू एकतेचं महत्व लोकांच्या गळी उतरवून जातीपातीमुळे विखुरलेला हिंदुसमाज एकसंध व्हावा यासाठी प्रयत्न  करू. परकियांच्या ‘divide and rule’ या धोरणाला त्यावाचून खीळ बसणार नाही.

अखेर अंदमानातून आणून रत्नागिरी इथे सरकारने त्यांना स्थानबद्धतेत ठेवल्यानंतर चार महिन्यातच त्यांनी हिंदूसभेची स्थापना केली व आपले स्थानबद्धतेतील पहिले भाषण दिले, अस्पृश्यता निर्मूलन कार्याची मुहूर्तमेढ रोवली. सकलहिंदुएकतेचं आपलं ध्येय त्यानी सात वर्षांतच गाठलं व रत्नागिरी इथं श्रीपतीतपावन मंदीर  उभारलं, जिथं सर्व जातींच्या हिंदूंना मुक्त प्रवेश होता; इतकंच नव्हे तर गाभाऱ्यात जाऊन पूजापाठ करण्याची, वेदमंत्रोच्चाराची मुभा होती. हिंदुएकता व अस्पृशता निर्मूलनावर त्यांनी अनेक कविता रचल्या व त्या विविध संघटनांद्वारे, विविध ठिकाणी, विविध समारंभातून जाहीर रित्या गायल्या गेल्या अशा प्रकारे समाज प्रबोधन करून त्यांनी ही सामाजिक  चळवळ पुढे नेली. थोर समाजसुधारक कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, आपल्या एका भाषणात म्हणाले होते, “मी आयुष्यभर अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम केलं पण अवघ्या सात वर्षांतच  या निधड्या छातीच्या वीराने जी सामाजिक क्रांती घडवली आहे ती पाहून मी इतका प्रसन्न झालो आहे की देवाने माझं उरलेलं आयुष्य त्यांनाच द्यावं.”

सावरकरांच्या प्रेरणेतूनच शेठ भागोजी कीर यांनी रत्नागिरी येथे साकारलेल्या पतितपावन मंदिरात देव प्रतिष्ठेचा अभूतपूर्व  समारंभ २२ फेब्रुवारी १९३१ रोजी झाला तेंव्हा सर्व  जाती, उपजातीचे पाच हजारांहून अधिक हिंदू जमले होते. अनेक सामाजिक व राजकीय नेते, संतमहंत तसेच वेदान्ताचे गाढे अभ्यासक, ‘महाभागवत’ डाॅ शंकराचार्य  कुर्तकोटी हे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्याप्रसंगी सर्व जाती, उपजातीच्या वीस हिंदु युवतींनी सावरकरांचे हे गीत एक कंठाने गायले.

हिंदुजातीचा श्री पतितपावन धावा... स्व. वि. दा. सावरकर ☆

उद्धरिसी गा हिंदुजातिसी केंव्हा

हे हिंदुजातिच्या देवा ॥ धृ. ॥

आब्राम्हण चंडाल पतितची आम्ही

तुम्ही पतितपावन  स्वामी

निजशीर्ष विटाळेल म्हणुनि कापाया

चुकलो न आपुल्या पाया

आणि पायांनी राखु शुद्धता साची

छाटिले पावलांनाची

ऐकू न पडो आपुलिया कानाते

मुख कथी न म्हणुनि ज्ञानाते

निज सव्यकरे वामकरा जिंकाया

विक्रियली शत्रुला काया

करु, बंधूसी बंद करु दारा, जे

चोर ते घराचे राजे

हे पाप भयंकर  झाले । रे

पेरिले फळाला आले। रे

हृदि असह सलते ते भाले । रे

उद्धार अता! मृत्युदंड की दे वा

हे हिंदुजातिच्या देवा! ॥१॥

 

अनुताप परी जाळितसे या पापा

दे तरि आजि उःशापा

निर्दाळुनि त्या आजि भेद – दैत्यासी

ये हिंदुजाति तुजपाशी

ते अवयव विच्छिन्न सांधिले आजि

तू फुंकी जीव त्यामाजी

देऊनि बळा वामनासि ह्या काळी

तो घाल बळी पाताळी

जरि शस्त्र खुळा कर न आमुचा कवळी

परि तुझी गदा तुजजवळी

जरि करिसी म्हणू जे आता। रे

म्हणशील करू ते नाथा । रे

उठू आम्ही परि दे हाता। रे

दिधलासि जसा कंस मारिला तेंव्हा

हे हिंदु जातीच्या देवा ॥२॥

     कवी – वि दा सावरकर

रसग्रहण

सावरकरांच्या सर्वच कविता गेय आहेत कारण त्या वृत्तबद्ध  आहेत. बहुतांश कविता जरी विविध मात्रावृत्तात बांधलेल्या असल्या तरी त्यांनी इतर वृत्तांचा वापर देखिल केलेला आहे.

या कवितेत ते पतितपावनाचा धावा करीत आहेत. अस्पृश्यता पालनामुळे हिंदु धर्माचे नुकसान कसे झाले व आता आम्ही ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करीत असताना आम्हाला तुमच्या सहाय्याची कशी आवश्यकता आहे, हे या कवितेत कवी पटवून देतात. आम्ही पापी आहोत, संपूर्ण हिंदु समाजच पतीत आहे, पण तुम्ही पतितपावन आहात तर तुम्ही आमचा हा हिंदु समाजपुरूष एकसंध करून आमचा उद्धार करा.

वेदांनी ब्राम्हणांना समाजपुरूषाचे मस्तक मानले आहे तर शूद्रांना पाय. कवी म्हणतात आमच्या मस्तकाला विटाळ होऊ नये म्हणून आम्ही आमचे पाय तोडले, इतकच नव्हे तर पायांनी देखिल आपली शुद्धता राखण्यासाठी पावलं तोडली. म्हणजे जसे सवर्णांनी दलितांना दूर लोटले तसेच शूद्रांनी पण अतिशूद्रांना दूर केले, सामावून घेतले नाही.

कानांनी ज्ञान ग्रहण करू नये म्हणून मुखाने त्याचा उच्चार केला नाही. म्हणजे ब्राम्हणांनी शूद्रांना वेदाध्ययनापासून म्हणजेच ज्ञानार्जनापासून वंचित  ठेवलं.

क्षत्रियांनी देखिल अशाच चुका केल्या. डाव्या हाताला जिंकण्यासाठी उजव्या हाताने आपलं पूर्ण शरीरच शत्रूला  विकलं. जसे जयचंदाने पृथ्वीराजास जिंकण्यासाठी महंमद घोरीला आपलं स्वातंत्र्य विकलं. सख्ख्या भावाला घरात कोंडून चोराच्या हातात आम्ही जामदारखान्याच्या किल्ल्या दिल्या. असं करून आपण आपलच नुकसान करून घेत आहोत हे आम्हाला कळलं नाही.

आता आम्हाला आमच्या चुका समजल्या आहेत. आम्ही पश्चातापदग्ध आहोत. आमच्या चुकांमुळेच हिंदु समाजपुरूष पंगु झाला आहे. आता याची जाणीव आम्हाला झाली आहे.

हा सल भाल्याप्रमाणे आम्हास  टोचतो आहे. आता आम्ही हे तोडलेले अवयव जोडले आहेत पण त्यात जीव येण्यासाठी, एकसंधता येण्यासाठी तुझ्या कृपेची आवश्यकता आहे.

तेंव्हा हे हिंदूंच्या देवा, तूच आम्हाला सहाय्य करून आमचा उद्धार तरी कर नाहीतर मृत्युदंड तरी दे. भेदाभेद राक्षसाचे निर्दालन करून आम्ही तुला शरण आलो आहोत, तरी आम्हाला उःशाप दे.

कंसासारख्या दुष्ट प्रवृतींचे उच्चाटन करण्यासाठी जसा तू आम्हाला मदतीचा हात दिलास तसाच आताही दे जेणेकरून अशा समाजविघातक कुप्रथांचे उच्चाटन करून हा हिंदुसमाजपुरुष एकसंध व बलशाली होईल. एवढीच विनंती मी तुला करतो आहे.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अब्रू… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ अब्रूकवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

विश्वाच्या निर्मितीत जगन्नियंत्याने एक सर्वांगसुंदर निर्मिती केली ती म्हणजे स्त्रीची. शिवाय तिला सृजनत्वाचे वरदान देऊन श्रेष्ठत्वही बहाल केले. स्त्री पुरुष हे समाजाचे दोन आधारस्तंभ. पण स्त्रीला कायमच दुय्यम स्थान दिले गेले आहे. तिला सतत अत्याचार, अन्याय सहन करावे लागतात. त्यात तिची चूक काहीच नसते. अशाच एका पीडितेने अख्ख्या जगाला आपल्या सन्मानासाठी अतिशय कळवळून केलेला प्रश्न आणि  शेवटी पेटून उठत दिलेले आव्हान म्हणजे डॉ. निशिकांत श्रोत्री यांची कविता ‘अब्रू’. या अतिशय गाजलेल्या कवितेचा आपण आज रसास्वाद घेणार आहोत.

अब्रू कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆

झगमगत्या ट्यूबलाईट्सनी उजळलेल्या

रंगीबेरंगी चित्रांनी सजलेल्या

आणि माणसांच्या झुंडींनी गजबजलेल्या,

छोट्याश्या अणकुचीदार टाचणीपासून

भल्या मोठ्या अजस्त्र विमानांपर्यंत

सारं काही सहज मिळणाऱ्या

जगाच्या या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

अब्रू मिळेल का हो, मला अब्रू मिळेल का ?

 

तिचं मोल द्यायला

ना माझ्यापाशी धनाच्या राशी

ना कीर्तीचे डोंगर,

जवळ तसं काहीच नाही …

मी तर फुटक्या नशिबाची

एक दरिद्री अभागिन

लंकेची पार्वती!

तरीही फुकट कोण देणार

म्हणून बरोबर घेतले होते

माझे लाख मोलाचे शील

तेव्हढीच माझी पुंजी!

 

ठाऊक नव्हते मला

या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

कोहळ्याच्या मोलाने मिळतो

छोटासाच, पण

दात आंबवणारा  आंबटढाण आवळा!

किती गच्च आवळून सशासारखी

उराशी धरावी लागत होती मला

माझी एकुलती एक पुंजी!

 

त्या पुंजीवरच माझ्या

डोळा फार सगळ्यांचा

डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

विक्रीसाठी बसलेल्या व्यापाऱ्यांचा,

खरेदीसाठी आलेल्या गिऱ्हाईकांचा

अन् विकायला ठेवलेल्या मालाचा सुद्धा;

मग दलालांचे तर काही विचारूच नका…

सगळीच गिधाड!

झाडावरचे कावळे देखील भेदरून

उगीचच आपले काणे डोळे

इकडून तिकडे टोलवत बसलेले!

 

उमगलंच नाही मला

केव्हा लुटली गेली

माझी जिवाभावाची पुंजी

मनानं नाही तरी

देहानं मात्र

करायला मला शीलभ्रष्ट …..

फासायला माझ्या अवघ्या अस्तित्वालाच

अन् रुपालाही

अंवसेचा काजळ काळिमा …..

तरीहि माझ्या पदरात

अब्रू नाही ती नाहीच!

 

दया करा हो, दया करा

पोटाची भूक मारेन

पण अस्तित्वाचीच होणारी

फरपटवणारी ही उपासमार

कुठवर सोसावी आता

अशा अगतिक अवस्थेत?

उसनी म्हणून तरी 

अब्रू मिळेल का हो, मला अब्रू मिळेल का ?

 

इथ सगळ विकतच मिळत

ठाऊक आहे मला

पण माझी पुंजीच

लुटली गेली आहे हो!

अब्रूच्या बोलीवर चक्क फसवणूक!

तरी पण मला हवी आहे

एखादी फाटकी तुटकी तरी

कसलीही अब्रू

उसनी द्या, खात्यावर द्या

नाहीतर भीक म्हणून द्या

पण अब्रू द्या हो, मला अब्रू द्या!

 

नाही देत?

का हो?

काय चुकल माझं?

तुमच्याच भल्यासाठी ना

उदात्तपणे उधळली मी माझी अब्रू

हुंड्यात आणि पेटत्या ज्वालेत

सगळ्यांचाच होम करून

राखायला तुमची उज्ज्वल प्रतिमा?

मग आता मात्र

तोंड का वळवता?

 

अखेरचेच मागते आहे

तुमच्या पुढे पदर पसरून

मला अब्रू हवी आहे

मला अब्रू द्या.

 

मुकाट्यानं द्या,

बऱ्या बोलानं द्या …..

नाहीतर बलात्कारान चोरावी लागेल मला

तुमच्या अब्रूची लक्तरं

उघड्यावर टांगून

याच डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

कारण …..

मला अब्रू हवी आहे हो, मला अब्रू हवी आहे!

©️ डाॅ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी. जी. ओ. / मो ९८९०११७७५४

झगमगत्या ट्यूबलाइट्सनी उजळलेल्या

रंगीबेरंगी चित्रांनी सजलेल्या

आणि माणसांच्या झुंडींनी  गजबजलेल्या

छोट्याशा अणकुचीदार टाचणीपासून

भल्या मोठ्या अजस्त्र विमानांपर्यंत

सारं काही सहज मिळणाऱ्या

जगाच्या या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

अब्रू मिळेल का हो, मला अब्रू मिळेल का ?

जगाचं हे मोठंच्या मोठं डिपार्टमेंटल स्टोअर आहे. ते झगमगत्या ट्यूबलाइट्सनी उजळलेलं आणि रंगीबेरंगी चित्रांनी सजवलेलं आहे. इथे छोट्याशा टोकदार टाचणी पासून अजस्त्र मोठ्या विमानापर्यंत अगदी कोणतीही गोष्ट सहजपणे मिळते. मग या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मला माझी अब्रू , माझा सन्मान मिळेल का हो ? असे एक पीडित स्त्री विचारते.

कवीने इथे अख्ख्या जगालाच एका डिपार्टमेंटल स्टोअरचे रूपक योजले आहे. ते स्टोअर अतिशय समृद्ध आहे. इथे काही नाही असे नाहीच. ते अतिशय आकर्षक आहे जणू काही एखादं भुलभुलैय्या नंदनवनच.पण इथे सर्व काही मिळत असतानाही स्त्रीला मात्र काही गोष्टींपासून वंचित ठेवले जाते. आजूबाजूच्या एवढ्या विशाल जगात तिला मात्र कोणी वाली मिळत नाही ही गोष्ट तिला हतबल करून सोडणारी आहे .

ही मुक्तछंदातली कविता आहे. प्रथम पुरुषी एकवचनातली ही कविता एका अत्याचार पीडितेची कहाणी,आर्त तळमळ कथन करते. पण ती फक्त एका स्त्रीची कहाणी एवढीच मर्यादित न रहाता अवघ्या स्त्री जातीची व्यथा वेदना इथे मांडते आहे.

तिचं मोल द्यायला

ना माझ्यापाशी धनाच्या राशी

ना कीर्तीचे डोंगर

जवळ तसं काहीच नाही

मी तर फुटक्या नशिबाची

एक दरिद्री अभागिन

लंकेची पार्वती !

तरीही फुकट कोण देणार

म्हणून बरोबर घेतले होते

माझे लाख मोलाचे शील

तेवढीच माझी पुंजी !

पण या स्त्रीची अवस्था दयनीय झालेली आहे. तिच्यापाशी धनदौलत नाही. तिचं असं काहीच ऐश्वर्य नाही. जे खरेदीसाठी उपयोगी पडेल असं हाती काहीच नाही. इथे ‘लंकेची पार्वती’ हे रूपक तिची अवस्था स्पष्ट करते. ती पूर्ण परावलंबी आहे. तिला कसलेही निर्णय स्वातंत्र्य नाही. हाती धन नाही. सर्वच गोष्टींपासून ती वंचित आहे. फक्त तिची पुंजी म्हणून तिच्याकडे तिचं शील तेवढंच आहे. त्यामुळे ती हतबल झालेली आहे.

ठाऊक नव्हते मला

या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

कोहळ्याच्या मोलाने मिळतो

छोटासाच, पण

दात आंबवणारा आंबटढाण आवळा !

किती गच्च आवळून सशासारखी

उराशी धरावी लागत होती मला

माझी एकुलती एक पुंजी !

या जगाच्या व्यवहारात फसवणूक करणारेच जास्त असतात. आवळा देऊन कोहळा काढणे हा त्यांचा स्वभावधर्म असतो. ज्याच्यामुळे दात आंबतात असा अगदी छोटासा आंबटढाण आवळा देऊन त्या बदली मोठा पौष्टिक कोहळा ते चतुराईने मिळवतात. या मतलबी लोकांचे कारस्थान ती ओळखू शकत नाही. त्यांच्यात अगदी घाबरून वावरत रहाते. पैशाच्या जोरावर गैरकृत्य करणाऱ्यांचे वर्तन वरून कधीच लक्षात येत नाही म्हणूनच खोटी प्रलोभनं दाखवून या ना त्या कारणाने तिची फसवणूक करत तिचे शील लुटले जाते आणि पुन्हा तिलाच बदनाम करून घरातून बेदखल केले जाते. अन्याय करणारे अंधारात रहातात आणि शिक्षा मात्र तिच्याच माथी येते हे खरे दुर्दैव आहे.

त्या पुंजीवरच माझ्या

डोळा फार सगळ्यांचा

डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

विक्रीसाठी बसलेल्या व्यापाऱ्यांचा,

खरेदीसाठी आलेल्या गिऱ्हाईकांचा

अन् विकायला ठेवलेल्या मालाचा सुद्धा;

मग दलालांचे तर काही विचारूच नका….

सगळीच गिधाड !

झाडावरचे कावळे देखील भेदरून

उगीचच आपले काणे डोळे

इकडून तिकडे टोलवत बसलेले !

तिच्या त्या पुंजीवरच त्या स्टोअरमधील सर्वांचा डोळा होता. तिथे विक्री करणारे व्यापारी, खरेदी करणारे ग्राहक, अगदी विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तूंचा सुद्धा मग दलालांचे तर काही विचारूच नका. ते टपलेलेच होते. एकजात सगळी बुभुक्षित गिधाडं. झाडावरचे कावळे सुध्दा मदतीला तर येत नव्हते, पण नजर इकडे तिकडे फिरवत त्रयस्थपणे फक्त मजा मात्र बघत होते.

इथे व्यापारी, गिऱ्हाईक, विक्रीचा माल, कावळे ही माणसांचीच रूपके आहेत. आजकालचे वास्तवही हेच सांगते आहे. तिची बोली लावणारे, तिच्यावर अत्याचार करणारे, हे सर्व तटस्थपणे त्रयस्थांसारखे पाहणारे तिच्या जवळचे, नात्यातले सुद्धा असू शकतात. मग परक्यांची गोष्ट तर विचारायलाच नको. माणसंच माणसांना कशा प्रकारे वागवू शकतात हे कुणालाच सांगता येणार नाही

ही गोष्ट तर फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. द्रौपदी वस्त्रहरण हे तर याचे ज्वलंत उदाहरण आहे. तिच्यावर अत्याचार करवणारे, करणारे आणि हतबलपणे ते बघत निष्क्रिय रहाणारे तर रथी-महारथी असूनही होणारा अनर्थ ते टाळू शकले नाहीत. खरे तर अशावेळी माणुसकी म्हणून सुध्दा कोणीही मदतीला येत नाही. सगळेच नुसती बघ्याची भूमिका घेतात हेच दुर्दैव आहे. धाडस करून कुणी मदतीला आलेच तर होणारा अनर्थ निश्चित टळू शकतो अशीही उदाहरणे आहेत. या वास्तवावर कवी इथे उत्तम भाष्य करतो.

उमगलंच नाही मला

केव्हा लुटली गेली

माझी जिवाभावाची पुंजी

मनानं नाही तरी

देहानं मात्र

करायला मला शीलभ्रष्ट…

फासायला माझ्या अवघ्या अस्तित्वालाच

अन् रुपालाही

अंवसेचा काजळ काळिमा…

 तरीहि माझ्या पदरात

अब्रू नाही ती नाहीच !

तिची फसवणूक करत तिचं शील केव्हा लुटलं गेलं हे तिला सुध्दा समजल नाही. मनाने ती  पवित्र होती पण  देहाने त्यांनी तिला शीलभ्रष्ट केले.  तिच्या अवघ्या अस्तित्वाला  काळिमा फासला आणि तिला बेरूप केले गेले. एवढं सगळं अघटीत घडूनही त्या बदल्यात  तिच्या पदरात अब्रू नाहीच पडली हे  तिचे  मोठे दुर्दैव .

तिचा काहीच दोष नसताना  झालेल्या इतक्या लुबाडणूकीने  तिला जगणे अशक्य झाले. तिचे मन शुद्ध असूनही समाज तिच्याकडे विचित्र नजरेने बघू लागला. त्यामुळे तिला उजळ माथ्याने जगणे अशक्य झाले.

दया करा हो, दया करा

पोटाची भूक मारेन

पण अस्तित्वाचीच होणारी

फरपटवणारी ही उपासमार

कुठवर सोसावी आता

अशा अगतिक अवस्थेत ?

उसनी म्हणून तरी

अब्रू मिळेल का हो, मला अब्रू मिळेल का ?

या होणाऱ्या दयनीय अवस्थेने ती स्त्री अगदीच लाचार झालेली आहे. ती एक वेळ भूक सहन करेल. कारण देहाच्या  या गरजेकडे  दुर्लक्ष करता येईल. पण तिच्या मनाचे काय? तिच्यावर ओढवलेल्या दुरावस्थेमुळे तिच्या पूर्ण अस्तित्वालाच काळीमा फासलेला आहे. समाजात तिला आता मानाचे स्थान राहिलेले नाही. सगळे जग तिच्याकडे कुत्सित नजरेने बघत आहे आणि ही मनाची कुचंबणा तिला अतिशय असह्य होते आहे.

त्यामुळे तिचे अस्तित्व टिकवण्यासाठी तिला समाजाकडून सन्मानाची अपेक्षा आहे. तिची कुणी हेटाळणी करू नये. जी चूक तिने केलीच नाही त्याची शिक्षा तिच्या माथी मारू नये आणि तिचे जगणे शांतपणे तिला जगू द्यावे हीच तिची रास्त अपेक्षा आहे.

इथे सगळं विकतच मिळतं

ठाऊक आहे मला

पण माझी पुंजीच

लुटली गेली आहे हो !

अब्रूच्या बोलीवर चक्क फसवणूक !

तरी पण मला हवी आहे

एखादी फाटकी तुटकी तरी

कसलीही अब्रू

उसनी द्या, खात्यावर द्या

नाहीतर भीक म्हणून द्या

पण अब्रू द्या हो, मला अब्रू द्या !

वेगवेगळी प्रलोभने  दाखवून तिची फसवणूक केली गेली.  तिच्या अब्रूचे धिंडवडे काढले गेले आणि यासाठी तिलाच जबाबदार धरण्यात आले. तिलाच बदनाम ठरवून समाजातून उठवले गेले. त्यामुळे घायाळ होऊन ती पुन्हा पुन्हा सर्वांकडे मिनतवारी करते आहे. यात ती पूर्ण निर्दोष आहे म्हणूनच तिला लोकांकडून माणुसकीची अपेक्षा आहे.

नाही देत ?

का हो ?

काय चुकलं माझं ?

तुमच्याच भल्यासाठी ना

उदात्तपणे उधळली मी माझी अब्रू

हुंड्यात आणि पेटत्या ज्वालेत

राखायला तुमची उज्ज्वल प्रतिमा ?

मग आता मात्र

तोंड का वळवता ?

अखेरचेच मागते आहे

तुमच्यापुढे पदर पसरून

मला अब्रू हवी आहे

मला अब्रू द्या.

कधी घराण्याच्या वारसासाठी, कधी हुंड्यासाठी, कधी आणखी काही मागण्यांसाठी  स्त्रीलाच वेठीला धरले जाते. अगदी प्रगतीच्या मार्गात तिचा शिडीसारखा  वापरही काहीवेळा होतो. त्यासाठी सतत मानहानी, छळ, मारहाण, जोरजबरदस्ती केली जाते.

पण या सगळ्याला तिलाच जबाबदार धरले जाते. तिच्या चारित्र्यावर शंका घेतली जाते .शेवट तिला जाळून मारले जाते, नाही तर तिला आत्महत्या करायला भाग पाडले जाते. ती घरासाठीच हे सर्व करत असूनही तिलाच कुलटा ठरवत घराबाहेर काढले जाते. तिला पूर्ण बदनाम करीत परावलंबी बनवले जाते.  यातून बाहेर पडण्यासाठीच  तिची ही सन्मानासाठी मागणी आहे.

मुकाट्यानं द्या,

बऱ्या बोलानं द्या…

नाहीतर बलात्कारान चोरावी लागेल मला

तुमच्या अब्रूची लक्तरं 

उघड्यावर टांगून

याच डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये

कारण ….

मला अब्रू हवी आहे हो, मला अब्रू हवी आहे !

तिने सर्व पद्धतीने त्यांच्या विनवण्या केल्या. आपल्याला असे बदनाम करू नये.  आपले निरपराधीत्व मान्य करून पुन्हा मान द्यावा अशी मागणी केली आहे. सरळपणे हे जर मान्य नाही  न केले तर त्यांच्या कुकर्माचा पाढा सर्व समाजापुढे वाचून त्यांच्याच गुन्ह्याची, अब्रूची लक्तरे सर्वांसमोर उघड करायची धमकी दिली आहे. आपल्यावरील अन्यायाने ती आता परती पेटून उठली आहे.त्यामुळे ती आता गप्प रहाणार नाही. नारी शक्ती जर चवताळून उठली तर काय करू शकते हे समाजाने वेळीच लक्षात घेतले पाहिजे. एकवटलेली स्त्री शक्ती समाजात उलथापालथ घडवू शकते. कारण स्त्री शिवाय समाज पूर्ण होऊ शकत नाही. पुरुषाला भावनिक मानसिक आधारासाठी स्त्रीची गरज असते. त्यामुळे तिला योग्य सन्मान देणे हे अगत्याचेच आहे. एकीकडे पूजा करायची आणि दुसरीकडे लाथाडायचे हे पूर्ण थांबवले पाहिजे.

अतिशय भावपूर्ण अशा या कवितेत  डिपार्टमेंटल स्टोअर हे प्रचंड विश्वाचे रूपक, तर त्यातले विक्रेते, खरेदीदार, विक्रीचा माल, कावळे ही माणसांचीच रूपके, आवळा, लंकेची पार्वती ही रूपके आहेत. यातून माणसेच माणसांना किती अन्याय्य पद्धतीने वागवतात, कसे अत्याचार करतात हे अचूकपणे सांगितलेले आहे. असे अत्याचार करणारे अगदी जवळचे किंवा दूरचे कोणीही असू शकतात. अशावेळी बाहेरचे त्रयस्थपणे फक्त बघ्याची भूमिका घेतात. त्यामुळे तिला वाचवायला कोणीच नसते. वास्तवात घडणाऱ्या अशा घटनांनी मन सुन्न होते. अशा घटनांचे वास्तव कवीने या कवितेत नेमक्या शब्दात मांडलेले आहे.

कवीने  तिची भावनिक, मानसिक स्पंदने अचूक शब्दांत टिपलेली आहेत. त्यातली आर्तता, तिची कासाविशी आपल्या मनाला जाऊन भिडते. आज काळ बदलला आहे. स्त्रीने आपले कर्तृत्व प्रत्येक आघाडीवर सिद्ध केलेले आहे. तरीही तिचे भोग पूर्णपणे संपलेत असे झालेले नाही. फक्त त्याची रूपे बदलली आहेत.

स्त्रीच्या एका दाहक, जीवघेण्या अनुभवाची ही करूण कहाणी  डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी त्यांच्या ‘अब्रू’ या भावस्पर्शी कवितेतून सांगितली आहे. तिची अनुभूती आपल्याला बेचैन करून जाते. शेवटी ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ हे दुर्दैवी वास्तव आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माळ गुंफिताना…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

माळ गुंफितांना स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ माळ गुंफितांना स्व. वि. दा. सावरकर ☆

माळ गुंफितांना । ऐका कवनाला । गुंफी कोण कशी माला ॥

घाली जगदंबा । त्रिगुणातीताला । त्रिगुणी बिल्वदली माला ॥

प्रकृतीदेवी गुंफी ।  देव विराटासी । नव नव सूर्यमालिकांसी ॥

प्रलयंकर काली । गुंफी महाकाला । ती नरमुंडचंड माला  ॥

उद्भवा घाली । घाली उद्भवाला । सृष्टी भूकंपांची माला ॥

गुंफी सत्यभामा । श्रीहरीला साची । माला पारिजातकांची ॥

माळ मोत्यांची । गुंफी रुचिरा ती । राणी राजाच्यासाठी ॥

फुलांची माला । माला ओवी रती ॥ आलिंगि त्या अनंगा ती ॥

विरहिणी परि ती ।  प्रिय स्मरण काला । ओवी अश्रूंची माला ॥

कवी – वि. दा. सावरकर

रसग्रहण

सावरकरांनी ही कविता १९२६ साली म्हणजेच ते रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत असताना लिहिली आहे. या कवितेमध्ये मांडलीय एक साधी गोष्ट- माला गुंफणे व ती आपल्या आराध्याला अर्पण करणे. पण या साध्या गोष्टीला सावरकर जी अध्यात्मिक  उंची व भावनिक  खोली देतात ती पाहून अचंबित व्हायला होतं.  त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची भरारी सामान्य विरहिणी पासून प्रकृतीदेवीपर्यंत झेप घेते व त्यांची अफाट कवीकल्पना, फुलांपासून ते भूकंपांपर्यंत व सूर्यमालेपासून अश्रुंपर्यंतच्या माला गुंफते. सूर्यमालेची माला, भूकंपांची माला या कल्पनांची कल्पनासुद्धा करणं अन्य कोणाला अशक्य आहे.

जगन्माता जगदंबा त्रिगुणातीताला म्हणजेच शंकराला बेलाच्या पानांची माला घालते. बेलपत्र हे पार्वतीचं रूप आहे. मंदराचल पर्वतावर एकदा पार्वतीच्या घामाचे थेंब पडले व त्यातूनच बेलाचा वृक्ष निर्माण झाला अशी मान्यता आहे. या वृक्षाच्या मुळांत ती गिरिजा रूपात, बुंध्यात माहेश्वरी रूपात, फांद्यात दाक्षायणीच्या, पानांत पार्वतीच्या, फुलांत गौरीच्या व फळांत कात्यायनीच्या रूपात  वास करते असं मानलं जातं.

प्रकृती व पुरुष यांनी ब्रम्हदेवाच्या आज्ञेवरून, ब्रम्हांड निर्मिती केली. म्हणून सावरकर म्हणतात प्रकृतीदेवी, विराटासाठी म्हणजेच ब्रम्हासाठी नवग्रहांच्या नवनवीन

सूर्यमाला गुंफित आहे.

कालीमाता हे दुर्गेचे रौद्र रूप आहे. ती स्मशानात राहते व मुंडमाला धारण करते. तसेच  महाकाल हे शंकराचे रौद्र रूप आहे तो देखिल स्मशानात राहतो व मुंडमाला धारण करतो. कालीने  शुंभ, निशुंभ तसेच चंड व मुंड या असुरांना ठार करून ती मुंडमाला शंकराला अर्पण केली  अशी कथा आहे.

सृष्टीदेवी तिच्या निर्मिकाला घालण्यासाठी भूकंपांची मालिका निर्माण करते. कवी येथे हे सत्य अधोरेखित करतात की, निर्मिती व नाश यांचं खूप जवळचं नातं आहे किंवा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

सत्यभामेसाठी श्रीकृष्णांनी स्वर्गातून पारिजातक आणला असं मानलं जातं. त्यामुळे सत्यभामा श्रीहरींसाठी पारिजातकाची माला गुंफते आहे.

सुंदर, आकर्षक अशी राणी, वैभवाचे प्रतीक असलेली मोत्यांची माळ आपल्या पतीसाठी म्हणजेच राजासाठी ओवते आहे.

शृंगाराचं प्रतीक असणारी फुलांची माला, साक्षात् शृंगार असलेल्या अनंगासाठी म्हणजेच कामदेव मदनासाठी त्याची पत्नी रती ओवते आहे. रती व मदन यांनी शृंगारिक अविर्भावांनी शंकराचा तपोभंग केल्यावर, क्रोधित शंकरांनी मदनाची जाळून राख केली मात्र नंतर  उःशाप म्हणून त्याला शरीरविरहित (अनंग) अवस्थेत कुणाच्याही शरीरात शिरण्याची मुभा दिली; म्हणूनच मदनाला अनंग म्हणतात.

विरहात झुरणारी प्रेमिका मात्र आपल्या प्रियासाठी अश्रूंची माळ ओवते आहे म्हणजेच अश्रु ढाळते आहे. प्रदीर्घ कारावासामुळे सावरकर व त्यांच्या पत्नी माई यांनी विरहयातनांची झळ चांगलीच अनुभवली होती. त्या आठवणींची मालाच ते या ओळीतून गुंफित असतील काय?

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावली… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ सावली…  ☆ सौ.मंजिरी येडूरकर

निसर्ग हा एक जादुगार आहे. त्याच्या कला त्याच्या लीला अगाध आहेत. फक्त पाहण्याची दृष्टी हवी. रोज उगवणारा सूर्य, त्याची रोज पृथ्वीवर येणारी किरणे! या किरणांच्या मार्गात एखादी वस्तू आली की, किरण थटतात त्यामुळे त्या वस्तूंची सावली पडलेली दिसते. एका साध्या सोप्या शास्त्रीय आधाराने स्पष्ट करण्याजोगी घटना त्यामुळे कधीच त्याचं कुतूहल वाटलं नाही.

पण ह्याच सावलीचं निरीक्षण केलं तर त्यात आश्चर्य  वाटण्याजोगी विविधता आढळते. प्रत्येक वस्तूची सावली निराळया प्रकारची असते. नारळाची सावली पाहिली की आईच्या पायाला घट्ट धरून मिठी मारणा-या बाळाची आठवण होते. असं वाटतं की ही सावली नारळाचे पाय घट्ट पकडते आहे. नारळानं तिला कितीही दूर ढकलंल तरी ती पाय सोडत नाही.

वेलीची सावली पाहिली की वाटतं जणू वेलीनं सावलीला अभयदान दिलं आहे. त्यामुळे हे निरागस बाळ खाली स्वच्छंदपणे नाचतयं बागडतंय. पण त्याचं वेलीपासून फार लांब जायचं धाडस होत नाही. त्यामुळे वेलीच्या आसपास खेळतंय. आंब्याची सावली निवांत पहुडलेली असते. सर्वांना सामावून घेणारी, शांत असते. हिच्या सावलीत शिरलं की इतकं सुरक्षित वाटतं की, आपल्याला आपल्या सावलीचंही भय रहात नाही. चिंचेची सावली कशी भेदरलेली, घाबरलेली आहे असं वाटतं. तिचं अस्तित्व इतकं अस्पष्ट असतं की वाटतं ती पळून जाण्यासाठी मार्ग षोधतेय पण तिला मार्ग सापडत नाहीय. तिला मोठयांदा ओरडावं असं वाटतयं पण आवाज फुटत नाहीय. एखाद्या झुडपाची सावली कशी अस्तित्वच हरवल्यासारखी, असून नसल्यासारखी!

माणसाची सावली मात्र दिवसभरात निरनिराळी रूपं घेऊन येते. सकाळी उगवत्या सूर्याबरोबर नव्या आशा, नवा उत्साह घेऊन येते. त्यावेळी सावली किती तजेलदार दिसते. आपली सोबत करते, दिलासा देते. पण दुपारच्या भयाण शांततेत कुणाची तरी सोबत हवी असं खूप वाटत असतं, त्यावेळी नेमकी गायब होते. आपल्याला एकटं सोडून! संध्याकाळी थकलेल्या निराश झालेल्या मनाला दिलासा द्यायचा सोडून लांब निघून जाते भरकटत, त्या मनासारखीच! आणि उदास करून जाते. काळोख्या रात्री घाबरलेलं मन नकळतच आसपासच्या आवाजांचा, हालचालींचा कानोसा घेत असतं, आणि त्यांना अचूक टिपण्याचा प्रयत्न करत असतं. त्यावेळी ही नको असणारी सावली हळूच येते आणि भिती दाखवून जाते. एकटेपणाची जाणीव कुठेतरी खोल रुतवून जाते.

अशी ही सावली तिचे अनेक आकार, अनेक रूपं. कांही मनाला भावणारी, तर कांही मनाचा थरकाप करणारी! सांगून, पाहून, वर्णन करून न संपणारी!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ फिनिक्स… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ फिनिक्सकवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

जीवनात चढउतार येतात, मानापमानाचे खेळ सुरू असतात. बरेचदा अपयश, बदनामीमुळे मानसिक, शारीरिक होरपळ होते. यातूनही नव्या जिद्दीने पुन्हा उभे रहात नवा डाव सुरू होतो. अशाच एका जिद्दी, नव्या उमेदीने पुन्हा डाव मांडणाऱ्या माणसाचे मनोगत डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी ‘फिनिक्स’ या कवितेत मांडले आहे. तिचाच आज आपण रसास्वाद घेणार आहोत.

फिनिक्स  कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆

पुनःपुन्हा पुनःपुन्हा

तोच अनुभव, त्याच ज्वाळा

पेटून निघालोय अंतर्बाह्य

शरीराने अन् मनानेही

……….. नकळतच!

 

क्षणभर बरं वाटलं

अजूनही मन शिल्लक आहे तर …..

            ….. जिवंत आहे

विश्वासच बसत नव्हता!

 

हे सुखही क्षणभराचंच

दुर्लक्ष करता येत नव्हतं

बसणाऱ्या चटक्यांकडे

अन् होरपळून निघालो

याच ज्वाळांच्या

भाजून काढणाऱ्या आठवणींनी!

 

आता मात्र ठरवलंय

जळून खाक व्हायचं

            ….. नेहेमीसारखंच

पण यावेळी मात्र

उठायचं नाही परत फिनिक्ससारखं

पुन्हा भाजून घ्यायला

अन् पुन्हा जाळून घ्यायला!

 

का केलास मग तो

हळुवार संजीवन स्पर्श

माझं मन आणि शरीर

जळून उरलेल्या

या तप्त राखेला

पुन्हा एकदा जन्म द्यायला

एका नव्या फिनिक्सला?

©️ डाॅ. निशिकान्त श्रोत्री

पुन:पुन्हा पुन:पुन्हा

तोच अनुभव, त्याच ज्वाळा

पेटून निघालोय अंतर्बाह्य

शरीराने अन् मनानेही

…. नकळतच !

आयुष्यात अपयशाचा, संकटांचा पुन्हा पुन्हा तोच दाहक अनुभव मी घेतला आहे. त्या धगीने नकळतच मी शरीराने आणि मनानेही पूर्णपणे होरपळून निघालो आहे.

या कवितेचे शीर्षकच कवितेचे सार सांगत आहे. आपल्याच राखेतून नवा जन्म घेत आकाशात झेपावणारा पक्षी म्हणजे फिनिक्स. पौराणिक कथांमध्ये त्याला अमरपक्षी म्हणतात. स्वतःच्या राखेतून उठण्याच्या क्षमतेमुळे त्याला अमर म्हटले जाते. अशीच विजिगीषू वृत्ती असणाऱ्या एका परिस्थितीशी लढणाऱ्याचे हे मनोगत.

मुक्तछंदात असणारी ही कविता प्रथम पुरुषी एकवचनात लिहिलेली आहे. कवी मोकळेपणाने आपण आयुष्यात अनुभवलेले दाहक प्रसंग कथन करीत परिस्थितीशी संवाद साधतो आहे. या अनुभवाने आपण पूर्णपणे गलितगात्र झाल्याचे सांगत आहे. अपयश, बदनामी, प्रेमभंग, अपमान अशासारख्या गोष्टींनी पुन्हा पुन्हा या प्रसंगाला सामोरे जातो आहे. त्याची तीव्रता दाखवायला नुसते पुन्हा पुन्हा असे न लिहिता पुन:पुन्हा पुन:पुन्हा असा प्रभावी शब्दप्रयोग केलेला आहे.

क्षणभर बरं वाटलं

अजूनही मन शिल्लक आहेत तर…

… जिवंत आहे

विश्वास बसत नव्हता !

या अवस्थेची जाणीव झाली. संवेदना जागी झाली आणि खूप बरं वाटलं. कारण हे जाणवण्या एवढं माझं मन अजून सावध आहे म्हणजे मी अजून जिवंत आहे. पण खरंच माझा यावर विश्वासच बसत नाही.

बसलेल्या कठोर आघाताने आपण जणू निष्प्राण झालो, पूर्ण उमेद खचल्याने धुळीला मिळालो अशीच कवीची भावना झालेली असते. पण संवेदना जागृत आहेत हे लक्षात आल्यावर आपण अजून जिवंत आहोत ही जाणीव त्याला होते आणि थोडसं निर्धास्त पण वाटतं.

हे सुखही क्षणभराचंच

दुर्लक्ष करता येत नव्हतं

बसणाऱ्या चटक्यांकडे

अन् होरपळून निघालो

याच ज्वाळांच्या

भाजून काढणाऱ्या आठवणींनी !

मी जिवंत आहे या जाणिवेचे सुख क्षणीकच ठरले. कारण त्या दाहकतेने बसणाऱ्या चटक्यांकडे दुर्लक्ष करता येत नव्हतं आणि त्यांच्या त्या भयावह आठवणींनी पुन्हा पुन्हा जीव पोळून निघत होता.

अशा जीवघेण्या आघातामुळे होणारे शारीरिक मानसिक त्रास, चटके हे नेहमी दृश्य असतात. ते सोसावेच लागतात. त्यामुळे विसरता येत नाहीत आणि त्यांच्या आठवणी या जास्त त्रासदायक असतात. त्यामुळे आपण आता संपलो असे वाटून आत्मविश्वास रसातळाला जातो.

आता मात्र ठरवलंय

जळून खाक व्हायचं

…नेहमीसारखंच

पण यावेळी मात्र

उठायचं नाही परत फिनिक्ससारखं

पुन्हा भाजून घ्यायला

अन् पुन्हा जाळून घ्यायला ?

आता मात्र मी ठरवलंय असा पुन्हा अनुभव आला की, नेहमीसारखं त्यात जळून खाक व्हायचं. म्हणजेच नेस्तनाबूत व्हायचं. पण आता या राखेतून त्या फिनिक्स पक्षासारखं पुन्हा उठायचं मात्र नाही. पुन्हा होरपळत त्यात नव्याने जाळून घ्यायचं नाही. म्हणूनच आता पुन्हा कसलाही प्रयत्न करायचा नाही. जिवंत असूनही मेल्यासारखे जगायचे.

कवी झालेल्या होरपळीने इतका गलितगात्र झाला आहे की, आता पुन्हा पुन्हा हा अनुभव घ्यायची त्याची तयारी नाही. त्यामुळे त्याने आता पुन्हा उभारी घ्यायचीच नाही. असंच उध्वस्तपण सोसत रहायचं असा निर्धार केला आहे.

का केलास मग तो

हळुवार संजीवन स्पर्श

माझं मन आणि शरीर

जळून उरलेल्या

या तप्त राखेला

पुन्हा एकदा जन्म द्यायला

एका नव्या फिनिक्सला ?

या दाहक आघाताने जणू जळून राख झालेल्या माझ्या तापलेल्या मन आणि शरीराला तू का तुझा संजीवन देणारा स्पर्श केलास ? आता यातून पुन्हा एकदा नव्या फिनिक्सला जन्म द्यायचा काय ?

इथे कवीला कुणीतरी आधाराचा हात देणारे, मानसिक उभारी देणारे, पुन्हा लढण्याचे बळ देणारे भेटलेले आहे. त्यामुळे तो पुन्हा उभा राहतोय. पण त्याला या पुन्हा पुन्हा येणाऱ्या अपयशाची, कटू अनुभवाची जबरदस्त भीती वाटते आहे. त्यामुळे तो त्या सुहृदाला विचारतो, ” का मला संजीवन देणारा तुझा स्पर्श केलास ? का माझी जीवनेच्छा पुन्हा जागृत केलीस ? “

झाल्या आघाताने कवीचे मानसिक खच्चीकरण होते. त्यातून तो सावरतो. पुन्हा उभा रहातो. पुन्हा कोसळतो. त्याची असह्य तगमग होते. ही सारी मानसिक, भावनिक आंदोलने सहजसुंदर शब्दरचनेत मांडण्यात कवी अतिशय यशस्वी झालेला आहे.

या कवितेत फिनिक्स या रूपकाचा खूप छान उपयोग केलेला आहे. परिस्थितीने पूर्ण हतबल झालेला कवी पुन्हा नव्या उभारीने परिस्थितीला सामोरे जात नव्याने डाव मांडतो. यासाठी योजलेले फिनिक्सचे रूपक अगदी यथार्थ आहे.

ही कविता प्रथम पुरुषी एकवचनात असली तरी प्रत्येकजणच आपल्या आयुष्यात अशा परिस्थितीला केव्हा ना केव्हा सामोरा गेलेलाच असतो. त्यामुळे ही कविता फक्त एकट्या कवीची न रहाता सर्वस्पर्शी होते. कारण असे अनुभव हे सार्वत्रिक असतात. हे अनन्योक्ती अलंकाराचे छान उदाहरण म्हणता येईल.

माणसाला आयुष्याच्या वाटचालीत कधी शत्रूकडून त्रासदायक आघात, व्यवहारात, व्यवसायात पूर्ण अपयश, मित्रांकडून फसवणूक, जोडीदाराकडून प्रेमात अपेक्षाभंग अशा जीवघेण्या अनुभवांना तोंड द्यावे लागते. तो मोडून पडतो. शारीरिक, मानसिक होरपळ होते. आत्मविश्वास लयाला जातो. अशावेळी एखादा मित्र, एखादा हितैषी, जिवलग, जोडीदार आधाराचा हात देतो. पाठीशी खंबीर उभा राहतो. मनाची उभारी वाढवून पुन्हा लढण्याचे बळ देतो. पुन्हा वाटचाल सुरू होते. पुन्हा अशा अनुभवाची पुनरावृत्ती होते. पण माणसाची दुर्दम्य  इच्छाशक्ती, जबरदस्त जीवनेच्छा गप्प बसू देत नाही. त्यामुळे पुन्हा नव्या उमेदीने तो जगण्याला सामोरा जाण्यास तयार होतो.

अशाच पद्धतीने लढणाऱ्याच्या मानसिक आंदोलनाचा एक सुंदर आलेख कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी फिनिक्स मध्ये मांडलेला आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print