सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ विश्रांतीचा पार जुना – कवी : सुहास  रघुनाथ  पंडित ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

☆ – विश्रांतीचा पार जुना – कवी : सुहास  रघुनाथ  पंडित ☆

पाशही सगळे सोडू मोकळे चल जाऊया दूर तिथे

तुझे माझे, देणे घेणे, नसतील असले शब्द जिथे

नसेल खुरटे घरटे अपुले बंद ही नसतील कधी दारे

 स्वच्छ मोकळ्या माळावरुनी वाहत येतील शीतल वारे

आशंकेला नसेल जागा नसेल कल्लोळ कुशंकांचे

परस्परांच्या विश्वासावर परस्परांना जिंकायाचे

चिऊकाऊच्या गोष्टी सांगत पिल्ले येतील चिऊ काऊची

मनात तेव्हा फडफड करतील सोनपाखरे आठवणींची

धकाधकीच्या जीवनातले कण शांतीचे वेचून घेऊ

तुडुंब भरले कुंभ सुखाचे हासत पुढच्या हाती देऊ

 खूप जाहले खपणे आता जपणे आता परस्परांना

खूप जाहला प्रवास आता गाठू विश्रांतीचा पार जुना

 – श्री सुहास रघुनाथ पंडित

(प्रेम रंगे, ऋतुसंगे या काव्यसंग्रहातून)

पती-पत्नीच्या नात्यात संध्या पर्व हे जीवनाच्या किनाऱ्यावरचे साक्षी पर्वच असते. आयुष्याकडे मागे वळून पाहताना खूप काही मिळवलं आणि खूप काही गमावलं असं वाटू लागतं.  हरवलेल्या अनेक क्षणांना गवसण्याची हूरहुरही लागते.  “पुरे आता, उरलेलं आयुष्य आपण आपल्या पद्धतीने जगूया की..” असे काहीसे भाव मनात उमटतात.

याच आशयाची सुप्रसिद्ध कवी श्री सुहास पंडित यांची ही कविता. शीर्षक आहे विश्रांतीचा पार जुना*

ही कविता म्हणजे आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर पती-पत्नींचे  एक मनोगत आहे. मनातलं काहीतरी मोकळेपणाने आता तरी परस्परांना सांगावं या भावनेतून आलेले हे विचार आहेत.

पाश ही सगळे सोडू मोकळे चल जाऊया दूर तिथे

तुझे माझे देणे घेणे नसतील असले शब्द जिथे

बंधनात, नियमांच्या चौकटीतल्या आयुष्याला आता वेगळ्या वाटेवर नेऊया. आता कसलेही माया— पाश नकोत, कसलीही गुंतवणूक नको. तुझं माझं दिल्या घेतल्याच्या अपेक्षांचं ओझंही नको, अशा मुक्त ठिकाणी आता दूर जाऊया.

नसेल खुरटे घरटे अपुले बंदही नसतील कधी दारे

स्वच्छ मोकळ्या माळावरती वाहत येतील शीँँतल वारे

आज पर्यंत आपल्या भोवतीचं वातावरण खूप संकुचित होतं. कदाचित जबाबदार्‍यांच्या ओझ्यामुळे, मर्यादित आर्थिक परिस्थितीमुळे असेल आपल्याला काटकसरीने राहावं लागलं, आपल्याकडे कोण येणार कोण नाही याचे तारतम्यही ठेवावे लागले, आपल्याच मनाची दारे आपणच बंद ठेवली, मनाला खूप मारलं पण आता मात्र आपण आपल्या मनाची कवाडे मुक्तपणे उघडूया, आपल्या जगण्याचे वावर आता मोकळं आणि अधिक रुंद करूया जेणेकरून तेथे फक्त आनंदाचेच स्वच्छ आणि शीतल वारे वाहत राहतील.  मनावरची सारी जळमटं, राग —रुसवे, मतभेद, अढ्या दूर करूया.

आशंकेला नसेल जागा नसेल कल्लोळ कुशंकाचे   

परस्परांच्या विश्वासावर परस्परांना जिंकायाचे

एकमेकांविषयी आता कसल्या ही शंका कुशंकांचा गोंधळ नको.  इथून पुढे विश्वासानेच परस्परांच्या नात्याला उजळवूया.  झालं गेलं विसरून एकमेकांची मने पुन्हा जिंकूया,जुळवूया.सगळी भांडणे, मतभेद विसरुन जाऊया.

चिऊकाऊच्या गोष्टी सांगत पिल्ले येतील चिऊकाऊची

मनात तेव्हा फडफड करतील सोन पाखरे आठवणींची

काळ किती सरला!  आपल्या घरट्यातली आपली चिमणी पाखरं आता मोठी झाली उडून गेली पण त्यांच्या पिल्लांनी आता आपल्या घराचं गोकुळ होईल.. पुन्हा,” एक होती चिमणी एक होता कावळा” या बालकथा आपल्या घरट्यात रंगतील आणि पुन्हा एकदा बालसंगोपनाचा आपण भोगलेला तो गोजिरवाणा काळ आपल्यासाठी मनात उतरेल.  या दोन ओळीत उतार वयातील नातवंडांची ओढ कवीने अतिशय हळुवारपणे उलगडलेली आहे आणि आयुष्य कसं नकळत टप्प्याटप्प्याने पुढे सरकत जातं याची जाणीवही दिलेली आहे.

धकाधकीच्या जीवनातले कण शांतीचे वेचून घेऊ

तुडुंब भरले कुंभ सुखाचे हासत पुढच्या हाती देऊ

जीवनातले अत्यंत अवघड खाचखळगे पार केले, दगड धोंड्या च्या वाटेवर ठेचकाळलो  पण त्याही धकाधकीत आनंदाचे क्षण होतेच की!   आता या उतार वयात आपण फक्त तेच आनंदाचे, शांतीचे क्षण वेचूया  आणि सुखानंदांनी भरलेले  हे मधुघट पुढच्या पिढीच्या हातात सोपवूया.

कवीने या इतक्या सोप्या, सहज आणि अल्प शब्दांतून केवढा विशाल विचार मांडलाय! दुःख विसरू या आणि आनंद आठवूया.  भूतकाळात कुढत बसण्यापेक्षा सुखाच्या आठवणींनी मन भरुया आणि हाच आनंदाचा, सुसंस्कारांचा वारसा पुढच्या पिढीला देताना हलकेच जीवनातून निवृत्तही होऊया.  पुढच्या पिढीच्या आयुष्यात आपली कशाला हवी लुडबुड? त्यांचं त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दे. आपल्या विचारांचं, मतांचं दडपण आपण त्यांना कां बरं द्यावं ?

पुरे जाहले खपणे आता जपणे आता परस्परांना

खूप जाहला प्रवास आता गाठू विश्रांतीचा फार जुना

किती सुंदर आणि आशय घन आहेत या काव्यपंक्ती! सगळ्यांचं सगळं निस्तरलं, सतत दुसऱ्यांचा विचार केला, त्यांच्यासाठीच राब राब राबलो, कित्येक वेळा याकरिता आपण आपल्या स्वतःच्या सुखालाही पारखे झालो पण आता पुरे झालं! आता फक्त तू मला आणि मी तुला. नको कसली धावाधाव. जरा थांबूया, निवांतपणे  आपल्याच जीवनवृक्षाच्या  पारावर विश्रांती घेऊया. विश्रांतीचा तो पार आपल्याला बोलावतो आहे.

विश्रांतीचा  पार जुना या शब्दरचनेचा मी असा अर्थ लावते की आता निवांतपणे या पारावर बसून विश्रांती घेऊ आणि भूतकाळातल्या जुन्या, सुखद आठवणींना उजाळा देऊ.

संपूर्ण कवितेतील एक एक ओळ आणि शब्द वाचकाच्या मनावर कशी शीतल फुंकर घालते..  शिवाय वृद्धत्व कसं निभवावं, कसं ते हलकं, सुसह्य आणि आनंदाचा करावं हे अगदी सहजपणे साध्या सरळ शब्दात सांगते.

प्रतिभा, उत्पत्ती, अलंकार या काव्य कारणांना काव्यशास्त्रात महत्त्व आहेच. कवी सुहास पंडितांच्या काव्यात या काव्य कारणांची सहजता नेहमीच जाणवते. मनातील संवेदना स्पंदने ते जाता जाता लीलया मांडतात त्यामुळे वाचक, कवी मनाशी सहज जोडला जातो, कुठलाही अवजडपणा,बोजडपणा,क्लीष्टता, काठिण्य त्यांच्या काव्यात नसते.

विश्रांतीचा पार जुना या काव्यातही याचा अनुभव येतो. जिथे —तिथे, दारे —वारे,घेऊ —देऊ यासारखी स्वरयमके या कवितेला लय देतात.

खुरटे— घरटे, कल्लोळ कुशंकांचा, खपणे— जपणे या मधला अनुप्रासही फारच सुंदर रित्या साधलेला आहे.

कुंभ सुखाचे, सोनपाखरे आठवणींची, कण शांतीचे, विश्रांतीचा पार या सुरेख उपमा काव्यार्थाचा धागा पटकन जुळवतात.

मनात तेव्हा फडफड करतील सोन पाखरे आठवणींची या ओळीतील चेतनागुणोक्ती  अलंकार खरोखरच बहारदार भासतो.

खुरटे घरटे ही शब्द रचनाही मला फार आवडली. यातला खुरटे हा शब्द अनेकार्थी आणि अतिशय बोलका आहे. चौकटीत जीवन जगणाऱ्या सामान्य माणसाची मानसिकताच या खुरटे शब्दात तंतोतंत साठवलेली आहे. आणि याच खुरटेपणातून, खुजेपणातून मुक्त होऊन मोकळ्या आभाळाखाली मोकळा श्वास घेण्याचं हे स्वप्न फक्त काव्यातील त्या दोघांचं न राहता ते सर्वांचं होऊन जातं.

या कवितेतला आणखी एक दडलेला भाव मला अतिशय आवडला. तो भाव कृतज्ञतेचा. पतीने पत्नीविषयी दाखवलेला कृतज्ञ भाव. “आयुष्यभर तू या संसारासाठी खूप खपलीस, खूप त्याग केलास, कामाच्या धबगड्यात मीही तुझ्या भावनांकडे दुर्लक्ष केले, तुला गृहीत धरले,पण आता एकमेकांची मने जपूया”संसारात ही कबुली म्हणजे एक पावतीच,श्रमांची सार्थकता,धन्यता!

खरोखरच आयुष्याच्या या सांजवेळी काय हवं असतं हो? हवा असतो एक निवांतपणा, शांती, विनापाश जगणं. दडपण नको ,भार नको हवा फक्त एक विश्रांतीचा पार आणि जुन्या सुखद आठवणींचा शीतल वारा. दोघां मधल्या विश्वासाच्या सुंदर नात्यांची जपणूक..

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments