मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरी… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरी… ☆ सौ. वृंदा गंभीर

गौरी, महालक्ष्मी तीन दिवस येतात आणि चैतन्य निर्माण करून जातात. 

गणपती बाप्पा त्यांना माहेरी घेऊन येतात. माहेर हे तीन दिवसाचं असतं हेच सुचवलं आहे गौराईने त्यांची आरास पूजा नैवेद्य रमुन जातो चार पाच दिवस तो उत्साह, आनंद ओसंडून वाहत असतो सुवासिनी येतात हळदीकुंकू समारंभ होतो भेटीगाठी होतात विचारांची देवाणघेवाण होते नवीन कल्पना सुचतात आणि दरवर्षी नवीन करण्याची प्रेरणा मिळते.

गावं बदलले कि प्रथा बदलतात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रथा असतात कुलाचार वेगळे असतात. स्वयंपाक, नैवेद्य वेगळे असतात गौराई सगळीकडे जाऊन तृप्त होते आणि आशीर्वाद देऊन जाते.

एकदा सुरु केलेला उत्सव बंद करता येत नाही. काही अडचण आली तर दुसऱ्याकडून करून घेता येत. वृद्धी असेलतरीही दुसऱ्याकडून करून घेता येत वृद्धी म्हणजे गोड विटाळ मानला जातो. सुतक असेलतर मात्र काहीच करता येत नाही. मग काय करायचं तर बऱ्याच ठिकाणी म्हणतात आत्ता नाही तर नवरात्रात गौरी बसवता येतात हे कुठल्या आधारावर सांगितलं जातं काही कळत नाही.

पंचांग मध्ये ही अफवा आहे असं सांगितलं आहे मग कोण जोतिषकार आहे जे वेदांच्या पलीकडे सांगतात.

गौरी अहवान वर्षातून एकदाचं होते त्याच वेळी पूजा होते. तशी लक्ष्मी रोजच घरात असते ना ती आहे म्हणून आपण आहोत पण तिला मान तीन दिवसाचा आहे. रोज ती आई म्हणून पाठीशी असते.

नवरात्री हा सोहळा त्या तिघींचा आहे ” महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी ” महिषसुराचा वध करण्यासाठी देव देवीला शक्ती प्रदान करण्यासाठी घटी बसतात सात दिवस युद्ध सुरु असतं आठव्या दिवशी देवी होमातून निघून नव्यादिवशी वध करते. नवरात्रीत नऊ दिवसाचा उपवास असतो मग गौरीची पूजा नवरात्रात केल्यावर तिला नैवेद्य कशाचा दाखवणार ती युद्ध सोडून एक दिवस तुमच्याकडे कशी येणार महत्वाचं म्हणजे देव घटी बसले असताना देवी जेवण तरी कसं करणार एकादशी असली तरी अन्नदान किंवा गाईला घास देता येत नाही तिथे नवरात्रीत महालक्ष्मी कशी उभी करणार हा एक प्रश्नच आहे आणि याचे उत्तर ही अफ़वा पसरणाऱ्याकडेच असेल असं वाटतं.

देव म्हणजे श्रद्धा, भक्त, उपासना, देव म्हणजे प्रेम दया होय.

जे काही आहे ते त्याचाच आहे आपण त्याला देणारे कोण, तो करून घेत असतो त्याला हवं त्याच्याकडूनच दोन हात जोडतो ते सुद्धा त्यानेच दिलेले आहेत फुल, उदाबत्ती, नारळ जे काय आहे ते त्याचाच त्याला अर्पण करतो देवाला पोहचतो तो फक्त भक्ती भाव म्हणून परंपरा, कुळधर्म, कुलाचार हे पारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवेत, , , , ,

पाडव्याची गुढी दीपावली ला उभारली आणि लक्ष्मी पूजन पाडव्याला केलं तर चालेल का तसंच गौरी अहवान एकदाचं होत हेच खरं आहे.

श्री स्वामी समर्थ 

© दत्तकन्या (सौ. वृंदा पंकज गंभीर)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नियतीने खास निवडलेला.. मुस्तफा ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ नियतीने खास निवडलेला.. मुस्तफा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

‘सगळ्या जगापेक्षा तब्बल नऊ महिने आधी त्याची आणि माझी ओळख झाली पण भेट मात्र नऊ महिन्यांनीच झाली. त्याआधी त्याचा आणि माझा संवाद व्ह यचा तो आंतरिक स्पर्शामधून. तो पोटात असताना मला झोके घ्यायला आवडू लागलं होतं. घराचे नको नको म्हणताना मी एखादा तरी झोका घ्यायचीच आणि मग यांनी घरातच छानसा झोपाळा आणून बांधला… बसा माय लेक झुलत. आणि एकेदिवशी म्हणजे १४ मे १९९५ रोजी तो आला! गोंडस.. गोड आणि लाघवी रुपडं घेऊन. सर्वांनीच म्हटलं… मुस्तफा नाव ठेवा. मुस्तफा म्हणजे खास… विशेष… अगणित लोकांमधून निवडला गेलेला! आणि होताही तसाच मुस्तफा. अभ्यासात हुशार आणि खेळांत चपळ. खेळण्यांमध्ये हेलिकॉप्टर जास्त आवडीचं होतं मुस्ताफाचं. आमच्या घरावरून लढाऊ विमानं वेगाने निघून जायची… पण हेलिकॉप्टर आलं की मुस्तफा चपलाईने घराच्या छपरावर जायचा आणि ते नजरेआड होईतोवर त्याकडे पहात राहायचा. त्याचे अब्बू गल्फमध्ये नोकरीला गेले तर याने सुट्टीवर येताना हेलिकॉप्टरच आणा असा हट्ट धरला होता! काय होतं पोराच्या मनात तेव्हा समजलं नाही. तसं आमच्यातलं तोवर कुणीही फौजेत गेलेलं मला तरी माहीत नव्हतं. आणि तो असं काही करेल असं स्वप्नातही आलं नव्हतं कधी आम्हा नवरा बायकोच्या. त्याचे बाबा झकिउद्दीन दूर आखातात नोकरी करायचे आणि मुस्तफा बहुदा तिकडेच गेला असता नोकरी किंवा व्यवसायासाठी. पण वृत्तीने अतिशय धार्मिक होता. त्यामुळे तिकडेही वळायची शक्यता होतीच. मला काहीही चालणार होतं. त्याच्यानंतर झालेली आलेफिया.. तिचं लग्न करून दिलं की मुस्ताफाच्या डोक्यावर सेहरा बांधला की आम्ही दोघं म्हातारा-म्हातारी मोकळे होणार होतो! 

राजस्थानातील उदयपूर जवळचं खेरोडा हे अगदी लहान गाव. पण मुस्ताफाची हुशारी पाहून आम्ही उदयपूर मध्ये राहयाला गेलो. मुस्तफा तिथल्या सेंट पॉल कॉलेजात जायला लागला. कधी त्याने एन. डी. ए. ची प्रवेश परीक्षा दिली, कधी पास झाला ते समजेपर्यंत बेटा खडकवासल्याला निघूनही गेला होता. तिथं आपल्यातलं कुणी नसेल ना रे? मी काळजीने म्हणाले होते.. त्यावर म्हणाला…. अम्मी… याह इंडियन आर्मी है… यहां सिर्फ एक धरम… देश और एक जात… फौजी! तुम देखना इतनी इज्जत कमाउंगा की जितनी कोई दुसरी नौकरी नहीं दे सकती! त्याची पत्रं यायची आणि कधी कधी फोनवर बोलणं व्हायचं. म्हणायचा…. जीवनात एक ध्येय सापडल्या सारखं वाटतं आहे… अम्मी! 

पासिंग आऊट परेडला आम्ही तिघेही गेलो होतो… मी, हे आणि धाकटी आलेफिया. तो पूर्ण गणवेशात समोर आला तेंव्हा झालेला आनंद अवर्णनीय असाच होता. त्याच्या मित्रांनी जेव्हा त्याला त्यांच्या खांद्यांवर उचलून घेतलं होतं तेंव्हा तर भारी वाटलं होतं. मुस्तफा एअर विंग निवडणार हे तर स्वच्छ होतं… त्याला आकाशात भरारी घ्यायला आवडू लागलं होतं… आंता त्याच्या हाती ख-याखु-या हेलिकॉप्टरची कमान असणार होती आणि तेही साधंसुधं प्रवासी हेलिकॉप्टर नव्हे… चक्क लढाऊ हेलिकॉप्टर! 

दोनच वर्षात तो फायटर पायलट म्हणून तरबेज झाला. त्याचे त्या युनिफॉर्ममधले फोटो पाहून डोळ्यांवर विश्वासच बसायचा नाही… एवढंसं होतं पोरगं… त्याचे हात चक्क आभाळाला टेकू लागलेत की! एखाद्या मिशनवर निघाला की फक्त त्याच्या अब्बुला कळवायचा… मला नाही! मी खूप जास्त काळजी करते अशी त्याची तक्रार असायची. दिवस निघून चालले… आता सूनबाई आणावी हे बरे. ठरवून टाकलं लग्न…. दोन तीन महिन्यांत बार उडवून द्यायचा होता.

दोन दिवस झाले… भूक लागत नव्हती… आणि डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले आपोआप. का अस्म व्हावं? तसं काही कारणही नव्हतं. ना कुठली लढाई चालू होती ना मुस्तफा कुठे मोहिमेवर निघाला होता. चीनच्या सीमेवर तैनात होता हे माहीत होतं… पण तिथं तर त्याचं काम सैनिकांना मदत करणं होतं… त्यासाठी कितीही उड्डाणे करायला तो सदैव असायचा… वजनाला हलके पण अत्यंत शक्तिशाली हेलिकॉप्टर त्याच्या हातातलं जणू आवडीचं खेळणं बनलं होतं. नंतर समजलं… त्याने त्यादिवशी मोहिमेवर जाण्याआधी त्याच्या अब्बुला फोनवरून कल्पना दिली होती. फक्त मोहीम काय आहे… हे नव्हतं सांगितलं.. नियमानुसार. फक्त म्हणाला जवळचा मित्र आहे सोबत…. मेजर विकास भांबु नावाचा. कामगिरी फत्ते करून हे दोघे आणि आणखी तीन सहकारी माघारी निघाले होते. अरुणाचल प्रदेशातील अपर सियांग येथील मिमिंग गावावर ते उडत होते… आणि अचानक त्याच्या हेलिकॉप्टरला मागील बाजूस आग लागली… ते वेगाने जमिनीकडे झेपावू लागले. खाली मोकळे मैदान दिसत होते… तिथे उतरणे सोपे होते… पण खाली आजूबाजूला लोकवस्ती होती आणि मुख्य म्हणजे तिथेच लष्कराचा दारूगोळा साठवण्याची जागा होती. हेलिकॉप्टर नियंत्रणात नव्हतं फारसं… काहीच सेकंद होते निर्णय घ्यायला… मेजर भांबु आणि मेजर मुस्तफा यांनी निर्णय घेतला… गावापासून दूर जायचं हे जळतं कफन घेऊन.. भले आपण जाळून जाऊ पण गाव आणि दारूगोळा वाचला पाहिजे. बलिदानाला काही प्रत्येक वेळी युद्धच असावं असं कुठं काय असतं? सैनिक म्हणजे प्रत्येक क्षण युद्धाचा प्रसंग. त्यांनी जवळच्या जंगलाच्या दिशेने आपले हेलिकॉप्टर वळवले… आणि व्हायचे तेच झाले… काही क्षणांमध्ये दाट झाडीत ते कोसळले…. सर्वजण मृत्यूच्या खाईत कोसळले…. मुस्तफाही त्यात होता! दैवाने या बलिदानासाठी त्याचीच निवड केली होती… नावासारखाच मुस्तफा… खास निवडला गेलेला… the chosen one! 

दोन दिवसांपूर्वी डोळ्यांतून विनाकारण वाहू लागलेल्या आसवांचा अर्थ त्यादिवशी ध्यानात आला! मुस्तफा कदाचित आणखी एका मोहिमेवर निघून गेला असावा… अशी मनाची समजूत काढत दिवस ढकलते आहे. पोरं आईपासून कधीच दूर जात नाहीत…. नदी सागराला जाउन मिळाली तरी उगमापासून तिचे पाणी तुटत नाही. हुतात्मे अमर असतात.. असे ऐकले होते… मुस्तफाही असाच अमर आहे… तो जवळ असल्याचा भास होतो… भास नव्हे… तो जवळच असतो नेहमी! 

तो दिवाळीचा दिवस होता. पण त्या रात्री एक दिवा नाही लावला गेला की एक फटाका नाही वाजला. चुली बंद होत्या… सा-या शहराने, गावाने मुस्तफाच्या देहावर एक एक मूठ माती घातली…. या मातीचे ऋण फेडून तो कायमचा मातीत मिसळायला निघाला होता! आता मी आणि माझे पती एका सामान्य मुलाचे नव्हे तर एका हुतात्मा सैनिकाचे आईबाबा झालो होतो… राष्ट्रपती महोदया सुद्धा आम्हांला सन्मानित करताना गहिवरल्या होत्या… मुस्तफाच्या नावाचे मरणोत्तर शौर्य चक्र स्वीकारताना दोन भावना होत्या…. गमावल्याची आणि कमावल्याची! मुलगा गमावला आणि अभिमान कमावला! आणि हा अभिमान उरी बाळगून उरलेलं आयुष्य काढायचं आहे! मुस्तफा.. अलविदा… बेटा ! ‘ 

(२१ ऑक्टोबर, २०२२ रोजी मेजर मुस्तफा बोहरा, मेजर विकास भांबु क्रू मेंबर्स हवालदार बिरेश सिन्हा, नाईक रोहिताश्व कुमार आणि क्राफ्टसमन के. व्ही. अश्विन यांनी एका हवाई मोहिमेत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. मेजर मुस्तफा बोहरा साहेबांच्या मातोश्री श्रीमती फातिमा बोहरा यांनी मोठ्या धैर्याने या दु:खाला तोंड दिले. १५ ऑगस्ट, २०२३ रोजी मा. राष्ट्रपती महोदयांनी दिवंगत मेजर मुस्तफा बोहरा यांना मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर केले. त्यांच्या सोबत असलेले मेजर विकास भांबु यांनाही मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले. मेजर भांबु हे सुद्धा राजस्थानचे सुपुत्र होते आणि याआधीही सेना मेडलने त्यांना गौरवण्यात आलेले होते. दिनांक ८ ऑगस्ट, २०२४ रोजी हा शौर्य चक्र प्रदान करणयाचा कार्यक्रम झाला. यानंतर झालेल्या मुलाखती मध्ये श्रीमती फातिमा बोहरा यांनी मोठ्या शौर्याने आपल्या लेकाच्या आठवणी सांगितल्या… त्या आणि तशा अनेक मुलाखती, बातम्या, विडीओस वर आधारीत हा लेख आहे… फातिमा यांच्या भूमिकेत जाऊन लिहिलेला.. जय हिंद… जय हिंद की सेना !🇮🇳)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मोक्षपट’ — माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

‘मोक्षपट‘ —  माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि तत्त्वज्ञान जसे कालातीत आहेत, तसे त्यांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे, तो म्हणजे सापशिडीचा खेळ ! या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वरमाऊली यांनी केली आहे, असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही; पण हे सत्य आहे. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या या खेळाविषयी जाणून घेऊया.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सापशिडीचे गुपित ‘डेन्मार्क’चे जेकॉब आणि पुणे येथील ज्येष्ठ संशोधक वा. ल. मंजुळ यांनी उलगडले..

संत ज्ञानेश्वर महाराजांनीच सापशिडीचा शोध लावला, याचे स्पष्ट पुरावे मिळत नव्हते; पण ‘डेन्मार्क’ देशातील जेकॉब यांच्या साहाय्याने काही वर्षांपूर्वी हे गुपित उलगडले गेले. ‘इंडियन कल्चरल ट्रॅडिशन’ या संकल्पनेच्या अंतर्गत डेन्मार्क येथील ‘डॅनिश रॉयल सेंटर’चे संचालक डॉ. एरिक सँड यांचे विद्यार्थी असलेल्या जेकॉब यांनी ‘मध्ययुगीन काळात भारतात खेळले जाणारे खेळ’, हा विषय संशोधनासाठी निवडला. या संशोधनाच्या वेळी त्यांच्या असे लक्षात आले की, १३ व्या शतकातील संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सापशिडीचा शोध लावलेला असू शकतो.

जेकॉब यांनी अनेक जुने सापशिडीचे पट त्यांनी मिळवले; परंतु योग्य संदर्भ मिळत नव्हते. संत ज्ञानेश्वरांच्या चरित्रातही याविषयी कुठे उल्लेख नव्हता. अखेर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक वा. ल. मंजुळ यांच्याकडे त्यांनी विचारणा केली. मंजुळ यांनी पुणे येथील डेक्कन महाविद्यालयामध्ये तशा प्रकारचा संदर्भ असल्याचे सांगितले आणि ‘मोक्षपट’ उलगडा गेला.

मनुष्याने आयुष्य कसे जगावे, याचे तत्त्वज्ञान सांगणारा सापशिडी खेळ!

‘मोक्षपट’ हा पहिला सापशिडीपट होता, असे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ भिक्षा मागण्यासाठी गावात जात असत. घरात एकट्या असलेल्या संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांचे मन रमावे; म्हणून संत ज्ञानेश्वर आणि संत निवृत्तीनाथ यांनी या खेळाचा शोध लावला, असे सांगितले जाते. लहान मुलांना खेळाच्या माध्यमातून चांगले संस्कार मिळावेत, असा, यामागील उद्देश होता.

मोक्षपटाचे दोन्ही पट २० X २० इंच आकाराचे असून त्यात ५० चौकोनी घरे आहेत. पहिले घर जन्माचे, तर शेवटचे घर मोक्षाचे आहे. माणसाच्या जन्मापासून त्याला मोक्ष मिळेपर्यंतचा प्रवास या पटामधून मांडण्यात आला आहे. ‘मोक्षपट’ खेळण्यासाठी सापशिडीप्रमाणेच ६ कवड्यांचा वापर करावा लागतो. ६ कवड्या पूर्ण पालथ्या पडल्या, तर दान मिळते. सापशिडीच्या खेळाप्रमाणेच यातही साप आहेत. त्यांना काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षडरिपूंची नावे देण्यात आली आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रगती करण्यासाठी शिडी आहे. तिला सत्संग, दया, सद्बुद्धी अशी नावे देण्यात आली आहेत. माणसाने आयुष्य कशा प्रकारे जगावे, याचे तत्त्वज्ञान या खेळातून सांगण्यात आले आहे.

जेकॉब यांना डेक्कन महाविद्यालयामध्ये रा. चिं. ढेरे यांच्या हस्तलिखित संग्रहातून दोन ‘मोक्षपट’ मिळाले.

मोक्षपटाच्या हस्तलिखितावर लिहिलेल्या ओव्यांमध्ये आयुष्य कसे जगावे ? कोणती कवडी पडली की, काय करावे ? याचे मार्गदर्शन अगदी सहजपणे सांगण्यात आले आहे. सापशिडी जरी अधुनिक असली, तरी गर्भितार्थ तोच राहील, यात काही शंका नाही.

इंग्रजांनी सापशिडी हा खेळ नेऊन त्याचे ‘स्नेक अँड लॅडर’ असे नामकरण करणे ‘व्हिज्युअल फॅक्टफाईंडर-हिस्ट्री टाइमलाईन’ या पुस्तकात वर्ष ११९९ ते १२०९ या कालखंडातील जगातील महत्त्वाच्या घडामोडींविषयी माहिती दिली आहे. ‘उल्लेखनीय गोष्ट’ या शीर्षकाखाली ‘१३ व्या शतकातील भारतीय कवी संत ज्ञानदेव यांनी कवड्या आणि फासे यांचा उपयोग करून एक खेळ सिद्ध केला. यात खेळाडू शिडीचा उपयोग करून वर चढणार आणि सापाच्या तोंडी आल्यावर खाली उतरणार. शिडीच्या साहाय्याने वर चढणे हे चांगले समजले जाई, तर सर्पदंश ही अनिष्ट गोष्ट समजली जात असे. हा खेळ ‘सापशिडी’ या नावाने अद्यापही लोकप्रिय आहे’, असा उल्लेख सापडतो.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई ही सर्व भावंडे हा खेळ खेळत असत. पुढे भारतभर या खेळाचा प्रसार झाला. इंग्रज भारतात आल्यावर त्यांना हा खेळ प्रचंड आवडला. बुद्धीबळ, ल्युडोप्रमाणे ते हा खेळही इंग्लंडमध्ये घेऊन गेले, असे म्हटले जाते. व्हिक्टोरिया राणीच्या म्हणण्याप्रमाणे त्यात काही पालट करण्यात आले आणि त्याचे ‘स्नेक अँड लॅडर’ असे नव्याने नामकरण करण्यात आले. सध्या आपण त्यांच्या पद्धतीने सापशिडी खेळत असलो, तरी त्याची मूळ संकल्पना भारतीय आहे आणि संत ज्ञानेश्वरमाऊली हेच या खेळाचे जनक आहेत. ’

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सात खड्यांच्या गौरी ”… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ “सात खड्यांच्या गौरी ”… लेखक : श्री मकरंद करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

(कोकणस्थ ब्राह्मणांच्या गौरी ७ खड्यांच्या का?)

गणपती बाप्पा आले, म्हणजे त्यांची आई गौरीही येणार. या प्रथम पूजनीय गणपतीनंतर त्याच्या आईचा म्हणजे गौरींचा मान ! हा गौरींचा उत्सव तसेच पूजा, विविध नैवेद्य या सर्व गोष्टी या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात. हा सृजनाचा उत्सव असल्याने तो साहजिकच स्त्रियांच्या अधिकारात येतो. विविध ठिकाणी ज्येष्ठा कनिष्ठा गौरी या मुखवटे, उभ्या मूर्ती, भिंतीवरील चित्र, तेरड्याच्या रोपट्याला देवीचे चित्र लावून, कलश इत्यादी स्वरूपात पुजल्या जातात.

कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये मात्र देवीचे प्रतीकात्मक रूप म्हणून ७ खडे आणून पुजले जातात. या संबंधात केले जाणारे विविध विनोदही ऐकायला मिळतात. पण याची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊ या. कोकणामध्ये पावसाचे प्रमाण खूप असते. सगळीकडचे जलसाठे तुडुंब भरलेले असतात. हे जलसाठे पावसाळ्यानंतरच्या काळात सर्वाधिक धोकादायक असतात. फोफावलेल्या वनस्पती, वेली, निसरडी जमीन, सर्वत्र चिखल यामुळे अपघात आणि मृत्यूची भीती असते. अपरिचित जलसाठ्यांच्या ठिकाणी, तिन्ही सांजेला उजेड कमी होताना, खूप झाडीच्या ठिकाणी कांहींचा अनपेक्षित अपमृत्यु ओढवतो. अत्यंत पुढारलेल्या अशा आजच्या काळातही पावसाळ्यात नदीत, ओढ्यात, धबधब्यात, समुद्रात बुडून मरण्याचे प्रमाण वाढते. मग यातून भीतीची, दंतकथांची परंपरा सुरु होते. कांही कथा तर खूपच भीतीदायक आहेत. अशा ठिकाणी पूर्वी अपघातात मरण पावलेल्या कांही स्त्रियांची पिशाच्चे येथे वास करतात असे मानले गेल्याने आणखीनच भीतीदायक पार्श्वभूमी लाभते. त्यांच्या कहाण्या, कथा अनेक पिढ्यांपर्यंत सांगितल्या जात राहतात. त्यामुळे विविध प्रकारचे विधी, तोडगे हे भक्तिभावाऐवजी भीतीमुळे केले जातात.

मोक्षदायी अशी सप्त तीर्थे, सप्त मातृका, सात पवित्र नद्या तशी आपल्याकडे सप्त देवतांची कल्पना मांडलेली आणि मानलेली आहे. विहिरी, तळी, सरोवर, पाणवठे अशा ठिकाणी सात देवतांचे वास्तव्य मानलेले आहे. त्यांना सात जल योगिनी, जलदेवता, अप्सरा म्हणतात. त्याचे साती आसरा, सती आसरा असे अपभ्रंशही झाले. कांहीं समाजात त्यांना गुरुकन्या मानले जाते. मत्सी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा, मकरी अशी त्यांची नावे आहेत. ही सर्व नावे जलचरांची आहेत. त्यांना त्रास दिल्यामुळे, नीट सेवा न केल्यामुळे त्यांचा कोप होतो. म्हणून त्या माणसांना ओढून पाण्यामध्ये नेतात अशी लोकांची श्रद्धा आहे. तसा कोप होऊ नये म्हणून प्रतीकात्मक ७ खडे आणून त्यांची पूजा केली जाते. हे खडे जल साठ्याजवळून, वाहत्या पाण्यातून, पवित्र वृक्षतळ अशा ठिकाणांहून आणले जातात. त्यांना समृद्धी देणाऱ्या, रक्षणकर्त्या सप्त देवता मानून त्यांची भक्तिभावाने सेवा केली जाते. गौरींच्या परंपरागत कहाणीमध्ये, दारिद्र्यामुळे तळ्यात जीव द्यायला निघालेल्या गरीब ब्राह्मणाला, वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेल्या गौरी देवीने वाचविले व त्याला समृद्धी दिली, असे वर्णन आहे.

कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये या सप्त देवतांचे, ७ खड्यांच्या रूपात पूजन करण्याचे व्रत पाळले जाते. कोकणातील अन्य ब्राह्मण पोट जाती तसेच अन्य जातींमध्ये सुद्धा खड्यांच्या गौरी आणण्याची पद्धत आहे. कोकणात अनेक सुप्रसिद्ध मंदिरातील देवता या सप्त शिळांच्या रूपात आढळतात. त्यामुळे सप्त शिळांचे महत्व केवळ ब्राह्मणच नाही तर अन्य अनेक समाजांमध्ये आहे. त्यांच्या त्या कुलदेवताही आहेत.

“ज्येष्ठे, श्रेष्ठे, तपोनिष्ठे, धर्मीष्ठे, सत्यवाहिनी, समुद्रवसने देवी, ज्येष्ठा गौरी नमोस्तुते.” असा श्लोक खड्याच्या गौरी आणताना म्हणतात. ही सात खड्यांच्या सात देवींची नावे नसून, एकाच जेष्ठा गौरीची ही सर्व विशेषणे आहेत.

आनंदाच्या सणासुदीच्या काळात (म्हणजे सध्याच्या पावसाळ्यात) माणसाने आपण देवापेक्षाही (निसर्गापेक्षाही) शक्तिवान, बुद्धिवान आहोत असे समजून आपला जीव घालविण्यापेक्षा, त्याचा सन्मान राखावा हेच या ७ खड्यांच्या गौरींच्या कहाणीचे फलित आहे.

लेखक : श्री मकरंद करंदीकर

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सर.. माघारी या ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

सर… माघारी या ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

हाताशी आलेला एकुलता एक मुलगा अकाली दगावला आणि कमल जीत सिंग उर्फ केजे सर सैरभैर झाले! ज्याच्यासाठी कमवायचं तोच आता या जगात नाही तर मग नोकरी करायची तरी कशाला? असा प्रश्न साहजिकच उभा राहिला!

भारतीय वायुसेनेत Warrant Officer म्हणून केलेली कित्येक वर्षांची सेवा अशी तडकाफडकी संपुष्टात आणायचा निर्णय त्यांनी काळजावर दगड ठेवून घेतला आणि वरिष्ठांना तसं कळवून टाकले!

केजे सरांशिवाय नव्या रंगरुटांचे (Recruits) पाय हलेनात! त्यांची passing out parade अगदी तोंडावर आलेली होती. पंचेचाळीस मुला- मुलींची बॅच होती. परेड काही कुणाच्या मनासारखी होईना. नवे instructor आले होते, मात्र पोरा पोरींना केजे पापाजींचा लळा लागला होता. खरं केजे म्हणजे प्रशिक्षणार्थी वायूसैनिकांचा कर्दनकाळ म्हणून कुप्रसिद्ध होते. मैदानात असा रगडा देत की आईचे दूध आठवावे. पण त्यांचे काळीज आईचे होते. जितके उत्तम प्रशिक्षण तेवढी उत्तम कारकीर्द यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे पद कवायत, व्यायाम, पथ संचलन यात जराही चूक त्यांना खपत नसे. तुम्ही भले नंतर माझ्यापेक्षा वरच्या पदावर जाल पण आता तुम्ही माझ्या आज्ञेत आहात.. मी सांगेन तीच पूर्व! असा त्यांचा खाक्या होता. मी तुम्हाला तुम्ही ऑफिसर झाल्यावर कडक salute ठोकेन की… असंही ते सैनिकांना सांगायचे. कुणाला दुखापत झाली, कुणी मनाने खचला की मग मात्र केजे काळजीवाहू आई होत. त्यांच्या तालमीत तयार झालेले अधिकारी याची साक्ष देत असत!

आता के जे सर शिकवायला येणार नाहीत हे समजल्यावर recruits मनातून खट्टू झाले. त्यांनी के जे सरांना एक पत्र धाडले..

प्रिय सर,

सत् श्री अकाल!

तुमच्या विना परेड नीट होत नाहीये. पासिंग आऊट जवळ आली आहे. तुमच्या पोरांची परेड वाईट झालेली तुम्हाला चालेल?

तुमचा एक मुलगा देवाघरी गेला… पण आम्ही पंचेचाळीस जण तुमची मुलेच आहोत की!

सर… please come back… soon!

पत्र वाचून के जे ढसाढसा रडले. आणि तडक परेड मैदानावर हजर झाले. नेहमीच्या पहाडी आवाजात पोरांना order दिली…. आज पोरांची पावलं नेहमीपेक्षा जास्त शिस्तबध्द पडत होती… सबंध संघ डौलात march करू लागला होता!

त्याचवेळी के जे सिंग सरांनी ठरवलं.. पुढील सर्व नोकरी या आपल्या लेकरांसाठी द्यायची… देवाने एक पोरगा हिरावून घेतला पण ही शेकडो पोरं पदरात घातली.. यांना पंखाखाली घेतलं तर त्यांना पंख फुटतील… ते उंच भरारी घेतील… देशाच्या सेवेसाठी सज्ज होतील. एका शिक्षकाला आणखी काय पाहिजे असतं?

(हैद्राबाद येथील भारतीय वायू सेना प्रशिक्षण केंद्रात warrant officer म्हणून कार्यरत असणाऱ्या कमलजीत सिंग यांची ही कहाणी.. आजच्या शिक्षक दिनानिमित्त. ) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ प्रेमाचे अपार आभाळ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ प्रेमाचे अपार आभाळ ☆ श्री संभाजी बबन गायके 

दोन न्यायाधीशांसमोर ‘त्यांची’ सुनावणी सुरू होती! दोन्ही न्यायाधीशांनी एकमुखाने एक आदेश सुनावला…. यावर ‘ त्यांनी’ मोठ्या अदबीने म्हणलं, ” Yes, your honour!…. आपल्या आदेशाचे पालन केले जाईल!”

आणि या निर्णयावर शिक्कामोर्तब म्हणून त्या दोन्ही न्यायाधीशांनी मोठ्या प्रेमाने ‘त्यांचे’ हात हातात घेतले… लहान मुले आई- बाबांकडून एखादी गोष्ट कबूल करून घेताना करतात त्यासारखे! ‘त्यांनी’ही ह्या दोन्ही न्यायाधीशांना लवून नमस्कार केला! 

“ठरलं… यापुढे मी पूर्णपणे शाकाहारी राहीन!”

यावर दोन्ही न्यायाधीश गोड हसले.. आणि खटला निकाली निघाला! न्यायाधीश महोदयांच्या आई या खटल्यात साक्षीदार होत्या… त्या आपल्या या लेकींकडे कौतुकाने पहात होत्या.. किती तरी वेळ!

देशाच्या आदरणीय सरन्यायाधीश महोदयांच्या अर्थात चीफ जस्टिस ऑफ इंडिया (Chief Justice of India) श्री. धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या निवासस्थानी हा खटला चालला…. आणि न्यायाधीश होत्या कुमारी प्रियांका धनंजय चंद्रचूड आणि कुमारी माही धनंजय चंद्रचूड! साहेबांनी आपल्या हाताशी आणि हक्काचे दोन मोठे वकील, ॲडव्होकेट अभिनव धनंजय चंद्रचूड आणि ॲडव्होकेट चिंतन धनंजय चंद्रचूड, असतानाही त्यांच्याकडे आपले वकीलपत्र दिले नव्हते… कारण त्या घरात प्रियांका आणि माही यांचाच कायदा चालतो!

अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत असताना, २०१५ मध्ये चंद्रचूड साहेबांनी प्रियांका आणि माही या ‘ विशेष क्षमता ‘ असलेल्या मुलींना दत्तक घेतले.

वडिलांच्या पावलांवर पावले टाकीत न्याय क्षेत्रात नाव कमावलेली आपली दोन मुले अभिनव आणि चिंतन यांना धनंजय साहेबांच्या सोबतीला ठेवून सौ. रश्मी धनंजय चंद्रचूड २००७ मध्ये हे जग सोडून गेल्या… कर्करोगाचे निमित्त झाले!

यानंतर काही वर्षांनी साहेबांनी त्यांच्या क्षेत्रातील वकील कल्पना दास यांचेशी विवाह केला. कल्पना यांनीही प्रियांका आणि माही यांचे मातृत्व मोठ्या प्रेमाने स्वीकारले!

वडील सरन्यायाधीश, आई आणि दोन भाऊ मोठे वकील अशा चतु:स्तंभी न्यायमंदिरात या कन्यका आनंदाने, सुरक्षित रहात आहेत!

 या दोघींनी आपल्या बाबांना एक प्रेमाचा आदेश दिला…. “शाकाहारी व्हा! क्रूरतारहित आहार आयुष्याचा अंगीकार करा!” हुकूम सरआँखो पर… म्हणत गेल्या सहा महिन्यांपासून चंद्रचूड साहेब कसोशीने शाकाहारी झाले आहेत… आणि आयुष्यभर शाकाहारी (vegan) राहणार असल्याचं वचन त्यांनी आपल्या या लाडक्या लेकींना दिले आहे!

साहेब आणि कल्पना मॅडम यांनी रेशमी कपडे, वस्तू, प्राण्यांच्या कातडी पासून बनवण्यात आलेल्या वस्तू इत्यादी विकत घेणे पूर्णतः बंद केले आहे! आणि साहेबांनी मांसाहार पूर्णतः वर्ज्य केला आहे! 

५ ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात मा. सरन्यायाधीश महोदयांनी ही बाब उघड केली.

काही दिवसांपूर्वी धनंजय महोदयांनी प्रियांका आणि माही यांच्या आग्रहाखातर त्या दोघींना आपले कार्यालय दाखवायला आणले होते.. अर्थात सर्व नियमांचे पालन करूनच! आपले वडील एवढ्या मोठ्या कार्यालयात काम करतात याचा त्यांच्या निष्पाप चेहऱ्यांवरचा आनंद अवर्णनीय होता! धनंजय साहेबांना सारा देश your honour म्हणून संबोधित असताना आपल्या या लेकींचा honour साहेबांनी अगदी कसोशीने जपला आहे. त्यांच्या पालनपोषण, शिक्षणात कोणतीही कसर ठेवली नाही आजवर!

सर्वाधिक काळ देशाच्या सरन्यायाधीशपदी कार्यरत राहिलेले महान न्यायाधीश यशवंत चंद्रचूड साहेब यांच्या पोटी धनंजय साहेब जन्मले. वकील झाल्यावरही त्यांच्या वडिलांनी त्यांना वकिली व्यवसाय करू दिला नाही…. न्यायदानात पारदर्शकता रहावी म्हणून! मी देशाच्या सर न्यायाधीशपदी असेतो तुला वकिली करता येणार नाही, ही त्यांची अट होती! नंतर धनंजय साहेबांनीही ‘सवाई’ कारकीर्द केल्याचे जाणकार जाणतात! नोव्हेंबर २०२४ मध्ये साहेबांचा कार्यकाळ संपेल. त्यांनी कार्यकाळात निर्भिडपणे घेतलेले अनेक निर्णय जनतेच्या न्यायालयात नावाजले गेले आहेत. पदामुळे व्यक्तीला श्रेष्ठत्व प्राप्त होते हे जगरीतीस धरून आहेच.. परंतु व्यक्तीमुळे पदाला आणखी प्रतिष्ठा प्राप्त होते, हे धनंजय साहेबांच्या कर्तृत्वावरून सहजी ध्यानात यावे, असेच आहे! मानवी मूल्यांची स्वतःच्या वर्तनातून सकारात्मक जपणूक करण्याच्या वृत्तीची माणसे देशाला लाभली आहेत… त्यांचा आदर्श पुढीलांनी घ्यावा असा आहेच! 

सरन्यायाधीश माननीय श्री. धनंजय चंद्रचूड साहेबांना आणि त्यांच्या पत्नी सौ. कल्पना यांना आदरपूर्वक नमस्कार आणि साहेबांनी केलेल्या देशसेवेबद्दल आभार! Thank you, your honour!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ माझी आदर्श उपासना… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

माझी आदर्श उपासना… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

मी माझ्या आज्जीला फार वर्षांपूर्वी विचारले होते की, ‘ तुम्ही कोकणात असताना गणेश उत्सव कसा साजरा करायचात? ‘ 

ती म्हणाली, ‘तो उत्सव नसतो ते एक व्रत असत, चतुर्थीच्या दिवशी स्नान करून नदीवर जायच – 1, नदीतली माती घेऊन – 2 एका स्वच्छ जागेवर यायच- 3. त्या मातीतील जास्तीच पाणी सुकू द्यायच – 4, मातीतला कचरा, कुडा बाजूला करायचा – 5. नंतर त्या मातीतून गणपतीची मूर्ती बनवायची – 6, तीथेच उपलब्ध फुले, दुर्वा, अक्षता, हळद-कुंकू वाहून पूजा करायची – 7. उपलब्ध वेळेनुसार आरती, स्तोत्र, जप, ध्यान करून, 8 त्या मूर्तीचे नदीत विसर्जन करायचे 9 आणि घरी यायचे10. कोकणात सर्वच सणांना मोदक केले जातात तसे सवडीनुसार मोदक करुन, गणपतीचे प्रतिक म्हणून ब्राह्मण भोजन घालावयाचे’.

… आजवर या विषयावर मी विचार केला आणि काही पौराणिक माहितीही वाचली. त्यातून माझे एक मत तयार झाले आहे. ते कदाचित अशास्त्रीय, अतार्किक, अवास्तव आहे असेही काही लोक म्हणतील, पण ते माझे मत – माझे आहे आणि मला ते फार प्रिय आहे.

साऱ्या देवतांच्या पूजा, उपासना किंवा व्रत का केली जातात? 

… त्यांची कृतज्ञता वा आदर व्यक्त करण्याकरता केले जाते. आपण अनेक कारणांनी अनेकांची कृतज्ञता वा आदर व्यक्त करतो, त्याकरता आपण वेळ, काळ व अन्य उपलब्ध साधने यानुसार ते व्यक्त करतो. प्रत्येक माणसाने एकच पध्दत वापरावी हा आग्रह नसतो. ज्याची जशी पात्रता असेल, उपलब्धता असेल तसे आपण स्विकारतो. मग देवांच्या पूजांबाबत, उपासनांबाबत एवढा आग्रह का?….. देवता असोत, आदर्श व्यक्ती असोत त्यांची उपासना नियमितपणे करावी असे माझे मत आहे, पण त्याकरता, बाह्य पूजाविधीचीच जरुरी आहे असे मला तरी वाटत नाही. मानस उपासना जास्त प्रभावी ठरते, कारण बाह्यपूजा अहंकार वाढवतातच शिवाय त्या करताना वेळ, शक्ती आणि अन्य अनेक गोष्टींचा बरेचदा अपव्यय होतो.

(निर्माल्य, देवाला वाहिलेल्या, किंवा सजावट केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करणं – किमान शहरात तरी किती अवघड आहे.) 

याहीपेक्षा आणखी एक गोष्ट मला महत्वाची वाटते, ती म्हणजे प्रत्येक देवता व व्यक्तींच्यातील गुणांचा विकास आपल्यामधे (भक्तांमधे) कसा होईल? प्रत्येक सच्चा धार्मिक मनुष्य स्वत: विकास करुन घेण्यास झटत असतो, आणि हा विकास उत्तम प्रकारे व्हावा याकरताच तर भारतीय परंपरेने चारी पुरूषार्थांची संकल्पना मांडली.

या विकासातील आदर्श तत्वांचा समुच्चय म्हणजे विविध देवता आणि त्यांची चरित्र आणि चारित्र्य होत. अशांची उपासना करायला हवी, आणि माझ्या आज्जीनं सांगितलेली व्रतपध्दती त्या अर्थाने मला फारच मोलाची वाटते…..

1) नदीवर जावे – नदी हे आपल्या सतत वाहणाऱ्या मनाचे प्रतिक आहे. (ओशो रजनिश मनाला ‘minding’ म्हणायचे. ) आपल्याच मनाचे निरीक्षण करावे.

2) नदीतील माती घ्यावी – आपल्याच मनातील काही बाबींचे निरीक्षण विशेषपणे करावे.

3) स्वच्छ जागेवर यायचं – जेथे मन शांत आणि स्तब्ध होण्यास मदत होते अशा ठिकाणी रहावे.

4) जास्तीचं पाणी सुकू द्यायचं – आपण अनेक नको त्या गोष्टींना (आग्रहांना, जाहिरातींना, सजावटींना) बऴी पडतो, अनेक गोष्टींची भुरळ पडते आणि मनामागे, इंद्रिये आणि आपल्या साऱ्या उर्जा धावतात, त्यांची धाव कमी करण्याचा प्रयत्न करायचा.

5) मातीतला कचरा, कुडा बाजूला करायचा – हे सार करताना आपल्यातील दुर्गुणांची ओळख पटू लागली की त्यांना लगेच दूर करण्याचा प्रयत्न करायचा.

6) त्या मातीतून गणपतीची मूर्ती बनवायची – आपल्यातील दुर्गुण (मत्सर, द्वेष, दुर्वासना, पूर्वग्रह, अज्ञान) आणि प्रवाहीपण नाहीसे झाल्यावरच स्वत:तील उत्तम गुणांचा विकास होतो.

 …. आता गणपतीच का? (माझाच जुना प्रश्न) – लंबोदर – अत्युच्च सहनशक्तीचे प्रतिक (so do Happy man) लांब नाक, मोठे डोळे, मोठे कान – ज्ञानेंद्रियांच्या (समजशक्तीच्या) अत्युच्च विकासाचे प्रतीक. ज्यांची सर्व प्रकारची सहनशक्ती व इंद्रियशक्तींचा विकास झाला तरच आपल्यातील गुणांचा पूर्ण विकास होतो आणि आपणच देवांप्रमाणे लोकांकरता आदरणीय व पूजनीय ठरतो.

7) तिथेच उपलब्ध फुले, दुर्वा, अक्षता, हळद-कुंकू वाहून पूजा करायची – आपल्यातीलच नव्हे तर अन्य वस्तूतील उत्तम गुणांची आपल्या व्यक्तीमत्वाला जोड द्यायची, किंवा असेही म्हणता येईल की आपल्याला लाभलेल्या साधनांचा आदराने वापर करायचा.

8) उपलब्ध वेळेनुसार आरती, स्तोत्र, जप, ध्यान करणे – एकदा विशिष्ट स्थान निर्माण केल्यावर, त्या स्थानावर टिकून राहण्याकरता तप करावे लागते. (रामकृष्ण परमहंस याबाबतीत फार आग्रही होते.) स्तोत्र, जप, ध्यानाद्वारे स्वत:लाच परत परत उत्तम गुणांची आठवण करून द्यावी लागते.

9) त्या मूर्तीचे नदीत विसर्जन करायचे – आपल्यातल्या विकासामुळे हुरळून न जाता, आपल्या मर्यादा आणि अन्य सर्वच जीव आणि अजीवांचे भान ठेवायचे

10) आणि घरी यायचे — हे सारे करताना आपले नित्यकर्म सोडायचे नाही.

जगातील अगणित देवतांची अशीच उपासना करता येईल असे मला वाटते.

मला अशी उपासना आवडते, पहा ! तुम्हाला आवडते का ?

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १३ — क्षेत्रक्षेत्रज्ञ योग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १३ — क्षेत्रक्षेत्रज्ञ योग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

*

अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् ।

एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा ॥ ११ ॥

*

अध्यात्मज्ञान नित्य तत्वज्ञान परिशीलन

गुण हे ज्ञान अन्य विपरित ज्ञान केवळ अज्ञान ॥११॥

*

ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वाऽमृतमश्नुते ।

अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते ॥ १२ ॥

*

अनादि सत्असत् ना सर्वश्रेष्ठ ब्रह्म ज्ञेय 

कथितो तुजला मोक्षदायी हे अमृत ज्ञेय ॥१२॥

*

सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोऽक्षिशिरोमुखम् ।

सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ॥ १३ ॥

*

सर्वत्र तया हस्तपाद नेत्र शिरे आनन

कर्णही सर्व बाजूंनी सर्वांसी व्यापून ॥१३॥

*

सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् ।

असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ॥ १४ ॥

*

भास सर्व इंद्रियांचा गात्र तया नसून

असक्त सकलांपासून भूत धारणपोषण

भासती सर्व गुण परी ते सर्वस्वी निर्गुण

समग्र गुणांचे ते भोक्ते असूनिया निर्गुण ॥१४॥

*

बहिरन्तरश्च भूतानामचरं चरमेव च ।

सूक्ष्मत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ॥ १५ ॥

*

सर्वभूतांतरी बाहेरी चल तसेची ते अचल

सूक्ष्म जाणण्यासि दूर परी भासते जवळ ॥१५॥

*

अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् ।

भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥ १६ ॥

*

ब्रह्म असूनी अखंड भासते सर्वभूतात विभक्त 

भूतधारकपोषक नाशक तथा तेचि जन्मद ॥१६॥

*

ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ।

ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य धिष्ठितम् ॥ १७ ॥

*

ब्रह्म हे तेजांचे तेज तमाच्याही सीमेपार

हृदयात ज्ञानरूप ज्ञेयरूप ज्ञाने उमगणार ॥१७॥

*

इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः ।

मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते ॥ १८ ॥

*

ऐसे आहे संक्षिप्ताने ज्ञान तथा ज्ञेय

ज्ञानाने या मम भक्त मम स्वरूपी होय ॥१८॥

*

प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादि उभावपि ।

विकारांश्र्च गुणांश्र्चैव विद्धि प्रकृतिसंभवान् ॥ १९ ॥

*

प्रकृती पुरुष उभयता तया अनादि जाण

विकारास तथा गुणास प्रकृती असे कारण ॥१९॥

*

कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ।

पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते ॥ २० ॥

*

कार्य-कारण-कर्तृत्वास मूळ प्रकृती कारण

भोगांस सुखदुःखांच्या मूळ पुरुष कारण ॥२०॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ देवाचं देणं… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ देवाचं देणं… ☆ श्री सुनील शिरवाडकर

तो एक लेखक होता. मराठी कादंबरीकार. १९७० ते १९९० हा त्याचा लेखनकाल. या काळात त्याने साधारण हजार कादंबऱ्या लिहिल्या. त्याचा खप अक्षरशः तडाखेबंद होता. ‘अश्लील कादंबरीकार ‘ म्हणुनच त्याची ओळख होती. पण त्याने कधी पर्वा केली नाही.

जन्म सांगलीचा. सुरुवातीच्या काळात त्याने काही मासिकं काढली. नट नट्यांची लफडी.. आणि त्याला साजेशी चित्रे असं त्यांचं स्वरुप असायचं. मासिकाची नावही तशीच.. राणी.. प्यारी.. मस्ती अशी.

ही माहिती तो कुठुन गोळा करायचा ते कधीच समजलं नाही. मासिकांवर त्याने टाकलेले पत्ते नेहमी खोटेच असायचे. तो नेमका कुठं रहातो.. अंक कुठून प्रकाशित करतो.. प्रिंट कुठून करतो हे कधीच समजायचं नाही.

पण त्यांची विक्री अफाट होती‌. महाराष्टातील सगळीच रेल्वे स्टेशन.. बस स्टॅण्ड.. आणि गावागावांत असलेले विक्रेते एजंट अंकाची आतुरतेने वाट पहात. आलेले अंक हातोहात खपत. कधी दुप्पट तिप्पट किमतीतही ती विकली जात.

काही काळ हा उद्योग चालला.. आणि मग बंदही पडला. मग त्यानं कादंबरी लेखन सुरू केलं. त्याच्या कादंबऱ्या म्हणजे रहस्यकथा असत. त्या नावाखाली पानोपानी कामुक वर्णने.. जोडीला खुन. दरोडे.. बदले हा मसाला.

त्याच्या लेखनाचा झपाटा विलक्षण होता. महीन्यात २०-२५ कादंबऱ्या सहजपणे तो लिहून काढायचा.

एक बाहेरगावचा प्रकाशक त्याच्याकडं आला होता…. कबुल करुनही अजुन का कादंबरी लिहीली नाही म्हणून जाब विचारण्यासाठी.

त्याने मग स्वतःला खोलीत कोंडुन घेतलं. दुपारपासुन तर रात्रीपर्यंत अखंड लेखन करुन कादंबरी त्या प्रकाशकांच्या हातात ठेवली.

याच काळात आशु रावजी.. दिनु कानडे या नावांनी लिहिलेल्या अश्लील कादंबऱ्या पण वाचकांमध्ये गाजत होत्या. हे दोन लेखक कोण हे कधीच समजलं नाही. पण बऱ्याच जणांच्या मते ह्या कादंबऱ्या तोच टोपण नावाने लिहीत होता.

त्यानं लेखन सहायक म्हणुन सुंदर मुलींचा तांडाच ठेवला होता. पुण्यात आल्यावर त्याला भेटायला गर्दी लोटे.

सुहास शिरवळकर एकदा त्याला भेटायला गेले होते. तो पुण्यात एका आलिशान हॉटेलमध्ये उतरला होता. त्याला भेटायला आलेल्या प्रकाशकांची गर्दी.. त्याच्या सेवेत असलेल्या सुंदर ललना.. आणि मद्याचा महापूर हे सगळं बघुन ते चकीतच झाले. ‘सु. शि. ‘सांगतात… या माणसाकडे पाहील्यावर एक गोष्ट लक्षात आली. या माणसानं आयुष्य खुप ‘उपभोगुन’ घेतलं आहे.

या अश्या लिखाणामुळे त्याच्या मागे कोर्ट कचेरी खटले मागे लागले. एक वेळ तर अशी होती की ऐंशी खटले त्यांच्यावर दाखल झाले होते.. मग त्यानं एक कायमस्वरूपी वकील पगारावर ठेवला.

जितका पैसा त्यानं मिळवला.. तो सगळा दारु.. स्त्रिया.. कोर्ट.. आणि पोलिसांची सरबराई यात घालवला. ऐषोरामी जीवन. ‌विलासी जगणं यात आलेली कमाई उधळली.

सुभाष शहा हे या लेखकांचं नाव. त्यांची पुस्तक वाचणं.. अगदी उघडपणे बाळगणं हेही अप्रतिष्ठतेचं.. अभिरुचीहिनतेचं लक्षण मानलं जातं होतं. तरीदेखील लपुन छपुन सगळेचं जण सुभाष शहांच्या पुस्तकांकडे आकर्षित होत असत.

पण या सगळ्याला उतरती कळा लागणं नैसर्गिक होतं. काळ बदलला.. लोकांच्या आवडी बदलल्या.. करमणुकीची साधनं बदलली.. त्यांच्या पुस्तकांचा खप खाली आला. दारु.. व्यसनं करता करता पैसा संपत गेला. शरीर पोखरत गेलं. देवानं सुभाष शहांना अपार प्रतिभा बहाल केली होती. लेखन शैली असुनही त्यांनी ती चुकीच्या कामांसाठी वापरली. त्यांना कधी मानसन्मान मिळालेच नाही. स्वत:च्याच अश्या सवयींमुळे एक उमदा लेखक संपून गेला.

या पार्श्वभूमीवर आठवतात लेखक रवींद्र पिंगे.. आणि त्यांचे विचार. ते म्हणतात..

“पन्नास वर्षे मी जीव लावून गोमटं आणि घाटबध्द लेखन केलं. दैवानं जे काही आणि जेवढं आपल्या ओंजळीत टाकलं, तेवढंच आपलं असतं. अधिकासाठी जीव पाखडायचा नाही. माझं मन नेहमीच वखवखशुन्य असतं. जे सुखदुःख मिळालं ते भोगलं.. तक्रार नाही. माझी ठाम श्रद्धा आहे की..

… माणसानं दिलेलं पुरत नाही..

आणि..

देवानं दिलेलं सरत नाही.

पोएट बोरकरांच्या भाषेतच सांगायचं तर..

.. वळुन पाहता मागे..

.. घडले तेच पसंत

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महर्षि बालखिल्य… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ महर्षि बालखिल्य… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

महर्षी बालखिल्य हे महर्षी कृतु आणि सन्नीता यांचे पुत्र. प्रजोत्पादनासाठी आणि तपस्या करण्यासाठी महर्षी कृतु यांनी आपल्या केसांपासून त्यांना निर्माण केले. ते साठ हजार होते. त्यांचा आकार अंगठ्या इतका लहान होता. ते सूर्याचे उपासक होते. ते सूर्य लोकात रहात. पक्षांप्रमाणे एक एक दाणा वेचून ते आपला उदरनिर्वाह करत असत. ते सदैव सूर्याकडे तोंड करून फिरत असत. त्यांच्या तपस्येचे तेज सूर्याला मिळत असे. ते सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट रेडियमच्या तीव्रतेपासून जगाचे संरक्षण करीत असत.

बालखिल्य हा दैवी ऋषींचा समूह आहे. ते शरीराने लहान पण तपस्वी म्हणून महान आहेत.

एकदा महर्षी कश्यप यांनी यज्ञ करण्याचे ठरवले. त्यांनी कृतु ऋषींना सांगितले तुम्ही माझ्या यज्ञात ब्रह्माचे स्थान ग्रहण करा व आपल्या सर्व पुत्रांना घेऊन या. महर्षी कृतुंनी आमंत्रण स्वीकारले. देवराज इंद्रही त्या ठिकाणी होते. महर्षी कश्यप यांनी सर्वांना यज्ञासाठी समिधा आणण्यास सांगितले. इंद्राने खूप समिधा आणल्या. पण बालखिल्य थोड्याच समिधा आणू शकले. इंद्राने चेष्टा केली. विचारले, हे वीतभर लाकूड घेऊन कशाला आलात? हा यज्ञ तुमच्या आकाराप्रमाणे छोटा असेल असे तुम्हाला वाटले का? बालखिल्ल्यांना उपहास समजला. तरीही कश्यप ऋषींसाठी शांत राहून ते म्हणाले, “आम्ही यज्ञासाठी समिधा आणल्या आहेत. त्यांच्या आकाराकडे न पाहता आमचा समर्पण भाव पहा. ” इंद्र म्हणाला, “ तुम्ही देवराज इंद्राशी बोलत आहात लक्षात आहे का? “ 

बालखिल्यांना खूप राग आला. इंद्राला धडा शिकवण्यासाठी ते म्हणाले, “ तुला इंद्रपदाचा गर्व आहे‌ म्हणून आम्ही संकल्प करतो की आम्ही आमच्या योगबलाने तुमच्यापेक्षा कैक पटीने शक्तिशाली, बुद्धिमान आणि सद्गुणी इंद्र निर्माण करू. ” इंद्र घाबरून कश्यपांकडे गेला. कश्यपांनी बालखिल्यांची समजूत घातली व सांगितले, “ जगात इंद्र एकच असणार तेव्हा त्याला क्षमा करा. ” बालखिल्यांना आपला संकल्प परत घेणे कठीण होते. ते म्हणाले, “ आम्ही संकल्प परत घेऊ शकत नाही. पण बदल करू शकतो. तुम्ही पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत आहात. तुमचा पुत्र अतिशय पराक्रमी, शक्तिशाली असा प्राणी असेल जो पक्षांचा इंद्र होईल. आमचा संकल्पही पूर्ण होईल आणि इंद्र पदाचे महत्व ही कमी होणार नाही. ” 

कश्यपांची पत्नी विनता हिने गरुडाला जन्म दिला आणि गरुड भगवान विष्णूचे वाहन बनले. तसेच त्याला पक्षांचे इंद्र असे नाव पडले.

त्यांनी बालखिल्य संहिता रचली. ते केदारखंडमध्ये तपस्या करीत होते. तिथे एक नदी आहे तिचे नाव बालगंगा.

ऋग्वेदाच्या आठव्या मंडलाच्या शेवटी एक परिशिष्ट आहे. त्याला बालखिल्यसूक्त असे म्हणतात.

एकदा गरुडाला खूप भूक लागली. त्याने वडिलांना विचारले, ‘ मी काय खाऊ?’ तेव्हा ते म्हणाले, “समुद्रात एक मोठे कासव आहे आणि वनामध्ये एक महाभयंकर हत्ती आहे. दोघेही खूप क्रूर आहेत. तू त्यांना खा. ” गरुडाने दोघांना पकडले व तो सोमगिरी पर्वतावर गेला. तिथे एका उंच वृक्षावर काही ऋषी उलटे लटकून तपस्या करत होते. गरुड त्याच फांदीवर बसला. त्याच्या वजनाने ती फांदी तुटू लागली. गरुडाने आपल्या चोचीत ती फांदी पकडली आणि कश्यप ऋषींकडे आला. कश्यप ऋषी म्हणाले, “ हे बालखिल्य ऋषी आहेत. त्यांना त्रास दिलास तर ते शाप देऊन तुला भस्म करतील. ” गरुडाला वाचवण्यासाठी त्यांनी बालखिल्य ऋषींना प्रार्थना केली की ‘ तुम्ही फांदीवरून खाली या. ’ बालकिल्ल्यांनी कश्यपांची प्रार्थना ऐकली. ते खाली आले आणि हिमालयात तपस्या करण्यासाठी निघून गेले.

असे हे आकाराने लहान पण कर्तृत्वाने महान असे तपस्वी बालखिल्य ऋषी. त्यांना कोटी कोटी प्रणाम.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares