मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सातवी माळ) – देणारे हात … ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सातवी माळ) – देणारे हात … ☆ श्री संभाजी बबन गायके 

मी बाई ! माझं नावच बाई. बाईचं नाव बाईच ठेवायचं आईबापाला का बरं सुचलं असावं हे काही सांगता यायचं नाही मला. लग्न झालं तेव्हा तशी लहानच होते मी म्हणायचं. कारण काहीही समजत नव्हतं संसारातलं. पण ‘ संसार काय आपोआप होतच राहतो… परमार्थ करावा लागतो‘.. असं आई म्हणायची. 

तसे मला दोन आईबाप. एक जन्म दिलेले आणि दुसरे पंढरीतले. सासरची शेती रग्गड आणि ती कसायला माणसं कमी पडायची. घामाच्या धारांनी शिवारं पिकायची..  पण माझं पोटपाणी पिकलंच नाही…पदरी एक तरी लेकरू घालायला पाहिजे होतं विठुरायानं. पण त्याच्या मनातलं जिथं रखुमाईला ओळखता येत नाही तिथं माझं म्हणजे ..  पायीची वहाण पायी बरी अशातली गत. तक्रार नव्हती आणि मालकांनी सवत आणली तिचा दु:स्वासही नाही. देवाच्या दोन्ही भार्यांची एकमेकींत धुसफूस होत असेलही, मात्र आम्ही एका जीवाने राहिलो. पण दैवाने मालकांना भररस्त्यातून माघारी बोलावलं आणि आमच्या दोघींच्याही कपाळांवरचे सूर्य मावळून गेले. जमलं तसं रेटलं आयुष्य. राहता वाडा ऐसपैस होता आणि माझ्यासाठी वाडयातल्या आतल्या खोल्या पक्क्या करायचं हाती घेतलं होतं. पण ते राहून गेलं आणि आता तर मला त्यात काही राम वाटत नाही. विठ्ठलच नाही राऊळात तर ते राऊळ सजवायचं तरी कशाला?

सवयीने शेतात जात राहिले, धान्य घरात येऊन पडत राहिलं. पण या सर्वांत लक्ष कुठं लागतंय. ‘ देव भक्तालागी करू न दे संसार ‘असं तुकोबारायांनी म्हणून ठेवलं आहेच. त्यांना तरी कुठं नीट रमू दिलं होतं त्यानं. इथं तर माझा तुकोबा वैकुंठाला निघून गेला होता आणि कुणासाठी कमवायचं, कुणासाठी स्थावर जंगम माघारी ठेवून जायचं हा प्रश्न होताच. भाकरीच्या दुरडीतली जास्तीची भाकरी देतोच की आपण, मग ही जास्तीची कमाई आपला जीव आहे तोवर ज्याची त्याला दिलेली काय वाईट? पण द्यायची तरी कुणाला आणि का म्हणून? लोक देवाकडं धाव घेतात. देवाशिवाय माणसांनी दुसरीकडं कुठं जाऊच नये, असं मला सारखं वाटत राहतं. देवाला द्यायचं म्हणते खरं मी, पण देवाला कुठं कशाची कमी असते. देवस्थानं म्हणजे दवाखानेच की जणू. शरीराला बरं करणारे दवाखाने पुष्कळ असतील आणि असायला पाहिजेत. पण मनालाही बरं करायलाच पाहिजे की. म्हणून मी ठरवलं .. जमतील त्या देवस्थानांना काही न काही द्यायचं.  आधी धान्य पाठवून देत होते. अक्कलकोटच्या स्वामी महाराजांच्या प्रसादासाठी लाखो लोक येतात कुठून कुठून. प्रसादाच्या स्वयंपाकाला आणखीन चांगली भांडी पाहिजेतच की…दिली मला जमली तेव्हढी. द्यायला लागले तसं देण्याची सवय वाढायला लागली. मंदीरांचे कळस झाले, रंगरंगोटी झाली, बांधकामं झाली, ती मी दिलेल्या खारीच्या वाटयातून झालेली या डोळ्यांनी पाहिली. 

वय झालंय आता…देहाचा भरवसा नाही. कधी जाईल काही नेम नाही. सवतीच्या वाटचं तिचं तिला मिळालेलं आहेच की. तिचं गणगोत आहे, त्यांची ती कष्ट करून खाताहेत…..त्यांचा त्यांना संसार आहेच.  माझ्या माघारी माझं उरेल त्यावरून कुणी तंडायला नको. म्हणून गंगेतून भरून घेतलेली ओंजळ, तहान भागल्यावर उरलेलं तीर्थ इकडं तिकडं शिंपडून न टाकता परत गंगामायला अर्पण केलेलं काय वाईट? आता माझा पैसा…माझ्या मालकानं माझ्यासाठी मागे ठेवलेला मला देवाला द्यावासा वाटतो त्यात कुणाचं काय जातं? 

एकटीच्या पोटाला लागतीय तेवढी जमीन हातात ठेवली आणि बाकीची देऊन टाकली. पैशांतलं काही कळत नाही. पण नातू आहेत चांगले..कागदाची कामं करून देतात. नाहीतर एवढे लाखा-लाखाचे व्यवहार मला अंगठा बहादरणीला कसं जमलं असतं,तुम्हीच सांगा ! 

मी म्हणलं…मला माझ्या बापाला सोन्याचा करदोडा घालायचाय….आईला मंगळसूत्र घालायचंय. बाप म्हणजे विठोबा आणि आई म्हणजे रखुमाई माझी. होऊन गेलं हातून…हिशेब अठरा लाखावर गेलाय म्हणतात. कुणी म्हणतंय आजवर पन्नास लाख गेले असतील म्हातारीच्या हातून. जाईनात का ! 

हे फेसबुक का काय म्हणतात,त्यामुळे मी माहिती झाले सर्वांना. तशी खरं तर गरज नव्हती. देवानं मला एवढं भरभरून दिलं तेव्हा कुठं सर्वांना तो सांगत सुटला? लोकांना माहित नव्हतं तेच बरं होतं. कुणी म्हणतं या पैशांतून दुसरं बरंच काहीबाही करता आलं असतं. लाख तोंडं आणि त्यांची मतं. पण मी म्हणते माझ्या बुद्धीनुसार मला वाटलं ते मी केलं .. आणि आणिक करणार आहेच शेवटपर्यंत. मला काळ्या दगडातला विठोबा सगुण साकार वाटतो, त्याच काळ्या दगडातली गोरी रखुमाई आवडते…त्यांना सजवायला नको? मी काही कुठं बाहेर देवाला जात नाही…पण दुस-या मुलखातल्या देवांची श्रीमंती ऐकून आहे की मी. होऊ द्या की आपलेही देव ऐश्वर्यवान…अहो, पंढरीश…पंढरीचा राजाच आहे नव्हे का? राजासारखाच दिसला पाहिजे माझा बाप. 

आता देवस्थानांनी भक्तांसाठी काय काय करायचं हे सांगायला जाणती माणसं आहेतच की जागोजाग.  त्यांनी सांगावं आणि देवस्थानांनी ऐकावं म्हणजे झालं. माझ्यासारख्या अडाणी बाईचा हा अडाणी विचार. .. मी माझं माझ्या देवाला देते आहे…तो तुम्हांलाही देईलच.

देवाच्या दयेने माझे हात देणारे आहेत…आणि माझ्या देवाच्या हातात झोळी नाही…मी त्याच्या चरणाशी वाहते ते त्यानेच माझ्या हवाली केलेलं….देणा-याने देत रहावे ! 

(बाई लिंबा वाघे….मराठवाड्यातल्या एका खेड्यातली शेतकरी वृद्धा…मनाने, विचाराने, वर्तनाने देवभक्त.  त्यांनी त्यांच्या पदरात असलेलं दान पुन्हा देवाच्या पायाशी ठेवलं. आपण त्यांना नमस्काराशिवाय काय देऊ शकतो. जुन्या पिढीच्या रक्तात अजूनही विठूचा अंश आहे…तो असाच कायम रहावा, देवस्थानांनी आणखी लोकाभिमुख व्हावं, अशी प्रार्थना त्या देवस्थानांच्या आराध्य देवतांकडे करूयात का? या नवरात्रात ही एक सातवी माळ अशी श्रीमंत ठरली.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता – अध्याय पहिला – ( श्लोक ४१ ते ४७) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग पहिला – ( श्लोक ४१ ते ४७) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।

स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः ৷৷४१৷৷

संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।

पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः৷৷४२৷৷

दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः ।

उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः৷৷४३৷৷

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।

नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ৷৷४४৷৷

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम्‌ ।

यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ৷৷४५৷৷

यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।

धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्‌ ৷৷४६৷৷

संजय उवाच

एवमुक्त्वार्जुनः सङ्‍ख्ये रथोपस्थ उपाविशत्‌ ।

विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ৷৷४७৷৷

मराठी भावानुवाद ::::  

कुलावरी वर्चस्व  अधर्म प्रदूषित कुलस्त्रिया 

वर्णसंकरा प्रसूत करती वाममार्गी त्या स्त्रिया ॥४१॥

वर्णसंकरे पिंडदान तर्पणादी खंड होत 

पितरादींची अधोगती नाश कुलाचा होत ॥४२॥

कुलघातक हा वर्णसंकर अतिघोर दोष

जातिधर्म कुलधर्मही जात पूर्ण लयास ॥४३॥

लुप्त जाहले कुलधर्म  नाही त्यासी  काही थारा

जनार्दना रे ऐकुन आहे नरकवास त्या खरा ॥४४॥

राज्यसुखाच्या मोहाने युद्धसिद्ध जाहलो

हाय घोर या पापाच्या मार्गाला  भुललो ॥४५॥

शस्त्र न धरी मी हाती काही करीन ना प्रतिकार 

मृत्यूला स्वीकारिन मी झेलुनिया कौरव वार ॥४६॥

कथित संजय 

छिन्नमने कथुनी ऐसे त्यजुनी तीरकमान

शकटावरती शोकमग्न तो  बसला अर्जुन ॥४७॥

– क्रमशः भाग पहिला 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सहावी माळ) – मुक्ता ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सहावी माळ) – मुक्ता ☆ श्री संभाजी बबन गायके 

धृतराष्ट्र आंधळा म्हणून गांधारीने उसनं आणि राजस अंधत्व मिरवलं, तसं मुक्ताबाईंना करून चालणार नव्हतं. लेकीने बापाच्या घरी रहायचं नसतं, ती परक्याची अमानत असते हे तिने लहानपणापासून ऐकलं होतंच. त्यामुळे तिच्या बालमैत्रिणींसारखं तिचंही लग्न ठरलं तेव्हा तिला वेगळं असं काही वाटलं नाही. मात्र लग्नात घरात खूप आनंदी वातावरण असतं याचा अनुभव तिने मोठया बहिणींच्या लग्नात घेतला होताच. त्या बहिणी माहेरी आल्यावर तिकडचं जे वर्णन करायच्या ते मुक्ताबाईच्याही कानांवर यायचंच. माहेरवाशिणी आणि आईचा संवाद म्हणजे ओल्या काळजांचं एकमेकांना दिलेलं मऊ आलिंगनच असतं जणू. सासरच्या गोष्टींचा भला मोठा भारा बांधून आणलेला असतो लेकीने, त्यातील एक एक काडी ती उलगडत राहते अगदी मध्यरात्रीपर्यंत. उबदार गोधडीत आईच्या मऊ हातांवर डोकं ठेऊन तिच्याशी हितगुज करण्यातलं सुख इतर कुणाच्याही वाट्याला येणार नाही. या संभाषणात आईला तिचं स्वत:चं माहेर आठवत असतं. ती वरवर हं हं म्हणत असते आणि लेकीच्या कपाळावरून उजवा फिरवत फिरवत तिला थोपटत असते, तिला एखादा कानमंत्रही देत असते आणि जिवलग मैत्रीण असल्यागत मधूनच फिदीफिदी हसतही असते. मुक्ता पलीकडच्या गोधडीत शिरलेली असली तरी तिचे कान जागे असायचे.

मुक्ताला लग्नात नवरा मुलगा तसा स्पष्ट दिसलाच नव्हता. मुक्ता ठेंगणीशी आणि तो तिच्यापेक्षा जवळजवळ दुपटीने उंच. भटजींनी अंतरपाट दूर केल्यावर तर लज्जेने त्याच्याकडे पाहणे झालेच नाही. हार घालतानाही थोडी नजर वर केली पण जुन्या जमान्यातल्या कागदी झिरमुळ्यांचं बाशिंग…नवरदेवाचं कपाळ मात्र उठून दिसलं. आणि तासाभरात व-हाडाच्या बैलगाड्या घुंगरं वाजवीत निघाल्या.

मुक्ता एकूणात तिसरी मुलगी. आधीच्याच लग्नातली आचा-याची, मांडववाल्याची देणी अजून बाकी होती.  त्यातच नात्यातल्या एकाने मुक्तासाठी त्याच्या दूरच्या नात्यातलं एक स्थळ सुचवलं. नवरदेवाच्या वडिलांचं नुकतंच निधन झालंय, वर्षात लग्न नाही केलं तर पुढे आणखी तीन वर्षे थांबावं लागेल, म्हणून त्यांना घाई आहे. खातंपितं शेतक-याचं घर आहे, मोठं खटलं आहे. मुक्ता संपादून जाईल त्या घरात. सांगणा-याने काही तपशील वगळून तर काही पदरचा घालून त्या स्थळाचं वर्णन केलं. आणि मुक्ताच्या वडिलांनी या स्थळामध्ये डोकं देण्याचं मनावर घेतलं. आणखी एक वावर विकलं तरी फारसं बिघडणार नव्हतं. कारण एकच लेक होता. मुक्ताच्या पाठीवर असलेल्या मुलाच्या लग्नात नाहीतरी सर्व वसुली करण्याची संधी मिळणार होतीच.

सकाळी सुपारी खेळण्याच्या वेळी मुक्ताने नव-याकडे पाहिलं आणि ती पहातच राहिली. नवरा मुलगा मात्र तिच्याकडे डोळे बारीक करून पहात हसतोय असं तिला वाटलं. तेवढ्यात मुक्ताला समोरच्या हळदी-कुंकवाच्या पाण्याने भरलेल्या ताटात अंगठी हाताला लागली. हा खेळ मुक्ता जिंकली होती….पण जिंकण्याचा आनंद तिला तसा झालाच नाही. महिपती नाव होतं नव-याचं. मैत्रिणींनी सांगून ठेवलेल्या उखाण्यांपैकी मुक्ताला एकही उखाणा आठवला नाही .. किंवा तिला आठवायचा नव्हता ! तिने कसाबसा एक साधा उखाणा घेतला. पण या उखाण्यात महिपतीरावांच्या नावाआधी आईवडिलांचा मान राखण्यासाठी मी हा विवाह केला आहे,असा आशय व्यक्त करायला ती विसरली नाही… ‘ चांदीच्या ताटात मोहरा आणि माणिक मोती…माहेरची लाज सारी लेकीच्या हाती…महिपतराव माझे शंकर आणि मी त्यांची पार्वती ! ‘

दुस-या दिवशी नव-यामुलीची पहिल्यांदा माहेरी पाठवणी झाली. रात्री आईच्या गोधडीत शिरलेल्या मुक्ताला तिला काहीही सांगावंसं वाटलं नाही. गोधडीतला अंधार तिला जास्त जवळचा वाटू लागला होता. दोन दिवसांनी मुक्ताला सासरी पाठवताना वडिलांनी मुक्ताला घट्ट जवळ घेतलं…पोरी महिपतराव डोळ्यांनी अधू आहेत…आंधळे नाहीत. देवभोळा साधा माणूस आहे. तू त्याचे डोळे हो ! मुक्ता बैलगाडीत बसली तेव्हा वडील हात हलवत होते..  पण त्यांचे पाण्याने भरलेले डोळे खाली पहात होते.

संसार सुरू झाला. पहिला मुलगा होईपर्यंत मुक्ताबाई आणि महिपतीरावांचा उघड संवाद झालाच नाही…त्याकाळी असं होणं अगदी सर्वमान्य होतं. जाऊबाईंना आपल्या अशा दीराला इतकी नीटस बायको मिळाली याचा आनंद कमी आणि हेवा अधिक वाटत होता. महिपतराव नजर अधू असूनही वाचणारे होते. कागदाला जवळजवळ पापण्यांचा स्पर्श होईल इतक्या जवळ त्यांना कागद धरावा लागायचा. पण वाचनाचा कंटाळा अजिबात नव्हता. मुक्ताबाईंनी माहेरी अभ्यासाचा कंटाळाच केला होता तसा. इथं महिपतराव मुक्ताबाईंची शाळा झाले.

महिपतरावांकडे शेतीतल्या काबाडकष्टांचा जणू मक्ताच दिला होता थोरल्याने. याचं काही लग्नं होणार नाही, त्यामुळे आपल्या मुलाला आपल्या माघारी मिळणार असलेल्या जमिनीत कुणी वाटेकरी नसणार हे तो गृहीत धरून चालला होता. सारा रोखीचा व्यवहार त्याच्याकडेच आणि घरातल्या किल्ल्यांचा जुडगा त्याच्या बायकोकडे.

मुक्ताबाई पुढे पुढे धीट झाल्या. व्यवहारात लक्ष घालू लागल्या. नवरा बैलगाडी घेऊन निघाला की कासरा आपल्या हाती धरू लागल्या…बैलगाडी गाववाल्यांच्या नजरेच्या टप्प्यापलीकडे गेल्यावर. महिपतरावांची नजर हळूहळू धूसर होत जाणार होती. दैवाने त्यांच्यासाठी मुक्ताबाईंचे दोन सुंदर, टपोरे डोळे पाठवून दिले होते. आणि आता तर हे डोळे अक्षरं वाचू लागले होते.

नावाचा महिमा असेल कदाचित, पण महिपतरावांच्या तशा तापट स्वभावावर त्यांनी प्रेमाने फुंकर घातली होती. आंधळा म्हणून हिणवणारा गाव, व्यवहारात फसवणारा थोरला भाऊ, यांच्याबद्द्ल असणारी नाराजी महिपतरावांच्या शब्दांतून आणि कधी कधी कृतीतूनही व्यक्त होई. पण मुक्ताबाईंनी त्या क्रोधाला संयमाची झालर लावून टाकली.

बापजाद्यांपासून चालत आलेल्या जमिनीच्या वादाच्या न्यायालयीन खटल्यांना कित्येक वर्षे लोटून गेली होती. निकाल काही लागत नव्हता. थोरले भाऊजी या बाबतीत तसे उदासीन होते. मुक्ताबाईंनी स्वयंपाकघरातून हळूहळू ओसरीवर प्रवेश मिळवला. कधी घरी सल्लामसलतीसाठी येणा-या वकिलांशी बोलण्याचं, त्यांना काही विचारण्याचं धाडस मिळवलं.

खटल्यातून यशस्वी माघार घेणं फायद्याचं आहे, असं सर्वांना पटवून दिलं. आणि वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या खटल्यातून सर्वांचीच सुटका केली. वाद तर चुलत घराशीच होता. ती मंडळीही मुक्ताची चाहती झाली. एकादशी, भजन करणारी, पहाटे उठून सडा रांगोळी घालणारी, तुळशीला पाणी घालणारी, जात्यावर दळण दळताना जनाबाई होणारी मुक्ता महिपतरावांच्या घराची लक्ष्मी झाली होती. मुक्ताबाईंना दोन मुलगे झाले. मुलगी हवी होती पण नाही पडली पदरात. मुलांची शिक्षणं व्यवस्थित होतील याकडे त्यांचं लक्ष असायचंच. थोरला शहरात नोकरीस लागला आणि धाकट्याने शेतीत लक्ष घातले. आता पैशांची कमतरता नव्हती. म्हणून गरजू आणि मुक्ताबाईंचं घर अशी जोडी ठरून गेली.

महिपतरावांची आई आणि मुक्ता जणू मैत्रिणीच बनल्या होत्या. म्हातारीची खूप सेवा केली मुक्ताबाईंनी. ‘माझ्या आंधळ्या लेकाचा संसार तुच कडेपतोर नेशील गं माझे बाये !’ असं म्हणून म्हातारी मुक्ताच्या गालांवरून हात फिरवायची आणि तिच्या स्वत:च्या डोक्याच्या उजव्या बाजूवर बोटं ठेवून कडाकडा मोडायची….हा आवाज मुक्ताला टाळ्यांच्या कडकडकटासारखा भासायचा. मुक्ताबाई माहेर तसं विसरूनच गेली होती.

महिपतरावांची दृष्टी आता जवळजवळ गेल्यातच जमा होती. अगदीच प्रयत्नांती त्यांना थोडंफार दिसायचं.  पण बाकी सर्व व्यवहार अंदाजेच. माळकरी असले तरी महिपतरावांना पंढरी काही घडली नव्हती. गावात होणाऱ्या कीर्तनांना, काकड्याला मात्र ते नियमित हजेरी लावत. अनेक अभंग त्यांना मुखोदगत होते. मुक्ताबाईंनाही त्यांनी विठूचा छंद लावला. सूरदास, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज यांची चरित्रे मुक्ताबाईंना खूप जवळची वाटली.

एके दिवशी पंढरीला जायचा हट्टच धरला मुक्ताबाईंनी महिपतरावांपाशी, आणि त्यांनी मुलांना सांगून तशी व्यवस्थाही करवून घेतली. देवापुढे उभी राहिली ही जोडी तेव्हा तेथील रखवालदारांनीही घाई केली नाही..मुक्ताई महिपतरावांना आपल्या डोळ्यांनी देव दाखवत राहिल्या…देवाचिये द्वारी क्षणभर उभं राहून. चारी मुक्ती त्या साधू शकणार नव्हत्या…पण पदरी पडलेलं त्यांनी पवित्र मात्र करून घेतलं होतं.

आज महिपतराव आणि मुक्ताबाई हयात नाहीत. पण प्राप्त परिस्थितीमध्ये जीवनाला सामोरे जाण्याची जिद्द दाखवणाऱ्या मुक्ताबाई स्त्रीशक्तीचं प्रतीकच बनून राहिल्या ..  किमान त्या गावात तरी. नवरात्रात अशा द्विभुज देवींची आठवण येते, यात नवल नाही.

परिस्थितीमुळे, गरीबीमुळे, परंपरांमुळे असे संसार स्वीकारावे लागणाऱ्या अनेक मुक्ताबाई आधीच्या पिढीने अनुभवल्या आहेत. त्या लढाऊ दुर्गांना या सहाव्या माळेच्या निमित्ताने नमस्कार.

(लेखातील नावे काल्पनिक आहेत. आयुष्य मात्र खरे.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (पाचवी माळ) – पंगत ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (पाचवी माळ) – पंगत ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

लग्नाच्या पंगतीत आज तिने केटरींगवाल्याच्या मागे लागून मसालेभात वाढण्याचं काम मिळवलं. एरव्ही कायम आचाऱ्यासमोर बसून भाज्या चिरून देण्याच्या, काकड्या खिसून देण्याच्या, पु-या लाटून देण्याच्या कामाला ती वैतागली होती. पंगतीत सुंदर सुंदर साड्या, दागदागिने घालून बसलेल्या आणि झकपक मेकअप करून बसलेल्या बायका -मुली तिला बघायच्या होत्या. झालंच तर नवरा-नवरीचं ताट वाढायला मिळालं तर चार दहा रुपये बक्षिसीही पदरात पडण्याची शक्यता होतीच. शिवाय वाढप्यांसाठी असणारा बऱ्यापैकी नीटनेटका ड्रेस घालण्याची संधी तर होतीच होती.

आचा-याच्या हाताखाली अल्पवयीन मुलांना काम करण्यास तसेही कायदा नाही म्हणतो. पण त्याचं हे नाही म्हणणं कुणाच्या कानांवर जात नाही सहसा. आणि भुकेच्या आवाजापुढे अन्य सर्व आवाज क्षीण पडतात. आपल्या ताटांमध्ये आलेले जिन्नस कुणाकुणाच्या कष्टांच्या निखाऱ्यांवरून आलेले आहेत, हे माहित करून घेण्याची गरज लक्षातही येणार नाही अशीच आहे. कुणी काही म्हटलंच तर ‘ ही लहान मुलगी त्या आज्जींची नात आहे, आज त्यांना बरं नाही म्हणून मदतीला आली आहे,’ असं सांगून वेळ मारून न्यायला केटरींगवाल्यांना जमतेच.

भांड्यांच्या टेम्पोत दाटीवाटीनं बसायचं, कामाच्या ठिकाणी जायचं आणि सगळी तयारी होण्याआधी आचा-याने घाईघाईने आणि काहीशा नाखुशीने बनवलेला सांबार भात भराभरा खाऊन मोकळं व्हायचं. आता सर्व उरकल्यावरच हातातोंडाची गाठ पडणार. त्यात निघताना प्रत्येकाचीच घाई. स्वयंपाकातील उरलेले पदार्थ खाऊन खाऊन त्यांचा कंटाळा आलेला असतो, पण घरी न्यावेच लागतात…घरात त्या अन्नाची वाट पाहणारी काही उपाशी पोटं असतात.

रोशनी आठवी इयत्तेत जाऊन शिकण्याचा प्रयत्न करते. चार सोसायट्यांमध्ये धुणी-भांडे करून घर चालवणारी आई आणि तीन भावंडं आहेत. रोशनी सर्वांत थोरली म्हणून तिची जबाबदारीसुद्धा थोरलीच. वडील वस्तीतील दुस-यांची मारामारी सोडवायला गेलेले असताना जीवाला मुकलेले. वस्तीतली झोपडी भाड्याने घेतलेली. भाडं थकलं की दुसरी झोपडी बघायला लागण्याच्या भीतीने, जे पैसे येतील ते भाड्याच्या रकमेसाठी बाजूला ठेवणं क्रमप्राप्तच होते. रोशनी केटरींगच्या कामाला जाते हे शाळेत तिने माहित होऊ दिले नव्हते. कामाच्या ठिकाणाहून रात्री आणलेले पदार्थ ती डब्याला घेऊन जात नसे. परंतु मेजवान्या रोज रोज थोड्याच असतात? आणि असल्या तरी त्या आपल्या कंत्राटदाराला मिळायला पाहिजेत, आणि कंत्राटदाराने आपल्याला कामाला नेलं तर पाहिजे !

चांगल्याचुंगल्या पदार्थांवरून मात्र रोशनीचं मन उडालं होतं. केटरिंगवाला उरलेले पदार्थ वाढप्यांत वाटून द्यायचा. खास चवदार बनवलेलं, भरपूर तेल-तूप, मसाला घातलेलं ..  ते रोशनीच्या घरी एरव्ही येण्याचा प्रश्नच नव्हता. आणि हे अन्न नेहमी नेहमी घरी नेलं तर घरच्यांना त्याची सवय लागेल आणि नेहमीच्या खाण्याकडे वाकड्या तोंडाने बघितलं जाईल, हे रोशनीला माहित होतं. त्यामुळे ती सहसा उरलेलं अन्न घरी घेऊन जायचीच नाही. कधीकधी चार गुलाबजाम, जिलेबी असं काहीबाही मात्र न्यायची..  इतर वाढप्यांनी फारच आग्रह केला तर.

रोशनीला हे काम आवडायचं नाही मनातून. लोकांनी जेवून ठेवलेली ताटं, त्यांच्या नटून थटून आलेल्या, हास्यकल्लोळ सुरू असलेल्या गर्दीतून घेऊन जायची, खरकट्या वाट्या, चमचे ड्रमातून वेचून काढायच्या आणि धुवायला बसायचं हे नको वाटायचं. शिवाय गर्दीतल्या कुणाकडे चोरट्या नजरेने पाहून घ्यायचं. कुणाला धक्का लागता कामा नये. पंगतीत एखादी शाळेतली भेटली म्हणजे? पोटात गोळा यायचा. पण रिकाम्या पोटात आलेला गोळाही भुकेला असायचा.

“ रोशनी, अगं चाल पटापट पुढं. ही आख्खी लाईन वाढून व्हायचीय अजून.”  असं केटरींगवाल्यानं टाळी वाजवून म्हणताच रोशनीने हातातील मसालाभाताचं भांडं एका हातावर पेलत पेलत काळजीपूर्वक वाढायला सुरुवात केली. सवय नव्हती…वेळ लागत होता…वाढून न झालेल्या पानांवर बसलेली मंडळी हात आखडून घेऊन बसली होती. ‘वदनी कवळ घेता‘ म्हणायची प्रतीक्षा करणारी अनुभवी मंडळी…’आवरा लवकर’ म्हणत रोशनीच्या वेगात आणखीनच व्यत्यय आणत होती.

निम्मी पंगत वाढून झाल्यावर का कुणास ठाऊक रोशनी थबकली. तिने भाताचं भांडं टेबलावरच ठेवलं आणि दुस-या वाढप्याला नजरेनेच इशारा केला आणि ती मागच्या मागे आचा-याच्या खोलीकडे जवळजवळ पळतच गेली. त्याने विचारले…” काय गं? काय झालं? “ त्यावर रोशनी म्हणाली, “ काय नाही…हात भाजायला लागला गरम भातानं.”  त्यावर तो म्हणाला…” तुला तर मोठी हौसच नाही का वाढपी व्हायची. एवढासा जीव तुझा…चालली वाढायला !”

आणखी काही पंगती झाल्या. लोक हात धुवायला नळापाशी गेले. नवरा-नवरीची पानंही वाढून झाली. त्यांच्या पानांभोवती फुलांची सजावट. त्यांना वाढणा-यांना नवरीमुलीकडच्या लोकांनी खुशीने काही रुपये दिले. रोशनीला मिळू शकले असते त्यातले काही, पण ती तिथं नव्हती. मेजवानी आटोपायच्या शेवटच्या टप्प्यात वाढपे, आचारी, त्यांच्या सोबतच्या माणसांची पंगत हॉलमधल्या अगदी कोप-यातल्या साध्या टेबलवर बसली. रोशनीचं लक्ष काही जेवणात लागणार नव्हतं. त्यांच्यातलाच एक जण सर्वांना जेवण वाढत होता. तितक्यात किचनमधून मसालेभाताचं पातेलं घेऊन मिरजकर बाई आल्या आणि त्यांनी पहिल्यांदा रोशनीला भात वाढला. बाईंना बघून रोशनी गडबडून गेली. बाईंनी इतरांनाही भात वाढला आणि त्या बाहेर जाऊन थांबल्या. केटररसाठी ही गोष्ट नवी होती…लग्नघरच्या मंडळींपैकीच कुणी तरी मोठ्या मनाच्या बाई असाव्यात, असं सर्वांना वाटून गेलं. रोशनीनं पटापटा चार घास गिळले आणि ती लगबगीनं बाई जिथं बसल्या होत्या तिथे त्यांच्यापाशी जाऊन उभी राहिली.

“ कामाची कसली लाज बाळगायची, रोशनी? तू मला पंगतीत बसलेले पाहूनच मागे फिरलीस ना? ” बाईंच्या या प्रश्नावर, एरव्ही वर्गात पटापट उत्तरे सांगणारी रोशनी आता मात्र शांत आणि मान खाली घालून उभी होती. तिच्या मागोमाग केटरींगवाला आला…म्हणू लागला…” काही चुकलं असंल मॅडम तर सॉरी म्हणतो. पुन्हा नाही मी लहान पोरींना कामावर लावणार !”

“अहो, तसं काही नाही हो दादा. ही रोशनी माझ्या वर्गात आहे. उलट मी तिचं कौतुकच करायला तिला बाजूला घेऊन आलीये. तुम्ही जा तुमच्या कामाला ! “ त्या दोघींकडे एकवार कटाक्ष टाकून तो बिचारा निघाला.

“ रोशनी, ठीक आहे. तुझी घरची परिस्थिती अशी आहे की तुला कोणतं न कोणतं काम हे करायलाच लागेल. तुला आवडत नसलं तरी. पण मग मिळालेलं काम आवडून घेतलंस तर सोपं होऊन जाईल, नाही का? ”

“ हो,मॅडम. स्वयंपाक करायला आवडतं मला. वेगवेगळ्या रेसिपी बनवून बघायला मज्जा येते. माझे पोहे, उपीट सगळ्यांनाच आवडतं ” रोशनी उत्तरली.

“ हो तर, स्वयंपाक तर आलाच पाहिजे प्रत्येकाला !” बाईंच्या या बोलण्यावर रोशनी गोड हसली.

“ पण हे असं वाढप्याचं काम किती दिवस करणार आहेस गं तू?” या प्रश्नावर मात्र ती गडबडून गेली.

“ माहित नाही बाई. पण शिक्षण पूर्ण होईपर्यंत तर करावंच लागेल !”तिने सांगितले.

बाई म्हणाल्या, ” हे बघ, आवडीच्या क्षेत्रात करीअर करायच्या खूप संधी आहेत आजकाल. तू केटरींगमध्ये जरी नीट लक्ष घातलंस ना तरी खूप चांगले पैसे मिळवू शकशील. पण आधी शिक्षण नीट पूर्ण कर बाई !” 

बाईंनी तास सुरू केला. त्या नेहमीच मुलींना भविष्याची स्वप्नं दाखवयच्या. त्या स्वत:सुद्धा गरीबीतून शिकल्या होत्या. त्यांच्या आई खानावळ चालवायच्या. त्यांनाही केटरिंगमध्ये गोडी होती. हॉटेल मॅनेजमेंट करायचं असं त्यांनाही शाळेत असताना कधीतरी वाटून गेलं होतं.

रोशनी दुस-या दिवशी शाळेत उशीराच पोहोचली, रात्री सर्व आवराआवरी करायला बराच उशीर झाला होता. “ मधल्या सुट्टीत मला स्टाफ रूममध्ये येऊन भेट,रोशनी !” मिरजकर बाईंनी रोशनीला असं म्हटल्यावर वर्गातल्या पोरींना वाटलं की आता रोशनीचं काही खरं नाही.

रोशनी मधल्या सुट्टीत स्टाफ रूमबाहेर घुटमळली आणि ते पाहून मिरजकर बाईच बाहेर आल्या आणि “ चल,हेडबाईंकडे !” म्हणत पुढे चालू लागल्या. ‘ आता हे काय वाढून ठेवलं असेल आपल्या पानात ‘ या विचाराने रोशनी हळूहळू हेडबाईंच्या खोलीकडे चालू लागली.

“ बाई,ही रोशनी माझ्या वर्गातली. हाताला खूप चव आहे हिच्या. आपल्या बारीक सारीक कार्यक्रमाचं केटरींग आपण हिला देऊयात का? ” मिरजकर बाई आणि हेडबाई यांच्यात यावर काही बोलणं झालं. त्यानंतर शाळेतल्या छोट्या समारंभांवेळी लागणारे खाद्यपदार्थ आणि रोशनी असं समीकरण होऊन गेलं. आणि मोठ्या जेवणाचं काम रोशनी ज्याच्याकडे कामाला जाते त्याच केटररला मिळालं…रोशनी आता त्याची मॅनेजर होती. मिरजकरबाईंच्या नातेवाईकांच्या घरच्या स्वयंपाकांची कामेही रोशनीला दिली जाऊ लागली.

हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी काय करायचं आणि कसं करायचं याची मिरजकर बाईंना माहिती होतीच.

……. 

आज रोशनीचं लग्न. सेवानिवृत्त झालेल्या मिरजकर बाईंना खास आणि आग्रहाचं आमंत्रण होतंच. त्याही त्यांच्या यजमानांना घेऊन गावावरून लग्नाला आल्या. जेवणाचा मोठा थाट होता. कधीकाळी त्याच्याकडे वाढपी म्हणून असलेल्या रोशनीच्या लग्नात केटररने स्वत:हून सर्व व्यवस्था केली होती. रोशनीचा स्वत:चा केटरींगचा छोटासा व्यवसाय सुरू होऊन बरीच वर्षे उलटून गेली होती…व्यवसाय प्रगतीपथावर होता. तिच्याकडे अनेक रोशनी काम करीत होत्या आणि रोशनी त्यांना कायम वाढपी राहू देणार नव्हती.

तिचे अनेक ग्राहक आज तिच्या लग्नातले खास आमंत्रित होते. तिच्या हॉटेल मॅनेजमेंटचा काही स्टाफही होता. मिरजकर बाई आणि त्यांचे यजमान पंगतीत बसले. वाढप सुरू झालं. मिरजकर बाई यजमानांशी बोलण्यात मग्न होत्या. त्यांच्या पानात मसालेभात वाढणारा हात त्यांना दिसला…मेहंदी लावलेला…हिरवा चुडा भरलेला…बोटात अंगठी असलेला ! रोशनी होती मसालेभाताचं भांडं हातात घेऊन, आणि सोबत तिचा नवरा !

“बाई, मागच्या वेळी वाढायचा राहून गेलेला मसालेभात आता वाढलाय !” 

कुणीतरी वदनी कवळ घेताचा गजर केला आणि मिरजकर बाईंनी आपल्या पानातील मसालेभाताचा एक छोटा घास रोशनीला भरवला !…… 

(नवरात्रीत अशा लढाऊ महिलांच्या कर्तृत्वाचं स्मरण म्हणून ही लेखमाला. यातील ही पाचवी माळ )

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भक्तीचे कर्ज — एक बोध कथा… ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ भक्तीचे कर्ज — एक बोध कथा ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

सावता माळी हा शेती करून पोट भरणारा एक भक्त होता. त्याचा पांडुरंगावर व पांडुरंगाचा त्याच्यावर खूपच लोभ होता. सोलापूर जिल्ह्यातील अरणगावी तो रहात असे. सावता माळी अभंग रचनाही करीत असे. काशिबा गुरव हे त्यांचे अभंग लिहून ठेवत असत. आज फक्त 37 अभंगच ज्ञात आहेत आपल्याला त्यांचे. पण तेवढेही पुरेसे आहेत भक्ती शिकायला. त्या अभंगांचं सार हेच की ‘प्रचंड उत्कट चिंतन केलं की भगवंत भेटतो.  

तर हा सावता माळी त्याच्या शेतात गव्हाचं पिक घेत असे. एके वर्षी भरपूर पिक आलं होतं. त्याच सुमारास पंढरपूरकडे जाणारी वारक-यांची दिंडी त्याच्या शेतावरून जात असताना त्याने थांबवुन त्यांना भोजन घातलं. सगळे भोजनाने खूश तर  झाले. पण मनोमनी दु:खी होते कारण त्या वारक-यांच्या गावी दुष्काळाने पिकं नष्ट झालेली होती. तेव्हा त्यांनी सावता माळ्याला विनंती केली की आम्हाला थोडं-थोडं धान्य द्या ना घरी न्यायला.   सावता माळ्याने बायकोला विचारलं तेव्हा बायको म्हणाली की यांना धान्य वाटून सगळंच संपेल धान्य. मग आपण वर्षभर काय खायचं. तेव्हा तो तिला जे म्हणाला त्याने तिच्या डोळ्यात पाणीच आले. तो म्हणाला,”हे बघ,जर निर्जीव जमिनीत एक दाणा पेरला तर पांडुरंग आपल्याला शेकडो दाणे देतो, तर त्याच्या जिवंत भक्तांच्या पोटात आपण दाणे पेरले तर तो आपल्याला उपाशी ठेवेल का ?”

सर्वांना आनंदाने धान्य वाटणा-या या दांपत्याला पहायला व हसायला सारा गाव लोटला होता. लोकं  नको-नको ते बोलत होते. कुटाळक्या,चेष्टा,टोमणेगिरी.पण हे आपले शांत होते.  सारं धान्य वाटून संपलं. दुस-या दिवशी पुन्हा शेत नांगरायला सुरवात केली सावत्याने. पण त्याच्याकडे पेरणी करायलाही धान्य शिल्लक नव्हते. गावात उसनं मागायला  गेला तरी कुणी दिलं नाही. एकाने मस्करीने त्याला भरपूर कडू भोपळ्याच्या बिया दिल्या पेरायला व म्हणाला की हे कडू भोपळे सकाळ संध्याकाळ भाजी बनवुन वर्षभर रोज खायला तुला पुरतील. सावताने त्या बिया घेतल्या व खरोखर पेरणीला सुरवात केली. सारा गाव हसत होता कारण कडू भोपळा तर गुरं पण खात नाहीत ! त्यावर्षी सावताच्या शेतात एक माणूस आत बसेल एवढे मोठे मोठे कडु भोपळे लागले वेलींना. साऱ्यांना आश्चर्य वाटले की असं कधी होतं का ? पण मग त्यावरूनही ते सावताची मस्करी करीत असत रोजच.  कडु भोपळ्यांची राखण करण्याची जरूरच नव्हती. कारण कोण चोरणार ते. पण तरीही रोज सावता शेतावर जाऊन राखण करत भजन करीत असे पांडुरंगाचं. थोडी कुठे मोल मजुरी करून दुस-यांच्या शेतावर,मग घरी येत असे. होता-होता लोक विचारू लागले की तू हे भोपळे एवढे कुठे साठवणार ? एके दिवशी भाजी करायला सावताने एक भोपळा घरी आणला. सावताच्या बायकोने भोपळा चिरला आणि काय आश्चर्य, संपूर्ण भोपळा तयार गव्हाच्या टपो-या दाण्यांनी भरलेला होता गच्च व ते सगळे गहू सांडले सारवलेल्या जमिनीवर. सावताचे डोळे पाणावले.”किती रे देवा तुला काळजी माझी.” 

मग दुस-या दिवशी पण भोपळ्यातून गहू निघाले. मग मात्र ही बातमी सगळ्या गावात वाऱ्यासारखी पसरली. सगळे जण हा चमत्कार बघायला येऊ लागले.कुणी भोपळा चोरून नेऊन चिरला तर त्यात गहू निघत नसे. ही बातमी त्यावेळेच्या मुसलमान राजाच्या कानावर गेली व तो स्वत: आला व सावताला भोपळा चिरून दाखवायला सांगितला. भोपळ्यातले गहू बघून तो मुसलमान राजाही गहिवरला व नमस्कार करून म्हणाला,”धन्य तुमची भक्ती!”. यानंतर सावता अधिकच विरक्त झाला. आपलं सर्वस्व देवाला दिलं की देवावरच भक्तीचं कर्ज चढतं. भक्तांचा चरितार्थ चालवण्यासाठी  देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी.  आपण सगळे कडू भोपळेच असतो. कुणा सावताचं भजन वा ज्ञान कानावर पडलं की आपल्या हृदयात भक्तीचे गव्हाचे दाणे तयार होत असतात. हा सगळा ना नामाचा महिमा आहे. तुमच्या मना भावली पंढरी, पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी…!

परोपकाराचा एक दाणा पेरला तर त्याची कितीतरी कणसे परतफेड म्हणून परत मिळतात.

परमार्थ हा संसारात राहूनही करता येतो त्यासाठी काही सोडावे लागत नाही. फक्त तो करताना तो भगवंताचा आहे,जे होते ते त्याच्या इच्छेनुसार होते हे ध्यानात ठेवावे.

प्रत्येक काम हे त्याचेच असून ते त्याच्या नामातच करावे. मग आपल्या वाईट संचिताचे,मागील पापाचे कडू भोपळे सुध्दा सात्त्विक पौष्टिक गव्हाने भरुन जातील.

बोध :  देव माझे चांगलेच करेल हा ठाम विश्वास मनी असू  द्यावा !

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारताचं बोलकं यश… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ भारताचं बोलकं यश… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आज सारा देश शांतपणे समाधानाने झोपणार आहे. मुलीच्या लग्नात तिची पाठवणी केल्यावर दिवसभराच्या शिणवट्यातून  थकलेला बाप जसा कृतार्थ भावनेतून झोपतो किंवा इंडिया – पाकिस्तानच्या सामन्यात त्यांना हरवल्यावर जल्लोष करून भागलेले जीव जसे निवांत पहुडतात तशी झोप आज लागणार आहे..

का? का वाटत असावं असं.? अब्जाधीश व्यावसायिकांपासून खेड्यापाड्यात राहणाऱ्या एखाद्या म्हाताऱ्याला सुद्धा चांद्रयान ३ च लँडिंग बघावस वाटलं अस काय होत त्यात.??

ऑर्बिटर, रोव्हर, लँडर ह्यातला फरक पण न कळणारे ह्या यशासाठी देव पाण्यात घालून बसले होते..!! का.?

कारण स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवसापासून ह्या देशाने केवळ आणि केवळ संघर्ष पाहिला आहे. स्वातंत्र्य मिळालं त्या आधी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये विन्स्टन चर्चिल म्हणाला होता की ” ह्या अर्धशिक्षित, गरीब..लोकांना स्वातंत्र्य दिले तर काही वर्षातच अराजक निर्माण होईल आणि हा देश गुंड मवाल्यांच्या ताब्यात जाऊन साऱ्यांची दुर्दशा होईल.” 

चर्चिल चुकीचा नव्हता..! फुटीरतावादी संस्थांनांचे  विलीनीकरण,  सर्वांना एका धाग्यात बांधू शकेल अशा संविधानाची निर्मिती, फाळणीतल्या विस्थापितांचे पुनर्वसन, भाषावार प्रांतरचना….ह्या एकेका प्रश्नाची व्याप्ती इतकी होती की देशाच्या पहिल्या काही पिढ्या त्यातच खर्ची पडल्या

फाळणीमुळे सुपीक प्रदेश पाकिस्तानात गेला होता, तर दुसऱ्या महायुध्दात जनता इतकी भरडली गेली होती की सगळी अर्थव्यवस्थाच जेरीस आली होती. त्यात अमेरिका – रशियाच्या शीतयुद्धात कोण्या एकाची बाजू घेतली असती तर स्वावलंबी राष्ट्र बनण्याच्या स्वप्नांना तिथेच सुरुंग लागून देश महासत्तांचे हातचे बाहुले झाला असता त्यामुळे देशाने अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.

तेव्हा संपूर्ण जगासाठी भारत एक चेष्टेचा विषय होता. 

१९६२ च्या दुष्काळात अमेरिकेकडे गहू मागितला तर जनावरांना खायला घातला जाईल असा नित्कृष्ट दर्जाचा गहू त्यांनी पाठवून भुकेल्या भारतीयांची चेष्टा केली होती. 

चीनसोबत झालेल्या युद्धात पुरेशा शस्त्र – साधनाअभावी कडाक्याच्या थंडीत भारतीय सैन्य धारातीर्थी पडले होते. अवकाश मोहीम काढायची तरी रशियाची मदत घ्यावी लागे. कित्येक वर्षे ऑलिंपिकमध्ये पदकांचा दुष्काळ होता. मुठभर ७ – ८ देश जो क्रिकेटचा खेळ खेळतात त्यात विश्वविजेते म्हणवून घेताना आपल्यालाच कुठेतरी पटत नव्हतं. कारगिलच्या युद्धात बोफोर्स तोफा ३ – ३ दिवस खोळंबून होत्या कारण देशाची स्वत:ची GPS सिस्टीम नव्हती आणि जी होती ती अमेरिकेच्या नियंत्रणाखाली…!!!

पण ह्या देशाच्या मातीत एक गुण आहे. कित्येक संकटे आली तरी पुन्हा शून्यातून उभं रहायचं.  देश लढत राहिला. ज्या देशात एखाद्या राज्याला त्याच्या शेजारच्या राज्याची भाषा समजत नाही त्या देशात दोघांना एकत्र ठेवणारं एक आदर्श संविधान लिहिलं गेलं.  जिथे गहू मागायची वेळ आली होती तिथे हरित क्रांती होऊन देश गहू निर्यात करू लागला. शेजारचं शत्रूराष्ट्र आम्हाला कमकुवत समजत असताना त्याला ९०००० सैन्यासह शरणागती पत्करायला लावली. पाश्चिमात्य देशांनी सुपर कॉम्प्युटर द्यायला नकार दिला तर स्वतः आमच्या तंत्रज्ञांनी परम कॉम्प्युटर घडवला. 

आणि आता ज्या मित्रराष्ट्राची अंतराळ मोहीम अपयशी होताना दिसली होती त्याच्याचसमोर आपण अनुभव कमी असताना यशस्वी होताना दिसत आहोत हे यश खूप बोलके आहे. इंटरस्टेलर सारख्या साय – फाय सिनेमाच्या बजेटपेक्षा कमी बजेटमध्ये ही मोहीम आखण्यात आली होती.

चार वर्षांपूर्वी डॉ.सिवन रडले तेव्हा सगळा देश हळहळला होता. कारण त्यांच्या अश्रुंच्यामागे मोठा इतिहास आहे. आज उदयोन्मुख  महासत्ता असताना सुद्धा हा खर्च वारंवार परवडणारा नाही. त्यामुळे अपयश म्हणजे काय ह्याचा अर्थ त्यांना माहीत होता.  त्यांचं यश – अपयश प्रत्येकाला आपलंसं वाटलं  कारण फक्त पैसाच नाही, तर आपल्या गेल्या कित्येक पिढ्या हा दिवस बघायला खर्ची पडल्या आहेत ह्याची जाणीव सगळ्यांना आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच पृथ्वीची क्षितिजे पार करत एका दुसऱ्या भौगोलिक रचनेवर भारताची मोहोर उमटली जात आहे. हा प्रसंगच अभूतपूर्व आहे.

आज इस्रोचा तो प्रवास आठवतोय…  

दुसरी कोणतीच सोय नसल्याने सायकल, बैलगाडीवर लादलेले स्पेअर पार्टस, एका चर्चच्या आवारात सुरू केलेलं प्रक्षेपण केंद्र, बिशपच्या घरातच मांडलेलं वर्कशॉप, हे घडवण्यासाठी परदेशातील मोठ्या पगाराच्या नोकऱ्या नाकारून भारतातच थांबलेले वेडे देशभक्त संशोधक, विन्स्टन चर्चिलचं भाषण, पाश्चिमात्य कार्टूनिस्टनी इस्रोची उडवलेली खिल्ली, चांद्रयान २ च्या वेळेस पाकिस्तानी मंत्र्यांनी केलेले उपहासात्मक ट्विट……..सगळं डोळ्यासमोर तरळतं आहे.!!

आज झोपी जाताना रात्री दूर त्या चंद्राकडे पाहताना विलक्षण समाधान वाटत आहे. प्रज्ञान रोव्हर आता तिथे कामाला लागला असेल….आणि काळाच्या पटलावर कधीही पुसली जाणार नाही अशी भारताची मोहोर तिथे उमटली जाणार आहे..!!! जय हो इस्रो..!!

लेखक :  सौरभ रत्नपारखी

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (चौथा माळ) – जीवनाच्या रणात लढतांना… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (चौथी माळ) – जीवनाच्या रणात लढतांना… ☆ श्री संभाजी बबन गायके 

तिच्या चेह-यावर सदा हसू असतं याचं नवल वाटत राहतं. कुणी परस्पर कधी हिशेब मांडलाच तर सुखाच्या बाजूला तशी अगदी किरकोळ जमा दिसायची आणि दु:खानं तर सगळा ताळेबंदच व्यापून टाकलेला होता.

दोन जिवंत माणसं वावरू शकतील एवढ्या जागेत सहा माणसं रहात असलेल्या घरात जन्माला येणं काही तिनं ठरवलेलं नव्हतं. एकवेळ मरण हाती असतं पण जन्म हाती नसतो हे खरंच हे तिला फार लवकर पटलं होतं. नात्यातली माणसं तिच्याघरी यायला नाखुश असतात, त्यांना हिच्या आईला भेटायचं असेल तर ती माणसं हिच्या घरी येण्याऐवजी ‘ तुम्हीच या की घरी आमच्या ’ असं का म्हणायची, हे तिला समजायला वेळ लागला.

आपल्या घराच्या आसपासची सगळी वस्तीच इतरांपेक्षा निराळी आहे, हे ती शाळेत जायला लागली तेंव्हा तिच्या लक्षात आलं. आपल्या शेजारी राहणारी माणसं काही आनंदाने या वस्तीत रहात आहेत, असं नाही हेही तिने विचारांती ताडलं. तिला सख्खा मामा नव्हता. पण मानलेले मात्र मामा होते. तिच्या शेजारच्याच खोपटात राहणारे. त्यांच्या गावी एकदा तिच्या आईने त्यांच्याबरोबर यात्रेला पाठवलं होतं. मामाच्या गावात एका गल्लीत एकाच आडनावाची माणसं राहतात. आणि ही घरं स्वतंत्र भिंतीचीही असतात, स्वच्छतागृहं घरांपासून तशी लांब असतात, हे पाहून तिला आश्चर्य वाटलं. नाहीतर तिचं घर वस्तीत सरकारनं बांधून दिलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहापासून अगदी काही फुटांच्या अंतरावर आहे. ही जागा सरकारने व्यापली नसती तर त्या जागेवर आणखी दहा-बारा झोपड्या सहज उभ्या करता आल्या असत्या. कारण वस्तीला लागूनच नदी किंवा नदीला लागूनच वस्ती होती. आणि आता आणखी लोकांना वस्तीत रहायला यायला वावच राहिला नव्हता. स्वतंत्र भिंती उभारण्याची चैन लोकांना परवडणारी नव्हती. आणि मुळात भिंती अशा नव्हत्याच. होत्या त्या पत्र्याच्या किंवा अशाच काही लाकडी फळ्यांच्या. लोकांनी वस्तीत जागा धरल्या होत्या, आपण पळत जाऊन,गर्दीत घुसून बसमध्ये जागा धरतो ना तशा ! चंदा याच वातावरणाला सरावलेली होती. तिथले आवाज, तिथला वास आणि गरीबीच्या सहवासाची तिला सवय झाली होती. आपल्या त्या एवढ्याशा घरात मागच्या बाजूला पडदा लावून एक आडोसा केलेला आहे, आणि त्यात एक आईस्क्रीमवाला मामा राहतो, त्याला त्याच्या जागेत जायला आपल्याच दारातून जावे-यावे लागते. आपले वडील त्या मामाशी आई सलगीने बोलली की भांडतात, काहीबाही बोलतात आणि बरेचदा तिला मारतात, असेही होई. पण अशा मारामा-या तर वस्तीतल्या ब-याच घरांत होतात, हे चंदाला ऐकून पाहून माहिती झाले होते. लग्न झाले की नवरा बायको असेच वागतात,ही तिची समजूत पक्की होत चाललेली होती. तिच्या शेजारी दोन बापे राहतात, मात्र ते रोज सकाळी बायकांसारखं नटून थटून बाहेर जातात. समोरच्याच झोपडीत एक बाई राहते. समोर म्हणजे हिच्या आणि त्या झोपडीत मुश्किलीने चार हातांचं अंतर असावं. त्या बाईच्या हाता,पायांची बोटं निम्मीच आहेत, ती सकाळी एका म्हाता-या माणसाबरोबर बाहेर पडते. त्या म्हाता-याच्याही हाता-पायांना नेहमी पांढ-या पट्ट्या बांधलेल्या असत आणि त्या पट्ट्यांवर रक्ताचे डाग असतात बहुतेकवेळा. डोळ्यांच्या पापण्याही झडून गेल्यात. रात्री वस्तीत अंधुक उजेड असतो, पण त्यामुळे आपल्याकडे नातेवाईक आलेच तर त्यांना अस्वस्थ का होतं, हे कोडं तिला काही केल्या उलगडत नव्हतं. तिला माहित नव्हतं की तिच्या आईच्या माहेरच्या लोकांना का चांगल्या घरची माणसं म्हणतात. त्यांची घरं आपल्यापेक्षा चांगली म्हणून त्यांना असं म्हणत असावेत, असं तिला वाटून जाई.

मुलीच्या जातीनं लवकर मोठं होणं किती वाईट असतं याची जाणीव तिला लवकरच व्हायला लागली. आई तिला सतत घरात थांब, पावडर लावू नकोस,कुणाशी जास्त बोलू नको असं म्हणायला लागली तेंव्हा तर चंदा खूपच गडबडून गेली. त्यात वस्तीच्या टोकावर रहायला असणा-या एका पोराने तिचा हात धरला आणि माझ्याशी दोस्ती करतेस का? असं विचारल्यापासून तिला भीतीच वाटू लागली होती. तशी तीही चार दोन वेळा त्या मुलाकडे पाहून ओळखीचं हसली होती, नाही असं नाही. पण ते सहजच. दिसायला बरा होता तो सिनेमातल्या हिरोसारखे केस ठेवणारा आणि वस्तीतल्या डबल बारवर व्यायाम करणारा. आईने यासाठी तिलाच का रागे भरले असावे, ह्या प्रश्नाचं उत्तर तिला आजवर नाही मिळालं. दोन्ही धाकटे भाऊ सातवी-आठवीतून शाळा सोडून गवंड्याच्या हाताखाली जाऊ लागले आणि घरात रोज रोख पैसे येऊ लागले होते.

एका दिवशी तिचं लग्नं ठरलं. पदरात निखारा ठेवून कसं जगणार आई? मुलगी मोठी झालीये आणि तिच्याकडे लक्ष द्यायला आपण दिवसा घरी थांबू शकत नाही. घरी थांबलं तर लोकलमध्ये भाजलेल्या, उकडलेल्या शेंगा विकायला कोण जाईल आणि घरात ज्वारीचं पीठ कसं येणार, हे तिचे प्रश्न इतर अनेक गोष्टींपेक्षा मोठे होते.

वस्तीतले लोक म्हणाले पोरगी बिघडली म्हणून तिच्या आईनं तिला उजवलं. चंदाचं लग्न मात्र तिच्या आईच्या सासरच्याकडच्या एका नातेवाईकाच्या मुलाशी झालं. पोरगा ड्रायव्हर, तीन भावांत मिळून तोकडी शेती आणि रूपानं चंदापेक्षा दहा आणे निराळा. आपली बायको आपल्यापेक्षा चांगली दिसते याचा त्या पोराला सुरुवातीला अभिमान आणि लग्नानंतर काहीच दिवसांत हेवा वाटायला लागला. दोन मुलं झाल्यावरही त्याचा जावईपणाचा तोरा काही कमी झालेला नव्हता. तरी बरं चंदाच्या आईनं पै पै साठवून त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी, मनगटात घड्याळ असे लाड केले होते. तुझी वस्ती तशी, तुझं खानदान तसं अशी कारणं भांडणाला पुरेशी ठरू लागली. तुझं आधी वस्तीतल्या एकाशी होतं हे तर त्याने खास शोधून काढलेलं कारण. चंदा कायमची वस्तीत आईकडे रहायला आली. दरम्यान दोन्ही भावांची अशीच लग्नं झाली होती, त्यांच्यापेक्षा गरीब असलेल्या लोकांच्या अल्पवयीन मुलींशी. आता घरात एक नाही तर तीन चंदा होत्या.

वस्तीत पुराचं पाणी शिरलं की वस्तीकरांना सरकारी शाळांच्या ऐसपैस खोल्यांमध्ये रहायला मिळायचं. दोन-तीन दिवसांत पुन्हा वस्ती गजबजून जायची. निवडणुका आल्या की प्रचाराला जायची कामं मिळायची सगळ्यांनाच आणि पैसेही.

वस्तीच्या टोकावर रहात होता, त्या मुलाचेही लग्न झाले होते आणि त्यालाही तीन मुलं होती. पण आताही तो चंदाकडे पहायचा संधी मिळेल तेव्हा. चंदाने सरळ राखी पौर्णिमेला त्याच्या घरी जाऊन राखी बांधून प्रश्न मिटवला.

नवरा परत नेण्याची शक्यता नव्हती आणि चंदाची इच्छाही नव्हती.  भावजया कुरकुरायला लागायच्या आत काहीतरी करायला पाहिजे होतं. थोरला भाऊ आता मंडईत गाळ्यावर कामाला लागला होता, पण हमालांच्या संगतीनं हातभट्टीत रमला आणि घरी पगार कमी आणि आजारपण जास्त यायला लागलं. त्यालाही मुलं झालीच होती जशी वस्तीतल्या इतरांना होत, पटापट. कार्यकर्त्यांच्या बळावर वस्तीत नळ चोवीस तास,लाईट आकडे टाकून सर्रास. वस्तीतल्या घरां-घरांत किरकोळ उत्पादनं होत होतीच, त्यात एका कोप-यात स्वच्छतागृहाच्या बाजूला भट्टी लागायची, तिथूनही भरपूर माल निघायचा. एकूण हाताला कामं होती आणि कामाला भरपूर हात तयार असायचेच.

चंदाची आई मरण्यासारखी नव्हती. पण आजाराच्या साथीत अगदी किरकोळीत गेली. खर्च असा लागलाच नाही तिच्या आजारपणात. माहेरी आलेल्या लेकीचा आधार हरपला. बाप काही लेकीला माहेरी राहू देईल असा नसतोच बहुदा. ज्याची अमानत त्याच्याघरी बरी असं मानणारा पुरूषच तो. झटकलेली जबाबदारी पुन्हा खांद्यावर घ्यायला तो तयार नव्हता. दुसरं लग्न केलं तिनं तरी त्याची ना नव्हती. पण चंदा एकदा हरलेल्या जुगारात पुन्हा पैसे लावायला तयार नव्हती.

तिने आईची शेंगांची टोपली उचलली आणि तडक रेल्वे स्टेशन गाठलं. दोन दिवसांनी भावजयही आली सोबतीला. माणसांच्या गर्दीत आता या दोन तरूण पोरी सराईतपणे आणि लाज घरी ठेवून स्थिरावल्या. चुकून धक्का लागलेल्या माणसांना मनानेच माफ करीत, मुद्दाम धक्के देणा-यांना भाऊ म्हणत त्या या ठेशन पासून त्या ठेशन पर्यंत फिरतात….भुनेला,वाफेला सेंग असा पुकारा करीत. रेल्वेतील टी.टी.,पोलिस, पाकीटमार,किरकोळ विक्रेते, आंधळे भिकारी, फरशीच्या तुकड्यांनी ताल धरीत अनाकलनीय गाणी गात पैसे गोळा करीत फिरणा-या भावांच्या जोड्या त्यांना तोंडपाठ झाल्यात. चंदाने मात्र आपली दोन्ही मुलं दूरवरच्या गावातल्या बोर्डिंग स्कूलमध्ये नेऊन ठेवलीत….त्यांना शिकवायचा तिचा इरादा आहे तिचा. आपल्या मुलांच्या नशिबात येऊ पाहणारी वस्ती तिला आता दूर सारायची आहे. फलाटावरील एखाद्या मोकळ्या बाकावर थकून भागून बसलेली चंदा तिच्या टोपलीतली एखादी जास्त भाजली गेल्यामुळे काळी ठिक्कर पडलेली शेंग सोलते…त्या शेंगेतील शाबूत भाग दातांनी कुरतडून खाते आणि लोकलची वाट पहात राहते. या महिन्यात पैसे साठले की पोरांना अभ्यासाची चांगली पुस्तकं नेऊन द्यायचीत तिला….त्यासाठी कितीही ओरडावं लागलं तरी चालेल….भुनेला, वाफेला सेंग…मूंगफल्ली का सेंग !

चंदासारख्या अशा अनेक अष्टभुजा जीवनाच्या रणात उभ्या असतात लढायला…. आई भवानी त्यांच्या हातांना आणखी बळ देवो.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (तिसरा माळ) – जीवनसंघर्षरत एक दुर्गा ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (तिसरी माळ) – जीवनसंघर्षरत एक दुर्गा ☆ श्री संभाजी बबन गायके 

नव-याला सोडलं असलं तरी कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातला काळा मणी यांपासून वत्सलामावशींनी फारकत म्हणून घेतली नाही. पदरात एक ना अर्धे…तीन मुलं. त्यात पहिल्या दोन मुली आणि तिसरा कुळाचा कुलदीपक. सासरचं घर सोडताना वत्सलामावशींनी नव-याचा प्रचंड विरोध डावलून मुलाला सोबत आणलं होतं. “ मला तुमचं काही नको…आणि माझ्या मुलांनाही तुमच्या या पापाच्या दौलतीमधला छदामही नको ” असं म्हणून मावशींनी कर्नाटकामधलं ते कुठलंसं गाव सोडलं आणि महामार्गावरून जाणा-या एका मालवाहू वाहनाला हात केला.

“ कित्थे जाणा है, भेन? ” त्या मालट्रकच्या सरदारजी चालकाने वत्सलामावशींना प्रश्न केला. “ दादा,ही गाडी जिथवर जाईल तिथवर ने ! ” असं म्हणून मावशींनी ट्रकच्या क्लिनरच्या हातावर दोन रुपयांची मळकी नोट ठेवली. “ ये नोट नहीं चलेगी ! ” त्याने कुरकुर केली. त्यावर चालकाने “ओय..छोटे. रख्ख !” असा खास पंजाबी ठेवणीतला आवाज दिल्यावर क्लिनरने मावशीची तिन्ही मुलं आणि मावशींना हात देऊन केबिनमध्ये ओढून घेतलं आणि स्वत: काचेजवळच्या फळीवर तिरका बसला. आरशातून तो मावशींना न्याहाळत होता जणू. सरदारजींनी त्याला सरळ बसायला सांगितले आणि ट्रक पुढे दामटला.

वत्सला जेमतेम विवाहायोग्य वयाची होते न होते तोच तिच्या वडिलांनी तिला दूर खेड्यात देऊन टाकली होती. त्यांना नव्या बायकोसोबत संसार थाटायचा होता आणि त्यात वत्सला बहुदा अडसर झाली असती. तरी बरं त्या स्वयंपाकपाण्यात, धुण्याधाण्यात पारंगत झाल्या होत्या, त्यांची आई देवाघरी गेल्यापासूनच्या काही वर्षातच. वत्सलाबाई तशा रंगा-रुपानं अगदी सामान्य म्हणाव्यात अशा. बेताची उंची,खेड्यात रापलेली त्वचा आणि काहीसा आडवा-तिडवा बांधा. पण रहायच्या मात्र अगदी स्वच्छ,नीटस आणि स्वत:चा आब राखून. वत्सलेचे यजमान तिच्यापेक्षा डावे. सर्वच बाबतीत. उंची,रंग आणि मुख्य म्हणजे स्वभाव. त्यांची पहिली पत्नी निवर्तली होती. पण मूलबाळ नव्हतं. कसलासा व्यापार होता त्यांचा. बाकी नावालाच मोठं घर आणि घराणं….संस्कारांची एकही खूण त्या घरात दिसत नव्हती. घरात दिवंगत तरुण माणसांच्या काही कृष्णधवल तसबीरी टांगलेल्या होत्या. पण ती माणसं कशामुळे गेली हे विचारायची सोय नव्हती. एकतर कानडी भाषेचा अडसर होता आरंभी. नंतर सरावाने समजायला लागले…सर्वच. गावातल्या जमीनदाराचा उजवा हात म्हणून दबदबा असलेला नवरा….जमीनदाराच्या सावकारकीचा हिशेब याच्याच चोपडीत लिहिलेला. कर्जाचे डोंगर डोक्यावरून उतरवू न शकणा-या गोरगरीबांच्या जमिनी सावकाराच्या नावे करून घेण्यात सरावाने वाकबगार झालेला माणूस. एखाद्याला बरणीतलं तूप काढून देताना आपल्या हाताला माखलेलं तूप माणूस पोत्याला थोडंच न पुसतो….ते तुपाचे स्निग्ध कण जिभेवर नेण्याची सवय मग अधिकाधिक वाढत गेली आणि कधीही वाल्मिकी होऊ न शकणारा वाल्या उत्पन्न झाला. स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करून त्यात सर्वमार्गे धनसंपदा घरात येत गेली. घरात माणसांची वानवा नव्हती आणि कामाचीही. वत्सलाबाईंचा ऐहिक संसार इतरांसारखा ठरलेल्या मार्गावरून वाटचाल करू लागला आणि वत्त्सलाबाई घरात प्रश्न विचारण्याएवढ्या मोठ्या आणि धीट झाल्या. तोवर तीन मुलं घातली होती पदरात नियतीने. वत्सलेचे प्रश्न टोकदार आणि थेट होते. यजमानांच्या खात्यावर आता धन आणि काळ्या धनासवे येणारे यच्चयावत अवगुणही जमा होत होते. नव-याने,सासु-सास-यांनी छळ आरंभला आणि त्याची परिणती म्हणून आज तीन मुलांना घेऊन वत्सलाबाई अनोळखी दिशेला निघाल्या होत्या.

कर्नाटकाच्या सीमा ओलांडून ट्र्क मराठी मुलखात शिरला. दुकानांच्या मराठी पाट्या वाचत वाचत मुलं सावरून बसली होती. आपण कुठे निघालो आहोत याची त्यांनाही कल्पना नव्हती. वाटेत सरदारजी काहीबाही विचारत राहिले आणि वत्सलाबाईंनी पंजाबी-मिश्रीत हिंदी अजिबात समजत नसली तरी कर्मकहाणी सांगितली आणि त्या दणकट शरीराच्या पण मऊ काळजाच्या शीखाला समजली…. “ तो ये गल है? वाहेगुरू सब चंगा कर देंगे ! “ त्याने अ‍ॅल्युमिनियमचे चंदेरी कडे घातलेला हात आकाशाकडे नेत म्हटलं.

रात्रीचे आठ वाजत आलेले होते. जकात नाक्याच्या पुढच्या वळणावर सरदारजींनी ट्र्क उभा केला आणि म्हणाले, “ भेनजी…उतर जावो. मैं तो अभी सड्डे ट्रांसपोर्ट ऑफिस जाऊंगा !

वत्सलेने या नव्या भावाकडे असे काही पाहिले की त्याने ट्रकचं इंजिन बंद केलं. सरदारजीचा स्वत:चा ट्र्क होता तो. पंजाबमधून महाराष्ट्रात येऊन स्वत:ची ट्रांसपोर्ट कंपनी काढायची होती त्यांना. औद्योगिक परिसराच्या जवळच एक ट्रक टर्मिनल उभं रहात होतं. त्यातलीच एक मोकळी जागा विकत घेऊन त्यांनी पत्र्याचं शेड ठोकून तात्पुरतं कार्यालय थाटलं होतं. आणि त्याला तो नसताना ते सांभाळणारं कुणीतरी पाहिजे होतं. राहण्याचा जागेचा प्रश्न मिटत होता. मराठी मुलूख होता. वत्सलाबाईंनी होकार दिला.

झाडलोट करणं, ट्रांसपोर्टसाठी आलेल्या मालावर लक्ष ठेवणं आणि बारीक सारीक कामं सुरू झाली. तिस-याच महिन्यात सरदारजींनी दोन नवे ट्रक घेतले. कार्यालय मोठे झाले. त्यांनी वत्सलाबाईंची पत्र्याची खोली आता पक्की बांधून दिली. परिसरात आणखी बरीच ट्रांसपोर्टची कार्यालये, गोदामं उभी रहात होती. चालक,मेकॅनिक,क्लिनर इत्यादी मंडळींचा राबता वाढू लागला. त्या परिसरात राहणारी एकमेव बाई म्हणजे वत्सलाबाई. तिथून जवळची मानवी वस्ती हाकेच्या अंतरावर नव्हती. चहापाण्याला,जेवणाला चालक-क्लिनर लोकांना थेट हायवेवरच्या ढाब्यांवर जावे लागे. सरदारजींना विचारून वत्सलामावशींनी आपल्या खोलीतच चहा आणि अल्पाहाराचे पदार्थ बनवून विकायला आरंभ केला. चव आणि मावशींचे हात यांचं सख्य तर होतंच आधीपासूनचं. माणसं येत गेली, ओळखीची होत गेली.

घरादारांपासून दूर असलेली ती कष्टकरी चालक मंडळी. त्यात त्यांच्या आयुष्यात आलेल्या अपरिहार्य पण अस्विकारार्ह गोष्टी. एकटी बाई पाहून त्यांच्या नजरांत होत जाणं नैसर्गिक असलं तरी वत्सलाबाईंचा अंगभर पदर, कपाळावरचं ठसठशीत कुंकू,गळ्यातला काळा मणी आणि जीभेवरचं आई-बहिणीसदृश मार्दव. वत्सलाबाई आता सगळ्यांच्याच मावशी झाल्या. आणि काहींच्या बहेनजी ! त्या ड्रायव्हर, क्लिनर मंडळींच्या घरची,मुलाबाळांची आवर्जून चौकशी करायच्या. कधी नसले कुणापाशी पैसे तर राहू दे…दे सवडीनं म्हणायच्या. आणि लोकही मावशींचे पैसे कधी बुडवत नसत.

दरम्यान मुली मोठ्या होऊ लागल्या होत्या. त्यांना मात्र मावशींनी सर्वांच्या नजरांपासून कसोशीने दूर ठेवलं. त्याही बिचा-या मुकाट्यानं रहात होत्या. लहानपणी जे काही लिहायला-वाचायला शिकल्या होत्या तेवढ्यावरच त्यांना थांबायला लागले. पण वागण्या-बोलण्यात अगदी वत्सलामावशी. काहीच वर्षांत मावशीच्या दूरच्या नातलगांना मावशींचा ठावठिकाणा लागला. अधूनमधून कुणी भेटायला यायचं.

सरदारजींनी जवळच शहरात प्लॉट घेऊन बंगला बांधला. आपले कुटुंब तिथे आणले. आऊटहाऊस मध्ये मावशींचे घरटे स्थलांतरीत झाले. आता पोरींची शाळा सुरू झाली जवळच्याच नगरपालिकेच्या विद्यामंदिरात. धाकटा लेकही आता हाताशी आला. पण त्या पठ्ठ्याला ड्रायव्हरकीचा नाद लागला आणि त्याने मावशींच्याही नकळत लायसेंस मिळवलं आणि ते सुद्धा अवजड वाहनांचं. मावशींनी मात्र चहा-नाश्त्याचा व्यवसाय सुरूच ठेवला…शरीर साथ देईनासं झालं तरीही.

सरदारजी पंजाबातल्या आपल्या मूळगावी गेले तेंव्हा सारा बंगला मावशींच्या जीवावर टाकून गेले होते…गेल्या कित्येक वर्षांत त्यांनी विश्वास कमावला होताच तेवढा. घर सोडून आल्यानंतर उभं आयुष्य मावशींनी एकटीच्या बळावर रेटलं होतं. स्वाभिमानने जगल्या होत्या. पै न पै गाठीला बांधून ठेवली…लेकी उजवताना लागणार होता पैसा..थोडा का होईना.

दोन्ही मुलींना स्थळं सांगून आली. दोघींची लग्नं एकाच दिवशी होणार होती. मावशींचा इतिहास आडवा नाही आला. इतक्या वर्षांच्या अस्तित्वात मावशींनी चारित्र्यवान वर्तनाची,प्रामाणिकपणाच्या खुणा वाटेवर कोरून ठेवल्या होत्या. विपरीत परिस्थितीत संस्कार सोडले नाहीत,मुलांनाही देण्यात कमी पडल्या नाहीत.

कसे कुणास ठाऊक, पण लग्नाच्या आदल्या रात्री मावशींचे यजमान येऊन थडकले. वाल्याचे पाप कुणीही स्विकारले नव्हते..अगदी जवळच्यांनीही. पैसे,जमीन होती शिल्लक काही, पण कुणाच्या डोळ्यांत डोळे घालून बोलण्याइतपत पत नव्हती राहिली. मावशी काहीही बोलल्या नाहीत.

दिवसभर ट्रांसपोर्ट कंपनीच्या आवारातच कार्य पार पडलं. पंजाब,हरियाणा,केरळ,बंगाल….भारतातल्या प्रत्येक राज्यातील एक न एक तरी व-हाडी हजर होता लग्नाला…अर्थात पुरूषांच्या त्या मेळ्यात एकही स्त्री मात्र नव्हती. मराठी लग्नसोहळा पाहून ती परप्रांतीय माणसं कौतुकानं हसत होती. सरदारजी मालक सहकुटुंब आले होते. त्यांनाही ट्रकच्या रस्त्यात उभं राहून हात करणा-या वत्सलामावशी आठवत होत्या…आणि त्यांच्या सोबतची लहानगी मुलं.

सायंकाळी पाठवणीची वेळ आली. मावशींनी व्यवस्थित पाठवणी केली. एका ट्रकवाल्यानं सजवलेल्या मिनीट्रक मधून दोन्ही नव-या सासरी घेऊन जाण्याची तयारी केली होती…..गाडीभाडं आहेर म्हणून वळतं करण्याच्या बोलीवर ! एकंदरीतच चाकांच्या त्या दुनियेत दोन संसारांची चाकं अग्रेसर होत होती.

मुली निघून गेल्या चिमण्यांसारख्या…भुर्र्कन उडून. त्यांना आता नवी घरटी मिळाली होती हक्काची. व-हाडी आणि इतर मंडळी निघून गेली. मंडप तसा रिकामा झाला. वत्सलाबाईंनी लाडू-चिवड्याच्या पुड्या बाहेर खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या नव-याच्या हातावर ठेवल्या आणि त्याला वाकून नमस्कार केला. आणि पलीकडे काथ्याच्या बाजांवर बसलेल्या ड्रायवर मंडळींकडे पाहून म्हणाल्या…’ कर्नाटका कोई जा रहा है अभी?’

एक चालक उठून उभा राहिला. मैं निकल रहा हूं मौसी थोडी देर में. त्यावर वत्सला मावशी नव-याकडे हात दाखवून म्हणाल्या…’ इनको लेके जाना1 और हाँ….भाडा नहीं लेना. तुमसे अगली बार चाय-नास्ते का पैसा नहीं लूंगी !’ 

असं म्हणत वत्सलामावशी लग्नात झालेल्या खर्चाच्या नोंदी असलेल्या वहीत पाहण्यात गर्क झाल्या….त्यांच्या यजमानाला घेऊन निघालेल्या ट्र्ककडे त्यांनी साधं मान वळवूनही पाहिलं नाही ! धुळीचा एक हलका लोट उठवून ट्रक निघून गेला…वत्सलाबाईंच्या डोळ्यांत त्यांच्या नकळत पाणी उभं राहिलं….पण आत मनात स्वाभिमानाच्या भावनेनं रिंगण धरलं होतं…एका बाईनं एक लढाई जिंकली होती…एकटीनं !

….. नवरात्रीनिमित्त ही दुर्गा मांडली. चारित्र्य, सचोटी, प्रामाणिकपणा, जिद्द, मार्दव, कर्तृत्व, करारीपणा आणि धाडस ह्या अष्टभुजा उभारून जीवनसंघर्षरत असलेली दुर्गा. संदर्भांपेक्षा संघर्ष केंद्रस्थानी ठेवून लिहिले. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पडघवली” मधील अंबावहिनी ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ? 

“पडघवली” मधील अंबावहिनी ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

मला आवडलेली गोनीदांच्या “पडघवली” मधील व्यक्तिरेखा – कादंबरी होती गो. नी. दांडेकर लिखित “पडघवली.” हे अप्रतिम पुस्तक आणि आणि मनाली भिडली ती  कादंबरीची नायिका “अंबावहिनी.”…ती एकदम मनात ठसली “पडघवली”  वाचली तेव्हा आवडलं होतं गोनीदांनी केलेलं “पडघवली”चं .. कधीही न पाहिलेल्या कोकणाचं वर्णन.. त्यांची ओघवती भाषा.  

१९५०चं दशक… कोकणपट्टीतील एक गाव. निसर्गाने आपलं वैभव अनंत हस्ते जिच्यावर उधळलंय अशी पडघवली.. घनदाट जंगल झाडी… त्याला नारळी पोफळीची डौलदार झालर. ..अशा या सुंदर गावी आली एक देखणी, गोरीपान आठ वर्षाची पोर.. लग्न म्हणजे काय हे न कळायच्या वयातच लग्न होऊन तिने पडघवलीतील आपल्या घराचा ऊंबरठा ओलांडला. तीच ही अंबा किंवा अंबूवहिनी… तिचं माहेरघर दाभोळ खाडीपासून दहा कोस आत.. पाण्याचं सततचं दुर्भिक्ष. अशा रुक्ष गावातून अंबा आली ते हिरव्यागार पडघवलीमधे. ..अष्टौप्रहर वाहणारा थंड पाण्याचा पन्हाळ बघून ती हरखली. घरी बरोबरीचे नणंद आणि दीर, गणुभावजी… हे तिचे खेळ सवंगडी. सासुबाई आणि मामंजी. अगदी प्रेमळ. वयाच्या दहाव्या वर्षी विधवा होऊन माघारी आलेल्या आतेसासुबाईंची आईविना वाढलेल्या अंबेवर अपार माया होती. अंबेचं घर हे गावकीतलं मुख्य घर. तिचे मामंजी खोत होते या गावचे! घरासमोर अंगण, मागं परसू, भोवताली नारळी-

पोफळीच्या बागा… पावसाळ्याचे चार महिने सोडले तर एरवी सात आठ महिने अंगणात मांडव.. खाली सावली आणि वर वाळवणं. पोफळं, आमसुलं,  कडवे वाल, गरे, आंबोशी, केळ्याचे काप, कडधान्य अन् काय काय… 

पडघवलीतलं प्रत्येक घर असंच खपत असे. अशा या कामसू गावाला त्यांच्या नव्या खोतीणीचा फार आदर होता. अंबावहिनी होतीही तशीच..! मनमिळावू, प्रेमळ, गावाविषयी आत्मीयता असणारी… 

आतेसासूबाईंकडुन शिकलेल्या, झाडपाल्याच्या औषधांनी, तिनं  कितीतरी गाववाल्यांना बरं केलं होतं आणि अनेक बाळंतिणींना सोडवलं होतं. ..

अंबेचा नवरा महादेव, तिची खूप काळजी घ्यायचा. बोलून दाखवलं नाही तरी त्याला अंबेचं कौतुक असावं. मात्र अंबेला जशी गावासाठी कळकळ होती तशी काही त्याला नव्हती. तो स्वार्थी नव्हता पण जरा आपल्या पुरतं पहाणारा होता..अंबेला याचं आश्चर्य वाटे. गावच्या खोताचा मुलगा ना हा ? असा कसा ?

गावकर्‍यांमधे अंबूवहिनीचा आणखी एक भरभक्कम आधार होता. तो म्हणजे गुजाभावजी. गुजा हा अंबूचा नवरा महादेव याचा अगदी जवळचा मित्र… महादेवाबरोबरच अंबूचीही गुजाशी छान मैत्री झाली. गावावरची अपार माया आणि कळकळ हा यांच्या मैत्रीतला दुवा… जिथे नवर्‍याबरोबर चारचौघात दोन शब्द बोलणं म्हणजे अगोचरपणा मानला जाई असा काळ तो. अशा काळी नवर्‍याच्या मित्राशी मैत्री ? अशक्यच..! 

पण “पडघवली” वेगळी होती. गुजाभावजी आणि अंबूवहिनी यांची निर्मळ आणि नितळ मैत्री पडघवलीच्या गावकर्‍यांनाच काय पण खुद्द महादेवाला देखील मान्य होती. त्यांच्या ह्या विश्वासाला तडा जाईल असं वर्तन गुजा आणि अंबू कडून कधी घडलं नाही.

दृष्ट लागावी असं सगळं …. पण.. ती लागलीच, अंबेचा चुलतदीर, व्यंकुभावजीच्या रूपाने… अंबेला माणसांची उत्तम पारख होती. तिला पहिल्यापासूनच व्यंकुच्या कारनाम्यांची शंका यायची. तिचा संशय दरवेळी खरा ठरे पण तिच्या नवर्‍याचं, भावावरील आंधळं प्रेम हेच अंबेचं मोठं दु:ख होतं.  बाहेरख्यालीपणा, गावातील लोकांच्या पैशांच्या अफरातफरी करणं, बेकायदेशीर जंगलतोड करणं.. अशा सगळ्या व्यंकूच्या कारवाया बघूनही आपला नवरा काही करत नाही म्हणून अंबू व्यथित होत असे. नवर्‍याचं नाकर्तेपण तिला असह्य होत असे पण ही व्यथाच तिला दिवसेंदिवस खंबीर बनवत होती… या सगळ्या कोंडमार्‍याचा स्फोट व्हायचा तो झालाच एके दिवशी…

व्यंकूनी सिमेंटचा बांध घालून महादेवाच्या आणि गावातील इतरांच्या बागेचं पाणी अडवलं. .तो बांध फोडायला अंबा स्वतः हातात कुदळ घेवून निघाली. अंबेचा तो अवतार बघून नवरा चरकला पण स्वतः गेला नाही. मात्र तिलाही अडवलं नाही. इतर काही गावकरी मदतीला आले आणि बांध फोडला गेला. अंबेनी सार्‍या गावासाठी पाणी वाहातं केलं. .व्यंकूनी गावकर्‍यांचा वानवळा मुंबईला नेऊन विकला. गावकर्‍यांना बोटी बुडाल्या असं सांगून त्यांचे पैसे हडप केले. हे प्रकरण मात्र महादेवाला खूप लागलं. स्वतःच्या खोत असण्याची त्याला जाणीव झाली. त्यानी जमीनीचा तुकडा विकून गाववाल्यांना नुकसान भरपाई दिली… कोण अभिमान वाटला अंबूला नवर्‍याचा. मनातून ती फार फार सुखावली. महादेवानी मात्र ह्या प्रकरणाचा धसका घेतला आणि त्यातून तो सावरलाच नाही.

महादेवानंतर अंबेनी गुजाभावजीच्या मदतीनी मुलाच शिक्षण केलं… गुजाला अंबेच्या कर्तृत्वाची जाण होती आणि आदरही. त्याच्यासारखा ताकदवान गडी. त्याने कोणा गुरूची दीक्षा घेतली मग तो गावातील चांगल्या कामासाठी देखील त्याच्या ताकदीचा वापर करेनासा झाला. यासाठी अंबा त्याची वेळोवेळी निर्भत्सना करे. 

तिची पडघवलीची ओढ व कळकळ समजून गुजा शेवटी ती सांगेल ते काम करायला तयार होई. अगदी गुरुवचनभंगाचा प्रमाद पत्करुन सुद्धा…

व्यंकूच्या कारवायांनी पडघवलीला उतरती कळा लागलीच होती. तरूणाई नोकरी धंद्याच्या नावाखाली गाव सोडून जात होती. त्यात भर म्हणून की काय महाभयंकर असं वादळ आलं आणि त्या वादळाने पडघवलीची उरली सुरली रया पण घालवली. या वादळात या खोतांच्या दारचं सर्वात जुनं आंब्याचं झाड जमीनदोस्त झालं…हे पाहून तिचा दिर हळहळला.. एरव्ही एवढ्या तेव्हढ्यासाठी जीव पाखडणारी अंबा वहिनी पण तिनी त्याची   समजूत घातली, “काय राह्यलंय त्या जुन्या झाडात ? आंब्यासाठी रडायचं ? सगळं जातंय. जाऊ दे..!” अंबेच्या तोंडचे हे पहिलेच निराशाचे उद्गार..! याच वादळात शेजार्‍यानी मदत न केल्यामुळे गावातल्या वृध्द यादोकाकी आणि त्यांची वासरी यांचा झालेला अंत .. अंबेला गावानी तिच्यावर केलेला हा शेवटचा घावच वाटला आणि तिनं हा गाव सोडायचा ठरवलं.? पण पडघवली सोडून जाणार कुठे ? मुंबईला मुलाकडे ? नाही नाही… अंबेची पराकोटीची घालमेल सुरू झाली.. 

मामंजी- आते सासुबाई- महादेव- यांची पडघवली ? साक्षात पडघवली ? वाडवडीलांनी वसवलेली पडघवली ? माडापोफळांनी झाकलेली पडघवली ? सोडायची ? नाही.. नाही..! अंबेला हे सहन झालं नाही. आणि  पडघवलीला कधीही अंतर द्यायचं नाही हे ठरवून ती माघारी फिरली…

अशी ही गावकर्‍यांशी आणि त्याहूनही जास्त गावाशी एकनिष्ठ असलेली अंबा… ज्या मातीत वाढली त्या मातीशी बेईमानी न करणारी अंबा… परपुरुषाशी निखळ व निर्मळ मैत्री कशी असावी हे दाखवून देणारी अंबा… खेडयातल्या आपल्या जीर्णशीर्ण, कोसळू पहाणार्‍या घरकुलांकडे लक्ष पुरवा हा संदेश देणारी अंबा… 

मला भावली..!!

© सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ देवीचे गायत्रीमंत्र – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ देवीचे गायत्रीमंत्र – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत गायत्रीमंत्र

धूमावती ॐ धूमावत्यै च विद्महे संहारिण्यै च धीमहि तन्नो धूमा प्रचोदयात् ॥

 मराठी भावानुवाद

ॐ 

ध्यान करितो धूमावती संहारिणीचे 

दान देई हे धूमा 

अमुच्या बुद्धीला श्रेष्ठ प्रेरणेचे

संस्कृत गायत्रीमंत्र

दुर्गा ॐ कात्यायन्यै विद्महे कन्याकुमार्यै धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात् ॥

मराठी भावानुवाद

दुर्गा ॐ 

ध्यान करितो कात्यायनी कन्याकुमारीचे

दान देई हे दुर्गे 

अमुच्या बुद्धीला श्रेष्ठ प्रेरणेचे

संस्कृत गायत्रीमंत्र 

ॐ महादेव्यै च विद्महे दुर्गायै च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात् ॥

मराठी भावानुवाद 

ॐ 

ध्यान करितो महादेवी दुर्गेचे

दान देई हे देवी 

अमुच्या बुद्धीला श्रेष्ठ प्रेरणेचे

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print