मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 265 ☆ तूच… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 265 ?

☆ तूच ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

मी पुन्हा पुन्हा–

त्याच तिथे येऊन पोहोचते,

जिथे केवळ नकार घंटाच,

घुमत असतात,

तुझ्या वागण्यात  !

 

तूही बदलत नाहीस,

आणि मी ही !

मला सांगायचं असतं..

तुला मनातलं बरंच काही,

मी स्वीकारलेलं असतं मला,

मी जशी आहे तशी,

सर्व गुणदोषांसकट!

 

पण तुझा वाढत चाललेला,

“श्रेष्ठत्व अहंकार”

आजकाल सहन होत नसतानाही,

तूच का हवी असतेस,

मनीचे गुज ऐकवायला?

 

भूतकाळात,

जरा जास्तच घुटमळत राहतो,

का आपण?

हा प्रश्न स्वतःलाच विचारत—

भविष्यात डोकावताना,

परत तूच??

हे कसं काय घडतंय?

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सार्थ करूया जीवन… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “सार्थ करूया जीवन…” ☆  डॉ. शैलजा करोडे

(अष्टाक्षरी)

वाट जीवन काटेरी

होई सरळ सुगम

बाळगावा मात्र मनी

आशावाद तो दुर्दम्य

*

कर्म चांगले करते

नाव यश किर्तीवंत

फळ कष्टाला मिळते

करू कार्य शोभिवंत

*

भुकेल्यांना द्यावे अन्न

आंधळ्याची काठी बना

जनसेवा ईशसेवा

मर्म जीवनाचे जाणा

*

असे संस्कार शिदोरी

जीवनात बहुमोल

जपतसे सदभाव

यश मिळते अमोल

*

जन्म मानव दुर्लभ

व्हावा नर नारायण

माणुसकी जपा मनी

सार्थ करूया जीवन

© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “शब्द  एक छंद….” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “शब्द एक छंद…. ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

शब्द हसतात ,शब्द रुसतात

शब्द एकांतात सोबत करतात…

 

शब्द टोचतात,डोळ्यात अश्रू आणतात

 सावरून घेतात, सांत्वनही करतात

 

शब्दांना असते धार,शब्द करतात वार

जपून करतो आम्ही शब्द व्यवहार

 

 

शब्दांना असतो ताल,शब्दांना असते चाल

शब्द समजूतदार,देतात आधार

 

शब्दांना असते वजन,उंची,भाव

घेतात मनाचा अचूक ठाव…

 

शब्दांना असतो वारसा

शब्दांविण भाव पोरका

काय वर्णावा शब्द महिमा

शब्द इथे माझा उणा…

 

शब्दांची चढता नशा

अंकुरतात नव्या आशा

शब्दांनी दिली जीवना दिशा

शब्द माझी अभिलाषा…

 

शब्द एक छंद

दरवळणारा सुगंध

जुळता ऋणानुबंध

भाव सारे स्वच्छंद…

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

२० मार्च, आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस! २००६ ते २०१२ या काळात संयुक्त राष्ट्रांनी एक मोहीम चालवली. २०११ मध्ये या दिवसाची कल्पना मांडली. आणि २०१३ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. याचे महत्व सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. यात लोकांना आनंदाचे महत्व पटवणे. आपले काम करताना आपण आनंदी असलो तर त्याचे होणारे फायदे प्रत्यक्ष दाखवले गेले. त्याच प्रमाणे विविध वेळी, विविध ठिकाणी आपण आनंदी मनोवृत्ती ठेवली तर कोणते फायदे होतात ते सांगितले गेले. त्या साठी कोणत्या कृती कराव्यात हेही सांगितले गेले. मानवी विकासासाठी आनंद किती महत्त्वाचा असतो याचेही महत्व विषद करण्यात आले.

हे सगळे करण्याची आवश्यकता का वाटली असेल? याचा विचार केला तर काही लोकांची मते, किंवा कामाच्या ठिकाणी आनंदी असणे, घरात आनंदी असणे याचा फारसा स्वीकार केला गेला नव्हता. जे आनंदी दिसत असत त्यांना नावे ठेवली जायची. आनंदाने किंवा हसऱ्या चेहऱ्याने काम करणाऱ्या व्यक्ती म्हणजे त्यांना कोणतीच गंभीरता नसते, ते कोणतेही काम नीट करू शकणार नाहीत असेही गैरसमज होते. कोणतेही काम गंभीरतेने, तणावपूर्ण केले तरच ते प्रामाणिकपणे व व्यवस्थित होते. असेही गैरसमज होते. प्रत्यक्षात काही निरीक्षणे, अनुभव व काही सर्व्हेक्षण केल्यावर असे लक्षात आले, की आनंदी मनाने काम केले तर ते अधिक चांगले होते. आणि करणाऱ्यालाही त्याचा आनंद मिळतो. आनंदाचा संबंध कल्याण व एकूण जीवनातील समाधानाशी जोडलेला असतो. ज्यांची आनंदाची पातळी जास्त असते त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असते. त्यांचे सामाजिक संबंध मजबूत असतात. प्रतिकूल परिस्थितीला ते तोंड देऊ शकतात.

आनंदाची कोणतीही ढोबळ व्याख्या करता येत नसली तरी त्यात सकारात्मकता ही भावना, उद्देशाची व परिपूर्णतेची भावना अशी मनाची स्थिती दिसून येते. अर्थात प्रत्येकाची आनंदाची व्याख्या व ज्यातून आनंद मिळतो या विषयी दृष्टिकोन भिन्न असतो. आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हा आनंद बदलत असतो. हा एक वेगळाच विषय आहे.

पण आनंदी राहिल्याने आपल्या कडून समोरच्याला नक्कीच आनंद मिळतो. त्याच्या पर्यंत त्या आनंद लहरी पोहोचतात. खरे तर ही आनंदाची भावना प्रत्येक सजीवात असते. आणि तो व्यक्त करण्याची किंवा ते आनंदी आहेत हे ओळखण्याची पद्धत वेगळी असते. हा आनंद पण असा असतो, तो आपल्याला मिळावा असे वाटत असेल तर तो दुसऱ्यांना द्यावा लागतो. म्हणजे आपला आनंद द्विगुणित होतो. आणि मग आनंदी आनंद गडे, जिकडे तितके चोहिकडे असे होऊन जाते.

आजच्या आनंदाच्या दिवसाच्या उत्सवात आपणही सहभागी होऊ या! स्वतः आनंदी होऊन इतरांनाही आनंदी करु या!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सापाचा दंश – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सापाचा दंश – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

अंतूभटजी शेठजीच्या बंगल्याच्या पायऱ्या चढून हॉलसमोरील देवखोलीकडे गेले. देवचंदशेठजी तिथेच खुर्चीवर बसुन त्त्यांची वाट पहात होते. त्यानी भटजीकडे पाहून स्मित केले. अंतूभटजी देवघरात गेले आणि नेहेमीप्रमाणे देवांना स्नान घालून, फुले अत्तर चढवून स्तोत्रे म्हणू लागले. रामरक्षा, श्रीसूक्त, अथर्वशिष्य वगैरे. शेटजी रोजच त्त्यांची पूजा मनापासून डोळे बंद करून ऐकत मग मान हलवत. पूजा संपली की भटजीना मसालादूध आणि फळे दिली जात. मग शेटजी न्याहारी करत आणि आपल्या पेढीवर जात.

देवचन्दशेठजीची त्या परिसरातील सर्वात मोठी सोन्याची पेढी होती, त्यान्च्याकडून त्या जिल्ह्यातील सोनार सोने खरेदी करत शिवाय शेठजीची तयार दागिने विकण्याचा शोरूम पण होता, त्या ठिकाणी त्त्यांचा मुलगा बसे. दिवसभर त्या शोरूममध्ये गिर्हाईकांची गर्दी असे.

अंतूभटजी घरातून बाहेर पडतापडता शेठजीना म्हणाले 

“शेठजी, चार दिवसाची रजा हवी होती..

“कुठे जाताय?

“मुलगी असते मुंबईला.. गाणे शिकते, माझ्या बहिणीकडे रहाते.. तिला पाहून यावं म्हणतो..

“बर, घरी कोण असत तुमच्या?

“मी एकटाच, मंडळी गेली दहावर्षांपूर्वी.. ही एक मुलगी पाठी ठेऊन.

शेटजीना काहीतरी आठवले.. त्यानी विचारले 

“बहीण कोठे रहाते तुमची मुंबईत?

“गिरगांवात, काळाराम मंदिराच्या बाजूला.. चाळीत.

“बरे, माझे एक काम करा.. जाताना एक पिशवी देतो ती आमचे साडू आहेत भुलेश्वरला… त्त्यांची मोठी पेढी आहे. त्याना द्या आणि तुम्ही येताना परत त्याचेकडे जा आणि ते एक पिशवी देतील, ती घेऊन या..

“बरे, परवा जाईन म्हणतो.. पिशवी तयार ठेवा.

“हो, एसटीने जाणारं ना? आमचा भिवा घेऊन येईल स्टॅन्डपर्यंत..

“बरे.. येतो..

अंतूभटजी अजून काही पूजा होत्या, त्या घरी गेले.

जायच्या दिवशी भटजीनी आपण आज मुंबईला निघणार असे शेटजीना सांगितले.. शेटजीनी त्याना पेढीकडे यायला सांगितले.

सायंकाळी भटजी शेठजीच्या पेढीकडे गेले. शेठजी त्त्यांची वाटच पहात होते. एक पुडक त्यान्च्या पिशवीत भिवाने ठेवले. अंतूभटजी बाहेर पडले तसे भिवा पण त्याचेंसमवेत चालू लागला, त्याला सोबत पाहून भटजी म्हणाले 

“अरे तू का सोबत? मला काय स्टॅन्ड माहित नाही?

“तुमास्नी सार मायती हाय, पर शेठजी बोल्ले, त्यसानी गाडीत बशीव आणि मग परत फिर..

भटजी काही बोलले नाहीत पण भिवा हा शेठजीनी पोसलेला गुंड त्याना आवडत नसे. काही न करता तो पेढीवर बसलेला असे कदाचित कुणाची हाडे मऊ करायची असतील, तर ते काम ते करत असावा.

अंतूभटजी गाडीत बसले.. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचले.

गिरगांवात बहिणीकडे जाऊन त्यानी मुलीला पाहिले आणि दुपारी भुलेश्वरला शेठजीच्या साडूकडे गेले आणि शेठजीची पिशवी त्यानी त्यान्च्या हातात दिली. साडू खूष झाले.. त्यानी थंडगार पियुष भटजीसाठी मागवलं. मग मोडक्या तोडक्या मराठीत बोलू लागले..

“तुमच्या देवचंदशेठजीनचा फोन अल्ला व्हता.. बर हाय.. परत कवा जनार गावला?

“सोमवारी.

“बर हाय.. शेटजीसाठी एक थैल्ली देतो, ती घेऊन जयचं.. तयार ठेवतो.

“बर.. म्हणत अंतूभटजी उठले आणि बहिणीच्या घरी गेले.

यावेळी भटजी आपल्या मुलीला गावी नेणार होते, त्यामुळे सोमवारी ते मुलीसह पेढीवर गेले आणि शेटजीच्या साडूनी दिलेली पिशवी घेउंन एसटीत बसले.

दुसऱ्या दिवशी सकाळी भटजी एसटीतुन उतरले आणि सरळ शेटजीच्या बंगल्यावर गेले आणि त्यानी साडूनी दिलेली पिशवी त्यान्च्या हातात दिली.. पिशवी पाहून शेठजी खूष झाले.. त्यानी त्याच्यासाठी आणि त्याच्या मुलींसाठी मसाला दूध मागविले आणि खिशातून पाचशेच्या दोन नोटा भटजीच्या हातात कोंबल्या.

“अरे काय हे, कशाला.. कशाला हे पैसे?

“अरे असू दे ना.. आणि ही कोण तुमची छोकरी काय?”

“होय.. गाणे शिकते मुंबईत.. उत्तरेकडील बनारसचे गुरु आहेत तिचे.. “

“अरे व्वा.. छान छान..

“काही लागलं तर सांगा आणि उद्यापासून पूजा सुरु करा..

“हो हो.. म्हणत भटजी बाहेर पडले.. एवढ्याश्या कामासाठी एक हजार मिळाल्याने ते खूष झाले.

आठ दिवसांनी भटजीना कन्येला मुंबईला पोहोचवायचं होत, यावेळी पुन्हा शेठजीनी मागीलवेळेपेक्षा मोठे पार्सल दिले आणि पिशवीत ते पार्सल खाली आणि त्यावर भटजींचे पंचे, बंडी वगैरे स्वतः शेठजीनी ठेवले. मागील वेळा सारखा भिवा स्टॅन्डपर्यत पोचवायला आला आणि गाडी सुटल्यावरच मागे फिरला. मुंबईला पोचल्यानंतर भटजी भुलेश्वरला गेले.. ते पार्सल त्यानी शेठजीच्या साडूकडे दिले.. साडूनी त्यान्च्यासाठी पियुष मागवून दिले आणि दोन हजार खिशात ठेवले. परत येताना शेटजीसाठी पार्सल दिले, ते त्यानी शेठजीना दिले.. शेठजी खूष झाले.. त्यानी पाचशेच्या दोन नोटा भटजीच्या खिशात कोंबल्या.

अंतूभटजी विचार करू लागले.. मुंबईत दोन हजार मिळाले आणि इथे एक हजार.. एवढे पैसे का देतात आपल्याला? काय असावे त्या पुडक्यात? नुसते खाऊ असल्यास, एवढे पैसे?काही तरी गडबड आहे निश्चित.

भटजींच्या मुलीचे कार्ड आले -क्लासची पंधराहजार फी भरायची आहे चार दिवसात.. अंतूभटजी घाबरले.. एवढे पैसे उभे करायचे, ते पण चार दिवसात.. त्याचेकडे शेठजीनी दिलेले पाच हजार होते, मग अजून दहा हजार..

भटजीनी धीर करून शेठजीकडे दहाहजरांची मागणी केली.

“देऊ.. दहा हजार कर्ज नव्हे, तुम्हाला देऊ.. फक्त आमचे एक पार्सल भुलेश्वरला पोहोचवा..

भटजी घाबरले.. पण पैसे तर हवे होते, धीर करून म्हणाले 

“काय असत त्या पार्सलात..

“त्याची चिंता तुम्हाला नको… तुम्ही फक्त तुमच्यासोबत न्यायचे.

“पण काही अघटित..

“काही होत नाही.. तुमच्या कपड्याकडे पाहून कोणी तपासत नाही.. काळजी करू नये..

शेवटी भटजी तयार झाले.. यावेळी एका सुटकेंसमध्ये वरखाली भटजींचे सदरे, पंचे ठेवून मध्ये शेठजींचे पार्सल होते. शेठजीनी भटजीना दहा हजार दिले. नेहेमीप्रमाणे भिवा स्टॅन्डवर त्याना गाडीत बसवून गेला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “टमाटे कसे आहेत?…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

 

🔆 मनमंजुषेतून 🔆

☆ “टमाटे कसे आहेत?…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

भाजीच्या दुकानात आपण नेहमीच जात असतो. कधी एकटे जातो, कधी बरोबर बायको असते किंवा नवरा असतो. पण बऱ्याच वेळेला आपण आपल्याच तंद्री मध्ये असतो. त्यामुळे आसपास घडणाऱ्या मजेशीर घटनांना आपण मुकत असतो. आपण नेहमीच वर्तमान काळात राहू शकलो, आणि आसपास घडणाऱ्या घटनांशी समरस होऊ शकलो, तर भरपूर आनंद मिळू शकतो, हे नक्की. हा लेख आणि ही घटना यावरच आहे.

—–

आज सकाळी फिरून येतांना नेहेमीप्रमाणे साने डेअरी मध्ये दूध घेतले. मुलीकडे सकाळी जातांना भाजी न्यायाची होती, म्हणून बायको बाजूच्याच भाजीच्या दुकानात भाजी घ्यायला गेली. दुकानदार तरुण मुलगाच होता. मी तिथेच उभा होतो.. तेवढ्यात एक मॅडम दुकानात आल्या —

मॅडम : अरे, टमाटे कसे आहेत ? 

दुकानदार मुलगा : मॅडम, टमाटे एकदम मस्त आहेत. आज न्याल तर पुन्हा नक्की परत याल.

मॅडम : अरे कसे म्हणजे तसे कसे नाही. कसे आहेत ?

मुलगा : मॅडम लाल आहेत आणि हिरवे पण आहेत. घरी गेल्यावर लगीच सार किंवा कोशिंबीर करायची असेल, तर पूर्ण पिकलेले लाल घेऊन जा. भाजी करायची असेल तर हिरवे टमाटे न्या. थोडे कमी पिकलेले पण आहेत. एकदम लहान आहेत आणि मोठे पण आहेत. कुठले देऊ?

मॅडम : अरे कसे आहेत, म्हणजे कसे दिले ? 

मुलगा : मॅडम, अजून दिले कुठे ! आताच तर दुकान उघडले आहे. आताच एका मॅडम ना भेंडी दिली, एकांना पालक दिला. टमाटो ची बोहोनी तूम्हीच करा. किती देऊ?

मॅडम : अरे, पण देणार कसे, ते सांग ना.

मुलगा : मॅडम वजन करूनच देणार. तुमच्याकडे पिशवी असेल तर त्यात देईन. नाहीतर आमची कापडी पिशवी घेऊन जा आणि उद्या पुनः भाजी न्यायला याल, तेव्हा पिशवी घेऊन या. पिशवी ८ रु ची आहे, पण मी फक्त ५ रु डिपॉझिट घेतो. आता प्लॅस्टिक कॅरी बॅग ठेवत नाही, कारण त्यावर बंदी आहे. आम्हाला थोडा त्रास होतो, पण बंदी योग्यचं आहे. कुठल्याही धोरणाला विरोध करायचा, म्हणून विरोध करणे, हे काही बरोबर वाटत नाही. आपण सगळ्यांनी बंदी चे पालन केले, तर शेवटी फायदा आपलाच आहे. बोला किती देऊ टमाटे ?

मॅडम : अरे भाव सांगशील का नाही ! भाव केल्याशिवाय कसे घेणार !

मुलगा : मॅडम, इथे भाव होत नाही. एकदम फिक्स्ड रेट, असे म्हणून त्यांनी बाजूच्या मोठ्या बोर्ड कडे बोट दाखवले.

बोर्ड वर लिहिले होते “इथे भाव होणार नाही, वाजवी भावात उत्तम माल इथे मिळेल. आज भाजी न्याल, तर रोजचं भाजी न्यायला इथेच याल”. खाली भाज्यांची नावे व त्यांचा किलोचा भाव लिहिलेला होता.

मॅडम नी बोर्ड बघितला आणि म्हणाल्या १ किलो लाल टमाटे दे.

मॅडम : अरे आधीच बोर्ड दाखवायचा नाही का 

मुलगा : मॅडम, तुम्ही टमाटो चा रेट विचारलाच कुठे !

भाजी घेऊन मॅडम बाहेर पडल्या आणि बायको पण भाजी घेऊन बाहेर आली.

 मॅडम आणि दुकानदार मुलाचा संवाद, हे आपल्या सगळ्यांचेच विचारांची देवाण – घेवाण करण्याचे एक बोलके उदाहरण आहे. बऱ्याच वेळा आपले पण असेच होते. आपल्याला काय पाहिजे आहे किंवा आपल्याला काय सांगायचे आहे, हे समोरच्याला समजेल अशा भाषेत आपल्याला सांगता येत नाही. “नाही, मला असे म्हणायचे नव्हते”, “माझ्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता”, अशी लांबण नंतर सुरु होते. त्यामुळे समज – गैरसमज, वाद – विवाद, भांडण – तंटे, यांचे पेव फुटते / ताण – तणाव वाढतात. अशा घटना घरी घडतात, बाहेर घडतात, ऑफिस मध्ये घडतात. आणि त्याचे परिणाम आपण बघतोच आणि अनुभवतो.

म्हणूनच गुरुजन सांगतात : Be specific, Be to the point, Be brief.

आता यापुढे भाजीवाल्याशी संवाद साधतांना, तिथला बोर्ड बघून मग ठरवायला पाहिजे कि आपण काय विचारायला पाहिजे हे लक्षात आले.

चार दिवसांनंतर (तेच ठिकाण, साधारण तीच वेळ) —-

सकाळी फिरायला गेलो, डेअरी मध्ये दूध घेतले. बाजूच्या भाजीच्या दुकानात बायको भाजी घ्यायला गेली. मी तिथेच उभा होतो. तेवढ्यात एक मॅडम दुकानात आल्या, ‘अरे टमाटे कसे आहेत’ ? बघितलं तर या मॅडम वेगळ्या होत्या. मला वाटलं, की मुलगा आता भाव लिहिलेल्या बोर्ड कडे बोट दाखवेल. पण दुकानदार मुलगा व मॅडम यांची पुढची डायलॉग बाजी साधारण परवा सारखीच झाली. मॅडम स्मित हास्य करत, टमाटे घेऊन बाहेर पडल्या.

बायकोची भाजी घेऊन झाली. पैसे देतांना मी मुलाला विचारले —

मी : दादा, एक विचारू का ?

मुलगा : काका जरूर विचारा 

मी : टमाटे कसे आहेत विचारल्यावर, तुम्ही रेट म्हणजे भाव सांगायला पाहिजे ना ! अशी लांबण का लावता. एखादा गिऱ्हाईक चिडेल ना !

मुलगा : काका, you are absolutely right

मुलगा : काका, आमचा धंदा एकदम रुक्ष आहे. भाव सांगायचा, भाजी द्यायची आणि पैसे घ्यायचे. थोडे गंमतीशीर बोलायला किंवा ऐकायला मिळाले, तर तेवढीच मजा येते. दिवस छान जातो. येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाची बोलण्याची पद्धत वेगळी असते. गिऱ्हाईकाच्या चेहेऱ्याकडे बघून मला समजते, की फिरकी घ्यावी का ! किंवा नाही काही गिऱ्हाईक पण माझी फिरकी घेतात. मजा येते. दुकानात उभी असलेली मंडळी पण काही वेळा चर्चेत भाग घेते. लोकांच्या आणि माझ्या चेहेऱ्यावर हास्य येते.

मी : (मुलाचं इंग्रजी वाक्य आणि विचार ऐकून मी अवाकच झालो) बरोबर आहे. मला ऐकतांना मजाच आली.

मुलगा : काका ‘joy and happiness is to be spread. Is it not !’ पण त्याकरता मजा happiness generate व्हायला पाहिजे ना ! तुम्हाला मजा आली. तुम्ही चार लोकांना सांगणार, एखादा लिहिणारा असेल तर तो whats app वर टाकणार आणि ते ५० जण वाचणार. This is the chain of joy.

मुलानी टोपलीतलं एक सुंदर मोठं सफरचंद माझ्या हातात दिलं आणि म्हणाला —

मुलगा : This is for you. This is for spreading the taste. तुम्ही दुकानात नेहेमी भाजी घेता, पण फळे कधी घेत नाही. आता पुढच्या वेळेला भाजी पण घ्याल आणि फळे पण. This is called spreading of business.

मी : वाह, क्या बात है ! दादा, चहा घेणार का ? 

मुलांनी होकार दिला आणि मी बाजूच्या दुकानदाराला खूण करून ३ कटिंग चहा मागवले.

चहाचे घोट घेतांना मुलाला म्हटलं : This is for spreading togetherness.

मुलाला थँक्स म्हणून आणि बाय करून आम्ही हसत हसत बाहेर पडलो.

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जयंत नारळीकर : गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही… भाग -१- लेखक : अज्ञात ☆ माहिती संग्राहक– श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ जयंत नारळीकर : गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही… भाग – १  – लेखक :  अज्ञात ☆ माहिती संग्राहक– श्री अमोल अनंत केळकर

विज्ञानकथा मराठी भाषेमध्ये आणून लोकप्रिय करणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली आहे, ही बाब विज्ञानाविषयी लिहिणाऱ्या सर्व लेखकांसाठी सन्मानजनक आहे. जयंत नारळीकर हे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ.. त्यांनी संशोधनासोबत साहित्याची देखील सेवा अतिशय जिव्हाळ्याने केली आहे. मराठी वाचकांत विज्ञानाची आवड रुजवण्यामध्ये नारळीकर यांच्या विज्ञानकथांचा खूप मोठा वाटा आहे. विज्ञानकथा लिहिणं हा खूपच अवघड विषय… कारण एकाच वेळेस तुम्हाला विज्ञान आणि कल्पनाशक्ती यांची सांगड घालावी लागते. आजच्या विज्ञानकथांमधून भविष्यातील विज्ञान जन्म घेत असते असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. जयंत नारळीकर यांचे संमेलनाध्यक्षपद म्हणजे साहित्याचा हा विज्ञानाच्या दिशेने होणारा प्रवास खूप दिलासा देणारा…

विज्ञान समजून घ्यायला त्या व्यक्तीची मातृभाषाच सर्वात उत्तम पर्याय असतो. इंग्रजीत जेव्हा एखादी माहिती मिळते तेव्हा मेंदू प्रथम त्याचे रूपांतर मायबोलीमध्ये करतो आणि समजून घेतो. वेळ आणि परिश्रम दोन्हींचा अपव्यय.. सदर ज्ञान मातृभाषेत उपलब्ध असल्यास जास्त सहजगत्या आत्मसात होते असे नारळीकर म्हणायचे.. मराठी भाषा ही नारळीकर यांच्यासाठी पावित्र्याची नाही तर जिव्हाळ्याची बाब आहे. त्यामुळे त्यांच्या कथेत इंग्रजी शब्दाऐवजी अट्टाहासी मराठी शब्द वापरायचा द्राविडी प्राणायाम त्यांना करावा लागला नाही. भाषेच्या सहजतेमुळे त्यांचे लिखाण वाचले गेले आणि विज्ञानकथा हा साहित्य प्रकार मराठीत लोकप्रिय झाला. मराठी साहित्याचे विश्व खऱ्या अर्थाने विस्तारणारी व्यक्ती साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली आहे याचा अगदी “दिलसे” आनंद झाला आहे. ❤️

‘चार नगरांतील माझे विश्व’ या जयंत नारळीकर यांच्या आत्मवृत्ताला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकात त्यांची जडणघडण कशी झाली हे समजून घेता येते. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूरात झाला. विद्वत्ता ही जणु त्यांच्या घरामध्ये पाणी भरत होती. मोठा जयंत आणि छोटा अनंत असे आटोपशीर कुटुंब. आई सुमती संस्कृत भाषेमधील पंडिता. तसेच एसराज या वाद्यावर त्यांची हुकूमत. (एसराज म्हणजे काय पाहायचे असेल तर सत्येंद्रनाथ बोस यांची पोस्ट पहा. ) प्रसिद्ध सांख्यिकी विजय शंकर हुजुरबाजार हे जयंतरावांचे मामा.

जयंत आणि अनंत दोघे आईला ‘ताई’ म्हणायचे आणि वडिलांना ‘तात्या’. रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ. रँग्लर ही पदवी लय मोठी. केंब्रिज विद्यापीठामध्ये दरवर्षी गणित विषयात पहिल्या वर्गात पास होणारे रँग्लर म्हणवले जातात. जयंतराव आणि त्यांचे वडील हे दोघे पण रँग्लर. ❤️वि. वा. नारळीकर खूपच हुशार. वि. वा. यांचे आईन्स्टाईनने मांडलेल्या सापेक्षतावाद सिद्धांतावर प्रभुत्व होते. त्यांना १९२८ साली BSc मध्ये ९६% मार्क पडले होते. त्यांना केंब्रिजमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी जे. एन. टाटा स्कॉलरशिप मिळाली. त्यांची हुशारी पाहून कोल्हापूर संस्थानाने त्यांना इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी मदत केली, परत आल्यावर संस्थानात नोकरी करायची या अटीवर.

कोल्हापूरच्या जवळील “पाचगाव” हे नारळीकर यांचे मूळगाव. जयंतरावांचे आजोबा वासुदेवशास्त्री भिक्षुकी करून पोट भरत होते. मात्र वि. वा. यांनी घराण्याचे नाव रोशन केले. घराण्याच्या नावाची पण एक मजा आहे. त्यांच्या घरी असलेल्या आंब्याच्या झाडाला म्हणे नारळाएवढे आंबे लागत.. म्हणून यांचे नाव नारळीकर. अशी दंतकथा लहानपणापासून ऐकली असल्याचे जयंतराव सांगतात, मात्र त्यांनी कधी ते झाड पाहिलेले नाही. त्यांचा जन्म जरी कोल्हापूरच्या रांगड्या मातीत झाला असला, तरी त्यांचे कुटुंब वाराणसी येथे स्थलांतरित झाले होते. रँग्लर वि. वा. नारळीकर यांना बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभागप्रमुखपदी निमंत्रित करण्यात आले होते. कोल्हापूर संस्थानाने दिलेली रक्कम परत करून वि. वा. १९३२ मध्ये वाराणसी येथे स्थायिक झाले होते.

घरात मोठ्या माणसांचा राबता. विनोबा भावे ते गोळवलकर गुरुजी अशी दोन ध्रुवावरील माणसे त्यांच्या घरी यायची. (दाढी ही एकच सामाईक बाब असावी त्यांच्यात, जसे रविंद्रनाथ टागोर आणि आपल्या भाऊमध्ये आहे. भाऊचे नाव सांगायला नको ना) सी. डी. देशमुख यांच्यासारखा अर्थतज्ज्ञ असो, वा सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखा शिक्षणतज्ज्ञ.. दीनानाथ दलाल यांच्यासारख्या जगप्रसिद्ध चित्रकार असो वा पु. ल. देशपांडे यांच्यासारखा हरफनमौला… तुकडोजीमहाराज असो वा रँग्लर परांजपे (पहिले भारतीय रँग्लर) कोणतीही महत्त्वाची मराठी व्यक्ती वाराणसीमध्ये आली तर नारळीकर कुटुंबाकडे त्यांचे जेवण ठरलेले असे. रँग्लर परांजपे यांची मुलगी शकुंतला, नात सई परांजपे (होय त्याच.. सुप्रसिद्ध दिग्दर्शिका.. जयंतराव आणि त्या समवयस्क) यांचे देखील येणेजाणे होते. जयंत नारळीकर यांचा ८० वा वाढदिवस आयुकामध्ये साजरा झाला, तेव्हा सईने त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्याच एका विज्ञानकथेवर एक नाटक बसवून सादर केले होते.

लहानपणी आई जयंत, अनंत यांना गणिताची कोडी घालत असे.. त्यामुळे त्यांना गणित आवडायला लागले. आई दोघांना रोज झोपण्यापूर्वी इंग्रजी, मराठी मधील नामांकित लेखकांच्या गोष्टी क्रमशः भागात सांगत असे. मात्र उत्सुकता ताणली गेली की पोरं थोडीच २४ तास वाट पाहणार.. सकाळी उठल्यावर पुस्तक हाती घेणे आणि गोष्टीचा फडशा पाडणे. यातूनच जयंतरावांना वाचनाची आवड लागली. (पोरांना पुस्तक वाच म्हणले की वाचत नाहीत.. त्यापेक्षा ही आयडिया भारी आहे राव, ट्राय केली पाहिजे आपण पण.. ) सुमतीबाई यांचा भाऊ मोरेश्वर हुजुरबाजार हा एमएससी करण्यासाठी वाराणसी येथे नारळीकर कुटुंबात तीन वर्षं राहिला होता. तेव्हा घरातील फळ्यावर रोज मोरुमामा जयंतसाठी एक गणितीय कोडे लिहून ठेवायचा.. जोवर ते सुटत नाही, तोवर जयंतला चैन पडायची नाही. त्यामुळे शाळेतील गणिताचा अभ्यास आधीच झालेला असायचा. ❤️

जयंत आणि अनंतचे शिक्षण वाराणसी येथे हिंदी माध्यमात सुरू झाले. हिंदी ही रोजची व्यवहार भाषा.. घरात मराठी भाषा बोलली जायची, मराठी पाहुण्यांची वर्दळ, वर्षा दोनवर्षाने सुटीमध्ये महाराष्ट्र भेट व्हायची.. त्यामुळे मराठी एकदम पक्की. इंग्रजी पुस्तकातील गोष्टी वाचूनवाचून या भाषेची पण तयारी, तर सकाळ-संध्याकाळ संस्कृत श्लोकांचे पाठांतर.. जयंतराव लहानपणीच बहुभाषिक झाले. एका रात्री सर्वपल्ली राधाकृष्णन जेवायला आले असताना या दोघा भावांनी शंकराचार्यांचे दशश्लोकी स्तोत्र सादर करायचा प्रयोग केला. एका खोलीत बसून पेटीच्या साथीवर हे दोघे गात आहेत.. आणि बाहेर लॉनमध्ये बसलेली मंडळी गप्पा मारणे थांबवून हे ऐकत आहेत.. त्यांना वाटले की गाणे आकाशवाणीवर सुरू आहे. स्तोत्र संपल्यावर त्यांना समजले की, अरे ही तर या दोघा भावांनी केलेली गुगली आहे. दोघांचे गाण्याचे, पठणाचे आणि उच्चारांचे खूप कौतुक झाले. प्रयोग प्रचंड यशस्वी.

रस्त्यावर डोंबा-याचा पायाला काठी बांधून चालण्याचा खेळ पाहिला. घरी तसेच करायचा प्रयत्न आणि विशेष म्हणजे त्याला ताई तात्यांचे प्रोत्साहन आणि सहाय्य. दोन्ही पोरं पायांना काठी बांधून चालायला लवकरच शिकली देखील. अर्थात लहानपणी अनेक अयशस्वी प्रयोग देखील केले आहेत. गाद्यांवर उड्या मारताना एकदा अंदाज चुकला आणि उडी थेट पलीकडल्या काचेच्या कपाटावर.. तेव्हा घुसलेल्या काचेचा व्रण आजही जयंतरावांच्या पायावर आहे. त्यासोबत बालपणातील अजून एका घटनेची आठवण त्यांच्या हृदयावर कोरली आहे. नारायणराव व्यास हे नारळीकर कुटुंबाचे स्नेही. त्यांचे नेहमी येणेजाणे. दररोज लाड करणारे व्यासमामा एक दिवस वेगळ्या मूडमध्ये होते. जयंत आणि अनंत दोघांना बोलून सांगितले की तुम्ही दोघे खूप ऐदी आहात.. सगळे आयते पाहिजे तुम्हाला.. घरातले काहीच काम करत नाही. अभ्यास करताना देखील दिसत नाही.

कधीही बोलून न घेण्याची सवय असलेले जयंत, अनंत या गोष्टीने खूपच नाराज झाले. व्यासमामा तेवढ्याने थांबले नाहीत, तर त्यांनी वि. वा. आणि सुमतीबाई यांचीदेखील हजेरी घेतली. तुम्ही मुलांना धाक लावत नाही, अशी तक्रार केली. वि. वा. म्हणाले “हे दोघे शाळेमध्ये कायम वरचा नंबर काढतात. त्यामुळे कधी बोलायची गरज पडली नाही. ” व्यासमामा म्हणाले, “आता अभ्यास सोपा आहे म्हणून ठीक. पण कष्ट करायची सवय लागली पाहिजे. ” झाले… तात्यांचा खटका पडला आणि रोज पहाटे उठून चार तास अभ्यास करायचे फर्मान काढले गेले. दोघा भावांनी तेव्हा मामांचा किती उदोउदो केला असेल काय माहित.. पण हीच अभ्यासाची सवय जयंत, अनंत यांना जीवनात यशस्वी करून गेली. जयंतराव आज व्यासमामांबाबत कृतज्ञता व्यक्त करतात. ❤️

मॅट्रिक परीक्षेत घवघवीत यश मिळवून जयंतराव उत्तीर्ण झाले, मात्र त्यांच्यापुढे एक प्रश्न उभा राहिला. गणित, विज्ञानासोबत संस्कृतची आवड होती. सर्वच विषयात चांगले मार्क होते. पण मॅट्रिकच्या पुढे संस्कृत आणि विज्ञान हे दोन्ही विषय एकत्र घेता येत नाहीत. एकतर आर्ट्स घ्या किंवा सायन्स. (आपल्याकडे लयच बंधन.. बाहेर देशात तसे नाही. जेनिफर डॉडनाने बायोकेमिस्ट्री विषय घेऊन आर्टसची पदवी मिळवली होती) नारळीकर म्हणतात, “अशी विभागणी चुकीची आहे. आजच्या स्थितीत कलाशाखेचा विज्ञानशाखेशी संवादच उरत नाही, म्हणून उपविषय निवडणे ऐच्छिक असावे. ”

बनारसमध्येच महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले. घरात वडील वैज्ञानिक असल्याने कोणत्याही संकल्पनेचा शेवटपर्यंत पिच्छा करायची सवय लागली. अनेक दिग्गज शास्त्रज्ञांची व्याख्याने विद्यापीठात आयोजित केली जात होती. बुद्धीला नवी क्षितिजे खुणावत होती. १९५७ साली बी. एसस्सी. च्या परीक्षेमध्ये अभूतपूर्व, उच्चांकी गुण प्राप्त करून जयंतराव विद्यापीठात पहिले आले. वडीलांप्रमाणे जयंतरावांना देखील टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठात जाण्यासाठी बोट पकडली.

केंब्रिज येथे त्यांनी बीए, एमए व पीएचडी या सर्व पदव्या मिळवल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. रँग्लरची परीक्षा लय भारी. परीक्षार्थी विद्यार्थ्याने जीव मुठीत घेऊन हॉलच्या मध्यभागी ठेवलेल्या स्टूलावर बसायचे (या ट्रायपॉडमुळे ही परीक्षा ‘ट्रायपॉस’ परीक्षा या नावाने देखील ओळखली जाते.) समोर प्रश्नांची फेरी झाडायला प्राध्यापकांची फौज. चहूबाजूंनी हल्ला करून बिचाऱ्या विद्यार्थ्याला जेरीस आणणारी.. विद्यार्थ्याच्या ज्ञानाची खरी कसोटी पाहिली जाते. या परीक्षेत जो टिकला, तोच जिंकला. १९५९ मध्ये बी ए (ट्रायपॉस) परीक्षेच्या वेळी जयंतराव अपघातग्रस्त होते. पायाला प्लास्टर.. मात्र त्यांनी सर्व प्राध्यापकांना अशी उत्तरे दिली की, त्या परीक्षेत जयंतराव सर्वात पहिले आले. म्हणजे सिनियर रँग्लर झाले. बापसे बेटा सवाई. ❤️

स्टीफन हॉकिंग आणि नारळीकर दोघे एकाच वेळी केंब्रिज विद्यापीठात विद्यार्थी होते. जयंतरावांच्या एक दोन वर्षं मागे होता स्टीफन. त्यांची भेट स्टीफन केंब्रिजमध्ये यायच्या आधीच झाली. १९६१ मध्ये इंग्लंडमधल्या रॉयल ग्रीनिच ऑब्झर्व्हेटरीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विज्ञान परिषदेमध्ये जयंतराव व्याख्यान देत होते. तेव्हा ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून आलेल्या स्टीफनने सर्वात जास्त प्रश्न विचारले होते. याच विज्ञान परिषदेत दोघांनी टेबलटेनिसचा एक सामना देखील खेळला, ज्यात जयंतराव विजयी झाले होते. (तेव्हा स्टीफनचा आजार जास्त बळावला नव्हता) स्टीफनची आठवण सांगताना जयंतराव म्हणतात, “विद्यार्थीदशेत असलेला स्टीफन पाहता तो नंतर एवढे मोलाचे संशोधन करेल असे वाटले नव्हते. तेव्हा तो अगदी सामान्य विद्यार्थी होता. त्याने त्याच्यामधले ‘बेस्ट’ नंतर बाहेर काढले. ” १९६६ साली नारळीकर यांना ॲडम पारितोषिक मिळाले. स्टीफन हॉकिंग, रॉजर पेनरोज यांच्यासोबत विभागून. खुद्द स्टीफन हॉकिंग यांनी फोन करून नारळीकर यांना ही बातमी दिली होती. गणितात मिळणारी टायसन, स्मिथ आणि ॲडम अशी तीनही बक्षिसे नारळीकरांनी पटकावली.

एम ए करत असताना जयंतरावांनी सन १९६० मध्ये खगोलशास्त्रसाठी असलेले टायसन पारितोषिक मिळवले. तर पीएचडी करताना सन १९६२ मध्ये स्मिथ पारितोषिक देखील पटकावले. १९६३ साली पीएचडी पूर्ण केली. पीएचडी करताना जयंत नारळीकर यांना सर फ्रेड हॉएल यांचे मार्गदर्शन लाभले. हॉएल हे संशोधनातील मोठे नाव. आइन्स्टाइनने मांडणी केलेला बिगबँग सिद्धांतातील त्रुटी काढून दाखवणारा हा शास्त्रज्ञ. अनेक वर्षं बिगबँग समर्थक आणि हॉएल यांच्यात वादाच्या फेरी होत होत्या.. कधी या गटाची तर कधी त्या गटाची सरशी होत होती. नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल मात्र यांच्यासोबत “कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी” मांडली आणि या वादावर पडदा पडला.

आइन्स्टाइन म्हणतो की, विश्व विस्तारत आहे. आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्याने प्रसंगी सिद्धांताला स्थिरांकाचे ठिगळ देखील लावले आहे. तरीही ताऱ्यांच्या जन्माचे गणन करताना काही गणितीय त्रुटी राहून जातात. यावर हॉएलने आक्षेप घेतले. मात्र नारळीकर आणि हॉएल यांनी संशोधन केले असता असे लक्षात आले की विश्व वेळोवेळी प्रसरण देखील पावते आणि आकुंचन देखील. (पुढे हबल दुर्बिणीने घेतलेल्या छायाचित्रांवरून हे सिद्ध देखील झाले. ) हा शोध खूप महत्त्वाचा होता. एका भारतीय शास्त्रज्ञाने आइन्स्टाइनवर मात केली, ही बाब “१६ वर्षे वयाच्या देशासाठी” खूप महत्त्वाची होती. (देशाला स्वातंत्र्य मिळून जेमतेम १६ वर्षे झाली होती. ) भारत सरकारने त्यांना ‘पद्मभूषण’ जाहीर केला. १९६५ साली जेव्हा ते काही महिन्यासाठी भारतात आले, तेव्हा त्यांना बघायला तोबा गर्दी.. जयंत नारळीकर हे खूप मोठे स्टार झाले होते.. लालबहाद्दूर शास्त्रींनी देखील त्यांना आश्वासन दिले की, ‘तुम्हाला जेव्हा भारतात कायमचे परत यावे असे वाटेल, तेव्हा मला सांगा.. तुम्ही म्हणाल त्या संस्थेत तुम्हाला नोकरी मिळेल. ‘ 

– क्रमश: भाग पहिला 

जय गणित, जय विज्ञान

#richyabhau

#नारळीकर_जयंत

आपला ब्लॉग : https://richyabhau. blogspot. com/ 

माहिती संग्राहक : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ राजे आणि दुसरं घर..! ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीता जोशी ☆

सुश्री सुनीता जोशी 

📖 वाचताना वेचलेले 📖

राजे आणि दुसरं घर..! ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीता जोशी

अवघ्या त्रेपन्न वर्षांचा एक सत्पुरुष.. पंचतत्वात विलीन झाला आणि… चित्रगुप्ताच्या दरबारात हजर झाला..

चित्रगुप्तानं बसायला मानाचं आसन दिलं – – अन् राजांना अपमान झालेला तो दरबार आठवला..

दोघांनीही त्यावर स्मितहास्य केलं.

“चला राजे, तुम्हांला स्वर्गाच्या दारापर्यंत सोडायची जबाबदारी माझी आहे. आयुष्यभर पायाला भिंगरी लावून फिरलात, आता जरा उसंत घ्यावी. “ चित्रगुप्त अंमळ हुशारीने म्हणाला.

राजे जागचे हलले नाहीत, अन् तो चिंताक्रांत झाला.

“चलावं महाराज, याचसाठी तर असतो मानव जातीचा अट्टहास.. “ यावेळी स्वरात जरा अजीजी होती.

“ नको देवा, अर्ध्यातच बोलावलंस न विचारता…. अन् ह्या स्वर्गाचा आग्रह नव्हताच कधी मनात. श्रींच्या इच्छेचं स्वराज्य तर झालं, सुराज्यासाठी तू वेळ कुठे दिला.. इथे स्वर्गात गेलो तर देवत्व मिळेल, आणि खाली मूर्त्या आणि टाक होतील माझ्या. मला मानवच राहू देत आणि राहिलेला अर्धा डाव पूर्ण करु दे. “

“भाग्य लिहीलं गेलंय राजे, आता बदल नाही. या दरबारातून थेट स्वर्गात, याला पर्याय नाही.“

राजे पुन्हा हसले, “ देवा, माझी वही नीट तपासलीत ना, तुरी द्यायची कला अवगत आहे मला. “

स्वर्ग सोडून राजाने पृथ्वीचाच हट्ट धरला. आता मात्र चित्रगुप्ताचा नाईलाज झाला. जगत्पिता ब्रह्मदेवाशी बोलणी करुन, राजांसोबत महाराष्ट्रातील गर्भवतींच्या स्वप्नात दाखल झाला.

गर्भवती १

देवी, हे मूल देतोय तुला, तेजस्वी आहे, राजकारणात जाईल, सुराज्य देईल. ’

‘ नको देवा, शिकून सवरुन नोकरी करेल असंच मूल हवंय मला, दुसरं घर बघ. ’

गर्भवती २

‘ देवी, हे मूल देतोय तुला, संस्कारी आहे, रांझ्याच्या पाटलाचे हात तोडेल, शत्रूकडच्या स्त्रीलाही सन्मान देईल. ’ 

‘ नको देवा, आपण भलं आणि आपलं घर भलं असं मानणारंच मूल दे मला, दुसरं घर बघ. ’

गर्भवती ३

‘ देवी, हे मूल देतोय तुला, परोपकारी आहे, रयतेचं हित बघेल, कुणाला उपाशी ठेवणार नाही, प्रसंगी धनिकाकडून घेईल व गरीबाला देईल. ’ 

‘ नको देवा, भौतिक सुखांची सवय झालीय मला, असं उपद्व्यापी मूल नकोय मला, दुसरं घर बघ. ’

गर्भवती ४, ५, ६…

‘ देवींनो, होऊ घातल्या मातांनो, इतिहास बदलू शकणारं एक मूल कूस मागतंय.. स्वर्गाचा दरवाजा सोडून, चंद्रमौळी अंगण मागतंय.. सुराज्याच्या राहिलेल्या स्वप्नासाठी, स्वतःच निर्मिलेल्या राज्यात, पुनर्जन्मासाठी एक जिजामाता शोधतंय.. कुणीतरी या पुढे आणि आपल्या उदरात सामावून घ्या हा सूर्य. ’ 

‘ देवा, कितीदा सांगावं तुला, जे आहे ते सहन करावं, जे होईल ते स्वीकारत जावं, निगुतीनं वागावं अन् स्वतःचं पहावं, हेच अंगात भिनलंय आता. अन्याय बिन्याय, सत्यासाठी लढा, वगैरे वगैरे म्हणजे लष्कराच्या भाकरी आहेत रे, नाही भाजायच्या आम्हांला… हे सूर्याचं तेज सांभाळणारी जिजाऊ शेजारच्या घरात आहे बहुतेक. आमचा पिच्छा सोड देवा आणि कृपा करुन दुसरं घर बघ. ‘ 

हताश झालेल्या स्वरात चित्रगुप्त म्हणाला,

“ राजे, उणीपुरी तीनशे चाळीस वर्ष फिरवताहात मला. एव्हाना तुमचा देव केलाय हो लोकांनी, मणभर सोन्याचं सिंहासन, आणि रुप्याचे टाक झालेत तुमचे आणि मूर्त्याही विसावल्यात देव्हा-यात. पुतळे तर तुम्ही न पाहिलेल्या न जिंकलेल्या प्रदेशातही उभारलेत. तुमचा पुनर्जन्म हा तर तुमचं नावं घेऊन मनमानी करणा-यांनाही घात ठरेल. त्यांनाही नकोसा असेल हा पुनर्जन्म. आता तरी स्वर्गात चला. “

“ देवा, असा हताश झालो असतो तर चार मित्र घेऊन भवानीसमोर शपथ घेतलीच नसती.. कोवळ्या पोराला घेऊन आग्र्याहून सुटलोच नसतो.. सर्व काही गमावलेल्या तहातून उभा राहिलोच नसतो.. अमर्याद सागराशी पैज घेतलीच नसती.. दक्षिणेचा दिग्विजय मिळवलाच नसता.. स्वराज्यासाठी आदर्श आज्ञापत्रे लिहीलीच नसती, आणि…. माझ्यानंतरही चालणारं राज्य निर्माण केलंच नसतं… एकदा सुराज्य येऊ दे देवा, तुम्ही म्हणाल तेथे येईन. “ 

पण तोपर्यंत…?

तोपर्यंत – – 

राजांचा आत्मा न मागितलेल्या देवत्वाच्या माळेत गुंफलेला राहणार,

आणि 

मावळ्यांचे हात केवळ ढोल-ताशांच्या गजरात गुंतलेले राहणार.. !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “ऐवज विचारांचा” – प्रा. स. ह. देशपांडे निवडक लेखसंग्रह ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “ऐवज विचारांचा” – प्रा. स. ह. देशपांडे निवडक लेखसंग्रह ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक :  ऐवज विचारांचा “.

स. ह. देशपांडे निवडक लेखसंग्रह

पृष्ठे : ४३९

मूल्य : ५००₹ 

प्रा. स. ह. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष सरत असताना त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह ‘ऐवज विचारांचा’ प्रकाशित होत आहे. प्राध्यापक देशपांडे यांनी पाच दशकांहूनही अधिक काळ विपुल लेखन केले व महाराष्ट्राच्या विचार-विश्वावर स्वतःचा एक विशिष्ट ठसा उमटवला. ‘राष्ट्रवाद’ या विषयाचे त्यांचे लिखाण हे अनेक मान्यवरांकडून व व्यासपीठांवरून चर्चिले गेले.

प्रस्तुत पुस्तकात स. हं. च्या लेखांची विभागणी ‘राष्ट्रवाद’, ‘सामाजिक आणि आर्थिक’, ‘व्यक्तिचित्रे’ आणि ‘संकीर्ण’ या चार प्रकारांत केली आहे. या सर्व लेखांतून प्रा. देशपांडे यांची स्वतंत्र लेखनशैली, विचारांतील सखोलता व सूक्ष्मता, तसेच तर्कशुद्ध व चिरेबंद मांडणी या बाबी वाचकाला सातत्याने जाणवत राहतील. आजही ताजे वाटणारे त्यांचे विचारगर्भ लेखन पुढील पिढ्यांनाही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.

ग्रंथात चार विभाग केले केले आहेत.

विभाग एक : राष्ट्रवाद

या विभागात आठ लेख आहेत. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल, कार्यपद्धतीबद्दल स. ह. देशपांडे यांना काय वाटतं होते, ते मांडण्यात आले आहे.

विभाग दोन : समाजकारण व अर्थकारण

या विभागात पाच लेख आहेत. यामध्ये चार लेख विविध विषयांवर आहेत.

विभाग तीन : व्यक्तिचित्रे

या विभागात सहा लेख आहेत. यामध्ये पाच जणांचे व्यक्तिचित्रण आहे.

विभाग चार : संकीर्ण

या विभागात सात लेख आहेत. यामध्ये स. ह. देशपांडे यांच्याबद्दल लिहिलेले लेख आहेत.

स. ह. देशपांडे यांचे सुपुत्र डॉ. चंद्रहास देशपांडे यांनी ‘सलाम, ‘त्या’ ध्यासाला, ‘त्या’ अभ्यासाला… !’ या लेखात आपल्या वडिलांच्या पैलूंबद्दल लिहिले आहे. त्यातील काही परिच्छेद इथे देत आहे. ते लिहितात- ‘सल्लामसलत, चर्चा, विचारमंथन, मतप्रवाहांची देवाण-घेवाण, या सध्याच्या जगात (दुर्दैवाने) होत चाललेल्या शिक्षण पद्धती हा तर बाबांच्या शिक्षकी प्रकृतीचा आणि प्रवृत्तीचा आत्माच होय. बऱ्याच वर्षांपूर्वी पार्ल्याच्या घरी नियमितपणे एक चर्चासत्र बाबा मुद्दाम घडवून आणीत. अनेक विषयांवर त्यात खुली, खेळीमेळीच्या वातावरणातील, पण गंभीर चर्चा व्हायची, वादाच्या फैरीही झडायच्या. ’

‘स्वतःच्या मतांबद्दल आग्रही, नव्हे क्वचितप्रसंगी अत्याग्रही राहूनही, वैचारिक विश्वात वावरताना मात्र बाबा सदैव विचारस्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्तेच होते. उदाहरणार्थ- जेव्हा बाबांच्याच एखाद्या लेखावर वा पुस्तकावर चर्चा असायची, तेव्हा आपल्या प्रतिपादनाच्या विरुद्ध भाष्य करणाऱ्या अभ्यासू व्यक्तींना आवर्जून बोलवायला बाबा आयोजकांना सांगत असत; पण त्याबद्दल स्वतःही प्रयत्नशील असतं. ‘

‘एक व्यक्ती म्हणून बाबांकडे बघताना मला जर कायम जाणवणारी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे हा एक ‘अस्वस्थ आत्मा’ होता. अनेक प्रकारच्या संवेदना असूनही बाबांना नेहमी जाणवत असे वा भिडत असे, ती एखादी सामाजिक वेदना. भोवतालच्या परिस्थितीत फार झपाट्याने सामाजिक- आर्थिक व मुख्यतः नैतिक अधःपात होत आहेत, मूल्यांचा पदोपदी ऱ्हास होत आहे, आपल्या देशाची अशी आयडेंटिटीच जणू वेशीवर टांगली आहे की काय, या व इतर अनेक समस्यांनी बाबा कायमच अस्वस्थ असत, त्यासाठी कायम एखाद्या विधायक मार्गाच्या शोधात असत. मात्र, आपले काम हे हातात मशाल घेऊन जाणाऱ्याचे नसून, वैचारिक पातळीवरून समाजाला काही मार्गदर्शन करण्याचे आहे, याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. तत्त्वांशी ते तडजोड खपवून घेत नसत व आपल्या डोळ्यांदेखत कोणावरही अन्याय झालेला त्यांना सहनही होत नसे. त्यासाठी निर्ढावलेल्या सरकारी अधिकाऱ्यापासून, उद्धट बसवाहकापर्यंत कोणाशीही भांडायला ते मागेपुढे पाहात नसत. शारीरिक जोखीम पत्करूनही त्यांनी अनेक प्रसंगांना धैर्याने तोंड दिले आहे. ‘

‘आज मागे वळून पाहताना बाबांच्या वैविध्यपूर्ण, लालित्यपूर्ण तसेच सखोल लेखनाचा काहीसा अचंबा वाटतो. एकीकडे भोवतालच्या सामाजिक परिस्थितीचे निरीक्षण आहे, तर ग्रामीण आर्थिक वास्तवाचे (भावुक न होता) परीक्षण आहे; मान्यताप्राप्त व्यक्तींची/विभूतींचीही डोळस चिकित्सा आहे, तसेच राष्ट्रवादासारख्या स्फोटक विषयाची अभ्यासपूर्ण व अभिनिवेशरहित मीमांसाही आहे. रसग्रहण आहे, तेही मर्मग्राही आहे. प्रतिवाद करताना कोठेही आत्मप्रौढी नाही, अहंकार नाही. केवळ आणि केवळ मतभेद व्यक्त करणे आहे (जेथे वैयक्तिक टीका झाली, तेथे मात्र त्याचाही समाचार घेतला गेला आहे). दर्जा, पातळी कधीही घसरलेली नाही, ना शब्दांवरचा ताबा कधी सुटल्याचा प्रसंग… ‘

– – – वैचारिक, तर्कशुद्ध वाचनाची आवड असणाऱ्यांनी हा विचारांचा ऐवजअवश्य वाचावा. यामुळे आपल्या मनाची वैचारिकघुसळण मात्र नक्कीच होईल.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 94 – जब भी विश्वास पास आते हैं… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – जब भी विश्वास पास आते हैं।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 94 – जब भी विश्वास पास आते हैं… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

आप जब मेरे पास आते हैं 

जैसे मय के गिलास आते हैं

*

कितनी बाधाएँ पार की हमने 

याद, सारे प्रयास आते हैं

*

सहने पड़ते हैं, पतझरों के दिन 

तब, बहारों के मास आते हैं

*

नींद के साथ, रात में मुझको 

स्वप्न तेरे ही खास आते हैं

*

छोड़ मन, आप सिर्फ तन लेकर 

कितने चिंतित-उदास आते हैं

*

गुफ्तगू उनसे हो भला कैसे 

छोड़ बाहर, मिठास आते हैं

*

सार्थक तो मिलन तभी होता 

जब भी, विश्वास पास आते हैं

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares