मराठी साहित्य – विविधा ☆ हिंदू वर्षातील पहिला सण.. गुढीपाडवा ☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ हिंदू वर्षातील पहिला सण.. गुढीपाडवा ☆ सौ शालिनी जोशी

चैत्र प्रतिपदेपासून वसंत ऋतू सुरू होतो. त्यामुळे धार्मिक सण आणि वसंताच्या आगमनाचा आनंद म्हणजे गुढीपाडवा. वसंतही भगवंतांची विभूती, ते म्हणतात, ‘अहमृतूनां कुसुमाकरः।’ वसंतऋतूला कुसुमाकर किती सुंदर शब्द आहे नाही ? चैतन्याची अनुभूती देणाऱ्या वसंताचा हा पहिला दिवस. होळीला दुष्ट प्रवृत्तीचा नाश शिकवल्यावर सुष्ट प्रवृत्तीचे वर्धन आणि जयजयकार सांगणारा हा दिवस. रूढीच्या निमित्त्याने निसर्गाचे रक्षण आणि सत्प्रवृत्तीचे वर्धन यातून आपल्या पूर्वजांनी शिकवले.

गुढीच्या काठीवर पालथा घालतात तो धातुचा गडू हे विजयश्रीचे व सामर्थ्याचे प्रतिक. जसे राजाच्या डोक्यावर किरीट असते. या दिवशी कडुलिंबाचे विशेष महत्व. तो गुढीला बांधतात तसेच जेवणात त्याची चटणी खातात. त्याच्या अंगच्या औषधी गुणधर्मामुळे उष्णता कमी होते, पचन सुधारते, पित्ताचा नाश होतो, त्वचेचे आरोग्य सुधारते. याच्या सर्वच भागांचा औषधात उपयोग. म्हणून कडुलिंबाचे सेवन एका दिवसापुरते नसून वर्षभर व्हावे हे सुचवायचे आहे. आंब्याची डहाळी म्हणजे मांगल्य आणि चैतन्य, तर फुले म्हणते कोमलता हे गुण आपण अखंड जोपासावे. साखरेच्या गाठीची मधुरता वाणीत असावी. कोणत्याही कर्मा मागील संकल्प (विचार )म्हणजे सुपारी आणि मग सिद्धी रुपी श्रीफळाचा लाभ होतो. हळदी कुंकवासारखे सौभाग्य आणि रांगोळीचे मांगल्य प्राप्त होते. त्यासाठी मुख्य गरज पाठासारख्या स्थैर्याची आणि काठीच्या काटकपणाची. हे सर्व साधले तर विजयश्री नक्कीच प्राप्त होते. पण येथे नम्रता महत्त्वाची, जी गुडी तिरपी करून व्यक्त केली जाते. अशा प्रकारे यशासाठी आवश्यक सगळ्या गुणांचे हे प्रतीक. यशा बरोबर वैभवाची गरज सुचवितो जरीचा खण आणि गुडीची उंची म्हणजे श्रेष्ठ यशाची अपेक्षा. अशी ही गुढी वर्षारंभी पुजायची, गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आणि पुढे घेणाऱ्या वसंतोत्सवाचा आनंद निसर्ग रक्षणांनी घ्यायचा. हाच गुढीपाडवा.

 गुढीची पूजा केल्यावर प्रार्थना म्हटली जाते ‘ ओम् ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद। प्राप्तेsस्मिन् संवत्सरे नित्यमं मंगलमं कुरु।

नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे नव्या पंचांगाची पूजा या दिवशी करतात. पुढे येणाऱ्या रामनवमी चे नवरात्र याच दिवशी सुरू होते.

आता पाडव्याला मिरवणुका, संगीताचे कार्यक्रम असे सार्वजनिक कार्यक्रमही होतात. एकंदरीत वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी व तो आनंद वर्षभर टिकवा ही इच्छा.

💐 नूतन वर्षाभिनंदन 💐

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मी प्रवासिनी ☆ सुखद सफर अंदमानची…  भाग – १ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सौ. दीपा नारायण पुजारी

☆ सुखद सफर अंदमानची…  भाग – १ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

सेल्युलर जेल 

विहार ट्रॅव्हल्स सोबत आम्ही पोर्ट ब्लेअरच्या विमानतळावर पाऊल ठेवलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा घाम ज्या भूमीवर गळला त्या भूमीवर आपण उभे आहोत ही भावना आमच्यातल्या प्रत्येकाच्या मनात होती. भारतीय असल्याचा अभिमान सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. समोर होता स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा. त्या पुतळ्याच्या पायथ्याशी उभं राहिलं की समोर दिसतात 

देवनागरी लिपीतील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा ही अक्षरं. हे नाव वाचताना मान आणि खांदे दोन्ही अभिमानानं ताठ होतात. भारतभूमीचा हा हिस्सा कुणा इंग्रज अधिकाऱ्याच्या नावानं असावा ही किती दुर्दैवी गोष्ट होती. पण आता बदल होतोय. इथली सगळी बेटं कात टाकलीय जणू. भारतीय नावांनी ओळखली जाऊ लागली आहेत. एक फोटो इथं घेतला जातोच.

इथं बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. दुपारी आम्ही समुद्रिका मरिन म्युझियम बघितलं. या ठिकाणी अंदमानच्या समुद्रात मिळणारे अनेक सागरी प्राणी ठेवले आहेत. काचेच्या पेटीतील, नैसर्गिक वातावरणात ठेवलेले हे सजीव छोटीशी समुद्र सफर करवून आणतात. निळ्या समुद्राखालच्या अनोख्या रंगीबेरंगी दुनियेत हरवून न जाल तरच नवल. शार्क माशाच्या हाडांचा मोठा सांगाडा आपलं स्वागत करतो. सावरकरांच्या भेटीची वेळ ठरलेली असते. त्यामुळे मस्य दुनियेतून बाहेरच्या जगात पाऊल ठेवावेच लागते. पुढील भेट जास्त महत्त्वाची असते.

आज राष्ट्रीय स्मारक असलेले सेल्युलर जेल, खरंतर ब्रिटिशांनी बांधलेला तुरुंग आहे. या तुरुंगाची रचना सायकलच्या चाकासारखी आहे. (ओक्टोपस या प्राण्यासारखी) या रचनेला पॅनोप्टिकॉन म्हणतात. एकोणीसाव्या शतकातील इंग्लंडमधील महान तत्त्वज्ञ बेंथमन यानं ही रचना सुचवली होती. इमारतीच्या मध्यभागी एक उंच टॉवर आहे ज्यावर चोवीस तास एक पहारेकरी असतो. या टॉवर वर एक घंटा आहे. ही घंटा वाजताच उठण्याची सक्ती होती. घंटा सुर्योदय होण्यापूर्वीही वाजे. दमलेल्या कैद्यांची झोप पूर्ण होण्यापूर्वीच. या टॉवरभोवती सायकलच्या स्पोक्सच्या आकारात सात इमारती. प्रत्येक विंगला तीन मजले आहेत. प्रत्येक मजल्यावर छोट्या छोट्या खोल्या. जणूकाही सजीवांच्या शरीरातील पेशी. या खोल्यांची संख्या सातशे. पण रचना अशी की इतर खोल्यांमधील कैदी बिल्कुल दिसत नाहीत. आपण समाजप्रिय आहोत. त्यामुळं आपल्या आजूबाजूला असणारे इतर कैदी दृष्टीस न पडणं हे सुद्धा खूप त्रासदायक ठरत असेल. आपल्या शरीरातील पेशींमध्ये देवाणघेवाण होत असते. या जेल मधील सेल्स मध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क साधता येत नसे. कैद्यांनी एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न जरी केला तरी कठोर शिक्षा होत असे.

या जेल मधील प्रत्येक सेलची, लांबीरुंदी ४. ५मीटर×२. ७मीटर(१४. ८फूट×८. ९फूट) एवढीच आहे. तीन मीटरवर (९. ८फूटावर) फक्त एक खिडकी आहे. जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट. एका पसरट लोखंडसदृश्य धातूच्या भांड्यात कसलं तरी हिरवट पाणी मिळत असे. त्यात किडे अळ्या पडलेल्या असत. पिण्याचं पाणी शारीरिक स्वच्छतेसाठी सुद्धा वापरू शकणार नाही इतकं घाण, गटारगंगेसारखं. वास सहन न होणारं. कैद्यांना कोलू ओढून तेल काढावं लागत असे. नारळ सोलावे लागत. साखळदंड बांधलेल्या अवस्थेत ही कामं विश्रांती न घेता करणं फारच कठीण होतं. त्यांना जर कोणी कामचुकारपणा करतोय असं वाटलं किंवा दिवसभरात दिलेल्या प्रमाणात तेल गाळलं गेलं नाही अथवा नारळ सोलले गेले नाहीत तर कोडे मारले जात. हात वर केलेल्या अवस्थेत पाठीवर, पायावर हे कोडे पडत. तरीही काम न झाल्यास, बंडखोरी केल्यास दोन पायांत आडवी काठी ठेवली जाई. मार तर खावाच लागे पण पाय जवळ घेता येत नसत.

शिक्षा जीवघेणी तर होतीच. निकृष्ट अन्न, पाणी, यांनी आजारपण ठरलेलंच होतं. अन्नत्याग केला किंवा उपोषण केलं तर जरबीनं नाकातून नळीनं दूध घातलं जाई. या धडपडीत फुफ्फुसात दूध जाऊन काही स्वातंत्र्यवीरांचा मृत्यू झाला आहे. या गोष्टी लपवल्या जात. काहींना वेडं ठरवलं गेलं तर काही खरंच स्वतःचं भान विसरून मानसिक स्वास्थ्य हरपून बसले.

याच परिसरात फाशीघर आहे. एक म्युझियम आहे जिथं, कोलू, साखळदंड, आसूड इ. ठेवले आहे. हे बघताना मानसिक यातना न झाल्या तर नवलच. इथं भेट देणारी एकही व्यक्ती अशी सापडणार नाही जिच्या डोळ्यात पाणी आलं नाही, मन भरून आलं नाही, देशाभिमान आणि स्वातंत्र्यवीरांच्या अभिमानानं उर भरून आला नाही. या इतिहासाची साक्ष देत उभा असणारा पिंपळ सुद्धा आपल्या सगळ्यांचं दैवत बनतो. इथल्या हुतात्मा स्मारकासमोर आपण नतमस्तक होतो. गुडघे टेकून इथली माती कपाळाला लावतो. जड पावलांनी, जड ह्रदयानं आणि त्याहून जड मनानं तिथून बाहेर पडतो…कदाचित एक मन तिथंच ठेवून…

– क्रमशः भाग पहिला 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “जागतिक महिला दिन – ८ मार्च ” – भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “जागतिक महिला दिन – ८ मार्च ” – भाग – २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

(स्त्रीशिवाय घराला घरपण येत नाही असं म्हणतात. मग या स्त्री ला घरामध्ये आनंद देण्याकरता, आपण घरातली मंडळी हिच्या करता काय वेगळं करतो ? बहुतेकांकडून उत्तर येईल – काहीच वेगळं करत नाही.)

इथून पुढे – – 

मेघना : प्रत्येक घरात स्त्री ही आई म्हणून रोल करत असते, बायको म्हणून रोल करत असते, सून म्हणून रोल करत असते आणि बाहेर नोकरी, व्यवसाय हे पण करत असते. असे असूनही, घरातले सगळे जण हिला “टेकन फॉर ग्रंटेड” म्हणून घेत असतात. घरातलं सैपाक पाणी / आवराआवर / मुलांचे डबे भरणे / मुलांची शाळेची तयारी / किराणा आणणे / भाजी बाजार आणि सगळी अवांतर कामे, ह्या सगळ्या तिच्याच जबाबदाऱ्या असतात. ती घरात असतांना सगळे जण, हे कुठे आहे / ते कुठे आहे / हे दे / ते दे, असा तगादा तिच्या मागे लावत असतात. सकाळी ऑफिसला जातांना मोबाईलसकट सगळे साहित्य आपल्या हातात यावे अशी नवऱ्याची बायकोकडून अपेक्षा असते. मग नोकरीला जाणाऱ्या स्त्रीने नवऱ्याकडून अशी अपेक्षा का करू नये.

मनवा : मुलगा आणि सून दोघेही ऑफिस ला निघतांना डबा, पाणी, मोबाईल असे सगळे त्यांच्या हातात देणारे सासू / सासरे कुणाच्या बघण्यात आहेत का ? 

मी : कधी ऐकण्यात नाही. किंवा कुठल्या टीव्ही सिरीयल मधे पण नाहीत 

मनवा : किती नवरे घरी जातांना बायकोकरता प्रेमानी गजरा घेऊन जातात / बायको ऑफिस मधून आल्यावर तिच्या ऑफिस च्या कामाबद्दल चौकशी करतात / तू दमली असशील, जरा गाणी वगैरे ऐक, मी चहा करतो / कुकर लावतो / वगैरे, असे म्हणतात. कितीजण तिला सैपाकघरातून तिचा हात धरून सोफ्यापर्यंत घेऊन जातात आणि प्रेमानी खाली बसवतात ? आणि हातात चहाचा कप देतात ! उत्तर येईल बोटावर मोजण्याइतपतच. आपण केलेल्या कामाचं कौतुक व्हावं, असं सगळ्यांनाच वाटत असतं. आजची डब्यातली पालक – पनीर भाजी एकदम हटके होती, किंवा आज डब्यात पुऱ्या आणि श्रीखंड मुळे मजा आली, एवढं बायकोचं कौतुक पण खरंतर पुरेसं असत. घरातले किती जण असं कौतूक करतात !.

मेघना : किती सासवा सून ऑफिसमधून आल्यानंतर तिच्या हातात खाण्याची डिश देतात / चहा देतात. उत्तर येईल अगदी एखादी.

मनवा : सुनेची विचारपूस करणे, हा बहुतेक घरात सासऱ्यांच्या प्रांतच नसतो. सुनेला मदत करण्याची जेंव्हा गरज असते तेव्हा ते त्यांच्या कट्ट्यावर गप्पा मारायला गेलेले असतात किंवा घरात मेडिटेशन करत असतात.

या सगळ्याला अपवादात्मक मंडळी नक्कीच आहेत, किती आहेत, हे मोजायला मात्र आपली हाताची बोटे पुरेशी आहेत.

मी : तुम्ही दोघी म्हणता ते अगदी बरोबर आहे. पण काही बाबतीत, स्त्रियांचे पण चुकत असते. घरातली सगळी कामे स्वतःवर ओढून घेण्याची त्यांची सवय त्यांनी बदलायला पाहिजे. धकाधकीच्या जीवनात आनंदी आणि हेल्दी राहणे पुरुष आणि स्त्रिया या दोघांना पण गरजेचे आहे. आणि याकरता रोज एक ते दीड तास प्रत्येकाने स्वतः करता राखून ठेवलाच पाहिजे असेच जाणकार सांगतात.

मनवा : काका, आपने सही फर्मया है. स्त्रियांना जर असा वेळ काढायचा असेल तर घरामधल्या कामाची विभागणी हि करायलाच पाहिजे. आणि त्याकरता कोण काय म्हणेल, याला गौण महत्व द्यायला शिकले पाहिजे.

मेघना : सकाळचा चहा / खाणे, संध्याकाळचे खाणे पिणे, घरातली अवांतर कामे, थोडी आवराआवर, मुलांचे अभ्यास घेणे ह्या कामात सासू सासरे नक्कीच हातभार लावू शकतात. इतर कामे नवऱ्याबरोबर शेअर करता यतात. ध्येय एकच, कि घर चालवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे आणि मला पण माझ्या हॉबी जपायला, व्यायाम करायला, वगैरे वेळ मिळालाच पाहिजे आणि मी तो मिळवणारच.

मनवा : थोडक्यात काय ? तर स्त्रियांनी स्वतःवर प्रेम करणे, याला पहिली प्रायोरिटी दिलीच पाहिजे.

मेघना : आता मजा बघा, स्त्री आणि पुरुष हि नक्कीच दोन वेगळी रसायने आहेत. त्यामुळे एकमेकांना समजण्यात थोडे अंतर पडू शकते. पण घरामधली सासू आणि सून यांचे स्त्री रसायन तर एकच असते. तरीपण कुठल्याही स्त्री च्या मागे सासू हे शीर्षक लागलं, की त्यांचं सून या स्त्री च्या बाबतीत वागणे कां बदलते, सुनेला आपलीच मुलगी असे मनापासून समजून तिच्यावर त्या प्रेम का करत नाहीत ? आणि स्त्रीच स्त्रीची दुश्मन कां व्हावी, हे एक न उलगडणारे कोडेच आहे.

मी : मला वाटतं सासू या शब्दामधेच ती मेख आहे. लग्न झाल्यानंतर जर नवर्याच्या आईचे सासुऐवजी मावशी असे नामकरण केले, तर हे न उलगडणारे कोडे सहज सुटेल.

मनवा : काका मावशीचं का बरं

मी : मावशी या नात्यात एक वेगळेच प्रेम आहे. आपल्याकडे म्हण आहे – माय मरो पण मावशी जगो. म्हणून मावशी असं नामकरण करायचं.

मनवा आणि मेघना : काका, एकदम जालीम उपाय आहे. आम्ही नक्कीच आमच्या ग्रुप वर टाकतो आणि घरी गेल्यावर सासूबाईंना आपल्या गप्पांचा संदर्भ देऊन मावशी म्हणायला सुरुवात करतो.

बाजूला चहा पित उभा असलेला ग्रुप : काका कल्पना आवडली. संध्याकाळी घरी गेल्यावर बायकोला सांगतो, की, आईला आता मावशी म्हणत जा. पुढच्या भेटीत तुम्हाला फीडबॅक देतो.

मी : पुरुष आणि स्त्रिया यांना सर्वच बाबतीत अगदी तंतोतंत समान हक्क आणि आनंदाच्या समान उपलब्धी हव्या असतील, तर मात्र आपल्याला ब्रह्मदेवाकडे पण थोडे साकडे घालावे लागणार आहे. सृष्टीच्या निर्मितीमध्ये पुरुष आणि स्त्री ही निर्मिती आखतांना, देवाचे पण थोडे चुकलेच आहे, असे मला वाटते. त्याने पुरुषाला थोडे झुकतेच माप दिले आहे. मासिक धर्म, बाळंतपण, मोनोपॉझ या गोष्टी त्यानी फक्त स्त्रियांच्या पदरी टाकल्यामुळे, या काळातली शारीरिक दुखणी आणि त्रास फक्त स्त्रियांना भोगावा लागतो. पुरुष नामोनिराळे असतात. संध्याचे कलियुग संपल्यानंतर पुढच्या अपग्रेडेड सृष्टीची निर्मिती करतांना, स्त्रियांचा हा शारीरिक त्रास दूर करावा किंवा समसमान करावा अशी आपण ब्रम्हदेवाकडे प्रार्थना करूया.

मनवा : काका, नक्कीच. देवांनी जर हे मान्य केलं तर सगळ्याच स्त्रिया खुश होतील आणि तुम्हाला दुवा देतील.

मेघना : काका, तुम्ही आल्यामुळे गप्पा मस्त रंगल्या, काही छान उपाय पुढे आले, मजा आली. चला आम्हाला ऑफिसला निघायला पाहिजे.

तेवढ्यात चहावाल्या दादांनी चहाचा दुसरा ग्लास आमच्या हातात दिला. चहा पिणारा बाजूचा ग्रुप दादांना उद्देशून : दादा इनका ये बिल हमारे बिल मे ऍड करना.

आम्ही सगळ्यांना बाय केले आणि आपापल्या मार्गाला लागलो.

– समाप्त –

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेमासाठी सारे काही… ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? मनमंजुषेतून ?

☆ प्रेमासाठी सारे काही… ☆ श्री संदीप काळे ☆

संत श्री. एम. मुळे वृंदावनचा फार जवळून संबंध आला. अनेक वेळा, अनेक दिवस वृंदावनला राहता आले. श्री. एम. मुळेच खूप सारे मित्र मिळाले. त्या मित्रांमध्ये वृंदावनमध्ये राहणारे राजेश तिवारी यांची खूप छान मैत्री झाली. अनेक वेळा त्यांच्यासोबत राहून तिवारी यांच्या नजरेने वृंदावन पाहिले. कृष्णभक्ती, अद्वितीय प्रेम आणि वृंदावन हा माणसाने एकदा तरी अनुभवावा असा अनोखा संगम आहे. त्या दिवशी राजेश यांचा फोन आला आणि मला म्हणाला, ‘संदीप, माझे लग्न ठरले आहे. तुला यायचे आहे’. मला राजेशच्या लग्नाला जाणे गरजेचे होते. कारण राजेशचे लग्न आमच्या सर्वांची मैत्रीण यूएसची श्रीकृष्णभक्त रुसीसोबत होणार होते. रुसीने पाच वर्षांपासून वृंदावनात श्रीकृष्ण भक्तीमध्ये स्वतःला समर्पित केले आहे.

रुसी आणि राजेशच्या लग्नाला वृंदावनात गेलो. दोन दिवस वृंदावनला मुक्काम होता. वृंदावनात फिरणे, तिथल्या माणसांशी बोलणे, यात जो आनंद मिळतो, तो अन्य कशातच नाही. लग्न लागल्यावर वृंदावनला फिरण्यासाठी बाहेर पडलो. वृंदावनात प्रत्येक वेळी नवीन काहीतरी अनुभव मिळतो. वृंदावनमधील मंदिर परिक्रमा हा माझा आवडता विषय.

मजल दरमजल माझा प्रवास सुरू होता. प्रेम- मंदिरापासून थोडे दूर गेल्यावर जप करत बसलेले एक जोडपे दिसले. दोघांचे लांब केस, दोघांमध्ये एक आसन, एकच पाण्याची बाटली, एकच बॅग, सारे काही दोघांत एकच होते. ते मी पाहिल्यावर माझ्या लक्षात आले की हे एक जोडपे आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून मला वाटले, आपण यांच्याशी बोलले पाहिजे. मी त्यांच्या अवतीभोवती घुटमळत होतो. आत्ता जागे होतील, नंतर जागे होतील, याची मी वाट पाहत होतो. खूप वेळ झाला, पण ते काही त्यांच्या साधनेतून बाहेर यायला तयार नव्हते. मी तिथून निघणार, इतक्यात ते दोघेही जागे झाले.

मी त्यांना नमस्कार केला. त्यांना मी म्हणालो, ‘तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, म्हणून ब-याच वेळापासून थांबलो आहे’.

त्या दोघांनी आश्चर्याने एकमेकांकडे पाहिले. त्यातली महिला मला म्हणाली, ‘सांगा ना काय बोलायचं आहे तुम्हाला? 

‘तुम्ही जी साधना करताय, तुम्ही जी ध्यानधारणा करताय, त्यातून तुम्हाला खरंच ईश्वराची भेट होते का? या साधनेने तुम्हाला समाधान मिळते का? का तुम्ही अन्य कुठल्या कारणास्तव ध्यानधारणा करताय?’ त्या दोघांनीही एकमेकांकडे पाहत आणि स्मितहास्य करत मला उत्तर दिलं. त्या जोडीमधला तो पुरुष मला म्हणाला, ‘अहो, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीत ईश्वर आहेच. तुम्ही ध्यानधारणा करा, तपस्या करा अथवा करू नका. त्याची आणि तुमची भेट होतच असते. मन एकाग्र ठेवून श्रीकृष्णाला भेटण्याची आस ठेवली, तर तो भेटतोच भेटतो’.

मग काय मी प्रश्न विचारत गेलो आणि ते उत्तर देत गेले. ते कुठे राहतात, ते काय करतात, ते कधीपासून साधू बनलेत, इथपासून ते त्यांचं पूर्वायुष्य मी त्यांच्याकडून जाणून घेत होतो. आयुष्याच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आल्यावर त्या दोघांनी साधूच्या वेशात राहणं पसंत केले. ते दोघेही आयटी इंजिनियर साधू का बनले? त्या दोघांची खूप करुण कहाणी मी ऐकली आणि माझं मन एकदम सुन्न झालं.

प्रेमिला शर्मा आणि सिद्धार्थ अवस्थी हे दोघेही अगदी जवळचे नातलग. लहानाचे मोठे ते उत्तर प्रदेशात झाले. उच्च शिक्षणासाठी मुंबईला गेले. तिथून दोघेही आयटी इंजिनियर झाले. दोघेही मुंबईत काम करू लागले. एकमेकांची ओळख होती. त्या ओळखीतून दोघांचे प्रेम झाले आणि ते प्रेम लग्नाजवळ येऊन थांबले.

प्रेमिलाला वडील नाहीत. प्रेमिलाची आई तिच्या एका बहिणीला घेऊन उत्तर प्रदेशात राहते. प्रेमिलाने जेव्हा सिद्धार्थचा विषय तिच्या आईला सांगितला, तेव्हा प्रेमिलाच्या आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. प्रेमिलाचा लग्नाविषयीचा निर्णय आईला अजिबात मान्य नव्हता. ज्या दिवशी प्रेमिलाने आईला लग्नाचा विषय सांगितला, त्याच्या दुसऱ्या दिवशी आईने उत्तर प्रदेशातून निघून थेट मुंबई गाठली. प्रेमिलाला पकडून तिने गावाकडे आणले. तिच्या लग्नाची इतर ठिकाणी बोलणी सुरू झाली. प्रेमिलाला तर सिद्धार्थबरोबरच लग्न करायचे होते. आईच्या ठाम नकारामुळे ते लग्न होणार नाही, हे निश्चित होते. प्रेमिलाने घरातल्या घरात दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला, तरीही तिची आई तिचे ऐकायला तयार नव्हती.

एकदा भांडणांत बोलता बोलता आई प्रेमिलाला म्हणाली, ‘तू कुठेतरी एखाद्या मंदिरावर साध्वी म्हणून जा, पण मी त्या मुलासोबत तुझे लग्न करू शकत नाही. तो माझ्या अशा नात्यातला आहे की, त्या नात्यांत तुमच्या दोघांचं नातं नवरा-बायकोचं होऊच शकत नाही. बहीण-भावाचे होते. तुम्ही लग्न केलं, तर मी लोकांना काय तोंड दाखवू? समाजात माझी इज्जत राहणार नाही. तुझ्या लग्नाला कोणी येणार नाही. तुझ्या बहिणीचं लग्न होणार नाही. त्यावर प्रेमिला म्हणाली, ‘ठीक आहे. मी मंदिरात साध्वी म्हणून राहते’. प्रेमिलाच्या आईला वाटले, प्रेमात पडलेली ही तरुण मुलगी थोडीच मंदिरात साध्वी म्हणून राहणार आहे? एकीकडे प्रेमिलाची आई तिचं लग्न कुठं जमेल का, या विवंचनेत होती, तर दुसरीकडे प्रेमिला साध्वी बनण्यासाठी दीक्षा कुठे घ्यायची? त्याची काय काय नियमावली असते? कोणाकडे जावे लागते? याची सगळी माहिती काढून ठेवत होती.

एके दिवशी प्रेमिलाने तिच्या आईला सांगितले की, मी आता साध्वी म्हणून मंदिरामध्ये बसणार आहे. प्रेमिलाच्या आईला प्रेमिलाचा निर्णय ऐकून एकदम धक्काच बसला, पण प्रेमिला तिच्या निर्णयावर ठाम होती. आत्महत्या, सामाजिक प्रतिष्ठा, आईचे मत, नातेवाईकांचे मत, सिद्धार्थला धोका या सगळ्या शक्यतांवर मात करायची असेल तर, आईने रागात का होईना मला सुचवलेला साध्वी बनण्याचा पर्याय जिवंत राहण्यासाठी योग्य मार्ग ठरू शकतो. त्यातून मला आवडणाऱ्या श्रीकृष्णाची भक्ती करता येईल. सिद्धार्थच्या प्रेमाचे पावित्र्यही मला जपता येईल, या भावनेतून प्रेमिलाने साध्वी बनण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतरही प्रेमिलाची आई ‘मी सिद्धार्थशी लग्न लावणार नाही’, या मतावर ठाम होती.

प्रेमिलाला मुंबईवरून गावी नेताना प्रेमिलाची आई तिला सोबत घेऊनच सिद्धार्थला भेटली. तिने सिद्धार्थला तंबी देत मारहाण केली आणि बजावून सांगितलं की, माझ्या मुलीला मी विहिरीत ढकलून देईन, पण तुझ्यासोबत तिचं लग्न करणार नाही. तुझ्या आईवडलांनी गावाकडे काय प्रताप केलेत, हे माहिती आहे ना? तुझे आणि हिचे नाते काय आहे हे माहिती आहे ना? यानंतर प्रेमिलाशी बोलायचा किंवा भेटायचा प्रयत्न केलास, तर मी तिचा मुडदा पाडेन. मीही आत्महत्या करीन आणि त्याची सगळी जबाबदारी तुझ्यावर असेल’.

सिद्धार्थला वाटलं, काहीही झालं, तरी प्रेमिलावरचं आपलं प्रेम कमी होणार नाही. तिच्याशिवाय आपण इतर कोणावर प्रेम करू शकत नाही. तिच्यासोबत लग्न करू शकत नाही. ती जिथे कुठे असेल तिथे सुखी राहावी, या भावनेतून मोठ्या जड अंत:करणाने सिद्धार्थने प्रेमिलाला समंजसपणे निरोप दिला.

तिकडे वृंदावनमध्ये जाऊन प्रेमिला साध्वी बनली. सिद्धार्थच्या प्रेमाचं पावित्र्य राखण्यासाठी तिनं हा निर्णय घेतला होता. ही गोष्ट प्रेमिलाच्या मैत्रिणीकडून बऱ्याच दिवसांनी सिद्धार्थला कळली. सिद्धार्थने खूप शोध घेतल्यावर त्याला प्रेमिला भेटली, ती साध्वीच्या वेशात. घडलेला सगळा प्रकार तिने सांगितला. ‘तू तुझे आयुष्य आनंदाने जग. आता मी हा निर्णय कायम ठेवून आयुष्यभर श्रीकृष्णाचं ध्यान करत या वृंदावनमध्येच राहणार आहे’, असं प्रेमिलानं सिद्धार्थला सांगितलं.

सिद्धार्थ प्रेमिलाला म्हणाला, ‘माझ्या आयुष्याला तुझ्याशिवाय काहीच अर्थ नाही. आपलं प्रेम काही विसरून जाण्यासाठी नव्हतं किंवा काहीतरी मिळवण्यासाठीही नव्हतं. आपलं प्रेम हे जन्मोजन्मीच्या गाठी आयुष्यभर कायम राहाव्यात यासाठी झालं होतं. तू जो साध्वी बनण्याचा निर्णय घेतलेला आहेस, तसाच मीही साधू बनण्याचा निर्णय घेतो. साधू आणि साध्वी बनून आपण श्रीकृष्णाची भक्ती करत राहू. नवरा-बायको होऊ शकलो नाही तर काय झाले? श्रीकृष्णाचे भक्त म्हणून सोबत राहू.

दोन-चार दिवस प्रेमिलाने सिद्धार्थची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण सिद्धार्थ काही ऐकायला तयार नव्हता.

शेवटी सिद्धार्थने साधू बनण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या चार वर्षांपासून हे दोघे जण साधू-साध्वी बनून वृंदावनमध्ये तपस्या करत असतात. चार ठिकाणी भिक्षा मागतात. पोटापुरतं जेवढं मिळेल तेवढं खातात. रात्री वृंदावनच्या श्रीकृष्ण आश्रमात मुक्काम करतात. साधू आणि साध्वीचे पावित्र्य त्या दोघांनीही जपले आहे.

प्रेमिला म्हणाली, ‘मी लहानपणापासून कृष्णभक्त आहे. श्रीकृष्णच आपल्यासाठी सर्व काही आहे, या भावनेने मी आयुष्याची बावीस वर्षे काढली. अपघाताने का होईना मी पूर्णवेळ कृष्णभक्त होईन, असं कधी वाटलं नव्हतं. मी सिद्धार्थमध्येसुद्धा श्रीकृष्ण पाहायचे. सिद्धार्थच्या मला जपण्याच्या पद्धतीत मला श्रीकृष्ण दिसायचे. दुर्दैवाने सिद्धार्थ माझा होऊ शकला नाही, पण माझी श्रीकृष्णभक्ती सिद्धार्थच्या सहवासाने आणि माझ्या समर्पणाने कायम राहिली.

सिद्धार्थ म्हणाला, ‘अहो, जगण्यासाठी लागते तरी काय? सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आनंदी आहात का? तुम्ही सुखी आहात का? हे खूप महत्त्वाचे आहे. मी आयटी इंजिनियर होतो. ती आयटी इंजिनिअर होती. आमच्या आयुष्याचे अंतिम ध्येय काय होतं? ते एकमेकांसोबत खूश राहायचं. मुंबईत राहिलो असतो, तर मोठ्या इमारतीमध्ये राहिलो असतो. आलिशान गाडीत फिरलो असतो. त्या सर्वांतसुद्धा सुख शोधणे हेच महत्त्वाचे ध्येय राहिले असते. इथे श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये सुख शोधायची गरजच भासत नाही. सुख हे आपोआपच मिळत जाते. माझे आणि प्रेमिलाचे प्रेम हे तेव्हाही होते, आताही आहे. तेव्हा त्या प्रेमात चांगुलपणाच्या आणाभाका घेत आकाशाला गवसणी घालणारे भौतिक सुखाचे स्वप्न पाहिले होते. आता त्या आणाभाका कायम आहेत. फरक इतकाच की, आता श्रीकृष्णाच्या भक्तीत विलीन होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या मार्गाने वाटचाल सुरू आहे’.

ते दोघेजण माझ्याशी बोलत असताना मी विचारले, ‘तुमच्या नातेवाईकांचे काय झाले? सिद्धार्थच्या घरच्यांनी विरोध केला नाही का?’ प्रेमिला म्हणाली, ‘जसं माझ्याकडे झालं, तसं त्याच्याकडेही झालं’. डोळ्यात अश्रू आणत, प्रेमीला म्हणाली, ‘एका वर्षानंतर माझी आई वारली. बहिणीची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. आईकडे फार काही नव्हतं. जे काही होतं, ते मी विकलं आणि आनंदात बहिणीचं लग्न केलं. सिद्धार्थला आई-वडील नव्हते. त्यानं त्याच्या मोठ्या भावाच्या नावावर त्याची सगळी मालमत्ता करून दिली आणि अगदी सहजतेनं, आनंदात माझ्यासोबत येऊन भगवे वस्त्र परिधान केले’.

मी त्या दोघांनाही अजून एक प्रश्न विचारला, ‘तुम्ही हे सगळं आपल्या प्रेमासाठी केलं का श्रीकृष्णासाठी?’ त्या दोघांचेही उत्तर अतिशय समर्पक होते. ते म्हणाले, ‘आम्ही जगत होतो श्रीकृष्णासाठी. आमचं प्रेमही श्रीकृष्णासारखं होतं आणि आम्ही आताही जे काही करतो ते श्रीकृष्णासारखं आणि श्रीकृष्णासाठीच करतो’.

सिद्धार्थ आणि प्रेमिला या दोघांचाही खूप छळ झाला होता. नियतीने आणि नातेवाईकांनी त्यांच्या अनेक प्रकारे परीक्षा पाहिल्या होत्या. त्या सगळ्या परीक्षांमध्ये सफल होता होता त्या दोघांनी प्रेमासाठी जे काही केलं ते अतुलनीय असंच होतं.

मी त्या दोघांचा निरोप घेऊन निघालो. निघताना माझ्या मनात एकच प्रश्न होता की, अजूनही किती सामाजिक प्रतिष्ठेच्या रेखा प्रेमाच्या आड येतील? त्यातून जे घडते, त्याचा आपण विचारही करू शकत नाही. तुमच्या अवतीभोवती असेच प्रेम करणारी अनेक जोडपी असतील. त्यांचे प्रेम अगदी राधा-मीरा श्रीकृष्णासारखं असेल. अशा जोडप्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी आपण निश्चितपणे मदत करणार ना?

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ती परत आली…! ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ ती परत आली…! ☆ सुश्री शीला पतकी 

सकाळी उठल्याबरोबर सौ ने ऑर्डर दिली “अहो ऐकलत का?…”

मी म्हणालो “हो तुझाच तर ऐकतोय बोल.” 

“ काही नाही खाली वाण्याच्या दुकानातून दोन नारळ घेऊन या आणि ते सोलून आणा.. तुम्हाला सोलता येत नाहीत.” 

मी.. “कशासाठी?” नको तो प्रश्न मी विचारलाच..

ती म्हणाली.. “ एक.. संध्याकाळी मारुतीला फोडा आणि एक सकाळी फोडून मी गणपती बाप्पाला नैवेद्याचे मोदक करणार आहे “ ती म्हणाली. “ सुनीता विल्यम्स परत आली. मी देवाला बोलले होते ती सुखरूप परत येऊ दे तुला अकरा मोदकांचा नैवेद्य दाखवेन.. !” 

“ तिच्यासाठी एवढा नवस बोलण्याचा काय काम?… “

“ अहो जरा काहीतरी वाटू द्या नवीन नवीन संशोधनासाठी ती बाई नऊ महिने अडकून पडली तिथे… बाई म्हणून परत आली.. हो ओढ असते ना आम्हा बायकांना घराची. तिच्याबरोबर तो बाप्या एकटा असता ना तर कधीच मरून गेला असता.. बाई होती म्हणून सगळ धीराने निभावलं.. !”

“ एवढं काही नाही हं.. ” मी म्हटलं !..

“ गप्प बसा.. बाथरूम मध्ये एकदा अडकून पडला होता तर केवढा गोंधळ केला. चार धक्के बाहेरून लागवले तेव्हा ती बाथरूमची कडी निघाली.. पंधरा मिनिटात पॅनिक झाला होता तुम्ही… नऊ महिने तिने बिचारीने एकटीनं घीराने काढले कारण तिला दिसत होत.. आपलं घर ! आठ दिवस माहेरी गेले आणि दोन दिवसात परत आले तर तुम्ही म्हणता का एवढ्या लवकर आलीस? अहो ओढ असते बाईला घरची.. माहेर वगैरे पहिले काही वर्ष.. तुम्हाला कळायची नाही आम्हा बायकांची ओढ…. ” 

“ पण मग त्याच्यासाठी गणपतीला कशाला नैवेद्य दाखवायचा अरे विज्ञानवादी तरी हो नाहीतर अध्यात्मवादी तरी हो.. ! “

“ मी कुठलाही वाद घालत नाही लक्षात ठेवा. विज्ञान हवंच ते आपल्याला प्रगतीपथावर नेणार आहे पण मनस्वास्थ.. त्याला अध्यात्मही हवं ! आम्हा बायकांची भाबडी श्रद्धा असते आणि तीच तुम्हाला कितीतरी वेळा तरुन नेते.. पहा सुनीताबाईसुद्धा आपल्याबरोबर भगवद्गीता, वेद, गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन गेल्या होत्या म्हणून सुखरूप परत आल्या. मनोधैर्य वाढवणाऱ्या त्या गोष्टी होत्या त्यांना खात्री होती. आपल्याबरोबर देव आहे आणि आम्हा बायकांची श्रद्धा बरोबर काम करत असते बरं !. तुम्हाला ठाऊक आहे का त्या यानात एक तरी बाई का पाठवतात?.. ” 

“ का का? “ मी माझा अज्ञान प्रकट करत आजीजीने म्हणालो..

ती.. ” कारण बाईच्या जातीला ओढ असते घराची. अंतराळात गेलेली पहिली लायका कुत्री होती.. कुत्री.. मादी जातीची आणि बायका चिवट असतात बरं का.. कठीणातल्या कठीण परिस्थितीला तोंड देऊन विजय मिळवण्याचं कसब परमेश्वराने बाईला दिले बाई.. अशी सहजासहजी मरत सुद्धा नाही… ती लढते निकरानं शेवटपर्यंत.. ”.. आणि अजून बरच काही ती बोलत होती…

… मी मनात म्हणालो ‘ कुठून हिला विचारलं.. मुकाट्याने नारळ आणले असते तर झालं असत ना.. खाल्ल्या की नाही शिव्या ‘.. शेवटी मी तिला शरण गेलो आणि म्हणालो “ बाई पिशवी दे आणि पैसे दे. नारळ आणतो.. अगदी सोलून आणतो पण तू मला बोलून घेऊ नकोस.. सखे तू आहेस म्हणून माझं सगळं व्यवस्थित चालले बरं..”

अशी शरणागतीची चार वाक्य टाकून मी मोकळा झालो आणि आज जेवायला मोदक मिळणार या आनंदात सुनीता विल्यम्सचे आभार मानून दुकानाकडे चालू लागलो…!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “युवराज्ञी येसूबाई” – लेखक : श्री अभय देवरे ☆ प्रस्तुती – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? इंद्रधनुष्य ?

☆ “युवराज्ञी येसूबाई” – लेखक : श्री अभय देवरे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

एकोणतीस वर्षे ! एकोणतीस वर्षे ज्या माऊलीने स्वतःला मोगलांच्या कैदेत ठेऊन शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले त्या युवराज्ञी येसूबाईबद्दल इतिहासाला अधिक माहिती नाही हे दुर्दैव कोणाचे ? आपले की इतिहासाचे ?…. तोही छत्रपती संभाजी महारांजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला, पती जिवंत असतानासुद्धा या पतिव्रतेला काही दिवस विधवेचे सोंग आणावे लागले ! होय, आग्र्याहून सुटल्यावर शिवछत्रपतींनी छोट्या संभाजीला दडवून ठेऊन अफवा पसरवली की युवराजांचा काळ आला ! त्यामुळे संभाजीराजे सुखरूप स्वराज्यात येईपर्यंत त्यांना विधवा म्हणून जगावे लागले ! मनाची केवढी प्रगल्भता ! त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबाने पतीला पकडल्यानंतरही धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरे जाणारी, पतीला हाल हाल करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालविण्यासाठी स्वतःचे आभाळाएव्हढे व्यक्तिगत दुःख बाजूला सारून शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल तीस वर्षे ओलीस ठेऊन घेणारी ही हिमालयाइतकी उंच स्त्री पहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआप लक्षात येते.

छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी दस्तुरखुद्द औरंगजेब महाराष्ट्रात आला होता. शिवाजी महाराज जिवंत नसल्यामुळे आता आपल्याला सहजपणे स्वराज्य ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता. पण संभाजी महाराजांनी तो मनसुबा आपल्या पराक्रमाने उधळला. अखेर कपटाने आणि घरभेद्यांची मदत घेऊन त्याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि अखेर ११ मार्च १६८९ रोजी त्यांनी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले. महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथेच सुरुवात झाली. आपल्या पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेऊन त्यांनी स्वराज्याची विसकटलेली घडी सरळ करायला सुरुवात केली. त्यांचे मन किती मोठे होते याची चुणूक त्यांच्या पहिल्याच निर्णयात दिसते. नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू राज्यावर बसावयास हवा होता. महाराणी येसूबाई यांनी आग्रह केला असता तर छोट्या शाहूला राज्याभिषेकही झाला असता. पण तत्कालीन परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे. त्या काळात रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांना मानणा-या सरदारांची संख्या मोठी होती. त्यामुळे नियमाप्रमाणे शाहू महाराजांना जर राज्यावर बसवले तर काही सरदार बंड करतील, सैन्याचे दोन भाग पडतील आणि हे अंतर्गत बंड औरंगजेबाला स्वराज्याचा घास मिळवून देण्यास मदत करेल अशी त्यांना भीती वाटली. त्यामुळे त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपले दीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले व स्वतः त्यांच्या वतीने काम करण्यास सुरुवात केली. आज लोकशाहीच्या नावाखाली आपल्याच मुला-नातवंडांना पुढे आणणारे नेते पाहिले की येसूबाईंची महानता लगेच लक्षात येते.

महाराणी येसूबाई यांचा त्याग इथेच संपत नाही. उलट तो त्याग इथे सुरू होतो. त्यांच्या असीम त्यागाचे दुसरे उदाहरण तर एकमेवाद्वितीय असेच म्हणावे लागेल. छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यावर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. त्याने स्वराज्याचा घास घेण्यासाठी रायगडाला वेढा दिला. पण स्वराज्याचा धनी त्या वेढ्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा प्रश्न होता. तसेच बाहेर मोकाट असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याने चहूबाजुनी आक्रमण करून स्वराज्याचे लचके तोडले असते. आणि राजाच बंदीवान असल्याने राज्यकारभार हाकणे हे अवघड झाले असते. येसूबाईंची त्यावर उपाय काढला. त्यांनी राजाराम महाराजांना सुचवले की त्यांनी रायगडच्या वेढ्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्यात तळ ठोकावा व रायगड वेढ्यात अडकल्याने संपूर्ण राजधानीच जिंजीला हलवावी. असे केल्याने रायगडाचे महत्व कमी होऊन या वेढ्यातून औरंगजेबाला फारसे काही गवसणार नाही आणि स्वराज्याचा कारभार व्यवस्थित हाकता येईल. म्हणजे स्वराज्य राखण्यासाठी त्या स्वतःला तोफेच्या तोंडी द्यायला तयार होत्या. कल्पना बिनतोड होती पण आपल्या मातेसमान वहिनीला आणि छोट्या शाहूला वेढ्यात एकटे सोडून निघून जाणे हे राजाराम महाराजांना पटेना. पण येसूबाईंनी राजाने नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्व दिले पाहिजे तरच राज्य चालते हे त्यांना पटवून दिले. अखेर जड अंत:करणाने राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि येसूबाईंच्या सत्वपरिक्षेला सुरुवात झाली. राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर येसूबाईंनी आठ महिने रायगड झुंजवला. खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपटाने रायगडावरील भगवे निशाण उतरवले व येसूबाईना शाहू महाराजांसहीत अटक केली. येसूबाईंना शिवरायांची शिकवणच होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण स्वराज्य राखावे. दिलेले किल्ले लढून परत मिळवता येतात पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही. शत्रूने बंदी बनवले तरी सुटता येते हा इतिहासही शिवरायांनी घडवून येसूबाईंसमोर आदर्शासारखा ठेवला होता. पण दुर्दैवाने येसूबाईना त्यांच्यासारख्या युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही. त्यामुळे त्यांना आणि शाहूंराजाना आपली उमेदीची एकोणतीस वर्षे स्वराज्यासाठी कैदेत व्यतीत करावी लागली. एकोणतीस वर्षांपैकी सतरा वर्षे महाराष्ट्रात औरंगजेबाच्या छावणीत नजरकैदेत त्यांना रहावे लागले. जिथे छावणीचा तळ पडेल तिथे त्या दुर्दैवी मायलेकरांची फरपट होई. स्वराज्यात राहूनही त्यांना स्वातंत्र्य उपभोगणे नशिबात नव्हते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्या दोघांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्षे परमुलाखत वनवास सहन करावा लागला. प्रभू रामचंद्रना किंवा पांडवांना चौदा वर्षेच वनवास होता. त्या वनवासातही ते स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकत होते पण येसूबाईना आणि शाहूराजेंना एकोणतीस वर्षे पारतंत्र्याच्या वनवासात घालवावी लागली. खरोखरच त्या दोघांच्या. स्वराज्यनिष्ठेला तोड नाही. अखेर बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजेच पहिले पेशवे यांनी त्यांची सुटका केली. मोगलांच्या कैदैतून छत्रपती शाहूंची सुटका व्हावी, यासाठी ते १७०५ पासून मध्यस्थी करीत होते. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कर्जे काढून फौजा उभारल्या आणि छत्रपतींच्या सर्व शत्रूंचा पराभव केला. १६८१पासून मोगलांशी चाललेल्या लढ्यात धनाजी जाधव, संताजी घोरपडे, सरदार भोसले, सरदार दाभाडे, सरदार आंग्रे आदी सरदारांना त्यांनी एकत्र आणले व मोंगलांशी लढा दिला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात झगडे सुरू झाले होते. बादशाह फरूख सियर आणि त्याला गादीवर आणणारे सय्यद बंधू यांच्यात वितुष्ट आले. सय्यदांचा नाश करण्यासाठी बादशाहच्या खटपटी सुरू झाल्या. आत्मरक्षणार्थ सय्यदबंधूंना मित्र शोधावे लागले. आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी मराठ्यांशी मैत्री करणे त्यांना भाग होते. त्यामुळे दक्षिणेचा सुभेदार सय्यद हूसेन अली याने पेशव्याचे मार्फत मराठी राज्याशी नवा तह केला. त्यात शिवाजी महाराजांचे स्वराज्य बिनशर्तपणे शाहू महाराजांना देण्याचे ठरले. शिवाय दख्खनच्या सहा सुभ्यांचा चौथ आणि सरदेशमुखी हे हक्कही मान्य करण्यात आले. मोबदला म्हणून शाहू महाराजांनी पंधरा हजार फौजेनिशी दख्खनच्या सुभेदारास मदत करावी आणि चोरचिलटांचा बंदोबस्त करून मुलखाची आबादी राखावी, या अटी करारनाम्यात ठरल्या. या करारनाम्यावर बादशाहकडून शिक्का-मोर्तब व्हावयाचे होते. बाळाजी विश्वनाथ फौजा घेऊन सय्यद बंधूंच्या साहाय्यास नोव्हेंबर १७१८ मध्ये दिल्लीस गले. दिल्लीत सत्तांतरण झाले. फरुख सियरची इतिश्री होऊन महमूदशाह गादीवर आला. १७१९च्या मार्च महिन्यात सनदांवर नव्याने बादशाहचे शिक्कामोर्तब होऊन बाळाजी पेशवे येसुबाई, शाहूराजे व इतर मराठी सैनिक यांची सुटका करवून साताऱ्यास येऊन छत्रपतींस भेटले आणि मायलेकांनी एकोणतीस वर्षांनतर मोकळा श्वास घेतला.

अशा रीतीने मराठ्यांच्यातील कपट व आपापसातील बेबनाव यांच्यामुळे एकोणतीस वर्षे कैदेत असलेले हे मायलेक दिल्लीतील मुगल सरदारांच्यातील कपट आणि आपापसातील बेबनाव यांचा फायदा घेऊन सुटले आणि एक वर्तुळ पूर्ण झाले.

१६९० ते १७१९ अशी एकोणतीस वर्षे त्यांनी कैदेत कशी काढली असतील याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो. आजूबाजूला परधर्मीय पुरुष माणसे, संपूर्ण वातावरण परकीय, खाणे पिणे, रीतिरिवाज, पोशाख सारे, सारेच अनाकलनीय आणि अबोध असताना त्या प्राप्त परिस्थितीशी कशाकाय सामो-या गेल्या असतील ? मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांवर जुलूम करणारा औरंगजेब महाराणी येसूबाईंशी कसा वागला असेल ? त्याच्या क्रूर वृत्तीशी त्यांनी कसा सामना केला असेल ? धर्मांतराच्या आणि अब्रूच्या भीतीच्या सावटात त्या एकोणतीस वर्षे कशा राहिल्या असतील ? आपला धर्म आणि अब्रू त्यांनी कशी सांभाळून ठेवली असेल ? या इतक्या वर्षात त्यांचे मानसिक संतुलन ढळले कसे नसेल ? महाराष्टातील सतरा वर्षांच्या कैदेत मुलगा जवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यावर दोघांची बारा वर्षे जाणीवपूर्वक ताटातूट करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्था काय असेल ? या आणि अशा असंख्य प्रश्नांच्या विचारांनी मनात काहूर माजते. औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून नेल्यामुळे आणि गनिमीकाव्याने मोगलांना ज्या धनाजी संताजी यांनी सळो की पळो करून सोडले त्या धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे याना येसूबाईंची सुटका करणे का शक्य झाले नाही ? त्यांच्या सुटकेस एकोणतीस वर्षे का लागली याचा शोध इतिहासात शिरून घेतला पाहिजे.

लेखक : श्री अभय देवरे

सातारा

प्रस्तुती : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सुंदर दिसण्याचा सोपा उपाय !” –  लेखक : प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित  ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “सुंदर दिसण्याचा सोपा उपाय !” –  लेखक : प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित 

आनंद न देणाऱ्या नात्यांची ओझी घेऊन जगण्यात काय अर्थ आहे ?

त्यापेक्षा तीच नाती जपावीत जी आपल्याला सुख देतात, वेळ देतात आणि आपली काळजी करतात !

जे आपल्या मनाचा विचार करतात आपणही त्यांच्या मनाचा विचार करावा !

आपलं सुखदुःख त्यालाच सांगावं ज्याला त्याची किंमत असते !

तुम्ही रडत आहात आणि समोरचा हसतोय किंवा तुम्ही हसताय आणि समोरचा रडतोय अशा व्यक्तीला काही सांगून, वेळ देऊन काय उपयोग ?

ज्याचा फोन यावा वाटतो त्याच्या जवळच मन मोकळं बोलावं,

ज्याचा मेसेज यावा वाटतो त्याच्याशीच जास्त connect रहावं !

जे आपला मेसेज वाचून साधा दोन शब्दांचा सुद्धा रिप्लाय देत नाहीत, त्यांना आपली खुशाली कळवायची तरी कशाला ?

जीव लावावा आणि लाऊन घ्यावा !

कुणीतरी माझं आहे आणि मी कुणाचा तरी आहे असं वाटणं म्हणजेच प्रेम, आदर आणि मैत्री !

 अहो छोट्या छोट्या गोष्टीतही खूप मोठा आनंद असतो तो देताही आला पाहिजे आणि घेताही आला पाहिजे !

तुझा डी. पी. छान आहे, तू आज सुंदर दिसतेस, मला तुझा ड्रेस आवडला, तुझ्या हाताला खरंच खूप मस्त चव आहे… अशा साध्या प्रतिक्रिया देण्याने सुद्धा समोरच्या व्यक्तीचं मन आनंदून जातं, सुखावतं, प्रसन्न होतं !

मनाची ही प्रसन्नताच तुमचा-आमचा बी. पी., शुगर नार्मल ठेवत असते !

खरं सांगा, असं एकमेकांशी का बोलू नये ? असं बोलायला काही पैसे लागतात का ? खूप कष्ट पडतात का ?

मुळीच नाही, तरीही माणसं या गोष्टी का करत नाहीत तेच कळत नाही ?

कुढत राहण्यापेक्षा फुलपाखरा सारखं उडत रहावं आणि जीवन गाणं मजेत गावं !

ज्या व्यक्तीशी बोलून तुम्ही सुखावता त्याच्याशी अधिक बोला ! 

ज्याला आपलं सगळं दुःख सांगता येतं त्यालाच हसत हसत जगता येतं !

मन मोकळं बोलल्यामुळे निसर्गतःच आपलं फेशियल होईल आणि तुम्ही खूप सुंदर, टवटवीत दिसायला लागाल !

गालावरची खळी आणि चेहऱ्यावरची लाली, हे मनाच्या प्रसन्नतेचं प्रतिबिंब असतं, म्हणून जी माणसं जवळची वाटतात त्यांच्याशी भरभरून बोला !

प्रेम करताही आलं पाहिजे आणि प्रेम मिळवताही आलं पाहिजे !

आवडीच्या व्यक्ती सोबत तुम्ही जितकं जास्त Open होऊ शकता, शेअरिंग करू शकता, तितके तुम्ही जास्त आनंदी राहू शकता, सुखी राहू शकता !

या आनंदी मना मुळेच आपण सुंदर, प्रसन्न आणि हसतमुख दिसतो आणि सर्वांना हवेहवेसे वाटतो !

दुःख असलं तरी दुःखी राहू नये आणि पुन्हा पुन्हा तेच ते रडगाणं गाऊ नये !

आहे ते स्वीकारायचं आणि मजेत पुढे जायचं !

हिंडायचं, फिरायचं, चांगलं रहायचं, फोटो काढायचे, डी. पी. बदलायचा, समोरच्याला छान म्हणायचं आणि आपल्याला कुणी छान म्हणलं की त्याला हसून thank you म्हणायचं !

जगणं सोप्पं आहे

त्याला अवघड करू नका

आणि मन नावाच्या C. D. मध्ये

Sad music भरू नका !

थोडं तरी मना सारखं जगा

आयुष्यभर दुसऱ्याच्या मनासारखं जगलात म्हणून कुणीही तुमचा पुतळा उभारणार नाही !

  

लेखक : प्रा. विजय पोहनेरकर, छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद )

 94 20 92 93 89

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तहान… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ तहान… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

तिला पाण्याची तहान

त्याला तहान ज्ञानाची 

पाणवठी तिला पाणी

त्याची तहान पुस्तकपानाची 

*

परिस्थितीशी झगडता

मुळी मागं नाही सरायचं 

भविष्याचे स्वप्न सत्यात

कर्तव्य करत फुलवायचं 

*

मनामधे जिद्द असेल तर

आपोआप मिळते वाट

असतील दगडधोंडे काटे

पण यशाची नक्की पडते गाठ

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कविता ☆ “कविता का दिन…” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी , बी एड , प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । यादों की धरोहर हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह -एक संवाददाता की डायरी को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह-महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ कविता – कविता का दिन☆ श्री कमलेश भारतीय ☆

विश्व भर में कविता

अच्छा है, कविता मन की थाह

सामने ला देती है

कविता, चिड़िया के घोंसले सी सुकून देती है!

कविता बहुत कुछ कहने को उकसाती है।

कविता का दिन है

और मैं खामोश कैसे रहता?

यों कवि कम, कथा ज्यादा कहता हूं

पर कविता भी लिखवा लेती है

कुछ न कुछ!

लोग भूल जाते हैं!

कि मैं भी कविता से प्यार करता हूं

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

संपर्क :   1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिंदी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆श्रेयस साहित्य # १ – श्री राम ☆ श्री राजेश कुमार सिंह ‘श्रेयस’ ☆

श्री राजेश कुमार सिंह ‘श्रेयस’

☆ साप्ताहिक स्तम्भ – श्रेयस साहित्य # 1 ☆

☆ कविता ☆ ~ श्री राम ~ ☆ श्री राजेश कुमार सिंह ‘श्रेयस’ ☆ 

आंखें तुमको देखती,

आंखों में है प्राण

रघुवर तेरे अधर पर,

अति मीठी मुस्कान

प्राण तत्व तुम जगत के

कर धारे संधान

रोम रोम में राजते

तुममें रमते प्राण

प्राण प्रिया जू सियाजी

राजे तेरे बाम

तुम प्रिय हो इस दीन के

प्रिय है तेरो नाम

राम नाम है मंत्र मणी

जपते आठो याम

मीरा के तुम राम हो,

कबीरा के भी राम

तुलसी के उर में बसों

घट में श्री रैदास,

गुरु नानक अरदास में

गुरु वाणी में वास

रहिमन दोहन में लिख्यो

ब्रह्म राम को नाम

राम शब्द परमात्मा,

आप सभी के राम

राम नाम महिमा बड़ी,

राम नाम को छाँव

जो जानन सो जान गा

माथ मोहि तोहि पाँव

श्रेयस रचि अति सोचि के

लिखियो शब्द सियराम

रतन महा बहुमूल्य है,

नाम तुम्हारो राम l

♥♥♥♥

© श्री राजेश कुमार सिंह “श्रेयस”

लखनऊ, उप्र, (भारत )

दिनांक 22-02-2025

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares