मराठीतील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक, टीकाकार व विचारवंत श्री. श्रीकृष्ण केशव क्षीरसागर उर्फ श्रीकेक्षी यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाली येथे दि. 6/11/1901 ला झाला. समाज, जीवन व संस्कृती यांचे सखोल चिंतन त्यांच्या लेखनातून दिसून येते. सौंदर्यवादी, चिंतनशील, वास्तववाद, गूढवाद, नवमानवतावाद इ. विषयांवर मूलभूत चर्चा करणारे असे त्यांचे साहित्य वेगळा ठसा उमटवून जाते. ज्ञानकोशकार केतकर यांचे ते समविचारी होते.
1940 साली त्यांची राक्षसविवाह ही पहिली कादंबरी प्रकाशित झाली. तेव्हापासूनच त्यांच्या लेखनातील वेगळेपणाची दखल घेतली गेली.
आधुनिक राष्ट्रवादी रवींदनाथ ठाकूर, उमरखय्यामची फिर्याद, टीकाविवेक, व्यक्ती आणि वाङ्मय, वादे वादे ही त्यांची समीक्षेवरील गाजलेली पुस्तके. याशिवाय तसबीर आणि तकदीर हे आत्मचरित्र, बायकांची सभा हे प्रहसन, मराठी भाषा–वाढ आणि बिघाड हे वैचारिक लेखन असे विविधांगी लेखन त्यांनी केले आहे. निवडक श्रीकेक्षी या नावाने त्यांचे निवडक साहित्य साहित्य अकादमीने संकलित केले आहे. साहित्य अकादमीने सल्लागार मंडळावर सदस्य म्हणूनही नियुक्त केले होते. महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या नावे समीक्षेसाठी पुरस्कार ठेवून त्यांचा सन्मान केला आहे. 1959 साली मिरज येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी बरोबरच त्यांनी उर्दू शायरीचाही अभ्यास केला होता.
1980 मध्ये त्यांचे निधन झाले.
सारस्वतकार भावे:
06/11/1871 हा विनायक लक्ष्मण तथा सारस्वतकार भावे यांचा जन्मदिवस. कोकणातील पळस्पे या गावी त्यांचा जन्म झाला तर शिक्षण बालपण व शिक्षण ठाणे येथे झाले . बी.एस.सी. पदवी संपादन केली असली तरी त्यांनी प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक, इतिहासकार आणि संपादक म्हणून नाव कमावले. ‘मराठी वाड्मयाचा त्रोटक इतिहास’ चे लेखन त्यांनी ग्रंथमाला या मासिकातून केले. महाराष्ट्र कवि हे मासिक 1903 साली काढले. महानुभवपंथाच्या पोथ्या त्यांनी बाळबोधलिपीत प्रकाशित केल्या. ऐतिहासिक संशोधनासाठी ‘मराठी दप्तर’ नावाची संशोधन संस्था काढली. विद्यमान नावाचे मासिक काढले. यावरून त्यांची साहित्य व संशोधन याविषयीची धडपड दिसून येते. पण त्याना लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली ती महाराष्ट्र सारस्वत या ग्रंथामुळे. ते या ग्रंथामुळे सारस्वतकार भावे या नावाने ओळखू जाऊ लागले. याशिवाय त्यांनी नेपोलियनचे चरित्र, दासोपंतांचे गीतार्णव, नागेश कविंचे सीतेस्वयंवर यांचा लेखन व सुधारित आवृत्तीचे प्रकाशनही केले. कविकाव्यसूची, वच्छाहरण या महानुभव काव्याचे संपादन केले. ठाण्याच्या सांस्कृतिक चळवळीतील ते एक अग्रगण्य व्यक्तिमत्व होते. भारतातील पहिले मराठी पुस्तकांचे सार्वजनिक वाचनालय त्यांनीच ठाणे येथे सुरू केले. यावरून त्यांच्या कार्याची महती लक्षात येईल.
भालबा केळकर: भालचंद्र वामन तथा भालबा केळकर हे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. पण लेखन आणि अभिनय या अंगभूत गुणांमुळे त्यानी या क्षेत्रातही महत्वाचे कार्य केले. अनेक बालनाट्ये व नभोनाट्यांचे लेखन व दिग्दर्शन त्यांनी केले. शास्त्रीय विषय रंजकपणे मांडणे हे त्यांच्या बालनाट्यांचे वैशिष्ट्य होते. नंतर त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था काढली. या संस्थेने अनेक नाटक सादर केली. भालबांनी दिग्दर्शन व अभिनयही केला. 1961 साली प्रेमा तुझा रंग कसा हे नाटक प्रथम दिग्दर्शित केले. नंतर वेड्याचं घर उन्हात, तू वेडा कुंभार इ . नाटके पडद्यावर आणली.
ओळखीच्या म्हणी कथांच्या खाणी, क्रिकेटचा खेळ व इतर गोष्टी, गुरूवरचा माणूस, तलावातले रहस्य हे त्यांचे काही बालसाहित्य. तर प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधन, शेरलॉक होम्सच्या अनुवादित कथा (सहा भाग), संपूर्ण महाभारताचे आठ खड हे त्यांचे अन्य काही लेखन.
1987च्या आजच्या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन. !
भाऊ पाध्ये: भाऊ पाध्ये यांचा आज जन्मदिवस. आपण त्यांच्या साहित्य कर्तृत्वाविषयी दि. 30/10/21 च्या अंकात वाचले आहे. म्हणून येथे पुनरावृत्ती टाळत आहे.
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
साभार: विश्वकोश मराठी, विकीपीडिया
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ भाऊबीज: आठवणी दाटतात….. ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
आज भाऊबीज. आज बहिणीने भावाला ओवाळायचं आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची. ओवाळणीच्या तबकातील दिवा हे सूर्याचे प्रतीक. सूर्य हा जीवनदाता. ’तू अनेक सूर्य पहा’ असा अर्थ त्या ओवाळण्यात आहे. भाऊ-बहीण यांच्या नात्यात एक अनोखे माधुर्य आहे. या नात्याचे कौतुक करताना लोकसाहित्याने खूप खूप ओव्या रचल्या आहेत. बहिणींना आपला लाडका भाऊ अगदी जवळचा वाटतो. जणू भाऊ म्हणजे गळ्यातला ताईत. एका ओवीत एकीनं म्हंटलयं, ‘दुबळा पाबळा का होईना, पण एक तरी भाऊ बहिणीला असावाच. का? भाऊबीजेला एक पावलीची चोळी आणि कधीतरी, थकल्या भागल्या देह-मनाला एका रात्रीचा विसावा.’
भाऊ मोठा असला, तर तो बहीण आणि वडील यांच्यामधला दुवा असतो.तो मित्र असतो. सल्लागार असतो. रक्षणकर्ता असतो. धाकटा असला, तर त्याच्या खोड्याही बहिणीला आनंद देतात. तो बहिणीला आपल्या मुलासारखाच वाटतो. असेच काही-बाही विचार मनात येत होते. विचार करता करता त्यांची वावटळच झाली. या वावटळीने मला एकदम उचललं आणि बालपणीच्या अंगणात नेऊन उतरवलं. तिथे आठवणी झिम्मा खेळत होत्या.
एक जण लगबगीने पुढे आली, ‘मी आठवते तुला?’
‘हो ग, तुला कशी विसरेन? ‘बालपणीच्या त्या निरागस वयातली, तितकीच निरागस आठवण. … आठ वर्षाची असेन मी तेव्हा. आजोळी होते मी तेव्हा. माझे मुंबईचे मामा-मामी, लता दिलीप सगळे आले होते. दिलीप माझ्या बरोबरीचा. लता आमच्यापेक्षा चार वर्षाने मोठी. तो भाऊबीजेचा दिवस होता. दिलीपने आमच्या दोघींकडून छान चोळून मोळून घेतले. आदल्या दिवशी तिळाचे वाटण केलेले होते. ते लावायला लागताच तो म्हणाला, तो चिखल मला लावू नकोस!’ त्यावर आजी म्हणाली, ‘अरे त्यामुळे शरीरावरची छिद्रे मोकळी होतात. अंग मऊ होतं.’ मगं तो काही बोलला नाही. मी वाटण जरा जास्तच खसखसून त्याला लावलं. आज महाराजांना पाण्याची बदली आयती द्यायची होती. विसण घालायचं होतं. उटणं लावायचं होतं. त्यावेळेपर्यंत मोती साबण आला नव्हता. निदान आमच्या घरात तरी. दोन बादल्या पाणी त्याला घालून झालं, तरी त्याचं ‘अजून घाल’ संपेना. एव्हाना बंबातलं गरम पाणी संपून नुकतच वरून घातलेलं गार पाणी येऊ लागलं होतं. मी म्हंटलं, ‘घालू गार पाणी?’ तशी महाराजांनी एकदाचा टॉवेल गुंडाळला. अंग पुसून नवे कपडे घातले. दादामामांनी त्याला दहा रूपयाच्या दोन नोटा दिल्या. एक मला घालायला आणि एक लताला घालायला.
मी पण आंघोळ करून जरीचं परकर –पोलकं घातलं. तशी त्याने सुरू केलं, ’सुंदर ते ध्यान । समोर उभे राही। जरी परकर घालूनिया ।। ‘आहा, काय ध्यान दिसतय?’ माझ्यावरून हात ओवाळत तो म्हणाला. मी काही चिडले नाही. त्याच्या खिशातल्या नोटेकडे बघत होते ना मी!. मग ओवाळण्याचा कार्यक्रम झाला. लताताईच्या तबकात त्याने नोट टाकली. नंतर मी ओवाळलं. मी आपली ओवाळतेय … ओवाळतेय… ओवाळतेय. नोट काही खिशातून बाहेर येईना. मी म्हंटलं ,’टाक की लवकर. माझा हात दुखायला लागलाय.’
त्याने खिशावर आपला हात ठेवत म्हंटलं , ‘घे बघू घे.’ आणि तो पाटावरून उठून चक्क पळायलाच लागला. ‘म्हणाला, ‘हे पैसे माझे आहेत.’ मी म्हंटलं , ‘दादामामांनी मला ओवाळणी घालण्यासाठी तुला दिलेत.’ ‘असं? मग मला पकड आणि घे.’ मी जवळ गेले की तो पळायचा. आमची शिवाशिवीच सुरू झाली. पण मी काही त्याच्याइतकी चपळ नव्हते. शेवटी रडत रडत आजीकडे गेले. आजीची आणि त्याची काही तरी नेत्रपल्लवी झाली. आजी खोटं खोटं त्याला रागावली. मी म्हंटलं, ‘दादांनी दिलेले पैसे द्यायचेत, तर इतका कंजूषपणा करतोयस, स्वत:चे द्यायचे झाले, तर काय करशील? बहुतेक माझ्याकडे ढुंकूनसुद्धा पाहणार नाहीस.
‘घ्या. रडूबाई… रडूबाई रडली… आजीपुढे जाऊन रडली….’ त्याने नोट माझ्या परकराच्या झोळात फेकून दिली. त्या दहा रुपयाचे मी काय केले हे आता आठवत नाही. मोठे छान दिवस होते ते. पुन्हा किती तरी वर्षं आम्ही भाऊबेजेला भेटलो नाही.आणि पुन्हा भेटलो, तेव्हा खूप सुजाण झालो होतो. तेव्हा, जुन्या भाऊबीजेची आठवण काढायची आणि लोट-पोट होत हसायचो. आता हेही आठवतय, की तो मिळवायला लागला आणि आता भाऊबीजेला आम्ही प्रत्यक्ष भेटत नसलो, तरी माझ्यासाठी कधी साडी, कधी ऊंची पर्स, कधी नेकलेस, कधी भारी अत्तराच्या किंवा सेंटच्या बाटल्या असं काही ना काही भाऊबीज म्हणून येत रहातं.
इतक्यात एक जण लाजत… संकोचत माझ्याकडे आली. ‘ मी… मी आठवते तुला.’
‘तुला कशी विसरेन? दुसर्याच्या कष्टाचा कळवळा येणार्या माझ्या भावाची आठवण तू…त्या वर्षी दिवाळीला मी माझ्या काकांकडे होते. माझी चुलत बहीण नलिनी. ती आणि मी एकाच वयाच्या. तिने खूप आग्रह केला की आमच्याकडे ये म्हणून. त्यावर्षीची माझी दिवाळी काकांकडे झाली. मला चार मोठे चुलत भाऊ. नर्कचतुर्दशीला आणि भाऊबीजेला सगळ्यांनी आम्हा दोघींकडून छान अंगमर्दन करून घेतलं. माझा दोन नंबरचा चुलतभाऊ बाबू म्हणाला , ’सगळ्यांना तेल लावून तुमचे दोघींचे हात चांगले भरून आले असतील. चला! आता तुम्ही पाटावर बसा. मी तुमच्या हाता-पायांना तेल लावतो. आम्ही म्हंटलं, ‘तू म्हणालास ना, पुष्कळ झालं, आमचं हात दुखणं कमी झालं. नाही म्हंटलं तरी दुसर्याच्या कष्टाचा विचार करणारा भाऊ आपल्या घरात आहे याचा मला आनंद झाला. अभिमान वाटला. ‘ऐसी कळवळ्याची जाती। लाभावीण करी प्रीति।‘ दुसर्याचा विचार करणारं त्याचं हरीण –काळीज त्या दिवशी प्रथम लक्षात आलं. मग त्याने आम्हा सर्वांना ‘सुवासिनी’ सिनेमा दाखवला.
एवढ्यात आणखी एक जण इतरांना मागे सारत धिटाईने पुढे आली. म्हणाली, ‘तुला ‘गणेश नगरचे’ महादेवराव आठवतात की नाही?’ मी म्हटलं, ‘त्यांना कशी विसरेन? ते तर माझ्या ‘मर्मबंधातली ठेव’ आहेत.
पुण्यात एका लग्नाच्या वेळी दादा आणि वसुधाताई यांची भेट झाली. सहज गप्पा मारता मारता तेही सांगलीचेच आहेत, असं कळलं. त्यांचं नाव महादेव आपटे. मी एकदम म्हणाले, ’मीही माहेरची आपटे.’ त्यावर ते म्हणाले, ‘अरे वा! मग तू आमची माहेरवाशीणच झालीस की! आता यायचं आमच्याकडे. गणेशनगरला. ’ मी मान डोलावली. अशा लग्नकार्यात किंवा प्रवासात झालेल्या ओळखी आणि त्यावेळी दिलेली आश्वासनं तिथल्या तिथे विरून जातात. पण यावेळी तसं झालं नाही. ती दोघं एक दिवस फोन करून आमच्या घरी आली आणि जाताना ‘आता तुमची पाळी’ असं बजावून गेली. दोघंही पती-पत्नी अतिथ्यशील. लाघवी. भेटेल त्याच्याशी मैत्री जोडण्याची अनावर हौस. हळूहळू मी खरोखरच त्यांच्या घरच्यासारखी झाले. त्या वर्षी त्यांनी मला भाऊबीजेला बोलावले. मी संध्याकाळी गेले. त्यानंतर राखी पौर्णिमेला काही मी गेले नाही. संकोच वाटला, की दरवेळी आपण त्यांच्याकडून ओवाळणी घेत राह्यचं, हे काही बरं नाही. दुसर्या दिवशी सकाळी फोन …. ‘काल वाट पहिली. तू आली नाहीस. असं चालणार नाही…’ वगैरे… वगैरे… मला माझ्या कोत्या विचारांची लाज वाटू लागली. प्रेमाचं रागवणं. त्यानंतर ही चूक मी पुन्हा केली नाही. बरं त्यांना बहीण नाही, म्हणून त्यांनी हे नातं जोडलं असंही नाही. त्यांना सख्ख्या, चुलत, मावस अशा अनेक बहिणी होत्या. शिवाय वसुधाताईंच्या बहिणीही ओवाळायला यायच्या. वसुधाताई स्वत:च ओवळणीची छान तयारी करून ठेवत. भेटलेल्या प्रत्येकाशी नातं जोडणं आणि निभावणं हा दादांचा स्वभावधर्म होता. आता दादा नाहीत. वहिनीही नाहीत. पण त्यांनी होते तोवर अगदी निरपेक्ष असं प्रेम आमच्यावर केलं.
असंच निरपेक्ष प्रेम आमच्या दादांनी म्हणजे माझ्या मोठ्या भाऊजींनी माझ्यावर केलं. अगदी लग्न झाल्यापासून. ते माझ्या वडलांसारखेच होते. माझे सल्लागार होते. मित्र होते. दुसर्यांच्या उपयोगी पडायचा त्यांचा स्वभावच होता. माझे लग्न झाल्यावर माझा भाऊ काही वर्ष भाऊबीजेला यायचा. पण पुढे दरवर्षी ते शक्य होत नसे. असंच एका वर्षी कुणीच नव्हतं ओवाळायला. आमच्या वाहिनी (माझ्या जाऊबाई) म्हणाल्या, ‘आज कुणाला तरी ओवाळल्याशिवाय राह्यचं नसतं. तू यांना ओवाळ. मग तेव्हापासून, माझे भाऊ आलेले असले, नसले, तरी आमच्या दादांना ( माझ्या मोठ्या भाऊजींना ) मी ओवाळू लागले. राखी पौर्णिमेला राखी बांधून ओवाळू लागले आणि त्यांच्या वाढदिवसाला त्यांना ओवाळून औक्षण करू लागले, ते अगदी परवा परवापर्यंत. गेल्या दोन वर्षांपूर्वी धनत्रयोदशीलाच ते गेले. तेव्हा ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्यात मी माझा मोठा भाऊ, मार्गदर्शक, संरक्षक आणि सल्लागार पाहिला.
आज अशा सगळ्या भावांच्या आठवणी काढता काढता, मनात एक हुरहूर दाटून आलीय. कालप्रवाहात सगळे वाहून गेले. मी या प्रवाहाच्या काठाशी उभी राहून म्हणते आहे, ‘गेले ते दिन गेले….’
शेवटच्या ‘न’ बरोबरच टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. ‘झालं बुवा एकदाचं…’ त्यावेळी प्रत्येक उपस्थिताच्या मनात आलेला हा विचारच जणू त्या कडकडाटातून घुमत होता. ‘‘चला, आता वधु-वरांनी एकमेकांच्या गळ्यात हार घाला.”… आंतरपाट गोळा करत गुरूजींनी ऑर्डर सोडली… ‘‘हं, गोपाळराव, तुम्ही आधी घाला हार…”…. पण केव्हाचे हार धरून थांबलेले गोपाळरावांचे हात, नेमक्या त्या मोक्याच्या क्षणी मात्र त्यांचं ऐकायला तयार नव्हते… आणि त्याचं कारणही तसंच होतं… उपस्थित एका वेगळ्याच समाधानाने त्यांच्या डोक्यावर अक्षतांचा अक्षरश: मारा करत होते, आणि तो चुकवता चुकवता डोक्याबरोबरच, हार धरलेले हातही नुसतेच इकडे तिकडे हलत होते. खरंतर अशावेळी अक्षता डोक्याला इतक्या लागत नाहीत… केसात अडकतात… आणि गोपाळरावांचा नेमका हाच तर प्रॉब्लेम झाला होता…अक्षतांचा मारा थोपवायला त्यांच्या डोक्याच्या नेमक्या मध्यभागीच केस शिल्लक नव्हते. आणि तेही निसर्ग नियमानुसार योग्यच होतं. वयाला साठी पार करण्याची उत्सुकता लागली, की डोक्यावर ‘कुंडल-कासार’ तयार होणारच की…
आता ही गोष्ट आश्चर्यात पाडणारी आहे, यात शंकाच नाही. म्हणजे हातात वरमाला घेऊन चतुर्भुज होण्यासाठी अधीर झालेल्या एका वराची साठी जवळ आलेली असणं, ही ‘स्वाभाविक’ बाब कशी म्हणता येणार? ——-
खरंतर अगदी लग्नाच्या वयात आल्यापासूनच गोपाळरावांनी इतरांसारखी वधू-संशोधनाची मोहीम अगदी वाजत-गाजत, सर्व तयारीनिशी सज्ज होऊन सुरू केली होती… सर्व तयारी म्हणजे… चार वर्षात मिळू शकणारी पदवी, निवांतपणाने सहा वर्षात का होईना, पण मिळवली होती. जोडीला टायपिंगची ४० स्पीडची परिक्षाही नशीब बलवत्तर असल्याने ते लगेच पास झाले होते. त्याच नशिबाच्या जोरावर, फार महिने वाट पहात थांबावे न लागता, एका खाजगी कंपनीत ‘ टायपिस्ट-कम…साहेब सांगतील ते सगळं ‘… या पोस्टवर नोकरीही मिळाली होती. म्हणजे आता त्यांना ‘उपवर’ असायला काहीच हरकत नव्हती. ते लहान असतांनाच एका अपघातात त्यांच्या वडलांचे निधन झाले होते. एक मोठा भाऊ होता… पण कुठल्याच अर्थाने त्यांना न शोभणारा. अपघाताची नुकसान भरपाई म्हणून मिळालेले थोडेफार पैसे, आणि आईने नाईलाज म्हणून स्विकारलेली अनेक घरच्या स्वैंपाकाची कायमस्वरूपी नोकरी, या दोन चाकांवर तिने बिचारीने संसाराचा गाडा चालता ठेवला होता… अगदी गोपाळरावांना नोकरी लागेपर्यंत. दरम्यान मोठ्या भावाने ब-यापैकी नोकरी, आणि पाठोपाठ तिथलीच एक छोकरी पटकावून, स्वत:ची वेगळी चूल मांडली होती. हळुहळू शरिराबरोबरच, किंवा त्याहीपेक्षा जास्त वेगाने, तो मनाने स्वत:ची आई आणि हा धाकटा भाऊ यांच्यापासून बराच लांब गेला होता. अतिकष्टाने आणि ‘गोपाळचे कसे होणार?’ या व्यर्थ चिंतेने केव्हापासूनच खचून गेलेली आई, गोपाळला नोकरी लागल्यानंतर, ‘आता इतिकर्तव्यता झाली’ असे समजून की काय, हे जग सोडून गेली. त्यावेळी भाऊ आला होता, पण त्यानंतर आजतागायत गोपाळला तो दिसलाही नव्हता… आणि आता आपल्याला एक मोठा भाऊ असल्याचं जणू तो विसरूनच गेला होता.
… आता अशा परिस्थितीत त्याच्यासाठी बायको शोधणार तरी कोण? नाही म्हणायला एक मावशी, आणि काही मित्र, जे त्याच्या गरीब स्वभावामुळे नकळत जोडले गेलेले होते, त्यांनी ४-५ वर्षं खटपट केली. पण मग मावशीही देवाघरी गेली, आणि मित्रही कंटाळले… तरी गोपाळ मात्र प्रयत्न करतच होता… पण कितीतरी मुलींचे पालक त्याच्या ‘सडाफटिंग’ या स्टेटस् मुळे साशंक व्हायचे आणि हे ‘स्थळ’ पहायचेच नाहीत. त्याच्या सर्वांगिण सामान्यपणामुळे काही ‘अतिशहाण्या’ (त्याच्या मतानुसार) मुली त्याला नकार द्यायच्या. काही मुली ‘चालेल’, असं नाईलाज झाल्यासारखं म्हणायच्या, आणि त्यांच्या चेहे-यावरचे ते भाव पाहून गोपाळचा ‘अहंकार’(?) डिवचला जायचा, आणि तोच त्यांना नकार द्यायचा.
एकूण काय? तर ‘बाशिंग बळ’ कमी पडतंय्, असे शेरे ऐकू यायला लागले. त्या बिचा-याने स्वत:हून ‘अनुरूप वधू’ ही व्याख्या खूपच ढोबळ करून टाकली होती… कधीच… म्हणजे वयाने पस्तिशी ओलांडल्यावर… तसाही ‘त्याचं लग्न’ हा कुणासाठीच फारसा इंटरेस्टचा विषय कधी नव्हताच. पण तरीही जे मित्र थोडीफार मदत करत होते, तेही एव्हाना स्वत:च्या संसाराच्या व्यापात गुरफटून गेले होते. पण गोपाळची चिकाटी मात्र, इतर कुठल्याही बाबतीत नसेल, इतकी याबाबतीत दांडगी होती. आणि ते अगदीच स्वाभाविक होतं… नाईलाजाने अगदी एकटा पडलेला माणूस सोबतीसाठी आसावलेला असणारच. तरीही तो आनंदी-शांत रहाण्याचा प्रयत्न करत होता… निदान वरकरणी तसं दाखवत तरी होता. आता स्थळाकडूनच्या आधीच्या अपेक्षाही खूप बदलल्या होत्या…. कमी झाल्या होत्या. बघता बघता पन्नाशी उलटली होती त्याची. आता फक्त अशी बायको हवी होती, जी दोनवेळेला त्याला साधंच पण घरचं खाऊ घालेल, क्वचित् कधी दुखलं-खुपलं तर आस्थेने विचारेल.. जमेल तेव्हढी काळजी घेईल… बस्. स्वत:चं मूल आणि इतर समाधानाच्या अपेक्षा कधीच्याच बारगळल्या होत्या. आता फक्त सोबत हवीशी वाटत होती… रंग-रूप–उंची-जाडी, हीसुद्धा अगदी गौण बाब ठरली होती.
… आणि अशातच आता अचानक एक मुलगी… म्हणजे बाई, त्याच्याशी लग्न करायला तयार झाली होती… आता लोक त्याला ‘गोपाळराव’ म्हणायला लागले होते… गोपाळराव अगदी खूष होते— कृतकृत्य झाल्यासारखे — आणि आज गोपाळराव चक्क बोहल्यावर चढलेही होते…
…… गुरूजींचे मंगलाष्टक संपले, अंतरपाट दूर झाला, गोपाळरावांच्या हातातला हार आणि समोरची ‘वधू’ही गळ्यात तो हार कधी घातला जातोय् याची वाट पहात ताटकळले होते. वधूच्या हातातला हारही त्याच्या गळ्यात पडायला उत्सुक होता…
… पण डोक्यावर होणा-या अक्षतांच्या माराने गोपाळराव गांगरून गेले होते, त्यांचे फक्त हातच नाही, तर पायही हळुहळू लटपटायला लागले होते… आणि त्यांच्याही नकळत, बारीकशी चक्कर येऊन ते धाडकन् खाली पडले……
———लोखंडी सिंगल कॉटवर उशी छातीशी कवटाळून,… पाय पोटाशी घेऊन…. केविलवाण्या चेहे-याने गाढ झोपलेले गोपाळराव चक्क कॉटवरून खाली पडले …. …आणि त्यांना ते कळलंही नाही. त्यांनी शांतपणे फक्त कूस बदलली.
——– आता छातीशी कवटाळलेली उशी दूर करूच नये इतकी सुखकारक असल्यासारखं वाटत होतं त्यांना—- आणि फरशी तर इतकी उबदार.. जाड आणि मऊमऊ ….खिडकीतून दिसणाऱ्या डोंगरामागून डोकावणारा पौर्णिमेचा चंद्र जणू फक्त त्यांच्याचकडे पहात खट्याळपणे हसत होता, आणि इतक्या वर्षांत- झोपेत का होईना – पहिल्यांदाच गोपाळराव अतिशय खूष होऊन चक्क गोड लाजत होते…..
☆ गेले ते दिवस ☆ संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने ☆
आज आठवते ना आपल्या लहानपणीची दिवाळी. २५ पर्यंत पाढे पाठांतर, २१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन, कविता पाठांतर, निबंध. दिवाळी सुट्टी अभ्यासासाठी दोनशे पानी वही व शुद्धलेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही.
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. इतका दिवाळीतला गृहपाठ करूनसुद्धा आपण दिवाळीत धम्माल करायचो. किल्ले बनवायचो, रांगोळीसाठी अगरबत्तीने ठिपके पाड़ून द्यायचो. मनसोक्त फटाके फोडायचो. सापाची गोळी आठवते ना… टेलिफोनचा फटाका आठवतो का… चिड़ी कुठून कुठे उड़ायची माहित आहे ना… राॅकेट साठी कुठून पण बाटली शोधून आणायचो. रस्त्यावर लावलेला बाण आड़वा होऊन कोणाकोणाच्या ढेंगातून गेला होता आठवतंय ना. कधी कधी बाण कोणाच्या खिडकीतून घरात घुसायचा, मग त्या काकी भडकण्याच्या आधी सगळे तिथून धूम ठोकायचे.
खरंच, दिवाळीच्या दिवसात आम्ही श्रीमंत व्हायचो कारण बाबा, मामा, काका, खिशात पैसे टाकायचे आणि उरलेल्या दिवसात अर्ध्या तासाचे 50 पैसे किंवा तासाचा 1 रुपया देऊन सायकल भाड़्याने घेऊन फिरायला जायचो ना…
आता फक्त हातात मोबाईल घेऊन त्यातच गर्क असलेली मुले दिसतात तेव्हा सांगावेसे वाटते, अरे दिवाळी म्हणजे व्हाॅटसअपवरचे मेसेज आणि व्हिड़ीओ नसतात रे….!
असो…. !! ?⭐?
संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ दिवाळी कालची आणि आजची.. भाग –2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
दिवाळी गोवत्स द्वादशी पासूनही साजरी करतात. गुरुद्वादशी असंही म्हटलं जातं. खेड्यात गोधनाला खूप महत्त्व असल्याने पूर्वीपासून आताही गाय-वासराची किंवा त्याच्या फोटोची पूजा करतात. शिष्य गुरूंचे पूजन करायचे. मात्र आज ही प्रथा फारशी दिसत नाही.
धनत्रयोदशी दिवशी पूर्वी आणि आताही व्यापारी वह्या आणि तिजोर्यांची पूजा करतात. धन्वंतरी जयंती असल्याने वैद्य डॉक्टर त्याची पूजा करतात. पूर्वी आणि आताही. पूर्वीची आणखी एक प्रथा कणकेच्या तेलाचा दिवा घराबाहेर संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून लावला जायचा. आणि सर्वजण मिळून सूर्याला प्रार्थना करायचे मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामसह त्रयोदश्यां दीपदानात सूर्यज प्रियतां मम . आज क्वचित ठिकाणी हे दिसते. पूर्व परंपरेनुसार क्वचित ठिकाणी ब्रह्मास्त्राच्या प्रतिमेची , निर्जळी उपास करून, पुरणाचा नैवेद्य दाखवून पूजा करतात. ही प्रथा आज फारशी माहित नाही पाण्याचे हांडे घासूनपुसून तेही पूजले जायचे.आज गिझर आणि गॅस असल्याने हांडे कोठे दिसत नाहीत. नरक चतुर्दशी दिवशी चे अभ्यंगस्नान आजही आहे. पण पूर्वी इतका मसाज करणे होत नाही. पूर्वी तीळ, खसखस, वाटून ते उटणे अंगाला लावत. आज उटण्याची तयार पावडर मिळते. नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट फोडले जायचे. आज कारिट कोणाला माहित असेल असे वाटत नाही. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी विष्णू आणि कुबेर आणि घरातील दागदागिने यांची पूजा केली जायची.तसेच अलक्ष्मीचा नाश व्हावा म्हणून घरातला कचरा काढणारी केरसुणीची पूजा करून दमडी आणि सुपे वाजवून बाहेर टाकला जायचा. आजही काही ठिकाणी हे चित्र दिसते. काही घरात, घरातली स्त्री समाधानी, आनंदी रहावी , म्हणून गृहलक्ष्मी म्हणून तिची पूजा केली जाते. पूर्वीचे फटाके आणि आता चे फटाके यातही खूप फरक पडला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री जागवत असत. पगडी पट मांडला जायचा .खेळ रात्री उशिरापर्यंत चालायचा. करमणुकीचे दुसरे साधन नव्हते. आता नवीन पिढीला पगडी पट हा खेळ आणि ते नावही माहीत नसावे. पाडव्यादिवशी खेड्यात लव्हाळीची दिवटी करून त्याने गायी वासरांना ओवाळून त्यांचे आशीर्वाद घेतले जायचे . यादिवशी शेणाचा गोवर्धन पर्वत करून, त्यावर दुर्वा फुले खोचून , कृष्ण गाई वासरे यांची चित्रे त्यावर मांडून पूजा आणि मिरवणूक काढण्याची प्रथा होती ही प्रथा आज फारशी दिसत नाही. पत्नी पतीला ओवाळण्याची पद्धत पुर्वापार आहे.फक्त देणे-घेणे वाढले आहे. भाऊबीज, या दिवशी भावाने घरी न जेवता बहिणीकडे जेवावे, आणि तिने भावा प्रति प्रार्थना करून कुशल चिंतावे.”हातजोडी ते उगवत्या नारायणा, जतन कर देवा ,माझा बंधूजी राणा”. असे म्हणून ओवाळावे. ही प्रथा आज आहे . फक्त भेटवस्तू देण्यात फरक पडलाय.
दिवाळी हा सण नात्या नात्यांशी इतकंच काय पर्यावरणातल्या प्रत्येक गोष्टीशी भाव बंधनांनी आणि आत्मीयतेने जवळीक आणणारा असा हा सण !कालच्या दिवाळीतला आनंद, चैतन्य ,उत्साह, यात बदल होतच राहणार. काल आणि आज प्रमाणे उद्याच्या दिवाळीतही फरक पडणारच. लाईटच्या माळा, भडक सजावटी, मिठाया ही सगळी आनंदाची बाह्यरूप. खरी दिवाळी मनांकडून मनाकडे. एकमेकांबद्दल वाटणारा प्रेम जिव्हाळा आपलेपणा हीच खरी दिवाळी मनामनांची.
“सर्वांना दिवाळी भरभराटीची, समृद्धीची, शांतीची आणि आरोग्यदायी जावो”