? कवितेचा उत्सव ?

☆ कधी न केली.. ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : पादाकुलक)

कधी न केली अशी वल्गना

सूर्यकुलाशी माझे नाते

मात्र येथल्या तमात माझे

दीपक मिणमिण तेवत होते !

 

कभिन्नकाळी रात्र परंतू

उष:कालही उजळत होता

कुणास ठावुक कसा परंतू

सूर व्यथांशी जुळला होता !

 

म्हणून स्पंदन नि:श्वासांचे

निरंत माझ्या कवनी होते

भिजुन चिंब त्या व्यथावनातुन

शब्द शब्द हे ठिपकत होते !

 

मला न कळले माझ्या देशी

कसा कधी मी उपरा झालो

नकाशातले गाव हरपले

कवनांच्या मग रानी आलो !

 

शब्दसाधना, शब्दच सिद्धी

पंचप्राण जणु शब्द जाहले

आत्मरंजनी जराजरासे

विश्वरंजनी थोडे रमले !

 

ओंजळीत या समुद्रतेचा

चुकून यावा अंश जरासा

अक्षरांस या अक्षरतेचा

चुकून व्हावा दंश जरासा !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments