सूचना/Information ☆ सम्पादकीय निवेदन – श्री सचिन पाटील – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

श्री सचिन पाटील

💐 अ भि नं द न 💐

आपल्या समूहातील सिद्धहस्त लेखक श्री सचिन पाटील यांना, त्यांच्या ‘पाय आणि वाटा’ या ललितसंग्रहासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा अॅड. त्रिंबकराव शिरोळे स्मृती पुरस्कार घोषित केला गेला आहे. 

श्री. सचिन पाटील यांच्या नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या या ‘पाय आणि वाटा’ ललितसंग्रहास रसिक वाचकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी त्यांच्या या संग्रहास साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार पुणे, माणगंगा साहित्य परिषद, फलटण, मातृस्मृती साहित्य सन्मान पुरस्कार कामेरी, साहित्य प्रज्ञा मंच पुणे, कृतिशील शिक्षक महाराष्ट्र राज्य, इत्यादी मान्यवर साहित्य संस्थांचे पुरस्कारही लाभले आहेत.

लेखक श्री. सचिन पाटील यांचे आपल्या समूहातर्फे अतिशय मनःपूर्वक अभिनंदन, आणि यापुढेही त्यांच्याकडून अशीच दर्जेदार आणि समृद्ध साहित्य-निर्मिती सातत्याने होत राहो यासाठी त्यांना असंख्य हार्दिक शुभेच्छा. 

अनेक पुरस्कार प्राप्त झालेला त्यांचा ललित संग्रह ——

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 154 – देवा पांडुरंगा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 154 – देवा पांडुरंगा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

देवा पांडुरंगा।

पाहसी का अंत।

दाटलीसे खंत।

माझ्या मनी।।१।।

 

गेली दोन सालं।

लेकरे बंदिस्त।

घातली रे गस्त।

कोरोनाने।।२।।

 

आषाढीची वारी।

निघे पांडुरंगा।

येऊ कैसे सांगा।

पंढरीत।।३।।

 

बालकात दिसे।

विठू रखुमाई।

शिकण्याची घाई।

तया लागी।।४।।

 

खडू फळा जणू।

टाळ नि मृदुंग।

पुस्तकात दंग।

पांडुरंग।।४।।

 

वाचतो मी नेमे।

अक्षरांची गाथा।

ज्ञानार्जनी माथा।

ठेवी नित्य।।५।।

 

पुन्हा जोडलीया।

शिक्षणाची नाळ।

विठाईच बाळ।

भासे मज ।।६।।

 

देवा पांडुरंगा।

आम्ही वारकरी।

शिक्षण पंढरी।

ध्यास ऊरी।।७।।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मोबाईल ने चोरली माणुसकी… ☆ दत्तात्रय गणपतराव इंगळे ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ मोबाईल ने चोरली माणुसकी… ☆ श्री दत्तात्रय गणपतराव इंगळे ☆

उन्हाळ्याची सुट्टी आता

मोबाईल ने चोरली,

मामाच्या गावाला जायची

मजाच निघून गेली!

 

मोबाईल ने चोरले

मुलांचे खेळणे,

मैदान ही झाले

आता सुने सुने!

 

मोबाईल ने चोरली

गोष्टीची पुस्तके,

आज्जी आजोबाही

आता शांत शांत झाले!

 

मोबाईल ने चोरल्या

गप्पा घरातल्या,

बंद झाले विचार

गोष्टी आपसातल्या!

 

मोबाईल ने माणसाची

माणुसकी चोरली,

आणि माणुसकी आता

संपत चालली…

माणुसकी आता संपत चालली…

 

© दत्तात्रय गणपतराव इंगळे

(आलूरकर)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “तंत्रज्ञान दिनानिमित्त…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “तंत्रज्ञान दिनानिमित्त…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कुठलाही महत्त्वाचा प्रसंग आयोजित करतांना माणूस आजकाल एखाद्या महत्वाच्या,वैशिष्ट्यपूर्ण वा खास दिवसाचे औचित्य साधायचा प्रयत्न करतो.त्यायोगे तो खास दिवस अजूनच खास होऊन कायमचा चांगल्या आठवणींनी स्मरणात राहायला मदतच होते.

स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत जर टप्प्याटप्प्याने गेलेल्या काळाचा विचार केला तर आपल्याला आपल्या भारताची झालेली लक्षणीय प्रगती लक्षात येईल. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या अधिपत्याखाली भारताची वेगवेगळी प्रगती झालेली दिसून येईल.आपल्या होणाऱ्या प्रगतीमध्ये तसेच विकासामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा सिंहाचा वाटा आहे ह्यात कुठलीच शंका नाही. हे युगच यंत्रांच युग आहे.पण फक्त मनात मात्र एक भिती दडून बसलीयं की हे  प्रगत यंत्रयुग चालत्याबोलत्या माणसाला यंत्र तर बनवीत नाही नां ? अर्थातच ही भिती काही अगदीच अनाठायी नाही बरं का,ब-याच अनुभवाने जाणवलेली ही भिती आहे. तरीही नाण्याला दोन्ही बाजू असल्या तरी आधुनिक तंत्रज्ञानाने झालेल्या प्रगतीमुळे तंत्रज्ञानाबाबत उजव्या विचारसरणीचं पारडं नक्कीच जड आहे हे विसरून चालणार नाही.  11 मे  हा  “तंत्रज्ञान दिन “!

विज्ञानामुळे नवनवीन क्रांती उदयास येते  आणि हीच क्रांती आपली उत्तरोत्तर प्रगती घडवून आणते.हल्ली काळ खूप बदललायं. परंतु पूर्वीच्या काळी ह्या विज्ञानाच्या अद्भूत कामगिरीमुळे निर्माण झालेले चमत्कार आणि त्या चमत्कारांमुळे तयार झालेले अविष्कार जनमानसाकडुन पचविल्या जाणं ही खूपच अवघड गोष्ट होती.

विज्ञानाचे अविष्कार येतांनाच दोन रुप घेऊन येतं.त्याच्या योग्य वापरामुळे झालेली  प्रगती, विकास आणि उत्कर्ष हे एक रुप आणि त्याच्या अतिरेकी ,चुकीच्या वापरामुळं झालेली अधोगती,पिछेहाट हे दुसरं रुपं.

पूर्वी माणसं ही नोकीयाच्या जाहीराती प्रमाणे ” कनेक्ट दी पीपल ” ह्यावर विश्वास ठेवणारी होती. माणसाचं माणसावाचून अडायचं असा हा “अच्छे दिन” असलेला काळ होता. ह्या यंत्रयुगामुळे माणसाला माणसाची गरज नसल्याची परिस्थिती निर्माण होऊ घातलीयं आणि हीच खरी धोक्याची घंटा आहे.

पूर्वी एकमेकांची मदत घेणं ह्यात प्रेम,आपुलकी हक्क दडलेला होता आणि तोच एकमेकांतील दरी मिटवून त्यांना जोडण्याचं दुव्याचं काम करायचा. आता ह्या यंत्रयुगांने एकमेकांची मदत घेतांना एकप्रकारची “हिचकीच”आलीयं.मुळात मदत घेणं हे कमीपणाचं लक्षण हा अत्यंत चुकीचा विचार मनात ठसवतं पिढी उत्तरोत्तर पुढे जातेयं.साधं उदाहरणं पूर्वी एकमेकांना पत्ते विचारतांना,ते शोधतांना खूप मजा यायची. पत्ता विचारणारा, शोधणारा थोडा काळजीत विचारायचा आणि समजावून सांगणारा अगदी तो प्रश्न चुटकीसरशी सोडवूंन दिलासा द्यायचा. आता मुळात पत्ता शोधणेच जवळपास बंद झालयं कारण एकमेकांकडे जाणीयेणीच मुळात कमी झालीयं आणि अगदीच नाईलाजाने जावं लागलं तर कमीपणा न वाटू देणारं “जीपीएस”वरील कोरडी बाई तुम्हाला पोहोचवते इप्सित स्थळी.

आता अत्याधुनिक बँकींग चे बदलते रुपं बघतांना तर हा अनुभव पावलोपावली येतोयं. अर्थातच ह्या नवीन तंत्रज्ञानाने सगळं खूप सहज,सोप्प झालयं हे ही खरचं किंवा ही काळाची गरज म्हणू हवतरं.मध्ये एक आजोबा आणि नातू बँकेत आले होते. ते दोघेही त्या  आजोबांना घरबसल्या बँकींग करता यावे म्हणून अँप डाऊनलोडींगसाठी बँकेत आले होते. अर्थातच आजोबांची सोय बघणं हा निरपेक्ष प्रामाणिक उद्देश नातवाचा होता पण आजोबा ह्यातून काय मिळवतात आहेत हे बघण्याच्या नादात आजोबा खूप काही गमावतात आहे हे त्याच्या लक्षातच येत नव्हते. आजोबा गमावतं होते त्यांचा वेळ घालवणं, आजोबा गमावत होते संवाद साधणं,आजोबा गमावत होते तो पासबुकातील आकडे बघतं राहण्याचा,मनाशी हिशोब करण्याचा आनंद, ते गमावतं होते मित्रमंडळी,समवयस्क परिचीत लोकांना एकत्र भेटण्याचा,वैचारिक देवाणघेवाणीचा आनंद,ते गमावतं होते अतिशय काटकसरीतून जमा केलेल्या पुंजीतुन केलेले फिक्स डिपाँझीट परतपरत वाचण्याचा, हाताळण्याचा आनंद.हे त्या नातवाला कळतच नव्हते वा जाणवतही नव्हते. असो कालाय तस्मै नमः हेच खरे.दोघही योग्यच होते फरक फक्त पिढीचा होता.”कुछ पाने के लिये कुछ तो खोना पडता है”ह्यावर परत एकदा विश्वास बसला.

11 मे हा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ 11 मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी देशात तंत्रज्ञानची क्रांती झाली. हा दिवस इतिहासात 1998 ची ‘पोखरण अणु चाचणी’ आणि अंतराळातील भारतातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. हा दिवस भारताने पोखरण मध्ये केलेल्या पाच अणुबॉम्ब चाचणीचा पहिला टप्पा होता. तर याच दिवशी भारताने ऑपरेशन शक्ती या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली होती.अणूबॉम्बची चाचणी करून भारताने जगात आपला दबदबा वाढवला होता. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यामुळे कधी न संपणाऱ्या पाश्चात्य देशांच्या शक्तीला आणि वर्चस्वाला भारताने आव्हान दिले.11 मे 1998 रोजी सकाळी वाळवंटातील पोखरण मधील खेतोलाई गावाजवळ भारताने अणुचाचणी घेतली. व्हाइट हाऊस नावाच्या शाफ्टचा स्फोट झाला. 58 किलोग्राम टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित केले. हा अमेरिकेनेने जपानच्या हिरोशिमा येथे दुसर्‍या महायुद्धात टाकलेल्या लिटल बॉय या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता. भारताने हे काम केलेच कसे ह्या विचारानेच जगाला धक्का बसला. 

भारताने ही अणूचाचणी गुप्तपणे केली होती.  १९९५ मध्ये भारताच्या प्रयत्नांना अमेरिकन हेरांनी शोधून काढले आणि दबावाखाली भारताने त्याची चाचणी पुढे ढकलली. त्यानंतर भारताने कोणतीही कसर सोडली नाही. कलाम आणि त्यांची टीम यांनी अनेक वेळा चाचणी स्थळाला भेट दिली. लष्करी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले. परंतु कोणालाही याबद्दल माहिती मिळाली नाही आणि त्यानंतर यशस्वी अणुचाचणी झाली.

तंत्रज्ञानाचा विषय निघाला तेव्हा अजून लक्षात आलं अणुचाचण्यांशिवाय भारताने बंगळूरच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या हंसा 3 या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी केली. ह्या व्यतिरिक्त भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) जमिमीवर हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करुन आजच्या दिवसाचं महत्त्व आणखी वाढवलं. हे सैन्य आणि नौदल यांनी एकत्रित केले आणि भारत मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग बनला.

आजचा हा तंत्रज्ञान दिन आपल्यासाठी एखादा सोहळा,समारंभ ह्या  सारखाच महत्त्वाचा आहे हे नक्की. आजच्या ह्या तंत्रज्ञान दिनी ह्या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा आणि त्यांच्या योगदानाबद्दल मनापासून धन्यवाद.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘आरसा…’ – लेखक – सुश्री रेणुका दीक्षित ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

?जीवनरंग ?

☆ ‘आरसा…’ – लेखक – सुश्री रेणुका दीक्षित ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

“काय????” जोरात किंचाळत अमोघने सईला विचारले.. दचकून आजूबाजूच्या टेबलवरची लोकं पाहू लागली.

“आपण हॉटेल मध्ये आहोत… be calm अमोघ… चील मार…” सई कॉफीचा घोट चवी चवीने पीत म्हणाली.

अमोघ वैतागत म्हणाला, “तुझं हे चील ना मला कधी कधी शेखचिल्लीची आठवण करून देत राहतं… काय करशील तुझा नेम नाहीय.. काहीही वेड्यासारखा विचार करू नकोस.. आई तुला हे सगळं बोलली का?? मला आईशी बोलावं लागेल… नक्की प्रॉब्लेम काय आहे?? काय कमी आहे आत्ता तिला…?”

“हे बघ… मी तुला सांगते आहे… विचारत नाहीय… आईनाही यातलं काहीही माहिती नाहीये .. म्हणजे कल्पना आहे ..आणि हे मनात आले की पटकन मी करून मोकळी होते म्हणून आज तुझी बायको म्हणून बसलेय तुझ्यासमोर… नाहीतर तू दहा वेळा कबड्डी खेळाडूसारखं माझ्यापर्यंत येऊन मागे जात होतास.. रेषेला न शिवता… आठवतं ना…”

अमोघला आठवलं, इंजिनीअरिंगला असतानाच सई त्याला खूप आवडायची. पुढे जाऊन दोघांना नोकरी लागली. हळुवार प्रेम मनात उमलू लागले, पण ते सांगण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. आपल्या घरी आई एकटीच… आपला आणि सईचा तेव्हाचा आर्थिक स्तरही वेगळा…

एके दिवशी रविवारी ही सई सरळ घरी आली होती. आईने केलेले पोहे खाऊन चक्क तिनेच विषय काढला होता. तिला अमोघ आवडतो, तिच्याइतकी आत्ता आर्थिक परिस्थिती नसली तरी त्याच्या हुशारीवर असलेला तिचा विश्वास, त्यालाही ती आवडते असा दाट संशय… सगळे काही बोलून मोकळी…. आपण तर नुसते बघतच बसलेलो होतो. तिने उचललेलं हे पाऊल… पुढे लग्न… तिची साथ… मनासारखं घर… अवनी सारखी गोड मुलगी… आईचे कमी होत गेलेले कष्ट…. सईचं आईला आपलंसं करून घेणं… सगळं काही क्षणार्धात समोर येऊन गेलं….

तडकाफडकी मनात येईल ती बोलत आणि करत असली, तरी त्या मागे तिचे ठाम विचार.. त्या दिशेने कृती.. हे त्याला चांगलेच माहिती होते..

सवाष्ण नाही म्हणून आई लग्नात विधीला बसायला तयार नव्हती. या सईने आग्रह करून सूनमुख आईच आधी पाहणार असा हट्टच केला होता..

जसे आठवत होते तसे आई कधीच आरशासमोर उभी राहिलेली त्याला आठवली नाही. दोन मिनिटं छोट्या आरशात बघून बाजूला व्हायची.

तो तीन वर्षांचा असताना त्याची आजी आणि वडील दोघं एका अपघातात दगावले होते. आजूबाजूच्या लोकांमुळे किंवा काहीही, पण आईने स्वतःला साध्या साड्या, साध्या रुपात गुंतवून घेतलं होतं. किती गोष्टी तिने मागे टाकल्या होत्या याची त्याला आत्ता कल्पना येत होती, स्वतः चा संसार सुरू झाल्यावर.. तरीही ती जे काही बोलत होती ते अजिबातच त्याला मान्य नव्हते… आईचं लग्न….

तो बुरसटलेल्या विचारांचा नक्कीच नव्हता, तरीही हे जे काही चालवलं होत सईने, ते त्याला पचनी पडत नव्हतं… तो एकदम गप्प होऊन गेला होता….

त्याच्या मनातली घालमेल पाहून सईने हळूच त्याच्या हातावर हात ठेवला… “मला तुझ्या मनातली उलथापालथ अगदीच समजते आहे. मी खूप वेळ घेतलाय. काही गोष्टी माझ्या लेव्हलवर पास केल्या आहेत, आणि मग तुझ्याशी हे बोलते आहे… तुझ्या इतकंच… कदाचित तुझ्याहीपेक्षा जास्त मी आईंशी जोडले गेले… त्यांच्या शाळेच्या नोकरीत भागणार नाही हे ओळखून आजोबांनी त्यांची शिवणकलेची आवड व्यवसायात बदलण्यासाठी केलेले प्रयत्न, आईंचे कष्ट, सगळी कलात्मकता पणाला लावून नोकरी आणि व्यवसाय यावर तुला मोठं केलं त्यांनी. अवघा तीन वर्षांचा त्यांचा संसार… त्याच्या आठवणीत आजवर आयुष्य काढलं त्यांनी… आजोबांचंही शेवटच्या दिवसात किती केलं ते मी कॉलेजमध्ये असताना पाहिलं आहे. तुला सांगू… लग्नानंतर मी त्यांना बऱ्याच वेळा म्हणायचे, ‘तुम्हाला छान सिल्कच्या साडीत.. कानातले.. बांगड्या.. केसात मोगऱ्याचा गजरा.. असं पहायचं आहे. तुम्ही भान विसरून आरशात बघत बसल्या पाहिजेत…’  त्या हसून सोडून द्यायच्या..”

“ बरं…. ‘यासाठी लग्नाचा घाट’ असं तुला वाटतं असेल तर नीट ऐक…  त्यांनी इतकी वर्ष एकाकी काढली. आपण आहोतच रे सोबत… पण आपलेही काही ना काही उद्योग सुरूच असतात…

तुला सांगू… म्हणजे हे माझे विचार आहेत.. प्रत्येकाला अगदी कोणत्याही वयात हक्काची सोबत लागतेच की.. ‘मी आहे ना…’ असं सांगणारा एक आवाज… कधी आपले लाड करणारं… वय विसरून लहान करणारं हक्काचं माणूस.. संवाद साधायला… अगदी कधी मनात आलं, तर मी जशी तुझ्याशी भांडते तसं भांडायलाही कुणीतरी हवं… बरं वाटत नाहीये… हे सांगायला अर्ध्या रात्री शेजारी कुणी हवं….”

तिला थांबवत अमोघने विचारले, “मग आता काय तू आईचं नाव वधुवर सूचक केंद्रात घालते आहेस का काय… यातून पुढे काय होईल याचा विचार केला आहेस..? लोकं काय म्हणतील??”

सईने लगेच उत्तर दिले… “किती आले होते रे तुझे नातेवाईक तुम्हाला मदत करायला… आणि जे मी तुला सगळं सांगितलं तसाच एक छान मेसेज बनवून मी सगळ्यांना पाठवणार आहे. कुणाला काही प्रश्न असणार नाहीत त्यांच्या लग्नानंतर…  .हे बघ, अवनी एरवी रविवारी अभ्यास करते का? पण परीक्षा असली की आपोआप न सांगता अभ्यासाला बसते… ती मानसिकता रुजलेली असते. तशीच थोडी मानसिकता सगळ्यांमध्ये थोड्या प्रमाणात रुजवते… करते प्रयत्न…”

“आता इतका विचार केलाच आहेस तर लग्न कुणाशी आणि आई कुठे जाणार हेही सांगून टाक…”

“त्रागा करून घेऊ नकोस… काळजीही करू नकोस… गेले सहा महिने मी साठे काकांना पाहतेय… बाजूच्या बिल्डिंगमध्ये राहायला आले आहेत… परवा नाही का तू होतास तेव्हा मला होममेड कणकेची वडी घेऊन आले होते… ते.. बायको कॅन्सरने गेली… बारा वर्ष झाली.. मुलगी लग्न होऊन ऑस्ट्रेलियात असते… सोसायटीत असलेल्या प्रोग्रॅममुळे आमची घट्ट मैत्री.. उत्साही.. स्वतः ला सकारात्मक कामात गुंतवून घेतलेले काका .. मुलांना किल्ले बनवायला मदत कर.. कामवाल्या मावशींच्या मुलांना शिकव.. गृहिणींसाठी आर्थिक साक्षरतेची कार्यशाळा घे.. असे असले तरी ही क्वचित एक उदासी जाणवली त्यांच्या चेहऱ्यावर…

मी त्यांच्याशी, त्यांच्या लेकीशी बोलून.. त्यांची परवानगी घेऊन… त्यांचं मत विचारात घेऊनच तुझ्याशी बोलतेय… आईना मी नाही, पण काकांनी कल्पना दिली आहे या सगळ्याची… त्या हो म्हणत नाहीत, पण नाही ही म्हणाल्या नाहीत… तू काय म्हणशील हा विचार… लोकांची धास्ती आहेच… त्यांनी स्वतःला मिटवून घेतलं आहे… नवरा नाही.. या एका गोष्टीपायी या पिढीमधल्या सगळ्याच बायकांनी कदाचित असंच स्वतः ला बंद करून घेतलं आहे……

….. आणि इतकं सगळं जुळून येतंय म्हणूनच हे तुला सांगते आहे. आपण बोलू सगळ्यांशी… मार्ग काढू… आणि त्या आपल्या जवळच राहतील.. दोघंही… अवनीला एक छान आजोबा मिळतील.. माझा आग्रह नाही तू त्यांना वडील मानावं असा… पण एक उबदार सोबत तुला नक्की मिळेल ही खात्री करूनच मी पुढे जायचा विचार करते आहे..

मी तर म्हणेन आईना एक दोन वर्ष राहू दे पलीकडच्या बिल्डिंगमध्ये… कधी हौसेने त्यांचं माहेरपण झालं नाही, की सणवार… मला त्यांचं माहेरपण करायचं आहे… वर्षभर त्यांचे सगळे सण त्यांना नवीन साडी घेऊन मस्त साजरे करायचे आहेत मला … त्यांना मनापासून तयार होऊन आरशात पाहताना मला बघायचं आहे…..  अमोघ.. इतकं सोसून त्याबद्दल चकार शब्दही काढत नाहीत आई… खूप शिकले मी त्यांच्याकडून… कधी एका शब्दाने ‘मी इतकं केलं…’ never… मी मनापासून काही ठरवते आहे.. मला तुझी फक्त साथ हवीय.”

अमोघ गप्प होत म्हणाला.. “बाई गं.. येत्या वटपौर्णिमेला मी वडाला फेऱ्या मारतो …ही वेडी मुलगी मला सगळे जन्म बायको म्हणून दे….”

हळूहळू सगळ्यांशी संवाद साधत दोघांनी गोष्टी पुढे नेल्या… सुमतीबाईंना सईने स्वतःच्या हाताने तयार केले होते.. आजवर झुगारून दिलेला मोठा आरसा… हिरवा रंग त्यांना अंगभर भेटायला आला होता.. लाल काठाची हिरवीगार पैठणी… हातात हिरव्या बांगड्या.. हाताला मेंदी… गळ्यात मोजके दागिने… नाकात नथ… केसात सुंदर गजरा…

त्या भान हरपून आरशात पहातच राहिल्या… डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते… तशाच काही भावना चेहऱ्यावर दिसलेले सईचे प्रतिबिंब त्यांना त्यात दिसले… नेहमीसारखे चेहऱ्यावर खट्याळ हसू आणि डोळ्यात पाणी… “बघा आई… मी म्हणाले होते ना… एक दिवस तुम्ही स्वतःला विसरून आरशात बघत राहाल असे काही मी करेन…”

आरशात एक छबी कैद झाली होती…. एकमेकींच्या मिठीत विसावलेल्या त्या दोघींचे चेहरे …statue केल्यासारखे…

लेखिका : सुश्री रेणुका दिक्षित

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “श्रद्धा आणि विश्वास…” लेखक –अज्ञात☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “श्रध्दा आणि विश्वास…” लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज नैवेद्याला नुसती दूधसाखर ठेवलीये हो.. गोड मानून घ्या.. ” असं म्हणून आज्जींनी स्वामींच्या मूर्तीला भक्तिभावाने नमस्कार केला..आणि ‘आज बाहेर पडायलाच हवं. फळं, भाजी सगळंच आणायला झालंय. छान उघडीप पण आहे.’ असं स्वतःशीच म्हणत त्या बाहेर जायची तयारी करू लागल्या. “बाहेर जाऊन येते हो. उद्याला नैवेद्यासाठी फळं, पेढे घेऊन येते.  उद्या परत दुधसाखरच समोर ठेवली तर म्हणाल आजही दुधसाखरच का ? म्हणून..”असं स्वामींच्या मूर्तीकडे बघून म्हणत त्या स्वतःशीच हसल्या अन कुलूप लावून बाहेर पडल्या..त्यांना एकुलती एक मुलगी.. लग्न होऊन सासरी गेली.. यजमान त्या आधीच गेलेले…मुलीच्या लग्नानंतर त्यांनी रहाता भला मोठा बंगला विकून कोथरूडमध्ये छोटासा फ्लॅट घेतला आणि त्या स्वामींच्या सोबतीने राहू लागल्या.. माहेरी सगळेच स्वामींचे भक्त त्यामुळे नकळत्या वयापासून त्यांच्यावर श्रद्धा जडली ती आजपावेतो..एकटेपण आल्यावर मग स्वामींच्या मूर्तीशी बोलायची सवयच जडली… अगदी एखाद्या माणसाशी बोलावं तसं त्या स्वामींच्या मूर्तीशी बोलत. अगदी सगळं सगळं सांगत. एकट्या असल्या तरी व्यवस्थित स्वयंपाक करून बरोब्बर साडेबाराला मूर्तीसमोर नैवेद्याचं ताट ठेवत अन पंधरा मिनिटांनी, “स्वामी, बरं झालंय ना सगळं ? तिखट नाही ना लागलं काही ? ” असं त्यांना विचारून तेच ताट त्या स्वतः घेत असत..इच्छा एकच होती की शेवटी लोळत घोळत पडू नये..शांतपणे मरण यावं.. हल्ली त्या तसं स्वामींना वारंवार सांगत…दिवस, वर्षं सरत होती. आज अंथरुणावर अंग टाकायच्या आधी हात जोडून त्यांनी नेहमीप्रमाणे स्वामींचं स्मरण केलं.. आणि  ” स्वामी, आता आयुष्याच्या या सांजवेळी पुढच्या प्रवासाला निघून जावंसं वाटतं…जे योग्य असेल ते घडवून घ्या..” अशी प्रार्थना करून त्यांनी डोळे मिटले..मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या कपाळावर कुणीतरी हात ठेवल्याचा त्यांना भास झाला अन, ” बाळ, सगळं तुझ्या मनासारखं होईल, पण अजून वेळ आलेली नाही.”  हे वाक्य अगदी स्पष्टपणे ऐकू आलं.. त्या जाग्या होऊन अंथरुणावर उठून बसल्या.. काही दिवसांपासून चाललेली मनाची घालमेल संपली. अतीव समाधानानं अंतःकरण भरून आल्यासारखं झालं. त्यांनी स्वामींकडे पाहिलं. मंदशा दिव्याच्या उजेडात स्वामींची मूर्ती तेज:पुंज दिसत होती. खरं सांगू, यालाच म्हणतात श्रध्दा आणि विश्वास.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मला पद्मश्री  पुरस्कार  दिलाच पाहिजे… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ मला पद्मश्री  पुरस्कार  दिलाच पाहिजे… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

पत्रकार रजत सरदेसाई एका MD (आयुर्वेद) डॉक्टरांची मुलाखत घ्यायला चालले होते. बरोबर त्यांचा मित्र बंड्या काळे होताच. डॉक्टरांनी मुलाखतीचे शीर्षक “मला पद्मश्री पुरस्कार दिलाच पाहिजे” हेच राहणार असेल तरच मुलाखत देईन असं म्हटल्याने हे दोघं बुचकळ्यात पडले होते. बंड्याला तर ब्राझीलमधील चिकिन्हो स्कार्पा या अब्जाधीशाची आठवण आली. त्याने, मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, त्याच्या चार कोटी रुपयांच्या बेंटली गाडीचं शाही इतमामात दफन करायचं घोषित केलं होतं. 

 “तो स्कार्पा आणि हे डॉक्टर, दोघेही विक्षिप्तपणाबाबतीत एकाच माळेचे मणी दिसतायत,” असं म्हणत म्हणत, बंड्या आणि रजत, मुलाखत देणाऱ्या दादर, मुंबईच्या डॉ. सुयोग कुळकर्णी यांच्याकडे पोचले. 

 रजतने भेटल्याभेटल्या मुद्द्यालाच हात घातला, “सर, कटाक्षाने आयुर्वेदिकच प्रॅक्टिस करणारे म्हणून तुमचा छान नावलौकिक आहे. पण मुलाखतीचे शीर्षक हेच हवे हा तुमचा अट्टाहास का ? याबद्दल काही सांगाल का, प्लीज ?”

 “होय. पहिल्याप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल मला कोणतेही प्रमाणपत्र अथवा पुरस्कार नकोय. तो तर माझा पेशाच आहे, त्याबद्दल मी फी – पैसे आकारतो. त्यामुळे त्याबद्दल वेगळा पुरस्कार मागणं, हे मला तरी पटत नाही. कदाचित माझं बोलणं तुम्हाला extreme वाटेल. पण असं आहे बघा की, खेळाडू असो, वा चित्रपट अभिनेता, किंवा अगदी एखादा शास्त्रज्ञ – या सगळ्या जणांना त्यांच्या उपजीविकेच्या साधनांसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पद्म पुरस्कार दिले जात आहेत. पण मी जे काम करतो ते पूर्ण निस्वार्थीपणे, अगदी नव्या पैशाचाही फायदा न घेता. आणि शिवाय ते समाजाच्या प्रचंड उपयोगाचे आहे. म्हणूनच माझे ठाम प्रतिपादन आहे की ” मला पद्मश्री पुरस्कार दिलाच पाहिजे ! “ डॉक्टर शांतपणे पण आग्रहाने बोलत होते.

 “पण असं तुम्ही काय जगावेगळं करता ?” न राहवून शेवटी बंड्याने मध्ये नाक खुपसलंच. 

“मी प्लेटलेट डोनर आहे.”

 बंड्याच्या चेहऱ्यावर भलं थोरलं प्रश्नचिन्ह.

 “बंडूदादा, पांढऱ्या रक्तपेशी (white blood cells WBC), तांबड्या रक्तपेशी (red blood cells RBC) यांच्याप्रमाणे प्लेटलेट या आपल्या रक्तात असतात. WBC, RBC यांच्यापेक्षा आकारात खूपच लहान. एक मिलीलिटर रक्तात तब्बल अडीच लाखांहून जास्त प्लेटलेट्स असतात. जखम झाल्यावर आलेले रक्त थांबवणे हे यांचं प्रमुख काम,” रजतने थोडक्यात प्लेटलेट्सची कुंडली मांडली. 

 “हां, हां. ते त्या पलीकडच्या गल्लीतील राजूच्या वडिलांना डेंग्यू झाला होता, तेव्हा त्यांच्या या प्लेटलेट कमी झाल्या वगैरे ऐकलं होतं. अरे, पण रक्तदान ऐकलं होतं, ही प्लेटलेट डोनेशन काय भानगड आहे ?” बंडूतील शंकासूर काही शांत होईना.

 “ज्या पेशंटच्या रक्तातील प्लेटलेट संख्या कमी आहे, अशांची जर मोठी शस्त्रक्रिया होणार असेल, किंवा काही अपघात वगैरे झाला असेल तर त्यांना प्लेटलेट्स द्याव्या लागतात. ” – डॉक्टर साहेब. “आणि दुसरा मोठा गट म्हणजे कॅन्सर पेशंट्सचा. कॅन्सर उपचारातील केमोथेरपीचा एक वाईट साईड इफेक्ट म्हणजे याने प्लेटलेट्सची संख्या लक्षणीयरित्या कमी होते.”

 “सर, खरं सांगू का, मला एक कळलं नाही”, बंडू निरागसपणे आपलं घोडं पुढं दामटत होता, ” की समजा झाल्या रक्तातील प्लेटलेट्स कमी, तर एवढं काय आकाश कोसळणार आहे ? म्हणजे, तुम्ही म्हणता तसं ज्यांना अपघात झाला आहे, जखम झाली आहे, शस्त्रक्रिया झाली आहे अशांचं ठीक आहे एक वेळ, पण बाकी असा कुठे आपल्याला एवढा रक्तस्त्राव होतो की जो थांबवायला या अशा इतरांकडून घेतलेल्या प्लेटलेट्स घ्याव्या लागतील ?”

 बंड्याच्या अश्या या un-diplomatic बोलण्याने रजत चांगलाच कावराबावरा झाला, पण त्याला आश्र्वस्त करत डॉक्टरसाहेब सांगू लागले, ” सर्वसामान्यांना कल्पना नसते पण दैनंदिन जीवनात असंख्य वेळा आपल्या शरीरात सूक्ष्म रक्तस्त्राव होत असतात. जोरात शिंकलात, किंवा शौचाला जरा जास्त जोर केलात तरी रक्तस्त्राव होतो. ज्यांच्या प्लेटलेट्सची संख्या सुयोग्य आहे, अशांच्या शरीरात हा रक्तस्त्राव इतक्या बेमालूमरीत्या आणि इतक्या सहजी आणि इतक्या लगेच थांबवला जातो की ते आपल्याला कळतही नाही आणि त्यामुळे त्याचं महत्त्वही उमगत नाही. पण जर हे छोटे छोटे रक्तस्त्राव थांबले नाहीत तर त्याचं पर्यवसान internal haemorrhage (हॅमरेज) मध्ये होतं आणि पेशंटच्या जीवालाही धोका होऊ शकतो. आणि कर्करोगाच्या पेशंटसची रोगप्रतिकार क्षमता अशीही कमी झाली असते, त्यामुळे त्यांच्याबाबतीत अधिक काळजी घेणं गरजेचं असतं.”

 डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून बंडूला विषयाचं गांभीर्य लक्षात आलं. 

–क्रमशः भाग पहिला 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जपावं… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

जपावं… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

   पाय जपावा

   वळण्याआधी

   तोल जपावा

   ढळण्याआधी

   अन्न जपावे

   विटण्याआधी

   नाते जपावे

   तुटण्याआधी

   शब्द जपावा

   बोलण्याआधी

   अर्थ जपावा

   मांडण्याआधी

   रंग जपावे

   उडण्याआधी

   मन जपावे

   मोडण्याआधी

   वार जपावा

   जखमेआधी

   अश्रू जपावे

   हसण्याआधी

   श्वास जपावा

   पळण्याआधी

   वस्त्र जपावे

   मळण्याआधी

   द्रव्य जपावे

   सांडण्याआधी

   हात जपावे

   मागण्याआधी

   भेद जपावा

   खुलण्याआधी

   राग जपावा

   भांडणाआधी

   मित्र जपावा

   रुसण्याआधी

   मैत्री जपावी

   तुटण्याआधी!

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

    प्रस्तुती :श्री. कमलाकर नाईक

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “गणिती“ – अच्युत  गोडबोले आणि माधवी ठाकूर देसाई ☆ परिचय – सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆

सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

परिचय..

शिक्षण – MSc(Applied Electronics)

वय – 57 वर्षे

विशेष 

  • जवळ जवळ 25 वर्षे लेक्चररशिप केली (इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्पुटर सायन्स मध्ये)  आणि गेल्या पाच सहा वर्षांपासून स्वेच्छेने निवृत्ती पत्करली आहे.
  • सध्या माझे छंद जोपासतेय. लेखन, वाचन, अभिवाचन आणि पेंटिंग.
  • तरुण भारत, दिव्य मराठी, सकाळ वगैरे वृत्तपत्रातून  तसेच साप्ताहिक लोकप्रभातून ललित लेखन.
  • पुण्याच्या जनमंगल ह्या साप्ताहिकात 2022 मध्ये वर्षभर सदरलेखन केलेले.
  • कविता, अभिवाचन, नाटक ह्यात विशेष रुची.
  • पेंटिंग्जचे ची 2, 3 सोलो शोज आणि 3, 4 ग्रुप शोज झाले आहेत.

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “गणिती“ – अच्युत  गोडबोले आणि माधवी ठाकूर देसाई ☆ परिचय – सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆ 

पुस्तक -गणिती

लेखक द्वय  – अच्युत  गोडबोले आणि माधवी ठाकूर देसाई 

परिचय- मधुमती व्हराडपांडे 

मनोविकास  प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं आणि श्री. अच्युत गोडबोले व डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी संयुक्तपणे लिहिलेलं “गणिती” हे अतिशय माहितीपूर्ण आणि तितकेच रंजक असे पुस्तक! गणितावर प्रेम करणाऱ्यांसाठी तर ही एक मेजवानीच! गणितासारख्या अतिशय रुक्ष आणि क्लीष्ट समजल्या जाणाऱ्या विषयावर तब्बल 465 पानांचे पुस्तक लिहिणे आणि वाचकाला अगदी शेवटच्या पानापर्यंत त्यात गुंतवून ठेवणे ही किमया अच्युत गोडबोलेच करू शकतात ह्याची हे पुस्तक वाचतांना खरोखरच  प्रचिती येते!

तसं पाहिलं तर निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत गणित असतं. पण आपल्याला त्याची जाणीव नसते किंवा माहिती नसते. पशु, पक्षी, वनस्पती सगळ्यांच्या शरीररचनेत, ते बांधत असलेल्या घरांमध्ये, फर्निचर मध्ये, घरट्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचे गणित दडलेले असते. झाडांना येणारी पाने एक विशिष्ट क्रमाने येतात असे आढळून आले आहे.  मधमाश्यांची उत्पत्तीही एका ठराविक क्रमाने होते, बऱ्याच फुलांच्या पाकळ्यांतही  काही विशिष्ट क्रम दिसून येतो. ही  क्रमरचना फिबोनाची क्रमिकेशी (Fibonacci series) मिळतीजुळती असते. 1,1,2,3,5,8,13,21,…. ह्या क्रमवारीला फिबोनाची सिरीज म्हणतात. ह्यातली  प्रत्येक संख्या ( पहिले दोन वगळता) आधीच्या दोन संख्याची बेरीज असते. निसर्गातल्या अनेक गोष्टींमध्ये आपल्याला ही सिरीज आढळते.

तसेच सुवर्ण गुणोत्तर (Golden ratio) हा सुद्धा निसर्गात आढळणारा एक अफलातून प्रकार! तुम्ही पोस्ट कार्ड, ग्रिटिंगकार्ड, खिडक्या, दारांच्या चौकटी, फोटो, आरसे ह्यांचे आकार किंवा मनुष्य किंवा इतर प्राणी यांच्या शरीराचे आणि चेहऱ्याचे आकार  बारकाईने बघितले तर एका विशिष्ट गुणोत्तरात असतात. तोच हा Golden ratio! त्यामुळेच ते आकार डोळ्याला आल्हाददायक वाटतात  आणि म्हणूनच चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला ह्या सगळ्यांमध्ये हा रेशो वापरलेला असतो. ह्या गोल्डन रेशो चा शोध सर्वप्रथम पायथॅगोरस ची पत्नी थेओना हिने लावला आणि नंतर यूक्लीड ने सर्वप्रथम त्याची व्याख्या केली.

सामान्यतः आपणास आपल्या आजूबाजूला सगळीकडेच गणित आहे ह्याची कल्पनासुद्धा नसते. अर्थात त्याने बिघडत काहीच नाही पण जेव्हा ते कळतं तेव्हा गणितातलं हे सौंदर्य आपल्या मनाला भुरळ पाडतं. प्रस्तावनेतच दोन्ही लेखकांनी हे अधोरेखित केलंय की हे पुस्तक लिहिण्याचा त्यांचा उद्देशच मुळी लोकांना गणित किती सुंदर असू शकतं  हे समजावं, ती शोधणाऱ्या गणितज्ञांची आयुष्ये कशा विविध चित्रविचित्र अनुभवांनी, घटनांनी भरलेली आहेत हे कळावं हा होता. आणि त्यांचा तो उद्देश ह्या पुस्तकाने अगदी सफळ संपूर्ण केलाय! आपल्या आजूबाजूला असलेल्या कित्येक गोष्टींमध्ये दडलेल्या गणितातलं मुलतत्व सोप्या भाषेत वाचकांना समजावून सांगितले आहे.

पुस्तकात आर्यभट , ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, वराहमिहीर, रामानुजन, नीलकंठ यांच्यासारख्या भारतीय गणितज्ञांसोबतच पायथॅगोरस, युक्लीड, आर्किमिडीज, न्यूटन, गाऊस, रीमान, ऑयलर, पास्कल, फर्मा, नेपिअर ह्यांच्याविषयी, त्यांच्या अनमोल शोधांविषयी अतिशय रंजक माहिती दिलेली आहे. निसर्गातल्या प्रत्येक सजीव, निर्जीव वस्तूंचं अचूक वर्णन आपण गणितामुळेच करू शकतो. विश्वरचनेचं कोडं उलगडण्यासाठी आज ज्या भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञानातल्या  अतिप्रगत थिअरीज वापरल्या जाताहेत त्याचा पाया  हजारो वर्षांपूर्वी अनेक गणितज्ञांनी  शोधलेल्या गणितावरच आधारलेला आहे. मात्र त्यासाठी त्यांना समाजाविरुद्ध कसा लढा द्यावा लागला त्याचीही इत्यंभूत माहिती आपल्याला ह्या पुस्तकात मिळते. पुस्तकाच्या सुरवातीलाच विश्वनिर्मिती झाल्यानंतर अंकांचा शोध कसकसा लागत गेला, त्यानंतर निरनिराळ्या आकृत्या त्यांची गणितं, त्यांचा देवळं, पिरॅमिड, घरं बांधण्यासाठीचा उपयोग इ बद्दल सुंदर विवेचन केलंय. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर प्रचंड असे इजिप्शियन पिरॅमिड बांधताना त्या लोकांनी खगोलशात्र आणि गणिताची सांगड घातली होती. आजसुद्धा जगभरातल्या पर्यटकांचे ते एक आकर्षण स्थळ आहे.

आपल्याकडे इ. स. पूर्व 800 च्या सुमारास यज्ञवेदींच्या रचनेसंदर्भात काही विशिष्ट गणिती सूत्रांचा वापर केला जायचा. त्याला “शुल्वसूत्र” असं म्हटलं जायचं. त्या काळात गणिताचे सर्व ज्ञान मंत्रांच्या स्वरूपात होतं. Trigonometry चे अख्खे टेबल  आर्यभटाने फक्त एका श्लोकात मांडले होते! अशा अनेक गोष्टी वाचतांना आपण आश्चर्यचकित होत जातो.

आर्यभटानंतर भारतीय गणितात अत्यंत मोलाची कामगिरी करणारा गणितज्ञ म्हणजे ब्रह्मगुप्त. त्याने जगाला “शून्य” म्हणजेच काहीही नसणे किंवा अस्तित्वविरहितता ही संकल्पना देऊन सगळ्याच गणितात प्रचंड क्रांती केली. मानवी मनाची ही सर्वात प्रगल्भ कृती होती असे लेखक म्हणतो. संपूर्ण जगाच्या गणिताचा चेहरामोहराच ह्या आविष्काराने बदलून टाकला!

आर्यभट, वराहमिहीर, ब्रह्मगुप्त यानंतर महावीराचार्य, रंगाचार्य, भास्कराचार्य, नीळकंठ, माधवाचार्य यांनी भारतीय गणितात फार मोलाची कामगिरी करून ठेवली. भास्कराचार्यांचे “सिद्धान्तशिरोमणी” आणि “लीलावती” हे ग्रंथ त्यांच्या अमूल्य योगदानाची साक्ष देतात. काही लोकांचे म्हणणे आहे कि लीलावती भास्कराचार्यांचे पत्नीचे नाव होते. काहींच्या मते ते त्याच्या अतिशय लाडक्या मुलीचे नाव होते. लग्नानंतर लवकरच वैधव्य आल्यामुळे भास्कराचार्याने तिला माहेरी आणले आणि तिचा वेळ चांगला जावा म्हणून तिला गणित शिकवले. तसेच तिचेच नाव आपल्या ग्रंथाला दिले. आज सुद्धा गणित कसं शिकावं ह्याचा आदर्श म्हणून ह्या ग्रंथाकडे पाहिलं जातं. तसाच केरळ मधला विद्वान गणितज्ञ म्हणजे नीळकंठ. त्याचेही “तंत्रसंग्रह” हे पुस्तक खूप गाजले. सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहणाच्या निश्चित वेळा काढण्याचं काम सर्वप्रथम नीलकंठाने केलं.

गणित म्हणजे केवळ मोजणे किंवा आकडेमोड करणे ह्यापलीकडेही काहीतरी आहे हे जगाला दाखवून देण्याचं श्रेय ग्रीक विचारवंत थेल्स याला जातं. त्यानंतर गणिताच्या इतिहासात अजरामर झालेला ग्रीक गणितज्ञ म्हणजे पायथॅगोरस! पायथॅगोरस ची ओळख प्रत्येकाला सातवी आठवीतच झालेली असणार. त्यामुळे सगळ्यांच्याच परिचयाचा! म्हणूनच त्याच्याविषयी सांगितली जाणारी एक छोटीशी कथा पुढे देते आहे.

ग्रीस मधल्या एका लहानश्या गावात डेमॉक्रिटस नावाचा एक अतिशय विद्वान गृहस्थ राहायचा. त्याला एकदा एक तरतरीत मुलगा लाकडाची मोळी विकण्यासाठी नेतांना दिसला. अतिशय सुव्यवस्थित, नीटनेटक्या बांधलेल्या त्या मोळीने डेमॉक्रिटसचं लक्ष वेधून घेतले. त्याने त्या मुलाला “तुला मोळी कुणी बांधून दिली?” अशी पृच्छा केली असता तो मुलगा उत्तरला , “माझी मोळी मीच बांधतो, मला आईवडील नाहीत” “मोळी विकून काय करणार?” ह्या प्रश्नावर तो मुलगा उत्तरला की मोठेपणी त्याला डेमॉक्रिटस सारखे विद्वान व्हायचे आहे. ते ऐकताच डेमॉक्रिटस ला त्या मुलाबद्दल कुतूहल वाटले व त्याने त्याला मोळी सोडून पुन्हा पहिल्यासारखी बांधून दाखवायला सांगितले. त्या मुलाने तसे केले. त्याचे मोळी बांधण्यातले कौशल्य, सुसंगती, अचूकता अन नेटकेपणा बघून डेमॉक्रिटस खुश झाला अन त्याने त्या मुलाच्या पोटापाण्याची अन शिक्षणाची जबाबदारी घेतली. हाच तो सुप्रसिद्ध पायथॅगोरस!

अशा अनेक गणितज्ञांच्या आयुष्यातील आख्यायिका, कथा आपल्याला ह्या पुस्तकात भेटतात. अतिप्राचीन काळापासून वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये गणिताची सुरवात कशी झाली, त्याच्या वेगवेगळ्या शाखा कशा निर्माण झाल्यात त्याचा रोचक इतिहास आणि त्यांच्या सगळ्याच प्रवासाची एक सुंदर झलक आपल्याला ह्या पुस्तकातून दिसते .

खरं सांगायचं तर पुस्तकाचा आवाका इतका प्रचंड आहे की इतक्या थोडक्यात त्याबद्दल सांगता येणं खूपच कठीण आहे. एवढं बाकी नक्की की ज्यांचा गणित हा विषय आहे, ज्यांना गणितामध्ये रुची आहे त्यांच्यासाठी तर हे विस्तृत पुस्तक म्हणजे एक अनमोल खजिनाच आहे! मात्र असे असूनही ज्यांचा गणित विषय नाही त्यांच्यासाठी हे पुस्तक नाहीच असे बाकी मुळीच नाही. ते सुद्धा पुस्तकातला काही भाग वगळून ह्या पुस्तकाचा आनंद निश्चितच घेऊ शकतात. एकंदरीतच प्रत्येक वाचकाला गणिताच्या अतिशय अद्भुत आणि रंजक विश्वाची एक सुंदर सफर हे पुस्तक घडवून आणतं ह्यात शंकाच नाही !

© सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

अकोला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #184 ☆ मूर्खों के पांच लक्षण ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं  माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं।  साप्ताहिक स्तम्भ  “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी का  मानवीय जीवन पर आधारित एक अत्यंत विचारणीय आलेख मूर्खों के पांच लक्षण। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # 184 ☆

☆ मूर्खों के पांच लक्षण 

‘मूर्खों के पांच लक्षण हैं:–गर्व, अपशब्द, क्रोध, हठ  और दूसरों की बात का अनादर।’ वाट्सएप के इस संदेश ने मुझे इस विषय पर लिखने को विवश कर दिया, क्योंकि सत्य व यथार्थ सदैव मन के क़रीब होता है; भावनाओं को झकझोरता है और चिंतन-  मनन करने को विवश करता है। सामान्यत: यदि कोई अटपटी बात करता है; अपना पक्ष रखने के लिए व्यर्थ की दलीलें देता है; अपनी विद्वत्ता का बखान करता है; बात-बात पर अकारण क्रोधित  होता है तथा दूसरों की पगड़ी उछालने में पल-भर भी नहीं लगाता..उसे अक्सर मूर्ख की संज्ञा से अभिहित किया जाता है, क्योंकि वह दूसरों की बातों की ओर तनिक भी ध्यान अथवा तवज्जो नहीं देता…सदैव अपनी-अपनी हांकता है। वैसे नास्तिक व्यक्ति भी परमात्म-सत्ता में विश्वास नहीं रखता और वह स्वयं को सर्वज्ञ, सर्वज्ञानी व सर्वश्रेष्ठ समझता है। वास्तव में ऐसा प्राणी करुणा अथवा दया का पात्र होता है। आइए! विचार करें, मूर्खों के पांचों लक्षणों पर… परंतु जो इन दोषों से मुक्त हैं– ज्ञानी हैं, विद्वान हैं, श्रद्धेय हैं, उपास्य हैं।

गर्व, घमण्ड व अभिमान मानव के सर्वांगीण विकास में बाधक हैं और अहं मानव का सबसे बड़ा शत्रु है, जो भौतिक व आध्यात्मिक विकास में बाधक है। वास्तव में अहं गर्व-सूचक है … आत्म-प्रवंचना व आत्म-श्लाघा का, जो मानव की नस-नस में व्याप्त है, परंतु वह परमात्मा द्वारा प्रदत्त नहीं है। दूसरे शब्दों में आप उन सब गुणों-खूबियों का बखान करते हैं, जो आप में नहीं हैं और जिसके आप योग्य नहीं है। दूसरे शब्दों में इसे अतिशयोक्ति भी कहा जाता है। इसका दूसरा भयावह पक्ष यह है कि जो आपके पास है, उसके कारण आप अहंनिष्ठ होकर स्वयं को सर्वश्रेष्ठ समझ, दूसरों को नीचा दिखाते हैं; उनकी भावनाओं को रौंदते हुए, उन पर आधिपत्य स्थापित करना चाहते हैं– जो सर्वथा अनुचित है। अहंभाव मानव को सबसे अलग-थलग कर देता है, जिसके परिणाम-स्वरूप वह एकांत की त्रासदी झेलने को विवश होता है। सब उसे शत्रु-सम भासते हैं और जो भी उसे सही राह दिखाने की चेष्टा करता है; जीवन के सत्य व कटु यथार्थ से परिचित कराना चाहता है; उसकी कारस्तानियों से अवगत कराना चाहता है–वह उस पर ज़ुल्म ढाने से गुरेज़ नहीं करता। जब इस पर भी उसे संतोष नहीं होता, तो वह उसके प्राण लेकर सूक़ून पाता है। इसलिए  वह अपने अहंभाव के कारण आजीवन सत्मार्ग का अनुसरण नहीं कर पाता।

अपशब्द अर्थात् बुरे शब्द अहंनिष्ठता का परिणाम हैं, क्योंकि क्रोध व आवेश में वह मर्यादा को ताक़ पर रख व सीमाओं को लांघकर अपनी धुन में ऊल- ज़लूल बोलता है…सबको अप-शब्द कहता है, गाली -गलौच पर उतर आता है। वह भरी सभा में किसी पर भी झूठे आक्षेप-आरोप लगाने व वह नीचा दिखाने के लिए हिंसा पर उतारू हो जाता है। जैसा कि सर्वविदित है– बाणों के घाव तो कुछ समय पश्चात् भर जाते हैं, परंतु वाणी के घाव नासूर बन आजीवन रिसते रहते हैं। द्रौपदी का ‘अंधे की औलाद अंधी’ वाक्य महाभारत के युद्ध का कारण बना। ऐसे अनगिनत उदाहरणों से भरा पड़ा है इतिहास… सो! ‘पहले तोलो, फिर बोलो’ को सिद्धांत रूप में अपने जीवन में उतार लेना ही श्रेयस्कर है। आप किसी को अपशब्द बोलने से पूर्व स्वयं को उसके स्थान पर तराज़ू में रखकर तोलिए और यदि वह उस कसौटी पर ख़रा उतरता है–तो उचित है; वरना उन शब्दों का प्रयोग कदाचित् मत कीजिए, क्योंकि वे शब्द-बाण कभी भी आपके गले की फांस बन सकते है।

प्रश्न उठता है कि अपशब्द का मूल क्या है? किन परिस्थितियों व कारणों से वे जन्म लेते हैं; अस्तित्व में आते हैं। सो! इनका जनक है क्रोध और क्रोध चांडाल होता है, जो बड़ी से बड़ी आपदा का सब कुछ जानते हुए भी आह्वान करता है। वह सबको एक नज़र से देखता है; एक ही लाठी से हांकता है; सभी सीमाओं का अतिक्रमण करता है। मर्यादा शब्द तो उसके शब्दकोश के दायरे से बाहर रहता है।

परशुराम का क्रोध में अपनी माता की हत्या कर देना, तो सर्वविदित है। क्रोध के परिणाम सदैव भीषण व भयंकर होते हैं। सो! मानव को इसके चंगुल से बाहर रहने का सदैव प्रयास करना चाहिए।

हठ…हठ अथवा ज़िद का प्रणेता है क्रोध। बाल-हठ से तो आप सब अवगत होंगे। बच्चे किसी पल, कुछ भी करने व किसी वस्तु को पाने का हठ कर लेते हैं; जिसे पूरा करना असंभव होता है। परंतु उन्हें बात बदल कर,व अन्य वस्तु देकर बहलाया जा सकता है। सो! इससे किसी की भी हानि नहीं होती, क्योंकि बाल-मन तो कोमल होता है …राग-द्वेष से परे होता है। परंतु यदि कोई मूर्ख व्यक्ति हठ करता है, तो वह पूरे समाज को  विनाश के कग़ार पर पहुंचा देता है। उसे समझाने की सामर्थ्य किसी में भी नहीं होती, क्योंकि हठी व्यक्ति जो ठान लेता है, लाख प्रयास करने पर भी वह टस-से-मस नहीं होता। अंत में वह उस मुक़ाम पर पहुंच जाता है, जहां वह अपनी सल्तनत तक को अपने हाथों जला अथवा नष्ट कर तमाशा देखता है और उस स्थिति में स्वयं को हरदम नितांत अकेला अनुभव करता है, क्योंकि उसके सुंदर स्वप्न जल कर राख हो चुके होते हैं।

मूर्ख व्यक्ति दूसरों का अनादर करने में पल-भर भी नहीं लगाता, क्योंकि वह अहं व क्रोध के शिकंजे में इस क़दर जकड़ा होता है कि उससे मुक्ति पाना उस के वश में नहीं होता। वह सृष्टि-नियंता के अस्तित्व को नकार, स्वयं को बुद्धिमान व सर्वशक्तिमान

स्वीकारता है और उसके मन में यह प्रबल भावना घर कर जाती है कि उससे अधिक ज्ञानवान् इस संसार में कोई दूसरा हो ही नहीं सकता। सो! वह अपनी अहं-तुष्टि ही नहीं, अहं-पुष्टि हेतु क्रोध के आवेश में हठपूर्वक अपनी बात मनवाना चाहता है, जिसके लिए वह अमानवीय-कृत्यों तक का सहारा भी लेता है। ‘बॉस इज़ ऑलवेज़ राइट’ अर्थात् बॉस अथवा मालिक सदैव ठीक होता है तथा कोई ग़लत काम कर ही नहीं सकता अर्थात् ग़लत शब्द उसके शब्दकोश की सीमा से बाहर रहता है। वह निष्ठुर प्राणी कभी भी अनहोनी कर गुज़रता है, क्योंकि उसे अंजाम की परवाह नहीं होती ही नहीं।

यह थे मूर्खों के पांच लक्षण…वैसे तो इंसान ग़लतियों का पुतला है। परंतु यह वे संचारी भाव हैं, जो स्थायी भावों के साथ-साथ, समय-समय पर प्रकट होते हैं, परंतु शीघ्र ही इनका शमन हो जाता है। यह कटु सत्य है कि जो भी जीवन में इन्हें धारण कर लेता है अथवा अपना लेता है… उसे मूर्ख की संज्ञा से अभिहित किया जाता है। वह घर-परिवार के लोगों का जीना भी दूभर कर देता है तथा उन सबको अपना विरोधी स्वीकारते हुए, अपना पक्ष रखने का अवसर व अधिकार ही कहां प्रदान करता है? अपने पूर्वजों की धरोहर के रूप में रटे-रटाए चंद वाक्यों का प्रयोग; वह हिटलर की भांति किसी भी अवसर पर धड़ल्ले से करता है। हां! घर से बाहर वह प्रसन्न-चित्त रहता है; सदैव अपनी-अपनी हांकता है तथा किसी को बोलने अथवा अपना पक्ष रखने का अवसर ही प्रदान नहीं करता। परंतु चंद लम्हों में लोग उसकी फ़ितरत को समझ जाते हैं तथा उसके चारित्रिक गुणों से वाक़िफ़ हो जाते हैं। वे उससे निज़ात पा लेना चाहते हैं, ताकि कोई अप्रत्याशित हादसा घटित न हो जाए। वैसे परिवारजनों को सदैव यह आशंका बनी रहती है कि उस द्वारा बोला उच्चरित कोई वाक्य, कहीं उन सबके लिए बवाल व भविष्य में जी का जंजाल न बन जाए। वैसे ‘बुद्धिमान को इशारा काफी’ अर्थात् जो लोग उसके साथ रहने को विवश होते हैं, उनकी ज़िंदगी नरक-तुल्य बन जाती है। परंतु गले पड़ा ढोल बजाना उनकी विवशता होती है; जिसे सहर्ष स्वीकारना व अनुमोदन करना–उनकी नियति बन जाती है।

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares