फोनवर बोलणाऱ्यांचे किती प्रकार सांगता येतील. काहींना निरोप सांगितला, किंवा मिळाला, की फोन ठेवण्याची घाई असते. काही फक्त हं……. बरे……. ठिक आहे……. बघतो……. चालेल….. नक्की असे म्हणत फोन ठेवतात. आपल्याला अजूनही काही सांगायचे असते…… पण त्याने फोन ठेवल्याने आपण फक्त फोनकडे बघतो…. कारण फोन ठेवणारा आपल्या समोर नसतो. (मग आपण सवडीने त्याला बघतो.)
पण बायकांचे फोनचे तंत्र वेगळेच असते. ज्या कारणासाठी फोन केला आहे तो विषय सोडून इतर विषयांवर देखील थोडक्यात विस्तृत चर्चा करण्याचे कसब यांच्याकडे असते.
हे समजण्याचे कारण आज सकाळी झालेले फोन. विषय साधाच होता. केरला स्टोरी सिनेमा बघायला जायचे का? किती वाजता? सह जायचे की आपले आपण…..
पहिला फोन झाला….. जायचे की नाही या चर्चेत काय सुरू आहे?….. अशी सुरुवात झाली……स्वयंपाक……. पलीकडून उत्तर……. मग आज काय करते आहेस? यावर भाजी पोळी पासून आमरसापर्यंत सगळा स्वयंपाक फोनवर सांगून झाला…… आता त्यांच्याकडची भाजी आम्हाला नवीन होती…… झालं….. केरला स्टोरी थोडी बाजूला राहिली, आणि भाजीची स्टोरी (डायरेक्शन सह) अगोदर संपली…….
मग दुसरा फोन…… (पहिला फोन संपेपर्यंत माझा चहा गरम करून, पिऊन देखील संपला होता.) परत सुरुवात काय करतेस? केरला स्टोरी ला जायचे का?….. हो जाऊ……. पण आत्ता साडी खरेदी करायला जाणार आहे……. मग काय? कुठे? कोण? काय विशेष? यावर माहिती असणाऱ्या सगळ्या साड्यांच्या प्रकाराची आणि काय घ्यायचे यांची स्टोरी फोनवरच सुरू झाली……. (तो पर्यंत दुध वर येते आहे का ते बघणे, आणि कुकरच्या तीन शिट्या झाल्या की गॅस बंद करायची जबाबदारी माझ्यावर होती ती देखील संपली. कदाचित प्रेशर देखील उतरले असावे…….. यांच्या लांबलेल्या फोनमुळे कुकरने देखील रागारागातच शिट्या दिल्या असाव्यात असे वाटले.) पण फोन सुरुच……. केरला स्टोरी अगोदर साडी स्टोरी झाली…..
कपड्यांच्या बाबतीत मला यांचे कळत नाही……. (हे त्यांनी पदोपदी खरेतर पदरोपदरी मला ऐकवले आहे……) म्हणजे यांनी नवीन कपडे घेतल्यामुळे यांचे आधीचे कपडे जुने होतात. का कपडे जुने झाल्यामुळे हे नवीन कपडे घेतात. (आधी कोंबडी की आधी अंड इतकाच हा कठीण प्रश्न आहे.)
अजुनही फोन करायचे होतेच. मग तिसरा फोन…….. तो पर्यंत माझे मोबाईलवर कोणत्या ठिकाणी किती वाजता
शो आहेत याचा अभ्यास सुरू झाला होता. यांची परत फोन लाऊन विचारणा सुरू झाली. केरला स्टोरी…….. बास येवढेच म्हटले असेल…….. तो पर्यंत पलिकडून हो…. नक्की……. मी पण तेच विचारणार होते……… मागचा एक कार्यक्रम माझा मिस झाला…….. मग तो मिस झालेला कार्यक्रम कोणता होता……. तो कसा मिस झाला……. यावर त्यांची (मिसींग) स्टोरी….. आणि त्याच कार्यक्रमात किती मजा आली……. कोण कोण आले होते…….. यावर यांची स्टोरी…….. असा स्टोरी टेलींगचा कार्यक्रम सुरू झाला…… यांच्या स्टोरी संपेपर्यंत माझा जवळपास सगळा पेपर वाचून झाला होता…….
शेवटी एकदाचे किती जणांनी आणि कोणत्या शो ला जायचे हे ठरले आणि मी तिकिटे बुक करायला फोन हातात घेतला.
आता जेवणानंतर कोण कसे येणार…. आपण कोणाला कुठून बरोबर घ्यायचे की आपण कोणाबरोबर जायचे यासाठी परत फोन होतीलच. तेव्हा अजुनही काही वेगळ्या स्टोरी ऐकायला येतीलच……
☆ “गडद मरण-स्वर (अनुवादित – The Last Post!)” ☆ भावानुवाद – श्री संभाजी बबन गायके☆
गडद काळोखामुळे दोन्ही बाजूंनी लढाई थांबबावी लागली आहे. उद्याच्या पहिल्या किरणांसोबत पुन्हा मृत्यू नाचू लागेल रणांगणावर आणि घेईल घास कुणाचाही. मृत्यूला कुठे शत्रू आणि मित्र सैन्यातला फरक समजतो? कुणीही मेला तरी त्याच्याच मुखात जाणार म्हणून तो हसतमुखाने वावरत असतो….वाट बघत थंड पडत जाणा-या श्वासांची.
मित्रसैन्य अलीकडच्या आणि शत्रूसैन्य पलीकडच्या भागात लपून बसले आहे अंधाराच्या पडद्याआड. गोळ्या झाडायच्या तरी कुणावर? दिसले तर पाहिजे या काळोखात. म्हणून परस्पर बाजूंना थोडीशी जरी हालचाल झाल्याची जाणिव झाली की अंदाजे बार टाकायच्या त्या दिशेला. यावेळी मात्र दोन्ही बाजू शांत होत्या. एका सैन्य तुकडीचा नायक आपल्या खंदकात भिंतीला टेकून बसला आहे. रातकिडे युद्धभूमीतल्या दिवसभरातल्या घडामोडींची जणू चर्चा करताहेत. झाडावरचं एखादं वटवाघुळ मधूनच दचकून उठल्यासारखं उडून जातंय आणि पुन्हा त्याच जागी येऊन चिकटून जातंय एखाद्या फांदीला. त्यांना रात्रीच दिसतं म्हणे !
एवढ्यात सैन्य तुकडी-नायकाच्या तीक्ष्ण कानांनी रणभूमीवरचा कण्हण्याचा क्षीण आवाज टिपला. कुणी तरी सैनिक बिचारा शेवटच्या घटका लवकर उलटून जाव्यात, एकदाचं सुटून जावं परलोकीच्या अज्ञात मुलखात यासाठी देवाला साकडं घालतोय. आपण आता हे जग पुन्हा पाहू शकणार नाही, याची त्याला पूर्ण खात्री वाटते आहे. त्याच्या डोळ्यांसमोर त्याची आई, बहिण, भाऊ, मित्र उभे आहेत..आणि उभे आहेत बाबा ! त्यांचा निरोप घेऊन तो मागील वर्षीच पलीकडच्या राज्यात गेला होता संगीत शिकायला. आणि आता ही दोन्ही राज्ये एकमेकांच्या जीवावर उठली आहेत. बाबांना न कळवताच तो त्या राज्याच्या सैन्यात भरती झालाय…संगीत वाद्यांच्या जागी आता त्याच्या नाजूक हातांत जीवघेणी हत्यारं आहेत.
विव्हळण्याचा तो आवाज सैन्य-तुकडी नायकाला शांत बसू देईना. कोण जाणे…तो आपल्याकडचाच सैनिक असला तर? त्याचा जीव वाचवू शकतो आपण ! नायकाच्या डोक्यात विचार सुरू होता. वरिष्ठांना विचारायला वेळ नव्हता आणि तशी परवानगीही कुणी त्याला दिली नसती. खुल्या मैदानातल्या युद्धभूमीत जाणं मोठ्या जोखमीचं होतं. तरीही नायक सरपटत सरपट्त निघाला त्या वेदनेच्या आवाजाच्या रोखाने. हालचाल टिपली गेली दूरवरच्या अंधारातून आणि गोळीबार होऊ लागला. तशाही स्थितीत नायकाने त्या जवानाला खेचून आणलेच आपल्या खंदकात. पण मघाशी आर्त स्वराच्या साथीने सुरू असलेले त्याचे श्वास मात्र आता थांबले होते. नायकाने खंदकातील कंदील त्या जवानाच्या चेह-यावर प्रकाशाची तिरीप पडेल असा धरला आणि त्याचा श्वास थबकला….बेटा ! त्याने अस्फुट किंकाळी फोडली. मोठ्याने रडणं त्याला शोभलं नसतं. त्याने कंदीलाची वात आणखी मोठी केली. आपल्या लेकाच्या चेह-यावरचं रक्त आपल्या हातांनी पुसलं आणि त्याच्या कपाळाचं दीर्घ चुंबन घेतलं. माणसा-माणसांतील रक्तरंजित संघर्षाने एका मुलाला आपल्या बापापासून कायमचं दूर केलं होतं.
रात्रभर नायक आसवं ढाळत राहिला. शत्रूकडून अधून मधून होत असलेल्या गोळीबारास उत्तर देण्याचीही त्याने तसदी घेतली नाही. उलट तिकडूनच एखादी गोळी यावी आणि काळीज फाडून निघून जावी आरपार असं त्याला मनोमन वाटत होतं. तेवढीच भरपाई होईल एका जीवाची. आमच्या गोळ्यांनी हा संपला आणि त्यांच्या गोळ्यांनी मी संपून जावं…एवढा साधा हिशेब होता !
वरिष्ठांपर्यंत सकाळी बातमी गेलीच. सैन्य तुकडी-नायक आता फक्त एक बाप होता..अभागी ! त्याने विनंती केली…माझ्या लेकाला सैनिकी मानवंदना देऊन, बिगुलच्या, ड्रम्सच्या गजरात त्याला त्याच्या शेवटच्या प्रवासाला पाठवू द्यात…माझा लेक सैनिक होण्यासाठी नव्हता जन्माला आला. त्याला संगीतकार व्हायचं होतं ! व्यवस्थेकडून नकार आला…कारण कितीही केला तरी तो शत्रू सैनिक. फार तर एक सैनिक देऊ बिगुल वाजवू शकणारा..त्याच्या थडग्यावर ! अगतिक बापाने हे मान्य केलं. लेकाच्या कोटाच्या खिशात त्याला एक गाणं सापडलं..कागदावर लिहिलेलं…रक्ताने माखलेल्या. गाण्याच्या शब्दांसोबत गाण्याच्या वाद्य-सुरावटीही वळणदार आकारात कोरून ठेवल्या होत्या कागदावर आणि खाली सही होती दिमाखदार….संगीतकार…..कुमार…………!
बापानं त्याच्या त्या गतप्राण झालेल्या मुलाचं शव खड्ड्यात हळूहळू उतरवलं….जगातली सारी आसवं त्याच्याच डोळ्यांत अवतरली होती जणू…..त्या आसवांनी खड्ड्याच्या वरची माती भिजू लागली…त्यातलीच एक मूठ माती त्याने खड्ड्यात शांतपणे चिरनिद्रेत गेलेल्या त्या देहावर टाकली. बापाच्या कुशीत मूल झोपतं तसा त्याचा चेहरा दिसत होता.
बिगुल वाजवणा-या सैनिकासमोर बापानं ती सुरावट धरली….जीव ओतून..प्राण फुंकून वाजव…माझ्या मुलाचे शेवटचे स्वर ! त्यानेही आपल्या कर्तव्यात कसूर केली नाही…..छातीतली सर्व हवा त्याने बिगुलात फुंकण्यास प्रारंभ केला. युद्धभूमी डोळ्यांत प्राण आणून या मरणसोहळ्यातील स्वरांची उधळण पाहू लागली..कानात प्राण आणून शब्दांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करू लागली…..
सैनिका…दिवस कडेला गेलाय आता….सूर्य तळ्याच्या, डोंगरांच्या आणि आभाळाच्याही पल्याड गेलाय.
सगळं ठीक आहे आता…नीज शांतपणे…दमला असशील ! देव इथंच जवळपास आहे !
अंधार डोळ्यांना काही पाहू देत नाहीये….पण आकाशातला एक तारा लकाकू लागलाय !
दुरून कुठून तरी रात्र येऊ लागलीय चोरपावलांनी !
देवाचे आभार मानावेत आज दिवसभरातल्या श्वासांसाठी !
ह्या विशाल गगनाखाली, ह्या सूर्याखाली, या ता-यांखाली
आपण आहोत आणि आपल्यावर त्याची दृष्टी आहे….
नीज बेटा ! देव इथंच जवळपासच आहे ! ……
….. बिगुल वाजवणारा सैनिक प्राणपणानं ही सुरावट वाजवून आता थकलाय…त्याच्या बिगुलातून निघणारे सूर आता मंद मंद होत जाताहेत ! ते संपताच बाप त्याच्याकडे वळून म्हणाला….आता ही लास्ट पोस्ट सुरावट थांबव…. शिबिरातल्या सैनिकांना झोपेतून उठवणारी सुरावट..रिवाली वाजव…मित्रा ! हा माझा फौजी पोरगा आता उठेल…अंगावर सैनिकी वर्दी चढवेल आणि निघेल युद्धभूमीवर…वन्स अ सोल्जर…always अ सोल्जर !
(सैनिकांना अंतिम विदाई देताना बिगुलवर दी लास्ट पोस्ट सुरावट वाजवली जाते. त्या सुरावटीचा इतिहास अभ्यासताना ही एक काहीशी दंतकथा वाटणारी किंवा असणारी हृदयद्रावक कथा हाती लागली. ती आपल्यासाठी मराठीत लिहिली…माझ्या पद्धतीने आणि आकलनाच्या आवाक्याने.)
(जरा जास्तच झालं ना लिहिताना? पण इलाज नाही. इतर कुणाला हे सांगावंसं वाटलं तर जरूर सांगा. नावासह कॉपीपेस्ट्, शेअर करण्यासाठी परवानगीची गरज नाही. शक्य झाल्यास या जळीताचा व्हिडीओ बघून घ्या इंटरनेटवर… धग जाणवेल !)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सोप्प नसतं हो, भगवंताचं होणं. प्रचंड निरागसता लागते, स्वच्छ मन लागतं. तुम्ही कधी भगवंताला मिठीत घेतलय का? नाही ना…. कधी सहज म्हणून कुणाला निरपेक्ष मदत केली आहे का? करून बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. अतीव दुःखात कुणाला आधार दिलाय का? देऊन बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणाच्या उत्कर्षाचं कारण व्हा, कुणाच्या यशात भक्कम साथ द्या, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणी कुणाचं नसतं हो.. तरीही कुणाचं तरी व्हायला काय हरकत आहे? आई नसलेल्याची आई व्हा, कुणाची ताई व्हा, तर कुणाचा भाऊ.. मग बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. कुणाच्या चेह-यावरचं हास्य बना, कुणाचे अश्रूंनी तुडुंब भरलेले डोळे पुसा, मग बघा.. भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. वार्धक्याने थकलेल्या पायांना तुमच्या हातांची ऊब द्या, थरथर कापणारे हात समाधानाने आशिर्वाद देतील.. मग भगवंताने स्वतःहून मिठी मारल्यासारखं वाटेल. आज प्रत्येक जण पैसे कमवायच्या मागे लागलाय. स्वतःचं स्टेटस वाढवायचय् प्रत्येकाला.. कुणाच्यातरी आयुष्यात आपल्या वाटणीचा ओंजळभर आनंद देऊन तर बघा.. खात्रीने सांगतो त्यांच्या मनातलं तुमचं स्टेटस खूप उंचावर असेल, अन् त्याच वेळेस भगवंताच्या मिठीची चाहूल लागेल. व्याकुळ नजरेने पाहत असलेल्या मुक्या जनावरांना पाणी द्या, अन्न द्या, ते आमरस नाही हो मागत.. तुम्ही दिलेल्या शिळ्या पोळीतच ते खूष असतात.. कधी स्वतः जवळची ताजी पोळी देऊन तर बघा, भगवंत स्वतःहून मिठीत घेईल. आपल्याकडे आपलं असं काय आहे? भगवंतानीच दिलेल्याचा आपण तोरा मिरवतो. मग त्यानी दिलेलं कघी कुणाला मनापासून द्या.. मग बघा … भगवंत मिठी मारल्याशिवाय राहणार नाही.
कवयित्री- अज्ञात
प्रस्तुती : सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “राष्ट्रीय कर्क रोग संस्था, नागपूर”… लेखक – श्री सूरज पाल☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
नमस्कार ! दिनांक ८/ ०५/२०२३ ला राष्ट्रीय कर्करोग संस्था, नागपूर येथे गेलो होतो.
एखाद्या पंचतारांकित हॉटेलात जातोय की काय असाच भास आला !
दवाखान्याची इतकी भव्यता, अत्याधुनिक यंत्रणा आणि सुंदरता बघून खूप अभिमानस्पद वाटलं , की माझ्या देशात सुद्धा अश्याप्रकारचे दवाखाने तयार होत आहेत.
आम्हा सगळ्यांना खूप सुरक्षित आणि आरामदायक वाटले ! रुग्णालय अतिशय स्वच्छ आणि व्यवस्थित आहे! संपूर्ण कर्मचारी अतिशय ज्ञानी आणि मैत्रीपूर्ण आहेत ! खोली अतिशय स्वच्छ आणि आरामदायक आहे! दिलेले अन्न अतिशय पौष्टिक आणि चविष्ट होते ! एकूणच, मला खूप सकारात्मक अनुभव आला !
कर्करोग या संकटाशी लढण्यासाठी इथे ‘कर्कयोद्धा’ ची फौज तयार करत आहेत. दवाखान्याच्या मिशनमधील प्रत्येक भागधारक, मग तो रुग्ण, काळजीवाहू, नातेवाईक किंवा इथले सेवा सहयोगी– हा सुद्धा कर्कयोद्धा आहे.
कार्यक्षमता, टिकाऊपणा, ऊर्जा कार्यक्षमता, सुरक्षा आणि सौंदर्यशास्त्र या मूल्यांवर राष्ट्रीय कर्करोग संस्थेची योजना आखली आहे.—- कर्क योद्धा, परिवार शक्ती, कर्क सेवक, आंतरिक संगत, सबकी लडाई ह्या तत्वांवर चालणारी ही संस्था आहे.
आज तुम्हा सगळ्यांना ऊर्जा कार्यक्षमता या तत्त्वावर कश्या प्रकारे ही संस्था आधारित आहे? हे सांगण्याचा प्रयत्न करतो – हा प्रकल्प पूर्णपणे सौर उर्जेवर आहे. सौर ऊर्जेच्या प्लेट्स च्या खालच्या सावलीचा उपयोग काय करायचं?, तर तिथे गाड्या पार्क करण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तसेच त्या भागात फुलबाग सुद्धा फुलविली आहे. अश्या प्रकारे आम्ही ऊर्जा सुद्धा तयार करू – जागेचा पुनर्वापर करू – फुलबाग सुद्धा फुलवू, हेच तत्व अश्या प्रकारच्या कृतीतून दाखवून आपल्या सगळ्यांसमोर उत्तम उदाहरण ठेवलेलं आहे.
लेखक : श्री सूरज पाल
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ भारताच्या आयटी उद्योगाचा ध्रुवतारा “नारायण मूर्ती” – लेखक – अतुल कहाते ☆ परिचय – सुश्री प्रिया कोल्हापुरे ☆
पुस्तकाचे नाव – भारताच्या आयटी उद्योगाचा ध्रुवतारा “नारायण मूर्ती”
लेखक – अतुल कहाते
प्रकाशक – मनोविकास प्रकाशन
पृष्ठ संख्या – ५०
पहिल्या भागात पॅरिस शहरातील आपले काम संपवून मैसूरला परतण्याआधी साम्यवादी देशांचा फेरफटका मारण्याच्या हेतूने ‘निस’ गावात पोहोचलेल्या तरुणास हादरवून सोडणारा अनुभव सांगितला आहे. रेल्वेच्या डब्यात स्थानिक तरुणीने सहज तिथल सरकारी वातावरण किती कडक आहे यावर काही संभाषण केलं. त्यावरून त्या दोघांनी बल्गेरियाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या सरकार विषयी टीकात्मक चर्चा केली या आरोपावरून त्या युवकाला व तरुणीला पोलिसांनी अटक केली. 72 तास अन्न पाण्याविना त्या युवकाचे झालेले हाल, तिथून त्याची झालेली सुटका, व त्याची विचारसरणीच पालटवून टाकणारा हा अनुभव यात वर्णन केला आहे.
हा युवक म्हणजे इन्फोसिस कंपनीचे सर्वेसर्वा नागवार रामाराव नारायण मूर्ती.
मूर्ती यांचा जन्म म्हैसूर मधल्या ब्राह्मण कुटुंबातला. वडील शिक्षक,आई पाचवी शिक्षण झालेली,ही पाच मुली आणि तीन मुलं अशी भावंड,समाधानी कुटुंब. मुलांनी शिकावं अशी इच्छा असणारे आई-वडील. वडिलांना पुस्तक वाचन व शास्त्रीय संगीताची आवड तीच आवड मूर्तीनाही जडली.कमी पगार असल्यामुळे काटकसरीने, जबाबदारीने, विना तक्रार जगण्याचे कौशल्य आईकडून त्यांनी लहानपणी अंगीकृत केले. मूर्ती शाळेत हुशार होते.विज्ञान, गणित त्यांचे आवडते विषय.
घरच्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे त्यांनी महाविद्यालयाची निवड करताना केलेली तडजोड, महाविद्यालयात त्यांना मिळालेले यश, शिक्षणाबाबतची त्यांची वाटचाल इथे सांगितले आहे. वडिलांनी मूर्तींच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च करण्यास आपण सक्षम नसल्याचे सांगूनही त्यांच्या वरती राग न धरता स्वतःच्या जिद्दीने शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची वाटचाल प्रेरणादायी आहे.
उच्च पदवीचे शिक्षण घेऊनही नोकरी न करता कृष्णय्या या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनानुसार संगणक शास्त्राचा अभ्यास करण्याचे मूर्तीनी ठरवले. त्याबद्दलचे शोध निबंध वाचन त्यांनी सुरू केले संगणक शास्त्राचे ज्ञान संपादन करण्यासाठी केलेली वाटचाल इथे सांगितली आहे. त्यांची कम्युनिस्ट विचारसरणी विषयीची आपुलकी ही इथं नमूद केली आहे.मूर्तींचे संगणक शास्त्राचे ज्ञान बघून’सेसा’ या फ्रेंच कंपनीने त्यांना सॉफ्टवेअर लिहिण्यासाठी पॅरिसला बोलवले.
पॅरिसमधील त्यांचे अनुभव, उद्योजकांबद्दल त्यांचा बदललेला दृष्टिकोण येथे सांगण्यात आला आहे. डाव्या विचारसरणीचे वारे डोक्यात असल्यामुळे मिळालेले पैसे गरजे पुरते ठेवून बाकीचे ते दान करत. तिथलं काम पूर्ण करून ते भारतात परतले. इथलं वातावरण त्यावेळी खूप तणावपूर्ण होतं. इथं आल्यावर मूर्तींनी एम.आर.आय नावाची कंपनी सुरू केली ज्यात त्यांना अपयश आलं.
या भागात सुधा मूर्ती यांची कौटुंबिक-शैक्षणिक माहिती, शैक्षणिक प्रवास, त्यांची जिद्द याची सविस्तर माहिती दिली आहे. मूर्तींची सुधा यांच्याशी झालेली भेट त्यातून त्यांचा प्रेममय प्रवास, सुधा यांच्या वडिलांचा विरोध, त्यांचा विवाह या भागात सविस्तर सांगितला आहे.
पुढील भागात नरेंद्र पटणी यांनी स्वतःच्या कर्तुत्वावर संगणकाच्या टेप्स आणि डिस्कमध्ये डेटा एन्ट्री करण्याचा उद्योग सुरू केला. त्याचे सविस्तर वर्णन येथे आहे. तिथेच मूर्ती कामाला लागले. तिथला त्यांचा प्रवास, सहकाऱ्यांची माहिती, त्यांच्या कामाचा आढावा इथे सांगितला आहे. इन्फोसिसच्या निर्मितीची पाळमुळं ही इथेच रोवली गेली. सुधा यांचा त्यासाठीचा दृष्टिकोन आणि सहकार्य देखील आपल्याला समजते.
पुढे इन्फोसिसच्या जन्माची माहिती, ती निर्माण करण्यामागचा हेतू, त्यासाठी केलेली धडपड, अनेक तडजोडी, कंपनीतले कामाचे आराखडे, सहकाऱ्यांची आणि मूर्तींची विचारसरणी, पटणी यांची नाराजी, इन्फोसिसच्या यशाचा प्रवास इथे वाचायला मिळतो.
कंपनीला भांडवल मिळवण्यासाठी बँकेकडून कर्ज न घेता शेअर बाजारातून पैसे उभा करण्याचा निर्णय इथे सांगितला आहे. त्याची सविस्तर माहिती इथे वाचायला मिळते.
पुढील भागात भारतामध्ये संगणक क्षेत्रासाठी बदललेलं चित्र, भारतात आयटी क्षेत्रात झालेला बदल, शैक्षणिक- औद्योगिक प्रगती इथे वाचायला मिळते.कंपन्यांच्या नफ्या-तोट्याचा,कर्मचाऱ्यांची काही माहिती इथे वाचायला मिळते.
सुधा मूर्ती यांचं मूर्तींच्या आयुष्यातले योगदान इथे सांगितलं आहे. त्यांनी कुटुंबाची उचललेली जबाबदारी,केलेल्या तडजोडीत,वाद न होऊ देता काढलेला मार्ग खूपच विचार करायला लावतो. इन्फोसिस फाऊंडेशनची धुरा त्यांनी कशी सांभाळली हेही यात समजतं.
इन्फोसिस मधून निवृत्त होऊन मूर्तींनी घरच्या वडीलधाऱ्याने वागाव तसं त्यांचं इन्फोसिसशी नातं ठेवलं पण त्यानंतर इन्फोसिस मध्ये झालेले चढ-उतार, इन्फोसिस वर-मूर्तींवर झालेल्या टीका इथे वाचायला मिळतात.
नुकसानीकडे चालणाऱ्या इन्फोसिसला तारण्यासाठी मूर्तींनी पुनरागमन करायचं ठरवलं. त्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय,इन्फोसिस मधलं वातावरण,त्यांचं झालेलं कौतुक, काही टीका इथे सांगितल्या आहेत.
साधेपणातही सुंदर,समाधानी आयुष्य जगता येतं स्वतःच्या प्रगती सोबत इतरांचीही प्रगती व्हावी हा उदात्त हेतू असणाऱ्या या मूर्तींबद्दल वाचताना अभिमान वाटतो. हे एक प्रेरणादायी पुस्तक आहे.
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆.आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – आँखों ने ओढ़ी बेशर्मी…।)
साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 05 – आँखों ने ओढ़ी बेशर्मी… ☆ आचार्य भगवत दुबे