श्री आशिष मुळे
कवितेचा उत्सव
☆ “त्या” ☆ श्री आशिष मुळे ☆
किती आल्या अन किती गेल्या
काही घुटमळल्या, काही थांबल्या
काही बोलल्या, काही बुजल्या
काही हसल्या अन काही रडल्या ।
थांबणाऱ्या नंतर आबोल झाल्या
जाणाऱ्या न बोलता बोलून गेल्या
हसणाऱ्या हसत हसत रडवून गेल्या
रडणाऱ्या नंतर हास्यास्पद झाल्या ।
काही मात्र जिवाभावाच्या झाल्या
जणू माझेच प्रतिबिंब झाल्या
काही हवा करून गेल्या
काही हवेत विरून गेल्या ।
पण….
सगळ्याच काहीतरी शिकवून गेल्या
प्रगतीत माझ्या हातभार झाल्या
आयुष्याच्या रखरखीत उन्हात
माझ्या ‘कविता‘ माझी सावली झाल्या ।
© श्री आशिष मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈