सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

स्पेस — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आय.टी. क्षेत्रात काम करणारे सुशांत प्रज्ञा आपापल्या कंपनीत अतिशय चांगले काम करत होते. लग्न करून शहरात नोकरी निमित्ताने स्थिर होऊ पहात होते.

दोघांचाही पगार लाखांच्या पलिकडचा त्यामुळे सगळ्या ऍम्यूनिटिज असलेल्या महागड्या टाऊनशिपमधे त्यांचे सर्व सोयींनी युक्त असे टू बीएचके चे घर. 

सकाळी उठून दोघेही आपापल्या कारनी ऑफिसला जायचे. संध्याकाळी यायची वेळ निश्चित नाही पण यायचे आणि तरी समोर लॅपटॉप उघडून बसायचे आणि मोबाइलवर सतत कॉल्स. 

एकमेकांशी बोलायला वेळ नाही आणि धडपणे जेवायला जमत नाही. अशी गत•••. स्वयंपाक करायचा कोणी? बाईने केला तरी तो थंड स्वयंपाक खायचा कोणी? नकोच असले काही म्हणून दोघांनीही रोज आपल्या आवडीचे जेवण बाहेरून मागवायचे, जमलेच तर एकत्र जेवायचे नाहीतर ज्याला जसे जमेल तसे त्याने खाऊन घ्यायचे. 

एकमेकांबरोबर कुठे जाणे सोडाच, पण एकमेकांशी धडपणे बोलताही येत नव्हते त्यांना. पाच दिवस काम दोन दिवस सुट्टी, असे असले तरी सुट्टीच्या दिवशीही एकतर बरेच उशीरा उठायचे आणि मग ५ दिवसांचे कामाचे प्लॅनिंग, काही क्लायंटसच्या शंका कुशंका सोडवणे आणि इतर काही गोष्टींमुळे दोघे आपल्यातच व्यग्र.

कामापुरते जुजबी गोष्टीच ते एकमेकांशी बोलायचे. घर आणि रहाणीमान पाहून सगळ्यांना वाटायचे ‘ वा काय मस्त संसार चालला आहे राजा राणीचा ••’ त्यांच्या आपसातील प्रेमाचा(?) हेवाच वाटायचा प्रत्येकाला.

१-२ महिन्यांनी गावाकडून बोलावणे यायचे. मग दोघांनी आनंदाने प्रेमाने जावे की नाही? पण नाहीच, त्यावरूनही कधी सुशांत तर कधी प्रज्ञा चिडायची. अरे आपल्याला आपली काही स्पेस हवी की नाही? एरवी नोकरी, क्लायंटस आणि सुट्टीच्या दिवशी काय तर म्हणे आई-बाबा आजी यांना भेटायला जाऊन दमायचे. कधी मिळणार आपल्याला आपल्यासाठी स्पेस?

झाऽऽऽले या दोघांमधे कोणी नको म्हणून गावाकडच्यांनी यांना शहरात रहायला परवानगी दिली, अभिमानाने कौतुकाने यांच्याबद्दल गावातल्या सगळ्यांना सांगत होते. मग हे दोघेच एकत्र रहात होते तरी त्या दोघांनाही मनाप्रमाणे एकमेकांना वेळ देता येत नव्हता, तसेच स्वत:साठीही वेळ देता येत नव्हता, तेवढी स्पेस त्या दोघांना मिळत नव्हती ही फॅक्ट होती•••

एका विकेंडला असेच गावाकडे जाण्यावरून दोघांचेही बिनसले. प्रज्ञा म्हणाली, “ यावेळी मी नाही येत, तूच एकटा जा.”  तर सुशांत म्हणाला, “ तुझ्या आई बाबांकडे मी येतो ना? मग माझ्या आई बाबांकडे जाताना तुला का प्रॉब्लेम येतो?”  ती म्हणाली, “ मी पण येतेच की, पण आज मला शांतता हवी आहे. मला माझी स्पेस हवी आहे. थोडी विश्रांती हवी आहे. तर तू मला माझी स्पेस देणारच नाहियेस का? ”

असे बोलून ती एका बेडरूममधे जाऊन दार लावून बसली. तिने घट्ट डोळे मिटून घेतले. डोके ओढणीने बांधून घेतले. पडदे ओढून अंधार करून ती पलंगावर पडली. हळूहळू तिला थोडे शांत वाटायला लागले, आणि तिला तिची आई आजी दिसू लागले•••

आई बाबा काका काकू आजी, आम्ही दोघे भावंडे आणि चुलत दोन भावंडे, असे ९ जण एका कुटुंबात रहात होतो. आई घरातील मोठी सून म्हणून सगळी जबाबदारी तिच्याकडे होती. पण सगळ्यांच्या आवडी निवडी, आजीचे मत, सगळे सांभाळून ती आनंदाने रहात होती. वडिलांच्या कामात हातभार लावून मधेअधे सिनेमा नाटके फिरायला जाणे हे सगळे ती करू शकत होती. 

मग प्रज्ञाला आठवले … एकदा तिने आईला याविषयी विचारलेही होते, “ तू कसे हे सांभाळू शकतेस? कसं जमतं गं तुला? “ तेव्हा आई म्हणाली होती, “अगं हे सगळं मी आपल्या माणसांसाठीच करते ना? मग आपल्या माणसांसाठी काही केले तर ते कष्ट जाणवत नाहीत. ते कष्टच वाटत नाहीत. फक्त त्यासाठी थोडी तडजोड आवश्यक आहे.”

“अजून एक सांगते बघ••• मला जेव्हा त्रास व्हायला लागतो ना? तेव्हा मी सासूबाईंचा विचार करते. अगं आपलं तर तेव्हा २०-२५ जणांचं कुटुंब होतं. तरी त्यांनी नाही सगळं सांभाळलं? त्यांना पती पत्नींना एकमेकांसाठी वेळ देणं तर सोडाच पण एकमेकांशी बोलताही येत नव्हतं. मग एकमेकांशी बोलणे नाही जमले तरी कोणाच्याही नकळत एकमेकांना स्पर्श करणं. काही खोड्या करणं यातूनच तर प्रेम बहरलं. एकमेकांच्या हृदयात घर केलं. ( हृदयात स्पेस निर्माण केली) सगळं घर हसतं खेळतं ठेवलं.”

“मग त्यांच्याही सासर्‍यांचे निधन झाले म्हणून घराच्या वाटण्या झाल्या आणि त्यांच्या ४ मुलांसवे वेगळ्या राहू लागल्या. तरी सणवार,लग्न, मुंज आदि सोहळ्यांना उपस्थित राहून त्यांनी इतरांच्या मनातही असलेली स्पेस जपलीच ना? तेव्हा घरात जागा नसेल कदाचित पण प्रत्येकाच्या मनात निश्चित जागा होती. हे सगळे पाहिले आणि मग थोडा त्याग, थोडी आपल्या भावनांना मुरड घालता आली तर आपणच आपली स्पेस निर्माण करू शकतो हे पटलं. म्हणून मी पण सासूबाईंच्या नकळत त्यांचा हा गुण चोरला म्हटलीस तरी हरकत नाही.” 

प्रज्ञाला हे आठवले मात्र. तिने डोळे खाडकन उघडले . तिच्या मनात असंख्य विचार भिरभिरून गेले. आपण दोघेच रहात असलो, घर मोठं असलं तरी आपल्याला स्पेस नाही हा किती कोता विचार आहे हे लक्षात आले. आपल्याला स्पेस मिळण्यासाठी कुणाच्यातरी मनात स्पेस निर्माण करता यायला हवी हे तिला पटले. 

तेव्हा स्पेस नसेलही कदाचित, पण एकमेकांच्या मनातील स्पेसमुळेच सगळी सुख दु:खे संकटे यांना सामोरे जायचे धैर्य मिळत होते, खंबीरता लाभत होती. आता एवढी स्पेस असूनही एकमेकांच्या मनातच स्पेस नाही त्यामुळे संकटकाळी अडीअडचणींना एकट्यानेच सामोरे जावे लागते आहे.  तेवढे धैर्य आपल्यात नसले तरी वरवर ते आपण दाखवतो आणि आतल्या आत खचतो. 

ही खच कोणाच्याही हृदयात स्पेस नसल्याने कोणालाच कळत नाही. आता आपणही अशीच स्पेस निर्माण करायला हवी हे तिने आता भांडून घेतलेल्या स्पेसने तिला शिकवले होते.

प्रज्ञा बाहेर आली आणि सुशांतला म्हणाली,” चल आपण गावाकडे जाऊ.” गावाकडील लोकांच्या मनात स्पेस करण्याच्या या विचाराने सुशांतच्या हृदयातील तिची स्पेस जरा बळकट झाली होती.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments