श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ संभ्रम… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
(वृत्त : पादाकुलक)
जाते वाहुन महापुरी ते
ताठ कण्याचे झाड वेंधळे
टिकुन राहते जपता जपता
शारण्याचा मंत्र लव्हाळे !
इथे फुलांनी जखमी कोणी
मुळी खुपेना कोणा काटा
कुणास जाळी रात्र चांदणी
कुणास वणवा फुटकळ चटका !
झुंज ज्योतिची प्रभंजनाशी
किती थरारक किती मनस्वी
शिक्कामोर्तब स्वमरणावर
सहीच अंती एक आंधळी !
कोणी भोगी इहलोकीचा
कोणी योगी मोक्ष मुक्तिचा
प्रियतम कोणा सिंहासन अन
बोधिवृक्ष हा ध्यास कुणाचा !
जगते कोणी अपुल्यापुरते
दूभंग दुजांस्तव इथे कुणी
कुणी नांदते गोकुळ हसरे
कमनशिबाची कहाणी कुणी !
कोणी इथले कोणी तिथले
कोणी असले कोणी तसले
कुण्या दिशेला गाव आपुले
कधी कुणा का येथे कळले ?
(शारण्याचा=शरण जाण्याचा)
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈