मराठी साहित्य – विविधा ☆ आपणही होऊ या अर्जुन… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

☆ गीता जयंती विशेष  – आपणही होऊ या अर्जुन… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

जगाच्या इतिहासात अशी एकमेव घटना असावी की ऐन युद्धाच्या धामधुमीत एका पथभ्रष्ट होऊ पाहणाऱ्या महापराक्रमी योध्यास त्याचा सारथी काही युक्तीच्या चार गोष्टी सांगतो. महापराक्रमी असणारा हा वीर पुरुष आपल्याशी लढायला सज्ज असलेल्या आपल्याच नातेवाईकांना पाहून युद्धातून पळ काढण्याची अनेक कारणे त्या सारथ्यास सांगतो. सारथी ती सर्व कारणे (?) शांत चित्ताने ऐकून घेतो. आणि त्यानंतर सलग अठरा अध्यायांचे कर्मशास्त्र त्यास सांगून त्या महापराक्रमी योध्यास युद्धास प्रवृत्त करतो. बरं ही कहाणी इथेच समाप्त होत नाही तर एका अर्थाने या कहाणीची ही सुरुवात (प्रारंभ) ठरते. कारण इतक्या सुस्पष्ट आणि चपखल शब्दात या आधी ‘कर्मशास्त्र’ कोणी कथन केलेले नव्हते.  आणि केले असले तरी ते सामान्य जनांच्या कानी पडले नव्हते असेच म्हणावे लागेल.

श्रीमद्भगवद्गीता सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर सांगितली गेली आहे. ऐकणारा अर्जुन होता आणि सांगणारा साक्षात् भगवान कृष्ण होते. अर्जुन कोण होता तर पाच पांडवांपैकी एक. श्रीकृष्णाचा परमभक्त अर्जुन. प्रश्न असा पडतो की अर्जुनासारख्या नित्य नामस्मरणात असणाऱ्या थोर भक्ताला सुद्धा विषाद व्हावा, त्याचे मन अस्थिर व्हावे, हे विशेष नव्हे काय ? अर्जुनाची जर अशी स्थिती असेल तर सामान्य माणसाने काय करावे ? आजच्या एकूणच धकाधकीच्या जीवनात कसे आनंदी राहायचे हाच मोठा प्रश्न होऊन बसल्याचे आपल्या लक्षात येईल. अर्जुनाला किमान इतकी तरी खात्री होती, इतका तरी विश्वास होता की ‘भगवंत’ त्याच्या बरोबर आहेत, त्याच्या पाठीशी आहेत. आज सामान्य मनुष्याला त्याच्या बरोबर नक्की कोण आहे? याची शाश्वती नाही. तसेच बरोबर असणारे किती साथ देतील याची खात्री नाही. कारण त्याचा स्वतःवर जितका असायला हवा तितका विश्वासच नाही; तर दुसऱ्यावर कसा विश्वास असणार ?  बरं, भगवंताला एखाद्याची दया आली आणि सहाय्य करण्यासाठी ते प्रगट झाले तरी या मनुष्याच्या मनातील शंका-कुशंका भगवंताला त्यास सहाय्य करण्यापासून नक्की रोखतील, अशी स्थिती आहे. आजच्या ‘अर्जुना’चे इतके ‘स्खलन’ झाले आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये.

गीता ही ‘धर्मक्षेत्र’ असलेल्या ‘कुरुक्षेत्रा’वर सांगितली गेली आहे. त्यामुळे भगवंतांना प्रगट होण्याइतके तरी ‘धर्मक्षेत्रे’ टिकविण्याची नितांत गरज असल्याचे आपल्या लक्षात येईल. सध्याचे ‘कुरुक्षेत्र’ हे ‘धर्मक्षेत्रां’वर आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. कारण सामान्य मनुष्य स्वधर्मपालन करताना दिसतोच असे नाही किंवा स्वधर्म म्हणजे नक्की काय असते हे सांगण्याची, शिकविण्याची व्यवस्था आज आपण निर्माण केली नाही किंवा करू शकलेलो नाही. सध्या मनुष्य फक्त ‘धावतोय’. सकाळी उठून नोकरीवर जाण्यासाठी आणि नंतर नोकरीवरून घरी पोचण्यासाठी. कधी सुखाच्या मागे तर कधी दुःखापासून दूर जाण्यासाठी. यातच त्याची अर्धीअधिक ऊर्जा आणि वेळ खर्च होत आहे. आपण नक्की काय करतोय ? जगतोय की मरत नाही म्हणून जगतोय हेच त्याच्या लक्षात येत नाही.

मनुष्याला आपली सद्यस्थिती कळली तर तो त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करू शकेल; पण सध्या मनुष्य शाळेत करायचा तसा ‘कदमताल’ करीत आहे आणि आपण फार मोठी उन्नती केली अशा भ्रामक समजुतीत सुख मानीत आहे. आपण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे युद्धभूमीवर लाखो लोक असतील पण विषाद (संभ्रम) मात्र अर्जुनालाच झाला. कारण इथे अर्जुन सामान्य मनुष्याचे प्रतिनिधित्व करीत आहे. जे मोठे (इथे कोणीही मनात जात आणू नये ) वर्गातील असतात त्यांना प्रश्न पडत नाहीत किंवा ते आपापल्या परीने त्या प्रश्नांची उत्तरे शोधतात. तिसरा वर्ग लहान लोकांचा असतो त्यांना रोजच्या जेवणाची भ्रांत असते, ते मिळविण्यातच त्यांचा वेळ जातो. प्रश्न फक्त दुसऱ्या वर्गातील अर्थात मध्यम प्रवृत्तीच्या माणसांना पडतात. आजपर्यंत जितक्या म्हणून ‘चळवळी’ झाल्या, आंदोलने त्यात सामान्य मनुष्य आघाडीवर असल्याचे आपल्या लक्षात येईल. भारतीय स्वातंत्र्ययुध्दात भाग घेतलेली बहुतांश मंडळी मध्यमवर्गीयच होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे ‘सामान्य’च होते. रामाने सुद्धा (वा)नरांच्या मदतीने रावणाचा पराभव केलेला आहे. या सर्व गोष्टी म्हणजे आपला विजयी आणि स्फूर्तिदायक इतिहास आहे.

भगवद्गीता हे ‘पुस्तक’ नाही. प्रत्यक्ष भगवंतांच्या मुखातून ताण-तणावाच्या परिस्थितीला सकारात्मक, ‘स्वधर्मा’ची कृती जोडून तोंड देण्यासाठी केलेले ते उत्कृष्ट मार्गदर्शन आहे. आयुष्यात अनेक समर प्रसंगांना तोंड देताना सर्वसामान्य माणूस अर्जुनाप्रमाणे गलितगात्र होऊन जातो. नैराश्य दाटून येते. कुठे तरी पळून जावेसे वाटते. मनुष्याला नित्यकर्म करावीशी वाटत नाहीत. हे करू की ते करू ? मीच का करायचे ? देव फक्त मलाच दुःख देतो ? माझेच वाईट होते अथवा केले जाते ? असे अनेक प्रश्न मनुष्यास पडत असतात. मग, मनुष्य थातुरमातुर कारणे देऊन निज कर्तव्यापासून स्वतःला दूर न्यायला लागतो. हाच ‘विषाद’.

‘विषाद’ कधी भोगात आणि कधी रोगात परिवर्तीत होत असतो. विषाद ‘योगात’ परावर्तित झाला तर गीतेचे ज्ञान प्राप्त होऊन मनुष्यास विश्वरूप दर्शन होऊ शकते.  पण तो जर भोगात किंवा रोगात परावर्तित झाला तर मात्र मनुष्याचे मोठे नुकसान होते. 

त्या अर्जुनाला स्वत:च्या मर्यादांची जाणीव होती आणि कृष्णावर विश्वासही होता. अहंकार बाजूला ठेवून कृष्ण काय सांगतो आहे ते ऐकून घेण्याची, शरण जाण्याची त्याची मनापासून तयारी होती. म्हणूनच त्याच्या विषादाचे परिवर्तन ‘योगा’त होऊन जीवनाचे चिरंतन, शाश्वत तत्त्वज्ञान जन्मास आले. आपल्या विवंचना, चिंता आणि अन्य सर्व समस्यांकडे आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघता आले पाहिजे. हाच दृष्टिकोन श्रीमद्भगवद्गीता आपल्याला शिकविते. त्यासाठी मात्र अर्जुन होण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे, तसा प्रयत्न करायला पाहिजे, किमान प्रारंभ !!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गीतेतील मोक्ष कल्पना… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

🌸  विविधा  🌸

गीतेतील मोक्ष कल्पना☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

गीता जयंतीच्या निमित्ताने थोडेसे चिंतन…

रंगबिरंगी नवरसांनी भरलेल्या जीवनात सुख आणि दुःखाचे अनेक प्रसंग येतात. ते चाकाच्या आऱ्या प्रमाणे निरंतर खाली वर फिरत असतात. कधी कधी तर काय करणे श्रेयस्कर होईल हे ठरवणे अवघड असते. अशा वेळी मार्गदर्शक ठरणारा उत्कृष्ट ग्रंथ म्हणजे गीता. गीतेचे महत्त्व सांगणारा एक सुंदर श्लोक आठवतो….

“सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन:|

पार्थो वत्स:सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतम् महत्||”

अशी ही गीता केवळ मृत्यू नंतरच्याच मोक्षाचा मार्ग दाखविते असे नाही तर जगताना येणाऱ्या प्रश्नांमधून मिळणाऱ्या मोक्षाचा मार्गही दाखविते. अर्जुनाला कृष्णाने दाखविला त्याप्रमाणे.

मोक्ष म्हणजे मुक्ती. आपल्या धर्मात पुनर्जन्माचा सिद्धांत मांडला आहे. म्हणजे पूर्वीच्या जन्माच्या कर्मानुसार या जन्मात फळ मिळते व पुन्हा पुन्हा जन्मही मिळत राहतो. या कर्मबंधनातून सुटका पाहिजे असल्यास या जन्मात कर्माचे बंधन लागणार नाही असे कर्म करायला हवे. ते कसे असावे? याचा मार्ग गीतेत सांगितला आहे.

गीतेवर अनेक टीकाकारांनी निरनिराळा अर्थ लावून टीका सांगितली आहे. त्यात प्रामुख्याने शंकराचार्यांनी लिहिलेल्या गीता टिकेत गीतेत प्रामुख्याने ज्ञानयोग सांगितला आहे असे मत मांडले आहे. म्हणजेच आत्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान म्हणजेच पिंडी तेच ब्रम्हांडी असल्याचे ज्ञान झाले की मग कर्म संन्यास घेतला की मगच मोक्ष मिळतो. म्हणजेच आत्मा परमात्म्यात विलीन होऊन मोक्ष मिळतो म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते असे मत मांडले आहे.

तर भक्ती मार्ग हेच भगवंतापर्यंत जाण्याचे अत्यंत सुलभ साधन आहे म्हणून गीतेतील मुख्य प्रतिपाद्य विषय भक्तीयोग हा आहे हे सांगणारा आहे एक पंथ आहे. हा भक्तिमार्ग अतिशय उत्कृष्ट आणि रसाळ वाणी व सुंदर दृष्टांतांनी फुलवून सांगणारा उत्कृष्ट ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी.

त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी या दोन्ही ग्रंथांचा आधार घेऊनच पुढची वाट चोखाळली आहे. त्यांच्या मते युद्धभूमीवर अर्जुनाने शस्त्र खाली ठेवल्यानंतर त्याला केवळ युद्धासाठी प्रवृत्त करण्यासाठीच भगवान कृष्णांनी गीता सांगितली आहे. त्याअर्थी गीतेचा प्रतिपाद्य विषय कर्मयोग हाच आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या ग्रंथाला कर्मयोगशास्त्र अथवा गीता रहस्य असे नाव दिले आहे.

प्रत्येकाने आपापल्या काळात समाजाची गरज ओळखून व जे ठासून सांगण्याची गरज आहे ते ओळखून गीतेचा मुख्य प्रतिपाद्य विषय कोणता आहे ते मांडले आहे असे मला वाटते.

शंकराचार्यांना त्यांच्या काळात समाजाला ज्ञानयोग सांगण्याची म्हणजेच ब्रह्मसत्य जगत् मिथ्या हे सांगण्याची मुख्यत्वे करून गरज वाटली. म्हणून त्यांनी समाजमान्य असलेल्या गीता या ग्रंथाचा आधार घेऊनच ज्ञानयोग सांगितला.

 ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात कर्मकांडाचे अतिशय स्तोम माजले होते व त्यापायी समाजातील माणुसकीच नष्ट झाली आहे हे त्यांच्या लक्षात आले. व

“अद्वेष्टा सर्व भुतानाम् मैत्र: करुण एव च |

 निर्ममो निरहंकार: समदुःखसुख:क्षमी||”

याप्रमाणे कोणाचा द्वेष न करणारा व सर्व प्राणिमात्रांशी मित्र भावाने वागणारा असा भक्तच भगवंताला प्रिय असतो हा उपदेश करणे त्यांना आवश्यक वाटले. म्हणून त्यांनी गीतेवर प्रवचन करताना भक्तियोगाचे महत्त्व जनसमुदायाला पटवून सांगितले.

लोकमान्य टिळकांना वाटत होते की आपण पूर्वी मोगलाईत अत्याचार सहन केले. आता ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आहोत व इकडे लोकांची प्रवृत्ती तर ईश्वराची इच्छा होईल तसे घडेल अशी आहे. अशा वेळी त्यांचा जो गीतेचा सखोल अभ्यास होता त्यावरून त्यांनी प्रकर्षाने मांडले की गीता अर्जुनाला शस्त्र हाती घेण्यासाठीच सांगितली आहे. तेव्हा गीतेत प्रामुख्याने कर्मयोग सांगितला आहे. त्या काळात, स्वातंत्र्यासाठी लढा देण्याचीच आवश्यकता आहे आणि आपल्या मुख्य धर्मग्रंथातही तेच सांगितले आहे असे मत मांडले.

आपल्या तत्त्वज्ञानात मोक्षप्राप्तीसाठी निवृत्ती मार्ग व प्रवृत्ती मार्ग चोखाळावे असे निरनिराळ्या तत्त्वज्ञांनी मांडलेल्या मतातून दिसून येते.

निवृत्ती मार्ग म्हणजे संसाराचा त्याग करून संन्यास घ्यायचा व कर्म संन्यासच घेऊन तपश्चर्येला बसावयाचे. कर्म जळून खाक होतील तेव्हाच मोक्ष प्राप्त होईल हे मत. पण एक असाही मतप्रवाह आहे की पूर्ण कर्मे कोणाला सुटूच शकत नाहीत. जीव जगवायला खावे लागणार. खाणे मिळण्यासाठी कमीत कमी का होईना परंतु कर्मे करणे आवश्यकच आहेत. संन्याशाची पण एक कुटी असतेच.

प्रवृत्ती पर मार्ग म्हणजे कर्म करावयाची पण निष्काम भावनेने करायचे. भगवंतांनी गीतेत म्हटलेच आहे…

“कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन|

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगोsस्त्व कर्मणि”

भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात की केवळ कर्म करण्यावरच तुझा अधिकार आहे. फळ मिळणे तुझ्या अधिकारातच नाही. म्हणून तू फलाशा मनात धरून कर्म करूच नकोस. फलाशा न धरता कर्म केले तर कर्माचे बंधन न लागता मोक्ष मिळतो.

ज्याप्रमाणे कर्म करण्यापासून मनुष्य मुक्त होऊ शकत नाही त्याचप्रमाणे सामान्य माणूस फलाशेपासून तरी मुक्त होऊ शकतो का? आपल्या मनात अनेक गोष्टींची तीव्र इच्छा असते. ती मनात धरूनच आपण आपल्या कामांची आखणी करतो. संपूर्णपणे वैराग्य आपल्यासारख्या सामान्यांना येऊच शकत नाही.

निष्काम कर्माचे महत्त्व सांगताना आचार्य विनोबांनी गीता प्रवचने मध्ये खूप सुंदर उदाहरण दिले आहे. ते म्हणतात की लहान मूल खेळण्याची क्रिया करते त्यातून त्याला फक्त आनंद मिळतो. कुठलाही हेतू मनात ठेवून तो खेळत नाही. पण खेळण्याच्या व्यायामातून प्रकृती चांगली राहणे हे फळ त्याला आपोआप मिळते. त्याप्रमाणेच बालकाचे निरागस मन घेऊन आपण कर्म केले तर त्याचे चांगले फळ फलाशा मनात न धरता ही आपल्याला मिळतेच.

असेच आणखी एक उदाहरण! एक मानसशास्त्रज्ञ अभ्यासाच्या एकाग्रतेसाठी समुपदेशन करताना विद्यार्थ्यांना ‘कर्मण्येवाधिकारस्ते’ हाच श्लोक सांगायचे. आणि म्हणायचे की अभ्यासानंतरच्या निकालात अमुक मार्क्स मिळतील याचाच विचार करशील तर निकालाच्या विचारांवरच तुझे मन केंद्रित होईल व अभ्यासावरून मात्र उडेल म्हणून तू चांगला अभ्यास कसा करायचा याचाच फक्त विचार कर. निष्काम कर्मयोगाचे महत्त्व या उदाहरणावरून लक्षात येते. रोजच्या जीवनात कर्मबंधनाची मुक्तता हीच नाही का?

आता इथे प्रश्न निर्माण होतो की कृष्णाला फक्त अर्जुनाला युद्ध करताच प्रवृत्त करायचे होते तर “अर्जुना फालतूपणा करू नकोस चल उठ धनुष्य हातात घे” एवढे जरी कृष्णांनी म्हटले असते तरी अर्जुनाने शस्त्र हातात घेतले असते. पण तो अर्जुन होता. श्रीकृष्णाची आज्ञा त्याने पाळली असती तरी मनापासून लढला नसता. कारण आपल्याच आप्तांना व वडीलधाऱ्यांना कसे मारू? ही शंका त्याच्या मनात होतीच. त्यासाठी भगवंतांना ज्ञान- भक्ती- कर्म ;या सर्वांचीच चर्चा करणे आवश्यक वाटले. अर्जुन एक एक शंका विचारत गेला. त्याचे निरसन करता करता प्रत्यक्ष भगवंताने ‘परिजनाला मारलेस तरी तू कर्तव्य कर्मच करतो आहेस म्हणून तू मोक्षालाच जाशील’ असे अर्जुनाला सांगितले.

सर्वप्रथमच आप्तांना समोर बघून यांना मारून स्वर्गाचे राज्य हे मला नको असे अर्जुन सांगतो. त्यावेळी आत्मा अमर असून तो फक्त हे शरीर मारणार आहेस. आत्मा कशानेही मारल्या जाऊ शकत नाही. हे कृष्णाने सांगितले व जन्म घेणाऱ्याला मृत्यू व मृत्यूनंतर पुन्हा जन्म निश्चित आहे. म्हणून तू त्याचा शोक करू नकोस. असे सांगितले आहे.

तरीदेखील अर्जुन तयार होत नाही त्यावेळी भगवान सांगतात;

“यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत |

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्||”

या श्लोकातून भगवान सांगतात की जेव्हा जेव्हा अनाचार माजतो तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो. आताही हे आप्त असले व वंदनीय असले तरी ते अविवेकाने वागले आहेत. व आता तू माघार घेतलीस तर दुसऱ्यांवर अन्याय केला तरी काही कोणाचे बिघडत नाही. असे विचार समाजात प्रसार पावतील. थोडक्यात म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो असेच जणू भगवंतांना म्हणायचे होते. म्हणून ते अर्जुनाला सांगतात तू युद्धासाठी उभा राहा. तू क्षत्रिय आहेस म्हणून अन्यायाचे परिमार्जन करण्यास तुला स्थिर बुद्धीने तुझ्या क्षत्रिय धर्माला जागून युद्ध करावयाचे आहे स्थितप्रज्ञ बुद्धीने, म्हणजेच कुठलाही दुष्टभाव मनात न ठेवता सगळ्यांना सारखे मानून लढलास तर त्याचे पाप तुला लागणार नाही. “तस्मादुत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय: ” असे कृष्ण वारंवार अर्जुनाला सांगतात.

आणि हे आत्म्याबद्दलच्या मी सांगितलेल्या ज्ञानामधूनही निष्काम कर्मयोगामधूनही तुला हे समजत नसेल तर तू माझा खरा भक्त आहेस म्हणून मला फक्त शरण ये आणि मी सांगतो त्यावर विश्वास ठेवून युद्ध करता उठ. कारण तुझ्याकरता योग्य तेच मी सांगतो आहे. परंतु तुझा कर्माबद्दलचा मोह नष्ट होऊ देऊन मगच मला शरण ये. ज्ञानानंतर स्थितप्रज्ञ होऊन तथा मला शरण येऊन केलेल्या या युद्धरूपी कर्तव्य कर्माने अखेरीस तुला मोक्षच मिळेल.

व्यवहारातही वडीलधारे पुष्कळदा समजावून सांगतात. तरीही न ऐकल्यास मोठ्यांना जीवनाचा अनुभव असतो. त्या आधारावर ते आपल्या मुलांना निश्चयाने सांगतात, ‘मी सांगतो तसे कर’. बहुतांश वेळा मुलांना त्याचा फायदाच होतो.

तसेच आपल्या मनात खूप गोष्टींचा संभ्रम निर्माण होतो त्यावेळी व. पु. काळ्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण अर्जुनच असतो. त्यावेळी कृष्णही आपल्यालाच व्हावे लागते. कारण प्रत्येक वेळी आपल्याला कृष्णाच्या रूपात कोणी भेटेलच असे थोडीच असते! आपण आपले कृष्ण होतो त्यावेळी गीतेचा कुठलाही अध्याय मराठीतून वाचायला घेतला तरी काही ना काही मार्गही सापडतोच. व समोरच्या संकटातून मुक्ती पण मिळवता येते. म्हणजेच संकटातून मार्ग शोधता येतो. कृष्णाने ज्ञान -कर्म -भक्ती मधून सांगितलेली मोक्ष कल्पना मांडण्याची माझी योग्यता पण नाही. तेवढे माझे ज्ञान पण नाही. पण आजच्या गीता जयंतीच्या दिवशी केलेला तोकडा प्रयत्न गोड मानून घ्यावा.

‌ सर्वांना नमस्कार व धन्यवाद!

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ आपली माती, आपली माणसं – ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ आपली माती, आपली माणसं — ☆ श्री प्रदीप केळूसकर

 सतीश जनाबाईला सांगत होता “सुरेशचो फोन इल्लो, दहा तारखेक तो मुंबईत उतारतलो, दोन दिवस तेची मुंबईत कामा करून बारा तारखेक चिपी विमानतळावर उतरून हय येतलो, मग परत पंधरा तारखेक परत तुका घेऊन चिपी वरुन मुंबई आणि त्याच रात्री अमेरिकेक जाऊची तिकिटा काढल्यानं तेनी. ”

जनाबाईने डोक्याला हात लावला.

“आता या वयात माका अमेरिकेक न्हेता, माका प्रवास जमतलो रे.. माजी ऐशी सरली ‘

“पण तू हय एकटी रावतास, तेची काळजी वाटता तेका आते..

“अरे पण मी तुज्याकडे रवलंय असतंय, तुजा घर म्हणजे माजा माहेर न्हय… आणि माजो भाऊस म्हणजे तुजो बापूस अजून हयात आसा मा.

 “होय गे आते, पण सुरेश ऐकणा नाय.. मी आणि बाबांनी तेका किती सांगलंय, जनीआते हय रवात.. तेचा माहेर आसा ह्या.. आमच्याबरोबर पेजपाणी खायत.. पण तो ऐकणा नाय, तेचा म्हणणा माजी मुला आता एक आणि तीन वर्षाची आसत, तेंका आजी कशी गावतली आणि आईक पण नातवंडाचे लाड करुषे वाटतले नाय..

नातवंडाचा विषय निघताच जनीबाई गप्प झाली. कल्पनेने तिच्या डोळयांसमोर सुरेशची मुले आली… काय नाव ठेवली.. ती आठवू लागली.. जतीन आणि छोटी जुलिया. जुलियाचे फोटो सुनेने.. कल्पनाने सुरेशच्या मोबाईलवर पाठविलेले.. गोबऱ्या गालाची गोरी गोरी आपली नात.. तिला वाटतं होते.. तिला उचलून घ्यावे.. तिची पापी घ्यावी.. तिला मांडीवर झोपवावं.. तिच्यासाठी अंगाई म्हणावी आणि तीन वर्षाचा नातू.. बूट घालून खेळायला जातो.. त्याला जवळ घ्यावं.. त्याला रामाची, अर्जुनाची, शिवाजी महाराजांची गोष्ट सांगावी. एवढ्या एकाच कारणासाठी तिला अमेरिकेला जावे, असे वाटतं होते.

ठरलेल्या प्रोग्रामप्रमाणे सुरेश आला. मग ती दोघ तिच्या माहेरी भावाला, भावजयला, भाच्याना.. सुनेला.. त्यान्च्या छोटयाना भेटून आली. माहेरहून बाहेर पडताना जनीला रडू कोसळलं… आता कदाचित ही शेवटची भेट.. तिचे भाऊ, वहिनी, भाचा पण रडू लागला. जड पायानी तिने माहेरच्याना निरोप दिला.

दुसऱ्या दिवशी सुरेश आईला घेऊन प्रथम मुंबईला आणि रात्रीच्या विमानाने अमेरिकेस रवाना झाला.

जनीबाईने विमानाचा प्रवास प्रथमच केला, सुरवातीला ती घाबरली.. पण विमान उडू लागताच ती तिची श्रद्धा असलेल्या वेतोबाचे नाव घेत होती.. मग हळूहळू तिची भीती कमी झाली आणि मग तिला झोप लागली.

जनी अमेरिकेत पोहोचली. तिच्या मुलाचे सुरेशचे मोठे घर होते.. आजूबाजूला जमीन.. भरपूर पाणी. तिने नातवंडांना जवळ घेतले. छोटया जुलीयाला ती आंघोळ घालू लागली.. तिला पावडरकुंकू लावू लागली. तिला झोपवू लागली. जतीन थोडा मोठा. त्याला थोडंथोडं मराठी येत होतं.. ती नातवाला गाणी म्हूणन दाखवू लागली, शिवाजीमहाराजांच्या गोष्टी सांगू लागली. थोडया दिवसात मुलांना आजीचा लळा लागला. आता मुलं आजीसोबत झोपू लागली. तिची सून कल्पना पण प्रेमळ, ती पण खूष झाली. तिलापण आपले संस्कार करणारे हवे होते. एकांदरीत आई अमेरिकेत आल्याने कुटुंब आनंदित झाल्याचे सुरेशच्या लक्षात आले.

जनीबाईने मुलाला भाजीची बियाणी आणायला सांगितली. सुरेशने सुपरमार्केट मधून आणुन दिली. सासूसुनेने मिळून भाजी घातली, त्या सुपीक जमिनीत भाजी तरारून वर आली. जनीबाईने फुलझाडे लावली. काही दिवसात ती पण जगली.

 सुरेशची बायको कल्पना गुणी स्त्री होती, तशी ती त्यान्च्याच नात्यातील. ती नोकरीं करत नव्हती, त्यामुळे जेवण, भांडीकुंडी सर्व करत होती. मुलं थोडावेळ आईकडे पण जास्त आजीसोबत असायची.

सुट्टीच्या दिवशी सुरेश आई, बायकोमुलांना घेउंन लांब फिरायला न्यायचा. जनीबाई एवढ्या वर्षात फिरली नव्हती, तेवढी चार महिन्यात फिरली.

सुरेश आणि कल्पनाच्या लक्षात येत होते, आईला अमेरिकेची हवा मानवली, गावात ती सतत उन्हात कामात असायची किंवा एकटीच असल्याने जेवण करायला टाळाटाळ करायची. पण इथे नेहेमी थंडहवामान आणि पौष्टीक जेवण शिवाय नातवंडांची साय, त्यामुळे उजळली होती. सुरेश आणि कल्पना मनात म्हणत होती, आता आईला इथेच ठेवायचे, घरात कोणी मोठे असले की आपल्याला आणि मुलांना पण आनंद होतो.

जनीबाई पण खूष होती, मुलाच्या सुनेच्या घरात कसलाच त्रास नव्हता पण तिला आपल्या घरची आठवण येई, आपल्या नवऱ्याने स्वतः कष्ट करून बांधलेले घर, आजबाजूची झाडें, घरातील देव.. जोडलेली माणसे.. नातेवाईक.. भाऊ वहिनी भाचा, त्याची मुले आणि तिची श्रद्धा असलेला देव वेतोबा.. ती सकाळी जाग आली की डोळ्यसमोर वेतोबा आणि त्याला नमस्कार करी. पण आपले थोडे दिवस राहिलेत, याची तिला कल्पना होती, शेवटचे दिवस मुला-सुनेसोबत नातवंडासोबत काढावेत, असे मनाला बजावत ती जगत होती.

आणि एका दिवशी ती सकाळी उठली, तेंव्हा तिचा मुलगा सुरेश घराच्या काचेतून बाहेर पहात होता, कल्पना पण त्याच्यासमवेत होती. सुरेश कुणाबरोबर इंग्लिशमध्ये मोठ्याने बोलत होता. कल्पना काळजीत दिसत होती.

सुरेशचे फोनवरील बोलणे संपल्यावर जनीबाईने विचारले “काय झाला रे?

सुरेश म्हणाला “या शेजारच्या बंगल्यातील रुसेलची मम्मी वर गेली, रुसेल बाहेरगावी गेलोवा, तो रात्रीपर्यत येतोलो.

“अरे बापरे, म्हणजे तोपर्यत सगळ्यांका वाट बघुक होयी.

“छे, अमेरिकेत कोण कुणाची वाट बघणत नाय, रुशेलने म्युनिसिपलतिक फोन केल्यानं, तेंची ऍम्ब्युलन्स येतली आणि बॉडी घेऊन जातली ‘.

“अरे मग जाळतले खय?

“इकडे जाळनत नाय, पुरतत.. ता काम म्युनिसिपलटी करता.

“अरे मग आमच्या देशातील लोक या देशात वर गेलो तर?

“तर तेका विद्युतवाहिनी असता, म्हणजे आत ठेवला आणि बटन दाबला की शरीराची राख होता.

“मग ह्या देशात लाकडा मिलनात नाय जाळूक?

“तेची बंदी आसा. या देशात कोणी मेलो तर या देशाचे नियम पाळूक लागतात. आपल्या भारत देशासारख्या नाय..

जनीबाईच्या डोक्यात गोंधळ उडाला. तिने तिच्या जन्मापासून मेलेल्या माणसाला जाळताना पाहिले होते. या देशात हे सर्व नवीनच, तिच्या पदरी पडणारे नव्हते.

थोडयावेळाने तिने मुलाला विचारले “मग तेचे अस्थी कसे गावातले?

“इकडे अस्थी वगैरे काय नसता गे, अस्थी वगैरे आपल्या देशात. माणूस मेलो काय संपलो.

“मग तेचा पुढचा सुतक.. ?

“या देशात सुतक कोण नाय पाळणा. कोणाक वेळ नसता.. जो तो कामात.

“मग अकराव्या.. बाराव्या?

“ते विधी भारतात.. आपल्या देशात, या देशातील लोक असला काय मानीत नाय.. ”

“मग त्या रुशेलची बाकी नातलगा? भाऊ, बहीण, आते, मामा मामी भाचे ते येतले मा भेटुक?

“सगळे फक्त प्रार्थना करतले चर्चमध्ये. आणि मेसेज पाठवतले दुःखाचे..

एकएक गोष्टी ऐकून जनीबाई आश्चर्य करीत राहिली.

या देशातील काय ह्या पद्धती? आपल्या देशापेक्षा एकदम उलट?

मग तिने सुरेशला विचारले “तू त्या रुशेल, भेटाक जातलंस मा?

“छे, मी मेसेज पाठवलंय कंडोलन्स चो, म्हणजे आपण श्रद्धांजली म्हणतो तस. ”

“बस एवढाच. ?

हे म्हणत असताना शेजारी ऍम्ब्युलन्स आली, त्यातील चार माणसे खाली उतरली, त्यानी घरात जाऊन बॉडी उचलली, दरवाजा उघडून आत ठेवली आणि ऍम्ब्युलन्स आवाज करत निघून गेली.

जनाबाई हादरली, अमेरिकेत मरण आलं तर? आपलं वय झालेलं, कधीही वर जायची तयारी हवी आणि मी मेल्यानंतर मला म्युनि्सिपलटीचे लोक ऍम्ब्युलन्स मधून घेऊन जाणारं आणि मला त्या शेगडीत घालणार? आणि माझे अस्थी? त्याचा विसर्जन… काही नाही.. कोणी तरी गोणीत भरून नदीत टाकणार? माझा मुलगा तरी असेल काय अंतिम कार्याला? माझी सून.. नातवंडे.. कोणी नाही.. माझा भाऊ.. भावजय.. भाचा.. सून. शेजारीपाजारी? कोणी म्हणजे कोणी नाही? मी गेल्यानंतर कोण रडणार नाही.. कोण कोणाला भेटायला येणार नाही.. सांत्वन करायला कोण नाही? नुसते मेसेज दुःखाचे.. कसले मेले कोरडे मेसेज?

छे छे.. माझ्या अस्थी मी या देशात टाकणार नाही.. माझ्या अस्थी माझ्या मातीत.. माझ्या देशाच्या मातीत -माझ्या माणसात…”

जनीबाई अस्वस्थ होऊ लागली, तिला झोप येईना, जेवण गोड लागेना, नातवंडांना जवळ घेऊन ती शून्यात पाहू लागली, शेवटी तिने धीर करून सुरेशला सांगितले 

“सुरेश, माझा वय झाला, आता केव्हाय वर जाऊची तयारी करूंक व्हयी, पण ह्या देशात मराची माझी तयारी नाय.

“अगे आई, काय बोलतस तू? आमी आसवं मा तुझ्यासोबत?”

“जिता आसय तोपर्यत तुमी आसात, मी मेल्यावर तू म्युनि्सिपलटीक फोन करून सांगतलंस, ही बॉडी घेऊन जावा म्हणून… त्या रुशेलच्या आईक नेला तसा.. माका आसा बेवारशी मराचा नाय आसा.. माका माझ्या माणसात मराचा आसा.. माजे अस्थी भोगव्याच्या कोंडीत पडात होयेक.. थयसून देवबागच्या संगमात विरघळूक होयेत.. “

“आई, काय तरी तुजा? तू एवढ्यात कशाक वाईट गोष्टी बोलत? तुका मोठा आयुष्य आसा?”

“नाय बाबा, माजी खात्री नाय, तू माका माज्या भावाकडे पोचव… मी थय आनंदान रवान.. मग मेलंय तरी हरकत नाय.. माज्या देशात माज्या मातीत.. माज्या माणसात..

सुरेश आणि कल्पनाने खुप समजावण्याचा प्रयत्न केला, पण जनीबाई काही ऐकेना.

आई जेवायची पण बंद झाली हे पाहून सुरेशने मामांना फोन लाऊन सर्व सांगितले, त्यानी तिला आनंदाने इथे घेऊन ये म्हणून कळविले.

सुरेश आईला घेऊन मामाकडे आला. या घरातील सर्वांनी तिला खुप प्रेम दिले, सुरेशच्या मुलांना आजीची सवय झाली होती, त्यामुळे दरवर्षी ती चौघे भारतात येऊन राहू लागली.

जनीबाई पुढे पाच वर्षे जगली. लहानश्या आजाराचे निमित्त होऊन ती गेली. सर्वजण तिच्यासाठी रडली. तिच्या भाच्याने सतीशने तिला अग्नी दिला. अनेक नातेवाईक, शेजारी, गाववाले भेटून गेले. पाचव्या दिवशी सुरेश, कल्पना अमेरिकेहून आली, तिच्या अस्थी तिच्या इच्छेप्रमाणे भोगव्याच्या कोंडीत सुरेशने विसर्जित केल्या. तिचे अकरावे, बारावे सुरेशने केले…

आणि तिच्या पिंडाला कावळा पटकन शिवला…

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शुभेच्छा व शुभेच्छा पत्रे… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

शुभेच्छा व शुभेच्छा पत्रे… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

मला लहानपणापासून वाचनाची लेखनाची अतिशय आवड आहे. विशेषत: कविता लिहिण्याची. अर्थात आवड असणं आणि जमणं यात फरक आहे. पण मी नव वर्ष, संक्रांत, गुढी पाडवा, दिवाळी, ख्रिसमस, आशा काही काही निमित्ताने, र ला र आणि ळ ला ळ जोडत चार दोन ओळी रचते आणि कविता करण्याची माझी हौस भागवून घेते आणि मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना या काव्यमय शुभेच्छा पाठवून मला तुमची आठवण आहे, बरं का ! असंही जाणवून देते.

आता हेच बघा ना, यंदाच्या वर्षी, मावळतं वर्ष आणि नवीन वर्ष यांची सांगड घालत मी लिहीलं होतं,

गत वर्षाच्या सरत्या क्षणांबरोबर विरून जाऊ दे

उदास मलीन धुके, कटू स्मृतींचे

येऊ दे सांगाती सौरभ सुमधुर स्मृतींचा

जो सेतू होऊन राहील भूत – भविष्याचा.

आणि पाडव्याला लिहिलं होतं,

‘नववर्षाचा सूर्य नवा, निळ्या नभी प्रकाशेल.

त्याच्या प्रकाश दीप्तीने, अंतरंग उजळेल.

अनातरीच्या उजवाडी हीण- मालिन्य जळावे.

नव आशांचे, नव स्वप्नांचे झरे वाहावे वाहावे.

अशा तर्‍हेची शुभेच्छाची देवाण-घेवाण करणारी अनेक प्रकारची रंगीत, मनोहर, आकर्षक चित्रे असलेली ग्रीटिंग्स, त्या त्या दिवसाच्या आधीपासून दुकानात सजलेली, मांडलेली दिसतात.

विविध, भाषांमधली, विविध प्रकारचे संदेश देणारी ही भेट कार्डे आताशी इंटरनेटच्या महाजालावरून किंवा व्हॉट्स अ‍ॅपवरूनही आपल्यापर्यंत येऊ लागली आहेत.

अलीकडे, कधी कधी वाटू लागतं, या सार्‍याला फार औपचारिकपणा येऊ लागलाय. अनेकदा पुनरावृत्ती झालेली असते. पण त्यात काही असे वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण संदेश असतात की ते मनात रुजून रहातात. अत्तरासारखे दरवळत असतात.

शुभेच्छा पत्रे, महणजेच भेटकार्डं व्यवहारात कधी आली, मला माहीत नाही. पण मी साधारणपणे, आठवी – नववीत असल्यापासून आमच्याकडे ग्रीटिंग्स येत असल्याचा मला

आठवतय. एक जानेवारी, दिवाळी, संक्रांतीला ती यायची. पुढे पुढे, वाढदिवस, विवाह, अमृत महोत्सव अशी त्यांची व्याप्ती वाढत गेली.

एकदा सहज मनात आलं, भेट कार्डे पाठवण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली, याचा शोध घ्यावा आणि खूपच गमतीदार माहिती मला कळली. हिंदुस्थानात पुराण काळापासून शुभेच्छापर संदेश पाठवण्याची परंपरा दिसते. त्या काळात संदेशवाहक दुसर्‍या राजाच्या दरबारात जाऊन आपल्या राजाच्या वाटेने त्याला शुभसंदेश देत. युद्ध, विजयोत्सव, विवाह, पुत्रप्राप्ती, या निमित्ताने ते पाठवले जात. मध्ययुगातही ही परंपरा कायम होती. पाश्चात्य राष्ट्रांचा विचार करताना कळलं की अमेरिकन विश्वकोशात असा उल्लेख आहे की येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी 600 वर्षे रोममध्ये शुभेच्छा देणारा संदेश प्रथम तयार झाला. एका धातूच्या तबकावर अभिनंदनाचा संदेश लिहून रोमच्या जनतेने आपल्या सम्राटाला तो भेट म्हणून दिला.

इंग्लंडमधील सुप्रसिद्ध कादंबरीकार चार्लस डिकन्स याला ग्रीटिंग कार्डाच्या नव्या परंपरेचे जनक मानले जाते. सुंदर हस्ताक्षरात शुभ संदेश लिहून तो छोटी छोटी भेटकार्डे तयार करी व आपल्या परिचितांना ती, तो पाठवी. अमेरिकेमध्ये बोस्टन लुईस याने १८७५मध्ये पहिले ग्रीटिंग कार्ड बनवले होते. जगातील सगळ्यात महाग ग्रीटिंग म्हणजे, रेसॉँ या चित्रकाराची दुर्मिळ अशी कलाकृती. त्यावर शुभसंदेश लिहून एका जर्मन नागरिकाने आपल्या मित्राला पाठवले होते. आज त्याची किंमत लाखो डॉलर्स आहे.

जगातील सगळ्यात मोठं ग्रीटिंग कार्ड केवढं असेल? त्याची लांबी ७ किलोमीटर एवढी आहे. १८६७ मध्ये व्हिएतनामयेथील युद्धाच्या वेळी अमेरिकन जनतेने आपल्या सैनिकांना त्यावर शुभ संदेश लिहून पाठवले होते. त्यावर एक लाख अमेरिकन जनतेने सह्या केल्या होत्या.

आहे ना भेट कार्डाचा इतिहास मनोरंजक…..

सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’तो’ का ‘ती’?” मूळ लेखक : डॉ. ना. सोमेश्वर अनुवाद : श्री मंगल पटवर्धन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “’तो’ का ‘ती’?” मूळ लेखक : डॉ. ना. सोमेश्वर अनुवाद : श्री मंगल पटवर्धन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

१८६५ मध्ये एक ब्रिटिश सैन्यातील डॉक्टर मरण पावला. तसं पाहिलं तर त्याच्या मृत्यूबद्दल सांगण्यासारखं काही विशेष नव्हतं. त्याला खूप जुलाब झाले होते. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न केले. तरी देखील तो वाचू शकला नाही. अजूनही ओ. आर. एस. किंवा अँटीबायोटिक्सचा शोध लागला नव्हता. जुलाब झाल्यामुळे मृत्यू येणे, हे सर्वसामान्य होतं. या डॉक्टरच्या मरण्याचं कुणाला काही फारसं वाटलंही नाही. पण… पण… पण काय? 

जेम्स मिरांडा बॅरी (१७८९-१८६५) सैन्यातील एक उच्च पदावर असणारा तो डॉक्टर ब्रिगेडियरच्या हुद्द्यापर्यंत पोहोचला. जेम्सचे वडील जेरेमिया व आई मेरी ॲन बर्कली (barkali).. यांचं ‘जेम्स’ हे दुसरं अपत्य. १७८९ मध्ये ते आयर्लंडमध्ये राहत होते. वडिलांचं किराणाचं दुकान होतं. तेच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन. वडील जेरेमिया खूप खर्चिक स्वभावाचे ! “बचत” या शब्दाशी त्यांचं काही नातं नव्हतं. त्यामुळे ते लवकरच कर्जबाजारी झाले. उधारी देणे अशक्य होऊन बसल्याने कुटुंबासमवेत डब्लिन येथील मार्शल सिया इथे स्थायिक झाले. इथेही त्यांची सुटका झाली नाही. फसवणुकीच्या गुन्ह्यादाखल त्यांना जेलची हवा खावी लागली. त्यामुळे आई व मुलं लंडनला आली. जेम्स बॅरी चांगला कलाकार होता. हे छोटं मूल आपल्या मामाच्या सहवासात इतकं रमलं की, त्याच्या मित्रांनाही त्यांनी आपलंसं केलं. त्यापैकी फ्रान्सिस्को द मिरांडा व डॉक्टर एडवर्ड फ्रेयर हे खूप जवळचे झाले. एडवर्ड फ्रेयर यांनी जेम्सच्या शेवटच्या दिवसात खूप सेवा केली व त्याच्यावर एक पुस्तकही प्रकाशित केलं. मिरांडा व फ्रेयर इतके जवळचे झाले की या दोघांनी मिळून जेम्सच्या शिक्षणाचा खर्च केला. मामाच्या मृत्यूनंतर त्याची सगळी प्रॉपर्टी या मुलाच्या नावाने झाली. त्यामुळे त्याला वैद्यकीय शिक्षण घेणे सहज शक्य झाले.

३० नोव्हेंबर १८०९ मध्ये ‘लॅडीस स्माक’ जहाजामधून लंडनहून ”विश्वविद्यालया”मध्ये प्रवेश घेण्यासाठी निघाला जेम्स मिरांडा बॅरी.

वैद्यकीय कॉलेजमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून जेम्स बॅरी ओळखला जाऊ लागला. नापास हे लेबल कुठेही न लागता वैद्यकीयच्या शेवटच्या वर्षापर्यंत आला. त्याने शेवटच्या वर्षाची परीक्षा देऊ नये, वयाने लहानसर दिसतो या कारणाने त्याच्यावर बंदी घालण्यात आली. ‘थोडा मोठा होऊ दे, थोडी वर्षे जाऊ दे’, असा निर्णायक मंडळांनी आदेश दिला. तरी जेम्स बॅरीने हार मानली नाही. त्याची इच्छाशक्ती, महत्त्वाकांक्षा त्याला स्वस्थ बसू देईना.

डेव्हिड स्टुअर्ट एस्क्रिन जो श्रीमंत, नावाजलेली व्यक्ती म्हणून ओळखला जायचा, त्याची जेम्सने भेट घेतली. मंत्रिमंडळाशी बोलणी करून त्यांना जेम्सचं म्हणणं पटवून दिल्याने जेम्सला शेवटच्या वर्षाला बसण्याची परवानगी मिळाली.

अशा तऱ्हेने १८१२ मध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन जेम्स बॅरीला डॉक्टरची पदवी मिळाली. लगेचच म्हणजे १८१३ मध्ये आर्मी हॉस्पिटलमध्ये ‘हॉस्पिटल असिस्टंट’ म्हणून रुजू झाला. अवघ्या दोनच वर्षांत म्हणजे १८१५ मध्ये जेम्स ‘असिस्टंट स्टाफ सर्जन’ म्हणून रुजू झाला. त्याची कुशाग्र बुद्धी, कामातील तत्परता व डॉक्टरी पेशातील ज्ञान त्याला इथवर आणू शकलं. मिलिटरी भाषेत हे ‘लेफ्टनंट’च्या हुद्द्यावर असल्याप्रमाणे होतं.

डेव्हिड स्टुअर्ट एस्क्रिनकडून एक पत्र घेऊन केप टाऊनला १८१६ मध्ये आला. केप टाऊनचे तेव्हाचे गव्हर्नर लॉर्ड चार्ल्स हेन्री सॉमरसेट यांची त्याने भेट घेतली. योगायोगाने त्याच वेळी गव्हर्नरच्या मुलीची तब्येत बिघडली होती. जेम्सने इलाज करून तिला अगदी ठणठणीत बरी केली. त्यामुळे जेम्स गव्हर्नरच्या मर्जीतला बनला आणि त्यांच्या घरातील एका सदस्यासारखा तिथेच राहू लागला. गव्हर्नर व जेम्सच्या नात्यासंबंधी काहीबाही बोललं जाऊ लागलं. ‘होमोसेक्शुअल संबंध असावेत’, अशीही कुजबूज सुरू झाली. १८२२ मध्ये गव्हर्नरने ‘कलोनियल मेडिकल इन्स्पेक्टर’च्या पदावर नियुक्ती केली. त्याच्याबाबतीत ही खूपच मोठी उडी होती. त्याच्या कामामुळे सर्वत्र जेम्सचा गवगवा होऊ लागला. पैसा व प्रतिष्ठा त्याच्या दाराशी लोळण घेत होते.

१८२६ मध्ये त्याला नावलौकिक मिळण्यासाठी आणखीन एक घटना घडली. एक गरोदर बाई पोट खूप दुखू लागल्याने जेम्सकडे आली. नॉर्मल डिलिव्हरी होण्याची लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे जेम्सने सिझेरियन करून बाळाला सुखरूपपणे बाहेर काढलं. आई व बाळ सुखरूप होते. ही दक्षिण आफ्रिकेतील पहिली सिझेरियन शस्त्रक्रिया होती. त्यामुळे बाळाचं नाव “जेम्स बॅरी मुनिक” असं ठेवलं. पुढील काही वर्षांत ‘जेम्स बॅरी मुनिक हेरटजोर्ग’ नावाचा पंतप्रधान झाला. एवढं “जेम्स बॅरी” हे नाव प्रसिद्धीला आलं.

केप टाऊन शहरात जेम्स आपल्या क्रांतिकारी कामामुळेही प्रसिद्ध झाला. मानवी हक्कासाठी लढणे हा त्याचा स्वभाव. आरोग्याविषयी सगळीकडे भाषण देत असे. त्याची अंमलबजावणी होते ना, याकडेही त्याचं लक्ष असे. केप टाऊनमध्ये बनावट डॉक्टर, नकली औषधे पुरवून लोकांना लुबाडत. जेम्स बॅरीने गव्हर्नर लॉर्ड चार्ल्स हेन्री यांना त्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता विनंती केली. हा अन्याय जेम्सला सहन होत नसे. शहरात स्वच्छता राखण्यासाठी त्याने बरेच उपक्रम हाती घेतले.

त्याकाळी जेलमध्ये कैद्यांच्या बरोबर कुष्ठरोगीही होते. त्यांना स्वतंत्रपणे खोली देण्यात आली. स्वच्छता पाळण्यासाठी नियम घालून दिले. समाजातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ पाणी पिण्यास मिळण्याची व्यवस्था केली.

भांडण, हातापायी, मारामारी करावी लागल्यास कधी माघार घेत नसे. त्याच्या अशा वागण्याने फ्लोरेन्स नाइटिंगेलपासून बऱ्याचजणांना हा “भांडखोर जेम्स” म्हणून आवडत नव्हता.

जेम्स याने जमैका, सेंट हेलीना, वेस्टइंडीज, माल्टा इत्यादी ठिकाणी काम केले. १८५७ मध्ये तो कॅनडाला गेला. तिथे त्याची ‘इन्स्पेक्टर जनरल ऑफ मिल्ट्री हॉस्पिटल’ या हुद्यावर नियुक्ती झाली. १८५९ मध्ये जेम्स बॅरीची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला आपल्या मायदेशी लंडनला परतावं लागलं.

१८६५ मध्ये जुलाब खूप झाल्याने तो मरण पावला. त्याने आपल्या मृत्युपत्रात पूर्वीच लिहून ठेवलं होतं – ‘आपण परिधान केलेल्या कपड्यासहितच आपले शवसंस्कार करावेत. ‘ पण मृत्युपत्र वेळेवर न मिळाल्याने त्याला नग्नावस्थेत आंघोळ घालावी लागली. त्यावेळी अशीच प्रथा होती. अंघोळ घालण्याकरिता जेव्हा विवस्त्र करण्यात आलं, तेव्हा कुणाचाही आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. जेम्स बॅरी हा पुरुष नसून “मार्गरेट ॲन बर्कली” ही स्त्री आहे, हे जगजाहीर झालं. नाही तर हे गूढ – गूढच राहिलं असतं व तिच्याबरोबरच दफन केलं गेलं असतं. जेम्स हा पुरुष नसून स्त्रीच आहे, यावर बऱ्याचजणांना आश्चर्य वाटलं. काहींचा विश्वास बसत नव्हता. तर काहीजण ‘आपल्याला तो पुरुष नसावा’, असा संशय येत होता, अशी कुजबूज सुरू झाली.

या घटनेमुळे फक्त डॉक्टरच नव्हे, तर पूर्ण ब्रिटिश साम्राज्यच हादरलं. त्याच्या मृत्यूनंतर ब्रिटनचा प्रसिद्ध कादंबरीकार चार्ल्स डिकन्सने “ए मिस्ट्री स्टील” नावाची कादंबरी लिहिली. बॅरीबद्दल अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. “द स्ट्रेंज स्टोरी ऑफ जेम्स बॅरी” लेखिका – ‘इझाबेल रे’.

 तसंच एक नाटकही रंगमंचावर आलं. डिकन्सच्या म्हणण्याप्रमाणे जेम्स बॅरीची कथा गूढ व कुतूहलपूर्ण आहे.

मार्गरेट ॲन बर्कली, आता ‘जेम्स बॅरी’ या नावाने ओळखू जाऊ लागला. तिने आपली केशभूषा, वेशभूषा बदलली. स्तन दिसू नयेत म्हणून मफलरने घट्ट बांधून घेतले. खांदे रुंद दिसण्यासाठी त्याला शोभेसा वेष परिधान केला. गळा दिसू नये म्हणून तो झाकण्यासाठी कोट घालू लागली. भाषा राकट व आवाजात जरबीपणा आणला. उंची कमी असल्याने उंच टाचेचे बूट वापरू लागली. एवढं सगळं करूनही दाढी मिशा नसल्याने चेहऱ्यावरचा नाजूकपणा उठून दिसायचा. आपल्या आवाजात जरब, कर्कशपणा व वागण्यात बेफिकीरपणा आणला. हालचाल, चालणं, बोलणं सगळं पुरुषी दिसण्याकडे ती प्रयत्नशील राहिली.

अशा तऱ्हेने मार्गारेटला ‘जेम्स बॅरी’ म्हणून “पुरुष” होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. कारणही तसंच होतं. त्या काळी स्त्रियांना डॉक्टर होण्यास अनुमती मिळत नव्हती. स्त्रियांना दुसरा दर्जा मिळायचा. स्त्रिया पुरुषांएवढ्या हुशार नसतात. त्यांची कार्यक्षमता पुरुषांएवढी नसते, असा समज होता. स्त्रिया म्हणजे फक्त मुलांना जन्म द्यायचं साधन. त्यांना शिक्षण कशाला हवं? – असाच सर्वत्र समज होता. त्यामुळे स्त्रियांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत नव्हतं. अशा परिस्थितीत डॉक्टरचे शिक्षण घेणे स्वप्नवतच. ‘डॉक्टर होऊन दाखवेनच’ ही तिची प्रबळ इच्छा तिला स्वस्थ बसू देईना. त्यासाठी तिने पुरुषी वेश, आवाज, चालणं, बोलणं इत्यादीमध्ये बदल करण्याचं ठरवलं व ती सगळीकडे ‘पुरुष’ म्हणूनच वावरू लागली.

अधिकृत दाखल्याप्रमाणे ब्रिटनची पहिली महिला डॉक्टर एलिझाबेथ गॅरेट अँडरसन (१८३६-१९१७) १८६५ मध्ये वैद्यकीय परीक्षा पास झाली. पण हिला पदवी मिळाली त्याच वर्षी जेम्स बॅरीच निधन झालं. यावरून हे सिद्ध होतं की, ‘जेम्स बॅरी उर्फ मार्गारेट’ ही ‘ब्रिटनची पहिली महिला डॉक्टर’ असं म्हणता येईल.

अशी ही ब्रिटनची आगळीवेगळी अचंबित करणारी सत्य घटना तिच्या मरणोत्तर उघडकीस आली. “तो” नव्हे, तर “ती” होती “मार्गरेट ॲन बर्कली”.

मूळ लेखक: डॉक्टर ना. सोमेश्वर 

अनुवाद: मंगल पटवर्धन 

(विश्ववाणी कन्नड पेपर)

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘जगण्यातली मजा वाढवण्याचे उपाय’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆3

१) जिथे राहता त्या कॉलनीत

 चार तरी कुटुंब जोडा,

 अहंकार जर असेल तर

 खरंच लवकर सोडा ।।

*

२) जाणं येणं वाढलं की

 आपोआप प्रेम वाढेल,

 गप्पांच्या मैफिलीत

 दुःखाचा विसर पडेल ।।

*

३) महिन्यातून एखाद्या दिवशी

 अंगत-पंगत केली पाहिजे,

 पक्वान्नाची गरजच नाही

 पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे ।।

*

४) ठेचा किंवा भुरका केल्यास

 बघायचंच काम नाही,

 मग बघा चार घास

 जास्तीचे जातात का नाही ।।

*

५) सुख असो दुःख असो

 एकमेकांकडे गेलं पाहिजे,

 सगळ्यांच चांगलं होऊ दे

 असं देवाला म्हटलं पाहिजे ।।

*

६) एखाद्या दिवशी सर्वांनी

 सिनेमा पहावा मिळून,

 रहात जावं सर्वांशी

 नेहमी हसून खेळून ।।

*

७) काही काही सणांना

 आवर्जून एकत्र यावं,

 बैठकीत सतरंजीवर

 गप्पा मारीत बसावं ।।

*

८) नवरा बायको दोन लेकरात

 “दिवाळ सण” असतो का?,

 काहीही खायला दिलं तरी

 माणूस मनातून हसतो का?

*

९) साबण आणि सुगंधी तेलात

 कधीच आनंद नसतो,

 चार पाहुणे आल्यावरच

 आकाश कंदील हासतो

*

१०) सुख वास्तूत कधीच नसतं

 माणसांची ये-जा पाहिजे,

 घराच्या उंबरठ्यालाही

 पायांचा स्पर्श पाहिजे ।।

*

११) दोन दिवसांसाठी का होईना

 जरूर एकत्र यावं,

 जुने दिवस आठवताना

 पुन्हा लहान व्हावं ।।

*

१२) वर्षातून एखादी दुसरी

 आवर्जून ट्रिप काढावी,

 “त्यांचं आमचं पटत नाही”

 ही ओळ खोडावी ।।

*

१३) आयुष्य खूप छोटं आहे

 लवकर लवकर भेटून घ्या

 काही धरा काही सोडा

 सगळे वाद मिटवून घ्या ||

 लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ विचारवंतांचे अंतर्मन – लेखक : श्री पुरुषोत्तम सदाफुले ☆ परिचय – सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ विचारवंतांचे अंतर्मन – लेखक : श्री पुरुषोत्तम सदाफुले ☆ परिचय – सुश्री वर्षा बालगोपाल ☆ 

पुस्तक : विचारवंतांचे अंतर्मन 

लेखक : श्री पुरुषोत्तम सदाफुले 

प्रकाशक : संवेदना प्रकाशन 

पृष्ठे १४३

मूल्य रु १८०/- मात्र 

विचारवंतांचे अंतर्मन नाव वाचले आणि उत्सुकता वाटून पुस्तक हातात घेतले आणि खुल जा सिमसिम असे म्हणताच या पुस्तकाच्या गुहेत वेगवेगळ्या विचारवंतांच्या विचारांचा खजिना हाती लागला.

अतिशय वेगळ्या विषयाचे हे पुस्तक मला वाटते अशा प्रकारचे हे एकमेव पुस्तक असावे.

पुस्तकाच्या शेवटी लेखक पुरुषोत्तम सदाफुले यांच्यावरील तीन लेखांचा समावेश आहे त्यावरून लेखकाचा विस्तृत परिचय घडतो आणि मग लक्षात येते, लेखक असंख्य व्यक्तींना पुरस्कृत करीत असतात. अशा प्रसंगांच्या माध्यमातून प्रमुख पाहुणे, अध्यक्ष यांच्या भाषणातून असंख्य मौलिक रत्ने लेखकाने वेचली आहेत आणि नुसती रत्ने वेचलीच नाहीत तर त्याला आपल्या शब्दांचे आपल्याही विचारांचे कोंदण देऊन ते अधिक आकर्षक केले आहे.

सर्वसाधारणपणे भाषणे कार्यक्रमात ऐकून तेथेच सोडून दिली जातात किंवा सभागृहाच्या बाहेर आल्यावर भाषणातील एकही शब्द आठवला जात नाही. परंतु लेखक हे स्वतः पण एक विचारवंत असल्याने अशा अनेक व्यक्तींच्या व्याख्यानातून या शब्दसागरावर आरूढ होऊन त्या लाटेच्या माध्यमातून विचारवंतांच्या काळजात शिरून तेथून ही मौलिक रत्ने गोळा करून या रत्नाचा सुंदर हार शारदामातेच्या गळ्यात घालताना असंख्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनेल अशा विचारांचे मंथन केले आहे.

अर्थातच मंथन म्हटले की उलट सुलट क्रिया होणार त्यातून नवनीत मिळणार किंवा रत्ने हाती लागणार हे सत्य आहे…… मग अशाच मंथनातून लेखकाला तब्बल ८० रत्ने हाती लागलेली आहेत. किंबहुना असंख्य रत्ने हाती लागलेली असताना त्यातील निवडक ८० रत्ने उजेडात आणली आहेत.

अर्थातच ८० आकड्यावरून सहस्रचंद्र दर्शन आठवले आणि खरोखर सहस्र चंद्राचे तेज एकत्र होईल एवढे प्रखर ज्ञान या मौलिक विचारांनी आपल्याला मिळते.

आपण जेवढे या पुस्तकाच्या अंतरंगात जाऊ तेवढे त्यातील वैशिष्टय त्याचे वेगळेपण आणि त्यातील मौलिकता मनाला भावते. हे पुस्तक वाचून हातावेगळे करावे असे नाही तर पुन्हा पुन्हा पारायण करून त्यातील एका एका विचारावर चिंतन करावे असे आहे. अर्थातच एका वाक्यात सांगायचे झाले तर छोटा पॅकेट बडा धमाका असे हे पुस्तक आहे.

अजून एक वेगळा विचार मनात आला, तो म्हणजे या पुस्तकाचा आकार चौकोनी आहे आणि मनात आले विचारवंतांच्या विचारांना एक चौकट प्राप्त करून द्यायचा हा प्रयत्न आहे.

खरेच आहे यातून ज्येष्ठ विचारवंतांचे विचार अधोरेखित तर होतातच पण त्याच विचाराच्या मथळ्यामधून त्याचे असामान्य असे महत्व पण उधृत होते.

गदीमांच्या विचारापासून सुरुवात होऊन उत्तम कांबळे यांच्या विचारसरणी पर्यंत ८० डब्यांची ही रेलगाडी असंख्य स्टेशने, असंख्य बौद्धिक खाऊ, असंख्य सौंदर्यस्थळें यांचे दर्शन घडवून आपला ज्ञानाचा प्रवास अतिशय आनंददायी, माहितीपूर्ण करते. कधीच संपू नये असे वाटणारा हा प्रवास मग शटल होऊन राहील अशी खात्री वाटते.

या पुस्तकाबद्दल लिहिताना दर खेपेला एक वेगळाच पैलू गवसतो. त्यामुळे नक्की कोणत्या पैलूवर व्यक्त व्हावे हा प्रश्न तसाच रहातो, म्हणून उत्तर स्वरूपात आपणच हे पुस्तक घेऊन वाचून बघावे आणि स्वतः अनुभवावे. या दिव्य रत्नाचे दर्शन स्वतः घेऊन खात्री करावी अशी आशा वाटते.

ते तुम्ही करालच ही खात्री पण वाटते.

तर मग… चला…

या विचारवंतांचे अंतर्मन जाणून घेऊ या…

परिचय : वर्षा बालगोपाल

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कादम्बरी # 82 – सिसकियाँ समझाएँगी… ☆ आचार्य भगवत दुबे ☆

आचार्य भगवत दुबे

(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर आचार्य भगवत दुबे जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया है।सीमित शब्दों में आपकी उपलब्धियों का उल्लेख अकल्पनीय है। आचार्य भगवत दुबे जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की विस्तृत जानकारी के लिए कृपया इस लिंक पर क्लिक करें 👉 ☆ हिन्दी साहित्य – आलेख – ☆ आचार्य भगवत दुबे – व्यक्तित्व और कृतित्व ☆. आप निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। हमारे विशेष अनुरोध पर आपने अपना साहित्य हमारे प्रबुद्ध पाठकों से साझा करना सहर्ष स्वीकार किया है। अब आप आचार्य जी की रचनाएँ प्रत्येक मंगलवार को आत्मसात कर सकेंगे।  आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – सिसकियाँ समझाएँगी।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – ☆ कादम्बरी # 82 – सिसकियाँ समझाएँगी… ☆ आचार्य भगवत दुबे ✍

इस बिदाई की व्यथा को सिसकियाँ समझाएँगी 

सबकी आँखों में घिरी ये बदलियाँ समझाएँगी

तुम, विरह की वेदना को, जानना चाहो अगर 

रेत पर व्याकुल तड़पती, मछलियाँ समझाएँगी

 *

काफिला होगा बहारों का, तुम्हारे साथ में 

तब तुम्हारी शोहरत को, तितलियाँ समझाएँगी

 *

हम सुमित्रों की दुआएँ, साथ में होंगी सदा 

महफिलों में गूंजती, स्वर लहरियाँ समझाएँगी

 *

अंजुमन में, चंद चेहरे याद आएँगे सदा 

चाहने वालों से खाली, कुर्सियाँ समझाएँगी

 *

जब भी वापस आओगे, पथ पर बिछे होंगे नयन 

राह तकती आपकी, ये खिड़कियाँ समझाएँगी

https://www.bhagwatdubey.com

© आचार्य भगवत दुबे

82, पी एन्ड टी कॉलोनी, जसूजा सिटी, पोस्ट गढ़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ मनोज साहित्य # 155 – मनोज के दोहे ☆ श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” ☆

श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं सजग अग्रज साहित्यकार श्री मनोज कुमार शुक्ल “मनोज” जी  के साप्ताहिक स्तम्भ  “मनोज साहित्य ” में आज प्रस्तुत है आपके “मनोज के दोहे। आप प्रत्येक मंगलवार को आपकी भावप्रवण रचनाएँ आत्मसात कर सकेंगे।

✍ मनोज साहित्य # 155 – सजल – एक-एक कर बिछुड़े अपने ☆

पानी जब हो कुनकुना, तभी नहाते रोज।

काँप रहा तन ठंड से, प्राण प्रिये दे भोज।।

धूप सुहानी लग रही, शरद शिशिर ऋतु मास।

बैठे कंबल ओढ़ कर, गरम चाय की आस।।

नर्म दूब में खेलतीं, रोज सुबह की बूँद।

सूरज की किरणें उन्हें, सिखा रहीं हैं कूँद।।

 *

ठिठुरन बढ़ती जा रही, ज्यों-ज्यों बढ़ती रात।

खुला हुआ आकाश चल, मिल-जुल करते बात।।

 *

सूरज की अठखेलियाँ, दिन में करे बवाल।

शीत लहर का आगमन, तन-मन है बेहाल।

©  मनोज कुमार शुक्ल “मनोज”

संपर्क – 58 आशीष दीप, उत्तर मिलोनीगंज जबलपुर (मध्य प्रदेश)- 482002

मो  94258 62550

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – चुप्पी ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)

? संजय दृष्टि – चुप्पी ? ?

वह अबाध

बह रहा है,

लहरों का कंपन

भीतर ही भीतर

साँस ले रहा है,

उसके प्रवाह को

बाधा मत पहुँचाना,

समुद्र की शांति होती है;

सच्चे आदमी की चुप्पी..!

?

© संजय भारद्वाज  

प्रात: 9:37 बजे, 26 नवम्बर 2021

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय, न्यू आर्ट्स, कॉमर्स एंड साइंस कॉलेज (स्वायत्त) अहमदनगर संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆ 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥  मार्गशीर्ष साधना 16 नवम्बर से 15 दिसम्बर तक चलेगी। साथ ही आत्म-परिष्कार एवं ध्यान-साधना भी चलेंगी💥

 🕉️ इस माह के संदर्भ में गीता में स्वयं भगवान ने कहा है, मासानां मार्गशीर्षो अहम्! अर्थात मासों में मैं मार्गशीर्ष हूँ। इस साधना के लिए मंत्र होगा-

ॐ नमो भगवते वासुदेवाय

  इस माह की शुक्ल पक्ष की एकादशी को गीता जयंती मनाई जाती है। मार्गशीर्ष पूर्णिमा को दत्त जयंती मनाई जाती है। 🕉️

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares