(पूर्वसूत्र- प्रवासाला जाण्यापूर्वी दादरच्या घराला कुलूप लावलं होतं त्याच दिवशी हे पत्र इथं येऊन पडलं होतं. म्हणजे साधारण आठवडा उलटून गेला होता.पण ते आमच्या हातात पडायला मात्र बराच उशीर झाला होता.कारण रिटन-टेस्टची तारीख आदल्या दिवशीची म्हणजेच शनिवारची होती आणि वेळ दुपारी ११ची. अर्थातच रिटन-टेस्टची तारीख उलटून गेली होती.हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला गेला होता!
मग कोंदट अंधाराने भरून गेलेलं असतानाच पुढचे तीन साडेतीन तास असे झंझावातासारखे आले की अपेक्षितपणे आकारलेल्या सकारात्मक घटनांनी त्या अंधारल्या मनात पुन्हा आशेची ज्योत पल्लवित केली..!)
युनियन बँकेकडून आलेलं ते रिटन टेस्टचं काॅल-लेटर टेस्टची तारीख उलटून गेल्यामुळे आता मुदत उलटून गेलेल्या चेकसारखं माझ्यासाठी कांहीही उपयोग नसलेला कागदाचा एक तुकडाच होतं फक्त.तेच काॅल लेटर वाचून विचारात पडलेले मेहुणे एखाद्या गूढ विचारात गढल्यासारखे स्वतःतच हरवलेले होते. दुसऱ्याच क्षणी काहीतरी गवसल्याच्या उत्साहात ते झपकन् पुढे आले. ते कॉल लेटर माझ्या हातात देऊन घाईघाईने त्यांनी चप्पल पायात सरकवल्या आणि तडक बाहेर पडले. मी कांहीशा गोंधळल्या अवस्थेत दाराकडे धाव घेतली.
“क..काय झालं? कुठे निघालात?” न रहावून मी विचारलं.
“येतो लगेच.आलोच.
तू थांब..” मागे वळूनही न बघता ते दिसेनासे झाले.
ते परत येईपर्यंतची पंधरा मिनिटं मला तिथंच गोठून गेल्यासारखी वाटत राहिली. सरता न सरणारी!
मला अपराध्यासारखं वाटू लागलं. खरंतर आम्ही घरी येताना वाटेतच ठरवल्यानुसार घरी सामान ठेवून,फ्रेश होऊन लगेच जेवायला बाहेर पडणार होतो. एक तर ते एवढ्या लांबच्या प्रवासातून दमून आलेले होते. त्यांना कडकडून भूकही लागलेली होती. असं असताना हे असं अचानक सगळं विचित्रच घडू लागलंय.कुठे गेलेयत हे?
पंधरा एक मिनिटांनी ते घाईघाईने परत आले.
“हे बघ आता जेवण राहू दे. जेवत बसलो तर फार उशीर होईल. मी प्रवासातच थोडी केळी घेतलेली आहेत.तुझ्या आईनं थोडे लाडूही दिलेत. दोघंही तेच घासभर खाऊन घेऊ न् लगेच बाहेर पडू. आपल्याला आत्ताच्या आत्ता ठाण्याला जायचंय?”
हे सगळं त्या क्षणी माझ्यासाठी अनपेक्षित आणि अनाकलनीयच होतं.
“आत्ता..?इतक्या रात्री..?”
“हो..”
“कशासाठी..?”
“जे करायचं ते फार वेळ न दवडता आजच्या आजच करायला हवं म्हणून.हे बघ,मी वरच्या मजल्यावरच्या गोगटे आजोबांच्या घरुन माझ्या ठाण्याच्या मावसबहिणीला फोन करायला गेलो होतो.मी बोललोय तिच्याशी. तिचा इंजिनीयर झालेला धाकटा दीर नुकताच टेक्निकल ऑफिसर म्हणून युनियन बँकेत लागल्याचं मी ऐकून होतो. ते सर्वजण एकत्रच रहातायत.मी ‘त्यांना मला तातडीनं भेटायचंय.महत्त्वाचं काम आहे.लगेच येऊ का?’असं फोनवर बहिणीला विचारलंय. ती ‘ये’ म्हणालीय. आपण आत्ता त्यांना भेटायला जातोय. त्यांच्या ओळखीनं काहीतरी मार्ग निघेल.”
त्यांचा आशावाद जबरदस्त होता. सगळं माझ्यासाठीच तर सुरू होतं. मी ‘नाही-नको’ म्हणायचा प्रश्नच नव्हता.पण तरीही….?
“तुम्ही प्रवासातून दमून आला आहात ना? उद्या सकाळी लवकर गेलो तर नाही का चालणार?”
“कदाचित उशीर होईल. ती ‘ये’ म्हणालीय तर आत्ताच जाऊ. चल. आवर लौकर..”
ठाण्याला जाऊन आम्ही त्यांच्या बहिणीच्या घराची बेल वाजवली तेव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते.मन आशा निराशेच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेत होतं. अनिश्चिततेच्या भावनेनं ते कातर झालेलं होतं.
“बराच उशीर झालाय पण अगदी नाईलाज म्हणून तुला त्रास द्यावा लागतोय बघ.”
मेहुणे त्यांच्या मावस बहिणीला.. म्हणजेच मिसेस साठेना म्हणाले.
“त्रास कसलाअरे? मी निरंजन भाऊजींना कल्पना देऊन ठेवलीय.त्यांना बोलावते. तू सांग त्यांना सगळं. तुमच्या गप्पा होईपर्यंत मी गरम काॅफी करते पटकन्.आलेच.”
इथे येताना माझ्या मनात असणारा संकोच या मनमोकळ्या स्वागतानं विरून गेला.
“नमस्कार..”
हसतमुखाने नमस्कार करीत निरंजन साठे आमच्यासमोर उभे होते. त्यांना पाहिलं आणि मन निश्चिंतच झालं एकदम. तो त्यांच्या प्रसन्न,देखण्या,रुबाबदार आणि मुख्य म्हणजे निगर्वी व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता की माझ्या मनाला मिळालेला अकल्पित संकेत होता कुणास ठाऊक पण मन निश्चिंत झालं होतं एवढं खरं.
मेहुण्यांनी नेमकी अडचण थोडक्यात सांगितली. मी सोबत आणलेलं कॉल-लेटर संदर्भासाठी त्यांच्या पुढे केलं. त्यांनी ते वाचलं. त्याची अलगद घडी घालून ते मला परत दिलं.
“एक काम करूया. उद्या सकाळी बरोबर दहा वाजता तू चर्नीरोडवरील युनियन बँकेच्या ‘मेहता-महाल’ मधल्या ऑफिसमधे ये. हे माझं कार्ड. लिफ्टने आठव्या मजल्यावर येऊन माझ्या केबिनमधे यायचं.आपण शेजारच्या ‘मेहता चेंबर्स’ बिल्डिंगमधे ग्राउंड फ्लोअरलाच बॅंकेचं रिक्रुटमेंट सेल आहे तिथे जाऊ.तिथेच ही सगळी रिक्रूटमेंट प्रोसेस सुरू आहे. डाॅ.विष्णू कर्डक तिथले सुपरिंटेंडंट आहेत. दोन महिन्यांपूर्वीच माझा इंटरव्यूही त्यांनीच घेतला होता. त्यामुळे ते बहुधा मला ओळखतील. आपण त्यांना भेटून सांगू सगळं.बघू काय होतं ते.एन.आय.बी.एम.च्या सहकार्याने बँकेतर्फे आठएक दिवसांचे रेक्रूटमेंट प्रोसेस सुरू आहे हे मी ऐकून होतो. तुझी रिटन टेस्ट हा त्याचाच एक भाग असणार आहे. टेस्ट-प्रोग्रॅम शनिवारी संपला असेल तर मात्र प्रॉब्लेम येईल.एरवी काहीतरी मार्ग निघू शकेल”
निरंजन साठे यांनी सर्व परिस्थिती नेमक्या शब्दात समजून सांगितली.आशेचा एक अंधूक किरण दिसू लागला. आम्हाला इथे यायची बुद्धी झाली, प्रयत्नांची दिशा का होईना पण नेमकी सापडली हा दिलासा असला तरी अनिश्चितताही होतीच.
कॉफी घेऊन त्यांचे आभार मानून आम्ही बाहेर पडलो तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली होती!
☆ बोलायचे राहून गेले – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(वंदना घरी आली तरी सरांच्या बोलण्याचा विचार करत राहिली. मिताला कुठे बिझी ठेवावे? तिला कसली आवड नाही पण अश्विनपासून तिला लांब ठेवावेच लागेल.) इथून पुढे —
पुन्हा सर तिच्या मदतीला धावून आले. चार दिवसानंतर ते तिला म्हणाले “वंदना, तुझी बहीण B. Sc आहे ना?”
“हो सर “.
“मग माझ्या डिपार्टमेंटमधील गोगटे मॅडम प्रेग्नन्सी लीव्हवर जात आहेत एक तारीखपासून.त्या जागेवर डेमॉन्स्ट्रेटर म्हणून मिता जर काम करायला तयार असेल तर प्रोफेसर शास्त्रींना मी सांगतो,”.
“पण सर मिताला अनुभव नाही हो, तिला जमेल प्रॅक्टिकल घयायला ? “
“का नाही जमणार? आणि मी असतो ना तेथे. सुरवातीला तिला थोडं अवघड वाटेल, पण पंधरा दिवसात ती तयार होईल “
“ बरं सर.. मी विचारते.. आणि कळविते “ असं म्हणत वंदना क्लासवर गेली.
वंदनाने रात्री आईसमोर मिताला कॉलेजमधील जॉबबद्दल विचारले. हल्ली मिता ताईबरोबर बोलत नव्हती, त्यामुळे तिने तिला उडवून लावले पण जेव्हा तिला कळले की जोगळेकरसरांच्या हाताखाली काम करायचे आहे, तेव्हा ती तयार झाली.
मग वंदनाने मिताच्या नावाचा अर्ज तयार केला आणि प्रोफेसर शास्त्रींकडे नेऊन दिला. शास्त्रीसरांनी एक तारखेपासून प्रोफेसर जोगळेकरना मदत करायला सांगितले आणि अशा रीतीने मिताला तात्पुरता का असेना पहिला जॉब मिळाला.
एक तारखेला वंदना आपल्या गाडीवरून मिताला घेऊन गेली आणि तिची जोगळेकर सरांशी गाठ घालून दिली. सर समोर येताच तिने “थँक्स “ म्हंटले. सरांनी पण हसून मिताचे स्वागत केले.
“आता मिताला थोडे दिवस दाखवावे लागेल पण थोडया दिवसांनी ती स्वतः मुलांचे प्रॅक्टिकल घेईल “
“हो ना सर, तुम्ही असताना तिची काळजी नाही, तुम्ही तिला तयार कराल “.
मिताला नवीन वर्गावर सोडून सर आणि ती कॅन्टीन मध्ये गेली. वंदनाला वाटत होतं, सरांशी काही तरी बोलाव, पण सर समोर असले की तिची बोलती बंद होई.
“त्याची काळजी करू नकोस वंदना, एकदा काम सुरु झालं की सर्व विसरेल, हें वय वेड असतं. ‘”
वंदनाच्या मनात आले, ‘ किती समजूतदार आहेत सर, आता आपल्यापुढे आहेत तर सांगावे का मनातले? किती दिवस मनातच राहिल्या आहेत भावना.’
सरांना मिटिंग होती त्यामुळे ते चहा पिऊन गेले. वंदनाला परत कविता आठवली
“रोज तुला मी येथे भेटते, बोलायाचे राहून जाते…. “
मिता पहिल्या दिवसापासून खूष होती. आता रोज ती आईला कॉलेजमधील मुलांच्या गमती आणि जोगळेकरसरांचे कौतुक सांगत राहिली. वंदनाचे बारीक लक्ष होतं, मिता आता व्यवस्थित प्रॅक्टिकल घेत होती, एकंदरीत ती कॉलेजमध्ये रमली होती. हेच तर वंदनाला हवं होतं. वडील गेल्यानंतर मिताची जबाबदारी तिने घेतली होती, पण मिता अवखळ होती, म्हणून तिची नाव व्यवस्थित पैलतीराला लावायला हवी होती .
तिने कॉलेज मध्ये पाहिलं, जोगळेकर सर आणि मिता कॅन्टीनमध्ये थट्टामस्करी करत असत. तिला स्वतः ला सरांची थट्टा कधीच जमली नव्हती.
एकदा ती उशिरा घरी आली तर तिची आई म्हणाली “आज तुमचे जोगळेकरसर येऊन गेले.”
वंदनाला आश्यर्य वाटलं, “सर कसे काय घरी?” तिने आईला विचारले. तर ती म्हणाली “अग मिता दोन दिवस कॉलेजमध्ये गेली नव्हती ना, म्हणून पहायला आले.” तिला कमाल वाटली सरांची. तसे सर कॉलेज मध्ये माझ्याकडे चौकशी करू शकले असते ना?
वर्ष संपत आले, कॉलेजमध्ये परीक्षा सुरु होत्या. आता एप्रिलअखेर मिताचा जॉब संपणार होता. मिता पण नर्व्हस झाली होती, आता दुसरीकडे कुठे जॉब असेल तर.. वंदनाने तिच्या नोकरीसाठी कुठे कुठे सांगून ठेवलं होतं. एका गोष्टीचं वंदनाला समाधान होतं, मिताने अश्विनचा नाद पूर्ण सोडला होता,कारण अश्विन नवीन मुलीबरोबर दिसत होता.
एप्रिल अखेर एक दिवस सरांचा फोन आला “वंदना, महत्वाचे बोलायचं होतं, उद्या सायंकाळी त्या हॉटेलमध्ये भेटशील का?”
वंदनाच्या शरीरावर मोरपीस फिरवल्यासारखे झालं. तिने ओळखले सर काय बोलणार आहेत ते? खरं तर तिलाच सरांना विचारायचं होतं पण,”बोलायचे राहून जाते ‘असे तिचे होत होते. ‘काही हरकत नाही, आपल्या संस्कृतीत पुरुषच पुढाकार घेतो,’ तिच्या मनात येत होतं, आपलं लग्न होण्याआधी मिताला जॉब मिळायला हवा, मग ती आणि आई राहतील, मग मिताचे लग्न.. मग आई एक महिना माझ्याकडे एक महिना मिताकडे .’ ..
पुरी रात्र वंदनाला झोप आली नाही, या कुशीवरून त्या कुशीवर ती तळमळत राहिली. सर काय बोलतील.. मग आपण लाजायचं.. मग हळूच हो म्हणायचं.. तिचं स्वप्नरंजन रात्रभर सुरु होतं.
तिला शोभणारे कपडे नेसून, हलकासा मेकअप करून हसरा चेहेरा ठेऊन ती सायंकाळी हॉटेलमध्ये गेली. सर वेळेवर आलेच. त्यानी दोन कप कॉफीची ऑर्डर दिलीं आणि ते बोलू लागले…..
“वंदना, माझे आईवडील आले आहेत. या वर्षी कोणत्याही परिस्थितीत माझे दोनाचे चार हात होताना त्यांना पहायचे आहे ‘
वंदनाच्या मनात आले केवढी ही सरांची प्रस्तावना, त्याची काही गरज आहे का? सरळ सांगायचे, तू मला आवडतेस म्हणून.
सर बोलत होते,” माझे वय एकतीस वर्षे आहे, त्यामुळे आता लग्न करणे आवश्यकच आहे. तू मागे म्हणाली होतीस, सर माझ्यामागे घट्ट उभे राहा, मी तुला जमेल तसे सल्ले दिले, तुला ते पटले असतील.
मिताला तिच्या प्रेमातून आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यात आपण यशस्वी झालो. पण मी तिच्या आठ महिन्याच्या सहवासाने तिच्यात अडकलो. वंदना, मला आणि मिताला लग्न करायचे आहे, पण तुझी आणि आईची परवानगी हवी.” … वंदनाला वाटले, जग आपल्याभोवती फिरत आहे. तिच्या कानात सरांचे उदगार घुमत राहिले “मला आणि मिताला लग्न करायचे आहे.. मला आणि मिताला लग्न करायचे आहे… मला आणि मिताला लग्न करायचे आहे….. “
वंदना सटपटली. तिच्या घशाला कोरड पडली. आपल्या डोक्यात कुणी लोखंडाचे घण मारीत आहे, असे तिला वाटले. तिचा विचित्र चेहेरा पाहून सर म्हणाले “काही होतंय का वंदना.. तुला मितासाठी मी पसंत नसेल तर तसे सांग..”
वंदना सावरली,”तसे नाही सर, तुम्हाला पसंत न करणारे म्हणजे…. “
तिला पुढे बोलवेना, डोळयांतून अश्रूचा पूर धडका मारत होता, तिने स्वतः ला सावरले आणि ती म्हणाली
“माझी पसंती आहेच सर पण आईला विचारते “ असं म्हणून ती बाहेर पडली.
वंदना कशी घरी आली, गाडी कशी चालवली.. तिच्या काही लक्षात नव्हते. तिने घरात प्रवेश केला मात्र, आई हसतहसत बाहेर आली “अग, तुला मिताची काळजी वाटायची ना, बघ तिने व्यवस्थित स्थळ पटकवले, अग जोगळेकरसरांनी तिला मागणी घातली, आहेस कुठे?”
वंदनाने पण काही माहित नसल्यासारखे सोंग केले “आई, तुला कुणी सांगितलं?”
“ अग मिता सांगते आहे, शनिवारी त्याचे आईबाबा भेटायला यायचे आहेत.”
शाळेत एखादी मुलगी गणवेश न घालता रंगीत कपडे ( तो नवीनच असेल असे नाही ) घालून आली की तिचा वाढदिवस आहे, हे कळायचं..शाळेत स्टेजवरून तिचं नाव पुकारलं जायचं.तिला शुभेच्छा दिल्या जायच्या नि आम्ही पोरी ” एक दोन तीन…एक दोन तीन..एक — दोन — तीन ” अशा शिस्तबद्ध टाळ्या वाजवायचो…
” आपणही टाळ्या वाजवाव्यात की तसच उभं रहावं ” या संभ्रमात ती वाढदिवसाळु उत्सवमूर्ती तोंडावर कसनुसे भाव घेऊन कानकोंड्या अवस्थेत उभी राहिलेली असायची!!
घरची जरा बरी परिस्थिती असली तर शाळेत लिमलेटच्या गोळ्या नाहीतर रावळगाव चॉकलेट वाटलंं जाई…. अन् त्यादिवशी “ती वाटणारी मुलगी” राणीच्या थाटात वावरत असे आणि तिला मदत करणारी तिची मैत्रीण तिच्या दासीच्या..कारण तिला एक गोळी जास्तीची मिळायची!!
ती गोळी किंवा चॉकलेट खिशातून जपून घरी नेलं जाई नि आम्ही तीन भावंडे त्याचे चिमणीच्या दाताने तुकडे करून पुढचा तासभर ते चघळून चघळून खात असू..
आयुष्यातील आनंद नि त्याचा कालावधी वाढवण्याची सोपी युक्ती आम्हाला त्या गोळीनं
आम्हाला शिकवली..!!
एके दिवशी एका मैत्रिणीने साधारण बटाटेवड्याच्या आकाराचा बसाप्पाचा शिक्का असलेला पेढा वर्गातल्या प्रत्येकाला वाढदिवसानिमित्त दिला…आम्हाला आश्चर्याने चक्कर यायचीच राहिली होती..!!
जेमतेम एखादी गोळी वाटणं सुद्धा परवडणं -नं- परवडण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आम्हा पोरींना प्रत्येकी एक एवढा मोठा पेढा हा फार मोठा सांस्कृतिक धक्काच होता..
” तिचे वडील मोठे डॉक्टर आहेत..तिला न परवडायला काय झालं ?” या घरातल्या शेरेबाजीनं…
” आपण एकतर डॉक्टर व्हायचं आणि अगदीच नाही जमलं तर किमानपक्षी डॉक्टरशी लग्न तरी करायचं ..आणि होणा-या पोरांच्या वाढदिवसाला शाळेत पेढे वाटायचे ” हा निश्चय मात्रं त्या नकळत्या वयात मनानं केला!
वाढदिवस जवळ आला की दोन विषय मनात पिंगा घालू लागायचे….. नवीन कपडा मिळणं नि मैत्रिणींना वाढदिवसासाठी घरी बोलावणं…
तीन मुलांची जबाबदारी असलेल्या आमच्या माऊलीनं घरखर्चातून थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवलेले असायचे..त्यातून पुढची किमान तीन वर्षे अंगाला येईल एवढा घळघळीत कपडा शिवला जायचा..नि वर्षभरातील सा-या सणवारांना, लग्नकार्यांना तो पुरवून पुरवून वापरला जायचा..!!
एखादे वर्षी घरात कुणाचं तरी आजारपण निघायचं नि साठवलेले सारे पैसे घरच्या डब्यातून डॉक्टरच्या गल्ल्यात जमा व्हायचे… त्यावर्षी आईची त्यातल्या त्यात नवी साडी फ्रॉक नाहीतर मॅक्सीचं रूप घेऊन वाढदिवसाला आम्हाला सजवायची…!!
” आई, वाढदिवसाला मैत्रिणींना बोलवूया नं गं ” ही आईच्या मागची भुणभुण काही मैत्रिणींच्या प्रेमापोटी नसायची.. तर असायची मैत्रिणींकडून भेटवस्तू मिळाव्यात म्हणून…!!
बरं त्यावेळच्या भेटवस्तू तरी काय असायच्या..
एखादी एक रुपयाची वही, पंचवीस पैशाची पेन्सिल, दहा पैशाचं खोडरबर, पंचवीस पैशाचं ” सोनेरी केसांची राजकन्या ” वगैरे पातळ कागदाचं गोष्टीचं पुस्तक, पन्नास पैशांचं कानातलं..देणा-याची आर्थिक परिस्थिती बरी असेल तर दीड-दोन रुपयांचं फाऊंटन पेन…
यातल्या ब-याच वस्तू स्वस्त पडतात म्हणून वर्षाच्या सुरुवातीलाच घाऊक आणून ठेवलेल्या..
कानातलं असंच कुणीतरी दिलेलं पण न आवडलेलं…
गोष्टीचं पुस्तक घरातल्या सगळ्या मुलांनी वाचलेलं…त्याचा आता नाहीतरी काय उपयोग म्हणून त्याचं रुपांतर भेटवस्तुत झालेलं…
बरं ..या वस्तू देताना त्याला गिफ्ट पॅकिंग वगैरे प्रकार नाही… त्यांच्या नैसर्गिक स्वरुपातच अवतरलेल्या… पण तरीही त्यांचं खूप आकर्षण असायचं… तेवढंही न मिळण्याचा तो काळ होता…
म्हणून तर पावडरचा डबा, टी-कोस्टर्स, कंपासपेटी असल्या महागड्या गिफ्ट्स देणाऱ्या एका मैत्रिणीला वर्गातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला बोलावलं जायचं…!!
भडंग, पातळ पोह्याचा चिवडा, कांदेपोहे , उप्पीट, एखादा लाडू नाहीतर डालड्यातला शिरा…यातल्या दोन पदार्थांवर वाढदिवस साजरा व्हायचा..!
मैत्रिणींकडून मिळालेली वह्या, पुस्तकं, पेन्सिली, कानातली वगैरे अख्ख्या दुनियेतल्या खजिन्याचा आनंद देऊन जायची…. हा खजिना कुशीत घेऊन निद्रादेवीच्या सोबत घडणारी स्वप्नांची सैर अद्भुत आनंद बहाल करायची…!!
…. ते दिवस कसे भुर्रकन् उडून गेले ते कळलच नाही…फुलपाखरीच होते ते..!!
आई -वडिलांचेही दिवस पालटले होते..केल्या कष्टांचं चीज झालं होतं..चार पैसे गाठीशी जमले होते..
भाऊ , बहीण मोठे झाले..कमावते झाले..
” तुला वाढदिवसाला फक्त काय पाहिजे ते सांग…”
जे पाहिजे ते मिळू लागलं होतं…पैसा आड येतच नव्हता…
पण लहानपणाची भेटवस्तूंची ओढ मात्र कुठेतरी आटली होती…. वाढदिवसाचं महत्त्व, लहानपणी वाटणारं कौतुक तारुण्याच्या रेट्यात कुठंतरी हरवून गेलं होतं..
लग्न झालं नि चित्रपटातल्या नायक-नायिकांच्या वाढदिवसाच्या भुताने झपाटलं..
वाढदिवसाला ” अलगदपणे गळ्यात हि-याचा नाजुकसा नेकलेस घालणारा ” किंवा ” वाढदिवसाला अचानक विमानात बसवून स्वित्झर्लंडला नेणारा ” किंवा ” शे-दोनशे लोकांना भव्य घराच्या भव्य हॉलमधे बोलावून पत्नीच्या वाढदिवसाची सरप्राईज पार्टी करणारा ” नायक आणि त्याने पत्नीला दिलेल्या भेटवस्तू प्रमाण होऊ लागल्या…
…… नि ” अगं हे सगळं तुझच आहे..तुला पाहिजे ते घेऊन ये ” असं म्हणून कर्तव्याला प्राधान्य देत कामाला निघून जाणारा नवरा …त्या नायकापुढे अगदीच फिका पडू लागला..
प्रत्यक्षातलं आयुष्य हे चित्रपटापेक्षा फार वेगळं असल्याचा धडा या वाढदिवसाच्या भेटवस्तुंनी शिकवला …नि स्वत:च्या वाढदिवसाची खरेदी स्वत:च करायची सवय लागली…
लेकीच्या बालपणाबरोबर मात्र बालपणाने पुन्हा आयुष्यात प्रवेश केला…
तिचा थाटाने साजरा केलेला पहिला वाढदिवस…
ती छान दिसावी म्हणून तिला टोचत असतानाही तिला घातलेले महागडे ड्रेस,
स्वत:च्या लेकरांच्या वाढदिवसांना फारशी हौस न पुरवू शकलेल्या आजी-आजोबांनी दिलेल्या सोन्या-चांदीच्या भेटवस्तू , काका, मामा, मावशी, आत्यांनी दिलेल्या गिफ्ट्स, निमंत्रितांकडून आलेले आहेराचे ढीग….
” सगळं तुझं तर आहे, तुला हवं ते तू जाऊन आण ” असं म्हणणा-या नव-याने स्वत: जाऊन लेकीसाठी आणलेल्या भेटवस्तू….. या सा-यांनी आयुष्यातल्या रिकाम्या जागा भरून काढल्या…
तिच्या वाढदिवसाला शाळेत वाटलेल्या भेटवस्तू, अगदी पेढेसुद्धा…
तिला पाहिजे तसे घेतलेले कपडे, दागिने, वस्तू..
तिच्या मित्र-मैत्रिणींना बोलावून साजरे केलेले वाढदिवस…
आणि दोस्त कंपनीकडून मिळालेल्या गिफ्ट्सनी सुखावलेली नि त्यांना कुशीत घेऊन स्वप्नांच्या राज्यात माझ्यासारखीच सैर करणारी माझी छकुली…!!
शिंप्याकडच्या कपड्यांची जागा ब्रॅंडेड वस्तुंनी घेतली… चिवडा-लाडुच्या जागी इडली, पावभाजी, पिझ्झा-बर्गर आला.
…. पण वाढदिवस नि भेटवस्तुंच्या बाबतीतल्या भावना मात्रं तिच्या नि माझ्या अगदी तशाच होत्या…तरल..हळव्या..!!
दरम्यानच्या काळात आई-वडील, सासुसासरे यांचे साठावे, पंच्याहत्तरावे वाढदिवस साजरे करून त्यांच्या अख्ख्या आयुष्यात कधीही साज-या न केलेल्या वाढदिवसांचं उट्टं काढण्याचा नि त्यांना मोठाल्या भेटवस्तू देऊन त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा केविलवाणा प्रयत्न केला…
पण त्यांनी दिलेल्या “रिटर्न गिफ्टने ” अक्षरश: चपराक मिळाली नि आमच्याऐवजी त्यांनीच आमच्या सा-या वाढदिवसांचं उट्टं भरून काढलं!!
काळ फार वेगाने सरला..
वाढदिवसाला भरभरून आशीर्वाद देणारे अनेक हात काळाचं बोट पकडून दूरवर निघून गेले…
” हॅं…वाढदिवस घरी कसला साजरा करायचा !! ” या वयाला लेक पोचलीय…
आता बहीण -भाऊ, दीर -नणंद यांच्या मुलांच्या मुलांचे म्हणजे नातवंडांचे वाढदिवस साजरे होतायत..
मी आजी म्हणून त्यांना उदंड आशीर्वाद देतेय…
” थीम पार्टीज, डेकोरेशन, चकाकणारे भव्य हॉल, “खाता किती खाशील एका तोंडाने ” अशी अवस्था करून टाकणारी विविध क्युझिन्स…
मुलांचा आनंद नव्हे तर स्वत:ची प्रतिष्ठा दाखवण्यासाठी दिलेल्या नि घेतलेल्या भेटवस्तू….
मुलाचे नि आईचे वाढदिवसासाठी घेतलेले हजारोंच्या किंमतीतील ब्रॅंडेड कपडे..
या झगमगाटात मला मात्रं दिसते ती माझी माऊली..वर्षभर पैसे साठवून लेकरांचा वाढदिवस साजरा करणारी….. रात्रभर जागून मुलांच्या वाढदिवसासाठी बेसन भाजणारी…
नि आपल्या लेकराच्या आनंदासाठी भेटवस्तू म्हणून स्वत:कडच्या चारच साड्यातील एक साडी फाडून कपडे शिवणारी.. त्यागाची मूर्ती…!!
आता माझीही पन्नाशी सरलीय…
वाढदिवस येतात नि जातात..
भेटवस्तुंचं आकर्षण कधीचच विरलय … आहेत त्याच वस्तू अंगावर येतात..
पण तरीही वाढदिवसाची ओढ मात्रं आजही वाटते…
…. कारण त्यानिमित्तांने कितीतरी जीवलगांचे , सुहृदांचे फोन येतात.. शुभेच्छा मिळतात..
आणि आपण आयुष्यात केवढी माणसं कमावली याची सुखद जाणीव होते…!!
आपण अंबांनींपेक्षाही श्रीमंत असल्याची भावना मनाला शेवरीपेक्षा तरल करून टाकते…
दिवसाच्या शेवटाला या शुभेच्छारूपी भेटवस्तुंना कुशीत घेऊन मी समाधानाने पुढच्या वाढदिवसाची वाट पहात झोपी जाते…!!
लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले
सोलापूर
प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ व्याकरणाच्या रुक्षतेतील काव्य :: यास्मिन शेख – लेखक : श्री मुकुंद संगोराम ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
यास्मिन शेख:
व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख वयाच्या शंभरीत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या सुहृदांचा एक मेळावा येत्या २१ जून रोजी पुण्यात आयोजित केला आहे.
भाषेवर प्रेम असणारे कुणीही व्याकरण या शब्दाभोवती असलेले नियमांचे जंजाळ सोडवण्याच्या फंदात पडत नाही. वयाच्या शंभीरत पदार्पण करत असलेल्या यास्मिन शेख यांच्यासाठी मात्र व्याकरण एखाद्या कवितेइतकं तरल असतं. गेली ७५ वर्षे व्याकरण हाच ध्यास असलेल्या यास्मिनबाईंना अजूनही या कवितेचा सोस आहे आणि तो त्या अगदी मनापासून लुटत असतात. नावामुळे झालेल्या घोटाळ्यांवर मात करत मातृभाषेवरील आपलं प्रेम अध्यापनाच्या क्षेत्रात राहून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यातच धन्यता मानणाऱ्या यास्मिन शेख यांची कहाणी म्हणूनच इतरांहून वेगळी. मूळ नाव जेरुशा. वडील जॉन रोबेन. आई कोकणातली पेणची – पेणकर. म्हणजे जन्माने यहुदी (ज्यू). जन्मगाव नाशिक. वडील पशुवैद्या. सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी; त्यामुळे सतत बदली. घरात पुस्तकांचा पेटारा भरलेला असायचा. सरकारी नोकरीत असल्यानं बदलीच्या प्रत्येक ठिकाणी प्रशस्त घरं. तिथं पुस्तक वाचनाचा लागलेला छंद, आजतागायत टिकून राहिला, याचं खरं कारण त्यांचं भाषेवरलं प्रेम.
वडिलांकडे हट्ट करून पुण्याच्या स. प. महाविद्यालयात बहिणीबरोबर प्रवेश मिळणं हा यास्मिनबाईंसाठी मैलाचा दगड होता. श्री. म. माटे यांच्यासारख्या प्राध्यापकाने त्यांच्यासाठी व्याकरणाचा मार्ग इतका सुकर केला की, व्याकरणाशीच त्यांची गट्टी जमली. इतकी की, बी.ए. ला संपूर्ण महाविद्यालयात सर्वाधिक गुण मिळवण्याचा मान मिळाला. के. ना. वाटवे यांच्यासारख्या गुरूनं भाषाशास्त्राचे धडे दिले आणि आपल्या मातृभाषेच्या व्याकरणाच्या त्या प्रेमात पडल्या. पुढे मुंबईत अध्यापनाला सुरुवात झाल्यावर खरा गोंधळ सुरू झाला, तो नावावरून. दरम्यान नाशिकलाच अझीझ अहमद इब्राहीम शेख यांच्याशी विवाह झाला आणि यास्मिन शेख हे नाव धारण केलं. ज्यू आणि मुस्लीम असा हा आंतरधर्मीय विवाह. पण यास्मिनबाईंशी गप्पा मारताना, या धार्मिकतेचा लवलेशही जाणवत नाही. लहानपणापासून ह. ना. आपटे वाचतच मोठे झाल्याने भाषेचे सगळे संस्कार अस्सल मऱ्हाटी. मुंबईत दरवर्षी महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी वर्गाच्या दिशेने येताना दिसताच दोन-तीन विद्यार्थी वर्गाबाहेर यायचे आणि म्हणायचे… धिस इज नॉट अॅन इंग्लिश क्लास, धिस इज लॉट अ फ्रेंच क्लास… हा मराठीचाच वर्ग आहे ना? असं विचारत जेव्हा त्या वर्गात शिरत, तेव्हा विद्यार्थी चकित होत. मुसलमान बाई शिकवायला येणार म्हणून साशंक झालेले विद्यार्थी शिकवायला सुरुवात करताच एकमेकांकडे आश्चर्यानं बघायचे. यास्मिनबाईंना त्यांचा राग यायचा नाही, पण दु:ख वाटायचं. भाषेला धर्म नसतो. तुम्ही ज्या राष्ट्रात जन्माला येता, वाढता, त्या राष्ट्राची भाषा तुमचीही मातृभाषा असते. त्या म्हणतात : मी एकच धर्म मानते – मानवता… सर्वधर्मसमभाव.
यास्मिनबाई म्हणतात की, कोणतीही भाषा मुळात ध्वनिरूप असते. त्याहीपूर्वी हातवाऱ्यांच्या साह्याने एकमेकांशी संवाद साधला जात असे. ध्वनिरूपातूनच बोली तयार होते आणि बोली तर विरून जाणारी. ती टिकवण्यासाठी लिपीचा जन्म. शब्द, त्यांची रूपं, त्यातून तयार होणारी वाक्यं, त्यांची रचना, यातून एक नियमबद्धता येत गेली. मराठी भाषेत तर ब्रिटिश येईपर्यंत व्याकरणाचा सुस्पष्ट विचार झालेलाच नव्हता. त्या काळातील संस्कृतज्ज्ञ दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना ब्रिटिशांनी मराठी व्याकरणाचं सुसूत्रीकरण करण्याची सूचना केली खरी, पण त्यांचा आदर्श होता, संस्कृत वैय्याकरणी पाणिनी. तर्खडकरांनी संस्कृत वर्णमाला जशीच्या तशी स्वीकारली. त्यामुळे मराठीत ज्याचे उच्चारही होऊ शकत नाहीत, असे वर्ण लिपीत आले. ती केवळ चिन्हंच राहिली. प्रमाण भाषा ही एक संकल्पना आहे. प्रमाण भाषेबद्दल विनाकारण उलटसुलट मतप्रवाह तयार झालेले दिसतात. यास्मिन शेख यांच्या मते औपचारिक, वैज्ञानिक, वैचारिक लेखनासाठी प्रमाण भाषा उपयोगात आणणं आवश्यक आहे. हे लेखन पुढील पिढ्यांसाठी टिकवून ठेवायचे असेल, तर त्यासाठी प्रमाण भाषेचा आग्रह सर्वांनीच धरायला हवा. पण मी जसं बोलतो, तसंच लिहिणार, असा हट्ट चुकीचाच आहे. कथा, कादंबरी यांसारख्या ललित लेखनासाठी प्रमाण भाषेचा आग्रह धरता कामा नये. बोली भाषेचे लिखित स्वरूप धारण करून असे लेखन केले जाते. त्यात त्या भाषेच्या, त्या भाषक समूहाच्या, तेथील व्यक्तींच्या भावभावनांचा उद्गार असतो. त्यामुळे प्रमाण भाषेमध्ये केवळ मराठी शब्दांचाच आग्रह धरायला हवा. इंग्रजी शब्दांचा सोस सोडून आपल्या भाषेतील शब्दांचा उपयोग करण्यावर भर दिला, तरच ती भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाईल.
१९६० साली महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संदर्भात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती म्हणजेच मराठी साहित्य महामंडळ. मराठी लेखनात एकसूत्रीपणा यावा, शासकीय लेखन व्यवहारात मराठीचा अचूक वापर व्हावा, यासाठी या समितीला मराठी लेखनविषयक नियम नव्याने निश्चित करण्याचं काम सोपवण्यात आलं. अशा १४ नियमांची यादी १९६२ मध्ये शासनाने स्वीकारली. १९७२ मध्ये त्यात आणखी चार नियमांची भर घालून नवे नियम सिद्ध केले. या नियमांचे स्पष्टीकरण देणारे पुस्तक यास्मिन शेख यांनी सरोजिनी वैद्या यांच्या सांगण्यावरून तयार केले. त्याबरोबरच ‘मराठी शब्दलेखनकोश’ सिद्ध केला. मुद्दा प्रमाण भाषेचा आणि त्याच्या वापराचा आहे. आणि सध्याची भाषेची अवस्था भयानक म्हणावी अशी असल्याचं यास्मिनबाईंचं स्पष्ट मत आहे. इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत मराठी शाळा ओस पडू लागल्याची खंत व्यक्त करतानाच यास्मिन शेख यांना या परिस्थितीला आपण सारे कारणीभूत आहोत, असं वाटतं. मराठी माणसंच मराठी भाषेची, लिहिताना आणि बोलतानाही दुर्दशा करतात. माहात्म्य ऐवजी ‘महात्म्य’, दुरवस्था ऐवजी ‘दुरावस्था’, घेऊन ऐवजी ‘घेवून’ असं लिहितात. ‘माझी मदत कर’, असं म्हणतात. दूरचित्रवाणीवरील मराठी वाहिन्यांवरचा मराठीचा वापर तर अगणित चुकांनी भरलेला असतो. इंग्रजी भाषेतून जे शब्द मराठीनं स्वीकारले आहेत, त्याला विरोध असण्याचं कारण नाही. मात्र मराठी शब्द उपलब्ध असतानाही इंग्रजीचा अतिरिक्त वापर करणं योग्य नाही… आज जे कुणी ‘मराठी असे आमुची मायबोली’, असा घोष करत असतील, त्यांच्यापर्यंत ही कळकळ पोहोचणं अधिक महत्त्वाचं आणि उपयुक्त आहे.
वयाच्या शंभरीत प्रवेश करतानाही स्मरणशक्ती टवटवीत असलेल्या आणि अजूनही नवं काही करण्याच्या उत्साहात असलेल्या यास्मिन शेख यांनी अनेक विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाची गोडी लावली. ‘बाई, तुम्ही व्याकरण, भाषाशास्त्र आमच्या तळहातावर आणून ठेवलंत’… असं म्हणत यास्मिन शेख यांचे आभार मानणारा विद्यार्थीवर्ग हे त्यांच्या जगण्याचं फलित आणि संचित. शंभराव्या वर्षातही स्वत:च्या हातानं कागदावर लेखन करण्यात त्यांना कमालीचा आनंद मिळतो, जगण्याचं नवं बळ मिळतं. व्याकरणाची कविता करत करत शतायुषी होणाऱ्या यास्मिनबाईंना मनापासून शुभेच्छा !
लेखक : मुकुंद संगोराम
प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
☆ BE PRACTICAL! – लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆
“चिटी चावल ले चली,
बीच में मिल गई दाल।
कहे कबीर दो ना मिले,
इक ले , इक डाल॥”
अर्थात :
मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, ‘क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होतीस , आता वरणाचीही सोय झाली.’ पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.
तेव्हा कबीर म्हणाले, ‘वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.’
तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान डाळीने हिरावून घेतलं.
माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधान क्षणात हिरावून घेतात.
साधं मोबाईलचं उदाहरण घ्या ना! एखादी व्यक्ती बचत करुन कसाबसा आवडीचा मोबाईल घेते, नि आठवडाभरातच त्याचं लेटेस्ट मॉडेल बाजारात येतं आणि त्याने घेतलेल्या मोबाईलचा आनंद, एका आठवड्यातच संपुष्टात येतो. तो मनाशी म्हणतो, ‘इतके दिवस थांबलो होतोच, आणखी आठवडाभर थांबलो असतो, तर काय बिघडलं असतं!’
विकल्प माणसाच्या डोक्यात बिघाड निर्माण करतात. हे मर्म लक्षात घेऊन शोषण,शासन व्यवस्था विकल्पांची लयलूट करतात.
ती बघून, ‘घेशील किती दोन करांनी’ अशी माणसाची अवस्था होते. त्याचं डोकं काम करेनासं होतं. अशी माणसं शोषण,शासन व्यवस्थांसाठी हाकायला खूप सोपी पडतात.
पूर्वी आजोबा-पणजोबांच्या काळातल्या वस्तूही, पुढील पिढ्या आनंदाने वापरत. त्यांना त्या जुन्या वाटत नसत. कारण तेव्हा इतके विकल्प नव्हते. (आणि ऐपतही नव्हती.)
आज असंख्य विकल्पांनी, वस्तूंचा जुन्या होण्याचा कालावधीच क्षणिक करुन टाकला आहे. परिणामी लोक चांगल्या वस्तूही भंगारात टाकू लागले आहेत.
भौतिक वस्तूंचा हा नियम मानवी नातेसंबंधांनाही लागू झाला आहे, कारण माणूसही भौतिकच आहे. नातं, मैत्री यांची नाळही, कधी नव्हे इतकी कमजोर झाली आहे.
देवाने माणसाला दोन हात दिलेत, ते दोन्ही हातांनी गोळा करावे म्हणून नाहीत, तर एका हाताने घ्यावं आणि दुस-या हाताने द्यावं, यासाठी आहेत. नुसतंच घेत राहिल्याने एकूणच असमतोल निर्माण होतो. मानवी जीवनातील अरिष्टास तो कारणीभूत ठरतो.
म्हणून देवघेव सुरु राहिली पाहिजे. देवघेवीमुळे समतोल तर टिकून राहतोच, माणसाचं समाधान आणि आनंदही त्यामुळे टिकाऊ बनतो.
कबीरांच्या या दोह्यात असा मोठा अर्थ दडला आहे.
चला तर मग आनंदी जगूया.
लेखक :अज्ञात
प्रस्तुती :सौ. शशी नाडकर्णी- नाईक
फोन नं. 8425933533
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा “रात का चौकीदार” महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत है आपके “चार दोहे…” ।)
(संस्कारधानी के सुप्रसिद्ध एवं अग्रज साहित्यकार श्री जय प्रकाश श्रीवास्तव जी के गीत, नवगीत एवं अनुगीत अपनी मौलिकता के लिए सुप्रसिद्ध हैं। आप प्रत्येक बुधवार को साप्ताहिक स्तम्भ “जय प्रकाश के नवगीत ” के अंतर्गत नवगीत आत्मसात कर सकते हैं। आज प्रस्तुत है आपका एक भावप्रवण एवं विचारणीय नवगीत “लिखने की ढो मत लाचारी…” ।)
जय प्रकाश के नवगीत # 59 ☆ लिखने की ढो मत लाचारी… ☆ श्री जय प्रकाश श्रीवास्तव ☆
(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही गंभीर लेखन। शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं। हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं।)
संजय दृष्टि – लघुकथा – शाश्वत
– क्या चल रहा है इन दिनों?
– कुछ ख़ास नहीं। हाँ पिछले सप्ताह तुम्हारी ‘अतीत के चित्र’ पुस्तक पढ़़ी।
– कैसी लगी?
– बहुत अच्छी। तुमने अपने बचपन से बुढ़ापे तक की घटनाएँ ऐसे लिखी हैं जैसे सामने कोई फिल्म चल रही हो।….अच्छा एक बात बताओ, इसमें हमारे प्रेम पर कुछ क्यों नहीं लिखा?
– प्रेम तो शाश्वत है। प्रेम का देहकाल व्यतीत होता है पर प्रेम कभी अतीत नहीं होता। बस इसलिए न लिखा गया, न लिखा जाएगा कभी।
अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार ☆सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय, एस.एन.डी.टी. महिला विश्वविद्यालय ☆संपादक– हम लोग ☆पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆ ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स ☆
आषाढ़ मास साधना ज्येष्ठ पूर्णिमा तदनुसार 21 जून से आरम्भ होकर गुरु पूर्णिमा तदनुसार 21 जुलाई तक चलेगी
इस साधना में – ॐ नमो भगवते वासुदेवाय। मंत्र का जप करना है। साधना के अंतिम सप्ताह में गुरुमंत्र भी जोड़ेंगे
ध्यानसाधना एवं आत्म-परिष्कार साधना भी साथ चलेंगी
अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं।
≈ संपादक – हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈