मराठी साहित्य – विविधा ☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – २ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – २ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सोशल मीडिया विषयी बोलताना आपण फक्त जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात वापरले जाणारे दुसरे माध्यम म्हणजे फेसबुक या विषयी बघू.

आज पहाटे मला एक रिल मुलाने पाठवले.हा एक लोकप्रिय होत असलेला नवीन प्रकार काही सेकंदात आपले म्हणणे दुसऱ्यांच्या गळी उतरवणे कधी विनोद,कधी सावध करणे हे याचे काम.तर या रिल मध्ये एक नवीन फसवणुकीचा प्रकार सांगितला आहे.आपल्याला फेसबुक वर Look who died in an accident असा मेसेज येतो.त्यात एक लिंक येते.त्यावर क्लिक केले की आपले log in चे डिटेल्स विचारतात.ते दिले की आपण out आणि विचारणारा in होतो.आणि आपल्यालाच मोठा अपघात होतो.आपले बँक खाते रिकामे होते.थोडा तपास केला असता दुर्दैवाने यात फसलेले लोक सापडले.

अजून एक उदाहरण मी बघितले.एकीने घरातील लग्न सोहळ्याचे सतत रोज होणारे कार्यक्रम फेसबुक वर टाकले.अगदी फोटो सहित.येणारे लाइक्स बघून खुश झाली.घरी बसल्या बसल्या सर्वांना सगळे कार्यक्रम फोटो,व्हिडिओ याच्या माध्यमातून दाखवू शकली.आणि या वयात मी किती जगा बरोबर आहे ( हम भी कुछ कम नही ) हे ऐटीत दाखवू शकली.मग त्यात सगळेच फोटो,विधी अगदी कव्हर केले.लग्न छान झाले.लग्नात एक आकर्षक पाकीट आले.त्यात हरखून सोडणारे गिफ्ट सगळ्या फॅमिली साठी चार दिवसाची ट्रीप मिळाली अगदी तिकिटे सुद्धा मिळाली. मंडळी खूप आनंदली.लगबगीने तयारी करून निघाली.आणि या मॅडमचे फेसबुक वर अपडेट सुरू झाले.प्रवासाचे फोटो येऊ लागले.सगळे डिटेल्स आम्हाला कळू लागले.मोठ्या आनंदात घरी आले.बघतात तर घर पूर्ण रिकामे.आंघोळीची बादली सुद्धा घरात राहिली नव्हती.हे घरातील फेसबुक वर केलेले प्रसारण किती महागात पडले?

अशा फसवणूका पण मोठ्या प्रमाणावर चालू आहेत.यात चोरांना आपणच माहिती पुरवतो.ते फक्त त्यांची थोडी हुशारी वापरतात आणि आपल्याला अद्दल घडवतात.

एक घटना तर मन बधीर करणारी समजली.एका घरात राहणारी चार माणसे.घरातील वयस्कर आजोबा वारले.मुलाने ही बातमी सगळी कडे टाकली अर्थातच सोशल मीडिया वर. सांत्वन करण्यासाठी भरभरून संदेश आले.पण प्रत्यक्ष एकही माणूस फिरकला नाही.शेवटी ८/१० तास उलटून गेल्यानंतर इमारती समोर भाजी विकणारा भाजीवाला त्याचे मित्र घेऊन मदतीला आला.

काही मंडळी तर अशी आहेत की घरात आणलेले/ केलेले किंवा आत्ता जे खायचे ते  पदार्थ देवाला नैवेद्य दाखवावा त्या प्रमाणे मोठ्या निष्ठेने फेसबुक वर पोस्ट केल्या शिवाय खात नाहीत.

मला तर हा प्रश्न पडतो आपणच आपले आयुष्य इतके सार्वजनिक ( जुन्या काळातील भाषेत सांगायचे तर चव्हाट्यावर मांडणे ) का करतो?

या काही घटना व सध्या फेसबुकवर जे सगळे बघायला मिळते ते बघून मन सुन्न होते.आणि वाटते समोरा समोर माणसांशी न बोलणारे आपण कुठे चाललो आहोत?कुठे पोहोचणार आहोत?आणि नवीन पिढीला कोणते संस्कार देणार आहोत?

हे सगळ्या घटनांनी माझ्या मनात अनेक तरंग उमटले.तरंग कसले वादळच उठले.आणि वाटले आपल्याच मंडळींना थोडे सावध करावे.नाहीतरी विष हे प्रत्येकाने थोडेच अनुभवायचे असते? त्या वरचे लेबल किंवा कोणी सांगितले तर आपण विश्वास ठेवून त्या पासून दूर जातोच की.तसेच लेबल दाखवण्याचा मी थोडा प्रयत्न केला.

माझी अगदी मनापासून विनंती आहे.ही सगळी साधने जगाची माहिती मिळवणे.परदेशातील आपल्या व्यक्तींशी संपर्क साधणे.चांगले विचार,चांगले कार्य यांचा प्रसार करणे.अशा कारणांसाठी करावा.माझी आजी कायम म्हणायची आपण आपलं जपावं आणि यश द्यावं घ्यावं हे अगदी पटते.

एक गाणे आठवते सावधान होई वेड्या सावधान होई आणि हीच सर्वांना विनंती आहे.

धन्यवाद

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘‘फिलोमेला‘…’ ☆ सुश्री निर्मोही फडके ☆

सुश्री निर्मोही फडके

(आजची कथा सुश्री निर्मोही फडके यांची आहे. त्या लेखिका, व्याख्यात्या, संपादिका आणि भाषेच्या अभ्यासक आहेत.)

? जीवनरंग ❤️

☆ ‘‘फिलोमेला‘…’ ☆ सुश्री निर्मोही फडके

पुस्तक : गुंफियेला शेला – कथा 3 : फिलोमेला – सुश्री निर्मोही फडके

जीव मुठीत घेऊन ती वेगानं धावत होती, खाचखळग्यांतून, काट्याकुट्यांतून, दगडपाण्यातून. अचानक तिला पंख फुटले आणि तिनं एका पायानं जमिनीला जोर देत दुसरा पाय दुमडून आपले हात पंखांना समांतर करत हवेत उंच भरारी घेतली.

‘ऊड फिलोमेला, ऊड, मिळालेल्या संधीचं सोनं कर,’ तिचं मन तिला आदेश देत होतं. अफाट आकाशात वारा अंगावर घेत उडताना तिला वाटत होतं, खूप जोरात ओरडून जगाला सांगावं, ‘मी फिलोमेला, राजकुमारी फिलोमेला, मी स्वतंत्र झालेय.’ 

हं, पण ओरडणार कशी? वाचा गमावली होती तिनं, त्या नराधमानं केलेल्या अत्याचारात.

फिलोमेलाच्या अलौकिक लावण्यावर, कोमल मनावर अनन्वित अत्याचार करून तिला मुकी, असहाय करून अज्ञातवासात बंदिवान करणारा तो, तिच्या सख्ख्या बहिणीचाच नवरा, राजा टेरिअस. 

‘ऊड राजकुमारी फिलोमेला, दूर जा इथून… पंख होती तो उड आती रे… मिळालेत तुला पंख,मूव्हींचं वेड असणारी निशा अगदी भान हरपून मूव्ही बघत होती. ग्रीक पुराणातली एक शापित सौंदर्यवती, तिच्या कथेवरचा मूव्ही, ‘फिलोमेला –  द नाइटिंगेल’. 

थिएटरमध्येच हा भव्य मूव्ही पाहायचा असं निशानं ठरवलंच होतं नि ती एकटीच मूव्ही पाहायला आली.

‘वाह् काय मस्त जमलाय मूव्ही, स्टोरीच दमदार. मेहुण्याकडून अत्याचार सहन करणारी फिलोमेला, हातमागावर चित्र विणून, मोठ्या शिताफीनं बहिणीला त्यातून संदेश पाठवून सुटका करून घेते. जीभ छाटल्या गेलेल्या फिलोमालाचं न गाणा-या नाइटिंगेलमध्ये झालेलं रूपांतर, वाह्, सो सिम्बाॅलिक. स्क्रीन प्ले, डायरेक्शन, अॅक्टिंग, सिनेमाटोग्राफी, ग्राफिक्…परफेक्ट, या वर्षीची दोन ऑस्कर नक्की, लिहायला पाहिजेच या मूव्हीबद्दल.’ 

निशामधला चित्रपट-आस्वादक एकेक मुद्दे मनात नोंदवण्यात गर्क असताना तिला जाणवलं, थिएटरमधल्या अंधारात आपल्या शेजारच्या सीटवरचे दोन डोळे पल्याला न्याहाळतायत नि एक हात पुढे सरकतोय.

‘फिलोमेला… फिलोमेला…’ ती मनाशी पुटपुटली.

अंगाशी सलगी करू धजावणारा तो हात तिनं कचकन पिरगळला तशी अंधारात एक अस्फुट पुरुषी आवाजातली किंकाळी उमटली नि विरली. फिल्मच्या क्लायमॅक्सच्या गोंधळात कुणालाच काही कळलं नाही.  

निशानं आपल्या आर्टिकलचं शीर्षक मनात पक्कं केलं, 
‘अजूनही लढतेय आधुनिक फिलोमेला’.

चित्रपट संपल्यावर पडद्यावर अक्षरं उमटली,

…A New Beginning.

❤ ❤ ❤ ❤ ❤

टीप – कथा वाचून आणि चित्र पाहून वाचकांना जर त्या चित्रावर आधारित नवीन कथा, कविता, लेख वगैरे सुचलं, तर त्यांनी ई-अभिव्यक्ती आणि सुश्री सोनाली लोहार यांच्याशी संपर्क साधावा.

चित्र साभार – फेसबुक पेज

©️ सुश्री निर्मोही फडके

मो. 9920146711

ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अल्बम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ अल्बम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

दरवर्षी चार जुलैला वाढदिवस असतो माझा आणि दरवेळी मागचे किती वाढदिवस कसे झाले, ते डोळ्यासमोर येऊन जातात! जणू फोटोच्या अल्बमची पाने मी उलटत होते! पन्नास वर्षांपूर्वी फोटो काढणे हे तितकेसे कॉमन नव्हते. कॅमेराच मुळी नवीन होता तेव्हा! साधारण ६०/६५ वर्षांपूर्वी आमच्या घरी कॅमेरा होता, अर्थात ही माझ्यासाठी ऐकीव गोष्ट! माझ्या वडिलांना फोटोग्राफीची आवड होती. फोटो काढणे, ते स्वतः डेव्हलप करणे हे ते शिकले होते, त्यामुळे आमच्याकडे खूप जुने फोटो अजूनही बघायला मिळतात! स्वातंत्र्यापूर्वी वडिलांचे कुटुंब कराची ला होते, तेथील त्यांच्या घराचे, कराची शहरातील फोटो अजूनही आमच्या अल्बम मध्ये आहेत.

अगदी पूर्वीच्या कॅमेरात आठ फोटो निघत असत. नंतर छोटे छोटे सोळा आणि 24 फोटो निघणारे रोल आले. कॅमेरा मध्ये जसजशा सुधारणा होऊ लागल्या तस तसे अधिक चांगले आणि जास्त फोटो मिळू लागले.आणि खर्च ही कमी येऊ लागला. फोटोंचा अल्बम ही लोकांच्या आवडीची गोष्ट बनू लागली. घरातील लग्न,मुंजी, बारसे किंवा कोणताही कार्यक्रम असला की फोटो काढून त्यांचा अल्बम बनवला जाऊ लागला. आमचे दादा मग प्रत्येक अल्बम ला नाव देत. “गोड स्मृती” नावाचा पहिला अल्बम अजूनही माझ्या माहेरी आहे. तिथे गेले की मी कौतुकाने ते जुने फोटो बघू शकते आणि त्यामुळे मनाला खूप आनंद मिळतो. अल्बम मधील काही व्यक्ती आता काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या तरी आपल्याला फोटो बघून ते जुने दिवस आणि माणसे यांचे स्मरण होते! आता तर काय मोबाईल मुळे फोटो काढणे खूपच सोपे झाले आहे, पण प्रिंटेड फोटो अल्बम ची शान मला वेगळीच वाटते!

स्वतःच्या आयुष्याचा हा अल्बम उघडताना माझ्याही डोळ्यासमोर माझ्या छोट्या छोट्या छबी दिसू लागल्या. आईच्या कडेवर बसलेली मी, तर कधी रडत असलेली, नुकतीच पावले टाकू लागलेली मी, मला फोटोतून दिसली. नवीनच पंजाबी ड्रेस घालून शाळेला जायच्या तयारीत असलेली चार-पाच वर्षाची ऋजू ही एका फोटोत दिसली. दोन वेण्या वर बांधलेल्या आणि काळ्या रंगाचे पांढरे खडी असलेले परकर पोलके घालून वडिलांबरोबर समुद्रावर फिरायला गेलेली मी, मला फोटोत दिसली. त्यानंतर स्कर्ट ब्लाउज घालून शाळेत जाणारी मी मला जाणवून देत होती की,’ तू आता मोठी झालीस!’ नकळत 1964 साल उजाडले आणि मी दहा वर्षाची झाले!

शाळेत असताना  माझ्या वाढदिवसाला आई माझ्या मैत्रिणींना घरी फराळाला बोलवत असे. आणि मग छोटासा मनोरंजनाचा कार्यक्रम ही होत असे. त्यात चिठ्ठ्या टाकून उचलायला सांगितले जाई आणि चिठ्ठीत असेल त्याप्रमाणे गाणे, नाच, नक्कल किंवा खेळ करून दाखवावे लागत असे. तेव्हा खायच्या पदार्थात पावभाजी, केक नसे पण घरी केलेले दडपे पोहे, चिवडा, लाडू यासारखे पदार्थ असत. मग आमची पार्टी मजेत होत असे. असे वाढदिवस साजरे करता करता अल्बम मध्ये मॅट्रिकच्या वर्षीचा ग्रुप फोटो आला आणि त्यामुळे आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो याची जाणीव झाली.

कॉलेजची वर्षे सुरू झाली आणि घरचा वाढदिवस बंद होऊन बाहेर हॉटेलात वाढदिवस साजरा होऊ लागला. फोटोसेशन होऊ लागले. मित्र मैत्रिणींबरोबर वाढदिवस मजेत साजरे होऊ लागले. छान छान गिफ्टची देवाणघेवाण होऊ लागली आणि हा अल्बम विस्तारत गेला.

अजूनही कधी ते फोटो बघते तेव्हा पुन्हा एकदा मनावर आठवणींचे मोरपीस फिरते! बघता बघता किती वाढदिवस साजरे झाले ,परंतु खरी मजा आणि प्रेम मिळाले ते लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला! सरप्राईज म्हणून मिळणारी साडी किंवा दागिना वाढदिवसाला शोभा आणू लागला. मग नवऱ्याबरोबर केक कापतानाचा फोटो अल्बम मध्ये आला. मुलांच्या जन्मानंतर आपल्यापेक्षा मुलांचे वाढदिवस साजरे करत असलेले फोटो अल्बम मध्ये दिसू लागले. ते चौकोनी कुटुंब असे आमचे फोटो आता अल्बम खुलवू लागले!

मध्यंतरीच्या काळात मुलांनी आमचे वाढदिवस साजरे केले.’ आई, तुझ्या वाढदिवसाला मी तुला सरप्राईज गिफ्ट देणार आहे’. म्हणत मुले त्यांनी साठवलेल्या पैशातून माझ्यासाठी आठवणीने छोटी मोठी वस्तू आणू लागली आणि माझा ऊर आनंदाने आणखीनच भरून  येई! अरेच्या! किती मोठे झालो आपण! असे म्हणतच अल्बम मधल्या फोटो भर पडत होती!

आता काय साठी उलटली! मुलांची लग्न कार्ये झाली. सून, जावई, नातवंडे यांच्या आगमनाने वाढदिवस पुन्हा एकदा जोरात साजरे होऊ लागले! फॅमिली ग्रुप फोटोंची अल्बम मध्ये भर पडली. छोटी नातवंडे अंगा खांद्यावर विसाऊ लागली. काळ्या केसांमध्ये रुपेरी चांदीची भर पडली. वय जाणवायला लागले. वाढदिवसाला आणलेला गजरा माळण्याइतके ‘ केस नाही गं उरले’ असं लेकीला म्हटलं तरी,’ आई तुला मोगरीचा गजरा आवडतो ना, म्हणून मी मुद्दाम आणलाय ‘ असं म्हटलं की त्या छोट्याशा केसांवर तो घालावाच लागे. असे वाढदिवस साजरे करता करता हळूहळू साठी उलटली. सांधे कुरकुरायला लागले. आता काही नको तर वाढदिवस असे वाटू लागले. इतकी वर्षे काढलेले फोटो अल्बम मध्ये बघताना आपल्या मधला फरक जाणवू लागला!

कुठे ती लहान ऋजू, नंतर लग्नानंतरची उज्वला आणि आता तर उज्वला आजी! अल्बम मधील सरकती वर्षे बघता बघता मी रंगून गेले! फोटो मुळेच ही किमया झाली आहे. खरंच, मन:चक्षुपुढे येणाऱ्या छोट्या मोठ्या व्यक्ती आपण वर्णन करून सांगू नाही शकत! पण फोटो मुळे मात्र व्यक्ती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहते ,ही तर आहे फोटो अल्बम ची किमया!

आता दरवर्षी चार जुलैला वाढदिवस येतो. मुलांच्या सोबत साजरा करताना केक कापला जातो. फोटो काढून होतात. पुन्हा एका नवीन वर्षात पदार्पण केले म्हणून! आठवणींच्या अल्बम मध्ये आणखी एका फोटोची भर! अशाच आनंदात वाढदिवस साजरा करत राहायचंय, जोपर्यंत भिंतीवरच्या फोटोमध्ये आपण जाऊन बसत नाही तोपर्यंत….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘एक कोयता गँग – अशीही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ एक कोयता गँग – अशीही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

बंड्या काळे त्याच्या मित्राकडे – क्राईम रिपोर्टर रजत सरदेसाईकडे आला होता. रजतच्या टेबलावर त्याने लिहिलेल्या एका लेखाचा मसूदा पडला होता – शीर्षक होतं – “आणखी एक कोयता गँग !”.

 “आता ही कुठली बाबा कोयता गँग ? पुणे परिसरातील वेगवेगळ्या कोयता गँगबद्दल तू स्वत:च तर गेले सहा महिने लिहीत आहेस की.” 

“बंडोपंत, हा लेख हातात कोयते घेऊन वार करणाऱ्या गुंडांबद्दल नाहीये. हा लेख सिकल सेल ॲनिमिया या रोगाबद्दल आहे – थॅलेसेमियाबद्दल. सिकल म्हणजे कोयता. जशी कोयता गँग धोकादायक आहे तसेच हा रोगही तसाच आणि तितकाच धोकादायक आहे हे सांगण्यासाठीचा हा प्रपंच.” रजत निरगाठ उकल तंत्राने समजावून सांगत होता.

 “ॲनिमिया ? पण तो तर रक्तातील हिमो का काहीतरी कमी झाल्याने होतो ना ?”

“हिमोग्लोबिन.”

 “हां, तेच ते.”

 “पण मग त्याचा कोयत्याशी काय संबंध ?” बंड्या पूर्णपणे out of depth होता.

 “तुला हिमोग्लोबिन म्हणजे काय ते ठाऊक आहे का ? रेड ब्लड सेल्स ?”

 बंड्याचा चेहरा कोराच आहे हे पाहून रजतने समजावण्यास सुरुवात केली. — “रक्तात रेड ब्लड सेल्स असतात. यांचा नॉर्मल आकार मेदुवड्यासारखा असतो. त्यात हिमोग्लोबिन प्रोटीन असतात. ही प्रोटीन्स फुफ्फुसांमधून आलेला ऑक्सिजन शरीरात सर्वत्र पोचवतात आणि तयार झालेला कार्बन डाय ऑक्साईड गोळा करून फुफ्फुसांपर्यंत पोचवतात.”

बंड्याला फारसा काही अर्थबोध झालेला दिसत नव्हते. 

“थोडक्यात सांगायचं तर हिमोग्लोबिनशिवाय ना प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन मिळेल, ना प्रत्येक अवयवातून कार्बन डाय ऑक्साईड गोळा केला जाईल.”

 “पण मग यात कोयता कुठे आला ?” बंड्याचा हैराण प्रश्न.

“काही अनुवांशिक बदलांमुळे या मेदुवड्यासारख्या असणाऱ्या रेड ब्लड सेल्स कोयत्यासारख्या (sickle) किंवा चंद्रकोरीसारख्या (crescent moon) होतात. त्यांचे ऑक्सिजन व कार्बन डाय ऑक्साईड वहनाचे काम ते करू शकत नाहीत, शिवाय टोकेरी आकारामुळे रक्तवाहिन्यांना इजा होते ती वेगळीच. ऑक्सिजन न मिळाल्याने अशा पेशंटसना धाप लागते, गुदमरल्यासारखं होतं, सतत अशक्तपणा राहू शकतो.”

 “अरे बाप रे, असं लफडं आहे होय ?” लेखाची पानं चाळता चाळता बंडू म्हणाला. “पण हा रोग होतो कशाने ? चौरस आहार न घेतल्याने, अस्वच्छतेमुळे का संसर्गाने ?”  

 “नाही. यापैकी कशानेच हा रोग होत नाही. हा रोग आई वडिलांतील अनुवंशीय (genetic) बदलांमुळे होतो. ज्यांना थॅलेसेमिया झाला आहे अथवा जे थॅलेसेमियाचे वाहक (carrier) आहेत अशा आईवडिलांच्या मुलांना थॅलेसेमिया होण्याची शक्यता खूप जास्त असते. सिंधी, लोहाणा आणि पंजाबी समाजांमध्ये थॅलेसेमियाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लग्नापूर्वी कुंडली, पत्रिका जुळवून बघण्यापेक्षा आपण थॅलेसेमियाच्या दृष्टीने कोणत्या गटात – थॅलेसेमिया मुक्त, वाहक का रोगी – कोणत्या गटात मोडतो ते तपासून बघण्याचा आग्रह धरला गेला पाहिजे. आपण थॅलेसेमियाचे रोगी वा वाहक असलो तर दुसऱ्या थॅलेसेमिया रोगी वा वाहकाशी लग्नच करू नये अथवा केलेच तर मुलं होण्याचा चान्स न घेतलेलाच बरा.  डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग हे गोंड समाजामध्ये कार्यरत आहेत. या समाजात ‘एक देव’, ‘दोन देव’ अशा उपजाती आहेत आणि वर वधू दोघंही एकाच उपजातीचे असलेले त्यांना चालत नाही. या समाजातही थॅलेसेमियाचे प्रमाण जास्त आहे. म्हणून मग डॉ. बंग यांनी त्यांच्या धार्मिक भावनांचा आधार घेत त्यांना सांगितलं, की आता समाजात आणखी एक नवी उप-जात आली आहे – सिकल देव. ही उप-जात रक्त तपासणीतून ओळखता येते, आणि नवरा बायको दोघेही ‘सिकल देव’ उप-जातीचे असले तर तेही चालत नाही.”

 “व्वा ! त्या बिचाऱ्यांना हे वाहक, रोगी प्रकरण कळणार नाही. पण त्यांच्या धार्मिक श्रद्धांना जोडल्याने हे काम सोप्पं होऊन गेलं,” बंड्याला हे पटलं…..  “पण मग या रोगावर उपाय काय ? हा रोग कशाने बरा होतो ?” 

 “आजच्या घडीला तरी हा रोग पूर्णपणे बरा कधीच होत नाही. Prevention is better than cure हे इथं अगदी चपखलपणे लागू पडतं. बाळ आईच्या गर्भात असताना नाळ किंवा गर्भजलाची तपासणी करून बाळाला थॅलेसेमिया आहे का नाही हे सुनिश्चित करता येते. दुर्दैवाने जर बाळाला थॅलेसेमिया झालाच तर या रोगाच्या तीव्रतेनुसार विविध उपाययोजना करता येतात. चौरस आहार व व्हिटॅमिन यांनी पेशंटची प्रकृती चांगली रहाण्यास मदत होते. नियमितपणे हात धुणे, संसर्ग टाळणे यानेही पेशंटची आजारी पडण्याची वारंवारिता frequency कमी करता येते. अनेकदा गरजेनुसार महिन्यातून एकदा पेशंटला चांगले रक्त देणे – blood transfusion – हा उपाय प्रामुख्याने केला जातो. पूर्वी रक्तदात्याच्या आरोग्याबद्दल ठोस माहिती नसायची. व दात्याकडून मिळालेल्या रक्तामुळे कावीळ, HIV असे रोग पेशंटला होण्याची भीती असायची. पण आता मिळणाऱ्या रक्ताची सखोल परीक्षा होते, व हे रक्त निर्धोक आहे याची खात्री पटल्यानंतरच ते पेशंटला दिले जाते, त्यामुळे हा धोका आता मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तसेच, रक्त स्वीकारतानाच्या सुया व अन्य वैद्यकीय अवजारे आता one time use असतात किंवा व्यवस्थित निर्जंतुक केली असतात, त्यामुळे त्यातून अन्य संसर्गाचे वा रोगाचे संक्रमण होण्याची शक्यता आता खूप कमी झाली आहे. (करोना काळात मात्र या पेशंटना रक्त मिळवण्यास खूप अडचणी आल्या.)

 सारखे रक्त स्वीकारल्याने पेशंटच्या रक्तातील लोहाचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढू शकते. त्यामुळे हे प्रमाण कमी करणारी औषधे पेशंटला घ्यावी लागतात. सुदृढ बाळाच्या नाळेतील पेशी वापरणे (stem cell therapy), bone marrow transplant असेही उपचार केले जातात. आयुर्वेद, होमिओपथी यांच्याही काही औषध पद्धती आहेत, परंतु आजच्या घडीला तरी, या जनुकीय आजारावर (genetic disease) १००% खात्रीलायक, १००% परिणामकारक उपाय नाही. 

 पाच दहा वर्षांपूर्वी, या रोगाची प्राणघातकता खूप भयावह होती. आजच्या घडीला हा इतका जीवघेणा रोग नाही, परंतु पेशंटला जपावे खूप लागते. जसं कोयता गँग बाबतीत वेळीच आणि नियमित सावधगिरी घेणं गरजेचं आहे, तसंच या रोगाचं आहे, आणि म्हणूनच या अशा सिकल सेल ॲनेमियाच्या कोयता गँगपासून सावध राहिलं पाहिजे,” रजतने सांगितले आणि तो समेवर आला. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घडी मोडणे… ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ घडी मोडणे… ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले 

पूर्वी नवी साडी घेतली की बायका कोणाला तरी घडी मोडायला द्यायच्या…. 

किती प्रेमळ रिवाज होता ना तो.. आतासारखी वारंवार साड्यांची खरेदी नसायची तेव्हा..वर्षाला एखाद – दोन साड्यांपर्यंतच मध्यमवर्गीयांची पण  मजल असायची…. त्याच त्याच साड्या नेसाव्या लागत..पण तरीही आपली नवी कोरी साडी, नणंदेला, जावेला, शेजारणीला घडी मोडायला द्यायला, मन मोठंच असावं लागत असेल.. 

नात्यागोत्यातली एखादी गरीब बाई पण घडी मोडायला चालायची… त्यानिमित्ताने तिच्या अंगाला कोरं कापड लागायचं…. तिला कानकोंडं वाटू नाही म्हणून, ” तुम्ही नेसल्या की मला पटपट नव्या साड्या मिळतात “.. असंही वरून म्हणायचं..आणि गरिबीनं पिचलेल्या त्या माऊलीला तिचा पायगुण चांगला असल्याचा आनंद बहाल करायचा…..

  …… आर्थिक श्रीमंती असो-नसो, पण मनांच्या श्रीमंतीचा तो काळ होता हे मात्र नक्कीच खरं …… 

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – शह – काटशह…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– शह – काटशह…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

राजकारणाचे  झाड,

सत्तेची झुलणारी फांदी !

भिरभिरणारी पाखरे,

बसून होती आनंदी !

 

आज या फांदीवर,

उद्या दुसऱ्या फांदीवर !

शह कटशह देत,

सत्तेचे चाले स्वयंवर !

 

कोणी न येथे नसे,

मित्र वा शत्रू कायम !

अचूक वेळ येई पर्यंत,

पाळतात सारे संयम !

 

कोण कोणाला नसे,

इथे स्पृश्य अस्पृश्य !

पापणी मिटताच,

पलटते पडद्यावर दृश्य !

 

विचारधारेचे घालतात लोणच,

डावपेचांनी घाले फोडणी !

त्यांच्या ताटाची करी चिंता,

कार्यकर्ते ठरतात अडाणी !

 

कार्यकर्ता भिडतो,

हातात मिरवीत झेंडे !

चामडीच नेत्यांची कडक,

शरमतात पाहुन गेंडे !

 

करेक्ट कार्यक्रम चाले,

कोण किती असो मोठा !

समीकरण जुळवत सारे,

शोधतात सत्तेच्या वाटा !

 

तुमच्या आमच्या पिंडावर,

पोसलेले सारेच  कावळे !

टोच मारण्यास तत्पर,

पंचवार्षिक श्राद्धाचे सोहळे !

 

पाच  वर्षात मतदार,

होतो एक दिवसाचा राजा !

पोकळ आश्वासनांचा,

नेते वाजवती रोज बँडबाजा !

 

खाण्याचे दात अन् दाखवण्याचे,

दात असतात वेगळे !

एका पेक्षा एक नग निघती सारे,

एकाच माळेचे मणी सगळे!

 

लोकशाहीचे  कुरण,

चरण्यात सारे वळू होती दंग !

भूक संपता संपत नाही,

सतेचे  उधळीत सारे  रंग !

 

वेश्या जाणे कोणा समीप,

कोणाला लोटावे ते दुर !

मरे आत्मा,भूत सारी,

सत्तेसाठी बडवती उर !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “वयात येताना” – लेखिका – सौ. अर्चना मुळे ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “वयात येताना” – लेखिका – सौ. अर्चना मुळे ☆ परिचय – सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆ 

पुस्तकाचे नाव.. वयात येताना

लेखिका.. सौ. अर्चना मुळे

पहिल्या उकळीचा कडक चहा, मोगऱ्या ची कळी नुकतीच उमलताना त्याचा येणारा सुगंध.. तप्त धरेवर पडणाऱ्या पहिल्या पावसाच्या सरी नंतर येणारा मृद्गंध.. ह्या सगळ्या पहिल्या गोष्टींची मजा, चव काही निराळीच असते.. तसचं ह्या वयात येताना ह्या पुस्तकाबद्दल मला वाटतं.. कालच ह्या पुस्तकाविषयी माहिती होणं, त्यानंतर माझं पुस्तकं ऑर्डर करणं आणि त्याची वाट बघत असतानाच दस्तुरखुद्द लेखिकेकडून ते ताज ताज नवं कोर पुस्तकं आपल्याला मिळणं हे म्हणजे भाग्यच म्हणावं लागेल..आणि मग अशावेळी ते पुस्तक एका बैठकीत नाही वाचून काढलं तर आपल्यासारखे करंटे आपणच म्हणावं लागेल..असो.. वयात येताना हे पुस्तक म्हणजे प्रत्येक आई ने आईनेच कशाला बाबाने ही वाचलंच पाहिजे असं पुस्तकं आहे..

छोटंसं अगदी फक्त 80 पानांचं हे पुस्तकं म्हणजे.. आदर्श पालक होण्याची गुरुकिल्ली आहे.. मासिक पाळी हा तसा दबक्या आवाजात बोलला जाणारा विषय पण लेखिकेने एका मध्यम वर्गीय कुटुंबात घडलेला प्रसंग इथे मांडून अनेक कठीण प्रश्नांची उत्तर सोप्पी करून सांगितली आहेत.. अवनी शाळेत जाणारी एक मुलगी आई, बाबा आणि आजी यांच्या सोबत राहणारी.. अचानक आई बाबा ऑफिस मध्ये असताना तिची पाळी येते आणि आजी तिला ज्या प्रकारे समजावून सांगून आईला बोलवून घेते.. आई आजी मिळून तिला पडलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतात पण देवपूजा धार्मिक विधी इथे मात्र थोडीफार अंधश्रद्धा येतेच.. पण मग तिच्या शाळेच्या टीचर आणि शुभाताई मिळून एक कार्यशाळा घेतात आणि मुलींच्या मनातील भिती, लाज, अंधश्रद्धा ह्या सगळ्या प्रश्नांना अगदी खेळाच्या रूपातून उत्तर देतात आणि अवनी ला तिच्या प्रश्नांची उत्तर मिळतात..ह्याचं बरोबर आहार, व्यायाम या गोष्टींबद्दल असलेले समज गैर समज अतिशय सोप्पे करून मांडलेले आहेत.. पुढे येणारा विषय म्हणजे मैत्री, प्रेम आणि आकर्षण ह्यातील फरक.. ह्या टॉपिक मधे दोन तीन प्रसंगातून हा कठीण वाटणारा प्रश्न अगदी साधी साधी उदाहरण देऊन समजावून सांगितला आहे.. कॉलेज वयीन मुलींमध्ये तारुण्यसुलभ असणारे भाव आणि त्यांना मुलांबद्दल वाटणारे आकर्षण हे सगळं खरतर नैसर्गिक आहे त्यात गैर काहीच नाही पण ह्या आकर्षणालाच प्रेम समजण्याची केलेली घाई मुलींना कशी अडचणीत आणू शकते हे दोन  मैत्रिणी सरिता आणि गायत्री ह्यांच्या संवादातून अतिशय छान शब्दात इथे मांडलेली आहे..  दुसऱ्या एका भागात सुरेखा आणि एक मुलगा फक्त बोलताना दिसतात त्यातून घरी होणारे गैर समज.. समाजाने दिलेली वागणूक ह्यातून सुरेखा आणि आई मध्ये आलेला दुरावा.. मग त्यांना समजावून देणाऱ्या डॉक्टर मॅडम क्षणभर आपल्या ताई सारख्याच भासतात.. प्रेम आणि आकर्षण हा  विषय हाताळताना लेखिकेने मांडलेले विचार प्रत्येकाने वाचलेच पाहिजेत असे आहेत..

खर तर मुलगी मोठी होते वयात येते ह्याच्या चर्चा होतातच पण मुलगा वयात येताना त्याच्या शरीरात होणारे बदल ह्यांचा फारसा कोणी विचार करताना दिसत नाही.. खर तर अशा वयात मुलांना ही समजावून सांगण्याची समुपदेशनाची गरज असते अन्यथा कुठून तरी काहीतरी पाहून ऐकून ह्या वयातील मुलांवर फार गंभीर परिणाम होतात.. मुलं एकाकी एकटी बनातात स्वभाव विचित्र बनत जातो.. मुलींना फार आधी पासूनच आई आजी ह्यांच्याकडून थोडीफार कल्पना असते आईला, ताईला बोलताना ऐकलेल असत पण मुलांच्या बाबतीत सगळचं नवीन कुठल्याच घरात मुलगा वयात येताना त्याच्याशी चर्चा गरजेची आहे ह्याचा विचार केलेला मी तरी पाहिला नाहीय.. पण ह्या पुस्तकात ह्याचा विचार करून मुलगा वयात येताना ह्या शेवटच्या  टॉपिक मधे तो  अतिशय वेगळ्या प्रसंगातून  पण समर्पक शब्दात मुलांच्या वडिलांसोबत  दोघांना एकत्र समजावून सांगताना खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून लेखिकेने आपले मुद्दे समजावून दिलेले आहेत.. मी प्रत्येक टॉपिक मधले अगदी सगळे डिटेल्स इथे देत नाही कारण अगदी 10 वर्षा पुढील सगळ्यांनी हे पुस्तक किमान एकदा तरी वाचावच असं मला वाटतं.. आणि ज्यांच्या घरात चौथी पाचवी मध्ये शिकणारी मुलगा मुलगी आहेत त्यांनी तर हे पुस्तकं संग्रही ठेवावे असे पुस्तकं आहे.. सो चला तर मग वयात येताना काय काय घडलं, घडू शकतं हे आपल्या मुलाबाळांना लेखिकेच्या शब्दात समजावून सांगू जेणे करून आपल्यातील आई ला आपल्या मुलांशी बोलणं संवाद साधणं सोप्प होईल..

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 145 – मन रहता है प्यासा… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणास्रोत हैं। आज प्रस्तुत हैं आपकी एक भावप्रवण रचना – मन रहता है प्यासा।)

✍ साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 145 – मन रहता है प्यासा…  ✍

कितनी बात करूँ मैं तुमसे

मन रहता है प्यासा।

 

कभी कभी हो मिलना जुलना

बेमतलब की बातें

स्पर्शों को बरजा करतीं

लज्जा भरी कनातें

आँखों के रतनारे डोरे, देते रहें दिलासा।

 

अगवानी करती हैं आँखें

करते होंठ नमस्ते

मौखिक में ही वक्त बीतता

कभी न खुलते बस्ते।

होगी कभी पढ़ाई आगे, बस इतनी है आशा।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 145 – “बन्द किताबों हुआ शब्द -…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है  आपका एक अभिनव गीत  बन्द किताबों हुआ शब्द – )

☆ साप्ताहिक स्तम्भ # 145 ☆।। अभिनव गीत ।। ☆

बन्द किताबों हुआ शब्द –  ☆

प्यास भूमिका निभा रही

जीवन पराग में

कुआँ निरंतर रहा यहाँ

जिनके दिमाग में

 

कण्ठ सूखते रहे अभावों

प्रतिश्रुत जल के

शापित रहे यहाँ हर

घर मे रोपित नलके

 

लोग भूल न पाये हैं

अब भी पनघट को

जो भविष्य को देखा

करते हैं तड़ाग में

 

बन्द किताबों हुआ शब्द-

प्यारा, पनिहारिन

पूछ रही थी यही बात

पुनिया बनजारिन

 

बस विवाह के समय

सुनो हमने माँगा था-

दे देना जलस्रोत एक

हमको सुहाग में

 

वैकल्पिक कुछ नहीं

और कुछ भी न सांत्वना

करते हुये नहीं जी सकते

सहज कल्पना

 

जो कुछ है सब जल

की माया जग उद्यम में

धरती के लौकिक प्रभाग

या  बीतराग में

©  श्री राघवेन्द्र तिवारी

17-06-2023 

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – ऊहापोह ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – ऊहापोह ??

ऐसी लबालब

क्यों भर दी

रचनात्मकता तूने,

बोलता हूँ

तो चर्चा होती है,

मौन रहता हूँ तो

और अधिक

चर्चा होती है!

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

[email protected]

☆ आपदां अपहर्तारं ☆

🕉️ चार दिवस गुरु साधना- यह साधना शुक्रवार  30 जून से आरम्भ होकर आज 3 जुलाई तक चलेगी। 🕉️

💥 इस साधना में इस बार इस मंत्र का जप करना है – 🕉️ श्री गुरवे नमः।। 🕉️💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares