मराठी साहित्य – जीवनरंग ☆ सुपरहिरो – त्यांचा आणि त्याचे… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ सुपरहिरो – त्यांचा आणि त्याचे… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆ 

आज गोरेगाव, मुंबईच्या सन्मित्र शाळेचे १९८६ च्या दहावीच्या बॅचचे सगळेजण खुशीत होते. फारा दिवसांनी आज त्यांचं नाशिकला गेट टुगेदर होतं. व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेजा-मेसेजी व्हायची नियमितपणे, पण प्रत्यक्ष भेटीचा आनंदच काही आगळा.

बऱ्याच जणांच्या विशेष खुशीचं कारणही तसंच विशेष होतं – आज त्यांचा सुपरहिरो त्यांना प्रत्यक्ष भेटणार होता – सुनील लुकतुके, डेप्युटी कलेक्टर – त्यांचा वर्गमित्र, आजच्या गेट टुगेदरला येणार होता.

त्याला भेटणं म्हणजे बौद्धिक मेजवानी असायची. सर्वसामान्य मध्यमवर्गातला मुलगा, मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतलेला, कोणतेही ट्युशन – क्लासेस न लावता, आपल्या मेहनतीने राज्य सेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाला होता आणि टप्प्याटप्प्याने बढती घेत आज डेप्युटी कलेक्टर पदावर विराजमान झाला होता. आपल्या कर्तृत्वाने, निर्भीड, निस्पृह वागण्याने त्याच्या नावाचा डंका सर्वत्र गाजत होता आणि शाळामित्र – वर्गमित्र या नात्याने आपोआपच या सगळ्यांची कॉलर ताठ होत होती.

आजही तो लाल दिव्याची सरकारी गाडी न आणता, सगळ्यांबरोबर ग्रुपने केलेल्या बसने मुंबईहून नाशिकपर्यंत आला होता. गाण्याच्या भेंड्या, नकला – सगळ्या सगळ्यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणे तो सहभागी होत होता, खळखळून हसत होता, रुसत होता, फुरंगटत होता, मज्जा करत होता.

सर्व मित्र मैत्रिणींना स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटत होता. एवढा मोठा माणूस, पण कोणतीही शेखी न मिरवता चारचौघांप्रमाणे सगळ्यांच्यात मिसळत होता – जणू अजून सगळेच जण शाळकरी होते.

पण त्यांना कल्पना नव्हती की त्या सगळ्या मित्रमैत्रिणींइतकाच, किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्त खुश स्वतः सुनील होता. आणि यामागचं त्याचं कारण होतं की त्याचे सुपरहिरो त्याला आज प्रत्यक्ष भेटत होते.

वर्गातल्या अनेक जणांशी तो फोनवरून संपर्कात होता, काहीजण व्हॉट्सॲपमुळे संपर्कात होते. आणि यातूनच त्याच्या सुपर हिरोंचे विविध पैलू त्याला उमगत होते.

तो विनी फडणीसला भेटला होता. तिचा पहिला मुलगा normal होता, पण धाकटी मात्र स्पेशल चाइल्ड होती. विनीचं कौतुक हे होतं की ना तिनं “माझ्याच नशिबी हे का” म्हणून कधी दैवाला बोल लावला ना तिनं एकाकडे लक्ष देताना दुसऱ्याकडे दुर्लक्ष केलं. आज तिचा मुलगा तर कॉलेजात व्यवस्थित शिकत आहेच आणि तिची मुलगी भरतनाट्यम आणि स्विमिंगमध्ये, ती शिकत असलेल्या संस्थेला भारंभार सुवर्णपदकं मिळवून देत आहे. ज्यांची मुलं अशी शैक्षणिक दृष्ट्या challenged आहेत अशा पालकांना समुपदेशन करण्यासाठी विनीला त्यांच्याच सन्मित्र शाळेने नुकतेच बोलावले होते.

किशोर सरोदे हा त्याचा दुसरा हिरो. त्याचा मुलगा आता तेरा चौदा वर्षांचा आहे. आज सगळे स्पर्धात्मक युगात आपापल्या मुलांवर अभ्यास, tuitions या सगळ्यांची भारंभार ओझी लादत असताना, या पठ्ठ्याने मात्र लॉन टेनिसमध्ये प्राविण्य दाखवणाऱ्या आपल्या मुलाची शाळा बंद केली होती. त्याचा मुलगा – राघव आता पूर्णवेळ टेनिस खेळतो आणि आईवडिलांना विम्बल्डनच्या vip stand मध्ये बसवून सामना दाखवण्याचं स्वप्न उरी बाळगून आहे. आज राघव under 14 वयोगटात all India level च्या साठाव्या रँकिंगला पोचला आहे.

स्वतः इंजिनीयर असूनही, मुलाचे कौशल्य आणि मेहनत घेण्याची तयारी बघून एवढा मोठा निर्णय घेणारा किशोर सुनीलला स्तिमित करत होता.

स्वामी समर्थांवर निस्सीम श्रद्धा असलेली सुनंदा गोडबोले त्याला आज कित्येक वर्षांनी भेटत होती. तिचा नवरा पोलीस हवालदार होता. दारू पिऊन बायकोला मारहाण करणं हा त्याचा आवडता टाईमपास. आणि त्याच्या या छंदात त्याची आई आणि भाऊ सक्रिय सहभागी. माहेरची अति गरीबी असल्याने सुनंदाचे परतीचे दोर केव्हाच कापले गेले होते. पण सासरच्यांकडून इतका छळ होऊनही सुनंदा खचली नव्हती.

निरलस सेवा करून जेव्हा तिनं आजारपणात खितपत पडलेल्या सासूचे प्राण वाचवले, अपघातानंतर सेवा सुश्रुषा करून दिरांना शब्दशः आपल्या पायावर उभं केलं आणि नवरा नोकरीतून सस्पेंड झाल्यावर तिच्या पोळीभाजी केंद्राने जेव्हा घर चालवलं, तेव्हा कुठे तिच्या सासरच्यांचे डोळे उघडले आणि ती आता सन्मानानं सासरी रहात होती.

वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी कर्करोगाचे निदान झाल्यावरही न खचणारा आणि करोना काळात नवरा बायको एकाच वेळी icu त असूनही निराश न होणारा प्रति टॉम क्रुझ मनिष …

विमान कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने नोकरी गमावलेला, नंतर करोनामुळे घरी बसावे लागलेला, पण अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही आपली सदाबहार विनोदबुद्धी कायम राखणारा हिमांशू …

सुनीलच्या स्वतःच्या जडणघडणीमध्ये, शाळेत असताना त्याचा अभ्यास घेण्यापासून त्याच्या आईची महत्त्वाची भूमिका होती. आज त्याच्या अनेक वर्गमैत्रिणी स्वतः करीअर करण्याची संधी व पात्रता असूनही मुलांना यशस्वी करण्यासाठी पूर्ण वेळ गृहिणी झाल्या होत्या आणि आपापल्या परीने सुनीलच्या आईची भूमिका निभावत होत्या.

बाकी मित्र मैत्रिणींपैकी कोणी सायबर गुन्हे तज्ञ, कोणी योगगुरू झाले होते. कोणी शरीराला प्रमाणबद्ध करणारा – वळण लावणारा बॉडी बिल्डर, तर कोणी मनाला वळण लावणारे शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, कीर्तनकार, कोणी डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट, उद्योगपती, आर्मी ऑफिसर, आणि या सगळ्यांचे रुसवे फुगवे सांभाळत, क्वचित कधी डोळे वटारून पण बरेचदा प्रेमाने सांगून – समजावून – चुचकारून सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा all rounder निलेश … सुपर हिरोंची ही यादी न संपणारी होती.

त्याची बायको त्याला नेहमी विचारायची – “तुझे शाळा सोबती तुझे सुपर हिरो का आहेत ?” आणि त्याचं नेहमी उत्तर असायचं की “हे एका साध्यासुध्या सुनीलचे मित्र आहेत, लाल दिव्याच्या गाडीत फिरणाऱ्या सुनीलचे मतलबी, फायद्यासाठी झालेले तोंडदेखले मित्र नव्हेत. शाळा कॉलेजात लौकिक अर्थाने त्यांना कदाचित कमी गुण असतील, पण आयुष्याच्या परीक्षेत ते त्याच्याइतकेच, किंबहुना कांकणभर जास्तच यशस्वी होते.

ते आर्थिक दृष्ट्या किती यशस्वी झाले, त्यांचं नाव –  मानमरातब किती आहे हे त्याच्या लेखी महत्त्वाचं नव्हतं. पण त्यांची झुंजार सकारात्मक वृत्ती त्याला प्रेरणादायक होती.

गुरू ठाकूरने

“असे जगावे छाताडावर

आव्हानाचे लावून अत्तर,

नजर रोखुनी नजरेमध्ये

आयुष्याला द्यावे उत्तर”

ही कविता जणू या दोस्तमंडळींना बघून, अनुभवून आणि उद्देशून लिहिली होती आणि म्हणूनच ते सगळेच त्याचे सुपरहिरो होते, आहेत आणि राहतीलही.

आजच्या गेट टुगेदरच्या दिवशी, सगळेच जण आपापल्या सुपर हिरोंना भेटून जाम खुश होते.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सावित्री… लेखिका : सुश्री मानसी काणे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? मनमंजुषेतून ?

 ☆ सावित्री… लेखिका : सुश्री मानसी काणे ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

यंदाची वटपौर्णिमा आता जवळ आलीय. यादिवशी प्रथेप्रमाणे वटसावित्रीची कथा वाचताना, दरवर्षी सावित्री मला नव्याने समजत जाते. खरं तर ही एक पुराण कथा! भोळ्या भाबड्या पतीभक्तीपरायण बायकांनी ती ऐकायची आणि श्रद्धेने माथा टेकवायचा.पतीचे प्राण यमाकडून परत आणणं म्हणजे का सोपी गोष्ट आहे? याबरोबरच सासऱ्यांचं अंधत्व दूर करणं, त्यांचं गेलेलं राज्य परत मिळवणं, आपल्या निपुत्रिक पित्यासाठी पुत्र लाभाचा वर मिळवणं…. हे सगळं त्या सावित्रीने केलं. आज तर्काच्या कसोटीवर घासून पाहिली तर यातली एकही गोष्ट आपल्याला पटणार नाही कदाचित.पण तरीही मी या कथेतले नवे नवे अर्थ शोधत राहते…आणि एका क्षणी मला समजतं ,की कोणतीही गोष्ट विपरीत परिस्थितीशी झगडून, आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा उपयोग करून, विनम्र भावाने, कधी विनवणी करून मिळवणं आणि मिळवलेल्या गोष्टीचा उपयोग संपूर्ण कुटुंबासाठी होईल, हे पाहणं म्हणजेच सावित्री असणं, सावित्री होणं !

सावित्री म्हणजे कोणी राजकन्या, राणी किंवा वनवासिनी नाही,तर प्रत्येक स्त्री म्हणजे सावित्री ! स्त्रीत्वाचं प्रखर तेज म्हणजे सावित्री! सत्यवान, वटवृक्ष किंवा यमधर्म ….हे सगळं निमित्तमात्र. अविरत प्रयत्न, आणि यशाचा ध्यास म्हणजे सावित्री !

सावित्री बुद्धिमान होती. पतिनिष्ठा, पातिव्रत्य, कर्तव्य, धर्म या बाबतीतली आपली मतं तिनं यमाला सांगितली. वेळप्रसंगी त्याची स्तुती केली आणि त्यामुळे प्रसन्न झालेल्या यमा कडून वेगवेगळे वर मिळवले. तिला केवळ आपल्या पतीचे प्राण नको होते ,तर त्यानं उत्तम प्रतीचं आयुष्य जगावं,असं वाटत होतं .मग आधी तिनं आपलं राज्य परत मिळवलं .मग सासऱ्यांची दृष्टी परत मिळवून राज्यकारभाराची व्यवस्था नीट राहील असं पाहिलं.पित्यासाठी पुत्र मागून त्याच्या राज्याचा भविष्यकाळ सुरक्षित केला. सत्यवानाचे प्राण परत नाही मिळाले तर पतीशिवाय आपणही जिवंत राहणार नाही म्हणून, आपल्याशिवाय जगणाऱ्या आपल्या लोकांसाठी तिनं हे वर मिळवले. मग यमाने सत्यवानाच्या प्राणाखेरीज कोणताही वर मागण्यास सांगितल्यावर मोठ्या चतुराईनं सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत, असा वर मागितला.आणि हा वर खरा होण्यासाठी यमाला सत्यवानाचे प्राण परत द्यावेच लागले.हा एक प्रकारचा गनिमी कावाच होता आणि या युद्धात ती जिंकली.

माझ्या आजूबाजूला असंख्य स्त्रिया वावरत असतात. आपल्या मनाला मुरड घालून मुलाबाळांच्या भवितव्यासाठी अनेक घरी उजाडल्यापासून मावळेपर्यंत धुणीभांडी, केरफरशी करणारी माझी कामवाली,जीवनाशी तिची  सुरू असलेली लढाई, मुलींना चांगलं सासर मिळवून देणं, त्यांची बाळंतपण करणं, मुलानं शिकावं म्हणून तिचा चाललेला अट्टाहास,हे सगळं मी रोज पाहते.तीस वर्षे नवऱ्याच्या दुर्धर आजारासह सर्व संसारिक जबाबदाऱ्या उत्तम पार पाडणाऱ्या माझ्या जिवलग मैत्रिणीचा संघर्ष मी पाहिला आहे. त्यासाठी अनेक सुखाच्या क्षणांचा तिने केलेला त्याग माझ्या डोळ्यासमोर आहे. अकाली गेलेल्या नवऱ्याच्या माघारी त्याची उरलेली जबाबदारी रात्रंदिवस कष्ट करून पार पडणारी माझी वहिनी तर माझ्यासमोरच आहे. या सर्वजणींना मी पाहते ,तेव्हा या  त्या सावित्रीपेक्षा कणभर ही कमी नाहीत, याबद्दल माझी खात्री पटते. आज नवऱ्याच्या बरोबरीने कष्ट करणाऱ्या मुली त्यांच्या ताणतणावाचा अर्धा भाग आपल्या खांद्यावर पेलतात, म्हणजेच त्या त्यांचं आयुष्य वाढवितात. मतिमंद, अपंग मुलांना मोठं करणाऱ्या मातांच्या कौतुकासाठी तर शब्दच अपुरे पडावेत.ज्या चिकाटीनं सत्यवानाचे प्राण परत मिळेपर्यंत सावित्री यमाच्या मागोमाग चालत राहिली, त्याच चिकाटीनं त्या इच्छित साध्य गाठण्यासाठी मुलांबरोबर रोज अग्निदिव्य करीत असतात.

सध्या सगळ्याच पुराणकथांना भाकडकथा समजण्याचा काळ आहे. त्यातले दृष्टांत काल्पनिक समजले जातात. पण, थोड्या वेगळ्या पद्धतीनं त्यांना  आधुनिक काळाशी जोडलं तर सत्ययुग,  द्वापारयुगातल्या या गोष्टी आजही लागू पडताना आपल्याला दिसतात. पुराणकालीन स्त्री सत्वाच्या, तपाच्या बळावर उभी असेल, तर आजची स्त्रीसुद्धा बुद्धी सामर्थ्याच्या आणि परिश्रमांच्या जोरावर आकाशाला गवसणी घालते आहे. आपल्याला जे हवे ते अविरत प्रयत्नांनी मिळवते आहे. आपल्या यशाने कुळाचे नाव वाढवते आहे. कोणतीही जबाबदारी स्वबळावर पार पाडण्याची ही कुवत म्हणजेच तर हे सावित्रीपण आहे.  आणि त्यासाठीचे प्रयत्न म्हणजेच वटसावित्रीचं व्रत आहे !

लेखिका : सुश्री मानसी काणे

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “रामशास्त्री वेळापुरे”  — संस्कृत दासबोध–कर्ता ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

 

☆ “रामशास्त्री वेळापुरे”  — संस्कृत दासबोध–कर्ता ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी  

मागे असेच एकदा सज्जनगडावरील ग्रंथ चाळत होतो ! अचानक एका पुस्तकाने लक्ष वेधून घेतले ! 

“ संस्कृत दासबोध ! “ अरे बापरे ! प्राकृत दासबोधाचा संस्कृत अनुवाद ! कसं शक्य आहे?

हातात घेऊन पुस्तक चाळलं तर खरेच तो एक अति उत्कृष्ट संस्कृत अनुवाद होता ग्रंथराजाचा ! त्वरीत गडावरून आज्ञा मिळवून घेऊन ग्रंथ खाली आणला व स्कॅन करविला ! लेखकांचा क्रमांक दिलेला होता पण संपर्क नाही होऊ शकला !

आता आली का पंचाईत ! त्यांच्या अनुज्ञेशिवाय ग्रंथ साईटवर टाकावा तरी कसा? समर्थांची प्रार्थना केली मनोमन…अणि दिवस पुढे सरले… पण नाव पक्के लक्षात होते लेखकांचे, “राम वेळापुरे “ .. …रामशास्त्री…असो. समर्थेच्छा !

वर्षभराने असाच एक दिवस शिवथर घळीत गेलो असताना एक विक्षिप्त वाटावा असा म्हातारा मनुष्य भेटला. विस्कटलेले मळकट पांढरे केस, अस्ताव्यस्त वाढलेली दाढी, बेरकी डोळे, पाय गोल झालेले त्यामुळॆ वजनकाट्यासारखी डौलदार चाल ! त्यात संघाची चड्डी घातलेली, त्यामुळॆ काड्यामोड्या झालेले पाय अधिकच नजरेत भरणारे…

म्हातारा घळ झाडीत होता. उत्कंठेने त्यांचेकडॆ पहात पहात जवळ जाताच डोके खाजवीत उभा राहिला !

एक डोळा जवळपास मिटलेला व एक डोळा भिवई वर ताणून उघडा धरलेला अशा अवस्थेत खेकसला ! “कोण रे तू? इथं कुठं वाट चुकलास?”

मी माझा लौकिक परिचय दिला. चांगलंय म्हणाला…” जा पळ घरी…इथं काय मिळणार तुला?

जा लग्न कर, संसार कर, पोरंबाळं होऊ देत, गाडी बंगला घे, आईबापाला सुख दे. इथं काय ठेवलंय..  दगडं आणि माती ! “ 

मी म्हणालो, “ इथंच तर खर सुख आहे बाबा ! हे सर्व असूनही इथं का यावसं वाटतं मग?” 

बेरकी नजर टाकीत म्हातारा उभा राहिला ! आता मात्र हातातला झाडू टाकून देत माझ्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि म्हणाला, “ अस्सं !!! बर मग जा आत ! “

मी दर्शन घेऊन परत आलो ! म्हाता-याबद्दल माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती !

मी परतून विचारलं, “बाबा आपलं नाव काय?”

“या शेणाला राम वेळापुरे म्हणतात !” 

“वेळापुरे? श्याम?” .. “अरे श्याम नाही राम !”

आणि अचानक माझ्या डोक्यात ट्यूब पेटली ! अरे बापरे ! रामशास्त्री वेळापुरे? संस्कृत दासबोधाचे कर्ते? मी चटकन विचारले, “ ते संस्कृत दासबोध कर्ते? “ 

“तिथं तिथं…” समर्थांकडे हात करीत ते म्हणाले, ” तिथंच बसलेत त्या दासबोधाचे कर्ते ! मी साधा मास्तरडा रे ! मला काय दगड कळतंय संस्कृतातलं? यांची प्रेरणा होती, होऊन गेलं ते पुस्तक…त्यात या शेणाचं काहीही कर्तृत्व नाही !”

मती सुन्न झाली ! इतकं जबरदस्त पुस्तक लिहून हा मनुष्य इतका अलिप्त? इतका निगर्वी? इतका अनासक्त?

नंतर त्यांनी सांगितले की येणा-या काळात संस्कृत ही जगाची ज्ञानभाषा होणार आहे ! तेंव्हा जगभरातील लोकांना दासबोध कळावा म्हणून यांनी आत्ताच तो अनुवादून ठेवलाय ! आणि हे खरे आहे बरे! संस्कृतचे खरे जाणकार आज भारताहून अधिक जर्मनीत आहेत, हे अनुभवणारे मित्र आहेत माझे तिथे !

बाबा बेलसरेंकडे जाऊन ही इच्छा रामशास्त्रींनी बोलून दाखविताच त्यांनी सांगितले– “ घळीत जाऊन समर्थांना आत्मनिवेदन करा ! तरच कार्य सिद्धीस जाईल ! आणि खरोखरीच पुढची पाच वर्षे रामशास्त्री घळीत बसून राहिले व त्यांनी हा अवघा ग्रंथ एकटाक लिहून काढला ! कल्याण स्वामींनी लिहिला त्याच जागी बसून ! कठीण शब्दांचे अर्थ त्यांना समर्थ आपोआप स्फ़ुरून देत असत ! काय चमत्कार आहे हा ! वाचून पहा ग्रंथ ! खरोखरीच अप्रतिम झाला आहे !

मग त्यांची आयतीच परवानगीही मिळाली आणी ग्रंथ दासबोध.कॉम वर आला !

ते म्हणाले, “अरे माझी मूर्खाची परवानगी कसली मागतोस? हे सर्व ज्ञान समर्थांचे ! त्यांना विचार आणि दे टाकून ! माझे काय आहे त्यात !”…. 

डोळ्यात पाणी आले…पायावर डोके ठेवायला गेलो तर जोरात ओरडले– “अरे अरे अरे ! सांभाळ ! डोक्याला शेण लागेल तुझ्या !”

मला काही कळॆना, बुचकळ्यात पडून उभा राहिलो, तर म्हणाले, ” मघाशी म्हणालो नाही मी? या शेणाला राम वेळापुरे म्हणतात? मग माझ्या पायावर डोके ठेवलेस तर शेण लागेल ना कपाळकरंट्या  आणि खो खो खो हसू लागले !

— त्यांची समर्थांप्रती दृढ निष्ठा, श्रद्धा, आत्मनिवेदनभक्ती, आणि टोकाची अनासक्ती, विरक्ती, निरीच्छा पाहून पुन्हा १००० वेळा मनोमन दंडवत घातले !

अशी माणसे आजही निर्माण होताहेत यातच समर्थांच्या लोकोत्तर कार्याचे यश सामावलेले आहे !

हा संस्कृत दासबोध dasbodh.com वर नक्की वाचा ! आवडॆल तुम्हाला !

॥ www.dasbodh.com ॥

लेखक : अज्ञात. 

संग्राहक : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एका वडीलांचे त्यांच्या मुलाच्या विवाहाबद्दल मनोगत…” ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “एका वडीलांचे त्यांच्या मुलाच्या विवाहाबद्दल मनोगत….”  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे  

नुकतेच – दि ३१ मार्च २०२३ ला माझ्या ज्येष्ठ मुलाचे लग्न झाले .

सोहळा खूप मोठा भव्य करण्याचा मनोदय नव्हता त्यामुळे आपल्या सर्वांना बोलावू शकलो नाही म्हणून क्षमस्व !

परंतु या निमित्ताने आम्ही – (मी – माझी पत्नी आणि मुले आणि वधू आणि त्यांचे वडिलधारे लोक अशा सगळ्यांनी ) मिळून काही गोष्टी लक्षपूर्वक आणि ठरवून करण्याचा प्रयत्न केला आणि तो देवाच्या आणि कुलस्वामिनीच्या कृपेने उत्तम रीत्या सफल झाला तो तुमच्या सगळ्यांशी समभागी (share ) करतो .

आम्ही असे लक्षात घेतले की – विवाह हा एक अत्यंत प्रमुख असा संस्कार आहे .

त्यामुळे हा संपूर्ण विवाह विधी हाच लग्नाचा मुख्य भाग असावा . 

 त्यात – सिनेमा – TV सीरियल – आणि आपले अज्ञान यांमुळे पुष्कळ गैर आणि रसभंग करणाऱ्या गोष्टी घुसल्या आहेत त्या टाळूया .

म्हणून – काही गोष्टी विचारपूर्वक केल्या आणि काही कटाक्षाने टाळल्या .

बँड – म्हणजे रणवाद्ये नकोत . मंगल आणि सुमधुर  वाद्याचे संगीत असावे . म्हणून सनई, सतार, बासरी यांचे आनंद उत्साह वाढवणारे संगीत पार्श्वभूमीवर ठेवले .

या विवाह संस्काराचे विधि अतिशय सुंदर आणि हृदयंगम आहेत .

त्यात सौंदर्य – मांगल्य – पावित्र्य – दूरदृष्टी – सगळं काही आहे .

परंतु आपणच ते विसरून गेलो आहोत .

म्हणून मी स्वतःच चार पाच महिने – विवाह विधींचा अभ्यास केला

त्याचे संकल्प – कृती – मंत्र यांचे अर्थ अभ्यासले – त्याला प्रमाण आणि आधार ग्रंथ वाचले .

ते वाचून मन भरून आले आणि असे प्रकर्षाने वाटले की सर्वांना हे विधी समजले पाहिजेत . 

म्हणून असे ठरवले की हा संपूर्ण विधी समजावणारे एखादे छोटेसे पुस्तक तयार करावे आणि प्रत्येकाला द्यावे . लग्नाला येणाऱ्या प्रत्येकाचे आपण स्वागत करतो त्यावेळी हे पुस्तक स्वागताची भेट म्हणून प्रत्येकाला दिले .

आणि सांगितले की आपण इथे लग्नासाठीच वेळ काढून आला आहांत तेव्हा इथे बसल्या बसल्या – हे पुस्तक चाळा – त्यातलाच विधी आपल्या समोर चालू आहे तो बघा . त्याचा अर्थ इथे दिला आहे आणि समोर प्रत्यक्ष कृती होत आहे.

ही कल्पना आलेल्या सगळ्यांनाच आवडली आणि कित्येकांनी त्याच्या अधिक प्रती मागूनही घेतल्या .

प्रत्यक्ष वधू – वर एकमेकांना पुष्पमाला घालताना ऐन वेळी वधूला किंवा वराला उचलून घेऊन एक अनैसर्गिक मजा घेण्याची वाईट कृती लग्नात घुसली आहे . ही कृती करण्यासाठी काही उत्साही तरुण आणि मित्र वाटच पाहात असतात .

त्यांना आधीच फोनवर बोलून विधी किती सुंदर आहे हे समजावले आणि त्यांनाच विचारले की – इतक्या छान भावनांचा संगम होताना – त्या भावनांना विस्कटून टाकणारी – ऐन वेळी पुष्पमाला घालूच न देणारी – उचलून घेण्याची – कृती करायची का?  तेव्हा त्यांनी स्वतःहूनच सांगितले की आम्ही हे करणार नाही .

आपण जेव्हा मंगलाष्टके म्हणतो त्यावेळी अक्षता वाहातो . त्या अक्षता येणार्‍या आप्त स्वकीय – मित्र यांच्या शुभ ईच्छा आणि आशिर्वाद म्हणून – वधू वरांच्या डोक्यावर वाहायच्या असतात . पण ही गोष्ट माहीती असूनही आपण ती त्यासाठी काही आयोजन नसल्यामुळे करू शकत नाही – भावना मनात ठेवून आपण आहे तिथून अक्षता वाहाव्या लागतात आणि त्यामुळे वाहाणे बाजूला राहते आणि जोर लावून फेकाव्या लागतात . मनातील भावना कृतीत व्यक्त करु शकत नाही .

म्हणून आम्ही आणि विधी सांगणार्‍या गुरुजींनी पुढाकार घेऊन एक वेगळी संकल्पना प्रत्यक्षात केली – ती अशी :

मंगलाष्टकांच्या वेळी आलेत्या प्रत्येकाच्या हातात अक्षता असतील पण त्या त्यांनी प्रत्येक वेळी टाकायच्या नाहीत तर हातातच ठेवायच्या .

तसेच आलेल्या सगळ्यांनाच खुर्च्यांवर बसायला सांगितले – वधू वरांच्या बाजूला फक्त उपाध्याय – अंतर्पाट धरणारे आणि करवल्या एवढेच असतील .

त्यामुळे पुढे गर्दी झाली नाही .

बसल्या जागेवरून प्रत्येकाला पाहाता आले.

मंगलाष्टके झाल्यावर वधू – वरांचे पुष्पहार घालून झाले की – ते दोघे गुरुजींसह विधी मंडपातून  उतरून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या जवळ जातील त्यांना नमस्कार करतील . त्या त्यावेळी समोरच्या चार – पाच जणांनी त्यांच्या मस्तकावर त्या अक्षता सोडाव्या . यामुळे लग्नासाठी येणाऱ्या प्रत्येकालाच त्याच्या सदिच्छा आणि आशिर्वादरूप अक्षता वधू – वरांच्या प्रत्यक्ष डोक्यावर वाहाता येतील .

असे करत अगदी सगळ्यांना सुरुवातीच्या ओळीपासून शेवटी पर्यंत आणि पुन्हा परत शेवटच्या ओळीपासून पुढच्या ओळी पर्यंत येणारे आप्त स्वकीय  जिथे बसले आहेत तिथे जाऊन प्रत्यक्ष भेटून त्यांचा वधू-वरांनीच सन्मान केला . आणि भरभरून आशिर्वाद प्राप्त केले .

या सगळ्या कौतुक कृतीला सुमारे २०० जणांच्या जवळ जाण्यासाठी – त्यांना नमस्कार करून शांतपणे पूर्ण करण्यासाठी केवळ पंधरा  मिनिटे पुरली .

यामुळे – वृद्धांना त्यांच्या बसल्या जागी जाऊन नमस्कार करून त्यांचा मान राखता आला आणि नंतर वृद्धांना – रांगेत तिष्ठत उभे राहून वधू वरांना स्टेजवर भेटावेच लागले नाही .

प्रत्येकाला वधू वर जवळून बघताही आले .

आलेल्या प्रत्येकाच्या भावनांना प्रत्यक्ष कृतीची पूर्णता आली – तसे समाधान प्रत्येकाने बोलूनही दाखवले .

गुरुजींनीही विधीतील प्रत्येक कृती – त्याचा अर्थ त्या त्या वेळी थोडक्यात सांगितला .

पाणिग्रहण – कन्यादान – सप्तपदी या मागच्या भव्य आणि उदात्त कल्पना लक्षात आल्या .

त्यानंतर पंगतीमध्ये सर्वांनी सहभोजन घेतले . पंगतीला वाढणाऱ्यांना सुद्धा ही कल्पना आवडली आणि त्यांनीही अगत्याने आणि आग्रहाने वाढले .

आपण सर्व हे विसरून गेलो आहोत की विवाह हा एक उत्साह – चैतन्य – आणणारा समाजाला स्वस्थता देणारा मंगल असा संस्कार आहे . हे विसरण्याचा अजून एक दुष्परीणाम आपणच आणला आहे – तो म्हणजे प्रत्येक विधीमधे फोटोग्राफर आणि व्हिडिओवाले – त्यांना जसे हवे तसे फोटो काढण्यासाठी विधिंच्या मधे घुसून तेच जणू पुरातन कालापासून लग्न लावत आले आहेत अशा थाटात वधू वरांना वेगवेगळ्या पोज घ्यायला लावतात आणि खरे म्हणजे विधी आणि संस्कार यांचा विचका करतात .

अशावेळी यजमान काहीच बोलत नाही त्यामुळे गुरुजी सुद्धा काही करू शकत नाहीत . 

खरे म्हणजे यजमानाने पुढाकार घेऊन या गोष्टी न कळत – शिताफीने टाळता येतात .

आम्ही फोटोग्राफी केलीच पण आधीच ही संकल्पना फोटोग्राफरला समजावून सांगितली आणि त्यांना सांगितले की तुमच्यासाठी म्हणून कोणतीही पोज संपूर्ण विधीत होणार नाही . तुम्ही सर्व बाजूनी फोटो काढा पण विधी तुमच्या साठी थांबणार नाही .

सुंपूर्ण समारंभच – 

“candid photography ” करा .

सगळे विधी झाल्यावर ज्याला जसे हवे तसे एकत्र – ग्रुप फोटो काढून घ्या .

आश्चर्य म्हणजे ही कल्पना फोटोग्राफरला सुद्धा आवडली आणि त्यांनी ही खूप सुंदर आणि भरपूर फोटो काढले .

इतकेच नव्हे तर फोटोग्राफर ने दोनच दिवसांत सर्व फोटोंची एक लिंक तयार करून दिली . आम्ही ती लिंक प्रत्येक कुटुंबाला व्हॉटस्अप वर पाठवली आणि ज्याला जे फोटो हवे आहेत ते डाऊनलोड करून घेतले .

प्रत्येकाला आपले स्वतःचेही – छान फोटो मिळाले .

संपूर्ण समारंभात शांत संयमित आवाजात सनईचे सूर सरु ठेवले होते त्यामुळे वातावरण प्रसन्न तर झालेच पण आवाजही मर्यादित ठेवण्यामुळे प्रत्येकाला एकमेकाशी नीट बोलता आले . 

खूप दिवसांनी भेटणाऱ्या नातेवाईकांना गप्पा मारता आल्या . 

हल्ली संगीताचा आवाज अतिशय मोठा ठेवतात त्याने काय साध्य होते हेच समजत नाही . 

एवढेच नव्हे तर एकमेकांशी धड बोलताही येत नाही .

कानांवर ध्वनीचे अत्याचार सहन करावे लागतात ते वेगळेच . बरे कोणी सांगतही नाही की आवाज मर्यादित ठेवा म्हणून .

आम्ही आधीच ठरवून हे सर्व टाळले . 

त्यामुळे ढणढणाटा ऐवजी उलट प्रसन्नता – उत्साह – गप्पा – हास्यकल्लोळ यांनी समारंभाला जास्त शोभा आली .

तसे लोकांनी बोलूनही दाखवले .

अशा काही गोष्टी सहज साध्य आहेत – करता येतात – अवघड नाहीत .

उगीच प्रवाह पतित होऊन भलत्याच गोष्टी करणे आपण टाळू शकतो .

यात कुठेही कर्मठपणा _ कठोरपणा आणण्याची किंवा आपल्या परंपरांचा वृथा अभिनिवेश दाखवण्याची बिल्कुल आवश्यकता नाही .

योग्य वेळी प्रत्येकाला आपलेसे करून – समजावून सांगितले की छान करता येते – उलट प्रत्येकाचा सहभागही वाढतो .

लग्नाला जाणाऱ्या प्रत्येकाला हे मनातून हवे आहे हे ही प्रकर्षाने लक्षात आले .

मग आपणच आपला अप्रतीम वारसा सांभाळायचा – वाढवायचा आणि भरभरून पुढच्या पिढीला द्यायचा हे आपण निश्चित पणे करु शकतो .

हे सर्व मी लिहीले आहे – ते आधी केले मग सांगितले – या वचनाला जागून आहे.

आपला : नरेंद्र आपटे (ठाणे)

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – नाच गं घुमा… – ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – नाच गं घुमा… – ☆ सौ राधिका भांडारकर ☆

कपाळावर लाल कुंकवाचा टिळा

 गळ्यात काळ्या मण्यांचं डोरलं 

हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा 

हेच तुझं रूप समाजाने कोरलं…१

 तुझ्या जीवनाच्या दोऱ्या

 त्यांनी घेतल्या हातात 

झालीस एक कठपुतळी

 राहिलीस त्यांच्या धाकात …२

नाच ग घुमा नाच ग घुमा

आखलं तुझं रिंगण

 याच्या त्याच्या तालावर 

नाचताना हरवलं भावांगण …३

दार उघड बयो दार उघड 

उभा होता उंबरठ्यात नवा विचार 

उचल ती कातर कापून टाक दोर

 होऊन जाऊ दे तुझ्या मुक्तीचा प्रचार ..४

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares