मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #146 ☆ संत सखू… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 146 ☆ संत सखू… ☆ श्री सुजित कदम ☆

संत सखू भक्ती भाव

दावी नाना चमत्कार

अंतरीची हरीभक्ती

पदोपदी साक्षात्कार…! १

 

साधी भोळी सवाशीण

सासरचा सोसे छळ

मर्यादेच्या पार नेई

दृढ निश्चयाचे बळ…! २

 

भावपूर्ण तळमळ

अनिवार इच्छा शक्ती

सासरच्या जाचालाही

मात देई विठू भक्ती…! ३

 

विठ्ठलाच्या चिंतनात

दूर झाला भवताप

युगे अठ्ठावीस उभे

विटेवरी मायबाप…! ४

 

नाव विठ्ठलाचे घेण्या

नाही कधी थकणार

संत सखू वाटचाल

पांडुरंग नांदणार…! ५

 

संत सखू वाटसरू

सुख दुःख पायवाट

जगुनीया दाखविले

प्रारब्धाचा दैवी घाट…! ६

 

अत्याचारी सासराला

नाही कधी दिला दोष

कृतज्ञता मानुनीया

विसरली राग रोष…! ७

 

दुराचारी कुट़ुंवाने

दिली प्रेरणा भक्तीची

अव्याहत हरीनाम

जोड ईश्वरी शक्तीची…! ८

 

दुःख दैन्य साहताना

संत सखू दावी वाट

नाही कोणा प्रत्युत्तर

पचविली दुःख लाट…! ९

 

पांडुरंग दर्शनाची

पुर्ण करी आस हरी

रूप सखुचे घेऊनी

नांदे पांडुरंग घरी…! १०

 

हरिभक्ती अनुभूती

हरिभक्ती पारायण

सांसारिक वेदनांचे

संत सखू शब्दायण…! ११

 

गेली पंढरीस सखू

पुर्ण केली तिने वारी.

घरकाम करताना

पांडुरंग झाला नारी…! १२

 

मोक्षपदी गेली सखू

इहलोक सोडूनीया

पांडुरंग आशीर्वादे

आली घरा साधूंनीया…! १३

 

श्रद्धा विठ्ठलाच्या पायी

संत सखू भक्ती भाव

वसवून गेला जगी

अध्यात्माचा नवा गाव…! १४

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुटुंब, सेवा आणि  नोकरी, वगैरे… ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

?  विविधा ?

☆ कुटुंब, सेवा आणि  नोकरी, वगैरे… ☆ श्री राहूल लाळे ☆

नववर्ष आलं आणि मागच्या वर्षाचा आढावा घेऊन पुढच्या वर्षात काय करायचं याचं प्लॅनिंग सुरू झालं. वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात वडील आजारी पडले. तसं मागचं वर्ष संपतानाच थोड्या तक्रारी चालू होत्याच, पण आता तीव्रता वाढली होती. अचानक ऑफिसमध्ये फोन आला की चक्कर येऊन पडले आणि लगेच निघालो. रस्त्यातूनच अँब्युलन्स घरी बोलवली आणि वडिलांना घेऊन दीनानाथ हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीत आणलं . परिस्थिती अवघड आहे आणि क्रिटिकल आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आणि आयसीयूमध्ये ऍडमिट केलं.

कोणतंही आजारपण, हे ते भोगणाऱ्याला जाणवतं आणि जवळच्या नातेवाईकांना, त्यांच्याशी संबंधितांना, हॉस्पिटलमध्ये काम करत असणारे डॉक्टर्स, नर्सेस, तिथले मामा-मामी आणि इतर सर्व सपोर्ट स्टाफना ही त्याची जाणीव होते…पण प्रत्येकाची त्याकडे पहायची दृष्टी वेगळी. डॉक्टर्स-नर्सेस-मदतीचा स्टाफ यांच्यासाठी जरी रुग्णांची सेवा करणं ही ड्युटी -कामाचा भाग असला तरी ती मनापासूनच करायला लागते – रुग्णाचा आजार त्याचं निदान करून दूर करायचा असला तरी भावनिक गुंतवणूक  न करता हे करणं महा कौशल्याचं काम. व्यक्ती तशा प्रकृती तसंच जेवढे रुग्ण तेवढे वेगवेगळे आजार व त्यांचे स्वरूप. यावर इलाज करताना अनेक नाजूक – अवघड आणि अनेकदा कसोटीचे प्रसंग येतात- त्यातून यशस्वी होऊन बाहेर पडणं सोपं काम नाही ! गेले काही आठवडे हॉस्पिटलमध्ये राहून अनेक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. सुरवातीला वडलांना  इमर्जन्सीत आणल्यावर तिथल्या स्टाफने केलेली धावपळ – नंतर रात्रभर ICU मध्ये तिथे चाललेली लगबग – सकाळी बाबांना शुद्ध आल्यावर त्या अर्धवट  स्थितीत त्यांच्या  ” माझ्याकडे कोणाचं लक्ष नाही” अशा काही तक्रारीही स्मितमुद्रा  धारण करून  डॉक्टर व इतर स्टाफचं त्यांचं काम करत राहणं म्हणजे त्यांना अशा किरकिऱ्या तर कधी अनेक सोशिक रुग्णांना एकाच वेळी अटेंड करणं यासाठी वैद्यकीय ज्ञान आणि प्रॅक्टिस याबरोबरच किती कौशल्याचं आणि धीराचं काम आहे हे नंतरही दोन-तीन आठवडे  जवळून पाहायला मिळालं.

जीवनदानाचं आणि रुग्णसेवेचं काम करणाऱ्या या सर्वांना अनेकदा दुवा मिळतात पण  काही विपरित प्रसंगी रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरं जावं लागण्याच्या प्रोफेशनल हॅझार्डना समोर जायला लागतं.  हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सेस , मामा-मामी आणि सिक्युरिटी  स्टाफ यांची  ( यात अनेक स्त्रियाच ) परिस्थिती काही वेगळी नाही – कधी रेग्युलर शिफ्ट म्हणून तर कधी ओव्हरटाईम म्हणून बारा बारा तास वेगवेगळ्या वेळेची ड्युटी करणं – अनेक रुग्ण – त्यांना भेटायला येणारे नातेवाईक- मित्रपरिवार यांना सांभाळून घेत सतत बारा महिने चोवीस तास हॉस्पिटलमध्ये  रुग्ण – त्यांच्या आणि नातेवाईकांच्या तक्रारी आणि दडपणग्रस्त  मनस्थितीत राहणं सोपं नाहीच.

सलग तीन आठवड्यांहून अधिक काळ लहानपणानंतर  वडिलांना आधी कधी  दिला होता  हे आठवायलाच लागेल. सुरुवातीचा पूर्ण  आठवडाभर पूर्ण वेळ  हॉस्पिलमध्येच होतो – ऑफिसला जाऊ शकलो नाही . नंतर इथं अनेक दिवस जाणार आहे हे कळाल्यावर आई – बायको – बहीण यांनी दिवसाचा वेळ वाटून घेतला आणि ऑफिसला जाणं  सुरु केलं.  संध्याकाळी ऑफिसमधून परस्पर हॉस्पिटलमध्ये जायचं आवरून  वडलांना जेवण भरवायचं – थोडावेळ बोलायचं – अनेक तक्रारी ऐकायच्या – समजावणूक काढायची सकाळचा चहा नाश्ता त्यांचा आणि माझा करून घरी जाऊन आवरून ऑफिसला जायचं असं टाईट शेड्युल सुरु झालं. ऑफिसला जायला थोडा उशीर होतोय पण सहकारी सांभाळून घेतायत. गेले तीन चार आठवडे हॉस्पिटलमध्ये अनेक चांगले वाईट अनुभव आले – चांगले प्रसंग डॉक्टर- हॉस्पिटल स्टाफ व इतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून तर वाईट म्हणजे  एवढ्या कालावधीत ओळखीचे झालेले काही रुग्ण डोळ्यासमोर  दगावताना  पाहणं आणि उगाचंच मनात गिल्टी कॉन्शस व्हायला होणं (ऍक्च्युअली त्यांचे नातेवाईक जास्त ओळखीचे झालेले – एकमेकांची दुःखं  शेअर करून ती हलकी होतात – ते अनुभवलं -). या ४ आठवड्यात काही समदुःखी मित्रमंडळी  भेटली, जी आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या उपचारासाठी आली होती. त्यातली काही नेहमी भेटणारी तर काही अगदी वीस पंचवीस वर्षांनी भेटली. वडिलांवर उपचार करणारी डॉक्टर तर लहानपणीची मैत्रीण.. उपचाराबरोबरच तिचे आधाराचे बोल होतेच.. इतरही डॉक्टर मित्र मंडळी भेटली.

आणखी एक  गोष्ट म्हणजे कुटुंब एकत्र आलं – नातेवाईक -मित्रमंडळींचे  फोन किंवा येऊन भेटणं झालं.

 – हे भेटणं- बोलणं एरवीही  वेळोवेळी व्हायला हवं असं वाटू लागलं आणि भेटायला येणारे  किंवा आधाराचे शब्द देणारे आपले कोण आणि फक्त  आपले म्हणणारे कोण हेही स्पष्ट झालं. असो प्रत्येकाला आपापले व्याप असतात. बापूंशी (वडील) बरंच   जवळचं  बोलणं – त्यांचं ऐकून घेणं अनेक दिवसांनी झालं – बाहेरचे सगळे कार्यक्रम – काही लग्नं – बाहेरगावच्या व्हिझिट्स – रोटरीचे कार्यक्रम सगळं बंद – मात्र वाचन – मोबाईलवर काही क्लिप्स बघणं – थोडंफार लिहिणं चालू ठेवलं.

हे आजारपण, दुखणं-खुपणं आपल्या प्लॅनिंगमध्ये कधीच नसतं , नाही का?  आजारी माणूस वृध्द असेल तर तो आजारी पडू शकतो याची मनाची तयारी असते, तरुण किंवा कोणत्याही वयातला धडधाकट माणूस आजारी पडला तर  मात्र ते काळजीचं  कारण होऊन बसतं. आजार, आजारपण आणि त्याबरोबरच येणारे वैद्यकीय उपचार व खर्च याचं आपण कसं नियोजन करतो याचा खरोखरंच विचार करायला हवा, हे अनेकदा आपल्याला किंवा जवळच्या व्यक्तीच्या आजारपणात आपल्याला जाणवतं. तब्बेतीची आणि जीवाची काळजी असली तरी सांपत्तिक स्थिती चांगली असेल तर एकवेळ निभावून येता येतं हे आता अनुभवायला मिळालं.

पण ज्यांची परिस्थिती नसेल त्यांनी काय करायचं ? तेही विदारक दृश्य सामोरं यायचं –  ती पाहतानाच दवाखान्यातच  एक पुस्तक वाचताना  ” लता भगवान करे ” या सत्य घटनेवर आधारित सिनेमाबद्दल वाचलं –  लता करे या पासष्टीच्या महिला आणि त्यांचे पती बुलढाण्याचे रहिवासी –  जमीनदाराच्या शेतात काम राबून आयुष्य काढलेले – आयुष्यभराची कमाई तीन मुलींच्या लग्नात खर्च होऊनही एकमेकांवरचं प्रेम आणि विश्वास सांभाळून सुखानं  जगणारं  जोडपं. सुख  हे बाह्य संपन्नतेवर अवलंबून नसून मनीच्या समाधानावर आहे हे दाखवणारं जोडपं. अचानक बाईंच्या पतीला गंभीर आजार होतो व तपासण्या करायला शहरात मोठ्या दवाखान्यात जायचा प्रसंग ओढवतो. आसपासच्या लोकांकडून पैसे गोळा करून लताबाई नवऱ्याला घेऊन शहरात मोठ्या दवाखान्यात जातात पण तिथल्या तपासण्या, डॉक्टरांच्या फिया , राहण्या खाण्याचा खर्च कळल्यावर त्या हबकून जातात. हॉटेल मध्ये खायला पैसे नाहीत म्हणल्यावर बाहेर दोन सामोसे घेऊन खाताना सामोसाच्या  पुडक्यावर बाई ” बारामती मॅरेथॉन मध्ये बक्षिसाची भव्य रक्कम” ही जाहिरात पाहतात आणि दुसऱ्या दिवशी बारामतीला जाऊन संयोजकांच्या हातापाया पडून   नववारी साडीत – अनवाणी पायानी शर्यतीत सामील होतात – आणि आश्चर्य म्हणजे फक्त नवऱ्याचे प्राण वाचवायचे या एकमेव उद्देशाने – जिवाच्या आकांताने पळून  महागाचे शूज घातलेल्या स्पर्धकांना हरवून मॅरेथॉन जिंकतात व पायांना झालेल्या जखमा विसरून बक्षिसाच्या पैशाने नवऱ्यावरचे उपचार चालू करतात. प्रेम सर्वात श्रेष्ठ हे प्रूव्ह करून दाखवणं यापेक्षा वेगळं काय असतं ? – ही स्पर्धा लताबाईंनी पुढची दोन वर्षही जिंकली एवढं मात्र कळलं की हा नि:स्वार्थीपणा आपल्या माणसाच्या – कुटुंबाच्या प्रेमातून येतो – आपल्या माणसासाठी छोटा मोठा त्याग करायची भावना याच प्रेमातून -निस्वार्थीपणातून निर्माण होते – नाते संबंध पुन्हा जुळण्यासाठी ते पक्के होण्यासाठीही याचा हातभार लागतो – लताबाईंसारखं मॅरेथॉन पळणं सर्वांना शक्य नाही – त्याची गरजही नाही – पण भौतिक सुखाच्या सर्व गोष्टी जवळ असताना – त्या सर्व गोष्टीतून – रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून आपल्या माणसासाठी फक्त आजारपणातच नाही इतरवेळी ही भावना का जोपासू नये ? आणि या पलीकडे जाऊन आपलं क्षितिज थोडंसं  वाढवून – प्रेम- आत्मीयता- ममत्व बाळगून कुटुंबाबाहेरही इतरांना जेवढी जमेल तेवढी मदत करायला काय हरकत आहे ?   त्यात किती सुख समाधान मिळेल याची कल्पना ही गोष्ट वाचून आणि ४ आठवडे दवाखान्यात राहून मिळाली – योगायोगानं हेच ” जीवन समजून घेताना ” या गौर गोपाल दास यांच्या पुस्तकात या दिवसांत वाचायला मिळालं . आपलं कुटुंब आपण निवडू शकत नसतो पण आपल्या रूपातून आपल्या कुटुंबाला आणि कुटुंबही आपल्याला मिळालेली एक सुंदर भेटच नसते का ?

गेले तीन चार आठवडे असे गेले तरी या सक्तीच्या पण आता काहीश्या भावून गेलेल्या सेवेमुळे एक आंतरिक समाधान मिळाले हे नक्की पाहूया – आमच्या सर्वांच्या प्रयत्नांनी – डॉक्टर व नर्सेसच्या उपचारांनी – बापूंना  लवकर बरं वाटू दे – आणि आमचं सहजीवन असंच आंतरिक बहरू दे –  आणि इतर सर्व रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाइकांसाठीही  हीच भावना व्यक्त करण्यापलीकडे माझ्या हातात आज काय आहे ?

© श्री राहुल लाळे

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ परीघ… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ परीघ… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

साहित्य अकादमी पुरस्काराचा शानदार सोहळा चालू होता.  एक एक पुरस्कार विजेते राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्विकारत होते.  सुरेख व्यासपीठ, सुंदर सजावट.  प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची निवेदिका, व्यासपीठावरचे मान्यवर, आणि अंगरक्षक.  प्रेक्षागृहातली सभ्य विद्वत्ता.  सगळेच कसे नीटनेटके होते.

याच वातावरणात एक व्यक्तिमत्व होतं शोभा विधाते. त्यांच्या “परीघ”  या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा, सावित्री फुले सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला होता.  निवेदिकेने  त्यांचे नाव पुकारले.  थोडक्यात परिचय करून दिला.  आणि त्यांना मंचावर पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी आमंत्रित केले.

शोभा विधाते याही  वयात चेहऱ्यावर प्रसन्नता टिकून होत्या. रुपेरी केस,  सोनेरी काठाची पेस्टल शेडची साडी, गळ्यात टपोऱ्या मोत्यांची माळ,  वयाला शोभेसाच  सारा साज.

त्या मंचावर आल्या आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.  निवेदिका म्हणाली, ” शोभाताई!  आपल्या  या काव्य प्रवासाविषयी ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.  ‘परीघ या काव्यसंग्रहातील एकेक रचना मनाला भिडते.  इतकी खरी वाटते की,  वाचताना जाणवते, या साऱ्या आपल्याच भावना आहेत. आपले मनोगत आपण प्रेक्षकांसमोर मांडावे.”

पोडीअमचा  माईक शोभाताईंनी हलकेच पकडला.  समोरच बसलेल्या विनय कडे त्यांनी पाहिलं.  विनयने अभिमानाने अंगठा दाखवला. शोभाताई बोलू लागल्या.

शोभा. एक मध्यमवर्गीय, रिती रिवाज, परंपरा सांभाळणाऱ्या समाजभिरू  कुटुंबातील मुलगी.  बाळबोध वळणाची, चौकटीत एका वर्तुळात वाढत होती.  मुलीची जात, मुलीची मर्यादा, मुलीने कसे वागावे, मुलीला काय शोभते, तिने काय करावे, काय नको,  कसे राहावे याच परिघातले शब्द ऐकत, ऐकत, आखलेल्या पाऊलवाटेवर ती चालत होती.  पण आतले आवाज आणि आतली वादळे तिला काहीतरी वेगळच सांगत होते.  तिचे स्वतःशी संवाद घडत होते. तिचे भांडणही तिच्या स्वत:शीच होत होते.

एक दिवस आई तिला म्हणाली,

“शोभे! आता पुरे शिक्षण.  वयोपरत्वे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत.  तरच ते चांगले असते.  जे समाजमान्य आहे तेच करावे.  आम्ही आता तुझ्यासाठी स्थळे पाहतो. एकदा तुझे लग्न झाले की दादाचाही मार्ग मोकळा होईल.”

तेव्हां तिने आईला विचारले,

“असं का?  तुम्ही दादाच लग्न करा की.  मला इतक्यात लग्न करायचं नाही.  मी काय करायचं ते मी ठरवेन.”

तेव्हां दादा चमत्कारिकपणे तिला म्हणाला होता,

” मग काय घोडनवरी झाल्यावर करणार का लग्न? आणि कधी आरशात पाहिलेस स्वतःला?  बुद्धिमत्तेचा गर्व उगीच नको करूस. शेवटी चूल आणि मुल, रांधा, वाढा, उष्टी काढा हेच खरे तुमचे जग. कळलं का? “

दादाच हसणं,  बोलणं, चेष्टेतलं असलं तरी खूप लागलं होतं.  प्रातिनिधिक स्वरूपाचं वाटलं होतं. पुरुषप्रधान परिघातलं ते अत्यंत संकुचित, कोत्या मनाचं,  खच्चीकरण करणारं, अडथळ्यांचं, हीन वक्तव्य होतं.

शोभा गप्प बसली होती याचा अर्थ तिने ते मानलं, स्विकारलं, असा मुळीच नव्हता. पण तिला एक माहीत होतं, लग्नाळू मटिरियल आपल्यात नाही.  “स्वजातीय, सुस्वरूप, सुगृहिणी, गृहकृत्यदक्ष, कमावती वधु पाहिजे”  या सदरातले एक एक शब्द,  तिने तिच्या मनाच्या खिडकीतून भिरकावून लावले होते.  एक मात्र नक्की होतं, समाजभीरु,  मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी, तिचं अस्तित्व, तिचं असं जगणं, बोलणं  तणाव देणार होतं.

तरीही एकदा तिने आई-वडिलांच्या आग्रहास्तव एक स्थळ, हो! स्थळच म्हणूया बघण्यास होकार दिला होता. त्याला  नकार देताना तिने आईला स्पष्ट सांगितले,

” तुला माहित आहे का त्याने मला काय विचारले?”

” काय?”  आईने  भीतभीतच तिला  विचारले.

शोभाने हसून म्हटले,” अगं! तो विचारत  होता, तुम्हाला मच्छरदाणीत झोप येते का?”

तरीही आई तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतीच.

प्रश्न तिथेच संपला होता? की परिघाबाहेरचा एक अवघड प्रश्न सुरू झाला होता?  दरम्यान काही घटनाही घडल्या.

शेजारच्या घरातल्या मीनाने स्वतःला जाळून घेतले होते.  आत्महत्येचे कारण समजलेच नाही. अपघाताच्या नावाखाली केस मिटवली गेली.

नंदिनी मावशीची मुलगी कायमसाठी तिच्याकडे परतली होती.  घटस्फोटाची नोटीस तिला मिळाली होती. प्रश्न होता तिच्या एकुलता एक मुलाच्या  कस्टडीचा.  नंदिनी मावशीच्या मुलीचे आर्थिक बळ शून्य  होते. कायद्याच्या कचाट्यात तिचे मातृत्व भरडून गेले होते.

प्रमोशनसाठी बॉसने घातलेल्या अटी धुडकावल्यामुळे वैजयंतीची बढती  नाकारली गेली. तिला राजीनामा द्यावा लागला होता.

आजूबाजूला घडणाऱ्या अशा अनेक घटनांशी शोभा तिचं नातं शोधत होती.  आणि शोधता शोधता तीही या प्रवाहाच्या विरोधात जात होती.

सोशियोलॉजी मध्ये ती पीएचडी करत होती. तिला टाटाची शिष्यवृत्तीही मिळाली होती. “शिक्षण, शोषण, आणि आजच्या स्त्रीचे स्थान सुरक्षितता आणि भवितव्य.”  हा तिच्या प्रबंधाचा विषय होता. तळागाळापासून ते उच्चस्तरीय गटातल्या अनेक महिलांच्या प्रत्यक्ष मुलाखतीतून तिने असंख्य टिपणे गोळा केली होती. आणि त्याचबरोबर जीवनाच्या एका महाद्वारातून, मिळालेल्या अनुभवातून, ती अधिक स्वयंप्रेरित, कणखर आणि निश्चयी  बनत चालली होती.

अनेक वेळा ‘हा दिवा मालवू की नको’ या संभ्रमातही ती पडली होती. पण तरीही पायाखालची वाट तिला बोलावत होती.

दादाचं लग्न झाल्यावर तिने घर सोडलं.  स्वतंत्र बाण्याची, स्वाभिमानी, स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभी राहिलेली, भले समाजासाठी वेगळी, चौकटी बाहेरची पण ती एक सक्षम स्त्री होती. ‘हा माझा मार्ग एकला’  हेही ती जाणत होती. तिची वाट सोप्पी नव्हती. आई-वडिलांना तिने  सांगितले,

“तुम्ही माझे जन्मदाते आहात. मी तुमची संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार आहे. आपण एकत्र राहू शकतो.”

   पण त्यांनी मुलाकडे राहणंच  पसंत केलं.  ते कधीही म्हणाले नाहीत,” तू मुलगी असलीस तरी मुलासारखीच आहेस.”

    शोभा विधाते, हे नाव ठळक होत गेलं.  साहित्य क्षेत्रातलं एक नामांकित व्यक्तिमत्व.  समाजाभिमुख लेखनामुळे वाचकांचा ओघ वाढत गेला.  पुस्तकांचा प्रचंड खप झाला. अनेक मुलाखती घडल्या. अनेक साहित्य कट्ट्यांवर एक शानदार व्यक्तिमत्व झळकत होतं.    

 शोभा विधाते.

    मुलाखतकार हटकून विचारायचे, ‘आता शेवटचा प्रश्न. थोडा व्यक्तिगत. आपण लग्न का केले नाही?’

    त्यावेळी मात्र शोभाच्या मनात विनोदानेच यायचे की सांगावे का यांना? “मला मच्छरदाणीत झोपायचे नव्हते.”

    आयुष्याच्या मध्यंतरानंतर विनय भेटला.  खरं म्हणजे तो तिचा बालमित्रच होता. अतिशय बुद्धीमान, विचारी. किती तरी वक्तृत्वस्पर्धेची व्यासपीठे दोघांनी मिळून गाजवली होती. पण तारुण्यात जे धागे जुळू शकले नाहीत, ते या उतार वयात जमले.

 

   गृहस्थी भोगून मोकळा झालेला विनय आणि वेगळाच प्रपंच सांभाळत आलेली अविवाहित शोभा.  विनय ची  कहाणी जेव्हा शोभाने ऐकली  तेव्हांही तिला वाटले होते,  सहजीवनाचे सौख्य शून्य टक्के असताना ही माणसे आयुष्यभर तडजोडी करत कशी जगतात?  आता बायको जग सोडून गेली, मुलगा परदेशस्थ झाला.  विनयचे जीवन मुक्त होते का एकाकी होते?  आणि अशा मध्यावर शोभाने, विनयशी तिचे जीवन का जोडले?  प्रश्न अनुत्तरीतच होता.  कदाचित प्रवाहात हरवलेले दोन ओंडके  योगायोगाने जवळ आले असतील.

   गेल्या काही वर्षापासून शोभा आणि विनय, विवाह बंधनात न अडकता एकत्र रहात आहेत. परिघा बाहेरचं जीवन जगत आहेत.

    मंचावरून बोलत असताना, शोभा जणू अदृश्यपणे मनाच्या प्रोजेक्टरवर तिच्या आयुष्याचा चित्रपट पाहत होती.  प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.  संग्रहातल्या अनेक कवितांची जन्म कहाणी तिने  उलगडली होती. मनोगताच्या  समारोपाशी येताना ती म्हणाली,

“एक कविता सादर करते. कवितेचे  शीर्षक आहे, परीघ.”

      तुझ्या दारावर किती वेळा थाप वाजवली

      पण आतून तू कडी काढलीसच नाहीस

      बंद दारापलीकडे मला ऐकू येतोय

      तुझा घुसमटलेला श्वास

      निशब्द नाकारलेले ठोके

      अगं! मी तुझं अस्तित्व.

      तुझी अस्मिता, स्वातंत्र्य विश्वास.

      पण तुझं दारच बंद!

     सोडायचा नाही परीघ तुला

    म्हणतेस, बरी आहे रे मी या वर्तुळातच

    पण लक्षात ठेव, वाटलंच कधी तर दार उघड

    मी पायरीवर तुझी वाट बघत आहे ..

नि:शब्द प्रेक्षागृहात नंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आणि बाहेरच्या काउंटरवर “परीघ” काव्यसंग्रहाच्या सर्व कॉपीज संपून गेल्या.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माधुकरी… — लेखक – श्री विकास वाळुंजकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ माधुकरी… — लेखक – श्री विकास वाळुंजकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

मौजीबंधनात अडकलेला गोडबोल्यांचा सुनील “ॐ भवती भिक्षांदेही” असे म्हणत समोर उभा राहिला. जेमतेम सात आठ वर्षाचा हा बटू. गोरापान. काळेभोर पाणीदार डोळे. छानपैकी चकोट केलेला. हातात दंड. दुस-या हातात झोळी. नेसणीला लंगोटी. गळ्यात जानवे. त्याचे हे रुपडे पाहून भिक्षांदेहीचा खराखुरा अनुभव दृष्टीसमोरून तरळून गेला.

असाच सातआठ वर्षांचा असेन. पित्याचे छत्र हरवलेले. काबाडकष्ट करून घाम गाळणाऱ्या आईपासूनही दुरावलेला. खूप खूप दूर गेलेला मी. व्यास गुरूकुल नावाच्या एका आश्रमात होतो.

ही गोष्ट असावी. १९५७ ते १९६१ या दरम्यानची. कोवळं वय. जग काय ? कशाचीच माहिती नव्हती. ॥ॐ भवती भिक्षांदेही॥ म्हणत दररोज दहा घरून प्रत्येकाने माधुकरी आणायची. अशी शिस्त होती आश्रमात. दुपारी बारा वाजता निघायचो. झोळीत ॲल्युमिनियमची ताटली, वाडगा असायचा. पंचा नेसलेला. दुसरा उपरण्यासारखा अंगावर घेतलेला. अनवाणीच जायचं. पहिलं घर होतं घाणेकरांचं. आजीआजोबा आणि मनावर परिणाम झालेला तरूण मुलगा. असं त्रिकोणी कुटुंब होतं ते. ॐ भवती म्हणताच घाणेकर आजी भाजीपोळी, आमटी, भात झोळीत घालायच्या.

तिथेच पुढे राहाणाऱ्या चित्तरंजन कोल्हटकरांच्या दारात उभा राहायचो. तिथेही अतिशय प्रेमाने भिक्षा मिळायची. पुढे महाजनांच्या घरात जिना चढून जायचो. दार उघडंच असायचं. त्यांच्या गृहिणीला ऐकू कमी यायचं. ताटकळत वाट पहात उभं राहावं लागायचं. त्या घरात भिंतीवर इंग्रजी कॅलेंडर व सुविचार लावलेले असायचे. भिक्षा मिळेपर्यंत त्यावरील स्पेलिंग पाठ करीत असे.

शेगडीवाले जोशी, गो.भा .लिमये, डाळवाले जोशी, आपटे रिक्षावाले, माई परांजपे आणि शेवट डाॅ. मोनॅकाका भिडे. अशी घरं मला नेमून दिलेली होती. या सर्व कुटुंबांतून  मिळालेले ताजे सकस पदार्थ आश्रमात घेऊन यायचे. मोठ्या पातेल्यातून ते ठेवायचे. नंतर मोठी मुलं वाढप्याचे काम करायची. वदनी कवळ म्हणत आम्ही त्या संमिश्र पदार्थांचा आस्वाद घ्यायचो.

दोन्ही वेळेस तेच पदार्थ. भिक्षांदेहीला प्रतिसाद देणारी ही सगळी घरं. सदाशिव पेठेत भिकारदास मारूतीच्या पिछाडीला होती. आज माहित नाही त्या घरांचं स्टेट्स काय आहे ते. पण या प्रत्येक घरातील प्रेमळ माणसं मनांत कायमची घर करून बसली आहेत माझ्या.

डाॅ. भिड्यांच्या घरात पाचपन्नास मांजरं होती. माझ्या मागोमाग तीही दारात यायची. शंभरीतल्या भिडे आजी मला आणि मांजरांना एकाचवेळी अन्नदान करायच्या. खूप गंमत वाटायची त्या घरात. गोभांच्या लिमये वहिनी तर सणावाराला थेट स्वयंपाकघरात बोलवायच्या. कधी पुरणपोळी, कधी जिलेबी, कधी शिरा खाऊ घालायच्या. म्हणायच्या, “बाळा. ताटात वाढलं तर हे गोडधोड तुला कसं मिळेल? ते तर वाटण्यावारी जाईल. बस खाऊन जा. ” वहिनींच्या त्या रूपात मला आईच भेटायची.

माई परांजपे तर वाट पहात बसायच्या. माधुकरी वाढल्याशिवाय जेवायचं नाही, असं व्रतच केलं होतं त्यांनी. ते घर मी कधीच चुकवीत नसे. आपटे रिक्षावाले म्हणजे त्या गल्लीतले समाजसेवकच होते. मुलं शाळेत पोचविता पोचविता त्यांची उडणारी धांदल. त्यांचं ते अंधारं दोन खोल्यांचं घर. नऊवारी साडीतल्या आपटे काकू. धुण धुताधुता लगबगीनं भिक्षा वाढण्यासाठी चालणारी त्यांची धडपड, माझ्या बाल मनावर कायमची कोरली गेली आहे.

भिक्षेच्या रुपाने मी समाजपुरुषच पाहात होतो. नियतीच्या रुपाने तो मला जगवत होता. संघर्ष शिकविणा-या या समाजपुरुषाचे दर्शन फारच अफलातून होते. असं माधुकरी मागणं आताशा दिसत नाही. त्यात गैर काहीच नव्हते.  चित्तरंजन कोल्हटकर हे नाट्यचित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व  होते. हे पुढे खूप उशीराने कळले. पोटाचीच लढाई होती. त्यामुळे नाटक सिनेमा वगैरै असतं, हे कळण्यासारखी परिस्थितीच नव्हती. कोल्हटकरांची तारका पुढे एसपी काॅलेजला बरोबर होती. तेव्हा आपण किती थोर व्यक्तीच्या कुटुंबाशी जोडले गेलो होतो हे लक्षात आले.

भोजनाचे आश्रमातील प्रसंग नजरेसमोरून तरळत असतांनाच गोडबोल्यांचा सुनील “आजोबा. ॥ॐ भवती भिक्षांदेही ॥ वाढतां ना ? ” असं म्हणाला. मी ताळ्यावर आलो.

चुरमु-याचा लाडू त्याच्या झोळीत घातला. साठ वर्षापूर्वी हरवलेलं बालपण शोधत बाहेर पडलो. मंगल कार्यालयातून थेट घरी आलो.

(मित्रांनो हे सगळं शब्दश: खरं आहे बरं)

लेखक : श्री विकास वाळुंजकर

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “गणपतीचे तीन अवतार…” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ “गणपतीचे तीन अवतार…” ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !

चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आज होत आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’ म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो.

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. तर माघी गणेशोत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते.

भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढ्या  मोठय़ा सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्त्व कमी आहे. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो.

गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे म्हटले जाते. 

  • पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते.
  • दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते.
  • तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे.

– त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते.

!! ॐ गं गणपतये नम: !!

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ईर्षा… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले  ?

☆ ईर्षा… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

एकदा ब्रह्मदेव रथातून जात असताना सारथी अचानक रथ थांबवतो. ब्रह्मदेवाने कारण विचारले असता, तो सांगतो की एक छोटा प्राणी बसला आहे. तो रस्त्यातून बाजूला होत नाही.. म्हणून रथ थांबवावा लागला. “ त्याला बाजूला होण्याची विनंती कर.” ….  थोड्या वेळाने ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्यावर सारथ्याने सांगितले की, तो प्राणी पूर्वी होता त्यापेक्षा मोठा झाला आहे.

ब्रह्मदेवाने सांगितले की, “ त्याला चाबूक दाखव म्हणजे तो बाजूला जाईल.”

ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्यावर कळले की, तो प्राणी अधिकच मोठा झाला आहे. आता तो प्राणी तर एका डोंगराएवढा मोठा झाला आहे. आणि रथावर चाल करून येत आहे.

हे ऐकताच ब्रह्मदेव म्हणाले, “ रथ मागे घे आणि त्याला सांग की, ‘तूच श्रेष्ठ आहेस, आम्ही रथ वळवतो आणि दुसऱ्या मार्गाने जातो. “

सारथ्याने हे सांगितल्यावर तो प्राणी एकदम मुंगी इतका छोटा झाला आणि रस्त्यातून बाजूला झाला.

आश्चर्यचकित झालेल्या सारथ्याने ब्रह्मदेवास याचे कारण विचारता देवाने सांगितले की, “ त्या प्राण्याचे नाव “ईर्षा” असे होते. आपण जेवढे महत्त्व त्याला देऊ तेवढा तो मोठा होत जाईल. मात्र आपण स्पर्धेतून दूर झाल्यावर “ईर्षा” राहिली नाही आणि तो सामान्य स्वरूपात आला.” 

—सर्वच स्पर्धा जिंकण्यासाठी खेळायच्या नसतात. काही वेळा फालतू स्पर्धेत भाग घेतल्यामुळे उगाच ऊर्जा व्यर्थ खर्च होते. काही वेळा नमते घेतल्यामुळे फायदाच होतो.

याचप्रमाणे जग लोकांच्या नजरेने बघण्यापेक्षा आपल्या नजरेने बघावे. आपण सुखी आहोत, याची पावती लोकांकडून घेण्यापेक्षा आपले सुख आपणच अनुभवावे.

आपला निर्णय आपण घ्यावा आणि त्यास जबाबदार राहावे.

लोक काय म्हणतील, याचा फार विचार करू नये. कारण एक दिवस प्रमाणापेक्षा कोणीही आपल्याला जवळ करणार नाही, तेव्हा आपले सुख-दुःख आपणच अनुभवावे, आयुष्य तणावमुक्त होते.

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – न्याहाळते मी मला…– ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– न्याहाळते मी मला… – ?सौ. उज्ज्वला केळकर 

नऊवारी नऊवारी नऊवारी 

नेसले मी साडी इरकली

काठ पदर आहे पिवळा

झंपर निळा,जांभळा ल्याली

रंग माझा गोरा,झाले वय जरी

आहे सौभाग्यवती खरी

आरश्यात बघून लावते कुंकू

तब्येतीने आहे मी बरी

भरून हाती हिरवा चुडा

आठवते मी तरूणपण

हसून गाली मला न्याहाळते

गेले नाही अजून खोडकरपण

रचना : सौ. रागिणी जोशी, पुणे

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ तन्मय साहित्य #167 – लघुकथा – कम्बल… ☆ श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ ☆

श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’

(सुप्रसिद्ध वरिष्ठ साहित्यकार श्री सुरेश कुशवाहा ‘तन्मय’ जी अर्ध शताधिक अलंकरणों /सम्मानों से अलंकृत/सम्मानित हैं। आपकी लघुकथा  रात  का चौकीदार”  महाराष्ट्र शासन के शैक्षणिक पाठ्यक्रम कक्षा 9वीं की  “हिंदी लोक भारती” पाठ्यपुस्तक में सम्मिलित। आप हमारे प्रबुद्ध पाठकों के साथ  समय-समय पर अपनी अप्रतिम रचनाएँ साझा करते रहते हैं। आज प्रस्तुत हैं आपकी एक अप्रतिम लघुकथा  “कम्बल…”)

☆  तन्मय साहित्य  #167 ☆

☆ लघुकथा – कम्बल

जनवरी की कड़कड़ाती ठंड और ऊपर से बेमौसम की बरसात। आँधी-पानी और ओलों के हाड़ कँपाने वाले मौसम में चाय की चुस्कियाँ लेते हुए घर के पीछे निर्माणाधीन अधूरे मकान में आसरा लिए कुछ मजदूरों के बारे में मैं चिंतित हो रहा था।

ये मजदूर जो बिना खिड़की-दरवाजों के इस मकान में नीचे सीमेंट की बोरियाँ बिछाये सोते हैं, इस ठंड को कैसे सह पाएंगे। इन परिवारों से यदा-कदा एक छोटे बच्चे के रोने की आवाज भी सुनाई पड़ती है।

ये सभी लोग एन सुबह थोड़ी दूरी पर बन रहे मकान पर काम करने चले जाते हैं और शाम को आसपास से लकड़ियाँ बीनते हुए अपने इस आसरे में लौट आते हैं। अधिकतर शाम को ही इनकी आवाजें सुनाई पड़ती है।

स्वावभाववश  मैं उस मजदूर बच्चे के बारे में सोच-सोच कर बेचैन हो रहा था, इस मौसम को कैसे झेल पायेगा वह नन्हा बच्चा!

शाम को बेटे के ऑफिस से लौटने पर मैंने उसे पीछे रह रहे मजदूरों को घर में पड़े कम्बल व हमसे अनुपयोगी हो चुके कुछ गरम कपड़े देने की बात कही।

“कोई जरूरत नहीं है कुछ देने की” पता नहीं किस मानसिकता में उसने मुझे यह रूखा सा जवाब दे दिया।

आहत मन लिए मैं बहु को रात का खाना नहीं खाने का कह कर अपने कमरे में आ गया। न जाने कब बिना कुछ ओढ़े, सोचते-सोचते बिस्तर पर कब नींद के आगोश में पहुँच गया पता ही नहीं चला।

सुबह नींद खुली तो अपने को रजाई और कम्बल ओढ़े पाया। बहु से चाय की प्याली लेते हुए पूछा-

“बेटा उठ गया क्या?”

उसने बताया- हाँ उठ गए हैं और कुछ  कम्बल व कपड़े लेकर पीछे मजदूरों को देने गए हैं, साथ ही मुझे कह गए हैं कि, पिताजी को बता देना की समय से खाना जरूर खा लें और सोते समय कम्बल-रजाई जरूर ओढ़ लिया करें।

यह सुनकर आज की चाय की मिठास के साथ उसके स्वाद का आनंद कुछ अधिक ही बढ़ गया।

© सुरेश कुशवाहा ‘तन्मय

जबलपुर/भोपाल, मध्यप्रदेश, अलीगढ उत्तरप्रदेश  

मो. 9893266014

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – कथा-कहानी ☆ लघुकथा – “पुरस्कार का हश्र” ☆ श्री कमलेश भारतीय ☆

श्री कमलेश भारतीय 

(जन्म – 17 जनवरी, 1952 ( होशियारपुर, पंजाब)  शिक्षा-  एम ए हिंदी, बी एड, प्रभाकर (स्वर्ण पदक)। प्रकाशन – अब तक ग्यारह पुस्तकें प्रकाशित । कथा संग्रह – 6 और लघुकथा संग्रह- 4 । ‘यादों की धरोहर’ हिंदी के विशिष्ट रचनाकारों के इंटरव्यूज का संकलन। कथा संग्रह – ‘एक संवाददाता की डायरी’ को प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी से मिला पुरस्कार । हरियाणा साहित्य अकादमी से श्रेष्ठ पत्रकारिता पुरस्कार। पंजाब भाषा विभाग से  कथा संग्रह- महक से ऊपर को वर्ष की सर्वोत्तम कथा कृति का पुरस्कार । हरियाणा ग्रंथ अकादमी के तीन वर्ष तक उपाध्यक्ष । दैनिक ट्रिब्यून से प्रिंसिपल रिपोर्टर के रूप में सेवानिवृत। सम्प्रति- स्वतंत्र लेखन व पत्रकारिता)

☆ लघुकथा – “पुरस्कार का हश्र” ☆ श्री कमलेश भारतीय

(तुम्हें याद हो कि न हो याद हो …)

मित्रो । जिंदगी के पहले पुरस्कार का हश्र क्या हुआ ? बताता हूं । पंजाब के एक समाचार पत्र ने सन् 1972 में लघुकथा प्रतियोगिता की घोषणा की । मैने अपनी रचना आज का रांझा भेज दी । पुरस्कारों की घोषणा हुई । मेरी लघुकथा को प्रथम पुरस्कार मिला और एक टिपण्णी प्रशंसा भरी ।

मैं समाचार पत्र के कार्यालय गया । पहली बार संपादक महोदय के दर्शन हुए । उन्होंने प्रेमपूर्वक पूछा कि पुरस्कार की राशि मिली ? मैने कहा कि नहीं।

वे मुझे मालिक के ऑफिस में ले गये और परिचय करवाया । फिर बोले कि अकाउंटेंट से पुरस्कार राशि दिलवा दूं ? मालिक ने स्वीकृति दे दी ।

अकाउंटेंट से राशि लेकर एक पुलक सी महसूस की । मैने साहित्य संपादक महोदय से कहा कि आइए, चाय का कप । सेलिब्रेट कर लेते हैं । बोले : इतनी गर्मी है युवा कथाकार । बीयर लेते हैं।

दफ्तर के सामने ही होटल था । अंदर गये । बीयर का ऑर्डर । आमलेट । छोटे छोटे घूंट के बीच कहा : युवा कथाकार अभी और प्रतियोगिताएं होंगी । रचनाएं भेजते रहना । समझ रहे हो न ?

बिल आया । मैने पुरस्कार राशि रख दी । तीन रुपये वापस आये । बैरे को टिप के रूप में देकर मैं बाहर आ गया ।

पुरस्कार के लिए फिर मेरा कोई रचना भेजने का मन नहीं हुआ ।

© श्री कमलेश भारतीय

पूर्व उपाध्यक्ष हरियाणा ग्रंथ अकादमी

1034-बी, अर्बन एस्टेट-।।, हिसार-125005 (हरियाणा) मो. 94160-47075

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – लिखना-पढ़ना ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 माँ सरस्वती साधना संपन्न हुई। अगली साधना की जानकारी से हम आपको शीघ्र ही अवगत कराएँगे। 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

? संजय दृष्टि – लिखना-पढ़ना ??

…कैसा चल रहा है लिखना-पढ़ना?

…कुछ अपना लिखता हूँ, बहुत कुछ अपना बाँचता हूँ।

…अपना लिखना अच्छी बात है पर अपना ही लिखा बाँचना…?

आज नयी कविता या कथा लिखता हूँ, मित्रों के साथ साझा करता हूँ। अगले दिन से मित्रों के लेखन में अपनी ही रचना के अलग-अलग संस्करण बाँचता हूँ।

© संजय भारद्वाज 

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares