मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #177 ☆ भुरळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 177 ?

☆ भुरळ… ☆

नच बोलावता आला, कसा भ्रमर जवळ

पाकळ्यांच्या मिठीमध्ये, होता घुसला सरळ

 

रात्रभर आडकलं, आत पाखरू वेंधळ

झाला जामिन मंजूर, त्याचा होताच सकाळ

 

फुलासाठी सारे प्रेम, फूल होतेच मधाळ

गुंजारव करताच, पडे फुलाला भुरळ

 

सूर्यकिरणांचा मारा, त्यानी होते होरपळ

भुंगा घालेतोय वारा, देई आनंद केवळ

 

थोडी पराग कणात, लागे कराया भेसळ

मध तयार घेईल, जेव्हा मिसळेल लाळ

 

फूल धरु पाहे त्याला, पळे पाखरू चपळ

नशिबात दोघांच्याही, होता विरह अटळ

 

दोन प्रेमीकांच्यामध्ये, कोण खेळतो हा खेळ

गंधाळल्या त्या क्षणाची, आहे तशीच ओंजळ

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माझे मृत्यूपत्र…. – स्वा.सावरकर ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. विद्या वसंत पराडकर ☆

सौ. विद्या वसंत पराडकर

?  काव्यानंद  ?

 ☆ माझे मृत्यूपत्र… – स्वा.सावरकर ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. विद्या वसंत पराडकर ☆

(देशभक्त वि.दा.सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.)

माझे मृत्युपत्र या कवितेचे रसग्रहण.

सावरकरांना न ओळखणारा या पृथ्वीतलावर विरळाच. भारतमातेच्या मुकुटातील हा दैदिप्यमान हिराच.mयांचे अमरत्व म्हणजे यांचा जाज्वल्य देशाभिमान, देशभक्ती, उदात्त देशप्रेम होय. भारत मातेच्या पायातील परदास्याच्या श्रुखंला तोडण्यासाठी त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी देवासमोर शपथ घेतली. यापुढे मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत  मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.

असा हा तेजस्वी तारा भारतीय क्षितिजावर चमकत राहिला..

स्वातंत्र्य वीर सावरकर हे उत्तुंग प्रतिभेचे कवी होते.यांनी साहित्याच्या सर्व दालनात प्रवेश केला.यांचे साहित्य सर्व व्यापी आहे.

माझे मृत्युपत्र हे यांचे वहिनीस  लिहिलेले पत्रात्मक काव्य‌ आहे.

राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना इंग्रजांनी पकडले. त्यांना पन्नास वर्षांची काळया पाण्याची शिक्षा जाहीर केली. यातून आपली सुटका नाही.हे त्यांनी जाणले. हे‌ कटू सत्य वहिनीला कसे सांगायचे? घरची परिस्थिती मोठी प्रतिकूल होती.१९०९मध्ये त्यांच्या ‌मोठया भावाला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांचा चार वर्षांचा मुलगा देवाघरी गेलेला. अशा‌ परिस्थितीत ही मर्मभेदी गोष्ट कशी‌ सांगावी या विचारात ते असताना काव्य प्रतिभा हात जोडून उभी‌ राहिली.असा हा या कवितेचा जन्म.ही कविता देशभक्ती ने‌ ओथंबली आहे.आजपर्यत अनेक कवींनी देशभक्तीच्या कविता लिहिल्या.परंतु झाले ‌बहु, होतील बहु परी या सम नसे.

 ☆ माझे मृत्यूपत्र… ☆

हे मातृभूमी तुजला मन वाहिलेले,

वकृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले,

तुतेची अर्पियली नवी‌ कविता रसाला

लेखाप्रती विषय तुचिं अनन्य झाला.

त्वत्स्थंडिली ढकलिले प्रियमित्रसंघा

केले स्वयें दहन यौवन देह भोगा

तत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा

तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा

त्वत्स्थंडिली ढकलिली गृहवित्तमता

दावानलात वहिनी नव पुत्रकांता

त्वत्स्थंडिली अतुल धैर्यनिष्ठ बंधू

केला हवि परम कारुण पुण्य सिंधू

त्वत्स्थंडिली वरी  प्रिय बाळ झाला

त्वत्स्थंडिली वरी आता मम देह ठेला

हे काय बंधू असतो जरी सात आम्ही

त्वत्स्थंडिली च असते,दिधले बळी मी

की घेतले  न व्रत हे आम्ही अंधतेने

लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने

जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे

बुद्धयाची वाण धरिले सतीचे.

माझा निरोप तुजला येथुनी हाच देवी

हा वत्सवत्सल तुझ्या पदी  शीर्ष ठेवी

सप्रेम अर्पण असो प्रणति तुम्हाते

आलिंगन प्रियकरा मम अंगनेते

प्रस्तुत कविता सावरकरांच्या जाज्वल्य देशभक्ती चे प्रतीक आहे. सावरकरांची त्यागी भावना दर्शविणाऱ्या या ओळी बघु या.      

हे मातृभूमी तुजला मन वाहिलेले

या स्वातंत्र्य लढ्याच्या अग्नि कुंडात

माझा परिवार, मित्र, यौवन सारे भोग

यांची आहुती दिली आहे.

या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे या काव्यातील शब्दसंपदा संस्कृत प्रचुर आहे.या काव्यात वीर रसाला करूण रसाची झालर लावली आहे.

भगवान् श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीतेचे प्रबोधन केले व त्यात ज्ञान,कर्म, भक्ती या योगांची माहिती दिली.सावरकर हे बुद्धिमत्तेचे पुतळे होते.त्यांनी ज्ञान,कर्म,भक्ती मार्गाचा अवलंब केला. ही कविता राष्ट्रीय भावनेची व देशभक्ती ने ओतप्रोत भरलेली आहे. कविता आशय संपन्न आहे.

आम्ही हे मातृभूमीची सेवा आंधळेपणाने घेतली नसून डोळे उघडे ठेवून घेतली आहे. कवि म्हणतो की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने ठिकठिकाणी सावरकरांचे मातृभूमी विषयीचे प्रेम कळसास पोहचले आहे. सावरकरांचा निस्वार्थी भाव या ओळीत दिसून येतो 

हे आपले कुलही त्यामध्ये ईश्र्वरांश

निर्वंश होऊनी ठरेल अखंड वंश

सावरकरांना पुढील चित्र दिसत असून ते त्यांनी सुंदर विरोधाभास अंलकाराने रेखाटले आहे.

हिंदुस्थान हा आमचा देश आहे. आमच्या देशात आमचेच राज्य हवे या तत्वनिष्ठ स्वभामुळे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली.

त्यांचे कार्य हे अतुलनीय आहे.

अंदमानच्या काळ्याभोर कोठडीत खिळ्यांचया साह्याने भिंतीवर लिहिलेली कविता आहे.या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिभेला आमचा खरोखरी सलाम.

सौ.विद्या पराडकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा ?

☆ ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

शिक्षणावर ते पुस्तकी आहे, पढिक पंडीत बनवणारे आहे, असा आरोप सातत्याने केला जातो. गेल्या पंचवीस-तीस वर्षात शैक्षणिक धोरण अधीक कृतीशील, उपक्रमशील झाले आहे हे खरे, तथापि धोरण आणि कार्यवाही यात खूप तफावत दिसून येते. मुले कृतिशील बनावी, म्हणून विविध विषयातील प्रकल्प मुलांना घरी करायला दिले जातात. प्रत्यक्षात मात्र हे प्रकल्प पालकच घरी करताना दिसतात. मुलांचा सहभाग खूप कमी असतो. कात्री, पट्टी, डिंक आणून दे, इ. पुरताच त्यांचा सहभाग मर्यादित असतो. मुलांचे शिक्षण कृतीशील, उपक्रमशील व्हावे, यासाठी सिस्टेड फाउंडेशनाने एक प्रकल्प हाती घेतला आहे. सिस्टेड फाउंडेशन म्हणजे  ( CISTED FOUNDATION – CENTRE FOR INNOVATION, TECHNOLOGY & ENTERPRENEURSHIP DEVELOPMENT ). याचे फाउंडर मेंबर आहेत, प्रा. भालबा केळकर आणि डॉ. सुहास खांबे. त्यांच्या प्रकल्पाचे स्वरूप आहे, ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’

मुलांना खेळण्यांशी खेळायला आवडतं. मुलांनी स्वत:च खेळणी बनवली तर— मुलं क्रियाशील होतील. त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळेल. ही खेळणी वैज्ञानिक तत्वांवर बनवली, तर क्रियाशीलता, नवनिर्मितीचा आनंद याबरोबरच त्यांची वैज्ञानिक तत्वांची समजही पक्की होईल. बाजारात अशी काही खेळणी विकतही मिळतात. उदा. डोलणारी, न पडणारी बाहुली. खाली न पडणार्याी बाहुलीमागे गुरुत्वाकर्षण हे तत्व आहे. अशा प्रकारची काही खेळणी मुलांनी स्वत:च बनवली तर? मुलांना निर्मितीचा आनंदही मिळेल आणि वैज्ञानिक तत्वेही चांगली लक्षात रहातील, हा विचार घेऊन सिस्टेड फाउंडेशन गेली दोन वर्षे या प्रकल्पावर काम करत आहे.

सिस्टेड फाउंडेशनचा हा प्रकल्प खरं तर एका जुन्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन आहे.

नवीन काही तरी करण्याच्या ध्यासातून प्रा. भालचंद्र दामोदर केळकर म्हणजेच प्रा. भालबा केळकर यांनी  एक नवा उपक्रम १९७५ साली हाती घेतला होता. तो होता शाळकरी मुलांसाठी. ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’, असं त्याला नाव देता येईल. मुलांना खेळण्यांशी खेळायला खूप आवडतं. मुलांनी स्वत:च अशी खेळणी बनवली तर? मग विचार सुरू झाला कोणत्या तत्वावर आधारित कोणती खेळणी बनवता येतील? नंतर तशी खेळणी बनवली गेली. त्याचे प्रात्यक्षिकही झाले. इथे त्यांच्यासोबत हरिभाऊ लिमये, प्रा. देशिंगकर, श्री. प्रमोद लिमये इ. मंडळी होती. यावर आधारित पुस्तकही छापले गेले. सध्या मात्र ते पुस्तक कुठेही उपलब्ध नाही. प्रकल्प महत्वाचा, शिक्षणाला एक नवी दिशा दाखवणारा होता, परंतु यातील संबंधित व्यक्ती आपापल्या व्यापात अधीक व्यस्त असल्याने त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देता आला नाही. त्यामुळे त्याचा व्हावा तसा प्रचार आणि प्रसार झाला नाही. हळू हळू हा उपक्रम विस्मृतीत गेला. प्रा. भालबा केळकर आणि डॉ. सुहास खांबे सध्या या विस्मृतीत गेलेल्या उपक्रमाच्या पुनरुज्जीवनाच्या कामात गुंतले आहेत.

१९७५ साली जेव्हा हा उपक्रम हाती घेतला होता, त्यावेळी बनवलेली खेळणी, त्यात काय सुधारणा करता येतील, नव्याने कोणत्या वैज्ञानिक तत्वावर कोणती खेळणी तयार करता येतील , (innovation and cunstraction) याबद्दल प्रा. भालबा केळकर आणि डॉ. सुहास खांबे यांच्यात चर्चा होते आणि नंतर खेळणी तयार केली जातात. पुठ्ठा, फळी, कागद, तार, खिळे, बॅटरी, काड्या, टाचण्या, पत्रा, रंगपेटी  यासारखे रहज उपलब्ध होणारे साहित्य आणि कात्री, डिंक, पक्कड, हातोडी, चिकटपट्टी यासारखी हत्यारे वापरून ही खेळणी बनवली जातात.  प्रत्यक्ष खेळणी तयार करण्यासाठी अनेक हातांची त्यांना मदत होते.  सध्या त्यांचे असे २० खेळण्यांचे संच तयार आहेत. आणखी ३० खेळणी बनवण्याची त्यांची योजना आहे. उदाहरण म्हणून त्यापैकी काही खेळण्यांची नावे आणि त्यामागील वैज्ञानिक तत्व बघू या. डोलणारी, न पडणारी बाहुली. गुरुत्वाकर्षण या तत्वावर हे खेळणं बनवलेलं आहे. बाजारातही अशी बाहुली मिळतेच, पण तयार खेळण्यांशी खेळताना हे तत्व मुलांच्या लक्षात येत नाही. पॅरॅशूटच्या खेळण्यात गुरुत्वाकर्षण आणि हवेचा ऊर्ध्वगामी दाब या तत्वांचा वापर केला आहे. न्यूटनचा पाळणा या खेळात ऊर्जेचे संक्रमण ( transfar of energy) हे तत्व वापरले आहे. (कॅरम या खेळात स्ट्रायकरने सोंगटी मारून ती पॉकेटमध्ये घालवायची असते. त्यातही हेच तत्व आहे.) हवेतील मत्सालय किंवा प्राणी संग्रहालय यात तरफेचे तत्व वापरले आहे.

दोन आरशात विशिष्ट कोन करून त्याच्या पुढे वस्तू ठेवल्यावर तिच्या किती प्रतिमा मिळतात? कोन कमी-जास्त केल्यावर मिळणार्याय प्रतिमांची संख्या कशी कमी जास्त होते, कोन जितका लहान, तितकी प्रतिमांची संख्या जास्त. असं बघता बघता दोन आरशात शून्य कोन ठेवला, म्हणजेच समांतर आरसे ठेवले, तर प्रतिमा कशा असंख्य मिळतात, हे दाखवता येते. या सार्याल प्रयत्नातून अनेक गोष्टी मुले स्वत:च शिकतात. शोभादर्शक बाजारात मिळतं. नळकांडं फिरवलं की आतल्या आकृती बदलतात. ते सारं पहाण्यात मुले रमून जातात. मुलांनी ते स्वत: तयार करावं. प्रथम नळकांडे तयार करावे. तीन आरशांच्या दीड इंच रुंदी व सहा ते आठ इंच लांबीचे आरसे त्रिकोण तयार करून आत बसवावेत. आत काचा, मणी, रंगीत कागद घालावेत. नळकांद्याच्या टोकाला पारदर्शक कागद लावून त्याला पुढे पुठ्ठा लावावा. पुठ्ठयाला बघण्यासाठी मधोमध छिद्र पाडावे. काचा, मणी, रंगीत कागद यांच्या कोन करून ठेवलेल्या आरशांमुळे अनेक प्रतिमा तयार होऊन नयनरम्य आकृती दिसते. नळकांडे हलवताच आतल्या आकृत्या बदलतात. शोभादर्शकाला तीन काचांच्याऐवजी  चार किंवा पाच काचा लावल्या तर…आत त्रिकोणाऐवजी चौकोन, पंचकोन तयार होईल. मग दिसणार्याय प्रतिमांमध्ये काय फरक दिसेल? मुलांना विचारप्रवृत्त करावे. निरीक्षण करायला, शोधून काढायला सांगावे. भालबा म्हणतात, ‘मुलांनी स्वत:च अशी काही खेळणी बनवली, तर ती क्रियाशील होतील. स्वत: वस्तू तयार केल्याचा आनंद मिळेल. ती बनवताना आत्मविश्वास, चिकाटी हे गुण वाढीला लागतील आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे यातून जी वैज्ञानिक तत्वे मुले शिकतील ती कधीच विसरणार नाहीत. पाठांतरापेक्षा हे ज्ञान टिकाऊ स्वरूपाचे असेल. या सार्याणतून पुढची पिढी पढिक पंडित न बनता क्रियाशील बनेल.’

तत्व, विचार आणि कल्पना या आपआपल्या जागी कितीही सुयोग्य असल्या, तरी व्यवहारात त्यांची उपयोगिता सिद्ध होणं महत्वाचं असतं. सिस्टेड फौंडेशनने आपल्या ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समज’ या उपक्रमाची उपयुक्तता आजमावण्यासाठी पलूस, देशिंग, सखराळे आणि कणेरी मठ येथील शाळेतून यासंबंधीच्या कार्यशाळा घेतल्या. २००-४००मुले होती. मुले खेळणी बनवण्यात रमून गेली होती. 

शाळेत कार्यशाळा घ्यायची ठरली की शाळाप्रमुखांशी संपर्क साधून कार्यशाळेमागचा हेतू स्पष्ट केला जातो. त्यांच्या संमतीने दिवस निश्चित झाला की जी खेळणी कार्यशाळेत बनवून घ्यायची त्याची यादी, त्यामागील वैज्ञानिक तत्व, खेळणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य-साधने, त्याची चित्राकृती शाळेकडे पाठवली जाते. साधारणपणे एका ठिकाणी पाच खेळण्यांची माहिती दिली जाते. मुलांनी साहित्य आणावे, असेही संगितले जाते. न आणलेले साहित्य आयोजकांकडून पुरवले जाते. प्रत्यक्ष कार्यशाळा सुरू करताना प्रथम त्या त्या खेळण्याची माहिती सांगितली जाते. खेळणी करून दाखवली जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांचे ५-५ चे गट केले जातात. त्यांना खेळणी करण्यास संगितले जाते. प्रत्येक गटाला वेगवेगळी खेळणी तयार करण्यास सांगितले जाते. मुले काम करत असताना अर्थातच त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते. त्यांना मार्गदर्शन केले जाते. कार्यशाळेचा अवधी तीन तासांचा असतो. त्यात काही गटात एक, काही गटात दोन, तर क्वचित एखाद्या गटात तीन खेळणीही बनतात. गट तयार करताना मुलांचे वय अथवा इयत्ता विचारात घेतली जात नाही. पाचवी ते नववी मुलांचा समावेश या कार्यशाळेत असतो.

प्रा. भलबा केळकर, डॉ. सुहास खांबे आणि एखादा मदतनीस असे तिघे जण कार्यशाळेत मार्गदर्शन करतात. काही वेळा शाळा स्वत: संपर्क करून पुन्हा कार्यशाळा घेण्याविषयी विनंती करते. पलूस इथे चार वेळा कार्यशाळा झाली आहे.  एका कार्यशाळेसाठी साधारणपणे दहा हजार खर्च येतो. सुरूवातीला हा खर्च, ‘घरचं खाऊन लष्करच्या भाकरी…’ अशी टीका सहन करत भलाबांनीच केलाय. शिक्षण पद्धतीतील परिवर्तनची आत्यंतिक आस ( passion) हेच त्याच्यामागे कारण आहे. आता फाउंडेशन स्थापन झालय.

सध्याचे शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी बघू जाता, हा उपक्रम अधीक प्रभावीपणे चळवळीत रूपांतरित होईल, असे वाटू लागले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, १४ तालुक्यांच्या गावी सायन्स सेंटर स्थापन झाली आहेत. महाराष्ट्रातील  सायन्स सेंटर स्थापन करण्यात अजिंक्य कुलकर्णी यांचे मोठेच परिश्रम आहेत. त्यांनी लखनौ, चंदीगड, दिल्ली, कानपूर, चेन्नई इ. ठिकाणी सायन्स सेंटर स्थापन केली आहेत आणि त्याचे काम-काज कसे चालावे, याचे मॉडेल पद्मनाभ केळकर यांनी तयार केले आहे. महाराष्ट्रात प्रत्येक सायन्स सेंटरसाठी चार शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील आशा ५६ शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे काम प्रा. भलबा केळकर, डॉ. सुहास खांबे यांनी केले आहे. त्यांच्यामार्फत शाळाशाळातून, ‘खेळण्यातून वैज्ञानिक तत्वांची समाज’ हा उपक्रम रुजत वाढत जाईल, असे वाटते.

वसई ते कोल्हापूर या पट्ट्यातील, जो डोंगराळ भाग आहे, तिथे आश्रम शाळा (निवासी शाळा) आहेत. २०१९पर्यन्त या शाळांमधून सायन्स सेंटर्स स्थापन झाली आहेत. या प्रत्येक आश्रम शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण प्रा. भलबा केळकर, डॉ. सुहास खांबे आणि पद्मनाभ केळकर यांनी केले आहे. सूर्य उगावतो आहे. आता प्रतीक्षा आहे त्याच्या सर्वदूर पसरणार्यां झळझळित किरणांची.  

© सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल – kelkar1234@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोयता… भाग – 2 ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

श्री सचिन वसंत पाटील

? जीवनरंग ?

☆ कोयता… भाग – 2 ☆ श्री सचिन वसंत पाटील ☆

(कारखान्यावर एवढ्या दाट वस्तीत दिवसाउजेडी बाई माणसानं परसाकडं जाणं अवघडच. जरी पोटात कळ आलीच, तरी अंधार होईपर्यंत ती तिला तसीच दाबून ठेवते.) — इथून पुढे —

अण्णा पहाटे-पहाटे बैलगाडी जुंपून कामावर निघतो. अंतरा अंतरावर असणाऱ्या सात-आठ खोपीतला एक गडी आणि एकेक बैलगाडी. अशी वरात निघते. एकापाठोपाठ एक… त्यापाठोपाठ असणारी मुकादमाची बुलट. लांब लांब जाणारा बुलटचा आवाज… बुडबुडऽ… बुडबुडऽ… बुड बुडऽ… मग तळ रिकामा होतो. 

सुलीच्या घरातली एकुलती शेळी गाभण आहे. दिवस भरलेत तिचे. विल वाटतंय एक-दोन दिवसांत. शेळीचं बाळंतपण करण्यातही सुली तरबेज आहे. त्याची चिंता तिला नाही. पण ढिम्म् दुपार तिला खायला उठते. तळावर क्वचित कोणी माणूस. शेरडू, करडू, दुभत्या गायीम्हशी. एखांदी म्हाताकोतारी बाई. जनावरांच्या उसाबरीसाठी राह्यलेली. एवढेच सोबती.

शेरड्यांची उसाबर आवरल्यावर सुलीला भर दुपार उदास, एकलकोंडी वाटते. वारा गप्प गप्प होतो. वातावरण गुढगंभीर राहतं. मधेच एखादं शेरडीचं करडू आईच्या आठवणीनं कातर होऊन ओरडतं नि गंभीर दुपारच्या पोटात कुणीतरी सुरा खुपसल्यासारखं वाटतं. उगी मन अस्वस्थ होतं. काही सुचत नाही. कुठं जावावं? कुणाबरोबर बोलावं? सुली कंटाळते. हळूहळू दुपार टळते. उन्हं मवाळू लागतात. मग कारखान्यावरली उंडगी पोरं मोठ्या रस्त्यावरून हेलपाटे घालतात. पानपट्टी भोवताली टोळकं करून मावा खावून पिचीपिची थुकत बसतात. जातायेता खोपीत कुठं कोण दिसतंय का तपासून बघतात.

अलीकडं एका टोळक्याला सुलीचा शोध लागलाय. वाटेवरून तिरकं तिरकं बघत ती हेलपाटे घालतात. सुली दिसताच तोंडात बोटं घालून शिट्ट्या मारतात. विनाकारण गाडीचा हाॅर्न वाजवतात. अलीकडं त्यांचा त्रास खूपच वाढलाय. कधी कुठलं हिप्पीवालं पोरटं येऊन हात धरंल सांगता येत नाही. पण सुली घरात कुणालाच सांगत नाही. बोलत नाही. वाटेवरल्या पोरांच्या नजरेपासून लपत-छपत त्रास सहन करत रहाते. घरातलं सैपाकपाणी, जनावरांची उसाबर करत रहाते. अण्णाला काही कमी पडू देत नाही.

गावाकडं हुती तवा सुलीची आज्जी म्हणत होती, “पोरगी न्हातीधुती झालीय अण्णा.. अवंदा उजवून टाक.. ज्याचं धन जाऊंदे त्याच्या घरी!” 

तिनं लगोलग तेंच्याच टोळीतला एक नवरा मुलगा शोधून काढला. आज्जीच्या भणीकडनं लांबणं पावन्यापैचा संमंद होता. नंदू त्याचं नाव. सहा फुट उंचीचा नंदू आडदांड होता. ओबडधोबड हातपाय आणि भरीव मनगट असलेला ह्यो बापय खडबडीत तोंडाचा होता. अंगावर, हाता-पायांवर भरपूर केस होते. काळ्याकुट्ट गुंड दगडावर बचकभर आकाराचा बटाटा ठेवावा तसं त्याचं नाक होतं. ऐन पंचवीशीतील नंदू कामाला वाघ होता. पहाटे पहाटेला कोयता घेऊन शेजंला भिडला की टण-दीड टण ऊस आडवा केल्याशिवाय मागं हटत नव्हता. हेच्या कोयत्याचा फडात कायम पयला नंबर. कोयता घेऊन ह्यो फडातनं बाहेर निघाला, की बारकी पोरंटोरं त्याला घाबरायची.

सुलीही त्याच्यापासून दबूनच असायची. त्याचे तांबरलेले डोळे बघितले की तिला भीतीच वाटायची. नवरा म्हणून काय, पण तो तिला शेजारी म्हणूनही आवडत नव्हता. उभ्या आयुष्यात ती त्याच्याशी कधी बोलली नव्हती. आजीची अशी समजूत होती की, तो कामाला वाघ आहे. त्याच्या मागं पडलेल्या ऊसाच्या मोळ्या बांधायला दोन-दोन बायका पुरत नाहीत. पाण्यागत पैसा मिळवील त्यो. राणीगत ठेवील पोरीला. अशी आज्जीची समजूत होती.

जोडीदार कसा असावा याचीही तिने काही मनातल्या मनात स्वप्ने बघितलेली. नवरा मुलगा गोरागोमटा. उंचापुरा. भरदार छातीचा. मानेवर केस रूळणारा. नाका-डोळ्यानं देखणापान असावा… असं तिला वाटत होतं.

आज्जीनं, नंदूच्या स्थळाची गोष्ट एकदा अण्णांच्या कानावर घातली. नंदूबद्दल ती गुणगान गाऊ लागली. तर अण्णा म्हणालं, 

“अाजून कुठं मोठी झालीय ती, ल्हान पोरच हाय!”

“ल्हान का असतीया, हिच्याबरोबरीच्या पोरी बगजा.”

“नेमापरमाणं अठरा वरसं तरी हुंदेल. जाऊंदेल अजून दोन पावसाळं!”

त्यावर आज्जी म्हणाली, “हिच्याबरोबरच्या पोरी बगजा. लग्नं हून दोन-दोन पोरंबी झाली तेंनला!”

“जगाचं काय असायचं ते आसुंदे, माज्या पुरगीचं लगीन वय पुरं झाल्यावरच हुईल!” असं अण्णानी निकराचं सांगितल्यावर आज्जी पुढं काय बोलणार? गप्पच झाली ती. 

खूप खूप बरं वाटलं सुलीला. बापाच्या मयेनं गळा दाटून आला. कसायाच्या तावडीत घावलेलं कोकरू हातातनं सुटावं आणि लांब जंगलात पळून जावावं, तसं सुलीला वाटलं.

आठ वाजून गेले असावेत. अजून कसा आला नाही अण्णा? फडावरलं कोणच गाडीवान आल्यालं न्हाईत खरं. त्यामुळं गाड्या खाली झाल्या नसाव्यात… निदान मुकादम तरी फटफटीवरून यायला पायजे होता. काही निरोप-बिरोप घेऊन. त्योबी अजून आलेला नाही!

मांडीवर झोपलेल्या आपल्या धाकल्या भावाला थोपटत, त्याचे मऊसर केस कुरवाळीत सुली विचार करीत होती. बाळाला आता झोप लागलेली. तरी वेळ जावा म्हणून ती त्याला थोपटीत होती.

आजूबाजूच्या खोपटातल्या चुली विझत चालल्या होत्या. क्वचित कुठे हालचाल जाणवत होती. बोलण्याचा आवाज बंद झाला होता. दारापाठीमागली शेळी रवंथ करीत खाली बसली होती. तिने आता डोळे मिटले होते. चुलीवर ठेवलेली चिमणी एकाकी जळत होती. वाऱ्याच्या झुळकेवर तिची ज्योत आळोखे-पिळोखे देत होती. तीही आता आळसावली होती.

पोराला हाथरूण टाकायला म्हणून सुली आत गेली. कुडाशेजारची सप्पय जागा तिने निवडली. खाली पडलेलं खुरपं आणि कोयता तिने कुडाच्या कामठ्यात अडकवून ठेवला. खाली अंथरलेल्या पटकुरावर तिने एक मऊमऊ दुपटं अंथरलं. आणि त्यावर बाळाला घातलं. 

लांबनं कुठूनतरी बुलटचा आवाज येत होता. हळूहळू तो मोठा होऊ लागला. बुडबुडऽ.. बुडबुडऽ.. बुड बुडऽ… सुलीनं वाकून खिडकीतनं बघितलं. काळ्यामिट्ट अंधाराला चिरत बुलटचा फोकस पुढंपुढं सरकत होता. गाडीच्या आवाजावरनं सुलीनं ताडलं. ही मुकादमचीच गाडी हाय. उगीच घाबरल्यागत झालं तिला. ती चुलीजवळ जाऊन बसली. बाहेरचा अंदाज घेऊ लागली.

गाडी आली ती सुलीच्या दारातच येऊन उभी राह्यली. बाहेरून हाळी आली, 

“सुलेऽ.. ये सुलेऽ…!” 

पहिल्यांदा तिनं हाक ऐकून, न ऐकल्यागत केलं. पुन्हा दोन-तीन हाळ्या आल्या. आता बोललंच पाहिजे. ती वाकून पुढे झाली. दाराच्या वर्तुळातून तिचे दोन डोळे मांजरागत चकाकले. भितभित तिनं विचारलं, 

“कोण हाय त्ये!” 

“आगं मी हाय, मुकादम! तुझ्या अण्णाला यायला उशीर हुईल. टायर फुटलीया गाडीची. सकाळपतूर हुईल दुरूस्त. रातभर तिथंच थांबावं लागंल. जिवून झोप म्हणून सांगितलंय त्येनं!”

“हां.. हांऽ.. बरंऽ..बरंऽ..!”

“बाकी समद्या गाड्या कशा आल्या न्हाईत मग?” न राहून सुलीनं भीतभितच विचारलं. 

“येतील आत्ता एवड्यात. ह्या मुरगळ्यावर आल्यात नव्हंका!” असं म्हणून मुकादमानं गाडीला किक मारली. आपल्या खोपीपशी जाऊन तो थांबला.

आता अण्णा सकाळीच येणार, रात्रभर आपुन खोपीत एकटंच, या धास्तीनं सुलीच्या अंगाचा थरकाप उडाला. यापूर्वी कधीच आसं झालं नव्हतं. अण्णा नसलं तरी आई हमखास घरात असायची. त्यामुळं तिला निर्धास्त वाटायचं. पण, अशी वेळ कधी आली नव्हती. ती घाबरून गेली. पाय थरथरू लागले. काय करावं? आजच्या दिवस शेजारच्या कुणाच्यातरी खोपीत झोपायला जावावं का? पर आपली खोप, जनावरं वार्‍यावर सोडून दुसऱ्याच्या घरात कशाला झोपाय जावावं. त्यात ती शेरडी एक व्याला झालीया. कुठं रात्रीच पाणटूळ भाईर आलं तर? आणि समजा व्याली यवस्थित आणि वार पडंना झाली तर? वार कुत्र्यानं वडून न्हेली तर? तिला नुसता विचार सुद्धा सहन होईना.

– क्रमशः भाग दुसरा

©  श्री सचिन वसंत पाटील

कर्नाळ, सांगली. मोबा. ८२७५३७७०४९.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रवास, माय-लेकीचा… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ प्रवास, माय-लेकीचा… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

हानपणी मराठी परिक्षेत नेहमी निबंध असे ‘माझी आई’. तेव्हा वाक्ये ठरलेली असत. “माझी आई खूप सुंदर आहे, माझी आई छान गाणं म्हणते, माझी आई स्वयंपाक खूप छान करते, माझी आई मला खूप आवडते”. झाला निबंध. भाषा बदलली तरी वाक्य तीच.. फक्त अनुवादित. ह्या पलिकडे लिहायचं तर आई समजलेलीच कुठे असते आपल्याला त्या वयात. बस आई आई असते. गरज असते (जी अनंत काळाची असते), श्वास असते म्हणा ना.

‘आई’ म्हणजे काय हे समजेपर्यंत निबंध लिहिण्याचं वय निघून गेलेलं असतं किंवा आई ह्या विषयावर निबंध लिहिणं बालिशपणाचं वाटतं. कारण तोपर्यंत आपल्यावर बाहेरच्या जगाचा प्रभाव असतो आणि आपले idols बदललेले असतात. अपरिपक्व विचारांमुळे हे idols पण बदलत असतात, प्रगल्भतेने त्यांना स्थैर्य येतं. आईला मात्र backseat दिलं जातं आणि ते ती अगदी सहज स्वीकारते.

आईच्या पदरापासून सुरु झालेला माझा आणि आईचा हा प्रवास…

माझ्या जन्माच्या वेळी खूप दिव्यातून आईला जावे लागले, माझा जन्म झाला आणि आईचा पुनर्जन्म. पुढे पूर्ण वर्ष माझी खूप काळजी घ्यावी लागणार होती जी तिने लीलया पार पाडली, कशी ते मात्र मला मी आई झाल्यावर कळले. 

“तू कुणाची” असा प्रश्न विचारताच माझं चटदिशी उत्तर येई , ‘मी बाबांची’. नकळत आईच्या मनावर एक ओरखडा . पण हसतमुखाने लटक्या रागात तिची एखादी चापट, एवढीच प्रतिक्रिया. आज कळतं की नकळत किती आघात करत असतो आपण आईच्या मनावर.

तेव्हा आई ही माझी प्रतिस्पर्धी, स्त्री म्हणून बाबांच्या प्रेमाची वाटेकरी, बालबुद्धीला एवढंच कळत असे. आमच्यात fine tuning होऊ लागलं आणि मी आईची कधी झाले कळलंच नाही.

लहानपणी प्रत्येकाला वाटत असतं की आपली आई एक परी आहे आणि तिच्याकडे जादुची छडी आहे. मला पण असंच वाटे, खास करुन दिवाळीत. कारण रात्री झोपताना सामसूम दिसणाऱ्या स्वयंपाकघरात सकाळी उठले की स्वादिष्ट फराळाचा घमघमाट असे, तेव्हा कळायचंच नाही ही झोपते कधी, ऊठते कधी आणि सगळं करते कधी. फक्त खायचं तेवढं कळत असे. दिवाळीची आणखी एक आठवण म्हणजे तिची वसुबारसेची रांगोळी. पाटावर अत्यंत सराईतपणे ती गाय आणि वासरू काढत असे, ते ही रांगोळीने. मी दिवसभर त्या रांगोळीची वाट बघत बसे. आज त्याच थरथरत्या हातांना रांगोळीची दोन बोटं ओढणं किती जड जातं हे बघून गलबलून येतं.

पण “मी बाबांची” म्हणणारी मी , वाढले मात्र आईच्या शिस्तीत. नुसतं बाबांच्या रागे भरण्याने ताप काढणारी (आणि नंतर त्यांच्याशी कट्टी घेणारी) मी आणि हवालदील बाबा, हे चित्र बघताच त्या माऊलीला लगेच समजले, इकडे शिस्त लावण्याचे काम तिलाच करावे लागणार आणि ते पण मोठ्या खुबीने!

मग काय सुरु झाला आमचा क्लास. तिच्या ह्या क्लासमधे ‘To Do ‘ ची लिस्ट कमी , ‘Not to Do’ ची 

लिस्टच मोठी होती.,असं वागायचं नाही, असं बोलायचं नाही. मी कधी रागाने तिला म्हणे, “काय गं सारखी नकार देत असतेस? ” तर शांतपणे मला समजावी, ” कारण तुला नकार पचवता आला पाहिजे आणि नकार देता पण आला पाहिजे”. त्या वयात तिचं बोलणं किती कळलं कुणास ठाऊक, पण पुढच्या आयुष्यात नक्कीच उपयोग झाला. 

शालेय जीवनातून कॉलेजमध्ये पाऊल ठेवले आणि तिच्या नजरेला आणिकच धार आली. बुरसटलेल्या विचारांची नाही ती, पण मैत्री कुणाशी असावी आणि कशी असावी ह्याचे मात्र नियम होते. तिच्यात आता एक मुलीची आई जरा जास्तच डोकावू लागली. आता शिस्तीची जागा माझ्या बद्दल वाटणाऱ्या काळजीने घेतली. आणि त्या काळजीपोटी माझ्यावर वेळेत घरी येण्याचं बंधन घातलं गेलं. कधी चुकून उशीर झाला तर तिचा काळजीने चेहरा काळवंडलेला असे, मग मलाच अपराधी वाटे. इतक्या वर्षांनी आज ही तीच अवस्था असते तिची.

तिच्याकडून शिकले.. तडजोड कधी, कुठे आणि किती करायची, तेही आत्मसन्मान सांभाळून. तिच्या प्रत्येक कृतीत माझ्यासाठी शिकवण असे. कणिक भिजवताना परात स्वच्छ दिसली पाहिजे, उष्टी खरकटी भांडी इतकी स्वच्छ पाहिजेत की कामवालीला आज स्वयंपाक काय होता ते कळता कामा नये. करंजी करताना एक मोदक ,आणि मोदक करताना एक करंजी करायचीच असते, का विचारलं की म्हणे बहिणीला भाऊ आणि भावाला बहिण ही पहिजेच. ह्या आणि अशा अनेक गोष्टी शिकले ज्या मला पुढे कामी आल्या. बाकी बऱ्याच गोष्टी तर तिला बघून बघूनच शिकले. असेच तर घडत असतात संस्कार. 

तर ही माझी आई, माझं लग्न ठरल्यावर मात्र थोडी चिडचिडी झाली. कदाचित धास्तावली. कदाचित मला पुढे जड जाऊ नये म्हणून मुद्दाम मायेचे पाश सैल करू बघत होती. कदाचित स्वतःलाच जड जाऊ नये म्हणून? सासरी मी पटकन रुळावी म्हणून? असेल कदचित !!

मुलगी म्हणून अती स्तुती कधीच केली नाही. एखादा पदार्थ मी केला की छान झालाय असं म्हणायची.. की मी समजून जायचे अजून सुधारणा करण्यास वाव आहे. “तुला माझं कौतुकच नाही ” हे माझं पेटंट वाक्यं आणि, “मुळूमुळू रडायचं नाही, येत नाही म्हणायचं नाही, करुन बघ, शिकून घे”.. ही तिची पेटंट वाक्यं. पुढे मला मुलं झाल्यावर ह्या वाक्यांत आणिक भर पडली . ” सारखं ओरडू नाही गं मुलांना ! किती बोलतेस ! अशाने कोडगी होतील ती! ” …. बघा, आहे का आता? आईची आजी झाल्यावर नियम आणि शिस्त दोन्ही शिथिल होतात, किंबहुना पूर्णच बदलतात. नातवंडांना सगळं माफ !

तर अशी मी तिच्या तालमीत घडत गेले, नुसतीच घडले नाही तर सक्षम झाले.. मानसिक दृष्ट्या.

आज लिहिता लिहिता तिची अनेक रुपं माझ्या डोळ्यासमोर सरसर सरकली. रात्री जागून माझ्यासाठी परकर पोलकं शिवणारी, तेही हाताने. माझ्यासाठी मेहनत घेणारी , मला सगळं आलच पाहिजे असा अट्टाहास करणारी, आपली मुलगी आयुष्याच्या कुठल्याही शर्यतीत मागे पडू नये म्हणून धडपडणारी.

मला आराम मिळावा म्हणून माझ्या तान्हुल्यांना सांभाळणारी, आणखी किती रुपात दिसली ती मला काय आणि किती लिहू? 

खरं तर लिहूच काय?

… ‘आई’ हाच एक अखंड ग्रंथ असतो, ज्याची कितीही वाचलं तरी पानं संपतच नाहीत, असं वाटतं. अजून कितीतरी वाचायचे बाकी आहे.

हा प्रवास फक्त माझा आणि आईचा नसून सगळ्या माय-लेकींचा प्रवास आहे. काळानुरूप त्यात मैत्रीची भर पडली आणि तो आणिकच सुंदर, सुखकर आणि समृद्ध झाला. आपला हा प्रवास असाच चालू राहो….सर्व मायलेकींसाठी.

लेखिका : अज्ञात. 

प्रस्तुती : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ई-सिगारेट… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? इंद्रधनुष्य ? 

☆ ई-सिगारेट… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

शाळा, महाविद्यालयातील तरुणाई अडकतेय ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’च्या जाळ्यात,सिगारेटची जागा आता” ई सिगारेटनी” घेतली. वेब सिगरेट नाव नवीन नसले तरी अनेक शाळांमध्ये व महाविद्यालयीन परीसरात या वेब ची लाट आली आहे. सातशे पन्नास रुपया पासून पाच हजार रुपया पर्यंत किंमत असलेली ही वेब सिगरेट शाळा महाविद्यालयातील शिक्षकांची डोके दुखी बनली आहे ज्या सिगारेटसारखा धूर होत नाही, अशी सिगारेट म्हणजे ‘ई- सिगारेट’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’. तंबाखूजन्य सिगरेट न ओढता तंबाखूमध्ये असलेलं निकोटिन हे द्रव्य शरीरात घेण्याचा एक मार्ग म्हणून ही सिगारेट वापरली जाते. ई-सिगारेट दिसतेही साध्या सिगारेटसारखीच. आता नवीन जी वेब सिगरेट आली आहे ती पेनड्राइव, पेन, लायटरच्या आकाराची. फरक असा की ई-सिगारेटमध्ये तंबाखू नव्हे, तर थेट द्रवरूपातलं निकोटिन असतं. ही सिगारेट पेटवण्यासाठी लाईटर किंवा काडेपेटी लागत नाही, कारण या सिगारेटच्या उपकरणात एका लहानशा बॅटरीचा समावेश असतो. जेव्हा सिगारेट ओढण्याची कृती केली जाते तेव्हा या सिगारेटमधील द्रवरूप निकोटिनची वाफ तयार होऊन ती ओढली जाते. या वाफेला प्रत्यक्ष धूम्रपान केल्यासारखा वास नसतो. सिगारेट प्रत्यक्ष पेटवली जात नसल्यामुळे त्यापासून राखही तयार होत नाही.यामुळे सिगारेट ओढल्याची निशाणी राहत नाही. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी मधल्या सुट्टीत याचा वापर बिनदिक्कत करतात आणि नेहमी प्रमाणेच वर्गात बसतात. काही विद्यार्थी शाळेत पेंगलेले दिसताहेत. शिक्षक सुध्दा भयभीत झाले आहेत. कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. ओरडण्याचा सोय नाही.

अशी मुले ओळखणे फारच कठीण असतात. इतर नशे प्रमाणे कोणत्याही प्रकारची चिन्हे दिसत नसल्याने विद्यार्थ्यांना हुडकून काढणे दुरास्पद असते.वर्गीतील असामान्य वर्तन. व अध्ययन अध्यापन प्रक्रियेत अशा मुलांचा समावेश नसणे यावरून तर कधी विद्यार्थ्यांकडून अशा विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकांना प्राप्त होते. अशा मुलांचे समुपदेशन करणे व व्यसनापासून दूर करणे हे शिक्षकांचे काम आहे. अनेकदा विद्यार्थी आपण व्यसन करतच नाही असे सांगतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पालक अनभिज्ञ आहेत. ज्यावेळी पालकांना शाळेतून फोन जातो त्यावेळी त्यांना सुद्धा मानसिक धक्का बसतो.

अनेकदा काही पालक आपला मुलगा या वेब सिगरेटच्या आहारी गेला आहे हे मान्य करण्यास तयार होत नाही. अशावेळी शिक्षक मात्र पालकांच्या रोषास बळी पडतो. शाळा, महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून पोलीस तक्रार नाही व कुठेही वाच्यता नाही. अनेक प्रकरणे दाबून टाकली जातात. भारतीय कायद्याने अशा प्रकारच्या सिगारेट वापरण्यावर व विक्रीवर बंदी आहे. असे असले तरी या व्यवसायात गुंतलेले लोक आपले सावज शाळा, महाविद्यालयाबाहेर असलेल्या पानपट्टी दुकाने व खाऊगल्लीत हेरतात. दुर्दैवाने तरुण मुले, मुलीही या व्यसनात गुरफटत आहेत. सर्व साधारणपणे हुक्या प्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवर्सची जत्रा वेब सिगरेट मध्ये असते असे या मुलांच्या बोलण्यातून जाणवले. आकर्षणापोटी तर कधी मौज मजेसाठी हजारो रुपये खर्चून वेब घेतली जाते व सामाईक चस्का घेतले जातात.

द्रव्यरूपातील निकोटिनची विद्युत उपकरणाच्या माध्यमातून वाफ बनवली जाते आणि याचा धूम्रपानासाठी वापर केला जातो याला ई धूम्रपान असे म्हटले जाते. यामध्ये ई सिगारेट, फ्लेवर हुक्का, ई शिशा इत्यादी निकोटिनयुक्त उपकरणांचा समावेश आहे.शरीराला अपायकारक असलेली ही द्रवे आमच्या तरुणपिढीची शरीर व मने खोकली करत आहे व त्याबरोबर आपल्या देशातील तरुण पिढी बरबाद होत आहे. या वेबचा धूर वेळीच रोखला नाही तर भविष्यात शाळा महाविद्यालये ही वेबचा अड्डा बनतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सोनेरी दिवस… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ सोनेरी दिवस… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

शाळेत असताना  टीचरकडून हातावर छडी पडल्यावर मी  नेहमी माझ्या हाफ पँट वर हात पुसून दुसरा हात पुढे करत असे….कारण मी साफसफाईच्या बाबतीत खूप जागरूक होतो.

माझे सगळे टीचर मला क्लासमध्ये उभा रहायला सांगून शिकवत असत.कारण माहितीये? ….ते सगळे माझी खूप इज्जत करत असत.

माझ्या शालेय दिवसांमध्ये,  माझे शिक्षक बर्‍याचदा माझ्या आई- पप्पांना घेऊन यायला सांगत असत , कारण ते काहीही मला direct सांगायला घाबरत असत…

मी जे काही लिहायचो, ते वाचायला माझ्या शिक्षकांना खूप आवडत असे,  माझे हस्ताक्षर त्यांना खूप आवडत असे. त्याच कारणास्तव ते बरेचवेळा मला एकच उत्तर 10 वेळा लिहून आणायला सांगत असत…

कितीतरी वेळेस शिक्षक मला न विचारता त्यांचा किमती chalk माझ्या दिशेने कॅच पकडण्यासाठी फेकत असत…ही गोष्ट वेगळी की ती कॅच सुटून मलाच chalk लागत असे.

उद्देश एकच होता की मी चांगला fielder बनावं . हीच काय ती अपेक्षा होती त्यांची माझ्याकडून.

परीक्षेच्या वेळी बहुतेक वेळा मला 3-4 शिक्षक z टाइप सुरक्षा देण्यासाठी माझ्या बेंचच्या आजूबाजूला पूर्ण exam संपेपर्यंत उभे राहत असत.

कितीतरी वेळा मला बेंचवर उभं करून मला सन्मानित करण्यात येत असे, 

कारण मी बाकी मुलांना व्यवस्थित दिसून त्यांनी माझ्याकडून प्रेरणा  घ्यावी आणि मला  वर्गातल्या  सर्व मुली व्यवस्थित दिसाव्यात, हा मुख्य उद्देश असायचा शिक्षकांचा.

शिक्षकांना माझ्या आरोग्याची विशेष काळजी होती.

माझ्या शरीराला vitamin D आणि मोकळी हवा मिळावी, ह्यासाठी मला बरेच वेळा सकाळच्या कोवळ्या उन्हात मैदानाला 10 फेर्‍या मारायला सांगितल्या जात असत.

जेव्हा की बाकी मुलं वर्गात घाम गाळत , गुदमरत शिकत असत.

मी इतर मुलांपेक्षा हुशार असल्याने माझे बहुतेक सगळे शिक्षक मला नेहमी म्हणत असत….

तू शाळेत का येतोस?..तुला ह्याची गरज नाहीये…

वाह ! काय ते सोनेरी दिवस होते!

लेखक – अज्ञात 

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ लेखनी सुमित्र की # 128 – गीत – आओ तो केवल तुम आओ… ☆ डॉ. राजकुमार तिवारी “सुमित्र” ☆

डॉ राजकुमार तिवारी ‘सुमित्र’

(संस्कारधानी  जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी  को सादर चरण स्पर्श । वे आज भी  हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया।  वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं  एक भावप्रवण गीत – आओ तो केवल तुम आओ…।)

✍  साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 128 – गीत – आओ तो केवल तुम आओ…  ✍

आओ तो केवल तुम आओ

मत सपनों की भीड़ लगाओ।

 

संवादी सपने जब अति

यादों की बाती उकसाते

दिया नहीं घाव की मरहम

किन्तु नमक तो मत छिड़काओ।

आओ तो केवल तुम आओ ।

 

सपनों की तासीर गर्म है

अश्रु, आँख का देह धर्म है

विषम भूमि में क्या उपजेगा

मत पानी में आग लगाओ।

आओ तो केवल तुम आओ।

 

एक नाग का एक वंश है

एक दाह है, एक देश है

सुधबुध खो दे समय सपेरा

कोई ऐसा राग सुनाओ।

आओ तो केवल तुम आओ।

© डॉ राजकुमार “सुमित्र”

112 सर्राफा वार्ड, सिटी कोतवाली के पीछे चुन्नीलाल का बाड़ा, जबलपुर, मध्य प्रदेश

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ अभिनव गीत # 127 – “तर्कशीला.. जैसे नहीं रही…” ☆ श्री राघवेंद्र तिवारी ☆

श्री राघवेंद्र तिवारी

(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी  हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार,  मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘​जहाँ दरक कर गिरा समय भी​’​ ( 2014​)​ कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। ​आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है।  आज प्रस्तुत है  आपका एक अभिनव गीत  “तर्कशीला जैसे नहीं रही)

☆ साप्ताहिक स्तम्भ # 127 ☆।। अभिनव गीत ।। ☆

तर्कशीला… जैसे नहीं रही

सुबह सुबह फोन पर

कहा मेरे बॉस ने-

” नीम फूल आये

पड़ौस में

 

देख लेना !

बदल कर चश्मे

वर्तमान मौसम

के करिश्मे

 

दिन ऐसे

लगते जैसे

गाये गये

मालकोंस में

 

धानी सी सूरत

जो हुई

शाख शाख

जैसे छुई मुई

 

है न आश्चर्य

जो आ ठहरा

साहब की

धौंस में

 

कंचनी काया

कमनीय है

पत्ती पत्ती

वंदनीय है

 

तर्कशीला

जैसे नहीं रही

सहजिन

अफसोस में

©  श्री राघवेन्द्र तिवारी

28-02-2021

संपर्क​ ​: ई.एम. – 33, इंडस टाउन, राष्ट्रीय राजमार्ग-12, भोपाल- 462047​, ​मोब : 09424482812​

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय  ≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – मनन चिंतन ☆ संजय दृष्टि – बुआई ☆ श्री संजय भारद्वाज ☆

श्री संजय भारद्वाज

(श्री संजय भारद्वाज जी – एक गंभीर व्यक्तित्व । जितना गहन अध्ययन उतना ही  गंभीर लेखन।  शब्दशिल्प इतना अद्भुत कि उनका पठन ही शब्दों – वाक्यों का आत्मसात हो जाना है।साहित्य उतना ही गंभीर है जितना उनका चिंतन और उतना ही उनका स्वभाव। संभवतः ये सभी शब्द आपस में संयोग रखते हैं  और जीवन के अनुभव हमारे व्यक्तित्व पर अमिट छाप छोड़ जाते हैं।  हम आपको प्रति रविवार उनके साप्ताहिक स्तम्भ – संजय उवाच शीर्षक  के अंतर्गत उनकी चुनिन्दा रचनाएँ आप तक  पहुँचा रहे हैं। सप्ताह के अन्य दिवसों पर आप उनके मनन चिंतन को  संजय दृष्टि के अंतर्गत पढ़ सकते हैं। )

? संजय दृष्टि – बुआई ??

मैंने पौधा रोपा,

फलत: पेड़ पनपा,

तुमने काँक्रीट बोया,

नतीज़ा बंजर रहा…!

© संजय भारद्वाज 

(संध्या 6:48 बजे, 21 फरवरी 2023)

अध्यक्ष– हिंदी आंदोलन परिवार सदस्य– हिंदी अध्ययन मंडल, पुणे विश्वविद्यालय संपादक– हम लोग पूर्व सदस्य– महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी ☆   ट्रस्टी- जाणीव, ए होम फॉर सीनियर सिटिजन्स 

मोबाइल– 9890122603

संजयउवाच@डाटामेल.भारत

writersanjay@gmail.com

☆ आपदां अपहर्तारं ☆

💥 महादेव साधना सम्पन्न हुई। अगली साधना की जानकारी आपको शीघ्र दी जाएगी। 💥

अनुरोध है कि आप स्वयं तो यह प्रयास करें ही साथ ही, इच्छुक मित्रों /परिवार के सदस्यों  को भी प्रेरित करने का प्रयास कर सकते हैं। समय समय पर निर्देशित मंत्र की इच्छानुसार आप जितनी भी माला जप  करना चाहें अपनी सुविधानुसार कर सकते हैं ।यह जप /साधना अपने अपने घरों में अपनी सुविधानुसार की जा सकती है।ऐसा कर हम निश्चित ही सम्पूर्ण मानवता के साथ भूमंडल में सकारात्मक ऊर्जा के संचरण में सहभागी होंगे। इस सन्दर्भ में विस्तृत जानकारी के लिए आप श्री संजय भारद्वाज जी से संपर्क कर सकते हैं। 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares