झोपाळ्यावाचून झुलत झुलत ज्यांनी या जन्मावर शतदा प्रेम केले, ज्यांच्या दारात पहाटे पहाटे केशराचे मोर झुलत असतात आणि ज्यांच्या रात्री चांदण्याचे सुरेल गाणे गात येत असतात, आपल्या लाख चुकांची कबुली देऊनही मनातल्या मोरपिसांची शपथ घालत ते केली पण प्रीती हे ही मनापासून जाहीर करतात, शब्दांवाचूनही ज्यांना शब्दांच्या पलिकडलं कळलेलं असतं पण तरी शब्द शब्द जपून वेच असं जे सांगून जातात, अवघ्या जीवनाचे गाणे करून हासत जावे जाताना असा संदेश सहजपणे जे देतात ते कवीवर्य मंगेश पाडगावकर !त्यांचा आज स्मृतीदिन. पण आज स्मृतीदिन असे तरी कसे म्हणावे? कारण त्यांच्या शब्दांची पाखरं रोजच आपल्या आजुबाजूला स्मृती ठेवून जात असतात. त्यांमुळे प्रत्येक दिवस हा त्यांचा स्मृतीदिनच असतो.
सुमारे साठ वर्षे साहित्याची सेवा करणारे मंगेश पाडगावकर हे मूळचे सिंधू दुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे. कोकणातील निसर्ग बालमनाने टिपला आणि नंतर काव्यात उतरला. त्यांनी मुंबई विद्यापीठात मराठी व संस्कृत या विषयात एम्. ए. पूर्ण केले. काही काळ रूईया महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. मात्र त्यांचे लेखन कार्य अखंडपणे चालू होते.
प्रामुख्याने काव्यनिर्मिती केली असली तरी त्यांनी साहित्याचा अनुवादही विपुल प्रमाणात केला आहे. 1957 साली त्यांनी थाॅमस पेनचे राजनैतिक संबंध हा निबंध अनुवादित केला. 2009 मध्ये बायबल चा अनुवाद केला. कमला सुब्रह्मण्यम यांच्याा मूळ इंग्रजी ग्रंथाचा कथारूप महाभारत या नावाने दोन खंडांत अनुवाद केला आहे. याशिवाय मीरा, कबीर, सूरदास या संत कवींच्या निवडक पदांचाही अनुवाद ही केला आहे. या व्यतिरिक्त विविध विषयांवरील 25 पुस्तकाचा अनुवादही त्यांनी केला आहे.
मराठी साहित्यात कविता हा त्यांचा विशेष आवडीचा प्रांत. त्यांचे काही कविता संग्रह असे: आनंदॠतू, आनंदाचे डोही, उदासबोध उत्सव, कबीर, कविता माणसाच्या माणसांसाठी, काव्यदर्शन, गझल, गिरकी, चांदोमामा, चोरी, जिप्सी, तुझे गीत गाण्यासाठी, तृणपर्वे , त्रिवेणी, धारानृत्य, बोलगाणी, भोलानाथ, भटके पक्षी, सलाम, क्षणिका इत्यादी… त्यांची अनेक काव्ये लयबद्ध, गेय असल्याने त्यांची गीते झाली. शिवाय अनेक भावगीतेही त्यांनी लिहीली आहेत.
त्यांच्या साहित्य सेवेचा वेळोवेळी गौरवही झाला आहे. 2010 साली झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे व विश्व साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते . सलाम या त्यांच्या कविता संग्रहास 1980 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 2008 साली महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. 2013 साली म. सा. प. चा सन्मान व त्याच वर्षी पद्मभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला.
मुंबईतील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे त्यांच्या नावाने भाषासंवर्धन पुरस्कारही दिला जातो.
“आयुष्य हे विध्यात्याच्या वहीतलं पान असतं
रिकामं तर रिकामं , लिहीलं तर छान असतं”
पाडगावकरांनी म्हटल्याप्रमाणे आयुष्याच्या राहिलेल्या पानावर काहीतरी छान लिहीत जाणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे वाटते.
☆☆☆☆☆
द. पं. जोशी:
द. पं. जोशी हे मूळचे परभणीचे. आपले शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर उच्च शिक्षणासाठी ते हैद्राबादला गेले. तेथे एम. ए. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. अभ्यासू वृत्ती, कुशाग्र बुद्धी, इतिहास व पूर्वसूरींबद्दल प्रेम यामुळे हैद्राबादेत ते सार्वजनिक कामात गुंतले. अनेक सार्वजनिक संस्था, मराठी साहित्य परिषद व मराठी महाविद्यालयांशी त्यांचा संबंध आला. 1959 ते 1992 या कालावधीत त्यांनी विवेक वर्धिनी महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.
त्यांचे स्वतंत्र, संपादित व अनुवादीत असे एकूण 15 ग्रंथ प्रकाशित आहेत. विविध नियतकालिकांमधून 100 हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. शिवाय उर्दू व हिंदी भाषेतील अनेक कथा, लेख यांचा मराठीत अनुवाद त्यानी केला आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ते दोनदा उपाध्यक्ष होते. 1998 साली भरलेल्या परभणीचे जिल्हा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी साहित्य परिषद, हैदराबाद या संस्थेचे ते 30 वर्षे कार्यवाह व 8 वर्षे अध्यक्ष होते. या संस्थेच्या पंचधारा या त्रैमासिकाचे त्यांनी अनेक वर्षे संपादन केले होते.
आज त्यांचा स्मृतीदिन! अमराठी प्रदेशात मराठीची सेवा करणा-या द. पं. जोशी याना अभिवादन.
☆☆☆☆☆
श्री सुहास रघुनाथ पंडित
ई-अभिव्यक्ती संपादक मंडळ
मराठी विभाग
संदर्भ: विकीपीडिया, तुझे गीत गाण्यासाठी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
प्रवीण भारती नावाचे एक शिक्षक होते. ते प्राथमिक शाळेतील मुलांना शिकवत असत. त्यांची शाळा गावापासून सात किलोमीटर दूर होती. शाळेच्या आसपासची जागा ही पूर्णपणे निर्जन होती.
त्यांच्या गावातून शाळेपर्यंत जाण्यासाठी क्वचितच वाहन मिळत असे, त्यामुळे ते बरेचदा कुणाकडून तरी लिफ्ट मागत असत. कधी जर लिफ्ट मिळाली नाही, तर असा विचार करत पायीच जात असत की, “देवाने मला दोन पाय दिले आहेत, तर त्यांचा उपयोग कधी होणार.”
जेव्हा प्रवीणजी रोज लिफ्ट मागण्यासाठी उभे राहत तेव्हा विचार करत की, “सरकारने कुठल्या निर्जन ठिकाणी शाळा उघडली आहे, त्यापेक्षा गावातच मी किराणा मालाचं दुकान उघडलं असतं तर बरं झालं असतं.”
रोजच्या कटकटीतून सुटका मिळण्यासाठी प्रवीणजीनी थोडे थोडे पैसे जमा करून, चेतक कंपनीची एक नवीन कोरी करकरीत स्कूटर विकत घेतली. स्वतःचे वाहन नसल्यामुळे जो त्रास प्रवीणजींनी सहन केला होता, त्यामुळे त्यांनी मनाशी एक खूणगाठ बांधली की कोणालाही लिफ्टसाठी नाही म्हणायचं नाही.—
—-कारण, त्यांना हे माहीत होतं की कोणी आपल्याला लिफ्ट नाकारली की किती ओशाळल्यासारखं होतं ते. आता प्रवीणजी रोज स्वतःच्या कोऱ्या करकरीत स्कूटरवरून शाळेत जात असत आणि रस्त्यात कोणी ना कोणी रोज त्यांच्याकडे लिफ्ट मागत असे आणि त्यांच्याबरोबर जात असे. परत येताना सुद्धा कोणी ना कोणी त्यांच्याबरोबर असे.
एक दिवस, जेव्हा प्रवीणजी शाळेतून परत येत होते तेव्हा रस्त्यात, एक व्यक्ती हताश होऊन लिफ्ट मागण्यासाठी हात दाखवत होती. आपल्या सवयीनुसार प्रवीणजींनी आपली स्कूटर थांबवली आणि ती व्यक्ती काहीही न बोलता त्यांच्या स्कूटरवर मागे बसली. थोडं पुढे गेल्यावर त्या व्यक्तीने चाकू काढला आणि प्रवीणजींच्या पाठीवर टेकवून म्हणाला, “असतील तितके सगळे पैसे आणि ही स्कूटर माझ्या हवाली कर.”
ही धमकी ऐकून प्रवीणजी खूप घाबरले आणि त्यांनी लगेच स्कूटर थांबवली. त्यांच्याजवळ जास्त पैसे नव्हतेच. पण ही स्कूटर तर होतीच, जिच्यावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. स्कूटरची किल्ली त्याला देत प्रवीणजी म्हणाले, “एक विनंती आहे.”
“काय ?” त्या व्यक्तीने खेकसून म्हटले.
प्रवीणजी विनंतीच्या सुरात त्याला म्हणाले, “तू कधीही कोणाला हे सांगू नकोस की ही स्कूटर तू कुठून आणि कशी चोरलीस. विश्वास ठेव मी पण पोलिसात तक्रार करणार नाही.”
त्या व्यक्तीने आश्चर्याने विचारले, “का?”
मनामध्ये असलेली भीती आणि चेहऱ्यावर असलेल्या औदासीन्याने प्रवीणजी म्हणाले, “ हा रस्ता खूप उबड-खाबड आणि निर्जन आहे. इथे क्वचितच वाहन मिळते. त्यात या रस्त्यावर जर अशा घटना घडल्या तर जे थोडेथोडके लोक लिफ्ट देतात, तेसुद्धा लिफ्ट देणे बंद करतील.”
प्रवीणजींची ही भावपूर्ण गोष्ट ऐकून ती व्यक्ती हळवी झाली. त्याला प्रवीणजी एक चांगली व्यक्ती वाटली, पण त्यालाही तर स्वत:चे पोट भरायचे होते. ” ठीक आहे ” असं म्हणून तो स्कूटर घेऊन तिथून निघून गेला.
दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवीणजी जेव्हा वर्तमानपत्र घेण्यासाठी दरवाजाजवळ आले व त्यांनी दरवाजा उघडला, तर त्यांना त्यांची स्कूटर समोर उभी असलेली दिसली. प्रवीणजींचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते पळत पळत स्कूटर जवळ गेले आणि आपल्या स्कूटरवर प्रेमाने हात फिरवू लागले, जणूकाही ते त्यांचे मूल होते. त्यांना तिथे एक कागद चिकटवलेला दिसला.
त्यावर लिहिले होते :
“मास्टर साहेब, असं समजू नका की तुमच्या बोलण्याने माझे हृदय द्रवले. काल मी तुमची स्कूटर चोरी करुन गावी गेलो. वाटलं भंगारवाल्याला ती विकून टाकावी. पण ज्याक्षणी भंगारवाल्याने ती स्कूटर पाहिली, मी काही बोलायच्या आधीच तो उद्गारला, ” अरे ही तर मास्तरसाहेबांची स्कूटर आहे.”
स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नात मी त्याला म्हणालो, ” हो ! मास्तर साहेबांनी मला बाजारात काही कामानिमित्त पाठवल आहे.” कदाचित त्याला माझा संशय आला होता.
तिथून सूटून मी एका बेकरीत गेलो. मला खूप भूक लागली होती व काहीतरी खाण्याचा मी विचार केला. बेकरीवाल्याची नजर स्कूटरवर पडताच तो म्हणाला, ” अरे ही तर मास्तर साहेबांची स्कूटर आहे.” हे ऐकून मी घाबरून गेलो आणि गडबडून म्हणालो, “होय, या गोष्टी मी त्यांच्यासाठीच घेतोय, कारण त्यांच्या घरी काही पाहुणे आले आहेत.” कसंतरी करून मी तिथूनही निसटलो.
मग मी विचार केला की गावाबाहेर जाऊन कुठेतरी तिला विकून येतो. मी थोड्याच दूरपर्यंत गेलो होतो, की नाक्यावरील पोलिसाने मला पकडलं आणि रागाने विचारलं की, ” कुठे चालला आहेस? आणि ही मास्तरसाहेबांची स्कूटर तुझ्याकडे कशी आली? ” मग काहीतरी बहाणा करून, मी तिथून ही पळालो. पळून पळून मी आता दमलो आहे ! मास्तर साहेब मला सांगा, ही तुमची स्कूटर आहे की अमिताभ बच्चन?? सगळेच तिला ओळखतात. तुमची अमानत मी तुमच्या स्वाधीन करत आहे. तिला विकण्याची ना माझ्यात हिंमत आहे, ना ताकद. तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मला क्षमा करा आणि त्रास दिल्याच्या बदल्यात, मी तुमच्या स्कूटरची टाकी पूर्ण भरून दिली आहे. ”
हे पत्र वाचून प्रवीणजींना हसू आले आणि ते म्हणाले, ” कर भला तो हो भला.”
—-जर तुम्ही उदात्त अंतःकरणाचे असाल, तर तुमच्या आसपासच्या लोकांना नक्कीच आनंद जाणवेल. म्हणून जीवनात कधीही कोणालाही मदत करण्यास मागे पुढे पाहू नका —–
—संग्राहक – सुश्री मृदुला अभंग
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ लेखक, संशोधक पं. महादेवशास्त्री जोशी ..केशव साठ्ये ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी ☆
आज “धायरी” पुण्यातील एक विकसित होणारे उपनगर म्हणून ओळखले जाते. पण एकेकाळी ते गावाबाहेरचे निर्जन ठिकाण होते. धायरी या नावाला ओळख दिली ती महादेवशास्त्री जोशी यांनी. गोवा ही जन्मभूमी आणि पुणे ही कर्मभूमी असलेल्या जोशी यांचा १२ डिसेंबर हा स्मृतीदिन. त्या निमित्त या लेखक-संशोधक महादेवशास्त्री यांना ही आदरांजली!
बापाविना पोरे वाढवणाऱ्या थोर मातांच्या कहाण्या आपल्याला नेहेमीच वाचायला मिळतात. पण आई स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्ताने तुरुंगात गेलेली आणि इकडे बाप मुलांना वाढवतो. डॉक्टर – संशोधक करतो. आईविना मुलांना वाढवताना आपले सामाजिक सांस्कृतिक योगदान देण्यात हे पिताश्री कोठेही कमी पडत नाहीत, हे वाचले की, निर्धार आणि कष्ट एकत्र आले की कुटुंबाचा काय कायापालट होतो हे समजते. महादेवशास्त्री यांचा जन्म गोव्याचा. पण नाव काढायचे, मोठे व्हायचे म्हणून ते पुण्यात आले आणि पुणेकरच झाले.
भिक्षुकी, पूजा, ज्योतिष या पिढीजात पेशापासून प्रयत्नपूर्वक दूर राहात त्यांनी लेखन हाच आपल्या आयुष्याचा श्वास आणि ध्यास केला. भाषेवर प्रभुत्व होते आणि कल्पनाशक्तीही अचाट होती. योगायोगाने एका मासिकात उपसंपादक म्हणून नोकरीही मिळाली. मोठ्या हिमतीने त्यांनी स्वतःची ज्ञानराज प्रकाशन ही संस्था सुरु केली. स्वतःमधील लेखकाचा सन्मान करण्यासाठी केलेला हा प्रयोग कालांतराने यशस्वीही झाला.
या संघर्षमय आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारे एक आव्हान समोर ठाकले. १९५५ मध्ये गोवा-मुक्ती संग्रामाची धामधूम सुरु झाली. यांना पुण्यात स्वस्थ बसवेना. या स्वातंत्र्य-यज्ञात उडी घ्यायचीच, असा निर्धार त्यांनी केला. कुठे मच्छरदाणी शिव, बांगड्या वीक, असे करत संसाराचा गाडा ओढायला मदत करणारी पत्नी पुढे आली आणि म्हणाली – “ तुमच्यावर संसाराची, उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे, तुम्ही नका भाग घेऊ, मी जाते.” शेवटी हे तयार झाले आणि सुधाताई जोशी यांनी या संग्रामात बेधडक उडी घेतली. थोडीथोडकी नव्हे १३ वर्षांची त्यांना शिक्षा झाली. पण ४ वर्षातच त्यांची सुटका झाली.
हा त्यांचा त्याग अतुलनीय आहेच, पण महादेवशास्त्री यांनी सुधाताई यांच्याशिवाय कच्च्याबच्यांचा सांभाळ केला आणि ते करताना आपली साहित्यसेवाही सुरु ठेवली. पत्नीशी झालेल्या ताटातुटीनंतर “भारतीय संस्कृती कोश”सारखा ग्रंथ त्यांनी निर्माण केला. १० खंडात भारतीय संस्कृतीची सांगोपांग चर्चा करणारे साहित्य निर्माण करण्याचा त्यांनी चंग बांधला. किती वर्षे लागतील, किती पैसा लागेल याची तमा न बाळगता महादेवशास्त्री यांनी या कामात स्वतःला बुडवून घेतले.
शास्त्रीबुवांच्या लेखनात आणखी एक पैलू होता – तो म्हणजे कथालेखकाचा. “कन्यादान” हा चित्रपट, अतिशय गाजलेला “मानिनी” हा सिनेमा त्यांच्याच लेखणीतून पडद्यावर अवतरला. “थांब लक्ष्मी कुंकू लावते”, “जिव्हाळा”, “वैशाख वणवा” या लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या चित्रपटांच्या श्रेयनामावलीत लेखक म्हणून यांचे नाव कोरलेले आहे. हे असे काम पुढेही मिळणे सहज शक्य होते. पैसाही चांगला मिळाला असता. पण “संस्कृतीकोश” हे ध्येय त्यांनी डोळ्यासमोरून ढळू दिले नाही.
आज आपण विकिपीडिया सर्रास वापरतो. ५० वर्षांपूर्वी हा कोशही एक प्रकारचा विकिपीडियाच होता. १० खंड लिहिणे म्हणजे काय, हे जे लिहिणे जाणतात, त्यांनाच कळेल. एवढे करून ते थांबले नाहीत. मुलांसाठीही चार खंडात भारतीय संस्कृती त्यांनी रसाळपणे नोंदवली. “आत्मपुराण” हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक गाजले.
धायरीचे गावकरी त्यांना खूप मानत असत. त्यांचे अंत्यसंस्कारही धायरीतच झाले. तिथेच मोठी श्रद्धांजली सभाही झाली. तेव्हा एका गावकऱ्यांनी काढलेले उद्गगार शास्त्रीबुवा किती थोर होते, याची साक्ष देणारे आहेत. जोशी यांच्याच मुलाने ते एका लेखात सांगितले आहेत.
गावकरी म्हणाला, “शास्त्रीबुवा म्हंजी लई मोठा मानूस. मोठा म्हंजी किती मोठा? तर असं बघा, त्यांनी एव्हढी बुकं लिहिली. ती बुकं जर येकावर येक, येकावर येक ठेवली, तर त्यांची उंची बाबांच्या उंचीपेक्षा जास्त होईल. एवढा मोठा मानूस होता हा.’’
महादेवशास्त्री जोशी यांना विनम्र अभिवादन !
– केशव साठये
संग्राहिका : सुश्री सुलु साबणे-जोशी.
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
एक सूडाचा प्रवास महाभारतातील अंबेचे जीवन हा स्त्रीत्वाचा हुंकार आहे. दोन महापराक्रमी पुरुषांच्या अहंकारात तिच्या आयुष्याची माती झाली तिच्या जीवाची प्रचंड तगमग झाली आणि सूडा कडे प्रवास सुरू झाला.
खरंतर ती काशीराजाची प्रेमळ सुस्वरूप हुशार कन्या. तिला अंबिका आणि अंबालिका नावाच्या दोन बहिणी होत्या.तिघी वयात येताच काशीराजाने त्यांचे स्वयंवर मांडले. त्यात भीष्म व त्यांचा सावत्रभाऊ विचित्रवीर्य यांना जुन्या वितुष्टामुळे आमंत्रण नव्हते. भीष्मांना खूप राग आला आणि ते स्वयंवर स्थळी आले. त्याच वेळी सौबल चा राजा शाल्व याला अंबेने माळ घातली. चिडलेल्या भीष्माने तिथे सर्व राज्यांशी युद्ध करून त्यांचा पराभव केला आणि अंबा ,अंबालिका, आणि अंबिका या तिघींचे हरण करून, रथात घालून ते आपल्या नगरीत परत आले. व आपला सावत्र भाऊ विचित्रवीर्य यांच्याशी लग्न करण्यास सांगितले. साहसी अंबेने स्पष्ट सांगितले मला शाल्वाशीच लग्न करायचे आहे मी त्याला तन-मन-धनाने वरले आहे. तिच्या इच्छेनुसार भीष्माने तिला शाल्वाकडे पाठवले. पण शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही. तो म्हणाला ” भीष्माने तुझे हरण केले. परपुरुषाच्या स्पर्शाने तू भ्रष्ट, पतित झाली आहेस. तुझा कौमार्य भंग झाला आहे.” असहनीय उपेक्षा आणि प्रेम भंगाचे दारुण दुःख घेऊन ती भीष्मा कडे परत आली. “तुम्ही मला पळवून आणलेत, आता लग्न करा. ज्या स्त्रीचे हरण झाले त्या स्त्रीला वडिलांचे दरवाजे बंद असतात.” असे म्हणाली. भीष्म म्हणाले “मी आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतली आहे “. बाणेदार आंबा म्हणाली,” मला तेच हवे. तुमची प्रतिज्ञा मोडण्यासाठीच मी आले आहे. प्रतिज्ञा मोडलेल्या व्यक्तीला जीवंतपणी नरक यातना भोगाव्या लागतात तीच पीडा मला तुम्हाला द्यायची आहे.”भीष्माने नकार दिला. आणि सूडाने पेटलेल्या अंबेने त्यांना धमकी दिली,” तुमच्या मृत्युचे कारण मीच असेन.” आणि वैफल्यग्रस्त होऊन ती जंगलात भटकत राहिली. तिथे तिला परशुराम ऋषींचा शिष्य होत्रवाहण भेटला. त्यांनी सांगितले भीष्माला किंवा शाल्वाला योग्य धडा शिकवण्याचे काम माझे गुरु करतील. त्याच्याबरोबर ती परशुराम ऋषींकडे आली व त्यांना म्हणाली,” मला न्याय हवाय. केवळ स्पर्शाने कौमार्य बाधीत होते तर आजन्म ब्रह्मचर्याचे व्रत घेतलेल्या भीष्माने कोणत्या अधिकाराने मला स्पर्श केला? परपुरुषाबद्दल अनुराग ठेवणारी स्त्री सर्पिणी प्रमाणे विषारी असते आणि ती पूर्ण कुटुंबाचा घात करते असे म्हणून त्याने मला परत पाठवले याचा अर्थ काय? परशुराम खरं तर तिची समजूत घालत होते पण तिचा युक्तिवाद त्यांना पटला. तिला मदत करण्यासाठी त्यांनी भीष्माला बोलावले पण भीष्म आले नाहीत. परशुराम ऋषी खूप संतापले आणि तेच भिष्मा वर चाल करून गेले. दोघेही तुल्यबळ योद्धे. तेवीस दिवस घनघोर युद्ध झाले. दोघांनी महाभयंकर अस्त्रांचा मारा सुरू केला. आता पृथ्वीचा विनाश होईल या भयाने नारदादी देवांनी मध्यस्थी करून युद्ध थांबवले. परशुरामाने तिला सांगितले आता मी तुला न्याय देऊ शकत नाही पण माझे गुरु आणि आराध्यदैवत भगवान महादेव यांच्याकडे तू जा. ते नक्कीच योग्य मार्ग दाखवतील. अंबेने अरण्यात घोर तपश्चर्या सुरू केली. गंगामातेने स्वतः तिची खूप समजूत घातली. पण अंबे ने जिद्द सोडली नाही. शेवटी शंकर प्रसन्न झाले पण ते म्हणाले या जन्मी त्यांचा मृत्यु करता येणार नाही. पुढच्या जन्मी तुझ्यामुळेच त्यांचा मृत्यू होईल. अंबेने स्वतःच लाकडी चिता रचून त्यात उडी घेतली व आत्मसमर्पण केले.
पुढच्या जन्मी शिखंडी च्या रूपाने तिने द्रुपद राजाच्या घरी जन्म घेतला. महाभारताचे घनघोर युद्ध सुरू झाले. शिखंडी अर्जुनाचा सारथी होता. 18 दिवस घनघोर युद्ध झाले. पितामह भीष्मांनी पांडवांच्या सैन्याची धूळधाण उडवली. शिखंडीच्या आड लपून अर्जुनाचा रथ त्यांच्या समोर आला. शिखंडी ला पाहून मी महिलेविरुद्ध शस्त्र उचलत नाही असे सांगून भीष्मांनी आपली शस्त्रे खाली ठेवली ती संधी साधून अर्जुनाने मर्मी घाव घातला आणि भीष्म धारातीर्थी पडले.
महाभारतातील सर्वात दाहक मृत्यू होता. अशाप्रकारे अंबेने आपला पण पूर्ण केला. अपमान आणि विटंबना असह्य झालेली एक स्त्री एका महानायकाच्या मृत्यूचे कारण बनली. जन्मजन्मांतरीच्या सूडाची कहाणी तिथली संपली पण तुमच्या आमच्या मनात ती सदैव घोळ तच राहणार. तिचा संपूर्ण जीवन प्रवास म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा लढा, मनपसंत पती निवडण्याच्या स्त्री अधिकाराचा लढा आणि अन्यायाविरुद्ध सर्वस्व झोकून दिलेला लढा.