सुश्री नीलिमा खरे

? काव्यानंद ?

☆ धर्म बुडाला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

☆ धर्म बुडाला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

धर्म बुडाला द्यूतपटावर नाही कुणाचा धाक

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक ||ध्रु||

*

अंधराज कर्णहीन झाला अंधपुत्रप्रेमाने

पितामहांनी नेत्र झाकले कर्तव्यशून्यतेने

धुरंधर गुरु कर्म विसरले मानवता अगतिक

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक ||१||

*

दानवीर परी झोळीमध्ये नाही स्त्रीदाक्षिण्य

सहस्रदानांचे त्याला का मिळेल काही पुण्य

पतिव्रतेला संबोधी तो पतिता उपभोगिता

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक ||२||

*

उठी भीमा कसुनी तव बाहू दाखविण्या सामर्थ्य

चापबाण गाळून धनुर्धर दुर्मुखलेला पार्थ

याज्ञसेनी तेजस्वी अगतिक पांच पती नपुंसक

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक ||३||

*

हरुनी जाता सर्वस्व कसा दारेवर अधिकार

धर्माहस्ते अधर्म कैसा झाला घोर अघोर

चंडप्रतापी पती असोनी शील होतसे खाक

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक  ||४||

*

भगिनीसाठी अशा अभागन  तूच एक भ्राता

श्रीकृष्णा रे धावुन येई दुजा कोण त्राता

चीर पुरवूनी लाज राखी मम बंधुत्वाची भाक

रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक  ||५||

©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

काव्यानंद : धर्म  बुडाला

रामायण व महाभारत ही दोन महाकाव्ये आपल्या सगळ्यांना अगदी मनापासून भावणारी! नुकत्याच झालेल्या रामनवमीच्या दिवशी आपण रामायणाची आठवण नक्की केली असेल. आज महाभारताची आठवण करून देणार आहे .महाभारत हा अत्यंत प्राचीन संस्कृत ग्रंथ महर्षी व्यास यांनी गणपती कडून लिहून घेतला. या ग्रंथाचे आधीचे नाव जय होते. महाभारत हा भारताच्या धार्मिक, तात्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट आहे. महर्षी व्यासांनी मानवी भावभावनांचे अतिशय सुस्पष्ट रूप महाभारतातील व्यक्तिरेखां मधून करून दिले आहे. जीवनातील असा कोणताही गुण ,दुर्गुण ,स्वभाव नसेल ज्याचा ऊहापोह/परामर्श या काव्यात घेतलेला नाही  आयुष्याशी निगडीत अशा या महाभारताचा सर्वसामान्यांना तर मोह पडतोच पण कविमनाला त्यातील प्रसंग, कथा, व्यक्तित्व खुणावत राहतात. असंच काहीसं डॉक्टर निशिकांत श्रोत्री सरांच्या बाबतीत घडलं.द्रौपदीची अत्यंत महत्त्वाची भूमिका या महाभारतात आहे याची आपल्याला कल्पना आहे. तिचा करारी ,स्वाभिमानी स्वभाव आणि त्याच वेळेला त्याला असलेली अहंकाराची किनार यामुळे तिचं व्यक्तिमत्त्व महाभारतात फार महत्त्वाचं ठरतं. तिच्यामुळे महाभारत घडलं असेही काही जाणकार मानतात .भर सभेत तिच्या बाबतीत घडलेला वस्त्रहरणाचा प्रसंग हा सर्वांना भावुक बनवणारा तसेच चीड  आणणारा आहे. या प्रसंगाने तिच्यासारखी स्त्री अबला होते आणि श्रीकृष्णाचा, तिच्या सख्याचा धावा करते हा प्रसंग कवितेमध्ये सरांनी शब्दबद्ध केलेला आहे.कवितेचे नांव  धर्म बुडाला  !  अगदी समर्पक नांव! या नांवापासूनच या कवितेतील काही वैशिष्ट्ये  मी रसग्रहणात्मक रूपाने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. कविताच खरं तर इतकी अप्रतिम सुंदर आहे की मी काही वेगळे भाष्य करण्याची गरज यावर नाही याची मला कल्पना आहे.तरी पण—! या कवितेला स्वतःची एक उंची आणि त्याचबरोबर खोली पण आहे. मी आता म्हटलं तसं कवितेच्या नांवापासूनच या कवितेचे वेगळेपण जाणवायला लागतं .कवितेच्या पहिल्या दोन ओळीत कवितेचा विषय स्पष्ट होतो.तसंच कवितेचे सार ही पहिल्या ओळीत विशद होत आहे असं वाटतं .द्यूतपटाचा खेळ खेळताना धर्म बुडाला आणि  कुणाला कुणाचा धाक उरला नाही असं कवी म्हणत आहे. येथे धर्म बुडाला ही शब्दयोजना मला फार महत्त्वाची वाटते. यातून दोन अर्थ ध्वनित होतात .एक म्हणजे खरा धर्म जो जीवन मूल्यांशी ,आचार विचारांशी निगडित आहे तो आणि दुसरा म्हणजे धर्मराज युधिष्ठिर! दोघंही बुडाले किती सुंदर आणि चपखल शब्दयोजना आहे ही. द्रौपदीच्या मनाची दारुण अवस्था ही अशीच एका वाक्यात अत्यंत समर्पक शब्दात मांडली आहे. रजस्वला मी एकवस्त्रा दीन घालते हाक अशा शब्दांत द्रौपदीच्या मनाची दारुण अवस्था मांडली आहे. ते सारे दृश्य या एका ओळीतून आपल्यासमोर उभे करण्याची ताकद या शब्दांत आहे. धृतराष्ट्र हा दुर्देवाने अंध होता या वस्तुस्थितीची जाणीव करून देताना तो  आपल्या  पुत्रा बद्दलच्या अंध प्रेमाने कर्णहीन ही  झाला आहे हे सत्य कवीने आपल्या समोर मांडले आहे. इथेही कर्ण हीन ही शब्दयोजना मला फार आवडली.द्रौपदीचा

टाहो , तिचा धावा त्याच्या कानापर्यंत पोहचतच नाहीये अशा अर्थाने ही  शब्द योजना!

तसेच अंधपुत्र हा शब्द ही फार परिणामकारक.धृतराष्ट्र तर दुर्योधनाच्या प्रेमात आंधळा आहेच. स्वतः दुर्योधन ही सत्ता, संपत्ती यांच्या मुळे अंध झाला आहे.उचित व अनुचित भान त्याला राहिले नाही.अंधराज व अंधपुत्र यांचा परस्परसंबंध सहजतेने , सहेतुक पणे सांगताना उत्तम अनुप्रास ही साधला आहे.

तसेच पुढे पितामह भीष्म जे अत्यंत कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जातात, किंवा त्यांचा महाभारतामध्ये तसा लौकिक आहे, त्यांनी नेत्र झाकून घेतले अशी शब्दयोजना केली. म्हणजेच कर्तव्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले.तसेच धुरंधर म्हणून प्रसिद्ध पावलेले गुरू सभेमध्ये उपस्थित असताना ते स्वतः कर्म ,कर्मा प्रतीची श्रद्धा, निष्ठा विसरले.इथे  त्या व्यक्तिरेखेचा ,व्यक्तित्वाचा जो महत्त्वाचा अंश आहे त्याला अनुसरून त्यांनी काय करणे अपेक्षित होतं आणि त्यांनी काय केलं याचं मला वाटतं विरोधाभास म्हणता येईल अशा पद्धतीने सगळा प्रसंग काव्यबद्ध केलेला आहे .

आणि इथे सरांनी माणसे नव्हेत तर सारी मानवता अगतिक झाली असे लिहिले आहे.या मुळे तर ही कविता एका मोठ्या उंचीला गेली आहे असं मला वाटतं. यथार्थ, अर्थवाही शब्द योजना करून हा सारा प्रसंग कवीने उत्तम रीतीने शब्दबद्ध केला आहे, काव्यबद्ध केला आहे. तसेच पुढे कर्णाची  व्यक्तिरेखा येते तेव्हा हा कर्ण जो दानवीर म्हणून प्रसिद्ध आहे  त्याच्या झोळीमध्ये स्त्रीदाक्षिण्याचे पुण्य मात्र नाही अशी स्पष्टोक्ती सहज पणे करून दिली आहे.सहस्त्रदाना पेक्षाही महत्त्वाचे स्त्रीदाक्षिण्याचे पुण्य कर्णाच्या  दानशूर व्यक्तित्वाशी जुळत नाही,मेळ घेत नाही. आणि अशा या विरोधाभासातून कर्ण ही व्यक्तिरेखा ,तिचा फोलपणा दर्शविते. आणि एवढंच नाही तर कर्ण द्रौपदी सारख्या पतिव्रतेला  पतीता आणि एक उपभोग्य वस्तू समजतो तेव्हा त्याच्या स्वतःच्या चारित्र्याची हीन पातळी या कवितेत अधोरेखीत केली गेली आहे. हे सर्व सांगताना पतिव्रता पतिता हा अजून एक सुंदर अनुप्रास साधला आहे.या शिवाय पतिव्रता पतिता उपभोगिता हे लयबध्द शब्द योजून कवीने  शब्दांवरील  हुकुमत दर्शविली आहे. पहिल्या दोन कडव्यात द्रौपदी समोर अत्यंत विचित्र, अपमानास्पद परिस्थिती उभी ठाकली आहे तिचं प्रत्ययकारी वर्णन अत्यंत ताकदीने उभे केले आहे. अशा या परिस्थितीत न्यायाने, धर्माने, जबाबदारीने, कर्तव्यबुद्धीने वावरणारे ज्येष्ठ लोक मूग गिळून गप्प बसले आहेत याची जाणीव झाल्यावर ती भीम आणि अर्जुन या आपल्या पतींना आवाहन करते .भीमाला ती म्हणते की हे भीमा!तुझं सामर्थ्य दाखव. तुझे बाहू कसून तुझे सामर्थ्य दाखव आणि माझे रक्षण कर. आता इथे सुद्धा बाहू कसून या दोन शब्दांत भीमाचे बाहू सामर्थ्य आणि कसून या शब्दांत द्रौपदीची त्याला केलेली आर्त आणि आर्जवी विनवणी  आपल्या ध्यानात येते. ती अर्जुनाला आवाहन करते. आणि त्याच्याकडे पाहून ती म्हणते हा धनुर्धर पार्थ धनुष्य व  बाण गाळून  हताश होऊन  दूर बसला आहे .गाळून या शब्दात अर्जुनाची अवस्था आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते.  नुसतंच आवाहनाची तीव्रता नाही तर त्या व्यक्तिरेखांची परिस्थिती आपल्यासमोर या शब्दांतून अत्यंत ताकदीने कवींनी विदित केली आहे.

याज्ञसेनी द्रौपदीला लाभलं होतं  यज्ञाचे तेज.त्यामुळे अशा तेजस्वी बाणेदार व्यक्तिमत्वाच्या द्रौपदी पुढे तिचे अगतिक पाच पती नपुंसक ठरतात. त्यामुळे या तेजस्वी व्यक्तिरेखेच्या पुढे पतींचा नपुसंकपणा ही मनावर कोरला जातो.येथे याज्ञसेनी हे द्रौपदीचे नामाधिधान  अतिशय उचित! त्याचा परिणाम आपल्या मनावर ठसतो. तिची आर्त साद तिच्या परिस्थितीची जाणीव करून देते आणि तरीही कोणीच काही प्रतिक्रिया देत नाही हे पाहिल्यावर  ती धर्माचा विचार मांडते . धर्मराज जो   स्वतः हरला आहे त्याला  स्वतःच्या बायकोवर काय अधिकार उरतो असा योग्य सवाल करून  इथेही धर्मा कडूनच केलेला अधर्म ही वस्तुस्थिती  दर्शविली आहे.हा प्रचंड विरोधाभास आपल्या लक्षात येतो .तसंच घोर अघोर ही शब्दयोजना आहे त्या शब्दांतून द्रौपदी वरील अन्यायाची तीव्रता आपल्या मनावर ठसते .चंडी प्रतापी पती म्हणजे माता चंडीसम प्रतापी  पती  असूनही द्रौपदीचे शील धोक्यात आले आहे. आणि  आपण सर्वस्व म्हणतो ते स्त्रीचं शील खाक होणार ही भीती

द्रौपदीच्या मनात आहे. या  द्रौपदीच्या सगळ्या भाष्या वर सभा तटस्थ आणि त्रयस्थपणे  बसून आहे .वचनांचा ,शौर्याचा ज्येष्ठत्वाचा  आधार घेऊन द्रौपदी तिच्यावरील होऊ पाहणाऱ्या अन्यायाला दूर करण्याचा प्रयत्न करते आणि तो फोल होतोय हे पाहून शेवटी भावा समान कृष्णाचा धावा करते .अभागी बहिणीसाठी तूच एक त्राता असे आवाहन ती करते. उत्तम शब्दयोजना पहा. भगिनी साठी अभागन तूच एक भ्राता! भ तसेच ग आणि न या शब्दांची द्विरुक्ती कवीच्या शब्द सामर्थ्याची आणि कल्पनाशक्तीची जाणीव करून देते .श्रीकृष्णा शिवाय आता दुसरा कोणीही त्राता उरला नाही ही गोष्ट द्रौपदीच्या  मनात पक्की होते आणि ती त्याला वस्त्र पुरवण्याची आणि त्यायोगे तिचं रक्षण करण्याची विनंती करते. आणि त्याला म्हणते माझ्या बंधुत्वाची भाक, आण, शपथ मी तुला देते आणि माझे रक्षण करण्याची विनंती करते .तर असा हा महाभारतातील वस्त्रहरणाचा एक महत्त्वाचा प्रसंंग ज्यामध्ये कितीतरी संमिश्र भावनांचा  अंतर्मुख करणारा   कल्लोळ  आहे.त्याच  एक दृश्यमान  चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं करण्यात कवी यशस्वी ठरलेला आहे .आणि त्या सगळ्याचे श्रेय  समर्पक, अर्थवाही शब्दांची योजना यांना! पर्यायाने कवीला आहे हे नि:संशय!

© सुश्री नीलिमा खरे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Oak

Lovely.