सुश्री दीप्ती कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ पाऊस… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆
(नुकत्याच झालेल्या वर्धा येथील अ.भा.साहित्य संमेलनात सादर केलेली कविता)
पाऊस आला,पाऊस आला, घेऊन मृदगंधाला
ग्रीष्मातील त्या उष्ण धरेचा कणकण संतोषला
जलधारांनी बरसत आला,थेंबातुनी प्रगटला
बळीराजाही,पेरायाला,शिवारात गुंतला ||१||
इंद्रधनुचा मोहक पट तो,आकाशी उमटला
बालचमुसह ,सर्वांसाठी, आनंददायी बनला
जलाशयाचा,तरुवेलींचा ,जीवनदाता ठरला
चिंबही भिजल्या,सृष्टीचा तो,सखा जणू भासला ||२||
धरतीनेही हिरवा शालु,अंगभरी ल्यायला
गवतफुलांचा,फळाफुलांचा,सुगंध साकारला
मातीतुनी या,नव कोंबांचा,हर्ष दिसु लागला
तनामनाने चाहुल घेता,आसमंती विहरला ||३||
चातकासही थेंबा घेऊनी, जन्म नवा लाभला
रिमझिम येता जलधारांचा,नादही झंकारला
पाऊस आला,पाऊस आला, मोद असा जाहला
नव आशांचा,नव स्वप्नांचा, झुला जणू झुलला ||४||
© सुश्री दीप्ति कुलकर्णी
कोल्हापूर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈