श्रीमती उज्ज्वला केळकर
कवितेचा उत्सव
☆ कणिका… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
☆
☆ कणिका ☆
वणवा पेटला पेटला
पळसफुलांनी
पाकळ्यांवर झेलला.
*
हे वितळणारं ऊन
गच्च ठेवलय धरून
झाडाझाडांनी पानापानांतून
*
रंग फुलांचे चोरले
फुलपाखरांनी
पंखांवर मिरवले
*
सूर्य तापतो तापतो आहे.
तरीही खुळा गुलाब
गालात हसतोच आहे.
*
☆ काही क्षणिका ☆
ग्रिष्माचा अंगार झेलीत
पाकळी पाकळी मातीत मिळते.
नको खंत त्याचा
मनी मी ठसविते.
फळाफळातील अमृत प्राशीत
बीज नवे जीवन धरते
मरणात खरोखर जग जगते.
*
☆ वाट ☆
त्या जंगली वाटेला
राजरस्त्याचे रूप देण्याची
स्वप्ने पहात
तो निघाला तिथून
उद्दाम ईर्षेने……
पण सावल्या बुडायच्या आत
त्यालाच गिळून टाकले तिने
*
☆ व्रतोत्सव ☆
सारं रान वणवलं, तेव्हा
आभाळही बघत राहिलं
शून्य काचेरी डोळ्यांनी
कुणा शापित वृक्षांच्या
दहनाचा व्रतोत्सव
☆
© सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈