मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अल्लड… – भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ अल्लड… – भाग – ३ ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पाहिले – मला खेळायला आवडतं आणि ही मोठी माणसं खेळतच नाहीत तर मी काय करु?मला नाईलाजास्तव लहान मुलांमध्ये खेळावं लागतं” … आता इथून पुढे)

प्रणव तिच्याजवळ गेला. तिचा चेहरा वर उचलून त्याने तिचे डोळे पुसले

“वेडाबाई कुठली! असं रडतात का?या मोठ्या माणसांना खरं तर कसं जगावं हे माहितच नसतं, म्हणून जो असा सुंदर जीवन जगतो त्याला ती नावं ठेवत असतात”

हर्षाला गोंधळली.तिला काही कळलं नाही.

“म्हणजे?”तिनं विचारलं

“तू लहान मुलांकडे बघितलंस?ती बघ कशी नेहमी आनंदी असतात.छोट्या छोट्या गोष्टीतही त्यांना आनंद वाटत असतो.एखादं खेळणं,पान,फुलं,पक्षी,चित्रं,चाँकलेट बघून ती हूरळून जातात.आपलं रडणं विसरुन ती लगेच हसायला लागतात.त्यांच्याजवळच्या प्रत्येक गोष्टीत ती आनंद शोधतात बरोबर ना?”

” हो”

” तू तशीच आहेस हर्षू.प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारी.आपल्या लग्नाला दहा वर्ष झालीत पण एवढ्या वर्षात मी तुला कधी निराश, उदास असं पाहिलंच नाही. झाली तरी काही क्षणापुरती.माझ्या आजारी आईचं तू सगळं व्यवस्थित केलंस पण कधी तुझ्या चेहऱ्यावर कंटाळा दिसला नाही. तू जे काही करतेस ते सगळं जीव ओतून. तू तुझ्यावरच्या  जबाबदाऱ्यांचाही आनंद घेत असतेस. कितीही कष्ट पडोत तुझ्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद कधी मिटला नाही. मला बऱ्याचदा तुझा हेवा वाटतो.तुझ्यासारखं होण्याचा मी बऱ्याचदा प्रयत्न केला. पण नाही जमलं.कदाचित वयाच्या दहाव्या वर्षी वडील वारल्यामुळे अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे मी खूप  लहानपणीच प्रौढ होऊन गेलो आणि नंतर मला कधी लहान होऊन आयुष्याचा आनंद घेणं जमलंच नाही.चाँकलेट खातांना किंवा कुल्फी,आईस्क्रीम खातांना तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तसा आनंद मला कधी होत नाही. आपण स्वित्झर्लंडला गेलो.तिथलं निसर्गसौंदर्य पाहून तू हरखून गेलीस पण मला त्याचं फारसं कौतुक वाटलं नाही. याचं कारण तुझ्यातलं लहान मुल अजून जिवंत आहे हर्षू आणि माझ्यातलं ते कधीच मेलंय. तुझ्यातलं ते लहान मुल तसंच जिवंत राहू दे.अगदी तू म्हातारी होईपर्यंत. कारण सांगू? तू मला तशीच आवडतेस .अल्लड, अवखळ. तुला पाहिलं की माझा थकवा, माझा कंटाळा, माझी उदासीनता कुठल्या कुठे पळून जातात. तुझ्या चेहऱ्यावरच्या त्या बालिश उत्साहाला पाहून माझ्यातही उत्साहाचा संचार होऊ लागतो”

प्रणव क्षणभर थांबला.

“आणि मला सांग. तू कामं तर मोठ्या माणसांसारखीच करतेस ना?तू स्वयंपाक उत्कृष्ट करतेस.घर छान सांभाळतेस.मुलांवर चांगले संस्कार करतेस.कंपनीत नोकरी करत असतांना तू कंपनीची बेस्ट एंप्लॉयी होतीस. तू कशातच कमी नाहीस.मात्र तुझ्यात आणि इतरांत हा फरक आहे की तू हे सगळं आनंदाने करतेस कारण तुझ्यातलं ते लहान उत्साही मुल तुला सतत सक्रीय, आनंदी ठेवतंय. खरं सांगू हर्षू,प्रत्येक माणसाने तुझ्यासारखंच असायला हवं पण मोठेपणाचा आव आणून माणसं जगतात आणि जीवनातल्या आनंदाला पारखी होतात”

त्याच्या तोंडून आपली स्तुती ऐकून हर्षा लाजली.मग ती अवघडली.आजपर्यंत तिला लोकांनी तिच्या बालिशपणावरुन टोमणेच मारले होते पण तिचा धीरगंभीर,अबोल नवरा चक्क तिचे गोडवे गात होता.तिला कसं रिअँक्ट व्हावं ते कळेना.

तेवढ्यात बाहेर कुठंतरी वीज कडाडली आणि त्यापाठोपाठ पावसाने जमीन ओली केल्याचा मंद सुवास सर्वत्र दरवळला.त्या वासाने हर्षा वेडावून गेली.या पहिल्या पावसात भिजायला तिला फार आवडायचं.

“आई पाऊस पडतोय.आम्ही पावसात खेळायला जाऊ?” बाहेरुन केतकीने विचारलं.

“हो.जा”तिला उत्तर देतादेता हर्षाने प्रणवकडे पाहून विचारलं.

“मी जाऊ?”

प्रणवने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं.

“कुठे?”

“पावसात भिजायला?”

प्रणवच्या डोक्यात ती काय म्हणतेय ते पटकन शिरलं नाही. शिरलं तेव्हा तो मोठमोठ्याने हसायला लागला.

“काय झालं हसायला?”तिने निरागसपणे त्याला विचारलं.

तो न बोलता हसतच राहिला.

“अं?सांगा ना का हसताय?”

” काही नाही.तू जा”

हर्षा पटकन बाहेर आली.

“चला रे मुलांनो.आपण पावसात खेळू या”

प्रणव बाहेर आला.आपली बायको आणि मुलांना पावसात नाचतांना पाहून त्याला त्यांचा हेवा वाटला.का आपल्याला इतकं प्रौढत्वं यावं की या छोट्या छोट्या क्षणांचा आपल्याला आनंद घेता येवू नये याचं त्याला वैषम्य वाटू लागलं.”बाबा या ना पावसात भिजायला”

केतकी ओरडली.पण प्रणवचं संकोची,प्रौढ झालेलं मन त्याला पुढे जाऊ देत नव्हतं.तेवढ्यात हर्षा पुढे आली.प्रणवचा हात धरुन तिने त्याला अंगणात खेचलं.त्याचे दोन्ही हात धरुन ती त्याला नाचवायचा प्रयत्न करु लागली.तिच्यासारखं चांगलं त्याला नाचता येत नव्हतं पण ती जशी नाचत होती तसा तो नाचण्याचा प्रयत्न करु लागला.मग कसा कुणास ठाऊक त्याला तसं भिजण्यात आणि नाचण्यात खूप आनंद वाटू लागला.

पावसाची सर आली तशी निघून गेली.पण त्या पंधरावीस मिनिटात सगळ्या सृष्टीवर चैतन्य पसरवून गेली.हर्षा मुलांना घेऊन आत गेली.तिच्या पाठोपाठ प्रणवही आत आला.

“मुलांनो बाथरुममध्ये जाऊन कपडे बदलून घ्या”

मुलं बाथरुममध्ये गेल्यावर हर्षा प्रणवसाठी टाँवेल घेऊन आली. ओलेत्या कपड्यात आणि विस्कटलेल्या केसात ती खुप गोड दिसत होती.

“हे घ्या. डोकं पुसून घ्या आणि मुलांचं झालं की तुम्हीही कपडे बदलून घ्या “त्याच्या हातात टाँवेल देत ती म्हणाली.त्याने टाँवेल घेतांना तिचे हात धरले आणि तिला जवळ ओढलं.

“खूप मजा आली आज हर्षू पावसात भिजून.असंच मला शिकवत रहा आयुष्याचा आनंद घ्यायला.शिकवशील ना?”

प्रत्युत्तरात ती लाजून हसली तसं तिला अजून जवळ ओढत तो म्हणाला.

“माझी गोड गोड बायको. मला तू खूप आवडतेस”

 – समाप्त – 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “शत्रूचं आभाळ झाकोळून टाकणारा मेघ !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “शत्रूचं आभाळ झाकोळून टाकणारा मेघ !” ☆ श्री संभाजी बबन गायके 

— लेफ्टनंट कर्नल मेघ सिंग राठौर ! पॅरा एस.एफ.!

नकळत काही अपराध घडल्यामुळे देवलोकातून शाप दिला जाऊन मृत्यूलोकात ढकलल्या गेलेल्या आणि शापाचा  कालावधी आणि नेमून दिलेलं कर्म पूर्ण केल्यानंतर पुन्हा देवलोकात सन्मानाने प्रवेश दिल्या गेलेल्या गंधर्वांच्या कथा आपण ऐकल्या असतीलच !

मृत्यूलोकातल्या अशाच एका आधुनिक गंधर्वाची ही रोमांचकारी कथा. त्यांचं नाव मेघ सिंग…. 

मेघ सिंग राठौर……एक पक्का राजस्थानी राजपूत लढवय्या ! जन्म मार्च १९२२, म्हणजे आजपासून शंभर वर्षांपूर्वीचा. मेघ सिंग तारुण्यात पदार्पण करताच सेनेत भरती झाले. तो काळ ब्रिटिश राजवटीचा. दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांच्या फौजेत असताना ‘गनिमी कावा’ पद्धतीने लढून जपान्यांच्या सैन्याला नाकी नऊ आणण्याचा, जखमी होण्याचा, युद्धबंदी बनून दिवस काढण्याचा मोठा अनुभव गाठीशी बांधून, पुढे स्वातंत्र्यानंतर मेघ सिंग अर्थातच भारतीय सेनेत अधिकारी बनले. कालांतराने लेफ्टनंट कर्नल हुद्द्यावर असताना एका बटालियनचे नेतृत्व करते झाले.

लष्करी भाषेत एखादा अधिकारी एखाद्या अपराधाबद्दल चौकशीच्या फेऱ्यात अडकला की त्याला ‘to come under cloud’ असं म्हटलं जातं. साहेबांचं नाव मेघ, आणि त्यांच्या बाबतीत वापरल्या गेलेल्या इंग्लिश वाकप्रचारातील शब्द ‘क्लाऊड’ म्हणजेही मेघ (ढग) हा एक योगायोगच म्हणायचा !   

लष्करी न्यायालयाने लेफ्टनंट कर्नल या हुद्द्यावरून मेघ सिंग साहेबांचा हुद्दा मेजर असा केला…. शिक्षा म्हणून. आणि त्यांना एका लष्करी प्रशिक्षण संस्थेत नियुक्तीवर धाडले. वर्ष होते १९६५. 

१९६२ मध्ये चीनकडून प्रचंड फसवणूक आणि लाजीरवाणा पराभव पत्करल्याने भारतीय सैन्याचे मनोधैर्य काहीसे खचलेले होते. याचा फायदा घेऊन पाकिस्तानने, १९४७ मध्ये वेषांतर करून कश्मिरमध्ये आक्रमण केले होते, तसेच पण उघड आक्रमण करण्याचे धारिष्ट्य केले. चवताळलेल्या भारतीय सैन्याने अनेक आघाड्यांवर पाकड्यांवर कुरघोडी करत आणली होती. परंतू काही ठिकाणी ते आपल्याला वरचढ होऊ पहात होते. भारताचा सर्वथैव अविभाज्य भाग असलेलं कश्मीर हातून निसटतं की काय अशी शंका निर्माण व्हावी, अशी विषम परिस्थिती निर्माण झाली होती. अर्थात सैन्य असं काहीही होऊ देणार नव्हतं !

पण आपण पारंपारिक पद्धतीने युद्ध करीत होतो. शत्रू आपल्या हद्दीत आला की त्याला त्याच्या सीमेत पिटाळून लावायचे. शत्रू आपल्या हद्दीत घुसण्याच्या तयारीत असताना त्याला त्याच्याच प्रदेशात घुसून आधीच नेस्तनाबूत करण्याची अतिप्राचीन युद्धनीती आपण बहुदा बाजूला ठेवली होती.  कश्मिरच्या मोर्चावर सेनेचे नेतृत्व करीत असलेले लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेब हे आधुनिक विचार, नवीन युद्धनीती या अपरंपरागत बाबींच्या विरोधात अजिबात नव्हते. त्यासाठी ते गरज पडली तर व्यवस्थेच्या विरूद्ध जाऊनही निर्णय घेण्याच्या पक्षात होते.

पदावनत करण्यात आलेल्या आणि अगदी सेनेतून स्वेच्छानिवृत्ती पत्करावी अशा निर्णयाप्रत आलेल्या आपल्या ह्या कथानायकास, मेजर मेघसिंग साहेबांना, युद्धाची परिस्थिती पाहून प्रशिक्षण संस्थेतून पुन्हा युद्धभूमीवर जाण्याचे आदेश प्राप्त झाले ! एका सैनिकास आणखी काय पाहिजे असते? मेजर मेघ सिंग साहेब थेट लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेबांना भेटले आणि आपण पाकिस्तानात घुसून, आपल्या सीमेत घुसलेल्या त्यांच्या सैन्याच्या मागे जाऊन त्यांच्यावर प्रतिआक्रमण करण्याचा विचार मांडला. आणि हे काम मी करतो, मला त्याचा पुरेसा अनुभव आहे, असे पटवून दिले…  

मेघसिंग साहेबांचा सैनिकी इतिहास ठाऊक असलेल्या हरबक्षसिंग साहेबांनी त्वरित तशी व्यवस्था केली. आणि यासाठी त्यांनी शासकीय परवानगी घेण्याची औपचारिकता विचारात घेतली नाही. तेव्हढा वेळही नव्हता. आणि आपण आक्रमण करायचे नाही, या आपल्या राष्ट्राच्या सर्वसामान्य विचारप्रणालीच्या ते विरुद्ध समजले जाण्याचीही शक्यता होतीच.   

हरबक्षसिंग साहेबांनी मेघसिंग साहेबांना सांगितलं होतं, ” यशस्वी होऊन आलात तर मी माझ्या हातांनी तुमच्या खांद्यावर तुमच्या बढतीच्या हुद्द्याचं पदक लावेन !”

अपमानाचा डाग धुऊन काढण्याची आंतरीक इच्छा असलेला सच्चा सैनिक ही संधी कशी सोडेल? मेघ सिंग साहेबांच्या अंगी आता दहा हत्तीचं बळ एकवटलं. त्यांनी भारतीय सैन्याच्या पायदळातून त्यांना हवी तशी माणसं काळजीपूर्वक निवडून घेतली, त्यांना केवळ एक दोन आठवड्याचं प्रशिक्षण दिलं. हे प्रशिक्षण जरी कमी कालावधीचं वाटत असलं तरी शत्रू प्रदेशात हलक्या पावलांनी घुसून प्रचंड विध्वंस घडवून आणण्याचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या माणसाकडून दिले गेले होते, हे विसरता कामा नये ! 

या सैनिकांच्या जथ्याला एक अनौपचारीक नाव दिले गेले…. ‘मेघदूत फोर्स !’ मेघ सिंग साहेबांची मेघदूत सेना ! या सेनेच्या बहाद्दर जवानांनी पाकिस्तानी प्रदेशात खोलवर घुसून त्यांच्या अनेक लष्करी महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करून त्यांचे प्रचंड नुकसान केले. मागून अचानक आणि अगदी अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सेनेचे धाबे दणाणून गेले होते. असे एक नव्हे तर तीन यशस्वी हल्ले या ‘मेघ’दूतांनी केले. पाकिस्तानचे अवघे आकाश या मेघांनी काळवंडून टाकले होते ! 

आणि विशेष म्हणजे स्वत:चे फारसे नुकसान होऊ न देता. 

कामगिरी यशस्वी करून मेघसिंग साहेब मेघदूतांसह परतले… पण काहीसे लंगडत. त्यांच्या मांडीमध्ये शत्रूच्या सैनिकाची गोळी घुसून आरपार गेली होती. पण त्या जखमेची त्यांना तमा नव्हती….. दिलेली कामगिरी पूर्णत्वास नेल्याचं खास सैनिकी समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं ! 

पदमभूषण,वीर चक्र विजेते, जनरल ऑफिसर इन कमांड (वेस्टर्न कमांड १९६५) लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेबांनी आपल्या या बहादूराच्या खांद्यावर लेफ्टनंट कर्नलचं चिन्ह स्वत:च्या हातांनी लावलं….. गंधर्व पुन्हा देवलोकात परतला होता… ताठ मानेने !

मेघदूतांसारखा आपला असा अधिकृत सैन्यविभाग असावा, ही गोष्ट देशाचा सैन्य कारभार चालवणाऱ्यांच्या लक्षात आली. असा विभाग निर्माण करण्याचं उत्तरदायित्व अर्थातच लेफ्टनंट कर्नल मेघसिंग साहेबांच्याकडे आले… आणि त्यांनी ते निभावले सुद्धा ! 

१ जुलै १९६६ रोजी ‘नाईन पॅरा स्पेशल फोर्स’ हा विभाग अधिकृतरित्या भारतीय लष्कराचा एक अपार महत्त्वाचा भाग बनला. पॅरा म्हणजे पॅराट्रूपर्स अर्थात हवाई मार्गाने शत्रूप्रदेशात उतरणारे सैनिक ! या विभागात भारतीय सैन्यातील अपार शौर्य गाजवण्याची महत्त्वाकांक्षा असलेले सैनिक स्वयंस्फूर्तीने प्रशिक्षणास येतात. या सैनिकांना नव्वद दिवसांच्या कठोरतम अग्निपरीक्षेस सामोरे जावे लागते ! या सैनिकांचे आणि अधिका-यांचे सर्व हुद्दे काढून त्यांना प्रशिक्षणार्थींचा दर्जा दिला जातो. हे सर्व पूर्वप्रशिक्षित आणि अगदी तयार सैनिक असतात हे लक्षात घेतले पाहिजे ! परंतू यातील केवळ पंधरा ते वीस टक्के लोकच अग्निपरीक्षेत उत्तीर्ण होतात.. यावरून पॅरा एस.एफ. च्या प्रशिक्षणाची काठिण्य पातळी ध्यानात यावी !

पहिले पस्तीस दिवस शारीरिक आणि कौशल्य प्रशिक्षण, यात तासनतासांचा शारीरिक व्यायामाचा, डोळ्यांवर पट्टी बांधून विविध प्रशिक्षणे घेण्याचा, हत्यारे चालवण्याचा, एखादे ठिकाण नष्ट करण्याचा सराव करण्याचा, अनोळखी प्रदेशातून, जंगलातून माग काढण्याचे प्रशिक्षण घेण्याचा, विषारी प्राणी हाताळण्याचे प्रशिक्षण, वैद्यकीय ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या, अन्न शिजवण्याच्या शिक्षणाचा आणि इतर कित्येक बाबींचा समावेश असतो. सलग चार दिवस पूर्ण उपाशी राहणे, तीन दिवसांत फक्त एक लिटर पाणी पिणे, आणि सलग सात दिवस अजिबात न झोपणे या गोष्टी अनिवार्य असतात. दहा किलो वजनाची वाळू भरलेली बॅग सतत शरीरावर बांधलेली असते या काळात. सर्व युद्धसाहित्य अंगावर घेऊन दहा, वीस, तीस आणि चाळीस किलोमीटर्स मार्चिंग करीत चालणे हे तर असतेच. 

विमानातून, हेलिकॉप्टरमधून दिवसा आणि रात्रीच्या वेळी किमान पन्नास वेळा अचूक उडी मारण्याचे प्रशिक्षण तर अत्यावश्यकच. युद्धाच्या साहित्यासह एकूण सत्तर किलोचे वजन घेऊन दहा किलोमीटर्स वेगाने चालणे ही असतेच. आपल्या सहकारी सैनिकास आपल्या खांद्यावर सलग कित्येक किलोमीटर्स वाहून घेऊन जाणे आहेच. सलग छत्तीस तासांची शारीरिक, मानसिक क्षमता चाचणी घेतली जाते. चाळीस ते ऐंशी किलो वजनाच्या वस्तू एका ठिकाणाहून उचलून विशिष्ट ठिकाणापर्यंत घेऊन जाव्या लागतात. पाण्यात बुडी घेऊन कित्येक मिनिटे श्वास रोखून धरावा लागतो, हात मागे बांधून पाण्याखाली खेचले जाते. यापैकी सोळा तासाच्या प्रशिक्षणात अन्नाचा एक कण, पाण्याचा एक थेंबही दिला जात नाही. 

अशा स्थितीत स्मरण चाचण्या, परिसराचा शोध घेण्याच्या क्षमतेच्या चाचण्या घेतल्या जातात ! त्यानंतर पुन्हा दहा किलोमीटर्स वेगाने चालणे आणि त्यानंतर सहा तास सलग व्यायाम ! शेवटी शत्रूवर लपून हल्ला करणे, इतरांनी लपून अचानक केलेल्या हल्ल्याला प्रतित्युत्तर देणे, छावण्या उभारणे, जखमी सैनिकांसाठी स्ट्रेचर्स तयार करणे, जखमी सैनिकांना सुखरूप हलवणे इत्यादी क्षमता तपासल्या जातात…. आणि हे कधी तर ….सैनिक गेली सलग कित्येक तास अजिबात झोपलेले नाहीत अशा स्थितीत !

अखेरच्या सत्रात दहा किलो युद्धसाहित्य, सात किलो वजनाची शस्त्रे घेऊन डोंगर, टेकड्यांतून, जंगलातून शंभर किलोमीटर्स धावणे…… याला तेरा ते पंधरा तास लागू शकतात ! या दरम्यान उंचावरच्या ठिकाणी लढण्याचे प्रशिक्षण तर असतेच असते. या सर्वांत टिकून राहिलेल्या सैनिकांना मग शेवटच्या टप्प्यात अतिरेकी विरोधी युद्धाचे अत्यंत खडतर प्रशिक्षण दिले जाते !……  नव्वद दिवस आगीच्या अंगाखांद्यावर खेळलेले हे सैनिकी सोनं शेवटी काय रूप घेऊन बाहेर येत असेल? केवळ अतुलनीय ! केवळ अवर्णनीय ! केवळ शब्दातीत ! 

असे असतात आपले पॅरा एस.एफ.चे जवान…. भारताच्या सार्वभौमत्वाचे संरक्षक ! कमीत कमी माणसांत जास्तीत जास्त मोठं आणि यशस्वी कामगिरी असे ध्येय बाळगणारे! आपल्या बडी वर, अर्थात सहकाऱ्यावर जीव ओवाळून टाकणारे, ‘हू केअर्स हू विन्स…’ म्हणजे कोण जिंकतंय याची तमा न बाळगता फक्त प्राणपणाने लढणारे! कुणी धर्म आणि जात विचारता, “पॅरा एस.एफ.” असं उत्तर देणारे ! या आणि अशा वीरांमुळेच भारत इतक्या आव्हानांना तोंड देऊनही सुरक्षित आहे!

हा अलौकीक सैन्यविभाग निर्माण करणाऱ्या वीरचक्र विजेत्या लेफ्टनंट कर्नल मेघ सिंग साहेबांना मानाचा मुजरा! २०१० मध्ये हा मेघ काळाच्या आभाळात अंतर्धान पावला!

या विभागाचे पहिले प्रमुख लेफ्टनंट जनरल हरबक्षसिंग साहेबांना वंदन ! एक जुलै या स्थापनादिनाच्या निमित्ताने देशभरातील सर्व पॅरा युनिट्सना कडक सॅल्यूट आणि …. 

……  जय् हिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अल्लड… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ अल्लड… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(मागील भागात आपण पहिले, – तिला भटकायला आवडायचं. लहानमुलांचे तर सगळेच खेळ आवडायचे. असं मैत्रीणींसारखं तिचं आयुष्य एकसुरी कधीच नव्हतं. –  आताइथून पुढे)

” काय म्हणतात आमचे जिजू?” एकीने विचारलं

“मजेत आहेत ” हर्षा उत्तरली ” सध्या फ्रान्सला गेलेत कंपनीच्या कामासाठी.म्हणून तर मी इकडे आले.दादा ,वहिनी आणि मुलांना घेऊन लग्नाला गेलाय.आई घरी एकटीच होती.म्हणून म्हंटलं आईलाही कंपनी आणि मुलंही बरेच दिवसात आजीला भेटली नव्हती.म्हणून मग आले इकडे”

” तुझ्या नवऱ्याला तुझा हा बालीशपणा आवडतो का गं?” दुसरीने टोचलं.हर्षाला जरा तिचा रागच आला पण तिला हे ही जाणवलं की प्रणव कधी तिला याबाबत बोलला नव्हता.वास्तविक ही जितकी चंचल,अवखळ तितकाच तो गंभीर आणि अबोल होता.तिच्या सासुबाईंनी तिच्या बालीशपणाबद्दल त्याचे कान नक्कीच भरले असतील पण त्याने कधी त्याचा चुकूनही उल्लेख केलेला तिला आठवत नव्हता.

“काय माहीत!कधी बोलले तर नाहीत. कदाचित आवडतही असेल” ती जरा खट्याळपणेच म्हणाली.मैत्रीण चुप बसली.

हर्षाची आई बाहेर येऊन तिच्या मैत्रीणींशी बोलायला लागली तशी हर्षा किचनमध्ये गेली.तिने झटपट शिरा भजी करुन प्लेट्स भरुन बाहेर आणल्या

“करुनच ठेवलं होतं की काय?”एकीने विचारलं

“नाही गं!आता केलंय.गरमच आहे बघ”हर्षा हसत म्हणाली.

“मग इतक्या झटपट?”

हर्षाचा कामाचा झपाटा जबरदस्तच होता.कधीकधी ती वेंधळेपणा करायची पण खुपदा फक्कड जमून जायचं

” खुप छान झालीहेत भजी आणि शिराही” एकजण म्हणाली

“चला याबाबतीत तरी आपली हर्षू मँच्युअर्ड आहे म्हणायची”दुसरीने टोमणा हाणला.तशा सगळ्या हसल्या.

“हर्षू लहानपणापासूनच स्वयंपाक छान करते.अगदी पाचवीत असल्यापासून ती पोळ्या करायची.अजूनही तिचं नवीननवीन पदार्थ करण्याचं वेड संपलेलं नाही. नोकरी करत असतांनाही ती सुटीच्या दिवशी काहीतरी नवीन करुन सर्वांना उत्साहाने खाऊ घालायची”

निर्मलाबाईंनी केलेल्या प्रशंसेने हर्षा अवघडली.

” कसं जमतं कुणास ठाऊक?आम्हांला तर रोजचा साधा स्वयंपाक करायचासुध्दा कंटाळा येतो”एक मैत्रीण म्हणाली

हाच तर फरक होता हर्षा आणि इतरांमध्ये.सदोदित उत्साहाने फसफसलेल्या हर्षाला सतत काम करायला आवडायचं.नोकरी करतांनाही ती आँफिसमध्ये कामात सर्वांच्या पुढे असायची.दिवसभराचं काम चारपाच तासात पूर्ण करुन ती बाँसकडे जाऊन दुसरं काम मागायची नाहीतर दुसऱ्यांना मदत करायची.तिच्या या वृत्तीमुळे ती बॉससकट सर्वांचीच लाडकी होती.म्हणून तर जेव्हा मुलांच्या संगोपनासाठी तिने राजीनामा दिला तेव्हा कंपनीने तिला ती मागेल तो पगार देण्याची तयारी दाखवली होती.अर्थातच तिने नकार दिला होता. 

मैत्रिणी गेल्या तसं प्रियाला हायसं वाटलं.त्याच त्या कंटाळवाण्या घरगुती विषयांवरच्या गप्पा ऐकून ती कंटाळून गेली होती.ती मागच्या महिन्यातच स्वित्झर्लंडला जाऊन आली होती.तिला त्याबद्दल खुप काही सांगायचं होतं पण मैत्रीणींना त्यात काडीचाही रस नव्हता.सध्या ती खुप पुस्तकं वाचत होती.त्याबद्दलही तिला बोलायचं होतं.पण मुलं,नवरा,सासू या विषयातून बाहेर निघायला मैत्रीणींना आवडत नव्हतं. 

संध्याकाळी मुलांना घेऊन ती बागेत गेली.मुलांचे झोके खेळून झाल्यावर कुणी बघत नाहीये हे पाहून तिनेही मनसोक्त झोक्यावर खेळून घेतलं.झोक्यावरुन उतरतांना तिथे मुलांना घेऊन अचानक उगवलेल्या बायका तिच्याकडे विचित्र नजरेने बघताहेत हे तिच्या लक्षात आलं आणि ती मनोमन लाजली. 

तीन  दिवसांनी भाऊ आणि वहिनी गावाहून आल्यावर ती पुण्याला परतली.दुसऱ्याच दिवशी प्रणव फ्रांसहून परतला.

उन्हाळ्याच्या सुट्या आता संपत आल्या होत्या.शाळेतली मुलं कॉलन्या कॉलन्यात क्रिकेट खेळायची.हर्षाच्या गल्लीतही एका मोकळ्या जागी क्रिकेट सुरु होतं.भाजीबाजारातून परतलेल्या हर्षाने ते पाहिलं आणि तिला लहानपणीचे दिवस आठवले.तिच्या इतर मैत्रिणी मुलींचे खेळ खेळत असतांना ही मात्र मुलांसोबत क्रिकेट खेळायची.ती बँटिंग आणि बाँलिंगही चांगली करत असल्यामुळे तिला टिममध्ये घेण्यासाठी मुलांची भांडणं व्हायची.हर्षाला ते आठवलं आणि ते क्षण परत अनुभवण्यासाठी ती उतावीळ झाली.

“ए मी खेळू का रे तुमच्या सोबत?”

तिनं असं विचारल्यावर मुलं हसू लागली

“काकू हा लेडीज गेम नाहिये.तुम्हांला बँट तरी हातात धरता येते का?”एक मुलगा चेष्टेने म्हणाला तशी हर्षा उसळून म्हणाली

” तुम्ही सगळे बँटिंग करा.तुम्ही सगळे आऊट झाल्यावरच मी बँटिंग करेन.चालेल?”

पोरं आनंदाने तयार झाली.

बऱ्याच वर्षांनी बाँल हातात घेतल्यामुळे तिचे चेंडू वेडेवाकडे पडत होते.पोरं ती मस्त चोपत होती.पण जशी ती सरावली तिने त्यांना आऊट करण्याचा सपाटा लावला.सातही पोरांना आऊट करुन तिने बँटिंग करायला सुरुवात केली.चार पाच चेंडू सरळ खेळल्यावर तिने मग जोरदार फटके लगवायला सुरुवात केली.एक चेंडू तर तिने पार एका दोनमजली इमारतीवरुन भिरकावून दिला.पोरं शोधायला गेली आणि रिकाम्या हाताने परत आली.

“काकू त्या रणदिवे मावशींच्या डोक्यात बाँल बसला.त्या बाँल देतच नाहीयेत.त्या तुम्हांला बोलवताहेत.तुम्ही जाऊन घेऊन या ना!”

हर्षा विचारात पडली.रणदिवे मावशी म्हणजे भांडकुदळ बाई होती.तिच्याकडे जायचं म्हणजे ती हमखास तिच्या लहान मुलांमध्ये खेळण्यावरुन तिला नाही नाही ते बोलणार हे नक्की होतं.

” जाऊ द्या मुलांनो.मी तुम्हांला पैसे देते तुम्ही नवा बाँल घेऊन या “मुलं खुष झाली. तिने आत जाऊन पैसे आणून मुलांना दिले.मुलं नवीन बाँल आणायला गेली.हर्षाने प्रकरण संपलं म्हणून सुस्कारा सोडला तर थोड्याच वेळाने रणदिवे मावशी उपटली.तिने हर्षाला लहान मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यावरुन चांगलंच फैलावर घेतलं.तिच्या बालिशपणावरुन हर्षाला नाही नाही ते बोलली.

“अगं तुला काही लाजबिज वाटत नाही का त्या लहान पोरांमध्ये खेळायला?आता तरी सुधर.तू काही लहान नाही.दोन मुलांची आई आहे तू”अशी ताकीद देऊन गेली.ती गेल्यावर हर्षाला रडू आलं.एक प्रकारची विचित्र उदासिनता तिला वाटू लागली. 

संध्याकाळी प्रणव घरी आला तर घरात सामसुम होती.केतकी आणि मिहिर काहीतरी खेळत बसले होते.हर्षा बेडरुममध्ये पुस्तक वाचत पडली होती.पण तिचं वाचण्यात मन लागत नव्हतं.दुपारचा प्रसंग तिला वारंवार आठवत होता.

“काय गं केतकी आज घरात इतकी शांतता का बरं?”प्रणवने विचारलं

” त्या मागच्या काँलनीतल्या रणदिवे आजी आपल्या घरी येऊन आईला खुप बोलून गेल्या.म्हणून आई रडतेय”

” आईला बोलून गेल्या?पण का?”

केतकीने त्याला सगळा किस्सा त्याला सांगितला.प्रणवच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.तो बेडरुममध्ये गेला.त्याला पाहून ती उठून बसली पण तिचा उदास,रडवेला चेहरा त्याच्या लक्षात आला.

“काय गं असा चेहरा पाडून काय बसलीयेस?”

“नाही. काही नाही असंच!”

” सांगितलं मला केतकीने सगळं.मग यात एवढं नाराज होण्यासारखं काय आहे?”हर्षा रडायला लागली.रडतारडता म्हणाली

“सगळेच मला म्हणतात की तू लहान आहेस का लहान मुलांमध्ये खेळायला?आपल्या आई होत्या त्याही तसंच म्हणायच्या.माझी आई,वहिनी,माझ्या मैत्रिणीही तसंच म्हणत असतात.आता मला खेळायला आवडतं आणि ही मोठी माणसं खेळतच नाहीत तर मी काय करु?मला नाईलाजास्तव लहान मुलांमध्ये खेळावं लागतं”

क्रमश: – भाग २… 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अल्लड… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ अल्लड… – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

हर्षा बाहेरुन आली तेव्हा शेजारच्या अंगणात लहान मुली पत्ते खेळत बसल्या होत्या.ते बघून हर्षा लगोलग तिकडे गेली.

“काय गं मुलींनो काय खेळताय?”

“बदाम सात”एकजण उत्तरली.

“मी खेळू तुमच्यासोबत?’’

एक मोठी बाई लहान मुलींसोबत खेळणार या विचाराने त्या मुली एकमेकींकडे पाहून खुदखुदू हसल्या.पण नाही कसं म्हणायचं या विचाराने त्यातलीच एक म्हणाली,

“हो.खेळा ना”

बऱ्याच दिवसांनी पत्ते खेळायला मिळताहेत याचा हर्षाला खुप आनंद झाला. ती मग त्यांच्याजवळ मांडी घालून बसली.आपल्या पाच वर्षाच्या मुलीला,केतकीलाही तिने जवळ बसवलं.छोट्या मिहिरला मांडीवर घेतलं.

“द्या मी पत्ते पिसते” मुलींकडचे पत्ते घेऊन तिने ते पिसले आणि सर्वांना वाटले. खेळण्यात ती इतकी रंगून गेली की त्यात एक तास कसा निघून गेला तिला कळलंच नाही.मध्येच एका मुलीने पत्ते टाकतांना बदमाशी केलेली हर्षाच्या लक्षात आली तेव्हा ती रागावून म्हणाली.

“ए असं नाही चालायचं हं.असा रडीचा डाव नाही खेळायचा”

तिचा आवाज ऐकून तिची आई बाहेर आली.

“अगंबाई ,हर्षू तू इथे बसलीयेस?मला वाटलं तू मैत्रिणीकडून अजून आलीच नाहीस आणि या लहान मुलींसोबत काय खेळत बसलीयेस?”

आईच्या हाकेने ती भानावर आली.

” हो आई.येतेच.बस फक्त एक डाव.”

“अगं तू भाजी करणार होतीस ना?की मी करु?बारा वाजून गेलेत.मुलांना भुका लागल्या असतील.”

” हो आई मला भुक लागलीये”

केतकी म्हणाली तशी मोठ्या अनिच्छेने ती पत्ते खाली ठेवून उठली

” मुलींनो संध्याकाळी आपण परत खेळू बरं का!”

मुलींनी माना डोलावल्या.हर्षा मुलांना घेऊन घरात गेली.

” हर्षू लहान मुलींसोबत खेळायचं तुझं वय आहे का?अगं दोन मुलांची आई ना तू?”

निर्मलाबाई म्हणाल्या तशी ती संकोचली. काय उत्तर द्यावं तिला कळेना.मग किचनमध्ये वळता वळता म्हणाली,

“अगं बऱ्याच दिवसात पत्तेच खेळले नव्हते म्हणून बसले.आणि काय बिघडलं गं लहान मुलींसोबत खेळले तर?”

निर्मलाबाई आपल्या त्या तीस वर्षाच्या निरागस चेहऱ्याच्या मुलीकडे पाहून हसल्या.”खरोखर या पोरीचं बालपण अजून संपलेलंच नाहिये अजून “त्यांच्या मनात आलं.

“काही बिघडत नाही. पण बाहेरच्यांनी बघितलं तर काय म्हणतील?”

” म्हणू दे काय म्हणायचं ते”

हर्षा थोडी चिडूनच म्हणाली.मग तिने भाजी करायला घेतली.पंधरावीस मिनिटात भाजी करुन तिने सर्वांना वाढलं.

” व्वा छान केलीयेस गं भाजी” भाजीची चव घेतल्याबरोबर निर्मलाबाई म्हणाल्या.हर्षाने स्मित केलं पण मघाशी आई जे बोलली त्याने तिचं मन नाराज झालं होतं.तिच्या सासूबाईही तिला नेहमी हेच म्हणायच्या.”अगं हर्षू हा बालिशपणा सोड आता .तू आता दोन मुलांची आई झालीयेस” दोन वर्षांपूर्वी त्या वारल्या तेव्हाच हर्षाच्या अल्लडपणावरुनचे त्यांचे टोमणे बंद झाले.आणि आज आईने त्यावरुन तिचे कान उपटले होते.

“आज तुझ्या मैत्रिणी येणार आहेत ना तुला भेटायला?त्यांना काय करायचं खायला?” अचानक आठवण येऊन निर्मलाबाईंनी विचारलं.

“शिरा आणि भजी करेन मी. तू बस त्यांच्या सोबत गप्पा मारत”

ती रागावलीये हे निर्मलाबाईंनी ओळखलं. पण तिचं रागावणंसुध्दा तिच्या निरागस चेहऱ्यावर मोठं गोड वाटत होतं. मनाशीच हसून त्या उठल्या. जेवणाचं टेबल आणि किचनमधला पसारा भराभरा आवरुन हर्षा बेडरुममध्ये गेली. तिची मुलं हाँलमध्ये कार्टून सिरीयल बघत बसली.

बेडवर पडल्यापडल्या हर्षाच्या मनात विचार आला. ‘खरंच का आपण बालिश आहोत? लहान मुलांच्या दुनियेत आपण रमतो. त्यांच्यासारखं आपल्याला हुंदडायला आवडतं,मस्त्या करायला आवडतं. खेळायला आवडतं. फुलं,फुलपाखरं,रंगबिरंगी पक्षी बघून आपण वेडे होतो.जगात सर्वत्र आनंदच भरलाय असं आपल्याला वाटत रहातं.आपण सहसा कुणावर रागवत नाही. रागावलो तरी पटकन विसरतो. म्हणून आपण सर्वांना बालिश वाटतो?’

तिला आपले काँलेजचे दिवस आठवले.फुलपाखरासारखी ती बागडायची.सगळ्यांशी ती हसून बोलायची.सगळ्यांशी तिची मैत्री होती.मुलांशी तर जास्तच.तिच्या मैत्रिणी तिला नेहमी टोकत “हर्षू मुलांबरोबर इतकी मोकळेपणाने वागत नको जाऊ.ते तुझ्या हसण्याचा वेगळा अर्थ काढतात”

पण तिने त्यांचा सल्ला कधीच मानला नाही. तिचा सुंदर पण निरागस,बालिश चेहरा आणि त्यावरच खट्याळ हसू पाहून अनेक तरुण तिच्या प्रेमात पडायचे.तिच्या प्रेमाची मागणी करणाऱ्या अनेक चिठ्ठ्या, अनेक मेसेज तिला मोबाईलवर यायचे.पण ती सगळ्यांकडे दुर्लक्ष करायची.त्यांना ती इतक्या गोड शब्दात नकार द्यायची की तिच्याबद्दल कुणालाच आकस रहात नसे.बरेच जण तिची बेबी म्हणून हेटाळणी करायचे.काँलेजच्या गँदरींगमध्येही तिला “बेबी”नावाने बरेच फिशपाँड पडायचे. पण तिला त्याचा कधी राग आला नाही.

“आई गं मी भातुकली खेळू?”

केतकीच्या प्रश्नाने ती भानावर आली

“का गं टिव्ही बघून कंटाळा आला वाटतं?”

” हो.खेळू का?”

“खेळ.पण तुझ्याकडे सगळं सामान कुठंय?”

” ती शेजारची उत्तरा आलीये सामान घेऊन”

“मग ठिक आहे.जा खेळा”

“आई तू येतेस मांडून द्यायला?”

ते ऐकून हर्षाला एकदम उत्साह वाटू लागला.प्रफुल्लित चेहऱ्याने ती म्हणाली.

” हो.चल चल.आपण हाँलमध्येच बसू”

मग हाँलच्या एका कोपऱ्यात ती मुलींना घेऊन बसली.तीन वर्षाचा मिहिरही तिथे लुडबुड करायला लागला.हर्षा मग त्या भातुकलीच्या खेळात अशी हरवून गेली की तिला जगाचा विसर पडला. 

चार वाजले आणि हाँलचा दरवाजा उघडला.तिच्या मैत्रिणी भराभर आत आल्या.हर्षाला उठून तयार व्हायला त्यांनी वेळच दिला नाही.

“अगंबाई, हर्षू अजून तू भातुकली खेळतेस?”

एक मैत्रीण म्हणाली तशा सगळ्याच जोरात हसल्या.

“नाही गं ,या मुलींना व्यवस्थित मांडून देत होते”

हर्षाने सारवासारव केली खरी पण मैत्रीणींना ते खरं वाटलं नाही हे तिच्याही ध्यानात आलं

“अगं आता तुझा स्वतःचा संसार आहे आणि तू खेळण्यातला संसार काय मांडून बसलीयेस?”

एका मैत्रिणीने परत आगाऊपणा केलाच.ते ऐकून केतकीला  काय वाटलं कुणास ठाऊक ती उत्तराला म्हणाली

“उत्तरा आपण उद्या खेळू हं”

उत्तरालाही ते पटलं.तिने पटापट सगळं सामान पिशवीत जमा केलं आणि निघून गेली.हर्षा आत जाऊन मेत्रिणींसाठी पाणी घेऊन आली.

“ए काही म्हणा आपली हर्षू अजून काहीsss बदलली नाही. अजूनही तशीच बालीश वाटतेय बघा” एक मैत्रिण म्हणाली

” हो खरंच.अगदी अकरावी बारावीतली अवखळ मुलगी वाटतेय”

“तिची फिगर तर बघ.अगदी चवळीची शेंग वाटतेय.नाहीतर आपण पहा .सगळ्याजणी भोपळे झालोत”

सगळ्याजणी फिदीफिदी हसल्या.

“हो पण वयानुसार थोडं मँच्युअर्ड दिसायलाच पाहिजे ना! नाहीतर ही हर्षू.वाटते का दोन मुलांची आई आहे म्हणून?आठवतं?आपल्या काँलेजची मुलं तिला बेबी म्हणायची.ती बेबी अजून बेबीच दिसतेय “

परत एकदा सर्वजणी हसल्या.  

हर्षाला खुप अवघडल्यासारखं झालं. त्या तारीफ करताहेत की टोमणे मारताहेत हे तिच्या लक्षात आलं नाही.

गप्पा सुरु झाल्या तसं हर्षाच्या लक्षात आलं की तिच्या मैत्रिणी पुर्णपणे संसारी झाल्याहेत.सासू,सासरे,नणंदा,नवरा आणि मुलं याव्यतिरिक्त त्यांचे विषय पुढे सरकत नव्हते.दोन वर्षांपूर्वी हर्षाच्या सासूबाई वारल्या.मुलांचा सांभाळ व्यवस्थित व्हावा म्हणून तिने स्वतः नोकरी सोडली आणि तीही पूर्ण वेळ संसारी बाई झाली असली तरी तिचं मन मात्र अनेक विषयावर गुंतत रहायचं.तिला इंटरेस्ट नव्हता अशी एकही गोष्ट नव्हती.तिला संगीत आवडायचं.विशेषतः सध्याच्या तरुण पीढिचं संगीत तिला खूपच आवडायचं. तिला पिक्चर बघायला आवडायचे, टिव्हीवरच्या कार्टून सिरीयल्स तर ती तिच्या मुलांसोबत आवडीने पहायची.तिला भटकायला आवडायचं. लहानमुलांचे तर सगळेच खेळ आवडायचे. असं मैत्रीणींसारखं तिचं आयुष्य एकसुरी कधीच नव्हतं.

क्रमश: – भाग 1… 

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘लिव्ह – इन…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ ‘लिव्ह – इन…’ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुमनमावशी बाहेर व्हरांड्यात मोबाईलवर बोलत होत्या. बेलचा आवाज आला, म्हणून त्या कुठल्या रूमची बेल वाजली हे बघायला वळल्या, तेवढ्यात ते काका त्यांच्याकडेच येताना दिसले. 

“पॉट द्यायचा होता जरा पेशंटला “, ते म्हणाले आणि व्हरांड्यात थांबले. 

“हो हो”, म्हणत मावशी लगबगीने तिकडे गेल्या. नंतर मावशी खोलीबाहेर आल्या आणि काकांना आत जायला त्यांनी खुणावलं. एवढ्यात बहुतेक त्यांचा मुलगा आणि नात आले. ” बाबा, आईचा नाश्ता झालाय ना? तुम्ही हा गरम गरम उपमा खाऊन घ्या. आज जरा उशीरच झाला मला. ही छकुली पण लवकर उठून बसली आज. मग तिच्यामुळे सविताला कामं आवरायला वेळ झाला थोडा.” तो म्हणाला. 

“अरे, असू दे. तुमची धावपळ मला कळत नाही का?;शिवाय सविता सकाळी सहाला उठून इथून घरी जाते. त्यानंतर सगळं करणार ना?” काका म्हणाले.   

आत्ताच ज्यांना पाॅट द्यायला त्या गेल्या होत्या, त्या सिंधुताईंचे हे मिस्टर आणि हा मुलगा असावा, असा सुमनताईंचा अंदाज ! सिंधुताईंना कंपवाताचा त्रास होता. मेंदूला रक्तपुरवठा नीट न झाल्याने, या आजारात स्नायू कडक, शिथील होतात. माणसाला शरीराचा तोल सांभाळता येत नाही. ‘डोपामाईन’, सारख्या गोळ्यांनी थोडा आजार नियंत्रित होतो. पण गोळीचा परिणाम पाच-सहा तासच टिकतो. आणि   गोळीचा प्रभाव कमी होऊ लागला की पेशंटचे हाता-पायाचे स्नायू आपली लवचिकता घालवून बसतात. 

पहाटे बाथरूमला जाताना सिंधूताईंच्या बाबतीत नेमकं हेच घडलं होतं. त्या तोल जाऊन पडल्या. कमरेच्या डाव्या बाजूचं हाड मोडलं. डोक्याला खोक पडल्यामुळे पाच टाके घालावे लागले. हातालाही मुकामार लागला होता. पण त्यांची घरची माणसं अगदी प्रेमानं करत होती त्यांचं. 

सुमनमावशी गेले चार – पाच दिवस हे सगळं ऐकत होत्या, पहात होत्या. ‘ म्हातारा – म्हातारी लई नशीबवान आहेत. नाहीतर एवढं प्रेमानं करणारी मुलं आता कुठं बघायला मिळतात. सविता म्हणजे सूनच असेल. पण मनापासून करतेय वाटतं सासूचं.’ 

मावशीची दिवसपाळी असल्याने त्यांनी सविताला पाहिलेलं नव्हतं. एक-दोनदा बाजूच्या दुसर्‍या पेशंटचं करत असताना त्यांची सहज नजर गेली, तेव्हा तो मुलगा आपल्या आईच्या अंगावरून हात फिरवत, तिला रात्री झोप नीट झाली का, विचारत होता. तीन-साडेतीन वर्षांची  नात, तिच्या आजीजवळ काॅटवर बसण्याचा हट्ट करत होती.

दुसर्‍या दिवशी दुपारी काका त्यांना म्हणाले, ” मावशी जरा खाली जाऊन मी हिची औषधं घेऊन येतो. तोवर जरा हिच्याजवळ थांबता का?”

मग सुमनमावशींना आयती संधीच मिळाली सिंधुताईंशी गप्पा मारायची. सुमनमावशी न राहवून सिंधुताईंना म्हणाल्या, ” बाई, लय नशीबवान आहात तुम्ही ! घरची सगळी लय प्रेमानं करतात तुमचं. अवो या करोनानंतर तर माणसं येकदम दूर दूरच राहायला लागलीत आजाऱ्यापास्नं. रोज बघतोय न्हवं का आम्ही हिथं !”

“खरंय, तुमचं ! पण मावशी एक सांगू का? या करोनानंतरच मला हे कुटुंब मिळालंय सगळं !”

 “आँ ! काय म्हन्तासा?”

“अहो खरंच सांगते. हे सुधीरराव आणि माझे मिस्टर सुधाकर लहानपणापासून घट्ट मित्र. मिस्टरांच्या पोर्ट ट्रस्टच्या नोकरीमुळे आम्ही मुंबईकर झालो आणि सुधीरराव प्रोफेसर होऊन नागपुरातच राहिले ! आम्ही ऑफिस क्वार्टर्समध्ये रहात होतो. आमची दोन्ही मुलं शिकून – सवरून संसारात स्थिरावली. त्यांना मुंबईत घर घ्यायला ह्यांनीच फंडातून पैसे काढून दिले. त्यामुळे रिटायर झाल्यावर आमच्याकडे फारशी पुंजी नव्हती आणि क्वार्टर सोडावं लागलं त्यामुळे घरही नाही. यांच्या पेंशनमध्ये आमचं दोघांचं भागलं असतं. पण मुलांना आता आमची अडगळ नको होती त्यांच्या संसारात !….  सुधीररावांना हे कळलं तसं त्यांनी यांना मनवून नागपुरात बोलावून घेतलं. त्यांचा मोठा बंगला होता सहा खोल्यांचा. शिवाय मागच्या बाजूला चाळटाईप वनरूम कीचन बांधून चार भाडेकरू ठेवले होते. त्यांनी स्वतःच्या बंगल्यातल्या दोन स्वतंत्र खोल्या आम्हाला वापरायला दिल्या. बाजूलाच त्यांच्याकडे चार खोल्या. मधला दरवाजा उघडला तर एकच मोठं घर. त्यांच्या बायकोशी माझी मैत्री आधीच झाली होती. त्यांना एकच मुलगा, तो अमेरिकेत स्थायिक झालाय. आई-वडिलांशी त्याचे चांगले संबंध ! पण इथलं राजकारण आणि भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे त्याला इकडे परत यायचं नाहिये. तो यांनाच तिकडे बोलावत होता पण यांना जायचं नव्हतं.”

“आम्ही इकडे राहायला आलो आणि तीनच वर्षांंनंतर सुधीररावांची बायको वारली, ब्रेन हॅमरेजनं. त्यानंतर मग आम्ही तिघे एकत्रच राहात होतो म्हणाना ! फक्त झोपायला वेगळ्या रूममध्ये. सात-आठ वर्षांपूर्वी मला पार्किन्सनचा त्रास सुरू झाला. पण घरातलं स्वैपाकपाणी मी करू शकत होते. बाकी कामाला बाई ठेवली होतीच.”

“२०२० उजाडलं आणि फेब्रुवारी २०२० मध्ये माझ्या मिस्टरांना कोरोनानं गाठलं. खरंतर त्यांना नक्की काय झालंय हे डॉक्टरना कळण्याआधीच ते गेले. एकाच घरात  राहणाऱ्या, मी आणि सुधीररावांची परिस्थिती फार विचित्र झाली होती… हा मुलगा दिनेश मागच्या चाळीत राहायला आला २०१८ मध्ये. प्रायव्हेट कंपनीत नोकरी करून एकीकडे शिकत होता काॅमर्सला ! अडल्या वेळी सगळ्यांना मदतीला तयार असायचा. याचे आई-वडील आणि मोठा भाऊ, लांब गोंदियाजवळ होते राहायला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत वडील गेले. तीनच महिन्यात भाऊही गेला. आणि त्या धक्क्याने आईचा हार्टफेल झाला. हा तर लाॅकडाऊनमुळे इकडेच अडकलेला. कामधंदाही बंद. अगदी वेडापिसा झाला होता. त्याचं सगळं कुटुंबच हरवलं ना ! त्याला माणसात आणायला आम्ही काय काय केलं ते आम्हालाच माहीत.”

“सविता, डी. एड. झालेली. सावत्र आईच्या जाचाला कंटाळून नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडण्याची संधी शोधत होती. इंटरव्ह्यूच्या निमित्ताने आमच्या चाळीत मैत्रिणीकडे नागपुरात आली आणि लाॅकडाऊनमुळे इकडेच अडकली. मैत्रिणीचा नवरा शिक्षक प्रायव्हेट स्कूलमध्ये. शाळा बंद झाल्या. पगार नाही, जागा लहान. ते तरी हिला किती दिवस ठेवून घेणार? पैसे तर हिच्याकडेही फारसे नव्हतेच. जेमतेम परतीच्या प्रवासाएवढे. ती दोघंही पाॅझिटिव म्हणून सरकारी केंद्रात भरती झाली. ही निगेटिव्ह पण होम क्वारंटाईन ! आम्हीच डबा देत होतो तिला. बंगल्यात वर्षभराचं धान्य भरलेलं होतं म्हणून निभावलं कसंतरी !

ही छोटी जुई, दीड वर्षांची आणि तिचे आई-वडील आणि आजी तिघेही कोरोनानं गिळले. तेही मागच्या चाळीतच राहणारे. तिला सवितानंच सांभाळलं. जुईचा एकच काका. तो दुबईत. मागच्या वर्षी तो भारतात आला. पैशाचा प्राॅब्लेम नसला तरी तो काही पुतणीची जबाबदारी घ्यायला तयार नव्हता. “

“माझी तब्येतही खूप बिघडली. महिनाभर बिछान्यावरून उठता येत नव्हतं. त्यावेळी सविताच आमचं जेवणखाण सांभाळत होती. दिनेश बाकीची मदत करत होता. पडेल ते काम करत होता. आमचं एक कुटुंबच तयार झालं म्हणाना ! आपण कायम असंच एकत्र राहावं असं आम्हां सगळ्यांना वाटायला लागलं. 

आम्ही खूप चर्चा करून निर्णय घेतला. मी आणि सुधीररावांनी सोय म्हणून रजिस्टर विवाह केला. अर्थात त्यांच्या मुलाला विश्वासात घेऊन. सविता आणि जुईला एकमेकींचा लळा लागला होताच. कोरोना काळात सविता आणि दिनेश एकमेकांना चांगले परिचित झाले होते. दिनेश बी. काॅम झाला आणि सुधीररावांच्या ओळखीनं त्याला एका सी. ए. कडे अकाउंट असिस्टंटची नोकरी पण  मिळाली. त्या दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला आणि त्यांनी तो स्वीकारला. सविताने तिच्या वडिलांना लग्नाविषयी कळवलं होतं, परंतु त्यांनी काहीच दखल घेतली नाही. जुईला त्यांनी दत्तक घ्यायचं ठरवलं आणि मग तिच्या काकांकडून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून घेतल्या.”

“आता आम्ही सगळे एकत्र राहतो, एकमेकांसाठी जगतो. आजी-आजोबा, मुलगा-सून आणि नात, असं परिपूर्ण कुटुंब आहे आमचं ! अशी आहे आमची ‘लिव्ह-ईन  फॅमिली”, सुधीरराव म्हणाले.   

“अरेच्चा, तुम्ही कधी आलात, कळलंच नाही.” सिंधुताई म्हणाल्या. 

… सुमनमावशी ही सगळी कहाणी ऐकून निःशब्दच झाल्या होत्या.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन लघुकथा (भावानुवाद) – श्री कमल चोपड़ा, सुश्री मीरा जैन, श्री राम मूरत ‘राही’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? जीवनरंग ?

☆ तीन लघुकथा (भावानुवाद) – श्री कमल चोपड़ा, सुश्री मीरा जैन, श्री राम मूरत ‘राही’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

☆ (१) चूक… ? की बरोबर…?? – श्री कमल चोपडा (२) यात सौदा कसला ?… – सुश्री मीरा जैन  (३) चोरी म्हणजे ??… – श्री राम मूरत ‘राही’ ☆

 

☆ १. चूक… ? की बरोबर…?? (अनुवादित कथा) ☆ श्री कमल चोपडा  ☆

नितीनने एक जोरदार शॉट मारला, आणि बॉल जवळच्या एका उघड्या गटारात जाऊन पडला. आता त्या गटारातून बॉल काढणार कोण ? घाण आणि दुर्गंधीने भरलेलं खोल आणि अगदी घाणेरडं गटार होतं ते. 

चरणू नावाचा एक मुलगा मोठ्या आशेने त्या मुलांचा खेळ बघत बसला होता ….. ती मुलं त्यालाही त्यांच्यात खेळायला बोलावतील म्हणून वाट बघत होता. पण कोणीच त्याला बोलावत नव्हतं. पण आता मात्र नितीनने त्याला हाक मारली.. “ ए मुला, त्या गटारातून आमचा बॉल काढून दे जा … बघ .. त्यासाठी आम्ही तुला एक रुपया देऊ .. आणि आमच्यात खेळायलाही देऊ. “ 

चरणू लालचावला, आणि गटारात उतरण्यासाठी त्याच्या कडेला लटकला. पण अचानक त्याचा हात घसरला आणि तो धपकन आतल्या घाणीत जाऊन पडला. तो धडपडत हात-पाय मारायला लागला.. जणू प्राणांची बाजी लावल्यासारखा. 

बाकीची मुलं कडेला उभं राहून नुसती हसत होती … कधी एकदा तो बॉल काढून आणतोय याची वाट बघत होती. 

“ किती तुच्छ मुलगा आहे ना हा… एक रुपयासाठी या घाणीत उतरलाय ..” 

“ ही गरीब माणसं इतकी हपापलेली असतात ना … एक रुपयाच काय, एका पैशासाठी सुद्धा प्राणही देतील हे “ 

चरणू नेमका त्याचवेळी बाहेर आला होता. डोक्यापासून पायापर्यंत घाणीने बरबटला होता. तोंडालाही सगळी घाण आणि चिखल लागलेला होता. 

“ हा घे एक रुपया, आणि आमचा बॉल आम्हाला दे. “… 

चरणू त्याच्यापुढे अक्षरशः फेकलेल्या त्या एक रुपयाच्या नाण्यावर पाय ठेऊन उभा राहिला, आणि गंभीर होत म्हणाला, “ या एका रुपयासाठी मी इतका मोठा धोका पत्करला नव्हता .. “

 “ मग काय आता शंभर रुपये हवेत की काय तुला ? “ 

“ नाही. पैसे नकोच आहेत मला .. मला खेळायचंय तुमच्याबरोबर … “

त्याची ती काहीतरी जगावेगळी आणि विचित्र इच्छा ऐकून बाकीची मुलं खळखळून हसायला लागली. 

“ साल्या तू आमच्याबरोबर खेळणार ? .. आधी स्वतःची अवस्था बघ कशी झाली आहे ती. असं वाटतंय की एखादं डुक्कर चिखलात मस्त लोळून आलंय …” आणि सगळे आणखीच जोरजोरात हसायला लागले. 

“ हे बघा .. मला खेळायचंय … तुम्ही खेळा आणि मलाही खेळू द्या की … घ्याल ना मला खेळायला ..की  नाही ? “ … चरणूने जरा आवाज वाढवत विचारलं. 

“ तुला सांगितलं ना एकदा… आमचा बॉल आम्हाला दे आणि तू लगेच निघून जा इथून … नाहीतर ..” नितीन चिडून म्हणाला. 

“ नाहीतर काय ?.. “ आणि चरणूने जणू जीवाची बाजी लावून तो बॉल ज्या घाणेरड्या खोल गटारातून काढून आणला होता, त्याच गटारात सगळी ताकद एकवटून पुन्हा जोराने फेकून दिला. आणि … 

“ आता बघतोच तुम्ही तरी कसे खेळता ते … “ असं म्हणत एका वेगळ्याच निर्धाराने तो तिथून निघून गेला. 

……… 

मूळ हिंदी कथा : खेलने दो  

कथाकार : श्री कमल चोपडा, दिल्ली 

भावानुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे  

२. यात सौदा कसला ?… (अनुवादित कथा) ☆ सुश्री मीरा जैन ☆

पाच वर्षांची मुक्ता आज सारखी आत-बाहेर आत-बाहेर करत होती. बहुतेक कुणी तरी येण्याची वाट पाहात होती. मध्येच वरच्या खोलीत जात होती – परत खाली येत होती. गॅलरीत जाऊन लांबवर बघून येणं तर सारखंच चाललं होतं. अचानक झोपाळ्यावर बसून मोठाले झोके घेत होती ….. पण असं सगळं करत असतांना तिचं सगळं लक्ष मात्र बाहेरच्या दाराकडे होतं. इतक्यात तिला तिच्या आजीची हाक ऐकू आली … 

“ मुक्ता .. पटकन ये बाळा, नाश्ता करून घे . आज तुझ्या आवडीचा शिरा केलाय बघ.. आज अजून भूक कशी लागली नाहीये माझ्या छकुलीला .. “ 

“ आजी थांब ना जरा. अजून भूक लागलीच नाही आहे गं मला “.. 

…. इतक्यात दारात टॅक्सी थांबल्याचा आवाज आला… आणि मुक्ता पळतच दाराकडे गेली. नीता – तिची आई एकदाची तिला दिसली आणि नीताने दारातून आत पाऊल टाकल्याक्षणी ती जाऊन नीताला बिलगली. नीतानेही तिला छातीशी घट्ट कवटाळलं आणि पटापट तिचे मुके घेतले. दोघींच्याही डोळ्यातून आसवांच्या धारा वहात होत्या…. कितीतरी वेळ दोघी तशाच उभ्या होत्या. जराशाने रडतरडतच मुक्ता तिला म्हणाली .. 

“ आई आता मला सोडून तू कुठेही जायचं नाहीस हं .. “ नीताने पुन्हा तिला घट्ट मिठी मारली, आणि जणू सगळा आत्मविश्वास एकवटून तिला अगदी ठामपणे सांगितलं … “ नाही बाळा.. नाहीच जाणार .. आता तुला सोडून नाही.. तर तुला माझ्याबरोबर घेऊनच जाणार आहे परत.. “ 

तिची आईही तोपर्यंत तिथे आली होती. तिचं बोलणं ऐकून ती आश्चर्यचकित झाली होती. न रहावून तिने विचारलं … “ नीता अगं हे काय करते आहेस तू ? ते लोक कधीच मुक्ताचा स्वीकार करणार नाहीत हे चांगलंच ठाऊक आहे तुला .. तुझ्याकडून तसं आधीच कबूलही करून घेतलंय ना त्यांनी … तरीही … ? “

“ हो, ठरलं होतं तसं .. पण आई तूच सांग … एखाद्या पूर्णपणे परक्या मुलाची मी आई होऊ शकते … केवळ त्याच्या वडलांशी मी पुनर्विवाह केलाय म्हणून.. आणि अगदी मनापासून तसा प्रयत्नही करते आहे ना मी. पण म्हणून..  मी जिला जन्म दिलाय त्या माझ्या स्वतःच्या मुलीला मी माझ्यापासून दूर लोटावं … तिला कायमचं विसरून जावं अशी अपेक्षा करणं चुकीचंच आहे …. मला ते पटणारही नाही.. आणि जमणार तर मुळीच नाही … अगं मी पुन्हा लग्न केलं आहे… याचा अर्थ एखादा सौदा नाही केलाय… माझ्या ममतेचा… माझ्या पोटाच्या गोळ्याचा. …आणि आई, सगळ्यांनीच समजून घ्यायला हवं हे.  चल मुक्ता.. “… 

मूळ हिंदी कथा : पतझड बसंत  

कथाकार : सुश्री मीरा जैन, उज्जैन

भावानुवाद : सुश्री मंजुषा सुनीत मुळे  

☆ ३. चोरी म्हणजे ??… (अनुवादित कथा) श्री राम मूरत ‘राही’

मी आणि बायको दर्शन घेऊन देवळातून बाहेर पडलो. पाहिलं तर बाहेर ठेवलेल्या बायकोच्या चपला कुठेच दिसत नव्हत्या. काल-परवाच घेतलेल्या नव्याकोऱ्या चपला होत्या त्या. साहजिकच आम्ही जरा जास्तच अस्वस्थपणे त्या शोधू लागलो. तेवढ्यात मला अगदी गरीब वाटणारा एक पाच -सहा वर्षांचा मुलगा हातात माझ्या बायकोच्या चपला घेऊन जातांना दिसला. 

मी पटापटा चालत त्याच्याजवळ गेलो आणि त्याला थांबवून विचारलं.. “ बाळा या चपला घेऊन कुठे चालला आहेस तू ?” — त्याचा कोवळा निरागस चेहेरा पाहून मी रागावू शकलोच नाही त्याच्यावर. 

“ घरी चाललोय. “ – तो म्हणाला. 

“ ही चप्पल कुठून आणलीस तू ? “

“ देवळाच्या बाहेर ठेवलेली होती – तिथून. “

“ बाळा पण ही चप्पल घेऊन काय करणार तू ? “

“ माझ्या आईला देणार … “

“ आईला देणार ? का ? “

“ कारण माझ्या आईकडे चपला नाही आहेत ना …. आम्ही खूप गरीब आहोत .. “

“ पण बाळा ही तर चोरी झाली ना ? “ 

“ चोरी ?.. चोरी म्हणजे काय असतं ? “

“ अरे एखाद्याला न विचारता त्याची एखादी वस्तू घेऊन टाकायची याला चोरी करणे म्हणतात.. आणि ही अगदी चुकीची आणि वाईट गोष्ट आहे. “ 

“ मला तर हे माहितीच नव्हतं “ … तो मुलगा विचार करायला लागला… आणि मग एकदम वळून देवळाकडे जायला लागला. मी त्याला थांबवलं आणि विचारलं .. . “ कुठे निघालास रे .. “

“ देवळात “.

“ का “. 

“ चपला ठेवायला “

“ राहू दे बाळा. आता या चपला तू तुझ्या आईला नेऊन दे … जा “. 

“ पण या तर चोरीच्या आहेत ना ? “

“ अरे आता या चोरीच्या नाहीयेत “. 

“ म्हणजे ? … ते कसं काय ? ‘

“ कारण या आमच्या चपला आहेत, आणि आम्ही तुला त्या घेऊन जाण्याची परवानगी देतोय. “

… हे ऐकून त्या मुलाला फार आनंद झाला होता हे त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं … तो धावतच तिथून निघून गेला. 

लगेचच माझी बायको माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि रागानेच म्हणाली .. “ अहो काय तुम्ही …. सरळ माझ्या चपला नेऊ कशा काय दिल्यात त्याला ? “

“ अगं तो त्याच्या आईसाठी घेऊन चालला होता.. म्हटलं ने. तुझ्यासाठी दुसऱ्या घेऊ ना आपण “… 

यावर बायकोने त्याच रागाने मान उडवली. 

मग मी तिला शांतपणे म्हटलं …. “ एक गोष्ट लक्षात आली नाही का तुझ्या … अगं त्या लहानग्याला आपण तिथल्या चपला उचलतोय म्हणजे “ चोरी “ करतोय…. काहीतरी वाईट काम करतोय .. हे सुद्धा कळत नव्हतं. “ चोरी म्हणजे काय “ हे इतक्या निरागसपणे विचारलं ना त्याने… आणि ते समजल्यावर चपला परत ठेवायला निघाला होता तो… पाहिलंस ना ?  आता पुन्हा कधी तो असा वागणार नाही बघ …. खात्री वाटतेय मला “ ….. 

मूळ हिंदी कथा : मां के लिये – कथाकार : श्री राम मूरत ‘राही’

भावानुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन लघुकथा ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ दोन लघुकथा ☆ सौ. उज्ज्वला केळकर 

(1) पुरस्कार : एक असेही घेणे (2) मुलगी झाली हो 

(1) पुरस्कार : एक असेही घेणे

‘अहो.. शुक… शुक … इकडे… इकडे … सुधाताई.. इकडे…’

‘ कोण तुम्ही? मी ओळखलं नाही….’

‘बरोबर आहे. मला कशाला तुम्ही ओळखाल? आम्ही साध्यासुध्या बायका… तुम्ही सुमन ताईंना ओळखाल. त्या स्टार लाईट नं! आम्ही एक पणती …. मिणमिणती….’

तसं नाही हो… मास्क आहे नं चेहर्‍यावर, म्हणून ओळखलं नाही….’

‘घ्या! हा काढला मास्क.’

‘अरे, सरलाताई होय. …खरंच मास्कमुळे मी तुम्हाला ओळखलं नाही. काय म्हणताहात?’

‘मी कुठे काय म्हणतीय? तुमची ती सरली म्हणतीय  काही- बाही . पुरस्कार मिळालाय ना तिला!’

‘पुरस्कार…. कसला पुरस्कार?’

‘जसं काही माहीतच नाही तुम्हाला ?’

‘नाही… खरंच माहीत नाही.’

‘अहो, गावभर सांगत सुटलीय ती… आणि तुम्हाला कसं नाही सांगितलं ? एवढी खास मैत्रीण तुमची’

‘आहो, एवढी खास मैत्रीण तुमची…’

‘खरं सांगू का, गेल्या महिन्याभरात भेट नाही झाली आमची. पण पुरस्कार कसला मिळालाय तिला? ‘

‘आदर्श समाज सेविकेचा पुरस्कार मिळालाय तिला!’

‘कुठल्या संस्थेने वगैरे दिलाय?‘.

‘नाही हो…’

‘मग नगरपालिकेचा आहे?’

‘नाही… नाही…

‘मग जिल्हा परिषदेचा असेल?’

‘बघा एवढीच लायकी आहे नं तिची? पण तिला राज्य पुरस्कार मिळालाय. ’

‘अरे वा! आता घरी गेल्यावर पहिल्यांदा तिला फोन करते.’

‘असतील तिचे कुणी काके-मामे वर!’

‘वर?;

‘वरच्या खुर्चीवर हो! जर माझे कुणी नातेवाईक असते वर…’

‘अं…’

‘वरच्या खुर्चीवर हो! जर माझे कुणी नातेवाईक असते, तर मलाही हा पुरस्कार मिळाला असता, होय की नाही?’

‘पण तिचे कुणी काके-मामे वर नाहीत.’

‘या फक्त बोलायच्या गोष्टी!’

‘पण तिचा काम खरोखरच पुरस्कार मिळण्याइतकं आहे!’

‘पण माझा कामही तिच्याइतकंच आहे. किंबहुना जरा जास्तच आहे, होय की नाही? काय? ‘

‘हं!

‘आहे ना! मग सांग…. सांगच … मला पुरस्कार मिळण्यात काय अडचण होती?’

‘नाही… कहीच अडचण नव्हती. मिळेल ना… पुढल्या वर्षी मिळेल. ‘

‘तुम्ही मला आश्वासन का देताय?

‘मग काय खात्रीने सांगू? सांगते … पुढल्या वर्षी तुम्हाला पुरस्कार मिळेल.’

‘तुम्ही निवड समितीच्या सभासद आहात का?’

‘मग खात्रीने कशा सांगू शकता?’

‘‘मग काय करू?’

‘कामाला लागा!’

‘कसलं काम?’

‘मंत्रालायावर मोर्चा घेऊन जा.’

‘कोण मी?’

‘नाही तर दुसरं कोण?’ मला पुरस्कार मिळावा, म्हणून मीच मोर्चा घेऊन गेले, तर कसं दिसेल?’

‘हं! बरोबर बोललात तुम्ही…आणी?’

‘घोषणा द्या. आवाज उठवा…’’कोणत्या घोषणा?’

‘बंद करा. बंद करा. पुरस्कार निवडीची पद्धत बंद करा. पुरस्कार निवडीची ही पद्धत बंद करा. नवे निकष तयार करा. हाय!हाय!… निवड समिती हाय!हाय!… आपल्या नातेवाईकांना पुरस्कार देणारी निवड समिती तयार करणारे सरकार हाय… हाय…’

‘पण असं कुठे झालय?’

‘असंच झालय. तुम्हाला काय माहिती?

‘तुम्हाला तरी काय माहिती?’

‘मला पुरस्कार मिळालानाही, याचाच अर्थ तो’

‘मला नाही तसं वाटत…’

‘’पण तुम्हाला घोषणा देण्यात काय अडचण आहे?’

‘अं… म्हणजे… अडाचण अशी नाही.पण…’

‘आता तुमचं पण…परंतु पुरे. घोषणा द्या. ‘बंद करा… बंद करा… पुरस्कारासाठी निवड करायची ही पद्धत बंद करा… ही पद्धत चुकीची आहे. नवीन निकष तयार करा. हाय… हाय… निवड समिती हाय… हाय… निवड समिती नियुक्त करणारं सरकार हाय… हाय…आपले लोक , नातेवाईक यांची निवड करून त्यांना पुरस्कार देणारं सरकार हाय… हाय…’

‘पण असं कुठे घडले?’

‘पण तुला घोषणा द्यायला काय होतय? घोषणा खर्‍या असल्या पाहिजेत, असं थोडंच आहे? आणखीही घोषणा देता येतील’

‘आणखीही? त्या कोणत्या? ‘

 ‘ चालणार नाही. ‘चालणार नाही. शिफारसबाजी चालणार नाही.’

‘ चालणार नाही. … चालणार नाही. घोषणाबाजी चालणार नाही.’

‘आहो, घोषणाबाजी नव्हे, शिफारसबाजी चालणार नाही.’

‘ही घोषणाबाजी कुठे करायची आहे?’

‘कुठे म्हणजे…. मोर्चात’’

‘पण मोर्चा कुणाविरुद्ध काढायचाय ?’

‘घ्या! बारा वर्ष रामायण वाचलं, रामाची सीता कोण ?’

‘कोण होती?’

बहीण. रामाची नाही माझी.सीतेवर रामाने अन्याय केला आणि सरारणे माझ्यावर! म्हणजे सरकारच्या निवड समितीने माझ्यावर. यासाठीच तर मोर्चा मोर्चा मंत्रालयावर घेऊन जायचे. नाही चालणार… नाही चालणार… पुरस्कार घोषित करण्यात शिफारसबाजी नाही चालणार… रद्द करा….रद्द करा… घोषित पुरस्कार रद्द करा…मला पुरस्कार मिळालाच पाहिजे. ‘

‘मिळाला पाहिजे… मिळालाच पाहिजे…’

‘मला पुरस्कार मिळालाच पाहिजे. ‘  

‘…. रद्द करा….रद्द करा… घोषित पुरस्कार रद्द करा…’

‘घोषित करा…. घोषित करा… नवीन पुरस्कार घोषित करा…’

‘पण हे सगळं कोण करणार?’

‘कोण म्हणजे?तुम्ही…’

‘मी?’

‘तुम्ही एकट्या नाही हो… तुम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणी…ज्यांना माझ्याबद्दल आत्मीयता आहे, त्या सगळ्यांनी.’

‘ मोर्चा काढायचा, घोषणा द्यायच्या, मला वाटतं, हे सगळं जरा जास्तच होईल.’

‘ जास्त नाही अन् कमी नाही. तुम्हाला मोर्चा काढायचाय. मंत्रालयात जाऊन पदाधिकार्‍यांना निवेदन द्यायचय. विरोधी पक्ष कदाचीत् याचा इशू करेल. सरकार बरखास्त करण्याची मागणी करेल. सरकार बरखास्त करण्याची मागणी करेल. सरकार बरखास्त होईल.नवीन सरकार येळ. नवी निवड समीती बनेल. ‘

‘मग?’

‘त्यात माझे कुणी काके-मामे आतील.कुणी माझ्या ओळखीचा त्या निवड समितीत असेल. माझ्यावर श्रद्धा असलेले कुणी तरी त्यात असेल. ‘

‘नाही… नाही… असं काहीही होणार नाही. कुठली गोष्ट कुठे नेलीत आपण!’

‘का नाही होणार? तुम्ही स्वत:ला माझी मैत्रीण म्हणवता नं? मैत्रीणीसाथठी आपण एवढं करू शकत नाही? मग ही मैत्री काय कामाची?’

‘आमचं सगळ्यांचं आपल्याला मूक समर्थन असेल, पण मोर्चा वगैरे…. नाही बाबा नाही’

मशनात जाओ तुमचं मूक समर्थन! असल्या मैत्रीणी कसल्या कामाच्या? दगाबाज कुठल्या! तुम्ही सगळ्या तिची मिठाई खाऊन बसल्या असाल.  मिठाईशी ईमान ठेवायलाच हवं! मला असा पुरस्कार मिळाला असता, तर पार्टी दिली असती, अगदी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये. पार्टी घ्यायलासुद्धा नशीब लागतं!’

हे मात्र तुम्ही अगदी बरोबर बोललात. आपल्याकडून पार्टी घ्यायला नशीब लागतं!’

(२)  मुलगी झाली हो –

अंसाक्काच्या घरी आज सकाळपासून गडबड सुरू झाली होती. तिच्या सुनेचे दिवस भरत आले होते. आज सकाळपासून तिला कळा सुरू झाल्या होत्या. अंसाक्काने लगबगीने कडकडीत पाणी केले. सुनेला न्हाऊ घातले. सदाशिव बायकोला घेऊन दवाखान्यात गेला.

अंसाक्का घरातली कामं अवरता आवरता दवाखान्यातून येणार्‍या निरोपाची वाट पाहू लागली. तिला खात्री होती, ‘आपल्याला नातूच होणार. आपल्या घराण्याची रीतच हाय तशी. आपल्या सासूला पैला मुलगा झाला. तोच आपला नवरा. आपल्याला बी पैला सदाशिव झालेला. दिराचा सोमू पैला. सोमूचा समीर पैला. आपली मुलगी सुरेखाला पैला मुलगाच. सदाशिवाला बी पैला मुलगाच व्हनार. सुमाचं पोट बी पुढे हुतं. डव्हाळे कडक. सारखी थकल्यावानी मलूल असायची. समदी मुलाचीच लक्षणं की.’

बारा वाजता सदाशिव सांगत आला. ‘सुमी बाळंत झाली. बाळ-बाळंतीण खुशाल हायती. आई, तुला नात झाली.’

‘काय?’ तिच्यावर जसा निराशेचा डोंगर कोसळला. तिला नातू हवा होता. नात नव्हे. डॉक्टरांनी संध्याकाळचं घरी सोडलं. अंसाक्का फुरंगटून बसलेली. तिने ना भाकर तुकडा घेतला. ना नव्या जिवावरून ओवाळून टाकला. शेवटी शेजारणीने भाकर तुकडा घेतला. ओवाळून बाळ-बाळंतिणीला घरात घेतले. अंसाक्का तशीच रुसून बसलेली. ‘अशी कशी मुलगी झाली? पैला मुलगा व्हायाची आपल्या घराण्याची रीत हाय. नातूच हवाय आपल्याला. ही रांड कशी तडफडली मधेच!’ असेच काही-बाही विचार अंसाक्काच्या मनात येऊ लागले.

आसपासच्या आया-बाया बाळाला पाहायला आल्या.

‘आजी, बघा तरी किती गोड, देखणी हाय तुमची नात. ‘ कुणीसं म्हंटलं. अंसाक्काचं हूं नाही की चूं नाही. ती आपली रूसलेली. जागची हललीसुद्धा नाही. अशी कशी मुलगी झाली, याच विचारात गुंतलेली. एवढ्यात कमळाबाईचं बोलणं तिला ऐकू आलं,

‘अगदी आजीसारखी दिसतीय नाही?’

‘व्हय! अगदी दुसरी अंसाक्काच!’

अंसाक्काचं कुतूहल चाळवलं. ती सुनेच्या दिशेने बघू लागली. अग, जवळ ये बघ. कशी तुज्यावाणी दिसतेय. नाक, डोळं, फुगरे गाल समदं तुझंच!’ आता अंसाक्काला राहवेना. ती उठून बाळाजवळ गेली. अगदी अंसाक्कासारखंच रंगरूप. ‘लहानपणी आपण अशाच दिसत असणार.’ अंसाक्काला वाटलं. तिने नातीला उचललं. छातीशी धरलं आणि तिचे पटापट मुके घेऊ लागली.

☆ ☆ ☆ ☆ ☆

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ऑनलाईन…  ☆ सौ. प्रांजली लाळे ☆

सौ. प्रांजली लाळे

अल्प परिचय :

सौ. प्रांजली हेमंत लाळे

राहणार मनमाड, जिल्हा-नाशिक, महाराष्ट्र

शिक्षण-एम.ए.बी.एड.(इंग्रजी)

  • दहा वर्षे शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून नोकरी.
  • सध्या गृहिणी व व्यावसायिका दोन्ही भुमिकेत कार्यरत. सोशल मिडियावर विविध विषयांवर लेखन करण्याची आवड. १४ कथा लिहून पुर्ण.

? जीवनरंग ?

☆ ऑनलाईन…  ☆ सौ. प्रांजली लाळे

नयना आज जाम खुश होती.. ‘आजकल पाँव जमींपर नही रहते मेरे..’ असंच काहीतरी झालेले.. आरशात पाहतानाही ती गाणं गुणगुणत होती.. स्वतःचेच प्रतिबिंब न्याहाळतांनाही तिची गालावरची खळी अधिकच सुंदर दिसली तिला.. नुकताच लग्नाचा वाढदिवस साजरा झालेला तिचा. तिच्या दोन्ही मुलांनी छान प्लॅन करुन लाँग डिस्टिनेशनला ह्या दोघांना पाठवलेले.. 

सुभाष, तिचा नवरा मोठ्ठा बिझनेसमन.. रग्गड पैसा, ऐशोआराम असलेले कुटुंब.. सुभाष थोडा अहंकारी.. स्वयंकेंद्री.. ‘मी’ आणि ‘माझे’ हे शब्द जेव्हा बोलण्यात येतात.. तेव्हाच खरं तर अहंकाराचा दर्प यायला लागतो..

सुखात लोळत असलेली नयना.. काहीच कमी नव्हते तिला खरं तर.. स्मार्ट,राजबिंडा आणि श्रीमंत नवरा, दोन सोन्यासारखी मुलं.. मुलगा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला.. मुंबईच्या रेप्युटेड कॉलेजला.. मुलगी रिया ह्यावर्षी आर्किटेक्ट होणार होती.. दोघेही मित्र परिवारात रममाण..

नयना मुळातच सौंदर्यवती.. माहेरची परिस्थिती यथातथाच.. परिस्थितीशी तोंडमिळवणी करत मोठी झालेली.. सुभाषशी लग्न झाल्यानंतर तिचा उत्कर्ष झाला.. तसे सुभाषनेही शुन्यातनं जग निर्माण केलेले.. पण भरपूर कमावत होता.. यशशिखरे चढत होता..

लग्न झाले तसे नयनाला नोकरी न करण्याची सक्त ताकीदच देऊन टाकली त्यानं.. आता मी भरपूर कमावतोय.. तु फक्त घर आणि मुलं सांभाळ.. बस्स.. नयनानेही ठरवलं.. घरात रहायचे.. राजाची राणी होऊन राज्य करायचे.. रमली बिचारी संसारात..

लग्नानंतर अधिक सुंदर दिसायला लागली होती.. सुखाचे बाळसंही चढले होते तिच्यावर.. पण संसाराच्या रामरगाड्यात ती स्वतःला आरशात पहायलाही विसरली..

सुभाषही यशाच्या मागे धावत होता.. एक टिपिकल जोडपे झाले होते ते.. मुलं मोठी होत होती.. तसतशी नयनाला स्वतःसाठी वेळ मिळायला लागलेला.. समाजात एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून नावारूपास आलेल्या सुभाषला बायको मेणाची बाहुली वाटायची.. पार्ट्या, मिटिंग्जमध्ये बिझी असलेला सुभाष नयनाला पार्टीपुरता बाहेर न्यायचा.. 

घरात प्रत्येक कामाला नोकर चाकर.. फक्त घराकडे लक्ष द्यायचे काम नयनाकडे.. जेवण-खाणं उरकले की नयना वामकुक्षी घ्यायची.. संध्याकाळी किटी पार्टी, मैत्रीणींबरोबर शॉपिंग असा नित्यक्रम असे..

सुभाषचे हल्ली पिणंही वाढले होते.. पैसा भरपूर असला म्हणजे सुख असतेच असे नाही.. लक्ष्मीबरोबर अलक्ष्मी यायला कितीसा वेळ लागतो…

नयना आजकाल काहीशी विचारात गढली होती.. एकटेपण डाचत होते तिला.. जुने दिवस आठवत होते तिला.. जेव्हा नवीन लग्न झाले होते त्यांचे.. तेव्हाचे मोरपंखी दिवस.. हवेत उडत होती ती.. सुभाषचे कौतुकाने तिच्याकडे पहाणे.. मन बहरुन यायचे तिचे.. त्याच्या प्रेम भरल्या तुडुंब नजरेने तिचं आयुष्य सुखावून गेले होते..

मध्यंतरीचा एक प्रसंग तिला उध्वस्त करुन गेला.. रात्रीचे बारा वाजून गेले तरीही सुभाष घरी परतला नव्हता.. पहाटे चार वाजता गेटचा आवाज आल्याने ही ताड्कन उठली.. झिंगतच आला होता तो.. हिने विचारले का उशीर झाला तर श्रीमुखात भडकवली त्याने.. ‘तुला काय करायचे आहे..’ वगैरे वगैरे.. ‘तुला काय माहीत मला किती कामाचा ताण आहे ते… तु काय घरीच असतेस..’ हे असे पहिल्यांदा ऐकत होती ती.. तिला प्रकर्षांने तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली.. तिच्या मुलीनं हे पाहिले.. ‘सकाळी बोलू गं आई..’ म्हणून समजावलं.

सकाळी नयना दैनंदिन कामाला लागली.. पण मन उदासच होते.. तिचा भ्रमाचा भोपळा फुटला होता.. तिला आपण कमी शिकलो आहोत.. बाहेरचे काहीच व्यवहार ज्ञान नाही ह्याची जाणीव झाली होती.. 

मुलगी उठली तशी आईला येऊन बिलगली.. हिचाही केव्हाचा दाबून ठेवलेला अश्रुंचा बांध फुटला.. “आई रडू नकोस.. तुला मी आजपासून मोबाईल शिकवणार आहे.. शिकशील ना??” थोडे आढेवेढे घेत नयना तयार झाली.. 

मग काय, नयनाच्या अँड्रॉइड मोबाईल स्क्रीनवर फेसबुक, व्हाट्सअप विराजमान झाले.. छान रमली त्यात नयना.. फेसबुक तर तिचे फेवरेट झाले.. विविध माहिती, मित्र मैत्रीणी ह्यातच तिचा वेळ जाऊ लागला.. ते आभासी जग सत्यापेक्षाही छान होते तिच्यासाठी..

एक दिवस मेसेंजर किणकिणला.. आकाश काळे नावाची फ्रेंड रिक्वेस्ट आलेली.. आतापर्यंत नयना माहिर झाली होती फेसबुक हाताळण्यात.. आकाशचे प्रोफाइल चेक केले तिनं झटकन.. दिसायला हँडसम.. एम.बी.ए. झालेला तरुण.. एक दोन म्युच्युअल मित्र मैत्रिणी होते.. रिक्वेस्ट स्विकारली तिनं..

दहा मिनिटात मेसेंजर पुन्हा किणकिणला.. “हाय, मी आकाश.. कशा आहात??”

ही “मी मजेत.. तुला मी ओळखत नाही..”

“हो, पण मी तुम्हाला खुप दिवसांचे फॉलो करतोय..”

“अच्छा.. मग??”

“तुमच्याशी बोलायचे म्हणून…

तुम्ही खुप छान दिसता..”

“थँक्स..” इथपासून सुरू झालेला प्रवास पर्सनल गोष्ट शेअर करण्यापर्यंत कधी पोहचल्या हे समजलेच नाही.. 

आकाश तिचे जग बनला.. त्याचा मेसेज आला नाही तर ती अस्वस्थ व्हायची.. तिला एका कंप्यानिअनची गरज असताना आकाश तिच्या आयुष्यात आला आणि तिचे जग बदलले होते.. आरशात स्वतःला न्याहाळायला लागली होती.. एक नवी पालवी फुटली होती तिच्या आयुष्यवेलीवर.. 

आकाशच्या स्तुतीसुमनांनी ती आनंदी बनली होती.. सुभाषने दिलेल्या शब्दांच्या डागण्यांवर आकाश ने केलेली स्तुती मलमाचे काम करत होती.. पण तिला काय माहिती होते हे सर्व आभासी जग आहे.. हा पाण्याचा बुडबुडा आहे.. तो प्रवाहात नाहिसा होणारच..

त्यादिवशी सकाळीच तिनं नेट सुरु केले.. आकाशचा मेसेज होता.. ‘मला तुला भेटायचे आहे.. मला पैशाची गरज आहे खुप.. आई आजारी आहे खुप.. दहा हजार तरी हवेत..’

हिने विचार केला, मेसेज केला ‘मुलीला सांगून बघते..’ हे वाचताच.. आकाश offline झाला.. पुढचा मेसेज गायब झाला.. त्या दिवशीपासून रोज प्रेमकविता लिहिणारा आकाश इनबाँक्समधे फिरकलाच नाही.. नयना पुन्हा उदास झाली..

खरं तर कुठे गुंतायचे नाही हे ठरवले की अश्या समस्या उद्भवत नाहीत.. कुठे थांबायचे हे कळलं की मृगजळही कोसो दूर पळतय..

मुलीनं नयनाला असे दुःखी पाहिले तसे बाबाशी बोलायचे ठरवले.. “आई एकटी पडली आहे बाबा.. तिला आता तरी सावरा.. या फेजमधे तिला तुमची गरज आहे..”

सुभाषलाही त्याची चूक समजली.. नयनालाही तिची चूक समजली होती.. तिला चुकीचे प्रायश्चित्त हवं होतं.. सुभाषच्या साथीनं पुढे जायचे होते.. तिनं आता ठरवलं होते ऑनलाइन फ्रेंडशिप नॉट अलाऊडेड.. जे दिसते ते सोनेच असते असे नाही.. ऑनलाइनमधे सबकुछ दिखावा है हे तिला चांगलेच समजले होते..

संग्राहक :  सुश्री प्रांजली लाळे  

मो न. ९७६२६२९७३१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नास्तिक — सुश्री गौरी हर्षल कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ नास्तिक — सुश्री गौरी हर्षल कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

“गाडी का थांबवलीस रतन?” लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसलेल्या डॉ. कोरडेनी गाडी थांबवल्याचं  जाणवलं तस ड्रायव्हरकडे बघण्यासाठी मान वर करत आपल्याच तालात विचारलं. पण वर बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ड्रायव्हर जागेवर नाहीये. आणि गाडीच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी आहे. 

त्यांनी गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते कधीचेच गाडीतून बाहेर पडले आहेत. आणि फक्त गाडीतूनच नव्हे तर त्यांच्या शरीरातूनही बाहेर पडले आहेत. 

स्वतःला बसलेल्या धक्क्यातून सावरत त्यांनी आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला असलेल्या गर्दीकडे त्यांचं लक्ष गेलं. वारीसाठी जाणाऱ्या एका दिंडीतले वारकरी होते ते सगळे गर्दीतले लोक. जसे ते कोरडेंसाठी पूर्णपणे अनोळखी होते तसेच कोरडेही त्यांच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते. पण आता या क्षणी मात्र ते सगळेजण कोरडेना आणि त्यांच्या ड्रायव्हरला वाचवण्यासाठी धडपड करत होते. ड्रायव्हर कसा माहीत नाही पण गाडीच्या बाहेर फेकला गेला आणि वाचला होता. पण डॉक्टर मात्र गाडीतच होते. 

काही वेळातच तिथे ऍम्ब्युलन्स आली. एम्ब्युलन्समधून उतरलेल्या कर्मचाऱ्यांनी दोघांनाही स्ट्रेचरवर घेत एम्ब्युलन्समध्ये ठेवलं. शरीर एम्ब्युलन्समध्ये ठेवताच कोरडेही तिकडे ओढले गेले, कदाचित अजून काही बंधन शिल्लक असावे. 

त्या दोघांकडे त्यांचा जीव वाचावा ह्या आशेने बघणाऱ्या वारकऱ्यांच्याकडे जाता जाता कोरडेंच लक्ष गेलं. आणि त्यांना तो प्रसंग आठवला….. 

‘भेटीचीया ओढ लागलीसे डोळा,

वाट ही विरळा दिसे मजला,

लाखो राउळाशी टेकवीला माथा,

देव कुठे माझा शोधू आता,

कुणी पाहिला पाहिला पाहिला हो,

माझा देव कुणी पाहिला..

कुणी पाहिला पाहिला पाहिला हो,

माझा देव कुणी पाहिला..

सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई

सावळे विठाई, कान्हाई कृष्णाई’

गाण्याचे बोल आणि तो आवाज कोरडेंच्या मनात फेर धरून नाचू लागला. अन् ते सगळे चेहरे त्यांना आठवले. 

डॉक्टर कोरडे प्रचंड सुदैवी होते. त्यांच्या घरात एकाच वेळी चार पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत होत्या. डॉक्टर सोडले तर सगळेजण रूढार्थाने देवभोळे असे होते. डॉक्टरांना मात्र ते सगळे अजिबात आवडत नव्हते.

आताही त्यांना तो प्रसंग आठवला जेव्हा त्यांनी घरातल्या सगळ्यांना गाण्याच्या बोलावर हातात टाळ घेऊन वारकरी वेशात नाचणाऱ्या नातवाकडे कौतुकाने बघताना बघितले होते. कोरडेंचे आईवडील, बायको आणि  डॉक्टर मुलगा, सूनही नातवाला कौतुकाने बघत होते. हे बघून त्यांचं डोकं फिरलं होतं. सगळ्यांवर चिडत त्यांनी नातवाच्या हातात असलेली टाळ फेकून दिली होती. कुठल्याही देवावर त्यांना इतका राग का आहे हे खुद्द त्यांनाही कळत नव्हतं. 

डॉक्टर रूढार्थाने जरी स्वतःला नास्तिक म्हणवून घेत असले तरी त्यांची त्यांच्या कामावर प्रचंड निष्ठा होती. अडल्या नडल्या लोकांना मदत करण्यासाठी त्यांना वेळ काळ कशाचेही भान उरत नसे. आणि त्यांच्या ह्याच गुणाबद्दल घरात आणि आसपासही सगळ्यांना आदर होता. अन् त्यामुळेच त्यांचे आईवडीलही त्यांचा देवावरचा राग सहन करत असत. कारण त्यांना त्या रागाचं मूळ कळलं होतं. 

एखाद्या पेशंटला इच्छा असूनही वाचवता आलं नाही की डॉक्टर हतबल होऊन चिडत असत. प्रॅक्टीसला इतकी वर्ष होऊनही अजूनही त्या गोष्टींचा त्यांच्या मनाला त्रास होत असे. सगळ्यात आधी उपचारासाठी दवाखान्यात आणण्याऐवजी देवळात, मशिदीत किंवा इतर कुठेतरी खेटे घालत बसलेल्या नातेवाईकांमुळे पेशंटला योग्य वेळी उपचार न मिळून तो दगावला की डॉक्टरांचा राग देवावर निघत असे. ते म्हणत असत की ‘तुमचा देव ह्या लोकांना ‘दवाखान्यात जा’ अशी बुद्धी का नाही देत? मग लोक पेशंटला काही झालं की डॉक्टर वर का चिडतात? देवावर का नाही चिडत?

आताही हा प्रसंग आठवताना त्यांना राग येत होता. मनातून वेगवेगळ्या गोष्टी समोर येत होत्या. पण अचानकच त्यांना आपल्या जवळ कुणीतरी उभं असल्याची जाणीव झाली. त्यांनी मान वळवून बघितलं तर एक व्यक्ती त्यांच्याकडे प्रेमळ हसत बघत होती. 

आतापर्यंत कोरडेंना आपल्या अवस्थेची जाणीव झाली होती. त्यामुळे ही व्यक्ती आपल्याला कशी काय बघू शकतेय ह्याचं त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्या व्यक्तीकडे बघितलं. 

त्या व्यक्तीने हसून अगदी मित्रत्वाने बोलायला सुरुवात केली. “काय मग डॉक्टर, कसं वाटतंय? खूप सगळे प्रश्न आहेत न मनात? कळत नाहीये हे सगळं असं अचानक कसं घडलं? मी कोण आहे? तुम्हाला कसा काय बघू शकतो? वगैरे वगैरे… अहं…. असं अजिबात समजू नका की मी तुमची खिल्ली उडवतोय. मी तर तुमच्या मदतीसाठी इथे आलो आहे. तसा मी सगळ्यांनाच मदत करण्यासाठी येतो पण तुम्ही जरा जास्तच स्पेशल आहात.” 

“कसं काय?”

“अहो तुम्ही प्रत्यक्ष देव आहात कित्येक लोकांसाठी. तुम्हाला कितीही चीड आली तरी तुम्ही स्वतः आमचं प्रतिरूप आहात पृथ्वीवर. हो बरोबर ऐकलत… मीच तो, ज्याचा तुम्हाला खूप राग येतो. पण मला तुमचा राग, त्यामागची भावना कळते, जशी ती तुमच्या आईवडिलांना पण कळली आहे. पण कसं आहे न डॉक्टर प्रत्येक माणूस हा त्याचं नशीब घेऊन जन्माला येतो. ते कसं घडवायचं हे त्यांचा हातात असतं. आमच्यासारखे तुम्हीही फक्त निमित्तमात्र ठरता.” 

डॉक्टर मन लावून ऐकत होते. 

“आता त्या दिवशीचच उदाहरण घ्या. त्या दिवशी तुमचे दोन पेशंट दगावले. पहिला पेशंट बऱ्याच उंचावरून पडून गेला आणि दुसरा सुद्धा एक्सिडेंट होता. पण त्या मागची गोष्ट तुम्हाला माहित नव्हती डॉक्टर.

पहिल्या पेशंटने आईवडिलांना, बायकोला जीव नकोसा केला होता. तो गेल्यावर तुम्हाला जे वाटलं ना  की ह्याचं घर उघड्यावर पडेल, तसं काही होणार नव्हतं. कारण त्याच्यामागे उरलेले ते तिघे आणि अजून दोन निष्पाप जीव रोज अक्षरशः जीव मुठीत धरून जगत होते. त्या जीवांनी भलेही कधीच त्याच्या मृत्यूची कामना केली नसेल पण त्या जीवांना होणारा त्रास नियतीला दिसत होता. त्यामुळेच त्या दिवशी तो दारू पिऊन इकडे तिकडे भरकटत असताना ही गोष्ट घडली आणि तो मृत्यूच्या दारात पोहोचला. पाच जीवांच्या पुढे त्याला मिळालेली शिक्षा तशी कमीच आहे. पटलं नं ?” 

डॉक्टरांनी होकारार्थी मान डोलावली. “आणि दुसरा? “

” त्याने स्वतःच्या आनंदासाठी बऱ्याच मुलींना फसवले होते. त्यापैकी दोघींनी ट्रकसमोर येऊन जीव दिला होता. त्या बिचाऱ्या अकाली गेल्या. आणि तुम्हाला वाटलं की त्याला नुकतीच नोकरी लागली होती, लग्न ठरलं होतं. पण डॉक्टर त्या मुलीचाही जीव वाचलाच. कारण ह्या मुलाच्या आईवडिलांना फक्त तो मुलगा आहे म्हणून त्याचे सगळे गुन्हे माफ करायची सवयच लागली होती. त्यांनाही शिक्षा होणं गरजेचं होतं. 

असे कित्येक आईवडील आहेत जे आपल्या अपत्याची मग तो मुलगा असो वा मुलगी, चूक लपवतात, त्यांना पाठीशी घालतात. पण त्यामुळे दुसऱ्या कुणाला त्रास होतो आहे हे त्यांना समजूनही ते दुर्लक्ष करतात. एखाद्या जीवाला हेतुपुरस्सर त्रास देणे मग तो मानसिक असो किंवा शारीरिक हे सगळ्यात मोठं पापच आहे ना डॉक्टर?” 

इतका वेळ शांतपणे ऐकणारे डॉक्टर बोलू लागले, ” बरोबर आहे तुमचं… मला फक्त नाण्याची एकच बाजू माहीत असायची त्यामुळे मी कित्येकदा तुमच्यावर आगपाखड केली. पण आज कळतंय की जाणारा जाण्यामागे बरीच कारणं असू शकतात. मी चुकलो, रागाच्या भरात खूपच चुकीचा वागलो. आईवडिलांना देवाचं करताना त्रास दिला. तुम्ही मला हवी ती शिक्षा देऊ शकता.” कोरडेंचे डोळे पाणावले होते. 

” हं, शिक्षा तर होणार आहेच तुम्हाला.”,  ते हसत हसत म्हणाले. तस कोरडेंना आश्चर्य वाटलं. 

” तुम्हाला परत पृथ्वीवर जायचं आहे, अजून बरंच काम शिल्लक आहे. आमची एक छोटी मैत्रीण तुम्ही वाचावं म्हणून आम्हाला साकडं घालत आहे.”, असं म्हणत त्यांनी कोरडेंना एक दृश्य दाखवलं. त्या दृश्यातले चेहरे ओळखू येताच कोरडेना आठवलं की त्या मुलीच्या आईला त्यांच्याकडे आणलं होतं आणि तिचं दोन महिन्यांनी ऑपरेशन ठरलं होतं. ती मुलगी देवांना पाण्यात ठेवून ‘ डॉक्टर वाचूदे म्हणजे ते माझ्या आईला वाचवतील ‘ असं सांगत होती. ते बघून कोरडेंना जाणीव झाली की घरातील लोकांपेक्षा जास्त बाहेर लोकांना त्यांची किती गरज आहे. 

आणि ते आठवताच कोरडेना घरच्यांची आठवण झाली. 

“आहेत आहेत. ते सगळे इथेच ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आहेत. पण एक वाईट बातमी आहे बुवा तुमच्यासाठी… तुम्हाला बरं वाटलं की बरेच नवस फेडावे लागणार आहेत.” असं म्हणत ते हसू लागले. 

“आता तर माझी कुठलेही नवस फेडायची तयारी आहे देवा, तुम्ही फक्त माझं काम माझ्याकडून नीट करून घ्या, एवढं एकच मागणं. आणि माझे पाय जमिनीवर राहूदे.” डॉक्टर म्हणाले. 

“तथास्तु” असं कानावर पडत असतांनाच कोरडेंना वेगाने खेचलं गेल्याची जाणीव झाली. मोठयाने श्वास घेत त्यांनी डोळे उघडले तसे आजूबाजूला असलेल्या चेहऱ्यावर उमटलेले हसू बघून त्याना आपण परत आपल्या शरीरात आलो आहोत ह्याची जाणीव झाली. 

नर्सने बाहेर जाऊन सांगितलं तसं त्यांच्या कानावर आवाज आला, “देवा, पांडुरंगा, वाचवलंस रे बाबा.”, ते ऐकून डॉक्टर कोपऱ्यात उभं राहून त्यांच्याकडे बघत डोळे मिचकवणाऱ्या त्या व्यक्तीला बघून हसले. सगळे जण त्या दिशेने बघू लागले तर तिथे भिंतीवर असलेल्या फोटोशिवाय काहीच नव्हतं. पण तो तिथेच होता सदैव. मनापासून आस्तिक असलेल्या नास्तिकासाठी. 

मंडळी पूजा, कर्मकांड करणारी प्रत्येक व्यक्ती मनापासून ते करत असतेच असे नाही. तसेच आयुष्यभर मंदिराची पायरीही न चढलेली व्यक्ती नास्तिक असते असं ही नाही. माणसाचं कर्म आणि त्यांचे परिणाम, माणसाचं भविष्य घडवत असतात. मग तुम्ही देवावर विश्वास ठेवा किंवा नका ठेऊ. मनाने, विचाराने आणि कर्माने तुम्ही काय आहात हे तुम्हाला माहीत असतं. आणि त्यालाही. बाकी कर्मसिद्धांत स्पष्ट करतोच. Always and forever. 

लेखिका : सुश्री गौरी हर्षल कुलकर्णी

संग्राहक : श्री मेघ:श्याम सोनावणे.  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जिव्हाळा… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ जिव्हाळा… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

आईला ऑपरेशनसाठी आत नेलं, तसा प्रसन्न बाहेर रिसेप्शन काउंटर जवळच्या सोफ्यावर येऊन बसला. विशाखा सासूबाईंची फाईल घेऊन तिथेच बसली होती.

आज पहाटे साडेपाचला आई बाथरुमला जायला म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली. कमरेचं हाड मोडलं होतं. तो आणि विशाखा तिला घेऊन करूणा आर्थोपेडिक हाॅस्पिटलमध्ये घेऊन आले. एक्स-रे बघून ऑपरेशन शिवाय गत्यंतर नाही असं डाॅक्टर म्हणाले. तेही लगेच करायला हवं होतं. सुदैवाने आईला इतर काही व्याधी नसल्याने बाकी रिपोर्ट्स चांगले आले. आणि आता नऊ वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं.

या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायला देखील सवड मिळाली नव्हती. हाॅस्पिटलच्या कँटिनचा मुलगा चहा घेऊन आला, तसं प्रसन्न आणि विशाखा, दोघांनी चहा घेतला.

चहा पिऊन प्रसन्नाने त्याच्या बाॅसला फोन करून आज ऑफिसला येऊ शकत नसल्याचं कळवलं. विशाखानं तीन दिवस रजाच टाकलेली होती. उद्या तिच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं बोरीवलीला. आज घरातलं आवरून दुपारी ती आणि सई, तिची लेक, मालाडला जाणार होत्या, तिच्या माहेरी. आणि आज सकाळी हे सगळं झालं होतं.

तिनं ठाण्यातच राहणाऱ्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला. सासूबाईंबद्दल कळवलं. ती पुढे काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, “अरे देवा ! अग आम्ही आलो असतो ग, पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना, त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय. रात्री १०३ होता, अजूनही पूर्ण उतरलेला नाही. बघते दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाईन. “

‘यांच्या तब्येतीच्या तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे. इकडे तिकडे भटकताना बरे टुणटुणीत असतात. कायम कुठल्या न कुठल्या टूरवर जात असतात आठ-पंधरा दिवस !’ विशाखा मनात म्हणाली.

“अहो, राजूभावजींना फोन करायला हवा ना?” तिनं प्रसन्नला विचारलं. राजू म्हणजे प्रसन्नचा दोन नंबरचा भाऊ ! प्रसन्न सगळ्यात धाकटा.

“करू सावकाश ऑपरेशन झाल्यावर ! तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाहीत. नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील. शंभर चौकश्या करतील. असं कसं झालं? तुम्ही काळजी घ्यायला हवी होती. यांव करा नि त्यांव ! तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरीवलीला. मी करतो मॅनेज इथे. तसंही पेशंटचं जेवणखाण इथेच मिळणार आहे. “

“अहो, तुम्ही एकटे कसं कराल? मी आज काही जात नाही. उद्याचं उद्या बघू. आईंना असं ठेवून जाऊन माझं काही तिथे लक्ष लागणार नाही. मीराताईंना विचारायचं का? पण नकोच, त्यांच्या घरी आधीच एवढं खटलं आहे. तरी त्या बिचार्‍या येतात धावून मदतीला !”

मीरा प्रसन्नची बहिण, लांबच्या नात्यातली. ती मुलुंडला राहायला होती. तिच्या घरी तिचे सासू-सासरे दोघंही ऐंशीच्या पुढचे. त्यामुळे विशाखाला तिची मदत मागायला संकोच वाटायचा.

असाच थोडा वेळ गेला आणि ऑपरेशन थिएटरमधून त्यांना बोलावणं आलं. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डाॅक्टर गेले. पाच-सहा दिवस तरी आईला हाॅस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. तिला सेमी डिलक्स रूममध्ये हलवण्यात आलं. एका रूममध्ये दोन पेशंट असणार होते.

आईला रूममध्ये ठेवून वाॅर्डबाॅय बाहेर गेल्यावर प्रसन्न आणि विशाखा आत गेले. आई अजून जरा गुंगीतच होती. रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती. बाजूच्या काॅटवर एक साधारण साठीच्या बाई झोपल्या होत्या. त्यांच्याही पायाचं ऑपरेशन झालेलं दिसत होतं.

त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता. पण तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितलं आणि पुन्हा मोबाईलकडे नजर वळवली.

सईचा फोन आला होता, ‘ मी येऊ का आजीजवळ बसायला? ‘ उद्या लग्नाला कसं जायचं आपण, या विचाराने थोडी नाराजही झाली होती ती ! पण विशाखानं तिला घरीच थांब म्हटलं. कामवाली यायची होती. शिवाय कुकर लावून, बाहेरून पोळी-भाजी आणून /मागवून ठेवायलाही सांगितलं. मग तिनं  प्रसन्नला घरी पाठवलं. तो स्वतःचं आवरून आणि जेवून आला की विशाखा घरी जाणार होती.

विशाखा सासूबाईंच्या काॅटजवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला. ‘जिव्हाळा’ च्या कुलकर्णी काकू बोलत होत्या. “अग, सुधाताईंचं ‘सुप्रभात’ आलं नाही ग्रुपवर सकाळी, म्हणून मी फोन केला, तर तो पण उचलला नाही त्यांनी. म्हणून मी आणि सानेबाई तुमच्या घरी गेलो. सईकडून हा सगळा प्रकार कळला. झालं का सुधाताईंचं ऑपरेशन?”

“हो काकू, ऑपरेशन झालं व्यवस्थित. अजून एक-दीड तासांनी त्या शुद्धीवर येतील, म्हणाले डॉक्टर. “

“बरं, तुला आज बोरिवलीला जायचंय ना भाचीच्या लग्नासाठी? ते तू ठरल्याप्रमाणे जा. सई बोलली मला, मग ग्रुपवर कळवलं मी ! आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतली आहे दोन दिवसांसाठी. रात्री माटेवहिनी येणार आहेत सुधाताईंजवळ झोपायला. त्यांना सकाळचा चहा नाश्ता आमची सुरभी देईल, ऑफिसला जाता जाता ! मग काळेबाई, निशा, देशपांडे काकू आणि मी उद्याचा दिवसभर आळीपाळीने थांबू. रात्री सरोजाताई येतील झोपायला. त्यामुळे प्रसन्नलाही लग्न अटेंड करता येईल उद्या. बाकी काही मदत लागली तर शहाणे, कुलकर्णी वगैरे पुरूष मंडळी आहेतच. ” असं म्हणून काकूंनी फोन ठेवला सुद्धा ! 

‘जिव्हाळा’, हा खरं तर सासऱ्यांच्या पेंशनर्स मित्रांचा ग्रुप. ठाण्यात राहणाऱ्या या पंधरा जणांनी हा ‘जिव्हाळा’ ग्रुप बनवला होता. या ग्रुपपैकी कोणाच्याही घरी काही अडचण असेल तर, बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायचे. मग ती मदत आर्थिक असो, सोबत करण्याची असो की इतर काही.

कोणाची मुलं परदेशी, कोणाची असून नसल्यासारखी, तर कोणी एकेकटेच. शिवाय नोकरी व्यवसायामुळेही मुलं-सुना दिवसभर बाहेर असायची. वेळ – प्रसंग काही सांगून येत नाही. पण अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता. विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता.

सासऱ्यांनंतर सासूबाई आता या ग्रुपवर होत्या. प्रत्येकाने सकाळी ‘सुप्रभात’, चा मेसेज टाकला म्हणजे, ‘All is well’ समजायचं. इतर वेळी फोन, मेसेज करायचाच गरज असेल तर. त्यानंतर विशाखा, प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं-सुनादेखील या ग्रुपला मदत करण्यात सामील होऊ लागले होते.

विशाखाला अगदी भरून आलं होतं. इथे रक्ताच्या नात्याची माणसं सबबी सांगत होती आणि ही  जिव्हाळ्यानं जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती. आता ती निश्चिंत मनाने भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

ही कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासह आणि कोणताही बदल न करता अग्रेषित करण्यास हरकत नाही.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print