मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॠणानुबंध….भाग 2 ☆ सुश्री स्वप्ना अभिजीत मुळे (मायी) ☆

? जीवनरंग ❤️

☆ ॠणानुबंध….भाग 2 ☆ सुश्री स्वप्ना अभिजीत मुळे (मायी) ☆ 

(काकूंनी मात्र तोंडात बेसनाचा लाडू घातला आणि केसांवरून हात फिरवत माझी दृष्ट काढत म्हणाल्या.. “खूप खूप मोठा हो..”) –इथून पुढे —-

काकांनी परत दरडावून हाक मारली आणि वेगळ्याच इर्षेने मला इस्त्री करायला बसवलं. मी घाबरत इस्त्री करायला लागलो, कारण हे श्रीमंताचं इस्त्री प्रकरण मला येत नव्हतं. आजोबांनी मला उशीखालची इस्त्री शिकवली होती. शर्ट उशीखाली घडी घालून ठेवला की सकाळी इस्त्री होतो… पण ही देशमुख इस्त्री चांगली जड होती.

भीतभीत फिरवायला लागलो. दोन पाच कपडे मस्त जमले, पण शेवटच्या कपड्याला गडबड झाली. काकूंची साडी जळाली. मन घाबरं घुबरं झालं. तो जळका भाग घडीत लपवला. थरथरत्या हातांनी त्या घड्या नीट ठेवल्या‌. सगळ्यात खाली ती साडी घातली. त्यादिवशी न जेवताच तिथून पोबारा केला.

दोन दिवस हृदयाची धडधड थांबली नव्हती. डोळ्यासमोर ती साडी आणि देशमुख काका फिरायला लागले.. तिसऱ्या दिवशी निरोप आलाच… ‘काकूंनी बोलावलंय.. जावं तर लागणार. आजचं मरण उद्यावर किती दिवस ढकलणार’ या विचाराने गेलो.. मनात निश्चय केला ‘फारच रागावले तर जेवण बंद करून येऊ’..

दबकत घरात शिरलो तर सगळी मंडळी कुठे तरी निघण्याच्या बेतात.. प्रत्येकानेच आपण इस्त्री केलेले कपडे घातले होते.. तेवढ्यात देशमुख काकू बाहेर आल्या. तेव्हा काका ओरडले, “अहो ती चॉकलेटी साडी नसणार होत्या ना तुम्ही, खास इस्त्री केलेली..?”

माझं हृदय धडधडायला लागलं. सगळ्या अंगाला घाम फुटला. पण काकू म्हणाल्या, “मला त्याचे काठ खूप टोचतात. तशीही माझ्या माहेरची साडी ती. तुम्हाला जसं माझं माहेर टोचतं तशीच झाली ती साडी. त्यापेक्षा तुम्ही प्रेमाने घेतलेली ही जांभळी पैठणी छान, मऊसूत आहे.. उगाच नका त्या टोचक्या साडीची आठवण काढू, मला त्रास होतो..”

देशमुख अगदीच खुलले– आपली बायकोच खुद्द तिच्या माहेरावर असं बोलते म्हणून.. लगेच म्हणाले “नकाच नेसू ती टोचकी साडी.. आपण अश्याच साड्या घेऊ तुम्हाला मऊसूत….”

तेवढ्यात काकू माझ्या पाठीवर थाप देत म्हणाल्या, “महेश, छान थालपीठं केली आहेत. जेवून घे.. काही थालपीठं जळाली आहेत, त्याचं फार मनाला लावून घेऊ नकोस..”

काकूंचं म्हणणं फक्त मला समजलं.. आज मला त्यांनी वाचवलं होतं.. जेवतांना कळलं थालपीठं जळाली नव्हतीच, पण ते वाक्य साडीवरून होतं ‘मनाला लावून घेऊ नकोस’..

पुढे काही महिनेच मी तिथे होतो, परत शिक्षणाला बाहेर पडावं लागलं. तिथे कोणी देशमुख नव्हते. 

हळूहळू काळही बदलला. छोटी मोठी नोकरी करत शिक्षण झालं. जेवणाचे प्रश्न मिटले. पुढे नोकरी, लग्न आणि आता परत ह्या शहरातली बदली.. त्यात नेमकं ह्या अपार्टमेंटमध्ये ह्याच काकू पोळ्याला भेटणं.. 

काकूंनी तर तुझ्यासमोर सांगितलं त्यांचं आयुष्य किती बदललं.. काका वारले, मुलगा दारूकडे वळला.. आता काकू पोळ्या करून उदरनिर्वाह करतात.. त्यात चिमीचं लग्न ठरलं.. आता ही माझ्यासाठी संधी आहे त्यांना माहेरची साडी घेण्याची, मला प्लिज त्या संधीचा आंनद घेऊ दे.. 

खरंतर त्या माऊलीने तेव्हा प्रेमाने खाऊ घातलं म्हणून मी शांतपणे शिकू शकलो.. तिचे ऋण कधी फिटणार नाही आणि उपकार केलेले तिलाही आवडणार नाही, मग ही संधी आहे.. मला त्याचा फायदा घेऊ दे..” 

आसावरी अवाक् झाली,.. “किती वेगळं असतं रे प्रत्येकाचं आयुष्य.. आज तुझ्या यशामागे किती तरी अदृश्य हात आहेत..”

महेश हसला. म्हणाला, “हो, त्या हातांचे ऋण असतात म्हणूनच माणसं यशस्वी होतात.. त्यांच्या कायम ऋणात राहायचं, पण संधी आली तर त्या समोरच्याला आनंदी करायचं..”

तो उठून कॉफी बिल पे करायला गेला. आसावरी गाडीत येऊन बसली. तिने ती मागची साडी आता मांडीवर घेतली होती. ती म्हणाली, “छान पॅकिंग करू आणि सरप्राईज देऊ त्यांना” म्हणत त्या साडीवर आसावरी हात फिरवू लागली.

महेश गाडी चालवत होता पण साईड मिररमध्ये त्याला आजोबा, देशमुख काका, काकू आणि इस्त्री दिसत होती.. शेवटी चेहऱ्यावर मायेने चॉकलेटी पदरही फिरत होता.. त्याचे डोळे भरून आले..आठवणींनी, मायेने की ऋणानुबंधामुळे, त्यालाच कळेना..

— समाप्त —

(वाचकहो, कथा कशी वाटली नक्की कळवा.. अश्याच कथांचे पुस्तक हवे असल्यास 9822875780 ह्या no वर msg करा. धन्यवाद.) 

© स्वप्ना अभिजीत मुळे (मायी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ॠणानुबंध….भाग 1 ☆ सुश्री स्वप्ना अभिजीत मुळे (मायी) ☆

? जीवनरंग ❤️

☆ ॠणानुबंध….भाग 1 ☆ सुश्री स्वप्ना अभिजीत मुळे (मायी) ☆ 

“थोडी भारी दाखवा ना दोन हजारच्या पुढे पण चालेल, आणि गडद चॉकलेटी रंग दाखवा प्लिज..” ह्या महेशच्या म्हणण्यावर “बरं” म्हणत पसरवलेल्या साड्या दोन्ही हातांनी उचलत तो दुकानातला नोकर निघून गेला तेंव्हा असावरीने न राहवून महेशला मांडीला चिमटा काढत खुणावलं आणि हातानेच ‘काय’ असं विचारलं,..

महेश म्हणाला, “बोलू या नंतर, साड्या बघ आधी..”

ती नाक मुरडत म्हणाली, “मला चॉकलेटी साडी नको.”

त्यावर महेश हसत म्हणाला, “तुला नाही गं..?”

आसावरीने परत डोळे मोठे करत “मग, दोन्ही ताईंना तर नाहीच आवडत हा रंग..”

त्यावर महेश म्हणाला, “त्यांना पण नाही.. देशमुख काकूच्या मुलीचं लग्न ठरलंय ना..” 

त्याच्या ह्या वाक्यावर आसावरी जोरात ओरडली, “काय ? देशमुख काकूंना दोन हजाराची साडी..?” तिचं ओरडणं एवढं जोरात होतं की काउंटरवरचा मालक आणि आजूबाजूचे गिऱ्हाईक सगळे वळून बघत होते हिच्याकडे, अगदी समोरच्या पिलरमध्ये आरसा होता मोठा, त्यातही बऱ्याच माना हिच्या दिशेने वळाल्या. तिला ते जाणवलं. ती जराशी चपापली आणि खर्ज्यात आवाज लावत म्हणाली, “अरे पोळ्यावाली आहे ती आपली.. तिला कशाला एवढी महाग साडी..? घरात आहेरात आलेल्या पन्नास साड्या आहेत, त्यातली देऊ..”

तिच्या बोलण्याकडे लक्ष न देता महेशला आठवणीत होती तशीच मोठया काठांची सोनेरी बुट्ट्या असलेली चॉकलेटी साडी या नवीन गठ्ठ्यात दिसली. त्याने ती साडी पटकन उचलली. किंमत तीन हजार सहाशे होती पण त्याने लगेच “ही साडी पॅक करा” असं सांगितलं आणि तो असावरीकडे न बघताच काऊंटर कडे चालू लागला.. 

आसावरी मनातून प्रचंड चिडली होती. तिथे न थांबता तणक्यात ती गाडीत येऊन बसली. महेशने साडीचं पार्सल मागे गाडीत टाकलं आणि सिट बेल्ट लावत म्हणाला, “छान आहे ना गं साडी.. अगदी मला हवी तशी मिळाली..”

आसावरीचा रागाचा भडकाच उडाला, “अरे, काय पायातली वाहाण छान म्हणून डोक्यावर नाही ठेवत आपण..”

महेश म्हणाला, “असावरी, तुला काही माहीत नाही. बोलू आपण निवांत..”

त्यावर चिडून आसावरी म्हणाली, “सगळं माहीत आहे मला, अण्णा बोलले होते मागे, ह्या देशमुखबाईचे फार उपकार आहेत आपल्यावर.. म्हणून काय एवढी महाग साडी..?”

महेशने कॉफी शॉप बघत गाडी थांबवली. आसावरी तणक्यानेच टेबलवर बसली. महेशने कॉफी ऑर्डर केली आणि आसावरीशी बोलू लागला, “माझे आई आणि बाबा पाठोपाठ वारले आणि आजोबांनी हिम्मत लावून मला या शहरात शिकायला ठेवलं. शेतीचं उत्पन्न कमी. आजोबा कसेबसे पैसे पुरवायचे मला, पण एकदा कळलं, गावातले देशमुख शहरात राहायला येणार. गावाकडे आजोबा त्यांच्या देवाची पूजा करायला जायचे, त्यामुळे रोजच्या उठण्या बसण्यातल्या ओळखी होत्या.

आजोबांनी शब्द टाकला, ‘पोराला एक वेळ जेवण मिळालं तर बरं होईल.. शिक्षणाचा खर्च पेलत नाही.. एक वेळ चहा नाष्टा धकवतो.. खरंतर रोज पूजेला आला असता, पण कॉलेजची वेळ सकाळची..”

आजोबांच्या बोलण्यावर देशमुख तयार झाले आणि माझं रात्रीचं जेवण पक्क झालं.. ही मायमाऊली तेव्हापासून माझी अन्नपूर्णा आहे.. मला छोटीमोठी काम़ त्या घरात सांगितली जायची.. कधी दळण आणायचं, कधी भाजी आणून द्यायची..

मला जेवू घालतात हे त्यांच्या घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात दिसायचं. मला ते खुपायचं पण माझ्याकडे इलाज नव्हता. आजोबांची महिन्याची चक्कर हुकली की पोटात गोळा यायचा, कसं होईल आपलं..? खोलीचे भाडे, चहा, नाश्ता बिल जीव घाबरून जायचा. त्यादिवशी हमखास जेवणात लक्ष लागायचं नाही, तेंव्हा देशमुख काकु डोक्यावरून हात फिरवून शेजारी बसून आग्रहाने वाढायच्या. म्हणायच्या, ‘येतील आजोबा, नको काळजी करुस..’

जेवतांना डोळ्यातून अश्रू गालावर येऊन घासात मिसळायचे.. आईचा स्पर्श आठवायचा..असे ते दिवस होते,..

एकदा मला घरातल्या काही कपड्यांना इस्त्री कर असं एकदम करड्या आवाजात सांगितल्या गेलं.. तश्या काकु बाहेर येऊन म्हणाल्या, “अहो असं रागावून का सांगता त्याला.. आणि त्याला सवय नसेल इस्त्री करण्याची..’ 

पण त्यादिवशी देशमुख काका रागातच होते.. त्यांचा माझ्यासोबत बारावीत शिकणारा मुलगा नापास झाला होता आणि त्यांच्या तुकड्यांवर जगणारा मी मात्र मेरिटमध्ये आलो होतो.. तो रागच होता.. उपकाराचा.. त्यादिवशी त्यांचा मुलगा.. ही आता लग्न ठरलेली चिमी तर आठच वर्षांची होती, ती सुद्धा वेगळ्याच तोऱ्यात होती. काकूंनी मात्र तोंडात बेसनाचा लाडू घातला आणि केसांवरून हात फिरवत माझी दृष्ट काढत म्हणाल्या..

“ खूप खूप मोठा हो..”

—क्रमशः..

© स्वप्ना अभिजीत मुळे (मायी)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रामाणिकपणाचे कौतुक… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

? जीवनरंग ❤️

☆ प्रामाणिकपणाचे कौतुक… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆ 

बंडूतात्या सकाळी सकाळीच तयारी करून शहराच्या गावी जायला निघाले. महत्त्वाचे काम असल्याने त्यांच्या सोबत त्यांचे मित्र अप्पाजीही होते. एस.टी.त बसल्यावर आपल्याला काय काय घ्यायचं आहे याचा ते विचार करत होते. बर्‍याच दिवसांनी शहराच्या ठिकाणी जात होते. त्यामुळे त्यांच्या छकुलीनेही “आपल्यासाठी काहीतरी आणा” असे बजावले होते.

गाडी वेळेवर पोहोचली. कार्यालयातील त्यांची कामेही लवकरच आटोपली. आपली सर्व कामे आटोपल्यावर  त्यांना घरी जाण्यासाठी बराच वेळ शिल्लक होता. आता  खरेदी करू या असं ठरवून दोघेही बाजारामध्ये गेले. घरी लागणा-या काही वस्तू बाजारातून त्यांनी खरेदी केल्या. आपली छकुली  काय तरी नवीन घेऊन येण्याची वाट पाहत असणार. म्हणून आपल्या मुलीसाठी त्यांनी एक सुंदर फ्रॉक खरेदी केला . मुलीला आवडत असलेला रंग आणि त्यावर असलेला सुंदर गोंडा त्यामुळे तो फ्रॉक बंडूतात्यांना खूपच आवडला होता. केव्हा एकदा घरी गेल्यावर आपल्या मुलीला ती भेट देतो असं त्यांना झालं होतं.  अजूनही गाडीला खूप वेळ होता. त्या दोघांची खरेदी संपलेली होती. आता बस स्टॉपवर बसून राहण्यापेक्षा आपण सिनेमा पाहायला जाऊ असा त्यांनी विचार केला. त्या दोघांनी एक रिक्षा बोलावली आणि त्या रिक्षात बसून ते सिनेमागृहात निघाले. सिनेमाचा वेळ झालेला होता. सिनेमागृहापाशी पोहोचल्यावर बंडूतात्यांनी रिक्षावाल्याला पैसे दिले आणि लगेच तिकीट काढायला म्हणून घाईघाईने निघून गेले. त्यांनी सिनेमाची तिकिटं काढली आणि सिनेमागृहात प्रवेश केला. त्यांच्या आवडीच्या विषयावर सिनेमा असल्यामुळे बंडू तात्या सिनेमा पाहण्यात दंग झाले होते.

दरम्यान मध्यंतर झालं आणि सिनेमागृहाच्या लाइट्स सुरू झाल्या. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दु:खी भाव दिसू लागले. अप्पाजींनी त्याला विचारलं, “काय रे, काय झालं? तू दु:खी का?”

बंडू तात्या म्हणाले, “आपण बाजारातून  माझ्या मुलीसाठी फ्रॉक घेतला होता. त्या फ्रॉकची पिशवी आता मला दिसत नाही. आता रिकाम्या हाताने घरी गेलो तर छकुली नाराज होईल.”

आप्पाजी म्हणाले, “अरे आता काय करणार ? आता तर आपली जायची वेळ झाली. आपल्याला वेळेवर निघायला हवं. नंतर बस नाही.”

बंडू तात्या आपल्या मित्राला म्हणाले, “चल आपण बाहेर जाऊ आणि थोडा शोध घेवू.”

आप्पाजी  त्याला म्हणाले, “ठीक आहे. पण नीट आठव. नाहीतर आपल्याला उगाच इकडे-तिकडे भटकत राहावे लागेल.”

बंडूतात्यांना मात्र काहीच सुचत नव्हतं. ते लगबगीने बाहेर आले. सिनेमागृहाच्या बाहेर आल्यानंतर इकडेतिकडे शोधक नजरेने पाहू लागले. त्याच वेळी एक गृहस्थ त्यांच्या दिशेने आला आणि त्यांना विचारलं, “काय हो, काय शोधत आहात? मला जरा सांगता का?”

त्या गृहस्थाकडे ते पाहू लागले. ते म्हणाले, “सांगून काय उपयोग आहे? पण सांगतो.  माझी एक किंमती वस्तू हरवलेली आहे आणि ती वस्तू मी जर घरी नेली नाही तर माझ्या मुलीला खूप वाईट वाटेल.”

तो गृहस्थ म्हणाला, “मी एक रिक्षा व्यावसायिक आहे. दुपारी माझ्या रिक्षामध्ये दोन व्यक्ती बसलेल्या होत्या . त्यापैकी एकाची पिशवी माझ्या रिक्षामध्ये राहिली. परंतु त्यांचा चेहरा नीट पाहिला नसल्यामुळे मला ते व्यवस्थित आठवत नाहीत. मी शोधू शकत नाही.”

हे ऐकून बंडूतात्यांना बरं वाटलं. ते म्हणाले, “अहो तो मीच आहे. माझीच पिशवी हरवली आहे.”

रिक्षावाला म्हणाला, “माझ्या रिक्षामध्ये ही पिशवी विसरली होती. घरी गेल्यावर माझ्या पत्नीला सापडली.”

“हो पण एवढ्या पिशवीसाठी तुम्ही परत आलात?”

रिक्षावाला म्हणाला, “खरं तर तुम्हाला सोडून मी माझ्या घरी गेलो. घरी गेल्यावर पत्नी पाहते तर ती पिशवी होती. ती पिशवी  बघून माझी बायको म्हणाली, “अहो केवढ्या प्रेमाने सद्गृहस्थाने आपल्या मुलीसाठी सुंदर ड्रेस घेतलेला आहे. आणि ती पिशवी तो आपल्या रिक्षामध्ये विसरला आहे. त्याला खूप वाईट वाटेल. पहिले तुम्ही पुन्हा मागे जा आणि त्याला शोधून काढा. आपल्या मुलीसारखी त्यांची मुलगी त्या वस्तूसाठी वाट बघत असेल.” म्हणून मी पुन्हा तुम्हाला शोधण्यासाठी आलो.”

हे ऐकून बंडूतात्यांना त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल अप्रुप वाटलं. त्याला बक्षीस म्हणून पैसे देऊ केले. मात्र त्याने पैसे घेण्यास नकार दिला.

तो म्हणाला, “अहो आम्ही कष्टाची  भाकरी खातो. आणि त्यामुळेच मी तुम्हाला ही पिशवी परत देण्यासाठी आलो आहे. मला अजिबात नको पैसे.”

बंडू तात्यांना राहवत नव्हतं. त्यांनी त्या रिक्षावाल्याचा पत्ता घेतला आणि त्या रिक्षावाल्याच्या युनियनचा सुद्धा पत्ता घेतला. घरी आल्यावर त्यांनी रिक्षा युनियनच्या अध्यक्षांना पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये त्या गृहस्थाच्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक केलं आणि रिक्षावाल्यांच्या युनियनचे सुद्धा आभार मानले

असेच काही दिवस गेले. एक दिवस त्यांना एक पत्र आले. त्यात लिहिलं होतं, “नमस्कार! आमच्या  रिक्षा युनियन मधील एका रिक्षावाल्याच्या प्रामाणिकपणाबद्दल तुम्ही कौतुक केलं. आमच्या सहका-यांनाही चांगलं वाटलं. त्याबद्दल त्या रिक्षावाल्याचा एक छोटासा सत्कार आमच्या युनियनच्यामार्फत ठेवलेला आहे. आणि हा सत्कार आपल्या शुभ हस्ते व्हावा अशी आमची इच्छा आहे. यासाठी तुम्ही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित रहावे. येण्या- जाण्याचा जो खर्च आहे तो आमच्या रिक्षा युनियनच्या मार्फत तुम्हाला देण्यात येणार आहे.”

बंडूतात्यांना खूप आनंद झाला. आपण लिहिलेल्या पत्रामुळे एका चांगल्या माणसाचा गौरव होतोय याचा त्यांना आनंद झाला. या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले. कार्यक्रम संपल्यावर पदाधिकाऱ्यांनी प्रवास खर्च देऊ केला परंतु त्यांनी तो नाकारला.

” एवढं चांगलं काम तुम्ही केलं. एका प्रामाणिक व्यक्तीचा तुम्ही गौरव केलात. त्यामुळे तुमच्याकडून पैसे घेणे हे मला शोभत नाही. अशाच प्रकारची प्रामाणिक सेवा तुम्ही सर्व जनतेला देत आहात हे पाहून मला खूप आनंद झाला आहे.”

प्रामाणिकपणाचे फळ नेहमीच चांगलं असतं.

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कागदपत्रे शोधता शोधता… सुश्री निलिमा क्षत्रिय ☆ प्रस्तुती सुश्री नेहा जोशी ☆

? जीवनरंग ❤️

☆ कागदपत्रे शोधता शोधता… सुश्री निलिमा क्षत्रिय ☆ प्रस्तुती सुश्री नेहा जोशी

कागदपत्रे शोधणे हा घरातील एक अतिशय तणावपूर्ण क्षण असतो. ब-याच घरांमध्ये कागदपत्रे नीटनेटके ठेवण्याची जबाबदारी पुरूष स्वत:कडे घेतात. कारण ते महत्वाचं काम असतं. आणि अशी महत्वाची कामे करण्यासाठी जी कुशाग्र बुद्धी लागते, ती बुद्धी पण त्यांना जन्मत:च असते. बायका काय आपल्या स्वयंपाकपाणी, स्वच्छता, आलं गेलं, नेणं आणणं, पाहुणारावळा, आजारपणं.. अशी क्षुल्लक बिन महत्वाची खाती सांभाळत असतात. कारण त्यांना काय समजतं!!

तर्रर्र.. ज्यादिवशी अचानक एखादं कागदपत्र घरातल्या पुरूषाला हवं असतं..

” इथे टिव्ही पाशी मी दोन पेपर्स ठेवले होेते ते कुठे आहेत? “

” कधी ठेवले होते”?

” परवा नाही का, तुमची भिशी होती, म्हणून मी घाईघाईत गेलो, नंतर ठेवू म्हटलं कपाटात.. “

“बरं मग? “

बाईला आता पुढचा सगळा एपिसोड रंगताना  दिसतो.

“बरं मग काय? सत्यनारायणाची कथा सांगतोय का मी? कागद गेले कुठे ते विचारतोय! भिशी च्या आवराआवरीच्या नादात टाकले नाही ना कुठे केरात बिरात”?

“केरात कशी टाकेन मी? तुमच्या एवढी नाही पण थोडीतरी अक्कल दिलीय देवाने मला पण”!  #सरीवरसरी

“हो,विसरलो होतो,” (कंसात)

“नक्की इथेच ठेवली होती का?”

” नक्की म्हणजे काय, मला आठवतं ना चांगलं. मला एक कळत नाही, दिवस दिवस वस्तू लोळत पडलेल्या असतात, त्या जागच्या हलत नाहीत, पण महत्वाचं काही ठेवलं की लगेच दोन मिनिटात गायब.”

” ठेवायचं ना मग व्यवस्थित लगेच, इथे तिथे टाकून पळायचं, आणि वर्षभराने विचारायचं, मी हे इथे ठेवलं होतं कुठे गेलं”

“सगळ्या घरभर तुझा आणि मुलांचा पसारा असतो, मी एखादा कागद ठेवला तर तो पण नाही रहात घरात नीट”

” बेडवरचा ओला टॉवेल, कपडे बदलल्यावर ‘ळ’ आकारात पडलेला पायजमा वेळच्या वेळी उचलला जातो माझ्याकडून म्हणून तुमचा पसारा दिसून येत नाही…

उडाले असतील ते फॅनने.. काही ठेवलं होतं का त्याच्यावर?”

” हो मग, टिव्ही च्या खाली दाबून ठेवले होते, झालंच तर रिमोट ठेवला होता वर”!

कागदांच्या ठेवणुकीचं इतकं डिटेलिंग ऐकल्यावर आता बिचारी गृहिणीं जरा गांगरते..

“कुठे गेले असतील बरं… थांबा जरा सापडतील. बघते मी…”

अशी जरा पुढची बाजू ढासळायला लागली की गृहस्थांच्या अंगात दहा बुलडोझर ची ताकद संचारते… #nilima_kshatriya

” हज्जारदा  सांगितलंय कागदपत्र फेकत जाऊ नका, माझ्या कामाच्या वस्तूंना हात नका लावत जाऊ.. पण नाही.. ( असा अनेकवचनी आदरार्थी उल्लेख केला की आपोआपच मुलांना पण समज मिळते, आणि ते शक्यतो घरातून काही वेळापुरते अदृष्य होतात, किंवा अभ्यासाला बसतात. )

हा हा लोकप्रभाचा अंक… गेल्या वर्षापासून इथे लोळतोय तो नाही हलला, पण दोनच कागद.. फक्त एकाच दिवसात गायब.. काय जादू आहे..”

खरं म्हणजे लोकप्रभाचा अंक ह्या महिन्याचा असतो, तो दोनच दिवसांपूर्वी आलेला असतो, पण ‘तो वर्षापासून इथे लोळतोय’ ह्या म्हणण्याला आता आडवं लावण्यात अर्थ नसतो, म्हणून गृहिणी नमतं घेत रहाते.. तसतसा गृहस्थांचा बुलडोझर सैरावैरा धावत सुटतो…

“दोन तास तहसील कचेरीत उभं राहून ते पेपर्स मिळवले होते.. सालं कशाचं गांभिर्य म्हणून नाही.. घर आहे की कबाडखाना.. “

आता गृहिणी सशाच्या काळजाने टीव्हीच्या आजूबाजूचा परिसर पिंजत सुटते. सोफ्याच्या खाली, शू रॅकखाली, टीव्हीच्या मागे, करत करत किचन बेडरूम्स.. इतकंच काय फ्रीज, बाथरूम सुद्धा बघून होतात. पण कागद पत्रं.. ‘धरती निगल गयी या आसमां खा गया’.. अशी अवस्था..

तेवढ्यात बुलडोझर डिझेल संपल्यासारखा एकदम लडखडतो. त्याला काहीतरी आठवतं. आणि तो

गृहिणीची नजर चुकवत बाहेर उभ्या ॲक्टीव्हाच्या पोटातून दोन कागद तोंड पाडून घरात आणतो.

आता गृहिणी च्या अंगात पण पोकलेन संचारतो..

“तुम्ही तर टिव्ही शेजारी ठेवले होते कागद, त्याच्यावर रिमोट पण ठेवला होता. मग ते गाडीच्या डिकीत कसे पोहोचले? सगळं घर उलथं पालथं करायला लावलं. स्वत:ला लक्षात रहात नाही आणि घरादाराला नाचवायचं. तेवढंच काम आहे का मला? घरात इकडची काडी तिकडे करायची नाही, मी एकटीनेच गाडा ओढत रहायचा.. ते कार्टे पण मेले तुमच्यावरच पडलेत. का ss ही कामाचे नाहीत. मला खरंच इतका कंटाळा आलाय ना ह्या सगळ्याचा आता. असं वाटतं निघून जावं कुठेतरी लांब.. मी म्हणून टिकले बरं, दुसरी असती ना तर केव्हाच निघून गेली असती. “

पुढील अनर्थ हसण्यावारी टोलवला जातो..

” चहा ठेव पटकन, बँकेत जमा करायचेत कागदपत्रं..

लेखिका : सुश्री निलिमा क्षत्रिय

संकलन : सुश्री नेहा जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा एका राणीची – भाग-3 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कथा एका राणीची – भाग-3 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(एक क्रूर कपटी राणी असे नवे  विशेषण राणी दिद्दाला मिळाले.)

पण या सगळ्याची पूर्वीपासूनच तिने पर्वा केलेली नव्हती.याउलट अभिमन्यूला गादीवर बसून तिने राज्यकारभार सांभाळला. ती अतिशय उत्तम, कुशल राज्यकर्ती होती.तिच्या अधिपत्याखाली तिचे राज्य अधिक समृद्ध आणि बलशाली बनले होते.तिने पूर्ण आशिया खंडात व्यापारी संबंध जोडले आणि इराण पर्यंत पसरलेल्या अखंड भारताच्या वायव्य सीमेचेरक्षण करण्याची रणनीती पण तयार केली. तिने अतिशय सुंदर आणि भव्य अशा चौसष्ट  मंदिरांचे निर्माण कार्य केले. श्रीनगर जवळ बांधलेले एक शिवमंदिर …ते आता ध्वस्त झालेले आहे… पण त्या परिसराला आजही दिद्दामार म्हणून ओळखले जाते.सगळ्या प्रजेचे सहकार्य तिला लाभले.

हे सगळे चांगलेच चालू होते .पण तिच्या वैयक्तिक जीवनात तिला अनेक आघात झेलावे लागले. 972 मध्ये तिच्या पुत्र अभिमन्यु मृत्युमुखी पडला आणि त्यानंतर राज्यावर आलेल्या दुसऱ्या राजपुत्राने तिला राजवाड्यातून बाहेर काढले. दुःखाने कोलमडून जाण्याची तिची मनोवृत्तीच नव्हती .जनतेच्या सहकार्याने ती पुन्हा सत्ता हातात घेऊ शकली आणि नंतर अभिमन्यूच्या अवयस्क मुलाच्या…. नातवाच्या…नावाने तिने राज्य सांभाळले. पण नशिबाने जणू तिला दुःखच द्यायचे ठरवले होते…… तो आणि नंतर पाठोपाठ दोन तीन वर्षातच दुसरा नातू…. ज्यांना ज्यांना ती राजपाट देत होती त्यांचे निधनच होत राहिले. हे दुःख तर होतेच पण या क्रूर कपटी राणीने आपल्या मुलांना आणि नातवंडांना मारुन टाकले, हा तिच्याविरुद्ध दुष्प्रचार पण  खूप मोठ्या प्रमाणात चालू होता. सर्व तऱ्हेने दाटून आलेल्या दुःखाच्या अंधारातून सावरण्यासाठी जे मनोबल लागते,त्याचे बाळकडू तिच्या जन्मापासूनच तिला मिळाले होते .तिने कशाचीही पर्वा न करता आपल्या पोलादी पंजाने मंत्री, सरदार यांच्यावर वचक ठेवून प्रजेला प्रसन्न ठेवत पन्नास वर्षे राज्य केले. त्याचबरोबर भावी राज्याच्या संरक्षणाचा विचार करून तिने इतक्या मोठ्या राज्याला एक सक्षम राज्यकर्त्यांची गरज आहे हे लक्षात घेऊन  आपल्या वेगळ्या शैलीने एका वारसाची पण निवड केली. त्याच्या हातात  राज्य सोपवून इसवीसन 1003 मध्ये ती मरण पावली.

दिद्दाची जीवन यात्रा …जी नको असलेल्या अपंग मुली पासून सुरू होऊन …पुरुष वर्चस्व असलेल्या समाजाचे नियम मोडीत काढून आपले नवे नियम स्थापित करून पन्नास वर्षे भारताच्या वायव्य सीमेचे रक्षण करून चांगले राज्य जनतेला देणाऱ्या एका वीरांगनेची कथा आहे.

खरे सांगायचे तर आजच्या युगात दिद्दाराणीची कहाणी तेव्हा आपल्याला अधिक समर्पक वाटते, जेव्हा बऱ्याच स्त्रिया संघर्षमय प्रवासानंतर केवळ सत्तेत आणि उच्चपदावर विराजमान होत नाहीत तर आपल्या क्षमतेने जगाला आश्चर्य चकीत करतात .

 हेच काम एका अनभिज्ञ राणीने  हजार वर्षांपूर्वी केले होते.

**  समाप्त **

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा एका राणीची – भाग-2 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कथा एका राणीची – भाग-2 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(जगात बहुतेक प्रथमच कमांडो सैन्य आणि गोरिल्ला युद्धतंत्राचा वापर दिद्दाने केला होता.)आता यापुढे…..

या युद्धतंत्राचा जोरावरच एकदा राणीने शत्रूच्या पस्तीस हजार सैन्याच्या तुकडी बरोबर फक्त पाचशे सैनिकांच्या मदतीने पाऊण तासातच एक युद्ध जिंकले होते.

पण स्त्री जातीच्या दुर्दैवाचा तिलाही सामना करावा लागला. तिचे शत्रूंनी ‘चुडैल राणी'(चेटकीण राणी) असे नामाभिधान केले. कारण युद्धशास्त्रातील कौशल्याबरोबरच बुद्धिमत्ता, आत्मविश्वास ,इच्छाशक्ती यांच्या बळावर तिने आक्रमणकारी मोठ्या राजा ,महाराजांना रणांगणावर धूळ चारली होती. एका स्त्रीकडून पराभूत झालेल्या राजांनी हारल्यामुळे गेलेली आपली प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी तिला चुडैल राणी म्हणायला सुरुवात केली. तिच्या अपंगत्वामुळे तिला खिजवण्यासाठी लंगडी राणी हा खिताब तर तिला त्यांनी आधीपासूनच दिलेला होता.

तिचा सर्वात मोठा पराक्रम त्या वेळी दिसून आला जेव्हा… सोमनाथ मंदिर लुटणाऱ्या आणि कित्येक शहरे उध्वस्त करणार्‍या…खूंखार मोहम्मद गजनीला तिने फक्त एकदा नाही तर दोनदा आपल्या  रणनीती-सामर्थ्याने भारतात काश्मीर मार्गे प्रवेश करण्यास रोखले. त्याला पराभूत पण केले. नंतर त्याने मार्ग बदलून गुजरात मार्गे भारतात प्रवेश केला.

इतके ‘असामान्यत्व’ सत्तेवर असल्यावर त्या व्यक्तीला मित्रांपेक्षा शत्रूच अधिक असतात. राणी दिद्दा पण याला अपवाद नव्हती. दरबारातले… एक सेनापती सोडला तर… सगळेच मंत्रीगण,सरदार तिला पाण्यात पाहत असत. अंतःपुरात इतर राण्या, त्यांचे नातेवाईक तिचा काटा काढण्याच्या तयारीतच असत.

अशातच एके दिवशी शिकारी दरम्यान राजा क्षेम गुप्ताचा मृत्यू झाला. तेव्हा तिला सती जाण्यासाठी तिच्यावर सगळीकडूनच खूप दबाव आणला गेला. पण मरणासन्न झालेल्या राजाला,राज्य सुरक्षित हातात सोपविण्याच्या तिने दिलेल्या वचनाने तिला मनोबल दिले. तिने सती जाण्यास साफ नकार दिला. कारण तिचा पुत्र अभिमन्यु लहान होता. त्याला राज्यकारभाराचे शिक्षण देण्याची जबाबदारी तिच्यावर होती.

हे सहन न झालेल्या अनेक सरदारांनी वेळोवेळी तिच्या  विरोधामध्ये अनेकदा बंडे पुकारली. पण दिद्दाने तिला सिंहासनावरून हटवण्याचे सर्व प्रयत्न क्रूरपणे हाणून पाडले. त्यामुळे क्रूर- कपटी राणी असे तिला नवे विशेषण मिळाले.

क्रमशः…

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा एका राणीची – भाग-1 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ कथा एका राणीची – भाग-1 ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

आपल्या देशात प्राचीन काळापासून राजघराण्यातील खूप शूर स्त्रियांनी राज्याचे रक्षण करण्यासाठी शत्रूंना परास्त केल्याचा इतिहास आपण वाचतो .पण झाशीची राणी लक्ष्मीबाई किंवा कित्तूरची राणी चन्नम्मा यापेक्षा जास्त नावे आपल्या लक्षात राहत नाहीत. तर कुणाकुणाचे आपण नावही ऐकलेले नसते. अशीच एक अनभिज्ञ राणी,जिने पुरुष वर्चस्व असलेल्या समाजाचे नियम मोडून आपल्या पोलादी पंजाने  शत्रूला नामोहरम करून पन्नास वर्षे राज्य केले. त्या काश्मीरच्या-राणी दिद्दाचे हे चरित्र.

उत्तर भारतात (आजचे हरियाणा, पूर्ण पंजाब, राजौरी, पुंछ या भागावर) तेव्हा लोहार वंशाचे राज्य होते .लोहार समाज त्या काळी खूप प्रतिष्ठीत होता. युद्धासाठी जरुरी असलेली शस्त्रास्त्रे आणि शेतीची अवजारे बनवणे हे त्यांचे काम असायचे. एका शहराचे लाहोर हे नाव सुद्धा ‘लुहार’ या शब्दावरूनच पडले होते.

ईसवी सन 958 मध्ये लोहार वंशात एक अतिशय सुंदर कन्यारत्नाचा जन्म झाला. पण राजा सिंहराज व राणीने आनंदोत्सव साजरा केला नाही. कारण ती दुर्दैवी बालिका जन्मताच एका पायाने अपंग होती.निष्ठुर आई-वडिलांनी तिचा त्याग केला. तिला कायमचेच एका दाईच्या सुपूर्द करून टाकले.त्या प्रेमळ दाई मॉंच्या दुधावरच ती सुंदर चिमुरडी मोठी झाली. दाईमॉंने तिला राजकन्येसारखे वाढवले. तिच्या योग्य शिक्षणाची व्यवस्था केली आणि  छोटीशी द़द्दा पण आपल्या अपंगत्वाला अडथळा न मानता युद्ध कलेत पारंगत झाली. खेळामध्ये प्रवीण झाली. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र याचा तिने अभ्यास केला. या सगळ्यात व्यस्त असलेल्या तिचे वय वाढत चालले होते. त्या काळात, साधारण हजार वर्षांपूर्वी सव्हिस वर्षाची अपंग   कुंवारी मुलगी… म्हणजे ती वाया गेलेलीच असणार तिचे नाव उच्चारणे पण महापाप आहे,असा समज सर्वत्र होता.

पण दैवाच्या योजना माणसांना थोड्याच माहीत असतात!

एके दिवशी  शिकारीच्या दरम्यान काश्मीरचा राजा क्षेमगुप्त याच्या ती दृष्टीस पडली आणि पहिल्या दृष्टिक्षेपातच तो सौंदर्यवती दिद्दाच्या प्रेमात पडला. ती लंगडी आहे हे माहीत झाले असूनही क्षेमगुप्ताने तिच्याशी विवाह केला.

दिद्दाचे भाग्य चक्रच पालटले. आता ती एका मोठ्या राजघराण्याची…. ज्यांच्या राज्याची सीमा इराणपर्यंत पसरली होती…. कुलवधू झाली होती.  तिचे सुखी आयुष्य सुरू झाले. तिला पतीचे प्रेम व आदर आणि अभिमन्यूच्या रुपाने सुंदर पुत्र ही लाभला.क्षेमगुप्ताला राजकारणात विशेष रुची नव्हती. त्याने दिद्दाची बुद्धिमत्ता व व्यवहार कुशलता पहिली आणि राज्यकारभारात लक्ष घालण्याची तिला प्रेरणा दिली. नंतर तर तिच्या कर्तृत्वावर प्रसन्न होऊन तिचा सन्मान करण्यासाठी सुवर्णमुद्रा पण त्याने काढली .आपल्या पत्नीच्या नावाने ओळखला जाणारा तो पहिलाच राजा म्हणावा लागेल.कारण तो नंतर राजा दिद्दाक्षेमगुप्त म्हणून ओळखला जाऊ लागला.

चतुर, चाणाक्ष पराक्रमी दिद्दाने कित्येकदा आक्रमण करून आलेल्या शत्रूला नेस्तनाबूत केले. बहुतेक जगात प्रथमच तिने ‘कमांडो’ सैन्याचा विकास केला.तसेच युद्ध जिंकण्यासाठी गोरिल्ला युद्ध (गनिमी कावा)  तंत्राचा वापर केला.

क्रमशः…

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शोध आनंदाचा…भाग -2 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆

सुश्री शुभदा जोशी

? मनमंजुषेतून ?

 ☆ शोध आनंदाचा…भाग -2 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆ 

माझा स्वभाव कृतीशील आहे. सतत काही ना काही करण्यासाठी माझं मन प्रवृत्त होत असतं. एकेकदा फरपट व्हावी एवढी ही कृतिशीलता! माझ्या समवेतच्या लोकांनादेखील ती अस्वस्थ बनवते. त्याच्या जोडीला मला सगळ्याचीच खूप घाई असते. ही घाई मला थांबू देत नाही, रमू देत नाही कशातही.

‘ चला …’ अशी हाक माझ्या आतून वारंवार उचल खात असते. कुठे जायचंय? कुठे पोचायचंय? आणि तिथे पोचल्यावर तरी मिळणार आहे का आनंद? की पुन्हा, चला…? माझ्या आनंदाला माझ्याच स्वभावातल्या अशा काही गोष्टी ग्रहण लावतात.

कसा बनला असेल हा स्वभाव?

मला स्वतःवर काम करायला आवडते. मानसशास्त्र हा काही माझा विषय नाही. पण मला जर आनंदाचा शोध घ्यायचा झाला तर मला माझ्या मनाबद्दल समजून घ्यायला हवे ना?

प्रश्न पडायला लागल्यापासून या संदर्भात काहीही ऐकू आलं तर मी कान टवकारते. पुस्तकं, लेक्चर्स, वर्कशॉप्स, अभ्यास गट अशा मिळेल त्या मार्गाने मी शोध घेत रहाते. जिवंत रहाण्यासाठी मला ते आवश्यक वाटते. कुठून कुठून काही काही समजत जातं आणि पावलापुरता प्रकाश मिळतो.

आपल्या स्वभावातल्या गमती जमती समजतात आणि त्यातून मार्ग काढायच्या युक्त्याही समजतात.

लहानाचं मोठं होत असताना, आपल्या काही गरजा पूर्ण होत नाहीत, मनाजोगे घडत नाही. त्या वेळी आपल्या हातात काहीच नसतं. या प्रकारच्या भावनांच्या वादळांतून वाट काढताना, जाणता अजाणता काही मार्ग शोधले जातात.

जसं की संतापी अभिव्यक्ती, स्वतःला दोष देत राहणं, मनाला लावूनच न घेणं अशा वेगवेगळ्या मार्गांनी आपण स्वतःला वाचवतो. आजूबाजूच्या इतर माणसांचे अनुकरण आणि प्रभाव देखील असतात या निवडीवर. त्या त्या वेळी आपण काढलेल्या मार्गांची, patterns ची नंतर सवयच होऊन जाते.  

खरं तर आज तसं वागायची गरज नसते. पण ते patterns अगदी पक्के भिनलेले असतात आपल्यात. स्वभावच बनून गेलेला असतो तो!  पण स्वभाव बदलता येतो हे मी अनुभवातून सांगते.

शालेय वयात विविध कारणानी जोपासल्या गेलेल्या माझ्यातल्या न्युनगंडावर मात करण्यासाठी शोधलेला हा मार्ग असू शकतो, हे आता समजते. आता वयाच्या या टप्प्यावर गरज नाहीये या ‘घाईची’ आणि स्वतःची फरपट करणा-या ‘कृतीशीलतेची’ देखील! उलट ह्या दोन्ही गोष्टी, एकाग्र होऊन माझे आकलन, समज एकत्र बांधण्याच्यामध्ये, आनंदाच्या वाटेवर अडथळाच बनत आहेत.

हे लक्षात येणं खूप भारी आहे! आता मी सांगू शकते माझ्या मनाला…

माझिया मना…

जरा थांब ना

धावणे तुझे 

अन मला वेदना…

©  सुश्री शुभदा जोशी  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खिचडी… सुश्री नीता नामजोशी… ☆ प्रस्तुती सुश्री स्नेहा वाघ ☆

? जीवनरंग ❤️

☆ खिचडी… सुश्री नीता नामजोशी… ☆ प्रस्तुती सुश्री स्नेहा वाघ ☆

समोरच्या पातेल्यातली खिचडी आपल्या पानात वाढून घेत ती खात बसलेल्या आपल्या सासूकडे ती चकित नजरेनं पहात होती..

नवं नवंच लग्न झालं होतं तिचं..

अगदी आयत्या वेळी नवऱ्याचा नि तिचा बाहेर जेवायला जायचा प्लॅन ठरला.. 

नवरा म्हणाला “ आईबाबांसाठी खिचडी बनवून ठेव..”

तशी तिनं नवथर उत्साहानं तिला बऱ्यापैकी जमणारी मुगाच्या डाळीची खिचडी बनवली..

आणि ती निघायच्या तयारीला लागली…

सासूचा निरोप घ्यायला ती स्वयंपाकघरात आली आणि पहाते तर..

सासू  एकटीच शांतपणे खिचडी खात बसलेली..हे दृष्य तिच्या सरावाचं नव्हतं..

आजवर कधी तिची आई तिच्या बाबांच्याआधी अशी एकटीच जेवली नव्हती..

ती एकटक पहात असताना नवऱ्याच्या हाकेनं तिची तंद्री भंग झाली..

ती सासूचा धावता निरोप घेऊन बाहेर पडली..

नवऱ्यासोबत रेस्टॅारंटमध्ये जेवतानाही तिच्या नजरेसमोर सतत  खिचडी खाणारी सासूच येत राहिली..

एका क्षणी न राहवून तिनं नवऱ्यापाशी मन मोकळं केलं.. ते ऐकताना तो तिच्याकडेच विचित्र अविश्वासाच्या नजरेनं पहात राहिला.. बोलला मात्र काहीच नाही..

एव्हाना तिला अंदाज आला होता -सासू नि नवरा मनमोकळं बोलणारे नाहीत..

माहेरच्या मोकळ्या ढाकळ्या दंगामस्तीच्या वातावरणात वाढलेली ती..

या घरात सदासर्वकाळ नांदणारी शांतता तिच्या अंगावर यायची…. ही माणसं मनातलं भडाभडा बोलून मोकळी का होत नाहीत..? न बोलताच एकमेकांच्या मनातलं कसं कळतं यांना..? दोन चार शब्दांची देवाणधेवाण कशी पुरते यांना ?—- हा प्रश्न तिला नेहमी पडायचा..

या संदर्भात बोलताना नवरा कधीतरी बोलून गेला -” अगं तुलाही जमेल.. फार काही न बोलता मनातलं समजून घ्यायला तूही शिकशील ..सूर जुळले की मनांचा सहज संवाद सुरू होतो..”

तिला मात्र ते काही केल्या जमत नव्हतं…. जमत नव्हतं म्हणण्यापेक्षा ते हजमच होत नव्हतं…

सासूचा तर अंदाजच येत नव्हता..

तिला आई म्हणणं जीवावर यायचं…. आतून त्या भावना आल्याशिवाय आई म्हणण्याचा दुटप्पीपणा तिला जमला नसता..

कसं कोण जाणे पण सासूला ते कळलं ..तिनंच तिला सांगितलं, “  तू आपली सासूबाईच म्हण हो मला.. “

आणि तिला हुश्श झालं.. 

नेमकी आपली सासू कशी आहे हे तिला कळत नव्हतं.. आजवर तिचा स्वर उंचावल्याचंही तिनं पाहिलं नाही..

की भावनांचं प्रदर्शन नाही .. कायम शांत संयत नि सौम्य ..

पण आजचं तिचं असं खिचडी खाणं मात्र सासूच्या मनातल्या प्रतिमेशी विसंगत असं वाटलं…

दोघं घरी परतले तेव्हा सासरेबुवा मजेनं तिला म्हणाले–”  बरं का सूनबाई.. आज तुमच्या सासूनं हद्दच केली ..तुम्ही केलेली खिचडी तिला इतकी आवडली की तिनं एकटीनं ती सफाचट केली.. आमच्यासाठी वेगळी बनवून दिली .. आता पुन्हा आमच्यासाठी खिचडी बनवा एकदा “ .. ते ऐकून ती अवाकच झाली…हे कसलं वागणं… ? 

रात्री झोपेतही तिला तेच आठवत राहिलं.. 

अचानक तिला मध्येच जाग आली..पहाते तर काय..नवरा शेजारी नाही..

त्याला पहायला ती बाहेर ड्रॅाइंग रूममध्ये आली…

रात्रीच्या शांततेत सासू नि नवऱ्याचं हलक्या स्वरातलं बोलणंही तिला स्पष्ट ऐकू येत होतं..

सासू नवऱ्याला सांगत होती– “ अरे खिचडी जरा खारट झाली होती.. तुला माहितेय यांना बीपीचा त्रास आहे.. जराही मीठ जास्त झालं की यांची चिडचिड होते.. बोलण्यातलं भान सुटतं.. यांच्याकडून सूनबाईला जरासं काही बोललं गेलं असतं तर ते मला आवडलं नसतं .. अरे आपलं माहेर सोडून आलेय ती..त्यात तिचा स्वभाव आहे हळवा.. आपणच जपायचं, तिला सांभाळून घ्यायचं….” 

 त्यावर नवरा म्हणाला “ अगं मग टाकून द्यायची खिचडी.. तू कशाला खात बसलीस ती.. ?” 

 सासू- “ अरे बाबा खाऊन माजावं पण टाकून माजू नये या संस्कारात वाढलीय मी.. अन्नाचा अपमान करवेना..म्हणून खाल्ली हो…. यांच्यासाठी दुसरी बनवली..” 

 नवरा- “ अगं पण मग फ्रिजमध्ये ठेवायची ..” 

 सासू -” ते यांच्या नजरेतून थोडंच सुटणार होतं.. किती बारीक लक्ष असतं यांचं तुला ठाऊकच आहे .. “

नवरा -” अगं पण तुला त्रास होतोय त्याचं काय… ?”

 सासू- “ घेतलीय मी पाचक गोळी .. बरं वाटेल हो मला.. आता तू जाऊन झोप बरं. आणि हो.. झाल्या प्रसंगाचा चुकून उल्लेखही करायचा नाहीये .. “ 

नवरा- “ हो…” 

आणि आता तिला त्या जागी उभं रहावेना.. ती तशीच बाहेर येऊन सासूच्या मांडीवर डोकं ठेऊन स्फुंदून स्फुंदून रडू लागली… सासू तिच्या डोक्यावर थोपटत राहिली.. 

दुसऱ्या  दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे किचनमध्ये आली ती.. गॅसपाशी उभी सासू चहा करत होती.. तिला पाहून प्रसन्न हसत म्हणाली- ”  बाळा जरा हा चहा नेऊन देतेस बाहेर .. “ 

आणि तिच्या तोंडून “ हो आई “ असं कधी निघून गेलं .. तिचं तिलाही कळलं नाही.. ती चहा घेऊन वळली.. सासू पाठमोऱ्या  तिच्याकडे त्याच शांत सौम्य समाधानी नजरेनं पहात होती.

लेखिका : सुश्री नीता नामजोशी

प्रस्तुती :  सुश्री स्नेहा वाघ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रामप्यारी – भाग – 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ रामप्यारी – भाग – 2 ☆ सौ अंजली दिलीप गोखले

(सुरुवातीला फक्त आठ मुलींपासून सुरू झालेली ही सेना अल्पावधीतच ४५,००० रणरागिणींपर्यत पोहोचली ..!! ) –इथून पुढे —–

*हा काळ होता अंदाजे इसवीसन १३३० चा ..!! एका पायाने लंगडा तैमुर, दिल्ली उध्वस्त करून पुढे सरकत होता ..!!

पुढील ठिकाणी येताच त्याला नवल वाटले .. लुटालूट करायला तो ज्या, ज्या गावात जाई, ते गाव अगोदरच रिकामे केलेले असे .. सर्व धनधान्य बाड-बिस्तरा घेऊन गावकरी गायब झालेले असत ..!!* 

लुटायचे, मारायचे, बाटवायचे .. पण कुणाला ..??

गावकरी विहिरीतील पाण्यात देखील कचरा आणि घाण टाकून जात .. ह्या गोष्टींमुळे, तैमुरच्या सैन्याची उपासमार होऊ लागली .. गावकरी कुठे गेले हे शोधण्यासाठी सैन्य पुढे जाई .. त्यावेळी गनिमी कावा करून, अचानक गावकरी सैन्यावर हल्ला करत आणि पळून जात ..!! दिवसा आमने सामने लढाई करायला काहीवेळ पुरुष सैनिक पुढे येत आणि हल्ला करून पळून जात ..!! रात्रीच्या वेळेत जाळपोळ आणि छुपे हल्ले ठरलेले ..!! ह्या गनिमी हल्ल्यांनी तैमुर हैराण झाला .. सैन्य देखील उपाशी राहू लागले तशी सगळ्यांची चिडचिड ही वाढू लागली ..!!

रोजच्या रात्रीच्या गनिमी काव्याने सैन्य पुरते नामोहरम झाले. रामप्यारीच्या मर्दानी युवती रात्रीच्या वेळी छुपे हल्ले करत आणि हे हल्ले करत असताना त्या काळजी घेत असत, की तैमुरच्या सैन्याला झोप मिळणार नाही ..!! हरदाई जाट, देवीकौर राजपूत, चंद्रो, ब्राम्हणी, रामदायी त्यागी ह्यांच्याकडे ह्या रात्रीच्या छुप्या हल्ल्याची जबाबदारी होती..!!

एखादी तुकडीच्या तुकडी वेगळी पाडून कापून काढणे .. तंबूला आगी लावणे, आगींमुळे हत्ती पिसाळणे, सततचे जागरण यामुळे, तैमुरचे सव्वा लाख सैन्य, अक्षरश: जेरीस आणले गेले ..!!

बरेच सैनिक तडफडून मरण पावले .. मेरठवर हल्ला केल्याचा तैमुरला आता पस्तावा होऊ लागला .. नेमक्या ह्याचवेळी, लपून बसलेले जोगराजसिंगचे सैनिक, अचानकपणे चहुबाजूंनी चालून आले ..!! 

त्यांनी सैनिकांच्या तुकड्या केलेल्या होत्या .. त्यामुळे सतत नव्या दमाचे सैन्य लढायला तयार असे ..!!

तीच कहाणी स्त्री सेनेची होती ..!! रामप्यारीने दिवसा व रात्री लढण्यासाठी, आपल्या सेनेच्या तुकड्या केलेल्या होत्या. एक तुकडी झाडांवर बसून, तैमुरच्या सैन्यावर शर-वर्षाव करे, तर दुसरी तुकडी तैमूरच्या मेलेल्या सैनिकांची शस्त्रे व दारुगोळा घेऊन त्यांच्यावरच चालवत ..!!

*पुरुष तुकडीचा म्होरक्या हरवीरसिंग गुलिया, लढाईच्या ऐन धुमाळीत, तैमुरच्या दिशेने निघाला ..!! तैमुरच्या  अंगरक्षकाना उडवून, बाहेरील कडे फोडून तो आत जातोय हे रामप्यारीने पाहिले मात्र, ती आपल्या तुकडीसहित, त्या धुमाळीत त्याच्या रक्षणार्थ उतरली, आणि सपासप सैनिक कापत, रामप्यारी बाईची स्त्री सेना, तैमुरच्या जवळ पोचली..!!

चपळाईने लढणाऱ्या स्त्री सैनिकांना पाहून, तैमुरचे सैनिक पुरते गोंधळले .. हरवीरसिंगच्या रक्षणार्थ आलेल्या ह्या स्त्री सेनेचा धोका, खिजराखानने ओळखला .. त्याने तैमुरचा घोडा खेचून, सटकण्याचा प्रयत्न केला .. त्यात तो काहीसा यशस्वीही होत होता तोच, २२,००० सैनिकांची दुसरी आणि अंतिम तुकडी घेऊन, ताज्या दमाने जोगराजसिंग मैदानात उतरले .. घमासान लढाई पेटली .. तैमुर चक्क पळून जात होता .. रामप्यारीने त्याला पाहिले व पळणाऱ्या तैमूरचा  पाठलाग चालू केला ..!!

रामप्यारी घोड्यावर आणि तैमुर देखील घोड्यावर ..!! तैमुरने चिलखत घातले होते. चिलखतातून दिसणा-या तैमुरच्या काखेच्या उघड्या भागावर, रामप्यारीने दौड घेतानाच, बाण चालवले. रामप्यारीने त्याला गाठून त्याच्यावर तलवार देखील चालवली .. पण विष लावलेले बाण शरीरांत शिरल्याने तैमुर बेशुद्ध होऊन घोड्यावरून पडला ..!!

खिजराखानला मागे येताना बघून रामप्यारी मात्र जंगलात नाहीशी झाली ..!!

ह्या जबरदस्त प्रतिहल्ल्याने घाबरून, तैमुर भारतावरील आक्रमण व त्याचे मनसुबे गुंडाळून, समरकंदला पळून 

गेला ..!! गळा, छाती तसेच बगलेतील जखमांमुळे, तैमुर लवकरच मेला ..!!

अशा ह्या ‘पळपुट्याचे’ तिकडे शूर योद्धा आणि महान धर्मप्रसारक म्हणून पुतळे उभे आहेत ..!!

आणि इथे त्याचे नांव, आपल्या मुलाला दिले जात आहे ..!!

*देश, धर्म, संस्कृतीच्या रक्षणासाठी, एकीकरण व स्त्री सक्षमीकरण करून प्रत्यक्ष युध्दात उतरणाऱ्यांना भारतीय लोक विसरले ..!!

पण त्यांनी पळपुटेपणा केलेला तैमुर मात्र लक्षांत ठेवला ..!!

तैमुरसारख्या नराधमाला समोर गाठून, त्याला विदीर्ण करणाऱ्या रामप्यारीबाई चौहानला देखील भारतीय लोक पार विसरून गेले .. कारण हा खरा इतिहास आम्हाला कधीच शिकवलाच गेला नाही ..!!*

तैमुर आला हे शिकवलं गेलं, पण तो घाबरून पळाला, हे आम्हाला कधीच शिकवलं गेलं नाही ..!

रामप्यारीला मानाचा मुजरा ..!!

—समाप्त— 

संग्राहिका : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares