मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रतन टाटा´ यांची अंत्ययात्रा – – ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

  रतन टाटा´ यांची अंत्ययात्रा – – ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

(‘रतन टाटा यांची अंत्ययात्रा कव्हर करतांना जाणवलेल्या ठळक बाबी-) 

१) रतन टाटांना अखेरचा निरोप देण्याकरता काढलेल्या अंत्ययात्रेत कुठलाही मोठा तामझाम नव्हता… साधी फुलांनी सजवलेली लहानशीच गाडी ज्यातून टाटांचं पार्थिव स्मशानभूमीत अवघ्या १५ ते २० मिनीटांत पोहोचलं… एवढा मोठा इतिहास घडवणारा उद्योगपती पण, त्याची अंत्ययात्रा सामान्य मुंबईकराची कोंडी करणारी, त्यांची नेहमीची गती कमी करणारी नव्हती…

२) स्मशानभूमीत सुरुवातीला मोजके १५० लोकच उपस्थित होते… सुरुवातीला सामुहिक शांती प्रार्थना झाली… `कोणताही धार्मिक विधी न करता´ शांतपणे पार्थिव विद्युतदाहिनीत नेलं गेलं…

३) टाटा अनंतात विलीन झाल्यानंतर सगळे व्हिआयपी स्मशानभूमीबाहेर आले… आणि बाहेर इतका वेळ रोखुन धरलेला जवळपास तीन-चारशेचा जमाव एकदम स्मशानभूमीत आला… काहींनी आम्हांलाही अंत्यदर्शन हवं म्हणून पोलिसांसोबत थोडीशी हुज्जतही घातली… तेवढ्यात एक किरकोळ शरिरयष्टीचा मुलगा जमावाच्या नजरेस पडला… `शांतनु सर, शांतनु सर´ अश्या हाका गेल्या… चेहरा उतरलेला तो बावीशी-पंचवीशीचा तरुण- शांतनु नायडू अतिशय शांतपणे जमावाला हात जोडून म्हणाला `everything is over´… केवळ या तीन शब्दांत जमाव शांत झाला.. आणि त्यातले काहीजण ओक्साबोक्शी रडू लागले 

४) शांतनु मान खाली घालुन, मिडीयाला काहीच उत्तर न देता बाहेर आला… एकाही कॅमेराकडे शांतनुनं साधी नजरही फिरवली नाही… बाहेर येताच त्यानं आपली बाईक शोधायला सुरुवात केली… अमित शहा आणि इतर व्हिआयपी येत असल्यानं रस्त्यावरच्या सगळ्या गाड्या हटवल्या होत्या… त्यात शांतनुची बाईकही कुठेतरी गेली… शांतनु हळु आवाजात आपल्या सहका-याला म्हणाला-

 `टॅक्सीसे जाते है, बाईक बाद में देखते है´… बाईक हरवलेल्या शांतनुला घेऊन जाण्यासाठी अनेक बड्या गाड्या तिथे दरवाजा उघडून तयार होत्या मात्र, तरीही शांतनुच्या तोंडुन निघालं – 

`टॅक्सी´से जाते है… स्मशानभूमीसमोरचा रस्ता बंद केल्यानं तिथे टॅक्सी येणार नव्हतीच… शेवटी कोणाच्यातरी खाजगी गाडीत मागच्या सीटवर तीन जणांमध्ये बसून शांतनु तिथुन गेला

५) या प्रसंगानंतर मात्र माझं लक्ष गर्दीतल्या काही चेह-यांनी वेधलं… माझ्यासकट अनेकजण तिथे असे होते की ज्यांना तिथला माहौल मोबाईलमध्ये टिपायचा होता… काही जण मात्र कमालीचे स्तब्ध आणि शून्यात नजर लावलेले होते… समोरुन टाटांचं पार्थिव गेलं, पोलिसांनी रायफलचे तीन राऊंड झाडत मानवंदना दिली पण यांचे कॅमेरे वर आलेच नाहीत- त्यांचे हात मोबाईलवर नव्हते तर दोन्ही हात जोडलेले होते… डोळ्यांच्या कडा भिजलेल्या होत्या…

६) त्यांपैकीच एकजण पटन्याहून १५ दिवसांपूर्वीच टाटांना भेटायला आलेला- साधारण तीशीचा हा तरुण सॅनिटरी पॅडच्या स्टार्टअपसाठी टाटांची मदत मागायला मुंबईत आला होता… ईमेलवरुन अपॉईंटमेंट ठरत असतांना टाटा आजारी पडले… तरुणाला काही दिवस वाट बघ सांगितलं आणि वाट बघता बघताच टाटा गेले… भेट झालीच नाही 

७) एक जण इमर्जन्सी फ्लाईट पकडून हैदराबादहून मुंबईत पोहोचला… हा पण तिथला लहानसा उद्योजकच… मी माझ्या घरात टाटांचा फोटो लावतो म्हणाला 

८) एकजण ठाण्यात मिस्त्री काम करणारा, एकजण पुण्यातला रिक्षावाला आणि एकजण टाटांच्याच कंपनीत बड्या हुद्द्यावर काम करुन रिटायर्ड झालेला… एकमेकांचं कधीच तोंड न पाहिलेली ही माणसं अक्षरश: एकमेकांच्या गळ्यात पडून रडली… यांना जोडणारा समान दुवा होता तो टाटांचा हात… या प्रत्येकाच्या आयुष्याला टाटा या नावानं कलाटणी दिली होती… रिक्षावाल्याला प्रशिक्षण मिळाल्यानं चांगला जॉब मिळणार होता, मिस्त्री कामगाराला कॅन्सरमधून जिवनदान मिळालं होतं, आणि हायप्रोफाईल रिटायर्ड व्यक्तीला जगण्यातलं समाधान मिळालं होतं

९) अनेकांना रतन टाटांचं शेवटचं दर्शन तर झालं नाहीच… पण रतन टाटांच्या शरीराचा अखेरचा स्पर्श ज्याला झालाय- त्या अंत्ययात्रेसाठी वापरलेल्या गाडीला हात लावून अनेकांनी नमस्कार केला… त्या गाडीला सजवलेली फुलं, त्यांची पाकळी घेऊन या लोकांनी आपल्या पाकीटात ठेवली…

१०) टाटांच्या ताज हॉटेलचा संपूर्ण स्टाफ अंत्यविधीवेळी उपस्थित होता… आणि तिथेही हा हॉटेलचा स्टाफ स्मशानभूमीत उपस्थित असलेल्यांना टाटा मिनरल वॉटरच्या बाटल्या देऊन 

`टाटांचंच पाणी´ पुरवत होता…

लेखिका : सुश्री मनश्री पाठक 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘डॉ. तारा भवाळकर कोण आहेत !’ — लेखक : हेमंत राजोपाध्ये ☆ प्रस्तुती : डॉ. सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

? इंद्रधनुष्य ?

डॉ. तारा भवाळकर कोण आहेत !‘ — लेखक : हेमंत राजोपाध्ये ☆ प्रस्तुती : डॉ. सोनिया कस्तुरे ☆

८७ वर्षाची तरुण, तडफदार लेखिका!

इथल्या उग्र जातीय दर्प आणि पुरुषप्रधान दुर्गंधीने बरबटलेल्या विषम समाजव्यवस्थेची चीड असलेली..

केवळ परंपरेतील सत्त्वाचे पोवाडे गात बसण्यापेक्षा त्या परंपरातील हीण कसे दूर करता येईल, यासाठी आयुष्यभर लेखन- संशोधनासोबतच प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करणारी..

उच्चभ्रू पेठांमधल्या आणि गढींमधल्या पवित्र सरंजामी वातावरणात झाकून ठेवलेल्या दुर्गंधी वास्तवांना समाजासमोर आणणारी…

तंजावरमधल्या राजे आणि दरबारी कवींपासून ते कैकाडी समाजातल्या उन्मुक्त बाणेदार ‘महामाये’पर्यंत सर्वांमध्ये सहज मिसळून जाणारी…

शनिवार पेठेतील वेदशास्त्रसंपन्न चित्रावशास्त्रींच्या व्युत्पन्न सहवासाच्या बालपणीच्या स्मृतींविषयी चिकित्सक आदर बाळगणारी…

मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाच्या नावाखाली शिरजोर झालेल्या अमर्याद मुजोर पुरुषप्रधानतेच्या ‘हलक्या दिलाची’ चिरफाड करणाऱ्या आदिवासी बाईचं तेज अंगी बाणवणारी…

भरतमुनीच्या नाट्यशास्त्रापासून, देवल, खाडिलकरांच्या नाटकांपर्यंत कानोसा घेत लोकनाट्य आणि अभिजन व बहुजन समाजातील विविध लोकपरंपरांचा समग्र, साक्षेपी आढावा घेणारी,

आदिशक्ती महामायेच्या महन्मंगल रूपाला कुबटपणा आणणाऱ्या व्यवस्थेत पिचलेल्या कैकाडी समाजातील स्त्रीपासून कथित उच्चभ्रू जातीय, वर्गीय सोन्याच्या पिंजऱ्यात डाळिंबाचे दाणे मिटक्या मारत खाणाऱ्या ब्राह्मण, मराठा स्त्रीपर्यंत समस्त स्त्रियांच्या मुक्तीची गरज ओळखणारी,

लोकश्रद्धांना गौण न मानता त्यांचं सामाजिक, राजकीय स्थान ओळखणारी मात्र अंधश्रद्धा आणि त्यातील शोषण यांच्याविरोधात ८४-८५ व्या वर्षीही खणखणीत आवाज उठवणारी,

अभिजन आणि बहुजन संस्कृतीतील अमर्याद विविधांगी मर्यादा आणि त्यांना उन्नत, समावेशक आणि प्रगल्भ करू शकणाऱ्या त्याच सांस्कृतिक संचितातले सत्त्व आधुनिकतेच्या चौकटीत बसवू पाहणारी,

डॉ. रा. चिं. ढेरेंसारख्या महविद्वानासोबत अभ्यास, संशोधन, लेखन करणारी, लक्ष्मण मानेंसारख्या शोषित समाजातून आलेल्या माणसासोबत तळागाळातील लोकांच्या दुःखांना वाचा फोडण्यात अग्रणी असणारी,

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींसारख्या प्रागतिक विचारवंतांच्या कौतुक/आदरास पात्र ठरलेली,

हरिवंशराय बच्चन यांच्या संस्कृतप्रचुर मधुशालेचा अनुवाद करण्यापासून ते तेलुगू, तमिळ प्रदेशातील भटक्या स्त्रियांच्या गाण्यांतील शब्द आणि भावनांचा तरल पण चिकित्सक भाष्यासह अनुवाद करणारी,

अन्याय पाहून चिडणारी, रस्त्यावर उतरणारी, जवळच्या माणसांपासून ते मोठाल्या पदांवरील माणसांच्या चुका परखडपणे मांडणारी,

बाणेदार, आक्रमक, सहृदय, ग्रेसफुल, प्रेमळ बाई म्हणजे डॉ. ताराबाई भवाळकर.

त्यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणं हे मराठी समाज आणि एकूण महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विश्वासाठी सुखावह बाब आहे.

कर्कश, एकांगी आणि मुजोर झालेल्या राजकीय सामाजिक भवतालात अशा विद्वान, परखड आणि सहृदय व्यक्तींना पुन्हा अशा जबाबदारीची धुरा देणं हे येऊ घातलेल्या बदलाचं लक्षण आहे, ही आणखी सुखावह बाब!

ताराताई भवाळकर यांच्या ग्रंथसंपदेची आणि निवडक मानसन्मानांची सूची ज्येष्ठ, साक्षेपी लेखिका डॉ. वीणा गवाणकर यांनी दिली आहे, ती अशी:

ग्रंथसंपदा 

अभ्यासक स्त्रिया (ज्येष्ठ लेखिका मालती दांडेकर, विदुषी दुर्गा भागवत यांच्यापासून ते प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्यापर्यंत ज्ञात-अज्ञात अशा २५ अभ्यासक स्त्रियांच्या संशोधन कार्याचा परिचय करून देणारे पुस्तक)

आकलन आणि आस्वाद (साहित्यिक)

तिसऱ्या बिंदूच्या शोधात (वैचारिक)

निरगाठ सुरगाठ (लेखसंग्रह)

प्रियतमा ( गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा)

बोरी बाभळी (रा. रं. बोराडे यांच्या ग्रामीण स्त्रीविषयक कथांचे संपादन आणि प्रस्तावना)

मधुशाळा (हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाला’चे मराठीतले पहिले मराठी भाषांतर)

मरणात खरोखर जग जगते (कथासंग्रह)

मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे

मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस्वाद

महामाया

माझिये जातीच्या (सामाजिक)

मातीची रूपे (ललित)

मायवाटेचा मागोवा

मिथक आणि नाटक

यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा

लोकनागर रंगभूमी (माहितीपर)

लोकपरंपरा आणि स्त्री प्रतिभा (माहितीपर)

लोकपरंपरेतील सीता

लोकसंचित (वैचारिक)

लोकसाहित्य : वाड्मयप्रवाह

लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा (माहितीपर)

लोकांगण (कथासंग्रह)

संस्कृतीची शोधयात्रा (माहितीपर)

स्त्रीमुक्तीचा आत्मस्वर (वैचारिक)

स्नेहरंग (वैचारिक)

सन्मान आणि पुरस्कार 

पीएच. डी. च्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा पुणे विद्यापीठाचा पुरस्कार.

आवास (अलिबाग) येथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

इस्लामपूर येथे भरलेल्या जागर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

इस्लामपूर येथे भरलेल्या राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

उचगाव (बेळगाव) येथे भरलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

कादरगा येथे भरलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

जळगाव येथे भरलेल्या सूर्योदय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

मुंबईतील मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघातर्फे सुं. ल. गद्रे साहित्य पुरस्कार. (२२-१-२०१७)

‘लोकसंचित’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा १९९१ सालचा पुरस्कार

पुणे शहरात ५ जानेवारी २०१९ रोजी झालेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

(१. ताराबाईंच्या ग्रंथांची आणि मानसन्मानांची सूची आयती उपलब्ध करून दिल्याबद्दल ज्येष्ठ, साक्षेपी लेखिका Veena Gavankar यांचे आभार

२. चौफेर व्यासंगी वाचक, रसिक असलेले पुण्यातील ज्येष्ठ, सुप्रतिष्ठ व्यावसायिक आणि आर्याबाग सांस्कृतिक मंचाचे संस्थापक श्री. Kalyan Taware यांनी सूचना केल्याने हा परिचय लिहायची प्रेरणा मिळाली.)

लेखक : हेमंत प्रकाश राजोपाध्ये

प्रस्तुती : डॉ. सोनिया कस्तुरे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘यत्र तत्र सर्वत्र…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘यत्र तत्र सर्वत्र…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

सकाळचा सुगंधी चहा टाटा…

जेवणातले चिमुटभर मीठ टाटा…

वेळेचे गणित टायटन टाटा…

वास्तू भक्कम आधार स्टील टाटा…

अखंड उर्जा निर्मिती टाटा…

गरीबांना विमा आधार टाटा…

असाध्य रोगावर इलाज टाटा…

मध्यमवर्गीय स्वप्न नॅनो टाटा…

श्रमिकांचा आधार ट्रक टाटा…

श्रीमंतांचे उड्डाण एअर इंडिया टाटा…

बोलण्याचे माध्यम संचार टाटा…

तंत्रज्ञान विकास टिसीएस टाटा…

ऐशोरामी स्वप्नवस्तु ताज हॉटेल टाटा…

चित्त्याच्या वेगाचे जॅग्वार टाटा…

देशाचे दिशादर्शक, आधार, विश्वास, शोअभिमानाचे नाव, सामाजिक भानाचे नाव, सुरक्षित गुंतवणुकीचे नाव, देश विकासात सिंहाचा वाटा, तत्त्व, स्वत्व, अस्तित्व, यत्र तत्र सर्वत्र साम्राज्य तरीही विनम्र आणि साधेपणाचे नाव, अनमोल रत्न, अजातशत्रू, घराघरात आणि जनसामान्यांच्या मनात असे हे रतनजी टाटा यांना अखेरचा टाटा.

कवी : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “हृदयशल्य !!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

हृदयशल्य !! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

तो केवळ दहा वर्षांचा असताना त्याला प्रेमाचा नव्याने शोध घेणं क्रमप्राप्त ठरलं! वडील नवल आणि आई सुनी यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि तो एकटा उरला. डोक्यावर केवळ छप्पर असून चालत नाही…. मायेची सावली लागते माणसाला.

आई-बाप हयात असतानाही त्याच्या वाट्याला हा असा पोरकेपणा आलेला होता. सोबत एक धाकटा भाऊ होता पण धाकटा. मग तो स्वत:च स्वत:चा वाटाड्या झाला. निवृती, ज्ञानदेव, सोपान यांना आईची जागा घेणारी मुक्ताई होती.. याला मात्र आपल्या मनालाच मुक्ता बनवून ‘साही अपराध जनाचा’ असं स्वत:ला म्हणावं लागलं. आईने आपला स्वतंत्र संसार नव्याने मांडला. तिच्या आईच्या आईने मग या दोघा भावांना आपल्या पदराखाली घेतलं. दत्तक घेतले गेले त्याला.

……. नियतीने त्यांच्या आयुष्याची तुटलेली दोरी एक गाठ मारून पुन्हा सांधण्याचा हा प्रयत्न होता.

पैशांची कमतरता म्हणजे काय हे ठाऊक नसलेल्या घरांत बालपण गेल्याने सुदैवाने या माणसाला जगण्यासाठी संघर्ष नाही करावा लागला. पण त्याच्या भावनिक आयुष्यात फक्त एकच स्त्री होती ती म्हणजे त्याची आजी. तिच्या सावलीतून जरासे बाहेर निघून तो परदेशी गेला.. स्वत:च्या पायांवर उभं राहायला. देखणा, राजबिंडा तरुण. सालस, सभ्य आणि आपल्या आजोबांकडून नर्मविनोदी स्वभावाची देणगी लाभलेला. त्याच्या प्रेमात कुणी न पडेल तेच नवल. परदेशात शिकत असताना एक अमेरिकन तरुणी त्याच्या आयुष्यात आली. प्रेमाचे रंग दाही दिशांना पसरले. भारतीय प्रेम आणि पाश्चिमात्य प्रेम यात फरक असतो हे त्याच्या तोवर ध्यानी आलं नव्हतं. पश्चिमेकडे व्यवहार सर्वाधिक वरची जागा पटकावून असतो त्यांच्या जगात. हा मात्र अस्सल भारतीय माणूस. ज्याला आपलं मानलं त्यासाठी आपलं सर्वस्व अगदी हक्कसोड पत्र करून देऊन मोकळा होणारा. त्याला परदेशी जाऊन सहा-सात वर्षे झाली होती. आणि याच दरम्यान त्याच्या मायेचा पदर इथं विरत चालला होता. आज्जी खूप आजारी पडू लागली. तिने सांगावा धाडला. आणि त्याच दरम्यान भारतावर युद्धाच्या ढगांनी गर्दी केली. त्याने प्रेयसीला लग्नाचे वाचन दिले होतेच. आणि ती सुद्धा तयार होती. पण परिस्थिती बदलली आणि तिचे व्यावहारिक संस्कार तिला बदलायला पाडू लागले. भारतात कायमचे राहायला जायचे, शिवाय तिथे तर युद्धाची स्थिती आहे. जीवनाचा भरवसा नाही, सुखाची शाश्वती नाही. तिच्या पालकांनी तिला पायाजवळ पहायाला उद्युक्त केलं आणि तिने मग दूरवर पाहण्याचं बंद केलं…… त्याची प्रेमकहाणी विवाहात परावर्तीत होण्याआधी समाप्त झाली. तिच्यासाठी हा निर्णय अगदी नैसर्गिक होता. पण याने मात्र आपल्या काळजातील एक मोठा कप्पा कायमचा दुखावून घेतला होता.

तो आला तसा इथलाच झाला. आजी, धाकटा भाऊ यांच्या सहवासात त्याने आपले एकाकीपण कमी केले.. पण ही त्याची त्याने काढलेली समजूत होती. कौटुंबिक व्यवसायात त्याने स्वत:ला इतके बुडवून घेतले की काळजाला वैय्यक्तिक आयुष्याचा विचार करण्याची सवडच गावेना. स्वत:चं घर वसवण्याचं जणू तो विसरत चालला होता. उद्यमशील स्वभाव शांत बसू देईना….. लक्ष्मी प्रसन्न होतीच आता ती त्याच्याकडेच कायम वस्तीला आली होती.

लाखो लोकांच्या संसाराशी आता तो नकळत बांधला गेला. मालक कामगारांचा पगार कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. हा मात्र पगार किमान चांगला असलाच पाहिजे या भूमिकेत असताना प्रत्यक्ष आपल्याच व्यावसायिक सहका-यांशी वाद घालणारा निघाला आणि आपले म्हणणे पटवू शकणाराही निघाला.

काळीज करपलेलं असलं की ते आपल्या मनाविरुद्धही कुठेतरी ओलावा शोधत असतं. त्याच्याही मनाच्या कोरड्या रानात काही श्रावणसरी बरसल्या… पण नशिबाचं ऊन नेमकं त्याच वेळी ऐन भरात होतं. संसार उभारायच्या अगदी जवळ असताना नियतीने त्याचा पाय अनेकदा मागे खेचला…. त्याला प्रचंड मोठ्या संसाराला हातभार लावायचा होता बहुदा. आणि वैय्यक्तिक एकल संसारासाठी त्याला वेळ द्यावा लागला असता… ते नियतीने टाळले. मोठ्या हितासाठी नशीब छोट्या स्वप्नांचा असा बळी घेते! 

अगदी तसंच झालं….. देश-विदेशात त्याने व्यवसायाचं जाळं उभारलं.

नवं जंगल उगवू लागलं की हळू हळू रोपे मोठी होतात, त्यांची झाडं होतात, त्यांना बहर येतो, कळ्या उमलू लागतात आणि मग फुलपाखरे आली की जंगल संपूर्ण होतं….. अनेकांचं आश्रयस्थान बनतं.

हा आता स्वतःच एक मोठा वृक्ष बनला होता. त्याला स्वत: आणखी उंच व्हावं लागलं. पण म्हणून सूर्य सर्वाधिक झेलला तो यानेच. त्याच्या छायेखाली मात्र गडद थंड सावली होती. आणि या सावलीत जो आला तो कधीच माघारी फिरला नाही. आज असे लाखो संसार त्याच्या आधारावर उभे आहेत. लाखो रुग्ण त्याच्या देणग्यांच्या आधारे जगले. अर्थाअर्थी थेट संबंध नसतानाही त्याने अगणित माणसांना जगवले आणि त्यांच्यात आपले प्रेम शोधले… नव्हे प्राप्त केले. माणसासोबत त्याने प्राणीमात्रही मित्र मानले.

आपल्या मनातील प्रेमाच्या, त्यागाच्या, समर्पणाच्या भावनेला त्याने एक अलौकिक आभाळ दिलं…. त्यात त्याने जमिनीवर राहून मनानेच विहार केला. आपल्या शब्दांतून एकाकीपणा सहसा जाणवू दिला नाही. तो प्रत्येकाला आपला वाटला आणि तरीही त्याचं स्वत:चं रक्ताचं होण्याचं भाग्य कुणाला लाभलं नाही…. ! हे प्राक्तन! पण यामुळे त्याचा अंश आता मागे उरला नाही.

तो जणू कर्ण कलियुगातला. त्याने श्रीमंतीची कवच कुंडले कुणी न मागताही समाजाला दिली… एका हाताचं दान दुस-या हातालाही समजू नये याची नेहमी काळजी घेतली. स्वत:चं म्हणावं असं कुणीही मागे न ठेवता या जगाचा निरोप घेणारा मात्र सा-या देशाला स्वत:चं करून गेला…. हा त्याला नियतीने दिलेला न्याय म्हणावा लागेल.

रतनजी टाटा…. नावाला साजेसं कर्तृत्व करून दाखवण्याचे भाग्य तुम्ही मिळवलेत…. विश्व जाले वन्ही…. संते आपण व्हावे पाणी…. हे मुक्ताईचे शब्द त्यांनी जगून दाखवले…. भारतमातेच्या कंठातील एक अनमोल रत्न निमाले!

(माहिती समाज माध्यमांतून साभार.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अभिनंदन — ‘अविस्मरणीय दिवस‘ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

??

☆ अभिनंदन — ‘अविस्मरणीय दिवस‘ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

अभिनंदन ! अभिनंदन !! 

पुणे मराठी ग्रंथालय या नामवंत ग्रंथालयातर्फे पुस्तक – परीक्षणासाठी नुकतीच एक स्पर्धा घेण्यात आली होती. त्या स्पर्धेत आपल्या समूहातील ज्येष्ठ लेखिका सुश्री विभावरी कुलकर्णी यांना द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध लेखक श्री. विश्वास देशपांडे यांनी लिहिलेल्या “ अष्टदीप “ या पुस्तकाचे त्यांनी केलेले परीक्षण पुरस्कार प्राप्त ठरले. आपल्या सर्वांतर्फे विभावरी कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

या यशाबद्दल आपल्या भावना व्यक्त करणारा त्यांचा हा लेख – – 

अविस्मरणीय दिवस…..

२ ऑक्टोबर २०२४ माझ्या आयुष्यातील दिवस! 

साधारण जून महिन्यात एक मेसेज प्राप्त झाला. पुणे मराठी ग्रंथालय यांच्या वतीने एक स्पर्धा आयोजित केली आहे. प्रथम या कडे दुर्लक्ष केले. कारण असे बरेच मेसेज असतात. पण पुणे मराठी ग्रंथालय यांचा मेसेज असल्याने आणि तेथील माझे अनुभव व आठवणी फार महत्वाच्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागेची अडचण असायची त्यांना हे ग्रंथालय म्हणजे फार आपुलकी व जिव्हाळ्याचे वाटायचे. कारण पुण्यातील अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे. सायकलवर अगदी ५/७ मिनिटात पोहोचता यायचे. आणि या ग्रंथालयात अत्यंत शांत व अभ्यास पूरक वातावरण असणारी अभ्यासिका होती. मी व माझ्या सारख्या अनेक विद्यार्थ्यांनी आपले भवितव्य तेथे अभ्यास करून घडवले आहे. त्यामुळे या संस्थेची पोस्ट असल्याने थोडे लक्ष दिले. त्या नंतर तीच पोस्ट ३/४ लोकांच्या कडून आली. त्यांनी जी स्पर्धा आयोजित केली होती त्याचा विषय होता पुस्तक परीक्षण. तसे मी मला वाटले तसे म्हणजे पुस्तक वाचून जे जे विचार मनात येतात ते पूर्वी पासून माझ्या डायरीत लिहून ठेवत असे. पण ते म्हणजे पुस्तक परीक्षण नव्हे! मग काही पुस्तक परीक्षणे बघितली आणि यात मला रंग उगवतीचे ग्रुप व हा ग्रुप ज्यांच्या साहित्य वाचनासाठी तयार करण्यात आला ते आदरणीय श्री देशपांडे सर यांची फार मोलाची मदत झाली. आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे पुस्तक परीक्षण कसे लिहावे हे समजले. मी पहिले पुस्तक परीक्षण लिहिले ते पुस्तक होते आकाशझुला अर्थात सर्वांचे आवडते व सरांचेच पुस्तक. आणि हे परीक्षण आपल्या गृप वर पाठवले. आणि आश्चर्य म्हणजे ते बऱ्याच जाणकार मंडळींना आवडले. आणि मग पुस्तक परीक्षण लिहिण्याचा छंदच लागला. आत्ता पर्यंत वाचता वाचता २०/२५ पुस्तक परीक्षणे लिहिली आहेत. हे सांगण्याचे कारण म्हणजे या सगळ्याचे फळ, सरांचे अनमोल मार्गदर्शन आणि आपल्या गृप वर जे कौतुक केले जाते त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. या सगळ्या मुळे मी स्पर्धेत भाग घेतला आणि अष्टदीप – लेखक श्री. विश्वास देशपांडे. या पुस्तकाचे परीक्षण केले. आणि ८/१० दिवसा पूर्वी एक पत्र मिळाले. त्यात त्यांनी माझ्या परिक्षणासाठी द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे असा उल्लेख केला होता. या ग्रंथालयाच्या परीक्षकांनी नंबर देणे म्हणजे आपण काही लिहू शकतो याची पावतीच! आणि चक्क ती मला प्राप्त झाली.

 २ ऑक्टोबर २०२४ या दिवशी हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. पुणे मराठी ग्रंथालय या संस्थेचा या दिवशी वर्धापनदिन असतो. काल ११३ वा वर्धापनदिन होता. आणि त्यात आम्हाला सहभागी होता आले. अतिशय मंगल व पवित्र वातावरणात हा सोहळा पार पडला. अगदी संस्थेच्या दरवाजातच प्रत्येकाचे पेढा देऊन स्वागत केले जात होते. आणि सगळी मंडळी लग्न कार्याला यावे तशी आली होती. फार सुंदर वातावरणात बक्षीस स्वीकारताना फार समाधान व आनंद अनुभवला. हा आनंद आपल्या माणसांच्या बरोबर वाटावा असे वाटले, म्हणून हा लिखाणाचा प्रपंच! आता आवरते घेते नाहीतर पुरस्कार मिळाला म्हणून लिही, असे व्हायला नको.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कृतज्ञता… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

☆ कृतज्ञता… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

मंडळी !!

आपली सनातन संस्कृती महान आहे याबद्दल आपल्या मनात शंका नसेलच. पण आपली संस्कृती महान आहे याचि प्रचिती कशी यावी?

गुढी पाडव्याला आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो.

त्यानंतर पावसाळ्याच्या आधी वडाची पूजा. पर्यावरण समतोल राखण्यासाठी…..

त्यानंतर सरपटणाऱ्या प्राण्यांचे संगोपन व्हावे, रक्षण व्हावे म्हणून नागपूजा….

त्यानंतर नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा…

… इथे परत पर्यावरणाचे रक्षण हा भाव…

त्यानंतर गणपतीचे आगमन

त्यानंतर पितृ पंधरवडा….. !!

साधी कोणी आपल्याला क्षुल्लक मदत केली तर आपण त्याला किमान धन्यवाद देतो….

मग इथे तर आपले आईवडील आपल्याला तळहातावरील फोडासारखे जपतात, फुलझाडांसारखे वाढवतात, जगायला सक्षम करतात…. आज जे आईबापाच्या भूमिकेत आहेत, त्यांना कळेल की त्यांच्या आई बाबांनी त्यांच्यासाठी काय काय केले असेल….

आपल्याला चांगल्या कुळात जन्म मिळाला. ते कूळ चांगले ठेवण्यासाठी ( शुद्ध ) अनेकांनी आपल्याला मोह आणि माया बाजूला ठेवल्या असतील… अनेकांनी अनेक व्रते केली असतील, अनेक नियम पाळले असतील, तेव्हा कुठे ते शुद्ध राहिले असतील……

थोडा गांभीर्याने विचार करावा….

आज आपण कदाचित मुलाच्या भूमिकेत असू, तर उद्या आपण आई बाबांच्या भूमिकेत जाणार आहोत…..

आपला धर्म कर्म सिद्धांत मानणारा आहे. त्यामुळे मेल्यानंतर मनुष्याला दुसरा जन्म मिळतो यात शंका नाही. तसेच इथून पाठवलेले पैसे चलन बदलून अमेरिकेतील मिळू शकतात. इथून फोन केला तर परदेशातील आपल्या नातेवाईकांशी आपण बोलू शकतो, तर श्रध्देने केलेलं श्राद्ध आपल्या पित्रांपर्यंत पोचू शकते असा तर्क आपण करू शकतो….

मूळ मुद्दा असा आहे की आपल्या कृतज्ञ रहावेसे वाटते की नाही ?

आपल्या शास्त्रकारांनी याचा अभ्यास केला आणि विशिष्ट काळ निवडून, त्याला विशिष्ट पद्धती निर्माण केली.

एक उदा. पाहू. पंतप्रधान येणार असतील तर वेगळा शिष्टाचार असतो, पण अमेरिकेचे अध्यक्ष येणार असतील तर….. ?

श्राद्ध करून काय होते असे म्हणणारे लग्नात ज्या विधीला शास्त्रीय आधार नाही असे अनेक विधी खर्चाचा विचार न करताच करतात, तेव्हा नवल वाटते…

आपला धर्म सांगतो म्हणून आपल्याला योग्य वाटतील ती काही कर्मकांडे अगदी अट्टाहासाने करावी……… आधी करून पहावे आणि अनुभव घ्यावा.

महान तत्त्ववेत्ता रेने देकार्त म्हणतात त्याप्रमाणे “जुने कितीही सदोष वाटू लागले, तरी अगदी निर्दोष नवे हाती येइपर्यंत शहाण्याने हातच्या जुन्याचा त्याग करू नये. त्याची कडूगोड फळे आपण सध्या चाखत आहोत. सध्या आपल्याकडे प्रचलित असलेल्या शिक्षणपध्दतीचे ‘पुनरावलोकन’ करण्याची नितांत गरज आहे.

आपण सर्वजण जाणते आहोत. विवेकाने निर्णय करावा.

निव्वळ आपले पूर्वज नाही तर आजपर्यंत आपल्या, आपल्या देशाच्या जडणघडणीत ज्यांचा ज्यांचा हातभार लागला, त्या सर्वांच्या प्रति आपण कृतज्ञ असलेच पाहिजे.

उद्यापासून नवरात्र सुरू होत आहेत. आपल्याकडे कोणतेही शुभ कार्य करण्या आधी नांदी श्राद्ध करण्याची पद्धती आहे. (थोडक्यात thanks giving)

पूर्वजांचे स्मरण करून, स्मरण ठेवून आपण उद्यापासून शक्तीची उपासना केली तर ती अधिक फलदायी होऊ शकेल…. !

आपण प्रयत्न करू.

आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय !!!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तुम्ही निर्लज्ज असू शकता.. मी नाही…” – अनुवादक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “तुम्ही निर्लज्ज असू शकता.. मी नाही…” – अनुवादक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

 – – – रतन टाटा

२६/११ च्या घटनेनंतर काही महिन्यांनी टाटा उद्योग समूहाच्या ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स यांनी त्यांच्या देश विदेशातील हॉटेल्सचे नुतनीकरण व पुनर्रचना करण्याच्या कामाचे त्यांचे सर्वात मोठे टेंडर काढले. काही पाकिस्तानी कंपन्यांनी हे टेंडर भरले होते.

आपले टेंडर प्रभावशाली ठरावे म्हणून पाकिस्तानातील दोन मोठ्या उद्योगपतींनी रतन टाटा भेटीसाठी पूर्व नियोजित वेळ देत नाहीत हे पाहून मुंबईतील “बॉम्बे हाऊस” या टाटाच्या मुख्यालयास समक्ष भेट दिली.

त्या पाकिस्तानी उद्योगपतींना बॉम्बे हाऊसच्या स्वागत कक्षात ताटकळत ठेवण्यात आले. काही तासांनी त्यांना कळविण्यात आले की, रतन टाटा कामात व्यस्त असल्याने पूर्व परवानगीशिवाय ते कोणालाही भेटत नाहीत.

निराश, त्रस्त, वैतागलेले पाकिस्तानी उद्योगपती दिल्लीला गेले. आणि त्यांच्या हायकमिशन मार्फत केंद्रीय व्यापार मंत्र्याला भेटले. या मंत्र्याने लगेच रतन टाटा यांना फोन करून विनंती केली की, त्या दोन पाकिस्तानी उद्योगपतींना आपण भेट द्यावी आणि त्यांच्या टेंडरचा आस्थापूर्वक विचार करावा.

….. त्यावर रतन टाटा ताडकन म्हणाले, ” तुम्ही निर्लज्ज असू शकाल, मी नाही “.

त्यानंतर काही महिन्यांनी पाकिस्तानी सरकारने टाटा उद्योग समूहाला “टाटा सुमो” या वाहनाची खूप मोठी खरेदीची ऑर्डर दिली, मात्र रतन टाटा यांनी ती खरेदीची ऑर्डर स्पष्टपणे धुडकावून लावली …।

पैसा, उद्योग, आणि व्यवसाय यापेक्षा रतन टाटा यांनी देशाला सर्वोच्च महत्व दिले …

प्रखर राष्ट्रवाद, मातृभूमीविषयी नितांत आदर आणि देशाविषयी निस्सीम प्रेम या रतन टाटांच्या गुणवैशिष्ट्याने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगून येते ….

रतन टाटांना सलाम !!!

महान उद्योगपती रतन टाटा यांना भावपूर्ण आदरांजली…

(फेसबुकवरील श्री कुंतल चक्रवर्ती यांच्या इंग्रजी पोस्टचे भाषांतर)

अनुवादक : अज्ञात

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लेखनभान !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

लेखनभान ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

पूर्वी कधीही नव्हते एवढे लेखन स्वातंत्र्य आज आहे. लिहिणारे आणि लिहू शकणारे अनेक होते, पण ते प्रसिद्ध करण्याला तांत्रिक मर्यादा होत्या. कागदावर छपाई करून ते वाचकांपर्यंत पोहोचणे ही एक मोठी प्रक्रिया असे. त्यात संपादन हा एक अतिशय महत्वाचा घटक असतो. त्यामुळे ‘साभार परत’ ची सवय नवोदित लेखकांना करून घ्यावी लागे.

‘वाचकांचा पत्र व्यवहार’ सारख्या सदरात दोन ओळींचे पत्र छापून आले तरी लेखक झाल्यासारखे वाटे ! आता परिस्थती खूपच लेखन-आणि लेखक ‘फ्रेंडली’ झाली आहे.

सुरुवात Email ने झाली. पुढे Facebookआणि Whatsapp मुळे कुणालाही, कितीही, केंव्हाही आणि मुख्य म्हणजे ‘कसेही’ लिहिता येऊ लागले. काही विशेष अशा डिजिटल साहित्य-मंचांचा ठळक अपवाद वगळता लेखनाचे संपादन, नियंत्रण असा फारसा भाग उरलेला नाही. गावाच्या माळावर जाऊन बोंब ठोकायला पाटलाची परवानगी घेण्याची गरज लागत नाही, तशातला हा प्रकार. त्याचे दुष्परिणाम वाचक भोगत असतात. विशेषत: फेसबुकवरील ‘पोस्ट’ ला ‘कमेंट’ च्या माध्यमातून लेखी स्वरूपात, चित्र स्वरूपात प्रतिसाद देण्याची सुविधा असल्याने कुणी काहीही लिहू शकते. या काहीही लिहिण्यातून अनेक अप्रिय घटना, प्रसंग घडलेले आहेत.

फक्त एक गोष्ट बरी आहे, ती म्हणजे हे लेखन वाचायचे की नाही हे वाचक ठरवू शकतात ! पूर्वी लोक पत्रकार, लेखक हे आपल्याविषयी काही लिहितील म्हणून त्यांच्यापासून दूर राहायचे किंवा गरज असली तर जवळही जायचे! हल्ली फेसबुकवर पोस्ट लिहिणाऱ्या लेखकांच्या बाबतीत असे होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विस्तारभयास्तव, फक्त एकाच प्रकारावर लेखकांनी कटाक्ष ठेवावा हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच !

जेंव्हा प्रत्यक्ष व्यवहारातील विषयावर, अनुभवावर लिहिले जाते, तेंव्हा त्या लेखनात नावांचा आणि इतर अनुषंगिक उल्लेख टाळायला पाहिजेत, असे मला अत्यंत प्रकर्षाने वाटते. व्यक्तीचा उल्लेख जर सन्मानजनक, कौतुकाचा, आनंदाचा, उपकाराचा इत्यादी इत्यादी असेल तर नावाचा थेट उल्लेख असलेला चांगलाच. परंतु मैत्री, प्रेम, चारित्र्य याबाबतीत महिलांचा उल्लेख करताना थेट नावे किंवा त्या व्यक्तीची ओळख पटेल असे लेखन टाळावे, असे वाटते. जरी घटना, प्रसंग कितीही जुने असले तरी संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील कुणाही व्यक्तीच्या नजरेस हा मजकूर पडला तर अनवस्था प्रसंग उदभवू शकतात. माझे अमक्या मुलीवर प्रेम होते पण आमचा विवाह होऊ शकला नाही, हे लिहिताना त्या मुलीच्या नावाचा आता उल्लेख का करावा? तिचे लग्न झालेले असेल, तिचा संसार सुरु असेल आणि संबंधित बाब तिच्या नव्या कुटुंबास माहीत नसेल, तर काय? एक तर ज्याने लेखन केले आहे त्याला ओळखणा-या वाचकांना नेमके कुणाबद्दल लिहिले गेले आहे, हे ताडणे फार अवघड नसते. कारण लेखक आणि वाचक तसे बरेचदा एकमेकांच्या ओळखीत, परिसरात असू शकतात.

छायाचित्रे वापरताना, विशेषत: महिलांची छायाचित्रे वापरताना भान राखणे गरजेचे आहे.

वृत्तपत्रांत अशा प्रकरणामध्ये व्यक्तींची बदललेली नावे छापण्याची पद्धत आहे. Electronic Mediaमध्ये चेहरे धूसर करून दाखवणे, लपवणे असे उपाय केले जातात. आणि हे आवश्यक सुद्धा आहे.

व्यक्तीमत्वाचे वर्णन करताना त्यांचे शारीरिक दोष लिहिण्याची अशी किती गरज असते लेखन विषय पोहोचवण्यासाठी? व्यक्तीच्या मर्मावर विनाकारण बोट ठेवून तो दुखावला जाईल, असे चांगले लेखक कधीही लिहित नाहीत.

लेखन विषयावर आता बंधने नाही घालता येत. पण अति होण्याआधी लेखकांनी आपापल्या लेखणीस वेसण घातलेली बरी !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ सर तुम्ही मेल्यावर… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ सर तुम्ही मेल्यावर… ☆ डॉ अभिजीत सोनवणे

“ती”… पूर्वी मागून खायची…

आता ” तिला ” एका मेडिकल कॉलेजमध्ये स्वच्छता कामगार म्हणून काम मिळवून दिले आहे.

तिच्या मुलाला “आपण” दत्तक घेतलं आहे, सर्व शैक्षणिक खर्च गेल्या चार वर्षांपासून “आपणच” करत आहात. (मी नाही… !)

कामावर जाताना आज बुधवारी सकाळी ती चुकुन भेटली.

पर्वती पासून सदाशिव पेठेपर्यंत ती चालत जायची, घरातलं सगळं आवरून जाताना कामाला उशीर व्हायचा, केवळ या कारणासाठी तिला काढायला नको, म्हणून “आपण” तिला नवीन सायकल सुद्धा घेऊन दिली आहे.

मला रस्त्यावर भिक्षेकर्‍यांमध्ये बसलेला बघून ती सायकल थांबवून घाई घाईने माझ्याजवळ आली, म्हणाली; ‘सर राकी बांदायची होती, पन कामावर खाडा झाला आसता… म्हनून मी रकशा बंदनाला यीवू शकले न्हायी… स्वारी सर… ! तिच्या नजरेत अजीजी होती.

मी म्हटलं हरकत नाही; भाऊ बहिणीच्या नात्याला औचित्य किंवा मुहूर्त लागत नाही…. आत्ता बांद राकी… !

‘मी आनलीच न्हायी की वो सर, मला काय म्हाईत तूमी आता भेटताल म्हनून… ‘ ती पुन्हा खजील झाली.

मी सुद्धा इकडे तिकडे पाहिलं… माझ्याकडे ड्रेसिंग चे सामान होतं, त्यातली चिकटपट्टी घेऊन तिला म्हटलं, ‘हि घे चिकटपट्टी आणि बांद मला “राकी”… ‘

‘या बया… म्हणत, तोंडाला ओढणी लावत, तीनं मला हसत हसत “राकी” बांदली… ‘

यानंतर मी खिसा चाचपला…. हातात येईल ती नोट तिला ओवाळणी म्हणून टाकली…. !

तीने ती नोट निरखून पाहिली…. कपाळाला लावली आणि परत माझ्या खिशात ठेवत म्हणाली, ‘सर मला ववाळणी नको, माज्या पोराला साळंचा डीरेस घ्या… ‘

‘म्हणजे ? मी नाही समजलो… ?’

ती म्हणाली, ‘सर आवो तुमि साळेची फी भरली… वह्या पुस्तकं घ्येतली, समदं केलं पन त्याला साळेचा डीरेस घ्यायला इसरले तुमि… ‘

बोलू का नको ? सांगू का नको ? सांगितलं तर यांना राग येईल का ? या अविर्भावात चाचरत ती बोलली… !

मला माझी चूक लक्षात आली… शाळेची फी भरली… वह्या पुस्तकं घेतली… सॉक्स आणि बुट घेतले…. मग युनिफॉर्म कोण घेणार ? याचा युनिफॉर्म घ्यायचा कसा काय राहिला माझ्याकडून ? मी मनाशी विचार करत राहिलो…

‘मग आधी का नाही माझ्या लक्षात आणून दिलंस ?’ मी जरा वैतागून बोललो.

‘आवो सर आदीच ह्येवढं करता आमच्यासाटी, त्यात आजून किती तरास द्येयचा, आसं वाटलं म्हनुन न्हायी बोलले आदी… ‘

तिच्या या वाक्यानं मी खरं तर सुखावलो…

कुणाच्या करण्याची काही “किंमत” समजली तरच “मूल्य” समजते !

खर्च झाल्याचं दुःख नसतंच, हिशोब लागला पाहिजे… !

‘बया, कुटं हरवले तुमी… ?’ माझे खांदे हलवत तीने विचारलं…

मी भानावर आलो…

‘साळेचा डीरेस नसंल तर झेंडावंदलाला येऊ नगोस म्हणून त्याला साळेत सांगितलं हुतं सर… आनी म्हनून त्यो गेला पन न्हाय सर झेंडावंदलाला…. !’

‘साळेचा डीरेस नव्हता, म्हनुन त्याला वर्गाच्या भायर पन हुबं केलं सर… म्हनुन मंग आज तुमाला बोलले सर… ‘.. लहान मुलीने आपल्या वडिलांना काही तक्रार करावी, या स्वरात ती बोलत होती… !

युनीफॉर्म नव्हता म्हणून झेंडावंदन करू दिले नाही… ? देशभक्ती युनिफॉर्मवर ठरते का ??

या विषयावर खूप काही लिहायचं आहे, पण पुन्हा कधीतरी… !

माझ्या चेहऱ्यावरचे भाव कदाचित बदलले असावेत…. हे भाव बघून ती म्हणाली….

‘जावू द्या सर मी बगते… डीरेसचं काय तरी.. ‘

तिच्या या वाक्याने मी भानावर आलो…

मी म्हणालो, ‘ आता आणखी काही बगु नकोस…. घरी जाऊन पोराला घे आणि शाळेचा डीरेस घे…. कामावर आजचा खाडा पडला तर पडू दे… त्याचे पैशे मी देईन तुला… !’

ती चटकन उठली….

‘मला ववाळणी नगो…. पण माज्या पोराला शिकू द्या…. त्येला शाळेचा डीरेस घ्या… त्येला झेंडावंदनाला जाऊ द्या ‘ हे म्हणणाऱ्या अशिक्षित परंतु सुसंस्कारित माऊली मध्ये मला खरी “भारतमाता” दिसली.. !

मला ववाळणी नगो…. पण माज्या पोराला शिकू द्या…. त्येला शाळेचा डीरेस घ्या… या दोनच वाक्यात मला माझी “जीत” झाल्यासारखं वाटतं….

कारण लहान मुलांना दिवसाला साधारण एक हजार रुपये भीक मिळते, म्हणजे महिन्याभरात तीस हजार रुपये…

शिका रे, म्हणणाऱ्या मला मग कोणते पालक भीक घालतील… ?

तरीही यांच्याशी झालेल्या नात्यांच्या जीवावर मुलं दत्तक घेतो आहे आणि त्यांना शिकवतो आहे…

असो, तर आजच दुपारी शाळेचा “डीरेस” विकत घिवून ती आली आणि म्हणाली, ‘सर किती करताल ओ माज्यासाटी… मी लय त्रास देती तुमाला…. स्वारी सर…. !’

काय बोलू मी यावर…. ?

मी तिला म्हणालो, ‘माझ्या मूर्खपणामुळे 15 ऑगस्टच्या अगोदर त्याला युनिफॉर्म घ्यायचं मला सुचलं नाही…. आणि त्यामुळे तो झेंडावंदनाला हजर राहू शकला नाही… वर्गातून त्याला बाहेर राहावं लागलं….

त्याबद्दल आज मीच, तुझी आणि त्याची माफी मागतो गं माऊली, “स्वारी गं… !!!

‘बया… तुमि नगा स्वारी म्हणू सर…. ‘ असं म्हणत, डोळ्यातून पाणी काढत, तिनं माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं…

मी पोराकडे पाहिलं… नवीन कपड्याचे तीन जोड पाहून पोरगं “हरखून टूम्म” झालं होतं…

इस्त्री केलेल्या कपड्याचा एक जोड त्याने अंगावर घातला होता….

मी इंटरनॅशनल संस्थेत काम करताना असेच मस्त कडक इस्त्रीचे कपडे घालायचो… मला माझीच आठवण झाली….

आता मी नाही असे इस्त्री चे कपडे घालत, इच्छाच होत नाही… पण, मला त्याच्यामध्ये अभिजीत दिसला… !

पूर्वी तो आईबरोबर याचना करायचा… आज तो इस्त्रीचे कपडे घालून शाळेत जाईल…

मी त्याला सहज गमतीने विचारलं, , ‘बाळा शिकून पुढे मोठा होऊन काय करशील ?’

तो म्हणाला सर, ‘मला डॉक्टर व्हायचं आहे… ‘

मी म्हटलं, ‘बाळा, डॉक्टर होऊन काय करशील पण ?’

तो निरागसपणे हसला आणि म्हणाला, “सर तुम्ही मेल्यावर मी डॉक्टर होऊन, भिकाऱ्यांची सेवा करीन…. !!!”

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नवरात्रीतील बौद्धिक उपासना…  ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ नवरात्रीतील बौद्धिक उपासना…  ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

बरेच लोक नवरात्रात नऊ दिवस उपवास करतात. शारीरिक दृष्टीने या उपवासाचा फायदा होतो.. शिवाय जरासे आत्मसंयमनही होते असं म्हणता येईल. पण उपवासाची मूळ संकल्पना वेगळीच आहे जी अनेक लोक उपास करतांना विचारातच घेत नाहीत

‘उपविशति. ’ या संस्कृत क्रियापदावरून आलेल्या “ उपवास “ या शब्दाचा खरा अर्थ आहे जवळ – शेजारी राहणे – सान्निध्यात राहणे….. अर्थात देवाच्या सान्निध्यात राहणे. शरीराने व मनानेही. संसाराच्या सर्व चिंता, सर्व विचार दूर सारून मन देवावर एकाग्र करणे, मनात फक्त ‘मी आणि देव’ हा भाव असणे. आणि असा उपवास करण्याचा उद्देश काही काळ तरी मनातला भौतिक सुख-दु:खांचा विचार कटाक्षाने बाजूला सारता यावा, मनातील नकारात्मकता नकळत नष्ट व्हावी आणि मन:शांती व पर्यायाने आरोग्यही लाभावे हाच असावा असे निश्चितपणे वाटते.

मी नुकताच एक लेख वाचला ज्यात ‘ नवरात्रीत बौद्धिक उपवास कसा करावा, ‘ याविषयीचे विचार मांडलेले होते. हे विचार खरोखरच अंमलात आणण्यासारखे आहेत. पण शीर्षकातला ‘उपवास’ हा शब्द मात्र मला खटकला. कारण ‘उपवास’ या शब्दाचा संदर्भ आपल्याकडे सर्वसाधारणपणे काहीतरी ( मुख्यतः खाणे ) टाळण्याशी … थोड्याशा नकारात्मकतेशी जोडला जातो. त्यामुळे ‘ बुद्धीचा उपवास ‘ हा शब्द खटकला. मग ते शीर्षक ‘नवरात्रीत बौद्धिक उपासना ‘ असे असावे या दृष्टीने मी तो लेख वाचला आणि मग. …. त्यातील मुद्दे विचार करावा असेच आहेत हे पटले. ते मुद्दे असे आहेत —–

प्रतिपदा मी माझा सर्व राग सोडून देईन.

द्वितीया मी लोकांना judge करणं सोडून देईन.

तृतीया मी माझे इतरांबद्दल सर्व आकस, पूर्वग्रह सोडून देईन.

चतुर्थी मी स्वतःला आणि सर्वांना क्षमा करीन.

पंचमी मी स्वतःला आणि प्रत्येकाला जसे आहे तसे स्वीकारेन.

षष्टी मी स्वतःवर आणि प्रत्येकावर बिनशर्त प्रेम करीन.

सप्तमी मी माझ्या ईर्ष्या आणि अपराधाच्या सर्व भावना सोडून देईन.

अष्टमी (दुर्गाष्टमी) मी माझी सर्व भीती सोडून देईन.

नवमी (महानवमी) माझ्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसाठी आणि मला जे मिळेल त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करेन.

दशमी (विजयादशमी) – विश्वामध्ये सर्वांसाठी विपुलता आहे. ‘ जो जे वांछील, तो ते लाहो. ’ असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहेच. त्यासाठी बिनशर्त ‘मैत्र’, प्रेम, साधना, निष्काम सेवा आणि विश्वास याद्वारे मी योग्य तेच आणि आवश्यक तेवढेच प्राप्त करावे अशी मनोधारणा मी बाळगेन

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही उपासना फक्त नवरात्रातच केली पाहिजे, असं काही नाही. किंबहुना ती रोजच्या आचरणात आणावी. ज्याप्रमाणे आपण नित्यनेमाने, न चुकता जेवतो, झोपतो, त्याचप्रमाणे या बौद्धिक उपासनेचाही रोजच्या परिपाठात समावेश करावा. मग हळूहळू या प्रकारे वागणं आपल्या अंगवळणी पडेल. आणि आपले जीवन नक्कीच सकारात्मक व समृद्ध होईल. हेही एकप्रकारे सीमोल्लंघनच ठरेल नाही का ??

सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. !!!!!

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares