मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गवळणींची प्रथा – –’ –  लेखक : श्री समीर गायकवाड ☆ संकलन व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘गवळणींची प्रथा – –‘ –  लेखक : श्री समीर गायकवाड ☆ संकलन व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

गवळणींची प्रथा – – 

दिवाळीमध्ये अंगणात शेणापासून केल्या जाणाऱ्या ‘गवळणीं’ची प्रथा इतर अनेक प्रथांप्रमाणे हळूहळू लोप पावतेय. महाराष्ट्राच्या ग्रामजीवनाचं आणि गतकालीन ग्रामीण स्त्रियांचं भावविश्व उलगडणाऱ्या या गवळणी आता इतिहासजमा होत आहेत. आता तर दारात गायीगुरंच नसल्याने शेणही मिळत नाही आणि नव्या पिढीची मंडळी शेणात हात घालायला तयार होत नाही. यांमुळे लोकसंस्कृतीचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होतोय, अर्थात काळाच्या प्रभावानुसार अशा गोष्टी घडत असतातच हेही मान्य केले पाहिजे!

दिवाळी हा कृषीजीवनावर आधारीत सण. गावांत शहरांत प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये कृषी संस्कृतीवर आधारीत विविध प्रथा आणि परंपरा साजऱ्या होतात. समृध्द लोकजीवनाचे दर्शन त्यातून घडतं. वेगवेगळ्या प्रांतात दिवाळी विविध पध्दतीने साजरी होते. त्यातून लोकजीवनाचं दर्शन प्रकर्षाने होते.

महाराष्ट्रात दिवाळीच्या आगळ्या प्रथा-परंपरा आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये अंगणामध्ये शेणापासून तयार केल्या जाणाऱ्या गवळणी. पूर्वी गावांमध्ये भरपूर गायीगुरं असायची. त्यांचे शेण मिळायचे. या शेणापासून धनत्रयोदशीच्या दिवशी पहिली गवळण तयार केली जायची. अर्थातच घरातील स्त्रिया या गवळणी बनवत. बाळगोपाळांचा उत्साह त्यावेळी ओसंडून वाही. प्रत्येक घरातील स्त्रिया मोठ्या कल्पकतेने या गवळणी बनवत. छोटे शेणगोळे बनवून आधी त्यांना बाहुल्यांचा आकार दिला जाई. सजावटीसाठी पाना-फुलांचा वापर करण्यात येई. कल्पनेतलं एक आटपाट नगरच या गवळणींच्या माध्यमातून उभे केलं जाई. पाच दिवस लोकजीवनातील वेगवगेळय़ा घडामोडी या गवळणींच्या माध्यमातून दाखविण्यात येत असत. पाचव्या दिवशी पांडव केले जात.

याकरिता अंगणाचा कोपरा राखून ठेवला जायचा. त्याला शेणाने सारवण्यात येई. त्याच्या मध्यभागी झोपलेला बळीराजा दाखविला जायचा. त्याच्या बाजूला काही गवळणी बळीराजाचे हात-पाय दाबताना दृष्टीस पडत. काही गवळणी स्वयंपाक करताना दाखविल्या जात. त्यासाठी सुंदर अशी चूलही मांडली जायची, त्यावर शेणाचेच तवे दाखवून भाकऱ्या करताना दाखवले जायचे. कुणी गवळणी दळणकांडण करताना दाखविल्या जायच्या. त्यासाठी शेणाचेच जाते केले जाई, जात्याच्या दोन्ही बाजूला बसून गवळणी धान्य दळत असल्याचे दाखविले जाई. शेणात बरबटलेली काडीपेटीची काडी म्हणजे जात्याचा दांडा असे!

काही गवळणी विहीरीवर पाणी भरण्यासाठी निघालेल्या दाखवल्या जात. एक हात कमरेवरच्या घागरीवर आणि दुसरा हात डोक्यावरल्या घागरीवर धरलेल्या या गवळणी सुंदर दिसत. काही गवळणी डोक्यावरील पाटीत भाजी घेऊन विकायला जात तर काहीजणी घरात देवपूजा मांडत, त्यासाठी शेणाचे देवघर करून त्यात नानाविध देव दाखविले जायचे. काही गवळणी गुरं राखायला पाळीवर घेऊन गेलेल्या दाखवत. तर काही गुरांना पाणी पाजताना दाखविल्या जायच्या. अंगणात खेळणाऱ्या गवळणी असत. डोंगर चढणाऱ्या, जेवण वाढणाऱ्या, ताक घुसळणाऱ्या अशा नाना प्रकारच्या गवळणी दाखविल्या जाता. कुणी लेकुरवाळी गवळण कमेरवर बाळाला घेऊन त्याला खेळवत असल्याचे दाखविले जाई. काही जणांना शेणाच्या टोप्या केल्या जात. क्वचित एखादीच गवळण पुस्तक वाचताना दाखवली जाई, अर्थातच त्या घरात शिक्षणाचं वारं दाखल झालेलं असे!

गवळणींना सजविण्यासाठी पाना-फुलांचा वापर केला जाई. कापसाच्या फुलांच्या, पानांच्या माळा गवळणींच्या गळ्यात घालत. गवळणींचा हा सारा संसार उभा झाला की त्या एकंदर नंदराज्याच्या बाहेरील बाजूला दोन बुरूज केले जात. त्यामध्ये चिपाडाची काडी घालून वेस बनविण्यात येई. गावाच्या वेशीवर तुतारी वाजविणारा शिंगाडा दाखविण्यात येई. जणू येणाऱ्या जाणाऱ्याचे तो शिंग वाजवून स्वागतच करतोय असे वाटे. त्यासाठी काचेची अर्धी बांगडी शिंग म्हणून त्या शेणाच्या बाहुलीत खुपसली जाई. वेशीजवळच दीपपाळ केली जाई. दीपमाळेवर पणत्या ठेवल्या जात. गावाकडच्या स्त्रीजीवनातल्या साऱ्या दैनंदिन घडामोडींचं सुंदर, सुबक भावदर्शन या गवळणींमधून व्हायचं.

पाच दिवस रोज वेगवेगळ्या प्रकारे गवळणी तयार करण्यात येतात. प्रत्येकजण आपापल्या कलाकौशल्याचं दर्शन शेणाच्या या गवळणी करताना घडवत असे. आपल्या गवळणी इतरांपेक्षा अधिक सुंदर आणि देखण्या कशा होतील याची जणू स्पर्धांच असायची. गवळणींच्या माध्यमातून उभारलेल्या आटपाटनगरात सगळं काही शेणाचंच असे. हे आटपाटनगर जरी स्त्रिया बनवत असल्या तरी, त्यातून लोकसंस्कृतीचं आणि ग्रामजीवनाचं यथार्थ दर्शन घडत असे. आपलं ग्रामजीवन किती समृध्द आणि स्वावलंबी होतं, याचं प्रत्ययकारी दर्शन ‘गवळणी’ बनविण्याच्या या प्रथेमधून व्हायचं.

पाचव्या दिवशी शेणाचे पाच पांडव केले जात. शेणाची मूद घेऊन त्याची द्रौपदी केली जायची. बळीराजा दाखवला जायचा. शेणाचा सुरेख असा डोंगर तयार केला जाई. कुणी चिपाडाच्या काटक्या एकत्र करून सुरेख मंडप करत. त्यावर आंब्याच्या डहाळया ठेवून मंडपाची शोभा वाढविली जाई. सलग पाच दिवसांत शेणापासून निर्मिलेल्या गवळणी जपून ठेवून छपरावर वाळवत घालण्यात येत. कार्तिक पौर्णिमेला त्यांचे दहन केले जाई. यावेळी कित्येक बारकाली पोरं धाय मोकलून रडत असत, मग त्यांच्या आयाबाया त्यांचे गालगुच्चे घेत त्यांची समजूत काढत असत! घरातली जाणती माणसं गालातल्या गालात हसत हे दृश्य मनात साठवत असत! 

आताशा हरेक घरापुढे गवळणी केल्या जात नाहीत. नव्या पिढीला त्यासाठीचं मार्गदर्शन करणाऱ्या सासूबाई, आजीबाईही आता लोप पावताहेत. तरीही काही अपवादात्मक ठिकाणी आपल्या आजी-आई, सासूकडून चालत आलेला वारसा जपण्याचा प्रयत्न काहीजणी करताना दिसतात. ज्या गावांचे शहरीकरण खूप कमी प्रमाणात झाले आहे अशा गावांमध्ये मात्र जुन्या पिढीतल्या वयस्क सागवानी बायका मात्र आजही शेणाच्या गवळणींची सुंदर रचना करून छोटसं आटपाटनगर वसवतात. आजीकडून नातीकडे आणि सासूकडून सुनेकडे चालत आलेला हा वारसा प्रयत्नपूर्वक पुढच्या पिढीकडे देण्यासाठी त्या इच्छुक दिसतात.

आता गुरं सांभाळणं हेच दिव्य होऊन बसलंय. जित्राबाऐवजी यांत्रिकी मदतीने शेतीकामे करण्याकडे कल आहे. यात गैर काहीच नाही. गावाकडच्या घरातले दूधदुभतेही घटत चाललेय. सारं काही अजस्त्र वेगाने बदलत चाललेय जे कुणीही रोखू शकत नाही. त्यामुळे काळाच्या ओघात अशा प्रथा नष्ट होतीलही परंतु पुढच्या पिढीच्या माहितीसाठी यांचं ‘डॉक्युमेंटेशन’ व्हायला हवं अन्यथा कधी काळी गावाकडच्या मायभगिनी, पोरंठोरं दर दिवाळीत शेणापासून सुंदर गवळणी बनवत असत नि त्याचाही आनंद घेत असत हे नव्या पिढीला खरं वाटणार नाही. जसजशी दिवाळी बदलत चाललीय तसतसे तिचे रुपडे प्राकृतिकतेपासून दूर जात अधिकाधिक कृत्रिम होतेय हे वास्तव आहे!

लेखक : श्री समीर गायकवाड

छायाचित्रे सौजन्य – सुश्री विनू कुलकर्णी

संकलक व प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र – भाग- १ – लेखक : माहिती संग्राहक :  श्री आनंद महाजन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

? वाचताना वेचलेले ?

दिवाळीच्या फराळामागील आहारशास्त्र – भाग-१ – लेखक : माहिती संग्राहक :  श्री आनंद महाजन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलु साबणे जोशी

… म्हणून दिवाळीत बनवले जातात करंजी, चकली, चिवडा अन् लाडू….

नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या पद्धती, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचा शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते!

सगळीकडे दिवाळीचे फराळ बनविण्याची गडबड चालू होती. सगळे जण आपापल्या कामात व्यग्र होते.

कस्तुरीच्या डोक्यात मात्र भलतेच चालू होते.. आई, मामा, आत्या सर्वाना प्रश्न विचारून विचारून तिने अगदी भंडावून सोडले होते. शंकरपाळीचा आकार असाच कसा? करंज्या अशा कशा दिसतात? लाडू गोलच का करतात? प्रत्येक फराळाचा आकार वेगवेगळा का असतो? आणि त्या छोटा भीमला जो लाडू आवडतो तो हाच का? तिच्या या प्रश्नांचे उत्तर मात्र कोणाकडेच नव्हते.

आज कस्तुरीच्या आज्जीची प्रकर्षांने आठवण येत होती. ती असती तर तिने सांगितलं असतं सगळं. पण या आताच्या नवीन पिढीच्या ‘मम्मी’ला पण हे माहीत नाहीये. त्यात छोटा भीमने तर लहान मुलांवर वेगळीच छाप टाकली आहे. त्यामुळे भीम नक्की कोण होता हे आपल्यालाही माहिती करून घेतलं पाहिजे. कारण नुसते दिवाळीचे पदार्थ बनवून दिवाळी साजरी करण्यापेक्षा तिचे शास्त्रीय महत्त्व, वेगवेगळे पारंपरिक पदार्थ, त्या बनविण्याच्या, खाण्याच्या पद्धती तसेच त्या प्रथम कोणी बनविल्या याचे शोध घेऊन या दिवाळीत आपल्या मुलांना आपल्या परंपरांबद्दल माहिती दिल्यास त्यांनाही याचा अभिमान वाटायला लागेल व ते खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करतील. मग पाहा ‘हॅपी दिवाली’ची कशी ‘शुभ दीपावली’ होतेय ते.

असो. तर भीम हा ‘पौरोगव बल्लव’ या नावाने राजा विराटाच्या सेवेत एक वर्ष पाकशास्त्रज्ञ म्हणून राहिला. ‘पौरोगवो बृवानो अहम बल्लावो नाम नामत:।.. महाभारत/विराट पर्व/ २/१-१०. भीमाला पाकशास्त्र चांगले येत होते. महाभारतात खूप ठिकाणी याचे वर्णनदेखील मिळते. बल्लव म्हणजे पाकशास्त्रज्ञ. पांडव वनवासात असतान जेव्हा श्रीकृष्ण त्यांना भेटायला आले तेव्हा भीमाने त्यांच्यासाठी खास एक नवीन प्रकारचा गोड पदार्थ तयार केला होता. तो खाल्ल्यावर श्रीकृष्णाने मोठय़ा आनंदाने भीमाचे कौतुक केले होते. व त्या पदार्थाचे नाव ‘रसाला’ असे ठेवले. तर हे ‘रसाला’ म्हणजेच आताचे श्रीखंड. म्हणजेच श्रीखंडाचा प्रथम निर्माता भीम आहे व त्याने तो खास श्रीकृष्णासाठी बनविला.

आपल्याला आपल्या प्राचीन आहारीय शास्त्राची माहिती करून देणाऱ्या ‘क्षेमकुतूहल’, ‘भोजन कुतूहल’, ‘पाकदर्पण’ अशा प्राचीन व सध्याच्या युगातील अगदी नुकत्याच प्रकाशित झालेल्या सूद्शास्त्र वर्णन केलेल्या ग्रंथांमध्ये आपल्याला याची अधिक माहिती मिळते. पूर्वीच्या काळी ‘पूपलिका’ म्हणजे पुरी, ‘पूपा’ म्हणजे छोटे वडे, ‘ईण्डरिका’ म्हणजे इडली, ‘घारिका’ म्हणजे डोसा, ‘कुंडलिका’ म्हणजे जिलेबी, ‘किलाट’ म्हणजे पनीर, ‘लाप्सिका’ म्हणजे हलवा आणि ‘चणक रोटिका’ म्हणजे हरभरा डाळीपासून बनवलेली रोटी अर्थात पुरणपोळी, ‘हिमाहवा’ म्हणजे बर्फी, ‘पिंडक’ म्हणजे पेढा व ‘लड्डूक’ म्हणजे लाडू असे सध्याच्या प्रचलित पदार्थाचे जुने संदर्भ व बनविण्याच्या पद्धतीचे वर्णन मिळते. त्याचबरोबर त्यासाठी लागणारी साधनसामुग्री, त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम, त्याचे फायदे-तोटे, प्रत्येक पदार्थ खाण्याचे प्रमाण याबद्दल विस्तृत माहिती मिळते. गरज आहे ती फक्त आयुर्वेदीय सिद्धांत व आहारशास्त्रातील वर्णन केलेले पदार्थ यांची सांगड घालून त्यांचे कालानुरूप व प्रकृतीनुरूप सेवन करण्याची.

आपण दिवाळीत केलेल्या पदार्थानी युक्त भोजनाला ‘पंचपक्वान्नांचे भोजन’ असे म्हणतो. पैकी यातील पंच – पक्व -अन्न म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पाच महाभूतांपासून बनलेले भोजन. या प्रत्येक महाभूतांचा आकार ग्रंथात वर्णन केलेला आहे. जसे की ‘पृथ्वी’ महाभूत हे स्थिर असल्या कारणाने चौकोनी सांगितले आहे. ‘जल आणि आकाश’ मात्र गोल सांगितले असून ‘अग्नी’चा आकार त्रिकोणी व वायूचा आकार अर्ध चंद्राकृती सांगितला आहे. आपल्या दिवाळीतील लाडू गोल, करंज्या अर्धचंद्राकृती, शंकरपाळ्या कधी त्रिकोणी कधी चौकोनी केलेल्या पाहायला मिळतात. या प्रत्येकाच्या मागे काही तरी गमक आहे. हे उगीचच नक्की आले नाही. या सर्व पंचमहाभूतांची आपल्याला आठवण राहावी, पुढच्या पिढीला त्याची माहिती मिळावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ती आपल्या परंपरांमध्ये जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आपल्या आहारातील सहा रस म्हणजे षड्रससुद्धा याच पाच महाभूतांपासून बनलेले असतात. यापैकी पृथ्वी आणि आप महाभूतापासून मधुर रस बनतो. पृथ्वी आणि तेज महाभूतापासून आम्ल रस बनतो. अग्नी व जल महाभूतापासून लवण रस म्हणजे खारट. आकाश व वायूपासून कडू. अग्नी व वायूपासून तिखट आणि पृथ्वी व वायूपासून तुरट रसाची निर्मिती होते, असे आयुर्वेद शास्त्राचे मत आहे. या सहा रसांच्या संतुलित सेवनामुळे आपल्या शरीराचे पोषण होत असते.

गंमत पाहा, आपल्या परंपरेत या सर्वाना महत्त्वाचे स्थान आहे. आपण दिवाळीमध्ये बनवीत असलेल्या प्रत्येक पदार्थाचा आकार व चव, त्यात वापरली जाणारी घटकद्रव्ये वेगवेगळी असतात. तसेच त्या प्रत्येक पदार्थाची अवस्थासुद्धा वेगवेगळी असते. थोडक्यात, या प्रत्येक पदार्थाच्या निर्मितीमागे हे पंच महाभूतांचे शास्त्र दडलेले असते. त्यांच्या कमी-अधिक संयोगानेच पदार्थ, त्यांचा आकार, त्यांची चव व टिकाऊपणा ठरलेला असतो. या पंचमहाभूतांमुळेच आपल्याला त्या पदार्थाचे पंच ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने ज्ञान होत असते. म्हणून तर पृथ्वी महाभूत त्या पदार्थातील गंध ठरवीत असते. आप महाभूत त्या पदार्थाची चव ठरवत असते, तेज महाभूत त्या पदार्थाचे रूप म्हणजे दिसणे ठरवत असते तर वायू महाभूत त्या पदार्थाचा स्पर्श ठरवत असते. तो पदार्थ खाताना येणारा विशिष्ट आवाज हा त्या पदार्थातील आकाश महाभूतांमुळे येत असते. कारण आकाश महाभूत त्या पदार्थातील शब्द व्यक्त करत असतो. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा पदार्थ आवडत असतो. कोणाला भज्याचा वास आवडतो, कोणाला जिलेबीची चव आवडते, कोणाला शेव, चकलीचा कुरकुरीतपणा व खातानाचा आवाज आवडत असतो तर कोणाला स्पर्शाला अनारसे व दिसायला करंज्या आवडत असतात. त्यामुळे या पाचही महाभूतांचे त्या एकाच पदार्थातील उत्तम संतुलन हे प्रत्येकालाच त्या पदार्थाच्या मोहात पाडते. हीच त्या सुगरणीची खरी कसरत असते. दिवाळीच्या प्रत्येक पदार्थाचा रंग-रूप, आकार, चव, स्पर्श व आवाज वेगवेगळा आहे. म्हणून आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांना आनंद देणारी अशी दिवाळी आपल्याला इतर सणांपेक्षा जास्त आवडते. कारण यात प्रत्येकाच्या प्रत्येक आवडीनिवडीची काळजी घेतली आहे.

बहुतांशी दिवाळीच्या फराळातील पदार्थ हे पार्थिव, आकाशीय व वायुवीय तत्त्वाचे असतात. त्यांच्यावर अग्नी व जल तत्त्वाचा संस्कार झालेला असतो. जसे की काही पदार्थ तेज व जल तत्त्व प्रधान अशा उष्ण तेलात तळलेले असणे. यामुळे त्या पदार्थावर या दोन महाभूतांचे संस्कार होतात. संस्कारांमुळेच त्या पदार्थात गुणपरिवर्तन होते. टणक पदार्थ मऊ होतात तर मऊ पदार्थ टणक होतात. म्हणून तर लाडू, करंज्या, शंकरपाळ्या, कापण्या, चिरोटे, शेव, चिरमुरे, अनारसे, चकल्या या प्रत्येकाचे पांचभौतिकत्व वेगवेगळे असते. त्यामुळे लाडू टणक असतात. करंज्या पटकन फुटतात. शंकरपाळ्या, चिरोटे मऊ असतात. शेव, चकल्या कुरकुरीत असतात. तर गुलाबजामून, रसगुल्ले जल महाभूत युक्त पार्थिव असतात. काही मधुर रसाचे गोड, काही तिखट तर काही आंबटगोड असतात. या प्रत्येक पदार्थाचे एक विशिष्ट पांचभौतिक संघटन असते. म्हणून तर प्रत्येक पदार्थ बनविताना ठरलेल्या प्रमाणातच घ्यावा लागतो, त्यास पाणी, अग्नीसुद्धा ठरल्याप्रमाणेच द्यावा लागतो नाही तर त्या पदार्थाचे पांचभौतिक संघटन बिघडते व पदार्थ बिघडतो.

— क्रमशः भाग पहिला 

लेखक : माहिती संग्राहक : श्री आनंद महाजन

योग प्रशिक्षक, अमरावती.

प्रस्तुती : सुश्री सुलु साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दिन दिन दिवाळी !! लक्ष्मी पूजन !!” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? विविधा ?

☆ “दिन दिन दिवाळी !! लक्ष्मी पूजन !!” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

 ॐ महालक्ष्मी च विद्महे

 विष्णुपत्नीच धीमही

 तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् !!

आज दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस. आज समृद्धीची, संपन्नतेची पूजा केली जाते‌. यावेळी निसर्ग सुद्धा सर्वांगाने बहरून आलेला असतो. पावसामुळे धरणी हिरवीगार आणि शरद ऋतूचे आल्हाददायक वातावरण असते. शेतामध्ये धनधान्याचा हंगाम असतो. त्यामुळे आनंदाचे, चैतन्याचे वातावरण असते आणि हाच आनंद दिवाळीत ओसंडून वाहत असतो.

दारापुढे सुंदर रांगोळ्या, दाराला पाना फुलांचे तोरण, दिव्यांच्या माळा, फुलांच्या माळा, तेवत्या पणत्या, प्रकाशमान आकाश कंदील अशा थाटामध्ये प्रत्येक घर उजळून निघालेले असते. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असते. मोठ्या उत्साहामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. दारिद्र्याचा अंधार दूर सारून समृद्धीचा दीप चेतवावा हा संदेश यावेळी सर्वार्थानं प्रकट होतो.

घरामध्ये, व्यवसायात समृद्धी रहावी, दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लक्ष्मीची पूजा करायची. त्याच बरोबरीने कुबेराची पूजा केली जाते. कुबेर हा देवांच्या संपत्तीचा राखणदार समजला जातो. तो संपत्ती संग्राहक, धनाधिपती, पैसा कसा राखावा हे शिकवणारा, स्वतःला संपत्तीचा मोह नसणारा, अतिशय निरोगी आहे असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. तेव्हा धनधान्य प्राप्त झाल्यावर मनुष्याला अहंकाराची बाधा होऊ नये यासाठी कुबेराचे स्मरण करायचे.

 ‘लक्ष्मी’ला चंचल म्हणतात. पण लक्ष्मी चंचल नसते. लक्ष्मीवान माणसाची मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे. त्यामुळे मानव देवही बनू शकतो आणि दानवही बनू शकतो. लक्ष्मीला भोग प्राप्तीचे साधन समजणाऱ्या माणसांचा ऱ्हास हा ठरलेलाच असतो. लक्ष्मीची पूजा करून तिचा योग्य सन्मान करणार्‍याची भरभराट तर होतेच. पण इतरांनाही तो सहाय्यभूत होतो. म्हणूनच दैन्य जाणवेल इतके कमी पण नको आणि बुद्धीचा तोल ढळेल इतके जास्त पण नको, इतकेच धन देवाने द्यावे अशी त्याची प्रार्थना करायला हवी.

लक्ष्मीचा वापर कोण, कशासाठी करतो यावर तिचे फळ अवलंबून असते. विपरीत मार्गाने वापरली जाते ती ‘अलक्ष्मी’, स्वार्थात वापरतात ते वित्त, दुसऱ्यासाठी वापरली जाते ती ‘लक्ष्मी ‘आणि देवकार्यासाठी वापरली जाते तिला ‘महालक्ष्मी ‘ म्हणतात. उदारहस्ते सांस्कृतिक कार्यात, सत्कार्यात लक्ष्मी खर्च करणाऱ्याच्या घरी ती पिढ्यानपिढ्या वास करते. म्हणूनच म्हणतात, ‘लक्ष्मी ही एक महान शक्ती असल्याने ती चांगल्या लोकांच्या हातातच राहिली पाहिजे, तरच तिचा सुयोग्य वापर होतो.

लक्ष्मी प्रमाणातच मिळाली पाहिजे. कारण लक्ष्मीच्या नाण्याला दोन बाजू असतात. तिचा वापर स्वार्थासाठी करायचा का परमार्थासाठी हे आपणच ठरवतो. तेव्हा या वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थकी लावणारी शक्ती मानून तिचे पूजन करायचे. बुद्धीचा समतोल राहू दे अशी प्रार्थना करायची.

एक गोष्ट महत्त्वाची आहे गैर मार्गाने आलेली लक्ष्मी कधीही स्थिर राहत नसते. तिच्यापासून शाश्वत सुख मिळत नाही तर प्रामाणिकपणे मिळवलेली लक्ष्मी शाश्‍वत सुखासमाधानाने आपली झोळी भरते. म्हणूनच असे सांगितले जाते की, “जो दुसऱ्याचे ओरबाडून खातो त्याला विकृती म्हणतात, जो आपले स्वतःचे खातो त्याला प्रकृती म्हणतात आणि जो आपल्यातले इतरांना खाऊ घालतो त्याला संस्कृती म्हणतात”. हेच या लक्ष्मीपूजनाचे सार आहे. लक्ष्मीमातेने सर्वांवर भरभरून कृपा करावी अशी तिच्या चरणी प्रार्थना करूयात.

शुभ दीपावली.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ धनतेरस (?) ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

धनतेरस (?) 🪔 ☆ श्री सुनील देशपांडे 

वसुबारस नंतर येते ती धनत्रयोदशी.

ज्यांना संस्कृत म्हणणे अवघड वाटते आणि जोडाक्षर म्हणणे गैरसोयीचे वाटते अशा लोकांनी धनत्रयोदशी म्हणण्याऐवजी वसुबारस नंतर धनतेरस असा फंडा तयार करून धनत्रयोदशीला धनतेरस असे नाव देण्याची रूढी निर्माण केली.

त्याचप्रमाणे धनत्रयोदशी ही कशासाठी आहे हे माहीत नसणाऱ्यांनी धनतेरस किंवा धनत्रयोदशी याचा संबंध धनाशी जोडून धनाची पूजा करण्याची रूढी निर्माण केली. धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी पूजनाचा दिवस. धन्वंतरी चा धन त्रयोदशीला जोडून हा शब्द झाला आहे.

दिवाळीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा वसुबारस म्हणजे गाईचा आदर्श समोर ठेवावा. गाईचे शुद्ध दुग्धजन्य पदार्थ वापरून आपला आहार आरोग्यपूर्ण ठेवावा. नैसर्गिक आणि शाकाहारी पदार्थांचा वापर करून आहार संतुलित ठेवावा. हा वसुबारसचा संदेश आणि उद्देश.

त्यानंतर येणारे धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरीला आठवावे. धन्वंतरी ही आरोग्य देणारी देवता. त्याला आपण अलीकडच्या काळात देवांचे डॉक्टर असे म्हणून ही संबोधतो. उत्सव साजरा करताना आरोग्याची काळजी घ्यावी, स्वतःचे कुटुंबाचे आणि समाजाचे आरोग्य नीट राहावे, सर्वांनीच आरोग्यपूर्ण जीवन जगावे यासाठी धन्वंतरीची शिकवण सगळ्यात महत्त्वाची. हा संदेश उत्सव साजरा करण्यापूर्वी देण्यासाठी धनत्रयोदशीचं प्रयोजन असलं पाहिजे असं मला वाटतं.

अलीकडच्या काळात या संदेशाला जास्तच महत्त्व आहे. स्वतःचं आरोग्य सांभाळण्यासाठी आरोग्यपूर्ण, प्रदूषण रहित आणि शक्यतो आपुलकीच्या भावनेने घरीच आरोग्यपूर्णरित्या बनवलेले पदार्थ उत्सव साजरा करण्यासाठी सेवन करावेत. कुटुंबाच्या आरोग्यासाठी कुटुंबातील सर्व वयाच्या आणि सर्व परिस्थितीतील व्यक्तींना योग्य अशा पथ्यकारक आणि आरोग्यपूर्ण पदार्थांसाठी आग्रह धरावा हा कौटुंबिक उद्देश. सामाजिक आरोग्यासाठी एकमेकांच्या घरच्या शुद्ध आणि आपुलकीने बनवलेल्या पदार्थांची देवाण-घेवाण करावी. समाजाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी घरासभोवतीचे वातावरण स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण असावे यासाठी फटाक्यांसारख्या धोकादायक आणि प्रदूषणात्मक गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. आपले स्वतःचे घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ व निर्मळ राहावा यासाठी परिसराची स्वच्छता व परिसर दिव्यांनी उजळून निघावा प्रकाशाची पूजा व्हावी हा उत्सवाचा मूळ आत्मा. फटाक्यामधून आपण या मूळ आत्म्यालाच उडवून टाकतो असे नाही वाटत? विकतचे पदार्थ आणून आणि एकमेकांना देऊन आपण सामाजिक आरोग्याचा आत्माच हरवून टाकतो असे नाही वाटत? अलीकडे उत्सवांचं सामाजिकरण होण्याऐवजी व्यापारीकरण होत राहिल्यामुळे उत्सवाचे मूळ उद्देश आणि त्या उत्सवातील आनंदाचा आत्माच हरवून चालला आहे असे नाही का वाटत? 

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झुलणारा आकाशकंदील ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

☆ झुलणारा आकाशकंदील  ☆ डॉ. जयंत गुजराती

ठिपक्या ठिपक्याने उमटणारी रांगोळी, त्यात पुरले जाणारे रंग म्हणजे दिवाळी. शिवून आलेले नवीन कपडे घालण्याची हौस म्हणजे दिवाळी. फटाक्यांची माळ तसेच उंच उंच उडणारे लखलखणारे बाण, प्रकाशपर्वास अनुरूप अशा कारंजासह फुलणाऱ्या कोठ्या, भूईचक्रांची पळापळ, टिकल्यांची फटफट, म्हणजे दिवाळी, तळणाचा खमंग वास घरभर पसरून राहणे म्हणजे दिवाळी, अन् हो रंगीबेरंगी आकाशकंदील आतील दिव्यासह झुलत राहणे म्हणजे दिवाळी.

वात्सल्यमूर्ति सवत्सधेनुचे पूजन करत माया ममतेचे आरोपण करणे म्हणजे दिवाळी. मांगल्याची कामना करत दिव्यांची आरास रचत भावविश्व समृद्ध करणे म्हणजे दिवाळी. असूरांचा संहार करत जीवन मूल्यांची पुनर्स्थापना म्हणजे दिवाळी. अनपगामिनी, परत न जाणाऱ्या लक्ष्मीचे मनोभावे आवाहन करणे म्हणजे दिवाळी. नवनवे नित्यनूतन काही गवसावे याची वांच्छा राखून नूतन वर्षाचे मुक्तमनाने स्वागत करणे म्हणजे दिवाळी. भावा बहिणीचे अक्षय टिकणारे नाते अधिक सुदृढ व सकारात्मक रहावे यासाठीची उजळणी, ओवाळणीसह साजरे करणे म्हणजे दिवाळी. अशी दिवाळी आपणा सर्वांस लाभो व हो तो रंगीबेरंगी आकाशकंदील मनात कायमचा झुलत राहो या सदिच्छांसह – – –

विनीत,

डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

??

☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-६ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

.. चैत्र पालवी…

मराठी चैत्र महिना उत्साहाचं वारं घेऊनच येतो. माहेरवाशिण चैत्रगौर घरोघरी विराजमान होते. आपल्यातल्या सुप्त गुणांना, कलेला वाव देण्यासाठी गृहिणींची लगबग सुरू होते. आमची आई आणि विमल काकू चैत्रगौर अप्रतिम सजवायच्या. पंचामृत, शुद्धोदक चंदन, अत्तर लावून चैत्रगौर लखलखीत घासलेल्या नक्षीदार झोपाळ्यात मखमली आसनावर विराजमान व्हायची. गृहिणीच्या उत्साहाला उधाण यायचं. हळदी कुंकवाच्या दिवशी. घरातल्याच वस्तू वापरून कमी खर्चात सुंदर आरास सजायची. सोनेरी जरीकाठाचे, मोतीया रंगाचे उपरणे अंथरून पायऱ्या केल्या जायच्या. अफलातून आयडिया म्हणजे सुबक कापून टरबुजाचं कमळ, कैरीचा घड, द्राक्षाचं स्वस्तिक आणि हिरव्यागार पोपटी कैरीला टोकाकडून कुंकू पाण्यात कालवून लाल जर्द चोचीचा डौलदार पोपट सुंदर ग्लासात ऐटीत बसायचा. छताला हाताने बनवलेलं तोरण चमकायचं. फळांच्या खाली बारीक दोऱ्याने विणलेली कमळं ऐसपैस पसरली जायची. असा होता चैत्रगौरीचा थाट. मग का नाही गौर प्रसन्न होणार?

आईच्या मैत्रिणीकडे शांतामावशीकडे अन्नपूर्णेसह लक्ष्मी पाणी भरत होती. चांदीच्या ताटात वाट्या, तांब्याभांडं, व पेल्याचा सेटच होता तिच्याकडे. त्याकाळी स्टील घेणे सुद्धा महागात पडायचं. सजलेल्या चैत्रगौरीपुढे चांदीच्या ताटलीत छोट्या नक्षीदार वाट्यांमधून आंब्याची डाळ, पन्हं आणि झक्कास हरभऱ्याची उसळ, काकडीची चकती सुबकपणे मांडून चविष्ट नैवेद्य देवीपुढे मांडला जायचा. चांदीच्या रेखीव पेल्यात केशर, विलायची युक्त केशरी पन्हं पाहून आमच्या मुलांच्या तोंडाला पाणी सुटायचं आणि मग काय ! पोटभर छानशी उसळ, चटकदार कैरीची डाळ, आणि बर्फाचे खडे घातलेले जम्बो ग्लासातले ते केशरी अमृत पिऊन पोटभर फराळ करून हळदी कुंकवाची, फराळाची सांगता व्हायची.

सवाष्णीसाठी तर हा समारंभ म्हणजे मानाचे पान. हळदी कुंकू, गजरा, अत्तर, आंब्याच्या डाळी, आणि काकडीबरोबर घशाला थंडावा देणारं अप्रतिम चवीचं थंडगार पन्हं पिऊन त्या तृप्त तृप्त व्हायच्या.

नवरात्रात रोज उठता बसता म्हणजे पहिल्या आणि दसऱ्याच्या दिवशी सवाष्ण व कुमारीका जेवायला असायची. पुण्यात शिकायला आलेले गरीब विद्यार्थी अध्ययन शिक्षण घ्यायचे पण पोटोबाचे काय? हा त्यांचा प्रश्न सुगरण गृहिणी सहजतेने माधुकरी देऊन सोडवायच्या. आता मुलांना तोंडातून शब्द बाहेर पडल्यावर सहज अगदी त्या क्षणी सारं काही मिळतंय, आई-वडिलांच्या जीवावर पैसा अडका, कपडे, चैनीच्या वस्तू, गाड्या अगदी विनासायास मिळताहेत, पण त्या काळी पोटासाठी पुण्यात विद्यार्थ्याला ठराविक घर हिंडून घरोघरी “भवती भिक्षां देही ” असं म्हणून फिरावे लागायचे. तेव्हां गृहिणीची त्या देण्यात.. “अतिथी देवो भव ” ही पुण्यकर्माची भावना असायची. बुद्धीने कष्टाने मिळवलेलं ते संघर्षमय असं विद्यार्थी जीवन होतं. अशा या विद्येच्या माहेरघरात कितीतरी विद्यमान व्यक्ती यशोदायी होऊन शिक्षण क्षेत्रात चमकल्या. उगीच नाही पालक म्हणायचे, ‘ पुणं तिथे काय उणं ‘. असं होतं विद्यादान, अन्नदान करण्यात अग्रगण्य असलेलं तेव्हाचं कसबे पुणं..

– क्रमशः भाग सहावा

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आठवतंय ना…… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आठवतंय ना… अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

आज आठवते ना आपल्या लहानपणीची दिवाळी. २५ पर्यंत पाढे पाठांतर, २१ दिवसांचे दहा ओळींचे शुद्धलेखन, कविता पाठांतर, निबंध. दिवाळी सुट्टी अभ्यासासाठी दोनशे पानी वही व शुद्धलेखनासाठी शंभर पानी दुरेघी वही.

गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी. इतका दिवाळीतला गृहपाठ करूनसुद्धा आपण दिवाळीत धम्माल करायचो. किल्ले बनवायचो, रांगोळीसाठी अगरबत्तीने ठिपके पाड़ून द्यायचो. मनसोक्त फटाके फोडायचो. सापाची गोळी आठवते ना… टेलिफोनचा फटाका आठवतो का… चिड़ी कुठून कुठे उड़ायची माहित आहे ना… राॅकेटसाठी कुठून पण बाटली शोधून आणायचो. रस्त्यावर लावलेला बाण आड़वा होऊन कोणाकोणाच्या ढेंगातून गेला होता…. आठवतंय ना. कधी कधी बाण कोणाच्या खिडकीतून घरात घुसायचा, मग त्या काकी भडकण्याच्या आधी सगळे तिथून धूम ठोकायचे.

सगळे फटाके संपल्यावर अर्धवट पड़लेल्या फटाक्यांची दारू पेपरमध्ये जमा करायचो आणि पेपराला सगळ्याबाजूने आग लावल्यानंतर उड़ालेला आगीचा ज्वाळ पहाताना मिळणारा आनंद….. आठवतंय ना..

खरंच, दिवाळीच्या दिवसात आम्ही श्रीमंत व्हायचो, कारण बाबा, मामा, काका, खिशात पैसे टाकायचे आणि उरलेल्या दिवसात अर्ध्या तासाचे 50 पैसे किंवा तासाचा 1 रुपया देऊन सायकल भाड़्याने घेऊन फिरायला जायचो ना…

आता फक्त हातात मोबाईल घेऊन त्यातच गर्क असलेली मुले दिसतात तेव्हा सांगावेसे वाटते,

“अरे बाबांनो.. दिवाळी म्हणजे व्हाॅटसअपवरचे मेसेज आणि व्हिड़ीओ नसतात रे…. ! “ 

असो…. !! 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ तिकीट ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ तिकीट… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. इच्छुक माणूस उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नरत आहे. काहींनी तर देव पाण्यात घालून ठेवले असतील…… असो, समजा एखाद्या मनुष्याला एखाद्या पक्षाने उमेदवारी दिली आणि तो निवडून आला. तर तो पक्षांतर करणार नाही असे आपण सांगू शकत नाही….. तसेच त्याने दिलेली आश्वासने पूर्ण करेलच असे नाही…….

तिकीट….

अनेक लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय….

एक महामंडळ आहे, ज्याने अनेकांचे जीवन घडवले, ते सुध्दा आपल्या ग्राहकांना तिकीट देते आणि मुख्य म्हणजे ते तिकीट अहस्तांतरणीय असते…..

आपल्या लक्षात आलेच असेल….. आपल्या सर्वांच्या जिवाभावाची एस. टी.

एस. टी. ने अनेकांची आयुष्ये उजळली. पूर्वी ग्रामीण भागात एस. टी. शिवाय पर्याय नव्हता…. आणि एस. टी. शिवाय अन्य पर्याय नव्हता आणि एस. टी. लाही पर्याय नव्हता…..

विद्यार्थी, चाकरमानी (नोकरदार), रुग्ण, अन्य प्रवासी यांना वाट पाहीन पण एस. टी. नेच जाईन असे घोष वाक्य न लावता, लोकं लाल रंगाची पिवळा पट्टा असलेल्या एस. टी. ची चातका सारखी वाट पाहत असतं…

अनेक गावात अमुक वेळेची बस आली की लोकं त्यावर आपली घड्याळे लावत असतं…..

कमीतकमी पैशात योग्य स्थानावर सुरक्षित प्रवास घडवणारे प्रवासाचे एकेमव माध्यम एस टी हेच होते……

महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हणता येईल अशी एस. टी.

एस. टी. गावात आली नाही तर त्यादिवशी गावांसाठी ती बातमी असे…..

ज्यांनी एस. टी. ला विश्वासाहर्यता मिळवून तमाम कर्मचारी बंधू भगिनींना कितीही धन्यवाद दिले तरी कमीच पडतील……

तर….. अशी तिकीट देऊन तिकीट घेणाऱ्यांचे आणि त्याच्या कुटुंबाचे हीत जपणारी आपली सर्वांची जिवाभावाची #एश्टी#…… !!

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दिन दिन दिवाळी !! नरकचतुर्दशी !!” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? विविधा ?

☆ “दिन दिन दिवाळी !! नरकचतुर्दशी !!” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आज ‘ नरक चतुर्दशी ‘. आजची पहाट रांगोळ्यांनी सजलेली, दिव्यांनी उजळलेली मंगल-प्रसन्न पहाट असते. आज पहाटेचे अभंगस्नान, यमाचे तर्पण, नरकभय निवारणासाठी दिवा लावणे, देवदर्शन, फराळाचा आस्वाद, रात्री दिव्यांची आरास असा दिवसाचा दिनक्रम असतो.

स्वर्ग आणि नरक या संकल्पना बहुतेक सगळीकडेच रूढ आहेत. आयुष्यात चांगली कृत्ये केल्यास मृत्युनंतर स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्यांमुळे नरकात जावे लागते अशी समजूत आहे. या नरकाचे सर्वांनाच भय असते. तेव्हा या नरकभयापासून मुक्त होण्यासाठी आजच्या दिवशी एक दिवा लावावा आणि संध्याकाळी घर, मंदिर, मठ या ठिकाणी दिव्यांची आरास करावी असे सांगितले आहे.

आजच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासूराचा वध केला. नरकासूर प्रागज्योतिष्पूर नगरीचा राजा होता. आपल्या असूरी शक्तीने तो देव आणि मानव सर्वांना त्रास देत असे. त्याने सोळासहस्र राजकन्यांना पळवून आणून आपल्या कैदेत ठेवले. त्यांच्या सुटकेसाठी भगवान श्रीकृष्णाने युद्ध करून त्याला ठार मारले. त्या आनंदाप्रीत्यर्थ लोकांनी उत्सव साजरा केला. दिवे लावून अंधाराला, संकटाला, भीतीला दूर पळवले.

मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला. आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने तसा वर दिला. म्हणूनच आज पहाटेच्यावेळी अभ्यंगस्नान करतात. आसूरी शक्तींचा, आसूरी महत्त्वाकांक्षेचा शेवटी नाशच होतो असा संदेश ही कथा देते. म्हणून प्रत्येकाने या दिवशी चांगले वागणे, चांगल्याची साथ देणे असा संकल्प केला पाहिजे.

स्त्री उध्दाराच्या या कामासाठी सत्यभामेने पुढाकार घेतलेला होता. नरकासूराच्या बंदीवासात राहिल्याने या राजकन्यांना कलंकित मानले जाऊ नये, त्यांचे सामाजिक स्थान हीन होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने त्या सर्व राजकन्यांशी विवाह केला अशीही कथा आहे.

स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या सतत ऐकायला मिळतात. त्यांना आळा कसा घालायचा हा खरा प्रश्न आहे. यासाठी कोणी श्रीकृष्ण धावून येईल असा चमत्कार होणार नाही. त्यासाठी सर्वांनीच आपल्या मनात श्रीकृष्णाचे विचार जागृत करून स्त्री शक्तीचे रक्षण केले पाहिजे. यामधे स्त्रियांनी सुद्धा सहभागी व्हायला हवे. आपले रक्षण आपणच करण्यासाठी आवश्यक गोष्टी लहानपणापासून शिकायला हव्यात. मन कणखर बनून अंगी धिटाई येईल. मुली स्वयंपूर्ण बनतील. त्याचबरोबर मुलांना लहानपणापासून स्त्रीचा आदर करायचा, स्त्री-पुरुष दोघेही समान आहेत, कोणत्याही प्रसंगात त्रास द्यायचा नाही असेच संस्कार द्यायला हवेत. त्यामुळे मुला-मुलींची मानसिकता विवेकी, सुदृढ व निकोप बनून ते मोठेपणी सुजाण, जबाबदार नागरिक बनतील.

प्रत्येकाने आपल्या मनातल्या परमेश्वराचे स्मरण ठेवले ; तर हातून वाईट कृत्य घडणारच नाहीत. जीवनाला नरक बनवणाऱ्या अस्वच्छता, आळस, प्रमाद, वासनांधता, व्यसनाधीनता या गोष्टी नरकासूरच आहेत. त्यांना आज नष्ट करायचे. वाईटातून चांगल्याची, अंधारातून उजेडाची वाट धरायची. तेव्हा चांगल्याचे रक्षण व्हावे, नाती जास्त जवळ यावीत यासाठी एकत्रितपणे पण नियम पाळत, सामाजिक भान राखत श्रध्देने, आनंदाने हा सण साजरा करू या.

शुभ दीपावली.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३0 ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३0 ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- आठवड्यातून ठरलेले दोन दिवस बँकेत येतानाच ‘लिटिल् फ्लावर’ मधे जाऊन कॅश व्यवस्थित मोजून घेऊन मी स्वतःच बँकेत घेऊन येऊ लागलो. कांही दिवस हे असं सुरू राहिलं पण अचानक एक दिवस या क्रमाला अतिशय अनपेक्षितपणे वेगळंच वळण लागलं आणि या सगळ्या चांगल्यात मिठाचा खडा पडला! मला मुळापासून हादरवून सोडणारी ती एक नाट्यपूर्ण कलाटणी मला पूर्णत: हतबल करून गेली होती! 

मला पुढे येऊ पहाणाऱ्या एका अतर्क्य आणि गूढ अशा अनुभवाची हीच तर पार्श्वभूमी ठरणार होती आणि सुरुवातसुद्धा.. !) इथून पुढे —- 

तो शुक्रवार होता. आमच्या रिजनल ऑफिसकडून आलेल्या फोनवर दुसऱ्या दिवशी शनिवारी संध्याकाळी ५. ३० वाजता अचानक ठरलेल्या ब्रॅंच मॅनेजर मिटिंगसाठी मला कोल्हापूरला येण्याचा निरोप मिळाला. योगायोग असा की मीटिंगच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पौर्णिमा होती आणि मीटिंग संपताच सांगलीला घरी मुक्कामाला जाऊन ति‌थून रविवारी माझ्या नेमानुसार पौर्णिमेला नृसिंहवाडीला दत्तदर्शनासाठी जाणंही सुलभ होणार होतं.

पण हा निरोप मिळताच मीटिंगची आवश्यक ती माहिती गोळा करून फाईल तयार करायलाच खूप रात्र झाली. म्हणून मग रात्री उशिरा न निघता शनिवारी पहाटेच्या बसने निघायचं ठरवलं. रात्री अंथरुणाला पाठ टेकली आणि शनिवारी सकाळी ‘लिटिल् फ्लॉवर’ मधे जाऊन आपल्याला कॅश कलेक्ट करायचीय याची आठवण झाली. रिजनल ऑफिसच्या फोननंतर सुरू झालेल्या या सगळ्या गदारोळात शनिवारी कॅश कलेक्शनसाठी मला येता येणार नाहीय असा मिस् डिसोझांना निरोप देणं राहूनच गेलं होतं त्यामुळे कॅश कलेक्ट करणं क्रमप्राप्तच होतं.

शेवटी पहाटे उठून प्रवासाची तयारी करून मी बॅग घेऊन बाहेर पडलो ते नेहमीप्रमाणे आठ वाजताच. ‘लिटिल् फ्लाॅवर’ मधे जाऊन पैसे मोजून ताब्यात घेतले. बँकेत जाऊन पैसे व स्लीप सुजाताच्या ताब्यात दिली.

“कॅश नीट मोजून घे. मगच मी निघतो. ” मी गंमतीनं म्हटलं. ती हसली. समोर इतर कस्टमर्स थांबलेले होते म्हणून मग तिने मी दिलेली ती कॅश आणि स्लीप समोर बाजूला सरकवून ठेवली आणि…. “सर, असू दे. तुम्ही स्वत: कॅश मोजून आणलीय म्हणजे ती बरोबरच असणाराय. मी नंतर मोजते. तुम्हाला उशीर होईल. तुम्ही तेवढ्यांसाठी नका थांबू. ” ती मनापासून म्हणाली. ते खरंही होतंच. मला तातडीने स्टॅण्ड गाठणं आवश्यक होतंच. सर्वांचा निरोप घेऊन मी निघालो.

पुढचं सगळंच सुरळीत झालं. मीटिंग चांगली झाली. मला घरी रहाताही आलं. सर्वांना भेटता आलं. गप्पा झाल्या. आराम करता आला. रविवारी नृसिंहवाडीचं दत्तदर्शनही निर्विघ्नपणे पार पडलं. आणि मग नेहमीच्या चक्रात अडकण्यासाठी मी रविवारी रात्री उशिराची सोलापूर बस पकडली. पहाटे साडेपाचच्या सुमारास घरी पोचलो. थोडा आराम करायलासुध्दा वेळ नव्हताच. सगळं आवरून साडेआठला ब्रॅंच गाठली. रात्रभराच्या जागरणाचा शीण सोबत असल्याने उत्साह फारसा नव्हताच. पण जो होता तो उसना उत्साहही नाहीसा करणारं एक अशुभ आक्रित 

ब्रॅंचमधे माझी वाट पहात होतं!मी केबिनमधे जाऊन बसलोही नव्हतो तेवढ्यांत माझीच वाट पहात असल्यासारखे हेडकॅशिअर सुहास गर्दे माझ्या पाठोपाठ केबिनमधे आले.

“गुड मॉर्निंग सर”

“गुड मॉर्निंग. बसा. कांही विशेष?”

“विशेष असं नाही… पण एकदा तुमच्या कानावर घालावं असं वाटलं. तुम्ही परवा शनिवारी इथून गेल्यानंतर थोडा घोळच झाला होता… ” ते म्हणाले.

“घोळ ? म्हणजे.. ?”

“म्हणजे.. ‘लिटिल् फ्लॉवर’ च्या कॅशमधे साडेआठशे रुपये कमी होते सर… “

“काय? अहो, भलतंच काय? कसं शक्य आहे हे?.. “

“हो सर. पन्नास रुपयांच्या सतरा नोटा कमी होत्या… “

एव्हाना प्रचंड दडपणाखाली असलेली सुजाता बोबडे केबिनबाहेर घुटमळत उभी होती, ती आत येऊन माझ्यासमोर खाली मान घालून उभी राहिली.

“सुजाताs. काय म्हणतायत हे?”

” ह.. हो सर. आठशे पन्नास रुपये.. शॉर्ट होते.. “

तिचा आवाज भीतीनं थरथरत होता. तिचे डोळे नेहमीप्रमाणे पाझरु लागले. ती उभीच्या उभी थरथरू लागली. टोकाच्या संतापाने माझं मन भरुन आलेलं असतानाही कांही न बोलता मी डोकं गच्च धरून क्षणभर तसाच बसून राहिलो. संतापाने भरलेल्या जळजळीत नजरेने सुजाताकडे पाहून तिला जायला सांगितलं. डोळे पुसत ती केबिनबाहेर गेली. मी व्यवस्थित पैसे मोजून हिच्याकडे दिलेले असताना आठशे पन्नास रुपये कमी येतीलच कसे? एखाद दुसरी नोट कमी असणंही शक्यच नव्हतं आणि पन्नास रुपयांच्या सतरा नोटा कमी?शक्यच नाही. माझ्या मनातला संशयी विचार सुजाताच्या पाठमोऱ्या आकृतीचा पाठलाग करत राहिला. तिचे कौटुंबिक प्रश्न, थोड्याच दिवसात येऊ घातलेलं तिचं बाळंतपण, आर्थिक ओढग्रस्तता.. सगळंच माझ्या मनातल्या संशयाला पुष्टी देणारंच होतं. पण तो संशयाचा कांटा मनात रुतण्यापूर्वीच मी क्षणार्धात उपटून तो दूर भिरकावून दिला. नाही… सुजाता असं कांही करणं शक्य नाही… ! मी माझ्या मनाला बजावून सांगितलं. पण तरीही ते साडेआठशे रुपये गेले कुठं हा प्रश्न मात्र माझं मन कुरतडत राहिला.

“सुहास, इतर कुठल्यातरी रिसीटमधे चूक असेल.. काहीतरी गफलत असेल. त्या कॅशमधे चूक असणं शक्यच नाही… “

” सगळ्या रिसिटस् दोन दोनदा चेक करून खात्री करून घेतलीय सर. सगळं बरोबर होतं. त्यादिवशी सगळेजण खूप उशीरपर्यंत याच व्यापात होतो. पण आता काळजीचं कांही कारण नाहीय सर. त्या संध्याकाळी आम्ही प्राॅब्लेम साॅल्व्ह करुन मगच घरी गेलो सर. आता प्रॉब्लेम मिटलाय. पैसेही वसूल झालेत. “

मी दचकून बघतच राहिलो क्षणभर.

“प्रॉब्लेम मिटलाय? पैसे वसूल झालेत?म्हणजे?कसे?कुणी भरले?”

“मी ‘लिटिल् फ्लाॅवर’ला त्याच दिवशी संध्याकाळी फोन करून सांगितलं सर. तुम्ही मीटिंगसाठी कोल्हापूरला गेलायत हेही सांगितलं. त्यांनी लगेच पैसे पाठवले सर. “

ऐकून मला धक्काच बसला. काय बोलावं, कसं रिअॅक्ट व्हावं समजेचना. मिस् डिसोझांना फोन करण्यासाठी रिसिव्हर उचलला खरा पण हात थरथरू लागला. फोन न करताच मी रिसिव्हर ठेवून दिला.

माझ्या अपरोक्ष नको ते नको त्या पद्धतीने घडून गेलं होतं. सुहास गर्देने बाहेर जाऊन स्वतःचं काम सुरू केलं, पण जाताना त्याच्याही नकळत त्यानं मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय असंच वाटू लागलं. मी शांतपणे डोळे मिटून खुर्चीला डोकं टेकवून बसून राहिलो. पण स्वस्थता नव्हती.

माझ्या मिटल्या नजरेसमोर मला सगळं स्वच्छ दिसू लागलं होतं… ! हो. हे असंच घडणाराय.. !माझ्यासमोर उभं राहून मिस् डिसोझा संशयग्रस्त नजरेने माझ्याकडे पहातायत असा मला भास झाला… न्.. मी भानावर आलो. खुर्ची मागे सरकवून ताडकन् उठलो.

काहीतरी करायलाच हवं… पण काय? मन सून्न झालं होतं. काय करावं तेच सुचत नव्हतं. आणि.. आणि अचानक.. अस्वस्थ मनात अंधूक प्रकाश दाखवू पहाणारा एक धूसर विचार सळसळत वर झेपावला… आणि केबिनचं दार ढकलून मी बाहेर आलो… !

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares